* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२३/७/२३

हृदयस्पर्शी जगायला सांगणारी गोष्ट

बाहेर थोडा काळोख पडायला सुरुवात झाली होती कुंपणाच्या लोखंडी दरवाजा जवळून मला कोणीतरी बोलवत होते.कोण असेल बरे या उत्सुकतेने मी बाहेर गेलो.एक वयस्कर माणूस दरवाजाबाहेर उभा होता चुरगळलेले कपडे आणि हातातील पिशवी बघून तो खूप दूरवरून प्रवास करून आल्यासारखे वाटत होते. 


हातातील कागद बघून त्याने विचारले, "बाबू हा पत्ता आनंद आठवा रस्ता आहे का ?" होय मीच आनंद मी उत्तरलो. 


त्याचे ओठ थोडेसे थरथरले कोरड्या ओठावरून त्यांनी जीभ फिरवली व स्वतः जवळील पत्र माझ्याकडे देऊन ते म्हणाले,"बाबू मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे आपल्या गावाकडून आलो तुझ्या वडिलांनी मला हे पत्र दिले आणि तुझी मदत मागायला सांगितले आहे".


"माझ्या वडिलांनी" मी  पुटपुटलो आणि उत्सुकतेने पत्र वाचू लागलो.


प्रिय आनंद,अनेक आशीर्वाद हे पत्र घेऊन येणारी व्यक्ती माझा मित्र आहे त्याचे नाव रमय्या खूप कष्टाळू आहे.

काही दिवसापूर्वी त्याचा एकुलता एक मुलगा एका अपघातात मृत्यू पावला.नुकसानभरपाईसाठी तो सर्वत्र धावाधाव करतोय.आताच्या परिस्थितीत खर्चाची तोंड मिळवणी करण्यासाठी त्याला त्याची अत्यंत गरज आहे.

मी सोबत पोलिस पंचनामा आणि ईतर सर्व कागदपत्रे पाठवीत आहे.भरपाईची अंतिम रक्कम तुम्हाला कंपनीच्या मुख्य कार्यालयात मिळेल असे त्याला सांगितले गेले आहे.त्याची हैदराबादला येण्याची पहिलीच वेळ आहे आणि तो तेथे अनोळखी आहे.मला खात्री आहे की तू त्याला मदत करू शकशील तुझी काळजी घे,आणि शक्य तेवढ्या लवकर आम्हाला भेटायला ये ..


तुझे प्रिय बाबा. .


मी पत्र वाचत असताना रामय्या मला न्याहाळत होता क्षणभर विचार केला,आणि त्यांना आत बोलावले त्यांना पाणी देऊन त्यांनी काही खाल्लेले आहे का याची चौकशी केली."नाही, प्रवास थोडासा लांबला त्यांमुळे मी फक्त बरोबर आणलेली दोन केळी खाल्ली",रामय्या म्हणाले.


आत जाऊन मी चार डोसे तयार केले,आणि लोणच्या-

बरोबर त्यांना देऊन म्हटले,"तुम्ही खाऊन घ्या". मी बाहेर जाऊन काही फोन केले.मी परत आलो तोपर्यंत त्यांनी डोसे संपवले होते व हातात काही कागद घेऊन ते बसले होते. त्यांच्या हातात त्यांच्या मृत मुलाचा फोटो होता बहुतेक २२ वर्षांचा असावा माझे डोळे पाणावले. 


"हा माझा एकुलता एक मुलगा याच्या आधी जन्मलेले सर्वजण काही ना काही कारणाने देवाघरी गेले,त्याचे नाव महेश.तो चांगला शिकला आणि त्याला चांगली नोकरी मिळाली. मी सर्व अडचणींवर मात करीन आणि तुमची चांगली काळजी घेईन असे तो म्हणाला होता. त्या अमंगल दिवशी त्याला रस्ता ओलांडताना अपघात झाला आणि त्यातच जागच्या जागीच त्याचा मृत्यू झाला.

मुलाच्या मृत्यूची भरपाई म्हणून पैसे स्वीकारायला सुरुवातीला आम्ही नाखूष होतो,परंतु दिवसेंदिवस आम्ही दोघीही थकत चाललो आहोत,तुझे वडील मला म्हणाले तू हैदराबादला जा आणि त्यांनी मला हे बरोबर पत्र दिले,

ठीक आहे आता फार उशीर झालाय तुम्ही आराम करा.

असे सांगून मी देखील झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तयार झालो. कॉफी पिऊन बाहेर पडलो.वाटेतच थोडसं खाल्लं आणी ऑफिसच्या पत्त्यावर पोहोचलो.


"आनंद आता मी सर्व काम करीन तू तुझ्या ऑफिसला जा,रामय्या म्हणाले. "काही हरकत नाही मी आज रजा घेतली आहे.",मी उत्तरलो. त्यांच्याबरोबर राहून मी त्यांना भरपाईची सर्व रक्कम मिळवून दिली."मी तुझा खूप खूप आभारी आहे माझी पत्नी घरी एकटीच आहे, त्यामुळे मी लगेच परत जातोय."रामय्या म्हणाले. "चला मी तुम्हाला बस स्टैंड वर सोडतो.",मी त्यांना बस स्टँडवर आणले बसचे तिकीट काढून दिले प्रवासासाठी बरोबर काही फळे घेऊन दिली.त्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी कृतज्ञता दाटून आली होती. 


ते म्हणाले, "आनंद बाबू तुम्ही माझ्यासाठी रजा घेऊन मला खूप मदत केली.घरी गेल्यावर मी तुमच्या वडिलांना भेटून हे सर्व सांगीन व त्यांचेही आभार मानीन." 


मी त्यांचे हात हातात घेतले आणि म्हणालो, "मी तुमच्या मित्राचा मुलगा आनंद नाही. माझे नाव अरविंद आहे.काल तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आला होतात.त्या आनंदचे घर अजून दोन किलोमीटर लांब होते.तुम्ही आधीच खुप थकला होतात.तुम्हाला सत्य सांगायचे माझ्या जीवावर आले.मी पत्रावरील आनंद च्या नंबरवर फोन केला चौकशी केली.आनंदच्या पत्नीने सांगितले. की तो काही कामानिमित्त शहराबाहेर गेला आहे. मी तुमच्या मित्राला फोन करून हे सर्व सांगितले खूप दुःखी झाले.जेव्हा मी त्यांना सर्व मदतीचे आश्वासन दिले तेव्हा त्यांना बरे वाटले.

तुमचे नुकसान हे कधीही न भरून येणारे आहे.परंतु मला वाटले मी तुम्हाला मदत करावी,आणि मी ती केली.यामुळे मला फार समाधान लाभले." 


बस सुटताना रामय्या यांनी माझे हात आपल्या हातात धरले,त्यांचे डोळे कृतज्ञतेने पाणावलेले होते."परमेश्वर तुझे भले करो" त्यांचे निघतानाचे शब्द होते.


मी वर आकाशाकडे पाहिले.मला वाटले माझे वडील तिथेच कुठे तरी असले पाहिजेत. "बाबा तुम्ही रामय्याच्या रूपात माझा उत्कर्ष पाहायला आला होतात,का? मला पत्र पाठवून तुम्ही माझी परीक्षा घेत होतात का मी मदत करतोय की नाही हे पाहत होतात ? तुमच्या सारख्या थोर पुरुषाचा मुलगा म्हणून जन्म घेऊन मी माझे कर्तव्य बजावले आहे तुम्हाला आनंद झालाय ना ?" 

आनंदाश्रूंनी माझे डोळे भरून गेले .


दुसऱ्यांना मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवा.वाट आपोआप सापडेल.


अनामिक


परवाच कामावर निघालो होतो.पावसाने फार वाट बघायला लालली.व एकदाचा वाजत गाजत आला.

अखंडपणे पाऊस पडत होता.त्या पावसामध्ये एक व्यक्ती एका गाडीतून उतरली.कामावर जाण्यास उशीर झाला होता.मेनन रिंग कंपनीच्या पुढे त्यांना जावे लागणार होते,वेळ झालाच होता.मला काय वाटले कोणास ठाऊक मी त्यांना पाहून कोणत्याही पूर्वपरवानगी शिवाय गाडी थांबवली,बसा म्हणालो.काही क्षण गेले व ते म्हणाले,

धन्यवाद देवासारखे धावून आलात.मी म्हणालो आपण अगोदर माणूस बनूया देव ही फार पुढची गोष्ट आहे.


जो माणूस 'अधिक' चांगले होण्यासाठीचे प्रयत्न थांबवितो तो माणूस 'चांगले' होणे देखील थांबवितो.ऑलिव्हर क्रॉमवेल - ब्रिटिश राजकारणी व सैनिक (1599-1558)


ते म्हणाले माझी गाडी बंद पडली आहे.दुरुस्ती

साठी मिस्त्री जवळ लावून आलो आहे.मी 'दररोज' कुणीही हात केला तरी त्या मानसाला गाडीवरून घेवून जातो.मी त्यांचे आभार मानले. व हे चांगुलपणाचे काम नेहमीच करा,असे सांगितले.तुम्ही जे काम करता त्या कामाची प्रतिक्रिया म्हणजेच मी तुम्हाला हात न करताही गाडीवरुन घेवून आले.कारण मी 'दररोज' कुणालाही गाडीवर घेत नाही. कारण घर जवळच आहे.या कारणाने पण तुम्हाला पाहून तुम्हाला पाहून गाडीवर घ्यावे.हे मला मनापासून वाटले.हाच तुमचा चांगुलपणा सो .. लगे..रहो.!


कंपनीच्या गेटबाहेर गाडी थांबवून त्यांना उतरले.गाडी पार्किंगमध्ये लावली.मनापासून या गोष्टींचे चिंतन करतच होतो.तेवढ्यात लिओ टॉल्स्टॉय न चुकता म्हणालेत.


जर तुम्हाला वेदना होत असतील तर तुम्ही जिवंत आहात.जर तुम्हाला इतर लोकांच्या वेदना जाणवत असतील तर तुम्ही माणूस आहात.


विजय कृष्णात गायकवाड





२१/७/२३

नवसृष्टी निर्माता शेक्सपियर

एक लाख वर्षांपर्यंत निसर्ग मानवाचे निरनिराळे नमुने बनवीत होता,मानवांवर प्रयोग करीत होता. शेवटी १५६४ साली सर्व संमीलित ज्ञान एकत्र ओतून निसर्गाने एक मूर्ती जन्माला घातली,ती शेक्सपिअर ही होय.


या जगात अनेक अनाकलनीय गूढे असतात. शेक्सपिअरसारख्यांची अलौकिक बुद्धी हे एक गूढच आहे.शेक्सपिअरचे आईबाप सामान्यांहून सामान्य होते.त्याच्या पित्याला स्वत:ची सहीही करता येत नसे.तो मोजे विणी,लोकर पिंजी,तो एका अज्ञात कुटुंबात जन्मला.आकाशात तेजाने तळपला;त्याच्या वंशात पुन्हा पुढे कोणीही चमकले नाही.शेक्सपिअरच्या पूर्वी आणि नंतरही त्याचे कूळ अज्ञातच होते.त्याला तीन मुली होत्या.त्यांपैकी दोघी दहा जणींसारख्या होत्या; पण तिसरी मात्र अगदीच अडाणी होती.


शेक्सपिअर म्हणजे निसर्गाची एक लहर होती. निसर्गाच्या हातून ही व्यक्ती नकळत जन्माला घातली गेली.तो मानवांत अती मानुष,देव होता. त्याच्या मनाची खोली कार्लाइललाही कळली नाही;जॉर्ज ब्रँडिसनेही त्या कामी हात टेकले आणि कोणाही टीकाकाराला तिचा अंत लागणार नाही,असे म्हणण्याचे धाडस मी करतो. शेक्सपिअर समजून घेणे म्हणजे सृष्टीचे गुंतागुंतीचे गूढच समजून घेणे होय.जीवनाचा हा जो विराट खेळ चालला आहे,जीवनाचे हे जे विराट नाटक चालले आहे,तेच शेक्सपिअरने थोडक्यात आपल्या नाट्यसृष्टीत निर्मिले आहे.त्याची नाटके म्हणजे सृष्टीची प्रतिनिर्मिती आहे. 


अमेरिकन कवी व तत्त्वज्ञानी संतामना एका सुनीतात म्हणतो,"शेक्सपिअरला निर्मून ईश्वराने सृष्टी दुप्पट केली."


शेक्सपिअरला जणू देवाची बुद्धी व देवाची भाषा लाभल्या होत्या!पण बाह्यतः मात्र त्याचे जीवन अगदी निराळे होते.

या कविसम्राटाचे जीवन जगातील अत्यंत नीरस जीवनासारखे होते.वयाच्या चौदाव्या वर्षी तो एका खाटकाजवळ उमेदवार म्हणून राहिला.त्याच्या वयाच्या अठराव्या वर्षी सव्वीस वर्षाच्या एका बाईने त्याला किंवा त्याने तिला मोह पाडला.तिचे नाव ॲन हॅथावे.तिच्याशी लग्न झाल्यावर लवकरच स्वतःचे स्ट्रॅटफर्ड गाव त्याला सोडावे लागले. कारण हरणे चोरण्याच्या आरोपावरून त्याला अटक होणार होती.लंडनला आल्यावर तो रंगभूमीकडे वळला.तो सतरा वर्षे नाटके लिहीत होता.

नाटकात बारीकसारीक कामेही तो करी. रंगभूमीवर काम करण्याबाबत तो उदासीन होता. आपली सारी नाटके छापून काढावीत,असे त्याला कधीही वाटले नाही.धंद्यात त्याने कमाई केली व तो थोडीफार सावकारी करू लागला.ऋणकोंनी वेळेवर पैसे न दिले तर तो फिर्याद करी तो दरसाल एकदा कुटुंबीयांना भेटावयास जाई.


आयुष्याच्या अखेरीस त्याने स्टॅटफर्ड येथे एक घर विकत घेतले व तिथे तो मरेपर्यंत एखाद्या सुखवस्तू गृहस्थाप्रमाणे राहिला.रंगभूमीवरील काम करणारे वागत,तसाच तोही वागे.ते वागणे मोठेसे सुसंस्कृत अगर सदभिरुचीला पोषक होते असे मुळीच नव्हे. एकदा तर त्याने इतकी दारू घेतली की,तो रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली झिंगून पडला! प्रेमाची विफलताही त्याने अनुभविली होती.तो आपल्या एका सुनीतात लिहितो,"माझी प्रियकरीण जेव्हा 'मी सत्यनिष्ठ आहे' असे सांगते,तेव्हा मी तिच्यावर विश्वास ठेवतो;पण ती खोटे बोलत आहे हे मला ठाऊक असते."नारीजनांना आकर्षण वाटेल असा पुरुष तो नव्हता,पण कधीकधी आपल्या प्रतिस्पर्थ्यांना तो प्रेमस्पर्धेत जिंकी.त्याचे कौटुंबिक जीवन सुखाचे नव्हते.ते वादळी होते.मरेपर्यंत त्याची पत्नी त्याला सतावीत होती. त्याने आपल्या मृत्यूपत्रात तिला केवळ आपला एक भिकार बिछाना चांगला होता तो मात्र ठेवला.थोडक्यात त्याची जीवनकथा ही अशी आहे.पण या हकिकतीने त्याच्या मनाचा थांग लावून घेण्यास प्रकाश मिळत नाही.मनुष्य या दृष्टीने त्याच्याच नाट्यसृष्टीतल्या कॅलिबन नावाच्या पात्राहून फार फार तर थोड्या उच्च दर्जाचा तो होता,असे म्हणता येईल.कॅलिबन हा अत्यंत क्षुद्र वृत्तीचा व क्षुद्र वासनाविकारांत लडबडलेला असा दाखविण्यात आला आहे.पण मानवजातीचा शिक्षक या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहिल्यास तो पृथ्वीवरच नसून स्वर्गातील आहे,असे वाटते.तो अती मानुष वाटतो.क्षुद्र मनाच्या या मानवात तो चुकून जन्माला आला असावा,असे वाटते.


जगातील अत्यंत प्रतिभासंपन्न प्रज्ञावंतांनी शेक्सपिअरच्या बुद्धीचे मोजमाप करण्याची खटपट केली,त्याची विचारसृष्टी तर्कदृष्टीने मांडून दाखविण्याची त्यांनी पराकाष्ठा केली.पण तो खटाटोप यशस्वी झाला नाही.

टीकाकार त्याला रोमन कॅथॉलिक म्हणतात.कोणी त्याला नास्तिक म्हणतात,कोणी देशभक्त मानतात,तर कोणी युद्धविरोधक मानतात.कोणी त्याला प्रवचनकार समजतात,तर कोणी त्याला सिनिक म्हणजे कशातच अर्थ नाही,असे म्हणणारा मानतात. कोणी त्याला मानव्यवादी म्हणतात,तर कोणी 'संशयात्मा' म्हणतात.कोणी त्याला राजांचा बडेजाव करणारा म्हणतात.वस्तुतः तो यापैकी काहीच नव्हता;पण असे असूनही तो सारे काही होता असे विरोधाभासाने म्हणावे लागते.! कोणाही एका मनुष्याचे वा मानवसंघाचे जे विचार अगर त्याच्या ज्या कल्पना असू शकतील, त्यांच्यापलीकडे शेक्सपिअरचे विचार व कल्पना जात.तो विचारसिंधू होता,कल्पनाविश्वंभर होता. तो जे जे पात्र निर्मी,त्याच्या त्याच्या जीवनाशी तो तितक्याच प्रेमाने व सहानुभूतीने मिळून जाई. कॅलिबानशी तो जितका एकरूप होई,तितकाच प्रॉस्पेरोशीही.शेक्सपिअरची मनोबुद्धी मानवजातीच्या मनोबुद्धीला व्यापून राहिलेली होती,तिजशी एकरूप झाली होती.शेक्सपिअरचे पृथक्करण करण्याचा प्रयत्न मी करणार नाही, किंवा त्याची विचारसृष्टी विवरूनही सांगणार नाही.कारण,असा प्रयत्न करणे निरुपयोगी आहे. पण मी त्याच्या विशाल मनोभूमीच्या कोपऱ्यात शिरून पाहणार आहे.त्याच्या अनंत बुद्धीच्या सागरात बुडी मारून पेलाभर शहाणपण मिळाले,तर मी आणणार आहे.या दृष्टीने शेक्सपिअरच्या तीन नाटकांकडे आपण जरा नजर टाकू या.पहिल्या नाटकात तो उपहास करणारा दिसतो,दुसऱ्यात केवळ ऐहिकदृष्टीचा दिसतो,तिसऱ्यात तत्त्वज्ञानी दिसतो.कोणती बरे ही तीन नाटके? टिमॉन ऑफ अथेन्स,हॅम्लेट,

टेंपेस्ट.


'टिमॉन ऑफ अथेन्स' या नाटकात एखाद्या ज्यू प्रेषिताप्रमाणे जगातील अन्यायांविरुद्ध तो गर्जना करतो व शिव्याशाप देतो.दुसऱ्या नाटकात तो फक्त जीवनाचे प्रतिबिंब दाखवितो,नीतीचे पाठ देत बसत नाही.जेव्हा कधी त्या वेगाने जाणाऱ्या नाट्यक्रियेत मध्येच क्षणभर जीवनावरील टीकेचे एखादे वाक्य उच्चारण्यासाठी तो थांबतो,तेव्हा जणू काय दुसऱ्या एखाद्या गोलावरून उतरलेल्या माणसाप्रमाणे या जगाला क्षुद्र व तुच्छ समजून तो फेकून देतो.!या जगाला तो फार महत्त्व देत नाही.हे जग म्हणजे मूर्खाची कथा,फुकट आदळआपट व आरडाओरड, निरर्थक पसारा असे म्हणून तो निघून जातो.पण या 'टिमॉन ऑफ अथेन्स' नाटकात जगाबद्दलचा त्याचा तिरस्कार,क्रोध ज्वालेत परिणत झालेला दिसतो.जीवन ही मूर्खाने नव्हे;तर कपटपटू सैतानाने सांगितलेली कथा असे येथे वाटते. आणि जग निरर्थक न वाटता द्रोह,नीचता,द्वेष, दंभ,कपट यांनी भरलेले दिसते.टिमॉन हा अथेन्समधील एक श्रीमंत मनुष्य आहे.तो उदारपणामुळे आपली सर्व संपत्ती मित्रांना वाटून टाकतो.त्यांना तो कधी नाही म्हणत नाही. मित्रांना त्यांच्या सावकारांचा तगादा लावला की तो त्यांचे कर्ज फेडून टाकी,मित्रांची लग्ने होत, तेव्हा त्यांना आंदण देई.त्याचा नवा संसार मांडून देई,तो त्यांना मेजवानीस बोलावी व जाताना देणग्या देई,हिरे- मोती देई.त्याचा कारभारी फ्लॅव्हियस 'हे औदार्य अखेर तुम्हाला धुळीला मिळवील' असे सांगतो.पण आपली संपत्ती संपणार नाही व आपले मित्र कृतज्ञ राहतील, टिमॉनला वाटते.फ्लॅव्हियसच्या सांगण्याकडे तो लक्ष देत नाही व शेवटची दिडकी संपेपर्यंत दुसऱ्यांना देतच राहतो.अखेर तो कर्जबाजारी होतो. त्याचे सावकार त्याला सतावू लागतात.ज्या मित्रांना आपण आपले सर्वस्व दिले,ते आपल्या संकटकाळी धावून येतील.असे त्याला वाटते.पण एकामागून एक सारे त्याला सोडून जातात;प्रत्येक जण निरनिराळ्या सबबी सांगतो व मदत नाकारतो.पुन्हा एकदा टिमॉन त्या सर्वांना मेजवानीस बोलावतो व त्यांच्यासमोर केवळ कढत पाण्याचे पेले ठेवतो.पण त्या वेळेपर्यंत आपणास त्याचे मित्र म्हणविणारे ते आश्चर्यचकित होऊन काही बोलण्याच्या आधीच तो ते कढत पाणी त्यांच्या तोंडावर व ताटे त्यांच्या अंगावर फेकतो व त्यांना घालवून देतो.


या स्वार्थी जगात निःस्वार्थीपणा म्हणजे मूर्खपणा असे तो शिकतो.जग काय हे त्याला नीट समजते.तो अथेन्स शहर सोडून जंगलातील गुहेत राहायला जातो.तिथे त्याला 'अत्यंत निर्दय पशूही माणसांहून अधिक दयाळू आढळतात. आपल्या गुहेसमोर तो कंदमुळांसाठी खणीत असता त्याला अकस्मात एक ठेवा 'पिवळा - गुलाम' - पिवळे सोने सापडते;मानवजातीला गुलाम करणारे व मानवजातीचे गुलाम असणारे सोने पाहून त्याला त्याचा तिटकारा वाटतो व तो ते पुन्हा मातीत पुरून टाकतो.पण काही नाणी मात्र कोणी मानवी प्राणी त्रास द्यावयास आले तर त्यांना देण्यासाठी म्हणून तो वर ठेवतो.


टिमॉनला सोने सापडल्याची गोष्ट अथेन्समधील लोकांना कळते व एकामागून एक ते त्याच्या गुहेकडे येतात.कवी,चित्रकार,योद्धे,वेश्या,भिकारी,डाकू,सारे येतात.पुन्हा एकदा टिमॉनची मैत्री जोडण्यासाठी ते उत्सुक होतात.तो प्रत्येकाला मूठ,दोन मुठी नाणी देतो.

एखाद्या संतप्त व तिरस्कार करणाऱ्या देवाप्रमाणे तो त्यांना म्हणतो, "जा,चालते व्हा,तुमच्या शहरात जा व हे द्रव्य पुजून ठेवा,नाही तर सूकरवत् चाललेल्या तुमच्या सुखोपभोगात खर्च करा." काही चोरांना तो द्रव्य देतो व म्हणतो,"जा,लुटा एकमेकांना,म्हणजे अधिक मिळेल.कापा गळे. जे तुम्हाला भेटतील ते सारे चोरच आहेत.जा अथेन्स शहरात व फोडा दुकाने.ज्यांचे लुटाल तेही चोरच ! चोर चोरांना लुटू देत.सारेच चोर !" हे सारे जग टिमॉनला डाकूंची गुहा वाटते.पण एक अपवाद मात्र असतो,तो म्हणजे त्याचा कारभारी फ्लॅव्हियस.तो आपल्या धन्याच्या दुःखात भागीदार असतो.फ्लॅव्हियस म्हातारा झालेला असतो.तो जेव्हा धन्याजवळ येतो, त्याला भक्तिप्रेम दाखवितो व रडतो,तेव्हा टिमॉन म्हणतो,"जगात अद्यापि थोडी माणुसकी आहे. या जगात एक फक्त एकच प्रामाणिक मनुष्य आहे.पण फक्त एकच हो! माझे म्हणणे नीट लक्षात घ्या.एकच,अधिक नाही;व तो म्हणजे हा माझा वृद्ध कारभारी." पण तो फ्लॅव्हियसला म्हणतो, "तू फसशील हो! इतके चांगले असणे बरे नव्हे. तू प्रामाणिक आहेस;पण शहाणपणात कमी दिसतोस.तू मला फसवून व छळून दुसरी चांगली नोकरी मिळवू शकशील.आपल्या पहिल्या धन्याच्या मानेला फास लागला,म्हणजे शहाणे नोकर दुसरा धनी मिळवितात.जगाची तर ही रीतच आहे.तू वेडाच दिसतोस.'


शेक्सपिअर खालच्या वर्गातील लोकांना तुच्छ मानतो,असा त्याच्यावर एक आरोप आहे. टीकाकार म्हणतात, "अशांविषयी शेक्सपिअरला सहानुभूती वाटत नसे. तो त्यांच्याबद्दल नबाबी तिरस्काराने व तुच्छतेने बोलतो.काटक्याकुटक्या,दगडधोंडे,यांच्याहून त्यांची किंमत अधिक नाही असेच जणू तो दाखवितो." अशा 'टीकाकारांना शेक्सपिअरच्या मनाची विश्वव्यापकता कळत नाही.'अथेन्सचा टिमॉन' या नाटकात शेक्सपिअरने अथेन्समधील जी मानवसृष्टी उभी केली आहे,तीत त्याचे अत्यंत प्रेमळ पात्र जर कोणते असेल,तर ते टिमॉनच्या गुलामाचे फ्लॅव्हियसचे होय.टीकाकारांच्या तत्त्वज्ञानात जितकी सहानुभूती असेल,त्यापेक्षा अपरंपार अधिक सहानुभूती शेक्सपिअरच्या अनंत मनात आहे.जीवनाकडे प्रत्येक दृष्टिकोनातून पाहणारा शेक्सपिअरसारखा द्रष्ट दुसरा झाला नाही. प्रसंगविशेषी तो शेलेप्रमाणे क्रांतिकारक होऊ शके,हीनप्रमाणे कडवट व कठोर होऊ शके, तसाच युरिपिडीसप्रमाणे निराशावादी तर बायरनप्रमाणे निस्सारवादी (सिनिक) ही होऊ शके.

स्विनबर्गप्रमाणे तो मायेतून पाहणारा होई, तर गटेप्रमाणे तत्त्वज्ञानीही होई;टेनिसनप्रमाणे तो आशावादी आणि शांतपणे शरणागती स्वीकारणारा,जे आहे ते चांगलेच आहे असे मानणाराही होई.जीवनाकडे नाना रंगांच्या चश्म्यांतून पाहणारा हा महाकवी आहे.याची दृष्टी एकांगी नाही.

'अथेन्सचा नागरिक टिमॉन' या नाटकात निराशेच्या काळ्या चष्म्यातून तो पाहत आहे.जगात कशातही सार नाही,सारा चौथा, सारे निःसार,घाण! टिमॉनचा एक मित्र अल्सिबिआडीस म्हणून असतो.(मानवजातीची कथा-हेन्री थॉमस)तो अथेन्स शहर वाचवू पाहतो;पण त्याला हद्दपारीचे बक्षीस मिळते! अल्सिविआडीस रागाने सैन्य उभारून आपला अपमान करणाऱ्या मातृभूमीवरच चालून येतो तेव्हा सीनेटर घाबरतात.ते सारे टिमॉनकडे जातात व म्हणतात, "अथेन्स संकटात आहे.या वेळेस तू ये." पण टिमॉन त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देत नाही.तो शक्य तेवढे सारे शिव्याशाप त्यांना देतो.पण शेवटी त्याच्या मनात एक विचार येतो.तो म्हणतो, "अल्सिबिआडीसच्या हातून मरण येऊ नये असे वाटत असेल तर एक गोष्ट मी करू शकेन." आणि मग तो म्हणतो,"माझ्या शेजारीच एक झाड आहे.

मला ते माझ्यासाठी कापावे लागणार आहे.मी ते तोडणारच आहे. पण अथेन्समधील माझ्या मित्रांना... साऱ्या अथेन्सलाच खालपासून वरपर्यंत रावापासून रंकापर्यंत सर्वांना माझा हा निरोप सांगा,ज्यांना ज्यांना येणारे संकट टाळायचे असेल,ज्यांना ज्यांना आपली दुःखे थांबवायची असतील, त्यांनी त्यांनी येथे त्वरेने धावून यावे.माझ्या कुऱ्हाडीने झाड पडण्यापूर्वीच या झाडावर त्यांनी स्वतःला टांगून घ्यावे."


आपल्या विषारी तिरस्काराचा शेवटचा बाण शहराकडे परतणाऱ्या त्या आपल्या नगरबंधूंवर सोडून टिमॉनने स्वतःचे थडगे खणले.तेथील खारट पाण्याच्या प्रवाहाजवळ त्याने खड्डा खणला व स्वतःचे विषण्ण जीवन संपविले. मातीतील,पृथ्वीच्या पोटातील कृतज्ञ किड्यांना मेजवानी देणेच अधिक चांगले.पृथ्वीवर चालणारा व्दिपाद मानवी पशुंपेक्षा पृथ्वीच्या पोटातले किडे व जीवजंतू किती तरी चांगले..


उर्वरित भाग पुढील लेखामध्ये



१९/७/२३

नेहमीच भल्याचा विचार करा..

जेव्हा मी लहान होतो,त्यावेळेस मी खूप स्वार्थी होतो.

आणि स्वतःसाठी उत्तमोत्तम गोष्टी हिसकावून घेत होतो.

हळू हळू सर्वजण माझ्यापासून दूर होत गेले आणि मला एकही मित्र राहिला नाही.माझ्या वडिलांनी माझ्या जीवनात मदत व्हावी म्हणून मला तीन गोष्टींची शिकवणूक दिली.एके दिवशी माझ्या वडीलांनी दोन वाट्या नूडल्स केले आणि नूडल्सच्या दोन्ही वाट्या टेबलावर ठेवल्या.एका वाटी मधील नूडल्स वर एक अंडे ठेवले होते व दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. त्यांनी मला सांगितले, "बेटा,तुला कोणती वाटी हवी आहे ती तू  घेऊ शकतो."


 त्यावेळी अंडे मिळणे कठीण होते.!आम्हाला केवळ सणासुदीच्या दिवशी किंवा नवीन वर्षाच्या दिवशीच फक्त अंडे खायला मिळत असे. 


म्हणूनच मी ज्या वाटीत अंडे होते ती वाटी निवडली.!आम्ही जेवण करायला सुरुवात केली,तेव्हा मी स्वतःला खूप बुद्धिमान समजून स्वतःला शाबासकी देत अंडे खाण्यास  सुरुवात केली. 


जेव्हा माझ्या वडिलांनी नूडल्स खाणे सुरू केले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांच्या वाटीत नूडल्सच्या खाली दोन अंडी होती.! तेव्हा मला खूपच पश्चात्ताप झाला.मी निर्णय घेण्यास खूप घाई केली म्हणून मी स्वतःला दोषी मानू लागलो.माझे वडील हसले आणि त्यांनी मला सांगितले,"बाळा,नेहमी लक्षात ठेव जसे दिसते तसे खरेच असते असे नाही.जर तुमची वृत्ती लोकांचा फायदा घेण्याची असेल तर नुकसान तुमचेच आहे.शेवटी तुमची हारच होईल."


 दुसऱ्या दिवशी,माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले.एका वाटीत वर एक अंडे होते आणि दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते.पुन्हा त्यांनी त्या दोन वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या व मला सांगितले,"बाळा,तुला जी वाटी हवी असेल ती घे."


ह्यावेळी मी जरा हुशारी दाखवली!मी अंड नसलेली वाटी निवडली.मला फार आश्चर्य वाटले जेव्हा मी नूडल्सला वर खाली हलवले तेंव्हा त्यात एकही अंडे नव्हते.


 पुन्हा माझे वडील हसले आणि मला म्हणाले, "बाळा,तू नेहमी आपल्या आधीच्या अनुभवावर विश्वास ठेवता कामा नये.कारण जीवनात खूप अनिश्चितता असते.कधी कधी,जीवन तुम्हाला धोका देऊ शकते किंवा तुमच्याशी कुणी कपट करू शकतो.अशा अनुभवाने तुम्ही नाराज किंवा दुःखी होता कामा नये,फक्त तो अनुभव एक शिकवणूक म्हणून स्वीकारला गेला पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे.या गोष्टी तुम्ही पुस्तके वाचून शिकू शकणार नाही."


तिसऱ्या दिवशी,माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले,एका वाटीच्या वर एक अंडे होते आणि दुसऱ्या वाटी वर एकही अंडे नव्हते.त्यांनी दोन्ही वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या आणि मला सांगितले,"बाळा,तू निवड आता तुला कुठली वाटी हवी आहे?"


 या वेळी मी माझ्या वडिलांना सांगितले की,"आधी तुम्ही घ्या कारण तुम्ही घरातील प्रमुख व्यक्ती आहात आणि कुटुंबासाठी तुम्ही खूप योगदान दिले आहे."


माझ्या वडिलांनी नाही म्हटले नाही व ज्या वाटीवर एक अंडे ठेवले होते ती वाटी निवडली.जेव्हा मी माझ्या वाटीतील नूडल्स खाण्यास सुरुवात केली तेव्हा मला खात्री होती की माझ्या वाटीत अंडे निघणार नाही.परंतु जेव्हा माझ्या वाटीत दोन अंडी निघाली,तेव्हा मी खूपच आश्चर्यचकित झालो.!


माझ्या वडिलांनी  प्रेमपूर्वक माझ्याकडे पाहून हसून मला सांगितले,"माझ्या बाळा,हे कधीही विसरु नकोस की तू जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याचा विचार करतोस,तेव्हा तुमच्याबाबतीत ही नेहमी चांगलेच होते!"


मला माझ्या वडिलांची ही तीन वाक्ये नेहमी आठवतात आणि मी त्यानुसार माझा व्यवहार आणि उद्योग करतो.हे खरेच आहे,की मला माझ्या उद्योगात त्यामुळेच सफलता मिळाली आहे.


एक यशस्वी उद्योजक नारायण मुर्ती..

१७/७/२३

डिक्शनरी - सॅम्युएल जॉन्सन -(१७५५)

डॉ.सॅम्युएल जॉन्सनची 'डिक्शनरी' हे जगातलं एकमेव एकहाती काम आहे.ही डिक्शनरी पुढे फ्रेंच आणि जर्मन भाषांमध्ये भाषांतरित केली गेली.प्रत्येक शब्दाचा अर्थ,त्याची व्युत्पत्ती आणि त्याचा उच्चार याचा खूप सखोल विचार प्रथमच सॅम्युएल जॉन्सनच्या डिक्शनरीमध्ये करण्यात आला.'न्यूटनचं विज्ञान आणि गणित यामधलं जे योगदान आहे,तितकंच मोठं योगदान डॉ. सॅम्युएल जॉन्सनच्या डिक्शनरीचं इंग्रजी भाषेसाठी आहे'असं अमेरिकन भाषाकार आणि भाषातज्ज्ञ नोह क्वेस्टरनं म्हटलं.आदिम काळातल्या भटक्या माणसानं जंगलातल्या गुहा,झाडाच्या ढोली अशा निवाऱ्याच्या जागा सोडून हळूहळू शेती करायला सुरुवात केली.आणि त्याच्या आयुष्याला स्थैर्य लाभलं.तो शेतजमिनीच्या ठिकाणीच आपली घरं बांधून राहायला लागला.हळूहळू तो सुसंस्कृत होत गेला;तसंच सतत नावीन्याचा शोध घेत राहिला.या सगळ्या प्रवासात संवादानं खूप मोलाची भूमिका बजावली आणि संवाद म्हटलं की त्यात भाषा आलीच.देश,प्रांत,प्रदेश,ठिकाण बदललं की भाषा बदलते.खरं तर बारा कोसांवर भाषा बदलते म्हणतात ते उगाच नाही.जग जसं बदलत गेलं तसतशी जगाला वेगवेगळ्या भाषांच्या भाषांतराची गरज भासायला लागली.आपल्या भावना,आपलं म्हणणं आणि आपले

विचार परक्या माणसांबरोबर वाटताना आपल्याला जे म्हणायचंय त्या शब्दांचे अर्थ त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची म्हणजेच त्याच्या भाषेत रूपांतरित करण्याची आवश्यकता वाटायला लागली.याच खटाटोपीतून जन्म झाला शब्दकोशाचा म्हणजेच डिक्शनरीचा !


'आत्तापर्यंत अनेक भाषाकारांनी अनेक शब्दकोश जगासमोर मांडले असले तरी या सगळ्यांमधला अत्यंत परिणामकारक असा समजला जाणारा शब्दकोश म्हणजे 'अ डिक्शनरी ऑफ द इंग्लिश लँग्वेज' ही डिक्शनरी तयार केली होती सॅम्युएल जॉन्सननं,सॅम्युएल जॉन्सन हा एक इंग्रजी लेखक त्याच्या जगभरात नावाजल्या गेलेल्या इंग्रजी भाषेतल्या डिक्शनरीमुळे ओळखला जातो.गूगलनं त्याच्या ३०८ व्या जन्मदिनाचं औचित्य साधून त्याचं डूडल बनवलं आणि त्याच्याविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली.सॅम्युएल जॉन्सन हा एक कवी,निबंधकार,

समीक्षक,चरित्रकार आणि संपादकदेखील होता. खरं तर या डिक्शनरीच्या आधीही काहींनी डिक्शनरीज तयार केल्या होत्या.डिक्शनरी तयार होण्याचं मूळ आपल्याला ११ व्या शतकात सापडतं.अकराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या डिक्शनरीज या चिनी आणि जपानी भाषांमध्ये सर्वप्रथम लिहिल्या गेल्या.त्यानंतर युरोपात म्हणजेच इंग्लंडमध्ये डझनावारी डिक्शनरीजची निर्मिती झाली.मात्र डॉ.सॅम्युएल जॉन्सन याच्या डिक्शनरीची सर कशालाही नव्हती.खरं म्हणजे डॉ.सॅम्युएल जॉन्सन याच्या 'डिक्शनरी'च्या छायेतच पुढे ऑक्सफर्ड 'डिक्शनरीची-देखील निर्मिती झाली.आधी प्रकाशित झालेल्या लॅटिन-इंग्लिश डिक्शनरीमध्ये डब्ल्यू,एक्स आणि वाय या अक्षरांवरून सुरू होणाऱ्या शब्दांचा समावेश केलेला नव्हता.मात्र डॉ. सॅम्युएल जॉन्सन याच्या डिक्शनरीमध्ये याही अक्षरांवरून सुरू होणान्या शब्दांचा समावेश केला गेला होता. खरं तर हा असा काळ होता,की ज्या काळात डिक्शनरीमधल्या शब्दांचे अर्थ कुठल्या तरी आख्यायिकां

-वर आधारलेले असायचे.त्यांना कुठलंही ठोस प्रमाण असायचं नाही.१७३६ साली नाथन बेटली या कोशकारानं तयार केलेल्या डिक्शनरीमध्ये २५०० शब्दांची यादी दिलेली होती.सॅम्युएल जॉन्सन यानं ही डिक्शनरी उदाहरणादाखल वापरली.प्रत्येक शब्दाचा अर्थ,त्याची व्युत्पत्ती आणि त्याचा उच्चार याचा खूप सखोल विचार प्रथमच सॅम्युएल जॉन्सन याच्या डिक्शनरीमध्ये करण्यात आला.अमेरिकन भाषाकार आणि भाषातज्ज्ञ नोह क्वेस्टर असं म्हणतो,'न्यूटनचं विज्ञान आणि गणित यांच्यातलं जे योगदान आहे,तितकंच मोठं योगदान हे डॉ.सॅम्युएल जॉन्सन याच्या डिक्शनरीचं इंग्रजी भाषेसाठी आहे.' १८ सप्टेंबर १७०९ या दिवशी इंग्लंडमधल्या लिचफिल्ड इथे डॉ. सॅम्युएल जॉन्सन याचा जन्म झाला.सॅम्युएलच्या आईचं नाव सारा आणि वडिलांचं नाव मायकेल जॉन्सन असं होतं. मायकल जॉन्सन यांचं पुस्तकविक्रीचं दुकान होतं.खालच्या मजल्यावर पुस्तकांचं दुकान होतं आणि वरच्या मजल्यावर जॉन्सन कुटुंब राहत असे.सारा आणि मायकेल यांनी अनेक वर्षं प्रतीक्षा केल्यावर सॅम्युएल हे पहिलं अपत्य जन्मलं होतं.सॅम्युएलच्या जन्माच्या वेळी साराचं वय ४० वर्षांचं होतं.खरं तर वयाच्या दृष्टीनं मूल जन्माला घालण्यास तसा उशीर झाला होता.आणि साराचं बाळंतपणही कठीण झालं होतं.सॅम्युएलच्या जन्माच्या वेळी इंग्लंडमधल्या तज्ज्ञ सर्जनांना बोलावण्यात आलं होतं.बाळाचा जन्म सुखरूप झाला,पण जन्मल्यानंतर बाळानं रडायला हवं,तर बाळ रडलंच नव्हतं.सगळ्यांचं धाबंच दणाणलं.शिवाय बाळ दिसायला अगदीच किडकिडीत होतं.हृदयाचे ठोके मात्र व्यवस्थित सुरू होते इतकंच काय ते त्या बाळाचं नशीब! बाळाची ही अवस्था बघून त्याची आत्या तर तिथेच मागचापुढचा विचार न करता म्हणाली, 'किती मरतुकड बाळ आहे हे,हे रस्त्यावर जर पडलं तर मी उचलणारदेखील नाही.'


आपल्या अशा नाजूक बाळाकडे बघून होणाऱ्या प्रतिक्रियांमुळे सारा आणि मायकेल यांना सॅम्युएलची खूप काळजी वाटायची.खरं तर पुढे सॅम्युएलची ज्या जगप्रसिद्ध आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाशी तुलना केली गेली,त्या न्यूटनचीही अवस्था जन्मल्यानंतर सॅम्युएल-सारखीच होती.मायकेल आणि सारा सॅम्युएलला लहानपणी 'सॅम' या नावानं हाक मारत असत.सॅम जेव्हा पाच वर्षांचा झाला,तेव्हा आपल्या आईबरोबर तो पहिल्यांदा चर्चमध्ये गेला.आईबरोबर त्यानं तिथे प्रार्थनेतही भाग घेतला.घरी आल्यावर सॅमनं चर्चमध्ये ऐकलेली प्रार्थना जशीच्या तशी शब्दन्शब्द सुरात गाऊन दाखवली.साराला ते ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला.

आपल्या मुलाची स्मरणशक्ती बघून ती चकित झाली. आपला मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे ही गोष्ट लक्षात येताच तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहायला लागले.

खरं तर वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच सॅमला त्याच्या आईनं घरीच शिकवायला सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी बूट बनवणाऱ्या एका निवृत्त माणसाकडे तिनं सॅमला व्याकरण शिकायला पाठवल.वयाच्या नवव्या वर्षापर्यंत सॅमला लॅटिन भाषाही अवगत झाली होती. त्यानंतर त्याचं पुढलं शिक्षण सुरू झालं खरं,पण तोपर्यंत त्यांच्या घरची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती.त्यातच भरीस भर म्हणून सॅमला टॉरेट सिंड्रोम नावाचा विकार जडला.या विकारात त्या रुग्णाचं त्याच्या ठरावीक मांसपेशींच्या हालचालींवर नियंत्रण राहत नाही.उदा.खोकला,शिंकणं,

डोळे मिचकावणं,मानेच्या निरनिराळ्या हालचाली.तसंच या विकारावर त्या वेळी कुठलाच उपाय नव्हता.

लहानपणी तो खूपच अशक्त आणि किडकिडीत असल्यानं त्याला दूध पाजण्यासाठी एका नर्सची व्यवस्था करण्यात आली होती.सॅमला दूध पाजणाऱ्या या नर्सला टीबी झाल्यानं त्या दुधातून सॅमला इन्फेक्शन झालं,असंही म्हटलं जातं.सॅमनं अशाही परिस्थितीत पुढलं शिक्षण घेण्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला;पण घरच्या कर्जबाजारीपणाच्या परिस्थितीमुळे त्याला जेमतेम वर्षभरच तिथे शिक्षण घेता आलं. त्यातच १७३१ साली मायकेलचा मृत्यू झाला.ऑक्सफर्डमधून बाहेर पडला तेव्हा सॅमची वेगवेगळ्या भाषांमधली गती विलक्षण होती.

तसंच त्याला विज्ञान हा विषयदेखील खूपच आवडायचा.

वडिलाचा मृत्यू आणि हातात कुठलीच पदवी नाही.अशा अवस्थेत सॅम नोकरीसाठी वणवण भटकायला लागला.या प्रयत्नांमध्ये त्याला स्टॉरब्रिज ग्रामर स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळाली.सॅमची तिथली अवस्थाही वाईटच होती.त्याला शिक्षक म्हणून मान देणं सोडाच,पण एखाद्या नोकरापेक्षाही वाईट वागणूक दिली जात असे.असं असलं तरी सॅम मात्र शिकवताना अतिशय मन लावून आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असे.वर्षभरात या नोकरीवरही त्याला पाणी सोडावं लागलं. त्यानंतर हेक्टर नावाच्या त्याच्या एका मित्रामुळे त्याला एका जर्नलमध्ये लिहिण्याची संधी मिळाली.याच दरम्यान त्यानं फ्रेंच आणि लॅटिन भाषेतल्या अनेक कवितांचं इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर केलं होतं.मात्र ते अप्रकाशितच राहिल. हॅरी पॉर्टर नावाच्या एका मित्राला त्याच्या आजारपणात सॅम्युएलन साथ दिली.फक्त साथसोबतच नाही,तर सॅमन हॅरीची त्याच्या मृत्यूपर्यंत देखभाल आणि सेवाशुश्रूषा केली.३ सप्टेंबर १७३४ या दिवशी हॅरीचा मृत्यू झाला. हॅरीच्या पश्चात त्याची पत्नी एलिझाबेथ आणि त्याची तीन मुलं होती.पुढे १७३५ साली सॅम्युएल जॉन्सन आणि एलिझाबेथ पॉर्टर यांनी लग्न केलं.त्या वेळी सॅम्युएलचं वय २५ तर एलिझाबेथचं वय ४६ वर्षांचं होतं! याच दरम्यान इतर ठिकाणी,इतर शाळांमध्ये नोकरी करून शिकव-ण्यापेक्षा आपण आपलीच शाळा सुरू करावी,असा विचार सॅम्युएलच्या मनात आला.त्यानं "एडिअल हाल' नावाची एक शाळा सुरू केली.सुरुवातीला या शाळेत फक्त तीनच विद्यार्थी होते.ही शाळादेखील फार काळ तग धरू शकली नाही.तसंच त्याच्या कौटुंबिक आयुष्यातही कटकटी सुरू झाल्या होत्या.एलिझाबेथ आणि सॅम्युएल यांचे आपसांत वारंवार खटके उडायला लागले. त्यामुळे १७३७ साली अखेर सॅम्युएलनं लंडन शहराचा निरोप घेतला आणि तो ग्रिनीच इथे जाऊन पोहोचला.याच काळात सॅम्युएलचा टॉरेट सिंड्रोम हा विकार बळावत चालला होता. त्यामुळे कुठेही काम करणं त्याला अशक्य झालं होतं. 'द जंटलमेन्स मॅगेझिन' या नियतकालिकात लेखक म्हणून काम करण्याची नोकरी सॅमला ग्रिनीच इथे मिळाली.१७३८ साली सॅम्युएलनं केलेलं भरीव काम लोकांच्या प्रथमच लक्षात आलं.ते काम म्हणजे सॅम्युएलने त्या वेळच्या लंडनच्या परिस्थितीवर केलेली 'लंडन' ही कविता ! या एका कवितेमुळे सॅम्युएलला लोक आता सॅम्युएल जॉन्सन असं आदरानं ओळखायला लागले.

'लंडन' ही कविता इतकी गाजली की काही लोकांनी तर ती त्यानं लिहिलीच नसून त्यानं ती कोणाची तरी नक्कल करून लिहिली,असे आरोपही केले.काही काळानंतर सॅम्युएल आणि एलिझाबेथ यांचा पुन्हा सलोखा झाला.

खरं तर एलिझाबेथचं सॅम्युएलवर प्रेम होतं.


१७४६ साली काही प्रकाशकांचा गट सॅम्युएल जॉन्सन याच्याकडे आला आणि त्यानं डिक्शनरी लिहावी,असा प्रस्ताव त्यांनी त्याच्यासमोर ठेवला.या प्रकाशकांनी सॅम्युएल जॉन्सन यानं ही डिक्शनरी तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करावी असा करारही केला.या करारानुसार प्रकाशकांनी सॅम्युएल जॉन्सनला १५७५ युरोज इतकं मानधनही दिलं. (त्या वेळच्या करन्सीमध्ये!) आताच्या हिशोबानं ते २ लाख ४० हजार युरोज इतकं होईल.खरं तर हे काम तीन वर्षांमध्ये पूर्ण होण्याइतकं लहान नव्हतंच.या कामाचा पसारा किंवा आवाका इतका मोठा होता की,प्रत्यक्षात डिक्शनरीचं काम पूर्ण होण्यासाठी तब्बल एक दशक लागलं.डिक्शनरीच्या कामानं सॅम्युएल जॉन्सनला झपाटून टाकलं होतं.

रात्रंदिवस शेकडो पुस्तकांच्या गराड्यामध्ये सॅम्युएल जॉन्सन घेरलेला असायचा.जमेल तिथून या माणसानं जमेल तितकी पुस्तकं गोळा केली होती.आवश्यक ती पुस्तकं मिळवण्याचा त्याला या काळात जणू ध्यास लागला होता.खरं तर तो काळ संगणकाचा नव्हता.

हाताखाली मदत करायला फक्त एक टायपिस्ट तो काय त्याच्याजवळ होता.अशा परिस्थितीत अनेकांनी त्याच्यावर टीकाही केली.जॉन हॉर्न यानं तर 'हे काही एका व्यक्तीनं करण्याचं काम नाही,असं म्हणून टोमणाही मारला होता.

काहींनी तर अतिशय वाईट कोशाकार म्हणून सॅम्युएल जॉन्सन याला हसायला आणि हिणवायलाही सुरुवात केली होती.एकीकडे शारीरिक दुर्बलता तर दुसरीकडे आर्थिक परिस्थितीचीही साथ नाही अशा अवस्थेत लोकांचे टोमणे आणि टीका सहन करत करत सॅम्युएल जॉन्सननं १७५५ साली अथक परिश्रमानंतर डिक्शनरी प्रकाशित केली. हेन्री हिचिंग या इतिहासकारानं असं म्हणून ठेवलंय,'सॅम्युएल जॉन्सनच्या 'डिक्शनरी' ने लोकांना इंग्रजी भाषेचं महत्त्व आणि तिची जगभरात असलेली आवश्यकता यांची जाणीव करून दिली.'कारण त्या काळात फ्रेंच भाषा ही युरोपियन किंवा राज्य करणारी भाषा समजली जात असे.इंग्रजी भाषेला कुठलाही साचाढाचा नसलेली आणि वरवरच्या संवादाची भाषा समजली जात असे.तिला कुठलाही प्रतिष्ठेचा दर्जा नव्हता.त्यामुळे हिचिंगचं हे म्हणणं खूप महत्त्वाचं ठरतं.


यातला एक हृदयद्रावक भाग म्हणजे ज्या एलिझाबेथनं सॅम्युएलला त्याच्या पडत्या काळात साथ दिली होती;पण सॅम्युएलचं डिक्शनरीच्या निर्मितीच्या काळात तिच्याकडे साफ दुर्लक्ष झालं.या काळात तिची तब्येत बिघडली असतानाही सॅम्युएलनं तिच्याकडे जराही लक्ष दिलं नाही.

त्यामुळे अखेर कंटाळून आणि निराश होऊन ती त्याला सोडून लंडनला निघून गेली.याचा कुठलाही परिणाम सॅम्युएलवर किंवा त्याच्या कामावर झाला नाही.तो आपल्याच धुंदीत होता.काहीच काळानंतर म्हणजे १७५२ साली एलिझाबेथच्या मृत्यूचीच बातमी त्याच्यापर्यंत येऊन धडकली.तेव्हा मात्र तिनं त्याला दिलेली साथ आठवून सॅम्युअलला खूप वाईट वाटलं.त्यानं एलिझाबेथच्या आठवणीदाखल एक कविता रचली आणि आपल्या मित्राला तिच्या दफन करण्याच्या वेळी हजर राहून ती गाऊन दाखवावी असं सुचवलं; पण सॅम्युएलचा मित्र त्याच्या या वागणुकीवर इतका चिडलेला होता की,त्यानं ही गोष्ट साफ नाकारली.सॅम्युएल जॉन्सन याची 'डिक्शनरी' बाजारात येण्याआधी इंग्रजी भाषेला काही आकार आणि रूप नव्हतं.या डिक्शनरीमध्ये ४२७७३ शब्दांचा अर्थ,त्यांची व्युत्पत्ती आणि त्यांचे उच्चार समाविष्ट करण्यात आले होते. १८ बाय २० इंच अशा आकाराची ही डिक्शनरी होती.या डिक्शनरीत त्यानं प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द अवतरण चिन्हांमध्ये दिला आहे आणि त्याचबरोबर त्याच शब्दाचे समानार्थी अनेक शब्द असतील तर तेही वेगळ्या अवतरण -

चिन्हांमध्ये दिलेले आहेत.अशा अवतरणचिन्हांच्या मधल्या शब्दांची संख्या १,१४,००० इतकी होते,हेही या डिक्शनरीचं वैशिष्ट्य! डिक्शनरीच्या प्रकाशनानंतर सॅम्युएल जॉन्सनला ट्रिनिटी स्कूल ऑफ लंडनकडून एमए (मास्टर ऑफ आर्टस इन इंग्लिश लँग्वेज) पदवीनं सन्मानित करण्यात आलं आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून त्याला डॉक्टरेटही जाहीर करण्यात आली.आता लोक सॅम्युएल जॉन्सनला डॉ.सॅम्युएल जॉन्सन म्हणून संबोधायला लागले.असं असलं तरी सॅम्युएल जॉन्सन मात्र स्वतः कधीही स्वतःच्या नावाआधी डॉक्टर असं संबोधन लावत नसे.


डॉ.सॅम्युएल जॉन्सनची 'डिक्शनरी' हे जगातलं एकमेव एकहाती काम आहे.ही डिक्शनरी पुढे फ्रेंच आणि जर्मन भाषांमध्ये भाषांतरित केली गेली.'ही डिक्शनरीच खुद्द त्या लेखकाचं स्मारक बनून जगात कायमस्वरूपी अस्तित्वात राहील,' असं प्रेसिडेंट ऑफ फ्लोरेन्टाईन यांनी जाहीर केलं. पुढे १५० वर्षांनंतर ऑक्सफर्डच्या निरनिराळ्या शब्दकोशांचं प्रकाशन झालं.त्यातही डॉ.सॅम्युएल जॉन्सन याच्याच डिक्शनरीतल्या व्याख्या पुन्हा वापरात आणल्या गेल्या.त्या 'जे' या नावानं वापरल्या गेल्या.सॅम्युएल जिथे जायचा तिथे तो अनेक मित्र जमवायचा.त्याची अनेक स्तरांतल्या लोकांशी मैत्री व्हायची.सॅम्युएल जॉन्सन चहाचा खूपच शौकीन होता.एकदा का तो चहा प्यायला लागला की,चक्क २५-२५ कप चहा तो सहजपणे रिचवायचा.तो जेवत असताना कोणी काही सांगायला लागला,तर तो त्याचा एकही शब्द जेवण पूर्ण होईपर्यंत ऐकून घेत नसे. इतकंच काय,पण जेवताना त्याच्या कपाळावरच्या नसा टम्म फुगत असत आणि त्याचं संपूर्ण शरीर घामानं डबडबून जात असे.व्यसनी माणसामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक नाही,असं सॅम्युएल जॉन्सन विनोदानं म्हणायचा.

खाणं-पिणं आणि वाचन या गोष्टींपुढे त्याला दुसरं काही सुचत नसे.विख्यात नाटककार शेक्सपिअर आणि कवी वर्डस्वर्थ यांनी वापरलेल्या अनेक शब्दांचा अर्थही सॅम्युएलच्या डिक्शनरीमध्ये देण्यात आला आहे हे विशेष ! शेक्सपिअर,जॉन मिल्टन,ॲलेक्झांडर पोप,एडमंड स्पेन्सर यांचीही प्रसिद्ध कोटेशन्स त्यानं डिक्शनरीमध्ये सामील केली होती. कुठल्याही समाजाच्या दृष्टीनं आक्षेपार्ह अथवा अश्लील समजल्या जाणाऱ्या शब्दांचा अर्थ देण्यातही सॅम्युएल जॉन्सन मागे हटला नाही हेही विशेष ! काळाच्या पुढे जाणारी ही गोष्ट होती.'आपला ज्या गोष्टीत कल आहे,त्याच गोष्टींबद्दलचं वाचन आपण केलं पाहिजे,'असं सॅम्युएल जॉन्सन म्हणत असे.


अखेरच्या दिवसांत सॅम्युएलचा एक डोळा अधू झाला होता आणि त्याला ऐकायलाही येईनासं झालं होतं.तसंच त्याला नैराश्यानंही ग्रासलं होतं. त्याच्या जवळच्या दोन मित्रांच्या मृत्यूनं त्याला जास्तच एकाकी वाटायला लागलं होतं. 


सॅम्युएलचा मृत्यू १३ डिसेंबर १७८४ या दिवशी वयाच्या ७५ व्या वर्षी अनेक विकारांनी ग्रस्त झाल्यामुळे झाला.

सॅम्युएल जॉन्सनला वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये शेक्सपि -

अरच्या स्मारकाजवळच दफन करण्यात आलं.(जग बदलणारे ग्रंथ,दीपा देशमुख) पुढे त्याचा मित्र जेम्स बोसवेल यानं सॅम्युएल जॉन्सनचं चरित्र लिहून प्रसिद्ध केलं. 'डिक्शनरी' ही जगातली पहिली डिक्शनरी नसलीतरी डॉ.सॅम्युएल जॉन्सन याच्या अथक परिश्रमामुळे ती जगभरात सर्वाधिक लोकप्रिय झाली हे मात्र खरं. !


समाप्त...

१५/७/२३

लिओनार्डो डी व्हिन्सी - भाग - २

आपण पाहिले की,लिओनार्डो हा अत्यंत स्वयंभू व अभिजात असा कलावान होता.त्याच्या कृतीत अनुकरण नाही.तो म्हणे,"आपण निसर्गाचे अनुकरण करावे,दुसऱ्या कलावंताचे करू नये." ग्रीक हे उत्कृष्ट कलावंत होते.

कारण ते निसर्गानुकारी होते.पण रोमन कलावंत दुय्यम दर्जाचे वाटतात.कारण,निसर्गाचे अनुकरण करण्याऐवजी त्यांनी माणसांचे - ग्रीकांचे अनुकरण केले.जुन्या ग्रीक कलावेत्त्यांत जी प्रतिभेची ज्वाला होती,ती लिओनार्डो -

मध्ये होती. लिओनार्डो जीवनातून स्फूर्ती घेई.कधीकधी तर तो जीवनाच्या पलीकडेही जाई.जीवनात नसलेलेही त्यांत ओतून तो अधिक सौंदर्य निर्मी. मोनालिसाची जी प्रतिकृती त्याने काढली आहे, तीत किती नाजूकपणा,

किती कोमलता,किती सुंदरता व एक प्रकारचीप्रभुशरणता

आहे.! मूळच्या खऱ्या मोनालिसाच्या चेहऱ्यात या साऱ्या भावना क्वचितच असतील.हे चित्र काढताना लिओनार्डोने निसर्गाचे अनुकरण केले आहे असे वाटते.त्या मानवी मुखमंडलावर त्याने इतकी मधुरता रेखाटली आहे आणि इतका चांगुलपणा उमटविला आहे,याचे कारण त्याच्या हृदयातच अपार साधुता,अपार मधुरता होती.


फिडियसच्या कलेचा आत्मा जसा लिओनार्डोजवळ होता,तसे त्याच्याजवळ सेंट फ्रेंन्सिससचे हृदयही होते.तो जीवनाकडे दुःखी स्मिताने पाहतो.त्याला मानवांची दुःखे पाहून त्यांची करुणा येई;पण त्यांचा मूर्खपणा पाहून तो स्मित करी.कधीकधी स्मिताचे परिवर्तन मनमोकळ्या हास्यातही होई.या बाबतीत ग्रीक लेखक रिस्टोफेन्स याच्याशी त्याचे साम्य आहे.आपण असेही म्हणू शकू की,लिओनार्डो हा रेखा व रंग यांचा रिस्टोफेन्स होता.ग्रीक रिस्टोफेन्स शब्दसृष्टीतील तर हा रंगसृष्टीतील.त्या ग्रीक नाटककाराप्रमाणे मानवी जीवनाच्या हास्यरसात्मक नाटकातील जे अधिक हास्यास्पद प्रकार दिसत,त्यांवर दृष्टी टाकणे त्याला बरे वाटे. जीवनातील नाना प्रकारचे हास्यास्पद चेहरे त्याने आपल्या नोटबुकात काढले आहेत.

त्याची नोटबुके अशा चेहऱ्यांनी भरलेली आहेत.


कधीकधी तो शेतकऱ्यांना आपल्या घरी बोलावी व गोष्टी सांगून त्यांची हसवूनहसवून मुरकुंडी वळवी.हसताना त्यांचे चेहरे निरनिराळ्या प्रकारचे होत; ते पाहून तो लगेच कागदाच्या तुकड्यांवर ते टिपून घेई व नंतर आपल्या अमर स्केचबुकांत त्या चेहऱ्यांना तो अमरत्व देई.


अपूर्व अशा परिस्थितीत मानवी भावना कशा दिसतात हे पाहण्याचे लिओनार्डोला जणू वेडच होते! ज्यांचा शिरच्छेद व्हायचा असे,अशा गुन्हेगारांचे चेहरे काढण्यासाठी तो तास न् तास बसे व त्यांच्या मरणान्तिक भावना रेखाटत असे; पण त्या मरणोन्मुखांची करुण मुखे रंगविताना त्याला आसुरी आनंद मात्र होत नसे.तो त्या वेळी शास्त्रीय दृष्टीने ते भावनांचे आविष्कारण पाहत असे.तो जणू मानसशास्त्राचा अभ्यास करी व त्यावर रेखारूप निबंध लिही.तो कलावान होता. जीवनाची व मरणाची प्रत्येक स्थिती,प्रत्येक दशा अभ्यासावयाची जिज्ञासा त्याला असे.

कलावान या नात्याने तो अभ्यास करी;पण 'मनुष्य' या नात्याने त्याने जीवनालाच गौरविले आहे व मरणाला धिक्कारले आहे.त्याचा चरित्रलेखक व्हासारी लिहितो, "जेथे पाखरे विकली जात,त्या जागी तो जाई;आपल्या हातांनी पिंजऱ्यातील पक्षी घेई,त्यांची मागण्यात येई तितकी किंमत देई व नंतर त्यांना सोडून देऊन त्यांचे स्वातंत्र्य त्यांना परत देई ! "


त्याला प्राणिमात्राबद्दल अनुकंपा वाटे,प्रत्येक जीव पवित्र वाटे.तो शाकाहारी झाला.आपण जर प्राणी निर्मू शकत नाही तर त्यांना ठार मारण्याचा आपणास काय अधिकार? तो लिहितो, "कोणत्याही प्राण्याचा जीव घेणे ही अत्यंत अमानुष गोष्ट आहे.रागाने अथवा मत्सराने आपण कोणाचा प्राण घ्यावा अशी आत्म्याची खरोखरच इच्छा नसते.ज्याला प्राणांची किंमत वाटत नाही,ज्याला दुसऱ्याच्या जिवाची पर्वा नाही,तो जिवंत राहण्यास अपात्र नव्हे काय ?"


लिओनार्डो स्वानुभवाने बोलत होता.आपण कशाच्या जोरावर हे असे बोलू शकतो,हे तो जाणत होता.

जीवनातील दुर्दैव,करुणा,विरोध व क्रूरता या गोष्टी त्याने स्वतः पाहिल्या होत्या.लुडोव्हिको स्फोर्झाच्या दरबारात व नंतर सीझर बोर्डिआ याच्या राजवाड्यात त्याला दिसले की,अत्यंत क्षुद्र स्वार्थासाठी व क्षुद्र कारणांसाठी माणसे माणसांची कत्तल करीत असतात.तो मानवातील सौंदर्याचा उपासक होता व म्हणून तो कलावान झाला.

पण मानवातील दुष्टता व जंगलीपणा पाहून तो तत्त्वज्ञानी झाला.


लिओनार्डोचे तत्त्वज्ञान सर्वसंग्राहक आहे. तत्त्वज्ञानाच्या प्रत्येक संप्रदायात जे जे चांगले दिसले ते ते सारे त्याने घेतले.सर्व ठिकाणचे उत्कृष्ट विचार घेऊन त्याने स्वत:चे तत्त्वज्ञान उभारले जीवन-मरणासंबंधीचे लिओनार्डोचे विचार सुसंबद्ध नाहीत.त्याच्या स्फुट व विस्कळीत विचारांना 'दर्शन' किंवा 'मीमांसा' म्हणता येणार नाही.

त्याने टीपा,टिप्पण्या लिहिल्या.त्याच्या पाच हजार पृष्ठांत सर्व काही संक्षेपाने आले आहे. 


तो डाव्या हाताने लिही,म्हणून त्याचे बरेचसे लिखाण लागत नाही.तसेच तो आपले इटॅलियन अक्षर हिब्रू व अरेबिक याप्रमाणे उजवीकडून डावीकडे लिही.

लिओनार्डोच्या तत्त्वज्ञानात्मक सूत्रांची नीट व व्यवस्थित मांडणी अद्यापि कोणी केलेली नाही.पण त्याच्या इतस्तत: विखुरलेल्या विचारांतून स्टोइकांची धैर्यशीलता व ख्रिस्ताची मधुर सौम्यता यांचे मिश्रण आपणास आढळून येते.लिओनार्डो चर्चचा सभासद नव्हता;पण तो येशूचा अनुयायी होता.त्याने काढलेल्या ख्रिस्ताच्या चित्रांतील ख्रिस्ताचे मुखमंडल रंगविताना ख्रिस्ताचा आत्मा आपण ओळखला आहे,असेच जणू तो दाखवीत आहे.पण त्याने ख्रिस्ताचे मुख तेवढेच नीट रंगविले असे नाही, तर ख्रिस्ताचे विचारही सहानुभूतिपूर्वक समजून घेतले होते.तो ख्रिस्ताप्रमाणे,स्टोइक बंधूंप्रमाणे, स्वतःची दुःखे समाधानाने व सहजतेने सहन करी;तो त्यांचा बाऊ करीत नसे.दुसऱ्यांच्या दुःखांविषयी तो सहानुभूती दाखवी.शत्रूंचा द्वेष व मित्रांचा मत्सर यांमुळे त्याला बराच त्रास होई. मायकेल एंजेलो हा त्याचाच समकालीन महान चित्रकार,

पण लिओनार्डोच्या कलेकडे तो सहानुभूतीने बघत नसे; व त्याचा सार्वजनिकरित्या अपमान करण्याची एकही संधी गमावीत नसे.लिओनार्डो मात्र हे सर्व अपमान सोशी,

धीरोदात्ततेने सहन करी.तो आपल्या हस्तलिखितात एके ठिकाणी लिहितो, "कपड्यांमुळे थंडीपासून बचाव होतो,तसा सहनशीलतेमुळे दुसऱ्यांनी दिलेल्या त्रासापासून बचाव होतो.थंडी वाढेल तसतसे अधिकाधिक कपड़े अंगावर घातल्यास थंडी काही करू शकणार नाही;तद्वतच लोक तुमच्या बाबतीत अधिकाधिक अन्याय करू लागले तर अधिकाधिक सहिष्णू व सहनशील बना.म्हणजे त्या अन्यायांनी व निंदा अपमानांनी तुमचे मन त्रस्त होणार नाही व त्यांची - शक्ती नष्ट होईल."व्यक्तींचा मूर्खपणा सहन करायला तो सिद्ध होता.पण मानवजातीचा मूर्खपणा पाहून मात्र त्याला तिरस्कार वाटे.तो एके ठिकाणी लिहितो, 'मानवा,तुझ्या जातीविषयी तुला काय वाटते? मानवजातीची मूर्खता व तिचा टोणगेपणा पाहून तुला लाज नाही वाटत?"


पोकळ मानसन्मानांसाठी सदैव आपसात झगडणारे राजे व सरदार पाहून त्याला गंमत वाटे.त्याचे आश्रयदाते राजवैभवाच्या कलेत तज्ज्ञ होऊ पाहत होते;पण लिओनार्डो कलेच्या राजवैभवात - भक्तिप्रेमात रंगला होता.त्याला जीवनाचा खरा - आनंद सौंदर्यातच सापडला. इतर सारे खटाटोप 'मृगजळापाठीमागे लागण्याप्रमाणे फोल' असे तो म्हणे. (Koheleth प्रमाणे) महत्त्वाकांक्षेत अर्थ नाही. आशा शेवटी निराशाच निर्मिते.तो लिहितो, "इच्छापूर्तीपेक्षा इच्छाच अधिक गोड असते. कीर्तीसाठी धडपडत असता स्वत:ची मान व दुसऱ्याच्या माना मोडून घेणे हे हास्यास्पद होय. झाडावर असताना गोड वाटणारे फळ तोंडात गेले म्हणजे कडू लागते.आपल्या शक्तीच्या मर्यादा ओळखण्यास आपण शिकले पाहिजे. फार मोठ्या ध्येयाची आशा धरणे मूर्खपणाचेच नव्हे;तर धोक्याचेही आहे.आपल्या बुद्धीच्या शक्तीनुसार आपण आपल्या महत्त्वाकांक्षेचे मोजमाप ठेवावे;आपल्या आशा- आकांक्षा त्या पूर्ण करणाऱ्या आपल्या शक्तीच्या पलीकडच्या असू नयेत.ज्यांची इच्छा आपण करतो ते प्राप्त होतेच असे नसल्यामुळे मिळू शकेल त्याचीच इच्छा आपण करू या.


इच्छा गोड असते; पण पूर्ती कडू असते, दुःखदायी असते.अशी कोणतीही निर्दोष देणगी नाही की जिच्यासाठी खूप कष्ट पडत नाहीत.हालांशिवाय,दुःखा-

शिवाय देणगीच नाही.लिओनार्डोसारख्या कलावंताच्या बाबतीत तर हे अधिकच सत्यार्थाने खरे आहे.कलावंताला अधिक निर्मिता येते,अधिक प्राप्त करून घेता येते;कारण तो दुःखही खूप सोसतो.ग्रीक कवींची अशी एक मीमांसा होती की,ज्ञान दुःखातून व वेदनांतूनच संभवते.जीवनाचा गंभीर अर्थ त्यांना समजला होता.म्हणूनच त्यांनी असा प्रचार मांडला. (Pathei Mathos). आपण सोसण्यास तयार असतो;म्हणूनच आपण शिकू शकतो.आपणास असलेल्या मृत्यूच्या जाणिवेमुळेच आपण जीवनाचा अर्थ समजू शकतो.


लिओनार्डोला जीवनाचा खोल अर्थ नीट समजला होता;कारण तो मृत्यूशी नीट परिचित होता,मृत्यूचा अर्थ त्याने पूर्णपणे ओळखला होता.त्याला वाटे की,मृत्यू मोठा फसव्या आहे. कधीही पूर्ण न होणाऱ्या आशांची आमिषे दाखवून फसविणे हेच मृत्यूचे काम ! जो भविष्यकाळ कधीही येणार नाही,त्याची आशा दाखवून मृत्यू फसवीत असतो.तो म्हणतो, "आपण नेहमी भविष्याची आशा करीत असतो; पण भविष्य आपल्यासाठी एकच निश्चित अशी गोष्ट ठेवीत असते व ती म्हणजे सर्व आशांचे मरण ! आपले सारे जीवन म्हणजे मरणाची तयारी.मी जगण्यासाठी शिकत आहे असे मला वाटे; पण ते शिकणे वस्तुतः मरण्यासाठीच होते."


पण लिओनार्डो जे जे भोगावे लागे,ते ते एखाद्या स्टोइकाप्रमाणे शांतीने व हसतमुखाने सहन करी.मृत्यूचे शेवटचे बोलावणे आले,तेव्हा तो दमल्याभागलेल्या मुलाप्रमाणे झोपी जाण्यास तयार होता.विश्रांतीवर त्याचा हक्क होता. मरणापूर्वी थोडाच वेळ त्याने आपल्या मित्रास लिहिले,"एखादा दिवस चांगल्या कामात गेला, सार्थकी लागला,म्हणजे जशी झोप सुरेख लागते, तद्वत् ज्याने आपले जीवन नीट व्यतीत केले आहे,त्याला मरताना आनंद होतो."तो वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी वारला.त्याचा मित्र मेल्सी लिहितो,"त्याचा वियोग प्रत्येकाला दु:सह आहे. त्याच्या मरणामुळे सर्वांना दुःख होत आहे.असा आणखी एखादा पुरुष निर्माण करणे निसर्गाच्या शक्तीच्या बाहेरचे आहे." लिओनार्डोच्याच शब्दांत सांगायचे झाले तर,विभूतिमान पुरुषांविषयी त्याने काढलेलेच शब्द आपणास त्यालाही लावता येतील."तो मानवात जन्मलेला देवदूत होता. ' "


१३.७.२०२३ या लेखातील शेवटचा दुसरा भाग..


समाप्त…