सकाळी लवकर ऑफिसला पोहोचायच्या गडबडीत नाष्टा करायचं राहून गेलं म्हणून म्हटलं,'चला आज जरा झणझणीत कोल्हापुरी मिसळीवर ताव मारू.' कंपनीच्या गेटपासून हाकेच्या अंतरावर असलेलं सुप्रसिद्ध मिसळ सेंटर गाठलं.
फोनवर बोलता बोलता समोर नजर गेली.चेहरा ओळखीचा वाटला म्हणून जरा नजर रोखून धरली,मेंदूवर ताण दिला तसा एवढ्या लांबून टक लावून आपल्याला कोणीतरी न्याहाळतोय,हे समोरच्या व्यक्तीच्या ध्यानात आलं.जवळ जाताच लक्षात आलं,'आरं ह्यो तर आपला सदा...' आमच्या गावाकडचा ऐन उमेदीच्या काळातला खास मित्र.लांब तिकडं कांडगावच्या रस्त्याला एका खेड्यातनं रोज सदाशिव गारगोटीला महाविद्यालयात शिकायला यायचा.घरची परिस्थिती बेताची.रोज सकाळी शेतात जाऊन वैरण आणायची.जनावरांना पाणी पाजून घाईगडबडीत सायकलवरनं धापा टाकत यायचा.
दुपारच्या जेवणात आईनं जुन्या धोतराच्या फडक्यात बांधून दिलेली चटणी-भाकरी खायचा. एकच शर्ट-पँट आठवडाभर तुबलायचा;पण मिळंल ते पुस्तक अधाशागत वाचून काढायचा.अभ्यासात हुशार असल्यामुळं सगळे शिक्षक त्याला मदत करायचे.पुढं कसल्यातरी कोर्ससाठी प्राचार्य गोविंद सरांनी सदाला पुण्याला पाठवलं तेव्हापासून त्याची-माझी गाठभेट नाही.
आठवणींच्या अडगळीतनं कॉलेजच्या दिवसांचा कप्पा उघडला.काळाचा धुरळा झटकला आणि दोघांच्या गालावर हसू उमटलं.कॉलेजला असताना नुकत्याच आलेल्या कोवळ्या मिशांवर ताव मारत मर्द असल्याचा दिखावा करत फिरणारा,एक शर्ट आठवडाभर वापरणारा घामसू,लुकडा सदाशिव एकदम डबलडेकर ढेरी,डोक्यावरचं केस विरळ झालेल्या आणि मिशा गायब,टकाटक अॅरोचा शर्ट, ब्लॅक बेरीची पँट आणि परफ्युमचा घमघमाट.हे बघून मी तर चक्रावलो. "आरं, सदा तू ? कुठ आहेस,काय करतोस? किती बदललास? काय कापड चक्क धुतल्याली आणि परफ्यूम ? मी तर ओळखलंच नाही पहिल्यांदा,काय करतोस तरी काय?"
"आरं हो हो जरा थांब,श्वास घे,दम लागला आसल, जरा एक एक प्रश्न विचार..." असं म्हणत सदानं मला मिठी मारली आणि ओढून हॉटेलमध्ये घेऊन गेला.
त्याच्या चेहऱ्यावरची हास्याची लकेर तशीच होती. मी अजूनही कॉलेजमध्ये तरंगत होतो.ते दिवस. खिशात कडकी.
सायकलवरनं आठ-दहा किलोमीटर रपेट करून आलं की,वाहणाऱ्या घामाच्या धारा,एक किंवा दोन ड्रेस,तेच रात्री धुऊन दुसऱ्या दिवशी सकाळी परत घालून कॉलेजला जायचं.एक रुपयाचा कटिंग चहा प्यायचा तोही टपरीवर गप्पा हाणत.गरमागरम कांदा-भजीचा खमंग वास आला की एकमेकांच्या तोंडाकडं बघत खिसं चापचायचं.पाच रुपये गोळा करून तिघात एक प्लेट घ्यायची.चार भजी आणि खाणारे तिघे मी,सदाशिव आणि आमचा लंगोटी यार तानाजी. प्रत्येकानं एक एक भजं उचललं.आता राहिलेल्या चौथ्या भज्यावर तिघांचा डोळा.जो आधी संपविणार तो हात मारणार.ह्यो सदा कायम खाताना राजकारणातला काहीतरी विषय काढला की,बाता मारणार तोवर बरोबरचा तानाजी चौथं भजं उचलणार.मग त्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला असायचा.अशी सारी गंमत असायची.
सकाळी सकाळी एवढ्या लांबून सायकल घेऊन येणार,भूक ज्याम लागलेली,बिल ह्योच देणार आणि त्याला बोलण्यात गुंतवून ज्यादाचं भजं तानाजी उचलणार.तान्यापण जरा जास्तच इरसाल. ह्याच्या तोंडाकडं बघत भजं मोडणार.एक घास मला देणार.मग सदाच्या तोंडाचा हावभाव बघण्यासारखा असायचा.बरोबरीचा घास मिळाला की पोटभर पाणी पिणार.
चहा ढोसला की बाहेर पडायला घाई.जो मागं राहणार त्याला बिल द्यायला लागणार.तान्या चॅप्टर.सदाला आतल्या खुर्चीवर बसायला जागा.मी समोरच्या बाजूला एकटा.मग मी आधी बाहेर,तान्या उठल्याशिवाय सदाला जागा नाही.कितीतरी वेळा असं सदाला लुटलं आणि चुकून कधी मी किंवा तान्या आतल्या खुर्चीवर बसलो,तर त्या दिवशी भजी मागवायचीच नाहीत. नुसताच चहा घ्यायचा.असं हे टपरीवरचं राजकारण.
आज मात्र सदा मला दंडाला धरून ओढत हॉटेलमध्ये घेऊन आला.दोन स्पेशल मिसळ बिगर कट ऑर्डर केली.जबरदस्तीनं एक्स्ट्रा पाव खायला लावला.मिसळ खाताना पुढं आलेल्या ढेरीवर आणि ब्रँडेड कपड्यावर डाग पडेल याची काळजी मात्र तो घेत होता.स्पेशल चहा कमी साखर.च्यायला,ह्या आयुष्याच्या धांदलीत जगण्यातली गोडीच कमी झालीय.कॉलेजबाहेरच्या टपरीवरच्या चहाची चव अजून जिभंवर रेंगाळतीय.करिअरच्या शिड्या चढत एवढ्या वर आलोय की,आजूबाजूला ओळखीची माणसं शोधताना नजर अंधुक झालीय.आपण एकमेकांपासून किती लांब आलोय याची जाणीवच नाही.
वाघीण,प्रतिक पाटील, स्वच्छंद प्रकाशन,कोल्हापूर
शेवटी बिल द्यायला दोघांनी पैशाचं पाकीट बाहेर काढलं आणि एकमेकांकडं बघत हसायला लागलो. "साल्यांनो,तू आणि त्यो तान्या,कॉलेजमध्ये बिल देताना तुम्ही दोघांनी मिळून मला लुटलं आणि आता बिल द्यायला निघालास व्हय.गप पाकीट आत ठेव..." सदाशिवनं मला दम भरला.
" लेका त्यावेळी तू दिलंस ना म्हणून मी आता देतो," मी म्हटलं.
"लय शहाणा हाईस.गप पैसे आत ठेव.पुन्हा कधीतरी तू दे.नाही तर बोलीव त्या तान्याला परत कॉलेजच्या टपरीवर आणि मग तू दे बिल..." असं म्हणत सदानं बिलासोबत टीपही दिली.
"ते आता शक्य नाही..." मी म्हटलं.
"का? मित्रांच्यासाठी एवढीपण फुर्सत नसते का? लय पैसा पैसा करू नगं.जरा मित्रांसाठी वेळपण काढ."
"मी ईन रे; पण तान्या नाही येऊ शकणार.माझ्या पैशाची भजी खायला.." मी बोलत बोलत हॉटेलच्या दारात आलो.
"का लय मोठा राजकारणी झाला की काय त्यो.का भांडणं-बिंडणं झाली की काय तुमची..?"
" भांडतोय कसला साला.रुसून बसलाय.चार वर्षांपूर्वी माझ्यासोबतच लंच करून गावाकडं निघाला.कात्रज घाटात गाडीचा अपघात झाला आणि परत आलाच नाही.." असं मी सांगताच सदानं गचकन मिठीच मारली मला.
खिशातून रुमाल काढला आणि डोळ्यांवर धरला.
मनात म्हटलं,'साला करिअरच्या नादात स्टेटस सांभाळताना मनसोक्त रडतापण येत नाही.'
इकडच्या तिकडच्या गप्पा मारून निघणार तोवर एक मुलगा भीक मागायला आला म्हणून खिशात हात घालून दोन रुपयांचं नाणं देणार,तोवर सदानं पैसे देऊ नकोस म्हणून खुणवलं आणि त्या पोराला विचारलं, " मिसळ खाणार..?" त्या पोरानं क्षणभर विचार केला आणि होकाराची मान हलवली.सदानं काऊंटरवर जाऊन एका मिसळचे पैसे दिलं आणि त्या पोराला मिसळ द्यायला सांगितली.
बाहेर येत सदा म्हणाला,"अरे,पैसे देऊन त्येचा याला काय उपयोग? कोणतरी मालक असंल याचा. लहान मूल समजून आपण भीक देतो.म्हणून त्यांना भीक मागायला भाग पाडलं जातं.पैसे नसताना आपणपण लहानाचं मोठं झालोच की!आपण कुठं भीक मागितली.मेसचा एक डबा तिघांनी खाल्ला, प्रसंगी उपाशी राहिलो;पण शिक्षण घेतलं म्हणून आज इथंपर्यंत पोहोचलो.त्यांना शाळेत पाठवायचं सोडून भीक मागायला लावतात आणि त्यावर कोणीतरी दुसराच डल्ला मारतो.भीक त्यांना द्यायची ज्यांना काहीच कामधंदा करता येत नाही आणि तेही पैसे नाही,तर खाऊ द्या.त्यांची गरज पैशाची नाही तर पोट भरण्याची आहे."
आजही सदा दुसऱ्याची भूक जाणतो.पोट भरण्यासाठी पैसे नाही नियत लागते.