सृष्टीच्या विराट दर्शनानं आश्चर्यचकित झालेल्या मानवाचं प्रथम दोन गोष्टींकडं लक्ष वेधलं.वरचं अनंत आकाश आणि खालची अफाट पृथ्वी.हे आकाश क्षितिजाशी पृथ्वीला मिळालेलं.आकाशात ग्रह-नक्षत्रांचा दिव्य खेळ चालतो.
धरतीच्या भूगर्भातील घडामोडींमुळं भूतलावरील पर्वतमाला नाहीशा होऊन तिथं समुद्र दिसतो.सागराच्या पोटातून डोंगरदऱ्या जन्माला येतात. कालौघात नद्या आपल्या प्रवाहाची दिशा बदलतात किंवा एखादी सरस्वती नदी लुप्तही होते. पृथ्वीतलावरील सारं काही अस्थिर आहे;परंतु आकाशातील खगोल मात्र चिरस्थायी आहे.
आकाशाचं खरं दर्शन घ्यायचं ते पर्वतावरून किंवा वाळवंटी प्रदेशातूनच.वनाधिकारी असल्यामुळं माझं बहुतेक वास्तव्य जंगलात असे.मी आकाशाचं सौंदर्य न्याहाळलं,ते पर्वतशिखरांवरून,डोंगरमाथ्यांवरून आणि गडांच्या चौथऱ्यांवरून.पर्वतावर उभं राहून आकाशाकडं पाहिलं,तर वाटतं की,तारे अधिक जवळ आले आहेत. उतारांवरील आणि खोऱ्यांतील जंगलांमधील उंच वृक्षांवर तारे अधांतरी लोंबत आहेत असा भास होतो.
वडगाव मावळात असताना पवन मावळातल्या तुंगी गडावर एकदा रात्रीचा गो.नी.दांडेकरांबरोबर मुक्कामाला गेलो होतो.बरोबर आणखी दोघं तिघं होते.
तुंगी हा टेहळणीचा गड आहे.तिथून आजूबाजूच्या सुमारे सोळा गडांचं दर्शन होतं.तिथल्या एका पडक्या विहिरीजवळ बसून आम्ही रात्रभर आकाशाकडं पाहात जागत होतो.इथून मला आकाशाच्या सौंदर्याचं खरं दर्शन झालं.वरती विशाल निळा घुमट,अष्टदिशा ग्रह-नक्षत्रांनी व्यापलेल्या.त्यात काही तारे फार तेजस्वी,सुंदर,तर काही मंद व मनोहर दिसत.मी दुर्बिणीतून आभाळाकडं पाहिल्यावर जो देखावा दिसला,तो केवळ अपूर्व होता. ताऱ्यांची संख्या जास्त दिसू लागली.इतकंच नव्हे,तर काही ताऱ्यांचं तेजही विलक्षण दिसू लागलं.काही लाल मण्यांसारखे दिसत,काही पाचूसारखे,काही नीलमण्यांसारखे,तर काही आपल्या तेजानं प्रत्यक्ष हिऱ्याला देखील मागं टाकतील असे होते.जिथं नुसत्या डोळ्यांना एक तारा दिसत होता,तिथं दुर्बिणीतून दोन किंवा तीन दिसत होते जिथं काहीच दृष्टीस पडत नव्हतं, तिथं दाट ढगांसारखा ताऱ्यांचा पुंज दृष्टीस पडे.
ग्रह-ताऱ्यांचं नियत परिभ्रमण त्या दिवशी जेवढं जाणवलं,तेवढं पुन्हा कधी दिसलं नाही.
ताऱ्यांचा प्रकाश धरतीवर पडलेला दिसत नाही म्हणतात;परंतु तुम्ही जंगलात गेलात,की अंधाऱ्या रात्री त्यांचा प्रकाश जाणवू लागतो.घनदाट अरण्यात रात्री कधी अंधार नसतोच.ग्रह-नक्षत्रांचा सौम्य प्रकाश जिकडंतिकडं दृगोचर होतो.अशा वेळी जंगलातून पायी चालू लागलात,की त्यांच्या मंद प्रकाशात बांबू-बेटांच्या अस्पष्ट छाया जमिनीवर पडलेल्या दिसतात.
जंगलातील तळी,सरोवरं,जलाशयं आणि दलदली यांभोवती रात्री आणि पहाटेच्या वेळी भटकताना मोठं गूढ वाटे.यक्षिणींचं आणि किन्नरींचं तिथं वास्तव्य असावं असं वाटे.साऱ्या आभाळाचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं असे.वाटे,की हे जलाशय गुरू-शुक्रांच्या डोळ्यांनी आपणाकडं पाहात आहे.
एकदा मध्यरात्रीनंतर मी नवेगावबांध सरोवराकाठी गेलो होतो.
अमावस्या एक-दोन दिवसांवर आलेली होती. जिकडंतिकडं विलक्षण शांतता होती.समोर स्तब्ध विशाल जलाशय पसरलेला होता.त्यात साऱ्या आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं होतं.लक्ष लक्ष ग्रहतारे त्यात चमकताना दिसले.वरती आकाश आणि खाली पाण्यात प्रतिबिंबित झालेला आकाशाचा पट.तिथं पाण्यावर कुठंच अंधार दिसत नव्हता.त्या स्वर्गीय दृश्याकडं मी किती तरी वेळ पाहात होतो.त्या अद्भुत शांतीनं मन प्रसन्न होत होतं.
पक्षिनिरीक्षणाच्या छंदामुळं पहाटेपूर्वीच्या काळोखात मी तळ्याची वाट धरीत असे.त्यामुळं मला जेवढं आकाशाचं दर्शन झालं,तेवढं क्वचितच कोणाला झालं असेल. पाखरांना जाग येऊन त्यांचा मंजुळ आवाज केव्हा कानांवर पडेल त्याची वाट पाहात मी तळ्याकाठी आकाशाकडं पाहात उभा असे.
कित्येक वेळा मी जंगलातील उंच निरीक्षण-मनोऱ्यात रात्री बसलेला असे.डोक्यावर छप्पर नसे.चोहो बाजूंना घनदाट जंगल.हिरे-माणकादी रत्नांनी झगमगणारा निळा-जांभळा आकाशाचा तुकडा तेवढा दिसायचा. क्षणोक्षणी त्या निळ्या पटलावरील रत्नजडित नक्षी बदलत असायची.पानगळीच्या दिवसांत सारे वृक्ष पर्णहीन झालेले असत. फक्त त्यांच्या फांद्या-डहाळ्या यांची नक्षी आभाळाच्या पार्श्वभूमीवर कोरलेली दिसायची.क्षणात असा भास होई की,ग्रह-नक्षत्रांची पानंफुलं लेवून ही अलंकृत झालेली झाडं उभी आहेत.काळ्याशार डोहातील पाण्यात काठावरच्या झाडांचं देखणं,कंप पावणारं प्रतिबिंब पडलेलं असायचं.
पक्षिनिरीक्षणाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील पश्चिम किनाऱ्यावर मी अनेकदा पायी हिंडलो आहे.तेव्हा समुद्रकिनाऱ्यावरून आकाशाचं आगळंवेगळं दर्शन घडलं आहे.सागरकिनाऱ्यावरील हवेतील आर्द्रतेप्रमाणं चांदण्या कमी-अधिक जवळ आल्यासारख्या दिसतात.
एकदा मी दिवेआगरच्या सागर-पुळणीवर रात्रभर आभाळाकडं पाहात जागत होतो.सागराच्या भरती-ओहोटीमुळे ग्रह-नक्षत्रांचं प्रतिबिंब तिथं आपण नेहमीचं पाहू शकतो,असं नाही.परंतु मध्येच काही काळ समुद्राचं पाणी स्थिर असतं.त्या वेळी अलौकिक सौंदर्य असलेल्या साऱ्या आभाळाची पडछाया या पाण्यात दिसू लागते.
हवेतील आर्द्रता जशी कमी होऊ लागते, तसे ग्रहगोल पुळणीवर उतरतात की काय,असं वाटू लागतं.
राजस्थानमधील रणथंबोर, सारिस्का आणि जैसलमेर या वाळवंटी प्रदेशांत तर आकाशातील नक्षत्रं अधिक जवळ आल्यासारखी वाटतात.
'रुक्मिणी स्वयंवरा'त निसर्गसौंदर्याकडं इतर कोणत्याही प्राचीन कवीपेक्षा नरेंद्रानं अधिक लक्ष पुरविलं आहे. आकाशात सायंकाळी नक्षत्रांचं कसं आगमन होतं,याचं सुंदर वर्णन 'नक्षत्राची शोभा'मध्ये आलं आहे :
तंब गगनीं नक्षत्रे उमटत: जैसी आकाशीं घाटौलि फुलत,ना तरि मेघ वीणि साधित : मोतियांची,की पाख-धुनि करीती चकोरे : ते सैग मंदाकिनीचे थेंबगोरे,की दिसति बाणलिंगे ऐतारे:गगन नर्मदेची...
म्हणजे 'नंतर एक एक करून आकाशात नक्षत्रं उमटू लागली.जणू काय गगनाच्या उद्यानातील पुष्पकळ्याच उमलू लागल्या.
नक्षत्रांच्या उगवण्याच्या परी तरी किती ? कुठे दाटलेले मेघ हळूच दूर होत आणि त्याआडची नक्षत्रं दिसू लागत.वाटे,जणू मेघाचा शिंपलाच उघडला आणि ही मोत्याची वीण ओघळली.कधी वाटे,चांदणं पिण्यासाठी आकाशाकडं जाणारे चकोर वाटेत मंदाकिनीच्या जलात आपले पंख धुऊ लागले आणि त्या पंखांना चिकटलेले मंदाकिनीचे हे थेंबच चोहिकडे उडाले.किंवा असं वाटे,की आकाशगंगेचा प्रवाहच वाहात आहे आणि ही नक्षत्रं म्हणजे त्या प्रवाहातील तेजस्वी बाणलिंगे आहेत.' (आनंद साधले)
सारिस्का या व्याघ्रप्रकल्प क्षेत्रात आम्हा वनाधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा होता.राहण्यासाठी खुल्या मैदानावर राहुट्या उभ्या केल्या होत्या.फेब्रुवारी महिना. दिवसा खूप कडक ऊन पडे,तर रात्री गारठवणारी थंडी पडे.रोज रात्री जेवण झालं,की मी तंबूसमोर वेताच्या खुर्चीवर बसून अंगावर ब्लॅकेट ओढून समोरच्या आकाशाकडं पाहात असे.एकदा आकाशातून उल्का पृथ्वीकडं येताना दिसली.अंधारलेलं आकाश क्षणभर प्रकाशानं झगझगीत झालं.पिवळा प्रकाश मागं सोडीत-रेखीत उल्का चालली होती.ती राहुटीवरून माझ्याजवळून प्रकाशाचा झोत टाकीत गेली.मला वाटलं,ती राहुटीवर पडणार.परंतु तसं काही घडलं नाही. दुसऱ्या दिवशी कळलं,की ती उल्का इथून एका किलोमीटर अंतरावर खाली पडली,तेव्हा दोन व्यक्तींचा त्यात मृत्यू झाला.
आकाशाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी तुम्हाला खगोलशास्त्राचं ज्ञान आवश्यक आहे असं नव्हे. रात्रीच्या शांत समयी मला एकट्यानंच आकाशाचं दर्शन घेण्यात जो आनंद मिळतो, तो खगोलशास्त्रज्ञांच्या सहवासात मिळत नाही. ते सारे जण सतत मोठमोठ्यानं बोलून रात्रीच्या शांततेचा भंग करतात. वाटतं, या शास्त्रज्ञांना आकाशातील सौंदर्यानं कधी स्पर्श केला असेल काय?
डेव्हिड थोरोला तो आकाशस्पर्श झाला होता,तो एका ठिकाणी लिहितो-'सूर्यास्त झाला,की जंगलाआडून हळूहळू तारकापुंज डोकावताना दिसतात.रात्रीची सुरुवात अशी उदात्त रीतीनं होणं हा केवढा योगायोग आहे!ही नक्षत्रांची वेळ म्हणजे शांतपणं अंतर्मुख होण्याचा समय.ग्रहगोलांनी सुशोभित झालेल्या आकाशाच्या निळ्या घुमटाखाली विशाल मृदगंधा पृथ्वी एखाद्या निसर्गदेवतेच्या मंदिरासारखी दिसते.या नक्षत्रदेवतांपुढं मन विनम्र होतं.इंद्रधनुष्य आणि नक्षत्रं म्हणजे अनंताचं जणू हस्ताक्षरच आहे!'
पाखरमाया,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी,नागपूर
नोबेल परितोषिकविजेती अमेरिकन कादंबरीकार पर्ल बक् हिचं बरंच आयुष्य चीनमध्ये गेलं.त्या पार्श्वभूमीवर लिहिलेली खगोलशास्त्रज्ञ 'फादर, अँड्री' ही तिची सर्वश्रेष्ठ कथा म्हणून गणली जाते. ही कथा वाचताना फादर अँड्रींना नक्षत्रांचा स्पर्श झाला आहे.
बालकवींना आकाशाच्या सौंदर्याचा साक्षात्कार झाला होता.'आनंदी आनंद गडे' ह्या कवितेत तो अनुभवास येतो :
नीलनभीं नक्षत्र कसें
डोकावूनि हैं पाहतसे;
कुणास बघतें ? मोदाला !
मोद भेटला का त्याला ?
'निर्झरास' या कवितेत आकाशाचं सुंदर वर्णन आले आहे.निळ्या आभाळातील तारका कशा दिसतात,पहा-
रम्य तारका लुकलुकती
नीलारुण-फलकावरती;
त्यांच्या 'तारकांचे गाणें' या कवितेची सुरुवात पहा-
कुणि नाहीं ग,कुणि नाहीं
आम्हांला पाहत, बाई.
शांति दाटली चोहिंकडे;
या ग,आतां पुढें पुढें,
लाजतलाजत
हळूच हांसत,
खेळ गडे,खेळू कांही,
कोणीही पाहत नाहीं,
बालकवींचं अंतःकरण एखाद्या सरोवरासारखं पारदर्शक होतं.दिव्यलोकीच्या शांतीचा त्यांना आकाशस्पर्श झाला होता.
विमल चंद्रिका क्षितिजावरतीं
तरळ तारका चमचम करिती,
दिव्य लोकिंची रुचिरा शांती,
तुडुंब भरली गगनांत... १
ग्रहाग्रहावर भरलें तेज,
तेजाची लयलूटच आज,
रात्रींचा शेवटला साज देव करिती जणुं स्वर्गात (तडाग असतों,तर-)
'अनंत' या कवितेत त्यांनी विश्वाचं सुंदर वर्णन केलं आहे.
अनंत तारा नक्षत्रे हीं अनंत या गगनांत,
अनंत दीप्ती,अनंत वसुधा,हे शशिसूर्य अनंत.
जिकडं तिकडं त्यांना प्रकाशाचाच साक्षात्कार होतो.
हर्षचरितात बाणभट्टानं पहाटेच्या ताऱ्यांचं मोठं सुंदर वर्णन केलं आहे.
'कलविंककंधराधूसरासु तारकासु'
म्हणजे प्रातःकालीन ताऱ्यांचा वर्ण कलविंक पक्ष्यांच्या पंखाच्या धूसर वर्णासारखा असतो.
'वंगचित्रे' या ग्रंथात पु.ल.देशपांडे यांनी आकाशसौंदर्य पाहणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांची एक सुंदर आठवण सांगितली आहे.
'रवींद्रनाथ,म्हणे,रोज पहाटे चार वाजता उठत असत. मग उत्तररामायणातल्या सौधावर येऊन स्वस्थ उभे राहात.अनेकांच्या पाहण्यात ही गोष्ट आली होती.कुणी तरी धिटाईनं विचारलं,
"गुरुदेव,रोज इतक्या पहाटे उठून आपण काय पाहता?"
गुरुदेव म्हणाले,"पहाट पाहतो."
रोजची पहाट त्यांना नवी दिसायची आणि ती तशी असतेच,फक्त पाहणारे डोळे हवेत.एका कवितेत तर त्यांनी म्हटलं आहे-
आज मनेरमध्ये छेये सुनील आकाश ओठे गेये छि
आज शकाल बेलाय छेले खेलार छेले शिकल टूटे छि...
मी मराठी तर्जुमा केला-
आज उतरले सुनील अंबर मनात माझ्या वेड्या आज पहाटे लुटुलुटुच्या शैशव लीला तोडिति सगळ्या बेड्या...
इथं मला बालपणी पाठ केलेली एक कविता आठवते :
देवा,तुझें किती। सुंदर आकाश
सुंदर प्रकाश। सूर्य देतो ।
सुंदर चांदण्या। चंद्र हा सुंदर
चांदणें सुंदर। पडे त्याचें।
आज इतकी वर्ष लोटली.अजूनही मी रोज पहाटे उठून रानावनांत फिरायला जातो,तेव्हा नित्यनूतन अशा आकाशाचं दर्शन होतं.