* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१९/१०/२४

एकीमध्ये शक्ती/Power in one

झाडे समाजशील असतात.एकमेकांना मदत करून त्यांचं जीवन सुरळीत चालू असतं.पण जंगल परिसंस्थेमध्ये फक्त एवढ्या गोष्टीने त्यांचा टिकाव लागणार नसतो.झाडाची प्रत्येक प्रजाती स्वतःला अधिक सूर्यप्रकाश मिळवण्याच्या प्रयत्नात असते. या स्पर्धेमुळे इतर प्रजातींना दाटीवाटीमध्ये राहावे लागणार असते.अधिक सूर्यप्रकाश मिळवण्याच्या, पाणी मिळवण्याच्या स्पर्धेनंतरच अतिंम जेता ठरणार असतो.

जमिनीतील आर्द्रता शोधून तिथंपर्यंत पोचण्याची क्षमता मुळांमध्ये असते. मुळांवर सूक्ष्म केस असतात ज्यामुळे त्यांचा पृष्ठभाग वाढतो आणि जास्त पाणी शोषण करता येते.

सर्वसाधारण परिस्थितीत या पद्धतीने त्यांना पुरेसं पाणी मिळतं पण जास्त पाणी कोणाला नको असतं? आणि याच कारणासाठी कोट्यवधी वर्षांपासून झाडांनी फंगस म्हणजे बुरशी बरोबर मैत्री केलेली आहे.


बुरशी हा एक अद्भुत प्रकार आहे.त्यांचं वर्गीकरण वनस्पती आणि प्राणी या मानवाने केलेल्या दोन गटांपैकी कुठेच चपखलपणे करता येत नाही.वनस्पतीच्या व्याख्येप्रमाणे झाडांना निर्जीव गोष्टीतून आपलं अन्न तयार करता येतं,त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे जगता येऊ शकतं. 


एखाद्या उजाड भूरूपात सुरुवात होते ती हिरव्या वनस्पतीने आणि मगच त्याच्यामागून जनावरं येऊ शकतात.खरंतर गवत आणि रोपट्यांना गुरांनी किंवा हरणांनी चरलेलं अजिबात आवडत नाही. एखाद्या कोल्ह्याने डुकराला खाल्लं काय किंवा हरणाने रोपट्याला खाल्लं काय,दोन्ही गोष्टीत यातना आणि मृत्यू आहेच. बुरशी प्राणी आणि वनस्पतींच्यामध्ये गणली जाते. त्यांच्या पेशींचे आवरण कायटिन नावाच्या पदार्थाने बनलेलं असतं,जे कधीही वनस्पतीत सापडत नाही. शरीरात कायटिन असल्यामुळे बुरशी वनस्पतींपेक्षा कीटक वर्गाच्या जवळ जाते.त्याचबरोबर त्यांना प्रकाश संश्लेषण करून आपलं अन्न बनवता येत नाही त्यामुळे ते इतर सजीवांबरोबर संधान बांधून जिवंत राहतात.


बुरशी पेशीतून असंख्य तंतू बाहेर निघतात,त्यांना पुढे आणखी फाटे फुटून या तंतूंचं एक सूक्ष्म जाळं तयार होतं.बुरशीचं हे जमिनीखालचं कापसासारखं जाळं अनेक दशकं वाढत असतं.या जाळ्याला 'मायसेलियम' म्हणतात.हे मायसेलियम झाडांच्या मुळांना चिकटून एक सहजीवी संबंध झाडांशी जोडतं.बुरशीचं मायसेलियम जाळं आणि झाडाच्या मुळांच्या तंतूचं मिळून जे जाळं तयार होतं त्याला 'मायकोरायझी' म्हणतात.स्वित्झरर्लंडमध्ये एका ठिकाणी 'मधाची बुरशी' नावाची बुरशी सापडते. एकशेवीस एकरात वाढलेली ही बुरशी सुमारे हजार एक वर्षं तरी जिवंत आहे.२३ ओरेगोनमध्ये अशीच एक बुरशी चोवीसशे वर्षं जुनी आहे आणि दोन हजार एकरावर पसरली आहे.तिचे वजन सुमारे ६६० टन असावे.म्हणजे बुरशी हा जीवसृष्टीतला सर्वांत मोठा सजीव मानला पाहिजे. 


स्वित्झर्लंड आणि ओरेगनमध्ये सापडलेली बुरशी ही झाडाशी अजिबात मैत्री करत नाही. किंबहुना जमिनीखाली हिंडताना ते खाण्यायोग्य ऊती शोधत असतात आणि झाडांना मारायचा प्रयत्न करतात. पण ते जाऊ दे! आपण बुरशी आणि झाडांमधल्या सलोख्याच्या जाळ्याबद्दल बोलू.

झाडाच्या प्रत्येक प्रजातीला बुरशीची एक मित्र प्रजाती असते. उदाहरणार्थ,ओकच्या झाडाला मिल्क कॅप नावाची बुरशी मदत करते.यामुळे झाडांच्या मुळाचा पृष्ठभाग वाढतो आणि त्याला जास्त पाणी व पोषणद्रव्यं शोषून घेता येतात.जी झाडं बुरशीशी मैत्री करतात त्यांना नायट्रोजन आणि फॉस्फरस दुपटीने मिळू लागतो.झाडाला जर बुरशीबरोबर भागीदारी करायची असेल तर त्याला अक्षरशः खुलं व्हावं लागतं.कारण बुरशीचे कापसासारखे धागे मायसेलियम झाडाच्या मुळाच्या केसांपाशी पोचायला हवेत.हे झाडाला त्रासदायक असतं का यावर संशोधन नाही,पण झाडाला मात्र हे हवं असतं.मला वाटतं की यामुळे झाडांमध्ये सकारात्मक भावना तयार होत असतील.पण झाडांना काहीही वाटलं तरी यानंतर ती बुरशीबरोबर भागीदारीतच काम करणार असतात. 


बुरशी आता झाडाच्या मुळांत शिरते आणि मुळांभोवती स्वतःला गुंडाळून घेते.अशा प्रकारे हे जाळं जंगलाच्या जमिनीतून मुक्तपणे दूरदूरवर पसरतं.बुरशीच्या भल्यामोठ्या जाळ्याच्या मदतीने झाडाची मुळे दूरपर्यंत पोहोचतात.आता ते झाड जमिनीखालून इतर झाडांच्या बुरशीबरोबर जोडलं जातं.यामुळे आता झाडांना पोषणद्रव्यांची देवाण-घेवाण करणं सोपं जातं.त्याचबरोबर कीटकांच्या आक्रमणाची बातमी एकमेकांपर्यंत पोचवली जाते.बुरशीचं जाळं म्हणजे जंगलातील इंटरनेट म्हणता येईल.पण हे जाळं बनवण्याची किंमत मात्र झाडाला चुकती करावी लागते.ही किंमत म्हणजे त्या बुरशीला अन्नपुरवठा करणं.इतर जनावरांसारखंच बुरशीला आपल्या अन्नासाठी दुसऱ्या सजीवांवर अवलंबून राहावं लागतं.त्यामुळे झाडाकडून बुरशीला साखर आणि कर्बोदके पुरवली जातात.ही बुरशी पण काही अल्पसंतुष्टी नसते.ती झाडांकडून त्यांनी बनवलेल्या अन्नाच्या एक तृतीयांश भागाची मागणी करते,त्यांच्या सेवेचा मोबदला म्हणून !पण जेव्हा आपण दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो तेव्हा अशी गोष्ट केवळ नशिबावर टाकून चालत नाही.मुळाला जडलेली बुरशी झाडाला संदेश पाठवू लागते आणि त्यावर झाडाची प्रतिक्रिया काय आहे याचा अंदाज घेते. जर प्रतिक्रिया अनुकूल असेल तर बुरशी झाडाला उपयुक्त हॉर्मोन म्हणजे ग्रंथीरस पुरवते.यामुळे बुरशी हवी तशी झाडाची वाढ होऊ देते.आपलं पक्वान्न मिळालं की बुरशी झाडांसाठी अजूनही काही पूरक सेवा देते.त्यांच्याकडून मातीतले जड धातू काढून दिले जातात.झाडांच्या मानाने बुरशीला त्याचा कमी त्रास होतो.जे प्रदूषण झाडांपासून दूर ठेवलं जातं ते बुरशीच्या फळांना म्हणजे मशरूम्सना उपयुक्त असतं.१९८६ सालच्या चर्नोबिलच्या न्युक्लिअर रिॲक्टरच्या अपघातानंतर तिथल्या मशरूममध्ये सीझियम नावाचा किरणोत्सर्गी 

धातू सापडत होता.बुरशीकडून झाडाला काही आरोग्यसेवाही पुरवल्या जातात.त्यांचे नाजूक तंतू झाडांना त्रासदायक असलेल्या जंतूंना मुळांपासून दूर ठेवतात.झाडांशी भागीदारी करून बुरशीसुद्धा झाडांबरोबरच शेकडो वर्ष जगू शकतात.पण जर का तिकडे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली,जसं की हवेतील प्रदूषण असह्य झालं,तर मात्र ते श्वास टाकतात.बुरशी मेल्यावर त्याला अनेक वर्षं साथ देणारे झाड फार काळ दुःख करत बसत नाही.आपल्या मुळाशी आलेल्या दुसऱ्या बुरशीबरोबर ते भागीदारी सुरू करतं.झाडाला बुरशीचे अनेक पर्याय उपलब्ध काईफ असतात.


सर्व पर्याय जेव्हा संपतात तेव्हा मात्र झाड धोक्यात येतं.झाडांपेक्षा बुरशी अधिक संवेदनशील असतात.ते आधी आपल्या साथीदाराची निवड करतात आणि एकदा का साथीदार झाडाला पसंत केलं की आयुष्यभर त्याची साथ देतात.ज्या बुरशींना फक्त बर्च किंवा लार्च अशा विशिष्ट झाडांच्या प्रजातीच लागतात,त्यांना 'यजमाननिष्ठ' असं संबोधलं जातं.चॅनतेरेल्स सारख्या काही बुरशीला ओक,बर्च किंवा स्प्रूस पैकी कोणीही चालतं.जमिनीत त्यांच्या वाढीसाठी जागा आहे की नाही,फक्त इतकंच ते बघतात.याचं कारण जमिनीखाली जागेसाठी स्पर्धा असते.उदाहरणार्थ, ओकच्या जंगलात जमिनीखाली एकाच झाडाच्या मुळापाशी बुरशींच्या शेकडो प्रजातींची स्पर्धा चालू असते.ओक वृक्षांना ही योजना अनुकूल असते. एक बुरशी काही कारणास्तव मेली तर दुसरी त्यांना साथ द्यायला उभीच असते.


संशोधकांना असं दिसून आलंय की,बुरशीसुद्धा आपल्या उपजीविकेचे दुसरे पर्याय बघून ठेवतात. सुझान सिमार्ड या संशोधकाने असा शोध लावला की,एका बुरशीच्या जाळ्याने झाडांच्या विविध प्रजातींना जोडून घेतलेले आहे.सिमार्डने इंजेक्शनचा वापर करून एका बर्च झाडात किरणोत्सर्गी कार्बन सोडला.त्यांना तो कार्बन जवळच्या 'डग्लस फर' मध्ये सापडला.जमिनीवरती जरी विविध प्रजातींची झाडं एकमेकांशी स्पर्धा करीत असली तरी त्यांच्या मुळांशी असलेल्या बुरशीचं जाळं मात्र त्यांच्यात तडजोड करण्यासाठी समन्वय घडवून आणण्यासाठी उत्सुक असतं. यातून त्यांना इतर झाडांना मदत करायची असते की आपल्यासारख्या दुसऱ्या बुरशीला हे अजून नक्की माहीत नाही.


मला वाटतं की बुरशी झाडांपेक्षा थोडे पुरोगामी असतात.

झाडांच्या प्रजातींमध्ये सतत स्पर्धा चालू असते.समजा,मध्य युरोपचे स्थानिक बीच वृक्ष तिथल्या बहुतेक जंगलात जास्त संख्येने आहेत तर हे फायद्याचे आहे का? जर एखादा विषाणू आला तर सर्वच बीच वृक्ष मरून जातील नाही का? अशा वेळेस तिथे ओक,मेपल,अश,फर अशा विविध प्रजाती असणं नक्कीच फायद्याचं ठरेल.कारण जरी त्या विषाणूंनी मारलं तरी इतर प्रजाती जिवंत राहतील आणि तिथल्या तरुण पिढीला (द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न,अनुवाद

गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन)

जगण्यासाठी आणि वाढण्यासाठी मदत करतील. वैविध्यामुळे जंगलाला सुरक्षा येते.बुरशीला परिस्थिती अनुकूल आणि स्थिर हवी असते त्यामुळे ते जमिनीखालील इतर प्रजातींना संरक्षण देत असतात.असे केल्याने कुठल्या एका प्रजातीचे वर्चस्व जंगलावर राहात नाही.


जंगलातली परिस्थिती जर बुरशी आणि झाडांना बिकट झाली तर बुरशी निर्णायक भूमिका घेऊ शकतात.

उदाहरणार्थ,जर पाईनच्या जंगलात नायट्रोजनचा तुटवडा झाला तर पाईनची जोडीदार बुरशी,'लाकारिया बायकलर,' किंवा 'दुरंगीफसवे' ही मातीमध्ये एक विषारी द्रव्य सोडते ज्यामुळे स्प्रिंगटेल नावाचे कीटक मरून पडतात आणि त्यांच्यामध्ये असलेला नत्र मातीत मिसळतो. झाड आणि बुरशीला यातून खत मिळते.


मी तुम्हाला झाडांच्या सर्वांत महत्त्वाच्या मदतनिसांची ओळख करून दिली,पण यात अजूनही काही प्राणी गणले जातात.वूडपेकर नावाचा पक्षी झाडाला थेट उपयुक्त नसला तरी त्याच्यापासून फायदा नक्कीच होतो.स्प्रूसच्या खोडाला बार्क बीटल नावाचा कीटक जडला की स्प्रूस धोक्यात येतो.या कीटकांची संख्या झपाट्याने वाढते आणि झाडाच्या जीवनदायी 'कॅम्बियम' थराला खाऊन टाकून झाडाला मारून टाकू शकते. ग्रेट स्पॉटेड वूडपेकरला या कीटकाची चाहूल लागली की तो तिथे तातडीने येतो.बुंध्यावर अनेक वेळा वर खाली फेऱ्या मारून तो कीटकांच्या अळींचा शोध घेतो,त्यांचा शोध घेताना तो खोडाला टोचत राहतो आणि त्यांच्या पांढऱ्या अळ्या सापडल्या की खाऊन टाकतो.पण त्या खाताना वूडपेकर झाडाचा जरासुद्धा विचार करत नाही. त्याच्या जेवणाबरोबर झाडाच्या बुंध्याची सालंसुद्धा टोकरली जातात,कपचे खाली पडतात.तरीसुद्धा कधीकधी या प्रकाराने झाड कीटकांनी केलेल्या नुकसानीतून वाचूही शकतं.जरी ते झाड मेलं तरी इतर झाडांना या कीटकांपासून संरक्षण मिळतं, कारण आता या कीटकांचं प्रजनन बंद झालेलं असतं.कोरड्या ऋतूत झाडांवर वूड बोरिंग बीटलकडून आक्रमण होतं.पाणी नसलं की झाडांना या कीटकापासून स्वसंरक्षण करता येत नाही.अशा वेळेस काळ्या डोक्याचा कार्डिनल बीटल झाडाच्या मदतीला येतो.प्रौढ अवस्थेत हा बीटल झाडांना उपद्रवी नसतो पण बाल अवस्थेत तो वूड बोरिंग बीटलला शोधून शोधून खातो.काही ओक वृक्ष तर केवळ कार्डिनल बीटल मुळे जिवंत आहेत.पण जेव्हा वूड बोरिंग बीटल फस्त होतात,तेव्हा मात्र कार्डिनल बीटल स्वतःच्याच बच्च्यांना खायला सुरुवात करतो.



१७/१०/२४

औद्योगिक क्रांती/The industrial revolution

१५.१०.२४ या लेखातील शेवटचा भाग…!


साने गुरुजींनी ह्यांच्या १९३९ पर्यंतच्या जीवनाची कहाणी लिहिली आहे : केसरी कचेरीत सेनापती १९१५ साली काम करू लागले. १९१७ साल आले. 


रशियातील क्रांतीची पहिली बातमी आली होती.केसरी कचेरीतील काही म्हणाले,"कसली क्रांती नि काय, संस्कृतीची सारी होळी केली त्यांनी.शिमगा सुरू केला आहे बेट्यांनी." सेनापती म्हणाले, कोट्यवधी श्रमजीवींच्या संसारांची होळी होत होती तेथे आता दिवाळी येत आहे.प्रत्येकाचा विकास होईल.सर्वांच्या जीवनात आनंद व प्रकाश होईल. मी हा दिवस साजरा करतो." असे म्हणून त्यांनी डाळे मुरमुरे आणले. लोक हसले. ते म्हणाले, "हे लेनिनमिक्श्चर आहे. श्रमजीवी जनतेच्या क्रांतीच्या दिवशी असलाच खाना शोभतो." 


केसरी ऑफिस सोडून पुढे ते ज्ञानकोशात काम करू लागले. त्या वेळी पत्नी वारली.सेनापतींची पत्नी वारली तेव्हा तेथील मित्र म्हणाले,"आज ज्ञानकोश कचेरीला सुटी देऊ." ते म्हणाले,तुम्ही वाटले तर घ्या सुट्टी.मी येऊन काम करीन!"


घरचा संसार क्षणभर थाटलेला मिटला.श्रीहरि दुसरा महान संसार त्यांच्यासाठी मांडीत होता.साबरमतीच्या महात्म्याने सत्याग्रहाचा मंत्र राष्ट्राला दिला.हिंदुस्थानभर चैतन्याची प्रचंड लाट उसळली.

ब्रिटिश सत्ता क्षणभर जरा हादरली.इकडे महाराष्ट्रात कोट्यधीश टाटा मुळशी पेट्यात धरण बांधू लागले.बारा हजार मावळे भिकेस लागणार होते.ज्या मावळ्यांनी महाराष्ट्रास महान इतिहास दिला,ते हाकलले जाणार होते.सत्याग्रह करावा असे शब्द उच्चारले जाऊ लागले.सेनापती या वेळेस मुंबईला होते.भंग्यांचा संप लढवण्यासाठी ते गेले होते. राजबंदी सुटावे म्हणून राजबंदी सोडा अशा अक्षरांची फळी गळ्यात अडकवून सेनापती त्यासाठी हजारो सह्या गोळा करीत त्या वेळेस हिंडत असत.अशा वेळेस सत्याग्रहाची हाक आली.त्यांनी जाणलेले होते, जगावरची दुष्ट प्रवृत्तींची पकड बळकट आहे.त्याविरुद्ध लढत यश मिळाले तरी ते अशाश्वत ठरणार.पण आपण टक्कर दिलीच पाहिजे.


ह्या जगण्यांतुन,ह्या मरण्यांतुन

हसण्यांतुन अन् रडण्यांतुन ह्या 

अशाश्वताच्या मुठी वळूनी

अपाप वरती चढतिल बाह्या; 


अंतरंगातील श्रीहरींशी त्यांनी चर्चा केली,आणि बाह्या वर चढवल्या.त्यांची मते निश्चितच होती.स्वातंत्र्य रणाशिवाय मिळत नसते.मरणाशिवाय मोक्ष नाही. तरीही सामसत्याग्रहाचा प्रयोग करावयास ते उभे राहिले. सामसत्याग्रह व शुद्धसत्याग्रह असे दोन भेद त्यांनी केले आहेत.या दोहोंचे पुन्हा आणखी दोन प्रकार त्यांनी कल्पिले आहेत.प्राथमिक व प्रागतिक.प्राथमिक सामसत्याग्रह म्हणजे शत्रूच्या पायावर डोके ठेवून विनवणे,त्याला नम्रपणे सांगणे व तो देईल ती शिक्षा सोसणे.प्रागतिक सामसत्याग्रह म्हणजे शत्रूला न दुखवता त्याची मालमत्ता नष्ट करणे.शुद्ध सत्याग्रहांतील प्राथमिक प्रकार म्हणजे शत्रूला नुसते जखमी करणे आणि प्रागतिक म्हणजे शत्रूला ठार करणे.सामसत्याग्रहाचा प्रयोग करून पाहू या.नाहीतर असा शुद्ध सत्याग्रह मग अवलंबू, असे सेनापतींनी ठरविले. ते सांगतात.


हठ माझी दृढमति । 

जनकार्य अनल्प जे । 

तें न साधे साम वादें ।

 विपक्षमत जैं खुजें ।

 येतों मी बोललों मित्रां ।

 तुम्ही व्यर्थ मरा जरी ।

 मरणें तुमच्या संगें । 

योग्य वाटे मला तरी ।।


लहानसहान कामे कदाचित सामसत्याग्रहाने सिद्धीस जातील.परंतु जी महान स्वराज्य संपादनासारखी कामे आहेत ती याने साधणार नाहीत.कारण शत्रूचे मन मोठे दिलदार नसते.


क्षुद्र मनाच्या शत्रूजवळ आपल्या या बलिदानाचा काय उपयोग? परंतु जगात फुकट काही जात नाही.राष्ट्रात या बलिदानाने शुद्धी येईल.त्यागाचे वातावरण निर्मिले जाईल.शत्रूचीही खरी परीक्षा होईल.शत्रू परीक्षेत नापास झाला तर मग शुद्ध सत्याग्रह आहेच.

अशी सेनापतींची विचारसरणी होती.देशात कोठून तरी तेज प्रकट व्हावे यासाठी त्यांचा जीव तडतडत होता.महाराष्ट्रातील पक्षोपपक्ष मुळशीचा विचार करायला जमले हे पाहून सेनापती आनंदले.ते म्हणू लागले-


महाराष्ट्र मुळशीपरिषदीं तिन्ही पक्ष जमले । 

दक्षत्वाच्या वीरत्वाच्या सुविचारी रमले । 

विश्वसलें मन जिवंत आहे थोर महाराष्ट्र ।

 महाराष्ट्र निजतेजें उठविल अखिल हिंदराष्ट्र ।।


सेनापती शांत राहतील की नाही,सामसत्याग्रहाची शिस्त पाळतील की नाही,अशी काहींना शंका वाटली. सेनापतींसारखे पुरुष जे हाती घेतील ते नीट पार पाडतील एवढीही त्यांना खात्री वाटेना!परंतु पुढे या शंका गेल्या.सेनापतींजवळ लपंडाव नाही.घाव घालायचा झाला तर तसे जाहीर करून घाव घालतील. घाव शांतपणे शिरावर झेलावयाचा ठरले तर त्याप्रमाणे अक्षरशः

वागतील.सेनापती शिस्तमूर्ती आहेत.व्रतमूर्ति आहेत.मुळशीचा सत्याग्रह म्हणजे महाराष्ट्राच्या अर्वाचीन इतिहासातील एक तेजोमय प्रकरण आहे. स्त्रीपुरुषांनी त्या प्रसंगी जे तेज प्रकट केले ते अवर्णनीय आहे.आधणाचे पाणी वीरांनी व वीरललनांनी अंगावर घेतले.मावळे व मावळणी यांनी अद्भुत धैर्य व शौर्य प्रकट केले.या सत्याग्रहातच 'सेनापती' ही पदवी सेनापतींस मिळाली.

सेनापती पुनःपुन्हा तुरुंगात जात होते.तुरुंगात ते सर्वांना धीर देत.सर्वांची चौकशी करीत. सर्वांच्या भाकऱ्या एकत्र कुस्करून काला करीत. गोकुळातील गोपाळकृष्णाचा प्रेमधर्म ते तुरुंगात शिकवू लागले.प्रेमधर्माचे सेनापती आचार्य आहेत.भेदभाव जावेत म्हणून ते तडफडतात.तुरुंगातून बाहेरच्या सैनिकांस ते तेजस्वी संदेश पाठवीत. 


सत्याग्रहींना तुरुंगात ते कविता पाठ करायला सांगत. अशा रीतीने हे काव्य बाहेर येई.पुष्कळसे काव्य या वेळेस त्यांनी दिले.अरे,हा शिवबाचा महाराष्ट्र.त्या मावळ्यांनी पूर्वी रक्ताचे सडे घालून येथे स्वराज्य स्थापिले.आनंदवनभुवन निर्मिले.महाराष्ट्राला दिव्य इतिहास दिला.त्या मावळ्यांचे ते अनंत उपकार स्मरून आजच्या सर्व सुशिक्षितांनी उठून काही ऋण फेडावे. "तीन हजार सत्याग्रही नाही का महाराष्ट्र देणार? महाराष्ट्र का मेला?" अशा गर्जनांनी सेनापती महाराष्ट्राची सुप्त तेजस्विता जागवू बघत होते.कोणी म्हणू लागले,सेनापती वेडे आहेत.आज यंत्रयुग आहे. वीज निर्माण केली पाहिजे.धरणे बांधली पाहिजेत.

सेनापती यंत्रविरोधी नाहीत त्यांनाही बिजली पाहिजे आहे.


बिजलीयुग हैं व्हावी । बिजली परि भाकरी । 

बारा हजार दीनांची । काढणें न परी बरी ।।


एवढेच त्यांचे म्हणणे होते.सेनापतींच्या हाकेस ओ देऊन सत्याग्रही येत होते.त्यांना सेनापती शिस्तीचे धडे देऊन तयार करीत.शिस्तीची महती सुंदर कवितांतून त्यांनी गायिली आहे.राष्ट्रे चढतात व पडतात.का?


हें पडणें हें चढणें याला मूळ एक शिस्त ।

शिस्तयुक्त ते चढले पडलों आम्ही बेशिस्त ।


असे त्यांनी बजावले आहे.बावळट व बेशिस्त लोक कुचकामाचे.

संयमानीच स्वराज्य वा स्वाराज्य लाभते. संसार वा परमार्थ, उभयत्र शिस्तीला महत्त्व आहे. 


जी शिस्त तीच शाही । शिस्तीत राज्य राही ।।


शिस्त शिकलेत म्हणजे राज्य आलेच हा मंत्र त्यांनी पटविला.

सामसत्याग्रह जोपर्यंत आहे,तोपर्यंत शत्रूने कितीही जाच केला तरी सहन करा.ते म्हणत :-


अम्ही पांडवांसारखी शिस्त पाळू । मनींच्या मनीं आमुचा क्रोध जाळू ।

पुढें धर्मयुद्धी करूं दोन हात । परी तोंवरी राहणें शान्त शान्त ।। 


जेव्हा प्रकटपणे मारणमरण सुरू करू,तेव्हा दे घाव घे घाव अशी टिप्परघाई खेळू.त्या सत्याग्रहात कधीकधी जुलूम इतका असह्य होई की सेनापती बेभान होत. एकदा तर ते टाटांच्या लोकांच्या अंगावर धावून जाणार होते.परंतु मित्रांनी त्यांना आवरिले.


एकदां कोपलों भारी । भारी दुष्टत्व पाहुनी । 

मित्रं धरूनिया मातें । शान्त केलें तया क्षणीं ।।


सेनापती अत्यन्त शान्तपणे टाटांच्या लोकांजवळ जाऊन मुळशीच्या शेतकऱ्यांची दुःखे सांगत.त्या वेळेस सेनापती रडत असत.


आंसवें गळती माझ्या । नयनांतून याचितां ।

मुळशीकर दुःखाचा । पाढा दुःसह वाचितां ।।


परंतु त्या आसवांची दानवी सरकारला कदर वाटली नाही.द्रव्यान्ध भांडवलवाल्यांनी त्या अश्रूची टर केली. तीन वर्षे सामसत्याग्रह करून मग गीताप्रणीत शुद्ध सत्याग्रहाची सेनापतींनी वीरघोषणा केली.या शुद्ध सत्याग्रहातील शत्रूला नुसते जखमी करणे हा प्राथमिक भाग त्यांनी उचलला.त्यांना व त्यांच्या साथीदारांस शिक्षा झाल्या.सेनापती आपल्या कैफियतींत म्हणाले,


मला ठार मारावयाचे नव्हते.तसा आरोप मजवर करता येणार नाही.माझ्या मनात तसे असते तर मी त्या वेळेस त्यांना जखमी करण्याऐवजी ठार केले असते.परंतु शुद्ध सत्याग्रहाचा प्राथमिक मार्ग आम्ही आखला होता.


सेनापतींच्या स्पष्ट वाणीचा न्यायाधीशावरही परिणाम झाला.शेवटी सात वर्षे ते तुरुंगात गेले.


ह्या वेळीच मला वाटते,महात्मा गांधींच्या तत्त्वनिष्ठेची अग्निपरीक्षा झाली.ज्या हिंसक अर्थव्यवस्थेविरुद्ध ते लिहीत होते,जी पारंपरिक,

ग्रामीण,कृषिप्रधान अर्थव्यवस्था टिकवलीच पाहिजे असे म्हणत होते त्यांच्यातला हा संघर्ष होता.पण महात्मा गांधींनी मुळशीच्या शेतकऱ्यांना नव्हे,तर टाटांना पाठिंबा दिला आणि हा सत्याग्रह कोलमडला.महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याला प्रभावी नेतृत्व निश्चितच पुरवले.पण स्वतंत्र भारतात एक नव्या प्रकारची अहिंसक अर्थव्यवस्था उभी करण्याच्या दिशेने प्रत्यक्षात आणता येईल असे काहीही ते सांगू शकले नाहीत.ते काम त्यांचे अनुयायी,अर्थतज्ज्ञ जे सी कुमारप्पा ह्यांनी करण्याचा प्रयत्न केला.

१५/१०/२४

औद्योगिक क्रांती/The industrial revolution

विज्ञानाधारित तंत्रज्ञानातून ऊर्जा,पदार्थ हाताळण्याची, त्यावर प्रक्रिया करण्याची नवनवी तंत्रे विकसित करता आली.वाफेवर चालणाऱ्या इंजिनाने मानवी श्रमांहून खूप जोरने काम करण्याच्या शक्यता निर्माण झाल्या, भराभर पाणी उपसून खूप जास्त खोलवर खणत कोळसा काढणे शक्य झाले तारयंत्राद्वारा भराभर दूरवर संदेश पाठवता येऊ लागले.ह्या साऱ्या तंत्रांतून औद्योगिक क्रान्ती होऊ शकली.तिच्या जोडीला एक नवी भांडवलशाही अर्थव्यवस्था रचली गेली.आर्थिक उत्पादनाचे तीन घटक आहेत.नैसर्गिक संसाधने,मानवी श्रम आणि भांडवल.अठराव्या शतकापर्यंत उत्तर आणि दक्षिण अमेरिका ही दोन प्रचंड खंडे पादाक्रान्त करून युरोपीयांनी भरपूर भांडवल व नैसर्गिक संसाधने आपल्या हातात आणली होती.दक्षिण अमेरिकेतील इन्का साम्राज्याचे सोन्याचे साठे लुटून युरोपात पैसाच पैसा पोचला,तर उत्तर अमेरिकेतील मूलवासीयांचे शिरकाण करत अफाट वनसंपत्ती,सुपीक शेतजमीन, खनिजे हाती आली.चणचण होती मानवी श्रमांचीच. बऱ्याच अंशी आफ्रिकेतील काळ्या लोकांना गुलाम करुन हीही भरून काढली.


युरोपीयांच्या ह्या साऱ्या भरभराटीमागे त्यांची आक्रमक वृत्ती होती.वाटेल तशी हिंसा करण्याची तयारी होती. देवाने मानवाला सारी पृथ्वी उपभोगासाठी निर्माण केली आहे ही ईसाई धर्माची शिकवण होती.अँटहिल कादंबरीतल्या काही संवादांत ह्या तत्त्वप्रणालीचे विवेचन पाहायला मिळते : ही देवाची इच्छा आहे.रेनी गंभीरपणे म्हणाला.तुम्हाला बायबलमध्ये भेटेल ते.त्यानं आपल्याला पृथ्वीचं राज्य दिलं - बसून आ वासून पाहायला नाही तर सुबत्ता वाढवायला,वंश वाढवायला.आपण राष्ट्रीय उद्यानांमध्ये बसून कविता लिहून नाही मोठे झालो.तू सेमीजपैकी आहेस.

तुझ्यात ते रक्त आहे! उगीच काहीतरी उदारमतवादी स्वप्नं पाहत भरकटू नकोस!"


हिन्द स्वराज


मुबलक भांडवल,मुबलक नैसर्गिक संसाधने ह्यांच्या आधारावर युरोपाने एक हिंसक अर्थव्यवस्था उभी केली.ही उभारत असताना एकीकडे युरोपात समता, बंधुत्व,स्वातंत्र्याचा उद्घोष चालला होता,तर दुसरीकडे अमेरिकेत मूलवासींची कत्तल चालू होती.

आफ्रिकेतील काळ्या गुलामांना अतिशय क्रौर्याने वागवण्यात येत होते.आशियात वेगळी रणनीती अवलंबिली गेली. आशियावर कब्जा करायला आल्या होत्या इंग्रज,फ्रेंच, डच व्यापारी कंपन्या.

त्यांना इथली नैसर्गिक संसाधने, कच्चा माल अगदी स्वस्तात हवा होता.आणि आपल्या मायदेशातल्या उत्पादनांसाठी बाजारपेठांवर कब्जा करायचा होता.नैसर्गिक संसाधनांवर पकड घट्ट करायला एक आधार होता,वसाहतवाद्यांचे खासे तत्त्व - विजेत्यांचा हक्क'. हा विजेत्यांचा हक्क गाजवत त्यांनी भारताच्या वनसंपत्तीवर कब्जा केला आणि ही वनसंपत्ती काळजीपूर्वक वापरणाऱ्या खेडुतांना, आदिवासींना हालअपेष्टेत लोटले.आपल्या 'शेतकऱ्यांचा आसूड' या रचनेत जोतिबा फुल्यांनी याचे मोठे हृदयस्पर्शी वर्णन केले आहे:पूर्वी ज्या शेतकऱ्याजवळ फारच थोडी शेती असत व ज्याचा आपल्या शेतीवर निर्वाह होत नसे,ते आसपासच्या डोंगरावरील दऱ्याखोऱ्यांतील जंगलांतून उंबर,

जांभूळ वगैरे झाडांची फळे खाऊन व पळस,मोहा इत्यादी झाडांची फुले,पाने आणि जंगलांतून तोडून आणलेला लाकूडफाटा विकून,

पेट्टीपासोडीपुरता पैसा जमा करत व गावच्या गायरानाच्या भिस्तीवर आपल्याजवळ एक दोन गायी व दोनचार शेरड्या पाळून त्यांच्यावर जेमतेम गुजारा करून मोठ्या आनंदाने आपल्या गांवीच राहात असत.परंतु आमचे मायबाप सरकारचे कारस्थानी युरोपीयन कामगारांनी आपली विलायती अष्टपैलू अक्कल सर्व खर्ची घालून भलेमोठे टोलेजंग जंगलखाते नवीनच उपस्थित करून,त्यामध्ये एकंदर सर्व पर्वत, डोंगर,टेकड्या,दरीखोरी व त्याचे भरीस पडीत जमिनी व गायराने घालून फॉरेस्ट खाते शिखरास नेल्यामुळे दीनदुबळ्या पंगु शेतकऱ्याच्या शेरडास या पृथ्वीच्या पाठीवर रानचा वारा सुद्धा खाण्यापुरती जागा उरली नाही.दुसऱ्या बाजूने आपल्यासाठी बाजारपेठा खोलण्यासाठी त्यांनी अनेक क्लृप्त्या लढवल्या. बंगालातल्या विणकरांचे कापड इंग्रजांच्या मँचेस्टरच्या गिरण्यांशी स्पर्धा करत होते.ते उत्पादन बंद पाडण्यासाठी त्यांनी ढाक्याच्या विणकरांचे अंगठे तोडले.

चीनवर इंग्रजांचा प्रत्यक्ष ताबा मिळू शकला नाही.तिथे लोकांना जबरीने अफूच्या व्यसनात पाडले. चीनच्या राज्यकर्त्यांनी अफूवर बंदी घालताच अफूचा व्यापार खुला करून घेण्यासाठी लष्करी बळाचा वापर केला आणि ह्या व्यापारातून भरपूर पैसे कमावले.ह्या साऱ्या करामतीत त्यांनी भारतातील वेगवेगळ्या घटकांशी हातमिळवणी केली.पुढे मोठे पैसेवाले झालेले अनेक भारतीय व्यापारी इंग्रजांच्या अफूच्या व्यापारात सामील होते.


हे सगळे महात्मा गांधींना जाणवत होते.म्हणून ते १९०९ साली लिहिलेल्या आपल्या 'हिन्द स्वराज' ह्या पुस्तकात विचारतात 'युरोपात सभ्यता आहेच कुठे? युरोपीयांनी जे काय कमावले आहे ते सारे हिंसेच्या पोटी.त्यातले काहीही आपल्याला नकोच नको.'

असे प्रतिपादन करत महात्मा गांधींनी आपल्याला विज्ञान,

तंत्रज्ञान,यंत्रे, औद्योगिक उत्पादन हे सारेच्या सारे टाकाऊ ठरवले.

पण ह्या तत्त्वविवेचनातून प्रत्यक्षात काय कारवाई केली पाहिजे,

आज भारतीय गिरणी मालकांनी काय केले पाहिजे,असे विषय जेव्हा पुढे येतात तेव्हा महात्मा गांधींच्या मांडणीची धार अगदी बोथट बनते.


सेनापती बापट


एका दृष्टीने महात्मा गांधींच्या तत्त्वविवेचनाची सत्त्वपरीक्षा झाली मुळशी आंदोलनात.सह्यगिरी महाराष्ट्राचे उदकभांडार आहे.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आणि पश्चिम उतारांवर जो प्रचंड पाऊस कोसळतो त्याने गोदावरी,भीमा,कृष्णा ह्या पश्चिमवाहिनी नद्या आणि त्यांच्या उपनद्या भरभरून वाहतात.हे पाणी साठवून एक तर ते दक्खन पठारावरच्या कमी पावसाच्या प्रदेशाला पाणीपुरवठा करता येतो,किंवा झपाट्याने कोकणात खाली उतरवून त्यातून वीज निर्माण करता येते.शेतीसाठी,शहरांना पाणी पुरवण्यासाठी छोटे-मोठे बांध अनेक शतकांपासून बांधले गेले आहेत.दीड दोन हजार वर्षांपासून दक्षिण भारतात तलावांची जाळीच्या जाळी उभारण्यात आली. पेशव्यांनी कात्रज जवळ तलाव बांधून पुण्याला पाणी पुरवठा केला.पण इंग्रजांनी आधुनिक तंत्रे वापरून खूपच मोठी धरणे बांधणे सुरू केले.पुण्याला पाणी पुरवण्यासाठी आणि शेतीसाठी असे एक मोठे धरण पुण्याच्या पश्चिमेला १८७९ साली खडकवासल्याला बांधले.मग जशा मुंबईत गिरण्या आल्या,वस्ती वाढू लागली,तशी घाटमाथ्याजवळ साठवलेले पाणी पश्चिमेला उतरवून वीज निर्माण करण्याची कल्पना निघाली.पोलादाचे उत्पादन सुरू करणाऱ्या टाटांनी १९११ मध्ये जलविद्युत ऊर्जा कंपनी स्थापन करून लोणावळ्याजवळ दोन धरणे बांधून पाण्यापासून वीज उत्पादनाची मुहूर्तमेढ रोवली.


लोणावळ्याची धरणे जिथे बांधली,तिथे मुख्यतःराहात होते धनगर आणि ठाकर.टाटांनी ह्यांना ना विचारले,ना पुसले. नुकसानभरपाईची बातच सोडा.सरकारच्या पूर्ण पाठिंब्यावर जागा ताब्यात घेतली,धरणे बांधली.मूळचे मालक मुकाट्याने निघून गेले.मग तिसरे धरण बांधायला निघाले मुळशी पेट्यात.हा प्रदेश आंबेमोहोर तांदळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध होता.इथली बरीचशी जमीन पुण्यातल्या सुशिक्षित वर्गातल्या लोकांच्या मालकीची होती.ती कसत होते स्थानिक कष्टकरी,मराठ्यांच्या इतिहासात शिवाजीचे सैनिक म्हणून मानाचे स्थान असलेले मावळे.इथेही टाटांचे इंजिनिअर सरकारी अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने मालकांना न पुसता - न विचारता सरळ शेतांत घुसले,चर खणू लागले.पण अनेक जमीन मालक होते भारतीय असंतोषाचे जनक समजल्या जणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या पुण्यातले. शेतजमीन अन्यायाने हिरावून घेतली जात आहे म्हणून आंदोलन उभे राहिले.त्याचे नेतृत्व केले सेनापती म्हणून लोकांनी पदवी बहाल केलेल्या पांडुरंग वामन बापटांनी. सेनापती होते संघटन कुशल,प्रभावी लेखक,वक्ते, विचारवंत.अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी (वारुळ पुराण,माधव गाडगीळ,ई.ओ.विल्सन,संक्षिप्त अनुवाद-नंदा खरे)निःस्वार्थीपणे जीव ओतून काम करणारे.

मढेकरांच्या शब्दात आयुष्य अक्षरशःवितळवून समाजाच्या भल्यासाठी झटणारे.


कुणि मारावे,कुणी मरावे, 

कुणी जगावे खाउनि दगड; 

वितळवून कुणि आयुष्यांना 

ओतावे अन् सोन्याचे घड.


राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….!

१३/१०/२४

तक्रारी दूर अशा करा.Do away with complaints

शेवटी त्यांनी किल्ला सर केला आणि शेवटी आज ते या स्थितीला पोहोचले आहेत.वॉल स्ट्रीटचे सगळ्यात महत्त्वाचे एक्झिक्युटीव्हपण त्यांच्याकडे सल्ला आणि मार्गदर्शन घेण्यासाठी येतात.त्यांना त्यांच्या रेकॉर्डचा अभिमान होता.त्यांना असायलाच हवा होता आणि याबाबत बोलायला त्यांना आवडत होतं.आपली गोष्ट सांगितल्यावर त्यांनी शेवटी क्यूबेलिसला संक्षिप्तपणे त्याच्या अनुभवाच्या बाबतीत विचारलं आणि व्हाइस प्रेसिडेंटला बोलावून सांगितलं,"मला असं वाटतं की, आपण या माणसाच्या शोधात होतो." मिस्टर क्यूबेलिसने आपल्या संभाव्य मालकाच्या बाबतीत सगळी माहिती गोळा करण्याचे कष्ट घेतले होते.त्यानी समोरच्या व्यक्तीमध्ये आणि त्याच्या प्रश्नांमध्ये रस घेतला होता.त्याने समोरच्या व्यक्तीला बोलण्याकरता प्रोत्साहित केले होते आणि त्यामुळे त्याचा चांगला प्रभाव पडला आणि त्याचा सुखद परिणाम झाला.सॅक्रेमेंटो,कॅलिफोर्नियाच्या रॉय जी.ब्रेडले यांची बरोबर त्याच्या उलट समस्या होती.जेव्हा एक संभाव्य चांगला कर्मचारी ब्रेडलेच्या फर्ममध्ये नोकरीकरता आपली शिफारस करत होता,

तेव्हा त्यांनी त्याची गोष्ट सांगितली.रॉयने आम्हाला सांगितले की,आमच्या फर्ममध्ये एक छोटी ब्रोकरेज फर्म होती.


याकरता आमच्या इथे कोणताही जास्तीचा लाभ जसं मेडिकल इन्श्युरन्स,पेंशन किंवा दवाखान्याचा खर्च उचलायची कोणतीच व्यवस्था,सोय नव्हती.प्रत्येक प्रतिनिधी एक स्वतंत्र एजंट होता.

आम्ही संभाव्य ग्राहकांकरता लीडसुद्धा उपलब्ध करू शकत नव्हतो कारण आम्ही त्यांच्याकरिता जाहिरातपण देऊ शकत नव्हतो,जसे की आमचे मोठे प्रतिस्पर्धा करत होते.रिचर्ड प्रायरला त्या प्रकारचा अनुभव होता जो आम्हाला हवा होता.आधी माझ्या असिस्टंटने इंटरव्ह्यू घेतला आणि त्याला आमच्या कामाला गेलेल्या सगळ्या नकारात्मक गोष्टी सांगितल्या. जेव्हा तो माझा ऑफिसमध्ये आला तेव्हा तो थोडा निराश वाटत होता.मी त्याला आपल्या फर्ममध्ये काम करण्याचा एकुलता एक  फायदा सांगितले ला की,तो स्वतंत्र कॉन्ट्रॅक्टर बनू शकतो आणि एक प्रकारे तो सेल्फ-एप्लॉयड् आहे.जेव्हा तो इंटरव्यूकरता आला तेव्हा त्याच्या डोक्यातखुप साऱ्या नकारात्मक गोष्टी होत्या;पण जेव्हा त्याने या फायद्याच्या बाबतीत बोलायला सुरुवात केली,तेव्हा तो एक एक करून आपल्या नकारात्मक विचारांपासून मुक्त होऊ लागला.


अनेक वेळा असं वाटलं की,जसा तो स्वतःशीच बोलतो आहे,जसा तो आपल्या मनातच विचार करतो आहे.अनेक वेळा माझ्या मनात आलं की, मी त्याच्या विचारांना स्पष्ट करू;पण मी असं नाही केलं, जेव्हा इंटरव्यू संपला,तेव्हा मला असं वाटलं की,त्याने स्वतःच स्वतःला विश्वास दिला की,तो आमच्या फर्ममध्ये काम करेल.

कारण की मी एक चांगला श्रोता होतो आणि मी डिकलाच जास्त बोलण्याचा मोका दिला, याकरता त्याने आपल्या मनात दोन्ही बाजूंना चांगल्या प्रकारे तोललं आणि तो सकारात्मक निष्कर्षावर

पोहोचला,ज्याला त्याने स्वतः करता एका आव्हानासारखं घेतले.

आम्ही त्याला कामावर ठेवून घेतलं आणि आज तो आमच्या फर्ममध्ये सर्वश्रेष्ठ प्रतिनिधींमधून एक आहे.इथपर्यंत की आमचे मित्रपण आमच्या सोयी-सुविधांच्या बाबतीत ऐकण्याऐवजी स्वतःच्या सुविधांबाबत ऐकणं जास्त पसंत करतील.


फ्रेंच दार्शनिक रोशफूकोने म्हटलं होतं,जर तुम्हाला शत्रू बनायचं असेल,तर तुमच्या मित्रांच्या पुढे जा.जर तुम्ही मित्र होऊ इच्छित असाल तर आपल्या मित्रांना स्वतःच्या पुढे जाऊ द्या. काय हे खरे आहे? हो,कारण जर तुमचे मित्र निघून जाताहेत तर ते स्वतः ला महत्त्वपूर्ण समजत आहेत जेव्हा तुम्ही त्यांच्या पुढे निघून जाता तर ते किंवा त्यांच्यामधले काही हीन आणि मत्सरी असू शकतात.


न्यू यॉर्क सिटीमध्ये मिडटाउन पर्सनल एजन्सीची हेनरीटा जी सगळ्यात लोकप्रिय प्लेसमेंट काउंसलर होती.सुरुवातीच्या महिन्यांमध्ये हेनरीटाचा आपल्या सहकाऱ्यांमध्ये कोणी मित्र नव्हता. का? कारण प्रत्येक दिवशी ती आपली शेखी मिरवत होती की,आज तिने किती प्लेसमेंट केले,आज तिने किती नवीन अकाउंट उघडले,आज तिने किती यश मिळवलं.


मी आपलं काम खूप चांगल्या रितीने करत होते आणि मला याचा गर्व होता,हेनरीटाने आमच्या वर्गातले माझे सहकारी माझ्या सफलतेमध्ये आनंद घ्यायच्याऐवजी चिडत होते.मला वाटायचं त्यांनी मला पसंत करावं.मी त्यांना खांच मित्र बनवायला बघत होते.या कोर्सचे काही उपाय ऐकल्या बरोबर मी आपल्या बाबतीत बोलणं कमी करून टाकलं.माझ्या सहकाऱ्यांजवळ आपली शेखी मिरवण्याकरता बरंच काही असायचं आणि माझ्या सफलतेबद्दल ऐकल्यावर ते आपल्या सफलतेबद्दत सांगायला आसुसलेले असत.आता जेव्हा आमच्याकडे गप्पा मारायला वेळ असतो तेव्हा मी त्यांना विचारते की,त्यांचा दिवस कसा गेला आणि मी आपल्या यशाचा उल्लेख तेव्हाच करते जेव्हा ते मला याबाबतीत विचारतात. - समोरच्या व्यक्तीला जास्त बोलू द्या.


११.१०.२४ या लेखातील शेवटचा भाग…


🍂 

१.

आपण जगत असतो आपलं 

एकाकी बकाकी नातं घेऊन 

प्रत्येक नातं व्यस्तच असतं

त्याचं त्याचं आयुष्य उघडून

२.

त्यानं का जगू नये,बघू नये

स्वत:चं अस्संल तस्संल खातं 

ज्यात त्यानं साठवलंय जुनं

माणसांशी जगू म्हटलेले नातं

३. 

आयुष्यं बविष्यं असतात अनेक 

जगून घेतली,तगवून ठेवली तर

सुंदर असतं,कलंदर असतं बरंच 

माणूस काणूस बिलंदर नसता तर

४.

फुलपाखरांनं हलकंच चुंबून घ्यावं

फुलाला,मुलाला,अन्य जगाला

पावन झालं असतं,गगन चुंबन 

 जर आगळं भान असतं माणसाला 

🍂

•रवींद्र श्रावस्ती



११/१०/२४

तक्रारी दूर अशा करा.Do away with complaints

जास्त करून लोक दुसऱ्यांना आपली गोष्ट खूप बोलतात.

याऐवजी तुम्हाला समोरच्याला जास्त बोलण्याचा मोका द्यायला पाहिजे.ते आपल्या बिझेनस आणि आपल्या समस्यांच्या बाबतीत तुमच्यापेक्षा जास्त जाणतात.याकरता तुम्ही त्यांना प्रश्न विचारा.त्यांना आपली गोष्ट सांगू द्या.


जर तुम्ही त्यांच्याशी असहमत आहात,तर तुमच्यामध्ये ही इच्छा जागू शकते की,त्यांची गोष्ट मध्येच तोडायची; पण असं मुळीच करू नका.ही एक भयंकर खोड आहे. कारण त्यांच्या डोक्यात खूपसे विचार असतात.ज्यांना ते व्यक्त करू इच्छितात,याकरता ते तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत.हेच योग्य होईल की,त्यांची गोष्ट धैर्याने आणि लक्षपूर्वक ऐका.याबाबतीत गंभीर राहा.त्यांना आपले विचार पूर्णपणे व्यक्त करायला प्रोत्साहित करा. काय ही पद्धत बिझनेसमध्ये कामाला येते? या बघू या. ही एक सेल्समनची गोष्ट आहे,ज्याला नाइलाजाने गप्प राहायला लागलं.


अमेरिकेच्या एका मोठ्या ऑटोमोबाईल निर्मात्याला वर्षभराकरता आहोल्ट्री फॅब्रिकची गरज होती.तीन मोठ्या निर्मात्यांनी आपले नमुने पाठवले.मोटर कंपनीच्या एक्झिक्युटीव्हने त्याची तपासणी केली. त्यानंतर प्रत्येक निर्मात्याला एक नोटीस पाठवली की, एका निश्चित दिवसाचा त्यांना वेळ दिला जाईल म्हणजे ते आपल्या कॉन्ट्रॅक्टवर शेवटचं विवरण देऊ शकतील.


विस्तृत विवरण देण्याकरता कंपनीच्या निर्मात्यांचे प्रतिनिधी निश्चित दिवशी उपस्थित झाले.योगायोगाने जी.बी.आर.नावाच्या प्रतिनिधीचा काही आजारामुळे घसा खराब झाला.जेव्हा कॉन्फरन्समध्ये एक्झिक्युटीव्हसमोर बोलायची माझी वेळ आली तेव्हा नेमके काय झाले हे मिस्टर आर.ने माझ्या क्लासमध्ये सांगितले.ते म्हणाले की,तेव्हा माझा आवाज निघत नव्हता.मी मुश्किलीने हळूहळू बोलू शकत होतो.मला एका खोलीत नेले गेले आणि मी तिथे टेक्सटाइल इंजिनिअर परचेसिंग एजंट,सेल्स डायरेक्टर आणि कंपनीच्या प्रेसिडेंटसमोर उभा राहू शकलो.मी बोलायला उभा राहिलो आणि हिमतीने माझी गोष्ट समोर ठेवण्याचा प्रयत्न केला;पण मी काही शब्दांपेक्षा जास्त बोलू शकलो नाही.ते सगळे लोक एका टेबलाच्या चारी बाजूंनी बसले होते,याकरता मी एका कागदावर लिहिलं माझा घसा खराब आहे,मी बोलू शकत नाही.कंपनीच्या प्रेसिडेंटने सांगितलं तुमच्या बाजूने मी बोलेन आणि त्यांनी बोलणं सुरू केलं.त्यांनी माझे सँपल्स दाखवले आणि त्यांची विशेषता सांगितली.माझ्या प्रॉडक्टच्या गुणवत्तेवर एक इंटरेस्टिंग वादविवाद झाला आणि प्रेसिडेंट माझ्या बदल्यात बोलत होता म्हणून त्याने चर्चेमध्ये माझंच प्रतिनिधित्व केलं.पूर्ण चर्चेत माझा सहभाग फक्त हसणे,डोकं हलवणे आणि चेहऱ्यावर हावभाव दाखवणे इथंपर्यंतच सीमित राहिला.


या अद्भुत मीटिंगमुळे मला कॉन्ट्रॅक्ट मिळाले.पाच लाख गज फॅब्रिक्सची ऑर्डर,ज्याची एकंदर किंमत १६,००,००० डॉलर्स होती.ही आजपर्यंत मिळालेल्या ऑर्डर्समधली माझ्या जीवनातील सगळ्यात मोठी ऑर्डर होती.


मी समजलो की,जर माझा घसा बसला नसता तर माझ्या हातातून कॉन्ट्रॅक्ट निघून गेले असते.याकरता, कारण पुर्ण मामल्याच्या बाबतीत माझे विचारच चुकीचे होते.भाग्यवश मी समजू शकलो की,अनेक वेळा दुसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यात आपल्याला जास्त फायदा मिळतो.


बिझनेसप्रमाणेच कुटुंबातही आपल्याला दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकल्यामुळे जास्त फायदा मिळतो.आपल्या मुलीबरोबर बार्बरा विल्सनचे संबंध वेगानी बिघडत होते. लॉरी आधी एक चांगली आणि शांत मुलगी होती;परंतु आता ती चिडचिडी आणि टिनएजच्या वयात येऊन बदलली होती.बार्बराने तिला रागवलं,घाबरवलं,धमकावलं,समजवलं;पण कुठलाच फायदा झाला नाही.


मिसेस विल्सनने क्लासमध्ये सांगितलं,एक दिवस मी हार मानली.लॉरीला मी बाहेर जायला मना केलं;पण तिने माझं सांगणं ऐकलं नाही आणि ती घरातलं काम करण्याअगोदर आपल्या मैत्रिणीला भेटायला निघून गेली.जेव्हा ती परत आली तेव्हा मी दहा हजार वेळा तिच्यावर ओरडायला हवं होतं;परंतु माझ्यात रागवण्याची ताकदच नव्हती.मी तिच्याकडे दुःखाने बघितले आणि फक्त इतकच म्हटलं की,असं का वागतेस लॉरी ? लॉरीने माझी परिस्थिती बघितली आणि मला शांत स्वरात म्हणाली की,तुला खरंच जाणून घ्यायचंय ? मी 'हो' म्हणून डोकं हालवलं यानंतर लॉरीने आधी तर घाबरत आपली गोष्ट सुरू केली;पण काही वेळानंतर तिच्या मनातलं सगळं काही बाहेर निघालं.मी तिचं बोलणं कधीच ऐकत नव्हते.जेव्हा ती तिचे विचार आणि भावना मला सांगू इच्छित होती तेव्हा मी तिला आदेश देऊन गप्प करत होते.मला हे जाणवलं की, माझी मुलगी माझ्याकडून एका मित्रत्वाच्या नात्याची अपेक्षा करत होती,

जेव्हा की मी रागवणाऱ्या आईची भूमिका निभावत होते. किशोरावस्थेतले तणाव मी तिच्यासोबत शेअर करावेत,असं तिला वाटत होतं


मी नेहमी तिच्यासमोर फक्त बोलतच राहत होते,जेव्हा की मला तिची गोष्ट ऐकायला हवी होती.मी तिची गोष्ट ऐकण्याच्या बाबतीत कधी लक्षच दिलं नाही.त्या दिवसानंतर मी तिचं बोलणं ऐकणं सुरू केलं.आता ती मला सांगून टाकते की,तिच्या डोक्यात काय चाललं आहे आणि आता आमचे संबंध खूप चांगले आहेत. आता तिच्यात सुधारणा झाली आहे.


मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,मंजुल प्रकाशन..


न्यू यॉर्कच्या एका पेपरमध्ये फायनान्शियल पानावर एक मोठी जाहिरात छापली.ज्यात नोकरीकरता खूपच योग्य व अनुभवी उमेदवार हवा होता.चार्ल्स टी.क्यूबेलिसने दिल्या गेलेल्या बॉक्स नं.वर आवेदन पाठवून दिलं. काही दिवसांनंतर त्याला इंटरव्ह्यूला बोलवलं गेलं. जाण्याच्या आधी त्या कंपनी आणि तिथल्या मालकाच्या बाबतीत वॉल स्ट्रीटकडून जेवढी शक्य होती,तेवढी माहिती मिळवायचा प्रयत्न केला.इंटरव्ह्यूच्या वेळी त्याने म्हटलं की,तुमच्या कंपनीचा रेकॉर्ड इतका चांगला आहे की,इथे काम करणे मला अभिमानास्पद वाटेल. मला वाटतं की,२८ वर्ष आधी तुम्ही फक्त एक डेस्क रूम आणि एक स्टेनोग्राफरच्या बरोबर बिझनेस सुरू केला होता.काय हे खरं आहे?


प्रत्येक यशस्वी व्यक्तीला आपल्या सुरुवातीच्या केलेल्या संघर्षाबाबत बोलायला खूप आवडतं.ही व्यक्तीपण याचा अपवाद नव्हती.त्यांनी खूप वेळपर्यंत आपली गोष्ट सांगितली की,कोणत्या प्रकारे ४५० डॉलर्स आणि एका स्वप्नाबरोबर त्यांनी आपल्या व्यवसायाचा प्रवास सुरू केला.त्यांनी सांगितलं की,टीका,टर आणि निराशेच्या नंतरही त्यांनी आपली हिंमत हरली नाही. सुरुवाती-सुरुवातीला तर त्यांना एका दिवसात सोळा तासांपर्यंत काम करावं लागत होतं आणि ते रविवार आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये पण काम करत होते.


राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!