सकाळ उजाडली,तेव्हा गोठवणारी थंडी आणि जागरण यामुळे मी आणि ती बकरीही पार थकून गेलो होतो.
आदल्या दिवशी ती बकरी एवढी ओरडली होती,की आता तिच्या घशातून आवाजच फुटत नव्हता.दुपारी दोन तास मी वाघिणीचा शोध घेण्यात घालवले,पण ते व्यर्थ ठरले.त्यानंतर मी आजूबाजूला कुठे चढ नाही ना हे पाहिलं,मग एक जरा पानांनी जास्त डवरलेलं झाड निवडून त्यावर माझं मचाण बांधलं,आणि दुपारी चार वाजता मी वर चढलो.ह्यावेळी मी दुसरी बकरी बांधली होती,पण ही आदल्या रात्री बांधलेल्या बकरीच्या अगदी विरुद्ध होती.जसे तिला बांधून लोक गेले,तशी ती खाली बसून निवांतपणे रवंथ करू लागली.ह्या रात्री मी व्यवस्थित गरम कपडे आणले होते. मध्यरात्रीनंतर मी अंगाभोवती छान ब्लॅकेट गुंडाळलं आणि मला इतकी मस्त झोप लागली,की थेट पहाटेच जाग आली.मी खाली बकरीकडे नजर टाकली;तर ती तेव्हाही काहीतरी चघळत एवढी निवांत बसली होती की,जगात जणू एकही शिकारी प्राणी नाही.मी दुपारी पुन्हा एकदा वाघिणीचा शोध घेतला,पुन्हा माझ्या पदरी निराशाच पडली.दुपारी तीन वाजता मी परत मचाणावर चढलो.ह्या वेळी आमिष म्हणून मी एक जवान बैल बांधला होता.
संध्याकाळचे सात वाजले.अंधार पडू लागला होता,तेव्हा अनपेक्षितपणे गावकऱ्यांचा एक घोळका हातात कंदील घेऊन आला आणि वाघिणीनं अर्ध्या तासापूर्वी एका छोट्या तलावाच्या भिंतीशी एक गाय मारल्याची व ती तिला खात बसल्याची खबर मला दिली.हे ठिकाण विरुद्ध दिशेला गावाच्या पलीकडे फर्लांगभर अंतरावर होतं.आता मचाणावर बसण्यात काहीच अर्थ नव्हता.मी मचाणावरून खाली उतरलो.तिथे बांधलेल्या बैलाला तसेच ठेवून मी गावकऱ्यांसोबत निघालो.गावापाशी पोहोचल्यावर मी त्यांना कंदील विझवायला सांगितले आणि त्यांच्यापैकी फक्त एकाला घेऊन मी त्या तलावाकडे निघालो.ती गाय रस्त्याच्या डाव्या बाजूला गावापासून एक फर्लांगावर आणि रस्त्यापासून पन्नास यार्डावर आहे,असं मला सांगण्यात आलं होतं.आता पूर्ण अंधार पडला होता.तो गावकरी माझ्यामागून येत होता.आम्ही रस्त्याच्या मधून चालत होतो.मी रायफलच्या नळीवर बसवलेला टॉर्च पेटवला आणि तो माझ्या डाव्या बाजूला फिरवू लागलो.
लगेचच गुरगुराट ऐकू आला आणि लालपांढरे डोळे चमकले.माझ्या अंदाजानं ते अंतर दोनशे यार्डाच्याही आतच होतं.डोळे चमकले,ते ठिकाण थोडं उंचावर होतं,असं कसं? मला प्रश्न पडला,परंतु मागून त्या गावकऱ्यानं माझ्या कानाशी लागत,वाघीण तलावाच्या भिंतीवर उभी असल्याचं सांगितलं.माझ्या बुटांचा तळ रबरी होता आणि तो गावकरी अनवाणी होता,त्यामुळे आम्ही चालताना आवाज येत नव्हता.वाघीण टॉर्चच्या झोताकडे पाहात उभी होती.आम्ही चालत पुढे जात राहिलो.इथे तलावाची भिंत येऊन रस्त्याला मिळत होती. आम्ही डावीकडे वळून एक चढ चढत,भिंतीवर आलो.
वाघीण आता गुरगुरू लागली.मी थांबून रायफल उचलायच्या बेतातच होतो,तेवढ्यात त्या वाघिणीचं अवसान गळालं आणि ती भिंतीवरून चारपाच झेपा घेत,तलावाच्या बाजूला खाली उतरली आणि दिसेनाशी झाली.त्यानंतर आम्ही भिंतीवरून चालत,आजूबाजूच्या झुडुपांवर टॉर्चचे झोत टाकत पुढे गेलो.तिथे आम्हाला मोठ्ठे वडाचं एक झाड दिसलं आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या फांद्यांमधून त्या वाघिणीचे डोळे लकाकले.हे एक मोठं नवल होतं.कारण वाघ सहसा झाडावर चढत नाहीत आणि एवढ्या उंचावर तर नक्कीच नाही.ती एवढ्या वर होती,तरी आम्ही भिंतींवर असल्यानं आम्ही समपातळीत आणि समोरासमोर होतो.मला फांद्यांच्या दुबेळक्यात बसलेली वाघीण स्पष्ट दिसत होती.मी काळजीपूर्वक नेम धरून चमकणाऱ्या त्या दोन डोळ्यांच्या मधोमध गोळी झाडली.'धप्प'असा आवाज करत ती वाघीण खाली कोसळली.तिनं एकदा घरघर केली,पण नंतर मात्र शांतता पसरली.माझ्या गोळीनं त्या वाघिणीचा वेध घेतल्याचं पाहून मी गावात जाऊन जरा झोप काढून सकाळी परत यायचं ठरवलं आणि आम्ही गावात आलो.तिथून मैलभर पुढे जिथे तो बैल बांधला होता,तिथे उभी केलेली माझी गाडी घेतली आणि तुमकूरला आलो.तिथे थोडंसं खाल्लं,त्यावर कडक चहा प्यायला,माझा पाईप भरून धूम्रपान केलं आणि सकाळी उठून त्या मेलेल्या वाघिणीला घेऊन यायचं ठरवून मस्त झोपी गेलो.सकाळी दिवस उजाडला,तसा मी परत गावात दाखल झालो.आदल्या दिवशी माझ्याबरोबर असलेल्या साथीदाराला घेतलं आणि त्या तलावाच्या भिंतीवरून जाऊन सावधपणे उतरत,ज्या वडाच्या झाडावर बसलेल्या वाघिणीला मी गोळी घातली होती,त्या झाडाशी गेलो.
वाघीण जिथे झाडावरून खाली पडली होती,तिथे रक्ताचा सडा पडला होता.तिथे आम्हाला साधारण एक चौरस इंचाचा हाडाचा तुकडा मिळाला.त्या हाडात मी झाडलेल्या गोळीतल्या शिशाचा एक तुकडाही घुसलेला दिसला.झाडाच्या बुंध्यावर झालेल्या धारदार नखांच्या खुणा बघून हे वजनदार जनावर झाडावर कसं चढलं असेल,याची कल्पना येत होती.माझा जोडीदार वर चढला,त्याला फांद्यांच्या दुबेळक्यात काही रक्ताचे थेंब दिसले.त्यानंतर आम्ही अत्यंत सावधगिरी बाळगत वडाच्या झाडापासून सुरू झालेल्या रक्ताच्या मागावर निघालो.आमच्या लवकरच लक्षात आलं की,वाघिणीच्या डोक्यात गोळी लागली आहे आणि ती चांगलीच जखमी अवस्थेत आहे.तो रक्ताचा मागही वेडावाकडा,कधी एकात एक मिसळलेला,कधी गोलाकार - असा होता.आपण कुठे जातोय हेही तिला नीटसं कळत नाही आहे असं दिसत होतं.आम्हाला बरेच ठिकाणी रक्ताची थारोळी दिसली.बहुधा विश्रांती घ्यायला वाघीण तिथे पहुडली असावी,तिथून पुढच्या दाट झुडुपाच्या पट्याच्या दिशेला आम्हाला रक्ताचा एखाददुसरा थेंब पडलेला सापडत होता.प्रथम आम्ही त्या झुडुपांच्या पट्याभोवती फिरून पार दोनशे यार्डावर असलेल्या भिंतीपर्यंत जाऊन तपास केला पण आम्हाला कुठेच रक्त सांडलेलं दिसलं नाही.हा दाट झुडुपांचा पट्टा दोनशे यार्ड लांब व साधारण सत्तर यार्ड ते दहा यार्ड अशा कमीजास्त रुंदीचा होता.वाघीण खात्रीनं या पट्यातच होती.पण ती जिवंत आहे का मेली होती,हे कळायला मार्ग नव्हता.ज्या ठिकाणी आम्हाला ती वाघीण या झुडुपांच्या दाटीत शिरताना सांडलेल्या रक्ताचे थेंब दिसले होते,तिथे आम्ही परत आलो आणि त्या झुडुपांच्या दाटीत दगड फेकू लागलो.पण तिथे संपूर्ण शांतता नांदत होती.आम्ही त्या झुडुपांच्या कडेनं तसेच पुढे पुढे जात राहिलो.मी त्या गचपणात पाच गोळ्याही झाडल्या,पण आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.आम्ही पाऊणएक लांबी पार केली.तिथे झुडुपांच्या वर बारा फूट उंच वाढलेलं एक झाड आम्हाला दिसलं.आजूबाजूला टेहळणी करावी, म्हणून माझा साथीदार जाऊन झाडावर चढू लागला तेव्हा अचानक एक डरकाळी फोडत ती वाघीण त्याच्या मागे आली.त्या माणसानं घाबरून किंकाळी फोडली,तेव्हा मी तिथून जेमतेम वीस यार्डावर होतो.मी एकापाठोपाठ एक तीन गोळ्या तिच्यावर झाडल्या,तशी ती मागच्यामागे कोसळली.सरतेशेवटी वाघिणीचा अंत झाला होता.
मी नंतर तिला जेव्हा तपासलं,तेव्हा मला दिसलं की त्या वाघिणीचे सुळे बोथट झाले होते,त्यामुळे ती मनुष्यवस्तीजवळ राहून मारायला सोपे अशा कुत्री,बकऱ्या व गाईगुरांवर गुजराण करत होती.
मनुष्यप्राण्यांबद्दल एकीकडे वाटणारी भीती व दुसरीकडे वाटणारा तिरस्कार यामुळेच केवळ ती नरभक्षक झाली नव्हती; परंतु ती वेळीच मारली गेली नसती,तर आज ना उद्या ती नक्कीच नरभक्षक झाली असती.भूक आणि वय यामुळे ती एवढी माथेफिरू आणि हिंसक झाली होती की काय कोण जाणे.
दरम्यान माझी अगदी पहिली गोळी त्या वाघिणीच्या नाकाच्या हाडाच्या थोडी वर लागली होती,त्यानेच उडालेल्या हाडाचा तुकडा आम्हाला झाडाखाली मिळाला होता.म्हणजे मी झाडलेली गोळी तिच्या डोक्यात पुरेशी घुसली नव्हती, म्हणूनच एव्हढा रक्तस्त्राव होऊनही ही वाघीण जिवंत राहिली असावी.माझा साथीदार झाडावर चढताना ती त्याच्यावर धावून गेली नसती.तर तिला मारता येणं अजूनच अवघड झालं असतं.
२३ मार्च २०२३ या कथेतील पुढील व शेवटचा भाग.. समाप्त