* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२७/१२/२५

राणी मेली ! The queen is dead !

एक कामकरी मुंगी मेली,फार कशाला,हजार कामकरी मुंग्या मेल्या तरी वारूळ जिवंत राहील,स्वतःला दुरुस्त करत राहील,म्हणूनच तर वारुळाला महाप्राणी म्हणायचं.राणीचं अंडी देणं थांबलं,तर मात्र ते पुन्हा मार्गी लावावं लागतंच,नाहीतर वारूळ मरतं.


आणि आता वीस वर्षांनंतर ती वेळ आली होती. वारुळाच्या आयुष्यातली सर्वांत मोठी आपत्ती होती, राणीचा मृत्यू.पण राणी मेली आहे याची खात्री होईपर्यंत कामकरी मुंग्या काही करू शकत नव्हत्या.काहीतरी बिनसलं आहे,हे त्यांना कळत होतं.पण बिघाडाच्या खुणा अजून पुसट होत्या.त्यांना प्रश्न किती मोठा, मूलभूत आहे,ते कळत नव्हतं.वारूळ नेहमीच्या गडबडीनं,

नेमकेपणानं वागत राहिलं.आपलं तारू भरकटून किनाऱ्यावरच्या खडकांकडे जात आहे,हे त्यांना उमगलं नव्हतं.गडबडीची वागणूक सुरूच राहण्याचं मूळ होत मुंग्यांच्या एकमेकींना संदेश

देण्याच्या पद्धतीत.त्या बहतांश आयुष्य जमिनीखालच्या अंधारात काढायच्या,त्यामुळे डोळ्यांनी पाहणं त्यांना दुय्यम महत्त्वाचं होतं.त्या एकमेकींशी आवाजानं तोंडानं बोलू शकत नव्हत्या.

आपण माणस दृष्टीने दाखवलेल्या चित्रांचा विचार करतो;कानांनी ऐकलेल्या आवाजांचा विचार करतो.मुग्या मुख्यतः वास आणि चवींमुळे विचार करतात.त्यांना वास येतात,चवी समजतात.चित्र 'दिसत' नाहीत,आवाज ऐकू येत नाहीत.त्यांच्या मेंदूना मुख्यतः फेरोमोन्स नावाच्या रसायनांनीच माहिती मिळते. त्या रसायनांच्या वासांमधून,चवींमधून मुंग्यांच्या मनांमध्ये कोणती चित्रं बनतात,त्या चित्रांचा अर्थ मुंग्या कशा लावतात,हे सगळं आपल्याला समजू शकत नाही. आपल्याला त्यांची संदेश घेण्यादेण्याची कल्पना नीटपणे करता येतच नाही.कसं सांगतात त्या,"तिकडे अन्न आहे, चला घेऊन येऊ या."असं? रसायनांच्या कोणत्या मिश्र-वासाने,मिश्र चवीनं,"घाई करा, शत्रू येतो आहे!" असं सांगतात त्या? आपल्याला ही वास-चवींची ज्ञानेंद्रियं नाहीत.आपल्याला मुंग्यांची धावपळ,

लगबग सगळी शांत,निःशब्द वाटते.प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात वास-चवींच्या संदेशांचा गोंगाट सुरू असतो,आपल्या आकलनापलीकडचा.डझनभर फेरोमोन्सच्या मिश्रणांमधून ही 'बोलाचाली' सुरू असते.राणीच्या शरीरातून निघणाऱ्या फेरोमोन्सचा मुंग्यांच्या भाषेत अर्थ असतो,


"इकडे या.माझ्यापाशी या. मला स्वच्छ ठेवा.मला जेवू घाला.माझ्या शरीरातनं जी द्रव्यं मिळतील,ती तुमच्या बहिणींशी वाटून घ्या." आणि कामकरी मुंग्यांनी ही आज्ञा ऐकली.त्या आपल्या जिभांनी राणीला चाटत राहिल्या.त्या चाटण्याचे अंश इतर मुंग्यांमध्ये वाटत राहिल्या.


प्रत्येक मुंगीच्या पोटाच्या पुढच्या भागात हे आज्ञा देणारे फेरोमोन्स गेले.त्यांच्या अन्नात ते आज्ञा-फेरोमोन्स मिसळले गेले.प्रत्येक मुंगी तिला भेटणाऱ्या मुंग्यांचे वास घेत असते.तिची शिंगं म्हणजे आपलं नाक,समजा. एका मुंगीनं दुसऱ्या मुंगीला शिंगांनी चाचपलं,की दुसरीचा वास पहिलीला कळतो.भरपूर जेवलेल्या,पोट भरलेल्या मुंगीचा वास सांगतो,"हा वास घे.उपाशी असशील,तुला भूक लागली असेल,तर हे खा."आणि जर पुढ्यातल्या मुंगीनं जीभ बाहेर काढली,तर पोट भरलेली मुंगी त्या भुकेलीच्या जिभेवर थोडंसं अन्न ओकते.पक्षी आपल्या पिल्लांना असेच घास भरवतात.


याच प्रकारान इतर माहितीचीही देवाणघेवाण वारुळातल्या मुंग्यांमध्ये सुरू असते.माणसांच्या शरीराचे अवयवही एकमेकांशी अशा हॉर्मोन नावाच्या रसायनांनी 'बोलत'असतात.एकूण वारूळ हा एक महाप्राणी सर्व मुंग्या या त्या महाप्राण्याचे अवयव.ते अवयव फेरोमोन्स वापरून 'बोलतात', मुंग्यांच्या मेंदूना ती रासायनिक भाषा समजते.सूचना, विनंत्या,आज्ञा,सगळं रसायनांमधून वाहत जाते.


पायवाट-वारुळाजवळ एकदा एका पक्ष्यानं एक नाकतोडा पकडला.पक्षी नाकतोडा चोचीत धरून घरट्याकडे जात असताना त्याचे काही तुकडे खाली जमिनीवर पडले.मिनीटभरात एका कामकरी मुंगीला ते नाकतोड्याचे तुकडे सापडले.ती नाहीतरी असलं अन्न शोधतच फिरत होती.अन्न मिळाल्याबरोबर पूर्वीपासून घडत आलेली एक घटनांची साखळी घडू लागली. मुंगीनं नाकतोड्याची चव घेतली,आणि ती वारुळाच्या दाराकडे पळत सुटली.रस्ताभर ती अधूनमधून आपलं पोट जमिनीवर टेकवायची.

यातून जमिनीला थोडंसं रसायन लागायचं,आणि अन्नापासून वारुळापर्यंतची वाट रेखली जायची.वारुळात शिरल्यावर मुंगी घाईघाईनं इतर मुंग्यांना भेटायला लागली,तोंडाजवळ तोंड न्यायला लागली.तिनं असं केलं,की नव्या मुंगीला नाकतोड्याचा वासही मिळायचा,आणि त्याच्यापर्यंत पोचायच्या वाटेचाही वास मिळायचा.सूचना असायची,"अन्न आहे, मला सापडलेलं.चला,मी रेखलेल्या वाटेनं जा,आणि अन्न कमावून आणा!"


लवकरच मूळ मुंगीची सूचना मिळालेल्या मुंग्यांचा घोळका नाकतोड्याकडे धावत सुटायचा.नाकतोड्याचा एखादा कण उचलून त्या माघारी वारुळाकडे धावल्या. त्याही पोट जमिनीला टेकवत होत्या,आणि अन्नाची वाट जास्त स्पष्ट करत सांगत होत्या,"मदतीला या.भरपूर अन्न आहे,या वाटेवर!" मुंग्यांचा एक घोळका नाकतोड्याचा एक पाय वारुळाकडे ओढायला लागला, सगळ्या मिळून काम करत होत्या.एक चिमणी काय गडबड चालली आहे ते पाहायला आली.तिनं नाकतोड्याच्या पायाला टोच मारली.सगळ्या मुंग्या विखुरल्या.आता त्यांच्या जबड्याजवळच्या एका ग्रंथीतून वेगळंच रसायन हवेत पसरलं,"धोका! मोठा धोका! पळा ! इथून दूर जा!" पायवाट-वारुळातले सगळे संवाद असे चालायचे,आणि त्या संवादांमधून कामं व्हायची. कधीकधी फेरोमोन्सच्या गंध-चवींसोबत स्पर्शातूनही संदेश दिले-घेतले जायचे.रसायनांची प्रमाणं, रसायनांची मिश्रणं यांमधून शब्द,वाक्यं घडायची. रसायन कुठे सोडलं जातं आहे,कोण सोडतं आहे, यालाही अर्थ असायचा.असं शब्दभांडार वाढत जायचं. वारुळाची भाषा समृद्ध व्हायची.


"ये, मी तुला चाटून स्वच्छ करते."


"कामाला लाग,त्या इतरांसारखी."


"मी या प्रकारची आहे,या स्थितीत आहे."


"चला,इथे रसायन पसरू या,आणि इतरांना सांगू या, की हा आमचा प्रांत आहे."


"सैनिक कमी पडताहेत.जरा बालगृहात जास्त सैनिक वाढवा."


"सैनिक फार होताहेत.जरा बालगृहात सैनिक कमी करा."


"नवी राणी व्हायला कोण धडपडतं आहे?"


सर्व मुंग्या फेरोमोन्सच्या ढगांमध्ये,प्रवाहांमध्ये वावरत असायच्या,आणि त्यातून संदेश घेत असताना स्वतःही त्यात संदेश सोडत असायच्या.काही संदेश फार दूरही जात नसत,आणि फार वेळही टिकत नसत.उदाहरण म्हणून "धोका!" हा संदेश घ्या.

एखाद्या जागी धोका असला तरी सगळ्या वारुळाला न घाबरवता,

फार वेळ जवळपासच्यांना न घाबरवता तो संदेश विरून जायचा. उलट्या टोकाला कामकरी मुंग्यांनी राणीशी कसं वागावं याबाबतचे संदेश सावकाशपणे दूरवर पसरायचे आणि जवळपास कायम टिकून राहायचे.राणी मेल्यानंतरही कामकरी मुंग्यांना ते जाणवायला वेळ लागला,कारण राणीचं प्रेतही राणीबाबतचे संदेश देतच राहिलं.राणीचं अस्तित्व पायवाट वारुळाच्या फेरोमोन्समध्ये सर्वत्र विणलं गेलं होतं.सगळ्या मुंग्यांच्या शरीरांमध्ये राणीचे फेरोमोन्स होते.ती वारुळाची खूणच होती म्हणा. मुंग्यांच्या शरीरांवर पातळसा मेणचट थर असायचा, राणीच्या फेरोमोन्सनी भरलेला.एखादी भेटणारी मुंगी आपल्या वारुळातली की बाहेरची,हे त्या वासानं तत्काळ कळायचं.दोन मुंग्या भेटल्या रे भेटल्या,की झपाट्यानं एकमेकींच्या अंगांवरून शिंगं फिरवायच्या. माणसांच्या डोळ्यांना दिसायचंही नाही,इतक्या वेगानं हे चाचपणं घडायचं,आणि उत्तर यायचं, "आपली" किंवा "परकी".भेटलेली मुंगी आपली असेल,तर सुखानं आपल्या कामाला लागायचं,किंवा तिला कुरवाळून दोस्ती दाखवायची.पण जर वेगळ्या वारुळातली मुंगी असेल,तर पळ तरी काढायचा,नाहीतर मारामारी तरी करायची.

बोलणं नाही,चालचलणुकीत वैशिष्ट्यं नाहीत. त्याची गरज नाही.वास पुरेसा आहे,


आपलं-परकं ठरवायला.वारुळाला सांधून ठेवणार, महाप्राणी बनवणार,ते राणीचे फेरोमोन्सचे वास.सगळी ओळख शुद्ध रासायनिक,ती जर हरवली,तर वारूळ विस्कटणार.आपसात भांडणं होणार,बाहेरच्यांना हल्ले करायला वाव मिळणार,शत्रू येऊन सहज एकेक मुंगीला खाऊन टाकणार.राणीच्या प्रेतातून बाहेर पडणारे फेरोमोन्स कमी होत गेले.तिचा वास मंदावत गेला. तिच्या शरीरातले काही भाग खाल्ले गेले इतर भाग वारुळाच्या प्रेतागारात नेले गेले.


राणी मेल्याच्या तिसऱ्या दिवशी तिच्यातून उमटणारी वारुळाची ओळख पटेनाशी झाली.नेहमीच्या वासांसोबत एक कुजण्याचा वास यायला लागला. राणीची स्तब्धता,हालचाल थांबणं,काहीच महत्त्वाचं नव्हतं.ती पाठीवर झोपून पाय हवेत असते तरी कामकरी मुंग्यांना फरक पडला नसता.तिचा रंग बदलून लाल,निळा,चंदेरी,सोनेरी झाल्यानंही फरक पडला नसता.मृत्यूचा वासच राणीच्या मृत्यूची बातमी कामकऱ्यांना देऊ शकत होता, इतर काही नाही.मृत्यूचा वास


माणसाच्या विष्ठेचा वास,सडक्या मासळीचा दुर्गंध,हे सगळे मुंग्यांच्या ओळखीचे असतात.इतरही विषारी पदार्थांचे वास मुंग्या ओळखतात,आणि ते ज्या जागी भेटतात तिथून त्या दूर पळतात.

मृत्यूचा वास मात्र फक्त चरबीचं विघटन होताना येणारं ओलेइक आम्ल आणि त्याचे क्षार यांच्याशी मुंग्यांच्या मनांत जोडलेला असतो. माणसांना हे वास बिनमहत्त्वाचे वाटतात. मुंग्यांना मात्र ते वास सांगतात,"मृत!" आणि जर मेलेली मुंगी आपल्या वारुळातली असेल तर मुंग्या त्या प्रेताची विल्हेवाट लावतात.


राणीच्या मृत्यूनंतर आठवड्याभरानं हा मृत्यूचा वास मुंग्यांना जाणवू लागला.त्यांच्या राणीचं प्रेत चाटण्यानं प्रेताचे तुकडे पडू लागले.एकेक करून ओलेइक आम्लाच्या,त्याच्या क्षारांच्या वासानं लदबदलेले तुकडे कामकरी मुंग्या राणी-दालनाबाहेर नेऊ लागल्या. काहीही क्रियाकर्म नाही.विधी नाहीत.पूजा नाहीत. शोकसभा नाहीत. केवळ ओलेइक वासांचे तुकडे घेऊन प्रेतागाराकडे जाणाऱ्या मुंग्यांमुळे वारूळभर बातमी पसरली,"राणी मेली!" प्रेतागार काही विशेष नव्हतं. अगदी राणीसाठीसुद्धा खास काही सोय नव्हती.मुख्य वारुळाच्या कडेनं एक दालन.


जिथे वाटेल त्या गोष्टी टाकल्या जात,येवढंच.अळ्यांचे कोष,अन्नातला न खाण्यासारखा भाग,अगदी राणीचेही अंश.प्रेतागार म्हणजे उकिरडा.


तर राणीचे अवशेष वाहून नेणाऱ्या मुंग्यांनी या प्रेतागाराजवळ जाऊन तिथल्या खास कामकरी मुंग्यांना ते अवशेष दिले.

प्रेतागारातल्या मुंग्या सतत तिथल्या वस्तू रचत असायच्या.उपयुक्त गोष्टी खायच्या,आणि इतर सारं नीट रचून ठेवायच्या.वारुळातल्या इतर मुंग्या त्यांच्याशी फार संबंध ठेवत नसत.


वारुळातली सगळी कामं अशा श्रमविभागणीवर उभारली जायची.यातून परोपकार आपोआपच उपजायचा.प्रत्येक मुंगी वारुळासाठी काहीतरी त्यागायची.काहीतरी सोय स्वतःला नाकारून वारुळाचं भलं करायची.यातला सगळ्यांत मोठा त्याग म्हणजे कोणत्याच मुंगीला पिल्लं देता येत नसत;विशेषतः राणी जिवंत आणि निरोगी असेपर्यंत.त्या सगळ्या विशिष्ट कामं करायच्या,ओझी वाहणं,शत्रूशी लढणं,एक ना दोन.काही कामं तर धोकादायक असायची.ती करणाऱ्या मुंग्या लवकरच मरणार,याची खात्री असायची.तरीही मुंग्या तसली कामं करायच्या. व्यक्तींना,

सुट्या मुंग्यांना महत्त्वच नसे.फक्त वारूळ महत्त्वाचं.तो महाप्राणी जगत राहणंच महत्त्वाचं;हे प्रत्येक मुंगीच्या मेंदूच्या रचनेतच ठसलेलं असायचं. एखादी मुंगी मेल्यानं वारूळ जरासं कमकुवत व्हायचं, हे खरं.पण हे नुकसान भरून काढणं सोपं असायचं. एका नव्या कोषातून एक नवी मुंगी बाहेर पडली,की झालं काम.पण एखादी मुंगी स्वार्थीपणानं वागली, तर? तिनं आपल्या कामापेक्षा आपल्या खाण्यापिण्याला महत्त्व दिलं,तर? तर संपूर्ण वारुळाची रचना बिघडून वारुळाचं जगणंच कठीण व्हायचं.त्यापेक्षा त्या मुंगीनं सभ्यपणे,मुकाट्यानं वारुळासाठी मरणं जास्त चांगलं.


सगळ्या मुंग्यांच्या सगळ्या वागणुकीचा हा पाया होता. आपण क्षीण झालो,दुबळे झालो,अपंग झालो,तर वारुळावर ओझं न टाकता दूर जाणे,प्रसंगी मरून जाणं! या स्वार्थ

त्यागामुळेच पायवाट वारूळ यशस्वी ठरलं होतं.सगळ्या मुंग्या सदासर्वदा कामांत असणं, आजारी,जखमी

मुंग्यांनी सेवेची अपेक्षा न ठेवता वारुळाच्या परिघावरच्या दालनांमध्ये जाऊन बसणं, सगळी नेहमीची वागणूक.

जखमींमध्ये खूपदा सर्वांत शूर सैनिक मुंग्या असायच्या.

कामकरी मुंग्या तर आजारी पडल्या,की वारूळच सोडून जात,की आपल्यामुळे इतरांमध्ये काही संसर्गजन्य रोग पसरू नये.म्हाताऱ्या मुंग्याही निरोगी असल्या तरी वारुळाच्या कडेला जायच्या,की आपलं आयुष्य संपत आलं आहे. त्या अन्न शोधत दूरवर भटकायच्या.हे एरवी धोकादायक काम त्या सहज करायच्या.वारुळाच्या रक्षणासाठी लढाईची वेळ आली,तर वयस्क सैनिक जास्त जोमानं पुढे व्हायचे,की आपण मेलो तरी वारूळ सुरक्षित राहील.माणसं आणि मुंग्यांमधला हा मोठा फरक आहे. माणसं तरुण पुरुषांना लढायला पाठवतात,तर मुंग्यांमध्ये म्हाताऱ्या 'बाया' लढायला जातात !


पण वारुळाचं जननेंद्रिय फक्त राणी मुंगी हेच होतं. वारुळातल्या सगळ्या मुंग्या,नवी वारुळं घडवू शकणाऱ्या नर-माद्या; सगळी एकट्या राणीची प्रजा होती.तिनं जगावं,पिल्लं देत राहावं,यासाठीच वारुळातल्या सर्व कामकरी मुंग्या,सैनिक मुंग्या स्वार्थत्याग करत होत्या.यापुढे पायवाट वारुळाचं जगणं-मरणं एकाच गोष्टीवर अवलंबून होतं.राणी मुंगीची जागा घेईल अशी नवी राणी मिळून स्थिरावेपर्यंत बसून राहणं.नवे जन्म सुरू होईपर्यंत टिकण्यासाठी सगळी कौशल्यं,सगळी ताकद,सगळ्या क्षमता वापरून काहीतरी जमणं आवश्यक होतं. (समाप्त )



२५/१२/२५

राणी मेली ! The queen is dead !

पायवाट संपून जंगल सुरू होतं तिथे एक वारूळ होतं. त्यातली राणी मुंगी मेली,वारुळातल्या सगळ्या मुंग्यांची आई.राणी मुंगी मेली, हे बरेच दिवस कुणाला कळलंच नाही. तिला ना ताप आला,ना तिनं आचके दिले. आसपासच्या आपल्या कामकरी मुलींचा "जाते गं!" असा निरोपही तिनं घेतला नाही.नेहमीसारखी ती राणी-दालनाच्या जमिनीवर पहुडली होती.पाय,शिंगं सैलावून पडली होती.आणि तशीच मेली.काही वेगळं दिसलं,जाणवलं नाही.जिवंत राणी मुंगीची आता हुबेहूब मूर्ती झाली होती.कामकरी मुंग्यांना काहीतरी भयंकर घडलं आहे,हे कळलं नाही.सारं काही आलबेल आहे, असा भ्रम होत राहिला.


हा भ्रम झाला,कारण कीटकांचा सांगाडा त्यांच्या शरीराच्या बाहेर असतो.माणसांमध्ये किंवा कणा असलेल्या इतर प्राण्यांमध्ये हाडांचा कडक सांगाडा शरीरात असतो,आणि स्नायू, मज्जा, रक्तवाहिन्या वगैरे मऊ भाग सांगाड्याभोवती बाहेरच्या भागाला असतो.कीटकांमध्ये मात्र सांगाडा बाहेर,इतर मऊ भाग आत,

असं असतं.कणा असलेले प्राणी मेले,की मऊ भाग सडायला लागतो.सगळ्यांना सडणं दिसत असतं.कीटकांचे मऊ भाग सडून तंतू आणि गुठळ्यांचा गुंताच उरतो;पण तो सांगाड्याच्या आत असतो.बाहेरून सांगाडाच दिसत राहतो,जशाच्या तसा.एखादा सरदार मरूनही बाहेरचा चिलखती पोशाख दिसावा,तसं होतं.


राणी मुंगीच्या शरीराचा वासही बदलला नाही.नेहमीचेच गंध येत राहिले,जणू काही राणी मुगी म्हणत होती,"मी तुमच्यातच आहे!" राणी मुंगी शांत,स्तब्ध होती खरी, पण ती नेहमीच तशी असायची.

ती ना स्वतः काही काम करायची,ना इतरांना "हे करा,ते करा" असे हुकूम सोडायची.तिच्यात सगळी कामकरी मुंग्याची काम करायला लागणारी बुद्धी होती.प्रत्यक्षात मात्र ती नुसती अन्न खात, अंडी देत बसलेली असायची.


दहाएक कोटी वर्षांपूर्वी राणी-मुंगीच्या प्रजातीच्या मुंग्या नसायच्या.'प्रजाती' म्हणजे प्रकार म्हणू या.माणसं ही एक प्रजाती,कुत्रे ही एक प्रजाती,वडाची झाडं एक प्रजाती,अशा लक्षावधी प्रजाती आहेत.पण दहाएक कोटी वर्षांपूर्वी आपल्या पायवाट-वारुळातल्यासारख्या मुंग्या नसायच्या.त्या वेळी गांधीलमाश्या असायच्या; आजही असतात तशा.मग यातल्या काही गांधीलमाश्यांमध्ये काही बदल झाले,आणि आजच्या सामाजिक मुंग्यांचे वंश सुरू झाले.त्या प्राचीन मुंग्या-माश्यांच्या

मज्जासंस्थेत आणि ज्ञानेंद्रियांमध्ये त्यांनी कसं वागावं ते नोंदलेलं असायचं.त्या मुंग्या माश्या नेमक्या त्या नोंदींप्रमाणे वागायच्या.

नोंदलेल्या क्रमानं कामं करायच्या.आजच्या मुंग्या-माश्याही हुबेहूब तशाच नोंदींप्रमाणे वागतात.अशा वागणुकीला 'मूळ प्रवृत्ती' म्हणतात.तर पूर्वजांसारखंच वागणं,म्हणजे मूळ प्रवृत्तीनुसार वागणं.तर आपण पायवाट-वारूळ कसं घडलं,त्यात कोण कोण कसं कसं वागलं, हे पाहू.


नवं वारूळ घडायला सुरुवात होते ते काही मुंग्यांनी जुनं वारूळ,

जन्म-वारूळ सोडण्यापासूनं.तर आपली राणी मुंगी अशी 'माहेर' सोडून बाहेर पडली.तिनं आपले चार नाजूक,पारदर्शक पंख पसरले आणि हवेत झेप घेतली. त्या वेळी खरं तर तिला 'राणी मुंगी' म्हणणं बरोबर नाही.ती होती 'राजकुमारी'.ती एकटीच हवेत झेपावली नाही,तर इतर अनेक राजकुमारीही झेपावल्या.आणि सोबत होते अनेक नर,राजपुत्र.


एका नरानं आपल्या राजकुमारीला दोन पायांनी पकडलं,आणि दोघेही गिरक्या मारत जमिनीवर उतरले. आता नरानं राजकुमारीला मागच्या पायांनीही धरलं, आणि तिच्याशी संभोग केला.जेमतेम पाचच मिनिटांमध्ये संभोग पूर्ण झाला.नराचं सगळं वीर्य राजकुमारीत शिरलं. तिनं ते एका पोटातल्या पिशवीत भरून घेतलं,आणि धडपडून स्वतःला नराच्या मिठीतून सोडवून घेतलं.


तिच्या वीर्य-पिशवीतला प्रत्येक शुक्राणू तिच्याइतकाच जगू शकत होता.आयुष्यभर ती पिशवीतले शुक्राणू वापरून अंडी देत राहणार होती.नराचं आयुष्य मात्र संपत आलं होत.काही मिनिटांत तो मरणार होता.नराचं सगळंच आयुष्य परावलंबी राहिलेलं,

झाडांवरच्या बांडगुळांसारखं.नाजूक जीव.राणी मुगीन नर-अंडं दिल, की कामकरी मुंग्या ते दुसरीकडे नेऊन ठेवणार.अंडं उबल,की तांदळाच्या दाण्याच्या आकाराची अळी निघणार.सगळ्या कामकरी मुंग्या त्या अळीच्या बहिणी. त्या तोडातून अन्न आणून अळीच्या तोंडात ओतायच्या. असं होत होत अळीची पूर्ण वाढ झाली,की शरीराभोवती एक पातळ,मेणचट कोष तयार व्हायचा. या कोषात मऊ सांगाडा घडायचा,पूर्ण कीटकाचा.पुढे डोकं,

डोक्याला दोन डोळे,दोन शिंगं,एक नीटसा न घडलेला जबडा,फक्त बहिणींनी दिलेलं अन्नच खाऊ शकणारा.डोक्यामागे धड आणि धडामागे पोट.सगळ्या कीटकाला मिळून चार पंख आणि सहा पाय,शरीराच्या दोन्ही बाजूंना तीन-तीन.आतल्या भागात सारे अवयव. मुख्य म्हणजे एक मोठं लिंग.मेंदू मात्र कणभरच. मेंदूतल्या सूचनाही थोड्याशाच.योग्य वेळी उडायचं. राजकुमारीला गाठायचं.

पकडायचं.संभोग करायचा,की नराचं काम संपलं.तर कोषात पूर्ण वाढ झाली,की कामकरी माश्या कोष खाऊन टाकून नराला मोकळं करायच्या.नंतर नुसतं वाट पाहणं.


बहिणींनी आणलेलं खाणं,आणि संभोग-उड्डाणाची सूचना येण्याची वाट पाहणं.नर म्हणजे एक शुक्राणू राजकुमारींपर्यंत पोचवणारा अग्निबाण.सूचना मिळाली रे मिळाली,की उडायचं आणि संभोगातून शुक्राणू पोचवायचे.मग मेंदूकडून संदेश येतो,"झालं काम ! पण परत वारुळाकडे मात्र मुळीच जायचं नाही आहे!"


ना अन्न शोधायचं कौशल्य,ना अन्न खाण्याचं.जरा उकाडा वाढला की शरीरातलं पाणी सुकून मरायचं.इतर कोणती मुंगी भेटली,

कोणता कीटक भेटला,तर तो तुकडे करून नराला खाऊन टाकणार.कीडमुंगीच कशाला,पक्षी,सरडे,सापसुरळ्या सारे काम संपवून जमिनीवर रांगणाऱ्या नराला खाण्याला तयारच असतात.

हा धोका राजकुमारीलाही असतोच.ती नरांइतकी हतबल नसते.

मेंदू मोठा असतो आणि शरीर बळकट.पण तिलाही वीर्यसाठा घेतल्यानंतर उघड्यावर वावरणं धोक्याचं असतं.तिला जमिनीखाली जायची, आडोसा गाठायची घाई असते.


पण आता पंखांची अडचण व्हायला लागते. मग ती मधले दोन पाय उचलते,आणि पंख जिथे शरीराला जोडलेले असतात तिथे रेटा देऊन पंख मोडून टाकते.हे करण्यानं तिला ना दुःख होत,ना शरीराला इजा होत. छत्रीधारी सैनिकानं उडी मारून जमिनीवर पोचल्यानंतर पॅराशूट सोडून द्यावा;तसं हे राजकुमारीच पंख मोडणं. नाहीतरी पंखांमध्ये मज्जा आणि रक्तवाहिन्या नसतातच. ते केवळ 'चायटिन' नावाच्या पदार्थांचे पडदे असतात, अधूनमधून चायटिनच्याच काड्यांनी मजबूत केलेले. तर राजकुमारी आता निरुपयोगी असलेले हे पंख टाकून देते.आपल्या राणी-मुंगीनंही पंख मोडले,आणि वारुळाकरता जागा शोधायला सुरुवात केली.


('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )


लवकरच तिला चांगली जागा सापडली.गवताच्या पुंजक्यांमध्ये एक मोकळी जागा होती.आपल्याला ती टीचभर वाटली असती,

पण मुंग्यांच्या दृष्टीनं ती एका मोठ्या मैदानासारखी होती.तिथे वारूळ घडवलं,तर वीसेक वर्ष ती त्यात राहू शकणार होती.जागा मिळाल्याबरोबर राजकुमारीनं तिथल्या मातीत उभं बीळ खोदायला सुरुवात केली.झपाट्यानं आणि नेमकेपणानं खोदकाम सुरू झालं.लवकरच बीळ राजकुमारीच्या लांबीइतकं खोल झालं.आता ती थेट उघड्यावर नव्हती, पण धोका संपला नव्हता.

आणखी खोल जाणं आवश्यक होतं.बीळ किती खोल झालं याचा अंदाज राजकुमारीला जायला यायला लागणाऱ्या वेळेवरून यायचा.पुरेसं खोल गेल्यावर तिनं एक मोठं दालन घडवायला सुरुवात केली.मूळ बिळाच्या तिप्पट व्यासाचं होतं,हे दालन.

अजूनही इतर मुंग्या आणि कीटक यांनी बिळात यायचा धोका होता,पण आता त्यांना राजकुमारीच्या दंशाला आणि चावण्याला तोंड द्यावं लागणार होतं.मोठं काम झालं होतं. 


जन्म-वारूळ सोडून उड्डाण करणाऱ्या राजकुमारींपैकी फार तर एखादा टक्का राजकुमारी दिवसाअखेरीला बीळ-दालनात पोचतात इतर नव्याण्णव टक्के कोणत्या ना कोणत्या भक्षकाला बळी पडतात,किंवा त्यांना नरच भेटत नाही.पण येवढ्यानंही राजकुमारी वारूळ घडवेल याची खात्री देता येत नव्हती.बीळ-दालन घडवणाऱ्या राजकुमारींपैकीही साधारणपणे एखादा टक्काच पुढे वारूळ घडवण्यात यशस्वी होतात,तर नव्याण्णव टक्क्यांना ते जमत नाही.म्हणजे शेवटी जन्म-वारूळ सोडणाऱ्या दहा हजार राजकुमारींपैकी एखादीच नवं वारूळ घडवू शकते दहा हजारांपैकी शंभरांनाच बीळ-दालन घडवता येत,आणि त्यांच्यातली एखादीच नवं वारूळ घडवते !


बीळ-दालन घडल्यावर पहिल्यांदा राजकुमारी बारीक अंड्यांचा एक लहानसा गुच्छ जनते.ही अंडी सतत स्वच्छ करावी लागतात,

नाहीतर मातीतले जिवाणू आणि बुरश्या यांची त्यांना लागण होऊन अंडी मरतात. राजकुमारी सतत अंडी चाटत राहते.यामुळे तिच्या लाळेचा एक पातळ थर सर्व अंड्यांवर चढवला जातो.


राजकुमारीची लाळ औषधी असते.जिवाणू,बुरशी यांना ती मारक असते.एखाद्या जिवाणूला जरी अंड्यांमध्ये शिरता आलं,तरी वेगानं प्रजनन होऊन लाखो जिवाणू तयार होऊन अंडी संपवून टाकू शकतात;म्हणजे आता राजकुमारीला इतर मुंग्या,कीटक,पक्षी,सरडे यांच्यापासून स्वतःला वाचवायचं असतं;आणि सोबतच जिवाणू,

बुरशीपासून अंडीही वाचवायची असतात. मूळ उड्डाण करणाऱ्यां

पैकी काही राजकुमारी बीळ-दालनं घडवतात;पण प्रत्येक राजकुमारी सुटी, एकटी असते.त्या एकमेकींना मुळीच मदत करत नाहीत.अंड्यांमधून घडलेल्या कामकरी मुंग्याही मदतीला नसतात.

मूळच्या जन्म-वारुळातल्या मुंग्या राजकुमारींना मदत करत नाहीत.एकदा का जन्म-वारूळ सुटलं,की स्वतःचं वारूळ घडू लागेपर्यंत प्रत्येक राजकुमारी संपूर्णपणे एकटी,एकाकी असते.


अंडी तर दिली;पण ती नीटपणे शुक्राणूंनी फळली असतातच असं नाही.आणि न फळलेल्या अंड्यांमधून मुंग्या घडत नाहीत.

बरं,शुक्राणूही चांगले,निर्दोष हवेत. सदोष शुक्राणूंनी फळलेल्या अंड्यांमधून निरोगी,सशक्त मुंग्या घडत नाहीत.पण पायवाट संपते तिथल्या वारुळाच्या राजकुमारीच्या बाबतीत सगळं काही नीट घडून आलं,आणि पहिल्या अंड्यातून पहिली बारीक अळी बाहेर पडली.राजकुमारीच्या डोक्याच्या भागात एक मोठी ग्रंथी होती.या ग्रंथीतून खूप पोषक अन्न राजकुमारीच्या तोंडात यायचं.

राजकुमारीच्या मागच्या, पोटाच्या भागातल्या चरबीपासून हे अन्न घडायचं. त्यासाठी पंख हलवणारे स्नायू उपयोगी पडायचे.तर हे अन्न राजकुमारी अळीला भरवू लागली.


असं करत,केवळ स्वतःच्या अंगातली द्रव्यं वापरत राजकुमारीनं दहाबारा मुंग्या घडवल्या.त्या सगळ्या माद्या होत्या.लहानखुऱ्या होत्या.दुबळ्या होत्या.त्या तशा असणंच गरजेचं होतं.मोठ्या,सशक्त मुंग्या केवळ राजकुमारीच्या शरीरातून घडवल्या असत्या,तर त्यांची संख्या अगदीच थोडी राहिली असती.इतक्या कमी मुंग्यांना नवजात वारूळ घडवताच आलं नसतं.


लहान होत्या, दुबळ्या होत्या,कमी होत्या,पण सगळ्या कामकरी होत्या.त्यांच्या मेंदूंमध्ये अन्न शोधायची,अन्न वारुळात आणायची,

राजकुमारीची काळजी घेण्याची कौशल्यं होती.या सगळ्या कौशल्यांची मूळ-प्रवृत्ती होती.आणि या सुरुवातीच्या मुंग्यांनी वारूळ घडू लागलं.आता राजकुमारी,राजकन्या या नावाऐवजी 'राणी' हे नाव आपल्या मूळ मुंगीसाठी योग्य ठरलं असतं,कारण तिनं वारूळ घडवायला सुरुवात केली होती.प्रजा घडवायला सुरुवात केली होती.काही मुंग्या अन्न शोधून आणू लागल्या होत्या.काही वारूळ वाढवत होत्या.काही राणीची सेवा करत होत्या. त्यांनी ही सगळी कामं नीटनेटकी करण्यावरच वारूळ घडणं अवलंबून होतं.या पुढच्या कामांमध्ये त्यांना राणीची मदत नव्हती.उलट राणीलाच मदतीची नितांत गरज होती.तिनं बीळ-दालन खोदलं होतं.. स्वतःचं शरीर वापरत कामकरी मुलींना कामाला लावलं होतं.आता ती थकून,भागून,भुकेली होऊन बसली होती.तिचं शरीर म्हणजे एक चायटिनचं कवच,आणि त्यात जेमतेम जगणारी अवयवांची व्यवस्था,येवढंच उरलं होतं.


पण पहिल्या पिढीच्या कामकरी मुंग्या वारुळाबाहेर पडून अन्न शोधत होत्या.त्यांना एक मेलेला डास सापडला.एका सुरवंटानं टाकलेली कात मिळाली.एक नुकताच जन्मलेला कोळी हाती लागला.हे सगळं अन्न त्या स्वतः खात होत्या,आणि राणीला भरवत होत्या. राणीचं वजन वाढायला लागलं.ती जराशी सशक्त झाली.

नंतरच्या पिढ्यांच्या मुंग्याही मोठ्या आणि दमदार होत्या,कारण त्या नुसतं राणीच्या शरीरातलं अन्न खात नव्हत्या.बाहेरच्या अन्नानं जोमदार झालेल्या मुंग्या उभ्या बिळापासून अनेक आडवे बोगदे खणू लागल्या.हळूहळू बोगद्यांचं आणि दालनांचं एक जंजाळ घडलं,ज्यात अनेक मुंग्या नेहमी वावरत असायच्या.वर जमिनीवर खोदलेल्या मातीचा ढिगारा झाल्यानं जंजाळाचं छतही मजबूत झालं,आणि सूर्याची ऊबही वारुळाला मिळू लागली.आता वारूळ शत्रूपासून सुरक्षित किल्ल्यासारखं झालं होतं.जसजसा काळ जात गेला,तसतशी राणी बिळाच्या नवनवीन,खोलात खोल भागाकडे सरकत गेली.बाहेरच्या धोकादायक जगापासून दूर राहणं तिच्या दृष्टीनं गरजेचं होतं,कारण आता ती एकच काम करत होती - पिल्लं देण्याचं.सगळ्या वारुळाची जननी तीच. 


वारुळाचं वर्धमान,वाढणारं टोकही तीच.पिल्लं वाढवायची जबाबदारी आधी जन्मलेल्या कामकरी मुंग्यांनी घेतली होती.नवी पिल्लं म्हणजे कामकरी मुंग्यांच्या बहिणीच.आता कामकरी मुंग्याच राणीचे हातपाय झाल्या,जबडा झाल्या.हळूहळू तर तिचा मेंदूही झाल्या,तिची बुद्धीही झाल्या.त्या छान,एकजुटीनं, एकत्रपणे सगळी कामं करायच्या.आपापल्या स्वार्थाची पर्वा न करता वारुळाची कामं वारुळाचं हित पाहात करायच्या.वारुळाचा सुट्या कीटकांमध्ये विखुरलेला एक 'महाप्राणी' झाला.


वारुळाची वाढ पूर्ण व्हायला दोन वर्ष लागली.आता वारुळात दहा हजारांपेक्षा जास्त कामकरी मुंग्या होत्या. त्यानंतरच्या वर्षी वारुळानं राणीमार्फत नरांना आणि राजकुमारींना जन्माला घातलं.या नरांनी,राजकुमारींनी संभोग -उड्डाणं केली.काही नवी वारुळं जन्माला आली. आता राणी सरासरीनं दर पंधरा मिनिटांनी एक अंडं देत होती.वारुळाच्या तळाशी,सर्वांत खोल दालनात राणी जडशीळ,सुस्त पडलेली असायची;जमिनीत पाच फूट खोलीवर.

माणसांच्या मापानं वारूळ दोनशे मजले भूमिगत होतं,चारशे मुंग्यांइतकं खोल.आणि जमिनीवर आणखी पन्नास मजले उंचीचा मातीचा ढीग होता.


राणी या लहानशा संस्कृतीचं नेतृत्व सांभाळत नव्हती; पण संस्कृतीची वाढ,त्या वाढीचा जोम,हे मात्र राणीच पुरवत होती.

वारूळ टिकेल की नाही टिकणार,यशस्वी होईल की पराभूत,

या प्रश्नांची उत्तरं मात्र राणीप्रमाणेच ठरू शकत होती.आपल्या वीस गर्भाशयांमधून घड्याळाच्या नियमितपणे तिनं अंडी घालत राहणं,हे वारुळाच्या हृदयाचं स्पंदन होतं.सगळे कामकरी ते स्पंदन चालू राहावं म्हणूनच झटत होते.अंडी देणारं स्पंदन जोमानं,

सातत्यानं चालू राहणं,म्हणजे वारूळ टिकणं.वारूळ नीट घडवणं,

स्वच्छ ठेवणं,जीव धोक्यात घालून बाहेरून अन्न कमावून आणणं,

वारुळाच्या महाद्वाराच्या रक्षणासाठी वेळप्रसंगी मरणही पत्करणं, सगळं काही राणी आणि तिच्या स्वार्थत्यागी प्रजेसाठीच ती प्रजा करत असते.  अपुर्ण…


२३/१२/२५

सामूहिक निवासी प्रकल्प / Collective Housing Project

झाड मोठं झालं की त्याचा इतर जीवसृष्टीला मागल्या प्रकरणात वर्णन केल्याप्रमाणे उपयोग होतोच असं नाही.आताही अजस्र वृक्ष इतरांना राहण्यासाठी जागा देऊ शकतात,पण मात्र स्वखुशीने नाही.वटवाघुळ,मार्टिन पक्षी (पाकोळी प्रजातीचा पक्षी) आणि इतर पक्ष्यांना प्रौढ वृक्षांच्या मोठ्या फांद्या विशेष आवडतात.जाड फांद्या थंडी आणि उष्णतेपासून चांगले संरक्षण देतात.


युरोपमध्ये प्रौढ वृक्षांवर घरकामाची सुरुवात मोठ्या ठिपक्याचा सुतार किंवा काळ्या सुतार पक्ष्यांकडून होते.हे पक्षी खोडात जेमतेम एखाद-दोन इंच मोठं भोक पाडतात.

यासाठी त्यांना कुजलेल्या किंवा वठलेल्या झाडांपेक्षा सशक्त झाडेच आवडतात.जर शेजारी छान नवीन घर बांधता आलं तर आपण एखाद्या पडक्या घरात राहू का? याच विचारातून सुतार पक्ष्यांना आपल्या कुटुंबासाठी भक्कम घर हवे असते.सुतार पक्ष्यांकडे एका बैठकीत मोठं घर बांधण्याची ताकद असते.पण तरीही हे काम ते एकदम संपवत नाहीत.

छोटं भोक पाडून झाल्यावर ते महिनाभर सुट्टी घेतात.या काळात इथे कदाचित बुरशी स्थापित होईल.


बुरशीला साल भेदून आत शिरता येत नाही,म्हणून सुतार पक्ष्याचे हे छोटे भोक त्यांच्यासाठी आमंत्रणच असते या खिंडारीत शिरून ते चटकनलाकडावर आक्रमण करतात. 

झाडाला वाटते की नियोजनबद्ध सहकार्यातून आपल्यावर आक्रमण होत आहे.पण सुतार पक्ष्यासाठी हे केवळ श्रमाचे विभाजन असते.काही काळातच आतल्या लाकडाचे तंतू मऊ पडतात आणि सुतार पक्ष्याला भोक मोठे करता येते.


अखेर तो दिवस येतो की बांधकाम पूर्ण होऊन त्याला गृहप्रवेश शक्य होतो.अशा प्रकारे हा पक्षी अनेक घरं करतो.

एक मुलाची खोली तर एक शयनगृह आणि थोडा बदल मिळावा म्हणून एक छिद्र.याच्या घरात दर वर्षी नूतनीकरण होते.याचा पुरावा झाडाखाली पडलेल्या लाकडाच्या तुकड्यांतून मिळतो.नूतनीकरण करणं गरजेचं बनतं कारण आत घुसलेल्या बुरशीला थांबवणं आता अशक्य असतं.

बुरशी आत शिरत जाते आणि लाकूड मऊ आणि ओलसर करते.अशा वातावरणात कुटुंब वाढवणं योग्य नाही,हो ना? प्रत्येक वेळेस जेव्हा सुतार पक्षी हे ओलसर लाकूड काढून टाकतो तेव्हा त्याचे घर छान मोठं आणि स्वच्छ होत जातं.

काही काळातच घर इतकं मोठं आणि खोल होतं की आपली पहिली भरारी घेण्यासाठी पिल्लांना वर चढून जावं लागतं.

अशी वेळ आली की आता हे घर इतरांसाठी सोडणं योग्य होतं.ज्यांना लाकडावर काहीही काम करता येत नाही,अशांना हे घर आयते मिळते.नटहॅच (शिलींध्री पक्षी) हा पक्षी सुतार पक्ष्यांसारखेच वठलेल्या फांद्यांवर चोची मारून छोट्या किड्यांना बाहेर काढत असतो.सुतार पक्ष्याने सोडलेल्या घरात आपले घरटे करणे नटहॅचला सोपे जाते.पण तिथे एक समस्या असते. झाडाच्या ढोलीचे प्रवेशद्वार फार मोठे असते त्यामुळे त्यांच्या भक्षकांना आत शिरून पिल्लांना खाणे सोपे होते.म्हणून तो पक्षी अतिशय कलात्मक रीतीने या ढोलीवर माती लिंपून हे प्रवेशद्वार छोटे करतो.


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज

पी ट र वो ह्ल ले बे न

अनुवाद - गुरुदास नूलकर

अरविंद घनश्याम पाटकर

 मनोविकास प्रकाशन


भक्षकांवरून एक गोष्ट आठवली.आपल्या भाडेकरूंना झाडांकडून एक विशिष्ट सेवा मिळते. लाकडाच्या गुणधर्मामुळे हे शक्य होते.लाकडाच्या तंतूंमधून ध्वनिप्रवाह छान होतो आणि म्हणूनच व्हायलीन किंवा गिटारसारख्या अनेक वाद्यांमध्ये लाकूड वापरले जाते.याचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला एक प्रयोग करता येईल.जमिनीवर पडलेल्या फांदीच्या निमुळत्या भागाला कान लावा आणि दुसऱ्या बाजूने तुमच्या मित्राला दगडाने हळूवार घासायला सांगा काय वातावरण शांत असल्यास कान लांब केला तरीही तुम्हाला हा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येईल.लाकडाच्या या गुणधर्माचा वापर करून झाडाच्या ढोलीत राहणाऱ्या पक्ष्यांना धोक्याचा संकेत मिळू शकतो. मार्टिन किंवा खारी आपल्या नखाने खरवडण्याचा आवाज त्यांना उंच झाडावरही टिपता येतो.यामुळे पक्ष्यांना निसटून जाता येते. जर घरट्यामध्ये पिले असली तर ते भक्षकांचे लक्ष वेधून त्यांची दिशाभूल करतात.पण हा प्रयोग सहसा यशस्वी होत नाही. पण जरी पालकांना उडून जाता आल तरीही पुन्हा प्रजनन करून ते नुकसान भरपाई करू शकतात.


या सस्तन प्राण्यांच्या काही प्रजातींना आपल्या पिलांना वाढवण्यासाठी अनेक पण अशा प्रकारच्या ध्वनिप्रवाहाचा वटवाघळांना काहीच उपयोग नसतो.छिद्रांची गरज असते.युरोप आणि पश्चिम आशियामध्ये सापडणाऱ्या बेकस्टाईन वटवाघुळाच्या माद्या आपल्या पिलांना समूहात वाढवतात.थोडे दिवसच ते एका ठिकाणी थांबतात. नंतर दुसऱ्या ठिकाणी निघून जातात. त्यांच्यावर जगणाऱ्या सजीवांपासून वाचण्यासाठी असे केले जाते.जर वटवाघळाने पूर्ण मौसम एकाच ठिकाणी वास्तव्य केले तर अशा सजीवांची संख्या प्रचंड वाढते आणि वटवाघळांना त्याचा त्रास होतो.पण एका ठिकाणी थोडेच दिवस वास्तव्य केल्याने हे टळू शकते.घुबडांना मात्र सुतार पक्ष्यांच्या छिद्रांची जागा पुरत नाही,त्यांना काही वर्ष धीर धरावा लागतो. कालांतराने झाड कुजू लागतं आणि एखादी फांदी दुभंगून त्याचं प्रवेशद्वार मोठं होतं.जर त्यात सुतार पक्ष्यांनी अनेक छिद्रं करून ठेवलेली असतील तर घुबडाचं काम सोपं होतं.म्हणजे सुतार पक्ष्यांची एकावर एक रचलेली अपार्टमेंट्स असतात. लाकूड कुजण्याची प्रक्रिया चालू झाली की ही अपार्टमेंट्स एकमेकांना जोडली जातात.आणि असं झालं की मग टॉनी घुबडाची सोय होते. तो आता आपल्या मित्रमंडळींसोबत इथे येतो.पण त्या झाडाचे काय? स्वसुरक्षा करण्याचे त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ होतात.आणि आता बुरशीवर आक्रमण करण्याची वेळ निघून गेलेली असते कारण भगदाडे मोठी झालेली असतात.पण जर का आपल्या बाहेरच्या जखमांवर झाडाला इलाज करता आला तर मात्र त्याचं आयुष्य वाढू शकतं. आतून कुजण्याची प्रक्रिया चालू राहिली तरी बाहेरून ते धडधाकट दिसतं आणि पोकळ स्टीलच्या नळीसारखे उभे राहून अजून एखादे शतक गाठू शकते.सुतार पक्ष्यांनी केलेल्या भोकाच्या जागी फुगवटा दिसला की झाड स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात असल्याचा पुरावा दिसतो. तरीही प्रचंड प्रयत्न करूनसुद्धा आपल्या खोडावरचे मोठे प्रवेशद्वार मात्र त्यांना बंद करता येत नाहीत. सुतारपक्षी निदर्यापणे नवीन झाडावर भोकं पाडतच राहतो.आता त्या कुजणाऱ्या खोडामध्ये अनेक प्रकारच्या सजीवांची वस्ती होते.लाकूड मुंग्या येऊन बुरसटलेले लाकूड खाऊ लागतात आणि त्यापासून कागदासारखी घरटी बनवायला सुरुवात करतात. घरट्याच्या भिंतीला अफिडने सोडलेले गोड द्रव लिपून घेतात.यावर बुरशी धरते आणि आपले जाळे पसरवून मुंग्यांचे घरटे मजबूत करते.दमट ओलसर छिद्रात अनेक प्रकारचे कीटक आकर्षित होतात. त्यांना अळ्या होण्यासाठी अनेक वर्षे लागतात त्यामुळे त्यांचा झाडाशी दीर्घकाळ संबंध टिकणारा असतो.कीटकांच्या अळ्यांमुळे बुरशी आणि इतर कीटकांना आमंत्रण मिळते आणि लाकडाचा भुसा सतत बाहेर जमिनीवर पडत राहतो.


घुबड, वटवाघूळ आणि उंदरांची विष्ठा ही त्या अंधार कोठडीत पडत असते.यामुळे लाकडाला पोषणद्रव्य मिळत राहतात आणि ब्लड नेक्ड् क्लिक बीटल, युरोपियन हरमिट बीटल आणि मोठा काळा बीटल या कीटकांची दीड इंचापर्यंत वाढ होते.परमिट बीटलना अंधार आवडतो त्यामुळे ते कुजणाऱ्या खोडाच्या बुंध्याशी राहतात.हे कीटक फारसे चालत किंवा उडत नाहीत त्यामुळे त्यांच्या अनेक पिढ्या एकाच झाडात राहू शकतात.वृद्ध वृक्षांना जपण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे.जंगलातून वठलेले वृक्ष काढून टाकले तर या छोट्या काळ्या किड्यांचा अधिवास निघून जातो आणि त्यांना दुसरे झाड शोधण्याइतकी शक्ती नसते.


एखादे झाड जर वादळात तुटून पडले तरीही त्याच्याकडून मोठी समाजसेवा झालेली असते.जरी संशोधकांकडून यावर फार अभ्यास झालेला नसला तरीही आपल्याला एक गोष्ट नक्की माहीत आहे की, जंगलात अधिक वैविध्य असल्यास परिसंस्था संतुलित राहू शकते. जितक्या जास्त प्रजाती तितक्या कुणा एका प्रजातीचे वर्चस्व जंगलावर होण्याची शक्यता कमी, कारण त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे त्याचे शत्रू तिथे असतात. आणि यामध्ये पडलेल्या झाडाच्या खोडाची मदत मिळते. सतराव्या प्रकरणात पाहिल्याप्रमाणे अशा वठलेल्या खोडापासून जंगलात पाण्याच्या उपलब्धतेवर नियंत्रण ठेवले जाते.



जीवनात विजयी करणारी गोष्ट..!


तो अगदी निवांतपणे गुरूंसमोर उभा होता.गुरू त्याच्या जाणकार नजरेने त्याला तपासत होते. नऊ-दहा वर्षांचा मुलगा,त्याला लहान मूल समजा.त्याला डावा हात नव्हता,तो बैलाशी झालेल्या भांडणात तुटला होता.तुला माझ्याकडून काय हवे आहे.गुरुने त्या मुलाला विचारले.त्या मुलाने गळा साफ केला.धैर्य एकवटले आणि म्हणाले - मला तुमच्याकडून कुस्ती शिकायची आहे. एक हात नाही आणि कुस्ती  शिकायची आहे ? विचित्र गोष्ट आहे. का? शाळेतील इतर मुले मला आणि माझ्या बहिणीला दादागिरी करतात. मला टुंडा म्हणतात.सगळ्यांच्या मेहरबानीने माझे आयुष्य उध्वस्त केले आहे गुरुजी.मला माझ्या हिंमतीवर जगायचे आहे.कोणाच्याही दयेची गरज नाही. माझे आणि माझ्या कुटुंबाचे संरक्षण कसे करावे हे मला माहित असले पाहिजे.योग्य गोष्ट आहे.पण आता मी म्हातारा झालोय आणि कोणाला शिकवत नाही.तुला माझ्याकडे कोणी पाठवले? मी अनेक गुरूकडे गेलो. मला कोणी शिकवायला तयार नाही.एका ज्येष्ठ गुरूने तुमचे नाव सांगितले.फक्त तेच तुला शिकवू शकतात.कारण त्यांच्याकडे फक्त वेळ आहे आणि शिकायला कोणी नाही,म्हणून त्यांनी मला सांगितले.


ते उद्धट उत्तर कोणी दिले असेल हे गुरूना समजले.

अशा गर्विष्ठ लोकांमुळेच वाईट स्वभावाचे लोक या खेळात आले,हे गुरूना माहित होते.ठीक आहे.उद्या सकाळी उजाडण्यापूर्वी आखाड्यात पोहोचा माझ्याकडून शिकणे सोपे नाही,हे मी आधीच सांगत आहे. कुस्ती हा प्राणघातक खेळ आहे.स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्याचा वापर करा.मी जे शिकवतो त्यावर पूर्ण विश्वास ठेव.आणि माणसाला या खेळाची नशा चढते.त्यामुळे डोकं थंड ठेव समजले?


होय गुरू.समजले आपण म्हणसाल त्या प्रत्येक गोष्टीचे मी पालन करीन.मला तुमचा शिष्य करा. त्या मुलाची इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. गुरूंच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले.गुरु आपल्या एकुलत्या एक शिष्याला शिकवू लागले.माती तुडवली गेली,मुग्दुलवरून धूळ झटकली गेली आणि या एक हाताच्या मुलाला कसे शिकवायचे या विचारात गुरूचे डोळे लागले.गुरूने त्याला फक्त एक डाव शिकवला आणि दररोज मुलाला प्रशिक्षण देण्यास भाग पाडले.सहा महिन्यांसाठी दररोज फक्त एक डाव.एके दिवशी सद्गुरूंच्या वाढदिवशी शिष्याने पाय दाबताना प्रकरण छेडायला सुरुवात केली.गुरुजी,सहा महिने झाले आहेत,मला या डावाचे बारीकसारीक मुद्दे चांगले समजले आहेत आणि मला काही नवीन डाव देखील शिकवा.गुरू तिथून उठले आणि निघून गेले.त्याने गुरूला नाराज केल्याने मुलगा परेशान झाला. मग गुरूच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो शिकत राहिला.

अजून काही शिकायचे आहे.असे त्याने कधीच विचारले नाही.गावात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात मोठी बक्षिसे होती.प्रत्येक आखाड्यातील निवडक पैलवान स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले होते. गुरुजींनी उद्या सकाळी शिष्याला बैलांसह गाडी घेऊन बोलावले.जवळच्या गावात जायचे आहे. सकाळी तुला कुस्तीच्या डावात सहभागी होण्यासाठी जायचे आहे.हात नसलेल्या या मुलाने कुस्तीचे पहिले दोन सामने जिंकले.तसेच विरोध करणाऱ्या सर्व गुरूचे चेहरे उतरले.बघणारे थक्क झाले.हात नसलेले मूल कुस्तीत कसे जिंकू शकते? कोणी शिकवले?आता तिसऱ्या कुस्तीत समोरचा खेळाडू नवशिक्या नव्हता.पण मुलाने ही कुस्ती सुद्धा आपल्या नीटनेटक्या चालीने जिंकली आणि बाजी मारली.


आता या मुलाचा आत्मविश्वास वाढला आहे. संपूर्ण मैदान आता त्याच्यासोबत होते.मीही जिंकू शकतो,ही भावना त्याला प्रबळ करत होती.काही वेळातच तो अंतिम टप्प्यात पोहोचला.ज्या आखाड्याने त्या मुलाला या म्हाताऱ्या गुरुकडे पाठवले होते,त्या गर्विष्ठ पैलवानाचा शिष्य शेवटच्या कुस्तीत या मुलाचा प्रतिस्पर्धी होता.हा कुस्तीपटू तेवढ्याच वयाचा असूनही ताकद आणि अनुभवाच्या बाबतीत तो या मुलापेक्षा वरचढ होता.त्याने अनेक मैदाने मारली होती.तो या मुलाला काही मिनिटांत चित करेल हे स्पष्ट होते.पंचांनी सल्ला दिला,कुस्ती घेणे योग्य होणार नाही.कुस्ती ही बरोबरीची असते.मानवता आणि समानतेनुसार ही कुस्ती रद्द करण्यात आली आहे.बक्षीस दोघांमध्ये समान विभागले जाईल.पंचांनी त्यांचा हेतू उघड केला.कालच्या या मुलापेक्षा मी खूप अनुभवी आणि बलवान आहे.ही कुस्ती मीच जिंकणार, ही गोष्ट सोळा आणे खरी आहे.त्यामुळे मला या कुस्तीचा विजेता बनवायला हवे.तेथें स्पर्धक अहंकारनी बोलला.


मोठ्या भावापेक्षा मी नवीन आणि अनुभवाने लहान आहे.माझ्या गुरूनी मला प्रामाणिकपणे खेळायला शिकवले आहे. न खेळता जिंकणे हा माझ्या गुरुचा अपमान आहे. माझ्या सोबत खेळा आणि माझ्यासाठी जे आहे ते द्या.मला ही भिक्षा नको आहे. त्या देखण्या तरुणाचे स्वाभिमानी शब्द ऐकून लोकांनी टाळ्या वाजवल्या.अशा गोष्टी ऐकणे चांगले पण हानिकारक असते. पंच निराश झाले. काही कमी की जास्त झाले तर?आधीच एक हात गमावला आहे,अजून काही आणखी नुकसान होऊ नये? मूर्ख कुठला.!


कुस्ती सुरू झाली आणि उपस्थित सर्वजण थक्क झाले.

संधीच्या शोधात मुलाने टाकलेला डाव आणि बाजी त्या मोठ्या स्पर्धकाला झेलता आली नाही.तो मैदानाबाहेर पडला होता.कमीत कमी प्रयत्नांत त्या नवशिक्या स्पर्धकाने त्या जुन्या स्पर्धकाला धूळ चारली होती.आखाड्यातत पोहोचल्यावर शिष्याने आपले पदक काढून सद्गुरूंच्या चरणी ठेवले. सद्गुरूंच्या पायाची धूळ कपाळावर लावून त्याने आपले डोके मातीने माखले.


गुरुजी, मला एक गोष्ट विचारायची होती. विचारा... मला फक्त एक डावच माहित आहे. तरीही मी कसा जिंकलो?


तू दोन डाव शिकला होतास.त्यामुळेच तू जिंकलास.कोणते दोन डाव गुरुजी?


पहिली गोष्ट,तु हा डाव इतक्‍या चांगल्या प्रकारे शिकलास की त्यात चुकीला वाव नव्हता.मी तुझ्याशी झोपेत कुस्ती लढवली तरीही तू या डावात चूक करत नाहीस.तुमच्या प्रतिस्पर्ध्याला हे माहित होते की तुम्हाला हा डाव माहित आहे, पण तुम्हाला फक्त हा एकच डाव माहित आहे हे त्याला थोडे माहीत होते का? आणि गुरू,दुसरी गोष्ट काय होती? दुसरी गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. प्रत्येक डावासाठी प्रतिडाव आहे! असा कोणताही डाव नाही ज्याची तोड नाही.असा दावा केला जाऊ शकत नाही.तसेच या डावाचा ही एक तोड होता.मग माझ्या प्रतिस्पर्ध्याला तो डाव कळणार नाही का? हे त्याला माहीत होते. पण तो काही करू शकला नाही.तुम्हाला माहीत आहे का? कारण त्या तोडीत डाव टाकणाऱ्या स्पर्धकाचा डावा हात धरावा लागतो! आता तुम्हाला समजले असेल की हात नसलेला साधा मुलगा विजेता कसा झाला? ज्या गोष्टीला आपण आपली दुर्बलता समजतो, तिला आपले सामर्थ्य बनवून जगायला शिकवतो,विजयी तोच खरा सद्गुरू.आतून आपण कुठेतरी कमकुवत आसतो,अपंग आहोत.त्या कमकुवतपणावर मात करून जगण्याची कला शिकवणारा गुरु हवा आहे.आपल्याकडे दोन हात आहेत... एक स्वतःला मदत करण्यासाठी आणि दुसरा इतरांना मदत करण्यासाठी आजपासून इतरांवर अवलंबून न राहता स्वतःची आणि इतरांची मदत केली पाहिजे.




२१/१२/२५

लोकांशी अचूक व्यवहार असे करा.Deal with people correctly.

सांगण्याची आता आवश्यकता नाही की मी या गोष्टीवर अत्यंत खुश होतो.पुढच्या रविवारी चर्चमध्ये इतर स्त्रियांना तिने ही घटना सांगितली आणि अनेक स्त्रियांनी मला येऊन सांगितले,की इतकी शहाणपणाची गोष्ट आम्ही या आधी कधीच ऐकली नव्हती.तेव्हा कुठे मला स्तुती करण्याच्या शक्तीचा प्रत्यय आला."


लॉरेंस जिगफेल्ड ऑडवेअर धूम माजवणारा सुप्रसिध्द निर्माता होता.तो एक असा निर्माता होता,ज्याच्यात 'अमेरिकन तरुणींना ग्लॅमरस' बनवण्याची विलक्षण प्रतिभा होती.प्रत्येक वेळी ते अशा एखाद्या सामान्य तरुणीला निवडत असे,जिच्याकडे कुणी पुन्हा वळूनसुध्दा पाहणार नाही.मग ते तिच्यात कायापालट करीत.

प्रशंसा व आत्मविश्वासाचे महत्त्व जाणवल्यामुळे त्यांना माहिती होते की केवळ प्रशंसा व महत्त्व दिल्याने सामान्य स्त्रीसुद्धा स्वतःला सुंदर मानू लागते.ते व्यवहारी होते.त्यांनी कोरसमध्ये गाणाऱ्या मुलींचा पगार आठवड्याला तीस डॉलरपासून वाढवून ७५ डॉलर्स केला.ते विशाल अंतःकरणाचे होते.फॅडलीजच्या सादरीकरणाच्या पहिल्या रात्री त्यांनी सर्व कलाकारांना तार पाठवली आणि यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक मुलीला अमेरिकन ब्युटी गुलाब दिले.


एकदा माझ्यावर डाएटिंगचे भूत सवार झाले अन् मी सहा दिवस उपास केला.सहाव्या दिवशी मला तेवढी भूक लागत नव्हती,जेवढी दुसऱ्या दिवशी लागली होती. आम्ही सगळेच हे जाणतो की जर एखाद्याच्या परिवाराला किंवा कर्मचाऱ्यांना सहा दिवस खायला मिळाले नाही तर तो स्वतःला अपराधी मानेल.पण जर ही व्यक्ती परिवार किंवा कर्मचाऱ्यांची स्तुती सहा दिवस, सहा आठवडे किंवा साठ वर्षापर्यंत करणार नाही,तेव्हा त्याला जरासुध्दा अपराधी वाटणार नाही.आम्ही हे विसरतो की स्तुतीसुद्धा भोजनासारखीच आमची अनिवार्य गरज आहे.


जेव्हा महान अभिनेता अल्फ्रेड लुटने 'रियुनियन इन व्हिएन्ना'

मध्ये प्रमुख भूमिका केली,तेव्हा त्यांनी म्हटले होते, "मला ज्या गोष्टीची सर्वाधिक गरज आहे ती आहे - आत्मसन्मानासाठीचं पोषण." आम्ही आपली मुले,मित्र आणि कर्मचाऱ्यांच्या शरीराचं पोषण करतो;पण आम्ही त्यांच्या आत्मसन्मानाचं किती पोषण करतो? आम्ही त्यांना उर्जेसाठी मांस व बटाटे उपलब्ध करून देतो,पण आम्ही त्यांना प्रशंसेचे दयाळू शब्द द्यायला विसरुन जातो,जे वर्षानुवर्ष त्यांच्या आठवणीत पहाटेच्या ताऱ्यांच्या संगीतासारखे गुंजेल.


पॉल हार्वेने आपल्या 'द रेस्ट ऑफ द स्टोरी' या रेडियो कार्यक्रमात सांगितले,की कशा त-हेने खरी प्रशंसा एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलून टाकते.त्यांनी एक घटना ऐकवली.अनेक वर्षांपूर्वी डेट्रॉइटच्या एका शिक्षिकेने स्टेव्ही मॉरिसला म्हटले की वर्गात हरवलेल्या एका उंदराचा शोध घ्यायला त्याने मदत करावी.

निसर्गाने स्टेव्हीला डोळे दिले नसतील.पण त्या ऐवजी स्टेव्हीची श्रवणशक्ती अतिशय तेज होती.स्टेव्हीमध्ये असे काही होते,जे त्या पूर्ण वर्गात कुणापाशीच नव्हते.पण हे असे प्रथमच घडले होते की त्याच्या श्रवणशक्तीसाठी कुणी त्याची प्रशंसा केली होती.अनेक वर्षांनंतर स्टेव्हीचे म्हणणे आहे की ती प्रशंसा त्यांच्या नवीन जीवनाची सुरुवात होती.त्या घटनेनंतर त्यांनी आपल्या ऐकण्याच्या क्षमतेचा विकास केला आणि स्टेव्ही वंडरच्या रंगमंचीय नावाला स्विकारून ते सत्तरच्या दशकाचे महान पॉप सिंगर व गीतकार झाले.अनेक वाचक या शब्दांना वाचताना मनात म्हणतील 'अच्छा! लबाडी ! लांगूलचालन ! मी याचा उपयोग करून पाहिला आहे समजदार लोकांसमोर.पण हे प्रकार चालत नाहीत.'


अगदी बरोबर आहे! लबाडी शहाण्या लोकांसमोर चालत नाही.ती उथळ,स्वार्थी आणि खोटी असते.तिला असफल व्हायलाच हवे आणि ती असफल होतेच.तसे तर अनेक लोक प्रशंसेचे इतके भुकेले असतात की ते लबाडीला स्तुती समजून पचवून टाकतात,ज्याप्रमाणे एखादा भुकेलेला मनुष्य गवत व किडे-मुंगळे खाऊन टाकतो.


महाराणी व्हिक्टोरियालापण खोटी स्तुती आवडत असे. प्रधानमंत्री बेंजामिन डिस्त्राइलीने हे स्विकार केले होते, की ते महाराणीची खोटी स्तुती करतात.त्यांच्याच शब्दात सांगायचं तर 'ते मोठ्या चमच्याने लोणी लावत असतात.' परंतु डिस्त्राइली ब्रिटनचे सर्वांत सुसंस्कृत, योग्य व चतुर व्यक्ती होते.ते या कलेत निपुण होते.जी गोष्ट त्यांचा हेतू सफल करून गेली,ती तुमच्या आमच्यासाठी योग्य ठरेलच असे काही म्हणता येणार नाही.दीर्घ काळासाठी खोटी स्तुती करण्याने फायदा कमी अन् तोटाच जास्त होऊ शकतो.अशी खोटी स्तुती म्हणजे खोटा शिक्का आहे.जर तुम्ही त्याला खरा शिक्का म्हणून बाजारात चालवण्याचा प्रयत्न केलात तर ते तुमच्या अंगाशी येऊ शकते.प्रशंसा व खोटी स्तुती यात काय फरक आहे? याचे उत्तर अगदी सोपे आहे.एक खरी असते आणि दुसरी खोटी. एक हृदयातून निघते आणि एक स्वार्थातून.एक निस्वार्थी असते,तर दुसरी स्वार्थपूर्ण ! एकीची प्रत्येक ठिकाणी स्तुती होते तर दुसरीची हर ठिकाणी निंदा.


मी मेक्सिको शहरात हल्लीच चापुल्टेपेक पॅलेसमध्ये एक मेक्सिकन हिरो जनरल अल्वारो ऑब्रेगॉनची मूर्ती बघितली. त्या मूर्तीखाली जनरल ऑब्रेगॉनच्या तत्त्वज्ञानाचे बुध्दिमत्तापूर्ण शब्द लिहिले होते : "आपल्यावर हल्ला करणाऱ्या शत्रुंना घाबरू नका; उलट त्या मित्रांना घाबरून असा जे तुमची खोटी स्तुती करतात."


नाही,नाही,नाही ! मी तुम्हाला खोटी स्तुती व लबाडी करायला सांगत नाहीए.मी तर अगदी वेगळेच सांगतोय. मी तुम्हाला एक नवीन जीवन सुरू करायला सांगतोय. मला परत सांगू द्या 'मी तुम्हाला एक नवीन जीवन सुरू करायला सांगतोय.'


सम्राट पंचम जॉर्जने बकिंगहॅम राजवाड्यात आपल्या अभ्यासिकेच्या भिंतीवर सहा सूत्रे लिहून ठेवली होती. त्यातले एक सूत्र असे होते,"मला हे शिकवा की ना मी कुणाची खोटी स्तुती करेन आणि ना कुणाकडून स्वतःची खोटी स्तुती ऐकण्यासाठी उत्सुक राहीन." मी एकदा लबाडीची व्याख्या वाचली होती जी इथे पुन्हा सांगण्यासारखी आहे- "लबाडी किंवा खोटी स्तुती समोरच्याला तेच सांगते जो तो स्वतःबद्दल विचार करतो."


"तुम्ही जी वाटेल ती भाषा वापरा," राल्फ वॉल्डो इमर्सनने म्हटले होते."तुम्ही नेहमी तेच सांगाल जे तुम्ही आहात." जर आम्हाला फक्त लबाडीच करायची असेल तर सर्वांशी लबाडीने वागून आम्ही सहजपणे मानवी संबंधाचे विशेषज्ञ बनू शकतो.


जेव्हा आम्ही कुठल्याच निश्चित विषयाबद्दल विचार करीत नसतो,तेव्हा आपल्या फावल्या वेळात ९५ टक्के वेळ आम्ही स्वतःबद्दलच विचार करीत असतो.जर आम्ही स्वतःबद्दल विचार करणे थोडे कमी केले तर दुसऱ्यांच्या चांगल्या गुणांबद्दल विचार करायला लागू, तेव्हा मग आम्हाला लबाडीची किंवा खोटी स्तुती करण्याची गरजच वाटणार नाही.खोट्या स्तुतीला पहिल्याच नजरेत,तोंडाबाहेर पडायच्या आधीच ओळखले जाऊ शकते आणि ती अगदी उथळ व खोटी असते.आजच्या जगात खरी स्तुती दुर्मिळ झाली आहे. असे काय होते कोण जाणे की चांगल्या क्रमांकानी उत्तीर्ण झालेल्या आपल्या मुलाची किंवा मुलीची स्तुती करण्याचा आम्हाला बरेचदा विसरच पडतो किंवा आम्ही आपल्या मुलाला त्यावेळी प्रोत्साहित करायला विसरून जातो,जेव्हा ते पहिल्यांदा चांगला केक यशस्वीपणे बनवतात किंवा पाखरांसाठी घरटे बनवतात.मुलांना आपल्या आई-वडिलांकडून झालेल्या स्तुतीने जो आनंद मिळतो,त्यापेक्षा जास्त आनंद अन्य कुठल्याच गोष्टीने मिळत नाही.पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही क्लबमध्ये चांगल्या भोजनाचा आनंद घ्याल,तेव्हा खानसाम्याला नक्की निरोप पाठवा की जेवण रुचकर होते आणि जेव्हा कोणी थकलेला विक्रेता तुमच्याशी सभ्यपणे वागेल तेव्हासुध्दा या गोष्टीचा उल्लेख जरूर करा. प्रत्येक पादरी,प्रत्येक भाषण देणारा आणि प्रत्येक सार्वजनिक वक्ता हे जाणतो की जर श्रोत्यांमधून एकाही व्यक्तीने टाळी वाजवली नाही तर किती वाईट वाटते आणि किती उत्साहभंग होतो. व्यावसायिकांना जे लागू होते ते ऑफिस, दुकाने, कारखान्यांमधले कर्मचारी, कुटुंबीय आणि मित्र परिवार यांना तर दुपटीने लागू होते.आमच्या संबंधात आम्हाला याचा कधी विसर पडायला नको की आमचे साथीदार अखेर मानव आहेत आणि स्तुतीचे भुकेले आहेत.हाच तो अस्सल शिक्का आहे ज्याला प्रत्येक जण पसंत करतो.


आपल्या प्रत्येक दिवसाच्या प्रवासात कृतज्ञतेच्या ठिणग्या मार्गावर पसरवण्याचा प्रयत्न करा.तुम्हाला नवल वाटेल की कशा तन्हेने या ठिणग्यांमुळे मैत्रीच्या छोट्या-छोट्या वाती उजळतील,ज्यामुळे तुमच्या भावी प्रवासात तुम्हाला ऊब मिळेल.


न्यू फेयरफिल्ड,कनेक्टिकट इथल्या पामेला डनहॅमच्या अनेक जबाबदाऱ्यांपैकी एक जबाबदारी होती नवीन कर्मचाऱ्याच्या देखरेखीची,ज्याचे काम अत्यंत वाईट होते.दुसरा कर्मचारी त्याची खूप टर उडवत असे आणि तो किती वाईट काम करतो असे सांगत.ही खूपच वाईट पध्दत होती आणि दुकानातला अमूल्य वेळ वाया जात असे.पॅमने या कर्मचाऱ्याला प्रेरणा देण्याचे अनेक उपाय अंमलात आणले,पण काही लाभ झाला नाही.मग तिला असे लक्षात आले की कधी तरी तो कुठले तरी काम चांगल्या त-हेने करून घेतो.पॅमने निर्णय घेतला की जेव्हा कधी अशी संधी येईल तेव्हा ती इतरांसमोर त्याची स्तुती करेल.असे केल्यावर सर्वांना दिसून आले की दर दिवशी त्याच्या कामात सुधारणा होत गेली आणि लवकरच तो आपले काम चांगल्या त-हेने करू लागला. 


आता सर्व जण त्याची स्तुती करतात आणि त्याला सन्मान देतात.खऱ्या स्तुतीने सकारात्मक परिणाम मिळाले,उलटआलोचना व टिकेने हाती काहीच आले नव्हते.लोकांना टोमणे मारून जखमी केल्याने ते कधीच बदलत नाहीत,न त्यामुळे काही सकारात्मक प्रभाव पडतो.म्हणून असे वर्तन करणे निरर्थक असते.एक जुनी म्हण आहे, जी मी माझ्या आरशावर चिकटवून ठेवली आहे. ती मी रोज वाचतो :


मी या रस्त्यावर फक्त एकदाच चालेन... म्हणून जर मी काही चांगले काम करू शकतो किंवा कुणाचे भले करू शकतो तर मी ते आत्ताच करेन. मी त्याला टाळणार नाही,दुर्लक्ष करणार नाही.कारण पुन्हा मी या रस्त्यावर परतून येणार नाही.


इमर्सनने म्हटले होते,"प्रत्येक व्यक्ती माझ्यापेक्षा कुठल्या ना कुठल्या गोष्टीत सरस असते.मी त्याची ती गोष्ट शिकून घेतो."


जर हे इमर्सनसाठी खरे असेल तर तुमच्या माझ्या बाबतीत तर ते हजार पटीने जास्त खरे आहे.आम्ही आपल्या इच्छांबद्दल विचार करणे सोडायला हवे. आम्ही लबाडीला विसरायला हवे प्रामाणिकपणे खरी प्रशंसा करायला हवी,मनापासून स्तुती करायला व मुक्तकंठाने कौतुक करायला हवे. जर तुम्ही असे कराल तर तुम्हाला असे आढळून येईल,की लोक तुमच्या शब्दांना त्यांच्या आठवणींच्या तिजोरीत ठेवतील आणि आयुष्यभर त्यांना ते शब्द आठवत राहतील. तुम्ही जे म्हटलं ते तुम्ही विसरून जाल,पण ते मुळीच विसरणार नाहीत.


खरी स्तुती करण्याची सवय लावून घ्या.(समाप्त)

१९/१२/२५

लोकांशी अचूक व्यवहार असे करा.Deal with people correctly

अनेक विशेषज्ञांचे मत आहे,की महत्त्वपूर्ण होण्याची जाणीवच माणसांना वेडं करून सोडते यात जे लोक वेडे होतात ते वेडेपणातच,स्वप्नलोकात स्वतःला महत्त्वपूर्ण मानतात.ते स्वतःलाच महत्त्व देतात,जे त्यांना वास्तव जगात मिळत नाही.अमेरिकेत जितके मनोरुग्ण आहेत त्यांची संख्या इतर आजारांनी पीडित असलेल्या रुग्णांपेक्षा जास्त आहे.


वेडेपणाचे कारण काय असते? या प्रश्नाचे कुणीही योग्य उत्तर देऊ शकणार नाही.पण आम्हाला हे नक्की माहीत आहे,की सिफीलिससारखा रोग मेंदूच्या पेशी नष्ट करतो आणि याचा परिणाम म्हणजेच वेडेपणा असतो.खरे तर जवळपास अर्धे मानसिक रोग शारीरिक कारणांनी होतात.उदा.मानसिक आघात,

दारु,मादक किंवा विषारी पदार्थ आणि अपघात;पण उरलेले अर्धे आयुष्य हा या कहाणीचा सर्वांत भयंकर हिस्सा आहे - उरलेल्या अर्धवेड्या लोकांच्या मेंदूच्या पेशींमध्ये कुठलीच शारीरिक गडबड झालेली नसते.पोस्टमॉर्टेम परीक्षणांमध्ये जेव्हा मरणाऱ्या रुग्णांच्या मेंदूच्या पेशी मायक्रोस्कोपखाली बघितल्या गेल्या तेव्हा त्या तेवढ्याच निरोगी होत्या जेवढ्या तुमच्या-माझ्या असतात.


मग हे लोक वेडे का होतात ?


मी हा प्रश्न चार प्रमुख मनोचिकित्सालयातल्या एका प्रमुखाला विचारला.या प्रमुखाला आपल्या विषयातल्या ज्ञानासाठी अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले होते. त्याने स्पष्टपणे मला सांगितले की,लोक वेडे का होतात हे त्यालां माहिती नाही.कुणीच याचे पूर्णपणे कारण जाणत नाही.परंतु तो असेही म्हणाला,की जे लोक वेडे होतात त्यांच्यापैकी बरेचजण वेडेपणाच्या अवस्थेत त्या महत्त्वपूर्ण भावनेचा अनुभव घेतात,जी त्यांना वास्तव जगात मिळत नाही.या तज्ज्ञाने मला एक कहाणी ऐकवली-


"माझ्या एका स्त्री रुग्णाच्या विवाहाचा दुःखद अंत झाला होता.तिला प्रेम,शारीरिक समाधान,मुले आणि सामाजिक प्रतिष्ठा हवी होती.पण जीवनाने तिच्या या आशांवर पाणी फिरवले.तिचा पती तिच्यावर प्रेम करीत नव्हता.तो तिच्याबरोबर जेवणसुद्धा करीत नसे.तिला त्याचे जेवण वरच्या मजल्यावरच्या त्याच्या खोलीत वाढायला सांगत असे.त्यांना मुलेबाळे नव्हती आणि तिला सामाजिक प्रतिष्ठाही नव्हती.ती वेडी झाली आणि आपल्या कल्पनेत तिने आपल्या पतीला घटस्फोट दिला आणि पुन्हा एकदा आपल्या लग्नाआधीचे नाव लावायला लागली.तिला आता असे वाटतेय,की ती एका श्रीमंत माणसाची पत्नी झाली आहे आणि ती स्वतःला इतरांनी लेडी स्मिथ म्हणावे असा आग्रह धरते.


मुलांबद्दल बोलायचं तर ती अशी कल्पना करते,की प्रत्येक रात्री ती एका नव्या बाळाला जन्म देते.जेव्हा मी तिला बघायला जातो तेव्हा ती म्हणते, 'डॉक्टर, काल रात्री मी एका बाळाला जन्म दिलाय.'

तिच्या भ्रमाचे जहाज वास्तवाच्या खडकावर आपटून चक्काचूर झाले आहे.पण वेडाच्या काल्पनिक प्रदेशात ती आपली स्वप्नं खरी करते आहे." हे दुःखदायी आहे का? मला माहीत नाही.तसे या डॉक्टरने असे पण म्हटले,"काश! मी तिचे वेड दूर करून एकवार पुन्हा तिची विचार करण्याची,समजण्याची शक्ती परत आणू शकलो असतो.पण कदाचित मी तसे केले नसते.ती आज जेवढी आनंदी / आहे तेवढी या आधी कधीच नव्हती."


जर अनेकजण महत्त्व मिळण्याच्या भावनेसाठी इतके भुकेले आहेत की ते त्यापायी खरोखरीच वेडे होऊ शकतात,तर जरा विचार करा की तुम्ही आणि मी आपल्या आसपासच्या लोकांची खरी प्रशंसा करून किती मोठा चमत्कार करू शकतो आणि किती तरी प्राप्त करू शकतो.


चार्ल्स श्वाब अमेरिकन उद्योगधंद्याच्या त्या पहिल्या व्यक्तींपैकी एक होते,ज्यांना एका वर्षात दहा लाख डॉलर्सपेक्षाही जास्त पगार (तेव्हा आयकर नसे आणि दरमहा ५० डॉलर्स कमावणारा माणूस श्रीमंत समजला जायचा) मिळत होता.त्यांना अँड्रयू कार्नेगीने १९२१ मध्ये युनायटेड स्टेटस् स्टील कंपनीचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आणि त्यावेळी श्वाबचे वय फक्त ३८ होते.(नंतर श्वाब यू.एस.स्टील सोडून गोत्यात आलेल्या बेथलेहम स्टील कंपनीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी तिला अमेरिकेतील सर्वाधिक लाभदायक कंपन्यांमधील एक बनवली).


कार्नेगीने चार्ल्स श्वाबला एका वर्षात दहा लाख डॉलर्स किंवा दररोज तीन हजार डॉलर्सपेक्षा अधिक पगार का दिला ? श्वाब अतिशय हुशार होते म्हणून? नाही.मग काय ते स्टील उद्योगातले सर्वांत मोठे माहीतगार होते म्हणून ? नाही.स्वतः श्वाबचे हे मानणे होते की त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या अनेक लोकांना त्यांच्यापेक्षा स्टील बनवण्याबद्दल जास्त ज्ञान होते.


श्वाब म्हणतात की त्यांना इतका जास्त पगार मिळण्याचे सर्वांत मोठे कारण हे होते,की ते लोकांबरोबर व्यवहार करण्याच्या कलेत निपुण होते.मी त्यांना हे कसे काय शक्य झाले असे विचारले.मी त्यांचे रहस्य त्यांच्याच शब्दात सांगतो.असे शब्द,जे सुवर्णाक्षरात लिहून प्रत्येक शाळा, घर, दुकान आणि ऑफिसात टांगून ठेवायला हवेत. असे शब्द जे मुलांनी पाठ करून टाकायला हवेत. जे जीवनात कधीही कामी येणार नाहीत असे ग्रामर किंवा ब्राझीलचे वार्षिक पर्जन्यमान पाठ करण्यापेक्षा, तुमचे व माझे जीवन आमूलाग्र बदलून जाईल असे ते शब्द…


असे आहेत श्वाब यांचे शब्द...


"मी मानतो की माझी सर्वांत मोठी हातोटी आपल्या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्याची कला आहे आणि स्तुती व प्रोत्साहनाद्वारे लोकांकडून सर्वोत्तम काम मी करवून घेतो.वरिष्ठांच्या टीकेपेक्षा या जगात दुसरी कुठलीच गोष्ट अशी नाही जी कोणाच्याही महत्त्वाकांक्षेला पायदळी तुडवू शकेल.मी कधीच कुणाची निंदा करीत नाही.मी प्रोत्साहन देण्यावर विश्वास ठेवतो जेणेकरून कर्मचारी काम करायला प्रेरित होतील.म्हणूनच मी स्तुती करायला तत्पर असतो आणि चूक काढण्यात कंजूषी करतो.जर मला एखादी गोष्ट पसंत पडली तर मी मनापासून तारीफ करतो आणि मुक्त कंठाने प्रशंसा करतो."


तर श्वाब असे करीत.पण सामान्य लोक काय करतात? अगदी याच्या उलट.जर त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही तर ते आपल्या कर्मचाऱ्यांवर तोंडसुख घेतात.जर त्यांना एखादी गोष्ट आवडली तर मात्र ते त्याबद्दल काहीही बोलत नाहीत.एक जुनी म्हण आहे : "मी एक चुकीचे काम केले,ज्यासाठी मला नेहमीच दोष दिला गेला.मी दोनदा चांगले काम केले, परंतु त्याबद्दल मला कधीच कुणी ऐकवले नाही."


श्वाबचे म्हणणे होते,"जीवनाच्या माझ्या दीर्घ प्रवासात मी जगातल्या अनेक देशांच्या महान व्यक्तींना भेटलो आहे.आजपर्यंत अशी व्यक्ती भेटली नाही,मग ती कितीही उच्च पदावर असेल,जी टीकेऐवजी स्तुतीच्या वातावरणात जास्त चांगले काम करू शकत नसेल."श्वाबच्या मते अँड्रयु कार्नेगीच्या अपूर्व यशाच्या प्रमुख कारणांपैकी हे एक कारण होते.कार्नेगी आपल्या सहकाऱ्यांची समूहात,तसेच खासगीमध्येही नेहमी प्रशंसा करत.


कानेंगी तर आपल्या कबरीच्या दगडावरसुध्दा आपल्या कर्मचाऱ्यांची तारीफ करणे विसरले नाहीत.त्यांनी स्वतःसाठी हा स्मृतिलेख लिहून ठेवला होता-"इथे तो मनुष्य झोपला आहे जो जाणत होता की आपल्यापेक्षा जास्त समजदार लोकांना आपल्या आसपास कसे एकत्रित करायचे."प्रामाणिक प्रशंसेचं हेच ते रहस्य,ज्यामुळे जॉन रॉकफेलर इतके यशस्वी झाले.जेव्हा त्यांचे भागीदार एडवर्ड टी.बेडफोर्ड यांच्यामुळे दक्षिण अमेरिकेच्या एका करारामध्ये कंपनीला ४० टक्के नुकसान झाले,तेव्हा रॉकफेलर त्यांच्यावर टीका करू शकत होते.पण ते जाणत होते की बेडफोर्डने त्यांच्याकडून पूर्ण प्रयत्न केला होता.तसेही आता नुकसान तर झालेच होते.म्हणून रॉकफेलरने त्यांचे अभिनंदन करण्याचे कारण शोधूनच काढले.त्यांनी बेडफोर्डचे अभिनंदन करताना म्हटले,"तुम्ही खर्चाची ६० टक्के रक्कम तर वाचवली,हे फार चांगले झाले," पुढे असेही म्हणाले,"आपण आपल्या मेंदूचा वापर नेहमीच इतक्या चांगल्या तन्हेने करू शकत नाही."


आता मी एक कहाणी सांगणार आहे,ज्यात सत्य नक्कीच दडलेले आहे.


"एका खेडुत स्त्रीने दिवसभर काबाडकष्ट करून आपल्या परिवारासमोर जेवणाऐवजी लाकडाचा भुसा ठेवून दिला.जेव्हा पती व मुलांनी या अजब प्रकाराचे कारण विचारले,तेव्हा त्या स्त्रीने उत्तर दिले,"मला वाटलं की तुमचं लक्ष याकडे जातच नाही की तुमच्यासमोर जेवण ठेवलं जातं की भुसा.गेली वीस वर्षे मी तुम्हा लोकांसाठी जेवण बनवते आहे पण तुम्ही मला कधी सांगितलं नाही की तुम्ही भुसा खात आहात."


घरातून पळून गेलेल्या महिलांबाबत काही काळापूर्वी संशोधन झाले.पळून जाण्यामागचे कारण होते 'प्रशंसेचा अभाव' आणि मी पैज लावतो,की हेच कारण घरातून पळून जाणाऱ्या नवऱ्यांचेही असणार! आम्ही बहुतेक वेळा आपल्या जोडीदाराला हे सांगायची तसदीच घेत नाही की आम्ही त्याच्या/तिच्यामुळे प्रभावित आहोत म्हणून.माझ्या वर्गात एका सदस्याने आपल्या जीवनातली एक घटना ऐकवली ज्यामध्ये त्याच्या पत्नीने त्याच्यापाशी एक आग्रह धरला होता.त्याची पत्नी व अन्य महिला चर्चमध्ये एका आत्मसुधार कार्यक्रमात सामील झाल्या.एक दिवस त्याच्या पत्नीने त्याला तिच्यातले सहा दोष काढायला सांगितले,जे सुधारल्याने ती अधिक चांगली पत्नी होऊ शकेल. 


तिचा पती हे ऐकून हैराण झाला.तो म्हणाला, "पत्नीच्या अशा आग्रहाने मी आचंबित झालो.खरे पाहिले तर मी सहज तिच्या हातात तिच्यातल्या दोषांची यादी देऊ शकलो असतो,ज्यामध्ये सुधारणेची गरज होती.ईश्वर जाणतो की तीसुध्दा अशा हजार गोष्टींची यादी माझ्या हातात देऊ शकली असती ज्यांमध्ये मला सुधारणेची आवश्यकता होती;पण मी असे केले नाही.मी तिला म्हटलं,"मला याबाबत विचार करायला वेळ दे.मी उद्या सकाळी तुला याचे उत्तर देईन."


दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो आणि फुलवाल्याला फोन करून माझ्या पत्नीसाठी सहा गुलाबांच्या फुलांचा नजराणा पाठवायला सांगितला. सोबत एक चिठ्ठी होती,"मला तुझे सहा दोष माहीत नाहीत,जे सुधारण्याची गरज आहे.तू जशी आहेस तशीच मला फार आवडतेस."


त्या संध्याकाळी जेव्हा मी घरी परतलो तेव्हा तुम्ही सांगू शकाल का की दरवाजात माझं स्वागत कुणी केलं? अगदी बरोबर ! माझ्या पत्नीने ! तिच्या डोळ्यांत अश्रू भरले होते. हे …! अपुर्ण