* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: पावसाचं झाड : एक सुंदर संधिप्रकाश / Rain tree: a beautiful twilight

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

5/17/26

पावसाचं झाड : एक सुंदर संधिप्रकाश / Rain tree: a beautiful twilight

मी कोइमतूर फॉरेस्ट कॉलेजमध्ये शिकत असताना १९५८ साली पावसाच्या झाडाचा पहिला परिचय झाला.दर आठवड्याला आम्हा वनाधिकाऱ्यांना वृक्षांच्या ओळखणीचे पाठ देण्यासाठी कोइमतूर शहराच्या परिसरात असणाऱ्या बागा,उद्यानं आणि कृषी महाविद्यालयं यांच्या आसमंतात नेलं जाई.

कोइमतूर तसं हरित शहर होतं.नारळींच्या झाडीतून डोकावणारी लाल कौलारू घरं,घरांपुढं फणसांची आणि आंब्यांची सावली,

बागेत लावलेली नाना त-हेची फुलझाडं,तसंच शहरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येक ऋतूत फुलणाऱ्या वृक्षांच्या रांगा आणि आल्हाददायक हवामान यामुळं माझं तेथील दोन वर्षांचं वास्तव्य मोठं आनंददायी झालं होतं.कोइमतूरमधील एका उद्यानात या पर्जन्य वृक्षाचं पहिलं दर्शन झालं.आमच्या वनाधिकारी शिक्षकानं या झाडाकडे बोट दाखवून त्याचं लॅटिन भाषेतील नाव सांगितलं : 'Pithecolobium saman.' यातील पहिल्या शब्दाचा अर्थ या झाडाला येणाऱ्या शेंगांशी संबंधित आहे.त्या माकडाच्या कानांसारख्या दिसतात. स्पॅनिश भाषेत त्याचं नाव आहे Zaman.त्याचा अपभ्रंश 'Saman.' त्या झाडाचं इंग्रजी नाव आहे 'रेन ट्री' म्हणजे पावसाचं झाड पर्जन्य वृक्ष.आमचे वनाधिकारी शिक्षक हरिसिंगानी सर वृक्षांची अशी काव्यमय ओळख करून द्यायचे.

त्यामुळं वृक्षांची शास्त्रीय नावं लक्षात ठेवायला अवघड असूनही ती सहज आठवणीत राहात.

मी त्या उंच भव्य झाडाकडं पाहात होतो.सारं झाड हिरव्यागार दाट पानांनी भरून गेलेलं.

तेवढ्यात सर म्हणाले,

'इतक्या दुरून पाहू नका.पुढं जा.त्या झाडाला स्पर्श करा.त्याची साल पहा.पानं हातात घेऊन त्यांची रचना पहा.फुलांचा रंग-आकार बघा.छताचं निरीक्षण करा.फांद्यांचे आकार पहा.एवढं जवळून निरीक्षण केल्यावर ते झाड तुमच्या कायमचं स्मरणात राहील.'

इथल्या रस्त्याच्या कडेनं लावलेली ही झाडं वाऱ्या वादळाला तोंड देत या झाडांनी आपला आकार कायम ठेवला होता.

हरिसिंगांनी सर पुढं सांगत होते,

'हे झाड वाढतंही जलद.मूळचं अमेरिकेतील.सिलोनी लोकांनी इकडं आणलं.तिथून ते भारतात आलं.त्याचं कारण वेगळं होतं.रेल्वेच्या इंजिनासाठी मंद गतीनं जळणारं इंधन लागतं,ते त्या झाडापासून उपलब्ध होतं.'माझ्यासमोरच्या झाडाची उंची आम्ही 'अ‍ॅबनी लेव्हल'नं मोजली,तर ती सत्तर फूट भरली. त्या झाडाचा आकार छत्रीसारखा,बुंध्यापासून निघालेल्या फांद्या छत्रीच्या काड्यांसारख्या उंच जाऊन त्यांनी वृक्षाच्या छताचा डोलारा तोलून धरला होता.पानोठ्याकडं पाहिलं,की हिरव्या मोरपिसाऱ्याची आठवण येई,पानं लांब असून देठाचा अभाव,शेवटी शेवटी ती अधिक मोठी आणि बाकदार होतात.

हवामानाप्रमाणं पानांची स्थिती बदलते.सूर्याच्या पूर्ण प्रकाशात ती जमिनीशी समांतर आडवी होऊन घनदाट छत उभं करतात.त्यातून क्वचितच एखादा उन्हाचा कवडसा पाझरतो.पावसाळी ढगाळ हवामानात आणि रात्री त्यांची पानं लाजाळूच्या पानांसारखी मिटलेली असतात.अशा रीतीनं पानं मिटली,की मला या देशात ते पावसाच्या आगमनाचं सूचक मानतात.म्हणून त्याचं नाव ‘रेन ट्री' किंवा पावसाचं झाडं.उन्हाळ्यात फांद्यांच्या अग्रावरील पुष्पदंडावर फिक्या गुलाबी मंजिऱ्यांचे गुच्छ दिसू लागतात.ते रेशमी गोंड्यासारखे वाटतात.या ऋतूत वृक्षाखालून येता-जाता फुलांचा मंद गंध दरवळू लागतो झाडाला येणाऱ्या शेंगांत मऊ,गोड गर असतो.म्हणून खारी या शेंगांबर फार लड्डू असतात.

महाराष्ट्रातील वनविभागाची वनात असणारी जुनी विश्रामगृहं पाहिली,तर आपल्या ध्यानात एक गोष्ट येईल की,ती मुख्य रस्त्यापासून आत एक-दोन किलोमीटर अंतरावर आहेत.ती उंचावर बसली आहेत.आत वनविश्रामगृहाकडं जाणारा रस्ता (अप्रोच) ही एक सुंदर कल्पना आहे.या वाटेनं चालू लागलात,की रस्त्याच्या दुतर्फा पावसाची जुनी झाडं उभी असतात.त्यात मधूनच शिरीष वृक्षांचं मिश्रण असलं,तरी तीही त्यात सहज विरून गेलेली असतात.ती दोन्ही झाडं दिसायला सारखी म्हणून पावसाचं झाड 'विलायती शिरीष' म्हणूनही ओळखलं जातं.पावसाच्या झाडाप्रमाणंच शिरीष वृक्षांवर नाजूक फुलांचा बहर आलेला असतो. झाडावरील गतवर्षाच्या शिरीषाच्या शेंगांच्या पापडीमधील बी हवेमुळं रुणुझुणु वाजत असतं. पुष्पांचा सुगंध आसमंतात दरवळलेला असतो.त्या वृक्षांच्या दाट सावलीतून मी हळूहळू विश्रामगृहाकडं जाऊ लागतो.दूर पावसाच्या झाडांच्या हिरव्यागार राईतून तांबड्या कौलांचं छप्पर डोकावू लागतं.

तिथं पोहोचल्यावर विश्रामगृहापुढील हिरवळीवर उभं राहून सुंदर हिरवळ पाहता पाहता डोळे निवू लागतात. अशी गालिच्यासारखी मुलायम हिरवळ फक्त पर्जन्यवृक्षाखालीच येऊ शकते.झाडाची ही उपयुक्तता आणि सौंदर्य ज्या वनाधिकाऱ्यानं जाणलं,तो सौंदर्यदृष्टीचाच असणार !

'हिरवळीवर वेताच्या खुर्चा ठेवलेल्या.प्रवासामुळं थकल्यानं मी खुर्चीत बसून समोर पाहतो,तर घनदाट जंगल असलेल्या पर्वतांच्या रांगा निळ्या होत होत क्षितिजावर विलीन झालेल्या,रानपाखरांची सुस्वर गाणी ऐकतच मी चहा घेत घेत समोरच्या दृश्याकडं पाहात असे.पावसाच्या वृक्षांनी सुशोभित असलेली राई बघत राहणं हा एक विलक्षण सौंदर्यानुभव आहे. 

हिवाळ्यातील एका सायंकाळी मी हिरवळीवर बसून या दृश्याकडं पाहात होतो.हिवाळ्यात सायंकाळी लवकर अंधारू लागतं,

संधिप्रकाश अल्पकाळ टिकतो.दिसतो, न दिसतो.तोच काळोखात विलीन होतो,परंतु मला समोर एक अभूतपूर्व देखावा दिसत होता.संधिप्रकाशाची वेळ निघून गेल्यावर पुन्हा तिथं जिकडे तिकडं सुंदर संधिप्रकाश दिसत होता.

मला कबीराच्या दोह्याची आठवण झाली.

सब अंधेरा हट गया। दीपक देखा माही।

हा अनुभव मी माझ्या रसिक मित्र-मैत्रिणींबरोबर घेतला आहे.परंतु त्यांना त्यातील गूढ सांगितल्याशिवाय सृष्टीतील ही किमया त्यांच्या लक्षात येत नसे.एकदा त्यांच्या ध्यानात आलं,की मग शब्दांची गरज नसे.सूर्य आकाशात प्रकाशत असताना एकाएकी आभाळ येऊन सूर्य दिसेनासा व्हावा,काही वेळानं विरळ ढगांआडून प्रकाश पाझरावा,पावसाचा नुसताच शिडकावा व्हावा,असा अलौकिक सुंदर परिणाम सभोवताली दृगोचर होत होता.त्यामुळंच पावसाच्या झाडाभोवतालचा सारा परिसर सदा हिरवागार दिसतो.

एकदा असाच मी सायंकाळी हिरवळीवर बसून समोरच्या दृश्याकडं पाहात होतो.इतक्यात माझ्या अंगावर पाण्याचे तुषार पडावे,तसा भास झाला.मी आजूबाजूला,वर आणि खाली आश्चर्यानं पाहू लागलो. खरं म्हणजे,ते पाण्याचे तुषार झाडावरूनच पडत होते. फांद्यांतून येणाऱ्या तिरप्या किरणांत ते जलतुषार आणखी सुंदर दिसत होते.

मी चौकीदाराला हाक मारली.तो अदबशीरपणे पुढं येऊन उभा राहिला.पाण्याचे तुषार त्याच्याही अंगावर पडत होते.तो देखील आश्चर्यानं आजूबाजूला पाहात होता.मी त्याला म्हणालो,

'झाडावर चढून पहा तरी,काय बरसतंय ते.'

तो झरझर वरच्या फांदीपर्यंत पोहोचला.आश्चर्यचकीत होऊन म्हणाला,

'अबब ! साहेब बघा तरी !'

त्यानं फांदी एका हातानं हलविली.तोच पंख असलेल्या कीटकांचा थवाच्या थवा भर्रकन वर उडाला.काही झाडाच्या खोडावर बसले.

मी जवळून पाहिलं,तर ते रातकिडे होते.आता ते रातकिडे उडून दुसऱ्या झाडाकडं गेले,तसा वरून येणारा पाऊस थांबला. चौकीदारानं एक फांदी खाली टाकली.

खाली पडलेल्या फांदीची साल मी काढली.त्या फांदीचं 'पॉकेट लेन्स'मधून निरीक्षण केलं.तेव्हा असं आढळून आलं की,त्या फांदीवर रातकिड्यांनी सूक्ष्म छिद्रं आपल्या सोंडांनी पाडली होती.ते कीटक झाडांतून वाहणाऱ्या जीवनरसाचं शोषण करीत होते.शोषणक्रिया इतक्या वेगानं चालली होती,की सोंडेकडं येणारा रसाचा प्रवाह वेगानं वाहात येऊन पावसाच्या रूपात खाली पडत होता.तेव्हा माझ्या लक्षात आलं,की याला पावसाचं झाड का म्हणतात.(पाखरमाया,मारुती चितमपल्ली, प्रकाशक- साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी,नागपूर)

पावसाची ही झाडं कधी जंगलात आढळून येत नाहीत. विस्तृत अशा हिरवळीच्या वा मैदानाच्या कडेनं वाढणारं तसेच,शोभेचं आणि सावलीचं झाड असल्यामुळं उद्यानातून आणि बागांतून ते दिसून येतं रातकिड्यांचा हा खाद्यरस फक्त पावसाच्या झाडातच असतो,असं नव्हे.नवेगावबांध,नागझिरा आणि मेळघाट इकडील वनांतून भटकत असताना साग,धावडा,कुसुंब इत्यादी वृक्षांवरूनही असेच पाण्याचे तुषार अंगावर पडण्याचा अनुभव मी अनेक वेळा घेतला आहे.परंतु रातकिड्यांना पावसाचं झाड अधिक आवडत असावं.या कीटकांना आकर्षित करायचं,तर पावसाची झाडं लावायला हवीत. त्यामुळं आजूबाजूचा परिसर हिरवा राहीलच,परंतु रातकिड्यांच्या संगीताचाही लाभ घेता येईल.

◆◆◆ समाप्त ◆◆◆