येशू जूडाच्या डोंगरात भटकत राहिला.मानवजातीने त्याला उडाणटप्पू ठरवले होते.जॉन बॅप्सिटस्ट याच्याप्रमाणे त्यालाही आढळून आले की,माणसे पशूच्याच प्रतिकृती आहेत.निराशेच्या गर्तेत पडलेले लोक त्याच्याभोवती गोळा झाले.कोळी,कामगार वगैरे दरिद्री लोक त्याचे अनुयायी झाले.त्याने त्यांना भावी सुखाची-स्वर्गातील राज्याची आशा दाखवली, अंधारमग्रांना आशेचा किरण दाखवला. "सोडा आपूले घरदार" तो म्हणाला, "चला माझ्या पाठोपाठ.प्रभूच्या नव्या राज्यात आपण शहरे,पुरे,पट्टणे हिंडत जाऊ, या गावाहून त्या गावी जाऊ,पृथ्वीवर सर्वत्र प्रभूचे राज्य स्थापू,ईश्वराचा झेंडा चोहोंकडे नेऊ."
त्याच्याभोवती जमा झालेले भिकारी म्हणजे बेजबाबदार व मजा करू पाहणाऱ्या लोकांचा जथ्था!त्यांना खाणेपिणे व भांडणे या गोष्टी आवडत.एकदा एका गावी त्यांचे स्वागत कोणीच केले नाही म्हणून त्या गावाला काडी लावायला ते निघाले;पण ख्रिस्ताने त्यांचे मन वळवले व त्यांना तसे करू दिले नाही.जगातल्या रूढींकडे पाहून तोंड वेंगाडण्यात त्यांना परमानंद वाटे. रविवारी म्हणजे प्रार्थनेच्या पवित्र दिवशी काही वेडेवाकडे,अपवित्र काम करताना ते कोणास आढळले तर ते असा युक्तिवाद करीत की,"लोकांसाठी रविवार आहे, रविवारसाठी लोक नाहीत." जे त्यांचे ऐकत नसत, ऐकायला तयार नसत,त्यांना ते शिव्याशाप देत व त्यांची निंदा करीत. "तुम्ही जणू मृतवत् मुडदे आहात!" असे ते त्यांना हिणवीत.ईश्वराने त्यांचा नाश करावा म्हणून ते प्रार्थना करीत.
सोडोम व गोमारा येथील लोकांचा जसा पूर्वी प्रभूने नायनाट केला तसाच याही लोकांचा त्याने नायनाट करावा म्हणून ते प्रभूला प्रार्थीत.ते जणू गॅलिलीतले समाजवादीच होते! अनुयायी फार अतिरेक करू लागले,तर त्यांचा मुख्य नेता ख्रिस्त त्यांस आवरी; पण खुद्द येशूही कधीकधी अत्यंत संतापे,प्रक्षुब्ध होई. ख्रिस्ताची वाणी व त्यांची कृत्ये अद्यापि पुरेशी सुसंस्कृत झाली नव्हती.
आपला संदेश न ऐकणाऱ्यांवर तो संतापे, त्याला धीर धरवत नसे.तो उतावळा व अधीर होता. निराशेच्या भरात एकदा तो म्हणाला,"जो माझ्या शब्दांवर विश्वास ठेवणार नाही,तो नरकात जाईल." आयुष्याच्या या काळात त्याच्या ठायी सहनशीलता नव्हती,सौम्यता नव्हती.तो एकदम रागावे, संतापे, प्रक्षुब्ध होई. कधीकधी क्रोध आवरणे त्याला अशक्य होई.जोरदार व तेजस्वी शब्दांनी ऐकणाऱ्यांचा हृदयपालट झाला नाही की तो हात उगारावयासही मागेपुढे पाहत नसे.हातात चाबूक घेऊन तो अन्यायाचे शासन करण्यास उभा राही;हाती तलवार घेऊन तो पृथ्वीवर स्वर्गाचे राज्य आणू पाही.
पण त्याच्या ठायी दैवी विनोदही होता व मुलांवर तर तो अपार प्रेम करी.तो जिथे जिथे जाई,तिथे तिथे त्याच्याभोवती मुले गोळा होत व त्याला म्हणत,"या, आमच्याबरोबर खेळायला या." तो त्यांच्याबरोबर हसे, खेळे.एक मुलगा खांद्यावर आहे,एक हाताला ओळखंबा घेत आहे,पुष्कळ जण त्याच्या पाठीमागून येत आहेत, अशा थाटात त्याची ती ऊन लागून तांबूस-पिंगट झालेली धिप्पाड मूर्ती रस्त्यावरून जाताना नेहमी दिसे, ती मुले पॅलेस्टाइनमधली लोकगीते मोठमोठ्याने गात व हावभाव करीत त्याच्याबरोबर हिंडत,ख्रिस्ताचे एखाद्या गावी आगमन म्हणजे तेथील मुलांना जणू सुटीचा दिवस ! तो नाझारेथचा गोड मुरलीवाला मुलांना इतके मोहून टाकी की,पृथ्वीच्या टोकापर्यंत कोठेही त्याच्याबरोबर जावयास ती आनंदाने तयार असत.
येशूची सारी आशा त्या बाळगोपाळांवर होती. 'हे माझे बाळसवंगडी म्हणजेच जगाची,प्रभूची व माझी आशा !' तो म्हणे,"ईश्वराचे राज्य अशा सरळ,निष्पाप,निर्मळ व प्रेमळ मुलांसाठीच असते.मुलांना त्याचे म्हणणे पटकन समजे.नवीन राज्याच्या ज्या अद्भुत कथा तो सांगे,त्या मुलांना खऱ्या वाटत.त्यात त्या निष्पाप बालकांना असंभाव्य वा अशक्य काहीच वाटत नसे.तो स्वतः त्या मुलांना घेऊन त्या रम्य आनंदभुवनात जाणार होता".त्या नवीन मंगल भूमीत द्वेष-मत्सर असणार नाहीत,दुःख असणार नाही,रोग असणार नाहीत,मरण येणार नाही!" असे तो सांगे.मुले त्याच्याजवळ बसून तल्लीनतेने ऐकत,आश्चर्याने त्यांचे डोळे विस्तारीत होत.येशू त्यांच्या डोळ्यांसमोर जी कल्पनारम्य चित्रे उभी करी,त्यामुळे त्यांची तोंडे आशेने व श्रद्धेने चमकू लागत."या पृथ्वीवर ही मुलेच नवीन स्वर्ग उभारतील,तो निर्माण करण्यास मदत करतील,मोठ्या माणसांच्या हातून हे काम होणार नाही,"असे त्याला वाटे.जे वयाने वाढलेले असतात,ते बिघडलेले असतात.साहसी वृत्ती,आत्मविश्वास,त्याग, श्रद्धा इत्यादी गुण त्यांच्या ठायी नसतात.न्याय्य वस्तुस्थितीतील वैगुण्ये,जगातील दुःखे व निराशा त्यांच्या हृदयात खोल रुतून बसलेली असतात,ते केवळ संसारी असतात.व्यवहारापुरते राहतात.या रानटी जगातील व्यावहारिक शहाणपणामुळे त्यांना सौम्य व शांत अशा एका नव्या जगातील सौंदर्ये दिसत नाहीत.
ख्रिस्त वयाने मोठ्या असलेल्या प्रौढांजवळ स्वर्गीय राज्याविषयी बोलत,तेव्हा त्यांना त्याचाही अर्थही समजत नसे.ते गैरसमज करून घेत व त्या राज्यात कोणाला कोणते अधिकार मिळणार याबाबत त्याच्याशी भांडू लागत ! ते त्याला विचारीत,"ते स्वर्गाचे राज्य आल्यावर तुमच्या उजव्या बाजूला कोण असणार, डाव्या बाजूला कोण बसणार,मंत्री कोण होणार, सेनापती कोण होणार?" ते लोक वयाने वाढलेले असले तरी एका दृष्टीने अडाणी मुलेच आहेत असे त्याला आढळून येई.दरिद्री,करुणास्पद पण वंदनीय मूल.
वाईट करण्याची त्यांची शक्ती तेवढी वाढलेली होती;इतर बाबर्तीत ते मूलच होते,अपरिपक्वच होते.आणि भोवतालच्या अशा लोकांत वावरतावावरता,त्यांचे अडाणी प्रश्न ऐकताऐकता ख्रिस्ताला हळूहळू कळून चुकले की,तो मुलांमध्येच वावरत होता.काही मोठी मुले, काही छोटी मुले;पण सारी मुलेच ! त्या मुलांच्या जगात एकटा तोच काय तो मनाने व बुद्धीने वाढत होता,प्रौढ व परिपक्व होत होता.बौद्धिक व नैतिकदृष्ट्या तोच तेवढा वाढत होता.आणि हे कळून आल्यावर तो रागावेनासा झाला.तो त्यांची कीव करू लागला.त्याला त्यांच्याबद्दल करुणा वाटू लागली.
तो त्याच्या आयुष्यातला संक्रमणाचा क्षण होता. सहानुभूतीची व प्रेमाची वेगळीच दृष्टी त्याला फुटली. मुलांचा द्वेष वा मत्सर करण्यात त्याच्यावर रागावण्यात, त्यांच्याशी आदळआपट करण्यात काय अर्थ? त्यांना शिव्याशाप देण्याचा,त्यांना शिक्षा करण्याचा काय उपयोग? ज्यांना विचार नाही,ज्ञान नाही,त्यांच्यावर तलवार उगारण्याचा काय उपयोग? का आपण फुकट दातओठ खावेत? प्रेमळ शब्दांनीच त्यांची कानउघाडणी करणे बरे नव्हे का? करुणेच्या,क्षमेच्या शस्त्रानेच त्यांना शिक्षा करणे अधिक शहाणपणाचे नाही का होणार ?
म्हणून त्याने आपला पवित्रा बदलला,आपले धोरण बदलले,जगात झगडे उत्पन्न करण्याची इच्छा आता त्याच्या ठायी राहिली नाही.त्याने आपला तापट स्वभाव सोडला.तो शांत व संयमी झाला.अत्याचाराने वा हिंसेने अन्यायाविरुद्ध लढणे त्याने सोडून दिले.सदैव युद्धाची भाषा वापरून पापाला डिवचण्याचे वा चिडवण्याचे त्याने बंद केले.इतकेच नव्हे;
तर तो शांततेच्या सनातन युद्धातला शांततेने लढणारा कर्मवीर बनला.तो चाबूक व तलवार टाकून देऊन क्षमा,दया व प्रेम या अधिक प्रभावी व प्रबळ शस्त्रास्त्रांनी सज्ज झाला.
तो मानवांमध्ये सदिच्छेचा संदेश पसरवीत फिरणारा परिव्राजक बनला. "शत्रूला ठार मार" अशी प्रार्थना देवाला करणारा पूर्वीचा येशू आता राहिला नाही. तो आता पर्वतोपनिषद् देणारा, परिणतप्रज्ञ असा सर्वस्वी निराळा महात्मा झाला.आता त्याचा संदेशही बदलला; शत्रूवर प्रेम करा,त्याच्या अज्ञानाची कीव करा, अडाण्यांना कळावे समजावे म्हणून त्यांना शिकवा. तुम्हांला शिव्याशाप देतील त्यांनाही आशीर्वाद द्या. छळणाच्याही आत्म्यांसाठी प्रार्थना करा.दुष्ट हृदयाच्या लोकांना रोगी समजून त्यांची शुश्रूषा करा.त्यांचे हृदय शुद्ध व निरोगी होण्यासाठी दयाळू वैद्याप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करा,आजारी माणूस सेवा करणाऱ्यासच वाताच्या भरात मारतो,तद्वत् हे रोगी हृदयाचे मानव त्रास देऊ लागले, मारू लागले,तरीही त्यांची सेवाच करीत जा.
शेवटी ख्रिस्ताला अटक झाली.त्याचे सारे शिष्य आपणही गिरफ्तार होऊ भीतीने पळून गेले ! त्याचे शत्रू त्याच्या रक्तासाठी तहानलेले होते;पण या सॉक्रेटिसप्रमाणेच ख्रिस्तानेही आपल्या बचावाची काहीही तयारी केली नाही.हातात तलवार घेऊन पीटर त्याला वाचवू पाहत होता,पण येशूने मंद स्मित केले. भाले,तलवारी वगैरे नेहमीची जुनाट हत्यारे घेऊन मारण-मरणाचा खेळ खेळण्याच्या स्थितीच्या पलीकडे तो गेला होता.तो या झगड्यांच्या पलीकडे गेला होता. ती पोरकट भांडणे त्याने केव्हाच मागे टाकली होती!
तलवारीने मिळविलेल्या विजयातून पुन्हा नवीन युद्धेच निर्माण होतात हीही गोष्ट त्याने नीट ओळखली होती.
आश्चर्यचकित झालेल्या पीटरला तो म्हणाला,"म्यानात घाल ती तलवार। जे तलवार हाती घेतील ते तलवारीनेच मरतील!"
रोमन सैनिकांसमक्ष उच्चारलेले ते शब्द म्हणजे जणू भविष्यवाणीच होती.! पण रोमनांनी त्या शब्दांकडे लक्ष दिले नाही.पायलेटने त्याला मरणाची शिक्षा फर्मावली! रोमन रिवाजाप्रमाणे क्रॉसवर खिळे ठोकून त्याला ठार मारण्यात आले! खिस्ताबरोबर दोन चोरही त्याच्या दोन्ही बाजूंस क्रॉसवर चढविले गेले.त्यांनी अपार वेदना होऊ लागल्यामुळे शिव्याशाप दिले;पण ख्रिस्ताने क्षमा केली.क्रॉसवरून लोंबकळणाऱ्या त्या तिघांच्याही मरणकाळच्या किंकाळ्या मात्र एकमेकांत मिसळून गेल्या.
अव्यवस्थित अशा या जगात कोठेच नीट न बसू शकणारे असे ते तिघे दुर्दैवी,करुणास्पद जीव होते !
मानवी ख्रिस्ताचे माझ्या मते हे असे चित्र आहे.घरच्यांनी नाकारलेला,नागरिकांनी धमकावलेला,मित्रांनी सोडलेला,शत्रूनी क्रॉसवर चढविलेला,अनुयायांकडून आतापर्यंत विपरीत अर्थ केला गेलेला,असा हा येशू ख्रिस्त काही जादूगार नव्हता.त्याने चमत्कार केले नाहीत.पण द्वेषाने पेटलेल्या या जगात त्याने दाखविलेले प्रेम हाच खरोखर थोर व अपूर्व चमत्कार नव्हे काय? त्याने केलेल्या चमत्कारांच्या म्हणून ज्या कथा गॉस्पेल्समध्ये वर्णिल्या आहेत,
त्याहून त्याने शत्रूबद्दल दाखविलेले प्रेम हा कितीतरी पटींनी मोठा चमत्कार नव्हे काय ? अर्वाचीन रूढ अर्थाने तो चर्चवाला नव्हता. त्याला विधिविधानांचा तिटकारा होता.कोंडलेली व गजबजलेली प्रार्थना-मंदिरे त्याला आवडत नसत. त्याचे चर्च मोकळ्या जागेत होते.रस्त्याच्या कडेचा एखादा दगड हेच त्याचे व्यासपीठ,तद्वतच जाडाभरेडा व प्रवासामुळे जीर्णशीर्ण झालेला एखादा झगा हाच त्याचा पोशाख असे.आणि आपल्या मातृभूमीची गाणी गाणारे ज्यू मजूर त्याचे साथीदार असत.ख्रिस्त आज जिवंत असता तर आपल्या नावाने चालणारी युद्धे,तद्वतच करण्यात येणारे द्वेष-मत्सर,छळ व अपराध पाहून तो विस्मितच झाला असता.ज्या ज्यू राष्ट्राने ख्रिश्चनांना देव दिला त्याच ज्यूंची निंदा चर्चवाले करीत आहेत,असे त्याला दिसले असते.एका ज्यू धर्ममार्तंडाने त्याला मरणाची शिक्षा फर्मावली,एवढ्याचसाठी आपली सारी ज्यू जात धिक्कारली जात असलेली त्याला दिसली असती,तर त्याने ख्रिश्चन चर्चला सौम्यपणे सांगितले असते की,आपणास जन्म देणारी माताही एक ज्यू बाईच होती.ख्रिस्त जर आज जर्मनीत येईल,तर तेथील ख्रिश्चन विद्यार्थी त्याला ज्यू समजून त्याच्या पाठीस लागतील.तो रुमानियात जाईल,तर त्याला तेथील लोक धावत्या आगगाडीच्या डब्याच्या खिडकीतून बाहेर फेकून देतील.तो पॅलेस्टाईनमध्ये जाईल तर अरब लोक त्याला ठार करतील व जवळच उभे असणारे ख्रिस्तीधर्मी इंग्रज सैन्य ती गंमत पाहत राहील. अमेरिकेतही पुष्कळशा कॉलेजात ख्रिस्ताला प्रवेश मिळणार नाही.थोडक्यात म्हणजे,आज जर ख्रिस्त जिवंत होऊन येईल,तर त्यालाही ख्रिश्चन राष्ट्रांना स्वतःच्या धर्माकडे घेऊन जाणे अशक्यप्राय होईल व मान हलवून म्हणावे लागेल,"हे प्रभो, हे तात, यांना क्षमा कर.आपण काय करीत आहोत हे यांना कळत नाही." तर मग ख्रिस्ताचे जीवन काय फुकटच गेले? तो काय उगीचच जगला? बिलकूल नाही.बर्नार्ड शॉ सर्वांना बजावून सांगत आहे की, "ख्रिस्ताचे जीवन विफल झाले असे अद्यापि म्हणता येणार नाही.
कारण,त्याच्या पद्धतीने प्रयोग करून पाहण्याचे शहाणपण अद्यापि कोणीही दाखविलेले नाही."
पण शौंच्या या म्हणण्यात नेहमीप्रमाणे अतिशयोक्ती आहे.कारण दोन माणसांनी ख्रिस्ताच्या पद्धतीचा अवलंब केलेला आहे;एक म्हणजे ज्यू तत्त्वज्ञानी स्पायनोझा व दुसरे म्हणजे हिंदूधर्मी गांधी.ख्रिश्चन जनतेला पुन्हा ख्रिस्ताकडे घेऊन जाण्यात ज्यू व हिंदू यांना अद्यापिही यश येण्याचा संभव आहे.