* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: डिसेंबर 2024

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३०/१२/२४

खेळ महत्वाचा - The game is important

आपण खेळण्यासाठी घडलो आहोत आणि खेळण्यातूनच घडलेलो आहोत.आपण ज्या वेळी खेळते असतो,त्या वेळी आपल्यातल्या मानवतेचं विशुद्ध दर्शन आपल्या खेळातून घडवण्यात आपण मग्न असतो. आपल्यातल्या वैयक्तिक सच्चेपणाचं दर्शन इतरांना घडत असतं.ज्या ज्या वेळी आपल्याला खूप प्रफुल्लित, तरतरीत वाटत असतं,त्या वेळी आपल्या खेळातून आपल्या स्मरणात राहिलेले सर्वोत्तम क्षणच आपल्याला आठवतात,यात नवल ते काय?"


खेळामुळे आपल्या मनाच्या कक्षा अधिक विस्तारतात, आणि त्यामुळेच सखोल शोध घेण्याची क्षमताही वाढते.नवीन कल्पना मनात रुजवून घेणं किंवा जुन्याच कल्पनांवर नव्याने प्रकाश टाकणं आपल्याला सहज जमतं.खेळ आपल्याला अधिक चौकस वृत्ती बहाल करतो, नावीन्यपूर्ण गोष्टींशी समरस होण्याचं भान देतो, अधिक कार्यरत राहण्यासाठी मदत करतो. 


आवश्यकतावादी व्यक्तीच्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी खेळ ही एक पायाभूत गरज आहे, कारण त्याच्यामुळेच शोधक वृत्तीला तीन विशिष्ट अशा मार्गांनी चालना मिळते, एक प्रकारचं इंधनच खेळामुळे तिला मिळतं,असंही म्हणता येईल.


एक म्हणजे,खेळामुळे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांची व्याप्ती वाढते.आपण एरव्ही ज्या पर्यायांचा विचार करणं तर दूरच,पण ज्यांच्याकडे वळूनही पाहिलं नसतं त्यांच्यातल्या शक्यता आपण पाहू शकतो.एरवी ज्यांचा संबंध जोडण्याचं आपल्याला सुचलं नसतं,त्या दोन पर्यायांमधला संबंध शोधण्याचा प्रयत्न आपण करतो.खेळामुळे आपल्या मनाची सर्व कवाडं खुली होतात.आपला दृष्टिकोन विशाल होतो. आपल्या काही चुकीच्या आणि जुन्या समजुतींना आव्हान देण्याची समर्थता आपल्यात येते आणि ज्या कल्पना आपण तपासूनही पाहिलेल्या नसतात,त्यांचं स्वागत करण्यासाठी आपलं मन तयार होतं.खेळामुळे आपल्यात होणारा आणखी एक बदल म्हणजे,आपण आपल्या जाणिवांना विस्तारण्याची परवानगी देतो आणि त्यामुळे नवनवीन गोष्टी,कल्पना आपल्याला सुचत जातात.


अल्बर्ट आईनस्टाईन यांनी एकदा म्हटलं होतं तसं : मी जेव्हा मला स्वतःला किंवा माझ्या विचार करण्याच्या पद्धतींना तपासून बघतो,त्या वेळी मी अशा निष्कर्षाप्रत येतो की,कल्पनाविलासाची जी देणगी असते,ती मला माझ्यातल्या गुणांपेक्षा,क्षमतेपेक्षाही अधिक मोलाची वाटते.कारण तिच्यातून मला सकारात्मक ज्ञान मिळवता येतं.


दुसऱ्या प्रकारे खेळाचा होणारा फायदा असा आहे की, तुम्ही जर कोणत्याही प्रकारच्या तणावाखाली असाल, तर त्यावरचा रामबाण उपाय आहे तो म्हणजे खेळ. 


कारण ताण हा निर्मितीक्षमतेचा शत्रू आहे.विश्वास बसणं जरा कठीण आहे,पण ताण आपल्यातली निर्मितीक्षमता,चौकसवृत्ती आणि शोधक स्वभाव,या गोष्टींसाठी उपयुक्त असणारे आपल्या मेंदूचे महत्त्वपूर्ण भागच दुबळे करून टाकतो,त्यांचं काम अक्षरशः बंद पाडतो.असं काही घडल्यानंतर तुम्हाला किती मानसिक त्रास होईल,याची कल्पना करणंसुद्धा तुम्हाला नकोसं वाटेल.कामाचा तुमच्या मनावर खूप ताण आहे,आणि त्याच वेळी सगळ्या गोष्टी चुकताहेत,विपरीत काहीतरी घडतंय.तुम्हाला तुमच्या किल्ल्या सापडत नाहीयेत, येता-जाता तुम्ही कशावर तरी आपटत आहात.एक अतिशय महत्त्वाचा रिपोर्ट तुम्ही घरीच स्वयंपाक

घरातल्या टेबलावर विसरून आला आहात. 


अलिकडच्या काळात झालेल्या संशोधनातून असं दिसून येत आहे की,आपल्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूच्या भागातल्या हालचाली ताणामुळे अधिक क्रियाशील होतात (The Amygdala) आणि त्याच वेळी मेंदूचा जो भाग ज्ञान मिळवण्याच्या कामासाठी (The Hippocampus) जबाबदार असतो त्याची क्रियाशीलता हा ताण कमी करत असते.या सर्व प्रक्रियेचा परिणाम म्हणजे आपण स्वच्छपणे विचार करण्याची आपली क्षमताच हरवून बसतो.


माझ्या स्वतःच्या मुलांमध्ये हे असे विचित्र परिणाम झाले त्या वेळी खेळाने सर्व परिस्थिती कशी आटोक्यात आणली,ते मी अनुभवलं आहे.ज्या वेळी एखाद्या गोष्टीचा त्यांच्या मनावर ताण असतो,

सगळ्या गोष्टी हाताबाहेर जाताहेत असं लक्षात येतं,त्या वेळी मी त्यांना चित्रकलेत मन रमवायला सांगतो आणि याचा सुपरिणाम लगेचच दिसून येतो.त्यांच्या मनावरचा ताण कुठल्याकुठे पळून जातो आणि त्यांची शोधक वृत्ती परत येते.आता तिसरा फायदा ! एडवर्ड एम. हॅलोवेल हे एक मानसोपचारतज्ज्ञ आहेत,आणि मेंदूच्या कार्यासंबंधात त्यांचा खास अभ्यास आहे.ते म्हणतात

की,खेळामुळे मेंदूच्या अंमलबजावणी करण्याच्या कार्यावर सकारात्मक परिणाम होतो.त्यांनी एके ठिकाणी लिहिलंय,मेंदूच्या अंमलबजावणी कार्यामध्ये अंतर्भूत होणाऱ्या गोष्टी आहेत,त्या म्हणजे योजना आखणं,त्यांचे अग्रक्रम ठरवणं,कोणतं कार्य कधी करायचं ते ठरवणं,कामासंदर्भातल्या अपेक्षा ठेवणं, प्रतिनिधिक गोष्टी ठरवणं,निर्णय घेणं,विश्लेषण करणं थोडक्यात सांगायचं तर व्यवसाय उत्तम तऱ्हेने चालवण्यासाठी एका कार्यकारी अधिकाऱ्याला प्रभुत्व मिळवण्यासाठी गरजेची असलेली जवळ जवळ सगळीच कौशल्यं मेंदूजवळ असतात आणि खेळामुळे ही कौशल्यं अधिक उजळून निघतात.


खेळ मेंदूच्या त्या भागांना चालना देतो,जे दोन प्रकारे त्यांचं कार्य करतात.काळजीपूर्वक,तर्कशुद्ध कारणमीमांसा करून आणि मुक्तपणे,कोणतीही बंधनं न मानता ते शोधक वृत्तीचा वापर करण्याचे संदेश देतात. म्हणूनच खेळत असतानाच्याच काळात अत्यंत महत्त्वपूर्ण विचार कुणालाही सुचले,तर त्यात नवल वाटायला नको. 


हॅलोविल लिहितात : पृथ्वी गोल आहे हा शोध कोलंबसला लागला तेव्हा तो खेळातच रमलेला होता. सफरचंदाच्या झाडावरून एक सफरचंद खाली पडताना न्यूटनने पाहिलं आणि गुरुत्वाकर्षणाच्या ताकदीचा शोध त्यांना लागला,त्या वेळी तेही काहीतरी खेळतच होते. वॅटसन आणि क्रिक डी.एन.ए.मॉलिक्यूलच्या संभाव्य आकाराबद्दल खेळकरपणे चर्चा करत होते,त्याच वेळी त्यांना डबल हेलिकसच्या संरचनेची कल्पना आली. Iambic meter या संकल्पनेशी शेक्सपिअर आयुष्यभर खेळले.मोझार्ट यांनी त्यांच्या हयातीतला जागेपणीचा एक क्षणही खेळाशिवाय वाया घालवला नाही.आईनस्टाईन यांचे 'थॉट एक्सपरिमेंटस्' हे स्वतःच्या मनाशी खेळण्याचं उत्तम उदाहरण आहे.


काम आणि खेळ


काही कल्पक कंपन्यांनी अखेर खेळाचं मूल्य काय आणि किती आहे, हे जाणून घेतलं आहे.ट्विटरचे सीईओ डिक कॉस्टोलो यांनी विनोदाच्या माध्यमातून खेळाला पुढे आणलं आहे,ते त्यांच्या कंपनीतच ! त्यांनी त्यासाठी आयत्या वेळी सुचेल त्याप्रमाणे विनोदाचं सादरीकरण करण्यासाठी एक जागा ठेवली आहे. सुरुवातीच्या काळात स्वतःएक स्टँडअप कॉमेडियन असल्यामुळे त्यांना याची कल्पना आहे की असं आयत्या वेळी सादरीकरण करण्याच्या क्रियेत लोकांना स्वतःच्या मेंदूला जरा ताण द्यावा लागतो.त्यामुळे त्यांच्या विचारात एक प्रकारचा लवचीकपणा येतो,त्यातून चाकोरीबाहेरचं काही तरी त्यांना सापडतं,त्यांच्या निर्मितीक्षमतेचाही त्यात कस लागतो.


इतर काही कंपन्या खेळकर वातावरण जपण्यासाठी सभोवतालच्या वातावरणात बदल घडवून आणतात.आई.

डी.ई.ओ.मध्ये त्यांच्या मीटिंग्ज त्यांनी छोट्याशा बसमध्ये घ्यायला सुरुवात केली आहे.गुगल कंपनीच्या हॉल्समध्ये एखाद्या ठिकाणी अचानकच तुम्ही गुलाबी फ्लेमिंगोजच्या आवरणाखाली असलेल्या भल्यामोठ्या डायनॉसॉरवर आदळू शकता.(अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत.) पिक्सर स्टुडिओजमध्ये कलाकारांच्या ऑफिसेसची वेगवेगळ्या प्रकारे सजावट केलेली आहे. काहींचं स्वरूप जुन्या काळातल्या पाश्चिमात्य सलॉनसारखं आहे,काही लाकडापासून बनवलेल्या झोपड्यांसारखी ! अशाच एका ऑफिसला मी भेट दिली होती,तिथे जमिनीपासून छतापर्यंत सर्वत्र 'स्टारवॉर्स' मधल्या पात्रांच्या छोट्याछोट्या मूर्ती ठेवलेल्या होत्या.


माझ्या माहितीतल्या एका यशस्वी महिलेने एका प्रकाशन संस्थेमधल्या तिच्या ऑफिसच्या एका टेबलावर एक स्टेपल्सपासून तयार केलेलं 'इझी बटण' ठेवलं होतं.ज्या ज्या वेळी तिच्या ऑफिसमध्ये आलेली माणसं जायला निघत,त्या वेळी या मोठ्याशा बटणावर हात दाबून बघण्याचा बालीश आनंद घेण्याचा मोह त्यांना होत असे.तसं ते दाबलं की,त्यातून आधीच ध्वनिमुद्रित करून ठेवलेलं 'हे तर अगदीच सोपं होतं' हे वाक्य मोठ्या आवाजात संपूर्ण ऑफिसला ऐकू जात असे. त्याच संस्थेतल्या खालच्या हॉलमधल्या स्वतःच्या ऑफिसमध्ये दुसऱ्या एका बाईंनी लहान मुलांच्या पुस्तकातली चित्रं फ्रेम करून लावली होती.लहान वयात घेतलेल्या आनंदाची आठवण ही चित्रं तिला करून देत असत.टेबलवरची खेळणी,फ्लेमिंगोच्या आवरणाखाली असलेले डायनॉसॉर्स आणि काहीतरी करण्याच्या तयारीत असलेली खेळण्यातली पात्रं, या सर्व चित्त विचलित करणाऱ्या गोष्टी कुणाकुणाला क्षुल्लक वाटू शकतात.पण कदाचित याच्या विरुद्धही असू शकतं,हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. 


खेळ ही एक बिनमहत्त्वाची आणि क्षुल्लक बाब आहे, अशी ठाम समजूत असणाऱ्या अनावश्यकतावाद्यांना या त-हेचे वेगवेगळे प्रयत्न हे एक प्रकारचं आव्हान आहे. या आव्हानांशी सामना करत बसण्याऐवजी खेळ ही निर्मितीक्षमता आणि शोधकवृत्तीकडे आपल्याला नेणारी एक सुंदर गोष्ट आहे,ही भावना अनावश्यकतावाद्यांनी समजून घ्यायला हवी.


काय महत्त्वाचं आहे,हे ठरवण्यासाठीच फक्त खेळाची गरज नाहीये तर खेळ ही एक स्वयंपूर्ण गोष्ट आहे.


म्हणूनच आता एका गोष्टीवर आपल्याला विचार करायला हवा की,खेळाला आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आणि आपल्या आयुष्यातही कशा प्रकारे सामावून घेऊ शकतो? ब्राऊन यांनी त्यांच्या पुस्तकात एक छोटीशी पुस्तिकाही अंतर्भूत केलेली आहे आणि यामागे त्यांचा मूळ हेतू वाचकांना स्वतःला खेळाशी कसं जोडून घेता येईल,हे समजावून सांगण्याचाच आहे.ते असं सुचवतात की,वाचकांनी त्यांच्या भूतकाळात डोकावून बघत खेळांच्या आठवणी काढाव्यात.लहान असताना तुम्ही अशा कोणत्या गोष्टी करत होतात,ज्या तुम्हाला उत्तेजित करत असत ? आज त्या गोष्टी कश प्रकारे तुम्हाला पुन्हा एकदा करता येतील ?


२८.१२.२४ या लेखातील शेवटचा भाग…

२८/१२/२४

खेळ महत्वाचा - The game is important

"अधूनमधून थोडासा अवखळपणा करणं सुज्ञ माणसांना नेहमीच आवडतं." - रोनाल्ड डल


'मेरी पॉपिन्स' या अतिशय दर्जेदार सांगीतिक चित्रपटाच्या शेवटी शेवटी कंठ दाटून आलेला आणि दुःखीकष्टी मिस्टर बँक्स घरी येतो.कामावरून काढून टाकलेला,हाकलून दिला गेलेला,रस्त्यावर ढकलून दिला गेलेला मिस्टर बँक्स ! मात्र घरी पोहचताच तो कमालीचा खूश होतो.त्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून जात असतो!त्याच्या स्वभावाशी जराही साधर्म्य न साधणारा तो आनंद बघून त्याच्या नोकरालाही वाटतं की,त्याचे साहेब आज त्यांचा नेहमीचा तंग चेहऱ्याचा मुखवटा बाहेरच फेकून आले असावेत.त्याच्या मुलाच्याही लक्षात येतं,'हे माझे नेहमीचे डेंड नाहीयेत ! ही कुणीतरी नवीनच व्यक्ती आहे.' मुलांची फाटलेली पतंग दुरुस्त करून आणत मुलांच्या हातात देऊन ते जेव्हा गाणं गायला लागतात, "चला मुलांनो पतंग उडवू या" तेव्हा तर मुलं थक्कच होतात.मिस्टर बँक्स त्याच्या बँकेच्या नेहमीच्या रटाळ आणि कंटाळवाण्या कामातून मुक्त होतो आणि त्याच्या आत दडलेलं लहान मूल अचानक जागं होतं.त्यांच्यात नव्याने दिसून आलेली कमालीची प्रसन्नता आणि त्याचा खुललेला चेहरा बघून त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना वाटत होतं,आधीच्या आपल्या घरातलं उदासवाणं वातावरण कुठेतरी पळून गेलंय ! आता घरात भरून राहिलाय फक्त आनंद आणि सौहार्द !


ही एक काल्पनिक कथा आहे,हे अगदी खरंय ! पण आपल्यातला खेळकरपणा जपला गेला,तर त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर किती जबदरस्त आणि सकारात्मक प्रभाव पडतो,त्याचं या कथेत अतिशय सुंदर प्रकारे चित्रण केलं आहे.


आपल्यापैकी बहुतांश लोकांना लहानपणी खेळायचं कसं याचं औपचारिक शिक्षण कधीच दिलं जात नाही. आपणच अगदी नैसर्गिकपणे,अगदी स्वाभाविकपणेच खेळायला शिकतो.एक चित्र मनाशी उभं करून बघा.


लहान बाळाला कुकीऽऽ कुकीऽऽ असं म्हणत त्याची आई त्याच्याशी खेळतेय आणि ते बाळ निखळ आनंदात रमून गेलंय.

छोट्या मुलांचा एखादा गट लुटुपुटीचे काही खेळ प्रत्यक्षात ते सगळं घडतंय असं मनाशी कल्पून, त्यांचं जे काही ज्ञान आहे,ते त्यात ओतून अगदी समरसून सगळी वातावरण निर्मिती करत त्यात दंग झालेला आहे. Mihaly Csikszentminalyi म्हणतात,त्याप्रमाणे एखादं मूल जुन्या पुठ्ठ्यांचे चौकोनी तुकडे जमवून त्यातून स्वतःसाठी राजवाडा उभा करण्यासाठी धडपडत असतं,त्या वेळी ते किती एकाग्रपणे त्याचं काम करताना दिसतं,

तेही आपण अनुभवलेलं असतं.पण आपलं वय वाढत जातं,तशा गोष्टी बदलत जातात.आपल्या मनावर असं बिंबवलं जातं की,खेळणं ही अगदीच बिनमहत्त्वाची बाब आहे


त्यात फक्त वेळ वाया जातो.खेळत बसण्याची आपल्याला अगदीच गरज नसते.खेळण्याची आवड असणं म्हणजे पोरकटपणा! दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की,हे असे नकारात्मकता ठासून भरलेले संदेश येतात, ते विचारांना चालना देणारे खेळ खेळण्यासाठी जिथे उत्तेजन दिलं गेलं पाहिजे,अशाच ठिकाणांहून ! खरं म्हणजे खेळाच्या बाबतीत कुणाचीही गळचेपी होता कामा नये !


(खेळा - तुमच्यातल्या सुज्ञ बालकाला कवेत घ्या.

इसेंशियलिझम -ग्रेग मॅकेऑन - अनुवाद - संध्या रानडे,मायमिरर पब्लिशिंग हाऊस,)


ग्रीक शब्द Schole पासूनच School या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे.याचा अर्थ आहे,विश्रांतीचा किंवा फुरसतीचा वेळ.मात्र औद्योगिक क्रांतीच्या काळात उदयाला आलेल्या आपल्या आधुनिक शाळांनी मात्र विश्रांती किंवा फुरसतीचे क्षण ही संकल्पना पारच हद्दपार करून टाकली आहे. 


शिक्षणातून बराचसा आनंदही काढून घेतला गेला आहे. 


शाळांमधून मुलांच्या निर्मितीक्षमतेला वाव मिळावा यासाठी स्वतःचं आयुष्य वेचणारे सर केन रॉबिन्सन, यांच्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आलीय ती म्हणजे, मुलांच्या निर्मितीक्षमतेला खतपाणी घालून ती फुलवण्याऐवजी शाळांचा मुलांमधली ती क्षमता मारून टाकण्याकडेच अधिक कल दिसून येतो.ते म्हणतात : "झटपट खाद्यपदार्थांसारखी (Fast Food) शिक्षण क्षेत्रातली झटपट ज्ञान या संकल्पनेत बसणारी संस्कृती शाळा विकत घेत सुटली आहे आणि ही संस्कृती 'फास्ट फूड' जसं आपल्या शरीरावर वाईट परिणाम करतं, आपलं शरीर दुर्बल करून टाकतं,तशाच प्रकारे आपल्यातली ऊर्जा,आपल्यातलं चैतन्य या गोष्टींना दुर्बलतेकडे ढकलते आहे.माणसाने जे जे साध्य केलं आहे,ते त्याच्यातल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर साध्य केलंय आणि माझा असा ठाम विश्वास आहे की,ही नवी संस्कृती आपण आपल्या स्वतःला आणि आपल्या मुलांना ज्या प्रकारचं शिक्षण द्यायचा प्रयत्न करतो आहोत,त्याच्यासाठी अत्यंत धोकादायक आहे." त्यांच्या या बोलण्यात निश्चितच तथ्य आहे.


खेळांसारख्या गोष्टी अगदीच बिनमहत्त्वाच्या असतात, ही कल्पना आपण सज्ञान वयात,प्रौढत्वात पोचतो, तोपर्यंत आपल्या मनात अगदी रुजून गेलेली असते.


आणि त्यानंतर तिची पाळंमुळं अधिकाधिक घट्ट होत जातात.

विशेषतः आपण आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवेश करतो त्या वेळी ! यात खेदाची बाब ही आहे की, अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच कंपन्या खेळाला उत्तेजन देतात.बाकीच्या नकळत का होईना,पण खेळाला कमी लेखतात.हेही खरं आहे की, काही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी निर्मितीक्षमतेला खेळ पूरक ठरतो,ही वस्तुस्थिती वरवर तरी मान्य करतात. पण त्यासाठी फारसा पुढाकार घेत नाहीत.

मात्र अजूनही अशा बऱ्याच कंपन्या आहेत,ज्या खेळाला पोषक ठरेल, खेळातूनच कर्मचाऱ्यांना संशोधनासाठी उत्तेजन देईल, अशा त-हेची संस्कृती स्वतःच्या कंपनीत रुजवण्याच्या दृष्टीने कोणतीही ठोस पावलं उचलत नाहीत.


या सर्व गोष्टींचं आपल्याला खरं म्हणजे जराही नवल वाटायला नको.कारण आधुनिक पद्धतीने काम करणाऱ्या संस्था जन्माला आल्या,त्याच मुळी औद्योगिक क्रांतीतून ! त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा पायाच मोठ्या प्रमाणावर वस्तूंचं उत्पादन करण्याच्या विचारातून घातला गेलाय.


याही पुढे जाऊन विचार करायचा ठरवलं,तर असं लक्षात येतं की,सुरुवातीच्या काळातला कंपन्यांमधला अधिकारी वर्ग खेळाला उत्तेजन देणारं वातावरण अजिबातच न जोपासणाऱ्या लष्करापासून कामाची स्फूर्ती घेणारा होता.(आणि खरं सांगायचं तर लष्कराची भाषा अजूनही अनेक संस्थांमधून वापरली जाते. संस्थेतले 'आघाडीचे' कर्मचारी (Front line) असा उल्लेखही अगदी सहजपणे केला जातो. तसंच 'कंपनी' हा शब्दही लष्करातल्या सैनिकांच्या तुकड्यांसाठी वापरला जातो.) औद्योगिक पर्व हा शब्द खरं म्हणजे आपल्यासाठी कधीच भूतकाळात जमा झाला आहे. पण तरीही त्या वेळच्या चालीरिती, शत्या काळातल्या बांधकामाच्या रचना आणि पद्धती यांनी आधुनिक संस्थांमध्ये अजूनही आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेलं आहे.


खेळ ही आजही माझ्या दृष्टीने अशी गोष्ट आहे,जी फक्त आपल्या निखळ आनंदासाठी आपण करायची असते. कशासाठी साधन म्हणून किंवा काही तरी साध्य करायचं आहे,म्हणून तिचा वापर करायचा नसतो. 


मग ते पतंग उडवणं असो,संगीताचा आनंद घेणं असो किंवा बेसबॉल खेळणं असो.हे सगळं कदाचित अनावश्यक गोष्टी या सदरात मोडत असेलही.आणि बरेचदा त्यांच्याकडे त्या दृष्टीने पाहिलं जातं ही वस्तुस्थिती आहे.पण खरं तर खेळ बऱ्याच दृष्टींनी आवश्यक असतो.स्टुअर्ट ब्राऊन हे 'नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर प्ले' या संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांनी जवळ जवळ सहा हजार लोकांच्या 'खेळाच्या इतिहासाचा' सखोल अभ्यास केला आहे आणि त्यातून त्यांनी असं अनुमान काढलं आहे की,तुमच्या वैयक्तिक आरोग्यापासून,ते तुमच्या लोकांशी असलेल्या संबंधांपर्यंत आणि तुमच्या शिक्षणापासून ते तुमच्या कामाच्या ठिकाणी नवसंशोधनाच्या बाबतीतली तुमची क्षमता वाढवण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत तुम्हाला अगदी जाणवेल इतक्या मोठ्या प्रमाणावर सक्षम करण्यामध्ये खेळाची भूमिका अत्यंत प्रभावी ठरते.ते म्हणतात, 


"खेळ हा तुमच्या मेंदूचा लवचीकपणा,ग्रहणशक्ती आणि तुमच्यातली निर्मितीक्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करतो." ते थोडक्यात असं सांगतात,"खेळाइतक्या सहजतेने दुसरी कुठलीच गोष्ट मेंदूला प्रज्वलित करू शकत नाही."


अनावश्यकतावादी


खेळ ही क्षुल्लक,बिनमहत्त्वाची बाब समजतो.


असंही समजतो की खेळ ही एक निर्मितीशून्य पद्धतीने वेळ वाया घालवणारी गोष्ट आहे.


आवश्यकतावादी


खेळाचं महत्त्व माहीत असतं.


त्याला हेही माहीत असतं की,खेळामुळे शोध घेण्यासाठी चालना मिळते.


खेळ आणि मन


खेळ हा सगळ्यांच्याच आयुष्यात किती महत्त्वाचा आहे, हे सांगताना कितीही बोललं,तरी ते कमीच आहे.प्राणी जगताचा सखोल अभ्यास केला गेला,त्या वेळी असं लक्षात आलं आहे की,खेळ हा बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्य वाढीस लागण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.त्यामुळेच सर्व प्रकारच्या प्रजातींचं अस्तित्वही टिकून राहू शकतं.बॉब फॅगन हे संशोधक पंधरा वर्षं 'ग्रिझली बेअर' जातीच्या अस्वलांचा सातत्याने अभ्यास करत होते.त्यांना असं आढळून आलं आहे की, जी अस्वलं भरपूर खेळत होती,ती दीर्घकाळ जगत होती.याचं कारण काय असं त्यांना विचारलं,तेव्हा ते म्हणाले,या जगाने सातत्याने पुढे टाकलेली वेगवेगळी आव्हानं आणि इथली अशाश्वतता यांना सामोरं जाणं, वरचेवर बदलणाऱ्या या ग्रहावर टिकून राहणं,या गोष्टी त्यांना खेळामुळेच शिकता आल्या."


जॉन पँकसेप यांनी त्यांच्या Affective Neuroscience: The Foun- dations of Human and Animal Emotions यात साधारण अशाच प्रकारचा निष्कर्ष काढला आहे.त्यांनी असं लिहिलं आहे की,एक गोष्ट अगदी खात्रीलायकपणे सांगता येते,ती म्हणजे प्राणी खेळत असतात,त्या वेळी अधिक लवचीकपणा आणि निर्मितीशील पद्धती वापरण्याकडे त्यांचा जास्त कल असतो."


मात्र तरीही,स्टुअर्ट ब्राऊन लिहितात,मनुष्य जात ही सर्वात अधिक खेळणारी आहे आणि सर्वोत्तम खेळाडूही आहे.आपण खेळण्यासाठी घडलो आहोत आणि सर्वोत्तम खेळाडू आहोत.


शिलल्क राहिलेला भाग..पुढील लेखामध्ये…!


महत्त्वाची नोंद वाचणीय - पुस्तकाचं संपादन करणारे एक जण म्हणतात,तसं,वाचकांचे आयुष्य शक्य तेवढं आरामदायी करणं,हेच माझं काम आहे.कोणत्याही पुस्तकातला महत्त्वाचा संदेश किंवा त्यातून काही घेण्यासारखं असेल,तर ते वाचकांपर्यंत शक्य तितक्या स्पष्टपणे पोहोचवणे हेच माझे उद्दिष्ट असतं.


२६/१२/२४

रहस्य आणि गोष्टी / Mysteries and things

त्यातून दोन ट्यूबस् मागच्या बाजूला जातात.दोन्ही हातांनी तो कोणत्या तरी वाहनावर नियंत्रण ठेवत आहे असा भास होतो.

डाव्या हाताचा पंजा क्लच,ॲक्सिलेटर, पेडल वगैरे सारख्या कुठल्या तरी भागावर ठेवलेला आहे;वर असणाऱ्या हाताची बोटे पाहिली की वाटते की तो रेडिओच्या बटणासारखे काही तरी फिरवत आहे. मोटारसायकल वापरताना पेट्रोलचा कमी-जास्त पुरवठा करण्यासाठी हाताने थ्रॉटल ओढावे,अशाच प्रकारे त्याची दुसऱ्या हाताची बोटे वळलेली आहेत.त्याचा पोषाख तसा अगदी आधुनिक पद्धतीचा आहे. अंगालगत घट्ट बसणारा फुलस्लीव्हज्चा पुलओव्हर, पुलओव्हरच्या ओव्हरच्या लांब हातांची मनगटावर घडी, अर्धी पॅन्ट,तिला रूंद कमरपट्टा,पायात मोजे,सर्वच अगदी घट्ट,अंगाला बसेल असे;अगदी आजच्या विसाव्या शतकातील अंतराळवीरच जसा काही! त्याची बसण्याची ढब सुद्धा आजच्या अंतराळवीरांसारखी आहे.आपण पाहत आहोत तो प्राचीन काळातील अंतराळावीरच असणार याबद्दल कोणाच्याही मनात शंका येऊ नये.तो दुसरा कोणी असूच शकणार नाही.(हा फोटो मुळ पुसतकात पहायला मिळेल.)


तांत्रिक भाषेतच बोलायचे तर त्याच्या चेहऱ्यासमोर ऑक्सिजनचे उपकरण आहे.कम्युनिकेशन सिस्टिम्स् आणि ऊर्जा मर्यादित करणारी यंत्रेही समोरच आहेत. सर्व यंत्रांवर हाता-पायांनी नियंत्रण ठेवण्यात येत आहे. अंतराळयानातून बाहेरच्या बाजूला बघण्याचीही सोय आहे.या सर्व यंत्रांच्या पुढे दोन लोहचुंबक असावेत. अंतराळयानाभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण करून अंतराळात अफाट वेगाने प्रवास करताना काही आदळू नये म्हणून!अंतराळवीरांच्या मागे ऊर्जा निर्माण करणारी अणुभट्टी असावी आणि चित्राच्या बाहेर रॉकेटचा एक्झॉस्ट दाखवला आहे.


हे शिलाचित्र खरेच आपल्याला काहीच दर्शवत नाही? निश्चितपणे माया लोकांना त्यांच्या अंतराळ पाहुण्यांची माहिती इतरांना द्यायची होती आणि त्यांना माहीत असलेल्या एकाच पद्धतीने त्यांनी ती दिली.शिलाचित्र कोरून! पण त्या कारागिरांना त्या चित्रातील ज्ञानाची माहिती असणे अशक्य आहे.मग या तांत्रिक बाबी त्यांनी कशा कोरल्या असतील? नुसते बघून हे अंतराळयान लक्षात राहणे कठीणच!मग त्यांनी अंतराळवीरांचाच सल्ला घेतला असेल का?आणि सोप्या पद्धतीने काढता येईल असे चित्र त्यांनी माया लोकांना दिले असेल का? यात काही अशक्य नाही.या सर्व देवांनी त्यांच्या पृथ्वीला दिलेल्या भेटी गुप्त राहाव्यात असा प्रयत्न कधीच केलेला नाही.त्यांनी त्यांचे ज्ञान पुढील पिढ्यांना देण्यासाठी जतन करून ठेवा असे सांगून नेहमीच उघड केले आहे.त्यांनी दिलेल्या पृथ्वी भेटीचा वृत्तांत आपल्यापर्यंत पोहोचावा या हेतूनेच त्यांनी ते केले असेल यात अशक्य काय आहे? की पुन्हा प्रत्येक गोष्टीचा संबंध अंतराळ प्रवासाशी लावण्यात येतो असे म्हणणार? प्राचीन काळातील अंतराळ प्रवासाच्या सिद्धान्ताला देत असलेल्या पुराव्यातून हे शिलाचित्र जर वगळले जाणार असेल तर अशा अलौकिक पौराणिक वस्तूंवर संशोधन करणाऱ्या विद्वानांच्या दानतीबद्दलच शंका घ्यावी लागेल.


मायांनी आपली शहरेसुद्धा नद्यांच्या काठी,समुद्राच्या काठी न बांधता जंगलात का बांधली ? त्यांना समुद्र माहीत नव्हता असा भाग नाही.समुद्रात किंवा समुद्रकिनाऱ्यावर मिळणाऱ्या गोष्टींपासून त्यांनी बनवलेल्या शेकडो गोष्टी सापडल्या आहेत.पण जंगलात राहून मग तिथे पाणी पुरवठ्यासाठी प्रचंड टाक्या बांधण्याचा खटाटोप त्यांनी कशासाठी केला? ग्वाटेमालातील टिकल येथे अशा तेरा टाक्या आहेत की ज्यात एक लाख चौरस मीटर एवढे पाणी मावेल.


त्यांनी चिचेन येथे बांधलेली वेधशाळा त्यांची अगदी पहिली आणि सर्वात जुनी गोलाकार इमारत आहे.या तीन मजली इमारतीला आतून गोल गोल जिना आहे. बाहरेच्या भिंतीवर पर्जन्य देवाची आणि उडणाऱ्या मानवांची चित्रे आहेत.


मायांना युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांचीसुद्धा कशी माहिती होती? पालेन्क येथील पिरॅमिडमधला, अग्निबाणात बसलेला अंतराळवीर आपल्याला काय सुचवतो?मायांच्या कॅलेन्डरमध्ये चार कोटी वर्षांची गणिते का करून ठेवली आहेत?व्हेनुशियन सिद्धान्त शोधून काढण्याइतके ज्ञान त्यांनी कसे मिळवले? खगोलशास्त्राच्या इतक्या अफाट ज्ञानाची प्राप्ती त्यांना झाली तरी कुणाकडून ?


मायांच्या सर्व इमारतींवर सर्पाचे चिन्ह का? जंगलात शहरे वसवणाऱ्या मायांनी एखादे फूल आपले चिन्ह म्हणून का निवडले नाही?किंवा एखादा जंगलातला प्राणीच ? तिरस्करणीय सर्पाचे चिन्हच आपल्याला मायांच्या साम्राज्यात पावलोपावली का आढळते? आणि अशा या सर्पाला पुन्हा उडण्याची शक्ती त्यांनी का सूचित करावी? त्याचा देव म्हणून का स्वीकार करावा?


आधीच होत असलेला बौद्धिक गोंधळ पूर्ण करण्यासाठी प्राचीन काळातल्या आणखी काही चमत्कारिक गोष्टींकडे नजर टाकायला हरकत नाही.


१९०० साली ग्रीक पाणबुड्यांनी एक बुडालेले जहाज शोधून काढले.त्यातून संगमरवरी आणि ब्रॉन्झच्या अनेक कलाकृती त्यांनी वर काढल्या.नंतरच्या संशोधनात हे जहाज जवळ जवळ २००० वर्षांपूर्वी बुडाले होते असे कळले.जहाजातून वर काढलेल्या अनेक गोष्टींमध्ये एक कसला तरी गोळाही दिसत होता;धड कुठला आकार नसलेला,रूप नसलेला हा गोळाच आपल्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा ठरला.संशोधकांनी हळुहळू काळजीपूर्वक त्याच्यावरची घाण काढून टाकली व साफ केला तेव्हा तो ब्रॉन्झचा एक पत्रा होता असे लक्षात आले.त्याच्यावर निरनिराळ्या वर्तुळाकृती चकत्याही दिसत होत्या.एकेक भाग साफ केल्यावर त्या पत्र्यावर अनेक गोष्टीही लिहिलेल्या आढळल्या.सर्वांचा संबंध खगोलशास्त्राशी होता.शेवटी लक्षात आले की ते एक यंत्र होते. त्याच्यावर एकमेकात अडकणाऱ्या अनेक वर्तुळाकृती चकत्या,

डायल्स,पट्ट्या वगैरे काय काय होते.एका बाजूचे चाक फिरवले की या सर्व चकत्या वेगवेगळ्या वेगाने फिरायला लागत. काट्यांना ब्रॉन्झची संरक्षक आवरणे होती.त्यांच्यावरही अनेक गोष्टी लिहिलेल्या होत्या.आज हे यंत्र कोणत्या तरी कुशल यंत्रज्ञ कामगारांनी बनवले आहे याबद्दल कुणालाच शंका नाही.अमेरिकन प्रोफेसर सोला प्राईस यांनी ते एक गणकयंत्र आहे आणि त्याच्या मदतीने सूर्य,चन्द्र, तारे यांच्या भ्रमणकक्षा शोधून काढता येतील असे सिद्ध केले आहे.नक्षत्रदर्शन घडवणारे छोटे तारांगणच !


हे यंत्र २१०० वर्षांपूर्वी बनवलेले आहे हे महत्त्वाचे नाही. अशा तन्हेने बनविलेले हे पहिले यंत्र नसणारच.कुतूहल एकाच गोष्टीचे असे पहिले यंत्र कोणी,कधी व कसे बनवले असेल?


१३ व्या शतकाच्या सुरुवातीला धर्मयुद्धावरून परत येताना सम्राट फ्रेड्रिक याने एक आगळाच तंबू परत आणला होता.तंबू उघडला की त्याचे छत घुमटासारखे दिसत असे.तंबूत एक छोटे यंत्रही होते.हे सुरू केले की या घुमटात नक्षत्रे त्यांच्या जागांवरून भ्रमण करायला लागत.हा सुद्धा एक छोटा प्लॅनेटोरियमच ! पण त्या काळात तो बनविण्याइतके तंत्रज्ञान तरी उपलब्ध होते; पण दोन हजार वर्षांहूनही जुने जे यंत्र ग्रीक पाणबुड्यांनी शोधून काढले आहे त्याचे काय? त्या काळात स्थिर तारे,नक्षत्रे,पृथ्वीचे भ्रमण या सर्व गोष्टी लक्षात घेणारे कोण होते? चिनी आणि अरबी खगोलशास्त्रज्ञसुद्धा याबाबतीत विशेष काही सांगू शकत नाहीत.

गॅलिलिओ गॅलिली जन्माला यायला अजून १५०० वर्षे हाती.फेड्रिकच्या तंबूबद्दल अनेक ठिकाणी वाचायला मिळते पण ग्रीक पाणबुड्यांनी शोधून काढलेले यंत्र अथेन्सच्या म्युझियममध्ये जाऊन कोणीही पाहू शकतो.


प्राचीन काळाने आपल्यासाठी सोडलेली ही आणखी काही कोडी !


दहा हजार वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेत ज्यांचे अस्तित्वच नव्हते अशा सिंह आणि उंट या प्राण्यांची चित्रे दक्षिण अमेरिकेतच समुद्रसपाटीपासून १२५०० फूट उंचीवर असलेल्या पठारांवरील खडकांवर कोरलेली आढळतात.


तुर्कस्तानमध्ये काचेच्या किंवा मातीच्या अर्धवर्तुळाकृती वस्तू सापडतात.त्या काय आहेत ते अजून कळत नाही.


अमेरिकेत नेवाडा वाळवंटात 'डेथ व्हॅली'मध्ये कोणत्या तरी प्रचंड उत्पाताने नष्ट झालेल्या शहरांचे अवशेष सापडतात.आजही वितळलेले खडक आणि वितळलेली वाळू तिथे दिसते.अगदी ज्वालामुखीचा उद्रेक झाला तरी,खडक वितळण्याइतकी उष्णता निर्माण होऊ शकत नाही.अशी उष्णता कोणत्याही कारणाने निर्माण झाली असती तर त्या शहरातल्या इमारतींवर परिणाम झालेला दिसला असता.तसा तो आढळत नाही.आज खडक वितळवण्याइतकी उष्णता निर्माण करणारी एकच गोष्ट आपल्याला माहिती आहे.ती म्हणजे लेसर किरण !


लेबॅनॉनमध्ये दोन लक्ष पौंड वजनाचा,ठराविक आकारात कापून गुळगुळीत केलेला दगड आहे.हा तरी कोणत्या मानवी हातांनी हलविलेला असणे शक्य नाही.


ऑस्ट्रेलिया,फ्रान्स,लेबॅनॉन,चिली,दक्षिण आफ्रिका, भारत इत्यादी देशात ॲल्युमिनियम,बेरिलियम असणारे विचित्र काळे दगड सापडले आहेत.अगदी अलीकडे केलेल्या संशोधनात आढळून आले आहे की,प्राचीन काळात भयंकर उष्णता आणि किरणोत्सर्गाचा वर्षाव या दगडांवर झाला असला पाहिजे.प्राचीन काळात किरणोत्सर्ग ?


ब्रिटिश म्युझियममध्ये भूतकाळातील आणि भविष्यकाळातील चन्द्रग्रहणांची माहिती वाचायला मिळते.पण ती लिहिली आहे बाबिलोनियन मृत्तिकापत्रांवर !


चीनमध्ये युनान प्रांतात झालेल्या एका भीषण धरणीकंपात कुनमिंग या सरोवरातून एक प्राचीन पिरॅमिडच वर आला.या पिरॅमिडवर अंतराळात झेप घेणाऱ्या अग्निबाणांची चित्रे कोरून काढलेली आहेत. पृथ्वीच्या पोटात आणखी किती रहस्ये,कुठे कुठे दडून राहिली आहेत हे कोण सांगणार?


 या सर्व गूढ गोष्टींचा उलगडा कोण करील आपल्यासाठी? प्रत्येक जुनी आख्यायिका,दंतकथा, पुराणकथा खोटी आहे,चुकीची आहे अशी त्यांची वासलात लावणे म्हणजे मूळ मुद्दे डावलण्यासारखे आहे.कसली भीती वाटते या लोकांना की नवीन सत्य समोर दिसले की हे डोळे झाकून घेतात आणि दुसरा कोणी नवीन सिद्धान्त मांडायचा प्रयत्न केला तर यांच्या कानांना जसे काही दडेच बसतात आणि त्यांना ऐकू येत नाही?


आज तर जगात अशी परिस्थिती आहे की दर दिवशी काही तरी नवीन घडत आहे,नवीन गोष्टी उघडकीला येत आहेत,नव्या गोष्टींचा शोध लागत आहे.आजच्या दळणवळणाच्या,वाहतुकीच्या,संदेश पाठवण्याच्या सोयींमुळे या गोष्टी तात्काळ जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहेत.ज्या उत्साहाने नवीन गोष्टींच्या शोधांकडे आपण बघतो,त्याच उत्साहाने भूतकाळातील गोष्टींकडेही आपण बघायला पाहिजे.आपल्या भूतकाळाच्या शोधाचा पहिला टप्पा संपत आला आहे. आता मानवी इतिहासाच्या नवीन साहसी पर्वाला सुरुवात होत आहे.


अंतराळ प्रवासाच्या !


२४.१२.२४ या लेखातील पुढील शेवटचा भाग...

२४/१२/२४

रहस्य आणि गोष्टी / Mysteries and things

गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासाबद्दल तसा प्रश्न नाही.तो आपल्याला व्यवस्थित माहिती आहे तरी सुद्धा रोमन,ग्रीक यांच्या देवदेवतांवर इतर महाकाव्ये, दंतकथा,आख्यायिकांवर आपल्या प्राचीन भूतकाळाची छाया पडल्यासारखी वाटते.अगदी अलिकडच्या अशा संस्कृतींचा विचार केला तरी त्यांच्या आख्यायिका आपली नजर प्राचीन भूतकाळाकडेच वळवतात.


दक्षिण अमेरिकेतील ग्वाटेमाला आणि मेक्सिकोतील जंगलात दडलेल्या मायांच्या प्राचीन अवशेषांची तुलना फक्त इजिप्त

मधल्या प्रचंड बांधकामांशीच होऊ शकते.मेक्सिकोच्या राजधानीच्या दक्षिणेस ६० मैलांवरील चोलुला येथील पिरॅमिडचे क्षेत्रफळ खुफूच्या पिरॅमिडहून जास्त आहे.तर उत्तरेकडील ३० मैलांवर असलेल्या टिओटिहुआन्का येथील पिरॅमिड ८ चौरस मैल जागा व्यापतो.


मायांची आख्यायिका सांगते की १०,००० वर्षांपूर्वी एक अत्यंत पुढारलेली अशी संस्कृती नांदत होती.माया लोक

आले कुठून हे आपल्याला कळलेले नाही अणि कुठे गेले तेही माहीत नाही.म्हणूनच त्यांनी दिलेली माहिती महत्त्वाची आहे.


मेक्सिकोतील युकातान भागात उतरल्यावर बिशप डीयागो डी लांडा यानेसुद्धा मायांच्या कित्येक हस्तलिखितांची होळी केली आणि वर प्रौढी मारली की त्या भारुडात विशेष काही नसल्याने तेथील सर्व लोकांचा विरोध मोडून काढून आम्ही सर्व गोष्टींचा नाश केला म्हणून!या विध्वंसातून मायांची फक्त तीन हस्तलिखिते वाचली आहेत आणि आज ज्या ठिकाणी ती ठेवलेली आहेत त्याच नावाने ती ओळखली जातात.


माद्रिद कोडेक्समध्ये ११२ रंगविलेल्या चित्रांची पाने आहेत.त्या चित्रांवरून काय अर्थ काढायचा हे प्रत्येकाने ठरवावे अशी परिस्थिती आहे.


ड्रेस्डेन कोडेक्सची ७४ पाने शिल्लक आहेत. खगोलशास्त्राची गणिते आणि चंद्र,शुक्र यांच्या भ्रमणाबद्दलची माहिती त्यात आहे.


मूळच्या पॅरिस कोडेक्सची तर फक्त दोनच पाने शिल्लक आहेत.मिळाली तेव्हाही बावीसच होती पण उरलेल्यांच्या प्रती तरी गेल्या शतकाच्या शेवटी काढल्या गेल्या होत्या हे नशिबच.या कोडेक्समध्ये कॅलेन्डरवर आधारित भविष्ये वर्तविली आहेत.


मायांच्या लिखाणाचा अर्थ लागत नाही याचे कारण म्हणजे वेगवेगळ्या खुणा आणि आकृत्या यांची त्यात असलेली रेलचेल.त्याच खुणा आणि तीच चिन्हे वेगवेगळ्या तऱ्हांनी वापरली की अर्थ वेगळा होतो.


मायांचे कॅलेन्डर आणि त्यांचा व्हेनुशियन फॉर्म्युला यांचा उल्लेख पूर्वीच केला आहे.मेक्सिकोतील पालेन्क, चिचेन इट्झा,ग्वाटेमालातील टिकल,होंडुरासमधील कोपान या सर्व ठिकाणची बांधकामे मायांच्या कॅलेन्डरला धरूनच झाली आहेत हे आज सिद्ध झाले आहे.त्यांना गरज होती म्हणून काही त्यांनी देवालये, पिरॅमिड बांधले नाहीत.त्यांनी पिरॅमिड आणि देवालये बांधली कारण त्यांच्या कॅलेन्डरची आज्ञा होती की इमारतीच्या इतक्या इतक्या पायऱ्या अमुक दिवसात बांधल्या पाहिजेत,

प्लॅटफॉर्म इतक्या महिन्यांनी आणि मंदिर इतक्या वर्षांत ! मायांच्या प्रत्येक इमारतीच्या दगड न् दगडाचा संबंध त्यांच्या कॅलेन्डरशी आहे.पूर्ण झालेली प्रत्येक वास्तू कॅलेन्डरप्रमाणे बांधलेली आहे.


पण मग काही तरी अघटित प्रकार घडला आणि तसे काहीच कारण दिसत नसताना त्यांची हजारो वर्षे टिकतील अशी बांधकामे,भव्य शहरे,सधन मंदिरे,पिरॅमिड यांचा मायांनी संपूर्ण त्याग केला आणि माया लोक निघून गेले.परत कधीही न येण्याकरता!त्यांची अप्रतिम शहरे बघता बघता फोफावणाऱ्या जंगलांनी व्यापून टाकली.


माया लोक का निघून गेले? याबाबत अनेक मते व्यक्त झाली आहेत.त्यांच्यावर परचक्र आले असेल असे म्हणावे तर माया त्यावेळी त्यांच्या प्रगत आणि संपन्न अशा संस्कृतीच्या अगदी अत्युच्च शिखरावर होते. त्यांच्यावर चढाई करण्याची आणि त्यांचा पराभव करण्याची ताकद त्यावेळी कुणातच नव्हती.


की हवामानात जबरदस्त फरक झाल्यामुळे मायांना देशत्याग करणे भाग पडले? पण या विचारालाही अर्थ दिसत नाही.मायांचे जुने राज्य आणि नवे राज्य यात २२५ मैलांचेसुद्धा अंतर नाही.हवामानातल्या फरकामुळे देशांतर करावे लागले असते तर माया लोकांना हजारो मैलांवर कुठल्या कुठे जावे लागले असते.


की भयानक अशा कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व पळापळ झाली?यालाही दुजोरा मिळण्यासारखे काही दिसत नाही.


की मायांमध्ये यादवी युद्ध माजले?नवीन विचारांचे तरूण आणि कर्मठ मतांची जुनी पिढी यांच्यात संघर्ष निर्माण झाला का? पण ही शक्यता विचारात घेतली तर सर्वच मायांना देशत्याग करण्याची आवश्यकता नव्हती. पराभूत मायाच देशोधडीला लागले असते.विजयी माया आपले पाय रोवूनच त्या साम्राज्यात राहिले असते.पण पुराणवस्तू संशोधकांना माया जमातीतील एक माणूस सुद्धा मागे शिल्लक राहिला होता याचा पुरावा सापडत नाही.बुद्धिमान,गणितज्ञ,

खगोलशास्त्रात पारंगत सर्वच्या सर्व माया जमात आपली शहरे,आपली पवित्र स्थाने,आपली देवळे,पिरॅमिड यांचा त्याग करून नाहीशी झाली.


आजपर्यंत अनेक बाजूंनी विचार करून ज्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही त्याबाबत आणखी एक शक्यता विचारात घेण्यासारखी आहे.तिलाही तसा पुरावा नाहीच.इतर स्पष्टीकरणाची शक्यता गृहीत धरूनसुद्धा एक नवीन विचार मांडायला हरकत नाही.


मायांच्या पूर्वजांना देवांनी (म्हणजे अंतराळवीरांनी) भेट दिली असावी.खगोलशास्त्र,गणित,कॅलेन्डर या सर्वांबाबात माया धर्मगुरू अत्यंत गुप्तता बाळगून होते.हे सर्व ज्ञान परिश्रमाने गुप्त ठेवून जतन करण्यात येत होते;कारण देवांनी मायांना वचन दिले होते की अमूक अमूक वर्षांनी ते परत येतील म्हणून!


देवांनी धर्मगुरुंना दिलेल्या आज्ञांप्रमाणे कॅलेन्डरमध्ये दिलेल्या स्पष्ट सूचनांप्रमाणे मायांनी त्यांची भव्य बांधकामे करायला सुरुवात केली.ठराविक वर्षांत ही सर्व भव्य मंदिरे,पिरॅमिड बांधल्यावर देव परत येणार होते.देव परत येण्याचे वर्ष माया लोकांच्या दृष्टीने आनंदोत्सवाचे वर्षच होते.त्यावर्षी देव परत येणार होते, त्यांनी बांधलेल्या अप्रतिम आणि भव्य मंदिरांचा, पिरॅमिडस्चा स्वीकार करणार होते आणि नंतर कायमचे त्यांच्यात राहणार होते.


दक्षिण अमेरिकेतील रहस्ये आणि इतर काही गोष्टी,देव ? छे ! परग्रहावरील अंतराळवीर ! बाळ भागवत,मेहता पब्लिशिंग हाऊस


मायांनी ते वर्ष जवळ येत असताना उत्साहाने सर्व भव्य इमारती पुऱ्या करीत आणल्या.देव परत येण्याच्या वर्षी त्यांच्या स्वागताची पूर्ण तयारी झाली होती.मंदिरे बांधून झाली होती,पिरॅमिडस् तयार झाले होते,इतर भव्य वास्तू पूर्णपणे बांधून तयार होत्या.माया लोक उत्साहाने प्रार्थना करीत होते.देवांच्या स्वागताची स्वागतगीते पाठ करीत होते.आकाशातून देवांचा दैदिप्यमान रथ कधी उतरतो याकडे नजर लावून होते.वर्षाचे दिवस सरायला लागले.मायांच्या मनात चलबिचल निर्माण व्हायला लागली.देवांना धूप,दागदागिने,

धान्य यांचे नजराणे, गुलामांचे बळी द्यायला सुरुवात झाली.पण अंतराळात संपूर्ण शांतता होती.गंभीर,मेघगर्जनेसारखा आवाज करीत येणारा देवांचा दैदिप्यमान रथ नजरेस पडत नव्हता.वर्ष संपले तरी देव आलेच नाहीत.


धर्मगुरू आणि सर्वच माया लोकांना निराशेचा किती जबरदस्त धक्का पोहोचला असेल याची कल्पना करवत नाही ! शतकानुशतके देव परत येणाऱ्या दिवसाची वाट पाहत उत्साहाने केलेली भव्य बांधकामे मातीमोल ठरत होती.माया लोकांच्या मनात किती तरी संशय निर्माण झाले असतील.कॅलेन्डर बनवण्यात काही चूक झाली का? की देव चुकून भलतीकडेच उतरले होते?की आणखी काही भयानक घोटाळा झाला होता?त्यांनी पुनःपुन्हा सर्व गणिते करून बघितली असतील.काहीच चूक नव्हती.सर्वांचा अर्थ एकच होता.देवांनी वचन देऊन ते मोडले होते.त्यांनी माया लोकांची घोर फसवणूक केली होती.सर्व गोष्टींवरचा विश्वास उडून दारूण निराशेच्या धक्क्यानेच मायांनी सर्व गोष्टींचा त्याग केला होता असेच म्हणावे लागते.


१९३५ मध्ये मेक्सिकोतील पालेन्क येथील मायांच्या पिरॅमिडमध्ये अगदी वरच्या बाजूने खाली खाली जाणाऱ्या पायऱ्या सापडल्या.

जमिनीखाली सहा फुटापर्यंत पोहोचलेल्या.अगदी सापडू नयेत. अशा उद्देशानेच बांधल्यासारख्या वाटत होत्या.खालची खोली १४ फूट लांब आणि ७ फूट रूंद अशा दगडी शिळेने बंद केली आहे.चारही कडांना मायांची चित्रलिपी,की जिचा अर्थ आपण आजपर्यंत लावू शकलेलो नाही.या शिलेवरील अप्रतिम अशा कोरीव कामाकडे समोरून,बाजूने कशीही नजर टाकली तरी अंतराळयानात बसलेला अंतराळवीरच आपण पाहात आहोत ही भावना काही मनातून जात नाही.मोटारसायकलची रेस असली तर मोटारसायकलवरचा स्पर्धक पुढे वाकून बसेल त्याच थाटात त्या चित्रातील माणूस वाकून बसला आहे.त्याच्या डोक्यावर शिरस्त्राण आहे.


या भागातील शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..!

२२/१२/२४

देव तेथेची जाणावा / May God be there

सकाळची आवराआवर करून पाटलांच्या श्रीपतीतात्यांनी शेताची वाट धरली.कारखान्याला ऊस जाऊन महिना झाला होता.औंदा खोडवं काढून भात पेरायचं ठरलेलं.आलटून-पालटून पीक घेतलं,तर मातीचा कस राहील,नाही तर पैशाच्या नादात नुसतंच ऊस पिकवत बसलं तर रानाला मीठ फुटायचं.शिवाय पोटापुरतं भात आणि ज्वारी पाहिजेच की! नुसती चिपाडं चघळून पोटं भरायची नाहीत,असा विचार करून श्रीपतीतात्यांनी ऊस तुटून गेल्यावर पाला पेटवून रान नांगरून ठेवलं होतं.त्यानंतर महिनाभर रान तसंच ठेवल्यामुळं ढेकळं चांगलीच तापलेली.

त्यातच दोन दिवसांपूर्वी पावसाचं सरवाट येऊन गेलं.तापलेल्या रानावर पावसाच्या सरी बरसल्यामुळं रानात कुळवायला चांगलीच घात आलेली.


बाहेरगावी शिकायला असलेला पोरगापण सुट्टी असल्यामुळं काल संध्याकाळी आला होता.आज तो हाताखाली आहे तोवर रान कुळवून पुरं करायचं. कारभारीन न्ह्यारी घेऊन आली की दुपारच्या म्होरं कस्पाटं येचून दिंडं फिरवलं की रान पेरायला तयार. रोजगारी माणसांकडून शेती करून घेणं गरीब शेतकऱ्याला कुठलं परवडतंय?घरातल्यांनी राबायचं म्हणजे हाताला काम झालं की खाल्लेल्या अन्नाचं रक्त होतंय,नाही तर पोटावर चरबी साठती,पाटील आपल्या विचारातच गुंग होतं.


तात्यांची शेती कमी असल्यामुळं ट्रॅक्टरनं मशागत करून परवडणारं नव्हतं.त्यांचं म्हणणं असायचं की,विकतचं बी-बियाणं आणि महागड्या खतांचा वापर करण्यापेक्षा गारीत कुजलेलं शेणखत टाकून मातीचा पोत जपायचा. ज्यांची शेती जास्त आणि घरात माणसं कमी,त्यांना ट्रॅक्टर परवडतोय.कमी खर्चात पारंपरिक शेती करताना भले उत्पादन कमी झालं,तरी कसदार धान्य पिकतं. ज्याच्या वाट्याला कमी शेती आहे,त्यांनी बांधावर बसून शेती पिकवू नये.दावणीची चार जनावरं ही शेतकऱ्याचा दागिनाच असतोय.घरात दुभतं जनावर असलं तर पोरं धष्टपुष्ट होणारच.


श्रीपतीतात्यांना एकच पोरगा.तसा तो शांत स्वभावाचा. वडील वारकरी असल्यानं मुलाचं नाव सोपान ठेवलं. त्याच्या आईची इच्छा होती की,सोपानला पाठीराखा भाऊ असावा आणि राखी बांधायला बहीण असावी. पोरगी कधीतरी स्वयंपाकात मदत करील आणि आपल्या माघारी हंबरडा फोडून गाव गोळा करील. पोरगी नांदायला गेली,तरी ती येईपर्यंत आई-वडिलांचं प्रेत दारात थांबवून ठेवतात.नाही तर पोरं लगेच लोटकं उचलून निघालं,

असा आईचा समज. वडील वारकरी संप्रदायातील.एकतर आपल्याला जमीन थोडी.रहायला दोनआखणी घर.त्यात वाटण्या करून भावाभावात भांडणं कशाला म्हणत एक मुलगा बास.अशा विचाराचे तात्या.त्यांनी मुलावरपण चांगलं संस्कार केलं. 


सोपानला सुपारीच्या खांडाचंपण व्यसन नव्हतं. कोणाशी लांडीलबाडी नाही की,चोरीचपाटीत कधी नाव नाही.दरवर्षी पारायणात ग्रंथ वाचायला बसायचा.कोणी हाक मारली तर कामाला नाही म्हणत नव्हता. गोठ्यातल्या जनावरांचं शेण काढण्यापासून वैरण आणणं,औत धरणं किंवा पिकाला पाणी पाजणं अशी शेतातील सगळी कामं तो करायचा.घरात आईला मदत करायला लाजत नव्हता.गिरणीतनं दळणकांडप आणणं,

दुकानातनं किराणा सामान आणणं हे तर नित्याचंच;पण आई आजारी असली किंवा रानात काम करून दमली असली,तर घरातील भुई शेणानं सावरायचा,तांदूळ निवडून शिजत घालून भाकरीला पीठ मळायचा.खरकटी भांडी घासून धुवायचा.इतका गुणी मुलगा कधी आई-वडिलांना उलट उत्तर देताना शेजाऱ्यांनी ऐकलं नाही.असा हा कष्टाळू सोपान अभ्यासात एक नंबर नसला तरी शिक्षकांची कधी तक्रार येईल इतका कमी नव्हता.चांगले शिक्षण घेऊन शिक्षक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून होता.


तात्यांनी आज उजाडल्यापासून रानात औताला सुरुवात केली होती.सूर्य डोक्यावर यायच्या आधी कुळवून संपवायचं ठरवलेलं.

बांधाकडंला झाडाच्या मुळ्यात कुळवाची फास आडकू नये म्हणून तात्यांनी स्वतःदावी हातात घेतली.अर्ध्यापेक्षा ज्यास्त काम उरकल्यावर पोराच्या हातात कासरा देऊन तात्या पलीकडच्या उसात घुसलं.त्यांनी कोंबाच्या आणि कवळ्या बांड्याच्या चार- पाच पेंड्या काढून आणल्या.तोवर सोपान औत पुरं करून बैलांना शेजारच्या पाटात पाणी पाजून छपरात घेऊन आला.बैलं दावणीला बांधून आंब्याच्या झाडाखाली घोंगडं टाकून बसला.आई जेवण घेऊन आली.तात्यांनी बैलाच्या पुढ्यात वैरणीच्या पेंढ्या टाकल्या आणि हाता-पायावर पाणी घेतलं.तिघांनी मिळून भाकरी उचलल्या.सोपानला गेले तीन महिने खानावळीतलं खाऊन कंटाळा आला होता.त्यात आज सकाळपासून कुळवावर हादरून कडकडीत भूक लागलेली.आईच्या हातची चुलीवर खरपूस भाजलेली भाकरी,भरलं वांगं,झुणका बघितल्यावर त्याच्या तोंडाला पाणी सुटलं.दोन भाकरी खाऊन भात खाल्ला,वर ताकाचा पेला रिता केला आणि ढेकर दिला,तसा आईचा चेहरा समाधानानं खुलला.


 उन्हाची किरणं तिरकी होईपर्यंत सोपाननं झाडाखाली ताणून दिली.तोवर कारभारणीच्या संगतीनं तात्यांनी अर्धअधिक रान वेचून कचऱ्याचं ढीग केलं.थोड्या वेळानं सोपान उठला आणि त्यानं सगळं ढीग पाटीत भरून ओढ्याच्या काठावर टाकलं.

दिंडाला बैलं जुपली. दिवस मावळतीकडं कलला तसं त्याच्या आईची आवराआवर सुरू झाली.जेवणाची रिकामी भांडी आणि त्यात थोडं जळण घालून बुट्टी डोक्यावर घेतली आणि तिनं घराची वाट धरली.तिला संध्याकाळच्या स्वयंपाकाचं वेध लागलं होतं.

आज पुरणपोळीचा बेत होता.तसं बघितलं तर रविवारी कुरवाड्यांच्या घरात वशाटाचा वास घमघमतो;पण श्रीपतीतात्या वारकरी. घरात रोज पोथी वाचली जायची.त्यामुळं हे कुटुंब शाकाहारी होतं.सोपानला पुरणपोळी आणि कटाची आमटी जास्तच आवडायची.शेवटी आईच्या हातच्या आमटीची चव कुठंच नसते,हे तो पक्कं जाणून होता.


संध्याकाळी जेवणखाण आटोपून आजूबाजूच्या आयाबाया गोळा झाल्या की,वडील पंढरीतून आणलेली पोथीपुराणं वाचून दाखवत.

आज मात्र सोपानवर वाचनाची जबाबदारी आली होती.गावातील काही घरांत टी.व्ही.आला,तसा कीर्तनाला येणाऱ्यांचा ओघ कमी झाला;पण श्रीपतीतात्यांच्या घरात टी.व्ही.नव्हता. पोरगा शिकून मोठा झाला तसा वडील त्याला पोथी वाचायला लावायचे आणि आपण ऐकायचे. 


दिवसभराचा थकवा निघून जायचा.शिवाय उगीच पारावर बसून गावाच्या कागाळ्या ऐकण्यापेक्षा घरात बसून ओव्या ऐकलेल्या बऱ्या,हा सरळ आणि साधा विचार श्रीपतीतात्यांनी रूजविला होता.याचा फायदा असा झाला की,घरात कोणी एकमेकांना खेकसत नाही. कोणी कोणाशी भांडत नाही.एखादा विचार पटला नाही तर 'रामकृष्ण हरी' म्हणत पुढे निघून जावं.शब्दानं शब्द वाढवून वाद घालत बसायचं नाही.जे योग्य आहे ते काळ ठरवेल.

मुखी पांडुरंगाचं नाव घ्यावं.मनात वाईट विचारांना थारा नाही.

वडील स्वतः निर्व्यसनी.त्यामुळं पोराच्या तोंडाला कधी वास आला नाही.कधी चोरी-लबाडी नाही.पोराला शिकवून मास्तर करावं,ही त्यांची माफक अपेक्षा.सोपन आता जिल्ह्याच्या ठिकाणी विज्ञान शाखेत पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. पदवीनंतर बी.एड्.करायचं ठरवलं होतं.


वाघीण-प्रतिक पाटील-स्वच्छंद प्रकाशन कोल्हापूर


दोन दिवस सुट्टीला घरी आलेला सोपान सोमवारी सकाळची पहिली गाडी पकडायचा;तरच त्याला महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत होतं.महिनाभर पुरंल इतका शिधा सोबत घेऊन तो घरातून बाहेर पडला.गावातल्या बायका नळावर पाणी भरायच्या लगबगीत होत्या.रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला होता.त्यामुळं सकाळी हवेत गारठा पसरलेला.प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतलेला.कोणी दारात उभा राहून दात घासत होतं,तर कोणी टमरेल घेऊन पांदीची वाट धरलेली. कोणी दुधाची भांडी घेऊन वस्तीवर निघालेलं.सकाळी शाळेत जाणाऱ्या पोरांचीदेखील घाई सुरू होती.


काही क्षणापूर्वी एस.टी.साठी गेलेला सोपान घराकडं परत येताना दिसला.सोबत कोणीतरी पोरगी होती. गावातल्या बायका आश्चर्यानं डोळं फाडून त्या दोघांकडं एकटक बघू लागल्या.'आगं ही तर ती ओढ्याकाठची संगी.हिच्या खांद्यावर हात ठेवून हा सोपान तिला घराकडं घेऊन का निघालाय?' बायकांच्या चर्चेला नवाच विषय मिळाला.त्या एकमेकींच्या कानाजवळ पुटपुटू लागल्या.

प्रत्येकजण आपापल्या परीनं तर्क लावायला लागलं.सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्यांची संख्या आपल्याकडं खूपच आहे.


संगी लहानपणी सोपानच्याच वर्गात शिकत होती. वडील दारूडा.

आई मोलमजुरी करून घर चालवायची. बाहेरच्या गावातून पोट भरायला या गावात आलेलं हे कुटुंब.त्यांना जमीन नाही की शेती नाही.गावाबाहेर ओढ्याच्या काठावर झोपडी बांधून राहिलेलं.बाप दारूच्या आहारी जाऊन त्याच्या कर्मानं मरून गेला, त्यावेळी संगी अवघ्या दोनच वर्षांची होती.उमलत्या कळीच्या वाट्याला आलेलं तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख.मग घराची सगळी जबाबदारी आईवर पडणं साहजिकच.आई गावातल्या प्रत्येकाच्या शेतात कामाला जायची.पोरीनं शिकावं म्हणून तिनं संगीला शाळेत पाठवलं.संगी सातवीत असताना आईनं आजारपणात अंथरुण धरलं,तसं संगीनं शाळा सोडून मोलमजुरी करून आईला सांभाळलं.दोन वर्षांपूर्वी आईपण गेली.आई-बापाचं छत्र हरवल्यामुळं पोरसवदा संगी पोरकी झालेली.तरीही तिनं जिद्द हरली नाही.ती एकटीच झोपडीत राहून उदरनिर्वाह करू लागली. ओढ्याच्या घाण वासानं झोपडीत कोणी जात नव्हतं.


काल रात्रीच्या अवकाळी पावसानं तिची झोपडी वाहून गेली.तिच्यासोबत संगीचा सगळा भूतकाळ धुवून गेला.रात्रभर ती पावसात देवळाच्या ओसरीवर कुडकुडत बसली होती.

अंगावरच्या भिजलेल्या कपड्याशिवाय तिच्याकडे काहीच नव्हतं.

सोपान घाईघाईनं एस.टी. स्टँडकडं चालला असता,त्याचं लक्ष संगीकडं गेलं.तो तिच्याकडं विचारपूस करायला गेला. 


त्यावेळी सारा प्रकार तिनं त्याला सांगितला. मागचा-पुढचा विचार न करता सोपाननं तिला सोबत घेऊन आपल्या घरचा रस्ता धरला.अंग चोरून घेऊन संगी सोपानसोबत घरी जाताना वाटेत बघणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या.दारात उभा राहूनच सोपाननं आईला हाक मारली आणि जोरात म्हणाला, "आई,तुला मुलगी पाहिजे होती ना.बघ मी तुझ्यासाठी तिला घेऊन आलोय." सोपान असा अचानक परत का आला म्हणून त्याचे आई-वडील धावतच दारात आलं आणि समोरचं दृश्य बघताना दोघांच्या तोंडातनं एकदम शब्द बाहेर पडलं... "आरं, ही तर ओढ्याकाठची संगी हाय.इकडं का घेऊन आलाईस तिला?"


'हिची आई मरून गेल्यापासून ती एकटीच झोपडीत रहात होती.कालच्या पावसानं झोपडी वाहून गेली.हिची आई शाळेच्या बाहेर पेरू,चिंचा,लेमनच्या गोळ्या विकायची.त्यावेळी मी तिला मावशी म्हणून हाक मारत होतो.माझ्याकडं पैसं कमी असलं तरी ती मला कधी माघारी पाठवत नव्हती.संगी आमच्या वर्गात होती.आई आजारी पडली त्यामुळं ती शाळा सोडून मोलमजुरी करायची.आईपण देवाघरी गेल्यामुळं आता तिला कुणाचाच आधार नाही.तिच्या पाठीशी मी भाऊ - म्हणून उभा राहणार हाय.आपण तिला शाळा शिकवून तिचं कन्यादान आपण करूया.'


सोपानचं विचार कानावर पडताच वडिलांनी आकाशाकडं बघत देवाचं मनोमन आभार मानलं आणि त्यांनी अक्षरशः लेकाच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणालं, 'पोरा आज तुझ्या मुखातून माझा भगवंत बोलला. जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा.पोरा पोथी पुराण वाचणं चांगलं हाय;ते आचरणात आणणं आवश्यक हाय.ते तू केलंस. इतक्या दिवसांत कधी जाणवलं नाही;पण आज हिच्या रूपात आमच्या दारात मुक्ताई आली...'