* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१६/११/२३

भेटकार्ड फकस्त वीस रुप्पय… Gift card only twenty rupees...

साताऱ्याचे श्री. प्रकाश देवकुळे या अवलिया माणसाचं नाव अनेक जणांना निश्चित माहिती असेल.

कलावंत माणूस.... ! 


"माणूस" म्हणजे खऱ्या अर्थाने माणूस...! 

दिलीप कुमार यांच्यावर अतिशय प्रेम...


इंग्लिश ग्रीटिंग कार्ड ला मराठी बाज देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा...!


या माणसाने मला मुलगा समजून पोटाशी धरले…आणि मायेची सवय लावून एकाकी टाकून अचानक सोडून सुद्धा गेले... 


माझ्याशी बोलताना नेहमी ते "आब्या लेका..." या वाक्यानंच सुरुवात करायचे... ! 

मी त्यांना काका म्हणायचो. 

एके दिवशी काकूंचा मला फोन आला आणि म्हणाल्या,'काकांनी बनवलेली जवळपास दोन ते अडीच हजार ग्रीटिंग कार्ड घरात पडून आहेत, ती तुला देते,तू या दिवाळीनिमित्त तुझे मित्र मंडळी आप्तेष्ट नातेवाईक आणि जवळचे लोक यांना ती भेट दे.'


'तुझ्या ताब्यात ती ग्रीटिंग कार्ड आली तर काकांना बरं वाटेल', हळव्या आवाजात काकू बोलल्या होत्या...


मी ही सर्व ग्रीटिंग कार्ड घरी घेऊन आलो आणि मनातल्या मनात आता ही ग्रीटिंग कार्ड कोणा कोणाला द्यायची याचा विचार करायला लागलो. 


काकू म्हणाल्या होत्या,'ही ग्रीटिंग कार्ड दिवाळीनिमित्त तुझे मित्र मंडळी आप्तेष्ट नातेवाईक आणि जवळचे लोक यांना ती भेट दे.'


आता माझी "मित्र मंडळी आप्तेष्ट नातेवाईक आणि जवळचे लोक" म्हणजे माझी याचक मंडळी...! 


यांना ही ग्रीटिंग कार्ड देऊन काय उपयोग ? 


ग्रिटींग कार्डने काय पोट भरणार आहे थोडंच त्यांचं ? 


की दिवाळी गोड होईल त्यांची ... ?


आणि झटकन मनात एक विचार चमकून गेला... 


होय,ही ग्रीटिंग कार्ड या याचक मंडळींना दिली तर त्यांचं पोटही भरेल आणि दिवाळी सुद्धा गोड होईल... ! 


१०० आणि १५० रुपयांचं हे एक ग्रीटिंग कार्ड जर माझ्या याचक कुटुंबाला दिलं आणि त्यांनी ते रस्त्यावर फिरून अगदी वीस रुपयात जरी विकलं तरी त्यांना याचे पैसे मिळतील..! 


१००-१५० रुपयांचं कार्ड 20 रुपयांत कुणाला नकोय.? 


ठरलं तर मग... ! 


या ग्रीटिंग कार्ड चे १००/१०० चे गठ्ठे केले आणि आज मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून, माझ्या कुटुंबातल्या अंध-अपंग अशा २५ बांधवांना हे गठ्ठे ते बसतात.तिथे जागो-जागी नेवुन दिले. 


२० रुपयाला एक याप्रमाणे हे विकले तर १०० ग्रीटिंग कार्ड चे रू.२००० दिवाळी सुरू होण्या अगोदर यांना मिळतील. हातात ही भेटकार्ड पडल्या पडल्या अनेकांनी तर रस्त्यांतच ग्रिटींग कार्डची मांडणी सुद्धा केली... 


आणि रस्त्यावरच्या येणा-या जाणाऱ्या कडे पाहुन आवाज देवु लागले... 


चला घ्या वीस रुप्पय... वीस रुप्पय... भेटकार्ड फकस्त वीस रुप्पय ...! 


माझ्यासमोरच बघता बघता व्यवसाय सुरुही झाला. 


अर्थात सर्व ठिकाणी बोहनी माझ्या नी मनिषाच्या हातची !


आनंदाची बाब अशी,की यातील अनेक मंडळी मला म्हणाली,विक्रीतील काही पैसे आम्ही तुम्हाला परत करु म्हणजे,त्या पैशातुन तुम्हाला 'आमच्यासारख्या आजुन  दोगाचौगांना मदत करता येईल...!'त्यांना हे असं वाटायला लागणं,याहुन मोठा आनंद कोणता असेल ??


मंगला थिएटर शिवाजीनगर,कॕम्प परिसर,सेंट अँथनी चर्च,शनिवारवाडा परिसर याठिकाणी २० रुपयांत कुणी अंध अपंग बांधव ग्रिटींग कार्ड विकतांना दिसला तर बेशक तो माझा "नातेवाईक आणि आप्तेष्ट " समजावा !

माझ्या नात्यातल्या या "माणसांना" कष्टकरी व्हायचंय... गांवकरी व्हायचंय... !  यांना भीक देवुन परावलंबी करण्यापेक्षा स्वावलंबी होण्यासाठी मदत करु,या दिवाळीत. ! 


फटाके उडवुन पाच सेकंदांची रोषणाई करण्यापेक्षा फक्त एक दिवा लावु, कुणाच्यातरी आयुष्यात कायमचा "प्रकाश" उजळवु,या दिवाळीत ... !


सगळी ग्रीटिंग कार्ड याचक मंडळींमध्ये विक्रीसाठी वाटून संपली आणि मी भानावर आलो... 


मी जे केलं ते काकूंना आवडेल का ???


मग मी काकूंना भीत भीत फोन लावला आणि मी जे केलं ते सविस्तर सांगितलं... खरंतर मी आधीच सांगून परवानगी घ्यायला हवी होती. 


पण आधी करायचं आणि नंतर कबुली द्यायची ही वाईट खोड माझी आधीपासुनचीच...


असो...!


फोनवरच माझं बोलणं झाल्यानंतर पलीकडे शांतता होती. मला वाटलं,मी जे केलं,ते काकूंना ते आवडलं नसावं.बर्‍याच वेळाने पलीकडून एक अस्पष्ट हुंदका ऐकू आला...! 


थरथरत्या आवाजात काकू म्हणाल्या..., 'लग्न झाल्यापासून प्रत्येक दिवाळ सण आम्ही दोघांनी मनापासून साजरा केला.पण या दिवाळीला मात्र ते नाहीत... !'


'रस्त्यात भेटून प्रत्येकाच्या हातात ग्रीटिंग कार्ड देऊन,शुभेच्छा देण्यात आणि घेण्यात त्यांना खूप आनंद वाटायचा... !' 


'आज वेगळ्या पद्धतीने नेमकं तु तेच केलंस... तू नुसत्या शुभेच्छा नाही दिल्यास,तर या लोकांच्या आयुष्यात ख-या अर्थानं आनंद फुलवलास.... आज काका असते तर त्यांनी तुला डोक्यावरच उचलुन घेतलं असतं.... आज तु जे केलंस,मला वाटतं हीच काकांना खरी श्रद्धांजली ठरेल...! 


यापुढे काकू काहीच बोलल्या नाहीत... पण मला मात्र फोनवर हुंदके ऐकू येतच राहिले... ! 


मी फोन ठेवला आणि माझ्या कानावर हाक आली..., 'आब्या लेका....'


मी चमकून इकडं तिकडं पाहिलं... पण आसपास कुणीच नव्हतं. 


का कुणास ठाऊक पण,

माझं लक्ष आभाळाकडे गेलं... 


आज आभाळ सुद्धा काकांच्या रुपात हसत आहे,असा मला भास झाला... !


मनोमन प्रकाश देवकुळे काकांना नमस्कार करुन,मी ही माझ्या मंडळींच्या आवाजात आवाज मिसळला.... 


चला घ्या वीस रुप्पय... वीस रुप्पय... भेटकार्ड फकस्त वीस रुप्पय... !!!


१०  नोव्हेंबर २०२०


डाॕ.अभिजीत सोनवणे 

भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर

१४/११/२३

मी आईला 'दत्तक' घेतलं.. I 'adopted' my mother..

हा मला भेटला साधारण तीन वर्षांपूर्वी.... रस्त्यावर पडलेला होता.... मी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जात होतो.

तेव्हा मला हा दिसला.... महिना जानेवारी २०१९ ! 


उघड्या अवस्थेत असलेला हा.... एका भिंती कडेला पडून होता... आधी याच्या अंगावर ब्लॅंकेट आणून टाकलं आणि त्याला एडमिट केलं होतं.....तो तापाने फणफणला होता.....


डॉक्टर म्हणाले, 'वाचण्याची शक्यता कमी आहे'.... परंतु तो वाचला....परत बाहेर आल्यानंतर पुन्हा आजारी पडला.... पुन्हा त्याला ऍडमिट केलं.... यावेळी डॉक्टर म्हणाले,'आम्ही काहीच करू शकत नाही.' 


पण याहीवेळी तो वाचला.... आणि काही काळाने पुन्हा आजारी पडला.... श्वासामध्ये घरघर चालू झाली.... मी त्याला पुन्हा एडमिट केलं.... डॉक्टर म्हणाले, 'हा काही तासांचा सोबती आहे....'


तरीही तो यातून वाचला.... 


यापुढेही दोनदा तो गंभीर आजारी पडला आणि आपण त्याला ऍडमिट केले आणि तिथेही तो वाचला.... 


मी डॉक्टरांचे आभार मानू की निसर्गाचे ????  


याला कोणीही नाही.... वडील लहानपणी वारले.... याच्या आईने याचा सांभाळ केला.... 


परंतु दहा बारा वर्षाचा असताना त्याची आई याला सोडून गेली... आई वर याचा खुप जीव होता.... ! 


आई ...आई....  म्हणून तो खूपदा तिची आठवण काढायचा! 


पाच वेळा तो वाचला गंभीर आजारातून.... 


हा चमत्कार कसा घडला मलाही कळत नव्हतं.... ! 


एकदा पूर्ण बरा झाल्यानंतर मला म्हणाला, 'सर मी आता परत रस्त्यावर झोपायला जाऊ का ?'


मी त्याला म्हणालो, 'पाच वेळा तुला वाचवला.... इतका तुझ्यावर खर्च केला.... तो तू रस्त्यावर झोपावं म्हणून का रे नालायका ?' 


तो यावर हसत लाडीगोडी लावत मला म्हणाला होता, 'मग मी तुमच्या कामात तुमाला मदत करू का ?' 


या नंतर मी त्याला माझ्या कामात मदतनीस म्हणून घेतलं ....परंतु मी त्याला जास्त पगार देऊ शकत नव्हतो.... शेवटी भिक्षेकरीच की मी ! 


एकदा त्याला म्हणालो, 'तुला आता मी भाजी विकण्याचा व्यवसाय टाकून देतो,

 तो तू कर... !' 


'व्हय.... चालतंय की सर', अस तो तेव्हा म्हणाला होता.  


आणि यानंतर मी त्याला एक सायकल घेऊन दिली.... त्या सायकलला कॅरेज लावून दिलं ....आणि त्याला भाजीचा व्यवसाय टाकून दिला.... 


त्याला सेटल करून मी त्याचा हात सोडला होता.... स्वतंत्रपणे जगण्यासाठी.... ! 


आज मला तो पुन्हा भेटला कॅम्प मध्ये....सायकलच्या कॅरेजला भाजी लावून तो धंदा करत होता .... 


ए.... मेथी घ्या वीस रुप्पय पेंडी.... वीस रुप्पय पेंडी....वीस रुप्पय पेंडी....! 


माझ्या या पोराला पाहून माझा उर भरून आला.... 


हा तोच होता ज्याला पाच वेळा मरता-मरता वाचवलं होतं....


माझ्या तोंडावर रुमाल आणि गॉगल होता....  मी त्याच्या जवळ जावून  म्हणालो, 'पाच रुपये पेंडी देतो का ?'


अर्थात त्याने ओळखलं नाही.... 


साहजिकच त्याला राग आला.... तो म्हणाला, 'तुमच्यासारख्या लोकांमुळे शेतकरी मरत आहे... हे असे बुलेट आणि कार मधून येता.... नाही तिथे खर्च करता .... आणि आमच्या सारख्या गरीब लोकांकडे बार्गेनिंग करता.... वगैरे वगैरे तो खूप काही बोलत होता....


या नंतर मी हळूच माझ्या डोक्यावरची कॅप काढली... रुमाल काढला... आणि गॉगल काढला.... 


आणि म्हणालो, 'ए येड्या, मला "वीस रुप्पय पेंडी" लय महाग वाटती,परवडत नाय.... पन्नास रुपयाला एक पेंडी देशील का.... ?


मला पाहून तो चमकला ....माझ्याकडे त्याने नीट पाहिलं ....आणि रस्त्यावर लोटांगण घातलं.... 


'अवो सर.... आवो ... तुमि.... आयला... वलकला नाय.... मापी करा.... '


गाडीवरून उतरून मी त्याला आलिंगन दिल.... अक्षरशः त्याच्या कपाळाचं आणि हाताचं चुंबन घेतलं.... 


त्याला पुन्हा हसत म्हणालो, 'मला वीस रुप्पय नको.... पन्नास रुपयांना पेंडी दे....'


तो म्हणाला, काय किंमत करता सर ?', 'आक्ख आवीष्य तूमी मला दिलं आहे.... सगळ्या पेंढ्या घीऊन जा की हो'


यानंतर त्याच्या सगळ्या पेंड्या पन्नास रुपये प्रमाणे विकत घेऊन मी रस्त्यात वाटल्या होत्या.... 


यावर तो रडत होता आणि मी हसत होतो....! 


कुणी रडताना.... हसण्याची ही माझी पहिलीच वेळ....!!


हा तोच होता.... रस्त्यात पडलेला .... 

कधीही जाईल अशा अवस्थेतला .... 

पाच वेळा अतीगंभीर अवस्थेतून सुद्धा हा वाचला...का वाचला ? कसा वाचला ?  कोणी वाचवले याला मला कळलं नव्हतं...!


याच्याच शेजारी एक आजी भाजी विकत होती.... ती आमच्या दोघातला संवाद पाहून जवळ आली आणि त्याला खुणेनं विचारलं, 'कोण आहे रे हा ?' 


त्याने,तीला काय सांगितलं मला माहित नाही, परंतु हात जोडत ती माझ्या जवळ आली होती....


मी त्याला खुणेनं विचारलं,

'आता हि आजी कोण ?' 

तो म्हणाला, 'ही माझी आई आहे'

मी चक्रावलो,मी त्याला म्हणालो,'अरे तुझी आई तर तुझ्या लहानपणीच वारली....मग ही कोण...? 


तो म्हणाला,'ही,आई माझ्यासारखीच रस्त्यावर पडली होती.... मी सावरल्यानंतर तीला म्हणालो, मी भाजी विकतो आई,त्यातली तुला थोडी देतो.... तू सुद्धा विक... ती तयार झाली आणि आम्ही दोघेही आता तुमच्या पैशातून दिलेली भाजी विकतो.... !


आई म्हणून मी तिला दत्तक घेतलंय सर....! 


तो सहजच बोलून गेला....


माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं.. 


'अरे नालायका,आईबाप दत्तक घेतात रे पोरांना....आज तू आईच दत्तक घेतलीस....  रस्त्यावरच्या आईला दत्तक घेऊन आज तू "लायक" झालास रे .... तूच आज बाप झालास की रे....' 


म्हटलं, 'येड्या, तु हे कुठून शिकलास ?' 


म्हणाला सर,'मी तुमचा "आशीश्टन्ट" म्हणून काम करत होतो ना तवा शिकलो... आपुन खड्ड्यातून भायेर आल्यानंतर..... दुसऱ्याला पण  खड्ड्यातून भायेर काढायचं....  सर तुमी शिकवलं व्हतं ना.... ईसरले ना सर तुमी ? मी नाय  इसारलो...' 


मी कसा इसरेन येड्या ..... ? माझ्या आयुष्याचं गाणं आहे ते.... तुला काय आणि कसं सांगू ? 


ओहो....आत्ता मला कळलं....

तुला पाच वेळा मरताना निसर्गानं का वाचवलं ? 

"तुला एक आई दत्तक घ्यायची होती ना येड्या..... !"


डाॕ.अभिजीत सोनवणे,डाॕक्टर फाॕर बेगर्स

भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर...

१२/११/२३

सैतानाचा शिष्य मॅकिऑव्हिली.. Machiavelli,Devil's Disciple

इतिहासात प्रामाणिक दुष्ट-शिरोमणी कोणी असेल,तर तो मॉकऑव्हिली होय.ज्या काळात लोक देवदूतांप्रमाणे बोलत व डाकूंप्रमाणे वागत, त्या काळात तो होऊन गेला.तो स्पेनच्या फर्डिनंड राजाचा समकालीन होता.

फर्डिनंड ही काय व्यक्ती होती हे आपण पूर्वी पाहिलेच आहे.लोकांना विषे देऊन त्यांच्या आत्म्यांना पुन्हा आशीर्वाद देणारा पोप सहावा अलेक्झांडर व त्याचा मुलगा सीझर बोर्जियो यांचा तो समकालीन होता.त्या काळात पोपांना लग्नाची परवानगी नसे.पण त्यांना मुले असली तरी मात्र चालत ! सीझर बोर्जियो हा सत्पात्र पित्याचा सत्पात्र पुत्र होता.त्याने आपल्या वडील भावाचा खून केला व आपल्या मेहुण्याचा,तसेच जे जे मार्गात आडवे आले,त्या सर्वांचा वध केला. दंभकलेत तो पित्याप्रमाणेच पारंगत होता, दुसऱ्यांचे खून करण्यात पटाईत होता.मित्रांना मिठी मारता मारता तो खंजीर भोसकी, जेवावयास बसलेल्यांना अन्नातून विष चारी. पित्याच्या कारस्थानामुळे मध्य इटलीतील मोठ्या भागाचा तो ड्यूक झाला व स्वतःच्या कारवायांनी पश्चिम युरोपातील राजामहाराजांत मानाचे व महत्त्वाचे स्थान मिळविले.राजा फर्डिनंड,पोपअलेक्झांडर व सीझर बोर्जियो हे त्या काळातील तशा प्रकारच्या लोकांचे जणू प्रतिनिधीच होते!त्यांच्याप्रमाणे वागणारे पुष्कळ लोक त्या काळात होते.सामान्य लोकांचे लक्ष स्वर्गाकडे वळवून त्यांचा संसार हे लुटून घेत,त्यांना पारलौकिक गोष्टीत रमवून त्यांच्या ऐहिक वस्तू हे लुबाडीत,यांना न्याय व दया माहीत नसत,सत्ता व संपत्ती हीच यांची दैवते ! ईश्वराच्या शब्दावर आमचा विश्वास आहे असे हे दाखवीत;पण वस्तुतः स्वतःच्या स्वार्थाचा आवाज मात्र ऐकत.बायबल म्हणजे गुलामांचे आचारपुस्तक असे हे मानीत.ज्यांना जगात मोठेपणा मिळवावयाचा आहे, सर्व विरोध नष्ट करायचे आहेत,वैभवाच्या शिखरावर चढायचे आहे,त्यांच्यासाठी बायबलांतील आज्ञा नाहीत.पण फर्डिनंडसारख्यांच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय आहे व ते म्हणजे लोकांचे पुढारी होणे.त्यांच्या मते,एकच वर्तन योग्य असे व ते म्हणजे पशूचे वर्तन.मॅकिऑव्हिलीच्या काळातील महत्त्वाकांक्षी युरोपचे ध्येय हे असे होते.सर्व लोकांना वाटत होते की,नवे नीतिशास्त्र हवे. मात्र दंभामुळे त्यांना तसे बोलण्याचे धैर्य नव्हते.


त्यांना असे नीतिशास्त्र हवे होते की,त्याच्या योगाने कसे फसवावे व कसे चोरावे,हे शिकावयास मिळेल;सर्वांच्या डोक्यांवर बसता यावे म्हणून कोणास कसे ठार करावे हे सांगणारे नीतिशास्त्र त्यांना हवे होते.थोडक्यात म्हणजे,त्यांना चोरांचे व डाकूंचे एक क्रमिक पुस्तक पाहिजे होते.ही उणीव मॅकिऑव्हिलीने दूर केली. माणसे खरोखर जशी होती,तशी त्याने रंगविली.

माणसे जशी दिसतात,तशी नसतात.

मॅकिऑव्हिली यथार्थवादी होता.युरोप रानटी प्राण्यांचे एक वारूळ आहे,असे त्याने दाखवून दिले व निर्लज्ज आणि बेशरम मोकळेपणाने या रानटी पशुपणात कसे यशस्वी व्हावे,हे युरोपियन जनतेस समजेल अशा भाषेत सांगितले.त्याने युरोपला पशुत्वाचे एक नवीन सूत्रमय शास्त्रच दिले.जगाने धक्का बसल्याचा बहाणा केला,पण मनात त्याला गुदगुल्याच झाल्या.! मॅकिऑव्हिलीने नेमके त्याच्या मनातलेच सांगितले होते.सुवर्णमध्याच्या कायद्याऐवजी त्याने लोखंडी कायदा दिला.ख्रिस्ताचे पर्वतोपनिषद त्याने अव्यवहार्य स्वप्न म्हणून फेकून दिले! त्याऐवजी त्याने तलवारीचे उपनिषद उपदेशिले.तोही इतरांप्रमाणे जंगलीच होता;पण तो निदान दांभिक तरी नव्हता.जंगली असून तो साळसूदपणाचा आव आणीत नसे.मॅकिऑव्हिली हा जन्माने फ्लॉरेन्स्टाइन होता. युरोपातील अनेक दरबारांत त्याला मुत्सद्देगिरीचे शिक्षण मिळाले होते. इ.स.१५०२ ते इ.स. १५१२ पर्यंत दहा वर्षे तो फ्लॉरेन्सच्या आमरण अध्यक्षाचा सॉडेरिनी याचा उजवा हात होता. युरोपातील नाटकाच्या पडद्याआड चाललेल्या भानगडी नीटपणे पाहण्याची संधी त्याला मिळाली.त्याने फ्लॉरेन्सच्या सैन्याची पुनर्रचना केली;

सॉडेरिनीची भाषणे तोच लिहून देई; सॉडेरिनीच्या पुष्कळशा कृत्यांबद्दलही तोच जबाबदार होता.लॉरेंझो डी मेडिसी याने जेव्हा सॉडेरिनीस पदच्युत केले,तेव्हा मॅकिऑव्हिलीचा खूप छळ केला गेला;आणि नंतर फ्लॉरेन्सपासून बारा मैलांवर असलेल्या एका गावी त्याला निर्वासित करण्यात आले. 


फ्लॉरेन्समध्ये काय काय चालले आहे,हे तो तिथून पाहू शकत असे.पण मेडिसीच्या धोरणात ढवळाढवळ करण्याइतका जवळ तो नव्हता.राजकारणात प्रत्यक्ष भाग घेता येत नसल्यामुळे यशस्वी राजकारणी कसे व्हावे,याचे शिक्षण तो इतरांस देऊ लागला.

राजकारणावर,मुत्सद्देगिरीवर,त्याने अनेक पत्रके लिहिली.

त्याने या पत्रकांस 'शासनविषयक कापट्य' असे नाव दिले होते.'स्टेट क्रॅफ्ट' म्हणजे मुत्सद्दी होण्यासाठी करावे लागणारे क्रॅफ्ट किंवा कपट. युद्धाच्या कलेवर त्याने सात पत्रके लिहिली; विवाहावर एक उपरोधक निबंध लिहिला, एक-दोन सैतानी नाटके लिहिली;पुष्कळशा विषयलंपटेच्या यथार्थवादी गोष्टी लिहिल्या.त्याने नीतीची उलटापालट केली व रानवटांच्या जगाला बिनदिक्कत सांगून टाकले की, अप्रामाणिकपणाचे धोरणच यशस्वी होते;तोच सर्वोत्तम मार्ग ! या जगात पुढारीपणासाठी निर्दय झगडा चाललेला असतो.अशा या जगात उदात्ततेला व उदारतेला,सहृदय व सुसंस्कृत अभिरुचीला वाव आहेच कुठे? युद्ध आणि ते प्रामाणिकपणे करणे ही गोष्ट हास्यास्पद होय.तो म्हणतो,"युद्धांत प्रामाणिकपणा कधीही नसतो. जे जे कराल,ते ते चांगलेच असते.जर शत्रूला भोसकावयाचे असेल,तर निदान त्याच्या पाठीत भोसकण्याइतके तरी शहाणे व्हा. "


मॅकिऑव्हिलीचे शाठ्यनीतीचे जगप्रसिद्ध पुस्तक 'प्रिन्स' म्हणजे 'राजा' हे होय.या पुस्तकात त्याने आपले विचार स्पष्टपणे मांडले आहेत.हे पुस्तक म्हणजे जुलमाचे क्रमिक पुस्तकच म्हणा ना ! मॅकिऑव्हिली हा सीझर बोर्जियाचा चाहता होता.आपल्या 'राजा' या पुस्तकात मोठेपणाचा आदर्श म्हणून त्याने सीझर बोर्जिया पुढे ठेवला आहे.बोर्जियाप्रमाणे सर्व राजांनी वागावे असे तो सांगतो.एकेकदा नवीन स्टेटचा कारभार हाती घ्यायचा असेल,आपले प्रभुत्व त्या राष्ट्रावर ठेवायचे असेल,तर बोर्जिया वागतो तसेच वागले पाहिजे,असे तो सांगतो.

त्याला प्रजेच्या कल्याणाची पर्वा नसे.राजाचा स्वार्थ कसा साधेल एवढेच तो पाही.पंधराव्या व सोळाव्या शतकांत युरोपातील नीती कशी होती,या बाबतीत हे पुस्तक म्हणजे उत्कृष्ट टीका होय.

या पुस्तकाची नीट कल्पना यावी म्हणून त्यातील मॅकिऑव्हिलीच्या जणू 'दहा आज्ञा'च,अशी दहा सूत्रे पुढे दिली आहेत.


१.स्वतःचा फायदा पाहा.

२.स्वत: शिवाय दुसऱ्या कोणाला मान देऊ नका.

३.साधुतेचे ढोंग करून दुष्ट आचरण करा.

४.जे जे शक्य असेल ते ते मिळवा,घ्या.

५.कंजूस असा.

६.पशुवत् वागा.

७.संधी सापडेल,तेव्हा तेव्हा दुसऱ्यांना फसवा.

८.शत्रूंना ठार कराच करा;पण जरूर तर मित्रांनाही.

९.दुसऱ्याशी वागताना दया दाखविण्यापेक्षा शक्ती दाखवा.

१०.युद्धाशिवाय कशाचाही विचार करू नका..

११.यातील प्रत्येक आज्ञा आपण जरा नीट पाहू या.


१.'स्वतःचा फायदा पाहा ही त्याची पहिली आज्ञा.

मॅकिऑव्हिली हा नैतिकदृष्ट्या अंध होता. हे सारे जग एक आहे,ही कल्पनाही त्याला शिवली नव्हती.! हा मानवसमाज म्हणजे भावाभावांचे एक कुटुंब आहे;सुख-दुःखांत त्यांनी परस्परांशी एकरूप व्हावे,असे त्याला कधीही वाटले नाही.माणसे म्हणजे इतस्ततःपसरलेले रानटी पशूंचे कळप आहेत;अडाणी पशूंचे गट आहेत,

असेच तो मानी! या जगात काही भोळे लोक आहेत,

काही दुष्ट पशू आहेत.दुष्टांनी भोळ्याभाबड्यांना स्वतःच्या सेवेसाठी राबवावे,असे त्याचे स्पष्ट मत होते.या भोळसटांवर जुलूम करणे,त्यांना चाबूक दाखविणे,हाच खरा मार्ग, याच रीतीने त्याचा उपयोग करून घेता येईल,असे तो म्हणे.जंगलचा कायदा असा आहे की,तुम्ही जर दुसऱ्याला हीनदीन न कराल,तर दुसरे तुम्हास हीनदीन करतील.बळी तो कान पिळी!म्हणून तो म्हणतो की,जे बलवंत आहेत त्यांनी आपल्या शक्तीचा प्रभाव दाखवावा व दुबळ्यांनी आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी गडबड करू नये,अशा अर्थाचे कायदे करावेत.प्रबळांची सेवा करणे हे दुबळ्यांचे कर्तव्य आहे.प्रबळांचे कर्तव्य मात्र एकच व ते म्हणजे स्वतःची सेवा करणे,स्वतःचा स्वार्थ साधणे.


.दुसरे सूत्र 'स्वत: शिवाय दुसऱ्या कोणाला मान देऊ नका' हे आहे.तो लिहितो,दुसऱ्याच्या मोठेपणास जो कारणीभूत होईल,तो स्वतःच नष्ट होईल.


दुसऱ्यांचे हितसंबंध तोपर्यंत वाढवावेत, दुसऱ्यांना तोपर्यंतच गौरवावें,की जोपर्यंत त्यांचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेता येईल.पण ते अधिक लोकप्रिय होऊ लागले,तर त्यांना ठार करावे.

महत्त्वाकांक्षी मनुष्याला प्रतिस्पर्धी असणे बरे नव्हे;ते नाहीसे केलेच पाहिजेत.यशस्वी राष्ट्राला एकच धनी असावा,एकच हुकूमशहा असावा;बाकी सर्वांनी त्याचे गुलाम असावे.राजाने दुसऱ्यांपासून नजराणे घ्यावेत, दुसऱ्यांकडून स्तुतिसुमनांजली घ्यावी,पण स्वतः मात्र कोणाचीही स्तुती करू नये;कोणालाही देणगी वगैरे काही देऊ नये.


३.'साधुतेचे ढोंग करून दुष्ट आचरण करा' हे तिसरे सूत्र.वाईटच करा,पण चांगले करीत असल्याची बतावणी करण्यास चुकू नका. अप्रामाणिकपणा व दंभ यावर मॅकिऑव्हिलीचा विश्वास होता.मुत्सद्द्याने कधीही मनातील गोष्ट मोकळेपणाने सांगू नये,असे तो प्रांजळपणे म्हणे.आपण भलेपणाने वागणे अहितकर होय.पण भलेपणाचे सोंग करणे मात्र फायदेशीर असते. जो अत्यंत चांगुलपणाने राहण्याची पराकाष्ठा करील,तो साधुतेचा आदर्श होऊ इच्छील,त्याचाच शेवटी या भोंदू व दुष्ट जगात नाश होईल.मॅकिऑव्हिली म्हणतो,"आपली सत्ता राहावी,दुसऱ्यांना लुटता यावे,म्हणून राजाने न्यायबुद्धी,भूतदया,माणुसकी,विश्वास वगैरेंना रजा दिली पाहिजे.या सद्गुणांच्या विरुद्ध,यांच्या उलट त्याने वागले पाहिजे;पण आपण अशा रीतीने वागतो असे प्रजेला कळू मात्र देता कामा नये.राजा उदार आहे,दयाळू आहे,

धार्मिक आहे,न्यायी आहे,असेच प्रजेला सतत वाटेल,

अशी खबरदारी त्याने घेतली पाहिजे.राजा प्रजेला वस्तुतःचिरडून टाकीत असतानाही तो आपले रक्षण करीत आहे,असेच ज्याला प्रजेला भासविता येईल,तोच खरा यशस्वी राजा ! "ओठांवर दया जरूर असू दे,पण पोटात मात्र पापच असू दे,अशी राजांना मॅकिऑव्हिलीची शिकवण आहे.


४.'जे जे शक्य असेल ते ते मिळवा,घ्या' हे चौथे सूत्र.स्वार्थी असा,लोभी असा,जे जे मिळविता येईल,ते ते मिळवा.मॅकिऑव्हिलीच्या दुष्ट स्मृतीप्रमाणे राजाने स्वतःच्या इच्छापूर्तीशिवाय अन्य कशाचाही विचार करू नये,दुसऱ्यांच्या हक्कांची काळजी करू नये.शक्य ते सारे लुटा,विरोध करणाऱ्यांना गप्प बसवा,पण उदार असण्याची शेखी मिरविण्यास मात्र चुकू नका.तथापि अती लोभ नको;पण तो वाईट आहे म्हणून नव्हे,तर त्यात धोका आहे म्हणून. परकीयांची लुटालूट करणे फार चांगले;मात्र ते सूड घेऊ शकणार नाहीत,असे असावे.स्वतःच्याच प्रजेवर फार कर बसवाल तर बंड होण्याची शक्यता असते.राजाला प्रजा रागाने पदच्युत करील अशी भीती असते.थोडक्यात सांगायचे,तर दुबळ्यांना लुटा व प्रबळांच्या बाबतीत सावध राहा.अशा रीतीने वागाल तरच तुम्ही मोठे व्हाल.


५.'कंजूष असा' हे पाचवे सूत्र.कृपणपणा करा. मॅकिऑव्हिली आपल्या पाशवी नीतिशास्त्रात पुढे सांगतो की,शक्य तो दुसऱ्याच्या पैशांतून खर्च चालवावा व स्वतः चा पैसा वाचवावा.आपल्या प्रजेचे मनोरंजन करण्यात राजाने उधळपट्टी करू नये.स्वतःच्या पैशाने खावे,पण मेजवान्या वगैरे देऊ नयेत.प्रजेसाठी खूप द्रव्य खर्च केल्यास उदारात्मा म्हणून कीर्ती होईल.पण लवकरच जवळचे सारे संपेल,प्रजेवर अधिक कर बसवावे लागतील व शेवटी नाश होईल.स्वतःच्याच देशात उभारलेल्या व मिळविलेल्या पैशांतून उदारपणा दाखविणाऱ्या राजाचा शेवटी विनाश होतो."स्वतःचे जे आहे ते देऊन टाकाल तर शेवटी पस्तावाल."पण युद्धात परकीयांपासून लुटून आणलेल्या पैशाने उदारपणा खुशाल दाखवावा. प्रजेचे वाट्टेल तितके मनोरंजन करावे.कारण त्यामुळे प्रजा राजाला उदार म्हणेल,

इतकेच नव्हे तर त्याच्यासाठी ती लढायला व मरायलाही सदैव तयार राहील.


६.'पशुवत् वागा' हे सहावे सूत्र.राजाने सौम्य वा मृदुप्रकृती असून कधीही चालणार नाही.सर्वांना गुलाम करणे हे राजाचे काम.मॅकिऑव्हिली सांगतो,"सीझर बोर्जिया समकालीन राजांहून श्रेष्ठ आहे;कारण तो सर्वांहून अधिक दुष्ट आहे." (पण या दुष्टपणामुळेच या सीझर बोर्जियाचे भाग्य अस्तास गेले हे मॅकिआव्हिलीला दिसले नाही.)स्पेनचा राजा फर्डिनंड याच्या दुष्टपणाचीही मॅकिऑव्हिलीने स्तुती केली आहे. मॅकिऑव्हिली म्हणतो,"पशू असेल तोच यशस्वी राजा होऊ शकेल.जे न्यायाचे भक्त आहेत, दुष्टपणाचे वैरी आहेत,दयाळू आहेत, ज्यांच्याजवळ माणुसकी आहे,

अशा सम्राटांची शेवटी वाईट गत होते.चांगुलपणा अंती फलदायक ठरत नाही.प्रजेने नेहमी आज्ञा पाळावी व सैनिकांनी आदर दाखवावा म्हणून राजाने सदैव कठोरच राहिले पाहिजे.स्वतःमधील माणुसकी मारून त्याने पशूच झाले पाहिजे. "


७.'संधी सापडेल तेव्हा तेव्हा दुसऱ्यांना फसवा' हे सातवे सूत्र प्रतिस्पर्ध्यास चिरडण्यासाठी मनुष्याने जाणूनबुजून पशू झाले पाहिजे,असे मॅकिऑव्हिलीचे मत आहे.राजाने सिंहाप्रमाणे भीषण व कोल्ह्याप्रमाणे धूर्त झाले पाहिजे. "कोल्ह्याप्रमाणे ज्याला नीट वागता येते,तोच नीट यशस्वी होऊ शकतो."न्यायापेक्षा बळाची प्रतिष्ठा अधिक आहे.कापट्य सत्याहून बलशाली आहे. राजाने वचन-पालनाच्या भ्रमात कधीही राहू नये. या जगात कोणीच दिलेले वचन पाळीत नाही. "सारेच लोक चांगले असते तर असा उपदेश करणे चुकीचे झाले असते;पण लोक दुष्ट असतात,त्यांचा कोणावरही विश्वास नसतो,म्हणून आपणही कोणावर विश्वास ठेवू नये." राजाला तर वचन मोडणे फारच सोपे असते." दिलेला शब्द मोडण्यास राजाला शेकडो सबबी सांगणे शक्य असते." कारण बहुतेक लोक शुद्ध नंदीबैल असतात.फसवले जाण्यासाठी,नकळत लुबाडले जाण्यासाठी हे जग सदैव तयारच असते.अर्वाचीन काळातील मुत्सद्देगिरी व व्यापारधंदा यांचा मॅकिऑव्हिलीच जनक आहे ही गोष्ट आपणास दिसून येईल.यशस्वी होणारा मुत्सद्दी वा धंदेवाला हा मॅकिऑव्हिलीच्या सांगण्याशीच अधिक जवळ असतो. व ख्रिस्ताच्या आज्ञांपासून फार दूर असतो,असे दिसून येईल.पण ते जाऊ द्या.मॅकिऑव्हिली

चे 'राजा' हे पुस्तक आपणास अद्यापि पाहायचे आहे.


८.'शत्रूना तर ठार कराच करा;पण जरूर तर मित्रांनाही' हे आठवे सूत्र.ज्या युगात मॅकि ऑव्हिली राहत होता ते माणुसकीला पारखे होते.सोळाव्या शतकातील प्रमुख खेळांपैकी प्राण्यांची शिकार व नास्तिकांना जाळणे हे दोन खेळ लोकप्रिय होते,करमणुकीची ही आवडती साधने होती.त्या काळातील एका सम्राटाला मनुष्याच्या पचनक्रियेची सर्व माहिती समजून घेण्याची इच्छा झाली.एखादा वैद्यकशास्त्राचा विद्यार्थी दोन बेडूक फाडतो,त्याप्रमाणे त्या सम्राटाने दोन जिवंत माणसांची आपल्यासमोर चिरफाड करून घेतली व आपली ज्ञानतृष्णा भागविली.शेकडो वर्षे लढाया सारख्या चालू असल्यामुळे मनुष्यांची हृदये दगडासारखी झाली होती;

मानवी प्राणांची किंमतच नाहीशी झाली होती,खून म्हणजे एक मामुली बाब वाटे,मित्रांची फसवणूक म्हणजे जणू मान्य कायदा! जीवनाच्या या शिकारीत अशा गोष्टी क्षम्यच नव्हेत तर कर्तव्यही भासत,त्यामुळे  मॅकिऑव्हिलीचे बोलणे लोकांना पटकन पटे. त्याच्या तर्कशास्त्रातले हे सारे दुवे ऐकायला ते तयार असत.


९.( दुसऱ्यांशी वागताना ) दया दाखविण्यापेक्षा शक्ती दाखवा' हे नववे सूत्र.दुसऱ्यांच्या बाबतीत दयेपेक्षा दुष्टता व बळजोरी यांचाच प्रयोग करीत जा.मॅकिऑव्हिलीने एक सर्वसामान्य नियम सांगून ठेवला आहे.की,

आपल्याबद्दल लोकांना प्रेम वाटण्यापेक्षा भय वाटणे अधिक बरे.एखाद्या प्रतिस्पर्धी राजाचे सर्वस्व हिरावून घेतल्यावर त्याला निःसंतान करा.काम अर्धवट सोडू नका, पुरे करा.नाही तर एखादा नातलग उद्या उभा राहून सूड घेऊ पाहील.महत्त्वाकांक्षी माणसाने अर्धवट दुष्ट असून भागणार नाही.दुष्टपणा करायचाच असेल,तर सदसद्विवेकबुद्धीची नांगी मोडून टाका.पण तुमच्या दुष्टपणास सीमा नसली,तरी त्याला रीत मात्र अवश्य हवी. तुम्ही एखादा देश घेतला किंवा एखाद्याला लुबाडले, तर जो काही दुष्टपणा करायचा असेल तो त्याच वेळेस करा.म्हणजे हळूहळू सारे विसरले जाईल. एकाच तडाक्यात सारे करून घ्यावे.पण कृपा करायची असेल,तर ती मात्र तीळतीळ करावी; म्हणजे तिची सारखी आठवण राहील.पण सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे शक्य तो दया न दाखविणे, कृपेची खैरात न करणे.

हुकूमशहाने बळाच्या जोरावर सत्ताधीश राहिले पाहिजे,

प्रेमाच्या जोरावर नव्हे.प्रजेची सदिच्छा हे त्याचे बळ नसावे;तर स्वत:ची शक्ती हे त्याचे बळ असावे.


आता मॅकिऑव्हिलीची शेवटची सर्वांत महत्त्वाची व रानटी आज्ञा पाहायची.कोणती बरे ती? खाली दिली आहे..


१०.'युद्धाशिवाय कशाचाही विचार करू नका' हे दहावे सूत्र.मॅकिऑव्हिली या पशुत्तमाचा युद्ध हाच मुख्य धंदा असला पाहिजे.मॅकिऑव्हिली सांगतो की,राजाने आपणास वधाच्या कलेला संपूर्णपणे वाहून घेतले पाहिजे."जो राज्यकर्ता आहे.त्याच्या ठिकाणी एकच कला पाहावी;ती म्हणजे युद्धाची कला." राजाने लष्करी गोष्टीशिवाय कोणत्याही गोष्टीत लक्ष घालू नये. शांततेच्या काळात त्याने सदैव युद्धाची तयारी करीत राहिले पाहिजे.राजाचे संभाषण,त्याचा अभ्यास,त्याचे खेळ,त्याचे वाचन,त्याचे गंभीर चिंतन,त्याचे विचार,या सर्वांचे ध्येय एकच असले पाहिजे व ते म्हणजे युद्ध.

आपल्या लोकांना कसे जिंकून घ्यावे,मानवजातीला कसे गुलाम करून टाकावे,याचाच ध्यास त्याने घ्यावा.

मॅकिऑव्हिलीन शासनपद्धतीत सारे रस्ते युद्धाकडे जातात आणि आजपर्यंत युद्धच सर्वत्र जारी आहे.

कारण मॅकिआव्हिलीचेच शिष्य सर्वत्र राज्य करीत आहेत.वाईट राज्य करीत आहेत.मॅकिऑव्हिलीने दिलेली राजनीतीच जगातील सर्व लष्करी हडेलहप्प्यांची व मुत्सद्द्यांची नीती आहे.

माणसामाणसांतील व्यवहारात आपण थोडे तरी बरे वागू लागलो आहोत.पण राष्ट्राराष्ट्रांतील व्यवहारात मात्र आपण साम्राज्यवादी स्वार्थाचे आंधळे धोरणच चालवीत आहोत.मुत्सद्देगिरी,कपट व रानटी पिळवणूक हेच धोरण सतत चालू आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांत आपण मॅकिऑव्हिलीच्या कपटनीतीचे अनुकरण करतो; एवढेच नव्हे तर तिचे कौतुक करतो.जगातील आजकालचे प्रमुख मुत्सद्दी,नामांकित इतिहासकार व काही मोठे तत्त्वज्ञानी(मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,सानेगुरुजी) मॅकिऑव्हिलीचेच शिष्य आहेत.अर्वाचीन काळातील अती बुद्धिमान लॉर्ड बेकन सांगतो की,राजकारणात पुष्कळसा दंभ असावा;व थोडासा प्रामाणिकपणा असावा.आठव्या हेन्रीचा प्रधान थॉमस क्रॉमवेल हा मॅकिआव्हिलीचे 'प्रिन्स' हे पुस्तक राजकीय शहाणपणाचे सार मानी.एकोणीसाव्या शतकातील मोठा इतिहासकार मेकॉले म्हणतो,'या 'प्रिन्स' पुस्तकात पुष्कळच उदात्त भावना आहेत." १९१४ सालच्या महायुद्धात लाजिरवाणी कत्तल साडेचार वर्षे चालली होती,तिचे कारण हेच की, जगातील सारे मुत्सद्दी मॅकिऑव्हिलीच्या उपदेशाप्रमाणे वागत होते.तोंडाने ते केवढीही मोठी तत्त्वे पुटपुटत असले,तरी त्यांचा व्यवहार मॅकिऑव्हिलीच्या सारखाच होता.आजचे सारे साम्राज्यवादी मुत्सद्दी,हुकूमशहा,योद्धे, मानवजातीचे नानाविध स्वरूपांतील छळवादी, सारे मॅकिऑव्हिलीचेच अनुयायी आहेत.

१०/११/२३

थोडसं रवंथ करण्याबद्दल .. A little bit about speeding up..

रवंथ करणं (रुमीनेट) म्हणजे काय? खरंतर या शब्दाचा इतिहास लक्षवेधी आहे: रुमिनेअर या लॅटिन शब्दावरून या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे,ज्याचा अर्थ आहे चघळत बसणं.यामुळे जे प्राणी गिळलेलं अन्न पुन्हा तोंडात आणून चघळतात त्यांना रवंथ करणारे प्राणी म्हणतात.

एका विशिष्ट प्रकारच्या विचारात आपण वारंवार गुंतून राहतो हे दर्शवण्यासाठी हा उत्तम शब्द आहे.गाय आपलं अर्धवट पचवलेलं अन्न पुन्हा चघळण्यासाठी तोंडात घेऊन येते आणि बऱ्याच वेळा रवंथ करते.आपण जुन्या आठवणी,कल्पना आणि कालबाह्य विचार चघळण्यासाठी पुन्हा खेचून आणतो,हे मानसिक पातळीवर रवंथ करण्यासारखंच आहे.पण रवंथ करणं हे गायीसाठी आरोग्यदायी आणि नैसर्गिक असलं तरी ते माणसासाठी आरोग्यदायी आणि नैसर्गिक असण्याची शक्यता कमी आहे.


समजा,तुमच्या जवळच्या माणसाशी तुमचा एक विचित्र मतभेद झाला होता आणि तुम्ही वारंवार तेच संभाषण तुमच्या मनात घोळवत बसला आहात.कदाचित आपण दुसरं काहीतरी बोलायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं किंवा जे घडलं त्याबद्दल तुम्हाला खंत किंवा पश्चात्ताप वाटला असेल.काहीतरी चुकीचं घडल्यासारखं वाटतं म्हणून तुमचा मेंदू त्याच प्रसंगाकडे पुन्हा ओढला जातो,तिथे घुटमळतो,तिथल्या प्रत्येक कटू बारकाव्यांना प्रकाशझोतात आणतो,वेगवेगळे समज आणि गृहीतकांचा विचार करतो.थोडक्यात,रवंथ म्हणजे अतिविचार करतो.


चोथा होईपर्यंत गोष्टींचा विचार केला जातो आणि त्याचा काहीही उपयोग होत नाही. बऱ्याचदा आपण एखादी जुनी आठवण काढतो आणि त्यामुळे इतर आठवणी जाग्या होतात. यामुळे आपण आपलं लक्ष विचलित करणाऱ्या आणि अतिविचार करण्यास भाग पाडणाऱ्या चक्रात अडकतो.तुम्ही गोष्ट चघळत राहता,पण अडचण सोडवण्याची तुमची क्षमता अधिक कमी होत जाते आणि तुमची अस्वस्थता वाढते. सांगायचं,तर तुम्ही एखादी वाईट परिकथा स्वतःला पुन्हा पुन्हा सांगणे थांबवू शकत नाही.. दुसऱ्या शब्दांत जुन्या वाईट आठवणी उकरून काढण्याचे तुम्ही चाहते असाल,तर ती रोखण्यासाठी पहिलं पाऊल असतं तुम्हाला उद्युक्त करणाऱ्या गोष्टींचा शोध घेणं.मग ती गोष्ट म्हणजे कदाचित तुमच्या घरी जाऊन तुमची जुनी खोली पाहणं असेल.कदाचित एखादं ठरावीक गाणं किंवा एखाद्या प्रकारचा खाद्यपदार्थ असेल किंवा कुणीतरी आपली परीक्षा घेत असल्याचा अनुभव असेल.ते जे काही असेल,पण तुम्हाला हे ठाऊक हवं की त्याचा तुमच्यावर काय परिणाम होतो,जेणेकरून तुम्ही कृती करू शकता.रवंथ करण्याची प्रक्रिया कोणता आकार घेते, हे समजून घेणं ही दुसरी पायरी आहे. तुम्हाला सतत खंत वाटते का? संताप वाटतो? निराश झाल्यासारखं वाटतं? तुम्ही वारंवार इतरांना दोष देता का? किंवा अपराधी वाटून घेता का ? मग हे समजून घ्या की,पुन्हा पुन्हा ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करता त्या गोष्टीबदल तुम्ही जागरूक होऊन त्यापासून अंतर राखायला हवं; शिवाय ती खरी असेल की नाही याचीही शाश्वती नसते.


उद्युक्त करणारी गोष्ट घडली की,आपोआप सुरू होणाऱ्या या कथेतून मनाने एक पाऊल मागे या.जागरूकतेच्या या आधीच्या सगळ्या तंत्रांप्रमाणेच इथेही न अडकता,न गुंतता किंवा विरोध न करता उलगडत जाणाऱ्या गोष्टीचं फक्त निरीक्षण करा.अंतर राखण्याचा एक मार्ग आहे लेबल लावणं. त्या कथेला एक नाव द्या.जेव्हा आपण त्याच जुन्या आरोप आणि रागाच्या कथेत अडकत आहोत असं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही विचार करू शकता,'अरे! ही तर हरिदासाची कथा आहे.' (अर्थात,आपण परत मूळ पदावर येतो.) विचार आणि भावनांमध्ये गढून जाण्यापेक्षा त्यांचं फक्त निरीक्षण केल्याने तुम्ही त्यांच्यापासून अंतर निर्माण करू शकता.


त्यामुळे,'मी निरुपयोगी आहे,'असं म्हणण्यापेक्षा 'मला आत्ता निरुपयोगी असल्यासारखं वाटतंय.' असं तुम्ही म्हणू शकता. 'मी माझ्या संधी फुकट घालवल्या.' असं म्हणण्यापेक्षा 'मला आता ते त्रासदायक प्रसंग आठवत आहेत.' असं म्हणा. त्या संवेदनेभोवती एक स्वतंत्र कुंपण घाला आणि संवेदनाच्या मर्यादा ओळखून हे तात्पुरतं आहे हे समजून घ्या. 


शेवटी,आपण स्वतःला जो त्रास करून घेतो, त्यापैकी किती गोष्टी वास्तवावर आधारित असतात आणि किती फक्त आपण स्वतःला सांगितलेल्या कथा असतात ?यात तुम्ही काही विनोद करू शकत असलात तर उत्तम! जेव्हा तुम्ही एखाद्या प्रसंगात विनोद शोधता तेव्हा तुम्ही मल्लखांबपटूसारखे लवचीक होता आणि तुमच्या समोर असणाऱ्या मोठ्या,भयानक अडचणीपेक्षा काहीसे मोठे होता.स्वतःला सांगा, "तर,चिंता करणारं माझं सैन्य आज दुपारी प्रचंड वेगाने माझ्याकडे येत आहे."आणि त्यात आणखी विनोद शोधण्याचा प्रयत्न करा.जेव्हा तुम्हाला तुमच्या बालपणातल्या लाजिरवाण्या घटना आठवतील तेव्हा एक छोटीशी परेड, छोटे पण हवेचे फुगे घेऊन तुमच्याकडे येत आहे असा विचार करा.


स्वतःवर हसा - किमान हे तरी समजून घ्या की,पुन्हा पुन्हा एकाच जुन्या आठवणीचं रडगाणं गाणारी तुम्ही एकमेव व्यक्ती नाही..


स्टॉप ओव्हरथिंकिंग,निक ट्रेंटन,अनु-अवंती वर्तक,मायमिरर पब्लिशिंग हाऊस


दुसरा पर्याय आहे जाणीवपूर्वक स्वतःला विचारणं आपण जे करत आहोत त्यामुळे अडचण सुटेल की फक्त विषयाचे चर्वितचर्वण होतंय ? स्वतःशी प्रामाणिक राहा.पहिल्यांदा विचार केल्यावर कदाचित त्या कल्पनेतून काहीतरी उपयोगी किंवा आत्मज्ञान मिळवून देणाऱ्या गोष्टी निष्पन्न होतील.पण बऱ्याचदा, तुम्ही एखाद्या कल्पनेचा जास्त विचार केलात तर त्यातून मिळणारा फायदा कमी असतो. विश्लेषण करण्याच्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी एक ताकदीचा मार्ग आहे कृती करणं.क्षमता,अंदाज आणि काळजी यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये गोंधळून जाण्यापेक्षा कृती करा आणि स्वतःला वास्तवात घेऊन या.जाणीवपूर्वक विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर,'मी फक्त विषय चघळत आहे,'असं आलं,तर तुम्ही आता लगेच एका छोट्या कृतीकडे तुमचं लक्ष वळवा.समजा,तुमच्याकडून चूक झाली की कोणताही विचार न करता तुम्ही तुमच्या मित्राला काहीतरी बोललात.तुम्हाला आता वाईट वाटतंय. ते वाक्य तुम्ही पुन्हा डोक्यात घोळवत राहता आणि प्रत्येक वेळी तुम्हाला त्याबद्दल वाईट वाटतं.मग तुम्ही थांबता आणि स्वतःला विचारता,'मी समस्या सोडवत आहे की फक्त रवंथ करत आहे?' तुमच्या लक्षात येतं की तुम्ही तो विषय फक्त चघळताय.तुम्ही स्वतःला थांबायला सांगता आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही जी लहानशी गोष्ट करू शकता,तिचा विचार करता..


तुम्ही तुमच्या मित्राला दुखावलं आहे,ही समस्या आहे.

माफी मागणं किंवा भेटून तुमच्यातली दरी मिटवणं हा यावरचा उपाय असू शकतो.त्यामुळे हे करा.जर तुम्ही या अडचणीचा विचार करण्यात तुमची सगळी ऊर्जा खर्च करणार असाल,तर किमान तिचा सदुपयोग तरी करा आणि गोष्टी सुधारण्यासाठी मार्ग शोधा.जर तुम्ही काही सुधारू शकत नसाल तर लक्ष विचलित करणाऱ्या एका गोष्टीकडे,माफ करण्याकडे किंवा विषय सोडून पुढे जाण्याकडे तुमची ऊर्जा वळवा.


ज्या गोष्टींमुळे तुमची परिस्थिती सुधारेल किंवा किमान त्या परिस्थितीशी जुळवून घेणं तुम्हाला शक्य होईल,त्या गोष्टींकडे तुमची चिंताग्रस्त ऊर्जा वळवल्याने पुन्हा एकदा तुम्ही वास्तवातील जगात येता.आणि न संपणाऱ्या आणि कुठेही न जाता फक्त गोल फिरत राहणाऱ्या मानसिक आंदोलनातून तुम्ही बाहेर पडता.


जर तुम्ही योग्य वेळी स्वतःचं लक्ष दुसरीकडे वळवू शकलात तर तुम्ही बऱ्याच प्रमाणात मानसिक लवचीकता निर्माण करू शकाल. जेव्हा आपण रवंथ करत असल्याचं तुम्हाला जाणवेल ('पुन्हा एकदा मी रवंथ करण्याची सुरुवात केली आहे.पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी चघळत बसणं किती कंटाळवाणं आहे...'), तेव्हा स्वतःला ज्याकडे तुमचं सगळं लक्ष वळेल,अशा एका कामात झोकून द्या.उठा आणि उलट क्रमाने अक्षरं म्हणत तीस उड्या मारा.

आठवड्याभरात तुम्हाला जे सामान खरेदी करायचं आहे त्याची यादी करा.विणकाम करा,तुमचं टेबल आवरा किंवा शब्दांवर मनापासून लक्ष देत एखादं कठीण गाणं म्हणा.

तुम्ही काय करता याने फरक पडत नाही,तर तुम्ही स्वतःचं लक्ष दुसरीकडे वळवून रवंथ करण्याच्या चक्र बाहेर पडता येणं हे महत्त्वाचं आहे.


जर तुम्हाला काही सुचलं नाही तर तुम्ही तुमच्या पाच इंद्रियांच्या संवेदनांवर लक्ष केंद्रित करा किंवा धावणे वा योगासने यांच्यासारख्या शारीरिक क्रिया करा.तुम्हाला स्थिरपणे बसून, मनात घुसखोरी करणाऱ्या विचारांशी लढायचं नाही,तुम्ही उठा,आवडत नसलेले विचार झटकून टाका ते काय असेल,काय असायला हवं,काय असू शकतं,

असं झालं तर काय,कदाचित.. अशा प्रकारच्या विचारांमध्ये तुमचा मेंदू गुरफटू लागला तर या मनोरचित विचारांच्या कळ्या उमलण्याआधीच खुडून टाका.एरवी आपल्याला लक्ष विचलित होणं टाळायचं असतं.पण जर आपण जागरूकतेने आणि योग्य कारणासाठी लक्ष दुसरीकडे वळवलं,तर ते एक शक्तिशाली शस्त्र ठरू शकतं.


ज्या गोष्टीवर तुमचं अजिबात नियंत्रण नाही त्या गोष्टीची तुम्ही काळजी करत आहात का ?


तुम्ही पराचा कावळा करत आहात का ?


तर तुमच्या रवंथ करण्याने परिस्थितीमध्ये सुधारणा होते आहे का? किंवा प्रश्न सोडवला जात आहे का ?


तुम्ही जी कहाणी सांगत आहात किंवा घटनांबद्दलचा तुमचा जो समज आहे, त्यावर कोणतीही शहानिशा न करता विश्वास ठेवण्याचं काही कारण तुमच्याकडे आहे का?


रवंथ करण्याची क्रिया ही तुमची जुनी मैत्रीण आहे,जी कायम कोणत्या ना कोणत्या विषयाचा चोथा करत असते,

अशी कल्पना करा व तिला मनाने दूर सारा.अशी कल्पना करा की,आपण एक शांत,तटस्थ निरीक्षक आहोत;ज्याला आतून हे माहीत आहे की,ही फक्त कथा आहे... एक कथा.तर,ही रवंथ करणारी जुनी मैत्रीण तुमच्याकडे येते आणि म्हणते,"तुला आठवतं, काही वर्षांपूर्वी तू म्हणाला होतास की,तुला फ्रेंच बोलता येतं आणि जेव्हा कोणीतरी तुझ्याशी फ्रेंचमध्ये बोललं तेव्हा त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे तुला समजलं नव्हतं?आठवतंय ते? किती लाजिरवाणं होतं ना ते? "


कदाचित टीव्हीवरच्या एखाद्या कार्यक्रमामुळे ही आठवण जागी झाली असेल किंवा हा प्रसंग जेव्हा घडला,तेव्हा तिथे हजर असणारी एखादी व्यक्ती तुम्हाला अलीकडच्या काळात भेटली असेल म्हणून ही आठवण पुन्हा जागी झाली असेल.रवंथ करण्याची क्रिया कोणत्याही प्रकारे उद्युक्त झाली असली,तरी एकदा तुम्ही त्याबद्दल जागरूक झालात की तुमच्याकडे दोन पर्याय असतात.तो संपूर्ण प्रसंग किती लाजवणारा होता आणि असं मूर्खपणा करून खोटं बोलल्याने माणूस म्हणून तुम्ही किती चुकीचे ठरलात याबद्दल तुम्ही तुमच्या त्या मैत्रिणीशी चांगली, प्रदीर्घ आणि तावातावाने चर्चा करू शकता. किंवा रवंथ करण्याच्या क्रियेला तुम्ही शांतपणे सांगू शकता,"हो,मला माहीत आहे ही जुनी गोष्ट. पण तो भूतकाळ आहे.मी त्यातून धडा घेतला आहे आणि आता मोठेपणा दाखवण्यासाठी मी तसं काही करत नाही आणि लोक माझी ती फजिती विसरूनसुद्धा बराच काळ लोटला आहे. आता मी जे करत होतो त्याकडे परत जातो."


जेव्हा ती त्रास देणारी मैत्रीण पुन्हा येईल आणि परत त्या लाजिरवाण्या प्रसंगाकडे लक्ष वेधेल तेव्हा तुम्ही तिला म्हणा,"नमस्कार,तुझ्याकडे बोलण्यासाठी काहीतरी नवीन आहे का ? तुझ्याकडे काही ताज्या कल्पना आहेत का? किंवा मी आता काय करायला हवं हे सांगता येईल का ? जर नसेल सांगता येत तर अच्छा. मी दुसऱ्या कामात व्यग्र आहे." तुमचं मन टेफ्लॉनसारखं निर्लेप आहे.सोपं आहे. आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही हे पाहिल्यावर मनातील चर्वितचर्वण आपोआप बंद होते.