पाण्यापेक्षा माती आपल्यासाठी अधिक गूढ आहे, रूपकात्मक आणि शब्दशः सुद्धा.असं म्हणतात की, आपल्याला जितकी चंद्राची माहिती आहे त्यापेक्षा कमी ज्ञान सागराच्या तळाचे आहे आणि माती मधल्या जीवसृष्टीचे तर याहीपेक्षा कमी ज्ञान आहे.
हे खरं आहे की,सूक्ष्मजीवांच्या अनेक प्रजाती आज माहीत आहेत आणि मातीबद्दलही बऱ्याच नवनवीन गोष्टी संशोधनातून येतात.तरीही आपल्या पायाखालच्या गुंतागुंतीच्या दुनियेची ही फक्त आंशिक माहिती आहे. जंगलामध्ये जवळजवळ अर्धा जैविक माल जमिनीखाली असतो.इथले बहुतांश सजीव साध्या डोळ्यांना दिसत नाहीत.त्यामुळे कोल्हा,काळा सुतार पक्षी किंवा फायर सॅलमँडरबद्दल जितके आपल्याला कुतूहल आहे तितके या सूक्ष्म सजीवांचे नाही.
पण झाडांच्या आयुष्यात या सूक्ष्म जीवांचे महत्त्व फार आहे.
जंगलातून मोठे सजीव आले नाहीत तरी झाडाला फार फरक पडणार नाही.हरणे,रानडुक्कर,मांसाहारी जनावरे आणि अनेक पक्षी जंगलात नसले तरी परिसंस्थेत फार परिणाम होणार नाही,जंगल वाढतच राहील.पण त्यांच्या पायाखालचे सूक्ष्मजीव नसले तर मात्र मोठा फरक पडेल.मूठभर मातीमध्ये जितके सूक्ष्मजीव असतात तितकी पृथ्वीची लोकसंख्याही नसेल.चमचाभर मातीमध्ये कित्येक मैलबुरशीच्या जाळ्याचे तंतू असतात.या सर्वांच्या योगदानातून झाडांसाठी मातीचे मूल्यवर्धन होते.या सूक्ष्मजीवांबद्दल बोलण्याआधी आपण पहिल्यांदा माती कशी तयार झाली,ते पाहू.उघडे किंवा सैल रचनेत असलेल्या दगडातून आर्द्रता आणि पोषणद्रव्यांचा योग्य साठा होत नाही.भूवैज्ञानिक प्रक्रियेतून,उदाहरणार्थ हिमयुगातील कडक थंडीमुळे या दगडांना तडे गेले. हिमनद्यांनी त्यांचे छोटे छोटे तुकडे केले.कालांतराने त्यांची बारीक वाळू बनली.हिमयुग संपल्यावर पाण्याने या वाळूचा थर दऱ्याखोऱ्यातून पसरविले किंवा वादळ वाऱ्यामुळे दूरवर पसरून त्यांचे जाड थर रचले गेले.
द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न
अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर
मनोविकास प्रकाशन
सूक्ष्मजंतू,बुरशी आणि वनस्पती पाण्यातून येत गेली आणि त्यांच्या विघटनामुळे वाळूत जैविक मालाची भर पडली.पुढील हजारो वर्षांत तिथे झाडे उगवायला सुरू झाली आणि मातीची गुणवत्ता वाढत गेली.झाडांच्या मुळांमुळे मातीची धूप टळली आणि त्यावर जैविक माल पडत गेला.ही दगडी कोळशाची प्राथमिक अवस्था होती.धूप किंवा झीज ही जंगलासाठी सर्वांत धोकादायक प्रक्रिया असते.जोरदार पाऊस किंवा काही हवामानाच्या घटनांमुळे माती वाहून जाते.जर जंगलाला पावसाचे पाणी शोषून घेता आले नाही तर पाणी वाहून जाताना मातीही घेऊन जाते.
यामुळेच पावसाळ्यात वाहणारे पाणी तपकिरी रंगाचे दिसते. पावसामुळे एका चौरस मैलातून दोन हजार नऊशे टन माती वर्षाकाठी वाहून जाऊ शकते.आणि एका वर्षात जेमतेम दोनशे नव्वद टन माती त्याच क्षेत्रावर तयार होऊ शकते.
त्यामुळे काही काळातच तिथे फक्त दगड उरतात.ज्या क्षेत्रात काही शतकांपूर्वी शेती झाली तिथे आज अशी मातीविरहित क्षेत्र दिसून येतात.या तुलनेत जिथे अजून जंगलं शाबूत आहेत तिथे एका चौरस मैलात जेमतेम एक ते चौदा टन मातीची झीज होते.
किंबहुना अशा ठिकाणी झाडाखालची माती अधिक खोल आणि पोषणयुक्त होत जाते ज्यामुळे तिथल्या जंगलाला पोषक वातावरण तयार होते.
आता मातीतील जीवसृष्टीकडे वळू.खरंतर ही काही फार प्रेक्षणीय नाही.हे सजीव इतके सूक्ष्म असतात की, डोळ्याने तर नाहीच पण भिंगातूनही दिसणार नाहीत. बीटल माईट,स्प्रिंगटेल किंवा स्युडो सेंटीपीड हे नक्कीच ओरंग ऊटंग आणि हम्पबॅक व्हेल माशाइतके आकर्षक नसतात,पण हे सजीव अन्नसाखळी मधले प्राथमिक घटक असल्यामुळे त्यांना जमिनीवरील प्लॅकटन (पाण्यात तरंगणारे सूक्ष्म प्लवक) म्हणता येईल. दुर्दैवाने संशोधकांना या जीवांमध्ये म्हणावा तितका रस नाही.यांच्या हजारो प्रजातींचा शोध लागला आहे पण त्यांना फक्त उच्चारायला अवघड लॅटिन नावं दिलेली आहेत. अजून अगणित प्रजाती आपल्याकडून दखल घेतली जाण्याची वाट पाहात आहेत.
तुमच्या घराच्या मागच्या जंगलात अजून खूप गुपित आपली वाट पाहात आहेत.तोच काय तो दिलासा!
याबद्दल आपल्याला आज जी थोडी माहिती आहे, त्यावर जरा बोलू.मघाशी बीटल माईटचा उल्लेख झाला. यांना 'ऑरिबॅटिड माईट' असेही म्हणतात.युरोपमध्ये यांच्या हजारो प्रजाती सापडतात.हे सजीव जेमतेम ०.०४ इंच लांब असतात आणि आखूड पायाच्या कोळ्यांसारखे दिसतात,तपकिरी रंगाच्या दोन छटा असलेले त्यांचे शरीर जमिनीच्या रंगात मिसळून जाते. आपल्या घरांमधल्या धुळीत ही माईट असतात. झडणाऱ्या मानवी त्वचेवर ते जगतात पण काही जणांना त्यांच्या अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो.काही बीटल माईट झाडांभोवती अशाच प्रकारे झडलेल्या सालांवर आणि पानांवर जगतात.ही नसती तर गळणारी पानं आणि सालांचा कित्येक यार्ड उंच ढीग झाला असता.बीटल माईटची भुकेली सेना हा ढीग फस्त करते.माईटच्या इतर काही प्रजाती बुरशीवर जगतात.बुरशीच्या बारीक तंतूंमधून वाहणारे द्रव्य ते शोषून घेतात.याव्यतिरिक्त झाडांनी आपल्या मित्र बुरशीसाठी बनविलेली साखरही बीटल माईट शोषून घेतात.
कुजणारे लाकूड असो किंवा मेलेली गोगलगाय, प्रत्येकावर चरणारे बीटल माईट जंगलात सापडतात. जन्म घेणारी वनस्पती असो अथवा मरून पडलेले झाड प्रत्येक ठिकाणी बीटल माईट असतात,त्यामुळे या परिसंस्थेचे अविभाज्य घटक म्हणून त्यांना मानलं जातं.
आता भुंग्यांकडे (वीव्हिल) वळू.कान हरवलेल्या पिटुकल्या हत्तीसारख्या दिसणाऱ्या या कीटकांत पृथ्वीतलावरील सर्वाधिक प्रजाती आहेत.फक्त युरोप खंडातच यांच्या चौदाशे प्रजाती मिळतात.खाण्यापेक्षा आपल्या पोराबाळांच्या पालकत्वात भुंग्यांचे जास्त लक्ष असते.पान आणि कोवळ्या खोडांमध्ये आपल्या सोंडेने छोटी भोकं पाडून त्यात ते आपली अंडी घालतात.तिथे या अंड्यातून निघालेल्या पिल्लांना भक्षांपासून संरक्षण असते आणि ती शांतपणे झाडाच्या आतला भाग किंवा पानं खात खात ती आपला मार्ग बनवतात.
जंगलाच्या जमिनीवर राहणारे काही भुंगे उडू शकत नाहीत,कारण त्यांना या परिसंस्थेच्या संथ चालीची आणि निरंतर अस्तित्वाची सवय झालेली असते.एका वर्षात ते फार फार तर तीस फूट प्रवास करतात,कारण त्या पुढे जाण्याची त्यांना गरजच पडत नाही.समजा एखादे झाड वठले आणि आजूबाजूची परिस्थिती बदलली तर तिथल्या भुंग्याला फक्त शेजारच्या दुसऱ्या झाडापर्यंत पोचायचा प्रवास करावा लागतो.मग तिथे पोचून तो कुजणाऱ्या पाल्यावर आपले पोट भरेल. जंगलात भुंगे असणे हे जंगल इतिहासकालीन असल्याचे निदर्शक आहे.जर मध्ययुगामध्ये जंगल साफ केले गेले आणि नंतर पुन्हा लागवड झाली तर तिथे हे कीटक दिसत नाहीत
कारण साफ झालेल्या जंगलापासून दुसऱ्या जंगलापर्यंत ते पोचू शकत नाहीत.आत्तापर्यंत आपण बोललेल्या सर्व प्राण्यांच्यात एक साम्य आहे.सर्व प्राणी सूक्ष्म असल्यामुळे फार छोट्या परिसरात त्यांचा परिणाम जाणवतो.मध्य यूरोपीय प्राचीन जंगलात हे ठीक होते. पण बहुतांश जंगलात मानवी हस्तक्षेप झालेले आहेत. त्यामुळे बीचच्या जागी स्प्रूस दिसतात,ओक वृक्षांची जागा डग्लस फरने घेतली आहे आणि विशाल वृक्षांच्या ठिकाणी यौवनातील झाडे उभी आहेत.अशा प्रकारच्या अल्पवयीन जंगलात जनावरांना खाद्य मिळत नाही त्यामुळे त्यांचे अस्तित्व संपून गेले.तरीही काही ठिकाणी आज जुनी पानझडी जंगले आहेत जिथे मूळच्या जैवविविधतेला आसरा मिळतो.आता जर्मनीमध्ये सूचीपर्णी जंगलांच्यापेक्षा पानझडी वृक्षांची लागवड सुरू झाली आहे.पण वादळात मोडलेल्या स्प्रूसच्या जागी एखादा बीच जरी उभा राहिला तरी बीटल माईट आणि स्प्रिंगटेल पुन्हा तिथे कसे पोहोचू शकतील? हे कीटक आयुष्यभरात जेमतेम तीन फूट चालतात. बाव्हेरियन जंगलासारख्या सुरक्षित वनक्षेत्रात पुन्हा एकदा घनदाट प्राचीन जंगले उभी राहतील,अशी अपेक्षा आपल्याला करता येईल का? हो, हे नक्कीच शक्य आहे.
माझ्या जंगलात काही विद्यार्थी संशोधकांनी सूचीपर्णी झाडांशी निगडित सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला आहे. त्यातून त्यांना असे दिसते की,हे जीव दूरपर्यंत जाऊ शकतात.जुन्या स्प्रूसच्या लागवडीत तर हे नक्कीच दिसून येते.या तरुण संशोधकांना स्प्रूस जंगलात विशेष स्प्रिंगटेल सापडले.पण ह्यूमेल मधल्या या जंगलात जेमतेम शंभर वर्षांपूर्वी लागवड झाली होती.त्याच्या आधी फक्त प्राचीन बीच वृक्ष होते,जसे मध्य युरोपात सापडतात.तर मग सूचीपर्णी जंगलात वाढणारे हे स्प्रिंगटेल ह्यूमेलला कसे आले,
पोचले ? माझ्या अंदाजाप्रमाणे हे कीटक पक्ष्यांच्या पिसामध्ये चिकटून इथे आले असावेत.पक्ष्यांना पानगळीत लोळायला खूप आवडते.असे करून त्यांची पिसे स्वच्छ होतात.आणि तेव्हाच हे छोटे जीव त्यांच्या पिसात अडकून बसतात. दुसऱ्या कुठल्या जंगलात जाऊन तिथे लोळण घेतली की तिथे जाऊन पडतात.
स्प्रूस जंगलातील विशेष प्रजातींना जे लागू होतं तेच कदाचित पानझडी वृक्षप्रेमी प्रजातींनाही लागू होत असेल.
जर का भविष्यात पुन्हा प्रौढ अवस्थेतील पानझडी जंगले इथे आली तर पक्षी योग्य त्या कीटकांना तिथे पोचवायची काळजी घेतील. पण कील आणि ल्युनेबर्गला झालेल्या अभ्यासात असे दिसते की या सूक्ष्म कीटकांची परत वारी होण्यासाठी प्रचंड कालावधी लागेल."
ल्युनेबर्गच्या सुपीक जमिनीवर शंभर वर्षांपूर्वी ओक वृक्षांची लागवड झाली.शास्त्रज्ञांना वाटले की काही दशकातच बुरशीचे जाळे तयार होईल आणि सूक्ष्म जिवाणू मातीत वाढू लागतील.पण आजही तिथे त्यांचं विपुल वैविध्य - दिसत नाही.याचा जंगल परिसंस्थेवर निश्चितच विपरीत परिणाम होतो.शिवाय जन्म आणि कुजण्याच्या विघटन प्रक्रियेचे पोषणचक्र कार्यक्षम होत नाही.त्यात भर म्हणजे शेतीच्या वेळेस वापरलेल्या खतांतील नत्र अजूनही इथल्या मातीत सापडते.इथलं एक जंगल इतर ठिकाणच्या लागवडीपेक्षा झपाट्याने वाढतय,हे खरं आहे,पण ही झाडं पुरेशी धडधाकट नाहीत.त्यामुळे दुष्काळ काढणं त्यांना अवघड जात. इथली माती पूर्ववत कधी होईल,हे आपल्याला माहीत नाही.पण इतकं कळलं आहे की एक शतक त्यास पुरेसं नाही.मातीचं पुनरुज्जीवन होण्यासाठी आपल्याला प्राचीन जंगलांना मानवी हस्तक्षेपापासून सुरक्षित ठेवावं लागतं.अशा ठिकाणी मृदेतील वैविध्य जिवंत राहतं आणि याचा उपयोग बाजूच्या परिसरात त्यांचा प्रसार होण्यासाठी होतो.आणि यासाठी काही मोठा त्याग करावा लागत नाही,हे आपल्याला ह्यूमेलच्या लोकांनी इतकी वर्षं दाखवून दिलं आहे.त्यांनी एक बीच वृक्षाचं जंगल सुरक्षित ठेवलं आणि कल्पकतेनं त्याचं मार्केटिंग केलं.
जंगलाच्या एका भागात जंगलातील स्मशानभूमी केली आहे.इथे मृतांच्या नातेवाइकांना जिवंत झाडाखाली आपल्या लाडक्या व्यक्तीची थडगी बनवण्यासाठी झाड भाड्याने दिलं जाते.आहे की नाही ही छान कल्पना ? अजून एक भाग उद्योगधंद्यांना भाड्याने दिला जातो जिथे त्यांना निसर्गसंवर्धनाची जबाबदारी पूर्ण करता येते. अशा गोष्टींमुळे लाकडाचा वापर होत नाही व निसर्ग आणि माणूस दोघेही खुश राहतात.
आजच्या एकविसाव्या शतकात जंगलाची सुरक्षा आणि संवर्धनाचा खर्च अशा प्रकारे विविध मार्गातून जगभरात काढला जात आहे.ग्वाटेमाला मधील 'माया बायोस्फियर रिझर्व' सारख्या ठिकाणी शिक्षण आणि उपयुक्ततेचा मेळ घडवून आणला जातो.तिथे स्थानिक लोकांकडून पर्यटक जंगलाची माहिती घेतात. त्यामुळे तिथे स्थानिक लोक लाकूडतोड किंवा शेती करत नाहीत.
काही ठिकाणी जंगल संवर्धनाचे काम प्रतिष्ठेशी जोडण्यात आले आहे,जसे स्कॉटलंड मध्ये ! इथे तुम्हाला पूर्वीच्या प्रतिष्ठित लोकांच्या मालकीची जमीन विकत घेता येते.त्यामुळे लाकूड तोडणाऱ्या धंद्यांना बाहेर ठेवलं जातं आणि तिथे प्राचीन कॅलिडोनियन जंगल परिसंस्थेचं पुनरुज्जीवन होऊ शकत आहे.काही ठिकाणी असंभाव्य संस्थांची भागीदारी आहे,जसे अमेरिकेमध्ये ! राष्ट्रीय वन्य जीवन आणि मत्स्य संस्था लांब पानाच्या पाईन परिसंस्थेला टिकवण्याचं काम करीत आहे,त्यांना अमेरिकेच्या संरक्षण खात्याकडून मदत मिळत आहे.याचं कारण म्हणजे सैन्य दलाच्याभोवती जंगल असणं हे त्यांच्या पथ्यावर पडतं.अशा कित्येक पद्धतीने आपल्याला जंगले सुरक्षित आणि उत्पादनक्षम ठेवता येतात.