* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१०/१/२६

हारजीत। / defeat

दुसऱ्या पहाटे सूर्य उजाडला,गवतावरच्या दवबिंदूंची वाफ झाली.नोकोबी परिसरातली सर्व वारुळं जागी होऊन आपापल्या कामाला लागली.ओढा-मुंग्यांनी पायवाट वारुळावरचा हल्ला नव्यानं सुरू केला. वारुळाच्या द्वाराभोवती पायवाट-सैनिक मुंग्या वर्तुळात उभ्या होत्या.

आता त्यांना मदत करायला कामकरी मुंग्या नव्हत्या.

सैनिकांना मिळणारा तो आधार आता नाहीसा झाला होता.उलट ओढा-हल्ला जोरदार होता.तासाभरातच त्यांचं पूर्ण सैन्य पायवाट-दाराभोवती एकत्रित झालं.एकेक पायवाट सैनिक मुंगी मरत होती,आणि तिची जागा घ्यायला वारुळातून कोणी येत नव्हतं.लवकरच सर्व पायवाट-सैनिक संपले,आणि ओढा-सैन्य पायवाट वारुळात घुसलं.


('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,

मनोविकास प्रकाशन)


मुख्य बोगद्यानं खाली उतरत ओढा सैनिक, ओढा-कामकरी आजूबाजूंच्या बोगद्यांमध्ये आणि दालनांमध्ये पसरले.सगळं वारूळ त्यांच्या 'हल्ला बोल' फेरोमोन्सनं भरून गेलं.आता पायवाट मुंग्यांच्या मनात वारुळाचा विचार नव्हता.प्रत्येक मुंगी सुटीसुटी स्वतःला वाचवू पाहात होती. एकमेकींना कोणतेही संदेश दिले जात नव्हते.राणी नाही,वारूळ शत्रूनं व्यापलेलं,अशा स्थितीत सामाजिकता मुळीच शिल्लक नव्हती.


काही मुंग्या पळून बाहेर पडल्या.पानांआड, खड्यांमागे लपायचा प्रयत्न करत होत्या,त्या.पण एकेक एकेक मुंगी मरत होती.कोणाला कोळ्यांनी खाल्लं,काही पाण्यात पडून मेल्या.एकीला लष्करी-मुंग्यांच्या जथ्यानं खाल्लं.बहुतेक सगळ्या एकदोन दिवसांत मारल्या गेल्या.आठवड्याभरात एकही पायवाट-मुंगी कुठेही जिवंत उरली नव्हती.


ओढा-मुंग्यांनी पायवाट वारुळाचा कोपरा-न्-कोपरा तपासला.एका संगोपन दालनात त्यांना नुकत्याच कोषाबाहेर पडलेल्या काही कामकरी मुंग्या आढळल्या.त्यांना सांभाळून ओढा वारुळात नेलं गेलं.काही थोड्यांना मारून खाल्लं गेलं.पण बहुतेक सगळ्यांना गुलाम म्हणून राखलं गेलं.अगदी लहान वयाच्या मुंग्या असल्यानं त्यांना पायवाट वारुळाचा वास नीटसा समजला नव्हता.त्या सहज ओढा वारुळाचा वास आपला मानू लागल्या.यानंतर कोणतीही इतर वासाची मुंगी भेटली,तर या पायवाट-गुलाम मुंग्या अगदी मूळ ओढा-

मुंग्यांइतक्याच वारुळप्रेमानं त्यांच्याशी लढायच्या!


या परक्या मुंग्यांना आपल्या करून घेतल्यानं ओढा-वारुळाची कामगारसंख्या वाढली.पायवाट वारुळाशी लढाईत झालेलं नुकसान भरून निघालं.


जर लढाईच्या वेळी पायवाट राणी जिवंत असती आणि ओढा-मुंग्यांनी तिला पकडलं असतं,तर मात्र तिच्या ताबडतोब खांडोळ्या उडवल्या गेल्या असत्या.हरलेल्या वारुळांच्या राण्यांना क्षणभरही जिवंत ठेवलं जात नाही.एक म्हणजे एकच राणी चालू शकते.त्या बाबतीत मुंग्यांची मनं कठोर असतात.माणसांमध्ये याला एकचालकानुवर्तित्व म्हणतात;एकाच चालकाच्या सांगण्यानुसार वागायचं असतं! म्हणूनच दोन वारुळांमध्ये कधीच तह होत नाही की मैत्री होत नाही. वारुळाची जागा एकेरी मालकीखाली राखणं,हे वारुळ-महाप्राण्याच्या दृष्टीनं अटळ,अपरिहार्य असतं. आणि वारुळाचं क्षेत्र काहीही करून,प्रसंगी जीव देऊनही राखावं लागतं.पण मुंग्यांच्या विश्वाबाहेरच्या घडामोडींचेही मुंग्यांवर परिणाम होत असतात.पायवाट वारुळाला हरवल्यानंतर तीनच आठवड्यांनी ओढा-वारुळाजवळ हलती झाडं येऊन गेली.मागे पायवाट वारुळाला जसे अनुभव आले होते,तसेच आता ओढा-वारुळाला आले.काही मुंग्या मेल्या,आणि विचित्र अन्नाचे ढिगारे हाती आले.ओढा-मुंग्यांना ही आपल्यावर देवांनी केलेली कृपाच वाटली.त्यांनाही वाटलं,की देव आपले सहकारी आहेत.देवही आपल्यासारखाच विचार करत असणार,अशी ओढा-मुंग्यांची खात्री पटली.त्यांना विचार करायची इतर कोणती पद्धत माहीतच नव्हती.तशी पद्धत त्यांना सुचूच शकत नव्हती.त्यांची खात्री पटली,की देवही आपल्या ताकदीचा भागच आहेत.


पायवाट वारुळाला हरवून,तिथल्या सर्व मुंग्यांना मारून किंवा गुलाम बनवून ओढा-मुंग्यांनी युद्ध थांबवलं.शत्रू पुन्हा उभा राहू शकत नाही अशी खात्री झाल्यावर त्यांनी पायवाट क्षेत्र पादाक्रांत केलं.त्या क्षेत्रभर कुठेकुठे विष्ठा टाकून फेरोमोन-

संदेश पसरवले,"हे क्षेत्र ओढा-मुंग्यांचं आहे." क्षेत्रातल्या वाटा-रस्त्यांवर आता ओढा वारुळाच्या फेरोमोन्सचा दरवळ होता.

पण त्यांनी नवीन क्षेत्र व्यापलं नाही.गरजेनुसार त्या अन्न शोधत तिकडे जायच्या.मावा कीटकांची विष्ठा,मेलेले कीटक, भरपूर नवं अन्न मिळायचं.आणि वाढीव अन्नामुळे ओढा-वारुळाची प्रजाही झपाट्यानं वाढत गेली.


ज्या मुंग्यांना लढायला बोलावलं गेलं,त्या आपण लढाईत जगणार की मरणार याचा विचार न करता आदेश पाळत लढायला गेल्या.आपल्या वारुळाला, आपल्या महाप्राण्याला त्यांनी जिंकवून दिलं.क्षेत्र मिळवून दिलं.अन्न मिळवून दिलं.गुलाम मिळवून दिले.आपली जीवजात जगायला आवश्यक ती सर्व चक्रं पुरी करत होत्या त्या.आणि त्यांना हे करायचा आदेश देणाऱ्या होत्या त्यांच्या मूलप्रवृत्ती.समाप्त …


सगळ्यांना शिकवणारा 'शहाणा,माणूस…


🔍 स्कॅन करा आणि भेट द्या 


www.vijaygaikwad.com


 ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करा,डिजिटल युगात विजय गायकवाड यांच्यासोबत !


आज आमचे प्रेम मार्गदर्शक मित्र तरुण शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांचा जन्मदिवस असं म्हणतात…एक अनोळखी माणूस,पुस्तक वाचत असताना उघडलं जाणार पान व त्या पानावरील एक वाक्य,तसंच येणारा अनोळखी फोन तुमचं आयुष्य झपाट्याने प्रकाशमय करू शकतो.असंच माझं आयुष्य बदलून टाकायला सुरुवात केली ती म्हणजे विष्णू गाडेकर यांनी आणि दररोज काही ना काही मला शिकवून शिकवतच असतात. माधव गव्हाणे चांगली माणसं जोडून देण्यामध्ये यांचा हातखंडा आहे.

त्यानेच सोडून दिलेला हा माणूस अजूनही माझ्या आयुष्याशी जोडला गेलेला आहे.फोन आला आणि व्हाट्सअप वरती काहीतरी लिहितो त्याला मर्यादा आहेत म्हणून एका रात्रीत न झोपता मला विजय गायकवाड हा ब्लॉग तयार करून दिला. हे लिहून कधीच न संपणारी अशी वही…


www.vijaygaikwad.com हे माझं नाव अमेरिकेतल्या फ्रॉक्झी या कंपनीने घेतलेलं होतं ते आम्ही पंधराशे रुपयेला विकत घेतलं हे विष्णू गाडेकर यांनीच केलं.दरवर्षी पंधराशे रुपये भरून हा ब्लॉग रिन्यूव करावा लागतो. पण माझ्याकडे पैसे नव्हते,तसेच साहेबांच्याकडेही नव्हते त्यांनी एक मार्ग काढला आपली चालू असणारी स्वतः ची एक वेबसाईट बंद केली.आणि www.vijaygaikwad.com हे वेबसाईट सुरू केली. अशा या मित्राला जन्मदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा.आम्ही ब्लॉग सुरू केला त्या वेळेला आम्हाला प्रश्न पडला होता. वाचक मिळतील का ? पण वाचकांना मला भरभरून प्रेम दिलं त्या सर्वांचेही आभार त्यावेळेला त्यांनी मला सांगितले शंभर वाचक ही मिळवायला फार वेळ लागेल आपल्याला पण आज ६४३८१ वाचक तर लेख ६१४ लेख,२३९ भाषा व किमान २० देशांमध्ये तो सन्मानाने वाचला जातो.


त्यांनी ज्या वेळेला मला विचारलं,वाचक मिळतील का ? मी ठामपणे सांगितलं एक जरी वाचक मला मिळाला तरी मी आयुष्यभर त्या एका वाचकांसाठी लेखन करीन. आज ठामपणे मी त्यांना हे सांगू इच्छितो की त्यांच्या सोबत केलेला हा प्रवास माझ्यासाठी खरोखर अविस्मरणीय असा आहे,आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी लिहित राहिन….धन्यवाद


मॅट्रिक फेल विजय गायकवाड,टोप,कोल्हापूर


संक्षिप्त वाढदिवस शुभेच्छा


आयुष्याला दिशा देणारा,

लेखनावर विश्वास ठेवायला शिकवणारा

आणि न शिकवता शहाणं करणारा माणूस—

विष्णू गाडेकर सर.

मित्रत्व,समर्पण आणि विश्वास यांचा

खरा अर्थ तुमच्याकडून शिकायला मिळाला.

तुमच्यासोबतचा प्रवास माझ्यासाठी सदैव प्रेरणादायी आहे.

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

— डॉ. दिपक शेटे (गणितायन)


विजय गायकवाड : न थांबणाऱ्या लेखणीचा उत्सव


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

विजय गायकवाड

शब्दांना अर्थ देणारा,

विचारांना दिशा देणारा,

आणि माणसांना माणूसपणाशी जोडणारा

विजय गायकवाड —

जगण्याच्या कठीण वाटांवरून चालताना

लेखणीला कधी थांबू न दिलेला,

अपयशालाही अनुभव मानून

यशाला माणुसकीची किनार देणारा

तुमचा हा प्रवास खरोखर प्रेरणादायी आहे.

एक जरी वाचक मिळाला

तरी आयुष्यभर लिहिण्याचा दिलेला शब्द

आज हजारो वाचकांच्या विश्वासात

परावर्तित होताना दिसतो आहे.

शब्दांची ही न संपणारी वही

समाजाला प्रकाश देत राहो,

हीच सदिच्छा.

तुमच्या लेखणीतून

सत्य,संवेदना आणि सामाजिक भान

असंच अखंड वाहत राहो.

नवे विचार, नवी माणसं

आणि नवे क्षितिजे

तुमच्या लेखनातून जन्माला यावीत.

 वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

आरोग्य,आनंद,समाधान

आणि लेखणीला अखंड बळ लाभो.


— शुभेच्छुक

डॉ. दिपक शेटे (गणितायन) 


काही वर्षापूर्वी एका *विद्यापीठाची*ओळख एका सन्मित्रा मुळे झाली.त्या विद्यापीठात जगातील सर्वच ज्ञानाचं भांडार आहे.हे विद्यापीठ म्हणजे आदरणीय *विजयजी गायकवाड साहेब*.ज्यांच्या शब्दाचा मी चाहता.माझ्यासारख्या अनेकांचे आदर्श असणाऱ्या साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा - दादासाहेब ताजणे,(लाडके शिक्षक)


आदरणीय **विजय गायकवाड सर


आपले व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानाचा असा एक 'कल्पवृक्ष'आहे,ज्याच्या आश्रयाला येणाऱ्या प्रत्येकाला प्रगतीची नवी दिशा आणि समृद्धी मिळते.आपल्या अफाट बुद्धिमत्तेचा आणि अनुभवाचा हा 'ज्ञानवृक्ष आम्हा सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी ठरला आहे.आपल्या ज्ञानाच्या भांडारातून आपण दिलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही स्वतःला नेहमीच समृद्ध समजतो.


आज आपल्या *वाढदिवसानिमित्त*आपल्याला उदंड आयुष्य,उत्तम आरोग्य आणि सुख-समृद्धी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.आपल्या मार्गदर्शनाचा हा वटवृक्ष असाच उत्तरोत्तर बहरत राहो.आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


पार्थ राजे गाडेकर युवा तंत्रज्ञ,सेलू 



८/१/२६

कुठलीच गोष्ट शिल्लक नसते.There is nothing left.

सुमारे चाळीस पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट.तेंव्हा संपर्काची साधने अगदीच मर्यादित होती. 


अनेक गावं मुख्य प्रवाहापासून दूर,अडगळीला राहायची. रस्ते नव्हते, वाहतुकीची सोय मर्यादित, आणि नैसर्गिक आपत्ती आली की दोन-दोन, तीन-तीन महिने गाव बाहेरच्या जगापासून तुटून जायचे.


अशाच एका डोंगरपायथ्याच्या गावात,महिन्यातून एकदा मीठ विकायला एक शेतकरी आपली बैलगाडी घेऊन यायचा.

गावकऱ्यांना त्याचा येण्याचा दिवस वर्षानुवर्षे ठरलेला होता. 


त्या दिवशी गावाच्या पारावर त्याची गाडी उभी राहायची आणि महिला मंडळ,घरांतील लोक आपापल्या गरजेपुरते मीठ त्याच्याकडून घेत गेले की त्याचे काम संपायचे.बदल्यात कधी धान्याचा घाणा,कधी मातीची भांडी,तर कधी काहीच नाही असा अल्प मोबदला त्याला मिळायचा.त्याचं नाव काय? कुठल्या गावचा तो? घरात किती मंडळी? हे विचारण्याचीही तसदी कोणालाच नव्हती.


" मीठाला काय दाम द्यायचं ? "


हीच गावकऱ्यांची वृत्ती.तो मात्र निःशब्द, निःस्वार्थपणे मिठाचे वाटप करून आनंदाने निघून जायचा.त्याने कधी तक्रार केली नाही,अपेक्षा धरली नाही.


अशाच एका दिवशी,गावात एक लग्न होतं.सर्वांनी त्याच्याकडून मीठ घेतलं पण साधं निमंत्रणही कोणी दिलं नाही.गावात मोठी मेजवानी,आनंद, गडबड… आणि तो मात्र पारावर एकटाच बसलेला. ते पाहून त्याच्या सोबत आलेल्या मुलांनी विचारलं


"बाबा,तुम्ही इतकी वर्षे या गावासाठी येता… मग तुम्हाला कोणी का नाही बोलावलं?"


या निरागस प्रश्नाने त्याच्या मनात दडवून ठेवलेली नाराजी चटका देऊन उठली.त्याने मुलांना समजावलं,पण आतून प्रश्न स्वतःलाच पडला 


" मी करतोय कोणासाठी? 


ज्यांना माझ्या येण्या-जाण्याचा,माझ्या श्रमाचा, माझ्या अस्तित्वाचाच पत्ता नाही… त्यांच्यासाठी मी का करावे?"


त्या दिवशी त्याने एक निर्णय घेतला,

आता या गावात मी येणार नाही.


तो गेला.

गावकऱ्यांना काहीही फरक पडला नाही.

साठवणुकीचे मीठ घरात होतं;म्हणून कोणाला त्याची आठवणही नव्हती.


पण दिवस गेले…

हळूहळू घरातील मिठाचा साठा संपत गेला. 

जेवण आळणी होऊ लागलं.स्त्रियांचे गट नकळत वेशीपाशी येऊन त्याची वाट पाहू लागले.


आणि जेव्हा ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळेला त्याची गाडी आलीच नाही.तेव्हा गावातील प्रत्येकाला त्याची किंमत कळली.


आता गावाला समजलं…

ज्याला आपण "शिल्लक", "साधं", "काहीतरी स्वाभाविक" समजतो,

ज्याचं योगदान इतकं नियमित असतं की आपण त्याची दखलच घेत नाही,

तोच मनुष्य खरे तर आपल्या जगण्यालाच अर्थ ऊर्जा देत असतो.

जो निःशब्द, विनातक्रार, विनाअपेक्षा सेवा करत असतो,

तो थांबला की, त्याच्या अस्तित्वाचं मोल कळतं.


बोध: –

जगात कुठलीच गोष्ट शिल्लक नसते.

कधी कोणाची कृपा,कोणाचं योगदान,

कोणाची साथ "स्वाभाविक" समजू नका.

जोपर्यंत एखादं काम निःशब्द चालू असतं,तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही.जेव्हा ते थांबतं तेव्हा उशिरा का होईना,पण सत्य समोर उभं राहतं.


ही कथा सांगते की,


कृतज्ञता व्यक्त केली नाही,मोफत मिळणाऱ्या कार्याची दखल घेतली नाही, दिला नाही,तर सर्वात शुल्लक वाटणारे पण जीवन समृद्ध करणारे मिठासारखे पण अत्यावश्यक साधन आपल्या आयुष्यातून कायमचे निघून जाते*.


लेखन :- अजित देशपांडे यांची ही बोधकथा आयुष्यात काय महत्वाचे आहे ही सांगून जाते.आमचे मार्गदर्शक सुनिव घायाळ यांचे मित्र 'आपरे' यांच्याकडून व्हाट्सअपद्वारे आलेली वरील कथा जशी आहे तशी आपल्यापुढे सादर केली आहे. - विजय गायकवाड..।।





६/१/२६

प्रसिद्ध राजा चौदावा The famous King XIV

पुन्हा एकदा कवीच्या वातावरणातून खाली उतरून राजांकडे वळू या.सतराव्या शतकात युरोपातील राज्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षा व घोडचुका यांमुळे युरोपीय संस्कृती जणू नष्टप्राय झाली ! शेक्सपिअरनंतरच्या पिढीने अत्यंत रक्तपाती असे धार्मिक युद्ध पाहिले.प्रॉटेस्टंट आणि कॅथॉलिक राजे आपापल्या प्रजेची तीस वर्षे कत्तल करीत होते. 'ईश्वराच्या अती थोर वैभवासाठी' आपापले देश या राजांनी उजाड व उद्ध्वस्त केले.हे तीस वर्षे चाललेले युद्ध १६४८ साली संपले.सारे मध्ययुरोप जणू ओसाड झाले होते.

भुकेलेली माणसे व भुकलेले लांडगे मेलेल्या घोड्यांच्या प्रेतासाठी परस्परांशी लढत होते. 


जर्मनीची लोकसंख्या एक कोटी साठ लक्ष होती ती साठ लक्षांवर आली.पश्चिम जर्मनीतील पॅलेटिनेट स्टेट अठ्ठावीस वेळा लुटले गेले.बोहेमियातील तीस हजार गावे भस्मीभूत झाली.


वेस्टफॅलिया येथील तहाने तीस वर्षांचे युद्ध संपले.पण या युद्धाने कशाचाही निर्णय झाला नाही.कॅथॉलिक पोपशी निष्ठावंत राहिले.

प्रॉटेस्टंट ल्यूथरची पूजा करीत राहिले.मध्ययुरोपातील राजे खाटीकखाना चालवत असता इकडे इंग्लंडमध्ये पहिला जेम्स मॅकिआव्हिलीच्या शिकवणीप्रमाणे अनियंत्रित सत्ता स्थापू पाहत होता.


प्रजेच्या हक्कांपेक्षा राजाची सत्ता अधिक असते असे दाखवू पाहत होता.तो म्हणे, "ईश्वर काय करू शकेल हे विचारणे जसे निंद्य अधार्मिक आणि नास्तिकपणाचे, तद्वतच राजा काय करू शकेल हे विचारणेही प्रजेला शोभत नाही.ते लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखे होय." जेम्सचा मुलगा पहिला चार्लस् गादीवर आला तेव्हा त्याने पित्याच्या उपदेशानुसार वागण्याचे नक्की ठरवले.

इंग्लंडचा अनियंत्रित राजा होणे हे त्याचे ध्येय होते.सर्व सत्ता आपल्या हाती असावी असे त्याला वाटत होते.त्याने पार्लमेंट बरखास्त केले.जमीनदार व व्यापारी राजाचा उद्धटपणा व अनियंत्रित हडेलहप्पीपणा पाहून संतापले.राजाची अनियंत्रित सत्ता सहन करायला ते बिलकूल तयार नव्हते.राज्यकारभारात आपणास सत्ता असलीच पाहिजे असा हट्ट त्यांनी धरला,राजा ऐकेना. तेव्हा या अतिरेकी राजाविरुद्ध त्यांनी बंड केले व त्याला कैद करून शेवटी त्याचे डोके उडवले.


पण इंग्रजांना जुन्या सवयी टाकून देणे कठीण होते. ऑलिव्हर क्रॉम्वेलच्या नेतृत्वाखाली रिपब्लिक स्थापण्याचे थोडेफार यत्न झाले.पण इंग्रज जनतेलाच राजा असावा असे पुन्हा वाटू लागले.नवा राजा आला. पण त्याची सत्ता अनियंत्रित राहिली नाही.राजे लोक धडा शिकले होते.पार्लमेंटशी शत्रूत्व करण्याचे धाडस त्यांनी पुन्हा केले नाही.त्या वेळेपासून इंग्लंड राजशाही रिपब्लिक झाले.राजाचा मुकुट केवळ एक निरुपद्रवी अलंकार म्हणून राहिला.वास्तविक,त्याची आवश्यकताही नव्हती.


(फ्रेंच राजांपैकी अती प्रसिद्ध राजा चौदावा लुई,हेन्री थॉमस,अनुवाद -सानेगुरुजी, मधुश्री पब्लिकेशन)


पण फ्रान्समध्ये अनियंत्रित राजसत्तेची कल्पनाच अधिक दृढावली फ्रेंच राजांनी पौर्वात्य सम्राटांप्रमाणे हुकूमशाही सुरू केली.ते प्रजेचे अनिर्बंध स्वामी होते. सारी प्रजा जणू गुलाम ! प्रजेतील गुलामीची विषमताच जणू त्यांनी नष्ट केली.सारेच दुर्बल व अगतिक प्रजानन या अनियंत्रित फ्रेंच राजांपैकी सर्वांत जास्त दिमाखखोर चौदावा लुई हा होता.


चौदावा लुई हा एकंदरीत कार्यक्षम व लायक राजा होता.

आपल्याजवळ दैवी सामर्थ्य आहे,असे त्याला वाटे. त्याला आपण पृथ्वीवरचे देवच आहोत असा भास होई, तो आपणास सूर्यदेव म्हणवी सूर्यदेव अपोलो याच्याप्रमाणे आपण या मर्त्यलोकी प्रकाश,वैभव व आनंद आणणारे आहोत असे तो म्हणे,त्याला वाटे की, ईश्वराने हे जग जे निर्मिले आहे,ते त्यात आपण आपल्या वैभवाने व दिमाखाने मिरवावे म्हणूनच होय.


त्यांचे पुष्कळसे समकालीन लोक त्याच्या दिमाखाने दिपून जात व त्याला खरोखरच अवतारी मानीत. आजही त्याच्या नावाभोवती तेजोवलय आहे.त्याचा एक अगदी अर्वाचीन चरित्रकार लुई बरट्रांड लिहितो, "चौदावा लुई हा सर्वांहून थोर फ्रेंच मनुष्य होऊन गेला. तो सर्वश्रेष्ठ फ्रेंचमन होय." लुई बरट्रांडचे मन मध्ययुगीन आहे.घमंडेनंदन व आदळआपट करणारे लोक त्याला आवडतात.हा चरित्रकार एके ठिकाणी लिहितो, "ग्रीसचा होमर,रोमचा व्हर्जिल,इंग्लंडचा शेक्सपिअर,इटलीचा डान्टे,जर्मनीचा गटे,तसा फ्रान्सचा चौदावा लुई." अशा प्रकारे लुईची अत्यंत स्तुती करून फ्रान्समधील थोर थोर कवी,शास्त्रज्ञ व व तत्त्वज्ञ यांपेक्षाही आपण चौदाव्या लुईला का श्रेष्ठ मानतो याची कारणे तो देतो.तो म्हणतो,"चौदावा लुई हा दैवी राजा होता. फ्रान्समध्ये त्याच्यासारखा दैवी मनुष्य जन्मला नाही. त्याने सारे आयुष्य युद्धात घालवले. त्याचे युद्धावर जितके प्रेम होते, तितके कोणाचेही नव्हते." चौदावा लुई युद्धाच्या वातावरणात वाढला.तीस वर्षांचे युद्ध संपण्यापूर्वी आठ वर्षे म्हणजे १६३८ साली तो जन्मला.युद्धातील विजय म्हणजे परम ऐश्वर्य असे त्याला शिकवण्यात आले होते.बुद्धप्रिय राष्ट्रांतील विकृत व विपरीत नीती त्याच्या बालमनावर ठसविण्यात आली होती.गुप्त कारस्थाने,खोटे बोलणे,फसवणूक,स्वार्थ,हाव इत्यादी ध्येये त्याच्यासमोर ठेवण्यात आली होती.या विचारांवर तो पोसला गेला होता.त्याच्या चरित्रकार बरट्रांड लिहितो,'लहानपणापासून आपले विचार व आपल्या भावना लपविण्याची आनुवंशिक कला त्याला साधली होती.

आपले स्वरूप लपवून ठेवण्याची गोष्ट अत्यंत फायदेशीर व आवश्यक असते.राजामधला सर्वांत मोठा गुण म्हणजे आपले स्वरूप समजू न देणे हा होय.'आपण मोठे झाले पाहिजे असे लहानपणापासूनच त्याला वाटू लागले होते. 


'तू कोणीतरी मोठा आहेस' असे त्याला लहानपणापासून शिकवण्यात येत होते.त्याची जीवनातील सर्वांत मोठी महत्त्वाकांक्षा हुशार,धटिंगण होणे ही होती.त्याच्या शिक्षकांनी त्याच्यासाठी नाना प्रकारचे लढाऊ खेळ शोधून काढले होते.त्याचे सारे बालपण भांडणांत व मारामाऱ्या करण्यात गेले.त्याचा स्वभाव वाघासारखा होता.ला पोर्ट नावाचा त्याचा एक नोकर होता. वयाच्या तेराव्या वर्षी हे लुई महाशय कसे होते,याचे गमतीदार शब्दचित्र त्याने रंगवले आहे.ला पोर्ट लिहितो, "आम्ही माँटेरोहून कॉबल येथे गेलो.तिथे लुईने आपल्या धाकट्या भावाला आपल्या शय्यागारात निजण्यास सांगितले.सकाळी दोघे भाऊ जागे झाले.चौदावा लुई आपल्या भावाच्या अंथरुणावर थुंकला.तोही लुईच्या अंथरुणावर थुंकला,लुई रागावून भावाच्या तोंडावर थुंकला.तेव्हा तो धाकटा भाऊ उडी मारून लुईच्या अंथरुणावर गेला व त्याने तिथे लघुशंका केली.लुईनेही तोच प्रकार भावाच्या अंथरुणावर केला...!" असा हा तेरा वर्षांचा लुई होता. आणि त्या वेळेस लुई राजा झाला होता. पाचव्या वर्षीच तो गादीवर बसला होता. पण चौदा वर्षांचा होईपर्यंत त्याला राज्याभिषेक करण्यात आला नव्हता.


त्याला राज्याभिषेक होईपर्यंत राज्यकारभार त्याची आईच पाहत होती.कार्डिनल माझारिन त्याला शिकवीत होता.हा इटालियन कार्डिनल लुईच्या आईचा प्रियकर होता.कार्डिनल माझारिन मोठा साहसी व नास्तिक होता.त्याची महत्त्वाकांक्षा पोप होण्याची होती. तो स्वतः अती हुशार,लफंग्या व दांभिक होता.त्याने तरुण लुईला दंभाचे परिपूर्ण शिक्षण दिले.तो लुईला सांगे, "मोठमोठ्या सरदार घराण्यांतील लोकांना कस्पटासमान,पायावरील धुळीप्रमाणे मान.दरबारातील सरदार-दरकदारांशी कधीही अधिक परिचय ठेवू नको. लोक कृपेची याचना करतील,तेव्हा चेहरा कठोर कर. मनातील भाव कधीही प्रकट न करता जणू अनाकलनीय गूढ.यातच खरा राजेपणा आहे.सर्व कारभार गुप्तपणे कर.

कोणालाही कसलीही दाद लागू देऊ नको.शाब्दिक वचने भरपूर द्यावीत;पण ती पूर्ण मात्र कधीही करू नयेत.'वचने किं दरिद्रता?' "


हा कार्डिनल माझारिन मॅकिआव्हिलीच्या राजनीतीवर पूर्ण विश्वास ठेवणारा होता.त्याने आपल्या या छात्राला या सैतानी विद्येत तरबेज केले.मॅकिआव्हिलीच्या वचनांनी भरलेली एक वहीच्या वही त्याच्याजवळ होती. तिच्यातील सर्वांत प्रमुख वचन हे होते; 'राजांची पूजा केली पाहिजे.त्यांची इच्छा म्हणजेच कायदा!' शुद्धलेखन लिहावयास शिकवणाऱ्या त्याच्या पंतोजींनी हे वाक्य त्याच्याकडून पुन्हा-पुन्हा घोटून घेतले होते.


बाळपणी लुईची बुद्धिमत्ता सामान्य मुलांच्या बुद्धिमत्तेहून कमी दर्जाची होती.पण माझारिनने लुईच्या हृदयात सुंदर वस्तूंविषयीची प्रीती निर्मिली,माझारिन हा इटालियन होता.त्याचे शिक्षण स्पेनमध्ये झाले होते आणि आता तो फ्रेंच संस्कृतीही आत्मसात करू पाहत होता.तो सौंदर्योपासक होता.संगीत व मूर्तिकला यांच्यावर त्याची भक्ती होती.रेशीम व फिती,आरसे व रत्ने,चित्रे व पुस्तके या सर्वांचा तो शौकीन होता,तो जरा डॅडी म्हणजे नवाबी वृत्तीचा होता.

इटालियन भिक्षुणींना तो स्वतःसाठी नाना सुंगधी उटणी व तेले करावयास लावी.या सुंगधी उटण्यांचा व तेलांचा उपयोग तो केवळ स्वतःसाठीच नव्हे;तर आपल्या दोन आवडत्या माकडांसाठीही करी.पण त्याच्यामध्ये असला नबाबीपणा असला,तरी एकंदरीत तो सौंदर्याचा प्रेमी होता यात शंकाच नाही.सौंदयोपासना हा त्याचा जणू धर्म होता !जगातील अत्यंत सुंदर असा कलासंग्रह त्याच्याजवळ होता.मरताना 'हा सारा कलासंग्रह सोडून जाण्याची पाळी आपल्यावर येणार;हे एकच दुःख त्याला वाटत होते.


माझारिन मेला तेव्हा राजा तेवीस वर्षांचा होता.तो या कार्डिनलजवळच सौंदर्यप्रेम शिकला होता.सारा फ्रान्स देश त्याने म्युझियम बनवला.ठायीठायी त्याने बागा, राजवाडे व संत-मंदिरे निर्माण केली.देशभर एक प्रकारचे कृत्रिम सौंदर्य दरवळू लागले.

राजदरबारात स्त्री-पुरुष पावडरी फासून,रंग लावून,उंची पोषाख घालून,आढ्यतेने व आदबीने हिंडत.खातापिताना अत्यंत नाजूक हावभाव करीत,साधे वाक्य बोलावयाचे असले, तरी त्यात मोठमोठे शब्द योजीत.साधेपणा जणू संपला व कृत्रिमता म्हणजेच जणू कला व जीवन असे झाले. राजाने उत्तमोत्तम कवी व नाटककार,

तत्त्वज्ञानी व शास्त्रज्ञ,तसेच उत्कृष्ट आचारी आपल्या दरबारी बोलावले.एखादा प्रेमळ धनी आपल्या कुत्र्यांशी वागतो, तसा तो सर्वांशी वागे.आपल्या भोजनाच्या टेबलावरील तुकडे तो त्यांना प्रेमाने देई व त्यांचा कंटाळा आला म्हणजे कचरा फेकावा त्याप्रमाणे त्यांना दूर फेकी.


ज्याप्रमाणे पंडितांना व कलावंतांना,त्याचप्रमाणे राजशाही वारांगनांनाही तो वागवी.त्याच्या पुष्कळच वारांगना होत्या.क्षणभर तो त्यांना वागणुक देई आणि मग लाथ मारी.लुईला देव मानणारे त्याचे काही चरित्रकार तो स्त्रियांच्या बाबतीत असा बेछूट वागणारा नव्हता,असे दाखविण्याची खटपट करीत असतात व त्याची प्रेमप्रकरणे पुष्कळ असली,तरीही तो विवेकी पती होता असे सांगत असतात.त्याचा चरित्रकार बरट्रांड लिहितो, 'अगदी खासगी बाबतीतील बारीकसारीक गोष्टींबद्दल वाचक क्षमा करणार असतील तर मी सांगतो की,आपल्या एखाद्या प्रिय पात्राजवळ अत्यंत कामासक्तीने रंगलेला असताही तो आपल्या पत्नीपासून सर्व रात्र काही दूर राहत नसे.त्या रमणीला सोडून शेवटी संयमाने तो पत्नीकडे येईच.' केवढा उदार व उदात्त राजा !


"मला आपले विकार आवरत नाहीत."असे तो पुष्कळदा आपल्या आईला सांगे व म्हणे,"मला याची लाज वाटते!" पण हे विचार व या वासना आवरण्याचा यत्नच त्याने कधी केला नाही.व्हर्सायलिस येथील तो प्रसिद्ध आरसेमहाल तो भव्य प्रासाद त्याने बांधला.

येथेच तो आपल्या प्रियकरणींची करमणूक करी.त्यांच्याबरोबर कामक्रीडा करी.नाचरंग खेळे,मेजवान्या देई.या त्या विषयोपभोगांतील वैभव प्राचीन रोमन सम्राटांच्या वैभवापेक्षाही अधिक असे.एकदा एका मेजवानीच्या प्रसंगी त्याच्याजवळच्या तरवारीचे म्यान इतक्या हिऱ्यांनी भरलेले होते की,ज्या सोन्यात ते हिरे बसवलेले होते ते सोने दिसणेही मुश्कील झाले होते.ही सौंदर्योपासना,ही सुखे,हे विलास या सर्वांसाठी लुईला अपरंपार खर्च करावा लागे.शेतकऱ्यांची दैना करून त्याने फ्रान्सचे वैभव वाढवले. अधिक उदात्त जगाचा पैगंबर जो डिडरो त्याने एक सुंदर प्रसंग रेखाटला आहे.आपल्या आजोबांना हेन्रीलौदावा लुई आपला व्हर्सायलिसचा प्रासाद दाखवीत आहे.


चौदावा लुईही मेलेला असून त्याचे भूत तो राजवाडा आजोबांना दाखवीत असता तो वृद्ध राजा राजवाडधाकडे बघतो व त्यानंत चुक् चक् करून नापसंतीदर्शक मान हालवून म्हणतो, "बाळ,राजवाडा छान आहे,सुंदर आहे यात शंकाच नाही.पण गोनेसी येथील शेतकऱ्यांची घरे कशी आहेत ते पाहावेसे वाटते." त्या भव्य राजवाड्याच्या आसपास राहणारे शेतकरी पेंढ्यांवर निजत,त्यांना राहण्याला घर नसे, त्यांच्या पोटात भाकर नसे,हे लुईला व हेन्रीला कळते तर त्यांना काय वाटले असते ?


आपल्या या भरमसाठ खर्चाच्या विलासोपभोगांसाठी लागणाऱ्या पैशांकरिता लुई सर्वांवर कर बसवी. मोठमोठ्या सरदारांपासून तो किसान कामगारांपर्यंत सर्वांवर तो करांचा बोजा लावी.पण सरदार बिथरले, तेव्हा त्याने सारा बोजा सामान्य रयतेवरच टाकला. आपल्या सार्वजनिक भाषणांतून तो गरिबांबद्दल अपार सहानुभूती दाखवी.तो एकदा म्हणाला,"शिपायांपेक्षा मजुरांचा उपयोग अधिक असतो."तो दुसऱ्या एका प्रसंगी म्हणाला,"किसान व कामगार यांच्यावर माझे फार प्रेम आहे."तो त्यांच्यावर प्रेम करी व त्यांना चिरडून टाकण्यासाठीही शक्य ते सर्व करी.त्याने शेतकऱ्यांची इतकी पिळवणूक केली की,शेवटी शेतकरी गुराढोरांप्रमाणे गवत खाऊ लागले.दुसऱ्यांबद्दल त्याला यत्किंचितही सहानुभूती वाटत नसे. राजाने आपल्या हृदयात दयेला थारा देता कामा नये, असे त्याचे मॅकिऑव्हिली मत होते.धनी गुलामांवर चालवितो, तशी राजाने प्रजेवर हुकूमत चालवावी असे तो म्हणे. प्रजेबद्दल तो फक्त तिरस्कारच व्यक्त करी. जणू खालच्या योनीतील पशू समजूनच तो त्यांना वागवी.शौचाला बसल्या बसल्या तो मुलाखती देई व उघड्यावर एनिमा घेई. 'आजूबाजूची माणसे म्हणजे कावळे,

चिमण्या व पशुपक्षी त्यांची कदर कशाला? त्यांची कशाची लाज?' असे जणू त्याला वाटे.एकदा सामान्य मनुष्य कुत्रा समोर असता जसे हे विधी बिनदिक्कत करील तसे माणसे समोर आली तरी लुई करी.त्याची स्तुतिस्तोत्रे गाणारा चरित्रकार बरट्रांड म्हणतो, 'त्याचे हरएक कृत्य राजाला शोभेसे असे काहीही करताना आपण मोठा भूपाल आहोत. थोर राजा आहोत हे तो कधीही विसरत नसे


तो स्वतःला दैवी समजे,अर्थात परिणामतः दुसऱ्यांस तुच्छ मानी,तो स्वतःला अधिक चाहत असे.म्हणून दुसऱ्यांचा तिरस्कार करी.

दुसऱ्यांचा तिरस्कार ही आत्मस्तुतीची निषेधक बाजू होती.तो स्वतःच्या मोठेपणाचा पुजारी होता.स्वतःला देव समजून तो आपला मानसन्मान करून घेई प्राचीन जगज्जेत्या सम्राटांच्या पावलांवर पावले टाकून जाण्यास तो उत्सुक होता.प्राचीन रोमन साम्राज्याचे पुनरुज्जीवन करून पोप व आपण अशी ईश्वराची दोन रूपे कल्पून आपण दोघांनी राज्य करावे,असे त्याचे स्वप्न होते.स्पेन व नेदरलँड दोहोंविरुद्ध त्याने सारखेच आक्रमक युद्ध चालविले होते.चाळीस वर्षे चाललेल्या या युद्धाने त्याने स्वतःसाठी वैभव मिळविले.पण राष्ट्राला मात्र भिकारी केले. फ्रान्सची विपन्नावस्था झाली.प्रजेने भावना पेटून लढण्यासाठी उठावे म्हणून प्रचार करण्याला तो धर्मोपदेशक पाठवी.हे धर्मोपदेशक प्रवचने देत व सांगत, "राजांसाठी मरणे हे शेतकऱ्यांचे कर्तव्य होय.प्रजेचा हा धर्म होय.' अँबे थेसॉ नामक एक धर्मोपदेशक लिहितो, 'तरुणांना काहीतरी करावयाला हवे असते. म्हणून फ्रान्सला युद्धाची जरुरी आहे.' फ्रान्समधील तरुण मरण-मारणाहून अन्य काहीतरी करू इच्छित असले, तरी त्यांना तसे कोण करू देणार? बिशप बोसो याची घोषणा होती की, 'राजाला युद्ध करावेच लागले तर ते त्याने पूर्ण शक्तीने करावे, सारी शक्ती एकवटून करावे... राजाचे वैभव व यश म्हणजेच देशाचे भूषण!' पण या राजाने किंवा या अ‍ॅबट बिशपांनी शत्रूच्या गोळ्यांसमोर आपली शरीरे उभी केल्याचा पुरावा मात्र आम्हाला तरी माहीत नाही.चौदावा लुई आपल्या देशात तर आपला मोठेपणा वाढवीत होताच.तेथील कवी, लेखक,धर्मोपदेशक या साऱ्यांना तर त्याने आपले भाट बनविले होतेच.पण इतर तटस्थ राष्ट्रांतील हुशार लेखकांनाही लाच वगैरे देऊन त्याने त्यांना स्वतःची स्तुतिस्तोत्रे गावयास लावली. 'चौदावा लुई हा अत्यंत थोर रोमन कॅथॉलिक ख्रिश्चन राजा आहे.सर्व मोठ्या उत्सवप्रसंगी त्याचे स्मरण करा,त्याचे भले चिंता.' असे इतर देशांतील लेखकही सांगत.लुई लढाईवर विश्वास ठेवी.तितकाच लाचलुचपतीवरही.तो इतर देश लढाईने जिंकू पाही तद्वतच पैशानेही आणि त्याच्या या द्विविध प्रचारापायी शेतकऱ्यांना मात्र भिकारी व्हावे लागे.


लष्करी वैभवासाठी हे जे पशुत्व,मूर्खत्व व कापट्य दाखविले जाई,त्याविरुद्ध क्वचित कोठे आवाज निघतच नसे असे नाही.

१६७५ साली मार्चच्या पाचव्या तारखेस राजा व त्याचे सारे दरबारी बसले असता पाद्री मास्कारॉन याने सर्वांसमोर युद्धविरोधी प्रवचन दिले. तो म्हणाला, "एखादा सामान्य चोर एकटा करतो,तीच गोष्ट एखादा मोठा योद्धा सैन्य घेऊन करतो.चोराहून वेगळे त्याच्यामध्ये काय आहे? एक लहान चोर, दुसरा मोठा चोर!"पण तेवीसशे वर्षांपूर्वी जेरुसलेमच्या राजाने जसे जेरेमियाच्या असल्याच शब्दांकडे दुर्लक्ष केले.तसेच चौदाव्या लुईनेही या शब्दांकडे दुर्लक्ष केले.लढवय्ये वीर अजून शांतिदूतांची भाषा ऐकण्यास उत्सुक नव्हते. चौदाव्या लुईने १७०७ पर्यंत आपली विजययुद्धे चालविली होती.त्याने थोडासा नवीन प्रदेश मिळविला. पण त्यासाठी स्वतःचे लाखो लोक बळी दिले!


चौदावा लुई मोठा श्रद्धाळू कॅथॉलिक होता.तो प्रॉटेस्टंटना छळी.त्याने कित्येकांना हद्दपार केले.दरसाल गुडफ्रायडे दिवशी बारा दरिद्री लोकांना बोलावून तो त्यांचे चरण प्रक्षाळी व मग वर्षाचे उरलेले ३६४ दिवस तो त्यांना उपाशी मरू देई.


बाहत्तर वर्षे राज्य करून लुई १ सप्टेंबर १७१५ रोजी मेला.क्षुद्र व साध्या गोष्टींतही कृत्रिमतेने कसे वागावे,हे त्याने दरबारी लोकांना शिकवले होते.त्याने दरबारी लोकांत कृत्रिमतेची कलावृत्ती निर्मिली,तर प्रजेत अनियंत्रित राज्यसत्तेविरुद्ध चीड उत्पन्न केली.

तिचेच पुढे पाऊणशे वर्षांच्या अल्पावधीत फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये पर्यवसान झाले…समाप्त


४/१/२६

५.५ कार्बनी संयुगं / 5.5 Organic compounds

ऊर्जा अक्षय्यतेचा नियम (लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी) हा सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही गोष्टींना लागू होतो,हे आता सर्वमान्य झालं होतं. याचाच अर्थ शेकोटीतली लाकडं आणि सजीव प्राणी हे दोघंही ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डाय ऑक्साइड निर्माण करतात.त्याचप्रमाणे विश्वातल्या सगळ्याच सजीव आणि निर्जीव गोष्टी या एकाच पदार्थापासून तयार झालेल्या आहेत असाही विचार आता पुढे यायला लागला होता.


आपल्याला दिसणारे समुद्र,जमीन आणि हवा हे घटक तर अनेक शतकांपासून न बदलणारे आहेत. पाणी तापवलं तर त्याची वाफ होते,पण वाफ थंड झाली की तिचं पुन्हा पाणी होतं.धातू वितळवता येतात आणि ते पुन्हा स्थायू रूपातही आणता येतात.म्हणजेच या क्रिया रिव्हर्सिबल आहेत.पण सजीवांपासून निर्माण झालेले साखर,कागद,तेल असे पदार्थ एकदा तापवले,जाळले किंवा त्यांच्यावर काही प्रक्रिया केल्या तर ते पदार्थ जळून जातात आणि पुन्हा त्यांच्या मूळ रूपात येत नाहीत.हाच तर सजीवांमधल्या आणि निर्जीवांमधल्या घटकांमध्ये फरक असेल का? सजीव आणि निर्जीव सारख्याच मूळ मूलद्रव्यांपासून (इलिमेंट्स) निर्माण झालेले असले तरी सजीव आणि निर्जीव यांचे मूळ घटक (म्हणजे संयुगं / कंपाऊंड्स) हे वेगळे असावेत का?


स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जॉन्स जॅकॉब बर्झेलियस (Jons Jakob Berzelius) (१७७९ ते १८४८) यानं या प्रश्नावर बराच विचार केला.बझेलियस हा वैज्ञानिक रसायनशास्त्रामध्ये रॉबर्ट बॉइल,जॉन डाल्टन आणि लव्हायेजे या वैज्ञानिकांच्या तोडीचा मानला जातो.रसायनशास्त्राचा पाया घालणाऱ्या वैज्ञानिकांपैकी तो महत्त्वाचा वैज्ञानिक होता.त्याला 'फादर ऑफ स्वीडिश केमिस्ट्री' असंही म्हणतात. लहान असतानाच बर्झेलियसचे वडील वारले.ते शाळेत शिक्षक होते.नंतर आईनं दुसरं लग्न केलं. तेव्हा सावत्र वडिलांनी बर्झेलियसला विज्ञान शिकवलं आणि त्याबद्दल गोडी लावून दिली.


मोठा झाल्यावर बर्झेलियस मेडिकल स्कूलमध्ये गेला.तिथे तो कार्ल शीलचे प्रयोग पुनःपुन्हा करून पाहत असे.यादरम्यान त्यानं अनेक नामवंत रसायनतज्ज्ञांच्या हाताखाली काम केलं आणि धातू, वायू, द्रव,अ‍ॅसिड,अल्कली,पाणी आणि काच या सगळ्या पदार्थांचे गुणधर्म शिकून घेतले.हे सगळं करताना त्यानं प्रामाणिकपणे अभ्यास करून खूप मेहनतीनं ज्ञान मिळवलं होतं.आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानं मेडिकल प्रॅक्टिस सुरू केली.पण त्यापेक्षा त्याला रसायनशास्त्रात जास्त रस वाटत होता.त्याचे आपले स्वतःचे प्रयोग चालूच होते. इंग्लंडमध्ये जाऊन त्यानं हंफ्रे डेव्ही,जेम्स वॉट, थॉमस यंग,विल्यम हर्षेल याही नावाजलेल्या वैज्ञानिकांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्या होत्या.


सजीवांपासून मिळालेल्या पदार्थांना ऑर्गेनिक सबस्टन्स म्हणावं आणि निर्जीवांपासून मिळालेल्या पदार्थांना इनऑर्गेनिक सबस्टन्स म्हणावं असं १८०७ मध्ये सुचवलं.

इनऑर्गेनिक पदार्थ हे ऑर्गेनिक पदार्थांपासून निर्माण करणं शक्य आहे, पण त्या उलट म्हणजे इनऑर्गेनिक पदार्थांपासून ऑर्गेनिक पदार्थ मिळवणं हे कोणत्याही सजीव मध्यस्थाशिवाय अशक्य आहे असं त्यानं सुचवलं.


इनऑर्गेनिक पदार्थांपासून ऑर्गेनिक पदार्थ तयार करण्यासाठी जी ऊर्जा किंवा जे बल लागतं ते फक्त जिवंत ऊतींमध्येच असतं असंही त्यानं सांगितलं होतं.पुढे त्यानं रसायनशास्त्रात इतरही अनेक शोध लावले.त्याच्या शोधांबद्दल त्याला रॉयल सोसायटीनं कॉपले मेडलही दिलं होतं. हे सगळं करताना त्याला लग्न करायला आणि आपलं कुटुंब वाढवायला वेळ नाही मिळाला.शेवटी वयाच्या ५६ व्या वर्षी १८३५ साली त्यानं एका स्वीडिश कॅबिनेट मंत्र्याच्या २४ वर्षीय एलिझाबेथ पॉपियस नावाच्या मुलीशी लग्न केलं. पण त्या आधीपासूनच त्याला गाऊटच्या आजारानं गाठलं होतं.त्यातच त्याचा नर्व्हज ब्रेक डाऊन झाला. त्याला कधीकधी नैराश्याचे झटकेही यायचे. ७ ऑगस्ट १८४८ साली त्याचा मृत्यू झाला.


पुढे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सजीवांच्या शरीरात तयार होणाऱ्या रसायनांचा अभ्यास पुढे गेला.प्रयोगशाळेत आणि कारखान्यांमध्ये कृत्रिमरीत्या ऑर्गेनिक कंपाऊंड्स तयार व्हायला लागले.आणि ऑर्गेनिक पदार्थ कशाला म्हणायचं या प्रश्नानं पुन्हा डोकं वर काढलं, त्यानंतर कार्बनी संयुगांच्या रसायनशास्त्राला ऑर्गेनिक केमिस्ट्री म्हटलं जायला लागलं आणि कार्बन नसलेल्या संयुगांच्या रसायनशास्त्राला इनऑर्गेनिक केमिस्ट्री म्हटलं जायला लागलं.आता याचा सजीव आणि निर्जीवांशी काहीही संबंध राहिला नाही.


एकोणिसाव्या शतकातल्या रसायनशास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत तयार केलेली ऑर्गेनिक संयुगं त्या मानानं साधी होती.पण सजीव टिश्यूमध्ये अजूनही इतर इतकी अनेक गुंतागुंतीची रसायनं होती,की ती कृत्रिमरीत्या तयार करता येतील असं एकोणिसाव्या शतकातल्या वैज्ञानिकांना वाटतच नव्हतं.

ऑर्गेनिक संयुगं ही आपल्याला कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेत तयार करता येणार नाहीत असं सगळ्यांना वाटत असतानाच,

बर्झेलियसचा सहायक आणि लायबिग या वैज्ञानिकाचा मित्र असलेल्या व्योलर यानं चक्क २२ फेब्रुवारी १८२८ रोजी आपल्याला इनऑर्गेनिक पदार्थांपासून ऑर्गेनिक पदार्थ बनवणं शक्य आहे आणि मी आताच काही इनऑर्गेनिक रसायनांपासून युरिया हे ऑर्गेनिक रसायन तयार करण्यात यशस्वी झालो आहे असं कळवलं आणि त्यानं खरंचच इनऑर्गेनिक पदार्थांपासून युरिया तयार केला होता. 


यातून त्यानं आपण कृत्रिमरीत्या इनऑर्गेनिक पदार्थांपासून ऑर्गेनिक पदार्थ बनवू शकत नाही हा समज तर खोडून काढलाच,पण त्याचबरोबर त्यानं अनेक कृत्रिम रसायनं तयार करण्यासाठी आश्वासक दिलासा दिला.यानंतर कृत्रिम रंग,अत्तरं आणि चक्क प्लॅस्टिकपर्यंत माणसानं मजल मारली ती यामुळेच ! आता सजीवांच्या शरीरातल्या संयुगांना ऑर्गेनिक संयुगं म्हणतात आणि ती आकारानं खूप मोठी आणि क्लिष्ट (कॉम्प्लेक्स) असतात यावर आता शंका घेण्यासारखं काही उरलं नव्हतं.याही संयुगांचे पुढे तीन गट झाले.त्यांना आता बायोमोलेक्युल्स म्हणू या.त्यात विल्यम प्राऊट (William Prout) (१७८५ ते १८५०) नावाच्या वैज्ञानिकानं खूपच महत्त्वाचं संशोधन केलं आहे.सजीवांमध्ये होणाऱ्या पचन आणि चयापचय यांच्या संशोधनासाठी आणि रसायनशास्त्रातल्या मूलद्रव्यांच्या ऑटोमिक वेट वरच्या संशोधनासाठी ओळखला जातो.


प्राऊट हा एडिंबरो विद्यापीठातून डॉक्टरकीची पदवी घेऊन बाहेर पडला होता.तो पचनाच्या आणि मूत्रविकारांवर चांगले उपचार करण्यासाठी प्रसिद्ध होता. १८१५ ते १८२७ या दरम्यान त्यानं फिजिओलॉजीमध्ये बरंच संशोधन करून अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले.प्राण्यांच्या गॅस्ट्रिक ज्यूसेस (जाठररस) मध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड असतं,त्यामुळे पचन ही रासायनिक क्रिया आहे.हे सांगणारा प्राऊट हा पहिलाच होता.त्यानंच युरीनमधून पहिल्यांदा युरिया वेगळा केला होता. पुढे त्यानं युरिनरी आणि डायजेस्टिव्ह पॅथॉलॉजीवरही एक पुस्तक लिहिलं होतं.


पण या सगळ्यांपेक्षाही महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे प्राऊटनं सजीवांमध्ये सापडणाऱ्या या संयुगांची काबर्बोहायड्रेट्स,

प्रोटीन्स आणि लिपिड्स अशा गटांत विभागणी केली.

साखर,स्टार्च,सेल्युलोज असे पदार्थ कार्बोहायड्रेट्समध्ये येत होते.कार्बोहायड्रेट्स हे कार्बन,हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांपासून तयार होत होते.


सजीव,अच्युत गोडबोले, अमृता देशपांडे, मधुश्री पब्लिकेशन


दुसरा प्रकार,लिपिडही असाच कार्बन,हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच मूलद्रव्यांपासू तयार होत होता.पण या गटात सगळी तेल येत होतं. कार्बोहायडेट्समध्ये लिपिडापेक्षाऑक्सिजनचं प्रमाण जास्त होतं आणि कार्बोहायडेट्स ही काही प्रमाणात तरी पाण्यात विरघळत होती.लिपिड्स पाण्यात अजिबात विरघळत नव्हती.


आणि तिसरा प्रकार म्हणजे प्रोटीन्स हे कार्बोहायडेटस आणि लिपिड्स यापेक्षा बरेच गुंतागुंतीचे होते.प्रोटीन्समध्ये कार्बन,हायड्रोजन आणि ऑक्सिजनशिवाय नायट्रोजन आणि सल्फर ही मूलद्रव्यंही होती.ते साधारणपणे पाण्यात विरघळत होते पण तापवल्यावर त्यांच्या गुठळ्या (कोॲग्युलेट) होत होत्या.सुरुवातीला प्रोटीन्सना अल्ब्युमिन्स हे नाव दिलं होतं.कारण अंड्याच्या पांढऱ्या बलकामध्ये (एग व्हाइट) मिळणारं प्रथिन हे सहजपणे उपलब्ध होणारी गोष्ट होती आणि लॅटिनमध्ये त्याला अल्ब्युमिन म्हणतात.


१८३८ मध्ये डच रसायनशास्त्रज्ञ गेरार्ड जोहानेज मल्डर (Gerardus Johannes Mulder) (१८०२ ते १८८०) यानं या अल्ब्युमिनस पदार्थांचं महत्त्व ओळखलं आणि त्यांना ग्रीक भाषेत खूप महत्त्वाचा किंवा अग्रक्रमाचा या अर्थाचा असणारा प्रोटीन हा शब्द आपल्या शोधनिबंधात पहिल्यांदाच वापरला. बहुतांश प्राणी आपल्याला लागणारं प्रोटीन हे वनस्पतींपासूनच घेतात हे त्यानं सांगितलं होतं. पण नंतर प्राणी हे वनस्पतींपासून मिळालेल्या प्रोटीनचं आपल्या शरीरात अमायनो अ‍ॅसिड्समध्ये रूपांतर करतात आणि मग त्यापासून पुन्हा आपल्याला हव्या त्या प्रोटीनमध्ये रूपांतर करतात हे नंतर कळलं.त्यानं पुढे अल्ब्युमिन,केसिन आणि फायब्रिन या प्रोटीन्सवर काम करून प्रोटीन्सचे रासायनिक गुणधर्म काय असावेत याबद्दलही लिहून ठेवलं होतं.


ऑर्गेनिक केमिस्ट्रीचं वाढतं ज्ञान आता पुन्हा सजीवांची उत्क्रांती कशी झाली असावी या प्रश्नाचंही उत्तर शोधायला मदत करत होती.कारण सगळ्याच प्रकारच्या सजीवांमध्ये कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स आणि प्रोटीन्स हीच तीन मूळ रसायनं किंवा संयुगं आढळत होती.अर्थात, यात बारीकसारीक बदल होते,पण मुख्य घटक हेच होते हे मात्र निश्चित.यातूनच पुढे रसायनशास्त्रज्ञांना या कार्बोहायड्रेट्स,

लिपिड्स आणि प्रोटीन्स ही रसायनं त्यांच्या मूळ बिल्डिंग ब्लॉकमध्ये रूपांतरित करता येतात हेही लक्षात आलं.म्हणजे असं की कोणतंही कार्बोहायड्रेट हे त्याच्या मूळ साखरेत,

लिपिड हे त्याच्या मूळ फॅटी अ‍ॅसिडमध्ये आणि प्रोटीन त्याच्या मूळ अमायनो अ‍ॅसिडमध्ये रूपांतरित करता येतं,हे आता लक्षात आलं होतं. या मूळ पदार्थाना बिल्डिंग ब्लॉक्स म्हणतात.आणि एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खातो किंवा वनस्पतिजन्य पदार्थ खातो. मग पचनाच्या प्रक्रियेमध्ये त्या प्राण्यानं खाल्लेले कार्बोहायड्रेट्स,लिपिड्स किंवा प्रोटीन्स मूळ बिल्डिंग ब्लॉक्समध्ये सुटे होतात आणि नंतर पुन्हा हव्या त्या प्रकारामध्ये बांधले जातात


या सगळ्या गोष्टींमुळे सगळ्या प्रकारचे सजीव वेगवेगळे दिसत असले तरी रासायनिकदृष्ट्या एकच आहेत असा एक दृष्टिकोन तयार व्हायला लागला. त्यामुळेच उत्क्रांतीमध्ये एका सजीवापासून दुसरा सजीव निर्माण होणं शक्य आहे असंही आता वाटायला लागलं होतं. यातून आता उत्क्रांती ही संकल्पना मूळ धरायला लागली होती.


हा भाग संपला…!



२/१/२६

नक्षत्रांचे देणे / Giving of Nakshatras

माझ्या भावरम्य आठवणी उंच डोंगरावरून दिसणारे नक्षत्रांनी भरलेले निळे आभाळ आणि त्यात विरून जाणाऱ्या समुद्र गाजाविषयीच्या आहेत.अगदी लहान होतो तेव्हापासून पावसाळा वगळता,मी नक्षत्रांखालीच झोपलोय.त्या वेळी मला माहीत नव्हते की,नक्षत्रेदेखील आवाज करतात. सारे आभाळ त्या ध्वनीने निनादून जाते.


वन्य प्राण्यांची शिकार सोडून भंडारीत राहणारा निरगू गोंड जंगलातल्या कंदमुळे व फळांवरच गुजराण करीत होता,

झोपडीसमोरच्या आगोट्याजवळ बाज टाकून आभाळातल्या नक्षत्राकडे पाहात तो झोपी जायचा.तेव्हा त्याने सांगितले की नक्षत्रे रात्रभर शिकार करीत असतात आणि त्याला त्यांच्या शिकारीच्या वेळचा 'छा,छौ' असा आवाज ऐकू येतो.


जंगलाचे देणं,मारुती चितमपल्ली, प्रकाशक - साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी, नागपूर


हा आवाज मला लहानपणापासून माहीत होता. नंदीवाला,

वैदू व पारधी आपली कुत्री घेऊन माळरानात शिकार करताना पाहिली आहेत.त्या वेळी झुडपे आणि गवतात लपलेले सावज शोधून काढण्यासाठी कुत्र्याला 'छा' म्हणताच तो आपले कान टवकारायचा.डोळे चमकवायचा.नाक जमिनीला हुंगत आणि 'छौ' म्हणताच तो चपळतेने शिकारीचा मागोवा घेऊ लागायचा.


मला नेहमीच आश्चर्य वाटायचं की जगभर रूढ असलेल्या ह्या शब्दाचे मूळ कोठे असावं ! माझ्या अनेक शिकारी मित्रांना या आवाजाविषयी विचारले.आता मला समजलं त्या आवाजाचं मूळ आदिवासींमध्ये आहे.आणि आदिवासी व कुत्र्यांना तो आवाज थेट नक्षत्रापासून मिळालाय.


ताऱ्यांच्या समूहाला नक्षत्र म्हणतात.हे तारे रेषांनी जोडले की त्याचे एक काल्पनिक चित्र तयार होते.हे चित्र कोणी पक्ष्याचे,

कोणी जनावराचे,कोणी माणसाचे,असे आपापल्या कल्पनेनुसार मानतात. त्या अनुषंगाने त्या तारकापुजाला नाव दिले जाते. नक्षत्रांची बरीच नावे पशु-पक्ष्यांची आहेत.


नक्षत्र उदयाला येते त्या काळाचा संबंध प्राण्याच्या आचरणाशी आहे की काय हा माझ्या संशोधनाचा विषय आहे.त्या अनुषंगाने जंगलात राहणाऱ्या अनेक आदिवासींना मी भेटलोय,त्यांच्याबरोबर नक्षत्रांविषयी बोलताना रात्र-रात्र जागलोय.पण प्रत्येक वेळी त्यांनी नवनवीन माहिती दिली.ती कुठल्याही ग्रंथात माझ्या तरी वाचण्यात आली नाही.नुकताच नाशिक जिल्ह्यातील पेठ,हरसूल व सुरगाणा ह्या जंगलात राहणाऱ्या कोकणा,वारली व कोळ्यांना भेटलो.माझा मुक्काम पेठच्या वनविश्रामगृहात होता.तो बांधून आता ५०-६० वर्षे झाली असावीत.निरोप पाठविल्याप्रमाणे आवारी गुरुजी तिथं माझी वाट पाहातच होते.अहोरात्र जंगलात राहणाऱ्या ह्या माणसानं पशु-पक्ष्यांचा अभ्यास केलाय.लोकगीते गोळा केली आहेत.


विश्रामगृहासमोरच्या माळावर उभे राहिले की, समोर अप्रतिम देखावा दिसतो.सह्याद्री पर्वताच्या एकामागून एक दिसणाऱ्या निळ्या रांगा शेवटी क्षितिजात विलीन होतात.त्यावरची हिरवी वने, पाचूसारखे दिसणारे माळ,पश्चिमेला उद्ध्वस्त गढीचे अवशेष आणि त्यावर बिजेची चंद्रकोर.ही चंद्रकोर दिसावी म्हणून तर कुणा रसिकानं ती गढ़ी तिथं बांधली नसेल ना! मी त्या सुंदर चंद्रकलेकडे पाहात राहिलो.जिकडे-तिकडे एक अद्भुत गूढ शांतता.अंधार पडू लागला तशी समोरच्या माळावरील वाघोली गावातील दिव्यांची माळ दिसू लागली.

विश्रामगृहाच्या व्हरांड्याचा मध्यभाग जरा वाढवून तिथे षट्‌कोनी पागोड्याचे छप्पर केलेले आहे.तिथल्या वेताच्या खुर्चीवर बसून आवारी गुरुजी व मी समोरच्या नक्षत्रांविषयी बोलत होतो. मी विचारलं,


'गुरुजी, नक्षत्रांची नावं एकतर पशू,पक्षी किंवा शिकारी आणि निसर्गातील घडामोडींशी संबंधित आहेत.असं का ? त्या प्राण्याचं आणि निसर्गाचं नक्षत्रांशी काय नातं असावं?'


'साहेब,असा संबंध असेलही पण त्याविषयी मी कधी विचार केला नाही.'त्यांच्या विचाराला चालना देण्यासाठी मी म्हणालो-


'मृग नक्षत्र हा हरीण वर्गातील प्राण्यांचा विणीचा काळ.'


'होय साहेब,आता आलं माझ्या ध्यानात.आर्द्राला आम्ही आदिवासी आडदरा म्हणतो.उन्हाळ्यात दिसणाऱ्या दऱ्या पावसाळ्यात मात्र नजरेआड होतात.त्या जणू लपून राहतात.

जिकडे तिकडे हिरवेगार होते.खराट्यासारख्या दिसणाऱ्या झुडपांना पालवी फुटते.भूमीतील कंदांच्या पानांची लवलव दिसू लागते.पालवलेली झाडं आंघोळ केल्याप्रमाणे स्वच्छ दिसू लागतात आणि खोरी हिरवळीचा आल्हाददायक आकार घेऊन उभ्या राहतात.'


'अन् पुनर्वसूला काय म्हणतात?' मी.


'आम्ही राजकुवर- म्हणजे राजपुत्र म्हणतो.ह्या नक्षत्राचा पाऊस झाला तर चांगला पडतो.नाही तर नाहीच.एखाद्या राजविशी म्हणजे राजकुमाराच्या लहरीप्रमाणे !


तर पुष्य म्हणजे कुलीम कुवर.कुलीम म्हणजे शेती.शेतीलायक पाऊस पडल्यामुळे कुणब्याच्या कुवराना-मुलाबाळांना आनंद होतो.ती आनंदानं नाचत बागडत असतात.'


त्यानंतर येतो आसलक - आश्लेषा.ह्या नक्षत्राचा पाऊस चांगलाच आसडून पडतो.पण तो कसा? थोडा वेळ.आम्ही इरले वा पाणघोंगडं अंगावर घेतो त्या वेळी पावसाचा घडवड आवाज येतो आणि पडतो न पडतो तोच बंद होतो. पुन्हा इरलं काढून बाजूला ठेवावं लागतं.'


मघा नक्षत्रात तर खूप पाऊस पडतो.नाही तर उघाड असते.

डोंगरावर टेकलेले आभाळ उंच जातं.त्यातून बगळे उडू लागतात.


मचा तर मघा


नाही तर बघा


निघतील बगा.


बगा म्हणजे बगळे.'मग पूर्वेकडून पावसाला सुरुवात होते.पण पावसाची झड इतक्या जोरात येते की, थोड्या वेळातच ओहोळ,नदी व नाल्यांना पूर येतो. म्हणून ते पूर्वा नक्षत्र.'


'पावसाच्या सुरुवातीला विणीच्या ओढीनं प्रवाहाच्या उलट दिशेनं छलांग मारीत गेलेले मासे आणि खेकडे वाहणाऱ्या शांत प्रवाहाबरोबर आपल्या पिलाबाळांसह खाली उतरू लागतात. म्हणून ते उत्तरा नक्षत्र.'


हस्त-चित्राला आम्ही हत्ती-चित्ता म्हणतो.पहाडात उंच गवत वाढतं आणि अधूनमधून होणाऱ्या वादळी पावसानं छातीएवढं वाढलेलं उंच गवत जमिनीवर आडवं होतं.वाटतं की त्यावर हत्ती लोळला आहे.चित्ता बरसला की चित्तिणीला पिलं होतात.नर चित्ता तसा क्रूरच.बोक्याप्रमाणे तोही चित्तिणीची पिलं खातो.त्याच्या भीतीनं चित्तीण माणसाच्या वस्तीजवळच्या झुडपी जंगलात आसरा घेते.तिथं कधी डुकरांची पिलं तर कधी सशांवर पिलांना पोसते.अधूनमधून गावातील एखादी शेळी किंवा वासरू मारायलादेखील भीत नाही


'स्वातीला स्वहाती म्हणतो.'


न समजून मी विचारलं,


'म्हणजे काय ?'


'देवाचे हात देवाची करणी अन् नारळात पाणी,तसं पेठजवळ असणा-या दमण नदीवरील पापड पातळ डोह,मालेगाव पिंपळनजीक शिंबर चोंड नाला आणि मोहपाडाजवळील जोळदा डोहाकाठच्या वाळूत शिंपला व शिंपी दि लागतात.'


'गुरुजी, म्हणजे त्यात नर-मादी असतात की काय?'


'होय,शिंपला नर असतो.तर मादीला शिंपी म्हणतात.'


'नर व मादीत ओळखण कशी?' मी.


'सांगतो,शिंपला हा थोडासा चौकोनी.त्याला कोपरे असतात.शिंपी आकारानं दीर्घ वर्तुळाकार असते.'


'मोती शिंपल्यात तयार होतो की शिंपीत ?'


'शिंपल्यात.त्या वेळी काहीशी उन्हें पडलेली असतात.शिंपले व शिंपीत जीव असतो.ती डोहातून काठावरच्या वाळूत येतात.अचानक पावसाचे थेंब पडतात त्या वेळी ज्या शिंपल्यांची तोंड उघडी असतात त्यात पावसाचे थेंब पडून त्याचा मोती होतो.शिंपल्यात अंड्यातल्या बलकासारखा द्रव असतो.त्यात लिबलिबीत अशी गोळी असते. मोत्यासाठी शिंपल्या गोळा करणारा कोळी ती गोळी काढून चटकन आपल्या तोंडात टाकतो. थोड्या वेळानं ती गोठते.नंतर ती बाहेर काढतो.पूर्ण टणक व्हायच्या आत सुई टोचून त्याला छिद्र पाडतो.ह्या भागात तुरीएवढ्या आकाराचे मोती मिळतात.सर्वच शिंपल्यात मोती तयार होत नाहीत. देव आपल्या हातांनी एखाद्याच शिंपल्यात मोती निर्माण करतो.'


'कार्तिक महिन्यात एखाद्या वर्षी विशाखा नक्षत्रात शेताच्या बांधातून उंदराची खूप पिलावळ जन्माला येते.उंदीर त्या वर्षी शेतातील पिकाची नासाडी करतात.असं होतं न होतं,तोच मांजऱ्या म्हणजे मार्गशीर्ष नक्षत्रात मांजराची बरीच वीण होते आणि ही मांजरे शेतीची नासधूस करणाऱ्या उंदरांच्या संख्येचं नियंत्रण करतात.जणू काय मांजराच्या धाकानं उंदीर निघून जातात.'


'रोहिणी नक्षत्रात रोही- म्हणजे नील गाईला पिलं होतात.रोहित म्हणजे फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे स्थलांतर करून तळ्यावर उडताना दिसू लागतात.


रेवती नक्षत्रात रातवा पक्षी चिकूर चुक्-चिकूर चुकू करून एकमेकांना साद पालतात.हा त्यांचा घरटी करून अंडी घालण्याचा हंगाम.कोकण भागात ह्या पक्ष्याला अतिशय समर्पक सुंदर नाव आहे.'


"कोणतं?'


रेवती.'


'खरंच किती छान आहे नाव.'


समाप्त..।