* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: वर्क्स - ॲरिस्टॉटल - (१८३७)

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

८/५/२३

वर्क्स - ॲरिस्टॉटल - (१८३७)

" जेवढं जास्त कळत जातं,तेवढं आपल्याला काहीच कळलेलं नाही,हे कळतं."


'वर्क्स' या ग्रंथामध्ये ॲरिस्टॉटलचे सिद्धान्त अतिशय सुसंगतपणे आणि अनेक दाखल्यांसह मांडले आहेत.

तर्कशास्त्रानुसार स्वर्गावरची वक्तव्यं,आत्मा,निसर्गाचा मानवाने स्वतःच्या कल्याणाकरता केलेला उपयोग,अशा अनेक गोष्टींबद्दल त्यानं आपली मतं या पुस्तकात मांडली होती.

'मानवाचं कल्याण करत असताना निसर्गाची तसूभरही हानी होता कामा नये.' 


असं त्याचं मत होतं.निसर्ग आणि प्राणिजात हे परस्परपूरक आहेत असं तो म्हणे.तत्त्वज्ञानावर आणि विश्वाच्या रहस्यांवर बोलणारा ॲरिस्टॉटल त्याच वेळी कविता आणि नाटक या विषयांवरही तितकाच समरस होऊन बोलत असे.


प्राचीन ग्रीसमधला,अभिजात काळातला ॲरिस्टॉटल हा एक प्रचंड प्रभावशाली तत्त्वज्ञ होऊन गेला.ॲरिस्टॉटलचा गुरू प्लेटो ॲरिस्टॉटला 'फादर ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी' म्हणायचा.ॲरिस्टॉटलनं जवळपास सर्वच विषयांमध्ये मुशाफिरी केली होती.भौतिकशास्त्र असो वा जीवशास्त्र;वनस्पतीशास्त्र असो वा खगोलशास्त्र;तर्कशास्त्र असो वा सौंदर्यशास्त्र; कविता असोत वा नाटकं;संगीत असो वा वक्तृत्व;मानसशास्त्र असो वा भाषाशास्त्र; अर्थशास्त्र असो वा राज्यशास्त्र या सर्व विषयांतला त्याचा अभ्यास पाहून आजही बुद्धिवंत अवाक् होतात.आणि त्यावर चर्चा करतात.ऑरस्टॉटलनं त्या काळात (ख्रिस्तपूर्व ३८४) २५० प्रबंध लिहिले होते.त्यातले केवळ ३० प्रबंध आज उपलब्ध आहेत.त्याचे सगळे प्रबंध एकत्र करून त्यावर जो ग्रंथ तयार झाला त्यालाच 'वर्क्स' असं संबोधलं गेलं.ख्रिस्ती बुद्धिवाद्यांनी ऑरस्टॉटलचं काम जगासमोर आणलं.


"वर्क्स" या ग्रंथामध्ये ॲरिस्टॉटलचे सिद्धान्त अतिशय सुसंगतपणे आणि अनेक दाखल्यांसह मांडले आहेत.

यामध्ये तर्कशास्त्रानुसार स्वर्गावरची वक्तव्यं,आत्मा,

निसर्गाचा मानवाने स्वतःच्या कल्याणाकरिता केलेला उपयोग,अशा अनेक गोष्टींबद्दल त्यानं आपली मतं मांडली होती.मानवाचं कल्याण करत असताना निसर्गाची तसूभरही हानी होता.कामा नये,असं त्याचं मत होतं.निसर्ग आणि प्रणित हे परस्परपूरक आहेत,असं तो म्हणे.


ऑरिस्टॉटलच्या विश्लेषणात्मक ज्ञानाचा प्रभाव त्या काळापासून संपूर्ण पाश्चिमात्य तत्त्वज्ञानावर पडला.

एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी ॲरिस्टॉटलनं तर्कशास्त्राचा वापर केला. तत्त्वज्ञानामध्ये त्यानं गणिताचा वापर करून सूत्रही तयार केली होती.मेटॅफिजिक्स हा शब्द पहिल्यांदा ॲरिस्टॉटलच्या सिद्धान्तातल्या गोष्टींसाठी वापरण्यात आला होता.मात्र ऑरिस्टॉटलन स्वतः मात्र या संकल्पनेसाठी फिलॉसॉफी हा शब्द वापरला.विज्ञान हे गणित आणि विज्ञान यांच्यापेक्षा वेगळं आहे.असे तो म्हणात असे.निसर्गातल्या कुठल्याही गोष्टीच अस्तित्व हे निसर्गातल्या गोष्टींची हालचाल,त्यांची वाढ

आणि त्यातले बदल यावर अवलंबून असते असं अरिस्टॉटलचं म्हणणं होतं.तसचं सबस्टन्स हा शब्द देखील त्यांनच पहिल्यांदा वापरला.प्रत्येक गोष्ट ही सबस्टन्स म्हणजेच नैसर्गिक कणांनी बनलेली असते,असं तो म्हणत असे.लोकांचं ज्ञान है त्यांच्या ज्ञानग्रहण करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं,असंही तो म्हणायचा.इथेही ॲरिस्टॉटलचं म्हणणं आणि प्लेटोचं म्हणणं यात फरक होता.प्लेटोचं तत्त्वज्ञान हे कल्पनेवर (आयडियाज) अवलंबून असायचं,तर ॲरिस्टॉटलचं तत्त्वज्ञान वस्तुनिष्ठ आणि प्रायोगिक गोष्टींवर अवलंबून होतं.


प्रत्येक वस्तू,अगदी सजीवदेखील ठरावीक पदार्थांपासून बनलेले असतात,असं ॲरिस्टॉटल म्हणत असे.त्यांची क्षमता त्या पदार्थांवर अवलंबून असते.एखादी निर्जीव वस्तू किंवा पुतळा हादेखील ज्या कणांपासून बनला आहे त्या कणांमधल्या क्षमतेवर तो अवलंबून असतो,असं ॲरिस्टॉटलचं मत होतं. 


सजीवांमध्ये आत्मा आहे असं आपण मानलं पाहिजे आणि मानवजातीचं अस्तित्व हे तर्क संगत,शास्त्रशुद्ध आणि काही कारणांसाठी आहे,असंही तो म्हणे.

वनस्पतींमध्ये आत्मा कमी प्रमाणात असतो,तर प्राण्यांमध्ये तो जास्त प्रमाणात असतो,असं ॲरिस्टॉटल म्हणे.


प्राणिशास्त्रातलं ॲरिस्टॉटलचं योगदान अनमोल आहे.ऑक्टोपसपासून अनेक समुद्री प्राण्यांचं विच्छेदन करून ॲरिस्टॉटलनं आपल्या प्रयोगांची अचूक निरीक्षणं नोंदवली.कोंबडीच्या पिल्लांची एम्ब्रिऑलॉजिकल डेव्हलपमेंट त्यानं सविस्तरपणे मांडली.इतकंच नाही तर व्हेल्स आणि डॉल्फिन्स इतर माशांपेक्षा कसे वेगळे आहेत.याचीही मांडण ॲरिस्टॉटलनं केली होती. काही समुद्री जीव (अंडी घालणारे) आणि काही प्रत्यक्ष पिल्लांना जन्म घालणारे या विषयांवरची शेकडो निरीक्षणं ॲरिस्टॉटलनं आपल्या ग्रंथात नोंदवली होती.रक्त असलेले आणि रक्त नसलेले असे प्राण्यांचे त्यानं दोन गट केले होते.प्लॅन्ट ऍनिमल असाही एक गट त्यानं शोधला होता. सर्वसामान्य काही लक्षणं समान असलेल्या काही जाती एकत्र येतात आणि त्यांची प्रजाती बनते यालाच जेनेरा म्हणतात.हा जेनेरा शब्द पहिल्यांदा ॲरिस्टॉटलनं वापरला.या प्रजाती किंवा जेनेरा एकत्र येऊन एक फॅमिली बनते. 


ऑक्टोपसचे सगळे हात म्हणजे त्याचे प्रजननाचे अवयव आहेत,असंॲरिस्टॉटलनं म्हटल्यावर अनेकांनी त्याच्या या म्हणण्याला विरोध केला होता.अगदी १९ व्या शतकापर्यंत त्याचं हे विधान अमान्य करण्यात आलं होतं;पण प्रयोगांती ते पुढे खरं ठरलं!


ॲरिस्टॉटलचा आत्मविश्वास आणि निरीक्षण इतकं दांडगं होतं की अनेक गोष्टी तो त्यावरून ठामपणे सांगत असे आणि लोकांचाही त्यावर विश्वास बसत असे.प्रत्यक्षात मात्र त्याचे तर्क गंमतशीर तर असतच,पण चुकीचेही असत. आपल्या हृदयात बुद्धी असते असं तो म्हणायचा. तसंच निसर्गातले पशु-पक्षी आणि वनस्पती यांच्यामध्ये एक शिडी असून शिडीच्या प्रत्येक पायरीवर कोणी ना कोणी असतं,मात्र मनुष्य हा एकमेव प्राणी शिडीच्या सर्वात वरच्या पायरीवर असल्याचं तो छातीठोकपणे सांगत असे.आज जरी अशी वाक्यं गमतीदार वाटत असली,तरी त्या काळात ॲरिस्टॉटल बोले आणि दल हाले अशी परिस्थिती होती.


भूशास्त्र (जिऑलॉजी) आणि हवामानशास्त्र (मीटिरीऑलॉजी) हे शब्दही ॲरिस्टॉटलनं व्यापक अर्थानं वापरले.जलचक्रांबद्दलची विस्तृत माहितीही त्यानंच शोधून काढली.पृथ्वीवरच समुद्रातलं गोड पाणी वाफेच्या रूपात ढगांमध्ये जमा होत आणि थंड होऊन पावसाच्या रूपात पुन्हा पृथ्वीवर येतं,असं त्यानं लिहून ठेवलं.हाच सिद्धान्त आज आपण वॉटर सायकल किंवा जलचक्र म्हणून ओळखतो.


माती,वायू,पाणी, सूर्य या सगळ्यांमध्ये एक आकर्षण असतं,असंही ऑरिस्टॉटलचं म्हणणं होतं.भूकंप,

ज्वालामुखी,इंद्रधनुष्य,धूमकेतू,आकाशगंगा

सगळ्यांबद्दल त्यानं लिहिलं होतं.ॲरिस्टॉटलनं बनवलेलं पृथ्वीच्या इतिहासाचं मॉडेल आधुनिक विज्ञानाशी साम्य दाखवताना दिसतं.पृथ्वीवरचा भूभाग कायम बदलत असून त्यामुळे एखाद्या ठिकाणची आर्द्रता किंवा कोरडेपणाही त्याप्रमाणे बदलत असतो,असं तो म्हणे.या विश्वविज्ञानाच्या बाबतीत विश्वाला सुरुवात किंवा शेवट नाही, त्यात होणारे बदल आणि या बदलाचं चक्र हे अनंत काळ चालणारे असल्याचं ॲरिस्टॉटलचं म्हणणं होतं.विश्व हे खूप मर्यादित स्वरूपाचं आहे.तसंच ते एकात एक असलेल्या आणि चमचमणाऱ्या इथरच्या दंडगोलांनी बनलेलं असून ते दंडगोल पारदर्शक असल्याचंही तो सांगत असे.नेमके यातले मोठे दंडगोल पृथ्वीभोवती फिरतात आणि या दंडगोलांमध्ये तारे असल्यामुळे तेही आपोआपच पृथ्वीभोवती फिरत असल्याचं ॲरिस्टॉटल म्हणत असे.या विश्वात एकूण ५५ दंडगोल असून ते वेगवेगळ्या आकाराचे आहेत.या वेगवेगळ्या आकाराच्या दंडगोलांमध्ये पोकळी असून ती देखील इथरच्या वाफेने भरलेली आहे,अशा चित्रविचित्र गोष्टी तो ठामपणे सांगत असे.


ॲरिस्टॉटलचा दबदबा त्या काळी चर्चवरच नव्हे तर सर्वत्र होता.त्यामुळे त्याने म्हटलेलं कुठलंही वाक्य प्रमाण अशी समजूत त्या काळी होती.एखादा वजनाने जड असलेला दगड आणि एखादं वजनानं हलकं असलेलं पक्ष्याच पीस दोन्हीही उंच ठिकाणावरून खाली टाकले तर दगड हा पक्ष्याच्या पिसाच्या आधी खाली पडेल कारण जड वस्तू हलक्या वस्तूपेक्षा लवकर खाली पडते असं त्याचं मत होतं.काही लोक जेव्हा त्याच्या म्हणण्याची शहानिशा करून बघत, तेव्हा तसंच घडत असे.याचं कारण हवेच्या खालून असलेल्या दाबामुळे पक्ष्याचं पीस हे दगडापेक्षा किंचित उशिरा पडत असे आणि मग लोक ॲरिस्टॉटलची वाहवा करत,तोच कसा खरा असं म्हणून त्याची प्रशंसा करत. 


आपण काहीही सांगितलं तर लोक डोळे मिटून त्यावर विश्वास ठेवतात त्यावर विश्वास ठेवतात.हे

ॲरिस्टॉटलला माहीत असल्यामुळे तो हास्यास्पद वाटतील अशा अनेक गोष्टी सांगत असे.


सजीव जसे वागतात तशाच निर्जिव वस्तूही वागताल असं त्याला वाटे आणि म्हणूनच सजीवांचे सगळे नियम तो निर्जिव वस्तूंनाही लावत असे.एखादी वस्तू वरून खालीच का पडते याचे उत्तर देताना,माणूस नाही का बाहेर गेला तरी काळी वेळाने पुन्हा आपल्या घरीच परत येतो,

त्याप्रमाणे वरून फेकलेली वस्तू खाली,म्हणजे तिच्या घराकडेच परतते असा त्याचा दावा होता.


केवळ तर्कावर मांडलेल्या ॲरिस्टॉटलच्या गोष्टींना पुढे जवळ जवळ १९०० वर्षांचा कालावधी गेल्यावर गॅलिलिओ नावाचा शास्त्रज्ञ आला.आणि त्याने प्रयोगाच्या साहाय्याने ॲरिस्टॉटलचं लोकांच्या मनावरचं गारूड आणि डोळ्यावरची झापड उतरवली.


ॲरिस्टॉटलच्या कल्पनेप्रमाणे माणूस आणि पृथ्वी हे विश्वाच्या केंद्रस्थानी होते.त्याचं हे मत चर्चलाही मान्य होतं.त्याच्या मताविरुद्ध कोणी बोललं तर त्याला कठोर शासन होत असे.ॲरिस्टॉटलचा रसायनशास्त्र या शाखेतलाही अभ्यास होता.त्याच्या म्हणण्यानुसार प्रत्येक पदार्थ हा चार नैसर्गिक तत्त्वांपासून बनलेला आहे.पृथ्वी,अग्नी,हवा आणि पाणी ही ती चार तत्त्वं.


हवेलासुद्धा वजन असतं,हाही सिद्धान्त त्यानं प्रथम मांडला.


ॲरिस्टॉटलन राज्यशास्त्र हा विषयही अभ्यासला.

'मनुष्य हा नैसर्गिकदृष्ट्या राजकीय प्राणी आहे,असं त्यानं म्हणून ठेवलंय.


कोणत्या प्रकारचं सरकार अस्तित्वात असायला हवं आणि ते कसं संतुलित ठेवता येईल यावरही त्यानं विस्तृत चर्चा केली आहे.लिहिताना त्यानं ग्रीक शब्दकोशाचा वापर केला आहे. लोकशाहीबद्दल ॲरिस्टॉटलनं केलेली चर्चा

आधुनिक राज्यशास्त्रासाठी दिशादर्शक आहे. 


ॲरिस्टॉटलच्या कामाचा आवाका इतका प्रचंड होता.

प्रत्येक विषयाचा त्यानं अभ्यास केला होता आणि त्या अभ्यासातून त्यानं प्लेटोच्या विचारांबाबत आपले मतभेद स्पष्टपणे मांडले होते.तत्त्वज्ञानावर आणि विश्वाच्या रहस्यांवर बोलणारा ॲरिस्टॉटल त्याच वेळी कविता आणि नाटक या विषयांवरही तितकाच समरस होऊन बोलत असे.नाटकाची संहिता,त्यातली पात्रं, पात्रांच्या भावमुद्रा,

नाटकाचं दिग्दर्शन,त्यातली गाणी या सगळ्यांविषयी त्यानं सखोलपणे मांडणी केली होती.त्याच्या सौंदर्यशास्त्र (एस्थेटिक्स) या विषयावरच्या विवेचनात त्यानं खलनायक कसा असावा याविषयीही लिहून ठेवलंय.

खलनायक हा कुरूप,घृणास्पद किंवा बावळट,निर्बुद्ध दाखवता कामा नये.तो कपटी तर असावाच,पण हुशार आणि देखणाही असावा.नाही तर तो नायिकांना आपल्या पाशात कसा ओढू शकेल?आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतल प्राण,प्रेम चोप्रा,डॅनी आणि विनोद खन्ना यांच्याकडे बघितलं की याची प्रचीती येते.


ॲरिस्टॉटलचा जन्म ख्रिस्तपूर्व ३८४ साली ग्रीसमधल्या मॅसेडोनियाजवळ झाला.त्याचे वडील राजवैद्य होते.

ॲरिस्टॉटल लहान असतानाच त्याचे वडील निकोमॅक्स यांच निधन झालं.त्यानंतर काहीच दिवसात त्याच्या आईचादेखील मृत्यू झाला.त्यानंतर त्याचा सांभाळ त्याच्या नातेवाईकांनी केला.तो सॉक्रेटिसचा शिष्य असलेल्या प्लेटोला आपला गुरू मानत असे आणि प्लेटोनं सुरू केलेल्या अकॅडमीमध्ये तो शिकायला जात असे. वयाची १७ ते ३७ वर्ष हा कालावधी त्यानं प्लेटोच्या अकॅडमीमध्ये व्यतीत केला.या अकॅडमीमधला तो अत्यंत हुशार विद्यार्थी होता, नैतिकता या विषयावर प्लेटो जास्त बोलत असे, कारण त्याला हा विषय मनापासून आवडत असे.


प्लेटो निसर्गातलं सौंदर्य प्रत्यक्ष अनुभवण्यापेक्षा गणितामध्ये शोधत बसायचा.प्लेटोची ही गोष्ट ॲरिस्टॉटलला मुळीच आवडत नसे.अनेक विषयांवर प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांच्यात मतभेद होते.याच कारणामुळे प्लेटोलाही ॲरिस्टॉटल आपली परंपरा पुढे नेणारा वारस वाटत नसे.प्लेटोच्या मृत्यूनंतर ॲरिस्टॉटलनं अॅथेन्स सोडलं. ॲरिस्टॉटलनं स्वतःची लिसीयम नावाची एक अकॅडमीही काढली.शिकवताना तो एका जागी स्थिर राहत नसे,तर फिरत फिरत आपल्या शिष्यांना ती गोष्ट समजावून सांगत असे. त्यामुळे त्याच्या शिष्यांना 'पेरीपॅटेटिक्स' असं लोक म्हणत.ॲरिस्टॉटलला लिहायला इतके आवडत असे,की पपायरसच्या पानांची तो बंडलच्या बंडल सहजपणे संपवत असे.


ॲरिस्टॉटलच्या मनातलं कुतूहल त्याला स्वस्थ बसू देत नसे.या कुतूहलापोटीच त्याला आपण या जगात कुठल्या गोष्टीमुळे आहोत,आपलं अस्तित्व म्हणजे काय,आपल्या असण्यामागे कुठला हेतू असू शकतो का,इतकंच नाही तर संपूर्ण विश्व असण्यामागे काही उद्देश असेल का? अशा प्रकारचे अनेक प्रश्नं त्याला सतावत असत. त्याच्या अशा प्रकारच्या हेतूवादाचा प्रभाव अनेक शतकं समाजमनावरच नव्हे,तर विज्ञानाच्या प्रगतीवरही झाला.


ग्रीसमध्ये जन्मलेल्या ॲरिस्टॉटलला ग्रीसचा खूप मोठा तत्वज्ञ म्हणून मान होता.ख्रिस्तपूर्व ३२३ मध्ये त्याचा मृत्यू झाला.त्याच्या मृत्यूनंतरही अलेक्झांडर या त्याच्या शिष्यानं त्याचे विचार समाजात रुजवले.


विश्वविज्ञानातली अनेक तत्त्वं पुढे ॲरिस्टॉकर्स, हिपॉकर्स आणि टॉलेमी मांडत राहिले. ॲरिस्टॉकर्स यानं पुढे ग्रहताऱ्यांचा अत्यंत खोलवर अभ्यास करून ॲरिस्टॉटलच्या चुका दाखवल्या.ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे सूर्य आणि तारे पृथ्वीभोवती फिरतात असं नसून पृथ्वी,चंद्र आणि इतर ग्रह हे सूर्याभोवती फिरतात असं त्याने सांगितलं.पण ॲरिस्टॉटलचा शब्द म्हणजे परमेश्वराच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द असं समजणाऱ्या लोकांनी ॲरिस्टॉकर्सचं म्हणणं धुडकावून लावलं.ॲरिस्टॉटल च्या सिंहासनाला तडा देण्याचं पुढे १६-१७ व्या शतकात विज्ञानानेच केलं.असं असलं तरीहीॲरिस्टॉटल आणि त्याच्या विचारांवर,सिद्धांतांवर आधारलेला त्याचा 'वर्क्स' या ग्रंथाचं योगदान जगाला महत्त्वाचं वाटतं हे मात्र खरं!



४ मे २०२३ या लेखातील पुढील भाग..