* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२५/१०/२५

सामने,युद्ध,देव ! / Front,war,God !

पण पायवाट-वारुळाचं सैन्य अजूनही बरचसं शाबूत होतं.एकूण प्रजेपैकी पंधराएक टक्के सैनिक होते. मजबूत चिलखती पायदळ होतं,हे.साधारण कामकरी मुंगीच्या दुप्पट आकार असायचा,

सैनिकांचा.सैनिक मुंग्यांचा बाह्य सांगाडा जाड आणि चिवट असायचा. त्यात खड्डे आणि उंचवटे घडून मजबुती आणिकच वाढलेली असे.शरीराच्या मध्याच्या चिलखतापासून दोन दणकट काटे कंबरेला संरक्षण द्यायला निघालेले असत. आणखी दोन काटे पुढे मानेला संरक्षण देत.डोक्याचा सांगाडा शिरस्त्राणासारख्या रचनेचा असे.जर कोणी या हत्यारबंद चिलखतधारी सैनिकांवर हल्ला केला,तर सैनिक शिंगं आणि पाय चिलखतात ओढून,अंग आक्रसून पूर्ण शरीराचीच ढाल करत असत.


साध्या कामकरी मुंग्यांनाही लढता येत असे,पण त्यांचं चिलखत हलकं असे.त्या नेटानं उभं ठाकून लढत नसत. त्यांचा मुख्य गुण म्हणजे वेगवान,चपळ हालचाली करता येणं.शत्रूभोवती रिंगण धरून पळताना मध्येच कमकुवत भागावर हल्ले करणं.एखादा पाय,एखादं शिंग धरून शत्रूला जखडून ठेवणं.असं शत्रूला जेरबंद केलं, की वारुळातल्या इतर मुंग्या येऊन शत्रूला दंश करायच्या,

त्याचे लचके तोडायच्या,त्याच्यावर विषारी द्रव्यं फवारायच्या,आणि शेवटी अनेक लहानशा मुंग्या मिळून मोठ्या शत्रूला मारून टाकायच्या.एखाद्या मोठ्या सांबराला किंवा नीलगाईला रानकुत्रे मारतात,तसेच डावपेच कामकरी मुंग्या वापरतात.


माणसांमध्ये हलक्या पायदळानं शत्रूच्या मशीन-गन ठाण्यांवरचे हल्लेही याच तंत्रानं केले जातात.


तर राणी मुंगी मेली तेव्हा पायवाट वारुळापाशी अशी दहा हजार सैनिक-कामकरी फौज होती.राणी मेल्यावर मात्र नवे सैनिक,नवे कामकरी घडणं संपलं.जे सैनिक, कामकरी होते ते वयस्क,म्हातारे व्हायला लागले. पायवाट वारुळाचं सगळ्यात शेजारचं वारूळ म्हणजे ओढ्याकाठचं वारूळ,ते पायवाट वारुळापेक्षा वयानं आणि आकारानं लहान होतं.आता मात्र ते शेजाऱ्याच्या दबळेपणातून फायदा कमवायला सज्ज झालं.एका पहाटे ओढ्याकाठच्या वारुळातनं एक अभिजन मूंगी निघाली.तिच्यामागे साध्या कामकरी मुंग्यांचा एक गट होता.ओढा अभिजन मुंगीन पायवाट वारुळाची स्थिती तपासायचं ठरवलं होतं.नेमकी स्थिती तपासणं सोपं नव्हतं.दोन वारुळांमध्ये सुमारे वीस मीटर अंतर होतं, 


दोन हजार मुंग्याइतक म्हणा.सरळ वाटेनं हे अंतर एखादी मुंगी सहाएक मिनिटात ओलांडू शकली असती. पण वाट सोपी नव्हती.एक सेंटिमीटर लांब मुंगीच्या नजरेन पाहिलं तर मोठाले अडथळे होते.माणसांना झाडोऱ्याचं बेट दिसतं तसा एखादा गवताचा पुंजका मुंग्यांना दिसायचा.काड्याकाटक्या रस्त्यात पडलेल्या ओंडक्यांसारख्या दिसायच्या. माणसांना सपाट वाटणारी वाळू खडकाळ जमिनीसारखी वाटायची.

पाऊस ही तर मोठीच आपत्ती.मुंग्यांच्या अंगावर एक थेंब पडणं,आणि माणसांना अग्निशामक दलानं जोरदार नळाच्या झोतानं हाणणं,हे सारखंच समजायला हवं.एखादा बारका ओघळही मुंग्यांना एरवी कोरड्या पात्रातल्या महापुरासारखा वाटायचा.ओढा-अभिजन मुंगीला पायवाट वारुळाच्या क्षेत्राचा रस्ता आठवत होता,कारण ती एकदा तिकडे गेली होती. पण आता तिनं पूर्वी आखलेली फेरोमोन वासाची वाट पुसली गेली होती.


आता तिचा भर होता सूर्याची जागा पाहून वाट आठवण्यावर.आता सूर्य उगवतो आणि मावळतो.दिवसभर त्याची जागा सतत बदलत असते. पण मुंग्यांच्या मेंदूंमध्ये घड्याळ असावं तशी काळ मोजायची क्षमता असते.माणसांच्या मेंदूंना न जमणाऱ्या नेमकेपणानं मुंग्या सूर्याच्या बदलत्या जागांवर लक्ष ठेवू शकतात.बदलत्या जागेप्रमाणे कोन कसेकसे बदलतात, हेही मुग्या जाणू शकतात.आपल्या नोकोबीच्या जंगलात सूर्य दिवसभरात कसा प्रवास करतो.हे मुंग्याना माहीत असतं.तो पूर्वच्या तळ्याकाठच्या झाडांमधून उगवतो, आणि वारुळांच्या थेट वरून पश्चिमेच्या जंगलात मावळतो.कोणत्यावेळी तो कुठे असेल,हे मुंग्यांना नेमकं माहीत असतं.पण तरीही मुंग्या अधूनमधून थांबतात, आणि आजूबाजूचा भाग डोळ्यांनी तपासतात. आठवणीतल्या खुणा तपासून आपण कुठे आहोत याचा अंदाज घेतात.एकदोन शेजारीशेजारी वाढलेली रोपटी, पानांमधून गोलाकार दिसणारा,आकाशाचा तुकडा, एखादी दाट सावली,अशा या खुणा असतात. आणि सोबतच वास-चवीचं वातावरणही असतं, आधीच्या फेऱ्यांमधून आठवणारं.या एका आठवणींच्या प्रकाराबाबत आपण माणसं फार कल्पनाही करू शकत नाही.

ओढा-अभिजन मुंगीचं शरीर खालच्या जमिनीच्या दोनेक मिलिमीटर वर होतं.ती आपली शिंगं खाली वाकवून,जमिनीजवळ नेऊन वेगानं धावत होती.शिंगं डावीउजवीकडे वळवत होती.

वास,त्यांचं मिश्रण,ते तीव्र होताहेत की मंदावताहेत,सारं नोंदून तिच्या बारीकशा मेंदूत एक नकाशा उमटत होता.


सडणारा,कुजणारा पाचोळा,त्यावर जगणाऱ्या बुरश्या आणि जिवाणू,या प्रत्येक गोष्टीचा स्वतःचा वास असतो.मुंग्यांना तो 'दिसतो'.दर चौरस मीटरमध्ये अशा अडीच-तीन लाख वासांचं मिश्रण असतं,आणि मुंग्यांना ते वास येतात आणि आठवतातएखादा वास सांगतो, "इथे अन्न आहे." दुसरा सांगतो,"इथे धोका आहे."सगळ्या संदेशांचा अर्थ क्षणोक्षणी लावत मुंग्या जगत असतात. 


त्या अर्थ लावण्यातूनच त्यांचं टिकून राहणं आणि मरून जाणं ठरत असतं.आणि आपल्याला ह्या प्रचंड तपशिलानं भरलेल्या विश्वाची जेमतेम कल्पना करता येते.ओढा-अभिजन मुंगी पायवाट वारुळाच्या दिशेनं चालली होती,पण तिला त्या वारुळात जायचं नव्हतं.तिची 'मंझिल' होती,एक दोन्ही वारुळांमधलं मैदान.मैदान फारतर दीड-दोन वितींचं होतं,पण मुंग्यांच्या मापांत ते प्रचंड मोठं होतं.आणि या मैदानात ओढा-अभिजन मुंगी आणि तिचे साथीदार यांना भेटले पायवाट अभिजन मुंगी आणि तिचे साथीदार.पायवाट अभिजन मुंगीनं राणीचा मृत्यू पाहिला होता.नंतरच्या सत्तास्पर्धेतून स्वतःचं वारूळ जरासं स्थिरावताना पाहिलं होतं.आता ती अन्न शोधत आपल्या वारुळाच्या क्षेत्राच्या अगदी बाहेरच्या सीमेवर आली होती.हे दोन वारुळांमधले मुंग्यांचे गट भेटले,आणि त्यांच्यात एक किचकट नाच चालू झाला.हा माणसांमध्ये असतो तसा नाच नव्हता.खरं तर तो एक सामना होता, दोन वारुळांमधल्या स्पर्धेसारखा.दोन्ही बाजूच्या मुंग्या पुढ्यातल्या बाजूची ताकद आजमावत होत्या.दुसऱ्याची ताकद तपासतानाच स्वतःच्या ताकदीची जाहिरातही केली जात होती.असं करण्यात कोणत्याच मुंगीला धोका वाटत नव्हता.

मृत्यूचा तर नाहीच,पण जखमांचाही धोका नव्हता.शत्रूला जोखणं आणि आपली शक्ती दाखवणं होतं हे;पहेलवानांनी एकमेकांपुढे शड्डू ठोकण्यासारखं.त्यातनं आपली सुरक्षा वाढेल,असं दोन्ही वारुळांच्या मुंग्यांना वाटत होतं.


या सामन्याच्या वेळी ओढ्याकडेचं वारूळ पूर्ण जोमात होतं.

आसपासच्या कोणत्याही वारुळाला हरवू शकेल, इतकी त्याची ताकद होती.मरू घातलेल्या पायवाट वारुळाला हरवण तर फारच सोपं होतं.ओढा-राणी सहा वर्षांची होती.माणसांच्या मापात तीसेक वर्षांची.भरपूर अंडी देत असायची.वारूळभर तिच्या राजस फेरोमोन्सचा सुगंध होता.वारुळाची जागाही चांगली,

सहज न खचणारी होती.एक बाजू ओढ्यानं, आणि दूसरी बाजू एका कोरड्या घळीनं सुरक्षित होती. इतर कोणतं वारूळ जवळ येणार नाही,असे तेज उतार वारुळाचं रक्षण करत होते.हे काही ठरवून झालं नव्हतं. केवळ योगायोगानं ओढा-राणीला मोक्याची जागा सापडली होती.जागा निवडण्याची बुद्धी राणी मुंग्यांमध्ये नसते.तर ओढा-अभिजन आणि तिचे साथीदार,पायवाट-अभिजन आणि तिचे साथीदार,असा मोठा जमाव मैदानात आला.दोन्ही बाजूंकडून साधारण सारख्याच संख्येनं मुंग्या होत्या.दोन्ही वारुळांच्या काही मुंग्या मात्र आपापल्या घरी जाऊन आणखी कुमक आणायच्या प्रयत्नांत होत्या.सगळ्या मैदानाभोवती लहान-लहान खड्यांवर चढून दोन्हीकडच्या मुंग्या शत्रूवर लक्ष ठेवत होत्या.घराकडे परतणाऱ्या प्रत्येक मुंगीला सौम्यसा शत्रूचा वास येत होता.त्यामुळे ती कोणाशी लढायला बोलावते आहे,ते कळत होतं.आता नुसत्या अभिजन आणि कामकरी मुंग्याच नव्हेत,तर सैनिक मुंग्याही मैदानावर येऊन पोचायला लागल्या. तासाभरात मैदान दोन्हीकडच्या शेकडो मुंग्यांनी फुलून गेलं.पण ही युद्धाची सुरुवात नव्हती.माणसांची सैन्यं जशी एकमेकांना घाबरवायला मिरवणुका काढतात, आपापसातच सराव-युद्धं खेळतात,तसा हा प्रकार होता. भारत-पाक सीमेवर 'वाघा बॉर्डर' ठाण्यावर जसे रोज थाडथाड पाय आपटत दोन्हीकडचे सैनिक एकमेकांवर गुरकावतात,तसा हा खेळ.दोन्ही वारुळांना आपली ताकद दुसऱ्याला दाखवायची होती,एवढंच.


शक्तिप्रदर्शन करणारी प्रत्येक मूंगी आकारानं मोठी दिसायचा प्रयत्न करत होती.पोटात द्रव भरून पोट फुगवली जात होती.पाय ताठ करून जास्त उंच दिसायचा प्रयत्न केला जात होता.कोणी तर खड्यांवर चढून आणिकच उंच होत होत्या.असं 'छाती फुगवून' चालताना दुसऱ्या वारुळाच्या मुंग्यांना मुद्दाम घासत जाणं,धक्के देणं,सारं सुरू होतं.आणि काही लहानशा मुंग्या शत्रूचा हिशेब मांडत होत्या.दुसऱ्या वारुळाकडे किती मुंग्या आहेत,त्यांची ताकद किती आहे, खाऊन-पिऊन जोमदार आहेत की नाहीत,सगळं नोंदलं जात होतं.जर शत्रूच्या मुंग्या आपल्याकडच्यांपेक्षा जास्त वाटल्या,तर आणखी मुंग्या बोलावल्या जात होत्या.हे जर जमलं नाही,तर शत्रूला आपोआप आपला दुबळेपणा कळण्याचा धोका होता.पायवाट-वारूळ राणी मुंगी मरण्याआधीही जरा दुबळं वाटायला लागलं होतं.त्यांचा प्रयत्न असायचा,की सामने आपल्या वारुळाजवळ व्हावेत;म्हणजे जास्त संख्याबळ दाखवणं सोपं जाईल.विशेषतः सैनिकांना जर लवकर मैदानात उतरवता आलं,तर शक्तिप्रदर्शन सोपं व्हायचं. अर्थात,शत्रूची ही पीछेहाट ओढा-मुंग्यांना पायवाट वारुळाची खरी स्थिती सांगतच असायची.आता तर पायवाट-वारुळाकडे पर्यायच नव्हता.त्यांना घराजवळ राहणं सक्तीचं होतं;आणि यानं त्यांचं अन्न शोधायचं क्षेत्राही कमी होत होतं.


१३.१०.२५ या लेखातील भाग क्रमश:हा क्रम मागे पुढे आहे…धन्यवाद 


२३/१०/२५

एक खिडकी अचानक उघडते / A window suddenly opens 

तर सगळी जुळवाजुळव झाली.तालमी सुरू झाल्या. कॉलेज-कॅण्टीनची नवी टुमदार इमारत होती. संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर ती मोकळीच असायची. ती जागा तालमींना मिळाली.

तालमी सुरू झाल्या आणि दोन चार दिवसांतच माझ्या लक्षात आलं की दिग्दर्शक काहीच करत नाहीयेत नुस्ते खुर्चीवर बसून राहताहेत. दोन वेळा चहा पिऊन निघून जातायत ! स्कूलचे दोन तीन अनुभवी नट सोडले तर आम्ही सारेच नवीन होतो. नुस्ते एका जागी उभे राहून भाषणे वाचीत होतो. स्कूलच्या ज्येष्ठ नटांना विचारलं तर ते म्हणाले, 'हे नेहमी असंच नाटक बसवतात.आम्ही आपापसातच हालचाली वगैरे ठरवतो.' मी घाबरलोच.मी म्हणालो,'

मग आपण दुसऱ्या कुणाला तरी दिग्दर्शक देऊ या.' तर हे म्हणतात, 'इतक्या वर्षांत आमची कुणाला छाती झाली नाही - तूही त्या भानगडीत पडू नको.मेडिकलची नाटकं त्यांना पिढीजात आंदण दिली आहेत असं ते मानतात.ते दुखावले गेले तर नाटक बंदसुद्धा पाडतील !' मी भलताच हवालदिल झालो.मला नाटकात काम करण्याचा अनुभव नसला तरी एव्हाना मी खूप नाटकं पाहिली होती.'नाटकं बसवावी लागतात','प्रयोग बांधेसूद असावा लागतो' वगैरे शब्द मी भालबांच्या तोंडून अनेक वेळा ऐकलेले होते.आमच्या शाळेतले फाटक परचुरे सरांनी बसवलेले 'बांधेसूद' प्रयोग मी पाहिलेले होते.पुढे रांगणेकरांची नाटकं पाहून तर 'नाटक बसवणं' म्हणजे काय याचा बऱ्यापैकी अंदाज मला आलेला होता.भालबांची आठवण झाल्याबरोबर मला एकदम आशेचा किरण दिसला.मी भालबांच्या घरी जाऊन दाखल झालो आणि त्यांना सगळी परिस्थिती सांगितली.ते म्हणाले,"एक दिग्दर्शक असताना मी होऊन मधे लुडबूड करणे मुळीच बरे नाही.माझे आणि त्या दिग्दर्शकाचे फार चांगले संबंध आहेत.ते दुखावले जातील." मी म्हटले,"ते दुखावले जातील म्हणून नाटकाचा चुथडा होऊ द्यायचा का ? तुम्ही त्यांच्या नकळत तालमी घ्या ! त्यांना पत्तासुद्धा लागणार नाही याची जबाबदारी मी घेतो.आमच्या कॅण्टीनला दोन खोल्या आहेत.एका खोलीत आमच्या अधिकृत तालमी चालतात.तुम्ही गुपचूप दुसऱ्या खोलीत भूमिगत तालमी घ्या !"नाटकाचा चुथडा होण्याचा माझा मुद्दा भालबांना पटला.आणि ते अनिच्छेने का होईना माझ्या कटात सामील झाले.आमच्या दुहेरी तालमी सुरू झाल्या. 


अधिकृत तालमीत चाललेल्या प्रवेशात ज्यांचे काम नसायचे ते तिथून हळूच सटकायचे आणि मागल्या खोलीत जाऊन भूमिगत तालमीत सामील व्हायचे.तिथे भालबा त्यांची तालीम घ्यायचे ! दुसऱ्या दिवशी त्या पात्रांत झालेली सुधारणा पाहून अधिकृत दिग्दर्शक खूश व्हायचे ! 'वंदे मातरम्'चा आमचा प्रयोग बऱ्यापैकी बांधेसूद झाला.मी आयुष्यात प्रथमच स्वेच्छेने ('अक्कल हुशारीने' म्हणता येईल - पण 'नशापाणी न करता' असं म्हणता येणार नाही कारण नाटकांची चांगलीच नशा तोपर्यंत चढली होती.) केलेला पहिला नाटकाचा प्रयोग पुण्यात लिमये मांडववाल्याच्या 'लिमये नाट्य-चित्र मंदिरात' (आजचे विजय टॉकीज) डिसेंबर १९४६ मध्ये झाला.मी स्वतः ड्रामा सेक्रेटरी असल्यामुळे प्रत्यक्ष प्रयोगाच्या आधी दोन-चार दिवस माझी प्रचंड धावपळ चाललेली होती.लिमयांकडे जाऊन पडदे निवड,नवयुग स्टुडिओतून सर्व पात्रांचे कपडे भाड्याने आण,घरोघर हिंडून नाटकात वापरलं जाणारं सगळं सामान गोळा कर.अनंत कटकटी.माझ्या भूमिकेवर एकाग्र होणं वगैरे अशक्यच होतं.

सगळ्या धावपळीत रात्री प्रयोग केव्हा सुरू झाला आणि केव्हा संपला तेही कळलं नाही.पण सुरू झाला,व्यवस्थित झाला आणि संपलाही ! लोकांना चक्क आवडला ! प्रयोग संपला आणि मग मात्र मी दीक्षित सरांच्या सिगरेटच्या धुरासारखा एकदम हलका झालो.सरळ अंतराळातच गेलो तरंगत ! खूप जणं विशेषत: दीक्षित सर आत येऊन शाबासकी देऊन गेले पण मी हवेतच । इतकी वर्षं जिवाचं पाणी करून टाकणारी भीती एकदम कुठे नाहीशी


झाली ? कशी नाहीशी झाली ? क्वचितच कुठेतरी दबा धरून बसलीही असेल.एखाद्या पडद्याच्या मागे.पण तिच्याकडे लक्ष द्यायला आपल्याला उसंत कुठे होती ? नाटकाचा पडदा वर जायच्या आधी आपण ड्रामा-सेक्रेटरी होतो आणि पडदा वर गेल्याबरोबर आपण 'त्रिभुवन' झालो.ती भीती श्रीराम लागूला शोधत राहिलेली असणार । म्हणजे सुरवंटाला.आता बैस म्हणावं शोधत.आता तो मुळी सुरवंट राहिलेलाच नाही -फुलपाखरू झालाय ! तालमींच्या वेळी आपण ड्रामा सेक्रेटरी असल्यामुले आपल्याला अधिकृत तालीम सोडून कधी जाताच आलं नाही.मग आज एवढं सराइतासारखं त्रिभुवनचं काम आपण कसं केलं ? अरे हा कसला प्रश्न ? आपण स्टेजवर असताना आपले सगळे गुरू अवतीभवतीच तर होते.पॉल म्यूनी, कोल्मन,

सोहराब मोदी,जागीरदार,इन्ग्रिड बर्गमन,नानासाहेब,

गणपतराव सगळे आपल्याला हाताला धरून नेत नव्हते का ? असं काय काय डोक्यात काहूर माजलं होतं.त्या धुंदीत मी रात्रभर कुठेकुठे भटकत राहिलो.धुंदी ! हा शब्द मी नुसता वाचत होतो, ऐकत होतो.त्या रात्री ती अवस्था प्रत्यक्ष अनुभवली.

दुसऱ्या दिवशीचा प्रयोग मी प्रचंड आत्मविश्वासाने केला.


ग्रॅहम ग्रीननं म्हटलं आहे की प्रत्येकाच्या बालपणात किंवा पौगंडावस्थेत एक क्षण असा येतो की एक खिडकी अचानक उघडते आणि सारा भविष्यकाळ आत येतो! मला वाटतं ती खिडकी त्या क्षणी उघडली होती.


एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षात असताना गॅदरिंगला 'पुण्यप्रभाव' नाटक केलं. फायनल परीक्षा तीन महिन्यांवर आली असताना आणि नापास होण्याची खात्री समोर दिसत असतानाही 'वृंदावन' करण्याची संधी हातातून टाकून देणं शक्यच नव्हतं.

कदाचित ते आयुष्यातलं शेवटचं काम असणार होतं.नानासाहेब फाटकांचा 'वृंदावन' पाहिला होता आणि त्यानं मला चांगलंच पछाडलं होतं.तेव्हा खूप मन लावून मी वृंदावन' केला आणि ठरल्याप्रमाणे एप्रिलमध्ये नापास झालो ! ऑक्टोबरच्या परीक्षेत मात्र पास व्हायचंच या निश्चयानं मग जोरात अभ्यासाला लागलो.पण पहिली चिंता हीच की आता कॉलेज सुटणार -तर आता नाटकं कुठे करायची ! जयंत धर्माधिकारी त्याच वर्षी फर्ग्युसनमधून बी.ए. झाला होता.त्याचीही हीच समस्या होती कॉलेज सुटलं,आता नाटकं कुठे करायची। तो कॉलेजच्या नाटकात नेमानं कामं करायचा. त्यालाही नाटकाचं चांगलंच वेड होतं. 


एक दिवस तो आणि भालबा हॉस्टेलच्या माझ्या खोलीवर आले.

काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय म्हणाले. आम्ही तिघं समोरच्या इराण्याकडे जाऊन बसलो. जयंतानं कुठल्याशा वृत्तपत्राचं एक कात्रण बरोबर आणलं होतं.दादर (मुंबई)ला 'दादर नाट्यकलोपासक' नावाची एक हौशी नाट्यसंस्था होती.तिनं हौशी नाट्यसंस्थांकरता एक नाट्यस्पर्धा आयोजित केली होती.प्रथम क्रमांकाच्या नाट्यप्रयोगाला एकशे एक रुपये बक्षीस मिळणार होतं ! जयंता आणि भालबा चांगलेच उत्तेजित झालेले होते.

एकरकमी एकशे एक रुपये मिळणं हे १९५१ साली चांगलंच आकर्षक होतं. (ते आपल्याला मिळणार असं आम्ही गृहीतच धरलं होतं.) पण त्याहीपेक्षा,नाटक करायला मिळणार हे जास्त महत्त्वाचं होतं.मग त्याकरता संस्थेचं पाठबळ हवं. आम्ही तर सगळेच कॉलेज शिक्षण संपलेले सडेफटिंग. तर मग आपण संस्था स्थापन करायची! त्यात काय ?


खरं म्हणजे त्या वेळी पुण्यात 'सोशल क्लब' आणि 'महाराष्ट्रीय कलोपासक' अशा दोन प्रतिष्ठित हौशी नाट्यसंस्था बरीच वर्षं काम करीत होत्या.त्यांची नाटकं आम्ही पाहिलेली होती.भालबा तर तोपर्यंत पुण्यातल्या सगळ्याच कॉलेजात नाटकं बसवायला जात होते आणि जयंत काय किंवा मी काय,सतत चार-पाच वर्षं कॉलेजच्या नाटकांत कामं करून बक्षिसं मिळवत असल्यानं हौशी नाट्यक्षेत्रात बऱ्यापैकी मांहीत झालेलो होतो.तेव्हा या दोन्ही संस्थांनी आम्हांला त्यांच्यात ओढायचा प्रयत्न केलेला होता.पण एक तर त्या संस्थांमध्ये सगळी बुजुर्ग मंडळी होती आणि मुख्य म्हणजे त्यांची नाटक सादर करण्याची पद्धत आम्हांला फार भडक,जुनाट वाटायची.त्यामुळे आम्ही त्यांना टाळत होतो.

आम्हांला काही तरी वेगळं करायचं होतं ! म्हणजे नेमकं काय करायचं होतं ते माहीत नव्हतं.पण तिथं जे चाललं होतं त्याबद्दल तीव्र असमाधान होतं. आणि आपल्याला काही तरी वेगळं – अधिक वास्तवदर्शी असं काहीतरी करायचं आहे अशी एक निश्चित खूणगाठ मनाशी होती.तेव्हा आपण आपली स्वतःची संस्थाच काढली पाहिजे असं काही तरी स्वप्नाळू बोलणं आमच्यात मधूनमधून व्हायचंही.आता या नाट्यस्पर्धेत प्रयोग करण्याची संधी आली आहे तर संस्था स्थापन करूनच टाकू या म्हणून आम्ही इराण्याच्या संगमरवरी टेबलाभोवती बसून चहाचा पाचवा कप पितापिता संस्था स्थापन करून टाकली.आचार्य अत्र्यांचं 'उद्याचा संसार' नाटक करायचं हेही त्यातल्या सगळ्या भूमिकांसह ठरवून टाकलं.तीन चार तास उत्साहानं फसफसून चर्चा करून एवढा महत्त्वाचा निर्णय एकमतानं घेतला म्हणून सगळेच खूश होतो.मी फक्त हिरमुसलो.

कारण परीक्षेच्या अभ्यासापायी मला 'बॅ.विश्राम' करायला मिळणार नव्हता !भालबा केळकर वाडियाचे,जया फर्ग्युसनचा,मी मेडिकलचा,लीला देव एस.पी.

कॉलेजच्या,ताराबाई घारपुरे तर बी.ए. होऊन बरीच वर्षं झालेल्या.तेव्हा संस्थेचं नाव ठेवलं 'इंटर कॉलेजिएट ड्रॅमॅटिक असोसिएशन !' त्या वेळी इंग्रजी नाव ठेवायची पद्धत रूढ होती.भालबांनी नेहमीप्रमाणे अगदी मन लावून,खूप मेहनत घेऊन 'उद्याचा संसार' बसवलं,आणि मुंबईला जाऊन मंडळींनी स्पर्धेत प्रयोग करून चक्कच पहिलं बक्षीस मिळवलं ! पण ते दोन संस्थांत विभागून ! म्हणजे हातात पन्नास रुपये आठ आणे.पहिल्याच प्रयत्नात पहिलं बक्षीस मिळणं म्हणजे फारच उत्साहवर्धक होतं. सगळ्यांना संस्थेविषयी एकदम आपुलकी,अभिमान वगैरे वाटायला लागला.आणि पहिल्याच फटक्याला संस्थेकडे साडेपन्नास रुपये भांडवल होतं ! मग काय ? तातडीनं पुढच्या नाटकाची तयारी सुरू झाली.एवढ्या काळात माझी परीक्षा होऊन मी एम.बी.बी.एस. झालो होतो. (पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'लमाण' या आत्मचरित्रातून)


प्रगतिपुस्तक…!


विद्यार्थ्यांचे नाव : डॉ. श्रीराम लागू


जन्म : १६ नोव्हेंबर १९२७


परीक्षेचा निकाल : चौथीत नापास


प्रगतीची वाटचाल : 'वेड्याचं घर उन्हात', 'उद्ध्वस्त धर्मशाळा',


'नटसम्राट','हिमालयाची सावली' इत्यादी नाटकांतील आणि 'सामना','सिंहासन' ह्या चित्रपटातील भूमिका गाजल्या.हिंदी सिनेमात अनेक महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. 'लमाण' हे आत्मचरित्र प्रसिद्ध,सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत महत्वपूर्ण सहभाग.अनेक महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित…. समाप्त 




२१/१०/२५

एक खिडकी अचानक उघडते / A window suddenly opens

" ग्रहम ग्रीननं म्हटलं आहे की प्रत्येकाच्या बालपणात किंवा पौगंडावस्थेत एक क्षण असा येतो की एक खिडकी अचानक उघडते आणि सारा भविष्यकाळ आत येतो." - डॉ.श्रीराम लागू


शाळा म्हणजे खासगीवाल्यांचा वाडा.काळेकभिन्न कोरीव काम केलेले खांब,तुळया,कमानी आणि त्यांनी बंदिस्त केलेल्या अंधेऱ्या खोल्या.खोल्यांत काही बाकडी आणि मास्तरांची टेबल-खुर्ची.

अतिशय मारकुटे आणि परपीडनात आसुरी आनंद घेणारे मास्तर.बास. शाळेतल्या चार वर्षांत काही शिकल्याचे आठवतच नाही.परीक्षाही आठवत नाही.पण चौथीच्या परीक्षेत नापास झालो एवढे नक्की ! कारण त्यामुळेच माझी शाळा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.


मी मराठी चौथीत नापास झालो तेव्हा आमच्या म्युनिसिपल शाळेच्या हेडमास्तरांनी आमच्या वडिलांना बोलावून घेऊन त्यांना सांगितले होते म्हणे की,"मुलाचे शिक्षण नीट करायचे असेल तर त्याला म्युनिसिपल शाळेतून काढून दुसऱ्या चांगल्या शाळेत घाला.मात्र मराठी चौथीचे वर्ष त्याला पुन्हा करू द्या !" वडिलांनाही ते पटले.कारण त्यांना व्यवसायामुळे माझ्या अभ्यासाची चौकशी करायलाही कधी वेळ मिळत नसे.


म्युनिसिपल शाळेतून भावे स्कूलमध्ये मला अक्षरशः अंधार

कोठडीतून स्वच्छ प्रकाशमय जगात आल्यासारखे वाटले.मोड्डी थोरली,लांबलचक तीन मजली दगडी इमारत.अर्ध्या भागात मुलांची शाळा आणि अर्ध्या भागात मुलींची शाळा.प्राथमिक शाळेच्या चार इयत्ता - प्रत्येकीच्या तीन-तीन तुकड्या.प्राथमिक शाळा मात्र मुलांमुलींची एकच होती.हायस्कूलच्या सात इयत्ता प्रत्येकीच्या तीन-तीन तुकड्या.प्रत्येक तुकडीला वेगळा वर्ग आणि वर्गावर झोकदार पाटी 'इ. ४ थी अ.' आणि प्रत्येक वर्गात प्रकाश म्हणजे किती ? अगदी डोळे दिपून जायचे.मराठी चौथीच्या वर्गात पुन्हा बसावे लागले याचे मला काहीच सोयरसुतक नव्हते । नव्या शाळेवर मी एकदमच खूश होतो.आणि त्या वेळी लक्षात आले नाही, पण पहिल्या शाळेतल्या चार वर्षांत माझा नकळत काहीतरी अभ्यास झाला असणार ! कारण म्युनिसिपल शाळेत 'ढ' समजला गेलेला मी नव्या शाळेच्या चौथीच्या वर्गात एकदम 'स्कॉलर' म्हणून ओळखला जाऊ लागलो ! मी खूश होतो ! शिकवायला बाई होत्या. छान दिसायच्या,खूप छान शिकवायच्या,पण त्यांचे कुंकू नसलेले कपाळ फार केविलवाणे वाटायचे.


मराठी चौथीची परीक्षा मी हां हां म्हणता पास झालो आणि इंग्रजी पहिलीत गेलो. (STD. IA) अशी इंग्रजीतली पाटी वर्गाच्या दारावर होती ! आमचे वर्गशिक्षक मुंडले नावाचे होते.इंग्रजी,मराठी दोन्ही छान शिकवायचे.शिकवताना छान छान गोष्टी सांगायचे. 


दिवाळीच्या सुट्टीत 'फराळाचं काय काय खाल्लं,सिनेमा कुठला पाहिला ?' असले प्रश्न विचारायचे म्हणजे अभ्यासाशी काही संबंध नसलेले - त्यामुळे अगदी घरच्यासारखे वाटायचे.


एक दिवस ते तासाला आले आणि त्यांनी एकदम घोषणा केली की,"शाळेचं गॅदरिंग जवळ आलेले आहे आणि त्यात करमणुकीच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला एक 'नाटिका' करायची आहे !" नाटिका म्हणजे काय हे आम्हांला कुणालाच माहीत नव्हतं.मग त्यांनी पेंडसे आणि सुखात्मे,आणि मी तिघांना उभं राहायला सांगितलं आणि म्हणाले, "तू (म्हणजे मी) गोपाळ कृष्ण गोखले व्हायचंस,तू लोकमान्य टिळक आणि तू दादाभाई नौरोजी."अशी तिघांना तीन कामं वाटून दिली आणि पुढे म्हणाले,"तुम्ही तिघांनी संवाद पाठ करायचे आणि मी सांगीन तसे एका पाठोपाठ म्हणायचे. आणखी एक 'सरोजिनी नायडू' लागेल.ती मुलींच्या शाळेतून आणू." मुलींची शाळा आमच्या शाळेला लागूनच होती.गॅदरिंगला चांगला महिनाभर अवकाश होता.मुंडले सरांनी स्वतःच ती नाटिका लिहिलेली होती. ( नापास मुलांचे प्रगतिपुस्तक,संपादन अरुण शेवले, प्रकाशक - ऋतुरंग प्रकाशन मुंबई)


आणि स्वतःच ते बसवणार होते.बसवणार म्हणजे काय तर आमच्याकडून भाषणं पाठ करून घेणार ! मला पाठांतराची सवय होती कारण घरी रोज संध्याकाळी 'शुभंकरोति', 'शांताकारम्', 'रामरक्षा', 'भीमरूपी' वगैरे देवासमोर बसून म्हणायला लागायचंच,मुंडले सर वर्गात तर नाटिका आमच्याकडून पाठ करून घ्यायचेच पण दुसऱ्या एखाद्या वर्गावर तास घेत असले आणि तास घ्यायचा कंटाळा आला की आम्हां तिघांना आमच्या वर्गातून बोलावून घ्यायचे आणि त्या वर्गातल्या मुलांसमोर उभे राहून आमच्याकडून भाषणं पाठ म्हणून घ्यायचे.आम्हांला आमचा तास चुकला (विशेषतः तो गणिताचा असला) तर मजाच वाटायची.क्वचित 'सरोजिनी नायडू' ही शेजारच्या शाळेतून बोलावली जायची.तिचं नाव मात्र आता आठवत नाही.लहानपणी पाठांतराला वेळ लागत नाही.त्यामुळे लवकरच आमची चौघांचीही ती सबंध नाटिकाच पाठ झाली !


गॅदरिंगचा दिवस उजाडला.शाळेच्या चारी बाजूंनी दगडी इमारतींच्या मध्यभागी भला थोरला चौक होता.त्याच्या एका बाजूला स्टेज बांधले होते आणि समोर चौकात प्रेक्षकांना बसायला,पुढे भारतीय बैठक आणि मागे खुर्चा अशी व्यवस्था होती.पाचएकशे प्रेक्षक मावत असत.दुपारी तीन-चारच्या सुमारास कार्यक्रम सुरू व्हायचा होता.आम्ही एक वाजल्यापासूनच हजर होतो. प्रेक्षागृह रिकामेच होते.आम्ही 'कलाकार' मंडळी स्टेजच्या मागच्या बाजूला जमलो.मास्तरांनी आम्हांला स्टेजवर नेऊन स्टेज दाखवले.लाकडाच्या फळ्यांचे स्टेज केलेले होते.वर एक सतरंजी टाकलेली होती.मागे कसल्या तरी देखाव्याचा भव्य पडदा लावलेला होता. स्टेजवर एक कोच आणि एक खुर्ची मांडलेली होती. पुढच्या बाजूला लाल रंगाचा दुपाखी पडदा होता.त्या पलीकडे प्रेक्षक बसणार होते.पण पडदा पडलेला असल्याने प्रेक्षागृह दिसत नव्हते.स्टेजच्या डाव्या-उजव्या बाजूला झाडांची चित्रे काढलेल्या विंगा होत्या. त्यांच्यामधून स्टेजवर प्रवेश करायचा किंवा बाहेर जायचे.आम्ही स्टेजवर बागडलो,कोचावर हुंडदलो, मास्तरांनी आमच्याकडून एकदा नाटिका म्हणवून घेतली.कुठे कुणी बसायचे,कुणी उभे राहायचे हे सांगितले.सगळे खेळीमेळीत चालले होते.दोन तास कसे गेले कळलेही नाही.


चारच्या सुमारास कार्यक्रम सुरू झाला.पहिलीच नाटिका आमची होती.नाटिकेच्या सुरुवातीला टिळक, दादाभाई आणि सरोजिनी स्टेजवर असतात.गोखले (म्हणजे मी) आत विंगेत उभे असतात.

पडदा वर गेला की स्टेजवर तिघांचे संभाषण सुरू होते.थोडा वेळ त्यांचे संभाषण झाले की गोखले प्रवेश करतात आणि पुढे बाकीची नाटिका होते.प्रत्यक्ष पडदा वर जाऊन नाटिका सुरू होण्याच्या वेळी मी विंगेत उभा राहून माझ्या प्रवेशाची वाट पाहत होतो. मनावर दडपण कसलंच नव्हतं.ठरावीक वाक्यानंतर प्रवेश करायचा आणि पुढचे संवाद बोलायचे.पाठांतर चोख होते.पण पडदा वर गेला मात्र आणि विंगेतून मला, समोर बसलेला प्रचंड समुदाय दिसला ! जगातली सगळी माणसे पोरे बनून तिथे कोलाहल करताहेत आणि मी दिसल्याबरोब्बर झडप घालून ती मला गिळंकृत करणार अशी दरदरून भीती मला वाटली. क्षणार्धात हातपाय गारठले,तोंड कोरडे पडले,जीभ टाळ्याला लागली.जीव वाचवण्याच्या आदिम प्रेरणेने माझा संपूर्ण कब्जा घेतला आणि मी विंगेला घट्ट धरून थरथरत उभा राहिलो.


थोड्या वेळाने लक्षात आले की स्टेजवरचे माझे सहकारी माझ्याकडे पाहून मला जोरजोराने हातवारे करून प्रवेश करण्याकरिता खुणावताहेत.समोरच्या विंगेत हातात शिट्टी घेऊन सर उभे होते.तेही जोरजोराने खुणावताहेत.माझ्या डोक्यात स्टेजवरच्या संवादाचा एक शब्दही शिरला नव्हता.डोक्यात घोंघावत होता समोर बसलेल्या प्रेक्षकांचा भयानक कोलाहल.

स्टेजवरचा संवाद थांबलाच होता कारण माझ्या प्रवेशाशिवाय नाटिका पुढे जाणे शक्यच नव्हते.समोरच्या विंगेतले सर एकदम दिसेनासे झाले.ते मागच्या पडद्याच्या मागून धावत माझ्या विंगेत आले.त्यांनी मला बकोटीला धरून विंगेपासून ओरबाडून काढले आणि एखाद्या मांजराच्या पिल्लाला फेकतात तसे एकदम स्टेजवर फेकून दिले.मी स्टेजवर धडपडत उभा राहिलो.समोर लाखो हिंस्र जनावरांचा समुदाय,त्यांच्या लसलसत्या लाल जिभा आणि भीषण गोंगाट.कोणत्या क्षणी मला फाडून मटकावून टाकतली याचा नेम नाही ! मला नाटिकेतील एक शब्द आठवेना.मी घाबरण्याच्याही पलीकडल्या अवस्थेला गेलो होतो - बधिर झालो होतो.स्टेजवर लोकमान्य टिळक,दादाभाई नौरोजी,सरोजिनी नायडू माझ्याकडे पाहून प्रचंड हातवारे,खुणा करत होते.त्यांचे ओठ हलताना दिसत होते पण ऐकू काहीच येत नव्हते. टाळ्याला चिकटलेली जीभ सुटत नव्हती.असा किती वेळ गेला कुणास ठाऊक.शंभर दोनशे वर्षं असावीत बहुधा ! नाटिका थांबून राहिली होती.पुढे जात नव्हती. मी बोलू लागल्याशिवाय पुढे जाणे शक्य नव्हते.


आणि मग एकदम कसे कुणास ठाऊक,मला भाषण आठवले.

टाळ्याला चिकटलेली जीभ सुटली आणि मी भडाभडा बोलायला लागलो.आणि एकदा बोलायला लागल्यावर मला थांबवण्याची कुणाची टाप होती ? मी माझे स्वतःचेच केवळ नव्हे तर इतर सगळ्यांचीही भाषणे न चुकता,धाडधाड नाटिकेच्या शेवटापर्यंत म्हणून टाकली ! टिळक,दादाभाई,सरोजिनी सगळे आ वासून बघायला लागले आणि बघतच राहिले.नाटिका संपली ! पडदा पडला.समोरच्या प्रेक्षकांना काहीच सोयर सुतक नव्हते.सर स्टेजवर आले, 'छान केलंत हं सगळ्यांनी' म्हणाले आणि पुढच्या नाटिकेच्या तयारीला लागले ! नाटिकेत काम करण्याबद्दल आम्हांला प्रत्येकाला दोन दोन लिमलेटच्या गोळ्या मिळाल्या.मला सायकलवरून कुणीतरी घरी पोचवले.मी मात्र इतका हादरलो होतो की मी मनोमन प्रतिज्ञाच करून टाकली,'पुन्हा जन्मात नाटकाच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही !'


आमच्या शाळेच्या गॅदरिंगला दर वर्षी दोन नाटके व्हायची.एक आजी विद्यार्थ्यांचे आणि एक माजी विद्यार्थ्यांचे.आमच्या शाळेतले फाटक सर आणि परचुरे सर दर वर्षी फार मेहनतीने ही नाटके बसवायचे.अगदी संगीतासकट.मी जसजसा मोठा व्हायला लागलो तसतसा ही नाटकं पाहायला लागलो.लांब कुठेतरी बसून बघायचं.

मी १९४४ साली मॅट्रिक झालो आणि फर्ग्युसन कॉलेजात गेलो.त्याचं असं झालं,मॅट्रिक झाल्यावर वडिलांनी रीतीप्रमाणे विचारलं,"आता पुढे काय करायचा विचार आहे ?" म्हणून. मी म्हटलं, "मला आर्ट स्कूलमध्ये चित्रकला शिकायला जायचंय." (मी चित्रं बरी काढायचो – आणि एकूणच मला कला विषयामध्ये स्वारस्य होतं.शास्त्रीय विषयांची काही गोडी नव्हती.)वडील क्षणभर अवाक् झाले.एका प्रतिष्ठित डॉक्टरच्या आणि काँग्रेसच्या गांधीवादी पुढाऱ्याच्या मुलाकडून त्यांची ही अपेक्षा सुतराम् नव्हती,काही तरी शिष्टसंमत प्रतिष्ठित व्यवसायाचं मी नाव घेईन अशी त्यांची खात्री असावी.थोड्या वेळानं ते बोलते झाले, "हे पहा,पेंटर बिंटर होणं म्हणजे भिकेची लक्षणं आहेत. तुम्ही यावर काहीच विचार केलेला दिसत नाहीये. 


तर मी सांगतो,मॅट्रिक झाल्यावर पुढे कॉलेजात दोन शाखा असतात - आर्टस् आणि सायन्स.आर्टस् घेतलंत तर एक तर वकील व्हाल किंवा प्रोफसर.आजकाल वकील सगळीकडे बेकार हिंडताहेत आणि प्रोफेसर म्हणजे दीडदोनशे रुपये पगारावर आयुष्य काढावं लागेल.तेव्हा आर्ट्सचा विचार डोक्यातून काढून टाका. आता सायन्स.त्यात दोन शाखा - एंजिनिअरिंग आणि मेडिकल.

एंजिनिअरिंगला जायचं म्हणजे गणित फार पक्कं हवं – तुमचा गणितात काय उजेड आहे तो दिसतोच आहे,तेव्हा एंजिनिअरिंग रद्द.आता म्हणजे मेडिकलशिवाय पर्याय नाही.तेव्हा मेडिकलला जायचं !" त्यांच्या वक्तृत्वानं आणि तर्कशुद्ध विश्लेषणानं मी फार प्रभावित झालो आणि फर्ग्युसनला सायन्समध्ये नाव दाखल केलं.


वडील स्वतः डॉक्टर असून राजकारणात रस घेत असल्यामुळे,

आपला व्यवसाय शक्य तितक्या लवकर आपल्या थोरल्या मुलानं चालवायला घेऊन आपल्याला मुक्त करावं असं त्यांना वाटणं अगदी साहजिक होतं !


'एकच प्याला' नाटक करून त्यात मी सुधाकरची भूमिका करावी असा प्रस्ताव मी आमच्या कमिटीपुढे मांडला. (माझ्या बाथरूम-अ‍ॅक्टिंगमुळे मी स्वतःला फारच मोठा नट समजू लागलो होतो !) पण एवढं गंभीर,शोकात्म नाटक गॅदरिंगसारख्या आनंदाच्या प्रसंगी लोक - विशेषतः विद्यार्थी – पाहून घेणार नाहीत;तेव्हा काहीतरी विनोदी नाटक करावं असं कमिटीचं मत पडलं.मग मी नाटक निवडलं आचार्य अत्र्यांचं 'वंदे मातरम्'.ते विनोदी तर होतंच पण मुख्य म्हणजे त्यातलं 'त्रिभुवन' हे काम मला करायला फार छान वाटलं ! जुने,स्कूलचे जे विद्यार्थी होते त्यातले काही चांगले,हौस असलेले नट होते.त्यांतले काही आम्हा कॉलेजवाल्यांतले काही असे मिळून नटसंच तयार करण्यात फारशी अडचण आली नाही.


'नटीसंच' जमवताना मात्र फार मुलींचे पाय धरावे लागले ! माझ्या स्वभावात ही पायधरणी बसणारी नव्हती.पण आता नाटक होणे आणि त्यात मी काम करणे हा जीवनमरणाचा प्रश्न झालेला होता.तेव्हा धरले पाय आणि तीन मुली तयार केल्या.दिग्दर्शक शोधण्याचा प्रश्नच नव्हता कारण मेडिकल स्कूलची सगळी नाटकं बरीच वर्षं पुण्याचे एक वयस्क आणि नाटकाचे शौकीन डॉक्टर बसवत असत.ते स्कूलचे माजी विद्यार्थीच होते. त्यांना नुसता निरोप पाठवला की ते येत असत. कुठलंही नाटक त्यांना चालत असे.


….. उर्वरित शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखामध्ये



१९/१०/२५

पामटॉप / palmtop

एकदा वन विभागाकडून आम्हाला जमिनीवर राहणाऱ्या स्टार टॉरटॉईज कासवांची जोडी मिळाली.
टणक पाठीवर सुंदर नक्षीदार चांदण्या असणारी कासवं.ही दोन्ही कासवं आकाराने आणि वयानेही लहान होती.या कासवांचं वास्तव्य गवताळ आणि रेताड प्रदेशात असतं.निवडुंग,रानफुलं, कंदमुळं आणि मेलेल्या प्राण्यांचं मांस यावर त्यांची गुजराण होते.
भारतातल्या खडकाळ आणि गवताळ प्रदेशात प्रामुख्यानं त्यांचं वास्तव्य असतं.

या कासवांना त्यांच्या नैसर्गिक परिसंस्थेमध्ये ठेवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला.त्यांच्या पिंजऱ्यामध्ये सहा-सात इंच जाडीचा वाळूचा थर टाकून सबस्ट्रेट तयार केला.वाळके ओंडके कल्पकतेने रचून त्यांच्यासाठी लपायच्या जागा तयार केल्या.
त्यातच पाण्याचं भांडं खुपसून ठेवलं. पिंजऱ्यामध्ये थोडे कॅक्टस आणून लावले.दररोज सकाळी बारीक चिरलेले टोमॅटो,गाजर,काकडी असा संमिश्र आहार आम्ही त्यांना देत असू,तर आठवड्यातून एकदा मटणाचा खिमा.पाव किलो खिमा हे दोघं तासाभरात फस्त करायचे.लवकरच त्यांचं बस्तान बसलं आणि मंडळी पार्कवासी झाली.

इतर प्राण्यांच्या तुलनेत या दोघांचा मुक्काम पूर्ण मूक होता.सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांचं रूटिन शांततेत सुरू असायचं.अशी चार-पाच वर्षं गेली असतील.
दोघंही वयात आली,त्यांचं रुटिन बदलून गेलं.नर सतत मादीच्या मागे मागे फिरू लागला. त्याच्या या नव्या आगळिकीने मादी बऱ्याचदा वैतागून त्याच्यापासून दूर लपून बसायची;पण जेवायला बाहेर पडलं की पुन्हा नवरोबांचा पाठलाग सुरू,असं बरेच दिवस चालल.
हळूहळू तिला हा पाठलाग सुखद वाटू लागला असावा.पिंजऱ्यात फिरता हळूच आपली मान कवचाबाहेर वेळावून तो आपल्या मागे येतोय की नाही याची खात्री करून घेऊ लागली.त्यांचा रोमान्स चांगलाच बहरू लागला.

एकदा दुपारी असाच पाठलाग सुरू असताना कासवीण नेहमीसारखी पुढे पुढे जाण्याऐवजी अचानक थांबली.आश्चर्याने तोही थांबला. क्षणभरातच तिच्या थांबण्याचा अर्थ त्याला आणि पिंजऱ्याबाहेरून त्यांच्या प्रणयलीला पाहणाऱ्या आम्हाला कळला.
त्यांच्या मेटिंगचा क्षण आला होता.पुढचे दोन्ही पाय तिच्या अंगावर ठेवून तो घट्ट उभा राहिला.पुढचे दोन-तीन तास मधे मधे ब्रेक घेत त्यांचा समागम चालू होता.त्यानंतर चार-पाच महिने गेले असतील.आताशा पाठलाग प्रकरणही थांबलं होतं.दोघंही खाणं पिणं उरकल्यावर आपापले फिरताना दिसत होते.एका दुपारी कासवीण अधाश्यासारखी पाणी पिताना दिसली.वास्तविक जमिनीवर राहणारी,गवताळ-
रेताड प्रदेशात वावरणारी ही कासवं फारसं पाणी पीत नाहीत.अधाश्यासारखं पाणी पिण्याच्या या कृतीने मी थोडा गोंधळलो आणि सतर्कही झालो. सगळी कामं सोडून खुर्ची घेऊन तिथेच बसून राहिलो.पाणी पिऊन कासवीण एका कोपऱ्यात गेली.तिथली वाळू थोडीफार शाकारून एका जागी स्थिर बसून राहिली.
थोड्या वेळाने तिथल्या वाळूत तिने शू केली आणि ओल्या झालेल्या वाळूमध्ये आपल्या मागच्या दोन पायांनी खड्डा खणायला सुरुवात केली.त्यानंतर दोन तासांनी पुन्हा पाणी पिऊन आली आणि खड्डा खणू लागली.तिला कुणीही डिस्टर्ब करायचं नाही,अशा सूचना सर्वांना देऊन संध्याकाळी मी घरी गेलो.पुढचे दोन-तीन दिवस असेच गेले.पाणी प्यायचं,वाळूत शू करायची आणि ओल्या वाळूतला खड्डा खोल खणत न्यायचा असा उपक्रम कासवीने चालवला होता.चार दिवसांत खड्डा बऱ्यापैकी खोल झाला.पाचव्या दिवशी सकाळी लवकर उठून भल्या पहाटे मी त्यांच्या पिंजऱ्याजवळ गेलो,तेव्हा खड्डा पुन्हा वाळूने भरून गेलेला दिसला.मी काय ते समजलो. कासवीने त्यात अंडी देऊन वरून वाळू टाकली होती.त्यानंतर पुन्हा त्या दोघांचं वागणं अगदी नॉर्मल झालं.खाणंपिणंही पूर्वपदावर आलं.

चार महिने उलटले.एकदा सकाळी मी दूध आणि पेपर आणायला मेन गेटवर गेलो असता नेहमीच्या सवयीने कासवांच्या पिंजऱ्याजवळ डोकावलो आणि तिथलं दृश्य पाहून आनंदाने वेडा झालो. आमच्या कासवांच्या पिंजऱ्यामध्ये डॉलरच्या आकाराची इवली इवली चार पिल्लं मजेत फिरत होती.टोमॅटो,काकडी आणि पालकाच्या छोट्या छोट्या तुकड्यांवर अक्षरशःतुटून पडली होती. आमच्या कासवांचा संसार फुलला होता. त्यांना बाळं झाली होती.न राहवून मी कुलूप उघडून पिंजऱ्यात गेलो.अंडी घातलेल्या घरट्यामध्ये उकरून बघितलं,तर अंड्यांची फुटलेली कवचं सापडली.थोडं टोकरल्यावर आणखी एक अंडं सापडलं.त्यातलं पिल्लू कदाचित मरून गेलं असेल असं वाटलं.पण कुतूहल स्वस्थ बसू देईना.त्या अंड्याच कवच हलकेच सोललं तर काय,माझ्या तळव्यावर एक छोटुकलं कासवाचं पिल्लू अवतरलं. त्याचं नीट निरीक्षण केलं तर त्याच्या पोटाखालच्या कवचामध्ये मला एक छोटं छिद्र दिसलं.त्यातून त्या पिल्लाची हृदयक्रियाही मला स्पष्ट दिसत होती. माझ्या तळहातावर जन्माला आलेल्या त्या पिलाचं नाव मी पामटॉप ठेवून टाकलं.
पोटातल्या छिद्रामुळे कासव कुटुंबातल्या या सर्वांत छोट्या सदस्याची थोडी जास्त काळजी घेण्याची गरज होती.त्यामुळे त्याला मी आमच्या बंगल्यावर घेऊन आलो.सोयरे वनचरे,अनिल खैर,समकालीन प्रकाशन 

पामटॉप दिसत छोटुकला असला तरी चांगलाच खादाड होता.काकडी,टोमॅटोची किंवा पेरूची फोड खायला दिल्यावर महाशय थेट फोडीवरच आरूढ घेऊन मुंडी खाली करून चरायला सुरुवात करत. बऱ्याचदा खाण्याच्या घाईत फोडीसकट तोल जाऊन तो थेट उताणा पडत असे.त्याला आपलं आपलं पुन्हा पालथं पडणं जमत नसे.त्यामुळे नुसतेच पाय हलवत वळवळ करत तो जागेवर गोल गोल फिरत राही.
आमच्यापैकी कुणाचं तरी त्याच्याकडे लक्ष गेल्यावर आम्ही त्याला सरळ करत असू.दरम्यानच्या काळात आमच्या घरी तो मस्त रुळला होता.पण शेवटी त्याला आपल्या भाईबंदांसोबत अन् नैसिर्गिक वातावरणात राहायला मिळणं गरजेचं होतं.महिन्याभराने त्याच्या पोटाचं छिद्र भरून आल्यावर त्यालाही आम्ही त्याच्या कुटुंबाबरोबर त्याच्या हक्काच्या घरी सोडलं.

…. समाप्त…


१७/१०/२५

अडचण हीच देणगी / Difficulties are gifts

विचारलं आणि मी जेव्हा सांगितलं की नाही बुवा.तेव्हा हसून ती म्हणाली,तिच्या त्या खास दिवसामध्ये मीपण वाटेकरी होऊ शकतो."मिस्टर हॅमिल्टन,उरलेला सगळा दिवस मी एमिलीबरोबर बागेत खेळण्यात घालवला.या सात वर्षाच्या मुलीला केवढातरी जास्त उत्साह आणि आनंद होता,की जेवढा इतर कुणाही माणसात असू शकेल त्यांपेक्षा जास्त.

"दिवस सरला तेव्हा ती खूप दमली.तिच्याबरोबर आलेली ती तरूण स्त्री तिला चाकाच्या खुचर्चीतून रुग्णालयात नेणार होती.जाण्याआधी एमिलीनं मला सांगितलं की ती परत गेल्यावर रुग्णालयात तिथल्या नर्सेसशी बोलणार होती आणि मलापण बागेत दिवसभर खेळायची काही व्यवस्था होते का ते बघणार होती."

जेसननं थांबून थेट माझ्याकडं पाह्यलं.त्याच्या डोळ्यात अश्रू होते.आणि माझ्या भावना आवरणं मलाही जड जात होतं.मिस् हेस्टिंग्जनं टिश्यू पेपरच्या आधारानं तो त्रास दूर केला आणि तिच्या नेहमीच्या अ‍ॅलर्जीबद्दल ती काही बोलली.आम्ही शांतपणे बसलो आणि मनात आलं,एका छोट्याशा मुलीच्या मुष्किलीमुळे आमच्यावर किती खोल परिणाम होतो !

शेवटी डोळे पुसून घसा साफ करून जेसन म्हणाला, "त्या आठवड्याच्या शेवटी मला एक प्रौढ माणूस माझ्या घरासमोरून रस्त्याच्या कडेकडेने चालतांना दिसला.मी आपल्या गाडीकडे जात होतो तेव्हा त्यानं मला बघितलं, बघून तो हसला आणि थेट माझ्याकडं आला.हात पुढे करून हस्तांदोलन करत त्याचं नाव बिल जॉन्सन असल्याचं त्यानं सांगितलं.त्यानं बघितलेल्या सगळ्या गाड्यांमध्ये माझी गाडी सगळ्यात सुंदर असल्याचं तो म्हणाला.तो जवळपासच रहात होता आणि लोकांची छोटीमोटी कामं करायचा.असली गाडी धुवायला त्याला अगदी आवडेल असं तो म्हणाला.

"तो अशी किरकोळ कामं का बरं करत होता असं मी विचारल्यावर त्यानं सांगितलं,की कंपन्यांच्या नोकरकपातीमुळे तो आणि त्याची बायको दोघं नोकरी गमावून बसले होते.घरी तीन मुलं होती.जमाखर्चाचा मेळ बसवायला तो आणि त्याची बायको मिळेल ती कामं करीत होते.त्यांची बचत सगळी संपली होती,असं दिसत होतं.आणि समोर येईल ते काम करून दिवसाचा जेमतेम मेळ घालणं चालू होतं.पुरेसे पैसे मिळाले नाहीत तर काय करणार तुम्ही ? असं मी विचारल्यावर हसून त्यानं उत्तर दिलं की मिळत होतं पुरेसं,आणि या अडचणीमुळे कुटुंबात एक मजेशीर गोष्टच घडत होती.पूर्वीपेक्षा सर्व जास्त वेळ परस्परांजवळ राहू लागलो आणि पैसा आणि काम यांच महत्त्व मुलांना कळलं.

"आधीच्या आठवड्यातच घडलेली एक घटना त्यानं गालात जरा हसून सांगितली थोड्याश्या ओटस खेरीज काही खायला नव्हतं,तो अगदी हार मानायच्या बेतात होता.तोच त्यानं त्याची बायको मुलांना काय सांगत होती ते ऐकलं त्याचं असं आहे कीअमेरिका हा देश पूर्वेकडून पश्चिमेकडे वसाहत करीत,जमीन लागवडीखाली आणत गुरांना चरण्यासाठी कुरण शोधत वाढत गेला.
पश्चिमेकडील आघाडीची तुकडी,त्याला वाईल्ड वेस्ट म्हणत,त्यातले बिनीचे लोक कित्येक दिवस एकेकदा ओटस् खाऊन राहायचे.त्यानं मला सांगितल की खूप पैसे मिळाले तरी आता पुढे त्याच्या धाकट्या दोन मुलाना ओट्सच खायला आवडणार आहेत."चपखल शब्द शोधत जेसन थोडा वेळ थांबला, आणि पुढं सांगू लागला,
"तो,त्याची बायको आणि मुलं एकत्रितपणे काही करताना,काही शिकताना काय काय मज्जा करत होते ते मला त्यानं सांगितलंत्यानं माझी गाडी धुतली,मी त्याला मागितले तितके पैसे दिले. आणि थोडे जास्त देऊ केले,पण त्यानं ते नाकारलेच.

"जाण्याआधी या त्याच्या परिस्थितीबद्दल मी हमदर्दी व्यक्त केली.तो त्याचं अद्भुत हास्य करत मला म्हणाला,तो स्वतःला अगदी नशिबवान समजतो आणि कोणी त्याच्याशी जागांची अदलाबदल करू पाहिली, तर त्याला तो तयार नव्हता." जेसन विचारात बुडून गेला आणि शेवटी बोलला,"मिस्टर हॅमिल्टन काय गंमत आहे सांगू? तो जेव्हा सांगत होता ना की कोणाशी जागांची अदलाबदल करायला तो अगदी तयार नव्हता,
तेव्हा मला स्वतःशीच वाटलं की मी खूप कारणांनी त्याच्याशी अदलाबदल करायला एका पायावर तयार आहे."

मिस् हेस्टिंग्जने पाण्याचे तीन पेले आणून ठेवले.
घोटभर पाणी पिऊन जेसननं त्याचा रिपोर्ट वाचणं पुढे चालू केलं.

"दुसऱ्या दिवशी मी एका दफनभूमिच्या प्रवेशद्वारा पुढून माझ्या गाडीनं चाललो होतो.आणि यापूर्वी कधीही पाहिली नव्हती एवढी लांब प्रेतयात्रा पाहिली.त्यावेळी मी काही त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही,पण नंतर त्याच दिवशी त्याच रस्त्यानं परत येत होतो तेव्हा मी विचार केला,जाऊन एका कामगाराला विचारावं की तो सकाळी मेलेला कोणी बडा असामी होता किंवा कसं ? 

मी दफनभूमीत गाडीतून आत शिरलो आणि बघतो तर एक खूप म्हातारा माणूस एकटाच एका थडग्याजवळ उभा होता.मी पाहिलेली प्रेतयात्रा जाऊन खूप तास होऊन गेले होते तेव्हा हा वेगळ्याच कारणानं तिथे उभा असावा,

"मी गाडीतून उतरून त्याच्याकडे गेलो.मी त्याच्याकडे चालत जात होतो,ह्याची चाहूल त्याला लागली. माझ्याकडे तो वळला.त्याच्यात व्यत्यय आणल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली.आधी कधीही पाहिली नव्हती एवढी लांब प्रेतयात्रा मी गाडीतून जाताना पाहिल्याचं त्याला सांगितलं आणि विचारलं की तो कोणी प्रसिद्ध नेता होता किंवा सिनेनट होता किंवा आणखी कोणी होता, ते."हलकसं हसून त्यानं मला सांगितलं की खरंच ती व्यक्ती प्रसिद्ध नेता आणि अभिनेता पण होती. तो म्हणाला,ही गोष्ट त्याला चांगली ठाऊक होती.कारण तिच्यासोबत तो जवळपास साठ वर्षे राहिला होता. वास्तविकतःती चाळीस वर्ष शाळेत शिक्षिका होती. आणि कित्येक विद्यार्थ्यांवर तिनं आपला ठसा उमटवला होता.खरोखर,शब्दशः देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो विद्यार्थी तिच्या मृत्युयात्रेला आले होते.म्हणून त्याला वाटतं की ती प्रसिद्ध व्यक्ती आणि तारका दोन्ही होती.

"मी त्याला म्हटलं की त्याच्या आयुष्यातल्या त्या सर्वांत दुःखाच्या दिवसाबद्दल मला फार वाईट वाटतंय.पुन्हा तो शांतपणे हसला आणि मला म्हणाला की त्याचं पुढचं जीवन निराळं होईल पण जो कोणी डोरोथी बरोबर साठ वर्षं राहिला आहे,
त्याच्या आयुष्यात वाईट दिवस येऊच शकत नाही.'डोरोथीनं माझ्यासाठी जे सर्व केलं त्याबद्दल तिचे आभार मानत मी फक्त उभा होतो.आणि मी आत्ताच तिला वचन दिलंय की मी तिला कोणत्याही प्रकारे दगा देणार नाही."

जेसननं आणखी घोटभर पाणी प्यायलं,
माझ्याकडे आणि मिस् हेस्टिंग्जकडे पाहिलं आणि पुन्हा सुरू केलं, त्या म्हाताऱ्या माणसानं माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि आम्ही दोघं चालत चालत दफनभूमीच्या बाहेर पडलो.मी गाडीकडे वळत असतांना तो मला म्हणाला की "जेव्हा कधी मला त्याच्याकडून काही हवं असेल तर त्याला जरूर भेटावं."मी गाडीत बसलो आणि त्याला हळूहळू जातांना बघितलं.

या टप्प्यावर जेसननं त्याचा अहवाल संपवलायसं वाटलं.मी वाट पाहिली.पण त्यानं पुढं काही चालू ठेवलं नाही.शेवटी मी म्हणालो,"जेसन, तुला एक मूल असं सापडलं की जे फार मोठ्या कठीण समस्येला आनंदानं सामोरं जात होतं,जे समजणं मला फार जड गेलं.तुला एक प्रौढ माणूस आणि त्याचं कुटुंब आढळलं की जे आर्थिक अडचणीतही आपलं कौटुंबिक स्वास्थ्य राखून होतं आणि मानानं जगत होतं.मृत्यूमुळे येणारं दुःख झेलणारा आणि त्याचं परिवर्तन जीवनाच्या आनंद महोत्सवात करणारा तुला एक म्हातारा माणूस सापडला.पण जेसन,तू काही अडचणीत असलेला एखादा तरूण गाठणे पण अपेक्षित होते. "

जेसनन घसा साफ केला आणि शेवटी बोलायला सुरूवात केली."मला माहित आहे मिस्टर हॅमिल्टन,की मला एक तरूण पण सापडवायचा होता.महिनाभरात मला शक्यत स्वतःच्या समस्यामुळे कोणी काही शिकलेला असा एकही तरूण भेटला नाही.मी माझं जीवन असलेले बरेच तरूण भेटले.पण मला आज तुमच्याकडे कबूल करायलाच हवं की माझ्याप्रमाणे किती अडचणी असतात,याची मला जाणीवच नव्हती.


या सगळ्या गोष्टी या आधी मला स्वकेंद्रीत पद्धतीनं अगदी स्वार्थीपणानं घालवलं.वास्तविक आजुबाजुला लोकांना खरोखरी वाटायचं.एखाद्या सिनेमात नाहीतर कुठे बातमी म्हणून येतात.
नाहीतर असंच काही.

"पण तुम्ही आणि माझे आजोबा रेड यांच्यामुळे अडचणींपासून,संकटांपासून माझं रक्षण होत गेलं आणि या महिन्यात मला भेटलेले लोक जसे हे अद्भुत धडे शिकताहेत तसे मी कधीच शिकलो नाही.प्रश्नांना बगल देऊन किंवा ते सोडवणं दुसऱ्या कोणावर सोपवून आनंद लाभत नसतो.प्रश्नांवर मात करून किंवा त्यांच्यासोबतीने आनंदानं राहात गेलो तरच खरा आनंद मिळतो."

मिस हेस्टिंग्जच्या अ‍ॅलर्जीनं पुन्हा उचल खाल्ली बहुतेक,कारण तिला नाक आणि डोळे टिपत बसावं लागत होतं.

शेवटी जेसननं विचारलं,"चारांमधली एक व्यक्ती म्हणून मला धरता येईल ना ? या महिन्यात मला चारांचा हिशोब द्यायचा होता." रेड स्टीव्हन्सच्या मृत्युपत्राशी आणि कागदपत्रांशी हे तत्त्वतःआणि शब्दशःसुसंगत असल्याची ग्वाही मी जेसनला दिली.जेसननं त्याच्या घड्याळ्यात बघितलं आणि म्हणाला, "असं असेल तर मी आता सटकतो.
दुसरीकडे वेळेवर पोचायचंय." मी ठीक आहे म्हटल्यावर मिस् हेस्टिंग्ज त्याला दारापर्यंत पोचवायला गेली.तिनं विचारलं, "एवढ्या घाईनं कुठे निघाला आहेस,जेसन ?'

तो म्हणाला"बागेत झोपाळ्यासमोर एका खास मैत्रिणीला भेटायचंय,मी उद्या भेटतो तुम्हां दोघांना."

…समाप्त…