* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: स्पिशीजचं वर्गीकरण आणि टॅक्सॉनॉमी/Species classification and taxonomy

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

५/६/२५

स्पिशीजचं वर्गीकरण आणि टॅक्सॉनॉमी/Species classification and taxonomy

कोणत्याही सारख्या किंवा वेगवेगळ्या सजीव किंवा निर्जीव गोष्टी माणसाला दिसल्या तर माणूस त्यांचं वर्गीकरण करतो.माणसाचा आणि मानवी मेंदूचा तो स्वभावच आहे.माणूस जेव्हा हंटर-गॅदरर स्थितीत होता तेव्हाच त्याला आपल्या आजूबाजूला असंख्य प्राणी, पक्षी,वनस्पती आणि कीटक दिसत होते.इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती कुणाला सापडल्या तर त्या लक्षात कशा ठेवणार?त्याच्यातल्या सारखेपणा आणि फरकांवरून ! अर्थात,त्या वेळी काही माणूस कागद-पेन घेऊन सजीवांचा अभ्यास करायला बसत नव्हता,तर त्या काळी त्याला फक्त आपल्याला खाण्यायोग्य वनस्पती आणि प्राणी कोणते आहेत, कोणत्या वनस्पती विषारी आहेत,कोणत्या प्राण्यांपासून आपल्याला धोका आहे,कोणत्या वनस्पती औषधी आहेत,कोणत्या वनस्पतींपासून आपण घरं बांधू शकतो आणि विशिष्ट सामूहिक विधींच्या प्रसंगी कोणत्या वनस्पती आणि प्राणी गरजेच्या आहेत इतकंच ओळखायची गरज होती.त्या वेळच्या माणसानं निरीक्षणानं हे ज्ञान गोळा केलं आणि आपल्या पुढच्या पिढीला दिलं.असं होत होत पुढच्या शेकडो-हजारो वर्षांत माणसाला बऱ्याच सजीवांची ओळख झाली


माणसानं वनस्पतींच्या जीवनचक्राचं निरीक्षण केलं आणि त्यातून शेतीचा उगम झाला.शेतीमुळे भटका माणूस जरा स्थिर झाला.या काळाला 'निओलिथिक रिव्होल्यूशन' म्हणतात. हा काळ ख्रिस्तपूर्व १०,००० वर्षांपासून ते ख्रिस्तपूर्व २५०० वर्षांपर्यंत तब्बल ७५०० वर्षं चालला. त्या दरम्यान जगात सगळीकडेच शेती,पशुपालन आणि वेगवेगळ्या प्रकारे जलसंधारण सुरू झालं.शेती आणि पशुपालनामुळे अनेक वनस्पती आणि प्राणी यांच्याशी माणसाचा संपर्क आला.तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पती आणि प्राणी यांना अर्थातच वेगवेगळी नावं मिळाली.त्या वेळी माणसाच्या उपयुक्ततेनुसार सजीवांचं वर्गीकरण झालेलं होतं.नंतर लेखनकला निर्माण झाल्यानंतर हे ज्ञान अनेक वर्षं/शतकं टिकलं.


जगात सगळीकडेच अशा अनेक पद्धती होत्या.गंमत म्हणजे शेती करणारा शेतकरी लिहायला-वाचायला शिकलेला नव्हता.त्यामुळे अन्नधान्याचं वर्गीकरण लिहिलं गेलं नाही.पण औषधी वनस्पतींचं ज्ञान असणारे वैद्यमात्र शिकलेले होते. 


त्यांनीच सगळ्यात आधी वनस्पतींची गटवार विभागणी करून वर्णनं लिहन ठेवली.जुन्या काळातली अशी वर्णनं आपल्याला भारत,चीन, इजिप्त आणि मेसोपोटेमिया या भागांतल्या दस्तऐवजांत पाहायला मिळतात.


भारत


भारतात ३७०० ते ३१०० वर्षांपूर्वी केलेलं सगळ्यात जुनं वनस्पतींच्या वर्गीकरणाचं वर्णन ऋग्वेदात सापडतं.त्यात वनस्पतींचं वर्गीकरण वृक्षं,औषधी वनस्पती आणि वेली अशा गटांमध्ये केल्याचं दिसून येतं.तर अथर्ववेदात वनस्पतींचं,मोठ्या फांद्या असणारे वृक्ष - वड,मंजिरी म्हणजे फुलोरा (क्लस्टर्स) असणारी झाडं- तुळस,स्तंधिनी म्हणजे झुडपं - मोगरा, प्रस्तानवटी म्हणजे खूप वाढणारी झाडं,प्रतानवटी म्हणजे पसरत जाणारी झाडं- रताळी,एकश्रंगा म्हणजे एकाच मुख्य खोडावर अनेक शाखा असलेली झाडं- अशोका,अंसुमती म्हणजे अनेक फांद्या असणारी झाडं- बदाम आणि कंदिनी म्हणजे जमिनीत कंद येणारी झाडं- कांदा,अशा आठ गटांत वर्गीकरण केल्याचं दिसतं.


याशिवाय मनुस्मृती,तैत्तरीयसंहिता,चरकसंहिता आणि सुश्रुतसंहिता याही ग्रंथांमध्ये वनस्पतींचं वर्गीकरण केलेलं होतं.चौथ्या शतकात पराशरानं 'वृक्षायुर्वेद' नावाचा ग्रंथ लिहिला.आश्चर्य म्हणजे त्यात त्यानं गहू-तांदळासारख्या एकदल (मोनोकॉटीलिडॉन) आणि डाळी आणि दाण्यांसारख्या द्विदल (डायकॉटीलिडॉन) वनस्पतींचंही वर्णन करून ठेवलं आहे.


चीन : चीनमध्येही ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकापासून ते दुसऱ्या शतकापर्यंत लिहिलेल्या ग्रंथांमध्ये वनस्पतींचं औषधी वनस्पती आणि इतर उपयोगाच्या वनस्पतींचं वर्गीकरण आणि वर्णन केलेलं आढळतं.ख्रिस्तपूर्व ३०० मध्ये 'अर्ह या' या चिनी ज्ञानकोशात जवळपास ३४० वनस्पतींचं वर्गीकरण केलेलं सापडतं !


यानंतरच्या काळात अ‍ॅरिस्टॉटलनं अनेक प्राण्यांचा अभ्यास करून त्यांचं वर्गीकरण केलं होतं.त्याचाच शिष्य असलेल्या थिओफ्रॉस्टसनं 'एन्क्वायरी इनटू प्लांट्स' आणि 'कॉजेस ऑफ प्लांट्स' हे दोन वनस्पतींवरचे ग्रंथ लिहून त्यात त्यानं जवळपास ५०० वनस्पतींचं विस्तृत वर्णन केल होतं.त्याचा 'एन्क्वायरी इनटू प्लांट्स' हा ग्रंथ तर नऊ खंडांत विभागलेला होता.त्यात सुरुवातीलाच त्यानं "आपण वनस्पतींचे बाहेरून दिसणारे गुणधर्म,त्यांची जीवनचक्रं,वेगवेगळ्या ऋतूंमध्ये त्यांची होणारी वाढ अशा सगळ्या गुणधर्मांचा अभ्यास केला पाहिजे." असं लिहिलं होतं.या ग्रंथात त्यानं ट्रीज, हर्ज आणि श्रब्ज अशा अनेक निकषांच्या आधारावर वनस्पतींचं वर्गीकरण केलं होतं.

थिओफ्रॉस्टसनं वनस्पतींना दिलेली अनेक नावं आजही आपण तशीच वापरतो हे विशेष ! पूर्वीच्या ग्रीक ज्ञानात रोमनांनी थोडीशी भर घातली होती.ख्रिस्तपूर्व दुसऱ्या ते इ.स. पहिल्या शतकापर्यंत कॅटो,वारो आणि प्लिनी यांनी या क्षेत्रात काम केलं होतं.हेच ज्ञान संपूर्ण युरोपात अनेक शतकं तसंच वापरलं जात होतं.

रेनायसान्सच्या काळापर्यंत यात फारसे बदल झालेच नाहीत.


मध्ययुग


चीन,भारत आणि काही पौर्वात्य देशांमध्ये मध्ययुगापूर्वीच अनेक विषयांवरचं ज्ञान उपलब्ध होतं. तर नववं शतक ते १३ वं शतक हा इस्लामिक (अरब देशांतला) रेनायसान्स मानला जातो.नवव्या शतकात होऊन गेलेला अब 'दिनावरी' हा अरेबिक बॉटनीचा प्रणेता मानला जातो.त्यानं आपल्या 'किताब अल नाबत' (बुक ऑफ प्लांटस) या पुस्तकात जवळपास ६३७ वनस्पतींचं वर्णन करून ठेवलं आहे.दहाव्या शतकात होऊन गेलेल्या अविसेनानंही आपल्या 'कॅनॉन ऑफ मेडिसीन'मध्ये अनेक औषधी वनस्पतींचं वर्णन करून ठेवलं आहे.यानंतरच्या काळात सजीवांच्या वर्गीकरणाचं महत्त्वाचं कार्य पुन्हा युरोपात होणार होतं.पण मधल्या काळात इतर प्रांतांतून युरोपात अनेक वनस्पतींची आयात झाली होती.मागच्या दोन हजार वर्षांत जितक्या वनस्पती युरोपात आल्या नव्हत्या,त्यापेक्षा किमान वीसपट वनस्पती मध्ययुगातून गेल्या काही शतकांत युरोपात दाखल झाल्या होत्या!


इटालियन डॉक्टर अँड्रिया कॅसाल्पिनो (Andrea Caesalpino) (१५१९ ते १६०३) यानं पिसा विद्यापीठात ४० वर्ष वनस्पतिशास्त्र शिकवलं. त्या दरम्यान त्यानं १५०० वनस्पतींचं वर्णन करणारं ६ भागांतलं पुस्तक' दे प्लांटिस' (द प्लांट्स) लिहिलं. याशिवाय त्यानं 'हर्बारियम' हे २६० पानांचं पुस्तक लिहिलं. त्यात त्यानं चक्क स्वतः तयार केलेले वनस्पतींचे ७६८ स्पेसिमेन्स अजूनही आपल्याला पाहता येतात,ही फारच कौतुकाची गोष्ट आहे. कॅसाल्पिनोनं फुलं आणि फळं यांच्या वर्णनांवरून वनस्पतींचं वर्गीकरण केलं होतं.त्यानं जीनसची संकल्पनाही मांडली होती.तो त्याच्या काळाच्या फारच पुढे होता.


यानंतरच्या काळात गास्पर्ड बऊहीन (Gaspard Bauhin) (१५६० ते १६२४) यानं दोन वनस्पतींच्या वर्गीकरणाबद्दल 'प्रोडोमस थिअट्रीची बॉटनीची' हे १६२० मध्ये आणि १६२३ मध्ये 'पिनाक्स' हे अशी दोन महत्त्वाची पुस्तकं लिहिली.यानं थोड्या प्रमाणात वनस्पतींना नावं देण्याची बायनॉमियल पद्धत वापरली होती.याचाच प्रभाव पुढे लिनियसवर पडणार होता.


जोहाचिम जंगनंही (१५८७ ते १६५७) वर्गीकरणाची एक पद्धत विकसित केली होती. त्यावरच आधारित आणखी चांगली पद्धत जॉन रे (१६२३ ते १७०५) यानं सुचवली होती. त्यानं वनस्पतींच्या वर्णनांची अनेक कॅटलॉग्ज प्रकाशित केली होती.त्यानं तो स्वतः राहात होता त्या केंब्रिजपासून सुरुवात करून अनेक ठिकाणी फिरून वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती गोळा केली होती.

वनस्पतींमध्ये फरक हे त्यांच्या बाह्य आणि अंतर्गत गोष्टींमुळे होऊ शकतात हे त्यानं मांडलं. 


यावरूनच पुढे फिनोटाइप आणि जिनोटाइप या संकल्पना आल्या.याबद्दल त्यानं 'हिस्टोरिया प्लांटारम' हे पुस्तक लिहिलं.हे पुस्तक आधुनिक बॉटनीचा पाया मानला जातं,

इतकं महत्त्वाचं आहे.


पाश्चिमात्य वर्गीकरण


पूर्वीही अ‍ॅरिस्टॉटलनं जवळपास पाचशे प्राण्यांच्या जातींचं आणि थिओफ्रॉस्टसनं तितक्याच वनस्पतींच्या जातींचं वर्गीकरण केलं होतं.त्यानंतर आता दोन हजार वर्षांच्या काळात इतक्या नव्या जातींचे प्राणी आणि वनस्पती सापडल्या होत्या,की त्या पूर्वीच्या कोणत्याही दस्तऐवजात आल्या नव्हत्या.अठराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतच जवळपास दहा हजार नव्या स्पिशीज शोधून,

त्यांची वर्णनं करून ठेवली होती.अनेकांनी अनेक प्रकारे हे वर्गीकरण केलं होतं.पण पूर्वीची गोष्ट वेगळी होती.आता सजीवांच्या अक्षरशः हजारो जाती माहीत झाल्या होत्या.आणि त्यांच्यात अनेक फरक आणि सारखेपणा होता.त्यांचं वर्गीकरण करणं ही खरंच फार अवघड गोष्ट होती.अशा प्रकारे इतक्या प्रजाती लक्षात घेऊन वर्गीकरणाचा प्रयत्न करणारा इंग्लंडचा जॉन रे (John Ray) (१६२८ ते १७०५) हा पहिलाच वनस्पतिशास्त्रज्ञ होता.


१६८६ ते १७०४ या दरम्यान त्यानं वनस्पतींच्या जीवनचक्राचं वर्णन करणारे तीन ज्ञानकोश प्रसिद्ध केले.त्यात त्यानं चक्क १८,६०० वनस्पतींच्या जातींचं वर्णन करून ठेवलं होतं.१६९३ मध्ये त्यानं प्राण्यांचंही असंच वर्गीकरण केलं होतं.पण वनस्पतींच्या मानानं त्यानं कमी प्राणी विचारात घेतले होते.पण त्यानं त्यात प्राण्यांचे दात आणि पायांची बोटं यांच्या रचना लक्षात घेऊन व्यवस्थित वर्गीकरण करायची पद्धत विकसित केली होती हे मात्र खरं.उदाहरणार्थ,सस्तन प्राण्यांमध्ये त्यानं पायांना बोटं (टोज) असलेली आणि पायांना खुरं (हूफ्ज) असलेली असे दोन गट केले होते.खुरं असलेले प्राण्यांचे त्यानं पुन्हा एक खूर असलेले घोड्यांसारखे प्राणी,दोन खुरं असलेले गाय-बैल असे कॅटल्स आणि तीन खुरं असलेले ऱ्हायनोसोर्स असे तीन गट पाडले होते.


दोन खुरं असलेल्या सस्तन प्राण्यांचे त्यानं पुन्हा शेळीसारखे घास खाणारे आणि कायमस्वरूपी शिंग असलेले,हरणासारखे घास खाणारे आणि शिंग कायमस्वरूपी नसलेले (हरणाचे शिंग दर वर्षी गळून पडतात आणि पुन्हा येतात.) आणि डुकरासारखे घास न खाणारे असे पुन्हा तीन गट पाडले होते.


ही पद्धत काही सगळ्याच प्राण्यांना लागू पडत नव्हती. पण रेनं गट आणि उपगट पाडून वर्गीकरणाची चांगली पद्धत निर्माण केली होती,हे मात्र खरं.


पुढे पिअरे मॅग्नॉल (Pierre Magnol) (१६३८-१७१५) आणि जोसेफ दे टर्नफोर्ट (Joseph de Tournefort (१६५६-१७०८) या गुरुशिष्यांनी जीनस हाच वर्गीकरणाचा पाया असला पाहिजे हा विचार आणखी पुढे आणला.पण या सगळ्यांनी केलेल्या वनस्पतींच्या अभ्यासाच्या पायावर खऱ्या अर्थानं कळस चढवला तो स्वीडिश बॉटनिस्ट कार्ल फॉन लिने (Carl von Linne) (१७०७ ते १७७८) यानं.आपण त्याला कार्ल लिनियस या लॅटिन नावानं ओळखतो.


त्याच्या वेळेपर्यंत तर माणसाला माहीत असलेल्या स्पिशीजची संख्या ७० हजारांवर गेली होती.कुठलाही जीव सापडला की त्याची नोंद पूर्वी झाली आहे की नाही हे तपासणं म्हणजे एक दिव्यपरीक्षाच असायची.हे करणाऱ्यांना 'टॅक्सॉनॉमिस्ट्स' म्हणतात.ते कसब शिकायला चक्क ८-१० वर्ष लागतात ! त्यातून प्रत्येक देशाची त्या जिवांना नावं देण्याची,त्यांची वर्गवारी करण्याची पद्धतही वेगळी असायची.ते दिसायला कसे आहेत? देखणे की कुरूप,लहान की मोठे,वगैरेंवरूनही त्यांचं वर्गीकरण व्हायचं.(सजीव,अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री

पब्लिकेशन )


ब्यूफाँ यानं तर कुठलाही जीव माणसाला किती उपयोगी आहे यावरून त्यांचं वर्गीकरण केलं होतं.


बरं,प्रत्येक नावही प्रचंड मोठं असायचं.जमिनीलगत उगवणाऱ्या चेरीला 'फिजॅलिस अम्नो रॅमोसिम रॅमिस अ‍ॅग्न्यूलॉसिस ग्लॅब्रिस फॉलिस डेंटोसेरॅटिस' असं नाव दिलं होतं.ते एका श्वासात म्हणणंही शक्य नसायचं ! त्यातून कित्येक वनस्पतींची किंवा प्राण्यांची वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या नावानं नोंद होई.म्हणजे या सगळ्या जीवसृष्टीची जागतिक डायरेक्टरी अशी नव्हतीच.म्हणजे संपूर्ण जीवसृष्टीच्या ०.०१% च सजीव आपल्याला आतापर्यंत सापडलेले होते,पण त्यांचाही आकडा काही कमी नव्हता आणि त्यांच्याही नोंदीमध्ये पूर्ण अंदाधुंदी होती ! म्हणजे गोंधळच गोंधळ !


या सगळ्यातून कार्ल लिनियस यानं मार्ग काढला.तो अतिगर्विष्ठ आणि अतिविक्षिप्त माणूस होता.१७०७ साली तो स्वीडनमध्ये एका गरीब पाद्र्याच्या घरी जन्मला.लहानपणी तो शाळेला सर्रास दांड्या मारत असे आणि तासन्तास आजूबाजूची झाडं आणि वनस्पती यांचंच निरीक्षण करत बसे.तो अभ्यासात फारसा हुशार नव्हता.तू फार फार तर चांभार होऊ शकशील असं त्याचे शिक्षक म्हणायचे.इतर काहीच येत नाही म्हणून वडिलांनीही मग त्याला चांभारच करायचं ठरवलं होतं.पण लिनियसला आपली चूक लक्षात आली आणि आपल्याला आणखी एक संधी मिळावी यासाठी त्यानं गयावया केली तेव्हा दया येऊन वडिलांनी त्याला एक संधी दिली.मग मात्र मिळालेली संधी वाया जाऊ न देता लिनियस जोरात अभ्यास करायला लागला.


कॉलेजमध्ये असतानाच लिनियसनं वनस्पतींच्या लैंगिक प्रजननाविषयी अभ्यास केला होता.त्यातूनही त्यानं प्रत्येक प्रजातीच्या लैंगिक अवयवांमध्ये काय सारखेपणा आणि काय फरक आहे,त्याचाही अभ्यास करून ठेवला होता.आता त्यानं याच निकषांवर वनस्पतींचं वर्गीकरण करायचं ठरवलं होतं.


शिल्लक भाग पूढील लेखामध्ये…