* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२३/६/२५

नाझारेथचा ज्यू येशू / The Jew Jesus of Nazareth

क्षणभर रोमन लोकांची खुनाखुनी बाजूस ठेवून आपण जरा दूर जाऊ या.रोमन लोकांची ती भांडणे,ते कोलाहल,ते गदारोळ तसेच सोडून आपण पूर्वेकडच्या अधिक शांतताप्रिय राष्ट्राकडे जरा जाऊ या.इकडे अलेक्झांडर,हॅनिबॉल,सीझर जगाला आपल्या महत्त्वाकांक्षांनी व खाटिकखान्यांनी हैराण करीत असता पूर्वेकडील हिंदू,चिनी व ज्यू राष्ट्र शांतीचे महात्मे जगाला देत होती.


हिंदुस्थानात थोर सम्राट अशोक होऊन गेला.ख्रि.पू. २६४ ते ख्रि.पू.२२७ पर्यंत त्याने राज्य केले.एका मोठ्या युद्धात त्याला विजय मिळाला होता.युद्धातील क्रूरता व भीषणता प्रत्यक्ष पाहून त्याला युद्धाचा वीट आला व पुन्हा म्हणून युद्ध करावयाचे नाही.असे त्याने ठरविले व युद्धाऐवजी सदिच्छेचा, बंधुभावाचा व प्रेमाचा संदेश जगभर पसरविणे,हेच आपले जीवनकार्य निश्चित केले.


नाझारेथचा बहिष्कृत ज्यू येशू,मानवजाती कथा,अनुवाद - साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन 


चीनमध्ये कन्फ्यूशियसचे अनुयायीही शांतिप्रसार करीतच होते.कुआंगत्से,मेंन्सियस,मोटी,इत्यादी चिनी शांतिदूतांनी आपल्याच बांधवांची प्रेते तुडवीत जाण्यापेक्षा निराळ्याच मार्गाने जीवन कसे कंठावे हे शिकविले.त्यांनी शांतीचा मार्ग शोधला.

कधीकधी मेन्सियसची वाणी प्रेषिताच्या वाणीप्रमाणे भासे.तो म्हणतो,"श्रीमंतांच्या घरात चरबी आहे,मांस आहे.तर गरिबांच्या पोटाच्या दामट्या वळल्या आहेत ! श्रीमंतांच्या तबेल्यांत धष्टपुष्ट घोडे आहेत, तर दरिद्री लोक भुकेने मरत आहेत ! जिकडे तिकडे उपाशी मेलेल्या लोकांचे मुडदे पडलेले आहेत!... श्वापदे माणसांना व माणसे एकमेकांना खातील.


एपिक्यूरसने स्वार्थाचाच उपदेश केला;पण अविरोधी, शहाण्या स्वार्थाचा मेन्सियसने तेच ध्येय चिनी जनतेपुढे ठेवले.तो उपदेशितो,"सुख खुशाल भोगा,स्वतःच्या सुखासाठी जरूर खटपट करा,पण दुसऱ्यांच्या सुखाआड येऊ नका,

म्हणजे झाले." एपिक्यूरसप्रमाणे व येशूप्रमाणे मेन्सियसलाही लहान मुले फार आवडत. तो लिहितो,"ज्याचे हृदय लहान मुलाच्या हृदयासारखे असते,तोच खरा मोठा."


मेन्सियसच्या शब्दांपेक्षाही मोटीची उपदेशवाणी अधिक सुदंर आहे. उदाहरणार्थ, पुढील उतारा पाहा - 


" एका राज्याने दुसऱ्या राज्यावर हल्ले चढविणे,एका कुटुंबाने दुसऱ्यास लुबाडू पाहणे,माणसांनी एकमेकांस लुटणे,राजांनी निर्दय असणे,प्रधानांनी अप्रामाणिक असणे,पिता-पुत्रांत वात्सल्याचा व पितृभक्तीचा अभाव असणे,इत्यादी गोष्टी साम्राज्याला अपायकारक असतात.परस्पर सहानुभूती व प्रेम दर्शविण्याचा सद्गुण सर्वांच्या जीवनात येईल तर केवढी मौज होईल!राजे एकमेकांवर प्रेम करू लागतील,तर रणांगणाची जरुरीच भासणार नाही.सर्वत्र प्रेम असेल तर कुटुंबातील कोणीही एकमेकांस लुबाडणार नाहीत.सर्वत्र प्रेम असेल तर माणसे चोऱ्या करणार नाहीत,राजे व त्यांचे प्रधान उदार होतील, आई-बाप व मुले यांचे संबंध प्रेमळ होतील,भावाभावांत मेळ व प्रेम राहील,ते भांडणे पटकन विसरतील.माणसे परस्परांवर प्रेम करतील,तर बलवान दुर्बलास चिरडणार नाहीत वा खाणार नाहीत, बहुसंख्य लोक अल्पसंख्यकांना लुटणार नाहीत.श्रीमंत गरिबांचा अपमान करणार नाहीत.सरदारवर्ग गरीब घराण्यात जन्मलेल्या श्रमजीवी वर्गाचा उपमर्द करणार नाही,त्याच्याशी अरेरावीने वा अहंकाराने वागणार नाही. कपटी लोक साध्या,सरळ लोकांना फसविणार नाहीत, वा त्यांच्या डोक्यावर बसणार नाहीत."


चिनी ऋषीची ही वाणी हिब्रू भाषेत भांषातरिली,तर हेच शब्द प्रेषित,इसैया,अ‍ॅमॉस किंवा हिल्लेल यांचेही आहेत, असे आढळेल.ही चिनी वाणी अरॅमिक भाषेत भाषांतरिल्यास ती गॅलिलीतील निळ्या नभाखालच्या पर्वतांच्या व्यासपीठावरून उपदेश करणाऱ्या तदनंतरच्या ज्यू धर्मसंस्थापकांचीच वाणी वाटेल.


गॅलिलीचा तो सौम्य पुरुष! तो फकिराप्रमाणे हिंडणारा महात्मा ! त्याला कोणी देव तर कोणी पागल बनविले आहे! कोणी त्याला जादूटोणा करणारा समजत,तर कोणी त्याला ढोंगी बुवा म्हणत ! कोणी तर त्याला 'अमेरिकन पद्धतीचा प्रचारक' मानतात.पण तो यांपैकी कोणीही नव्हता.प्रेमाने द्वेष शमवावा,क्षमेने सूड जिंकावा,

नम्रतेने अहंकार जिकांवा;शांतीने रक्तपात जिंकावा,असे शिकविणारे जे अनेक महात्मे पूर्वेकडे झाले,त्यांच्याच परंपरेतील व त्याच मालिकेतील तोही एक होता.त्याचे खरे चित्र आजपर्यंत काढले गेलेले नाही व पुढेही कधी काढले जाईलसे वाटत नाही.कारण, त्याच्या प्रत्येक चरित्रकाराने जणू स्वतःचेच चित्र काढून त्याला ख्रिस्ताचे नाव दिले आहे,स्वतःला ख्रिस्तावर लादले आहे! बायबलात जसा येशू चमत्कार करणारा दिसतो;


त्याच्याभोवती जसे तेजोवलय शोभते,तद्वतच रेनन,पापिन,

वूस बार्टन वगैरेंनी लिहिलेल्या चरित्रांतही येशूच्या बाबतीत प्रकार आढळतात.ख्रिस्ताच्या आपणांसमोर असलेल्या चित्रांत खूप विरोधाभास आहेत ! एका गालावर मारले असता दुसरा गाल पुढे करण्यास सांगणारा येशू मंदिरात जमलेल्यांस फटके मारून बाहेर हाकलीत आहे असे दिसते! एका क्षणात तो पृथ्वीवर शांतता आणणारा आढळतो; तर दुसऱ्या क्षणी तो तरवार परजीत आहेसे दिसते ! 


सुखाचे व शांतीचे उपनिषद सांगणारा तो सुखी लोकांची टिंगल उडवितो ! (जे तुम्ही आज हसत आहात,तेच उद्या रडाल,आक्रोश कराल,समजले?) तो शत्रूना क्षमा करतो; पण शत्रूना प्रभूने ठार करावे म्हणून प्रभूला आळवितोही ! स्वर्गाच्या राज्याची घोषणा करणाराच तो अनेक जातीच्याजाती नरकात लोटतो!आपला उपहास करणारांनाही आशीर्वाद देणाराच तो.अंजिराचे झाड अंजीर देत नाही (अंजिरांचा मोसमच नसताना कोणता शहाणा मनुष्य अंजिराच्या झाडापासून अंजीर अपेक्षील?) म्हणून त्याला शिव्याशाप देण्यासही मागेपुढे पाहत नाही! असे हे परस्परविरोधी तुकडे एकत्र करून त्यांवरून जिंवत माणसाचे खरेखुरे चित्र तयार करता येईल का ?


हो.ते तयार करणे शक्य आहे असे मला वाटते.सजीव येशूचे चित्र हवे असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की,कितीही झाले,तरी मानव,मर्त्य होता.त्याचा स्वभाव हळूहळू विकसत गेला.त्याच्या जीवनात हळूहळू उत्क्रांती,वाढ होत गेली.इतर मानवांप्रमाणेच त्याचेही चारित्र्य हळूहळू फुलत गेले.नव्या करारांतील कालगणना आपण दूर फेकून देऊ या.त्यांच्या चरित्रातल्या ज्या अनेक कथा चार पुस्तकांत आल्या आहेत,

त्यांनाही फारसे महत्त्व नाही.त्या तोंडोतोंडी आलेल्या लोककथा आहेत.मानसशास्त्राचे किंवा इतिहासाचे ज्ञान नसणाऱ्यांनी त्या गोष्टी गोळा करून लिहून काढल्या आहेत.एखाद्या चिनी कोड्याप्रमाणे हे तुकडे बायबलात इकडे,तिकडे,चोहोंकडे,सर्वत्र पसरलेले,विखुरलेले आहेत.ते गोळा करून त्यांची नीट जुळणी करून पुनर्रचना करता आली,तर ज्याचे आकलन करता येईल,ज्याच्यावर प्रेम करता येईल, ज्याचे पूजन करता येईल असा पुरुष आपणास खास निर्मिता येईल,एका मर्त्य व्यक्तीचे सुंदर व सहृदय चित्र खचित उभे करता येईल.


हा पुरुष कशा प्रकारचा होता? प्रारंभी तो बंडखोर व तापट डोक्याचा होता,तो प्रतिष्ठितांच्या समाजाचा द्वेष करी;

आपल्यासारखे जे परित्यक्त वा दरिद्री होते, त्यांच्यात तो मिसळे,भोवतालचे जीवन पाहून तो असंतुष्ट झाला होता.अधिक चांगले जीवन सर्वांना लाभावे म्हणून झगडावयाला,लढा करावयाला तो तयार होता.त्याचा स्वभाव जहाल व जलाल होता.तो मारण्यासाठी हात उगारी;शाप देण्यासाठी जीभ उचली. जग सापांनी व सैतानांनी भरलेले आहे,असे त्याला वाटे. जग म्हणजे चोरांचे व लुटारूंचे माहेरघर व दरोडेखोरांची गुहा आहे,असे त्याला वाटे.या सर्वांना शुद्ध करणे किंवा हाकलून देणे हे आपले कर्तव्य आहे,अशी त्याची समजूत होती.थोडक्यात म्हणजे,उत्युत्कट क्रांतिकारक जॉन दि बॅप्टिस्ट याचा तो श्रद्धाळू शिष्य होता.


पण तो मानवांवर अपरंपार प्रेम करी,म्हणूनच त्यांच्यावर दातओठही खाई;त्यांचा द्वेषही करी.ज्यू प्रेषितांचा क्रोध व त्यांची करुणा ही दोन्ही त्याच्या ठायी होती.प्रथम काही असंतुष्ट भिकारडे लोकच त्याच्याभोवती गोळा झाले.पण जसजसे त्याचे अनुयायी वाढू लागले,त्याचे शिष्य त्याची पूजा करू लागले,तसतसा त्याच्या स्वभावातील मधुरतेचा स्तुत्य व उदात्त भाग अधिकाधिक प्रकट होऊ लागला,मातीचे सोने होऊ लागले.तो असंतुष्ट जनतेचा देवही बनला.आणि नंतर त्याचे मरण! पण आपण त्याचे चरित्र अधिक जवळ जाऊन पाहू या व त्याचा स्वभाव निरखू या.


लहानपणी तो नेहमी भटके,कधीही स्वस्थ बसत नसे. त्याच्या स्वभाव बंडखोर होता.त्याला आईबापांनी जेरुसलेम येथे आणले,

तेव्हा तो त्यांना सोडून निघून गेला व ज्यूंच्या धर्ममंदिरात जाऊन तेथील धर्मगरूंशी वाद करीत बसला.इकडे आईबाप त्याला शोधीत होते. शेवटी तो जेव्हा सापडला तेव्हा त्यांनी त्याची चांगलीच कानउघडणी केली.त्यांनी त्याला नाना प्रश्न विचारले. त्याची त्याने जरा रागानेच उत्तरे दिली.वडील मंडळींच्या म्हणण्याकडे तो दुर्लक्ष करू लागला.वडील मंडळीचे न ऐकण्याची प्रवृत्ती त्याच्या ठायी दिसून येऊ लागली.तो आपल्या सदसद्विवेकबुद्धीच्या सांगीप्रमाणे वागू लागला. पुढील अठरा वर्षांत त्याने काय काय केले ते समजत नाही.वयाच्या तिसाव्या वर्षी तो पुन्हा आईबापांना सोडून गेला व जॉर्डन नदीच्या तीरावर भटकत राहिला.


तिथेच तो जॉन दि बॅप्टिस्ट याच्या क्रांतिकारक पक्षास मिळाला.

जॉन हा एक संन्यासी होता.तो वृत्तीने आडदांड व क्रांतिकारक होता.तो द्वेषाचे उपनिषदच शिकवी. अननुतप्तांना वाचविण्यात त्याला विशेष आनंद वाटत नसे;तर अननुतप्तांना शिव्याशाप देण्यात व त्यांना शासन करण्यात त्याला खरा आनंद वाटे.

सुखोपभोग सुख म्हणजे त्याच्या मते पाप;व धनदौलत,इस्टेट असणे लाजिरवाणे.या जीवनात सुख मिळवू पाहणे म्हणजे पुढे कायम नरकाचा धनी होणे होय,असे तो सांगे.स्वतःचा उद्धार व्हावा असे वाटत असेल त्याने दारिद्र्याचे व्रत घ्यावे,अंगावर चिंध्या घालाव्यात,केस कसेतरी वाढवावे, स्वतःला असुखी करावे,

ईश्वराच्या आज्ञा पाळाव्यात व आपल्या (जॉनच्या) म्हणण्याप्रमाणे वागावे,असे जॉन दि बॅप्टिस्ट प्रतिपादत असे.


ही मतप्रणाली जरी प्रखर वैराग्याची व जरा असंस्कृत असली,

तितकीशी सुंदर नसली,तरी येशू तिच्याकडे ओढला गेला.

जॉनप्रमाणेच तोही बंडखोर होता, रूढींचा द्वेष्टा होता.त्याला आजूबाजूच्या लोकांच्या दंभाची मनस्वी चीड येई.जॉर्डन नदीच्या पाण्याने येशूला शुद्ध करून घेऊन नवदीक्षा देण्यात आली. तो जॉनचा मुख्य शिष्य,पट्टशिष्य झाला.पुढे जॉनला अटक झाली व येशू एकटाच राहिला.तो रानावनात भटकत राहिला.


मूसा, बुद्ध वगैरेंच्याप्रमाणेच त्यानेही केले.अनंत आकाश व निर्जन वन यांच्या सान्निध्यात राहून तो विचार करू लागला.

त्या गंभीर शांततेत त्याची विचारवेल फुलली व बहरली.तो आपल्या जन्मग्रामी परत आला.आपल्या लोकांना नवीन संदेश द्यावयास तो अधीर झाला होता.


पण त्याला धोंडे मारून त्याची हुर्रेवडी उडवण्यात आली! त्याच्या कुटुंबीयांनी त्याला हाकलून दिले व 'त्याचा आमचा काहीही संबंध नाही,तो एक भटक्या व निकामी माणूस आहे',असे म्हटले.नाझारेथच्या प्रमुख नागरिकांनी 'जर येथील शांततेत तू व्यत्यय आणशील बिघाड करशील,तर तुला कड्यावरून खाली लोटून देऊ',अशी धमकी दिली.भटकून भटकून बाळ परत घरी आला,तो सारे दरवाजे आपणास बंद आहेत, असे त्याला आढळून आले.रानातील पशुंनाही गुहा असते,पक्ष्यांनाही घरटी असतात,पण नाझारेथच्या या परित्यक्त्त्याला मात्र डोके टेकवायला कोठेही जागा नव्हती.


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….!


२१/६/२५

नागपंचमी / Nagpanchami

शरद म्हणाला, "हो, हो! का नाही? तुम्ही पुढे व्हा. शेकोटी रस्त्यावर पेटवू.सगळ्या वावरात तयार पिकांच्या गंज्या पडल्या आहेत.

एखादी ठिणगी पडली तर आक्रीत घडायचं.तुम्ही रस्त्यावर जाऊन थांबा,मी शेकोटी पेटवायला गबाळ घेऊन येतो."


शेकोटी पेटली.तिच्याभोवती बसून पुन्हा गप्पा सुरू झाल्या.मघाशी कुणीच न खाल्लेला चिवडा शरदने आणला होता.स्वतःच्याही नकळत सगळ्यांनी तो खायला सुरुवात केली. शरद सांगू लागला -


आता प्रतापभाऊचं लक्ष्य गावात दारूबंदी करायचं आहे.गेल्या आठवड्यातच त्याने आधी गावातल्या बायांची आणि नंतर पुरुषांची बैठक घेतली.बायका तर दादल्यांच्या दारू पिण्याने फारच गांजल्या आहेत. पैशापरी पैसा जातो अन् घरात नवरा-बायकोची भांडणं-मारहाण नित्याचंच.त्यामुळे मुलांचा अभ्यास होत नाही.प्रतापभाऊने पुरुषांच्या सभेत सगळ्या पुरुषांना सक्त ताकीद दिली की,'प्रत्येकाने दारू सोडायचा प्रयत्न मनापासून करायचा.तुम्हाला मी एका महिन्याचा अवधी देतो.तेवढ्यात दारू सुटलीच पाहिजे.त्यानंतर कुणी दारू प्यायला तर त्याच्यावर सामाजिक बहिष्कार घातला जाईल.आणि हो,जर कुणी बायकोवर हात टाकला तर त्याला मोठा दंड होईल !'


प्रतापभाऊने अशी ताकीद दिल्यामुळे सगळ्या बायका प्रतापभाऊवर एकदम खूश !"


गप्पा चालू असतानाच लांबून एक दिवा हळूहळू जवळ येताना दिसला.शरद म्हणाला,"एवढ्या रात्रीचं कोण येतंय कोण जाणे!"


तेवढ्यात एक जण सायकलवर त्यांच्या जवळ येऊन थांबला.त्या सायकलस्वाराने विचारलं,"कुठलं गाव हे ?"


"मुखेड." शरदने उत्तर दिलं.


सायकलस्वार रागाने म्हणाला,"भररस्त्यात शेकोटी काय म्हून पेटवली ? उजेड बघून फसलो ना मी.आधीच चकवा लागल्यागत कवा धरून फिरून राह्यलोय.उजेड दिसला अन् मला वाटलं,आता आलो बराबर."


"कुठल्या गावी जायचंय ?" शरदने विचारलं.त्याने कुठल्याशा खेड्याचं नाव सांगितलं.शरदने त्याला रस्ता समजावून सांगितला.

तो गेल्यावर प्रकाश म्हणाला,"जग चंद्रावर पोहचलं आणि आपण अजूनही उजेड बघून गावाचा रस्ता शोधतोय!'


त्यावर यशा हसून म्हणाला,"पण खरंच आपण पोहचलो का चंद्रावर ? सोनार गुरुजी तर म्हणतात त्याप्रमाणे कुठले तरी दगड आणले अन् आपल्याला दाखवले."


त्यावर एकच हशा पिकला.


दुसऱ्या दिवशी सकाळी मंडळी सायकली घेऊन अशा बेताने निघाली की,पावणे आठ वाजता ते पारावर पोहचले.झाडून सगळा गाव पारावर जमा झाला होता. तालुक्याहून येणाऱ्या रस्त्याकडे उत्सुकतेने सगळे पाहत होते.त्यांचं आपसातल्या बोलण्याकडेही फारसं लक्ष नव्हतं.थोड्यावेळाने लांबून धुरळा उडत असलेला दिसला.सगळे ओरडले,


'आली,बस आली !'


थोड्याच वेळात बसचा ठिपका मोठा होत होत पारापाशी येऊन ठेपला.दोनचार लोक बसमधून उतरले. ड्रायव्हर-कंडक्टरने खाली उतरून बीडीकाडी ओढली. पंधरावीस मिनिटांनी तालुक्याला जाणाऱ्या लोकांना घेऊन बस परतीच्या प्रवासाला निघाली आणि पारावर जमलेले लोक आपापल्या कामाला जाण्यासाठी पारावरून उठले !


पोचवायला आलेला शरद म्हणाला,"गावात बस सुरू झाल्यापासून दररोजचाच हा खेळ झालाय.बस यायच्या वेळेला अख्खं गाव पारावर जमतं अन् बस ढळली की, शेतावर जायला पांगतं !"


घरी आल्यावर यशाने बापूंना गंमत म्हणून ही गोष्ट सांगितली.

त्यावर बापू म्हणाले,"यशा,कदाचित बाहेरचं जग आणि त्यांचं गाव ह्या मधला बस हा दुवा आहे, असं त्यांना वाटत असावं.

त्यांचं स्वतःचं गावापुरतं विश्व बाहेरच्या अफाट जगाशी ते बसच्या रूपाने स्वतःला जोडत असावेत !"


यशाने डोकं खाजवत बापू म्हणतात ती मानसिकता समजून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.


मुखेडहून आल्यापासून सगळ्यांना तिथे होत असलेल्या बदलाविषयी ऐकण्याचा छंदच लागला.मधूनमधून कुणीतरी विषय काढायचा आणि प्रतापभाऊ नवीन काय करतोय ते विचारायचा.तेव्हा शरद सांगायचा -


आता गावात दारूबंदी यशस्वी झाली होती.गावपण स्वच्छ झालं होतं.सार्वजनिक संडासांचं बांधकामदेखील सुरू झालं होतं.पंचायतीच्या काही सभासदांना वाटत होतं की,आपण 'आदर्श गाव योजने'त आपल्या गावाच्या नावाचा अर्ज भरावा.त्यांनी तसं प्रतापभाऊला विचारलं तर, 'आपण थोडं थाबावं',असं त्याचं मत पडलं.


"आपल्या गावातल्या सुधारणा नुकत्याच झाल्या आहेत. वर्षसहा महिने होऊन जाऊ द्या.पुढच्या वर्षी आपण नक्की अर्ज करू या.सध्या आपण गावात आणखी काय सुधारणा करता येतील ह्यावर लक्ष केंद्रित करू या." हे प्रतापभाऊचं म्हणणं गावकऱ्यांना पटलं.त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न सुरू केले.


'गावात अजूनपर्यंत वीज आली नव्हती.ती आणण्याचा प्रयत्न करू या' असं प्रतापभाऊने सुचवलं.सरपंचाच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ जिल्ह्याच्या ठिकाणी गेलं. प्रतापभाऊ अर्थातच सोबत होता.बोलण्याचं काम तोच करत होता.


मोठ्या साहेबांनी म्हटलं,"गावापासून सगळ्यात जवळचा खांब दोन कोसांवर आहे.तिथून गावापर्यंत वीज आणायची तर खर्चाचं काम आहे.यंदाच्या बजेटमध्ये तेवढी तरतूद केलेली नाहीय.पुढच्या वर्षी नक्की बघू या."


काहीतरी आशेचा किरण दिसला म्हणून शिष्टमंडळ खूश होऊन गावाकडे परतलं.गावात सगळे सण घरोघरी किंवा आपापल्या गल्लीत साजरे होत असत. प्रतापभाऊने सगळ्या तरुणांची एक बैठक घेतली. गणपती,होळीसारखे सण सगळ्यांनी मिळून साजरे करण्याची कल्पना मांडली.त्यामुळे सण मोठ्या प्रमाणात साजरा होऊ शकणार होता.शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी सण आतापर्यंत साजरे केले जात असताना ईर्षा आणि ईर्षेतून होणारी भांडणं हेदेखील टळणार होतं.लोकांमध्ये एकजूट राहू शकणार होती.

सगळ्यांनी प्रतापभाऊची ही कल्पना उचलून धरली.चर्चेच्या ओघात एकाने विचारलं,


"भाऊ,नागपंचमी दहा दिवसांवर आलीय.घरोघरी पोरंसोरं लहान मोठे झोके बांधतीलच पण गावात एक मोठा झोका बांधू या.काही शर्यतीपण लावू या."


"मग जिंकणाऱ्याला बक्षीसपण देऊ या!" दुसऱ्याने पुस्ती जोडली.


एकामागून एक सूचना येऊ लागल्या.अनेकांनी मांडलेल्या सूचनांवर आणि कल्पनांवर सगळ्यांनी मिळून चर्चा केली.प्रत्येक जण हिरिरीने आपला सहभाग देऊ करत होता.अशा रीतीने नागपंचमीला गावाबाहेरच्या पुरातन वटवृक्षाला एक मोठा झोका बांधायचं ठरलं.गावाच्या अंगात उत्साह संचारला.सण असला तरी तो शिस्तीत साजरा व्हावा म्हणून प्रतापभाऊने म्हटलं,


"आपण एक नागपंचमी कमिटी स्थापन करू या.त्यात गावातल्या महिलांनाही सामील करून घेऊ."


"तुमचं अगदी बरोबर आहे भाऊ.अहो,बायकांचाच सण हा.परगावाहून किती तरी माहेरवाशीणीही येतात." एक जण म्हणाला.


नागपंचमी कमिटी स्थापन झाली.तिच्या तीन बैठका झाल्या.

प्रतापभाऊ तरुणांना आणि महिलांना पुढाकार घ्यायला,निर्णय घ्यायला प्रोत्साहन देत होता.


कमिटीने वडाखालच्या जागेची साफसफाई केली. झाडंड्झुडपं,

काटेकुटे,दगडगोटे गोळा करून जागा मोकळी केली.गावकऱ्यांना-मुख्यतः बायाबापड्यांसाठी बाजूला एक साधासा मंडप बांधला.

तालुक्याच्या गावातून हलकडी मागवली.तिच्या वीरश्रीयुक्त आवाजाने झोका चढवणाऱ्याला हुरूप येणार होता. झोका बांधण्यासाठी मोटेचे वीस फूट दोन मोठे सौंदर आणले.गावच्या सुभान्या सुताराने उभं राह्यला लाकडाची जंगम फळी बनवून दिली.पायाला टोचू नये म्हणून त्याने फळी चांगली गुळगुळीत बनवली होती. शिवाय जाडजूड दोरखंड बांधायला दोन्ही बाजूंनी लोखंडी कड्यासुद्धा बसवल्या होत्या.आदल्या दिवशी संध्याकाळीच झोपाळा बांधून तयार झाला होता. झोपाळा खरंच मोठा शोभिवंत दिसत होता.ज्या फांदीवर तो बांधला होता तिला समांतर वीस फुटांवर एक दोरखंड बांधून छोट्याशा दोरीने त्याला मधोमध एक फडकं लटकवून दिलं होतं.सगळी तयारी झाल्यावर कमिटीतल्या एका दांडग्या पोराने झोका चढवून पाहिला.त्याचा झोका त्या लाल फडक्याच्या पाच फूट खालपर्यंतच पोहचला.पण तिथपर्यंत झोका पोहचवायला त्याला चाळीस मिनिटं लागली.नंतर झोका थांबवायला वीस मिनिटं.कारण मोटेच्या जाडजूड दोरखंडाने झोपाळ्याचं वजन खूप झालं होतं. झोक्यावरून खाली उतरल्यावर तो जवान घामाघूम झाला होता.रात्री आजूबाजूच्या भागात आणि झोपाळ्याच्या दोरखंडाला पताका लावण्यात आल्या होत्या.एकंदर गावात धामधूम सुरू झाली.


नागपंचमीचा दिवस उजाडला.घरोघरी माहेरवाशिणी आल्या होत्या.कमिटीने सकाळीच गावात दवंडी पिटवून गावकऱ्यांना गावाबाहेरच्या झोक्याकडे यायचं,शर्यतीत भाग घेण्याचं आवतन दिलं होतं.मुख्य गोष्ट म्हणजे जिंकणाऱ्याला एक सोन्याची अंगठी मिळणार होती. गावातली सगळी तरणी पोरं आपणच शर्यत जिंकून अंगठी मिळवणार अशी शेखी मारत होती.


झोक्याजवळ शहरातून आणलेली हलकडी वाजायला लागली तसं निम्मं गाव आधीच जमलं होतं.उरलेलं निम्मं हलकडीचा आवाज ऐकून लगबगीने गावाबाहेर जाण्यासाठी धावलं.एकेक जण झोका चढवायचा प्रयत्न करत होता.काही जणांनी पहिल्या पाचदहा मिनिटांतच 'हे आपल्या आटोक्यातलं काम नाही, म्हणून माघार घेतली.नवीन भिडू झोक्याजवळ गेला की,सगळेजण टाळ्याला प्रोत्साहन देत आणि त्याचा प्रयत्न फसल्यावर त्याची हुर्योवाडीपण करीत.दोनचार धाडसी बायांनीसुद्धा प्रयत्न केले.पण थोड्याच वेळात धापा टाकत त्या परत घोळक्यात सामील झाल्या.जेवायची वेळ झाली.लोक एकेक करून घरी जाऊन जेवून परत येत होते. 


संध्याकाळचे पाच वाजायला आले होते.फक्त दोघांचाच झोका आडव्या दोरखंडाला बांधलेल्या लाल फडक्यापर्यंत कसाबसा पोहचला पण नंतर त्यांचा दम तुटला अन् त्यांनी प्रयत्न सोडून दिले.गावातले काही लोक बाजूला उभ्या राहिलेल्या नागपंचमी कमिटीच्या सभासदांकडे जाऊन आडवा दोरखंड आणि लाल फडकं थोडं खाली घ्यायला सांगू लागले.कमिटी मेंबर्सही त्याला तयार झाले.तरी 'त्या आधी कुणी एखादा रुस्तुम राहिला आहे काय प्रयत्न करायचा?',असं कमिटी मेंबर्सपैकी एकाने विचारलं आणि कुणाला तरी म्हमद्या खाटकाची आठवण झाली! म्हमद्या खाटकाचं दुकान गावात होतं.कुणाची बकरी,कुणाची कोंबडी कापून-साफ करून देण्याचं काम म्हमद्या करायचा. आजूबाजूच्या गावात कुठे कुस्तीचा फड लागला की, तिथे म्हमद्या कुस्ती खेळायला हजर ! कुणीतरी म्हणालं,


"अरे जा रे, म्हमद्याला असेल तसा घेऊन या.नेहमी गावात बेटकुळ्या फुगवून दाखवत असतो."


दोनचार जण म्हमद्याला आणायला गावाकडे झिंगाट पळाले म्हमद्या नुक्ताच जेवूनखाऊन लवंडला होता. त्याला बोलवायला धावतपळत आलेल्या पोरांनी त्याला धड कपडेसुद्धा घालायची उसंत दिली नाही.तसाच पुढे घालून झोक्याच्या जागी आणला.

म्हमद्याने लुंगी अन् वरती मलमलचा कुडता घातला होता.गळ्यात अन् दंडाला काळा गंडा बांधलेल्या म्हमद्याने आखाड्यात शिरताना माती मस्तकाला लावतात तसा झोक्याला नमस्कार केला.मग तो झोक्यावर उभा राहिला. 


म्हमद्याने हळूहळू झोका चढवायला सुरुवात केली. झोका चढवण्याची त्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी होती. झोका मागे गेला की,तो खाली बसायचा.झोका पुढे जाण्याच्या वेळेस शरीराचं वजन मागच्या बाजूला जाईल अशा रीतीने पाठीची कमान करून तो उभं राह्यचा.असं केल्यामुळे झोक्याला एक प्रकारचा गचका मिळून झोका वरती जायचा.हळूहळू झोका चांगलाच वरती गेला.लो कांच्या अपेक्षा आणि टाळ्या वाढत गेल्या. 'आईच्यानं म्हमद्याने तर कमालच केली...', 'अंगठी त्योच गबरू न्हेनार...' अशा आरोळ्या जमावातून येऊ लागल्या. 


झोक्यावर चढल्यापासून म्हमद्या तीसपस्तीस मिनिटं सतत झोका घेत होता.अजूनही त्याचा दम तुटलेला दिसत नव्हता.म्हमद्या लाल फडक्यापासून फूटभर अंतरावर राह्यला अन् आक्रीतच घडलं !


हवेच्या झोताबरोबर म्हमद्याची लूंगी जी सतत खाली बसून उठून ढिल्ली झाली होती ती आता सुटली अन् उडाली की ! मांजा तुटून पतंग कटावा तशी ती हवेत भरकटत राहिली.त्याला बोलवायला गेलेल्या पोरांनी त्याला नीट कपडेही घालू दिले नव्हते.होता तसा त्याला बाहेर काढून इथवर आणला होता.त्यामुळे त्याने आत काहीच घातलं नव्हतं.म्हमद्या चांगलाच गोंधळला. त्याला काय करावं काही सुचेना.झोका वीस फूट पुढे अन् वीस फूट मागे लंबकासारखा फिरायला लागला. क्षणभर सगळा जमाव सुन्न ! पुढच्याच क्षणी जमावाची जी तारांबळ उडाली म्हणता ! बायाबापड्या तर भुर्रकन घराकडे पळाल्या.पोरासोरांनापण जाणत्या लोकांनी पिटाळून लावलं.नंतर उरलेल्यांनी म्हमद्याला वेगवेगळ्या सूचना करायला सुरुवात केली.


कुणी म्हणे, 'खाली बस.' कुणी म्हणे 'उभा राहा.' तर कुणी सांगे 'अंगातला कुडता काढून कंबरेला बांध.' कमिटी हतबुद्ध उभी राहिली.हलकडीवाले ह्या क्षणाला वाजवावं की नाही ह्या संभ्रमात! प्रतापभाऊने तर कपाळावर हात मारून घेतला ! झोका दहा फुटावर आला.म्हमद्याने झोक्यावरून उडी मारली अन् खाली पडलेली लुंगी धावत जाऊन उचलून ती कशीबशी कंबरेला गुंडाळत तो घराकडे झिंगाट पळाला !


प्रतापभाऊने आणि कमिटीने म्हमद्याला विजयी घोषित केलं.

कारण तो आडव्या दोरखंडापर्यंत जवळजवळ पोहचलाच होता.पण म्हमद्या अंगठी घ्यायला होता कुठे ? तो तर लांबच्या नातलगाकडे जो निघून गेला तो थेट महिनाभर त्याने कुणाला तोंडच दाखवलं नाही ! त्यामुळे एक मोठं आक्रीत आणखी घडलं-गावात खाटकाचं एकच दुकान असल्यामुळे सगळ्या गावाची महिनाभर मोठीच पंचाईत झाली की राव !

१९/६/२५

नागपंचमी/ Nagpanchami

रविवारच्या दुपारपासून वाड्यावर पत्त्यांचा अड्डा बसत असे.

बापूदेखील रविवारची ह्यासाठीच वाट बघत असत. रविवारी त्यामुळेच बापूंच्या वामकुक्षीला सुट्टी असे.


( गावगोत,माधव सावरगांवकर,अष्टगंध प्रकाशन )


बापूंच्या वामकुक्षीला सुट्टी असल्यामुळे यशा,मंदा आणि मुक्ता खूश असत.कारण बापूंना झोप लागेपर्यंत - जी कधी लवकर लागत नसे,त्यांची पावलं थोपटत अन् पोटऱ्या दाबत बसावं लागे.

थोडं थांबलं तर बापू पावलं हलवत आणि हूं ऽऽऽ असा हुंकार देत.थोड्याच वेळात मुलांचे हात दुखू लागत आणि त्या हात दुखण्यापेक्षा त्यांना कंटाळाच जास्त येई.मग त्यांनी एक युक्ती शोधून काढली.दोघांनी एकमेकांना खुणवायचं आणि एकदम ओसरीमधून झिंगाट पळायचं.इतकं जोरात की,बापूंनी हुंकार देईपर्यंत त्यांच्या आवाजाच्या टप्प्याच्या बाहेर जायचं.मुलं कंटाळतात हे बापूंनादेखील माहीत असायचं.तेही नंतर त्यांना रागवत नसत. रविवारी मात्र पत्त्यांमुळे वामकुक्षी नाही अन् त्यामुळेच पाय दाबणंही नाही.सुट्टी ! सुट्टी म्हणजे एकदम सुट्टी !


जेवण झाल्यावर पहिला अड्डा ब्रीजचा असे.चव्हाण काका,नाईक काका अन् ठोंबरे काका हे ब्रीजचे नियमित मेंबर असत.ते सगळेच समवयस्क असल्याने त्यांच्या गप्पा ऐकण्यात यशाला मौज वाटे.

सतत तिथे बसल्याने त्यालाही ब्रीजचा खेळ समजायला लागला होता.त्यामुळे आवडायलाही लागला होता.दुपारी साधारण एक वाजता सुरू झालेला खेळ साडेपाच वाजेपर्यंत चालायचा.खरं तर,खेळणं पाच वाजेपर्यंतच असे.पाच वाजता माई चहा तयार करून मंदाबरोबर किंवा यशाबरोबर ओसरीवर पाठवत.चहा पिता पिता कॉल देताना किंवा पत्ते टाकताना कोण चुकलं ह्याची चर्चा होई.कधी कधी ती चर्चा वादात बदले.पण हे सगळं साडेपाचला नक्की संपे.कारण साडेपाचला गल्लीतले दुसरे मेंबर - सोनारमास्तर,धनुमामाजी, दाणीकाका हे सातहाती खेळायला येत.बापू अर्थातच दोन्ही खेळांतले कॉमन मेंबर होते.धनुमामाजी वाड्याच्या मागच्या भागातल्या मारवाडी कुटुंबाचे प्रमुख होते.

त्यांच्या किराणामालाच्या दुकानाला रविवारी सुट्टी असे.दाणीकाका बँकेतून रिटायर्ड झाले होते. 


सोनारमास्तर गल्लीतच असलेल्या प्राथमिक मुलांची शाळा नंबर दोनचे हेडमास्तर होते.यशासकट गल्लीतील सगळीच मूलं कधी ना कधी सोनारमास्तरांच्या हाताखाली शिकली होती.रविवारी मुलांना खेळताना हाक मारायला कुणी नसे.अंधार पडेपर्यंत डबा ऐसपैस, चोरशिपाई किंवा लगोरी असे खेळ चालत.त्यानंतर मारुतीच्या पारावर गप्पांचा अड्डा बसे आणि वेगवेगळ्या विषयावर त्यांच्या गप्पा चालत.


त्या रविवारीही अशाच गप्पा रंगल्या होत्या.नुकतंच चंद्रावर अमेरिकेचं यान उतरलं होतं.माणसाने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं.तिथून परतताना त्यांनी चंद्रावरून दगडपण आणले होते.

बाकीच्यांनी ह्याबद्दलच्या बातम्या पेपरमध्ये वाचल्या होत्या.पण ग्रुपमध्ये दत्ताच्या देवळातला श्रीपाद हा एकटाच असा भाग्यवान होता ज्याने ते दृश्य टीव्हीवर पाहिलं होतं. अजून गावात टीव्ही आलेला नव्हता. पण श्रीपाद त्यावेळी नेमका त्याच्या ताईकडे मुंबईला गेला होता म्हणून तो ही ऐतिहासिक घटना पाहू शकला होता. साहजिकच त्यामुळे तो अधिकारवाणीने ह्या विषयावर बोलत होता आणि बाकी सगळे त्या भाग्यवंताचा शब्द न् शब्द आश्चर्याने अन् कौतुकाने टिपत होते.


गप्पा ऐनभरात होत्या त्यामुळे आतला सातहातीचा डाव कधी संपला आणि कधी सोनारमास्तर येऊन गप्पा ऐकत उभे राहिले हे कुणालाच कळलं नाही.


"अरे,हे अमेरिकावाले काहीही बावळ्या मारतात अन् तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता ?" सोनार मास्तरांच्या आवाजाने सगळे चिडीचूप झाले.


श्रीपाद काहीसा चिडून म्हणाला, "पण गुरुजी,तिथून आणलेले दगडपण टीव्हीवर दाखवले..."


"तू ह्या आधी चंद्रावरचे दगड पाहिले होते का रे कधी ? त्यांनी सांगितलं अन् तुम्ही विश्वास ठेवला !"


आता प्रत्यक्ष शाळेच्या हेडमास्तरांनीच अमेरिकेवर अविश्वास दाखवला तिथे इतरांची काय कथा ! श्रीपाद मात्र हिरमुसला.

गप्पांचा अड्डा चालूच राहिला.घरच्यांनी हाका मारल्यावर एक एक जण घरी जाऊन पटकन् जेवून आला.


आता विषय तालुक्याच्या गावाचं जीवन आणि अगदी छोट्या खेड्याचं जीवन ह्याकडे वळला.प्रकाश हा मारवाड्यांच्याच कुटुंबातला धनुमामाजींच्या लहान भावाचा - मिश्रीलालजींचा मुलगा.मिश्रीलालजी आठ कोसांवर असलेल्या मुखेड नावाच्या खेड्यात राहत. तिथे त्यांचंही किराणामालाचंच दुकान होतं.प्रकाश अतिशय बुद्धिमान अन् गोष्टीवेल्हाळ मुलगा होता.तो मधूनमधून मुखेडला जात असे.त्याला तिथल्या सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकायला मिळत.त्या इतरांना सांगण्यात त्यालाही मौज वाटे आणि ऐकणाऱ्यांनाही. त्याच्या गावात अजून लाईट आले नव्हते.

वर्तमानपत्रही यायचं नाही.फोनचा तर तालुक्याच्या गावीच पत्ता नव्हता तिथे छोट्या गावात कसा असणार ? एकंदरीत जगाशी काहीही संबंध नसलेलं ते एक एकाकी बेट झालं होतं.


एकदा सगळी मित्रमंडळी प्रकाशच्या गावाला सायकलवरून निघाली.भल्या सकाळीच सायकली काढल्या कारण घरच्या मंडळींनी उन्हाच्या आत मुखेडला पोहचा असं बजावून सांगितलं होतं.तरीही पोहचेस्तोवर अकरा वाजले.सगळ्यांचे चेहरे श्रमाने आणि उन्हाने लाल झाले होते.हातपाय धुऊन सगळे फ्रेश झाले.चहा पिऊन लगेच नदीकाठचं रामाचं मंदिर पाहायला निघाले.दुपार झाली होती तरीसुद्धा वातावरण उबदार अन् सुखकारक होतं.


राममंदिर खूप प्राचीन होतं.आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध होतं.नदीच्या काठावर खडकावर असलेल्या पावलांसारख्या खुणा प्रकाशने दाखवल्या.गावकऱ्यांच्या श्रद्धेप्रमाणे त्या खुणा हनुमानाच्या पावलांच्या आहेत म्हणून मंदिरात दर्शनाला आलेले लोक त्यांचीही पूजा करतात,असं प्रकाशने सांगितले.सगळ्या मित्रांनीही भक्तिभावाने त्या पाऊलखुणांना नमस्कार केला.


घरी येईपर्यंत पोटात कावळे ओरडायला लागले होते. प्रकाशच्या आईने जेवायला डाळबट्टी अन् मुगाचा हलवा असा बेत केला होता.सगळे जण त्यावर तुटून पडले.आकंठ जेवण झाल्यावर मागच्या घरात गाद्या पसरून ठेवल्या होत्या तिथे बडीशोप चघळत सगळे गप्पा मारत बसले.थोड्या वेळात काहींना पोटात तडस लागली.प्रकाशची आई म्हणाली, "काही काळजी करू नका. डाळबट्टीच्या जेवणामुळे होतं असं.तुम्ही जसजसं पाणी प्याल तसतशा डाळबट्ट्या पोटात फुगतात.प्रकाश, दुकानातून सोडा अन् थोडा ओवापण आण.थोड्या वेळात बरं वाटेल तुम्हाला."


दुकान घराच्या पुढच्याच भागात होतं.प्रकाशने लगेच सोडा आणि ओवा आणला.गप्पा मारता मारता एक एक जण आडवा झाला अन् घोरायलाही लागला.पाचच्या सुमारास सगळे हळूहळू जागे झाले.चहापाणी झाल्यावर गावाच्या बाहेर असलेल्या प्रकाशच्या मित्राच्या शेतावर जायची टूम निघाली.मित्रमंडळी तर काय तयारच होती. रूटीनमध्ये बदल,मनापासून प्रकाशच्या आईवडिलांनी केलेलं स्वागत अन् मिष्टान्नाचं जेवण ह्यामुळे सगळ्या मित्रांच्या उत्साहाला उधाण आलं होतं.सगळेजण तयार होऊन चालतच निघाले.त्यामुळे पहिला चालणारा अन् शेवटचा चालणारा यात बरच अंतर पडत होतं.त्यामुळे ओरडून बोलावं लागत होतं पण त्यातही गंमत होती.


शहरात थोडं जरी मोठ्या आवाजात बोललं तर मोठी माणसं ओरडत,एखादी म्हातारी आजीबाई तिरकसपणे म्हणे,'घशात मुसळ घातले का रे पोरा तुझ्या?'


इथे अशी काही बंधनं नव्हती.सगळी मुलं आजूबाजूला विपुल दिसणाऱ्या रानपाखरांसारखी स्वच्छंद वागत होती.मळ्यावर प्रकाशच्या मित्राने चहा-चिवड्याचा बेत केला होता.चिवड्याला सगळ्यांनी नकार दिला कारण सकाळचं खाल्लेलं अजून पोटातलं जराही हललं नव्हतं. पण चहा मात्र सगळे प्यायले.घराच्या बाहेर खळ्यातच जाड जाजम टाकून गप्पांचा अड्डा जमला.छोट्या गावात काय घडणार असं सगळ्यांना वाटत होतं पण प्रकाशच्या मित्राने - शरदने दिलेली माहिती ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला.शरद सांगत होता.


मिलिटरीमधून रिटायर होऊन प्रताप भोसले नावाचा गावातला तरुण परत आला होता.प्रताप अतिशय धडाडीचा होता.त्याचे गावासंबंधी काही आदर्श विचार होते.गावानेदेखील त्याने न मागता त्याला सामाजिक नेतृत्व दिलं होतं.कारण प्रतापला राजकारणात अजिबात इंटरेस्ट नव्हता.चारसहा महिन्यांपूर्वीच तो गावात कायमचा म्हणून आला होता.अगदी प्रथम त्याने गावातल्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं.प्रतापच्या भोवती गावातली सगळीच्या सगळी मुलं जमा झाली होती. वयस्कर मंडळी औत्सुक्याने आणि आशेने त्याच्याकडे पाहत होती.प्रतापने गावातल्या प्रत्येक गल्लीत एक मंडळ स्थापन केलं.ग्रामपंचायतीने नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडून गल्ली साफ करून घेण्याची जबाबदारी त्यापैकी एकेकावर आळीपाळीने सोपवली. 


ग्रामपंचायतीने नेमलेल्या सफाई कर्मचाऱ्यांकडून गल्ली साफ करवून घेण्याची जबाबदारी तरुणांच्या मंडळाची होती.प्रतापने प्रत्येकाकडून सुरवातीलाच शपथ घेऊन ठेवली होती की,ते कुणाशीही भांडणतंटा करणार नाहीत.जर कुणी सफाई कर्मचारी कामात टंगळमंगळ करत असेल तर त्याला फक्त समज द्यायची.

तरीही त्याने कामाकडे दुर्लक्ष केलं तर ते काम मंडळाच्या स्वयंसेवकांनी करायचं आणि त्या कर्मचाऱ्याची माहिती प्रतापला द्यायची.प्रकाशच्या ह्या योजनेमुळे गावाचं रूपडंच पालटून गेलं होतं.संपूर्ण गाव चकचकीत झालं होतं.गावातल्या सगळ्यांचंच आरोग्य त्यामुळे सुधारेल हे प्रतापने सगळ्या गावाला पटवून दिलं.सगळा गाव जणू प्रतापचा भक्तच झाला.आता प्रताप सगळ्या गावाचा प्रतापभाऊ झाला होता.


साफसफाईनंतर प्रतापभाऊने गावाच्या सार्वजनिक संडासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.गावात सार्वजनिक संडास नव्हतेच.

एखाद दुसरा धनिक, व्यापारी सोडला तर सगळा गाव सकाळी उठून प्रातर्विधीसाठी माळरानावर जात होता.ग्रामपंचायतीने स्त्री-पुरुषांसाठी वेगवेगळ्या जागा नेमून दिल्या होत्या. तरी तिथे जाणं स्त्रियांना लज्जास्पद आणि वृद्धांना त्रासदायक वाटायचं.शिवाय अनकाईच्या जंगलातून आलेल्या एखाद्या चुकार बिबट्याने प्रातर्विधीसाठी आलेल्या कुणाला उचलून नेल्याच्या काही घटना घडल्या होत्या.प्रतापभाऊने ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतलं आणि त्यांच्यामार्फत सरकारी योजनेत अर्ज केला.

सुरुवातीला गावातल्या म्होरक्यांना हा सामाजिक कार्य करतो आहे पण ह्याचा खरा उद्देश स्वतःचं राजकीय वर्चस्व निर्माण करायचा आहे असा संशय होता.पण त्याने हे काम ग्रामपंचायतीतर्फे करून घेतल्याने त्या संशयाचं निराकरण झालं.त्यामुळे तेही खुल्या दिल्याने प्रतापभाऊच्या पाठीशी उभे राहिले.


'मागच्याच आठवड्यात सहा सार्वजनिक संडास बांधण्या

संबंधीच्या मंजुरीचं पत्र ग्रामपंचायतीकडे आलं आहे,असं शरदने सांगताच सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.


"शरद,आणखी सांग ना प्रतापदादाच्या विधायक कामाच्या कथा." यशा शरदला म्हणाला.


शरद पुढे सांगू लागला -


गावात बैलगाड्यांशिवाय दुसरं वाहतुकीचं साधन नव्हतं. वैयक्तिकरीत्या कुणी सायकलवर तर अगदी दोनचार जण मोटरसायकलचा वापर कुठे जाताना करताना दिसत.पावसाळ्यात चिखल व्हायचा त्यामुळे तर त्यावेळी सगळ्या गावाला फारच त्रास व्हायचा.पण प्रतापने गावातून सह्या जमवल्या आणि सरपंचाच्या पत्राला त्या सह्या जोडून तो अर्ज एसटीच्या अधिकाऱ्यांकडे तो स्वतः घेऊन गेला.त्याने त्याचा पाठपुरावाही केला.त्याच्या प्रयत्नांना यश येऊन सध्या तालुक्याच्या गावापासून बसची एक फेरी सुरू झाली आहे. 'काही दिवसांनी आणखी फेऱ्या वाढवून घेऊ' असं प्रतापभाऊ म्हणत होते आणि ते म्हणतात म्हणजे तसं नक्की होणार! उद्या सकाळी आठ वाजता गावाबाहेरच्या पाराजवळ जा म्हणजे तुम्हाला एक गंमत दिसेल.आता अंधार पडायला लागला होता आणि थंडीपण हळूहळू वाढत होती.प्रकाश शरदला म्हणाला, "पुढच्या गप्पा मारायला शेकोटी पेटवू या का?"


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये 

१७/६/२५

बारा वर्षांचं पोरं ! Twelve year old boy

१९३९ साली घडलेल्या घटनेवरचं लॉस्ट ऑन अ माउंटन इन मेन हे पुस्तक हार्पर कॉलिन्स प्रकाशनाने १९७८ साली पहिल्यांदा प्रकाशित केलं.त्यांच्या या साहसाबद्दल बोलण्यासाठी डॉन फेंडलर यांना जगभरातून अनेक ठिकाणांहून आमंत्रणं आली.अगदी शेवटपर्यंत ते आपला अनुभव मुलांसोबत शेअर करत फिरले.

२०१६ साली ८९ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.


१५.०६.२५ या लेखातील दुसरा शेवटचा भाग…


पाय खुरडत त्याला चालावं लागतं.दगडांवरून चालून आणि काटेरी फांद्या धरून हाता-पायांचे तळवे सोलवटलेले असतात.

एवढंच नव्हे,तर झोपेत खाजवून खाजवून संपूर्ण अंगभर जखमा झालेल्या असतात.त्या ताज्या जखमांवरच आता माश्या आणि नाना प्रकारचे किडे बसलेले असतात.ही अवस्था मोठ्या माणसालाही रडकुंडीला आणायला पुरेशी असते,मग डॉनची काय कथा! पण आपलं रक्ताळलेलं शरीर पाहत असतानाच त्याला झाडावर बसून चिवचिवाट करणारा एक पक्षी दिसतो.डॉन लिहितो,'तो पक्षी इतका आनंदात गात होता आणि मजेने किडे खात होता की मला वाटलं, ही जागासुद्धा अगदीच काही वाईट नसावी.' या विचारासरशी डॉन पुन्हा उल्हसित होतो.आपण मोठ्या संकटात सापडलोय असं त्याला अजूनही वाटत नसतं.


आता थोड्याच वेळात कुठल्या तरी वळणावर आपल्याला समोर कॅम्प दिसणार,असं गृहीत धरून तो पुन्हा चालू लागतो.ओढ्याच्या काठाने कधी दलदल असते,कधी मोठाले दगड असतात,तर कधी काट्यांनी भरलेली झाडं.आपण नेमके कुठल्या दिशेने चाललोय याचीही डॉनला कल्पना नसते.चालत राहायला पाहिजे, एवढंच त्याला कळत असतं.तिसरा दिवसही असाच संपतो.थोडीफार फळं खाऊन आणि पाणी पिऊन डॉन रात्रीला सामोरा जातो.या वेळी त्याला ओढ्याकाठीच मऊ गवताने आच्छादलेली जागा सापडते.त्या विचित्र परिस्थितीतही डॉनच्या मनात येतं,'काय छान जागा मिळालीय झोपायला! नशीबवान आहे मी! आल्या परिस्थितीशी डॉन किती सहज जुळवून घेतो हे त्याच्या अशा अनेक उद्गारांवरून कळतं.त्या रात्री त्याच्या दृष्टीने आणखी एक सुंदर गोष्ट घडते.डॉन ओढ्याकाठी पडून असताना एक हरिण तिथे पाणी प्यायला येतं.डॉनला बघून ते त्याच्या जवळ येतं.इतकं जवळ,की अंगावर झेप घेतं की काय असं वाटावं.पण त्याचा वास घेऊन ते पुन्हा ओढ्याकडे वळतं.शांतपणे पाणी पितं आणि निघून जातं.डॉन लिहितो, 'त्या वेळी मी इतका भुकेला होतो,की पाणी पिणाऱ्या हरणाला दगडाने ठेचून मारणं शक्य होतं;पण तो विचार तेव्हा माझ्या डोक्यातही आला नाही.उलट,ते मला घाबरलं नाही,या जाणिवेने मी खूष झालो आणि आनंदाने झोपी गेलो.'


चौथा दिवस उजाडतो.आता भुकेचा राक्षस डॉनला चांगलाच छळू लागलेला असतो.डोळ्यांसमोर सतत दुधाचा कप दिसत असतो.

त्यामुळे साहजिकच घरची, आईची आठवण येत असते.आपण कुठून या संकटात सापडलो,असं वाटून मनावर मळभ येत असतं.

पण ते बाजूला सारून मिळतील तेवढ्या स्ट्रॉबेरी खाऊन तो चालत असतो.एकदा अचानक त्याच्या समोर एक दांडगं अस्वल उभं राहतं ! डॉनला पाहून ते असं काही किंचाळतं की डॉनचा श्वासच थांबतो.तिथून पळून जाण्याचंही त्याला सुचत नाही.काहीही हालचाल न करता तो नुसता उभा राहतो.अस्वलही त्याच्याकडेच बघत असतं.अख्खं एक मिनिट असंच जात.


पण नंतर ते अस्वल तिथून धूम ठोकतं आणि ओढा पार करूनच थांबतं.अस्वलाची ती पळापळ बघून डॉनला हसू आवरत नाही.हसता हसता तो जमिनीवर लोळण घेतो. त्या परिस्थितीतही डॉनचं हसणं हरवलेलं नसतं.


आता जंगलात हरवून चार दिवस होत आलेले असतात. डॉनला अशक्तपणा जाणवू लागलेला असतो.सगळ्यांत मोठा त्रास असतो तो त्याच्या जखमी पायांचा आणि अंगभर चावणाऱ्या डास-माश्यांचा.पायांत बूट नसताना चालणं म्हणजे दर दोन पावलांनंतर वेदनेने ओरडावं लागणं.अनेकदा वेदना इतक्या असह्य होतात की तो विश्रांतीसाठी थांबून बराच वेळ रडत राहतो.अचानक कुठून तरी आई-वडील यावेत आणि आत्ता याक्षणी ताबडतोब आपली यातून सुटका व्हावी असं दरक्षणी त्याच्या मनात येत असतं;पण दुसरीकडे असं होणार नाहीये याचीही त्याला जाणीव असते.ही आपण केलेली चूक आहे,ती आपल्यालाच निस्तरावी लागेल,असं तो स्वतःला बजावत असतो.

पण शरीर थकलं असलं तरी त्याचं मन मात्र हिंमत हरायला तयार नसतं.शरीर आणि मन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत याची जाणीव डॉनला नकळत होत जाते.कितीही थकला,कितीही निराश झाला तरीही हिंमत हरून एकाच जागी पडून राहण्याचा विचार त्याच्या मनाला शिवत नाही.तो चालत राहतो.आणि तरीही चालतंय ते वेगळ्याच कुणाचं तरी शरीर आहे असं त्याला सारखं वाटत असतं.


पाचव्या दिवशी एके ठिकाणी त्याला रस्ता म्हणावा अशी वाट दिसते.तिथे काही कापलेली लाकडं टाकून ठेवलेली असतात.या पाच दिवसांत दिसलेल्या मानवी, अस्तित्वाच्या त्या पहिल्याच खाणाखुणा असतात.तो रस्ता पाहून डॉन इतका खूष होतो की थोडा वेळ पायांमधल्या वेदना विसरून पळत सुटतो.आपली शक्ती संपली असं वाटत असतानाही अचानक आपल्या शरीरात एवढा जोर कुठून आला हेच त्याला कळत नाही.तो हुशारतो.हा रस्ता आपल्याला कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या वस्तीपर्यंत घेऊन जाईल अशी खात्री त्याला वाटू लागते.


सुरुवातीच्या दिवसांत त्याला रोज असं वाटत असतं,की आज संध्याकाळी आपण कॅम्पवर पोहोचू.आता ती भावना त्याच्याही नकळत बदललेली असते.'कधी माहिती नाही,पण आपण नक्की सुखरूप पोहोचू' असं तो स्वतःशी म्हणायला लागतो.त्या विचारातच तो दिवसभर चालत राहतो.अखेर अंधार पडतो आणि एकबरीशी जागा शोधून तो तिथे झोपी जातो.आता डास-माश्यांची फिकीर करणं त्याने सोडून दिलेलं असतं.त्याच्या हातांमध्ये माश्या मारण्याएवढेही त्राण उरलेले नसतात.जाग येते तेव्हा उन्हं डोक्यावर आलेली असतात आणि कोणी तरी त्याच्या शेजारी बसून विचित्र भाषेत बोलत असतं.तो वळून पाहतो,तर एक खार जणू त्याची विचारपूस केल्यासारखीच त्याच्याशी बोलत असते.डॉनला वाटतं, 'या जंगलात प्राणी किती वेगळेच वाटतात ! त्यांची भीती वाटत नाही. ते तुमचे मित्र असल्यासारखेच तुमच्या जवळ येतात. असं वाटतं, ते तुम्हाला मदत करू बघताहेत.' ही खार बराच काळ डॉनची सोबत करते. कधी रस्त्यावर,कधी झाडांवरून उड्या मारत.त्या खारीशी गप्पा करत,तिच्या खोड्यांना हसत डॉनच्या वेदना काहीशा कमी होतात.त्याला जाणवतं,की माणसाला कोणत्याही गोष्टीची सवय होऊ शकते.एकटेपणाची,वेदनांची,चालण्याची,

काहीही न खाण्याची... कशाचीही. माणसाकडे सहनशक्ती नेमकी असते तरी किती ? ती संपते तरी कधी ?


थोडं पुढे गेल्यावर डॉनला आणखी काही मानवी खाणाखुणा दिसतात.एक लाकडी केबिन लांबूनच त्याच्या नजरेच्या टप्प्यात येते.आत कोणी तरी फॉरेस्ट गार्ड असेल आणि आता आपली सुटका होईल,या विचाराने त्याचं हृदय उडी घेतं;पण प्रत्यक्षात त्या केबिनमध्ये बहुतेक बऱ्याच वर्षांत कोणी फिरकलेलं नसतं.त्यामुळे तिथे काही खायला मिळेल,ही डॉनची आशाही पूर्ण होत नाही.

त्याला तिथे मिळतं ते एक जुनाट,भयानक कुबट वास येणारं ब्लँकेट.त्या वासाने उलटी होईल असं वाटत असूनही डासांपासून बचाव करण्यासाठी डॉन ते ब्लँकेट सोबत घेतो आणि सकाळी सकाळीच त्या उबदार ब्लँकेटमध्ये स्वतःला गुंडाळून झोपी जातो.त्याला जाग येते ती थेट संध्याकाळीच. एवढी छान झोप त्याला आजवर कधीच लागलेली नसते.तसंही तो रोज रात्र होण्याची वाट पाहत असतो. पुढे अनेकदा लोक त्याला विचारतात,की 'तुला रात्री जंगलामध्ये भीती वाटली नाही का? कधी एकदा सकाळ होते असं तुला व्हायचं का?' त्यावर डॉनचं उत्तर असायचं, "नाही.उलट,मी रात्र होण्याचीच वाट पाहत असे.माश्या-डास आणि चालणं हे तिन्ही इतकं जीवघेणं होतं की त्यापेक्षा रात्रच चांगली वाटायची."


पाच दिवस होऊन गेल्यावर मात्र डॉनचं शरीर ढासळायला सुरुवात होते.अशक्तपणा वाढू लागतो. अंगात ताप भरू लागतो.डोक जड होत.एकदा तर चालता चालता तो चक्कर येऊन पडतोच.जाग येते तेव्हा अंधारून आलेलं असतं.बराच वेळ तो तसाच बसून राहतो.

स्वतःच्या शरीराकडे बघताना त्याला वाटत. हे आपलं शरीर नाहीच.पायाच्या बोटांची नखं तुटली आहेत.सोलवटलेल्या तळव्यांमध्ये काटे घुसलेत. उघड्या पडलेल्या जखमांमध्ये किड्यांनी अंडी घालायला सुरुवात केलीय.कुणाचंही शरीर एवढा त्रास सहन करून पुन्हा चालत राह शकत,यावर त्याचा

स्वतःचाच विश्वास बसत नाही,पण रात्र पडताना पाहन डॉन कसाबसा स्वतःला उठवतो आणि झोपण्यासाठी चांगलं झाड शोधू लागतो.त्याच वेळी त्याला आणखी एक अस्वल दिसतं.ते डॉनकडे पाठ करून चाललेलं असतं,या वेळी अस्वलाला पाहून भीती वाटण्याऐवजी त्याला दुसरा सजीव प्राणी दिसल्याचा आनंदच होतो, ते अस्वल नजरेआड होईपर्यंत तो त्याच्याकडे बघत राहतो. ते जातं तेव्हा एकटेपणाच्या जाणिवेने डॉनला रडू फुटत. जणू तो कायमच जंगलात राहत आलाय आणि प्राणी हेच त्याचे सोबती आहेत.


असेच आणखी दोन दिवस जातात.शेवटच्या दोन दिवसांत आपण नेमकं काय काय केलं याचं डॉनचं भानही कमी होत जातं.चालत राहणं,अशक्य झालं की पडून राहणं आणि रात्र झाली की बरी जागा शोधून झोपणं.डॉन जणू यांत्रिकपणे सगळ्या गोष्टी करत असतो.पण शेवटच्या टप्प्यात डास आणि माशांचा त्रास अगदी असह्य होऊ लागतो.त्याच्या अंगावर जिथे शक्य तिथे,अगदी डोळ्यांच्या पापण्यांना,कानात,नाकात, डोक्यात - सगळीकडे.

पापण्यांनाही त्यांनी चावे घेतले असल्याने डोळे उघडून बघणंही मुश्किल होऊन जातं. 


'आपण जंगलाच्या आत चाललोय म्हणून डास वाढलेत की मानवी वस्ती जवळ येतेय म्हणून ?' याचं उत्तर शोधण्याएवढेही डॉनचे विचार स्थिर राहिलेले नसतात.


अशातच एके ठिकाणी डॉनचा पाय दलदलीत फसतो. तिथून बाहेर पडण्यासाठी जेवढी शक्ती लागते तेवढी आता डॉनकडे उरलेली नसते.कसाबसा तो त्यातून बाहेर पडतो.बाहेर येऊन पाहतो तो त्याच्या शरीराला जळवा लगडलेल्या असतात.जेवढ्या शक्य तेवढ्या जळवा ओढून काढता काढता तो इतका दमतो की तसाच वाळूवर पडून राहतो.पण कशा कोण जाणे,उरलेल्या जळवाही त्याचा नाद सोडतात.बराच वेळ स्वच्छ पाण्यात पाय बुडवून बसल्यावर पुन्हा त्याच्या जिवात जीव येतो.पण आता एकेक पाऊल टाकण्यासाठी त्याला शरीरात असलेली सगळी शक्ती एकवटावी लागत असते.डॉनच्याच शब्दांत सांगायचं,तर चालू लागल्यावर पाय निखळून बाजूला पडतील की काय अशी भीती त्याला वाटत असते.आपण कुठे चाललोय.कधी हरवलोय,कधी खाल्लय,आता रात्र आहे की दिवस यातलं काहीच त्याला कळेनासं होतं.आपलं असणं म्हणजे निव्वळ चालणं आहे असं त्याला वाटायला लागतं.अखेर ती वेळ येतेच. की आता एकही पाऊल टाकणं शक्य नसतं.


तो जिथे उभा असतो तिथेच कोसळतो.किती वेळ जातो माहिती नाही.नंतर थोडी शुद्ध आल्यावर त्याला वाटतं की कोणी तरी आपल्याला हाताशी धरून उठवतं आहे. डॉन डोळे उघडून अपेक्षेने बघतो.त्याला वाटतं,अखेर आपल्याला एखादा गाइड किंवा फॉरेस्ट गार्ड भेटलाच म्हणायचा! पण आजूबाजूला कोणीच नसतं.पुढे त्याचे वडील या अनुभवाबद्दल बोलताना म्हणतात,"तुला एखाद्या देवदताने मदत केली असणार." त्यावर डॉन उत्तरतो,"तो मला चक्क ओढूनच नेत होता."


थोड्या वेळाने डॉनला एका झाडाला खिळ्याने ठोकलेलं पोतं सापडत.त्याच्या वरच्या बाजूला छोटं भोक असतं. डॉन ते पोतं डोक्यावरून घेतो आणि त्या भोकातून बघत वाट चालत राहतो.त्यामुळे डास-माश्यांचे हल्ले थांबतात.तोही केवढा मोठा दिलासा असतो ! (या पोत्यानेच आपला जीव वाचवला असं डॉनला वाटत असतं.जंगलातल्या त्या दिवसांची आठवण म्हणून डॉन पुढे स्वतःच्या मृत्यूपर्यंत ते पोतं जपून ठेवतो.) आपण किती दिवस चालतोय हे आता डॉनला आठवेनासं झालेलं असतं.'पण आपल्याला हरवून आठवडा होऊन गेला हे नक्की.लोकांनी आपला शोध घ्यायला सुरुवात केलीच नाही की काय ? केली असेल तर ते आपल्याला अजूनही कसे शोधू शकलेले नाहीत ? आता बहुतेक आपण या जंगलातच राहणार...' असे उलटेसुलटे विचार त्याच्या मनात यायला लागतात.


प्रत्यक्षात डॉन हरवल्याच्या संध्याकाळपासून त्याच्या वडिलांनी आणि गाइड्सनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केलेली असते.दोन दिवसांनंतरही तो सापडत नाही म्हटल्यावर बाहेरून बचावकार्य करणाऱ्या तज्ज्ञांची मदत बोलावली जाते.एवढंच नव्हे,तर आसपासच्या परिसरातले शेकडो नागरिक कामगार आपणहून त्याच्या शोधासाठी कटाहदिनच्या जंगलात शिरतात;पण एवढ्या प्रचंड मनुष्यबळाने शोध घेऊनही डॉनचा ठावठिकाणा लागत नाही.कारण तो पूर्ण विरुद्ध दिशेच्या जंगलात भरकटलेला असतो.


नवव्या दिवशी थोडा चालत,थोडा झोपून राहत, बराचसा गुंगीत तो एका नदीच्या काठाशी येऊन पोहोचतो.बघतो तर पल्याड एक छोटं घर दिसतं.पण इथेही कुणीच नसेल तर? किंवा हाही भासच असेल तर? पण थोड्या वेळाने त्याला नदीत होड्या दिसतात. ज्याअर्थी होड्या आहेत त्याअर्थी घरात माणसं राहत असणार,असा विचार करत असतानाच घरातून एक माणूस बाहेर येतो.त्याला बघून डॉन जोरजोरात ओरडायला सुरुवात करतो.त्या माणसाला सुरुवातीला एखादा प्राणी किंवा घुबड ओरडतं आहे असंच वाटतं, पण अखेर त्याचं डॉनकडे लक्ष जातं.मग मात्र जराही वेळ न दवडता तो डॉनच्या मदतीला धावतो.पाचव्या मिनिटाला डॉनला सुखरूप घरात आणलं गेलेलं असतं. हरवल्यापासून तब्बल नवव्या दिवशी डॉन पुन्हा माणसांत येतो.लवकरच आई-वडिलांपाशीही पोहोचतो. डॉन नऊ दिवसांनंतर सापडला असला तरी त्याला स्वतःला मात्र आपण फक्त सातच दिवस भटकत होतो असं वाटत असतं.नंतर त्याला जेव्हा विचारलं जातं,की 'तू दिवस का मोजले नाहीस?' तेव्हा त्याचं उत्तर असतं,"मला रोज वाटायचं की आज रात्री मी नक्की कॅम्पवर पोहोचेन !"


या नऊ दिवसांच्या काळात डॉनने मनाची जी हिंमत दाखवली ती तर अविश्वसनीय आहेच,पण त्याची पायपीटही थक्क करणारी आहे.डॉनच्या प्रवासाचे सगळे तपशील ऐकल्यावर कटाहदिनच्या गाइड्सनी त्याच्या भटकंतीचा नकाशा तयार केला.त्यांच्या मते डॉन रोज तब्बल २० ते २५ किलोमीटर चालत होता.म्हणजे नऊ दिवसांत कॅम्पच्या विरुद्ध दिशेने त्याने तब्बल १८० ते २०० किलोमीटर पायपीट केली होती.कोणाचीही सोबत नसताना केवळ स्वतःच्या हिमतीवर एका बारा वर्षांच्या मुलाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेलं हे साहस म्हणजे माणसाच्या चिवट जीवनासक्तीचं प्रतीक म्हणायला हवं.