२८.०५.२५ या लेखातील पुढील शेवटचा भाग
निहोंगीत याबद्दल काय म्हटले आहे?
जग निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात वेगवेगळे देश जे वाहत जात होते त्यांची तुलना फक्त पाण्यात पोहणाऱ्या माशांशीच होऊ शकते.निहोंगीमध्ये दिलेली सर्वच माहिती तंतोतंत बरोबर आहे. अचूक आहे.मग ज्यांनी प्रथम मानव निर्माण केला त्या स्वर्गात निर्माण झालेल्या 'देवांनी' (अंतराळवीरांनी) त्यांना हे ज्ञान दिले होते असे म्हटले तर संशयास्पद का ठरावे?
सर्व धर्मग्रंथांत या नवीन घटनांचा वृत्तांत सांगताना होणारी गडबड अगदी साहजिकच आहे.कोणत्याही नवीन गोष्टींना नावे द्यायची म्हटले की विसाव्या शतकातील आपण 'हुशार' माणसेही एक पाऊलसुद्धा पुढे टाकू शकलेलो नाही.
चाळीस वर्षांपूर्वी मानवाने आकाशात उडणारी एक वस्तू पाहिली.कशी दिसत होती?कपबशी मधल्या बशीसारखी ! बरोबर !उडती बशी !उडती तबकडी !
जग जर अणुयुद्धात नष्ट झाले तर विसाव्या शतकातल्या आख्यायिकेचे संशोधन करण्याची पाळी चाळिसाव्या शतकातल्या संशोधकांवर येईल.
या उडत्या तबकड्यांबद्दल त्यांना किती तरी ठिकाणी उल्लेख सापडेल.आख्यायिकांप्रमाणे आकाशातून उडणाऱ्या,रंग बदलणाऱ्या,प्रचंड वेगात कशाही तऱ्हेने दिशा बदलणाऱ्या वस्तुंची माहिती त्यांना मिळेल पण त्यांना काही समजू शकेल असे वाटत नाही.तबकडी फेकणाऱ्या एखाद्या खेळाडूचा ब्रॉन्झचा पुतळा त्यांना मिळाला तर उडत्या तबकड्या हा एक वेगळा खेळच होता,असे जर त्यांना वाटले तर त्यात नवल काहीच नाही.
आल्बर्ट आईनस्टाईन यांनी त्यांचा सापेक्षतावादाचा सिद्धान्त मांडला (Theroy of Relativity) आणि त्यामुळे पुराणकाळातील काही अफलातून गोष्टींचा अर्थही या शतकात लागला आहे.
जपानची अत्यंत जुनी अशी ही आख्यायिका !
हेकि प्रांतात जोसा जिल्ह्यातील त्सुत्सुकाहा या सागर किनाऱ्यावरील एका खेड्यात एक तरूण राहत असे. अत्यंत देखणा.त्याला लोकांनी नाव ठेवले होते 'आयलंड चाईल्ड.' एक दिवस मासेमारीसाठी तो एकटाच समुद्रात गेला.त्याला त्या दिवशी काहीच मासे मिळेनात आणि कंटाळत असतानाच त्याला डुलकी लागली.डोळे उघडतो तो एकाएकी त्याला नावेत शेजारीच एक अत्यंत सुंदर तरुणी बसलेली दिसली.तो तिला म्हणाला. 'माणसांची घरे तर फार दूर किनाऱ्यावर राहिली आहेत.
समुद्रावरही काही दिसत नाही.तूआहेस तरी कोण आणि अचानक इथे आलीसच कशी?' ती तरुणी उत्तरली
'मी आकाशातूनच आले.' 'म्हणजे कुठून? स्वर्गातून ?'
'तू मनातला संशय काढून टाक.माझ्याबरोबर प्रेमाने रहा.
अनंत काळपर्यंत आपण सुखाने राहू या.जरा तुझे डोळे मात्र क्षणभर मीट.'
थोड्याच वेळात ते एका सुरेख बेटावर पोहोचले.तो तिच्या आई-वडिलांना भेटला.त्यांनी त्याला स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातला फरक समजावून सांगितला.त्यांचे लग्नही लावून दिले.त्यांनी तीन वर्षे अगदी सुखात काढली पण नंतर आपल्या घराच्या आठवणीने तो व्याकुळ झाला.त्याचे कशातच लक्ष लागेना.तो दुःखी बनला.शेवटी तिने त्याला सांगितले की,'तू क्षणभर डोळे मीट आणि मी तुला घरी पोहोचवते.'
थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले तर तो गावात आला होता पण त्याला ते अनोळखी भासत होते.त्याला त्याचे घर सापडेना.त्याने एका खेडुताला आयलंड चाईल्डचे कुटुंब कुठे राहते म्हणून विचारले.खेडुताने तो कुठुन आला आहे याची चौकशी करून म्हटले,की तो फार जुनी गोष्ट विचारतो आहे म्हणून.जुन्या कथा सांगणाऱ्या वृद्ध माणसांकडून त्याने आयलंड चाईल्डची गोष्ट ऐकली आहे.अशा नावाचा एक तरूण त्या खेडेगावात राहत होता.एकदा तो मासेमारीला समुद्रावर म्हणून जो गेला तो परत आलाच नाही.त्या गोष्टीला आता तीनशे वर्षे होऊन गेली.हा तरूण अफाट वेगाने जाणाऱ्या अंतराळयानातून दुसऱ्या ग्रहावर गेला होता हेच खरे असणार.म्हणूनच काळातला हा फरक.तशी साधीच गोष्ट पण ही गोष्ट किती सत्य सांगून जाते हे नाकबूल करता येईल?
दक्षिण अमेरिकेतील ही आख्यायिका तर अजून अप्रकाशितच आहे.कार्ल ब्रजरने बरीच वर्षे दक्षिण अमेरिकेत पत्रकार म्हणून वास्तव्य केले होते.तो इतिहासकारही आहे.१९७२ मध्ये त्याची आणि तिथल्या भोंगुलाला जमातीच्या प्रमुखाची प्रथम गाठ पडली. तातुन्का नारा हे त्याचे नाव.दोघांच्या नंतर अनेक भेटी झाल्या आणि ते मित्रही बनले.नाराचा कार्लवर विश्वास बसला आणि जगाला एका आश्चर्यकारक कथेचा लाभ झाला.
भोंगुलाला जमात ही देवांनी त्यांची जमात मानली होती. त्यावेळेपासूनचा सर्व इतिहास त्यांनी व्यवस्थित लिहून ठेवलेला आहे.तातुन्का नारा त्यांचा जो इतिहास सांगतो तो अगदी थक्क करणारा आणि विलक्षण आहे.
आमचा इतिहास देव पृथ्वीवरून निघून गेल्या क्षणापासून सुरू होतो.
भोंगुलाला जमातीचा त्यावेळचा राजपुत्र इना याने घडलेला सर्व इतिहास पद्धतशीरपणे आणि व्यवस्थित लिहून ठेवण्याची आज्ञा दिली आणि आजपर्यंत आम्ही ती आज्ञा पाळत आलेलो आहोत.
त्यावेळी या खंडात फक्त आम्ही होतो.त्यावेळी माणसात आणि जनावरात तसा विशेष फरक नव्हताच.अंगावर वस्त्रे नाहीत,शेती करायची माहिती नाही,समाजव्यवस्था वगैरे काही प्रकारच अर्थात नाही.आणि मग एक दिवस देव उतरले.ही घटना अगदी नक्की कधी घडली माहीत नाही पण साधारण १५००० वर्षापूर्वी घडली.अचानक अंतराळात उडती जहाजे दिसायला लागली.त्या जहाजातून प्रखर प्रकाशझोत बाहेर पडत होते.धरणी हादरत होती. गडगडाटाचा आवाज टेकड्यांपलिकडेही घुमत होता.ही दैदिप्यमान जहाजे उतरली आणि त्यातून पृथ्वीचा ताबा घेण्यासाठी आलेले देव उतरले.ते विश्वातल्या ज्या ठिकाणाहून आले होते त्या ठिकाणाचे नाव होते श्वेरता !आमचे धर्मगुरू म्हणतात की,खरे म्हणजे त्यांचे साम्राज्य अनेक ग्रहांवर पसरलेले होते. त्यांना तारे कसे फिरतात माहीत होते.निसर्गाचे नियम माहिती होते.त्यांचे ज्ञान इतर जगांना देण्यासाठी ते आले होते.अकाकुर या किल्ल्यावरून देव राज्य करीत. त्यांची प्रथम १३० कुटुंबे पृथ्वीवर आली होती.त्यांची आकाशातून उडणारी जहाजे पक्ष्यांहून जास्ती वेगाने जात असत.रात्र असो किंवा दिवस असो शिडांशिवाय, सुकाणुंशिवाय उडत असत,परत येत असत.त्यांच्याकडे एका तऱ्हेच्या धातूचे दगड होते.जगात कुठेही,काहीही घडले तरी त्या दगडात स्वच्छ दिसत असे.त्यांनी जमिनीखाली राहण्यासाठी उत्कृष्ट व्यवस्था केली होती.
परत जाण्याच्या दिवशी त्यांनी इनाला बोलावून सांगितले की,त्यांचे इथले काम झाले आहे.त्यांना आता निघून जायला पाहिजे.पण तुम्ही कधी संकटात सापडलात तर आम्ही नक्की परत येऊ.आता एक महाभयंकर संकट कोसळणार आहे.त्यातून निभाव लागण्यासाठी तू तुझ्या लोकांना घेऊन जमिनीखाली, आम्ही बनवलेल्या घरात रहायला जा.प्रचंड गडगडाट करीत आणि अग्निवर्षाव करीत देवांची जहाजे अंतराळात नाहीशी होईपर्यंत इना एकटाच उभा होता. ही घटना साधारण १२००० वर्षांपूर्वीची आहे.आता आमच्या हृदयातच फक्त देवांच्या प्रतिमा होत्या. डोळे पाण्याने भरून येत असताना आम्ही पुनःपुन्हा आकाशाकडे पाहत होतो पण ती सोनेरी जहाजे परत आली नाहीत.
तातुन्का नारा या ठिकाणी जगावर कोसळलेल्या दोन आपत्तींचे वर्णन करतो की,ज्यात सर्व मानव जमातच नष्ट होणार होती.
मग बारा वर्षांनी पुन्हा महापूर आला.पृथ्वीवर काय घडत आहे याचा उमज पडत नव्हता.सगळीकडे थंडीच थंडी,नाहीतर भयंकर उष्णता.भीतीने माणसे आणि जनावरे सैरावैरा पळत होती.
झाडांवर चढावे तर झाडेच उन्मळून लांबवर पडत होती.फेकली जात होती.गुहेत लपायला पाहावे तर त्या कोसळून पडत होत्या.वरचे सर्व खाली जात होते,खालचे सर्व वर येत होते.
पण तरीही या आपत्तींतून आणि दुसऱ्याही भीषण संकटांतून भोंगुलाला जमातीचे थोडे जण बचावलेच.आणि एके दिवशी संध्याकाळी पुन्हा एकदा सोनेरी जहाजांनी आकाश व्यापून टाकले.देव परत आले होते. आम्हाला खूप आनंद होत होता पण देवांच्या स्वागताला आता थोडेसेच लोक शिल्लक राहिले होते.शआमच्या जमातीचा खूपच नाश झाला होता.
अकाकुर येथे एका मंदिराखाली जमिनीवर चालणारे, पाण्यावर चालणारे,टेकड्यासुद्धा चढणारे देवांचे एक वाहन आणि अंतराळात उडणारे दुसरे एक वाहन आम्ही अगदी जपून ठेवून दिले आहे.उडणारे वाहन कोणत्या धातूचे आहे हे माहीत नाही पण ते सोनेरी आहे.दोन माणसे एकावर एक उभी राहतील एवढी त्यांची लांबी-रुंदी आहे.त्यात दोन माणसांना बसायची सोय आहे.त्याला शीड नाही,सुकाणू नाही पण आमचे धर्मगुरू म्हणतात,
त्यात ल्हासा (?) बसला तर गरुडापेक्षा जास्ती वेगाने जाईल आणि ढगांमध्ये तरंगेल. ह्या वाहनाचा मुख्य भाग चांदीच्या वाटीसारखा आहे.ते वाहन अगदी रहस्यमय आहे.त्याला सात पाय आहेत. तीन पुढल्या बाजूला आणि चार मागच्या बाजूला.'
हे असे सर्व संभाषण कार्ल ब्रजरने टेप करून घेतले आहे.
भोंगुलाला जमातीच्या १५००० वर्षांच्या इतिहासात काय नाही?त्यांना त्यांच्या देवांनी सर्व गोष्टींची नावे शिकवली,भाषा शिकवली,
लिपी शिकवली,शेतीभाती करायला शिकवली,नियम घालून दिले,की जे आजही पाळले जातात.तातुन्का नाराचा वृत्तांत आश्चर्याने थक्क करतो.म्हणून तो अशक्य ?
१८ ऑक्टोबर १९७६ रोजी मेक्सिको शहरातील एका वृत्तपत्र संस्थेने बातमी दिली की,एका अज्ञात अशा प्राण्याचा सापळा मिळाला आहे.हा प्राणी पृथ्वीवर कधीही अस्तित्वात नव्हता.या प्राण्याचा जन्म परग्रहावरच झाला असावा.त्याला पाठीचा मणका, खांद्याची हाडे आहेत,हातांची सुरुवात दिसते. कुत्र्यासारखे डोके,अगदी लहान डोळे आणि मोठे नाक येईल अशी घडण आहे.
हे वाचल्यावर तातुन्का नारा याने सांगितलेली आणखी एक गोष्ट आठवते.
खोलीच्या चारही भिंतीतून रहस्यमय प्रकाश येत होता. मध्यभागी पारदर्शक दगडी पेट्यात चार गूढ प्राणी दिसले.तीन पुरूष आणि एक स्त्री! त्यांच्या छातीपर्यंत कुठला तरी द्राव होता.ते अगदी आपल्यासारखेच होते पण त्यांच्या हाता-पायांना सहा सहा बोटे होती.ते झोपलेले देवच भासत होते.
पृथ्वीच्या पोटातून मेक्सिकोमध्ये असेच काही बाहेर आले होते का? आख्यायिकांप्रमाणे काही जुन्या चालीरिती म्हणजे सुद्धा 'देवांच्या' स्मृतीच जागृत ठेवण्याचा प्रयत्न वाटतो.
ब्राझिलमधल्या कियापो जमातींच्या दंतकथांप्रमाणे शेकडो पिढ्यांपूर्वी त्यांच्या जवळच्या पर्वतावर धूर व ज्वाळा सोडत एक धरणीकंप झाला.सर्वजण त्यांच्या जवळच्या खेडेगावातच पळून गेले पण काही दिवसांनी काही तरूण योद्धयांनी धीर केला आणि ते पर्वताकडे निघाले.त्यावेळी तिथून एक अनोळखी इसम बाहेर आला.लाकडी दांडुके,विषारी बाण,तलवारी त्याच्यावर आपटूनच उडत.त्याच्यावर या सर्वांचा काहीच परिणाम झाला नाही. त्याने उलट हसत राहूनच त्यांची टर उडवली.तो अनोळखी माणूस त्यांच्याबरोबर त्यांच्याच गावात रहायला आला.हळुहळू त्याचे अस्तित्व लोकांच्या अंगवळणी पडले.कियापोंची भाषा या अज्ञात माणसानेच त्यांना शिकवली आहे.शिकार कशी करावी, साधी आयुधेच पण ती कशी वापरावीत,शेती कशी करावी या गोष्टी शिकवण्यासाठी त्याने स्वतःच्याच घरी शाळा काढली होती.त्याचे नाव होते 'बेप कोरोरोटी' म्हणजे 'मी अंतराळातून आलो.'
आणि एक दिवस विचित्र दिसणारा चकचकीत पांढरा सूट त्याने अंगावर चढवला आणि तो त्यांना म्हणाला, 'त्याला बोलावणे आले आहे.त्याची इथे रहायची वेळ संपली आहे.आता त्याला परत जायला पाहिजे.इलाज नाही;पण कोणीही त्याच्यामागे यायचा प्रयत्न करू नये.' पण तरीही कुतुहलाने काही जण लपत छपत त्याच्या मागोमाग पर्वतापर्यंत गेले.तो त्या पर्वतावर गेला आणि पुन्हा एकदा त्यांनी पर्वतावर धूर व ज्वाळा पाहिल्या आणि भूमी हादरवून सोडणारा प्रचंड गडगडाटही ऐकला.अंतराळात झेप घेऊन बेप कोरोरोटी अदृश्य झाला.आजसुद्धा समारंभात कियापो लोक गवताचे सूट अंगावर चढवतात.फुगीर ओबडधोबड आकाराचे.कियापो लोकांशी पहिला संपर्क १९५२ मध्ये साधला गेला.युरी गागारिन यान १९६१ मध्ये अंतराळात पाऊल टाकले.
अवकाशयात्रिकांचे तऱ्हेचे सूट घालून समारंभात वावरत आहेत,
त्यांना एक अक्षर लिहिता-वाचता येत असेल तर शपथ.आज आपण अंतराळ प्रवासात करीत असलेल्या प्रगतीची त्यांना थोडीसुद्धा जाणीव नाही.बाहेरच्या जगात काय चालले आहे याची त्यांना कल्पना नाही.आपले अंतराळवीर कसा पोषाख करतात याची त्यांना माहिती नाही.पण अंतराळातून उतरलेल्या 'देवांची' स्मृती शेकडो वर्षे अंतराळवीरांसारखाच पण गवती सूट घालून जतन केली आहे हे तर सत्य आहे.
तिबेट ! कायमचाच,अगदी आजसुद्धा अत्यंत गूढ आणि रहस्यमय वाटणारा देश! तिबेटी लोकांचे दोन धर्मग्रंथ आहेत.किती मोठे असावेत? त्यांचे २२५ खंड होतात. लाकडी फळ्यांवर कोरलेले हे धार्मिक ग्रंथ इतकी प्रचंड जागा व्यापतात की,तिबेटमधल्या अनेक खेड्यांतील तळघरांमध्ये या फळ्या विभागून ठेवल्या आहेत.अत्यंत गुप्तपणे.हे ग्रंथ मुळी सर्वसामान्य लोकांसाठी नाहीतच. त्यातले ज्ञान सुद्धा 'गुप्त' ठेवण्यात आले आहे.तरीही त्या खंडांचा साधारण १/१०० वा भाग भाषांतरित केला गेला आहे.त्याच्यात २७ राजांची मूळ नावे दिली आहेत. त्यातले सात म्हणे शिडीवरून आकाशात चढून अदृश्य झाले. त्यांना प्रकाशाचे देव मानतात.आपले पृथ्वीवरील काम आटोपून ते परत गेले.जिथून आले होते तिथे परत गेले.
आख्यायिकेप्रमाणेच त्यांचा पद्मसंभव हा शिक्षक अंतराळातून आला.त्याने स्वतःबरोबर अनेक ग्रंथ आणले होते.पण ते कुणालाही न समजणाऱ्या भाषेत लिहिले होते.ज्या काळापर्यंत ती भाषा सर्वांना समजणार नाही,त्यावेळेपर्यंत जतन करून ठेवण्यासाठी ते ग्रंथ त्याने गुहांमध्ये लपवून ठेवले होते.इथे राहत असताना त्याने त्याचा आवडता शिष्य पागुर वैरकाना याला तो निघून गेल्यावर या पुस्तकांचे भाषांतर करायची परवानगी दिली होती.खरे सांगायचे तर आजही कित्येक तिबेटी पुस्तकांची नावे या गूढ भाषेत लिहिलेली आढळतात.ती नावे कुणालाच समजत नाहीत.आख्यायिका सत्यकथांवरच आधारित असतात या गोष्टीचा हा धडधडीत पुरावा आहे.
पद्मसंभवाचा आवडता शिष्य पागुर वैरकाना याने पद्मसंभव स्वर्गाला जायला निघतो त्याचे वर्णन केले आहे.आकाशात इन्द्रधनुष्य आणि एक ढग दिसत होता.पाहता पाहता तो ढग अगदी जवळ आला.देवांना भेटण्यासाठी पद्मसंभव चांदी-
सोन्यासारख्या लखलखणाऱ्या घोड्यावरून बसून निघाला हे सर्वांना दिसत होते.राजा आणि इतर सर्वजण बघत होते तोपर्यंत पद्मसंभव एखाद्या मोठ्या पक्ष्यासारखा दिसायला लागला.पुन्हा बघेतो तो एखाद्या छोट्या पक्ष्यासारखा वाटत होता.थोड्या वेळातच तो अगदी माशीएव्हढा लहान झाला आणि नंतर दिसेनासाच झाला.चांदी-सोन्याच्या घोड्यांवर बसून पद्मसंभव अंतराळात अदृश्य झाला होता.'
बहुतेक सर्व धर्मग्रंथांत आकाशातून देव पृथ्वीवर उतरताना होणाऱ्या गोष्टींची नोंद आहे.पण तिबेटी धर्मग्रंथ देव परत जाताना काय घडते याचे वर्णन करतात.
बायबलमधल्या अशा वर्णनांवर कोणीही अविश्वास दाखवणार नाही;पण तिबेटी धर्मग्रंथांत अशी वर्णने आली तर मग त्या दंतकथा,आख्यायिका का ठराव्यात ?
तिबेटी लोकांना त्यांचा अद्वितीय गुरू माहिती होता.तो त्यांच्यात राहिला होता.गुरुने त्यांच्याबरोबर वास्तव्यच केलेले होते.त्यांना अनेक गोष्टी शिकवलेल्या होत्या. त्यांच्याशी संभाषण केलेले होते.पद्मसंभव इतका हुशार होता की कुणालाही न येणारी एक भाषा त्याला अवगत होती;आणि एक दिवस सर्वांच्या देखत अंतराळात उडून तो नाहीसा झाला.त्याच्या घरी परत गेला.त्याला एकट्यालाच येणाऱ्या भाषेतील पुस्तके आजही तिबेटमध्ये अस्तित्वात आहेत.आजही ती भाषा कुणाला कळत नाही.तरी ही आख्यायिकाच म्हणणार? कोणता 'काल्पनिक' देव अशी पुस्तके देऊन गेला असता?
जगातल्या सर्व महाकाव्यात आख्यायिका आहेत, जगातील कानाकोपऱ्यात चितारलेल्या चित्रात आहेत, धार्मिक ग्रंथांत आहेत.
जग निर्मितीच्या जगभरच्या कथात कोणाच्याही लक्षात यावे इतके साम्य आहे.
निर्मितीला जबाबदार असलेले सर्व देव आकाशातूनच आले आणि त्यांचे काम झाल्यावर आकाशातच परत गेले.त्या सर्वांची वाहने चमकदार होती.दुसऱ्या सूर्याएवढी दैदिप्यमान दिसायची.ती उडताना पृथ्वीचासुद्धा थरकाप उडत असे,
मेघगर्जनेसारखा गडगडाट होत असे.याच देवांनी आपली पृथ्वी राहण्यालायक बनवली.त्यांनीच पृथ्वीवर वनस्पती जीवन,प्राणी जीवन निर्माण केले.
त्यांच्यासारखीच बुद्धिमान जमात देवांनीच प्रथम या जगात निर्माण केली,शेती करण्याचे ज्ञान दिले, स्वच्छतेचे,समाजसुधारणेचे पहिले नियम घालून दिले.देवांनी निघून जाण्यापूर्वी पृथ्वीवर राज्य करण्यासाठी त्यांच्यासारखे राजे निर्माण केले.आपापली कामे झाल्यावर देव जेव्हा परत गेले तेव्हा येण्याचे आश्वासन देऊनच परत गेले.अजूनही या सर्व आख्यायिका आहेत, दंतकथा आहेत,काल्पनिक,बनवून सांगितलेल्या गोष्टी आहेत असे म्हटले तर ते संपूर्णतःअव्यवहार्य ठरेल.
प्राचीन काळातील आपल्या पूर्वजांनी पाहिलेल्या, अनुभवलेल्या गोष्टींच्या चक्षुर्वैसत्यम् हकिगती म्हणजेच या आख्यायिका !
परग्रहांवरील अंतराळवीरच मानवाच्या अज्ञात इतिहासातील आपल्या प्राचीन पूर्वजांनी पाहिले होते ही गोष्ट अगदी नक्की आहे.वादातीत आहे.