* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: बोधकथा - क्षमा

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२१/३/२३

बोधकथा - क्षमा

नाशिकला आमच्या बागेत अनेक प्रकारच्या जास्वंदी फुललेल्या होत्या.रस्त्याने जाणारा-येणारा थोडावेळ थबकून त्यांच्या कडे न बघता गेला असं कधी होत नव्हतं.श्रावण महिना होता.माझ्या दारा समोरच पिवळ्या रंगाची पण आत लालसर –(गर्द गुलाबी) रंगाचा चांदवा असलेली जास्वंद खूप बहरली होती.साधारण दहा बारा फुट उंचीचे झाले होते ते झाड.रोज किमान ५६-६० हून अधिक फुले झाडावर असायची.फार लाडकी जास्वंद होती ती माझी.तिने शेजारच्या सोनार काकांच्या बागेत अतिक्रमण करायला कधी सुरवात केली,समजलंच नाही.तिच्या फांद्या त्यांच्या बागेत जरा जास्तच पसरायला लागल्या. झाडाची फुले कोमेजून दुसऱ्या दिवशी खाली पडून त्याचा खूप कचरा व्हायचा.कोमेजलेल्या फुलांवर असंख्य चिलटे बसायची.ती मग दिवस भर घरात देखील फिरायची.कोमेजल्यावर फुले चिकट होत.त्यावर चुकून पाय पडलाच तर पाय सटकून माणूस खाली पडायची पण शक्यता असायची.शेजारचे सोनार काका मला रोज सांगत,"अगं भारती,आमच्या बागेत आलेल्या या जास्वंदीच्या फांद्या कापून टाक बरं.मला त्रास होतो त्याचा." मला त्यांचा त्रागा समजत असे. पण त्या फांद्यांवरच्या असंख्य कळ्या पाहिल्या की मी त्यांना प्रॉमिस करायची," काका, एवढ्या कळ्यांची फुले होऊन जाऊ देत ना.काही दिवसांनी असाही त्याचा बहर कमी होईल.


मग कापतेच मी त्याच्या फांद्या.चालेल ना ?" "ठीक आहे.पण लवकर काप.मी पडलो पाय घसरून तर ?" इति काका.

"हो, हो, लवकरच कापीन मी फांद्या.प्रॉमिस काका !" माझे ठरलेलं उत्तर एके दिवशी मी ऑफिसमधून घरी परतले तर काका बाहेरच उभे."त्या फांद्या आत्ताच्या आत्ता काप,फार दिवसापासून ऐकतोय तुझं,आज कापते-उद्या कापते.आज आत्ता माझ्या समोर काप फांद्या."एरवी अत्यंत प्रेमळ असे सोनार काका त्यादिवशी इतके का संतापले होते मलाही समजलं नाही.माझाही राग जरा अनावर झाला.घरात जाऊन मी झाडे कापायची कात्री आणि चांगला धारदार कोयता आणला.फक्त  त्यांच्या बागेतल्याच नाही तर माझ्याही बागेतल्या  जास्वंदीच्या झाडाच्या फांद्या कापल्या.दहा बारा फुट उंचीचे ते झाड मी अगदी अडीच तीन फुटी करून टाकलं.कंपाऊंड वॉलच्या पलीकडून सुद्धा ते आता काकांना दिसणार नव्हतं.

ती माझी कृती म्हणजे राग अनावर झाला की  माणूस किती विकृतपणे वागतो याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं.पश्चाताप तर लगेचच झाला.पण आता पश्चाताप करून काही उपयोग पण नव्हता.त्या फांद्या पुन्हा थोडीच जोडता येणार होत्या ? त्या रात्री जेवलेही नाही आणि झोपलेही नाही.पावसाचे दिवस होते.झाड पुन्हा भराभर वाढलं.आश्चर्य म्हणजे एकही फांदी सोनार काकांच्या बागेच्या दिशेने वाढली नाही.पुन्हा दहा -बारा फुट झाड वाढलं.पाने हिरवीकंच आणि टवटवीत.पण फूल मात्र एकही नाही.त्याच्या आसपासच्या झाडांवर असंख्य फुले पण याला मात्र एकही नाही.खतं-औषधे सर्व काही प्रयोग झाले.सहा महिने उलटले आणि माझी अस्वस्थता वाढली.

काय करू मी ? सोनार काकांना पण ही घटना सांगितली.

त्यांनाही खूप वाईट वाटलं.एक दिवस कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सरस्वती दीदी यांचा फोन आला.त्यांनी वयाची पंच्याहत्तरी गाठली होती.

झाडा झुडपांची आणि बागेची सरस्वती दिदीना खूप आवड होती. कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर -अगदी समुद्राच्या रेतीत सुंदर असे Beach Garden त्यांनी बनवलेले मी पाहिले होते.झाडांवरचे त्यांचे प्रेमही मला ठाऊक होते.त्यांचा फोन येताच मी जास्वंदीच्या झाडाची कथा अगदी अथपासून त्यांना सांगितली.'दीदी,त्या झाडाला आता कुठलं खत घालू म्हणजे त्याला पुन्हा छान फुले येतील?" मी अक्षरश: रडवेली झाले होते.


"There is no need for any fertilizer. Did you say sorry to that plant Bharati ? And say it honestly till it responds to you."  


"काय ? झाडाला सॉरी म्हणू ?" खरं तर डॉ जगदीश चंद्र बोस यांनी लावलेले वनस्पतींच्या बाबतीतले सर्व शोध माहीत होते.वनस्पतींना भावना असतात,ते प्रतिक्रिया व्यक्त करतात वगैरे. Secret of plants सारखी अनेक पुस्तकेही वाचली होती.पण प्रत्यक्षात आपल्याला स्वत:ला असा काही अनुभव येईल असा कधी विचारही मनात आला नव्हता. सरस्वती दिदी पुढे म्हणाल्या की अगदी रोज ठराविक वेळेला क्षमा मागायची.झाडाला कुरवाळायचं,इतरही गप्पा मारायच्या,झाडाची क्षमा मागण्याचा माझा दैनिक कार्यक्रम सुरू झाला.

पहिल्या दिवशी थोडं कृत्रिम वाटलं पण जसजसे दिवस वाढत गेले,एक व्याकुळता माझ्या बोलण्यात - स्पर्शात आपोआपच यायला लागली. 

 जास्वंदीशी बोलणं,तिला कुरवाळणं मलाही आवडायला लागलं.तिला फुले कधी येतील या उत्सुकतेपेक्षा आमच्या दोघींमध्ये एक वेगळं नातं तयार झालं ते मला अधिक महत्त्वाचं वाटलं.दहा-बारा दिवस होऊन गेले.एके दिवशी सकाळी जास्वंदीच्या पानामागे एक कळी लपून बसलेली दिसली.जणू म्हणत होती,"शोध मला.बघ मी आलेय.

"आनंद गगनात मावेना म्हणजे काय असतं ते प्रत्यक्ष अनुभवलं. पण थोडा वेळच. शेवटी मन शंकेखोर.हा निव्वळ योगायोग तर नाही ? पण चार दिवसातच जास्वंदी कळ्यांनी  पानोपान बहरली.फुलेही उमलू लागली.मग मात्र खात्री पटली की जास्वंदीने मला खरोखर क्षमा केली आहे.पहिला फोन सरस्वती दीदींना केला.  माझ्या या आनंदात त्यांच्या इतकं दुसरं कोण सामील होऊ शकलं असतं?त्या दिवशी जास्वंदीशी हितगुज करताना मी म्हणाले,"आता जन्मात कधी मी असे वागणार नाही. पण तू सुद्धा माझ्याशी पुन्हा कधी कट्टी घ्यायची नाही बरं का!"


भारती ठाकूर 

नर्मदालय,

लेपा पुनर्वास (बैरागढ)

जिल्हा खरगोन 

मध्य प्रदेश..