* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: नक्षत्रांचे देणे / Giving of Nakshatras

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२/१/२६

नक्षत्रांचे देणे / Giving of Nakshatras

माझ्या भावरम्य आठवणी उंच डोंगरावरून दिसणारे नक्षत्रांनी भरलेले निळे आभाळ आणि त्यात विरून जाणाऱ्या समुद्र गाजाविषयीच्या आहेत.अगदी लहान होतो तेव्हापासून पावसाळा वगळता,मी नक्षत्रांखालीच झोपलोय.त्या वेळी मला माहीत नव्हते की,नक्षत्रेदेखील आवाज करतात. सारे आभाळ त्या ध्वनीने निनादून जाते.


वन्य प्राण्यांची शिकार सोडून भंडारीत राहणारा निरगू गोंड जंगलातल्या कंदमुळे व फळांवरच गुजराण करीत होता,

झोपडीसमोरच्या आगोट्याजवळ बाज टाकून आभाळातल्या नक्षत्राकडे पाहात तो झोपी जायचा.तेव्हा त्याने सांगितले की नक्षत्रे रात्रभर शिकार करीत असतात आणि त्याला त्यांच्या शिकारीच्या वेळचा 'छा,छौ' असा आवाज ऐकू येतो.


जंगलाचे देणं,मारुती चितमपल्ली, प्रकाशक - साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी, नागपूर


हा आवाज मला लहानपणापासून माहीत होता. नंदीवाला,

वैदू व पारधी आपली कुत्री घेऊन माळरानात शिकार करताना पाहिली आहेत.त्या वेळी झुडपे आणि गवतात लपलेले सावज शोधून काढण्यासाठी कुत्र्याला 'छा' म्हणताच तो आपले कान टवकारायचा.डोळे चमकवायचा.नाक जमिनीला हुंगत आणि 'छौ' म्हणताच तो चपळतेने शिकारीचा मागोवा घेऊ लागायचा.


मला नेहमीच आश्चर्य वाटायचं की जगभर रूढ असलेल्या ह्या शब्दाचे मूळ कोठे असावं ! माझ्या अनेक शिकारी मित्रांना या आवाजाविषयी विचारले.आता मला समजलं त्या आवाजाचं मूळ आदिवासींमध्ये आहे.आणि आदिवासी व कुत्र्यांना तो आवाज थेट नक्षत्रापासून मिळालाय.


ताऱ्यांच्या समूहाला नक्षत्र म्हणतात.हे तारे रेषांनी जोडले की त्याचे एक काल्पनिक चित्र तयार होते.हे चित्र कोणी पक्ष्याचे,

कोणी जनावराचे,कोणी माणसाचे,असे आपापल्या कल्पनेनुसार मानतात. त्या अनुषंगाने त्या तारकापुजाला नाव दिले जाते. नक्षत्रांची बरीच नावे पशु-पक्ष्यांची आहेत.


नक्षत्र उदयाला येते त्या काळाचा संबंध प्राण्याच्या आचरणाशी आहे की काय हा माझ्या संशोधनाचा विषय आहे.त्या अनुषंगाने जंगलात राहणाऱ्या अनेक आदिवासींना मी भेटलोय,त्यांच्याबरोबर नक्षत्रांविषयी बोलताना रात्र-रात्र जागलोय.पण प्रत्येक वेळी त्यांनी नवनवीन माहिती दिली.ती कुठल्याही ग्रंथात माझ्या तरी वाचण्यात आली नाही.नुकताच नाशिक जिल्ह्यातील पेठ,हरसूल व सुरगाणा ह्या जंगलात राहणाऱ्या कोकणा,वारली व कोळ्यांना भेटलो.माझा मुक्काम पेठच्या वनविश्रामगृहात होता.तो बांधून आता ५०-६० वर्षे झाली असावीत.निरोप पाठविल्याप्रमाणे आवारी गुरुजी तिथं माझी वाट पाहातच होते.अहोरात्र जंगलात राहणाऱ्या ह्या माणसानं पशु-पक्ष्यांचा अभ्यास केलाय.लोकगीते गोळा केली आहेत.


विश्रामगृहासमोरच्या माळावर उभे राहिले की, समोर अप्रतिम देखावा दिसतो.सह्याद्री पर्वताच्या एकामागून एक दिसणाऱ्या निळ्या रांगा शेवटी क्षितिजात विलीन होतात.त्यावरची हिरवी वने, पाचूसारखे दिसणारे माळ,पश्चिमेला उद्ध्वस्त गढीचे अवशेष आणि त्यावर बिजेची चंद्रकोर.ही चंद्रकोर दिसावी म्हणून तर कुणा रसिकानं ती गढ़ी तिथं बांधली नसेल ना! मी त्या सुंदर चंद्रकलेकडे पाहात राहिलो.जिकडे-तिकडे एक अद्भुत गूढ शांतता.अंधार पडू लागला तशी समोरच्या माळावरील वाघोली गावातील दिव्यांची माळ दिसू लागली.

विश्रामगृहाच्या व्हरांड्याचा मध्यभाग जरा वाढवून तिथे षट्‌कोनी पागोड्याचे छप्पर केलेले आहे.तिथल्या वेताच्या खुर्चीवर बसून आवारी गुरुजी व मी समोरच्या नक्षत्रांविषयी बोलत होतो. मी विचारलं,


'गुरुजी, नक्षत्रांची नावं एकतर पशू,पक्षी किंवा शिकारी आणि निसर्गातील घडामोडींशी संबंधित आहेत.असं का ? त्या प्राण्याचं आणि निसर्गाचं नक्षत्रांशी काय नातं असावं?'


'साहेब,असा संबंध असेलही पण त्याविषयी मी कधी विचार केला नाही.'त्यांच्या विचाराला चालना देण्यासाठी मी म्हणालो-


'मृग नक्षत्र हा हरीण वर्गातील प्राण्यांचा विणीचा काळ.'


'होय साहेब,आता आलं माझ्या ध्यानात.आर्द्राला आम्ही आदिवासी आडदरा म्हणतो.उन्हाळ्यात दिसणाऱ्या दऱ्या पावसाळ्यात मात्र नजरेआड होतात.त्या जणू लपून राहतात.

जिकडे तिकडे हिरवेगार होते.खराट्यासारख्या दिसणाऱ्या झुडपांना पालवी फुटते.भूमीतील कंदांच्या पानांची लवलव दिसू लागते.पालवलेली झाडं आंघोळ केल्याप्रमाणे स्वच्छ दिसू लागतात आणि खोरी हिरवळीचा आल्हाददायक आकार घेऊन उभ्या राहतात.'


'अन् पुनर्वसूला काय म्हणतात?' मी.


'आम्ही राजकुवर- म्हणजे राजपुत्र म्हणतो.ह्या नक्षत्राचा पाऊस झाला तर चांगला पडतो.नाही तर नाहीच.एखाद्या राजविशी म्हणजे राजकुमाराच्या लहरीप्रमाणे !


तर पुष्य म्हणजे कुलीम कुवर.कुलीम म्हणजे शेती.शेतीलायक पाऊस पडल्यामुळे कुणब्याच्या कुवराना-मुलाबाळांना आनंद होतो.ती आनंदानं नाचत बागडत असतात.'


त्यानंतर येतो आसलक - आश्लेषा.ह्या नक्षत्राचा पाऊस चांगलाच आसडून पडतो.पण तो कसा? थोडा वेळ.आम्ही इरले वा पाणघोंगडं अंगावर घेतो त्या वेळी पावसाचा घडवड आवाज येतो आणि पडतो न पडतो तोच बंद होतो. पुन्हा इरलं काढून बाजूला ठेवावं लागतं.'


मघा नक्षत्रात तर खूप पाऊस पडतो.नाही तर उघाड असते.

डोंगरावर टेकलेले आभाळ उंच जातं.त्यातून बगळे उडू लागतात.


मचा तर मघा


नाही तर बघा


निघतील बगा.


बगा म्हणजे बगळे.'मग पूर्वेकडून पावसाला सुरुवात होते.पण पावसाची झड इतक्या जोरात येते की, थोड्या वेळातच ओहोळ,नदी व नाल्यांना पूर येतो. म्हणून ते पूर्वा नक्षत्र.'


'पावसाच्या सुरुवातीला विणीच्या ओढीनं प्रवाहाच्या उलट दिशेनं छलांग मारीत गेलेले मासे आणि खेकडे वाहणाऱ्या शांत प्रवाहाबरोबर आपल्या पिलाबाळांसह खाली उतरू लागतात. म्हणून ते उत्तरा नक्षत्र.'


हस्त-चित्राला आम्ही हत्ती-चित्ता म्हणतो.पहाडात उंच गवत वाढतं आणि अधूनमधून होणाऱ्या वादळी पावसानं छातीएवढं वाढलेलं उंच गवत जमिनीवर आडवं होतं.वाटतं की त्यावर हत्ती लोळला आहे.चित्ता बरसला की चित्तिणीला पिलं होतात.नर चित्ता तसा क्रूरच.बोक्याप्रमाणे तोही चित्तिणीची पिलं खातो.त्याच्या भीतीनं चित्तीण माणसाच्या वस्तीजवळच्या झुडपी जंगलात आसरा घेते.तिथं कधी डुकरांची पिलं तर कधी सशांवर पिलांना पोसते.अधूनमधून गावातील एखादी शेळी किंवा वासरू मारायलादेखील भीत नाही


'स्वातीला स्वहाती म्हणतो.'


न समजून मी विचारलं,


'म्हणजे काय ?'


'देवाचे हात देवाची करणी अन् नारळात पाणी,तसं पेठजवळ असणा-या दमण नदीवरील पापड पातळ डोह,मालेगाव पिंपळनजीक शिंबर चोंड नाला आणि मोहपाडाजवळील जोळदा डोहाकाठच्या वाळूत शिंपला व शिंपी दि लागतात.'


'गुरुजी, म्हणजे त्यात नर-मादी असतात की काय?'


'होय,शिंपला नर असतो.तर मादीला शिंपी म्हणतात.'


'नर व मादीत ओळखण कशी?' मी.


'सांगतो,शिंपला हा थोडासा चौकोनी.त्याला कोपरे असतात.शिंपी आकारानं दीर्घ वर्तुळाकार असते.'


'मोती शिंपल्यात तयार होतो की शिंपीत ?'


'शिंपल्यात.त्या वेळी काहीशी उन्हें पडलेली असतात.शिंपले व शिंपीत जीव असतो.ती डोहातून काठावरच्या वाळूत येतात.अचानक पावसाचे थेंब पडतात त्या वेळी ज्या शिंपल्यांची तोंड उघडी असतात त्यात पावसाचे थेंब पडून त्याचा मोती होतो.शिंपल्यात अंड्यातल्या बलकासारखा द्रव असतो.त्यात लिबलिबीत अशी गोळी असते. मोत्यासाठी शिंपल्या गोळा करणारा कोळी ती गोळी काढून चटकन आपल्या तोंडात टाकतो. थोड्या वेळानं ती गोठते.नंतर ती बाहेर काढतो.पूर्ण टणक व्हायच्या आत सुई टोचून त्याला छिद्र पाडतो.ह्या भागात तुरीएवढ्या आकाराचे मोती मिळतात.सर्वच शिंपल्यात मोती तयार होत नाहीत. देव आपल्या हातांनी एखाद्याच शिंपल्यात मोती निर्माण करतो.'


'कार्तिक महिन्यात एखाद्या वर्षी विशाखा नक्षत्रात शेताच्या बांधातून उंदराची खूप पिलावळ जन्माला येते.उंदीर त्या वर्षी शेतातील पिकाची नासाडी करतात.असं होतं न होतं,तोच मांजऱ्या म्हणजे मार्गशीर्ष नक्षत्रात मांजराची बरीच वीण होते आणि ही मांजरे शेतीची नासधूस करणाऱ्या उंदरांच्या संख्येचं नियंत्रण करतात.जणू काय मांजराच्या धाकानं उंदीर निघून जातात.'


'रोहिणी नक्षत्रात रोही- म्हणजे नील गाईला पिलं होतात.रोहित म्हणजे फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे स्थलांतर करून तळ्यावर उडताना दिसू लागतात.


रेवती नक्षत्रात रातवा पक्षी चिकूर चुक्-चिकूर चुकू करून एकमेकांना साद पालतात.हा त्यांचा घरटी करून अंडी घालण्याचा हंगाम.कोकण भागात ह्या पक्ष्याला अतिशय समर्पक सुंदर नाव आहे.'


"कोणतं?'


रेवती.'


'खरंच किती छान आहे नाव.'


समाप्त..।