* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२७/१२/२२

जगणं सुंदर आहे हे सांगणारं,व मृत्यूवर प्रेम करायला लावणारं जिवाभावाचं पुस्तक...!

मृत्यू सुंदर आहे?


मृत्यू फक्त नकारच नाही. मृत्यू त्यापेक्षा भरपूर काही आहे,हे कधी तरी समजून घ्यावं लागेल !


मृत्यूला सुंदर म्हणता येईल? त्याला सुंदर करता येईल?


हे प्रश्न तसे अवघडच. पण ते आपणाला आपल्या हृदयावर झेलावे लागतीलच! हे प्रश्न गडद करण्यापेक्षा त्यांच्या उत्तरासाठी सुरुवात तर करावी लागेल !


हे पुस्तक कदाचित निर्णायक उत्तर देणार नाही,पण निर्धारक सुरुवात मात्र निश्चितच करेल.


 हे पुस्तक मृत्यू मांडते,जगणंही मांडते.


भयमुक्त मृत्यूसाठी मृत्यूसाक्षरता,मृत्यूजागरूकता आवश्यक असते.ह्या पुस्तकाचा जन्म खरं तर त्या दिशेने चालण्यासाठी आहे,एवढे मात्र निश्चितच या पुस्तकाबाबत सांगता येईल."मराठीतले या विषयावर हे पहिले वहिले पुस्तक...!


या पुस्तकातील शेवटाचे मलपृष्ठ जगण्याबाबत सांगणार व त्याचबरोबर न चुकता मृत्यू ही आनंदी करणारं..!


मी लहान असताना एका इमारतीचे बांधकाम सुरू होते.या इमारतीवर काम करणार्‍या मजुरांची लहान लहान मुले दररोज सकाळी जरा लवकरच आगगाडीचा खेळ खेळायची त्या खेळाचा आवाज यायचा,सिग्नल देण्याचा आवाजही न चुकता जोडीला असायाचा.असा हा खेळ दररोजच रंगात यायचा.या खेळाचं निरीक्षण एक चिकिस्तक व्यक्ती करत होते.सात दिवस त्यांनी हा खेळ पाहिला आठव्या दिवशी ते त्या मुलांना भेटायला गेले.तर या खेळामध्ये बदल व्हायचे.तो बदल म्हणजे आज जो मुलगा डब्बा आहे.तो उद्या इंजिन व्हायचा प्रत्येक मुलगा आळीपाळीने इंजिन व्हायचा पण एकच मुलगा असा होता जो डब्बा होता नव्हता आणि इंजिनही होत नव्हता.तो नेहमीच सिग्नल माणुस असायचा.ती व्यक्ती या सिग्नल मुलग्या जवळ गेली व त्यांनी त्याला प्रश्न विचारला. 'बाळ तू सोडून बाकी सर्व मुले आळीपाळीने रेल्वेचा डब्बा व इंजिन बनतात.तुला डबा किंवा इंजिन बनायला आवडत नाही का ?' त्या मुलाने जीवन जगण्याचे एक तत्व सांगितले.तो मुलगा म्हणाला," 


रेल्वेचा डबा किंवा इंजिन बनण्यासाठी अंगामध्ये शर्ट असावा लागतो.त्या शर्टाला धरूनच इंजिन किंवा डबा होता येत.आणि माझ्याकडे शर्टचं नाही?" 


हे उत्तर देताना त्याचे डोळे लकाकले व तो नम्रपणे म्हणाला,माझ्याकडे शर्ट नाही पण या खेळातील सर्व आनंद घेतो.कारण माझ्या परवानगीशिवाय संपूर्ण आगगाडी जाग्यावरुन हलूच शकत नाही.उद्या माझ्याकडे भरपूर शर्ट असतील पण तरीही मी सिग्नल माणूसच होणार.कारण हे मला मनापासून आवडतं हे उत्तर ऐकून त्या व्यक्तींने त्याचे आभार मानले .


प्रत्येकाचे लहानपणं हे संघर्षातून जात असते. त्यातूनच जीवन जगण्याची उर्मी जागृत होते.जीवनावर श्रद्धा बसते.मग आपण या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करतो.


कष्ट करून घाम गाळून जीवनामध्ये उभं राहावं लागतं.शारीरिक कष्टाचे कामे करीत असताना.दम लागतो,वेदना होतात.तरीही आपण जीवन आनंदी जगण्याचा प्रयत्न करतो.


अशी काम करत असताना आपला श्वास या भूतलावरील सर्वात मूल्यवान श्वास आहे याची कधी जाणीव झालीच नाही.


परवा मृत्यू सुंदर आहे? या पुस्तकाचे लेखक आदरणीय डॉ.रवींद्र श्रावस्ती यांना भेटण्याचा व यांच्याशी बोलण्याचा योग आला.आमच्या भेटीतून संवादातून जीवन,

जीवनातील हेतू,आपलं या पृथ्वीतलावरील स्थान,अशा गहन व जटिल जीवनातील चढ उतारांवर चर्चा झाली.


 या चर्चेतून डॉक्टर साहेबांनी केलेला अभ्यास, चिंतन-मनन,स्वतःला स्वतःकडून नियंत्रित करणारे व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडे आकर्षित झालो. 


धीर गंभीर नेहमीच शुन्यामध्ये विचार करणारे पण प्रेमाने सोबत घेऊन सत्य सांगणारे,व्यक्तीच्या सोबत जाणारे त्याला कधीही एकटे न सोडणारी ही व्यक्ती मला जगावेगळी वाटली.यावेळी त्यांनी मला मृत्यू सुंदर आहे? हे पुस्तक प्रेमपूर्वक भेट स्वरूप दिले.


जन्माला आल्यानंतर एक ना एक दिवस आपण मरणारच हे मी लहानपणापासून ऐकत आलो आणि वाचत आलो.एखादी मनाविरुद्ध गोष्ट घडली.दुःखद प्रसंग घडला.शारीरिक वेदना वाढली. तरी या सर्वातून सुटका होण्यासाठी अस्वस्थतेतून मरण आलं तर बरं होईल.असं काही वेळा सुद्धा बोललं जातं.मृत्यू न समजून घेता यावर भाष्य केलं जातं.


बऱ्याच महिन्यापूर्वी मला निमोनिया झाला होता.शारीरिक दुःख, रक्तदाब वाढलेला त्यात सोबत आसपास पाहिलेले जिवंत मृत्यू,झोप लागायची बंद झाली.आणि मीही मरणार ही भीती वाढीला लागली.यादरम्यान मी जगण्यापेक्षा मृत्यूचा विचार जास्त करायला लागलो.मी मेलो म्हणजे सगळंच संपलं.हताश झालो,बरा झालो घरी काही दिवस विश्रांती घेतली.कामावर रुजू झालो.पुन्हा मृत्यू चा विसर पडला. पुन्हा मागील पानावरील जीवन पुढील पानावर घेतले.पुस्तक वाचत होतो.जीवन पुन्हा नव्याने समजून घेत होतो.


मृत्यू सुंदर आहे हे पुस्तक वाचायला घेतले.या ठिकाणी बुद्ध म्हणाले,


तुम्ही स्वतः च स्वतःला शरण जा आणि स्वतः प्रज्ञा-व्दिप बना. कुणावरही विसंबून राहू नका.नाहीतर तुम्ही शोक आणि निराशा यांच्या भोवऱ्यात सापडाल. 


माझ्यासाठी हे पुस्तक हा विषय अतिशय वेगळा होता,चौकटीच्या बाहेर नेणारा होता,मृत्यूकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यास भाग पाडणारा हा वाचन प्रवास सुरू झाला होता.अतिशय उच्च कोटीचे तत्त्वज्ञान,सत्य शोधण्यासाठी केलेले प्रयास या सर्वांची मनापासून जाणीव होत होती.


मरण माझे मरोन गेले | मज केले अमर ||


पुसिले बुड पुसिले वोस | वोसले देहभाव ||


आला होता गेला पूर || धरिला धीर जीवनी ||


तुका म्हणे बुनादीचे | जाले साचे उजवणे ||


- तुकाराम ( तु.गा.२३३८)


वाचत असताना पुस्तक अवघड जात होते. वेळच्या वेळी लेखकांना फोन करून चर्चा करत होतो.डॉक्टर साहेब ही मनापासून मला समजेल अशा सोप्या भाषेत समजून सांगत होते.म्हणूनच हे पुस्तक समजून घेण्यामध्ये त्यांचे फार मोठे योगदान आहे त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.


शारीरिक इजा वेदना झाली की मला मृत्यू आठवायचा,पण हे पुस्तक वाचत असताना माझ्या मध्ये सूक्ष्म पण अमुलाग्र बदल होत होता.


पान नंबर ६७ व ६८ वाचत असताना डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.


चुंदाच्या घरी घेतलेल्या भोजनानंतर त्या रात्री बुद्धांच्या पोटात प्रचंड वेदना सुरू झाल्या. त्यामुळे त्या रात्री त्यांना शांत झोप येऊ शकली नाही. त्या रात्री ते तडफडत राहिले. त्या तशा अवस्थेतही त्यांनी कुशिनाराच्या दिशेने प्रवास सुरु केला.पोटात भयानक वेदनांचा महाकल्लोळ आणि त्यातच अतिसारामुळे शरीर कोरडे,शुष्क झालेले. त्यामुळे वाटेतच एका वृक्षाखाली विश्रांती घ्यावीच लागली.अतिसारामुळे शरीर कोरडे पडलेले; प्रचंड तहान लागलेली.त्यामुळे अस्वच्छ असलेले पाणी त्यांना प्यावे लागले. पाणी प्राशन केल्यानंतरही त्यांना थकवा जाणवत असल्यामुळे बुद्ध पुन्हा तिथे आडवे होतात.जीर्ण वस्त्र बदलण्यासाठी त्यांना आनंदचा आसरा घ्यावा लागतो.ही सर्व वर्णने त्यांच्या देहाला किती पीडा होत होती, त्याची साक्ष देतात.


त्या तशा अवस्थेतही ककुथ नदीवर ते स्नान करतात आणि पुन्हा पाणी पिऊन घेतात. त्यानंतर त्यांना पुन्हा विश्रांती घ्यावी लागते. या सर्व गोष्टींचा पुन्हा उल्लेख करायचे कारण म्हणजे शरीर आजारी असताना,तेही अतिसाराने,बुद्ध प्रचंड पायपीट करतात.

यातनांनी,वेदनांनी शरीर पोखरले असतानाही समस्त लोकांवरील अमाप मायेपोटी महाकरूणेपोटी त्यांना 'देशना' देत राहतात. आयुष्याचे शेवटचे काही क्षण शिल्लक असताना ते हे करतात हे विशेष महत्त्वाचे !


एकमेकांत गुंतलेली ही दृश्य,नजरेसमोरून हटणार नाहीत ही दृश्ये;त्यांना क्रमांकही देता येणार असे क्षण,प्रचंड घालमेलीचे पण तसेच मनाला सुंदर बनवणारे क्षण ! एकाच वेळी आनंद आणि दुःख देणारे महाक्षण !


... बुद्धांच्या आयुष्याची सायंकाळ आणि त्या वेळी त्या आसमंतात उभी ठाकलेली सायंकाळ.कुशीनाराच्या सुंदर मनात,फुललेल्या त्या दोन साल वृक्षांच्यामध्ये वेदनांनी घायाळ होऊन सुद्धा,शरीर शुष्क होऊन गेलयं तरी,

मुखावरचे मंदस्मित पांघरलेला बुद्ध नजरेसमोरुन हटत नाही.सोबत संपत चाललेले आयुष्य आणि कोमजते शरीर यांच्या साथीने बुद्ध त्या सालवृक्षाखाली बहरत चाललेत. ते बहरणे शरीराचे की मनाचे ? माहित नाही. कदाचित ते बहरणे दोन्हीचेही.


बुद्ध नावाच्या दृष्टीला आणि द्रष्ट्याला वसंत ऋतु येण्यापूर्वीच साल वृक्ष बहरलेले दिसतात. त्या साल वृक्षांच्या पाकळ्या तथागत आणि भिक्खुंचे चीवर यांच्यावर शिडकाव करत आहेत.सूर्याची सुंदर लालिमा,साल वृक्षांच्या फांद्यांमधून गात्रे शीतल करणारी मंद हवा,तथागतला हे प्रिय आहे,आनंदी करणारे आहे.. असे असंख्य उद्गार बुद्धांच्या मुखातून,दुःखाच्या गडद छायेत हळवे बनवून बसलेला भिक्खू संघ‌,वरील उद्गार एकूण त्यांच्या मनाचे त्यांच्या हृदयाचे काय होत असेल? तेही फुलत होते की आणखी काय होत होते? तिथे उमटलेल्या त्या दृश्यांचे वर्णनच करता येणार नाही..


कोमजलेल्या बुद्धांचे फुलत चाललेले दृश्य एकीकडे आणि त्या तिकडे वृक्षांच्या गर्दीत दडपून,कोमेजून गेलेले;बुद्धांची आत्तापर्यंत सावली असलेले भन्ते आनंद रडत आहेत.. ते रडणे खरे रडणे आहेच.


मानवी संवेदनशील मनाला पिळ पाडणारा तसाच हा आक्रोश ! उजेडाचा अंधार होतानाची ती घालमेल,ती धास्ती सुंदरतेचा शेवट हृदय पिळवटणारा असतोच. आनंदाचे तेच झालेय..


आनंद दिसत नाही,कुठे आहे तो ? तथागताची नजर व्याकुळ बनतेय,आनंदासाठी.आनंदांना त्यांनी आरपार बघितलंय.त्यांची बलस्थाने, त्यांची मर्मस्थाने त्यांना माहीत आहेत.भूतकाळ आणि भविष्यकाळातील कोणत्याही संबोधी प्राप्त गुरुला आनंदापेक्षा अधिक प्रतिभासंपन्न आणि निष्ठावंत सहाय्यक मिळू शकणार नाही,असा आनंदाचा बुद्ध गौरव करतात.त्याची मुक्तता व्हावी,अर्हपतपद प्राप्त व्हावे यासाठी बुद्धांचे सम्यक मनसुद्धा अपार चिंताक्रांत आहे..


... समजावणारे बुद्ध आणि त्यांचा योग्य अर्थ समजणारे आनंद.त्यांना नव्याच व्यथेने ग्रासलेय. मातीने बनविलेल्या झोपडींचा एक छोटासा कसबा असलेल्या कुशनगरीत तथागतांनी शरीराचा त्याग करू नये,असे त्यांना वाटते. त्यासाठीही ते व्याकूळ आहेत.त्यांना समजावतानाचे बुद्धांचे उद्गार ही लाजवाब.


आपल्या अंगावर पडणारी साल वृक्षाची फुले.. हे दृश्य तथागत आनंदांना दाखवताहेत.


सुंदरता ही कुठल्या ठिकाणांवर अवलंबून असत नाही.सुंदरता छोट्या गोष्टीत सुद्धा असते... 


त्या छोट्या कसब्यात सौंदर्य शोधणारे तथागत म्हणूनच मनाला व्यापून राहतात !


अश्रुंनी डबडबल्या डोळ्यांनी घेतलेल्या या 'स्व' अनुभवांनी मृत्यूवर असणारे प्रेम,गुरू-शिष्याच्या या नात्याला शिर साष्टांग दंडवत घालून माझ्या जीवनावर अज्ञानाच्या दृष्टिकोनातून मृत्यूवर पडलेला अंधार प्रकाशमय झाला.


एखाद्या झोपडीमध्ये उद्याच्या अन्न मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचा विचार करणारी व्यक्ती असो,सध्या सुरू असणाऱ्या युद्धाचा मानवी आयुष्यात होणाऱ्या बदलावर विचार करणारी व्यक्ती असो, किंवा सर्वार्थाने सुखसोयी उपलब्ध असणारी श्रीमंत व्यक्ती असो प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो.सर्व सुख-सोयी असतानाही जर दाड दुखत असेल तर त्या व्यक्तीला आपली दाढ व त्याची वेदना हीच महत्वाचे वाटते.इतर सर्व गोष्टी गौण वाटतात.


आपलं जीवन जितकं साधं सरळ,आनंदी,सुखी असेल.आपल्या मृत्यू ही तसाच असेल.जन्म आणि मृत्यू या दोन्हीच्या मध्ये जो कालावधी आहे त्याला जीवन म्हणतात.व तेच जीवन सुखी आनंदी कसं जगायचं न चुकता हे पुस्तक सांगतं.शरीर आहे त्यासोबत वेदना संवेदना आहेतच. पण हे पुस्तक वाचल्यामुळे या वेदणेकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. 


परवाच एक घटना घडली.माझी दाढ दुखत होती.असह्य वेदना होत होत्या.परवाच मी ती दाढ काढून घेण्यासाठी गेलो होतो.त्या ठिकाणी रिसर्च सेंटर असल्याकारणाने शिकाऊ डॉक्टर होते.त्यांनी माझी संपूर्ण चौकशी केली विचारपूस केली. त्यांनी माझे संपूर्ण दात मोजले.आणि त्यांनी मला प्रश्न विचारला,'तुम्ही कधी तुमची अक्कल दाढ काढली आहे का यापूर्वी ? मी नाही म्हणून सांगितले. ते म्हणाले बरं झालं तुम्हाला तीनच 'अक्कल' दाढा आहेत.हा संवाद होत असताना दाढ प्रचंड प्रमाणात दुखत असतानाही मला हसू आले.मी म्हणालो अक्कल दाढा किती असतात.ते म्हणाले वर दोन खाली दोन अशा चार दाढा असतात.तसा विचार करा गेलं तर या दाढांचा आपल्याला काही उपयोग होत नाही.' ते म्हणाले,पण या दाढा काढताना  त्या हाडांमध्ये असल्याकारणाने खूप त्रास होतो. मी म्हणालो,आपण तर म्हणता या दाढांचा आपल्याला काही उपयोग नाही. मग तयार करणाऱ्याने हे उगीचच केले नसेल.याचाही आपण विचार करावा. मी म्हणालो,चला मला तीनच अक्कलदाढा आहेत. येथे आलेला हा एक फायदा झाला. दाढ काढत असताना होणार्‍या वेदनेमध्येही मी आनंदी होतो.


धर्म कोणताही असो,त्यातल्या माणसांनी आपल्या धर्मातल्या मयत माणसांची 'शवशरीरे' स्नान घालून,फुले वाहून;पेटीला,तिरडीला फुलाचे हार घालून आजही सजवत ठेवली आहेत.दुसऱ्या,तिसऱ्या,बाराव्या,तेराव्या दिवशी ( दिवसाचा आकडा कोणताही असू दे ) गोड पदार्थ करून आजही शेवट गोड केला जातोय. तथागतांच्या महापरिनिर्वाणाचेच हे कदाचित संचित असेल; त्याचाच हा कदाचित संस्कार असेल.युरोप- अमेरिकेतल्या काही प्रांतात मयत माणसाला निरोप देण्यासाठी नातलग, मित्रमंडळी नटून-थटून येतात.हसत-खेळत त्याला निरोप देतात.प्रेत सजवतात, सुगंधी द्रव्य त्यावर शिंपडतात आणि त्याद्वारे त्या मयताचा मृत्यू सोहळा साजरा करतात.हा सोहळा म्हणजे मला जणू जीवनाचे केलेले हे स्वागतच वाटले.


असाच परवा व्हाट्सअप वरती डॉ.रवींद्र श्रावस्ती आदरणीय लेखकांचा संदेश पडला.बोलायचं आहे वेळ आहे का? एवढा थोर माणूस पण उच्च कोटीची नम्रता पाहून मी नतमस्तक झालो. त्यांनी या पुस्तकाची निर्माण कथा सांगितली. हे पुस्तक लिहिण्यासाठी,विचार करण्यासाठी,चिंतन करण्यासाठी,मनन करण्यासाठी त्यांना तब्बल दहा वर्षे लागली. हे पुस्तक लिहिलं पण लोकं हे पुस्तक स्वीकारतील का ? हा प्रश्न त्यांना रात्रंदिवस भंडावून सोडत होता. त्यामुळे त्यांनी या पुस्तकाची सामग्री एका कोपऱ्यात ठेवून दिली. लेखकांच्या आदरणीय सासुबाईचे निधन झाले.आणि त्यावेळी सर्वप्रथम सर्व लोकांच्या समोर मृत्यू सुंदर आहे ? यास अनुषंगाने ते बोलले. त्यांचं ते बोलणं ऐकून बऱ्याच जणांनी सांगितलं आपले हे मृत्यूबाबतचे सुंदर विचार ऐकून आमची ही मृत्यूबाबतची भीती कमी झाली.आपण या विषयावर पुस्तक लिहावे. मग त्या नंतर पुन्हा अभ्यास सुरू झाला.अनेक संदर्भ ग्रंथ,रात्रीचा दिवस करून त्यांनी या मृत्युला सुंदर बनवले आहे.अशाच एका कार्यकर्त्याचा धडधाकट भाऊ मृत्यू पावला.त्याला होणारा त्रास,

जीवनातील क्षणभंगुरता,या सगळ्यांचा विचार करता लेखकांच्या एका डॉक्टर मित्रांनी हे पुस्तक त्या कार्यकर्त्याला भेट म्हणून दिले. त्यानी ते वाचावयास सुरू केले. व तीन दिवसांनी थेट लेखकांना फोन केला.आपले पुस्तक वाचून मी पूर्णपणे सावरलो आहे. मृत्यू हे जीवनातील सत्य मी मनापासून स्वीकारले आहे. आपला व आपल्या पुस्तकाचा मी मनापासून आभारी आहे. ही सत्य कथाच या पुस्तकाचं महात्म्य अधोरेखित करते.


या पुस्तकामध्ये मृत्युचे सौंदर्यशास्त्र मांडणारी कथा आहे.प्रभा व अश्वघोष ही कथा जीवन मृत्यू यामधल्या बदलांची जाणीव करून देणारी,सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ जीवन जगून, जीवनातील सत्य समजून घेण्यासाठी प्रभा ने केलेले आत्मदान हे खऱ्या प्रेमाची माहिती सांगते.


'वृक्ष बोला पत्ते से,सुन पत्ते मेरी बात |


इस घर की यह रीत है,एक आवत इक जात ||


_कबीर


हे जीवनातील सत्य समजून घेतले


मृत्यु नसता तर या जगाचे वैराण वाळवंट झाले असते ! माणसातले प्रेम आटले असते; माणसे जनावरेच राहिली असते.खरे तर मृत्यूने जगण्याचे भान दिले,नैतिकता दिली.


मृत्यू सुंदर जगण्याची प्रेरणा देतो.मानवी जीवनाचे मांगल्य तगवून ठेवणारे निसर्गाचे विनाशकारी रूप म्हणजे मृत्यू ! मृत्यू तर असणारच आहे. तो येण्यापूर्वी आपले छान आयुष्य जगवून घेतलं पाहिजे.


चला, सुंदर माणसे तयार करूया,सुंदर माणसे होऊया ! मग मृत्यूचे काय बिशाद आहे

माणसांना ' ठार ' मारण्याची !


इतक्या प्रगल्भ,गुंतागुंतीच्या जीवनाची उकल साधी-सोपी करण्यामध्ये लेखक यशस्वी ठरले आहेत.


अस्तित्वा संदर्भातील काही सुक्ष्म पैलू डॉ.बंदिष्टे यांच्या भाषेतच बघूया.


प्रत्येक अस्तित्व बदलत असते.व्यक्तीच्या प्रत्येक गोष्ट म्हणा किंवा संपूर्ण विश्व म्हणा, प्रत्येक अस्तित्व सतत बदलत असते. काही अस्तित्वे (उदा. घड्याळातील वर्ष दाखविणारा काटा) अगदी हळूहळू बदलत असतात,तरी इतर काही गोष्टी लवकर लवकर बदलतात व त्या बदलत आहेत,हे दिसतेसुध्दा ( उदा. नदीचे पाणी,घड्याळाचा सेकंद दाखवणारा काटा आदी ) एकूण निष्कर्ष असा, ती प्रत्येक अस्तित्व सतत बदलत असते. अस्तित्व ( वास्तव ) = बदलणे, असे असेल तर बदलणाऱ्या अस्तित्वाचा प्रवाह अखंड असतो व त्या प्रवाहाचा आकारसुद्धा जवळजवळ एकसारखाच असतो.म्हणून जी वस्तू आपण पाहतो आहे,ती पूर्वीची वस्तू आहे,असा आभास पाहणाऱ्यांना होतो.असे वाटते,की त्याच वस्तू व प्राणी पुष्कळ वेळेपर्यंत टिकून राहतात.म्हणून आपण अमुक माणसाला,झाडाला किंवा इमारतीला पुष्कळ वर्षानंतर पाहतो आहे,अशी भाषा वापरतो. पण,खरे पाहिली तर कोणतीच गोष्ट दोन क्षणसुद्धा न बदलता राहत नाही.वेळेच्या दृष्टीने प्रत्येक अस्तित्व क्षणिक आहे.


बुद्धांच्या या भूमिकेला म्हणतात.


'क्षणिकवाद'.आपण पुष्कळदा असे म्हणतो,की हा तोच माझा मित्र आहे,जो मला पाच वर्षानंतर भेटतो आहे.परंतु आपण जर शांतपणे वास्तविकता पाहिली,तर आपल्याला असे दिसेल,की आपल्या त्या मित्राचा प्रत्येक कण क्षणाक्षणाला बदलत असतो; परंतु तो बदल सूक्ष्म व सतत होत असल्याने,तो आपल्या लक्षात येत नाही.


 ही सगळी स्थिती 'एकाच नदी मध्ये कोणीही दोनदा अंघोळ करू शकत नाही'या वाक्याने दर्शविली जाते. ज्या नदीमध्ये आपण आधी कधी अंघोळ केली होती,ते पाणी कधीचेच वाहून गेले असल्याने 'त्याच'नदीमध्ये आपण दुसऱ्यांदा आंघोळ करू शकत नाही.आता तिथे दुसरे पाणी आहे.ही स्थिती लोक नीट पाहत नाही व अमुक नदीमध्ये मी चौथ्यांदा किंवा दहाव्यांदा अंघोळ करतो आहे,अशी वाक्य बोलत असतात.असो, या ठिकाणी आणखी एका गोष्टीकडे दुर्लक्ष होते, ही नदी बदलते तशी अंघोळ करणारी व्यक्ती सुद्धा सतत बदलत असते.म्हणून मग जशी कोणी व्यक्ती कोणत्याही नदीमध्ये दोनदा अंघोळ करू शकत नाही,तसेच कोणीही,कोणत्याच खुर्चीवर सुद्धा दोनदा बसू शकत नाही. खरे पाहिले तर कोणीच माणूस कोणतीही गोष्ट दुसऱ्यांदा करू शकत नाही.ज्या गोष्टी सध्याचे विज्ञान म्हणते आहे,त्या अडीच हजार वर्षांपूर्वी ( २५०० ) बुद्धांनी म्हणाव्यात ही आश्चर्याची व कौतुकाची गोष्ट आहे.दिक् - काल - शक्ती यांच्या सतत भूतकाळापासून भविष्य कडे जात असणाऱ्या प्रवाहामध्ये कोणत्याच गोष्टीची कुठेच पुनरावृत्ती असू शकत नाही.अगदी सारख्या दिसणाऱ्या दोन गोष्टींमध्येही काही न काही  (जागेचा,वेळेचा,

रचनात्मकतेचा) फरक अगदी हमखास असतो .


बुद्धांच्या या क्षणिकवादाचा अर्थ,प्रत्येक गोष्टीमध्ये होणारा बदल हा त्या गोष्टीमध्ये होत असणारा पूर्ण बदल असतो.वस्तूंमध्ये काय किंवा व्यक्तींमध्ये काय अपरिवर्तित राहणारे, न बदलणारे,नित्य असे कोणतेच तत्व नसते.


वाहत असणाऱ्या प्रवाहापेक्षा निराळी अशी नदी नसते;


क्रिया व कर्ता ही दोन भिन्न तत्वे नसतात.करणारा व क्रिया एकमेकांपासून निरनिराळ्या गोष्टी नाहीत.बदलत राहणे,परिवर्तित होत जाणे हा प्रत्येक अस्तित्वाचा,प्रत्येक वास्तवाचा स्वभाव आहे, धर्म आहे.


जग हे फक्त आपापल्या स्वभावानुसार सतत परिवर्तीत होत असलेल्या,परिवर्तन पाहणाऱ्या अगणित गोष्टींचा एक अखंड प्रवाह आहे.


डॉ.बंदिष्टे लिहितात,'प्रत्येक अस्तित्व बदलते याचा अर्थ एवढाच आहे,कि ते आपल्यासारख्याच आणखी एका क्षणिक अस्तित्वाला,वास्तवाला जन्म देते. प्रत्येक अस्तित्व आपल्यासारख्याच अस्तित्वाला निर्माण करू शकते; तेवढीच त्याची निर्माणशक्ती असते व तीच हमखासपणे तिच्या निर्माणशक्तीची दिशा असते.


तथागत गौतम बुद्ध त्यांनी कोणत्याही प्रकारचे कुंपण घातलेले नाही.याच अनुषंगाने लेखकांशी मी नेहमी बोलतो.बोलण्यातून वाचण्यातून मृत्यूबाबत प्रगल्भता वाढत आहे. त्यावेळी मी लेखक साहेबांशी बोलतो त्यांची ती समजावून सांगण्याची पद्धत माझ्या मनाला प्रेमाची फुंकर घातल्यासारखी वाटते.आता तर मी ठामपणे म्हणू शकतो डॉ.रवींद्र श्रावस्ती त्यांच्याशी बोलतो तेव्हा मी प्रत्यक्ष माझ्या मृत्यूशी बोलतो.


जैन परंपरेत निर्वाण म्हणजे मृत्यू असे मानले जाते.बौद्ध परंपरेत निर्वाणाचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे; निर्वाण जिवंत असतानाच प्राप्त करावयाची गोष्ट आहे,तर परिनिर्वाण हा मृत्यू आहे.


जैनांचे २४ वे तीर्थकर वर्धमान महावीर यांचे इसवीसन पूर्व ५९९ साली अश्विन महिन्यातील अमावास्येच्या पहाटे चार वाजता 'पावापुरी' येथे निर्वाण झाले; त्यांनी मोक्ष मिळविला.जैन पुराणाचा आधार घेऊन असे सांगता येईल,की भगवान महावीरांच्या अनुयायांनी त्यांच्या मृत्यूनंतर आनंद सोहळा म्हणून अमावास्येच्या अंधारात असंख्य दिवे लावले.दिवाळी किंवा दीपावली तेव्हापासुनच साजरी करण्याची प्रथा सुरू झाली असे मानले जाते.या दिवाळीला 'निर्वाण महोत्सव'असेही म्हणतात.


सुफी संत शेख इब्न अल्-हबीब या़ंच्या नजरेतून मृत्यूला जाणून घेऊ हबीब म्हणतात-


रे माझ्या बंधू,

मृत्यूसाठी स्वतःला तयार कर

मृत्यू येणारच आहे,

त्यातून येणाऱ्या दुःखाने

हृदय त्रासले - संतापले

तरी आशा सोडू नकोस

निश्चयपूर्वक प्रयत्न कर

अधिकाधिक चांगली कामे कर

एक ना एक दिवस मृत्यू आम्हाला

विलग करणारच आहे


सुफी संत रुमी हा मोठा अवलिया संत.त्याची Death is our marriage with eternity हि रचना समजून घेऊ या.


'एक दिवस मी मरणार आहे

मला माझ्या थडग्याकडे नेताना

तू मेलास,

तू मेलास,असे म्हणत

अजिबात रडू नका

मृत्यू म्हणजे जाणं नव्हे

सूर्य मावळतो,चंद्र मावतो

पण ते कुठे जात नाहीत

मृत्यू म्हणजे चिरंतनाशी लग्नच

थडगं कैदखाना वाटतो

पण ती तर मुक्ती आहे

पाशातून मुक्त होऊ या

माझे मूख बंद होते अन्

त्यातून आनंदाची आरोळी उमटून

ताबडतोब ते पुन्हा उघडते !


अशा सर्वच धर्मानी,संतांनी मृत्यूबाबत सांगितलेले.जीवन सत्य आपणास मृत्यूसौंदर्यभान आणि धर्म यामध्ये वाचावयास मिळते.थक्क करणारे सर्वच आहे.


लोकायत प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले,आयुष ग्राफिक्स कोल्हापूर यांची अक्षरजुळणी आहे. या सर्वच लोकांनी जीवन व मृत्यू सुंदर आहे. हे सांगण्याचे महान कार्य केलं आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!


आपलं शरीर हे मूल्यवान आहेच.शरीरासोबत असणारा आनंद,वेदना संवेदना,भावनिक गुंतागुंत,बौद्धिक गुंतागुंत असणारच!


आपलं जीवन आपल्या जीवनात घडलेल्या घटना प्रसंग त्याला धैर्याने सामोरे जावे लागेल.जीवण जसं आहे तसं ते आनंदाने स्वीकारले पाहिजे.यामध्येच जीवनाचे इतिकर्तव्य आहे.


हे पुस्तक वाचत असताना या पुस्तकांमध्ये मला दोन औषधांच्या 'मोकळ्या चिठ्या' मिळाल्या. या मोकळया चिठ्ठ्या मला सांगत होत्या.आयुष्य मोकळ्या मनाने जगा.जे नाविन्यपूर्ण असेल,नवीन असेल ते स्वीकारा ! आयुष्य अलगदपणे फुलासारखे जगा,फुल आपलं संपूर्ण आयुष्य अलगदपणे जगते.व ज्या झाडासोबत ते आयुष्यभर राहिले. ते झाड हि ते 'अलगदपणे' सोडते.यालाच मृत्यू सुंदर आहे असं म्हटलं जातं.


जाता - जाता


या पुस्तकाचे आदरणीय लेखक माझे परम मित्र फारच कमी काळामध्ये माझ्याशी व मी त्यांच्याशी घट्ट जोडले गेलो. त्यांचं व्यक्तिमत्व हे मला फार भावलं.सुंदर जीवन कसं जगायचं,आपला मृत्यू सुंदर कसा करायचा.हा विषय तर माझ्यासाठी फारच गुंतागुंतीची आणि अवघड होता. पण मी कधीही त्यांना फोन लावला.तरी कोणत्याही प्रकारचा वेळ न घेता ते लगेच माझ्याशी बोलायचे.इतक्या शांतपणाने,सरळ साध्या सोप्या मला समजेल अशा सोप्या भाषेत ते निरंतर मला सांगत होते.'हे पुस्तक माझ्यासाठी सुंदर वाचन, अनोळखी प्रवास होता.या प्रवासामध्ये त्यांनी मला एक क्षणही 'वाऱ्यावर' सोडले नाही.आणि माझ्या संपूर्ण आयुष्यात ही ते मला वाऱ्यावर सोडणार नाहीत. ह्या पुस्तकाने मला ही सर्वोत्तम अशी भेट दिली आहे.


हे पुस्तक वाचून माझ्यामध्ये लौकिक व अमुलाग्र असा बदल झाला आहे.आपलं जीवन जेवढं आनंदी,सुंदर असेल,तेवढाच आपला मृत्युही आनंदी व सुंदर आहे.याची मला मनस्वी जाणीव झाली. येणारा प्रत्येक क्षण आनंदात जगायचा,उत्साहात साजरा करायचा. तो मी करतच आहे करीत राहीन. मी या सुंदर जीवनावर प्रेम करायला शिकलो आहे. मृत्यू कोणत्याही वेळी जर मला भेटायला आला. याबद्दल माझ्या मनात कोणतीही भीती,अगर शंका नाही. हेच धाडस,सत्य मला या पुस्तक वाचनातून मिळालं.


या पुस्तकानं मला खरंच ' मृत्यू सुंदर आहे ? हे सांगितलं. प्रत्येक माणसानं जीवन आनंदी व मृत्यू सुंदर आहे हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक वेळ नक्कीच वाचावं आपला दृष्टीकोन नक्कीच बदलणार..!

२५/१२/२२

….मुंगी उडाली आकाशी !!

"अगं आई,सांग ना मोंटूला,आम्ही सर्व मुलींनी आज एकत्र येऊन एक छान कार्यक्रमाचा बेत आखलाय तर ती यायला नाही म्हणतेय."


मोंटू,जा बाळ.मोठ्या बहिणींचं ऐकावं आणि नुसती पोरांबरोबर हुंदडत असतेस.त्यापेक्षा जावं अशाप्रकारच्या मुलींच्या कार्यक्रमाला."


" मी नाही जाणार असल्या कार्यक्रमाला.मला असले मुलींचे कार्यक्रम आवडत नाहीत.आज तर मी,विदुनं आणि भय्यानं जायचं ठरवलंय सायकलवरून.आज आम्ही त्या मोठ्या चिंचेजवळ असलेल्या घसरतीवर शर्यत लावणार आहोत.बघ आज दोघांना कशी हरवते ते."


अर्थात मोंटू स्वतःला वाटते तेच करणारी असल्यानं तिच्या आईचा आणि मोठ्या दोन्ही बहिणींचा तिच्यासमोर नाईलाज असायचा.


पंजाबमधील कर्नाल या गावातील श्री.बनारसीलाल चावला नावाच्या शीख व्यक्तीच्या कुटुंबातील ही गोष्ट.१९४७ सालच्या भारत-पाक फाळणीत होरपळून निघालेले हे कुटुंब. पाकिस्तान शेहुपुरात पिढ्यान् पिढ्या काढलेल्या या सधन कुटुंबाला शेवटी वाचवत निर्वासितासारखा कर्नालमधील एका पडक्या मशिदीमध्ये आश्रय घ्यावा लागला.


बनारसीलाल,त्यांची पत्नी संयोगिता,सुनीता आणि दीपा या दोन मुली,मुलगा संजय आणि शेंडेफळ असलेली कल्पना अर्थात मोंटू अशा पाच जणांच्या कुटुंबाच्या जीवनाला नव्याने सुरुवात झाली आणि लहानमोठे व्यवसाय करत बनारसीलाल यांचा हळू हळू जम बसू लागला.


मुले मोठी होऊ लागली.पण यांच्यातली कल्पना लहानपणापासूनच जरा हूड होती.आपल्या बहिणींपेक्षा तिचे आपल्या भावाशी जास्त जमायचे आणि त्याच्याप्रमाणेच तिचे सर्व खेळ मुलांचे असत.त्याचे ऐकणे,अनुकरण करणे हे तिला लहानपणापासून आवडे.बहिणींबरोबर घरात राहण्यापेक्षा संजयबरोबर बाहेर धांगडधिंगा घालणे हे तिला अधिक आवडायचे. कर्नालमधील टागोर बालनिकेतन शाळेमध्ये कल्पना जात असे आणि एक हुशार मुलगी म्हणून ती शिक्षकवर्गात प्रिय होती.जशी ती अभ्यासात हुशार होती,तशी ती खेळातही पुढे होती.शाळेमध्ये ती भरतनाट्यम् बरोबर कराटेही शिकली होती.अशा या हरहुन्नरी कल्पनाचे शालेय शिक्षण संपले आणि तिने इंजिनिअर व्हायचे ठरविले.

कर्नालमध्येच असलेल्या 'दयालसिंग कॉलेजमध्ये तिने पदवीपूर्व वर्गाचे दोन वर्षे शिक्षण घेतले आणि गुणवत्तेवर चंदीगडच्या पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला.


घर सोडून वसतिगृहामध्ये राहून शिक्षण घेणे कल्पनाच्या पालकांना पसंत नव्हते,पण कल्पनाच्या इंजिनिअर होण्याच्या तीव्र इच्छेसमोर त्यांना नमावे लागले आणि वसतिगृहात राहण्याऐवजी तिच्या आईने चंदीगडला तिच्याबरोबर राहण्याचा पर्याय निवडला.अशाप्रकारे इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकारू लागले.कल्पनाला इंजिनिअरिंगसाठी मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल हा विषय सुचवण्यात आला.पण तिच्या मनामध्ये एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे आपण एरोनॉटिकल इंजिनिअर व्हायचे.कॉलेजच्या प्राचार्यांना आणि विभागप्रमुखांना तिने ठामपणे सांगितले की,या विषयाला जर तुम्ही मला प्रवेश दिला नाही तर मी माघारी जाईन.इथेदेखील तिची तीव्र इच्छा आणि निश्चयाकडे पाहून त्यांनी तिला प्रवेश दिला.

एरोनॉटिक्स हा विषय घेऊन इंजिनिअरिंग करणारी ती त्या कॉलेजमधील एकमेव मुलगी होती.


खरं तर हे एरोनॉटिक्सचे भूत कल्पनाच्या मानगुटीवर अगदी लहानपणापासून बसले होते. कारण तिच्या भावाला आपण पायलट व्हावे, असे लहानपणापासून वाटायचे आणि त्याचे अनुकरण करायला कल्पनाला आवडायचे. त्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कल्पनाच्याही मनामध्ये विमाने भरारी घेऊ लागली होती आणि पुढे एरोनॉटिक्स हा विषय घेऊन ही मनातली विमाने प्रत्यक्षात उडविण्याची तिची प्रक्रिया सुरू झाली.


इंजिनिअरिंगच्या शेवटच्या परीक्षेत तिने देदीप्यमान यश मिळविले आणि आसमंतामध्ये भरारी घेण्यासाठी कल्पनाचे पंख उघडू लागले. तिला उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जायचे होते आणि म्हणून तिने तेथील अनेक विद्यापीठात अर्ज पाठविले होते.

टेक्सासमधील विद्यापीठात तिला एरोनॉटिक्समध्ये उच्च पदवी घेण्यासाठी प्रवेश मिळाला.यावेळीदेखील तिच्या घरच्यांचा तिच्या या निर्णयाला पाठिंबा नव्हता.पण कल्पनाच्या इच्छेपुढे त्यांचा विरोध टिकला नाही आणि कल्पनाने अमेरिकेकडे भरारी मारली.


अमेरिकेत पोचल्यावर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास अर्लिंग्टन इथे कल्पनाने एरोस्पेस इंजिनिअरिंग याच विषयात आपल्या पदव्युत्तर शिक्षणाला सुरुवात केली.


याच वेळेस तिच्या आतमध्ये दबून राहिलेली तिची विमान उडविण्याची इच्छा उफाळू लागली आणि तिने विमान उडवायचे प्रशिक्षण घ्यायचे ठरविले.या निमित्ताने तिचा परिचय तिचा प्रशिक्षक असलेल्या जीन पियरे या तरुणाशी झाला आणि विमान उडवता उडवता त्यांची मनेही उडून एकमेकांमध्ये जाऊन बसली.त्या दोघांनी लग्न करायचे ठरविले.कल्पनाच्या घरातून पुन्हा कडाडून विरोध झाला,पण तिचा हट्ट (तीव्र इच्छा) करण्याचा स्वभाव सर्वांना परिचित होता,त्यामुळे विरोध केला तरीही कल्पना आपल्या मनाप्रमाणे केल्याशिवाय राहणार नाही,याची जाणीव घरच्यांना झाली आणि कल्पनाच्या लग्नाला हिरवा कंदील दाखवला गेला.१९८४ तिचा आणि जीन पियरे हॅरिसन या मूळच्या फ्रेंच पण अमेरिकेचे नागरिकत्व मिळविलेल्या युवकाचे लग्न झाले.


यानंतर मात्र तिच्या विषयात ती अधिकाधिक प्रगत होत गेली आणि यशाच्या एक एक पायऱ्या चढू लागली.

टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये पहिली आल्यानंतर तिने मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली आणि त्यानंतर तिने कोलोरॅडो विद्यापीठात एरोस्पेस इंजिनिअरिंग,म्हणजे अवकाशात जाणाऱ्या वस्तूंसाठी लागणारे तंत्रज्ञान यातील विषय आपल्या डॉक्टरेटसाठी निवडला.१९८८ साली तिने आपली डॉक्टरेट मिळविली आणि त्यानंतर अवकाशात जायच्या प्रयत्नांची आखणी करायला सुरूवात केली.


अवकाशयात्री बनण्यासाठी अतिशय कणखर आणि संतुलित वृत्ती लागते.सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळी मानसिकता या पेशासाठी गरजेची असते.कोणत्याही प्रसंगी विचलित न होता चटकन योग्य निर्णय घेण्याची क्षमता या व्यक्तींकडे लागते.या सर्व गोष्टी कल्पना चावलाकडे जन्मजात होत्या.त्यामुळे तिला अवकाशयात्री होण्याचा मार्ग सुकर झाला.या वेगळ्या मानसिकतेबद्दल कल्पनाला विचारल्यावर ती म्हणते की,


 'अवकाशयात्री बनण्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता आणि कौशल्ये तुम्ही प्रशिक्षणामुळे आणि सरावामुळे अंगामध्ये बाणवू शकता.पण आकाशात,अवकाशात विहार करायचे स्वप्न मात्र तुमच्याकडे उपजत असावें लागते.'पुरुषांची मक्तेदारी मानलेल्या या क्षेत्रामध्ये शिरकाव करून त्यात प्रावीण्य मिळविण्यात कल्पना यशस्वी झाली होती.


अवकाशात विहार करायचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग खडतर आहे,पण अशक्य नाही.लहान शहरातून येणाऱ्या भारतीय मुलीसाठी अवकाश स्वप्ने अशक्यप्राय गोष्ट असली तरी तिने ती साध्य करून दाखवली आणि अनेक मुलींसाठी आदर्श निर्माण करणारी ती एक रोल मॉडेल ठरली.


'नासा'मध्ये दाखल झाल्यानंतरचा तिचा प्रवास अवकाशयानाप्रमाणेच वेगवान होता.तिने आपल्या कामाच्या पध्दतीने,नम्र स्वभावाने, सतत दुसऱ्यांना मदत करण्याच्या वृत्तीने, प्रामाणिकपणामुळे आणि मेहनतीमुळे आपल्या सहकाऱ्यांबरोबर आपल्या वरिष्ठांचीही मने जिंकली.


तिच्या या गतीमुळेच तिला १९९७ मध्ये कोलंबिया यानामधून अवकाश मोहिमेवर जाण्याची संधी मिळाली.तिचा हा अंतराळ प्रवास सोळा दिवसांचा झाला.या दरम्यान कल्पना कोलंबिया यानात अंतराळात होती. कल्पना चावला 'पहिली अंतराळवीर स्त्री' म्हणून प्रसिद्धीस आली.


याबद्दलच्या तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी तिला विचारले असता ती म्हणते,


"तुमच्या अंतर्मनात सतत जागी ठेवलेली स्वप्ने सत्यामध्ये उतरवण्याचा मार्ग अस्तित्वात असतो.फक्त तो शोधण्याची दृष्टी आणि धैर्य तुमच्या अंगी असायला हवे."


कल्पनाची घोडदौड चालूच होती.दोन हजार साली 'एस.टी.एस.१०७' या कोलंबियाच्याच आणखी एका अवकाशयात्रेसाठीही तिची निवड झाली. ही यात्रा २००३ साली ठरवण्यात आली होती. त्यासाठी कल्पनाला पुन्हा आणखी प्रशिक्षणासाठी नासाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये काम करावे लागले.


कल्पनाने आपल्या दुसऱ्या उड्डाणाची तयारी सुरू केली.

यावेळी तिला विशेष प्रशिक्षण देण्यात येत होते.कारण या यात्रेची ती 'कमांडर' होती. सर्व तयारी पूर्ण झाल्यावर 


१६ जानेवारी,२००३ या दिवशी कोलंबिया अवकाशात झेपावले.अंतराळ यानातून पृथ्वीकडे बघताना कल्पनाला ती फारच मोहक वाटत होती.एखादी तलम ओढणी घेऊन नटलेली पृथ्वी तिला अतिशय कोमल आणि कोवळी दिसत होती.या ठिकाणाहून पृथ्वीकडे पाहताना आपण कोणा एका देशाचे आहोत हे भानच नाहीसे होते,असा अनुभव तिला आला.आपण सर्व पृथ्वीशी बांधील आहोत याची जाणीव तिला होत होती..


सोपविलेले काम पुरे करून कोलंबिया आणि अर्थात कल्पनाही परतीच्या प्रवासाला लागली. १ फेब्रुवारी २००३ च्या सकाळी ९ वाजता आपल्या हृदयामध्ये जोपासलेल्या स्वप्नांची पूर्ती करीत ती पृथ्वीवर उतरणार होती. अवकाशयात्रेची आणि तिच्या वैयक्तिक यशाची गुढी आता अमेरिकेबरोबर भारतातही उभी केली जाणार होती.सायकलवरून तोंडावर वारे घेऊन वेगाने जाणारी मोंटू आता एक अंतराळयान घेऊन पृथ्वीच्या दिशेने वेगाने कूच करीत होती. वेगाशी अतूट नाते असलेल्या कल्पनाच्या जीवनालाही आता अतिप्रचंड वेग आला होता. कल्पनाची वाट बघणाऱ्यांची उत्कंठा प्रत्येक क्षणाला वाढत होती.पहाटे पहाटे आकाशामध्ये भरारी घेणाऱ्या पक्ष्यांची घरट्यांमध्ये परत येण्याची वाट जशी संध्याकाळी त्यांची बाळे बघत असतील अगदी त्याचप्रमाणे कर्नालच्या टागोर बालनिकेतन शाळेतील लहान मुलांपासून ते शिक्षकांपर्यंत आणि जीन पियरेपासून ते तिच्या आई-वडील,इतर कुटुंबीय,सहकारी आणि मित्रमंडळीपर्यंत प्रत्येक व्यक्ती कल्पना पुन्हा घरी येण्याची वाट बघत होती.कोलंबिया पृथ्वीच्या कक्षेमध्ये आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता.... आता अर्ध्या तासात कल्पना येणारच....


"आता पंचवीस मिनिटे लागतील हं "


यावेळी मात्र घड्याळ अतिशय संथ गतीने आपले काटे पुढे सरकवत असल्यासारखे वाटत होते....झाली. अठरा मिनिटं राहिली.


सतरा...


सोळा .....


आणि घड्याळ थांबलं......


पृथ्वीपासून केवळ साठ किलोमीटर अंतरावर असताना कोलंबिया कल्पना आणि इतर अंतराळवीरांसह पंचमहाभूतामध्ये विलीन झालं. एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं.कल्पना आपली पुढची स्वप्नं साकार करण्यासाठी पृथ्वीवर पोहोचू शकली नाही.कदाचित् ईश्वराला त्याचाच अंश असलेल्या या मुंगीनं घेतलेली ही अवकाशभरारी इतकी भावली असेल की, त्यानेच तिला आपल्यामध्ये सामावून घेतलं असेल आणि अशातऱ्हेने आकाशी उडालेली ही मुंगी स्वतःच आकाश होऊन राहिली.


भरारी ध्येयवेड्यांची

डॉ. प्रदीप पवार

२३/१२/२२

येमेडोड्डीचा नरभक्षक.. थरारक शिकार कथा.. भाग - ३

तरी त्या त्रासदायक अवस्थेत मी सूर्य मावळेपर्यंत थांबलो.त्यानंतरचाही पुढचा संपूर्ण आठवडा मी रोज तसाच काढला,परंतु वाघ त्या परिसरात आल्याचं किंवा कोणी त्याला पाहिल्याचं कुठूनही ऐकायला आलं नाही.

त्या दरम्यान एक मात्र झालं,माझ्या नजरेच्या टप्प्यातलं प्रत्येक झुडूप,तसंच वाघ माझ्यावर हल्ला करायला आला,

तर तो कुठल्या वाटांनी येऊ शकतो,त्या वाटांवरून लपतछपत येण्यासाठी तो कुठल्या आडोशांचा वापर करू शकतो,याचा एक तपशीलवार नकाशा माझ्या डोक्यात फिट्ट बसला.


पहिला आठवडा असा वाया गेल्यानंतर या रटाळ,

कंटाळवाण्या कामात थोडा विरंगुळा, म्हणून मी बिरुरच्या रेल्वेस्टेशनवरच्या पुस्तकाच्या दुकानातून काही हलकीफुलकी पुस्तकं विकत घेऊन आलो.पुस्तक वाचत तो ओंडका आपटताना मी माझे कान मात्र उघडे ठेवले होते.अशाप्रकारे दुसराही आठवडा उलटला,पण वाघाची कुठलीही चाहूल लागली नाही..


आता माझा वैताग वाढू लागला होता आणि एकाच जागी जास्त हालचाल न करता बसून काढल्यानं मी कंटाळलोही होतो.एखादी अजून चांगली काही योजना आखता येईल का,याचा विचार करत मी माझं डोकं बरंच खाजवलं,पण मी करत होतो त्यापेक्षा वेगळं मला काहीही सुचलं नाही.वाघाच्या या भागातल्या आधीच्या फेरीला तीन महिने उलटून गेले होते आणि चौथा महिना सुरू झाला होता.वाघानं आखलेली कार्यक्रमपत्रिका बदलली नसली,तर तो कुठल्याही वेळेस इथे येणं अपेक्षित होतं.

माझं आणि चिकमंगळूर जिल्ह्याच्या डेप्युटी कमिशनरचं असं ठरलं होतं,की त्याच्या अखत्यारीत येणाऱ्या भागात कुठेही मानवी बळी पडला,तर त्यानं ती खबर त्याच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत किंवा जमेल मला तातडीनं पोहोचवायची.त्या काळात अशी तातडीची बातमी पोहोचवण्यासाठी रनर असायचे.दोनच दिवसांत चिकमंगळूर ते साक्रेपटना रस्त्यावरच्या एका वस्तीवर वाघानं माणूस मारल्याची बातमी मला रनरनं दिली.त्या पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी रनर परत आला.त्यानं दिलेल्या खबरीनुसार, आयरनकेरे तलावाच्या उत्तरेच्या तीरावर वाघानं एका गुराख्याला मारलं होतं.

होगारेहळ्ळीपासून नऊ मैलांवरच्या मडक तलावापासून हे ठिकाण पाच मैलांवर होतं.


आत्तापर्यंत आलेल्या या खबरी समाधानकारक होत्या.म्हणजे वाघ आपल्या ठरावीक मार्गानं पुढे येत होता आणि शेवटचा बळी पडल्याची बातमी मला मिळाली,त्याच्या दोन दिवस आधी तो इथून चौदा मैलांवर होता,म्हणजे या कालावधीत तो आता होगारेहळ्ळीच्या आसपास असणं अपेक्षित होतं किंवा आलेलाही असणं शक्य होतं.शिवाय त्यानं शेवटचं खाणं खाल्ल्याला तीन दिवस होत होते,त्यामुळे आता तो नवा बळी मिळवायला नक्कीच आतुर असणार होता.


त्या संध्याकाळी मी मुदलागिरी गौडाला, नरभक्षक वाघ या परिसरात दाखल झाल्यामुळे, होगारेहळ्ळी आणि आसपास राहणाऱ्या लोकांनी,नारळी-पोफळीच्या बागा आणि खुरट्या झुडुपांच्या जंगलापासून काहीही करून दूर राहावं,असा इशारा द्यायला सांगितलं.


दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा जरा जास्तच लवकर मी माझी नेहमीची जागा घेतली,मात्र या वेळेला मी वाचायला पुस्तक आणलं नव्हतं.ह्या वेळेला जमेल तेवढ्या जोरात तो ओंडका आपटून आवाज करायचा,खोकला काढायचा आणि झाडावर जमेल तेवढी हालचाल करायची, जेणेकरून मला त्या वाघाचं लक्ष माझ्याकडे वेधून घेता येईल असा मी विचार केला होता.त्या दिवशी काही झालं नाही.संध्याकाळी गावात परत येताना अचानक हल्ला झाला,तर त्याला तोंड द्यायला मी अत्यंत सावध होतो.असे दोन दिवस गेले,पण काहीच घडलं नाही किंवा कुठेतरी अजून एखादा बळी पडल्याचीही काही बातमी आली नाही.


हा वाघ होगारखान डोंगरातल्या जंगलात निघून गेला की काय?की होगारेहळ्ळीला वळसा घालून वायव्येला लिंगडहळ्ळी,किंवा पश्चिमेला सांतावेरीच्या दिशेला गेला?मला शंका येऊ लागली.


सध्या हवा जरा गरम होती आणि सप्तमी अष्टमी असल्यानं चंद्र अर्ध्यावर असणार होता,त्यामुळे मी पुढचे दोन दिवस दुपारी आणि रात्रीही झाडावरच बसायचं ठरवलं.वाघ रात्रीही माझ्याकडे आकर्षित होईल,अशी मला आशा होती.आधीचे पंधरा दिवस मी अत्यंत तणावग्रस्त अवस्थेत झाडावर बसून काढले होते,पण माझ्या हाती काही लागलं नव्हतं.मला त्याचा शीणही जाणवत होता,पण हाती घेतलेलं कार्य तडीस न्यायचं मी ठरवलं होतं.


दुसऱ्या दिवशी दुपारी मी परत माझी जागा घेतली.ह्या वेळेस मी अशा अवघडलेल्या अवस्थेत रात्र काढायला आवश्यक,म्हणून माझं रात्रीचं जेवण,गरम चहानं भरलेला थर्मास,एक ब्लॅकेट,टॉर्च,पाण्याची बाटली अशा छोट्या मोठ्या गोष्टी आणल्या होत्याच,परंतु रात्री झोप लागू नये म्हणून बेंझेड्रिनच्या गोळ्याही बरोबर ठेवल्या होत्या.


ओंडका आपटण्याचं काम मी जे दुपारी सुरू केलं,ते रात्री पार उशिरापर्यंत चालू ठेवलं.एका शृंगी घुबडाचा घुत्कार आणि लांब कुठेतरी एक जंगली मेंढी ओरडल्याचा आवाज सोडला,तर सारं जंगल त्या रात्री जरा जास्तच शांत होतं.


दीड वाजता चंद्र मावळला.गडद अंधार पडला आणि गारठाही वाढला.तीनच्या सुमारास माझ्या डोळ्यावर झापड येऊ लागली,म्हणून मी बेंझेड्रिनच्या दोन गोळ्या घेतल्या.


अर्ध्या तासानंतर झुडुपात थोडी खसफस झाली आणि पाठोपाठ तरसाच्या हसण्याचा हलका,पण कर्कश्श आवाज आला.एकतर त्यानं मला पाहिलं होतं किंवा त्याला माझा वास आला होता.काही का असेना,ते लपतछपत अंधारात नाहीसं झालं..


पुन्हा एकदा शांतता पसरली ती पहाटेपर्यंत अबाधित राहिली.त्यानंतर मात्र रानकोंबडे बांग देऊन उगवत्या सूर्याचं स्वागत करू लागले.मी अत्यंत सावधगिरीन झाडावरून खाली उतरलो,कसाबसा होगारेहळीला परत आलो आणि चार तास झोप काढली.


सकाळी अकरा वाजता मी पुन्हा एकदा झाडावर होतो.मी इतका थकलो होतो,की मला हे असे फार काळ चालू ठेवता येणं अवघड होतं.गरम दुपार नेहमीसारखी काही न घडता गेली. तांबट पक्ष्याचा 'टोक टोक' आवाज व कोकिळेची 'कुहू कुहू' एवढेच आवाज येत होते.संध्याकाळ जवळ येऊ लागली,तसे गवतातले किडे टिपणारे तितर पक्षी 'कुकुर्रक कुकुर्रक' करू लागले,जसा सूर्य होगारखान पर्वताच्या मागे बुडाला,मोरांनी 'मियाउ मियाउ म्हणत त्याला निरोप दिला.


आता रात्रीच्या पक्ष्यांनी ताबा घेतला आणि ते आकाशात घिरट्या घालत शीळ घालू लागले.दहा वाजून थोडाच वेळ झाला असेल,चितळ 'अय्याव ! अय्याव ! आवाजात सातत्यानं ओरडून धोक्याचा इशारा देऊ लागले.


एक शिकारी जनावर शिकारीला निघालं होतं आणि हा सदैव सावध हरणांना एक तर त्याचा वास आला होता किंवा त्यांनी त्याला पाहिलं होतं.तो एक साधा वाघ होता का नरभक्षक वाघ होता का एखादा बिबळ्या होता,हे कळणं आवश्यक होतं.मी आता जरा जास्त उत्साहाने तो ओंडका आपटून आवाज करू लागलो.. फक्त हे लाकूडतोडे एवढ्या रात्री जंगलात कसे?'अशी शंका त्या वाघाला येणार नाही,अशी मला आशा होती.


मिनिटांमागून मिनिटं जात होती आणि अचानक पॉक पॉक व्हियाँक!" असा धोक्याचा इशारा देत एक नर सांबर अर्ध्या मैलापेक्षा कमी अंतरावरून ओरडलं आणि नंतर होगारखानच्या दिशेने पुढे गेलं,त्यानंतर स्मशानशांतता पसरली एकीकडे तो ओंडका आपटत मी त्या अर्धवट चंद्रप्रकाशात नजरेच्या टप्प्यात येणारं प्रत्येक झुडूप बारकाईनं न्याहाळत होतो आणि वाघ कुठून झाडाकडे येईल व त्याला असलेल्या लपायच्या जागा,याचा अंदाज बांधत होतो.कुठेही काहीही हलत नव्हतं. त्या सांबराच्या ओरडण्यानंतर एकही आवाज आलेला नव्हता.


आता कुठल्याही क्षणी काहीतरी घडणार आहे, अशी एक विचित्र भावना मला सारखी होत होती.माझ्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे, असंही वाटत होतं;परंतु एखादा बारीकसाही आवाज नव्हता.तो ओंडका आपटत,मी जरा खोकलो,थोडा इकडे तिकडे हललो,शेवटी तर मी चक्क उभा राहून खाकरत थुंकलो.तरी काहीच नाही.आणि अचानक तो आला.जादू व्हावी,तसा एक भला मोठा राखाडी आकार जेमतेम दहा यार्डावर असलेल्या झुडुपाआडून प्रकट होऊन, पंख असल्यासारखा,मी बसलेल्या झाडाच्या बुंध्यावर झेप घेत माझ्या खालच्या फांदीच्या दुबेळक्याशी आला.


एक भलंमोठं डोकं माझ्या खालच्या बाजूला फक्त तीन याडांवर अवतीर्ण झालं.मी टॉर्चचं बटण दाबलं आणि त्या प्रकाशात चमकणाऱ्या दोन डोळ्यांच्या मधोमध गोळी झाडली.त्या धमाक्यानं वाघ एक भलीमोठी डरकाळी फोडत मागे जमिनीवर पडला.मी दुसरी गोळी झाडली. पुन्हा एक डरकाळी फोडून तो गायब झाला. शंभर यार्ड अंतरावरून मला 'हर्रफ' असा एक आवाज ऐकू आला,

मग मात्र शांतता पसरली.


मी झाडलेल्या दोन्ही गोळ्या वाघाला नक्की लागल्या होत्या,किमान दुसऱ्या गोळीनं तरी तो मला मारता यायला हवा होता.मात्र मला एवढी खात्री होती,की तो जबर जखमी झाला आहे आणि तो फार दूर जाऊ शकणार नाही.उरलेली रात्र मी डुलक्या मारल्या आणि वाघामागे कशाप्रकारे जाता येईल,हे ठरवायला होगारेहळ्ळीला सकाळी परत आलो..


आल्यावर मी एक छोटीशी झोप काढली,उठून गरमगरम चहा,टोस्ट व बेकनचा नाश्ता करेपर्यंत मुदलागिरी गौडानं कमाल केली.वाघ ज्या झुडुपांमध्ये असायची शक्यता होती,त्या झुडुपांतून आपल्या म्हशी हाकलत नेण्यासाठी त्यानं म्हशींच्या कळपाच्या एका मालकाला तयार केलं होतं.म्हशी जवळ आल्या म्हणजे वाघ आपल्या लपलेल्या जागेतून बाहेर आला असता.


सकाळी नऊ वाजता मी,मुदलागिरी गौडा,दोन वाटाडे,पंधरा म्हशींचा कळप आणि त्याचा मालक,मी जिथे बसायचो,त्या झाडाशी आलो. मी आधी झाडावर चढून,वाघ कुठे दिसतोय का हे पाहिलं पण मला काहीही दिसलं नाही.मी खाली उतरताना झाडाच्या खोडावर,मी झाडलेली पहिली गोळी वाघाच्या चेहऱ्याला किंवा डोक्याला लागून उडालेले रक्ताचे थेंब मला दिसले.खाली उतरल्यावर,तो तिथून ज्या झुडुपामागून गेला,तिथून माग काढताना मात्र, भरपूर रक्त सांडलेलं आम्हाला दिसलं,म्हणजे माझी दुसरी गोळीही वर्मी लागलेली होती.वाघ गेलेल्या दिशेनं आम्ही त्या म्हशींना पांगवून त्यांची एक सैलसर आडवी रांग केली.मी त्या म्हशींच्या मागे चालत होतो.ते दोन वाटाडे माझ्यामागे चालत होते.मुदलागिरी व त्या कळपाचा मालक मी बसायचो त्या झाडावर बसले.आम्ही साधारण दोनशे यार्ड गेलो असू. आम्हाला एक जोरदार गुरगुराट ऐकू आला.म्हशी जागीच थांबल्या आणि मान खाली करत, ज्या दिशेनं आवाज आला,त्या दिशेला शिंगं रोखून त्या उभ्या राहिल्या.


माझ्या थोडं डाव्या बाजूला एक झाड होतं.मी एका वाटाड्याला त्यावर चढून वाघ कुठे दिसतोय का हे बघायला सांगितलं.त्यानं वर चढून पाहिलं आणि खुणेनंच काही दिसत नसल्याचं सांगितलं.दरम्यान,म्हशी थोड्या मागे हटल्या होत्या आणि हाकलूनही पुढे जायला तयार नव्हत्या.त्या म्हशींना तिथेच सोडून मी आणि उरलेला वाटाड्या मागे मुदलागिरीकडे आलो.मी त्याला जाऊन गावातली चारपाच कुत्री घेऊन यायला सांगितलं.तो निघाला लगेचच,पण त्याला परत यायला चांगला दीड तास लागला आणि त्याच्याबरोबर फक्त दोन कुत्री होती. तेवढीच तो मिळवू शकला होता.आम्ही त्या कुत्र्यांना म्हशींवर सोडलं.कुत्री मागे लागली, म्हणून त्या म्हशी पंचवीस एक यार्ड पुढे गेल्या असतील,लगेचच वाघानं भयानक गुरगुराट केला.म्हशी जागीच थांबल्या आणि कुत्री जोरजोरात भुंकू लागली.


मी हळूहळू सर्वात पुढे असलेल्या दोन म्हशींच्या मागे गेलो आणि त्यांच्या पायांमधून मी झुडुपांत लपलेला वाघ दृष्टीस पडतोय का हे बघायचा प्रयत्न केला;पण मला काहीच दिसलं नाही.मी एका म्हशीला पुढे जायला ढोसलं,पण ती गर्रकन माझ्याच दिशेनं वळली.तिच्या लांबलचक अणकुचीदार शिंगांपासून मी थोडक्यात बचावलो.मी अत्यंत बिकट परिस्थितीत सापडलो होतो.माझ्या समोर कुठेतरी तो जखमी वाघ होता,की जो कुठल्याही क्षणी माझ्यावर हल्ला करू शकत होता;तर दुसरीकडे माझ्या आजूबाजूला अस्वस्थ म्हशी होत्या,ज्या कधीही उचकून एकत्र येऊन,माझ्यावर चालून आल्या असत्या आणि जरी त्यांचा मोहरा बाहेर आलेल्या वाघाकडे वळला असता,तरी मी त्यांच्या मार्गात आलो असतो.मी काही पावलं मागे आलो आणि त्या झाडावर बसलेल्या वाटाड्याला खाली उतरायला सांगितलं.त्याच्या व दुसऱ्या वाटाड्याच्या मदतीनं म्हशींच्या पलीकडे जिथून तो वाघ गुरगुरला होता,त्या झुडुपांवर आम्ही दगड फेकायला सुरुवात केली.त्याबरोबर लगेचच तो वाघ पुन्हा गुरगुरू लागला,पण तो लपलेल्या जागेतून बाहेर काही येत नव्हता आणि तिथून निघूनही जात नव्हता.


याचा अर्थ तो चांगलाच जखमी होता आणि तिथून निघून जाता येत नाही,अशी त्याची अवस्था असावी.


यापुढे दगडफेक करून काही फायदा नव्हता. म्हशींना तिथेच सोडून मी ते दोन वाटाडे आणि ती दोन कुत्री बरोबर घेऊन एक भलामोठा वळसा घातला आणि वाघाच्या साधारण तीनशे यार्ड मागच्या बाजूला पोहोचलो.तिथून पुढे मात्र आम्ही अतिशय सावकाश पुढे जाऊ लागलो. माझ्या सूचनेनुसार,वाटेतल्या प्रत्येक झाडावर किंवा उंच जागेवरून तो वाघ दृष्टीस पडतोय का, हे आम्ही पाहात होतो.असे आम्ही सुमारे दोनशे यार्ड अंतर कापले असेल,तेव्हा एका झाडाच्या फांदीवर चढलेला वाटाड्या,त्याला काहीतरी दिसल्याच्या खुणा करू लागला.शेवटी खाली उतरून त्यानं माझ्या कानात फुसफुसत,सुमारे पन्नास यार्डावरच्या झुडुपात,एक पांढरी, तपकिरी रंगाची वस्तू दिसते आहे असं सांगितलं. त्या पलीकडे अजून पन्नास यार्डांवर त्या म्हशी होत्या.


वाटाड्याला ज्या फांदीवरून काहीतरी दिसलं होतं,त्या फांदीवर मी त्याला घेऊन चढलो.त्यानं एका झुडुपाकडे बोट दाखवलं.आधी मला काहीच दिसलं नाही,पण नंतर मात्र मलाही काहीतरी पांढरं तपकिरी दिसलं.मी नेम धरला आणि गोळी झाडली.ही गोळी कुठून आली, याबद्दल वाघाच्या मनात गोंधळ उडाला आणि डरकाळ्या फोडत त्यानं समोरच्या म्हशींवर हल्ला चढवला.सर्वात जवळच्या म्हशीवर त्यानं उडी घेतली.बाकीच्या म्हशी एकत्र आल्या. आपली शिंगं रोखत त्या वाघावर चालून गेल्या. वाघ त्या म्हशीच्या पाठीवर बसून जोरजोरात गुरगुरत होता.


मी झाडावर असल्यानं,मला समोरचं दृश्य अगदी स्पष्ट दिसत होतं,पण मी झाडलेली गोळी त्या म्हशीला किंवा आजूबाजूनं पुढे येणाऱ्या म्हशींपैकी एखादीला लागायची शक्यता होती..


बाकीच्या सर्व म्हशी आता तिथे दाटीवाटीनं शिंगं रोखून पुढे आल्या.आपल्याला उद्भवलेला धोका लक्षात येऊन वाघानं त्या म्हशीवरून उडी मारली आणि पंचवीस एक यार्ड अंतरावरच्या एका झुडुपाआड तो दडला.म्हशींकडे लक्ष ठेवून बसलेला वाघ मला स्पष्ट दिसत होता.माझी गोळी वाघाच्या डाव्या खांद्यामागे घुसली आणि वाघाचा खेळ खलास झाला.


वाघाची नंतर तपासणी केली,तेव्हा मला कळलं,आदल्या रात्री झाडलेल्या गोळ्यांमधली पहिली गोळी डोळ्याच्या दोन इंच खाली लागून तिथल्या हाडाच्या चिंधड्या उडाल्या होत्या. माझी दुसरी गोळी त्याच्या पोटातून आरपार गेली होती,पोटाला पडलेल्या छिद्रातून त्याची आतडी लोंबत होती.माझ्या तिसऱ्या गोळीनं थेट त्याच्या हृदयाचा वेध घेतला होता.कार शिकाऱ्यांनी झाडलेली गोळी लागून त्याचा जबडा मोडला होता आणि तो नीट जुळून आला नव्हता, त्यामुळे त्याला नैसर्गिक खाद्य मिळवायला जबड्याचा वापर करता येत नव्हता. त्याचा परिणाम म्हणून तो नरभक्षक झाला होता.


जी म्हैस त्याच्या ताकदवान पंज्यांनी जखमी झाली होती,तिच्या मालकाला मी नुकसानभरपाई दिली;पण मला खात्री आहे की, 


थोड्याच दिवसांत ती बरी होऊन हिंडू फिरू लागेल,कारण म्हशी मुळातच तब्येतीनं ठणठणीत असतात.


अशाप्रकारे येमेडोड्डीच्या नरभक्षकाची कारकीर्द संपुष्टात आली आणि सर्व जिल्हा भयमुक्त झाला परंतु हे सर्वांनी समजून घायला हवे की, परिणामांची काहीही पर्वा न करता अत्यंत बेजबाबदारपणे वागलेल्या या कार शिकाऱ्यांमुळे एकोणतीस निरपराध लोकांचा बळी गेला होता.


 कथा पुर्ण झाली.मनस्वी धन्यवाद 

नरभक्षकाच्या मागावर - केनेथ अँडरसन

अनुवाद - संजय बापट

२१/१२/२२

येमेडोड्डीचा नरभक्षक.. थरारक शिकार कथा.. भाग - २

पुढे जेव्हा रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर व्हायला सुरुवात झाली,तसा बिबळ्या सरपटत घाणेरी आणि इतर काटेरी झुडुपांच्या भरगच्च गचपणात शिरला होता.आम्ही रांगत किंवा सरपटत गेल्याशिवाय त्यात शिरणं अशक्य होतं. रानडुकरांच्या जा-ये करण्यानं तयार झालेली एक चिंचोळी वाट या गचपणातून जात होती. बिबळ्याही याच वाटेनं गेला होता,कारण या वाटेवर आम्हाला बरंच रक्त सांडलेलं आढळलं.


आम्ही वाकून त्याच वाटेनं जाऊ लागलो.माझी ४०५ विंचेस्टर रायफल कुठल्याही क्षणी गोळी झाडायला सज्ज होती व ती मी माझ्यापुढे धरून बिबळ्याच्या मागावर रांगत चाललो होतो.डाव्या उजव्या बाजूनं किंवा मागून हल्ला झाल्यास बचाव करायला आल्फी माझ्यामागून येत होता. असे आम्ही सत्तर-पंचाहत्तर यार्ड गेलो असू,पुढे वाटेला एक वळण होतं.


कुठलीही पूर्वसूचना नाही,आवाज नाही,धोक्याचा इशारा नाही,अचानक एका क्षणी त्या वळणावर दबा धरून बसलेला बिबळ्या माझ्यावर झडप घालायला झेपावत आला आणि तो जेव्हा आला,तेव्हा तो माझ्यापासून रायफलच्या नळीची जेवढी लांबी असते तेवढ्या अंतरावर होता.ती जागा एवढी चिंचोळी होती आणि अंतर एवढं कमी होतं, की नेम चुकणं केवळ अशक्य होतं.मी झाडलेली गोळी त्याच्या कवटी आणि मेंदूला भेदून आरपार गेली आणि तो माझ्या रायफलच्या नळीच्या पुढच्या टोकाशी मरून पडला.


आम्ही पुढचे दहा दिवस बिरूरला राहिलो. त्या दहा दिवसांत फक्त एक गाय मारली गेली,तीही सातव्या दिवशी दुपारी,येमेडोड्डीपासून सहा मैलांवर.ती बातमी आम्हाला कळून आम्ही तिथे पोहोचेपर्यंत तिचा फडशा पाडला होता,कारण गाईला झाकून ठेवण्याची तसदी कोणीही घेतली नव्हती.ते उरले सुरले अवशेष जिथून दिसू शकतील,असं एक झाड सुमारे चाळीस यार्डावर होतं.

आल्फी त्या झाडाच्या दुबेळक्यात मध्यरात्र उलटून जाईपर्यंत बसला,पण वाघ काही आला नाही.त्यापुढे मात्र काहीच घडलं नाही.अकराव्या दिवशी सकाळी आम्ही बंगलोरला परत गेलो.


त्यानंतर काही दिवसांनी एका अंधाऱ्या रात्री लिंगडहल्ली - बिरूर रस्त्यावरून ज्यांना आम्ही 'कारशिकारी' म्हणतो,

अशी एक चौकडी निघाली.यांना कारशिकारी म्हणायचं कारण, यांना जंगलाचं सौंदर्य,सावजाचा माग काढण्यातला थरार,मोठ्या प्राण्यांच्या शिकारीचं शास्त्र यात काडीमात्रही रस नसतो आणि त्याची पर्वाही नसते.हे रात्री कार काढून निघतात, यांच्याकडे स्पॉटलाईट असतात.ते या स्पॉटलाईटचे झोत टाकत जंगलरस्त्यानं फिरतात आणि या प्रकाशझोतात जो कोणी प्राणी दिसेल किंवा ज्या कोणाचे डोळे चमकलेले दिसतील, त्याला बंदुकीच्या गोळ्या झाडून मारायचं असा त्यांचा एकमेव छंद असतो.ते जनावर नर आहे का मादी,वयानं लहान आहे का मोठं,ते गोळी लागून जखमी झालंय का मेलंय - या कुठल्याही गोष्टीचा त्यांना विधिनिषेध नसतो आणि ते त्याची खात्री करायचीही तसदी घेत नाहीत.किंबहुना कारमधून फिरताना मध्ये कुठेही ते खाली उतरून जमिनीवर पायही ठेवत नाहीत.हे वर्तन सर्व नियमांच्या विरुद्ध आहे;परंतु अशा घटना घडतात,ही वस्तुस्थिती आहे.


तर झालं असं,की हे कारशिकारी रात्री निघाले. बिरूरपासून चारेकमैल अंतरावर स्पॉटलाईटच्या प्रकाशझोतात त्यांना रस्त्याच्या कडेच्या बांधावरून वर येणाऱ्या एका वाघाचे डोळे चमकलेले दिसले. दोन गोळ्या झाडल्याचा आवाज घुमला.तो वाघ उडी मारून नाहीसा झाला.त्याच्या जबड्याच्या खालच्या बाजूला गोळी लागली होती,


दुसरीचा मात्र नेम चुकला होता.ह्या कारशिकाऱ्यांनी थांबून,आपण झाडलेल्या गोळ्यांचं काय झालं,याचा काहीही तपास केला नाही हे वेगळं सांगायची गरज नाही. जखमी वाघाचा माग काढावा,जमलं तर त्याला मारून वेदनामुक्त करावं,असा विचारही ह्या लोकांच्या मनात आला नाही.


त्या जखमी झालेल्या वाघानं दोन महिने तरी अत्यंत वेदना सोसल्या असाव्यात आणि जखम भरून येताना त्याचा जबडा वेडावाकडा जुळून आला असावा,ज्यामुळे तो त्याचं नैसर्गिक खाद्य मिळवू शकला नसावा आणि त्याची उपासमार झाली असावी.


त्यानंतर साधारण तीन महिन्यांनी जंगलात चरणाऱ्या शेळ्यामेंढ्यांच्या कळपाजवळ अतिशय सावधगिरी बाळगत दबक्या पावलांनी जाऊन एका वाघानं एका धष्टपुष्ट शेळीवर झडप घातली.वाघ जनावराला मारताना त्याची मान मोडतात,तसं न करता त्यानं त्या शेळीला पुढच्या पंजाचा एक जोरदार तडाखा दिला होता.नेमका  गुराखी जवळच होता.त्यानं धाडसानं आपल्या हातातली काठी त्या वाघाला फेकून मारली.ती त्या वाघाला ओझरती लागली,त्यामुळे चिडून वाघ त्या गुराख्यावर धावून आला.त्याच्या पंज्याच्या एका फटक्यात त्या माणसाच्या डोक्यावरची त्वचा संपूर्ण फाटली.घाबरून व वेदनेनं त्यानं फोडलेली किंकाळी वाघाच्या पंज्याच्या दुसऱ्या तडाख्यानं बंदच झाली,कारण एखादं अंडं फुटावं तसा त्याच्या कवटीचा चेंदामेंदा झाला होता.


तो माणूस खाली कोसळला.आता वाघापुढे दोन बळी होते.एक ती शेळी व दुसरा माणूस त्या वाघाची व्दिधा मनःस्थिती झाली.त्यानं फुटलेल्या कवटीतून वाहणारं रक्त चाटून पाहिलं,जणू तो चवीचवीतला फरक तपासून पाहात होता.नंतर त्यानं त्या शेळीच्या मानेला धरून तिला उचललं व तो जंगलातल्या झुडुपांकडे जाऊ लागला.पण अचानक काय झालं कोण जाणे,आपल्या तोंडातली शेळी खाली टाकून तो वळला आणि त्या गुराख्याच्या खांद्याला तोंडात धरून तो जंगलात निघून गेला.


येमेडीच्या नरभक्षकाची भीतिदायक कारकीर्द सुरू झाली.त्यानंतर साधारण अडीचशे चौरस मैल परिसरात पडलेले बळी हे या वाघाच्या खात्यावर मांडले गेले.

बिरूर,लिंगडहळ्ळीहून उत्तरेकडे भागवतकट्टे,तिथून पश्चिमेला बाबा बुडान पर्वतरांगेतील सांतावेरी,तिथून खाली दक्षिणेस आयरन कोटे तलाव आणि बिरूर एवढी या भीतीग्रस्त परिसराची व्याप्ती होती.


एकापाठोपाठ एक सातत्यानं माणसं मारली जाऊ लागली.हे बळी पडण्यात एक सुसूत्रता होती,ती म्हणजे ते ठरावीक वाटांवर पडत होते व प्रत्येकजण जबड्यानं चावा घेतल्यानं न मरता पंज्याच्या जबरदस्त तडाख्यानं मारला गेला होता.तसेच मारले गेलेल्यांच्या प्रेताची तपासणी केल्यावर असं दिसलं,की सर्व प्रेतांवरचं मांस वाघानं आपल्या ताकदवान पंजांच्या नखांनी ओरबाडून काढून खाल्लं होतं.याचा निष्कर्ष असा निघत होता,की 


वाघाच्या खालच्या जबड्याला दुखापत झाल्यानं त्याला त्याचा वापर करता येत नव्हता.


या नरभक्षकाचं आगमन झालं आणि पूर्वी,मी येमेडोड्डी व लिंगडहळ्ळीला गाईगुरं मारणाऱ्या एका जवान वाघाचा उल्लेख केला होता,त्या वाघाचा उपद्रव एकदमच थांबला.

हा तोच वाघ होता,जो नरभक्षक झाला होता,असं मानायला जागा होती.कारशिकाऱ्यांनी केलेला उपद् व्याप

बरेच दिवस कोणाला माहीत नव्हता;परंतु त्यातल्या एकानं आपण बिरूर लिंगडहळ्ळी रस्त्यावर एका - वाघावर गोळी झाडून त्याला जखमी केल्याची गोष्ट,मोठी फुशारकी मिरवत सांगितली आणि सर्व चित्र स्पष्ट झालं.


या वाघाचा संचार साचेबद्ध मार्गावरून होता.मी वर सांगितलेल्या ठिकाणांच्या आजूबाजूला असलेल्या खेडेगावातली आणि वस्त्यांवरची माणसं हा सातत्यानं मारायचा.वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या वाचून,

माझ्याकडे असलेल्या या भागाच्या नकाशावर,वाघाच्या हालचाली कुठे व कशा होतायत ते,आणि त्यानं माणसं मारलेल्या ठिकाणांची नावं व तारखा यांची नोंद ठेवायला मी सुरुवात केली...


या सर्व परिसराच्या केंद्रस्थानी 'होगारखान' नावानं ओळखला जाणारा आणि साधारण ४५०० फूट उंच असलेला डोंगर होता.याच्या पायथ्याशी असलेल्या टेकड्या घनदाट जंगलानं भरलेल्या होत्या.इथे मनुष्यवस्ती जवळजवळ नव्हती.माझ्या अंदाजानं,याच भागात या वाघाचं वास्तव्य होतं आणि इथूनच तो मनुष्यवस्तीत येऊन सातत्यानं मनुष्यबळी घ्यायचा.माझ्या नकाशावरच्या नोंदींवरून असं दिसत होतं,की साधारण दर तीन महिन्यांनी,त्याची आधीच्या ठिकाणी परत फेरी व्हायची.या वाघानं घेतलेल्या बळींची संख्या आता सत्तावीसवर पोहोचली होती.


या वाघाला मारायला मी होगारेहळ्ळी नावाच्या खेड्यात मुक्काम करायचं ठरवलं.हे खेडं बिरूर आणि लिंगडहळ्ळीच्या मध्यावर होतं आणि होगारखान डोंगराच्या पायथापासून जेमतेम साडेतीन मैलांवर होतं.हा भाग खुरट्या झुडुपांनी व्यापलेला होता.मी हे ठिकाण निवडायची दोन कारणं होती.एक म्हणजे हा परिसर व इथलं जंगल माझ्या पूर्ण परिचयाचं होतं आणि इथले रहिवासीही माझ्या परिचयाचे असल्यानं त्यांच्याकडून मला बऱ्यापैकी सहकार्य मिळेल, अशी मला आशा होती,या वाघाचं वास्तव्य होगारखान डोंगराच्या पायथ्याला असावं,याची मला खात्री होती.आणि सर्वात महत्त्वाचं कारण हे,की वाघाची पुढची फेरी सुरू झाली,की इथे हमखास बळी घेतला जायचा.


या वाघाचा फेरा साधारण तीन महिन्यांनंतर पुन्हा या गावातून जाईल,अशा अंदाजानं,त्याच्या सहा आठवडे आधी,मी त्या गावात दाखल झालो.त्यामुळे मला लोकांशी संवाद साधायला मिळाला.एवढे बळी कुठे व कसे पडले,

याची माहिती तर मला मिळालीच;परंतु तो पुन्हा या भागात जेव्हा येईल,तेव्हा काय योजना करावी, हेही ठरवायला वेळ मिळाला.


होगारेहळ्ळी हे गाव जुनं होतं.इथे मजबूत बांधणीची दोन सुरेख पुरातन मंदिरं होती.गाव तसं मोठं होतं,परंतु लोकवस्ती मात्र फार नव्हती. इथली घरं इथेच मिळणाऱ्या,

लालसर रंगाच्या दगडात बांधलेली होती.याच्या दक्षिणेकडे विस्तीर्ण असा एक सुंदर तलाव होता.त्यात पाणपक्षी आणि बदकं मुबलक प्रमाणात होती. या गावाच्या आग्नेयेला नारळी आणि पोफळीच्या बागा होत्या.इथली जमीन जरा खोलगट होती आणि या बागांमुळे ती कायम ओलसर असायची.इथल्या पोफळींचे सरळसोट शेलाटे बुंधे त्यावर वाढलेल्या नागवेलींनी पूर्णपणे वेढून टाकले होते.संपूर्ण भारतात लोक जी पानं खातात,ती ह्या नागवेलीची पानं असतात,ह्या पानांना चुना लावून त्यात कात आणि सुपारी घालून ती खाल्ली जातात.


गावाच्या पूर्व व उत्तर दिशांना काही भाताची शेतं आणि कोरडवाहू जमिनी होत्या.पश्चिम आणि वायव्य दिशांना मात्र होगारखानच्या दिशेनं जाणारं खुरट्या झुडुपांचं दाट रान होतं.


तुम्हाला आता लक्षात आलं असेलच,की या खुरट्या झुडुपांच्या रानातच सर्वात जास्त बळी पडले होते.दोन बळी नारळी-पोफळीच्या बागांमध्ये पडले होते.बाकीचा सर्वसाधारण उजाड भाग मात्र हा वाघ कटाक्षानं टाळायचा. जेव्हापासून हे बळी पडू लागले,तेव्हापासून गावकरी अंधार पडायच्या आत घरात जाऊन दारं बंद करायची खबरदारी घेऊ लागल्यानं आता बळी दुपारी पडू लागले होते.गावाच्या वेशीच्या आसपास बरेचदा वाघाचे ठसे आढळले होते,पण पक्की बांधलेली घरं व मजबूत लाकडी दारांमुळे तो कुठल्याही घरात निदान आत्तापर्यंत तरी शिरू शकला नव्हता..


एकंदर परिस्थिती लक्षात घेता वाघाला मारण्यासाठी काही योजना बनवणं अवघड होतं आणि मला हे माहिती होतं,की वाघानं इथे एखादा माणूस मारला,की पुढचे तीनचार महिने तो होगारेहळ्ळीला परत येणार नव्हता आणि त्यानंतर,कुठेतरी अजून एखादा माणूस मारला जाईपर्यंत ह्या वाघाचा ठावठिकाणा समजणं केवळ अशक्य होतं.


आता मला एकच पर्याय सुचत होता, खरंच सांगतो,तो मला अजिबात रुचलेला नव्हता,तो पर्याय म्हणजे मीच आमिष म्हणून वाघाला आकर्षित - करायला बसायचं !


मला होगारेहळ्ळीला येऊन एक आठवडा होऊन गेला होता. मी वाघांबद्दल मिळेल तेवढी सर्व माहिती घेतली होती. जिथे जिथे बळी पडले,त्या सर्व जागी मी स्वतः जाऊन कशा पद्धतीनं आणि परिस्थितीत हे बळी पडले,हे जाणून घेतलं.आता तो नरभक्षक कधीही इथे येणं अपेक्षित होतं आणि ताबडतोब काहीतरी ठरवणं आवश्यक होतं. 


खुरटी झुडुपं असलेल्या परिसरात सर्वात जास्त बळी जे पडले होते,ते एकतर लाकूडतोडे होते किंवा गुराखी होते.या परिसरात बिबळ्यानं एखाददुसरी गाय मारली होती,पण या वाघानं एकाही गुराला साधा ओरखडाही काढला नव्हता.तेव्हा मला जी कल्पना सुचली, ्ती एवढी कमाल होती,की मी स्वतःचीच पाठ थोपटली.मी त्या परिसराच्या अर्धा मैल आत एका झाडावर पंधराएक फूट उंचीवर,जिथे वाघाची उडी पोहोचणार नाही,अशा एका फांदीवर एक खुर्ची चढवून बसवली.त्यानंतर मी एक सहा फूट लांबीचा आणि तीन इंच व्यासाचा एक लाकडाचा ओंडका घेतला,त्याच्या एका टोकाला एक मजबूत दोर बांधून मी तो वरच्या एका फांदीला असा लटकावला,की त्याचं खालचं टोक हे माझ्या खालच्या एका फांदीपर्यंत येईल.नंतर मी त्या दोराच्या दुसऱ्या टोकाचा फास करून तो माझ्या बुटाच्या पुढच्या भागात अडकवला.आता मी खुर्चीत रायफल घेऊन आरामात बसून माझं पाऊल वरखाली केलं,की तो ओंडका वर उचलला जाऊन खालच्या फांदीवर आपटणार होता आणि रानात लाकडं तोडताना लाकूडतोड्यांचा जसा आवाज येतो, तसा आवाज होणार होता.ही दोरी मी थोडी लांबच ठेवली होती,याचं कारण,पाऊल दमलं, तर मी ती हातानं खालीवर ओढून आवाज करू शकलो असतो.दुसरं म्हणजे ती दोरी जरा जास्त वर ओढून खाली केली,तर तो ओंडका जोरानं फांदीवर आपटून मोठा आवाज आला असता. मला ऊन लागू नये,म्हणून माझ्या डोक्यावरच्या फांद्याच मी जरा डोक्यावर ओढून घेतल्या.


आता मला आखडून बसायची काहीच आवश्यकता नव्हती.मी आरामात बसून खाऊपिऊ शकणार होतो,धूम्रपान करू शकणार होतो आणि खोकलो तरी चालणार होतं,कारण मी आमिष म्हणूनच बसलो होतो. वाघ जवळपास आला,तर माझ्याकडून झालेल्या आवाजानं तो निश्चितच माझ्याकडे आकर्षित होऊन लपतछपत माझ्यावर हल्ला करणार होता आणि मलाही तेच हवं होतं..


होगारेहळ्ळीचा सरपंच मुदलागिरी गौडानं मला पूर्ण सहकार्य केलं.मी त्याला माझी योजना समजावून सांगितली आणि हेही बजावून सांगितलं,की ज्या दिवसापासून मी माझी योजना अमलात आणून झाडावरच्या खुर्चीत बसायला सुरुवात करीन,त्या दिवसापासून त्या नारळीपोफळीच्या बागांमध्ये किंवा खुरट्या झुडुपांच्या रानात कोणीही फिरकता कामा नये. त्यानंही मला भरवसा दिला,"ही जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवलेली आहे,आता ती अंमलात आणायचं काम माझं." वाघाला त्या परिसरात कोणी आढळलंच नसतं,तर तो माझ्याकडे आकृष्ट होण्याची शक्यता वाढली असती.त्या सरपंचानं दवंडी पिटून सर्व गावकऱ्यांना ही गोष्ट कळवली आणि वेळप्रसंगी दमदाटी करूनही, दुपारनंतर त्या खुरट्या झुडुपांच्या रानात,दोन तीन आठवडे फिरकायचं नाही,अशी सक्त ताकीद त्यानं गावकऱ्यांना आणि आसपासच्या परिसरातल्या लोकांनाही दिली.


तिथल्या गुरांना तीन आठवडे चरता येईल एवढं गवत गावाच्या जवळपास होतं,एवढ्या काळात वाघ येईल अशी मला आशा होती,वाघाचा फेरा इथे येण्याची शक्यता असल्याचा आगाऊ इशारा गावकऱ्यांनाही मिळाला होता.आता हे दोन-तीन आठवडे कुठेही बाहेर न जाता आळसात घालवायचे,म्हणून गावकरीही मनातून खूश झाले.मी होगारेहळ्ळीला आल्यापासून बरोबर दहाव्या दिवशी दुपारी बाराच्या आत पाण्याची बाटली,थोडे सँडविच,माझा ओढायचा पाईप आणि अर्थातच माझी ४०५ विंचेस्टर रायफल घेऊन मी झाडावर बैठक मारली.तो माझा पहिला दिवस.थोड्याच वेळात पाऊल वरखाली करून तो ओंडका आपटत राहणं नुसतंच कंटाळवाणंच नाही,तर थकवणारंही होतं,हे मला चांगलंच कळलं.त्यात भरीस भर म्हणून दुपारच्या कडक उन्हात चहूबाजूला त्या झुडपांच्या दाट जंगलाकडे बघताना माझे डोळेही शिणले.


उर्वरीत कथा पुढील भागात.. ( अपुर्ण ) 


नरभक्षकाच्या मागावर - केनेथ अँडरसन

अनुवाद - संजय बापट

१९/१२/२२

येमेडोड्डीचा नरभक्षक.. थरारक शिकार कथा..

म्हैसूर प्रांतातल्या कडूर जिल्ह्यामध्ये,येमेडोड्डीचं जंगल येतं.'बाबाबुडान' नावानं ओळखल्या जाणाऱ्या साडेसहा हजार फूट उंच पर्वतराजीच्या पूर्वेकडे पसरलेल्या डोंगररांगा या येमेडोड्डीच्या जंगलाच्या सभोवती आहेत.याच्या सीमेवर 'मडुक' नावाचं चहुबाजूंनी जंगलानं वेढलेलं एक अतिशय सुंदर सरोवर आहे.या सरोवरापासून पाण्याचा एक अरुंद पाट निघून,तेवढ्याच अरुंद जंगलवाटेसोबत ईशान्येकडे दहा मैल जाऊन, बिरूर नावाच्या एका छोट्या शहराच्या उत्तरेला तीन मैलांवरच्या एका छोट्या तलावाला मिळतो.


ह्या सर्व परिसरात वन्य प्राण्यांचं अस्तित्व खूप मोठ्या प्रमाणावर आहे,इथे गाईगुरांचे कळपही बरेच आहेत.

त्यांना सकाळी चरायला नेऊन संध्याकाळी परत आणलं जातं.असं असल्यावर इथे भरपूर वाघ नसतील, तरच नवल. इथे मुबलक आढळणारी रानडुकरं,सांबर व चितळ हे खरं वाघाचं मुख्य खाद्य,परंतु शिकारीपेक्षा गुरांना मारणं सोपं असल्यानं हे वाघ कालांतरानं गुरांची शिकार करू लागतात,आणि वाघ गुरं मारणारच,म्हणून गुराखीही फारशा गांभीर्यानं त्याची दखल घेत नसत.


 दररोज एखादी तरी गाय किंवा बैल मारला जायचा.

बिबळे वासरं,शेळ्या आणि गावातली कुत्री मारायचे.बिरूर गावातली ही नित्याचीच बाब होती.


वाघांपेक्षा बिबळे संख्येने कमी होते व वाघांच्या भीतीनं,ते वाघांचं वास्तव्य असलेल्या ठिकाणी न राहता,सहसा गावाच्या वेशीच्या आसपासच असायचे.


१९४६ च्या सुरुवातीला एक लहान नर वाघ इथे दिसू लागला.संध्याकाळी गाईगुरं परत येताना, बिरूरच्या वेशीवरच,त्यानं वासरं,शेळ्या,मेंढ्या उचलायला सुरुवात केली.


वाघ जनावरं मारताना त्यांची मान मोडतात,

कधीकधी मोठ्या आकाराचे बिबळे,ज्यांना स्थानिक भाषेत 'तेंदू' म्हणून ओळखलं जातं,तेही याच पद्धतीनं शिकार करतात,त्यामुळे हे काम बिबळ्याचंच असावं असा समज होता परंतु एकदा एका जवान गाईला मारताना त्याला एका गुराख्यानं पाहिलं आणि तो वाघच असल्याचं स्पष्ट झालं.


हा वाघ कुठल्याही देशी किंवा विदेशी शिकाऱ्याच्या गोळीला बळी न पडता झपाट्यानं वाढत गेला,

त्याचबरोबर तो अधिकच धाडसी आणि धूर्त बनला.

पुढच्या अठरा महिन्यांत त्यानं दर आठवड्याला दोन किंवा कधीकधी तीन गुरं मारली.हा तिथल्या गुराख्यांची मोठी डोकेदुखी होऊन बसला होता.


ह्या वाघाच्या उपद्रवाच्या बऱ्याच बातम्या माझ्यापर्यंत पोहोचल्या होत्या.१९४८ सालच्या अखेरीस माझा मित्र आल्फी रॉबर्टसन लवकरच इंग्लंडला परत जाणार होता.

त्याला भारतातील एक आठवण म्हणून वाघाचं एखादं कातडं मिळालं तर हवं होतं.आम्ही बिरूरला काही दिवस राहिलो,तर त्या उपद्रवी वाघालाही मारता येईल आणि आल्फीला कातडंपण मिळेल असा विचार करून मी मित्रांबरोबर - येमेडोड्डीला जायचं ठरवलं.


बंगलोरहून आम्ही निघालो.आम्हाला १३४ मैल अंतर जायचं होतं.त्या दिवशी नेमका मला ऑफीसमधून निघायला वेळ लागला आणि आम्ही संध्याकाळी उशिरा निघालो.रस्ते बरेच खराब होते.बंगलोरपासून ८६ मैलांवर तिपतूर इथे आमच्या गाडीला एक अपघात झाला. आम्ही माझ्या मित्राच्या गाडीनं जात होतो, गाडीही तोच चालवत होता.एका सपाटशा दगडावरून गाडीचं चाक गेलं,ते दगडाच्या पुढच्या भागावरून जाताना त्याचा मागचा भाग उचलला गेला आणि गाडीच्या मागच्या बाजूला असलेल्या पेट्रोलच्या टाकीवर तो खाड्कन आपटून टाकीला चांगली नऊ इंचांची चीर गेली. टाकीतलं आठ गॅलन पेट्रोल गळून रस्त्यावर सांडलं आणि गाडी जागेवर बंद पडली. आमच्याजवळ जादाचं पेट्रोल नव्हतं,पण प्रायमस स्टोव्ह होता आणि त्याला लागणाऱ्या पॅराफिन तेलाच्या दोन बाटल्या होत्या,शिवाय फुटपंपही होता.आम्ही त्या पंपाच्या नळीचं एक टोक एका बाटलीत घातलं, तोंडानं दुसऱ्या टोकातून तेल ओढून घेत ते कॉरबुरेटरला जोडलं व गाडी चालू करून तिपतूरमध्ये पोहोचलो.तिथे किरकोळ दुरुस्ती करणारा एकच माणूस होता.त्याला आम्ही उठवलं.एका घराबाहेर आम्हाला एक पॅराफिनचा रिकामा डबा मिळाला.त्या डब्याच्या पत्र्यानं त्या पेट्रोलच्या टाकीची चीर आम्ही झाकून दुरुस्त करून घेतली.तिपतूरच्या एकमेव पेट्रोलपंपापर्यंत गाडी ढकलत नेल्यावर आम्हाला कळलं,की तिथलं पेट्रोल संपलं आहे आणि नवीन साठा दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत येईल.आम्ही चांगलेच अडकलो होतो.दुसरा पंप सोळा मैलांवरच्या आर्सीकेरी गावात होता.तिथपर्यंत जाण्यापुरतं पेट्रोल मागायला आम्ही एकदोन ट्रक ड्राइव्हरनाही उठवलं.त्यांना अवाच्यासवा पैसेही देऊ केले, पण "आमच्याही गाड्यांमधलं पेट्रोलही संपलंय आणि आम्ही पण उद्या येणाऱ्या पेट्रोलच्या गाडीची वाट बघतोय," असं त्यांनी आम्हाला सांगितलं.


आता मात्र आम्ही आमची सदसद्विवेकबुद्धी, चांगुलपणा गुंडाळून ठेवला.आम्ही तो मघाचचा डबा आणि एक रबरी नळी घेतली आणि तिपतुरच्या निद्रिस्त रस्त्यांवरून लपतछपत निघालो.एका गल्लीत आम्हाला एक फोर्ड गाडी उभी दिसली.त्या गाडीचा मालक जागा झाल्यास त्याच्यावर नजर ठेवायला मी आल्फीला सांगितलं आणि आवाज न करता हळूच त्या गाडीच्या पेट्रोलच्या टाकीचं झाकण उघडलं. रबरी नळीचं एक टोक टाकीत घालून दुसऱ्या टोकातून तोंडानं पेट्रोल ओढून मी ते माझ्या मांडीत धरलेल्या डब्यात जमा केलं.असं पुन्हा एकदा करून जमा झालेलं पेट्रोल घेऊन आम्ही घाईनं गाडीशी आलो.पेट्रोल आणि उरलेलं पॅराफिन एकत्र करून आम्ही गाडी सुरू केली आणि आसंकिरीला आलो.


या सगळ्या गोंधळामुळे बिरूरला पोचायला आम्हाला सकाळचे साडेसात वाजले.गावातून आम्ही जंगलाच्या दिशेनं साधारण दोन मैल गेलो असू,रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या एका मोकळ्या जागेत आम्हाला बरीच गिधाडं जमलेली दिसली.माझा मित्र फोटो काढू लागला, तोपर्यंत मी ती गिधाडं जमण्याचं कारण बघायला गाडीतून उतरलो.एक तरुण बैल तिथे मरून पडला होता.


त्याच्या गळ्यावरच्या सुळ्यांच्या खुणा बघून,हे काम बिबळ्याचं आहे,हे स्पष्ट होतं.त्याच्या मानेचे मणके मोडलेले असते,तर तो वाघानं घेतलेला बळी आहे,असं नक्की झालं कारण 


वाघांची जनावर मारायची पद्धत तशी असते.

दुसरं म्हणजे बैलाच्या पोटाकडचा भाग खाल्लेला होता आणि आतडी तशीच आत होती.म्हणजे बैलाला बिबळ्यानंच मारलं होतं.वाघ स्वच्छतेचे भोक्ते असतात.खाणं सुरू करायच्या आधी ते जनावराच्या पोटातील घाण खाण्यात मिसळू नये म्हणून,त्याचा मागचा भाग फाडून त्याची आतडी काढून ती दहाएक फूट अंतरावर नेऊन ठेवतात.


इतक्या लगेच आमचं नशीब उघडलं,म्हणून आम्ही खूश झालो.गिधाडांपासून संरक्षण करण्यासाठी रस्त्याच्या कडेच्या झुडुपांमधून आम्ही काही फांद्या तोडून तो मेलेला बैल झाकला आणि त्या झुडुपांमध्येच आम्हाला लपून बसता येईल,अशी एक छान जागा तयार केली. आता संध्याकाळी हा बिबळ्या नक्की सापडेल आणि गाडीमुळे रात्री झालेल्या त्रासाची भरपाई होईल,या विचारानं आल्फीलाही बरं वाटलं.


तिथून काही अंतरावर जाऊन आम्ही खाल्लं. रात्री जागरण करायचं असल्यानं झोप काढली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही त्या मेलेल्या बैलाशी आणि आम्ही केलेल्या लपणाशी आलो. त्या बैलावर झाकून ठेवलेल्या फांद्या आम्ही बाजूला केल्या.आल्फी रायफल,

टॉर्च,पाण्याची बाटली आणि ब्लॅकेट घेऊन लपणात शिरला.मी गाडी घेऊन बिरूरला परत जायच्या बेतात होतो, तेवढ्यात एक गुराखी धापा टाकत तिथे आला आणि अर्ध्या तासापूर्वी,मैलभरापेक्षा कमी अंतरावर,

वाघानं आपली दुभती गाय मारल्याची खबर त्यानं दिली.


वाघाला मारून त्याचं कातडं मिळवायचं,का बिबळ्याला मारून त्याचं - हा निर्णय मी आल्फीवर सोपवला.आम्ही केलेली तयारी बघता बिबळ्याला नक्की मारता येणार होतं,वाघाला मारता येईलच याची खात्री नव्हती;परंतु आल्फीनं वाघाला मारायचं ठरवलं.आम्ही लपण करायला वापरलेलं सर्व साहित्य काढून गाडीत भरलं आणि वेगानं गाडी चालवत निघालो. जाताना त्या गुराख्यालाही आम्ही सोबत घेतलं. त्यानं सांगितलेल्या ठिकाणी गाडी थांबवून आम्ही गाडीतलं लपणाचं सर्व साहित्य बरोबर घेतलं आणि गाय जिथे मारली होती,तिथे चालत निघालो.


आम्हाला फार लांब जायला लागलं नाही. जेमतेम तीन फर्लांगावर ती मेलेली गाय पडली होती.तिची मान मोडली होती आणि नाकातून अजूनही फेसाचे बुडबुडे येत होते.गुराख्यामुळे किंवा गाईंबरोबर जवळच चरत असलेल्या म्हशींमुळे असेल,वाघ एक लचकाही न तोडता निघून गेला होता.


सहा वाजले होते व झपाट्यानं अंधार पडू लागला होता.दुर्दैवानं जवळपास एकही झाड किंवा लपून बसता येईल अशी जागा नव्हती. आमच्यापुढे दोनच पर्याय होते.एकतर गाईला इथंच सोडून परत जायचं,नाहीतर जमिनीवरच कुठेतरी बसून,वाघ परत येईल,तेव्हा त्याच्यावर गोळी झाडायची जोखीम पत्करायची.


आल्फीला काहीही करून इथेच थांबायचं होतं. शेवटी आम्ही गुराख्याच्या मदतीनं आजूबाजूच्या काही फांद्या व आमच्याजवळचं साहित्य घेऊन एक ओबडधोबड लपण तयार केलं आणि साडेसहा वाजता आम्ही सगळेच त्यात घुसलो.


आता जवळजवळ पूर्ण अंधार पडत आला होता. पंधरा मिनिटांतच पंचवीस यार्डावरची ती मेलेली गाय दिसेनाशी झाली.अमावस्येची अंधारी रात्र होती.चांदण्यांच्या मंद प्रकाशात आम्हाला अगदी जवळचंच,जरा जरा दिसत होतं;पण गाय मात्र दृष्टीस पडत नव्हती.


एक तास गेला आणि साधारण अर्ध्या मैलावरून एका कोल्ह्याची कोल्हेकुई ऐकू आली.तो विचित्र आवाजात ओरडत होता.कोल्हे सहसा टोळीनं गावाच्या किंवा शहराच्या वेशीजवळ आढळतात. रात्री ते वस्तीत शिरून,काही खायला मिळतंय का,हे बघतात.रात्री होणारी त्यांची कोल्हेकुई सर्व भारतीयांना ओळखीची आहे.


असा एकटा फिरणारा कोल्हा मात्र,जरा वेगळ्या आवाजात ओरडतो.अशा एकट्या कोल्ह्याबाबत बरंच काही लिहिलं गेलं आहे आणि बरेच काही समज,आख्यायिका,अंधश्रध्दा आहेत.यातल्या दोन महत्त्वाच्या समजांपैकी एक म्हणजे - हा कोल्हा वाघ किंवा बिबळ्या,जास्त करून वाघाबरोबर असतो तो आपल्या विचित्र ओरडण्यानं वाघाला शिकार कुठे असेल,याची जाणीव करून देतो व त्याचा मोबदला म्हणून, वाघाचं खाणं झाल्यावर,त्यातला वाटा मिळवतो.


 दुसरा समज म्हणजे - एका ठरावीक वाघाबरोबरच हा जोडी जमवतो.त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर राहात तो आपल्या खाण्याची सोय करतो.यातलं काहीही खरं असलं तरी, एका कोल्ह्याची कोल्हेकुई म्हणजे वाघ किंवा बिबळ्या जवळपास असल्याचं चिन्ह आहे,हा अनुभव मी भारतातल्या अनेक जंगलांमध्ये घेतला आहे.


म्हणून त्या रात्री तो कोल्हा ज्या पद्धतीनं ओरडला,

त्यावरून आम्हाला गाईला मारणाऱ्या वाघाची वर्दी मिळाली.त्यानंतर दहाच मिनिटं गेली असतील,त्या गाईच्या पलीकडच्या बाजूनं 'ओऊंघ' 'ओऊंघ' असा वाघाच्या ओरडण्याचा आवाज आला. वाघ खरंच आला होता. मी आल्फच्या मांडीला हलकेच ढोसले,पण तोही तयारच होता.थोडा वेळ गेला आणि झुडुपात किंचित खसफस झाली. त्यापाठोपाठ एक धप्पसा व काहीतरी ओढल्याचा आवाज आला. 

 आल्फीने टॉर्चचे बटण दाबले,परंतु सभोवतालच्या अंधारात दुर्दैवानं टॉर्चचा प्रकाशझोत मेलेल्या गाईवर नेमका पडायच्या ऐवजी गाईच्या डावीकडे पडला.तेवढा इशारा त्या वाघाला पुरेसा होता.गुरगुर करत एका क्षणात तो उडी मारून झाडीत नाहीसा झाला.


वाघ आता परत येणार नव्हता आणि तिथे थांबणं व्यर्थ होतं,हे माहीत असूनही आम्ही तासभर तिथे थांबलो.

त्यानंतर मैलभर अंतरावरच्या डोंगराच्या माथ्यावरून आम्हाला वाघाच्या ओरडण्याचा अस्पष्टसा आवाज आला. आम्ही जरा निराश होऊन आवराआवर केली आणि गाडीपाशी आलो,तर आल्फीला गाडीची किल्लीच सापडेना.ती सापडेपर्यंत रात्रीची लिंगडहळ्ळीहून बिरूरला जाणारी बस आम्हाला ओलांडून पुढे गेली.

आम्ही तिच्यामागोमाग जात बिबळ्याला मारण्यासाठी जे लपण केलं होतं, तिथपर्यंत आलो.तेव्हा,समोर आम्हाला जे दृश्य दिसलं,ते पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. बसच्या दिव्यांच्या उजेडात,आपण मारलेल्या बैलाला खात बसलेल्या बिबळ्याचे डोळे चमकत होते.बसच्या ड्रायव्हरनं ते पाहून करकचून ब्रेक मारत बस थांबवली.


बस थांबताना उडालेल्या धुरळ्यात मी आणि आल्फी गाडीतून खाली उतरून धावत बसच्या पुढे आलो.

आम्हाला तो बिबळ्या पलीकडचं शेत अर्ध ओलांडून जाताना दिसला.आल्फीनं गोळी झाडली. बिबळ्या जोरात 'गर्रर्र' आवाज करत हवेत उसळला आणि अतिशय वेगानं ते शेत ओलांडत नाहीसा झाला.


आम्ही चूक केली होती,पण आता त्याचा विचार करून काही फायदा नव्हता... आम्ही आल्फीला खाली उतरवून बसच्या मागोमाग गाडी घेऊन तिथून निघून जायला हवं होतं.दोन्ही गाड्या निघून गेल्याचं पाहून काही मिनिटातच तो बिबळ्या भक्ष्यावर परत आला असता आणि सहजपणे आल्फीच्या गोळीला बळी पडला असता.खरंतर माझ्याकडूनच योग्य सल्ला दिला गेला नव्हता आणि आता बिबळ्याही जखमी होऊन पळाला होता.ते अत्यंत धोकादायक होतं.


जे घडून गेलं,त्याचा जास्त विचार न करता आम्ही बिरूरला टूरिस्ट बंगल्यावर परत आलो. सकाळी उठून आम्ही परत त्या ठिकाणी गेलो.जरा आजूबाजूला हिंडून पाहिल्यावर आम्हाला एक पुसटसा रक्ताचा माग सापडला.


शेत संपून झुडुपांचं गचपण सुरू झालं,तसा रक्ताचा माग जास्त स्पष्टपणे दिसू लागला.पण आता आमच्यापुढे एक वेगळीच समस्या उभी राहिली.बिबळ्याच्या एका बगलेत गोळी लागली होती,त्यातून रक्त वाहू लागायला थोडा वेळ लागल्यानं सुरुवातीचा माग अस्पष्ट होता.


उर्वरीत कथा पुढील भागात.. ( अपुर्ण )


नरभक्षकाच्या मागावर - केनेथ अँडरसन

अनुवाद - संजय बापट