हॅमिल्टनच्या प्रतिपादनानंतर मुंग्या - मधमाशांसारख्या कीटकांच्या समाजप्रेमाचे रहस्य आई-मुलींपेक्षाही बहिणी-बहिणींच्यात जास्त जवळचे रक्ताचे नाते असते हेच असणार हे शास्त्रीय जगतात सर्वमान्य झाले.हे काम नुकतेच प्रसिद्ध झाले तेव्हा १९६५ साली मी हार्वर्डला विल्सनचा विद्यार्थी होतो,आणि ते वाचून विल्सन एक मोठे कोडे सुटले असे खुलले होते.पण ह्यातून प्राण्यांच्या आणि मानवाच्या समाज जीवनाबाबतचे सारे काही प्रश्न सुटले नव्हते.कागदमाशांसारखे खास रक्ताचे नाते नसलेले कीटकही इष्ट मैत्रिणींशी हातमिळवणी करतात हे ठाऊक होते.मानवी समाजात तर रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन पुण्य परोपकार, पाप ते परपीडा अशी मांडणी करण्यात येत होती.बुद्ध भिक्खू,ख्रिस्ती धर्मगुरू स्वेच्छेने ब्रह्मचर्य पत्करत होते,अनाथांची सेवा करत होते. मराठा योद्धे देव,देश अन् धर्मासाठी प्राण घेतले हाती या वृत्तीने लढत होते.औरंगजेबासारख्या प्रबळ शत्रूला नामोहरम करत होते.ह्या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा? आणि मानवी समाजांतल्या दुटप्पी वागणुकीचा कसा उलगडा करायचा?१९६५-७० ह्या काळात हार्वर्ड विद्यापीठात प्रचंड खळबळ माजलेली होती. व्हिएटनाममधले युद्ध कळसाला पोचलेले होते.पहिले आणि दुसरे महायुद्ध,नंतर एकोणीसशे पन्नासच्या दशकातले कोरियातले व एकोणीसशे साठच्या दशकातले व्हिएटनामचे युद्ध, एकोणीसशे नव्वदच्या दशकातले इराकचे पहिले युद्ध व गेल्या शतकाच्या अखेरीचे इराकचे दुसरे युद्ध ही सगळी युरोपीय समाजाची जगाच्या सत्तेवर पकड राहावी आणि त्यातून ह्या युरोपीय समाजाचे आर्थिक हितसंबंध पुष्ट होत राहावेत ह्या खटाटोपांचा भाग होती.
एका बाजूला समानता,स्वातंत्र्य,बंधुत्वाचा घोष करत अमेरिका आपले सारे बळ एकवटून जगात इतरत्र केवळ आपल्या हितसंबंधांना अनुकूल अशा राजवटी राहाव्यात एवढीच काळजी घेत होती.त्यासाठी चिलीसारख्या देशात लोकांनी निवडून दिलेल्या राष्ट्राध्यक्ष आयेन्डेचा खून घडवून तिथे पिनोचेसारख्या सैनिकी हुकूमशहाची रक्तरंजित सत्ता पोसत होते.ही दुटप्पी वागणूक सगळ्याच अमेरिकी नागरिकांना पटत होती असे नाही,पण तीच समर्थनीय आहे असं मानणारी प्रभावी राजकीय विचारधारा अमेरिकेत नांदत होती.
अशी दुटप्पी मूल्येही कशी योग्यच आहेत ह्याची मांडणी मनुष्यप्राणी मोठ्या हुशारीने करत राहतो.भारतीय समाजात तुम्ही पूर्वजन्मी पापे केलीत,म्हणून ह्या जन्मात त्याची फळे भोगताहात असे म्हणून अन्यायांचे समर्थन केले.जायचे,आणि बहुसंख्य लोकांच्या मनावर ह्या संकल्पनेची अगदी घट्ट पकड होती. जसा युरोपीय साम्राज्यवाद फैलावला तसा जगातील भारतासारख्या देशांची आपण लूट नाही करत आहोत, तर त्यांना सुधारतो आहोत,त्यांच्या समाजांना युरोपीय सभ्यतेच्या उच्च पातळीकडे नेत आहोत म्हणून समर्थन केले गेले.
व्हिएटनामवर आक्रमण अमेरिकी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी नाही,तर त्या देशाला साम्यवादाच्या नरकापासून वाचवण्यासाठी करतो आहोत, म्हणून सांगितले जात होते. हे युद्ध तेव्हा सुरू झालेल्या टीव्हीच्या युगात लोकांच्या डोळ्यासमोर येऊ लागले होते.
त्यातला एक संस्मरणीय प्रसंग होता,माय लाइ ह्या खेड्याचा पूर्ण विध्वंस तिथे राहणाऱ्या सर्व रहिवाशांचे हत्याकांड.हे हत्याकांड का केले असा प्रश्न विचारल्यावर एका अमेरिकी सैनिकी अधिकाऱ्याने नामी उत्तर दिले - त्या खेड्याला वाचवायसाठी आम्हाला ते समूळ नष्ट करणे भाग पडले !
साथी हाथ बढाना !
व्हिएटनाममधल्या युद्धाने अमेरिकी समाजात एका जोरदार विचारमंथनाला चालना दिली होती.मानवी मन,मानवी समाज समजावून घेणे हा जिव्हाळ्याचा विषय बनला होता.ह्याचा मागोवा घेत हार्वर्डचे मानववंशशास्त्रज्ञ माकडांचा,अगदी अप्रगत तंत्रज्ञाने वापरणाऱ्या आफ्रिकेतल्या कलहारी वाळवंटातल्या टोळ्यांचा,
आणि मानवी समाजातल्या गुलामगिरीच्या इतिहासाचा अभ्यास करत होते. ह्या प्रवाहातून महाविद्यालयीन शिक्षणात साहित्य आणि समाजशास्त्राचा अभ्यासक असलेला बॉब ट्रिव्हर्स जीवशात्र - उत्क्रान्तिशास्त्राकडे वळला. त्याने ठरवले की आपण परोपकार-परपीडा, स्वार्थ- परार्थ-परमार्थ,आप्तार्थ-मित्रार्थ-संघार्थ, स्वहित-आप्तहित-परहित ह्या सगळ्यांचा एका नव्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. निसर्गनिवडीच्या चौकटीत हे सगळे मांडले पाहिजे.बॉब ट्रिव्हर्स आणि मी जिगर दोस्त होतो. रोज संध्याकाळी जोडीने स्कॅश खेळायचो.
ट्रिव्हर्सने ह्या सगळ्याचा उलगडा करणारे, परतफेडीचा,
देवाण- घेवाणीचा परार्थ नावाचे शास्त्रीय जगतात खास गाजलेले सैद्धान्तिक प्रतिपादन कसे विकसित केले,हे मी दोन वर्षे खेळ संपल्यावर संत्र्याचा रस पीत-पीत ऐकले. खूप मजा आली !
आदिमानवाच्या समाजात प्रत्येक जण प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर ओळखतात.वर्षानुवर्षे एकमेकांच्या संपर्कात राहतात.एकमेकांना मदत करत,एकमेकांना दुखवत राहतात.अशी सामाजिक देवाण घेवाण ही शेवटी निसर्गाच्या निवडीतूनच साकारलेली असणार. प्रत्येक व्यक्ती आपण आतापर्यंत दुसऱ्यासाठी किती झीज सोसली,दुसऱ्याचा किती फायदा करून दिला,आणि ती दुसरी व्यक्ती आपल्यासाठी किती झीज सोसते आहे,
आपला किती फायदा करून देत आहे,आपण दुसऱ्याला किती दुखावले - सुखावले,त्याने आपल्याला किती दुखावले-सुखावले ह्या साऱ्याचा हिशेब करत राहणार.
संयुक्तिक,संतुलित देवाण घेवाण दोनही पक्षांच्या फायद्याची ठरू शकेल,आणि अशा सर्वांना लाभदायक नेटक्या आदान-प्रदानांतूनच मानवी समाजाची भरभराट झाली आहे.परस्परा करू सहाय्य हे मानवी समाजाच्या यशाचे रहस्य आहे.पण दोघांचाही लाभ असला तरीही देवाण - घेवाण जर प्रमाणबद्ध असली तरच निसर्ग
निवडीला उतरेल.केवळ एकाला भरमसाट लाभ असेल तर निसर्गनिवडीत ती असमर्थनीय आहे,टाकाऊ आहे असे ठरेल. म्हणून मनुष्यप्राणी सढळ हाताने मदत कोण करतात आणि हात आखडता कोण घेतात, कोण उपकाराची जाणीव ठेवतात,आणि कोण मदत करणाऱ्यांचा विश्वासघात करतात,
कोणाशी जवळीक करणे शहाणपणाचे आहे, आणि कोणाला दोन हात दूर ठेवणे बरे,कोणाची वाहवा करावी आणि कोणाची छी-थू करावी, कोण सज्जन,कोण दुर्जन हे सतत जोखत असतात.अशा हिशोबांतून,अजमासांतून, ठोकताळ्यांतून मानवी समाजजीवन उभारले गेले आहे.
भाषाकोविद मानव…
मनुष्यप्राणी अशा अनेक परस्परसंबंधांचा, कालचा,
आजचा, खूप वर्षांपूर्वीचा सुद्धा जमाखर्च ठेवू शकतो,तो त्याच्या सांकेतिक भाषेच्या बळावर.ही भाषा माणसाच्या आनुवंशिकतेचा मूलाधार असलेल्या डीएनेसारखीच अगदी थोड्या घटकांनी बनलेली आहे.पण त्या मोजक्या घटकांच्या जुळणीतून अनंत वैविध्य निर्माण करू शकते.
डीएनेत केवळ ॲडेनीन,थायामीन,सायटोसीन व ग्वानीन हे चार घटक ओळीने गुंफून वाटेल तेवढे वेगवेगळ्या त-हेचे जनुक बनविले जातात.केवळ चार रंगांच्या पाच मण्यांची माळ गुंफली तरी हजारांहून जास्त वेगवेगळ्या माळा बनवता येतात.दहा मण्यांच्या भरतात दहा लाखांवर,
पंधरांच्या अब्जावर ! आपल्या बोलण्यात शंभराहून जास्त ध्वनी असतात.ते ओळीने गुंफून अमाप शब्दवैविध्य निर्माण करता येते.
हे शब्द वेगवेगळ्या वस्तू,क्रिया, संकल्पनांच्या संज्ञा म्हणून वापरता येतात.ओळीने शब्द गुंफून अगणित वाक्ये बनवता येतात.वाक्यांच्या माळांतून अगणित विधाने करता येतात, कथानके रचता येतात.आपल्या डोक्यात एक संवाद सतत चालू असतो.त्यात जगात काय चालते,
काय चालणे शक्य आहे,काय चालणे योग्य आहे ह्याचा निरंतर ऊहापोह चालू असतो.
उलटा-पालटा,इकडून तिकडे उड्या मारत, बहिणाबाईंच्या शब्दात मन वढाळ वढाळ,जसे गुरु पिकावर।असा प्रवास सुरू असतो.हे सारे निसर्गाच्या निवडीत पारखले गेले असणार.मग ह्यातून काय काय लाभ होतात?
ह्यातून मानवाला लाभली आहे.कार्यकारण संबंधांची मीमांसा,चिकित्सा करण्याची क्षमता. ह्या सामर्थ्यामुळे आपण इतर जीवजातींवर लीलया मात केलेली आहे.इतर साऱ्या जीवजातींची प्रगती मंदगतीने होत राहते.
उत्क्रान्तीच्या ओघात वनस्पती शत्रूचा प्रतिरोध करण्यासाठी विषोत्पादन करतात.बांबूचे कोंब असतात मोठे पौष्टिक,पण सायनाईडने ठासून भरलेले,विपुल बांबू असलेल्या प्रदेशात राहणाऱ्या काळतोंडी वानरांच्या पोटातले बॅक्टेरिया सायनाइडचे दुष्परिणाम टाळू शकतात,म्हणून असे बॅक्टेरिया पोटात बाळगणारी वानरे ह्या कोंबांवर ताव मारतात.असे समर्थ बॅक्टेरिया माणसांच्या पोटांत नाहीत,तर वानरांच्यात कुठून आले? वानरांच्या पोटातल्या बॅक्टेरियांची सायनाइड पचवायची शक्ती अपघातकी आनुवंशिक बदलातून उपजली,आणि मग बांबू खाण्याचे धाडस करणाऱ्या वानरांच्या पोटात ह्या शक्तीमुळे त्या बॅक्टेरियांना आणि त्यांना बाळगणाऱ्या वानरांना- चांगले पौष्टिक अन्न मिळू लागले.यातून त्या सशक्त बॅक्टेरियांची आणि वानरांचीही पैदास वाढली.ह्या जनुकांच्या उत्क्रान्ती प्रक्रियेला हजारो-लाखो वर्षे लागली असणार.अन् आपण? मानवाला सायनाइड म्हणजे साक्षात् मरण! पण मानवाने आपली चौकस बुद्धी,
प्रयोगशीलता वापरत शोधून काढले की कोंबांना चिरून,
पाण्यात खूप वेळ ठेवले की सायनाइडचा निचरा होतो.ही स्मरुकांच्या उत्क्रान्तीची प्रक्रिया काही दशकांतच साधली असेल,आणि एकदा समजले की ही उपयुक्त माहिती भराभर पसरली असेल.
आज जिथे जिथे बांबू मुबलक मिळतो तिथेही तंत्रज्ञान वापरून बांबूचे कोंब बिनधास्त खाल्ले जातात.प्राण्यांना जे कमवायला हजारो पिढ्या लागतात,ते सारे आपण ज्ञानसाधनेच्या बळावर चुटकीसरशी साधतो.या ज्ञानसाधनेचा एक भाग म्हणून माणूस तऱ्हेतऱ्हेच्या कामकाजांसाठी उपयुक्त अशा कृत्रिम वस्तू,अवजारे,
आयुध्ये घडवतो.या कृत्रिम वस्तूंना जनुक-स्मरुक ह्यांच्याशी यमक जुळवायला आपण निर्मक असे अभिधान दिले आहे.शिकारीचे डावपेच ही स्मरुके,तर शिकारीची शस्त्रे ही निर्मुके,आग निर्माण करण्याची कृती ही स्मरूके,तर चुली,शेगड्या ही निर्मुके आहेत.
अशा नानाविध स्मरूक-निर्मुकांनी सज्ज मानव उंदरासारखे गवताचे बी खातो,बकऱ्यांसारखी पालेभाजी खातो,डुकरांसारखी कंदमुळे खातो, पोपटांसारखी फळे खातो,सरड्यांसारखे मुंगळे खातो,बगळ्यांसारखे खेकडे-मासे खातो, वाघांसारखी रानडुकरे खातो,आणि इतर कोणीच ज्यांना मारू शकत नाहीत असे अवाढव्य देवमासेही खातो ! आपण विषुववृत्तीय जंगलापासून ध्रुवाजवळच्या बर्फील्या वाळवंटांपर्यंत,प्रवाळाच्या बेटांपासून हिमालयातल्या पठारांपर्यंत फैलावले आहोत.
मनुष्यप्राणी अहर्निश डोके चालवत असतो. आसमंतात काय चालले आहे,आपल्याला काय काय आव्हानांना सामोरे जायला लागणार आहे, हे समजावून घेत असतो.
काही वर्षांपूर्वी मी आदिवासींचा शिष्य बनून पायी हिंडत हत्तींच्या शिरगणतीचा उपद् व्याप केला.माझे गुरू सतत बारीकसारीक खाणाखुणा धुंडाळत असायचे, कोठे खुट्ट वाजले तर कान देऊन ऐकायचे.सांगायचे,ह्या झाडाच्या बुंध्यावरचा चिखल बघ.सहा- सात फूट उंचावर आहे,
म्हणजे इथे एक मोठा नर हत्ती अंग घासून गेला आहे.
अजून चिखल ओला आहे,म्हणजे तो महाकाय जवळच कोठे तरी असणार.तिकडे कडाकडा आवाज येतोय ना,तिथे बांबूचे मोठे बेट आहे,तो चरतोय वाटते.काही राखून न ठेवता माझे आदिवासी गुरू मला शिकवत आहेत.कारण ज्ञानसंपदा ही अशी खाशी संपत्ती आहे की दिल्याने ती घटत नाही,उलट आदान-प्रदानातून वृद्धिंगत होते. ईशावास्योपनिषदात म्हटल्याप्रमाणे पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। पूर्ण ज्ञान इतरांपर्यंत पोचवले तरी आपल्यापाशी पूर्ण ज्ञानच शिल्लक राहते.ह्या आगळ्या वित्त भांडारातून मानवाने सृष्टीवरची आपली पकड हळूहळू घट्ट केली आहे.
फुकटबाजी व फसवेगिरी
मानवी समाजात जसजशा एकमेकांना मदत करण्याच्या शक्यता वाढल्या तशा एकतर्फी फायदा घेण्याच्या शक्यताही वाढतात.एखाद्याने जर मोकळेपणे कुठल्या झाडाला भरपूर फळे लगडली आहेत हे सांगितले,तर इतर त्या माहितीचा फायदा उठवून पोट भरू शकतील. पण त्याच वेळी काही जण स्वत:जवळची अशी माहिती दुसऱ्यांना न देता,केवळ दुसऱ्यांच्या माहितीचा लाभ घ्यायचा अशीही अप्पलपोटेगिरी करू शकतील.शिवाय परस्परांना मदत केवळ ज्ञानाच्याच नाही,तर अनेक जिवाभावाच्या संदर्भात देण्याचे प्रसंग येतात.हिंस्र श्वापदाची चाहूल लागताच धोका पत्करूनही आरोळी देणे, शिकार करताना सावजाची पळण्याची वाट रोखून धरणे,ओढ्याचा जोराचा प्रवाह ओलांडायला हात देणे,
अशा अनेक प्रसंगांत एकमेकांना मदत करण्याचा प्रचंड फायदा मिळू शकतो.पण मदतीचा हात पुढे करणाऱ्याचे नुकसान होण्याचाही धोका असतो.
कोण सच्चेपणे मदतीचा हात पुढे करतात आणि कोण लुच्चेपणे हात आखडता घेतात,कोण पूर्वी दिलेल्या मदतीची न विसरता परतफेड करतात आणि कोण आयत्या वेळी तोंडघशी पाडतात, हे सगळे मानवी समाज जीवनातले जिव्हाळ्याचे विषय आहेत.टिचग्या कागदमाशाही आपल्या पोळ्यातल्या इतर माशांना वैयक्तिक पातळीवर ओळखतात.कोण दणकट,कोण कमकुवत हे उमगत उमगत एकमेकींपुढे वाकतात, हातमिळवणी करतात किंवा कुरघोडी करतात.
मानवी समाजात असे वैयक्तिक परस्परसंबंध अतोनात गुंतागुंतीचे बनतात.
तुकोबा म्हणतात : मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेटूं ऐसे। भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाच्या माथी हाणू काठी।। कोणाशी आणि केव्हा मऊपणे वागावे, कोणाशी केव्हा कठोरपणे वागावे,कोणाला लंगोटी द्यावी, कोणाला काठी हाणावी,हे ठरवता - ठरवता माणसाच्या नीतिसंकल्पनांची उत्क्रांती झाली.
सुष्टता,दुष्टता,कृतज्ञता,कृतघ्नना,आदर,तुच्छता, द्वेष,सूड अशा सगळ्या भावना उद्भवल्या.पुण्य, परोपकार,पाप ते परपीडा अशा संकल्पना मांडल्या गेल्या.पण जोडीला क्रोध,लोभ,मद, मोह,मत्सरही फोफावले आणि 'पुण्य इथे दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली'अशी परिस्थितीही उद्भवू शकली.मानवाला भाषेद्वारे विविध संदेश देता येतात,
नानाविध परीच्या माहितीची देवाण-घेवाण करता येते.
अशा संवादांत दुसऱ्यांना खरे काय ते सांगता येतेच,आणि तितक्याच सहजतेने दुसऱ्यांची दिशाभूलही करता येते.
खोटे सांगून अनेकदा स्वहित साधू शकते.मित्रांना आपण त्यांच्यासाठी काय,काय करतो आहोत हे सांगताना राईचा पर्वत करून त्यांच्याकडून परतफेड म्हणून अवाच्या सवा लाटता येते, शत्रूना खोटे-नाटे सांगून संकटात पाडता येते. सर्वच मानव जन्मभर इतक्या शिताफीने खऱ्या- खोट्याची सरमिसळ करत असतात की असे न करणाऱ्या सदा सत्यवचनी हरिश्चन्द्राचे खास कौतुक केले जाते.असा आहे समाजप्रिय मानवाच्या उत्क्रान्तियात्रेचा परिपाक.दुसऱ्यांना मदत करण्याची प्रवृत्ती,आणि जोडीला त्यांना फसवून स्वतःचा फायदा करून घेण्याचीही.संघासाठी स्वतःचे प्राण देण्याची तयारी,पण त्याबरोबरच ज्यांना परके मानतो त्यांच्याशी बेफाम क्रौर्याने वागण्याची,त्यांची हत्या करण्याचीही तयारी. सच्चे ज्ञान संपादन करण्याची अफाट क्षमता, आणि धादान्त खोटे बोलण्याची,फसवण्याचीही ! म्हणूनच प्रत्येक माणसाच्या अंतर्मनात काही प्रमाणात तरी स्वार्थ आणि परोपकार,हिंसा आणि करुणा,क्रौर्य आणि दया-क्षमा-शांती, खोटेपणा आणि सच्चेपणा ह्यांच्यात एक रस्सीखेच चालू असते.एक निरंतर द्वंद्व, कुतरओढ चालू राहते.समाजातही ह्या परस्परविरोधी प्रवृत्तींची स्पर्धा चालू असते.
२०.०७.२४ या लेखमालेतील पुढील लेख…