* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: ऑगस्ट 2024

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३०/८/२४

नव्या भूमितीचे प्रणेते/Pioneers of New Geometry…

२८.०८.२४ या लेखातील शेवटचा दुसरा भाग..


त्यातच त्याचा मोठा मुलगा अचानक वारला. हा धक्का लोबॅचेव्हस्की पचवू शकला नाही. त्याचे केस अकाली पांढरे झाले.शरीरही खंगलं.कझानमध्ये त्याचं मन रमेना.यानंतर त्यानं कझान सोडलं आणि दूर एका शेतात घर घेऊन तो राहायला लागला.तिथे त्यानं (गणिताशी काहीही संबंध नसलेले) लोकरीच्या जातींवर बरेच प्रयोग केले आणि ते यशस्वीही झाले,एका नव्या युगाची सुरुवात करणारा हा 'भूमितीतला कोपर्निकस' २४ फेब्रुवारी १८५६ रोजी वयाच्या एकसष्टाव्या वर्षी मरण पावला तो एका नव्या क्रांतीची बीजं पेरूनच !


लोबॅचेव्हस्कीप्रमाणेच जानोस बोल्याई (१८०२-१८६९) यानंही गाऊसला अशाच प्रकारच्या नॉन-युक्लिडियन जॉमेट्रीबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला.पण गाऊसनं त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं.कोण होता हा जानोस बोल्याई ? गणितज्ञ गाऊस गॉर्टिजेनला असताना त्याची भेट हंगेरीहून आलेल्या फार्कस बोल्याई नावाच्या एका गणितज्ञाशी झाली.पुढे गाऊसची आणि फार्कस बोल्याईची घनिष्ठ मैत्रीही झाली. फार्कस बोल्याई खरं तर हा एक कवी, नाटककार आणि संगीतकार होता.पण तो एक चांगला गणितज्ञही होता.त्याला युक्लिडच्या भूमितीतलं पाचवं पॉस्च्युलेट सिद्ध करायचं होतं.

त्यानं त्याप्रमाणे एक सिद्धता सुद्धा लिहिली.पण गाऊसनं लगेचच त्यात चूक काढली.त्यामुळे निराश न होता फार्कस बोल्याईनं त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा एक सिद्धता लिहिली.गाऊसनं तीही चुकीची ठरवली.कालांतरानं गाऊसनं पाचव्या पॉस्च्युलेट

ऐवजी वेगळाच दुसरा काहीतरी विचार सुरू केला आणि त्यामुळे त्याची आणि फार्कस बोल्याईची पाचव्या पॉस्च्युलेटवरची चर्चा थांबली.


फार्कस बोल्याई अतिशय नम्र असा माणूस होता. आपल्या मृत्यूनंतर आपल्या थडग्याजवळ एक सफरचंदाचं झाड लावावं अशी इच्छा त्यानं व्यक्त केली होती.या सफरचंदाच्या तीन फळांपैकी ॲडम आणि इव्ह या दोघांसाठी प्रत्येकी एक अशी दोन त्यांनी पृथ्वीचा नरक केल्याबद्दल असावीत आणि उरलेलं एक न्यूटनसाठी पृथ्वीचा परत स्वर्ग केल्याबद्दल असावं,अशी त्याची भन्नाट इच्छा आणि त्याहूनही भन्नाट त्यामागची कारणं होती !


१५ डिसेंबर १८०२ साली फार्कस बोल्याईला एक देखणा,निळ्या डोळ्यांचा आणि कुरळ्या केसांचा मुलगा झाला. त्याचं नाव बोल्याईनं जानोस ठेवलं.या मुलाला त्यानं स्वतःच अगदी लहानपणापासून गणित शिकवलं.१८१७ साली जानोसनं व्हिएन्ना इथल्या रॉयल कॉलेज ऑफ इंजिनिअर्स इथे प्रवेश घेतला.

बोल्याईनं जानोसला सेनेत जाता यावं म्हणून प्रशिक्षणही दिलं होतं. त्याप्रमाणे जानोस लष्करामध्ये अधिकारी झाला.जानोस अतिशय सुंदर व्हायोलिन वाजवे.एकदा तर त्यानं लष्करामधल्या १३ अधिकाऱ्यांबरोबर एक स्पर्धा लावली होती. १३ अधिकाऱ्यांनी गाणं म्हणायचं आणि जानोसनं व्हायोलिन वाजवायचं.या जुगलबंदीत जानोसनं या तेराही अधिकाऱ्यांना गारद केलं.


जानोसला आपल्या वडिलांची युक्लिडच्या  पाचव्या पॉस्च्युलेटबद्दलची महत्त्वाकांक्षा सुरुवातीपासूनच माहीत होती.बराच काळ तोही या युक्लिडच्या पाचव्या पॉस्च्युलेटवर विचार करण्यात घालवे.या अशक्यप्राय अशा युक्लिडच्या पॉस्च्युलेटच्या सिद्धतेवर जानोसनं वेळ घालवू नये अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. ते त्याप्रमाणे त्याला पत्रंही लिहीत.पण जानोसनं ऐकलं नाही. त्याला ते युक्लिडचं पाचवं पॉस्च्युलेट वेड लावत होतं.आपल्या मुलाचा हा ध्यास बघून फार्कस बोल्याई मात्र अस्वस्थ झाला.कारण त्याची स्वतःची उमेदीची वर्ष या पाचव्या पॉस्च्युलेटमुळे फुकट गेली होती.'कृपा करून हा नाद सोड. यानं तुझा वेळ जाईल, तुझी तब्येत खराब होईल, तुझी मनःशांती भंग होईल'असं तो आपल्या मुलाला सांगत असे.


शेवटी १८२० साली जानोस बोल्याईला युक्लिडच्या पाचव्या पॉस्च्युलेटपेक्षा वेगळं पॉस्च्युलेट धरूनही वेगळ्याच नॉन-युक्लिडियन जॉमेट्रीचा डोलारा उभा करता येतो हे लक्षात आलं आणि भूमितीत एक नवं दालन उघडलं गेलं आणि दोन हजार वर्षांच्या युक्लिडच्या थिअरीला तडे गेले.युक्लिडची भूमिती या नव्या भूमितीतली एक फक्त स्पेशल केस होती.१८३२-३३साली फार्कस बोल्याईनं गणितावरचे दोन खंडं प्रकाशित केले.यातल्या पहिल्या खंडात शेवटी परिशिष्टामध्ये जानोसनं 'सायन्स ऑफ ॲब्सोल्यूट स्पेस' नावाचा एक २६पानी निबंध लिहिला.या २६ पानांनी जानोस बोल्याईचं नाव गणितात अजरामर केलं !


बोल्याईनं युक्लिडच्या पाचव्या पॉस्च्युलेटवर प्लेफेअरच्या विचारांपासून सुरुवात केली. युक्लिडचं पाचवं पॉस्च्युलेट बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारांनी लिहिता येतं.त्यापैकी प्लेफेअरचं व्हर्शन असं की एखाद्या सरळ रेषेच्या बाहेरच्या कुठल्याही बिंदूपासून त्या रेषेला एक आणि एकच समांतर रेषा काढता येते.बोल्याईनं असं म्हटलं की समजा हे पॉस्च्युलेट खोटं आहे असं मानलं तर रेषेबाहेरच्या बिंदूतून दोन किंवा जास्त समांतर रेषा काढता आल्या पाहिजेत.

पण त्यासाठी आपल्याला सपाट पृष्ठभागाऐवजी वक्र पृष्ठभागाचा विचार करावा लागेल असा लोबेंचेव्हस्की

प्रमाणे त्यानंही विचार करायला सुरुवात केली.त्यानं मग युक्लिडच्या या पाचव्या पॉस्च्युलेटपेक्षा वेगळंच पॉस्च्युलेट मांडलं.त्याच्या पॉस्च्युलेटप्रमाणे कुठल्याही रेषेला त्या रेषेबाहेरच्या बिंदूतून एकापेक्षा जास्त समांतर रेषा काढता येत होत्या.त्यानं त्याच्या नव्या भूमितीचा डोलारा रचायला सुरुवात केली.

जानोसच्या या नव्या भूमितीत कुठलेच अडथळे किंवा परस्परविरोध येत नव्हते.जानोसनं ज्या वेळी आपली भूमिती शोधली त्या वेळी तो स्वतःच इतका भारावला की,'मी कसलाही आधार न घेता एक विलक्षण विश्व निर्माण केलं आहे' असं म्हणायला लागला.


जानोसचं संशोधन फार्कस बोल्याईनं गाऊसकडे पाठवलं. त्यावर गाऊसनं 'हे सगळं संशोधन अप्रतिम आहे,युगप्रवर्तक आहे याची मला कल्पना आहे.या संशोधनाची स्तुती करणं म्हणजे माझी स्वतःचीच स्तुती करण्यासारखं आहे.कारण बऱ्याच वर्षांपूर्वी मीही अशाच काही कल्पना लिहिल्या होत्या.

त्याच्याशी तुमच्या मुलाच्या कल्पना तंतोतंत जुळतात' असं उत्तर लिहिलं.गाऊसनं फार्कसच्या या समांतर रेषांसंबंधीच्या संशोधनातल्या दोन वेळा चुका काढलेल्या असल्यामुळे फार्कसला या वेळी आपल्या मुलाचं संशोधन गाऊसला पटलं याचा अफाट आनंद झाला.पण त्याच्या मुलाचा मात्र हिरमोड झाला.

कारण आपण काहीतरी नवीन शोधलंय असं त्याला वाटत होतं.पण गाऊसनं हे आधीच शोधलंय म्हटल्यावर तो हिरमुसला. 


बोल्याईची भूमिती बरीचशी लोबॅचेव्हस्कीप्रमाणेच असली तरी बोल्याईला मात्र याबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्यानं आपली भूमिती स्वतंत्रपणेच शोधली होती.बोल्याई,लोबॅचेव्हस्की आणि गाऊस या तिघांनी वेगवेगळ्या प्रकारे सपाट पृष्ठभाग आणि गोलाकार वक्र पृष्ठभाग यांच्यातल्या भूमितीतला फरक दाखवला आणि नव्या भूमितीचा पाया घातला.

गाऊस,बोल्याई आणि लोबॅचेव्हस्की यांनी जणू काही युक्लिडच्या भूमितीकडे बघण्याची काच काढून तिथे भिंग बसवलं.त्यामुळे सुरुवातीला साधी सरळ वाटणारी युक्लिडची भूमिती भिंगातून बघितल्या

प्रमाणे वेडीवाकडी दिसायला लागली.गाऊस, बोल्याई आणि लोबॅचेव्हस्की यांनी सपाट स्पेसची कल्पना झुगारून लावली आणि वक्र स्पेसची कल्पना आणली.लोबॅचेव्हस्कीच्या भूमितीप्रमाणेच जानोस बोल्याईची भूमितीही बराच काळ अज्ञातच राहिली.

१८६७ साली रिचर्ड बाल्टझर या गणितज्ञानं ती जगासमोर आणली आणि जगाला लोबॅचेव्हस्की बोल्याई यांच्याबद्दल कळलं.त्यामुळे १८९४ साली जानोस बोल्याईच्या उपेक्षित थडग्यापुढे त्याचा पुतळा उभारण्यात आला.लोबॅचेव्हस्कीच्या नावानंही १८९३-९४ साली एक फंड उभारला गेला.यातला काही भाग नवीन गणितज्ञांना बक्षीस देण्यासाठी वापरला गेला,तर काही भागातून कझान विद्यापीठासमोर लॅबोचेव्हस्कीचा पुतळा उभारला गेला.कित्येक वर्षांनी का होईना पण शेवटी निकोलस लोबॅचेव्हस्की आणि जानोस बोल्याई यांना अखेर न्याय मिळाला.


वाचणीय नोंद:-पॅगोडा : देवळाचे चित्र असलेले सोन्याचे नाणे. हिंदूंच्या देवळांना युरोपियन पॅगोडा म्हणत. म्हणून या होनाचे नाव पॅगोडा.सन १८१८ मध्ये एका पॅगोडाची किंमत ८ कास किंवा ४२ फलम होती.तो साडेतीन रुपयांबरोबर होता.फलम म्हणजे पुतळीपेक्षा कमी किमतीचे नाणे.याची किंमत तीन रुपये.१० फलम म्हणजे एक होन. एका पुतळीची किंमत चार रुपये.भारतातील सोन्याचे आणि चांदीचे असलेले हे नाणे मद्रासमध्ये १८१८ च्या सुमारास चलनात होते.८ कास म्हणजे १ फनम तर ८२ फनम म्हणजे एक पॅगोडा.त्यावर्षी रुपया हे प्रमाणभूत नाणे केले होते.म्हणून पॅगोडाची किंमत साडेतीन रुपये होती.२० कास म्हणजे १ फलूस तर ४ फलूस म्हणजे १ फनम.असे ४२ फनम म्हणजे १ पॅगोडा.विजयनगर,

अर्काट,मद्रास,डच,फ्रेंच आणि डॅनिश वसाहती यांची नाणी पॅगोडा म्हणून प्रचलित होती.विजयनगरच्या पॅगोडाचे वजन ३.३० ग्रॅम होतं.दक्षिण भारतात प्रचलित असलेले फनम हे लहान नाणे मल्याळममध्ये ते 'फनम' तर तमिळमध्ये 'पनम' म्हणून ओळखले जाई.संस्कृतमध्ये त्याला म्हणत 'पण'.दखनी भाषेत ते झाले फनम.प्राचीन काळापासून चलनात असलेले सोन्याचे हे नाणे नंतर चांदीचे झाले.( वाचता .. वाचता.. वेचलेले.)



२८/८/२४

लोबॅचेव्हस्की / बोल्याई Lobachevsky / Bolyai.

नव्या भूमितीचे प्रणेते…


नॉन-युक्लिडियन जॉमेट्रीचा पाया घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या निकोलस लोबॅचेव्हस्कीचा जन्म रशियात १७९३ साली झाला.

त्याच्या आई-वडिलांनी पोलंडहून रशियात स्थलांतर केलं होतं. 


लोबॅचेव्हस्कीच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्याचे वडील वारले.तीन लहान मुलं पदरात असूनही लोबॅचेव्हस्कीची आई डगमगली नाही.गरिबीमुळे आपली मुलं अशिक्षित राहिली तर ते योग्य होणार नाही याची तिला कल्पना होती.तिन्ही मुलांना सुरुवातीला ती घरीच शिकवत असे.नंतर तिनं मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून प्रयत्न केले. शिष्यवृत्ती मिळाल्यावर तिनं त्यांना शाळेत दाखल केलं.या सगळ्यामुळे लोबॅचेव्हस्की वयाच्या आठव्या वर्षी शाळेत गेला.त्याला लॅटिन भाषेत आणि गणितात चांगलीच गती होती.लोबॅचेव्हस्कीच्या बुद्धिमत्तेमुळे शिक्षक प्रभावित झाले.याच सुमारास रशियातल्या कझान इथे एक नवीन विद्यापीठ सुरू झालं होतं.लोबॅचेव्हस्कीला आणि त्याच्या मोठ्या भावाला तिथे प्रवेश मिळाला आणि शिष्यवृत्तीही मिळाली.लोबॅचेव्हस्की जेव्हा विद्यापीठात शिकायला होता तेव्हा तिथे पुरेसे शिक्षकच नव्हते आणि जे थोडेसे होते त्यांनाही स्वतःच्या विषयाचं फारसं ज्ञान नव्हतं.याचा परिणाम म्हणजे सुरुवातीला

प्राध्यापकांना जर्मनीतून बोलवावं लागे.असं असलं तरी थोड्या कालावधीतच हे विद्यापीठ भरभराटीला आलं. लोबॅचेव्हस्कीनं खरं तर वैद्यकीय शिक्षणासाठी या विद्यापीठात प्रवेश मिळवला होता.पण त्याला गणिताची खूपच आवड होती. 


त्यामुळे त्यानं गणिताचा अभ्यासही चालू ठेवला.

कालांतरानं त्याचा गणित विभागातला सर्वश्रेष्ठ विद्यार्थी असा बहुमानही करण्यात आला.हा बहुमान मिळाल्यावर मात्र लोबॅचेव्हस्कीचा अहंकार जागृत झाला.दुसऱ्याची टिंगलटवाळी करणं, शिक्षकांना चिडवून त्रास देणं असे उद्योग तो करायला लागला.

एकदा तर वर्गात त्यानं चक्क फटाके फोडले होते.

यामुळे कंटाळून जाऊन प्राध्यापकांनी त्याच्या विरुद्ध तक्रार केली.त्याला 'सर्वश्रेष्ठ विद्यार्थी' असा जो बहमान मिळाला होता तोही त्याच्याकडून काढून घेण्यात आला.त्याला कॉलेजमधून काढून टाकावं असाही विचार सुरू झाला. पण एवढ्या बुद्धिमान मुलाला कॉलेजमधून काढू नये असं तक्रार करणाऱ्या प्राध्यापकांनाच वाटल्यामुळे त्याला कॉलेजात ठेवलं गेलं.तिथे त्याला गणित शिकवायला एम. सी. बार्टेकस नावाचे एक जर्मन गृहस्थ होते.ते गाऊसला ओळखत असत.समांतर रेषांच्या युक्लिडच्या त्या पाचव्या गृहीतकावर गाऊस विचार करतोय हे या बार्टकसनंच लोबॅचेव्हस्कीला सांगितलं.


यामुळेच याविषयीचा किडा लोबॅचेव्हस्कीच्या डोक्यात वळवळायला लागला आणि त्यानं यावर सखोल विचार करायला सुरुवात केली.यानंतर त्यानं युक्लिडचं पाचवं (सेल्फ कन्सिस्टंट) अशी नॉन-युक्लिडियन जॉमेट्री रचली.सर्वसाधारणपणे ज्या वयात मुलं पदवी शिक्षणाला सुरुवात करतात त्या वयात लोबॅचेव्हस्की चक्क एम.ए. झाला. 


पण त्याच्या बेशिस्त आणि बेमुर्वतखोर वागण्याला कंटाळून जाऊन विद्यापीठानं त्याला पदवीच दिली नाही.लोबॅचेव्हस्कीनं आपल्या दुर्वर्तनाबद्दल माफी मागितली तेव्हा कुठे त्याला पदवी देण्याचा पुनर्विचार करण्यात आला.लोबॅचेव्हस्कीला विद्यापीठानं शिष्यवृत्ती दिली होती.त्यामुळे ती वाया घालवणंही शक्य नव्हतं.या सर्वांवर विद्यापीठाने एक वेगळाच पण भन्नाट असा निर्णय घेतला.त्यांना वाटलं या कुशाग्र बुद्धीच्या मुलाला वर्गात बसवून खोडकरपणा करायला वाव देण्याऐवजी त्याला प्राध्यापकच करावं,म्हणजे त्याचा वात्रटपणा कमी होऊन त्याच्या बुद्धीचा फायदाही सगळ्यांना होईल.अशा प्रकारे लोबॅचेव्हस्की वयाच्या चक्क अठराव्या वर्षी कझान विद्यापीठात प्राध्यापक बनला.आणि आश्चर्य म्हणजे जबाबदारी अंगावर पडताच लोबॅचेव्हस्कीनं आपला व्रात्यपणा सोडून देऊन अतिशय उत्कृष्टपणे काम करायला सुरुवात केली.


लोबॅचेव्हस्कीचा विद्यापीठाबरोबरचा करार सहाच वर्षांचा असला,तरी त्यानं तिथे पुढे तब्बल २२ वर्ष काम केलं! त्याची कार्यक्षमता अफाट होती.पुढे त्यानं चांगला प्रशासक म्हणूनही नाव कमावलं.१८१९ ते १८२५ या सहा वर्षात लोबॅचेव्हस्कीनं अक्षरशः ढोर मेहनत केली.वयाच्या फक्त एकविसाव्या वर्षी त्यानं कझान परिसरातल्या सगळ्या प्राथमिक,माध्यमिक शाळा आणि विद्यापीठं यांच्या आर्थिक आघाडीवरही काम केलं आणि तिथल्या मुलांची नोंद करण्याचं काम एकट्या लोबॅचेव्हस्कीनं केलं.याशिवाय लोबॅचेव्हस्कीला मुलांच्या एकंदरीत प्रगतीविषयी रिपोर्ट पाठवावे लागत.यात बहुतांशी मुलांची राजकीय मतं काय आहेत हे लोबॅचेव्हस्कीला लिहन पाठवावं लागे. वयाच्या अड्डठ्ठाविसाव्या वर्षी विद्यापीठातल्या सगळ्या वर्गांना तो गणित आणि भौतिकशास्त्र शिकवत असे. एवढं सगळं कमीच होतं म्हणून की काय पण ग्रंथपाल म्हणूनही तोच काम करे.त्यापूर्वी विद्यापीठाचं ग्रंथालय अतिशय अव्यवस्थित होतं.त्यातली पुस्तकं नीट लावण्याचं कामही लोबॅचेव्हस्कीनं एकट्यानं कोणाचीही मदत न घेता केले.एकदा एक माणूस त्याचं ग्रंथालय बघण्यासाठी आला असताना त्या वेळी लोबॅचेव्हस्की पुस्तक लावण्यात मग्न होता. त्याचे केस विस्कटलेले होते.त्याचा हा अवतार बघून त्या माणसाला लोबँचेव्हस्की ग्रंथालयातला नोकर असावा असं वाटलं.त्यामुळे त्यानं लोबॅचेव्हस्कीला चांगलं काम केल्याबद्दल बक्षिसीही दिली! कहर म्हणजे लोबॅचेव्हस्कीनं ती स्वीकारलीही। (गणिती- गणिताची आवड निर्माण करणारे एक रसिली सफर,अच्युत गोडबोले,डॉ.माधवी ठाकूरदेसाई, मनोविकास प्रकाशन)


लोबँचेव्हस्कीनं ग्रंथालयाबरोबरच विद्यापीठाचं अतिशय अस्ताव्यस्त असलेलं म्युझियमही नीट लावायला घेतलं. 


ग्रंथपालाबरोबर तो म्युझियमचा क्युरेटरही झाला.१८२५ साली झार अलेक्झांडरचा मृत्यू झाल्यावर सरकारनं नवा क्युरेटर नेमला आणि लोबॅचेव्हस्कीची म्युझियमच्या कामातून सुटका झाली.लोबॅचेव्हस्कीच्या विद्यापीठात राजकारण मात्र बरंच चालत असे.त्याला कंटाळून बरेचसे जर्मन प्राध्यापक विद्यापीठ सोडून गेले.त्यामुळे लोबॅचेव्हस्कीवर खूप जबाबदाऱ्या पडल्या. त्यानं त्याही चांगल्या प्रकारे निभावल्या. त्यामुळे अगदी लहान वयातच लोबॅचेव्हस्की विद्यापीठाचा मुख्य संचालक बनला.या पदाबरोबर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव लोबॅचेव्हस्कीला होती.त्यानं मन लावून काम केलं.त्याच्या कारकिर्दीत विद्यापीठ वाढलं, समृद्ध झालं आणि भरभराटीला आलं.


लोबॅचेव्हस्कीचं आपल्या विद्यापीठावर एवढं प्रेम होतं,की ज्या वेळी सरकारनं विद्यापीठाचं नूतनीकरण करायचं ठरवलं त्या वेळी लोबॅचेव्हस्कीनं स्वतः आर्किटेक्चर शिकून घेतलं आणि सगळ्या इमारतींचा आराखडा स्वतः तयार केला.त्यानं या इमारती नंतर इतक्या सुंदर बनवल्या की त्या सरकारी इमारती वाटूच नयेत ! लोबॅचेव्हस्कीनं स्वतः जातीनं लक्ष घातल्यामुळे या इमारतींना लागणारा खर्चही कमी झाला.लोबॅचेव्हस्की उत्कृष्ट व्यवस्थापक होता.१८६० मध्ये युरोपमध्ये कॉलऱ्याची साथ पसरली.सगळीकडे माणसं पटापट मरायला लागली.त्याबरोबर लोबॅचेव्हस्कीनं आपल्या विद्यापीठात आणि शहरात बाहेरच्या इतर माणसांना यायला बंदी केली. त्या काळी पुस्तकावरच्या बाइंडिंगमुळे कॉलरा पसरतो असा एक समज सर्वत्र पसरला होता.त्यामुळे त्यानं बाइंडिंग नसलेली हस्तलिखित पुस्तकं मागवली. कझान विद्यापीठाच्या वाचनालयात ती पुस्तकही निर्जंतुक केली जात असत.या सगळ्यांमुळे यूरोपभर,रशियात सगळीकडे कॉलरा पसरत असतानाही विद्यापीठ त्यातून वाचवलं.लोबॅचेव्हस्की अफाट काम करे.तो कधीही थकत नसे.


विद्यापीठातर्फे तो एक रिसर्च जर्नलही प्रकाशित करत असे.त्याचं नाव 'कझान मेसेंजर' असं होतं.युक्लिडच्या भूमितीला शह देणारी भूमिती त्यानं याच कझान मेसेंजरमध्ये १८२३-२४ मध्ये प्रकाशित केली.लोबॅचेव्हस्कीनं एक वेधशाळाही उभारली होती.एक व्लोबचेव्हस्कीकडे चांगली गुणग्राहकता होती.एकदा एका दुकानात काम करणारा माणूस गणिताचं पुस्तक वाचताना त्यानं बघितला.गणितावर प्रेम करणाऱ्या माणसाचं आयुष्य अस दुकानात काम करून फुकट जाऊ नये म्हणून त्यानं लगेच त्याला विद्यापीठात घेतलं.पुढे शिकून हा मुलगा भौतिकशास्त्राचा प्राध्यापक झाला. 


मजुरांसाठी गणिताचे वर्ग घेण्याची कल्पना लोबॅचेव्हस्कीच्याच डोक्यातून आली.


ज्या मुलाला वात्रटपणाबद्दल विद्यापीठातून काढून टाकणार होते,त्याच मुलानं विद्यापीठाची एवढी भरभराट केली हे बघून संस्थाचालक अचंबित झाले! लोबॅचेव्हस्कीनं संस्थेच्या विकासासाची स्वतःला वाहून घेतल्यामुळे त्याला पुढे गणितावर संशोधन करायला वेळच मिळाला नाही.त्यानं लग्नही चाळिसाव्या वर्षी केलं.


दुर्दैवानं १८४२ च्या सुमारास विद्यापीठाला आग लागली.त्यात त्याला अभिमान वाटणाऱ्या सगळ्या इमारती जळाल्या. इतकंच नाही तर त्याची अत्यंत आवडती वेधशाळाही जळून राख झाली.पण लोबॅचेव्हस्कीचा आशावाद एवढा दुर्दम्य होता की दोन वर्षांत त्यानं विद्यापीठ पुन्हा पहिल्यासारखं उभं केलं आणि आगीचं कुठे नामोनिशाणही राहिलं नाही.याच वर्षी गाऊसमुळे लोबॅचेव्हस्कीची रॉयल सोसायटी ऑफ गॉटिंजेन इथे त्याच्या नॉन-युक्लिडियन जॉमेट्रीवरच्या कामामुळे फॉरेन करस्पाँडंट म्हणून नेमणूक झाली.अतिशय व्यस्त असून आणि प्रशासकीय आणि शिकवण्याच्या कामाचं जबरदस्त ओझं स्वतःच्या डोक्यावर असूनही गणिताच्याच नाही तर माणसाच्याच इतिहासात मैलाचा दगड ठरेल अशी भूमिती लोबॅचेव्हस्कीनं शोधली हे विशेष !


लोबॅचेव्हस्कीचं हे छाती दडपून टाकणारं काम बघून त्याला सरकारकडून वाहवा मिळाली असेल किंवा त्याच्यावर बक्षिसांची खैरात झाली असेल असं कोणालाही वाटेल. पण लोबॅचेव्हस्कीला या सगळ्या कामाचा मोबदला म्हणून सरकारकडून 'त्याची सेवा आता नकोय' असं पत्र मिळालं.याचं कोणतंही कारण त्याला सरकारकडून सांगितलं गेलं नाही.


लोबॅचेव्हस्कीसारखा माणूस मिळणार नाही,त्याला काढू नका, असं त्याच्या सहकाऱ्यांनी पदोपदी सांगूनसुद्धा लोबॅचेव्हस्कीला घरी बसवलं गेलं.हा अपमान आणि ही वंचना सहन करणं लोबॅचेव्हस्कीच्या ताकदीपलीकडचं होतं. लोबॅचेव्हस्की त्यामुळे पूर्णपणे खचून गेला. ज्या संस्थेसाठी आपण आयुष्य वेचलं त्याच संस्थेपासून आपल्याला दूर राहावं लागणं ही कल्पनाच सहन करणं त्याला शक्य झालं नाही.


सेवामुक्तीनंतर लोबॅचेव्हस्कीला विद्यापीठात फार फार तर गणिताचा अभ्यास करण्याची मुभा मिळाली.यानंतर त्याच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू झाली.हळूहळू त्याची दृष्टी अधू होत गेली.१८५५ साली कझान विद्यापीठानं सुवर्णजयंती साजरी केली.त्या वेळी झालेल्या समारंभात लोबॅचेव्हस्कीनं पँजिओमेट्री नावाचं आपलं संपूर्ण गणितावरचं एक पुस्तक सादर केलं. या वेळेपर्यंत तो पूर्णपणे आंधळा झाला होता.हे पुस्तक त्यानं दुसऱ्याकरवी लिहून घेतलं होतं.


पुढील शिल्लक राहिलेला भाग…३०.०८.२४ या दिवशीच्या लेखामध्ये…


वाचणीय नोंद:-अगदी अलीकडच्या काही वर्षांपर्यंत हुक्केरी हे एक मोठं शहर होतं. त्याच्या अंतर्गत अनेक छोटी शहरं होती.इथला महसूलही मोठा होता. शिवाय इतरही अनेक फायदे होते.इथल्या सुभेदाराला खूप सोयीसुविधा होत्या इथं. इथं सुभेदार म्हणून विजापूरच्या आदिलशहानं रूस्तुम इ जमानला नामजद केलं होतं.या भागात शिवाजीराजांच्या कुरबुरी वाढल्या होत्या. इथले काही प्रदेशही त्यांनी ताब्यात घेतले होते. अंगी असणारं धाडस आणि ते योजत असलेल्या नव नव्या युक्त्या यामुळं त्यांना सतत यश मिळत होतं.अनेक युक्त्या

प्रयुक्त्या करून ते शत्रूला बरोबर अडचणीत आणत असत.कधी गनिमीकाव्यानं तर कधी अगदी समोरासमोर हल्ला करत असत.प्रसंगी दोन पावलं मागंही जात असत.

ते आपल्या सैन्याला खूप जपत असेत विनाकारण त्यांचे प्राण संकटात टाकत नसे.कधी धूर्तपणाची खेळी करून तर कधी समोरच्या सरदाराला एखादं मोठं अमिष दाखवून ते आपला डाव साधत असत.त्यांची प्रत्येक चाल अगदी आश्चर्यकारक अशीच असे.रूस्तुम इ जमान मोठ्या सैन्यासह चालून येत असल्याच्या खबरा शिवाजीराजांना अगोदरच लागल्या होत्या.तरीही तो राज्याच्या सीमेपर्यंत येईतोवर त्यानी कोणतीही हालचाल केली नव्हती.त्याला अगदी सहज येऊ दिलं होतं. त्याच्या सैन्याला अन्न,पाणी,

घोड्यांना चारा कसलीही रसद मिळणार नाही अशा ठिकाणापर्यंत येऊ द्यायचं त्याचं धोरण होतं. अशी रसद त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही याची दक्षता शिवाजी

राजांनी घेतली होती.जेव्हा आपल्या सैन्यासह रूस्तुम इ जमान अगदी जवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी आपला एक सरदार त्याच्याकडे पाठवला.या सरदारावर शिवाजीराजापाची कामगिरी सोपविली होती आणि तो रुस्तुम इ जमानचा मित्र होता.हा सरदार स्वराज्यात येण्यापूर्वी विजापूरच्या दरबारातच होता.त्याच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे त्याला तिथून हाकलून लावण्यात व्याल होत.नंतर तो शिवाजीराजांच्या आश्रयाला आला होता.हा सरदार अतिशय हुशार होता, चाणाक्ष होता.अशा वाटाघाटी करण्यात त्याचा हातखंडा होता.समोरच्याला तो आपल्याला हवा तसा निर्णय घ्यायला भाग पाडत असे असा त्याचा लौकिक होता.शत्रूला बोलतं करण्यात कुणीही त्याचा हात धरू शकत नव्हता. याला त्याच्यावर सोपविलेले काम नीट समजावून देत शिवाजीराजांनी शत्रुच्या गोटात पाठवून दिले. रूस्तुम इ जमाननं त्याचं अगदी प्रेमानं आगत स्वागत केलं.त्या दोघांत बराच वेळ बोलणीही झाली.शिवाजीराजांच्या सरदारानं आपल्याला हवं ते त्याच्या गळी उतरवलं.सद्यःस्थितीत शिवाजी

राजांवर विजय मिळवणं अतिशय कठीण आहे याचं भान ठेवून रूस्तुम इ जमाननं त्याच्याकडून आलेली ३०००० पॅगोडा ची भलीभक्कम रक्कम भेट म्हणून स्वीकारली आणि आपलं सैन्य मागं घेतलं.खरं तर अतिशय चातुर्यानं हा निर्णय घ्यायला त्याला भाग पाडण्यात आलं होतं. (५ मे १६६० च्या एका डच पत्रानुसार आपलं सैन्य मागं घेण्यासाठी रूस्तुमजमाननं शिवाजीराजांकडून ४०००० पॅगोडाची लाच घेतल्याचा उल्लेख आहे.) परंतु ही गोष्ट विजापूरच्या अदिलशहापासून फार दिवस लपून राहिली नाही.त्यानं रूस्तुम इ जमानला विजापुरच्या दरबारात बोलावून घेतलं आणि त्याचा शिरच्छेद केला.या सगळ्या घडामोडीत रूस्तुम इ जमानच्या मुलाचा हात नसल्याची खात्री पटल्यावर अदिलशहाने हुक्केरीचा सरदार म्हणून त्याची नियुक्ती केली. पण त्याच्या अधिकारावर मात्र मर्यादा घालण्यात आली रूस्तुम इ जमानकडे असणारे महसूल वसुलीचे आणि इतर महत्त्वाचे अधिकार बादशहानं काढून घेतले होते.यानंतर त्यानं दुसरा एक सरदार मोठ्या सैन्यासह शिवाजीराजांवर पाठवून दिला.शिवाजीशी लढाई करण्यासाठी त्याला सर्व त्या सुविधा पुरविल्या होत्या.


वाचता.. वाचता.. वेचलेले !!

२६/८/२४

सावधगिरीचा धडा - A lesson of caution !

जे शिकारी मोठ्या जनावरांच्या शिकारीमधल्या त्यांच्या अपयशाचं खापर नशीबावर फोडतात त्यांच्याशी मी अजिबात सहमत नाही.आपण नेहमी एक गोष्ट विसरतो की श्रवणशक्ती आणि नजर याबाबतीत वन्यपशू माणसापेक्षा कैकपटींनी वरचढ आहेत,त्यातही जे वन्यपशू अन्न व संरक्षण या बाबतीत ह्या दोन गोष्टींवर अवलंबून असतात ते जास्तच ! आपण त्यांच्या हालचाली पाहू किंवा ऐकू शकत नाही याचा आपण असा अर्थ घेतो की त्यांनीही आपल्याला ऐकलेलं किंवा पाहिलेलं नाही.

त्यांच्या या क्षमतेला कमी लेखणे आणि हालचाल तसेच आवाज न करता काही काळ सुद्धा बसता न येणे ही कारणं या अपयशांना जबाबदार असतात.या त्यांच्या क्षमतेचं एक उदाहरण म्हणून आणि त्यासाठी किती काळजी घेणं आवश्यक आहे हे समजावं म्हणून मी माझा अगदी अलीकडचा एक अनुभव तुम्हाला सांगणार आहे.


मार्चचा महिना होता.जमीनीवर पडलेल्या वाळलेल्या पानांच्या आच्छादनावर एखादं पान पडल्याचा आवाज सुद्धा मोठा येत होता अशा वेळी जंगलाच्या एका विशिष्ट भागात मला एका वाघाचा सुगावा लागला.या वाघाचे फोटोग्राफ मला फार दिवसांपासून घ्यायची इच्छा होती.

लंगूरच्या एका कळपाला वाघ पडून राह्यला होता त्या जागेकडे जायला भाग पाडून मला त्या वाघाची जागाही बरोबर समजली होती.वाघापासून साधारण सत्तर यार्डावर एक हिरवळीचा तुकडा होता.हा तुकडा पन्नास यार्ड लांब व तीस यार्ड रुंद होता.या तुकड्याच्या कडेलाच पण वाघाच्या विरुद्ध बाजूला एक मोठं झाड होतं व त्यावर काही वेली चढून अगदी शेंड्यापर्यंत गेल्या होत्या.

जमीनीपासून वीस फूटांवर खोडाला दोन फांद्या फुटल्या होत्या. त्या वाघाने सकाळीच एक सांबर मारलं होतं आणि ते सांबर व त्याची आताची जागा याच्या मध्येच तो हिरवळीचा तुकडा असल्याने तो वाघ दुपारी ती हिरवळ ओलांडणार हे मला नक्की माहीत होतं. भक्ष्याच्या जवळपास दुपारभर पडून राहण्यासारखी दाट झाडी नव्हती व त्यामुळे तो हिरवळ ओलांडून तिकडच्या झुडुपांमध्ये सावलीसाठी गेला होता.याच ठिकाणी मी त्याला लंगूरच्या साहाय्याने शोधून काढलं होतं.वाघ बिबळ्यांसारख्या मांसभक्षी प्राण्याची शिकार किंवा फोटोग्राफी करायची असेल तर त्यांची जागा बरोबर माहीत असणं आवश्यक असतं आणि यासाठी उत्तम मार्ग म्हणजे पक्षी व प्राण्यांची मदत घेणे.जर संयम असेल आणि जंगलवासींच्या सवयीचं ज्ञान असेल तर त्या प्राण्याला किंवा पक्ष्यांना आपण आपल्याला पाहिजे त्या दिशेला जायला भाग पाडू शकतो.यासाठी योग्य असे पक्षी म्हणजे रानकोंबडे,मोर,व्हाईट कॅप्ड बॅब्लर्स (सातभाईंची एक जात, मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे,आरती प्रकाशन)

आणि प्राण्यांमध्ये भेकर किंवा लंगूर.


अतिशय काळजीपूर्वक दबकत दबकत मी झाडापर्यंत गेलो.खालून वर गेलेल्या वेलींची टोकं वाघ जिथे होता तिथून दिसू शकत होती त्यामुळे वेलींना अजिबात धक्का न लावता मी फांद्या फुटल्या होत्या तिथपर्यंत चढलो.या ठिकाणी मला बसायला बऱ्यापैकी जागाही होती व चांगलं लपणही होतं.

आता मी माझा १६ एमएमचा कॅमेरा काढला व समोरच्या पानोळ्यामधे जरा फट तयार करून अजिबात आवाज न करता बसून राह्यलो.मला त्या फटीतून फक्त समोरची हिरवळ आणि त्याच्या पलीकडच्या जंगलाचा थोडा भाग दिसत होता.

जवळजवळ तासाभरानंतर ब्रॉन्झविंग्ड डोव्हजची एक जोडी त्या जंगलातून अचानक वर उडाली व पंख फडफडवत झुडुपांवरून निघून गेली आणि त्यानंतर मिनिटा दोन मिनिटांनी मगाच्या जागेपासून काही अंतर माझ्या दिशेला अपलँड पिपिट्सचा छोटा थवा जमीनीवरून उडाला,एका निष्पर्ण झाडाच्या फांद्यावर इकडून तिकडे उड्या मारत शेंड्यावर गेला व नंतर तिथून दूर उडून गेला.


या दोन्ही पक्ष्यांना स्वतःचा विशिष्ट असा अलार्म कॉल नाही,पण त्यांच्या वागणुकीवरून सहज कळत होतं की वाघाने झोपण्याची जागा सोडली आहे.मी माझी नजर सावकाश डावीकडून उजवीकडे फिरवायला सुरुवात केली तेव्हा ती एका छोट्या पांढऱ्या वस्तूवर स्थिर झाली.हिरवळीपासून दहा फुटांवर असलेली ती वस्तू एखाद दुसरा चौरस इंच एवढी असेल.यानंतर मी दृष्टीक्षेत्राच्या अगदी उजव्या कडेपर्यंत नजर फिरवली व परत त्या पांढऱ्या वस्तूवर स्थिर केली.काही सेकंदापूर्वी ती वस्तू ज्या ठिकाणी होती तिथे ती आता नाही हे माझ्या लक्षात आलं... वाघाच्या चेहऱ्यावरच्या पांढऱ्या खुणेशिवाय ते दुसरं काही असूच शकत नव्हतं.नक्कीच... मी झाडाकडे येत असताना किंवा चढत असताना मला वाघाने पाहिलं असणार.मी पातळ रबरी सोलचे बूट घातले होते आणि माझ्या परीने अजिबात आवाज न करण्याचा प्रयत्न केला होता.तरीही जेव्हा त्याची भक्ष्याकडे जाण्याची वेळ झाली तेव्हा त्याने दबकत जवळ येऊन त्याला संशय होता त्या जागेचं परत निरीक्षण केलं होतं व त्या संशयाचं मूळ शोधत होता.त्याच स्थितीत अर्धा तास थांबल्यावर तो उठला.हातपाय ताणले,जांभई दिली आणि आता भीती नाही याची खात्री झाल्यानंतर हिरवळीकडे चालत आला.

इथे तो उभा राह्यला,एकदा उजवीकडे तर एकदा डावीकडे तोंड करून त्याने नीट निरीक्षण केलं आणि सावकाशपणे हिरवळ ओलांडायला सुरुवात केली.माझ्याबरोबर खालून तो त्याच्या भक्ष्याकडे गेला.


जंगलात भटकंती करताना मला जेव्हा शिकाऱ्यांनी मचाणं बांधण्यासाठी तोडलेले वासे,नीट दिसावं म्हणून तोडलेल्या फांद्या,खालचा पालापाचोळा दिसावा आणि हे सर्व करताना किती आवाज झाला असेल याचा मनात विचार येतो तेव्हा कळतं की इतक्या वेळा मचाणांवर रात्री जागून त्यांना अपयश का येतं ! आम्हाला आजपर्यंत नरभक्षक बिबळ्याला मारण्यात आलेलं अपयश मात्र नको त्या गोष्टी केल्याने किंवा काही करायचं राहून गेल्यामुळे आलं नव्हतं,तर खरोखरच ते नशीबाचे खेळ होते.माझ्यासाठी पाठवलेला शूटींग लाईट वेळेवर न पोचणे,इबॉटसनच्या पायाला मोक्याच्या क्षणी पेटके येणे,बिबळ्याने सायनाईडचा ओव्हरडोस घेणे आणि आता यावेळेला आमच्या माणसांकडून जिन ट्रॅप खाली पडून त्याचा दात तुटणे याला दुसरं काय म्हणणार?तरीही इबॉटसन पौरीला निघून गेल्यावरही माझ्या आशा शाबूत होत्या कारण आता मला माझ्या शत्रूच्या क्षमतांचा बरोबर अंदाज आला होता.


एक गोष्ट मात्र मला राहून राहून अस्वस्थ करत होती ते म्हणजे ब्रिज बंद करून त्या बिबळ्याला नदीच्या एकाच बाजूला स्थानबद्ध करणे.कोणत्याही दृष्टीकोनातून बघितलं तरी असं करणं म्हणजे डाव्या तीरावरच्या माणसांना नरभक्षकाच्या तोंडी देण्यासारखं व उजव्या तीरावरच्या माणसांना मात्र सुरक्षित ठेवण्यासारखं होतं.


यावेळी आम्ही रुद्रप्रयागला येण्याच्या अगोदर बळी गेलेल्या मुलाला धरून गेल्या काही दिवसांत डाव्या तीरावरच्या तीन लोकांनी आपला जीव गमावला होता व याहीपुढे अशी शक्यता होतीच.तरीही दोन ब्रिज मोकळे करून बिबळ्याला उजव्या तीरावर यायची परवानगी देणे म्हणजे अगोदरच डोंगराएवढ्या असलेल्या आमच्या अडचणींमध्ये दुपटीने भर टाकण्यासारखंच होतं आणि त्याचा फायदा काहीच होणार नव्हता.बळी कुठेही जावो पण दोन्हीकडच्या माणसांच्या आयुष्याचं मोल सारखंच होतं त्यामुळे शेवटी मन घट्ट करून मी ब्रिज बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला.इथे मला डाव्या तीरावरच्या शूर पहाडी माणसांचं कौतुक करावंसं वाटतं.ब्रिज बंद केल्या नंतरचे परिणाम माहीत असून देखील कोणीही त्याचा निषेध केला नाही किंवा ब्रिज मोकळे करण्याची साधी विनंतीही केली नाही.


एकदा दोन्ही पूल बंद केल्यावर मी आसपासच्या सर्व गावांमध्ये धोक्याची व खबरदारीची सूचना देण्यासाठी एक माणूस पाठवला व स्वतःही जितकी पायपीट शक्य होईल तेवढी केली.प्रत्येक ठिकाणी मला पहाडी पाहुणचाराचा अनुभव आला. नरभक्षकाचा पुढचा बळी त्यांच्यापैकीच एखाद्याचा असणार होता याची जाणीव असून देखील त्यांची श्रद्धा अढळ होती की नरभक्षक काल मेला नाही म्हणून काय झालं? तो आज नाहीतर उद्या तरी खतम् होणारच.


२४/८/२४

सर तुम्ही मेल्यावर / Sir when you die

"ती"... पूर्वी मागून खायची... 


आता "तीला" एका मेडिकल कॉलेजमध्ये स्वच्छता कामगार म्हणून काम मिळवून दिले आहे.तीच्या मुलाला "आपण" दत्तक घेतलं आहे, सर्व शैक्षणिक खर्च गेल्या चार वर्षांपासून "आपणच" करत आहात. (मी नाही...!) कामावर जाताना आज बुधवारी सकाळी ती  चुकुन भेटली. 


पर्वती पासून सदाशिव पेठेपर्यंत ती चालत जायची, घरातलं सगळं आवरून जाताना कामाला उशीर व्हायचा,केवळ या कारणासाठी तिला काढायला नको,म्हणून "आपण" तिला नवीन सायकल सुद्धा घेऊन दिली आहे. 


मला रस्त्यावर भिक्षेकर्‍यांमध्ये बसलेला बघून ती सायकल थांबवून घाई घाईने माझ्याजवळ आली,

म्हणाली; 'सर राकी बांदायची होती, पन कामावर खाडा झाला आसता... म्हनून मी रकशा बंदनाला यीवू शकले न्हायी... स्वारी सर...! तिच्या नजरेत अजीजी होती. 


मी म्हटलं हरकत नाही;भाऊ बहिणीच्या नात्याला औचित्य किंवा मुहूर्त लागत नाही.... आत्ता बांद राकी...! मी आनलीच न्हायी की वो सर,मला काय म्हाईत तूमी आता भेटताल म्हनून ...'  ती पुन्हा खजील झाली.मी सुद्धा इकडे तिकडे पाहिलं... माझ्याकडे ड्रेसिंग चे सामान होतं, त्यातली चिकटपट्टी घेऊन तिला म्हटलं, 'हि घे चिकटपट्टी आणि बांद मला "राकी"...' 


'या बया...  म्हणत, तोंडाला ओढणी लावत, तीनं मला हसत हसत "राकी" बांदली...' 


यानंतर मी खिसा चाचपला.... हातात येईल ती नोट तिला ओवाळणी म्हणून टाकली....! 


तीने ती नोट निरखून पाहिली....  कपाळाला लावली आणि परत माझ्या खिशात ठेवत म्हणाली,  'सर मला ववाळणी नको,माज्या पोराला साळंचा डीरेस घ्या... '


'म्हणजे ? मी नाही समजलो... ?'


ती म्हणाली, 'सर आवो तुमि साळेची फी भरली... वह्या पुस्तकं घ्येतली, समदं  केलं पन त्याला साळेचा डीरेस घ्यायला इसरले तुमि... ' बोलू का नको ?  सांगू का नको ? सांगितलं तर यांना राग येईल का ? या अविर्भावात चाचरत ती बोलली...! 


मला माझी चूक लक्षात आली... शाळेची फी भरली... वह्या पुस्तकं घेतली... सॉक्स आणि बुट घेतले....  मग युनिफॉर्म कोण घेणार ? 


याचा युनिफॉर्म घ्यायचा कसा काय राहिला माझ्याकडून ? मी मनाशी विचार करत राहिलो... 'मग आधी का नाही माझ्या लक्षात आणून दिलंस ?'  मी जरा वैतागून बोललो. 


'आवो सर आदीच ह्येवढं करता आमच्यासाटी,त्यात आजून किती तरास द्येयचा,आसं वाटलं म्हनुन न्हायी बोलले आदी...'


तिच्या या वाक्यानं मी खरं तर सुखावलो...


कुणाच्या करण्याची काही "किंमत" समजली तरच "मूल्य" समजते ! 


खर्च झाल्याचं दुःख नसतंच,हिशोब लागला पाहिजे...! 'बया, कुटं हरवले तुमी...?' माझे खांदे हलवत तीने विचारलं... 


मी भानावर आलो...


'साळेचा डीरेस नसंल तर झेंडावंदलाला येऊ नगोस म्हणून त्याला साळेत सांगितलं हुतं सर... आनी म्हनून त्यो गेला पन न्हाय सर झेंडावंदलाला.... !'  


'साळेचा डीरेस नव्हता,म्हनुन त्याला वर्गाच्या भायर पन हुबं केलं सर... म्हनुन मंग आज तुमाला बोलले सर...' लहान मुलीने आपल्या वडिलांना काही तक्रार करावी,या स्वरात ती बोलत होती... ! 


युनीफॉर्म नव्हता म्हणून झेंडावंदन करू दिले नाही... ? देशभक्ती युनिफॉर्मवर ठरते का?? 


या विषयावर खूप काही लिहायचं आहे, पण पुन्हा कधीतरी... ! माझ्या चेहऱ्यावरचे भाव कदाचित बदलले असावेत.... हे भाव बघून ती म्हणाली....


'जावू द्या सर मी बगते... डीरेसचं काय तरी..'


तीच्या या वाक्याने मी भानावर आलो...


मी म्हणालो, ' आता आणखी काही बगु नकोस....  घरी जाऊन पोराला घे आणि शाळेचा डीरेस घे .... कामावर आजचा खाडा पडला तर पडू दे... त्याचे पैशे मी देईन तुला... !'


ती चटकन उठली.... 


'मला ववाळणी नगो .... पण माज्या पोराला शिकू द्या.... त्येला शाळेचा डीरेस घ्या... त्येला झेंडावंदनाला जाऊ द्या ' हे म्हणणाऱ्या अशिक्षित परंतु सुसंस्कारित माऊली मध्ये मला खरी "भारतमाता" दिसली.. ! 


मला ववाळणी नगो .... पण माज्या पोराला शिकू द्या.... त्येला शाळेचा डीरेस घ्या... या दोनच वाक्यात मला माझी "जीत" झाल्यासारखं वाटतं....


कारण लहान मुलांना दिवसाला साधारण एक हजार रुपये भीक मिळते,म्हणजे महिन्याभरात तीस हजार रुपये...! शिका रे,म्हणणाऱ्या मला मग कोणते पालक भीक घालतील... ?


तरीही यांच्याशी झालेल्या नात्यांच्या जीवावर मुलं दत्तक घेतो आहे आणि त्यांना शिकवतो आहे...


असो, तर आजच दुपारी शाळेचा "डीरेस" विकत घिवून ती आली आणि म्हणाली, 'सर किती करताल ओ माज्यासाटी...मी लय त्रास देती तुमाला.... स्वारी सर.... !' 


काय बोलू मी यावर.... ? 


मी तिला म्हणालो, 'माझ्या मूर्खपणामुळे १५ जुलै च्या अगोदर त्याला युनिफॉर्म घ्यायचं मला सुचलं नाही.... आणि त्यामुळे तो झेंडावंदनाला हजर राहू शकला नाही... वर्गातून त्याला बाहेर राहावं लागलं.... 


त्याबद्दल आज मीच,तुझी आणि त्याची माफी मागतो गं माऊली,  "स्वारी गं...!!! 


'बया...  तुमि नगा स्वारी म्हणू सर....' असं म्हणत, डोळ्यातून पाणी काढत, तीनं माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं...मी पोराकडे पाहिलं... नवीन कपड्याचे तीन जोड पाहून पोरगं "हरखून टूम्म" झालं होतं...


 इस्त्री केलेल्या कपड्याचा एक जोड त्याने अंगावर घातला होता.... 


मी इंटरनॅशनल संस्थेत काम करताना असेच मस्त कडक इस्त्रीचे कपडे घालायचो... मला माझीच आठवण झाली.... आता मी नाही असे इस्त्री चे कपडे घालत, इच्छाच होत नाही... पण, मला त्याच्यामध्ये अभिजीत दिसला...! 


पूर्वी तो आईबरोबर याचना करायचा... आज तो इस्त्री चे कपडे घालून शाळेत जाईल...


मी त्याला सहज गमतीने विचारलं,'बाळा शिकून पुढे मोठा होऊन काय करशील ?'


तो म्हणाला सर,'मला डॉक्टर व्हायचं आहे. ...'


मी म्हटलं,'बाळा, डॉक्टर होऊन काय करशील पण ?'


तो निरागसपणे हसला आणि म्हणाला,

"सर तुम्ही मेल्यावर मी डॉक्टर होऊन, भिकाऱ्यांची सेवा करीन....!!!


बुधवार २१ ऑगस्ट २०२४


"कापडी पिशवी प्रकल्प - अर्थात "आजीबाईचा बटवा..!!!"


हुश्श्श.... ! 


चालू झाला एकदाचा कापडी पिशवी प्रकल्प...!!! खूपदा सांगितलं आहे तरीही पुन्हा सांगतो....

रस्त्यावरील लोकांना भीक देणाऱ्या माझ्या भाऊ आणि बहिणींनो....  मी आपल्या पायावर डोकं टेकवून सांगतो, की लोकांना भीक देऊ नका... ! 


यांना आपण कामाला लावू.... तुमच्याकडे काही काम असेल तर यांना द्या...! काही काम नसेल तरी हरकत नाही पण, यांना भीक नका देऊ... दोन पाच रुपयात पुण्य विकत मिळत नाही...!!! 


मी यांना शासकीय नोकरी देण्याचा प्रयत्न करतोय परंतु,शासनाच्या कोणत्याही योजनांमध्ये काही कागदपत्रे नसल्यामुळे हे लोक बसत नाहीत... समाजातील अनेक लोक यांच्यासाठी मला नोकऱ्यांची ऑफर देतात,परंतु माझ्या लोकांकडे ते कौशल्य नाही किंवा शारीरिक क्षमता नाही... 


आणि म्हणून,कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त मोबदला देणारा कोणता व्यवसाय आपण या लोकांना देऊ शकू ? याचा विचार मी रोज करत असतो... ! 


असो...


समाजाने गोरगरिबांना वाटण्यासाठी दिलेल्या साड्यांचा ढीग माझ्या घरात आहे. या साड्यांची बोचक्यावर बोचकी बांधून मी घरात ठेवली आहेत. 


चालताना चुकून एखाद्या बोचक्याला माझा धक्का लागतो... मी धड;पडत नाही... परंतु पुढे जाऊन कुठेतरी धडपडतो.... घरातल्या एखाद्या वस्तूला माझा हात लागतो.... ती वस्तू खाली पडते... आणि प्रकट दिन असल्याप्रमाणे घरातली गृहलक्ष्मी न जाणो कुठून तरी प्रकट होते... हातात लाटणे आणि चेहऱ्यावर रुद्रावतार...! 


यानंतर ती माऊली, काम वाढवलं म्हणून, पुढचे दोन तास मंजुळ स्वरात माझ्या घराण्याचा उद्धार करणार,

हे मला माहीत असतं आणि म्हणून मी,समस्त नवरे जातीचा मान राखून,आपण जन्मजात बहिरे आहोत असं दाखवून,गुपचूप घराबाहेर पडतो आणि भीक मागणाऱ्या लोकांमध्ये फिल्डवर जातो...!  


असाच एके दिवशी,फिल्डवर गेलो असता,एका भिक मागणाऱ्या ताईने मला शिलाई मशीन घेऊन द्याल का असं विचारलं ? 


कान टवकारुन,मी तिला म्हणालो,' बाई, काय करशील गं तू मशीन घेऊन दिल्यानंतर ?' 


ती म्हणाली,'साड्यांना फॉल पिको करेन, कपड्यांची किरकोळ दुरुस्तीची कामं करेन ... आणि मला साड्या किंवा मोठे कापड मिळाले तर मी या कपड्यांच्या पिशव्या शिवेन,सासू बसून भीक मागते तिला बसल्या बसल्या या पिशव्या रस्त्यावर विकायला लावेन... तेवढाच आमच्या कुटुंबाला हातभार... ! 


हाच तो शंभरावा ठोका...!!! 


मला आठवतं,त्यावेळी मी खूप जोर जोरात हसलो होतो... मला मार्ग मिळाला होता...! 


घरात पडलेल्या साड्या,या ताईला किंवा ज्यांना शिलाई काम येतं,अशा माझ्या भीक मागणाऱ्या लोकांना देऊन पिशव्या शिवायला लावल्या तर ??? 


या ताईच्या सासूसारखे अनेक लोक नुसते बसलेले असतात... यांना या पिशव्या बसल्या बसल्या विकायला लावल्या तर...??? भीक मागणाऱ्या लोकांसाठी कमी खर्चात,कमी कष्टात जास्त मोबदला मिळवून देणारा हा मोठा व्यवसाय ठरेल... !


मला मार्ग सापडला... आणि तो आमच्या एका याचकानेच दाखवला.


एक गट बसून पिशव्या शिवेल,दुसरा गट या पिशव्या विकेल... असा जर एखादा प्रकल्प सुरू केला, तर भीक मागणाऱ्या लोकांना एक व्यवसाय तर मिळेलच.... 


परंतु;आमच्या गृहलक्ष्मीच्या तलवारीसम भासणाऱ्या लाटण्यापासून माझी सुद्धा सुटका होईल... माझ्या घराण्याचा उद्धार यानिमित्ताने टळेल ....असाही एक स्वार्थी विचार मनात तरळून गेला... ! 


या विचाराने मी सुखावलो...


पण,आमच्या भीक मागणाऱ्या लोकांकडून पिशव्या विकत घेणार कोण ??? 


मग आमच्याकडून पिशव्या विकत घ्या, भीक नको काम द्या.अशा अर्थाचा एखादा बोर्ड तयार करून विकणाऱ्या लोकांच्या गळ्यात लटकवू... असा विचार मनात आला. पण उगीच कोरडा काहीतरी मेसेज तयार करण्यापेक्षा,पुण्यातल्या लोकांशी इमान राखून.... पुणेरी टोमणे का तयार करू नयेत ? असं डोक्यात आलं...


पुणेरी टोमण्यांच्या माध्यमातून प्लास्टिक पिशव्या वापरणे सोडून द्या आणि आमच्या कापडी पिशव्या विकत घ्या अशा अर्थाचा मेसेज लिहिला तर समाज प्रबोधन सुद्धा होईल आणि आमच्या पिशव्या सुद्धा विकल्या जातील,असा विचार डोक्यात आला. 


पुणेरी टोमणे गुदगुल्या करतात,पण ते टोचत नाहीत,बोचत नाहीत...! 


आपोआप चेहऱ्यावर स्मितहास्य येतं... आणि जे काही सांगायचं आहे ते बरोबर योग्य ठिकाणी घुसतं...आणि मग पहिलाच टोमणा सुचला... 


सासूबाईंच्या सारख्या सूचना आणि सुनबाईंच्या सूचना नको असतील तर प्लास्टिक पिशवी वापरणे सोडून द्या आणि आमच्या कापडी पिशव्या वापरा...


पाठोपाठ दुसरा सुचला...


प्लास्टिकची पिशवी म्हणजे गर्लफ्रेंड दिखावू,

कापडी पिशवी म्हणजे सुंदर, छान बायको टिकाऊ... प्लास्टिक पिशवी वापरणे सोडून द्या आणि आमच्या कापडी पिशव्या वापरा...!


मला आणखी टोमणे हवे होते... मग डोक्यात सतत तेच विचार ... पण,या दोन शिवाय गाडी काही पुढे जाईना....आणि टोमणे पण काही केल्या सुचेनात ... 


एकतर मी सातारी... धीर धरायची आम्हासनी सवय नाही...! हिकडं भाकरी थापली,की तिकडं ती तोंडात गेलीच पायजे...


काही केल्या हे गणित जमेना...


तरीही सतत विचार सुरू होते....

मोटरसायकल चालवताना एखादा टोमणा सुचला की गाडी बाजूला घेऊन पटकन मिळेल त्या कागदावर तो टोमणा लिहून घ्यायचो... 


चार आठ दिवसात बरेच टोमणे सुचले...


मग माझ्या पुस्तकाच्या डिझाईन पासून प्रिंटिंग पर्यंत सर्व काही करणारी,पद्मिनी खुटाळे हिला मी माझी आयडिया सांगितली, तिने कागदावर टोमण्यांना डिझाइनचं रूप दिलं...आम्ही चक्क कॉपी करतो.असं म्हणणाऱ्या डीजी कॉपीयर्स यांनी माझ्या या टोमण्यांची मला चक्क कॉपी काढून दिली...


यानंतर,पिशव्या शिवू शकतील असा एक गट तयार केला... पिशव्या विकू शकतील असा दुसरा गट तयार केला... आधी सर्व अंदाज घेतला,(म्हणजे होमवर्क केला.

लहानपणी कधी केला नाही,परंतु आत्ता मात्र केला ) आणि मगच होमवर्क करून माझा विचार तुम्हा सर्वांना सांगितला... ! मला वाटलं नव्हतं पण,माझ्या एका साध्या छोट्या विचाराला तुम्ही सर्वांनी इतकं उचलून धरलं की काय सांगू ? 


कुणी शिलाई मशीन दिल्या,कुणी कपडे, कुणी आर्थिक मदत... आणि काय काय सांगू ? माझ्यावर माया करणाऱ्या कितीतरी आज्यांनी फोन करून या प्रकल्पाची आणि माझी स्तुती केली... 


हि पण एक प्रकारे मदतच आहे...(यावेळी भारावून मी त्यांना म्हणालो होतो, प्रकल्पाविषयी लिहीन तेव्हा आजी तुमचं नाव नक्की लिहिणार आहे... त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या,नाव लिही, पण आमच्या नावापुढे आजी लावू नकोस... ताई म्हण हां... Ladies are Ladies )


यातून एक झालं... 


यामुळे माझं मनोबळ आणखी वाढलं... आपण योग्य रस्त्यावर आहोत याची खात्री पटली...! 


असो.... यावरून एक आठवलं... 


केलेली स्तुती कधी लक्षात ठेवायची नसते... 

पण स्तुती करणाऱ्या व्यक्तीला मात्र विसरायचं नसतं. स्तुती आठवली की अहंकार वाढतो... स्तुती करणारी व्यक्ती आठवली की कृतज्ञता... !!! 


मी कृतज्ञ आहे या आजीबाई ताईंचा...!!! 


यानंतर शिवणाऱ्या गटाला पिशव्या शिवायला लावल्या,विक्री केल्यानंतर, ज्याच्या हातात या पिशव्या पडतील,त्याला या पिशव्यांच्या विक्री मागचा हेतू कळावा, यासाठी एक छोटासा मेसेज फ्लेक्स वर टाईप करून पिशवीवर शिवून घेतला. 


यानंतर विकणाऱ्या गटाला बोलावून त्यांच्या गळ्यात पुणेरी टोमण्याचे बोर्ड घातले...  हातात पिशव्या दिल्या आणि त्यांना सांगितलं,या पिशव्या आता विकायच्या... लक्ष्मी रोड,तुळशीबाग,बाजीराव रस्ता, कॅम्प अशा गर्दीच्या ठिकाणी फिरत रहा... '


'गळ्यात अडकवलेले बोर्ड लोकांना दिसायला हवेत... येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पिशव्या घेण्यासाठी विनंती करा... '


'यातून जे पैसे येतील ते निम्मे पैसे तुम्ही घ्यायचे, उरलेले निम्मे मला द्यायचे,म्हणजे मी हे निम्मे पैसे शिवणाऱ्या व्यक्तीला देईन.'


यातून एकाने कळीचा मुद्दा विचारला,'सर एक पिशवी कितीला विकायची ?' 


बापरे... 


मी हा विचारच नव्हता केला...एक पिशवी कितीला विकायची... ??? 


खरंच पिशवीची किंमत काय ठेवायची...??? 


समाजाने दिलेल्या कपड्यातून मी या पिशव्या शिवल्या होत्या... 


कुणी देवीला होतील म्हणून ठेवलेल्या नव्या साड्या मला दिल्या होत्या.... 


लेकीच्या लग्नात मिळालेल्या साड्या मला दिल्या... 


कुणी पडद्याचे कापड दिले... 


वडिलांच्या पंचाहत्तरी निमित्त / वाढदिवसानिमित्त आलेले सुटिंग शर्टिंग आणि सफारी चे कापड मला अनेकांनी दिले.कुणी घरात असलेल्या कपड्यांच्या रात्रंदिवस बसून स्वतः पिशव्या शिवल्या होत्या.... त्या मला दिल्या...अक्षरशः कुणी कुणी पाचशे रुपये मीटरचे कापड विकत घेऊन मला तागेच्या तागे दिले होते ...ठेवणीतल्या साड्या आता घालून मी या वयात कुठे मिरवणार आहे ? असं म्हणत कितीतरी आज्यांनी ठेवणीतल्या साड्या मला दान केल्या...


हे प्रेम म्हणू ?  माया म्हणू ? विश्वास म्हणू ? की समाजाबद्दलची कृतज्ञता म्हणू.... ?? 


समाजाने दिलेल्या या प्रेमाची, मायेची, विश्वासाची आणि कृतज्ञतेची आम्ही पिशवी तयार केली....  पण त्याची किंमत ठरवणारा मी कोण ??? 


माझी तितकी पात्रता नाही...


आमचा हा प्रकल्प म्हणजे नुसता प्रकल्प नाही,तर डोंगरावर पोहोचलेल्या माणसांनी, पायथ्याशी असलेल्या माणसांना, माणुसकीने केलेली मदत आहे...!!!


आमची पिशवी म्हणजे पिशवी नाही... आजीबाईचा हरवलेला बटवा आहे तो...! 


या बटव्यामध्ये प्रेम,माया, विश्वास आणि कृतज्ञतेचा,आजीच्या खरबरीत हाताच्या मायेचा स्पर्श आहे...! आणि मग खूप विचार करून ज्यांनी मला पिशवीची किंमत विचारली होती त्यांना सांगितलं... 


'मामा, या प्रत्येक पिशवीची किंमत अमूल्य आहे...आणि या पिशवीची किंमत ठरवण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही...!' 


'जी व्यक्ती तुम्हाला या पिशवीची किंमत विचारेल... त्याच्याशी थोडसं बोला,त्यांना जाणीव करून द्या,पिशवीचं कापड कुठून आलंय... कुणी दिलंय ? देणाऱ्याची भावना काय आहे ? कुणी शिवलंय... आपण कशासाठी या पिशव्या विकतोय... ?' वगैरे.... वगैरे ! 'माझी खात्री आहे, पिशवीवरचा मेसेज वाचून, तुमचं बोलणं ऐकून,एखादी संवेदनशील व्यक्ती या पिशवीचं मोल बरोबर ठरवेल... आपल्याला किंमत नकोच आहे.हवंय ते समाजाच्या विश्वासाचं मोल... !'


'किंमत ठरवण्याची पात्रता आपली नाही; समाजाने दिलेल्या गोष्टीचे मोल समाजच करेल...!' यानंतर ती व्यक्ती पिशवी विकत घेतल्यानंतर,जो निधी देईल,तो प्रसाद समजून माथ्याला लावा...! 


'प्रसादाची चिकित्सा,किंमत आणि मोल करायचं नसतं कधीच...!' 


माझ्या लोकांनाही ते पटलं...


बरोब्बर शनिवारी एक जूनला आमचा हा प्रकल्प सुरू झाला.... शिवणाऱ्याने पिशव्या शिवल्या... विकणाऱ्याने पिशव्या विकल्या... ! 


दिवसाढवळ्या जे स्वप्नं पाहिलं होतं...ते प्रत्यक्षात येत होतं...! आता पाच लोक पिशव्या शिवत आहेत....  पाच लोक पिशव्या विकत आहेत...


माझा एक अपंग माणूस आहे,पूर्वी तो वर्षानुवर्षे रस्त्यावर पडून होता.... त्याला नीट करून,आता अपंगाची सायकल दिली आहे... सायकलवर पुणेरी टोमणे अडकवले आहेत... मला अभिमान हा की,याच्याकडून मला कोणतीच अपेक्षा नव्हती तरीही सर्वात जास्त व्यवसाय तोच करतो...!!! 


तर, "आजीबाईचा हा बटवा" सध्या दहा लोकांचे कुटुंब चालवत आहे... ! 


या प्रकल्पाची माहिती मिळाल्यानंतर,अनेक लोकांनी माझ्याकडे पिशव्यांची डायरेक्ट ऑर्डर द्यायला सुरुवात केली...! 


सुरुवातीला अनेक लोकांना,माझ्या लोकांनी तयार केलेल्या या पिशव्या मी घरपोच पाठवल्या...पिशव्या पाहून,तुम्हाला द्यायचे ते पैसे द्या,असे म्हणालो.... त्यांनी त्याचे योग्य ते... नव्हे, जास्तीचेच मोल दिले...! पण तरीही मनामध्ये एक सल होता... 

हे पैसे मिळाल्यानंतर,मनात अनेक विचार सुरू झाले... हे विचार मी अत्यंत नम्रपणे आपल्यासमोर मांडत आहे,हा विचार चुकीचा असेल तर मला जरूर कळवा..माझ्याकडून जर कुणी अशा डायरेक्ट पिशव्या विकत घेतल्या,तर मिळालेल्या पैशातून मी निम्मा पैसा पिशव्या शिवणाऱ्या व्यक्तींना मोबदला देऊ शकतो... पण उरलेला निम्मा पैसा मी कोणाला देऊ ? पिशव्या विकून संस्थेसाठी देणगी जमा करणे हा हेतूच नाही....! 


आज पाच लोक भीक मागणे सोडून... इकडे तिकडे फिरून.... गळ्यात पाटी अडकवून.... पिशव्या घेण्याविषयी, लोकांना विनंती करून पिशव्या विकत आहेत... त्यांना त्या बदल्यात पैसे मिळणार आहेत.... त्यांचं कुटुंब चालणार आहे.... भीक मागणे सोडून त्यांनी कायम हेच करावे, अशी माझी इच्छा आहे. त्यांना कामाची / कष्टाची सवय लागावी... त्यांच्याकडे पाहून इतर याचकांना प्रेरणा मिळावी... 


उद्या पाचाचे ५० लोक व्हावेत... या ५० लोकांनी भीक मागणे सोडावे आणि आम्हाला सुद्धा पिशव्या विकायला द्या, म्हणून माझ्याकडे पिशव्या मागाव्यात... मी त्यांना माझ्याकडच्या पिशव्या विकायला देईन आणि यातून ५० लोकांची / कुटुंबांची उपजीविका चालेल... हा मूळ हेतू आहे... ! 


परस्पर जर मी माझ्याकडूनच पिशव्या विकल्या तर... शिवणाऱ्या व्यक्तीला पैसे मिळतील, परंतु पिशव्या विकणारे ५० लोक मग कसे तयार होणार ???


आणि म्हणून अत्यंत नम्रपणे मी सांगू इच्छितो की, तयार झालेला हा "आजीबाईचा बटवा" भीक मागणाऱ्या लोकांनी कष्ट करून,फिरून विकावा, त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ त्यांनी चालवावा...  याचसाठी ठेवायचा असं ठरवलं आहे.. ! 


(हा मेसेज तुम्हाला मिळण्यापूर्वीच ४५,०००) पिशव्यांची ऑर्डर माझ्याकडे आली आहे... किंमत तुम्ही सांगाल ती..अशी प्रेमळ सूचना सुद्धा आहे,परंतु मी वरील विचार त्यांना सांगून,अत्यंत नम्रतेने नकार कळवला आहे) हि तर सुरुवात आहे...जरा जोर लावला तर, आणखीही खूप ऑर्डर्स मिळतील..., अशाप्रकारे निधी मिळत गेला तर संस्था उत्तम प्रकारे चालेल यात वादच नाही... 


पण मला संस्था नाही,तळागाळात पडलेल्या,.. रुतून बसलेल्या माझ्या भीक मागणाऱ्या समाजाला चालवायचं आहे, चिखलातून त्यांना उठवून उभं करायचं आहे.... ! डायरेक्ट पिशव्या विकून,

भविष्यातल्या माझ्या ५० /५००/५००० लोकांच्या तोंडचा घास मला हिरावून घ्यायचा नाही...! 


आणि म्हणून मी कोणालाही परस्पर पिशव्या न विकण्याचा निर्णय घेतला आहे... !


मी चुकत असेन तर जरूर कान पकडावा... व्यवहारात मी जरा कच्चाच आहे...!!!  


याचकांकडून पिशव्या शिवून घेणे आणि त्यांच्याचकडून विकणे हा माझ्यासाठी व्यवसाय किंवा धंदा नाही... हा प्रकल्प म्हणजे माझ्यासाठी,माझ्यापुरती मी  मांडलेली पूजा आहे... 


माझे लोक या प्रकल्पाविषयी लोकांना बोलून माहिती देतील,कपडे देणाऱ्या व्यक्तीच्या भावना बोलून दाखवतील,प्लास्टिक पिशव्या वापरू नका म्हणून समाजाला विनवतील .... माझ्या लोकांनी  केलेली ही आरती आहे असं मी समजतो...! या प्रकल्पातून मिळालेल्या निधीमधून माझे भीक मागणारे लोक,आपल्या नागड्या उघड्या लहान मुलांच्या तोंडात सन्मानानं घास भरवतील तोच माझ्यासाठी नैवेद्य असेल...!! 


म्हाताऱ्या आईला याच पैशातून ते मानानं साडीचोळी करतील तीच माझ्यासाठी नवरात्र असेल....!!! याच पैशातून त्यांच्या घरातली चूल पेटेल... तीच माझ्यासाठी दिवाळीची पणती असेल ...!!! त्यांच्या घरातली लक्ष्मी उंबऱ्याच्या आत, ताठ मानेनं, दिमाखात डोक्यावर पदर घेऊन उभी असेल... तीच माझी गुढी आणि तोच माझा पाडवा... ! अशा भरल्या घरात मी कधीतरी जाईन आणि तिथली चिल्ली पिल्ली पोट्टी.... मामा मामा म्हणत माझ्या अंगा खांद्याशी झोंबतील... माझ्या ताईच्या घरची हि कार्टी "मामाच्या गावाला जाऊया" म्हणत मला त्रास देतील... या पिल्लांना कसं सांगू ???  मामाचा गाव हाच आहे गड्यांनो...! आमचा हा दंगा बघून खाटेवर पडलेली म्हातारी खोकत खोकत मला म्हणेल... भयनीच्या घरी आलाच हायस तर जीवून जा बाबा ...


मी म्हणेन, 'नगो म्हातारे प्वॉट भरलंय माजं....' म्हातारी मग लटक्या रागानं,मुडद्या म्हणत माझ्या तोंडात गुळ शेंगदाण्याचा तोबरा भरंल ... 


मला मिळालेला प्रसाद हाच तो...!!!


आता अजून कसली पूजा मांडू ?? कुठे अभिषेक करू... ???


आज पर्यंतच्या अनुभवावरून सांगतो... आता तुमचा पुढचा प्रश्न असेल, 'डॉक्टर आम्ही यात काय आणि कशी मदत करू शकतो?'*


चला तर आज खरंच मागतो... 


आजपर्यंत तुम्ही इतकं काही दिलं आहे,की माझी झोळी पूर्णतः भरून गेली आहे... मी तुमच्याकडे काही मागावं असं तुम्ही काही शिल्लकच ठेवलं नाही...! तरीही काही द्यायचं असेल तर माझ्या या पाच कष्टकरी लोकांचे ५०... नव्हे ५०० ... नाही नाही ५००० लोक होऊ देत.... असा आशीर्वाद द्या... !कधी बोललो नाही,परंतु खूप वेळा नाउमेद होतो मी... अशावेळी चल रे,म्हणत पाठीवर एक हलकीशी थाप द्या...! थकून कधी गुडघ्यावर बसलोच तर,उठून उभं राहण्यासाठी उठ रे... म्हणत साद द्या...! 


मी रेडा होवून नुसता "वेद" म्हणतो..

त्यावेळी तुम्ही दुसऱ्याची "वेदना" जपता...


मी "दान" मागत झोळी घेवून फिरतो...

त्यावेळी तुम्ही "पसायदान" जगता...


आता काय मागु माऊली तुमच्याकडे ? 

आपल्यापुढे नतमस्तक मी... कृतज्ञ मी ...!!! 


५ जून २०२४


डॉ.अभिजीत सोनवणे-डॉक्टर फॉर बेगर्स..