* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१६/४/२४

अब्राहम लिंकन Abraham Lincoln

मानवजातीची धार्मिक,सामाजिक व राजकीय स्वातंत्र्याच्या कार्यक्षेत्रात कसकशी प्रगत होत गेली हे आतापर्यंत आपण पाहत आलो. कितीतरी राष्ट्र रानटी स्थितीतून सुधारणेच्या आसपास येत आहेत,असे आपणास दिसले. आपल्या काळाबरोबर पुढे न जाता शेकडो वर्षे मागे रेंगाळत राहणारे,मध्ययुगीन विचारांनी अंध झालेले व प्रगतीला अडथळा करणारे कितीतरी मुत्सद्दी आपणास अधूनमधून आढळले ! पावले पुढे टाकीत असतानाही दृष्टी मात्र भूतकाळच ठेवणारे व ठेवावयास लावणारे ते प्रतिगामी मुत्सद्दी लोकशाहीच्या काळात पुन्हा राजशाह्या दृढ करीत,नवप्रकाश येत असता दुष्ट रूढींनाच सिंहासनावर बसवू पाहत.


आंधळ्यांचे हे आंधळे नेते जगात धुडगूस घालीत असूनही मानवजात चुकूनमाकून का होईना,पण न्यायाच्या, सहिष्णुतेच्या,उदारतेच्या व अधिक स्वच्छ आणि सुंदर विचारांच्या अधिकाधिक जवळे जात चालली आहे असे आपणास आढळले. 


आतापर्यंत आपण आशिया व युरोप यातच वावरलो.

त्यावरच आपली दृष्टी खिळली होती. आता आपण अटलांटिक ओलांडून अमेरिकेत जाऊ या व युरोपातून आणखी पश्चिमेकडे चाललेला संस्कृतीचा प्रवाह पाहू या.जगातल्या विचारहीन लेखकांनी कितीतरी वर्षे अमेरिकेची उगीचच टर उडविली आहे.अमेरिकन लोक असंस्कृत आहेत.त्यांनी नीट चालरीत व रीतभात नाही,ते रानटी आहेत.जुन्या जगातील नवाबी व रुबाबी संस्कृतीच्या मानाने ते फारच मागासलेले आहेत,असे हे लेखक खुशाल लिहितात ! ते थोडेसे खरेही असेल;पण त्या टीकेच्या आवाजात एक प्रकारची कुरुची,एक प्रकारची अशिष्टता नाही का? त्यात एक प्रकारचा रानवटपणा दिसत नाही का?अमेरिकेत वसाहत करणाऱ्यांना अस्तन्या वर सारून रात्रंदिवस अविश्रांत श्रमावे लागले.जंगले तोडावी लागली. युरोपातील आपल्या बांधवांची संस्कृती आपलीशी करून घ्यायला त्यांना अवसर तरी कुठे होता? युरोपीय संस्कृतीतील सद्‌गुण अभ्यासायलाच नव्हेत,तर दुर्गुण उचलायलाही त्यांना फुरसत नव्हती.त्यांना अठराव्या शतकातला बराचसा काळ स्वतःचे घर व्यवस्थित करण्यातच घालवावा लागला. त्या वेळी युरोपच दुसऱ्यांच्या घरात लुडबूड करीत होते.अमेरिकन जरा रानवट व आडदांड दिसले,तरी ते युरोपियनांपेक्षा खास अधिक शांतताप्रिय होते. दरबारी चालीरीती त्यांना माहीत नसल्या,तरी ते उगीचच कोणाच्या माना कापायलाही धावत नसत.साम्राज्यवादी कवी किप्लिंग युद्धाच्या वैभवाची गाणी अत्यंत सुंदर व अलंकृत शब्दांत गातो,तर वाल्ट व्हिटमन ओबडधोबड वाणीने मानवी बंधुतेची गीते गातो.


एकोणिसाव्या शतकातील प्रबल राष्ट्रांत अमेरिकेतील संयुक्त संस्थाने हे एकच राष्ट्र खरोखर अनाक्रमणशील राष्ट्र होते. अमेरिकनांतही गर्जना करणारे हडेलहप्प मधूनमधून दिसत,अगदीच दिसत नव्हते असे नाही.मेक्सिकन व स्पॅनिश युद्धाच्या वेळी अमेरिकेनेही लष्करी मूठ दाखविण्याचा बेशरमपणा केलाच.जंगली रानवट-

पणापासून कोणते राष्ट्र पूर्णपणे मुक्त झाले आहे? पण विचारहीन स्वार्थांधतेचे प्रकार अमेरिकेच्या बाबतीत कधीकधी दिसून आले असले,तरी एकंदरीत अमेरिका फारशी युद्धप्रिय होती,असे म्हणता येणार नाही.


पण अमेरिकेला एक दुष्ट रोग जडलेला होता. तो म्हणजे गुलामगिरीचा.तो मारून टाकण्यासाठी अनिच्छेने तिला एका यादवी युद्धात भावाभावांमधल्या निर्दय आणि निष्ठुर युद्धात भाग घ्यावा लागला.ती इतिहासातील अत्यंत दुर्दैवी व दुःखदायक घटना होती.असे घडले नसते तर काय झाले असते,असल्या चर्चा आता काय कामाच्या? इतिहासात टाकलेली पावले पुन्हा बदलून टाकण्यात काय अर्थ ? ही यादवी टाळता आली असती असा युक्तिवाद करण्यात येतो.ती निःसंशय टाळता आली असती.हेच काय,पण जगातले कोणते युद्ध त्यातील पुढारी वेगळे असते तर टाळता आले नसते? त्या त्या युद्धातील सूत्रधार व प्रमुख पात्रे वेगळी असती,तर प्रत्येक युद्ध टळले असते.

पण ते सूत्रधार मानवीच होते.त्यांच्या ठायी मानवांचे क्रोध-मत्सर व स्वार्थ-दंभ भरपूर होते.त्यांची दृष्टी संकुचित व मर्यादित असल्यामुळेच ते जराही दूरचे बघत नसल्यामुळेच,इतिहास जसा घडावासा आपणास वाटते तसा तो घडला नाही


भूतकाळाचे पुस्तक पुरे झाले आहे.आता कितीही काथ्याकूट केला,त्यातील कितीही घोडचुका दाखवल्या,

तरी भूतकाळातले एक अक्षरही बदलणे आता शक्य नाही.पोप म्हणे, 'जे आहे ते योग्यच आहे.' भूतकाळाला हेच वचन आपण लावू तर ते बरोबरच ठरेल. भूतकाळात जे जे घडले ते ते तसतसे घडण्यावाचून गत्यंतरच नव्हते.प्राप्त परिस्थितीत तसे व्हावयाचे.१८६१ सालचे अमेरिकेतील अंतर्युद्ध टाळणे अशक्य होते.पण त्या युद्धानेही भूतकाळातील इतर प्रत्येक युद्धाप्रमाणे भविष्यकाळासाठी मात्र रक्ताने संदेश लिहून ठेवला आहे.

धोक्याची सूचना देऊन ठेवली आहे. भूतकाळ बदलता येणार नाही,भविष्यकाळ मात्र बदलता येईल.कोणती ती सूचना? कोणता तो संदेश? ती सूचना,तो संदेश हाच की, 


'काही युद्धे टाळता येतात,मानवजातीच्या सुधारणेसाठी युद्ध ही एक आवश्यक गोष्ट नाही.

अमेरिकेतील गुलामगिरी अंतर्गत युद्धामधील रक्तपाताशिवाय रद्द करता आली असती.' हा संदेश नीट ध्यानी घ्यावा म्हणून अमेरिकेतील गुलामगिरीचा इतिहास जरा पाहू या.कोलंबस प्रथम अमेरिकेत आला तेव्हा तो तीन वस्तूंच्या शोधात होता.सोने,बाटविण्यासाठी माणसे व गुलाम म्हणून विकायला मानवी शरीरे.. त्याच्या पाठोपाठ स्पॅनिश लोक येऊन इंडियनांना गुलाम करू लागले.पण इंडियनांना तो ताण सहन होईना आणि म्हणून (व्हॅन लून म्हणतो) 'एका दयाळू धर्मोपदेशकाने लेंस कॅससने आफ्रिकेतून नीग्रो आणावेत असे सुचवले.इंडियन गुलामांची जागा भरून काढावी असा त्याचा मथितार्थ. नीग्रो अमेरिकेस बऱ्याच वर्षांपूर्वी आले होते. पहिले पांढरे यात्रेकरू मॅसेच्युसेट्समध्ये १६२० साली प्लायमाऊथ येथे व गुलामांचे पहिले यात्रेकरू व्हर्जिनियामध्ये जेम्स टाऊन येथे उतरले.


उत्तरेकडील संस्थानांना गुलागिरीचा वीट आला. मॅसेच्युसेट्समध्ये तर १७८३ सालीच गुलामगिरी रद्द करण्यात आली.इतरही काही संस्थांनानीही मॅसेच्युसेट्सचे अनुकरण केले.उत्तरेकडच्यांना कळून आले की,स्वातंत्र्यापेक्षा दास्यासाठीच अधिक खर्च लागतो.हेच दाक्षिणात्यांच्याही डोक्यात लवकरच आले असते.बेंजामीन जैकलीनने हे ओळखले होते.तो म्हणाला,"ग्रेट ब्रिटनमध्ये कामगार जितके स्वस्त आहेत तितके आपल्या इकडे गुलामही स्वस्त नाहीत,कोणीही गणित करून पडताळा पाहावा.आपण गुलाम विकत घेतला,त्या रकमेवरचे व्याज धरा.त्या गुलामाच्या जीविताचे इन्शुअरन्स जमेस धरा. त्याच्या प्राणांची अश्वाशक्ती लक्षात घ्या.त्याला लागणारे कपडे,त्याला द्यावे लागणारे अन्न, त्याच्या आजारात करावा लागणारा खर्च. त्यामुळे फुकट जाणारा वेळ,कामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे होणारे नुकसान (आणि कितीही काळजी घेतली तरी,

आपला फायदा नाही हे माहीत असल्यावर कोणता माणूस मनापासून व लक्ष देऊन काम करील?) गुलामांनी काम चुकवू नये म्हणून त्यांच्यावर ठेवलेल्या पर्यवेक्षकांचा खर्च,पुन्हा होणाऱ्या चोऱ्यामाऱ्या (गुलाम हे गुलाम असल्यामुळे व गुलाम हे चोरही असावयाचेच,म्हणून या चोऱ्या होतच राहणार) या साऱ्या खर्चाची इंग्लंडमधील लोखंडाच्या वा लोकरीच्या कारखान्यांतील मजुरांच्या मजुरीशी तुलना करून पाहिल्यास लक्षात येईल की, येथील नीग्रोंकडून आपण कितीही काम करून घेत असलो,तरी ते इंग्लंडमधील मजुरांपेक्षा एकंदरीत अखेर महागच पडतात."


दुसऱ्या शब्दांत हेच सांगायचे,तर गुलामगिरी फायदेशीर नव्हती.दक्षिणेकडच्यांना ती दरिद्रीच करीत होती.

युरोपातील राष्ट्रे हे पाहत होती. एकामागून एक सर्वांनी गुलामगिरी टाकून दिली. १८६०च्या सुमारास जगातील बहुतेक सर्व देशांत गुलामगिरी ही एक मृतसंस्था झाली होती. अमेरिकेतही ती मृत्यूपंथास लागली होती. १८३३ साली ग्रेट ब्रिटनने आपल्या सर्व भागांतील गुलामगिरी रद्द केली.१८२७ साली मेक्सिकोने सर्वांना मुक्त केले. फ्रान्सने १८४८ साली,पोर्तुगालने १८५८ साली,रशियाचा झार अलेक्झांडर याने १८३३ साली सर्व गुलामांना मुक्त केले.भू-दासांना स्वातंत्र्य दिले.अमेरिकेतील दक्षिणी संस्थानेही पुढच्या पिढीत गुलामगिरी रद्द करायला तयार झाली असती.पण नैतिकदृष्ट्या गुलामगिरी वाईट म्हणून मात्र नव्हे,तर आर्थिकदृष्ट्या ती परवडत नव्हती म्हणून.अमेरिकन नीग्रोंचे स्वातंत्र्य दहा लाख लोकांच्या रक्ताने पवित्र करण्याची जरुरी नव्हती.हे अंतर्गत युद्ध एक अनावश्यक अशी दुःखद घटना होती.


पण तत्कालीन स्वभावाप्रमाणे हे अंतर्गत युद्ध टाळणेही अशक्य होते.अमेरिकेतील मोठ्यातल्यामोठ्या मुत्सद्द्यांनीही युद्ध व्हावे, म्हणूनच प्रयत्न केले आणि दुःखाची गोष्ट ही की, आपण काय करीत आहोत हे त्यांनाही कळत नव्हते.यांपैकी सर्वांत मोठा मुत्सद्दी उदात्त चारित्र्याचा पण संकुचित दृष्टीचा अब्राहम लिंकन होय.तो थोर;पण करुणास्पद पुरुष होता. युद्ध होण्याला त्याचीच अप्रबुद्धता बरीचशी कारणीभूत झाली.थोडे शहाणपण त्याच्या ठायी असते,तर युद्ध होतेच ना.पण युद्ध सुरू झाल्यावर त्याने अनुपमेय धैर्य दाखवल्यामुळे यश मिळाले व गुलामगिरी रद्द झाली.


या भागातील राहिलेला उर्वरित शिल्लक शेवटचा भाग १८.०४.२४ या दिवशीच्या लेखामध्ये.



१४/४/२४

थोडीशी मासेमारी - २ A little fishing - २

१२.०४.२४ या लेखातील पुढील भाग…


या धबधब्याच्या खाली तीस ते चाळीस यार्ड रूंद व दोनशे यार्ड लांब असा डोह तयार झाला होता. व या डोहाच्या दोन्ही बाजूला उंच खडक लांब भिंती होत्या.या दोनशे यार्डापैकी,मी जिथं उभा होतो तिथून शंभर यार्डाच्या पाण्याचा भाग दिसू शकत होता.या अतिशय सुंदर दिसणाऱ्या डोहाताच पाणी स्फटिकासारखं स्वच्छ होतं. डोहाच्या माझ्या बाजूला दगडी भिंत एकदम पंधरा फूट उंच होती.त्यामुळेच हा धबधबा तयार झाला होता.

धबधब्याच्या ज्या बाजूला मी उभा होतो त्या बाजूकडून डोहापर्यंत पोचणं शक्यच नव्हतं व किनाऱ्याने दाट झुडुपं वाढली असल्याने जर मासा गळाला लागलं तर काठाकाठाने त्याच्यापर्यंत पोचून तो हातात मिळणंसुद्धा मुश्किल होत.वाट निसरड्या दगडधोंड्यातून काढावी लागणार होती.डोहाच्या पलीकडच्या टोकाला ही मंदाकिनी नदी प्रचंड उसळ्या मारत फेसाळत अलकनंदाशी तिच्या संगमावरच मिळत होती.


थोडक्यात काय,मासा गळाला लावणं आणि तो हाताशी येणं या दोन्ही गोष्टी या ठिकाणी अवघडही होत्या व धोकादायक सुद्धा!पण ही फार पुढची गोष्ट होती व तिचा विचार आताच करण्याची गरज

नव्हती.अजून तर मी माझा रॉडसुद्धा नीट जुळवला नव्हता! बघूया तरी काय होतंय ते...!


डोहाच्या माझ्या बाजूला म्हणजेच धबधब्याच्या बाजूला पाणी खोल होतं आणि त्यावर धबधब्याच्या फेसाळत्या पाण्यामुळे पाण्याचे असंख्य छोटे छोटे बुडबुडे तरंगत होते आणि त्याच्या मध्यापर्यंत त्याचा वाळूचा तळ दिसत होता.

इथे पाणी चार ते पाच फूट खोल होतं. तळातला प्रत्येक दगड दिसेल इतकं ते पाणी निवळशंख होतं.डोहाच्या या भागातच दोन ते पाच किलो वजनाचे मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत येत होते.या बारा फूट उंच खडकावर हुक माऊंट केलेला दोन इंची चमचा हातात घेऊन त्या पाण्याकडे बघत असतानाच फिंगरलिंग्ज माशांचा एक थवा तिथे चमकला व डोहावरून सरळ पुढे जाऊ लागला. त्यांच्या पाठलागावर तीन मोठे महासीर होते. यावेळी मी अगदी निराळी व अपारंपरिक पद्धत वापरून चमचा लांब फेकला.अतिउत्साहाच्या भरात माझा अंतराचा अंदाज चुकला व डोहापलीकडच्या खडकांवर पण पाण्यापासून एक दोन फूट उंचीवर तो चमचा आपटला. शपण माझं नशीब आज जोरावर होतं.कारण तो चमचा पाण्यात पडला त्याच वेळेला फिगरलिंग्जच्या पाठलागावर असलेले महासीर मासे तिथे येऊन पोचले होते आणि त्यातल्या एकाने तर आमिषाला तोंड घातलंच.उंचावरून लांबलचक लाईनने कास्टिंग करणं तसं कष्टाचं असतं पण माझ्या रॉडने मला चांगली साथ दिली आणि तो हुक माशाच्या तोंडात अडकला.काही क्षण माशाला काय झालंय ते कळलं नाही व त्याने पांढरं पोट माझ्याकडे करून पाण्यावर काटकोनात उभं राहून दोन्ही बाजूला हिसडे मारायला सुरुवात केली व शेवटी टाळूत टोचणाऱ्या हुकमुळे जीवाच्या आकांताने पाणी उंच उडवत सरळ प्रवाहाला लागला.या जोरदार हालचालींमुळे तळाशी असलेल्या छोट्या माशांची मात्र तारांबळ उडाली.


या पहिल्याच घावेत त्या माशाने रीळवरची १०० यार्ड दोरी ओढून नेली व काही क्षणानंतर आणखी ५० यार्डस ! तरीही रिळावर अजूनही बरीच दोरी शिल्लक होती पण आता तो मासा प्रवाहातल्या वळणावर आला होता आणि आता डोहाच्या पलीकडच्या टोकाकडे जाण्याचा धोका होता.पण कधी ताण देऊन तर कधी ढील देऊन शेवटी मी त्याचं तोंड प्रवाहाच्या वरच्या बाजूला वळवण्यात यशस्वी झालो आणि त्यानंतर त्याला वळणावरून स्थिर पाण्यात ओढून आणलं. माझ्या जरा खालच्या बाजूने पुढे आलेल्या एका खडकामुळे बॅकवॉटर तयार झालं होतं आणि तिथे आल्यावर अर्धा तास जीवघेणी झुंज दिल्यावर तो मासा शेवटी पाण्याखाली बुडाला.


आता मात्र विचार करण्याची वेळ येऊन ठेपली होती आणि हा मासा बहुतेक असाच सोडून द्यावा लागणार असा विचार मी करत असतानाच माझ्या शेजारच्या दगडावर एक सावली पडली. खडकावरून बॅकवॉटरकडे वाकून पहात ती व्यक्ती म्हणाली की हा तर खरोखर फार मोठा मासा आहे साहेब,पण आता त्याचं तुम्ही काय करणार आहात ? जेव्हा त्याला मी म्हणालो की त्याला तिथून इथे घेऊन येण्याचा मार्ग नसल्यामुळे त्याला तसाच सोडून द्यावा लागणार... तेव्हा तो म्हणाला, "थांबा साहेब, मी माझ्या भावाला घेऊन येतो.हाक ऐकली तेव्हा बहुतेक त्याचा भाऊ गोठा धूत असणार. हा उंच, सडपातळ नुकतंच मिसरूड फुटलेला पोरगा तशाच अवस्थेत आला तेव्हा मी त्याला हातपाय धुवून यायला सांगितलं नाहीतर तो खडकारून घसरून पडलाच असता.त्यानंतर मी त्यांच्याबरोबर पुढे काय करायचं यावर चर्चा केली.आम्ही जिथे उभे होतो तिथून खडकामध्ये एक भेग सुरू होऊन खाली एका छोट्याशा कपारीपर्यंत गेली होती.ही कपार पाण्यापासून एखादा फूट वर होती व साधारण ६ इंच रुंद होती.योजना अशी ठरली की आताच हातपाय धुवून आलेल्या त्या छोट्या भावाने कसरत करत त्या कपाऱ्यापर्यंत जायचं त्यानंतर मोठ्या भावाने कपारीपर्यंत गेलेल्या भावाचा हात पकडण्याइतपत खाली जायचं आणि मी मोठ्याचा हात धरून खडकावर पालथा पडून राहायचं.पण प्रथम मी त्यांना विचारून घेतलं की त्यांना पोहता येतं का व त्यांना माशाला हाताळता येतं का? हसत हसतच त्यांनी सांगितला की अगदी छोटे असल्यापासनं ते दोघेही मासेमारी करतायत.


योजनेतला कच्चा दुवा असा होता की मी एकाच वेळी हातात रॉड धरून साखळीतला दुवा बनू शकणार नव्हतो.पण काहीतरी धोका तर पत्करायला पाहिजेच होता.तेव्हा मी रॉड खाली ठेवला,लाईन तोंडात पकडली आणि त्या दोन भावांनी त्यांच्या जागा घेतल्यावर खडकावर पालथा पडून मोठ्याचा हात पकडला.त्यानंतर फिशिंग लाईन कधी तोंडात पकडून तर कधी हातात पकडून त्या माशाला जवळ ओढायला सुरुवात केली.त्या पोराला माशाला कसं हाताळायचं माहीत होतं हे नक्की,


कारण माशाचा खडकाला स्पर्श होण्याच्या अगोदरच त्याने त्याच्या कल्ल्याच्या एका बाजूला अंगठा तर दुसऱ्या बाजूला बोटं अशी त्याच्या गळ्यावर घट्ट पक्कड घेतली. ह्या क्षणापर्यंत मासा शांत होता पण जसा त्याचा गळा पकडला गेला तशी एकदम त्याने उसळी मारली व काही क्षण आम्ही तिघंही पाण्यात कोसळणार अशी परिस्थिती निर्माण झाली.ते दोघंही अनवाणी होते आणि आता दोरी पकडावी लागत नसल्याने माझे दोन्ही हात त्यांना मदत करायला मोकळे होते.त्यामुळे ते दोघंही मागे वळले व अगदी पायाच्या बोटांवर पकड घेत त्याच भेगेतून वर आले.


मासा हातात आल्यावर मी त्यांना ते मासे खातात का असं विचारलं.अत्यानंदाने ते 'हो' म्हणाल्यावर मी त्यांना म्हटलं की जर माझ्या माणसांकरीता दुसरा मासा पकडायला त्यांनी मला मदत केली तर हा जवळपास १५ किलोचा मासा मी त्यांना देईन.ते लगेच तयार झाले.


माझा हूक त्या महासीरच्या खालच्या ओठात खूप खोलवर रुतला होता.जसा मी तो कापून काढला तसे ते भाऊ उत्सुकतेने बघू लागले.हूक निघाल्यावर त्यांनी मला तो नीट बघण्यासाठी मागितला.एकाच टोकाला तीन तीन हूक ? अशी गोष्ट त्यांच्या गावात कोणी बघितलीही नव्हती.अर्थात त्यांच्या टोकाला थोडासा बाक असलेली पितळी तार होती ती 'सिंकर' म्हणून काम करते.पण त्या हुकला आमिष कोणतं लावलं होतं ? मासा पितळ थोडंच खाईल ? ते खरंच पितळ होतं की दुसरं कोणतंतरी कडक

झालेलं आमिष होतं? अशा त-हेने आमिषाचे चमचे,तीन हुक लावलेला गळ या सगळ्या गोष्टीवर शेरे व आश्चर्याचं आदानप्रदान झाल्यावर मी त्यांना खाली बसायला व मी दुसरा मासा पकडत असताना नीट बघायला सांगितलं.


डोहातले सर्वात मोठे मासे त्याच्या पलीकडच्या कडेला होते पण तिथे महासीर शिवाय मोठे 'गूंच' मासेसुद्धा होते.हे मासे गळाला पटकन लागतात.पण गळाला लागल्यावर तळाशी सूर मारून कोणत्यातरी कातळाच्या खाली डोकं घालून ठेवण्याची त्यांना सवय असते त्यामुळे आपल्या पहाडी नद्यांमध्ये फिशिंग करणाऱ्यांचे गळ तुटायला हेच मासे नव्वद टक्के जबाबदार धरले जातात आणि गळाला लागले तरी या त्यांच्या सवयीमुळे हातात मिळणं फार कठीण आणि जवळजवळ अशक्यच असतं.


मगाशी जिथून गळ टाकला होता त्या जागेपेक्षा चांगली दुसरी जागा नव्हती.म्हणून मी परत उभा राहिलो व चमचा हातात घेऊन कास्टींगसाठी सज्ज झालो.मगाच्या माझ्या,महासीरच्या व त्या दोन मुलांच्या हालचालींमुळे खालच्या डोहातले मासे जर बिचकले होते पण आता हळूहळू ते परत डोहात यायला लागले होते.त्या मुलांच्या उत्तेजित आवाजातल्या ओरडण्यामुळे व त्यांनी बोट दाखवल्यामुळे माझं लक्ष,जिथे उथळ पाणी संपत होतं व खोल पाणी सुरू होत होतं तिथल्या मोठ्या माशाकडे गेलं.मी गळ फेकण्याच्या आधीच तो वळला व खोल पाण्यात शिरला. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर तो तिथे परत आला तशी मी गळाची दोरी फेकली.पण दोरी ओली होऊन आकुंचन पावल्याने माझा अंदाज थोडा चुकला.

दुसऱ्या वेळेला मात्र मी अचूक वेळेला व अचूक जागी दोरी फेकली.चमचा बुडण्यासाठी थोडा वेळ दिल्यानंतर मी हळूहळू रीळ गुंडाळायला सुरुवात केली.थोडे हिसके देत देत मी दोरी ओढू लागलो तेवढ्यात एक महासीर चटकन पुढे आला व दुसऱ्या क्षणाला टाळूला हुक अडकल्याने त्याने पाण्याबाहेर उसळी मारली.त्यानंतर तो परत पाण्यात पडला,अंगात आल्यासारखा प्रवाहाबरोबर जाऊ लागला.ती माणसं अजूनही पलीकडच्या बाजूला हुक्का ओढत बसली होतीच त्यांची व त्या दोन भावांची उत्सुकता आता शिगेला पोचली.


मी परत एकदा रीळ गुंडाळून तयार झालो तसं माझ्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या त्या दोन भावांनी मला सांगितलं की यावेळी मासा डोहाच्या पलीकडच्या टोकाला जाऊ देऊ नका. हे बोलणं सोपं होतं पण प्रत्यक्षात आणणं फार अवघड होतं.कारण हुक किंवा गळ तुटून न देता महासीर माशाची पहिली धाव थांबवणं भल्याभल्यांना शक्य होत नाही.पण आज आमचं नशीब आमच्यावर प्रसन्नच होतं म्हणा किंवा मासा फार लांब जायला यावेळी घाबरला म्हणा पण रिळावर ५० यार्ड लाईन उरलेली असताना तो थांबला व जरी त्याने बराच वेळ झुंज दिली तरी तो वळवणावरच थकला आणि पाण्यात बुडाला. त्यानंतर त्याला ओढून आणणं फारसं अवघड नव्हतं.दोन्ही माशांची लांबी जवळपास सारखीच होती,पण दुसरा पहिल्यापेक्षा वजनी होता.मोठा भाऊ विजयी मुद्रेने हा मासा खांद्यावर टाकून त्याच्या गावात परतला पण छोट्या भावाने मात्र मला विनवलं की दुसरा मासा व गळ हातात घेऊन मला स्वतःला तुमच्या बरोबर इन्स्पेक्शन बंगल्यावर येऊ द्या.मीही पूर्वी केव्हातरी छोटा मुलगा होतो व माझा मोठा भाऊही फिशिंग करायचा त्यामुळे त्याला नक्की काय पाहिजे हे मला कळलं.खरंतर त्याला म्हणायचं होतं की,"साहेब तुम्ही मला मासा व रॉड घेऊन तुमच्याबरोबर यायची परवानगी दिलीत व तुम्ही एक दोन पावलं माझ्या मागे चाललात तर रुद्रप्रयाग बाजारातल्या सर्वांना वाटेल की हा मासा मीच गळाला लावलाय.एवढा मोठा मासा तर त्यांनी कधी पाहिलाही नसेल."


१२/४/२४

थोडीशी मासेमारी - १ A little fishing - 1

१९२५ च्या शिशिर ऋतूत मी निराश मनाने गढवाल सोडलं व ताजातवाना होऊन १९२६ च्या वसंत ऋतूच्या सुरुवातीला माझ्या रणभूमीवर परतलो.यावेळेला मी कोटद्वारपर्यंत रेल्वेने आलो आणि तिथून मग पायी पौरीला येऊन प्रवासाचे आठ दिवस वाचवले.पौरीला इबॉटसन मला येऊन मिळाला व आम्ही दोघं रुद्रप्रयागला आलो.माझ्या तीन महिन्याच्या अनुपस्थितीत बिबळ्याने आणखीन दहा नरबळी घेतले होते आणि या काळात त्याला मारण्यासाठी तिकडच्या दहशतीखाली खचलेल्या रहिवाशांकडून एकही प्रयत्न झाला नव्हता.शेवटचा बळी एका छोट्या मुलाचा गेला होता आणि तो अलकनंदाच्या डाव्या तीरावर आम्ही येण्याच्या अगोदर दोन दिवस घेतला गेला होता.या बळीची बातमी आम्हाला टेलिग्राफने पौरीला असताना कळली होती पण कितीही वेगाने निघालो तरी थोडासा उशीर झालाच. आल्यानंतर पटवारीकडून आम्हाला कळलं की आदल्या रात्रीच बिबळ्याने त्याचा संपूर्ण फडशा पाडला होता.हा बळी रुद्रप्रयागपासून चार मैलांवरच्या एका गावात मध्यरात्री घेतला गेला होता आणि खाताना कोणतीही आडकाठी न आल्याने बिबळ्याने नदी ओलांडली असण्याची शक्यताच नव्हती.त्यामुळे आम्ही ताबडतोब दोन्ही ब्रिज बंद करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली.त्या हिवाळ्यात इबॉटसनने अतिशय कार्यक्षम अशी माहिती व संपर्क यंत्रणा प्रस्थापित केली होती.जर एखाद्या ठिकाणी कुत्रा,

बोकड,गाय किंवा माणूस यापैकी काहीही मारलं गेलं किंवा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला गेला तर त्याची खबर लवकरात लवकर आम्हाला मिळू शकणार होती.


 त्यामुळे आम्ही नरभक्षकाच्या हालचालींशी सतत संपर्क ठेवू शकणार होतो.नरभक्षकाचा वावर असलेल्या प्रदेशात प्रत्येक जण स्वतःच्या सावलीचाही संशय घेतो आणि ऐकला जाणारा प्रत्येक आवाज नरभक्षकाने केल्याचा भास होतो. त्यामुळे कित्येक अफवा आमच्यापर्यंत पोहोचणं साहजिकच होतं या अफवांचा पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला मैलोन मैल तंगडतोड करावी लागे.


अशीच एक गंमतीशीर गोष्ट गालटू नावाच्या इसमाबाबत घडली.अलकनंदाच्या उजव्या तीरावर रुद्रप्रयागपासून आठ मैलांवरच्या त्याच्या गुरांच्या ठाण्यावर रात्री झोपण्यासाठी त्याने गाव सोडलं.दुसऱ्या दिवशी त्याचा मुलगा तिथे गेला तेव्हा त्याला त्याच्या बापाचं कांबळे दुसऱ्या दिवशी अर्धवट आत व अर्धवट बाहेर असं पडलेलं दिसलं आणि जवळच्याच मऊ जमीनीवर त्याला त्याच्या मताप्रमाणे फरफटत नेल्याच्या खुणा व बिबळ्याच्या पावलांचे ठसे आढळले.गावात येऊन त्याने बोंबाबोंब केली. त्यानंतर जवळजवळ साठ माणसं 'मृतदेह' शोधण्यासाठी निघाली तर चार माणसांना आमच्याकडे पाठवलं गेलं.त्यावेळेला इबॉटसन आणि मी अलकनंदाच्या डाव्या तीरावर एका डोंगरावर हाकारा घालत होतो.तेवढ्यात ती माणसं तिथे आली.बिबळ्या नदीच्या आमच्याच बाजूला आहे व गालटूचा बळी गेल्याच्या बाबतीत काही तथ्य नाही याची मला इतकी खात्री होती की,इबॉटसनने त्या चार माणसांना पटवारीबरोबर परत पाठवलं व या घटनेचा स्वतः शोध घेऊन यायला सांगितलं.दुसऱ्या दिवशी आम्हाला पटवाऱ्याकडून संपूर्ण रिपोर्ट मिळाला. त्याच्याबरोबर दरवाजाजवळच सापडलेल्या पगमार्कचं स्केचही काढून दिलं होतं.रिपोर्टमध्ये असं लिहिलं होतं की जवळजवळ दोनशे माणसांनी शोध घेऊनही गालटूच्या 'मृतदेहा'चा पत्ता लागलेला नाही व शोध सुरूच ठेवण्यात येत आहे.

चित्रामध्ये एखाद्या थाळीच्या आकाराच्या वर्तुळाभोवती छोट्या चहाच्या कपाच्या आकाराची वर्तुळं काढण्यात आली होती आणि सर्व वर्तुळं कंपासने काढण्यात आली होती.पाच दिवसानंतर इबॉटसन व मी ब्रिजवरच्या टॉवरवर बसण्यासाठी निघत असताना एक वरात बंगल्यात आली.सर्वात पुढे एक वैतागलेला माणूस सारखा हातवारे करून ओरडत होता की मी काहीही गुन्हा केलेला नसताना मला अटक करून रुद्रप्रयागला का आणण्यात आलं आहे? हा माणूस गालटूच होता! त्याला शांत केल्यावर त्याने त्याची कथा ऐकवायला सुरूवात केली.झालं होतं असं की त्या रात्री गुरांच्या ठाण्यावर जाण्यासाठी घरातून निघतानाच त्याचा मुलगा घरी आला व त्याने सांगितलं की त्याने शंभर रुपयांना आज एक बैलजोडी विकत घेतली आहे.गालटूच्या मताप्रमाणे ती जोडी सत्तर रुपयांच्या वर जायला नको होती.ह्या पैशांच्या उधळपट्टीमुळे त्याने डोक्यात इतका राग घालून घेतला की गुरांच्या ठाण्यावर रात्र काढून सकाळी उठल्यावर तो त्या तिरीमिरीतच दहा मैलांवरच्या गावात त्याच्या लग्न झालेल्या मुलीकडे निघून गेला होता.आज जेव्हा तो परत आला तेव्हा त्याला पटवाऱ्याकडून अटक झाली.आता त्याला जबाब पाहिजे होता की या सर्व घटनेत त्याचा दोष काय आहे.काही वेळ निघून गेल्यानंतर त्यालाही हळूहळू या सर्व प्रकारातला विनोद कळायला लागला व तो दहा मैलांवरच्या गावात राग थंड करण्यासाठी गेला असताना पटवाऱ्यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून व इतरही मंडळीकडून काय मूर्खपणा झालाय हे कळल्यावर तोही सर्व मंडळींबरोबर खूप हसायला लागला.


रुद्रप्रयाग ब्रिजच्या टॉवरवरच्या त्या निसरड्या प्लॅटफॉर्मवर बसायला इबॉटसनचा सक्त विरोध होता.तिथे लाकूड व सुतार उपलब्ध असल्याने त्याने टॉवरच्या कमानीमध्येच चांगला प्लॅटफॉर्म तयार करवून घेतला.त्या प्लॅटफॉर्मवर त्याला शक्य होतं तेवढ्या पाच रात्री आम्ही बसून काढल्या.इबॉटसन गेल्यानंतर बिबळ्याने एक कुत्रा,चार बोकड व दोन गायी मारल्या.कुत्रा व बोकड मारल्याच्या रात्रीच दोघांचाही फडशा पाडला गेला,पण प्रत्येक गायीजवळ मात्र मी दोन दोन रात्री बसून काढल्या.

त्यातल्या पहिल्या गायीवर दुसऱ्या रात्री बिबळ्या आला,

पण रायफल खांद्याला लावून बरोबर आणलेल्या टॉर्चचं बटन मी दाबणार इतक्यात शेजारच्या घरातल्या बाईने दरवाजा उघडताना आवाज केला आणि दुर्दैवाने तो पळून गेला.या सर्व काळात एकही मनुष्यबळी मात्र गेला नाही.फक्त एक स्त्री व तिचं मूल जखमी झाल्याची घटना मात्र घडली.ते दोघं जिथे झोपले होते त्या खोलीचा दरवाजा बिबळ्याने ताकद लावून उघडला आणि त्या बाईचा हात तोंडात पकडून तिला खोलीबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने ती बाई खंबीर होती आणि बेशुद्ध वगैरे पडली नाही.जमीनीवरून ओढली जात असताना ती खोलीत आणि बिबळ्या दरवाजाबाहेर अशी स्थिती तिने त्याच्या तोंडावर दरवाजा लावून घेतला आणि छातीवरच्या काही जखमा व सोलवटलेल्या हातासकट ती वाचली,


मुलाच्या डोक्यालाही छोटी जखम झाली.या खोलीत मी दोन रात्री बसून काढल्या,पण बिबळ्या काही आला नाही.

मार्च महिन्याच्या शेवटी शेवटी एकदा मी केदारनाथ यात्रामार्गावरच्या एका गावाला भेट देऊन परतत होतो.

एका ठिकाणी मंदाकिनी नदीचा प्रवाह रस्त्याच्या अगदी जवळून गेला होता व तो उतारावर १२ फूट खाली कोसळल्यामुळे धबधबा तयार झाला होता.इथे आल्यावर मला दिसलं की नदीच्या पलीकडे, धबधब्याच्या वरच्या भागाच्या खडकांवर काही माणसं त्रिकोणी जाळं लावलेला लांब बांबू घेऊन बसली होती.त्यादिवशी माझी चालही बरीच झाली होती आणि ती माणसं काय करतायत ते बघण्याची उत्सुकताही होतीच.त्यामुळे मी रस्ता सोडला व थोडी विश्रांती घेण्यासाठी आणि सिगरेट ओढण्यासाठी माझ्या बाजूच्या खडकावर बसलो.आता त्यांच्यातला एकजण उठला व धबधब्याच्या खालच्या दिशेला आपलं बोट करून उत्तेजित आवाजात त्याच्या सहकाऱ्यांना काहीतरी सांगायला लागला तसे त्याचे दोन सहकारी तो जाळं लावलेला बांबू घेऊन उठले आणि त्यांनी धबधब्याच्या अगदी जवळ ते जाळं येईल अशा पद्धतीने बांबू पकडला.३ ते २५ किलो वजनाचे महासीर मासे असलेला एक थवा धबधब्यावरून खाली उडी घेत होता.त्यातला एक १० किलो वजनाचा मासा धबधब्याच्या प्रवाहात शिरून खाली पडत असतानाच सफाईदारपणे त्या जाळ्यात पकडला गेला.जाळ्यातून तो मासा काढून टोपलीत टाकल्यानंतर परत एकदा ते जाळं धबधब्यावर धरलं गेलं.मी हा खेळ जवळजवळ एक तास बघत होतो आणि तेवढ्या वेळात त्यांनी साधारण त्याच वजनाचे चार मासे पकडले.माझ्या मागच्या रुद्रप्रयागच्या भेटीत इन्स्पेक्शन बंगल्याच्या चौकीदाराने मला सांगितलं होतं की या भागात वसंत ऋतूमध्ये मंदाकिनी व अलकनंदा या दोन्ही नद्यांमध्ये वितळलेल्या बर्फाचं पाणी येणं सुरू होण्याच्या जरासं अगोदर खूप मस्त फिशिंग होऊ शकतं. त्यामुळे यावेळी रुद्रप्रयागला येताना.


मी माझा चौदा फुटी वेताचा साल्मन रॉड,२५० यार्ड लांबीची फिशिंग लाईन गुंडाळलेलं सिलेक्स रीळ व एक-दोन इंचाचे घरी बनवलेल्या पितळी चमच्याचं आमिषही आणलं होतं.


दुसऱ्या दिवशी नरभक्षकाची कोणतीही विशेष बातमी मिळाली नाही तेव्हा मी ही सर्व साधनसामग्री घेऊन धबधब्यावर आलो. कालच्याप्रमाणे आज महासीर मासे (मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे,आरती प्रकाशन) 

धबधब्यावरून खाली उडी मारत नव्हते. पलीकडच्या बाजूला काही माणसं शेकोटीच्या भोवती हुक्का ओढत बसली होती व एक दोन दम मारले की तो हुक्का एका हातातून दुसऱ्याच्या हातात जात होता... मला पाह्यल्यावर त्यांची उत्सुकता चाळवली व ते निरखून बघू लागले !


या लेखातील शिल्लक भाग १४.०४.२४ दिवशीच्या पुढील भागामध्ये..

१०/४/२४

स्वतःला मोकळं करा..set yourself free..

कधीतरी आयुष्यात काहीतरी डळमळू लागते. तेव्हाच साहित्याचा जन्म होतो.असाच एक जन्म झाला.किरण येले लिखित मोराची बायको या पुस्तकाचा..


प्रत्येक मानवी जीवनात शुद्ध पारदर्शक स्वातंत्र्य असावे अशी माझी इच्छा आहे.सिमोन द बोव्हुआर या मध्यवर्ती विचाराचा 'विचार' करायला लावणारं वाक्य या पुस्तकाचा 'मानवी गाभा आहे.' 


द सेकंड सेक्स जो १९४९ तो प्रसिध्द झाला.जगभरातील स्त्रीमुक्तीवादींना,सर्व स्त्रियांना बायबल ठरावा असा ८०० पानांचा हा ग्रंथ आहे.जो करुणा गोखले यांनी ५५९ पानांमध्ये अनुवाद केला आहे,तर पद्मगंधा यांचे प्रकाशन आहे.जग बदलणारे ग्रंथ 'दीपा देशमुख मनोविकास प्रकाशन या मध्ये विस्ताराने लिहिले आहे.स्त्री जन्मत नाही तर ती घडवली जाते.तिचे पंख छाटले जातात आणि तिला उडता येत नाही असा तिच्यावर आरोप केला जातो.सिमॉन द बोव्हा.या पुस्तकात शेतीचा उदय होण्याच्या आधीपासूनच स्त्रीचा इतिहास लिहिला होता.


या पुस्तकात सिमॉन म्हणते,स्त्रियांचे पोशाख दागिने हे सगळं तिच्या हालचालींवर बंधन घालण्यासाठी केले जातात.चीनमध्ये प्रथेच्या नावाखाली मुलींचे पाय जाणीवपूर्वक बुटात घालून त्यांची वाढ होऊ देत नसत.

इतकच काय पण अलीकडल्या काळातली गोष्ट बघितली तर हॉलीवूडमधल्या अभिनेत्री असलेल्या स्त्रियांची टोकदार नखं त्यांच्या हातांच्या हालचालींवर बंधन आणताना दिसतात.


पुरुषाला स्त्रीमध्ये निसर्गातलं खळखळणारे सौंदर्य असावं असं वाटत असतं.पण निसर्गातलं वैविध्य,त्यांचं खरं रूप त्याला नको असतं.स्त्री सुंदर हवी पण नदीतल्या अविचल गोट्यांसारखे असणे त्याच्या सोयीचा असतं.


जन्मल्यानंतर तो मुलगा असो व मुलगी दोघांचीही वाढ सारखीच होत असते.दोघांनाही आईच्या स्तनावाटे दूध पिण्यापासून अनेक कृतींतून सारखाच आनंद मिळत असतो.हळूहळू मुलाला तू वेगळा कोणीतरी आहेस म्हणून वेगळ्या पद्धतीने वाढवलं जातं आणि मुलीला तु स्त्री आहेस,असं म्हणून तिच्यावर अनेक बंधनं लादत तिला वाढवलं जातं.खरं तर त्याआधी दोघांनाही आपल्यातल्या जैविक फरकाचा पत्ता नसतो.मुलीवर अगदी कोवळ्या वयापासून मर्यादा घालण्यात येतात.


उत्क्रांतीच्या टप्प्यातून जात असताना स्त्री आणि पुरुष यांच्यात समानतेच नातं निर्माण होऊ शकलं असतं,पण तसं घडलं नाही.याचं कारण कुठलाही सजीव दुसऱ्या सजीवाचं शोषण करू बघतो.त्यामुळे पुरुष स्त्रीकडे बघताना आपण वरचढ कसे आहोत,ते दाखवण्याचा प्रयत्न करत राहतो.स्त्री आणि पुरुषांच्या नात्यात समतोल आणण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे असं सिमॉन म्हणते.थोडीशी ओळख वाढण्यासाठी ही माहिती दिलेली आहे.आपण आता परत जावू मोराची बायको या पुस्तकाकडे.. या पुस्तकात सात कथा आहेत.मुखपृष्ठ - सतीश भावसार, ग्रंथाली यांचे प्रकाशन आहे.


'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'

असंही त्या प्रश्नांचं स्वतःच सरळपणे उत्तरही दिलं होतं !


एक वाचक म्हणून मी पुस्तकावर व पुस्तक माझ्यावर जिवापाड प्रेम करतात.तुम्ही जर मनापासून काही वर्षे पुस्तके वाचलीत.तर तुमच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू होतं. जिथून पुस्तके तुम्हाला वाचतात.लाओत्से,बुद्ध,कन्फ्यूशियस त्यांचे विचार तत्त्वज्ञान एकच आहेत.व हे एकत्रित प्रवास करतात.हे मनापासून पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला समजत जातं. वाचकांनी पुस्तकांमधील असणाऱ्या दोन ओळींमध्ये मोकळ्या जागेतील प्रवाशी असलं पाहीजे. लेखक पुस्तक लिहीत असताना.ती घटना तो प्रसंग पुस्तकात उतरत असताना.त्या लेखकाच्या जीवाची झालेली घालमेल,श्वासांमधील चढ - उतार,दुःख,आनंद निर्माण झालेली भावना याचं आकलन त्या दोन ओळींमधील मोकळ्या जागेतच होतं.पुस्तक वाचत असताना आपलं भांड मोकळं ठेवावं.कारण 

भरलेल्या भांड्यामध्ये नवीन काय भरता येत नाही.

प्रत्येक पुस्तक वाचण्या अगोदर स्वतःला मोकळ करा. म्हणजे प्रत्येक पुस्तक तुम्हाला एक नवीन ज्ञान देईल विचार देईल.जसं कबीरांनी एका ठिकाणी म्हटलं आहे.


कबीर मन निरमल भया जैसा गंगा नीर । तब पाछें लगा हरि फिरै कहत कबीर,कबीर ।।


गंगेच्या पाण्यासारखं मी माझं मन निर्मळ स्वच्छ केलं त्यानंतर मग हरीच 'कबीर, कबीर' असा जप करत मागे मागे फिरू लागला..


' मोराची बायको ' हे पुस्तक वाचण्या अगोदर मी नुकतंच झेन नितीन भरत वाघ यांचे पुस्तक वाचून संपवलं होतं.त्यात एक छोटीशी कथा आहे.ही कथा या ठिकाणी द्यावी असं मला वाटतं.


गुरू कधी कधी ही गोष्ट सांगत : "बुद्ध जेथे जन्मला होता,त्याच गावात एक म्हातारी जन्मली होती.पण ती लहानपणापासून बुद्धाला खूप घाबरत असे.सगळे तिला सांगत,तो खूप चांगला माणूस आहे वगैरे. पण तिची भीती कधीच गेली नाही. तो दिसेल म्हणून ती नेहमी घरात पळून जायची. एकदा ती दुसऱ्या गावाला जात असताना केशरी रंगाचं चिवर धारण केलेला एक भिक्खू दिसला,तो बुद्धच होता.ती खूप घाबरली, पण पळाली नाही.तिने बुद्धाकडे पाहण्याचे टाळले.तिने दोन्ही हातांनी डोळे गच्च मिटून घेतले.पण आश्चर्य असे,की ती जितक्या गच्चपणे डोळे मिटत होती,तितका बुद्ध तिला तिच्या बंद केलेल्या हाताच्या बोटांतून स्पष्ट दिसत होता. सांगा,ती म्हातारी बाई कोण होती?"


किरण येले यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून रस्त्यावरची माणसं पुन्हा माणुसकीच्या परिघारावरती आणलेली आहेत.


साइन आउट या कथेत एक मानसशास्त्र आहे. माणसाच्या सजीव जीवनामध्ये कृत्रिम जीवन आल्यानंतर काय होऊ शकतं यावर भाष्य केलं आहे.आपल्याला आवडणारी सुंदर गोष्ट केवळ आपल्याला सांभाळता येणार नाही वा आपल्या

जवळ फार काळ राहू शकणार नाही आणि ती हरवली तर ते दुःख आपण पचवू शकणार नाही,

म्हणून नाकारतो किंवा असंही होतं की,सुंदर गोष्टीमागून येणाऱ्या अडचणी,प्रश्न,गुंते,दुःखं यांना आपल्याला सामोरं जाता येणार नाही म्हणून आपण नाकारतो,पण कारण दुसरंच देतो.पण खरोखरचं वास्तवात आपण जगतं असताना कोणतही अनुमान न लावता वर्तमानमध्ये मुक्तपणे जगलो पाहीजे.जे आपण जगत नाही.


अवशेष ही कथा वाचताना माणसाचं दुसऱ्या माणसाची असणार नातं,वागणं हेच जिवंतपणे तुमचं अवशेष दाखवणार असतं.प्रत्येक सजीव गोष्ट ही एकमेवच असते.हे वाक्य आत्मपरीक्षण करायला लावते.हे वाचत असताना एक वाक्य आठवले.ते ही पुस्तकातील आपण प्रचंड सुदैवी आहोत की आज आपण इथे आहोत..! आणि 'आपण' म्हणजे प्रत्येकच सजीव.आपण आपलं आयुष्य जगत असतो.पण जगण्याच्या या गुंतागुंतीमध्ये आपल्या हातून बऱ्याच काही महत्त्वाच्या रिकाम्या जागा सुटून जातात.काहीतरी तुटले काहीतरी आवाज आलाय.पण नेमका कशाचा हेच आपण विसरून जातो कारण आपलं जगणं हे पृष्ठभागावरचं असतं आतून नसतं.पुस्तक आणि माणसं अगदी सेम असतात.

माणसांनी एकमेकांना नव्यानं वाचलं पाहिजे.पुस्तक जसं वर वर वाचलं की कळत नाही,तसंच माणूसही.वर वर वाचलात की कळतच नाही.पण आत्मीयतेनं वाचले की माणसाच्या आत नेमकं काय चाललंय ते कळतं. म्हणजे एकच पुस्तक आपण जर अकरा जणांच्याकडे दिले तर ते पुस्तक एक न राहता अकरा पुस्तके होतात.म्हणजे तिथे ११ वेगवेगळे दृष्टिकोन असतात.


कोपऱ्यातलं टेबल हा टेबल अजूनही माझ्या डोक्यामध्ये घुमत आहे.सरोळकर ज्यानं माणसांतनं स्वतःला वेगळे केलं होतं.अगदी त्या कोपऱ्यातल्या टेबलासारखं ही अविस्मरणीय घटना आहे.बायकांसोबत मी का जातो ते तुम्हाला नाही कळायचं.कारण तुम्हाला त्यांचे फक्त टोचणार अवयव दिसतात.बोचणारे त्यांचे डोळे नाही दिसत.देवानं एक मायाळू माणूस बनवला,त्यालाही तुम्ही घाणेरड्या नजरेने बघता. तुम्हाला वाढवणाऱ्या,जन्म देणाऱ्या,पाजून मोठं करणाऱ्या अवयवांना,ओगंळवाणी करून टाकता.तुम्ही बायकाकडे अशा नजरेने कसं पाहू आणि बोलू शकता? या माणसांमध्ये मला निर्मळता,

निकोपता दिसली.स्त्री समजून घेण्यासाठी आपल्यातील पुरुष व पुरुषार्थ संपवावा लागतो.याची जाणीव झाली.


ती आणि ती चिमणी व स्त्री यांच्या विषयी डोळं खाड करून उघडं करणारी अतिशय मनस्वी मांडणी केलेली आहे.चांगला आणि वाईट या विचारातील द्वंद या कथेमध्ये वाचायला मिळत. जसं की प्रत्येक रात्र एकसारखे नसते.

तशी दिसत किंवा भासत असली तरी चंद्र,सूर्य,तारे आपापल्या स्थानी भासत असले तरी तसं नसतं. त्यांच्या जागा बदललेल्या असतात.कोन बदललेले असतात,

वाहणारा वारा वेगळा असतो.धरतीच्या आत खदादणारी लाव्हालय वेगळी असते.स्त्री,स्त्रीत्व जगण्याची तत्वे,आईने सांगितलेलं अनुभवी जीवन हे खरोखरच अचंबा वाटण्यासारखा आहे.आपण असं कधी विचारच केलेला नाही.असं राहून राहून वाटतं.


बाई ग,एक लक्षात ठेव चालताना रस्त्यालगतच्या दुकानातून खूप साड्या मांडलेल्या दिसतात. त्यांतल्या काही साड्या आवडतातही आपल्याला.पण म्हणून त्या सगळ्या घेत गेलो तर घराचाच बाजार होऊन जाईल! एवढ्या वर्षांत तू जे शिकलीस ते तू सांगितलंस... आता एवढ्या वर्षांत मी जे शिकले ते तुला सांगते, नीट ऐक आयुष्य हे असंच असतं बये.मनाची एक मागणी पूर्ण केली की दुसरी उगवणारच कुत्र्याच्या छत्रीसारखी कुठेही,कशीही.मन लहान मुलासारखं असतं.त्याला आवडेल ते मागत राहणार,हट्ट करणारच लहान मुलासारखं.कारण त्याला माहीत नसतं आईसक्रीम खाल्ल्यानं पडसं होतं,चॉकलेट खाल्ल्यानं दात किडतात. मनाला आपण समजावायला हवं की,आयुष्यात खूप गोष्टी दिसताक्षणी आवडतात, पण जवळ केल्यावर त्याचे परिणाम वाईट होतात. आणि प्रवाहीपणाचं म्हणशील तर सगळ्या गोष्टी त्या त्या परिघातच बदलतात.म्हणजे बदलायचं म्हणून चंद्र,सूर्य,तारे आकाश सोडून समुद्रात प्रकाशत नाहीत.फक्त जागा बदलत राहतात आकाशातच.

बदलायचं म्हणून पृथ्वी उलटी फिरू नाही लागली कधी एवढ्या वर्षांत.फक्त कोन बदलत राहिली.झाडं जमिनी

ऐवजी आकाशात उगवली नाहीत कधी बदलायचं म्हणून.म्हणे प्रवाही असायला हवं!"असं म्हणत ती निघाली. बाई ग... आपण आपल्यावर वार होतो तीच बाजू जोजवत बसतो कायम.छातीवर वार झाला की तीच जागा दाखवत राहतो आणि पाठ विसरूनच जातो.

उजव्या हातावर झाला तर डावा हात विरसतो.डावा डोळा जखमी झाला तर उजवा डोळा विसरतो.तेव्हा प्रत्येक गोष्टीला दुसरीही बाजू असते हे लक्षात ठेव. 


आपण सगळेच आपल्याला समजतो तसे नसतो.

आपल्या सगळ्यांचंच आतलं रुप वेगळं असतं.

एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे गेल्यावरच ते आपल्याला कळतं.हे वैचारिक वैज्ञानिक सिद्धांताने सिद्ध केलेले वाक्य वाचून विचार करायला लागलो आहे.


मांदळकरबाई,अमिबा आणि स्टील ग्लास,मोराची बायको या सर्वच कथा आपल्याला भरभरून जीवन देत आहेत.

पण हे घेण्यासाठी अगोदर आपण लायक असायला हवं.चौकट व थडगे यामध्ये काही फुटांचे अंतर असतं.

हे हेन्री डेव्हिड थोरो यांनी सांगितलेले आहे.पण या चौकटीमध्ये आणि थडग्यामध्ये किती अंतर आहे.हे अंतर समजून घेण्यासाठी मोराची बायको हे मुळ पुस्तक वाचावं लागेल. हे पुस्तक समजून घेण्यासाठी आपल्याला 'जाग्यावर' असावं लागेल.ते ही आतून जस की फार वर्षांपुर्वी एमर्सन यांनी हेन्री डेव्हिड थोरो ला सांगून ठेवलं आहे.स्वतःसाठी एक झोपडी बांध आणि जिवंत असतानाच स्वतःची चिरफाड करण्याची प्रक्रिया सुरू कर...! 


अवेकन द जायंट विदिन मध्ये अँथोनी रॉबीन्स यांनी नातेसंबंधाबद्दल सांगितले आहे.


जीवनाचा पाया समग्र नातेसंबंध असतो.सुयोग्य जीवन अत्यंत सुव्यवस्थेत आणि सद्‌गुणात असते.असे आयुष्य असामान्यपणे साधे असून सदैव आत वळलेले आहे.

एकूणच संपूर्णपणे पवित्र आणि खोलवर साधे असलेल्या मनात कोणाताही संघर्ष नसतो.अशा प्रकारचा पाया सहजपणे,कोणताही विशिष्ट प्रयत्न न करता आकाराला येतो,त्यावेळी आपण त्यातले सत्य पाहू शकतो.एकदा का जे आहे त्याचे समग्र आकलन झाले की मूलभूत बदल सहज शक्य होतो.नातेसंबंध ही मोठी छान गोष्ट आहे.



एका प्रतिभावान कवीची एक कवीता 


तुझ्या अंतर्मनातील

 सुप्त साम्राज्याचा-ऊर्जेचा तू शोध घे!


तो घेतलास आणि तू तुझ्यातील सामान्यत्व नाकारलेस, 

तर तुझे सारे भ्रम नाहिसे होतील.


दुःखाच्या दलदलीतून तू कधी चाललाच नाहीस, तर तुला आनंदाविषयी कसे समजणार?

आपल्या बंधनाबद्दल तू मोठमोठ्यांने ओरडला नाहीस, 

तर तुला स्वातंत्र्याचे मोल कळेल का? 

जर तू प्रेमाशून्य गोष्टींच्या अडथळ्यातून 

मुक्त होण्यासाठी प्रयत्नच केला नाहीस, 

तर तुला प्रेम म्हणजे काय ते कळेल का?


शेवटी जाता जाता..


एक झेन कथा शिष्याने विचारले,"सत्य मार्ग कोणता आहे?"


"रोजचा मार्गच सत्य मार्ग आहे." गुरू उत्तरला.


"मी शिकू शकतो का?" शिष्याने विचारले.


"जेवढा तू शिकशील,तेवढा सत्यमार्गापासून दूर जाशील."


"जर मी शिकलोच नाही तर मला कसं समजेल?" शिष्याने विचारले.


गुरू उत्तरला, "मार्ग ही दिसणारी वा न दिसणारी गोष्ट नाही,ती माहीत असलेली वा माहीत नसलेली गोष्ट नाही.मार्गाची अभिलाषा धरू नको,अभ्यास करू नको किंवा नाव देऊ नको. जर तुला स्वतःला मार्ग शोधायचा असेल, तर स्वतःला आकाशासारखं मोकळं कर."


बघा जमलं तर स्वतःला मोकळं करा…


मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो,हे संपूर्ण पुस्तक वाचून ते तुमच्या जीवनाशी,आयुष्याची जोडून घ्या.. शेवटी महत्वाचे असते ते प्रत्यक्ष आपलं जगणं..! जगतानाच शब्दांचा खरा अर्थ आपल्याला कळायला लागतो.हे पुस्तक म्हणजे कसं जगायला हवं? या गुंतागुंत अवघड प्रश्नाचं सरळ साधं उत्तर..! असं जगावेगळ पुस्तक लिहिणारे आदरणीय लेखक किरण येले यांचे शतशः आभार व धन्यवाद.. एक जगावेगळी माणसाला माणूस बनण्यासाठीची निर्मिती केल्याबद्दल आपले पुनश्च एकदा आभार व धन्यवाद…


हे समिक्षण लिहून पूर्ण केलं आणि शांतपणे रस्त्याच्या कडेला कट्ट्यावरती बसलो. आणि त्याचवेळी नेहमीच्याच सवयीप्रमाणे माझी पत्नी सौ.मेघा म्हणाली,आज एकटेच बसला आहात,

पुस्तक कुठे आहे? पुस्तकाशिवाय तुम्ही म्हणजे स्त्रीचं मोकळं कपाळ मी हसून उत्तर दिलं आत्ताच समीक्षण लिहून पूर्ण केले आहे.म्हणून शांत बसलो आहे.…!!

८/४/२४

टॉलस्टॉयचे गांधीजींना पत्र.. Tolstoy's letter to Gandhiji..

Religion is not a belief in certain supernatural occurrences, prayers and nor in the neccessity for certain cermonies; nor is it the superstition of ancient ignorance.

Religion is a certain relation established by man between his separate personality and the infinite universe or its Source, and man's purpose in life which resulting from that purpose.God is not a person and there is no personal immortality, but whenever anyone devotes his life to carry out his will, which is that love should grow within the individual,

the entire world,his work becomes indestructible and after his physical death will merge with the love existing in the cosmos,that is, with God. In this way a truly Christian life acquires a purpose, despite the inevitability of individual death, which makes life blissful and rob death of its sting.


These universal truths common to all religions are so simple,easily comprehensible and near to the heart of every man that they immediately compel recognition.We are of necessity led to recognise ourselves as a part of the whole- a part of something infinite. This infinite is God... to a ma materialist-matter; to an individualist-a magnified, non-natural man; to an idealist-his ideal,Love.


'गांधी नावाचे महात्मा' संपादक: रॉय किणीकर सहाय्यक:अनिल किणीकर,डायमंड पब्लिकेशन्स या पुस्तकातील… या पत्राचा मराठी भाषेमध्ये स्वैर अनुवाद केला आहे.आमचे मार्गदर्शक मित्र,लेखक,विचारवंत डॉ.रवींद्र श्रावस्ती यांनी त्यांचे विशिष्ट आभार व धन्यवाद..!!


धर्म म्हणजे विशिष्ट अलौकिक, दैवी घटनांवर विश्वास नव्हे ; विशिष्ट प्रार्थना आणि धार्मिक विधी करणेही नव्हे;  अथवा अंधश्रद्ध प्राचीन अज्ञानही नव्हे; धर्म म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या स्वतंत्र व्यक्तित्वाद्वारे अफाट विश्वाशी  किंवा त्याच्या स्त्रोताशी विशिष्ट नाते निर्माण करणे होय ; तसेच व्यक्तीचा जगण्याचा उद्देश की ज्या विश्वातून तो आला आहे, त्याच्याशी नाते निर्माण करणे होय. देव हा एक व्यक्ती नाही आणि व्यक्तीला अमरत्व नाही; पण जेव्हा कोणीही व्यक्ती आपले आयुष्य देवाच्या इच्छेनुसार समर्पित करतो, आपल्या आत वाढत असलेल्या प्रेमाला जागून ; संपूर्ण जगात त्याचे काम अमर होते आणि त्याच्या भौतिक शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे शरीर सृष्टीच्या प्रेमस्वरूपात म्हणजेच ईश्वरात विलीन होते. याप्रकारे  खरे ख्रिश्चन म्हणून जगणे आपल्या जीवनात अर्थ प्राप्त करते, त्याला हेतू प्राप्त होतो ; व्यक्तीचा मृत्यू अटळ असला तरी जगणं आनंदमय होतं, व त्याद्वारे मृत्यूचा दंश देखील ते जगणं हिरावून घेऊ शकत नाही. सर्व धर्मांत आढळणारी ही विश्वव्यापक सत्ये दिसायला अगदी साधी आहेत ,कळायला सोपी आहेत. आणि प्रत्येकाच्या हृदयाजवळ जाऊन बसतील अशी आहेत व त्यांना समजून कार्य करायला बाध्य करतील अशी आहेत. आपण या अफाट अनंत विश्वाच्या पसार्याचे अभिन्न भाग आहोत याचा आम्हाला बोध झाला पाहिजे. ही अफाट अनंतता म्हणजेच ईश्वर आहे.. भौतिकावाद्याची भौतिकता,  व्यक्तिवादाला अति महत्व देणार्या व्यक्ती , अनैसर्गिक व्यक्तित्व, आदर्शवादी लोक, यांंचा आदर्श जे प्रेम आहे, तेच ईश्वर आहे.


आदरणीय डॉ.रवींद्र श्रावस्ती साहेब 


 'यातनामुक्तीच्या विश्वात' या सदराखाली 'तरुण भारत संवाद' या वृत्तपत्रामध्ये आपली लेखमाला सुरू आहे.

वृत्तपत्राला 'ज्ञानाचे स्तोत्र' म्हटलं जातं आपली लेखमाला मी न चुकता आवर्जून वाचतो.वृत्तपत्र वाचणे हा एक शिष्टाचार आहे.'शरीर' या पुस्तकात एक मध्यवर्ती  वाक्य आहे,ते म्हणजे 'प्रतिबंध हाच इलाज' आपल्या या अभ्यासपूर्ण लेखामुळे सर्वसामान्य माणुसही स्वतःच डॉक्टर बनून काळजी घेवू शकतो.एवढी ताकत आपल्या लेखामध्ये आहे.आजच्या जगामध्ये किरकोळ आजारी पडले तरीही महागड्या तपासण्या कराव्या लागतात.गरीब लोक दवाखान्याचे नाव काढताच त्यांचा रक्तदाब वाढायला लागतो.पूर्वी डॉक्टर व रुग्णांचे नातं वेदना

मुक्तीसाठीचं होतं.डॉक्टर हाच त्या रुग्णाचा पहिला नातेवाईक होता.आता तो व्यवसाय झालेला आहे.

आपला रुग्ण आपल्याकडून दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये म्हणून त्याला जास्तीची किंवा अनावश्यक अँटोबायोटिक्स देवून बरं केलं जातं.पण आपल्यासारखे दुर्मीळ डॉक्टर अजून आहेत,जे संवादातून, विश्वास देवून रुग्णांवर उपचार करतात. आधार देतात. त्यामुळे रुग्णाला जास्त खर्च न पडता तो लवकर बरा होतो व डॉक्टरांच्या ऋणात राहतो.हिप्पोक्रेट्सच्या मते," निरोगी माणसाच्या शरीरात सगळे अवयव सुसंगतपणे वागत असतात.पण जेव्हा माणूस आजारी पडतो तेव्हा हा समतोल ढासळलेला असतो.आपलं शरीर स्वतःच स्वतःला बरं करायचा प्रयत्न करत असतं आणि आपण त्या शरीराला बरं होण्यासाठी योग्य वातावरण निर्माण केलं पाहिजे." हिप्पोक्रेट्स यांचं हे म्हणणं फक्त डाॅक्टरांनाच दिशादर्शक नाही तर सर्वांनाच आहे. 


आज प्रत्येक डॉक्टराला पदवी मिळते तेव्हा

हिप्पोक्रेट्सची जी Oath (शपथ) आहे , ती घ्यावी लागते. असे सांगतात की ती हिप्पोक्रेट्सनं लिहिलेलीच नाही..! त्याच्या मृत्यूनंतर किमान सहा शतकांनी ती लिहिली गेली आहे.गेल्या हजारो वर्षांमध्ये त्या शपथेत अनेक बदल झालेले असले तरी आजही प्रत्येक डॉक्टरला या व्यवसायात पडण्यापूर्वी ती शपथ घ्यावी लागते. 


त्या मूळच्या शपथेचा सारांश असा : मी अपोलो देवतेची शपथ घेऊन सांगतो, की मी माझ्या वैद्यकीय व्यवसायाशी अतिशय प्रामाणिक राहीन. तसंच मी हे काम करत असताना ज्या ज्या लोकांशी माझा संबंध येईल त्या सर्वांशी मी सहानुभूतीनं वागेन. मी भ्रष्टाचार करणार नाही.मी माझ्या ज्ञानाचा वापर फक्त आजारी माणसांना बरं करण्यासाठी करेन.मी कुणालाही कधीही विषारी औषध देणार नाही.मी कुठल्याही स्त्रीला तिच्या गर्भाचा नाश होण्यासाठी कधीही कुठलंही औषध देणार नाही. मी रुग्णांच्या खासगी बाबींविषयी किंवा त्यांच्या आजारांविषयी दुसऱ्यांशी उगीच चर्चा करणार नाही.मी कोणत्याही घरात गेलो तर तिथे मी रुग्णाला बरं करण्याचा सर्वतोपरीनं प्रयत्न करेन. मी जाणूनबुजून काहीही वेडंवाकडं करणार नाही.''सजीव' पुस्तकातील ही प्रतिज्ञा व हे उतारे ज्या क्षणी वाचले त्याच क्षणी आपले लेख व आपण दिसलात.आपले लेख सत्याची प्रचिती देतात.

आपणास व आपल्या लिखाणास माझा संवेदनशील सलाम व पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा."जर तुम्ही महान पावलांचा पाठलाग करत असाल तर तुम्ही महान पावलांचे ठसे सोडता."अर्नेस्ट अग्येमांग येबोह यांचं हे वाक्य आहे. हे ठसे सोडण्याचे कार्य दैनिक तरुण भारत हे वृत्तपत्र करीत आहे. त्याबद्दल या समूहाचे आदरणीय संपादक, उपसंपादक, कार्यालयीन स्टाफ या सर्वांचे आभार ! विशेषतः धन्यवाद यासाठीही की काय वाचावं अशा विचारात असणाऱ्या लोकांच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे दैनिक तरुण भारत संवाद  ! असे वैचारिक लेख प्रकाशित करून सर्वसामान्य वाचकांना असामान्य माणूस बनवण्यासाठीच्या प्रक्रियेमध्ये आपला वाटा खूप मोठा आहे. "कोणीही तुमच्या मेंदूत सत्य ओतणार नाही.हे तुम्हाला स्वतःसाठी शोधायचे आहे." हे 'नोम चोम्स्की' यांचं विधान यासाठी आपले वृत्तपत्र कार्यरत राहो,यासाठी शुभेच्छा!थांबतो.आपले शतशःआभार धन्यवाद !