सुमारे चाळीस पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट.तेंव्हा संपर्काची साधने अगदीच मर्यादित होती.
अनेक गावं मुख्य प्रवाहापासून दूर,अडगळीला राहायची. रस्ते नव्हते, वाहतुकीची सोय मर्यादित, आणि नैसर्गिक आपत्ती आली की दोन-दोन, तीन-तीन महिने गाव बाहेरच्या जगापासून तुटून जायचे.
अशाच एका डोंगरपायथ्याच्या गावात,महिन्यातून एकदा मीठ विकायला एक शेतकरी आपली बैलगाडी घेऊन यायचा.
गावकऱ्यांना त्याचा येण्याचा दिवस वर्षानुवर्षे ठरलेला होता.
त्या दिवशी गावाच्या पारावर त्याची गाडी उभी राहायची आणि महिला मंडळ,घरांतील लोक आपापल्या गरजेपुरते मीठ त्याच्याकडून घेत गेले की त्याचे काम संपायचे.बदल्यात कधी धान्याचा घाणा,कधी मातीची भांडी,तर कधी काहीच नाही असा अल्प मोबदला त्याला मिळायचा.त्याचं नाव काय? कुठल्या गावचा तो? घरात किती मंडळी? हे विचारण्याचीही तसदी कोणालाच नव्हती.
" मीठाला काय दाम द्यायचं ? "
हीच गावकऱ्यांची वृत्ती.तो मात्र निःशब्द, निःस्वार्थपणे मिठाचे वाटप करून आनंदाने निघून जायचा.त्याने कधी तक्रार केली नाही,अपेक्षा धरली नाही.
अशाच एका दिवशी,गावात एक लग्न होतं.सर्वांनी त्याच्याकडून मीठ घेतलं पण साधं निमंत्रणही कोणी दिलं नाही.गावात मोठी मेजवानी,आनंद, गडबड… आणि तो मात्र पारावर एकटाच बसलेला. ते पाहून त्याच्या सोबत आलेल्या मुलांनी विचारलं
"बाबा,तुम्ही इतकी वर्षे या गावासाठी येता… मग तुम्हाला कोणी का नाही बोलावलं?"
या निरागस प्रश्नाने त्याच्या मनात दडवून ठेवलेली नाराजी चटका देऊन उठली.त्याने मुलांना समजावलं,पण आतून प्रश्न स्वतःलाच पडला
" मी करतोय कोणासाठी?
ज्यांना माझ्या येण्या-जाण्याचा,माझ्या श्रमाचा, माझ्या अस्तित्वाचाच पत्ता नाही… त्यांच्यासाठी मी का करावे?"
त्या दिवशी त्याने एक निर्णय घेतला,
आता या गावात मी येणार नाही.
तो गेला.
गावकऱ्यांना काहीही फरक पडला नाही.
साठवणुकीचे मीठ घरात होतं;म्हणून कोणाला त्याची आठवणही नव्हती.
पण दिवस गेले…
हळूहळू घरातील मिठाचा साठा संपत गेला.
जेवण आळणी होऊ लागलं.स्त्रियांचे गट नकळत वेशीपाशी येऊन त्याची वाट पाहू लागले.
आणि जेव्हा ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळेला त्याची गाडी आलीच नाही.तेव्हा गावातील प्रत्येकाला त्याची किंमत कळली.
आता गावाला समजलं…
ज्याला आपण "शिल्लक", "साधं", "काहीतरी स्वाभाविक" समजतो,
ज्याचं योगदान इतकं नियमित असतं की आपण त्याची दखलच घेत नाही,
तोच मनुष्य खरे तर आपल्या जगण्यालाच अर्थ ऊर्जा देत असतो.
जो निःशब्द, विनातक्रार, विनाअपेक्षा सेवा करत असतो,
तो थांबला की, त्याच्या अस्तित्वाचं मोल कळतं.
बोध: –
जगात कुठलीच गोष्ट शिल्लक नसते.
कधी कोणाची कृपा,कोणाचं योगदान,
कोणाची साथ "स्वाभाविक" समजू नका.
जोपर्यंत एखादं काम निःशब्द चालू असतं,तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही.जेव्हा ते थांबतं तेव्हा उशिरा का होईना,पण सत्य समोर उभं राहतं.
ही कथा सांगते की,
कृतज्ञता व्यक्त केली नाही,मोफत मिळणाऱ्या कार्याची दखल घेतली नाही, दिला नाही,तर सर्वात शुल्लक वाटणारे पण जीवन समृद्ध करणारे मिठासारखे पण अत्यावश्यक साधन आपल्या आयुष्यातून कायमचे निघून जाते*.
लेखन :- अजित देशपांडे यांची ही बोधकथा आयुष्यात काय महत्वाचे आहे ही सांगून जाते.आमचे मार्गदर्शक सुनिव घायाळ यांचे मित्र 'आपरे' यांच्याकडून व्हाट्सअपद्वारे आलेली वरील कथा जशी आहे तशी आपल्यापुढे सादर केली आहे. - विजय गायकवाड..।।