* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: ऑगस्ट 2023

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३०/८/२३

ह्युएन त्संगच्या पावलांवरून - मिशी सरण In the Footsteps of Hiuen Tsang

सातव्या शतकात अशक्यप्राय वाटणारा सोळा हजार किलोमीटर पायी प्रवास करून भारतात आलेल्या ह्युएन त्संग या चिनी प्रवाशाबद्दल आपण साऱ्यांनी वाचलेलं असतं,पण त्याच्या या प्रवासाबद्दल आणखी जाणून घ्यावं असं आपल्यापैकी कितीजणांना वाटतं?

ह्युएन त्संगने झपाटलेल्या एका महिलेने तेराशे वर्षांनंतर त्याच्या इतिहासाचा माग काढत त्याच्याच मार्गाने प्रवास केला.त्याची ही गोष्ट.


इ.स. ६२७ आपल्याला ह्युएन त्संग नावाने परिचित असलेल्या (मूळ चिनी उच्चार श्वेन झांग) चीनमधल्या तरुण बौद्ध भिक्खूने बौद्ध धर्माबद्दल सखोल ज्ञान मिळवण्यासाठी भारताच्या दिशेने प्रस्थान ठेवलं.त्या काळी बौद्ध पौथ्यांचे चिनी अनुवाद अगदीच यथातथा असत. विशेषतः ह्युएन त्संगला रस असणाऱ्या योगकार पठडीतल्या ग्रंथांचे अनुवाद अनाकलनीय होते. त्यामुळेच ह्युएन त्संगची उत्सुकता चाळवली गेली.बौद्ध धर्म नेमका कसा आहे,त्याचे विचार काय आहेत हे स्वतः जाऊन समजून घेतलं पाहिजे,या विचाराने तो झपाटला होता.

बौद्ध धर्माविषयीची आस्था आणि एका प्रकारच्या साहसाचं आकर्षण यातून तो एके दिवशी भारताच्या दिशेने चालू लागला.भारतात दहा वर्षं मुक्काम,एकूण सोळा हजार किलोमीटरचा प्रवास करून अठरा वर्षांनी तो पुन्हा चीनमध्ये परतला.कोणत्याही सोई-सुविधा नसताना, जगाच्या नकाशाचं ज्ञान नसताना त्याने हा  प्रवास कसा केला असेल या विचारानेही आपण थक्क होतो.भारतातल्या मुक्कामात संस्कृत भाषा शिकून ह्युएन त्संगने बौद्ध धर्माचा अभ्यास केला.त्याचा बहुतेक काळ तो नालंदा विद्यापीठात शीलभद्र नावाच्या तत्त्वज्ञाच्या सहवासात होता.चीनमध्ये परतल्यानंतर तो तिथे बौद्ध मत शिकवू लागला.त्याच्या लिखाणामुळे प्रथमच चिनी भाषेत बौद्ध सूत्राचं अचूक भाषांतर झालं.चीनमधील बौद्ध मताला लेखी आधार मिळाला.पण ह्युएन त्संगचं महत्त्व फक्त चीनपुरतं मर्यादित नाही;त्याने आपल्या विस्तृत प्रवासाबद्दल लिहिलेल्या टिपणांमधून आज आपल्याला त्या काळातला भारत समजून घेण्यासही मोठी मदत होते.ह्युएन त्संगने उचललेलं साहसी पाऊल आपल्याला चीनशीच नव्हे.तर आपल्याच इतिहासाशीही जोडतं.


ह्युएन त्संगबद्दलची ही माहिती म्हणजे आपल्यासाठी एखाद्या पुस्तकातलं एखाद प्रकरण.जे वाचून पुस्तक मिटवायचं आणि पुढच्या विषयात शिरायचं;पण पत्रकार लेखिका मिशी सरण मात्र तसं करू शकली नाही.जन्माने भारतीय असणारी मिशी अमेरिकेत लहानाची मोठी झाली.आपल्या उच्च शिक्षणासाठी 'तिने 'चीनची संस्कृती' हा विषय निवडला. त्यानंतर बीजिंग आणि नानजिंग इथे पुढच्या अभ्यासासाठी तिने दोन वर्षं वास्तव्य केलं.तिथे तिने 'मँडारिन' या प्रमुख प्रमाणित चिनी भाषेवर प्रभुत्व मिळवलं.या काळातच तिची ह्युएन त्संगशी जवळून ओळख झाली.या तरुण साहसी चिनी प्रवाशाने मिशीचा जणू ताबाच घेतला.पुढे १९९४ मध्ये ती वास्तव्यासाठी हाँगकाँगला गेली. तिथे ती वार्ताहर म्हणून काम करत होती.वयाची तिशी पार केल्यावर आपण फारच चाकोरीबद्ध आयुष्य जगतोय ही भावना तिला छळायला लागली.अशाच एका आत्मपरीक्षणाच्या उदास संध्याकाळी तिच्या मनात अनेक दिवसांपासून रेंगाळणारा एक विचार पुन्हा वर उफाळून आला ह्युएन त्संग ज्या मार्गाने भारतात गेला त्या मार्गाने आपणही का जाऊ नये? हा विचार बरेच दिवस तिच्या मनात येत होता;पण त्याकडे दुर्लक्ष करत तिची दैनंदिन कामं चालू होती.पण एके दिवशी आतला आवाज ऐकत तिने ह्युएन त्संगच्या पावलावर पाऊल टाकत हा प्रवास करण्याचा निर्णय घेतला.ह्युएन त्संग चीनमधून भारताकडे निघाला त्यानंतर तब्बल तेरा शतकांनंतर मिशी सरणने तितकंच धाडसी पाऊल उचललं होतं. 'चेजिंग द मॉक्स शॅडो अ जर्नी इन द फुटस्टेप्स ऑफ ह्युएन त्संग' हे पुस्तक म्हणजे ह्युएन त्संग आणि मिशी सरण या दोघांच्या प्रवासाची गुंफण आहे.

ह्युएन त्संगच्या मार्गावरून प्रवास करण्याचं ठरलं,पण ते प्रत्यक्षात येण्यास वेळ लागणार होता.ह्युएन त्संगभोवती निर्माण झालेली दंतकथांची जळमटं दूर करून त्याच्याबद्दलची,तसंच त्याच्या प्रवासाबद्दलची यथातथ्य माहिती शोधून मगच तिला खऱ्या प्रवासाची तयारी करता येणार होती.पण तिने कंबर कसली आणि कामातून वेळ काढून एक दिवस ती हाँगकाँगहून बीजिंगला जाऊन धडकली.बीजिंगमध्ये चौकशी केल्यावर तिला माहिती कळली,की तिथे एक संस्था ह्युएन त्संग,त्याचं कार्य,त्याचं लेखन आणि त्याचा विचार यांचा अभ्यास करते. ती तडक त्या संस्थेत पोहोचली. तिथले भारताविषयीचे दोन तज्ज्ञ व्हांग शिचुआन आणि सुन बावगांग तिच्या शंकासमाधानासाठी सज्ज झाले.दोघंही भारतात राहून आलेले होते. 'खरं तर तू आमच्याकडे याआधीच यायला हवं होतंस !' या वाक्याने त्यांनी मिशीचं स्वागत केलं. दोघांच्या बोलण्यातून ह्युएन त्संगबद्दलचा त्यांना वाटणारा अभिमान प्रतीत होत होता.त्यांनी मिशीला ह्युएन त्संगची चरित्रकहाणी ऐकवली. 'चिनी संस्कृती समजून घ्यायची तर त्या संस्कृतीवरचा भारतीय प्रभाव जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल,' या वाक्याने त्यांनी आपल्या मार्गदर्शनाचा शेवट केला. त्यांनी मिशीला कुणाकुणाशी संपर्क साधायचा त्या संस्था आणि व्यक्तींचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक दिले आणि तिच्या धाडसी उपक्रमाला तोंडभरून शुभेच्छाही दिल्या.मिशीचा ह्युएन त्संगच्या शोधाचा प्रवास सुरू झाला लुओयांग इथून. 

लुओयांग हे ह्युएन त्संगचं जन्मगाव. इ.स. ६०० मध्ये ऐन हिवाळ्यात त्याचा जन्म झाला.त्याचं जन्मनाव होतं चेन यी चेन यी म्हणजे चेन नदीच्या काठी जन्माला आलेला.

योग्य वेळी बौद्ध भिक्खूंनी चेन यीच्या डोक्यावरचे केस भादरले.त्याला दीक्षा देऊन नवोदित म्हणून त्यांच्या पंथात दाखल करून घेतलं.त्या वेळी त्याचा नवा जन्म झाला, म्हणून त्याला ह्युएन त्संग हे नवं नाव दिलं गेलं.


ह्युएन त्संगच्या या गावात इ. स. ५०८ मध्ये बोधी ऋषीचं आगमन झालं होतं.सम्राटांच्या आज्ञेनुसार युंग-निंग मठात बसून त्यांनी ३९ ग्रंथांचा अनुवाद केला.त्यात लंकावतार सूत्र, कमल सूत्र,हीरक सूत्र यांच्याबरोबरच असंघ आणि वसुबंधू या दोन भावांनी रचलेले अनेक ग्रंथ होते.मिशी त्या गावी पोहोचली तेव्हा एके काळी भरभराटीला आलेल्या या गावाचं भकास दर्शन तिला घडलं आणि हाती घेतलेल्या प्रवासाबद्दल तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; पण तिचा निश्चय ढळला नाही. तेव्हा चीनमध्ये स्वातंत्र्याचे मर्यादित वारे वाहू लागलेले होते,पण तरी परक्या व्यक्तींकडे संशयाने बघण्याच्या वृत्तीत फारसा फरक पडलेला नव्हता.पासपोर्टधारी व्यक्तीला गावातल्या सर्वात महागड्या हॉटेलात ठेवायचं आणि दुभाष्या नेमायचा,ही प्रथा अजूनही पाळली जात होती.मिशीने मँडारिनमध्ये ती हाँगकाँगची रहिवासी आहे हे सांगून एका छोट्या हॉटेलात जागा मिळवली आणि दुभाष्याला हुसकून लावलं.सर्वप्रथम तिने ह्युएन त्संगच्या कुटुंबाची म्हणजे चेन कुटुंबीयांची गाठ घेतली. चेन झवेई हा ह्युएन त्संगच्या रक्ताचा अंश असलेला तरुण तिला भेटला.त्याने मिशिला ह्युएन त्संगच्या आई-वडिलांच्या समाधीकडे नेलं. त्यांच्याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध होती. ह्युएन त्संगची आई इ.स. ६०४ मध्ये, तर वडील इ.स. ६०९ मध्ये वारले होते. गावाजवळच्या एका शेतात त्यांना पुरण्यात आलं होतं. त्या वेळी ह्युएन त्संग खूपच लहान होता. गावात ह्युएन त्संगचे कपडे आणि कटोराही पुरलेले असल्याचं तिला कळलं.ह्युएन त्संगच्या आई-वडिलांची समाधी पाहून मिशी त्या ठिकाणी पोहोचली.तिथला पॅगोडा आता जवळजवळ भग्नावस्थेतच होता. पुढल्या प्रवासात हळूहळू मिशीच्या लक्षात येत गेलं, की गौतम बुद्धांच्या अवशेषांप्रमाणेच ह्युएन त्संगचे अवशेषही जगभरात विखुरलेले आहेत.

ह्युएन त्संगने आपल्या प्रवासाची साद्यंत हकीकत मृत्युपूर्वी शब्दबद्ध केली.बौद्ध धर्माच्या मूळ पोथ्यांचा अभ्यास करणं हा या प्रवासाचा मूळ हेतू होता.ही सर्व हकीकत तांग राजघराण्याच्या काळातील प्राचीन रूढ चिनी भाषेत नमूद करण्यात आली होती.अत्यंत काटेकोरपणे 'ता तांग शी युझी' म्हणजे 'ह्युएन त्संगने नोंदवलेली पश्चिमेकडच्या जगाची हकीकत' अशा शीर्षकाच्या या हकिकतीचं लिखाण इ. स. ६४८ मध्ये पूर्ण झालं.त्यात रस्त्यांबाबतचं मार्गदर्शन,एका स्थानापासून दुसऱ्या स्थळी पोहोचायला लागलेले दिवस,त्या काळात काटलेलं अंतर,वाटेत लागलेले जलप्रवाह,नद्यांच्या खोऱ्यांमधून घेतली जाणारी पिकं,वाटेत कळलेल्या स्थानिकांच्या हकिकती आदी अनेक बाबी अंतर्भूत आहेत.त्यामुळेच ही हकीकत म्हणजे एक महत्त्वाचा दस्तऐवज बनली आहे.ह्युएन त्संगच्या या प्रवासवर्णनातून पश्चिम चीन,मध्य आशिया,अफगाणिस्तान,वायव्य भारत आणि भारतातील तेव्हाच्या परिस्थितीचं तपशीलवार वर्णन आढळतं.तेव्हाचा वायव्य भारत म्हणजे आजच्या पाकिस्तानातील वायव्य सरहद्द प्रांत.ह्युएन त्संग भारतातून परतला आणि त्याच सुमारास भारतावर इस्लामी आक्रमणाची सुरुवात झाली.ज्या भूभागातून ह्युएन त्संग भारतात आला त्या मध्य आशियात आणि अफगाणिस्तानात इस्लामी प्रभाव वाढला.मात्र,मिशीच्या प्रवासाचा मुख्य आधार होता तो म्हणजे ह्युएन त्संगचा समकालीन आणि परिचित हुई लीने लिहिलेलं ह्युएन त्संगचं चरित्र.हे चरित्र चीनमध्ये पुराणग्रंथांच्या यादीत समाविष्ट झालेलं आहे.या चरित्राचा चिनी अभिजात साहित्यावर प्रचंड प्रभाव पडलेला आहे.भारतीय आणि चिनी संस्कृतीत हा मोठा फरक आहे.भारतात मौखिक परंपरा असल्याने इतिहासात सांगोवांगीच्या गोष्टींची भर पडत राहते.त्यामुळे त्या घटना आधुनिक काळात पोहोचेपर्यंत त्यातली विश्वासार्हता नष्ट होऊन इतिहासाला दंतकथांचं स्वरूप प्राप्त होतं. चीनमध्ये मात्र गेल्या तीन हजार वर्षांचा इतिहास अगदी सूक्ष्म बारकाव्यांसह लिखित स्वरूपात उपलब्ध आहे.त्याला दंतकथांची जोड मिळण्याची शक्यता दिसत नाही.ह्युएन त्संगने हुई ली बरोबर त्याच्या प्रवासासंबंधी अधूनमधून शिळोप्याच्या गप्पा मारल्या असणार हे उघडच आहे. हुई ली आपल्या मित्राच्या रोमहर्षक प्रवासवर्णनाने अतिशय भारावून गेला होता, हे त्याने लिहिलेल्या चरित्रावरून सहज स्पष्ट होतं. या चरित्रातली काही वर्णनं अतिशयोक्तिपूर्ण आहेत,पण ही वर्णनं ह्युएन त्संगच्या विस्तृत टिपणांशी ताडून पाहून ह्युएन त्संगचा वास्तव चरित्रपट आज तेरा शतकांनंतरही आपल्याला पाहता येतो.( हटके भटके,निरंजन घाटे, समकालीन प्रकाशन पुणे )  इ. स. ६१८ मध्ये चीनमधील सुई राजवंशाची सद्दी रक्तलांच्छित क्रांतीमुळे संपुष्टात आली.ह्युएन त्संग आणि त्याचा मोठा भाऊ लुओयांग हे जन्मगाव सोडून आधी चांग आन आणि तिथून चेंगडूला पळाले.चेंगडूला त्यांनी महायान संग्रह आणि अभिधर्म कोश यांचा अभ्यास केला. ह्युएन त्संगचं या अभ्यासाने समाधान झालेलं नव्हतं.त्याला योगाकारभूमी शास्त्र आणि परमार्थ सूत्राचा अभ्यास करायचा होता.त्या काळात चीनमध्ये भारतीय ग्रंथांचे वेगवेगळे अनुवाद उपलब्ध होते.एकाच ग्रंथाच्या दोन अनुवादांत सुसूत्रता आणि साम्य या दोहोंचाही अभाव होता.प्रत्येक अनुवादानुसार अनेक पंथ अस्तित्वात आले होते.यामुळेच ह्युएन त्संगने भारतात जायचं ठरवलं.आपल्या प्रवासात ह्युएन त्संग आधी सिचुआनला पोहोचला. तिथून पूर्वेकडे जिआंगसू आणि हेनानला गेला.इथल्या बौद्ध पीठांमध्ये त्याची प्रवचनं होत होती.त्याने या काळात बौद्ध तत्त्वज्ञानासंबंधीचे अनेक वाद जिंकले.बौद्ध तत्त्वज्ञानाचा जाणकार विद्वान म्हणून त्याची कीर्ती पसरू लागली. इ. स. ६२५ मध्ये तो चांग आनला परतला.पुढच्याच वर्षी चीनमध्ये परत एकदा क्रांती झाली आणि तांग साम्राज्याचा पाया घातला गेला.तांग साम्राज्याचा काळ चीनच्या इतिहासात 'सुवर्णकाळ' म्हणून नोंदवला गेला. ह्युएन त्संगसमोर फाही येन आणि ची येन या दोन विद्वानांचा आदर्श होता.त्यांनी भारतात जाऊन बौद्ध सूत्रांचा अभ्यास आणि अनुवाद केला आणि ती चीनमध्ये आणली. 'मलाही तेच करायला हवं' असं ह्युएन त्संगला वाटू लागल्याचं हुई लीने लिहून ठेवलं आहे.

मिशीनेही लुओयांगहून चांग आन गाठलं.चांग आनला आता झिआन असं म्हणतात.एके काळची तांग साम्राज्याची ही राजधानी आता चीनच्या शांगझी या प्रांतात आहे.ह्युएन त्संगचा प्रवास नक्की कुठून सुरू झाला ते पाहून तिथूनच मिशीलाही तिचा खरा प्रवास सुरू करायचा होता.चीनच्या १९५८ च्या सांस्कृतिक क्रांतीत ह्युएन त्संगचे अवशेष त्याच्या मूळ समाधीतून दुसरीकडे हलवण्यात आले.या नव्या जागेचे दर्शन घेऊन मिशीची भारत यात्रा सुरू झाली.


उर्वरित प्रवास पुढील लेखामध्ये…

२८/८/२३

'प्रयाण' अल् मुस्तफा देवदूत - २ 'Departed' Al Mustafa Angel - 2


कृपाळूपण स्वतःची प्रतिमा आरशात स्वतःच न्याहाळत बसेल तर ते शिळारूप होईल. सत्कृत्य स्वतःलाच कुरवाळून घेत आत्मप्रशंसा करील तर शापचिंता निर्माण करील.तुमच्यापैकी काहींनी मला माणूसघाणा म्हटलं. आपल्याच एकलेपणात धुंद असतो म्हटलं. कोणी म्हणाले,अरण्यातील वृक्षवेलींशी हा संवाद करतो तितका माणसांशी करीत नाही. डोंगरमाथ्यावर जाऊन एकलकोंडा बसतो आणि आमच्या वस्तीकडे अवहेलणेच्या नजरेनं पाहतो.जिवलग मित्रहो,डोंगरवाटांनी मी चालत राहिलो आणि दूर विजनात दिवस काढले : हे नसतं केलं तर उंचावरून,दूर अंतरावरून तुमच्याकडे मला कसं पाहता आलं असतं?अंतर राखलं नाही अन् दुरून पाहिलं नाही तर एखाद्याला कुणाशी जवळीक कशी साधेल ?


इतर काहींनी,प्रत्यक्ष बोलून दाखवलं नाही तरी मला म्हटलं :परदेशी यात्रिका,कधीही पोहोचू शकणार नाहीस अशा उत्तुंग शिखरांचा ध्यास घेतला आहेस.गरुड जिथं घरटं बांधतो त्या टकमक सुळक्यावर तू बैठक का मांडतोस ? जे अप्राप्य त्याच्या शोधात का असतोस ? कोणती वादळं तुला आपल्या जाळ्यात बंदिवान् करायची आहेत ?कोणते ध्रुमधूसर पक्षी

आकाशमार्गावर धरू पाहतोस ? 

ये,आमच्यातला एक होऊन राहा.खाली उतरून ये.आमचं अन्न घेऊन भूक शांत कर.आमच्या मद्यानं तहान भागव.' त्यांनी काढलेले हे शब्द अंतःकरणापासूनचेच होते.

पण,मित्रहो,अधिक खोलात जाऊन त्यांनी पाहिलं असतं तर त्यांना कळलं असतं की,तुमच्या आनंदाचं आणि दुःखाचं रहस्य कशात,त्याच्या शोधात मी होतो.


आकाशपंथांनी विहरणारे तुमचे आत्मपक्षी माझा पारधविषय होते.पण मी कसला पारधी ? माझीच पारध होत राहिली.माझे कित्येक बाण धनुष्यातून सुटले पण परतून माझ्या हृदयावर आदळले.उंचावर मी जात होतो,

तरी मला सरपटावं लागलं,हेही खरं.माझे पंख उन्हात पसरलेले होते तरी जमिनीवरील त्यांची सावली कासवगतीची होती.एवढा मी श्रद्धावान् पण शंका-संशयांनी भरलेला होतो. कित्येकदा माझ्याच

यातनांच्या जखमा मी चाचपून पाहिल्या आहेत,आणि त्यामुळ तुमच्यावरचा माझा विश्वास वाढला आहे.तुमचं अधिक ज्ञान मला झालं आहे.हा माझा विश्वास आणि हे माझं ज्ञान यांच्या बळावरच मी सांगतो तुम्ही आहात ते तुमच्या देहात बद्ध नाहीत:तुमच्या घराचे आणि शेतमळ्यांचे तुम्ही कैदी नाहीत.


तुमच्यांत जे वस्तीला आहे ते पर्वतशिखरांच्याही वरून संचार करतं.वाऱ्यासोबत स्वैर भटकतं. ऊब मिळावी म्हणून सूर्यप्रकाशात वळवळावं आणि सुरक्षिततेसाठी जमिनीखाली अंधाऱ्या बिळांत वावरावं,अशी तुमच्या अंतरात्म्याची गत नाही.तो मुक्त आहे : जगाला व्यापून राहणारं, अंतराळात मुक्त संचार करणारं ते चैतन्य आहे.

हे माझे शब्द तुम्हाला संदिग्ध वाटत असतील, तरी ते तसेच घ्या.त्यांना साफसूफ करायला बघू नका.सगळ्याच गोष्टींचा आरंभ संदिग्ध आणि व्यामिश्र असतो,तरी त्यांचा शेवट तसा नसतो. मी म्हणजे केवळ एक आरंभ - दर्शन,इतकाच तुमच्या आठवणीत न राहीन तर किती छान होईल! चेतना आणि ती धारण करणारे जीव यांचा जन्म केवळ धुक्यात होतो : स्वच्छ केलासात (crystal) होत नाही.आणि कुणास ठाऊक,केलास ही धुक्याची अधोगती तर नसेल?


मी तुमच्या आठवणीत राहणार असेन तर मी सांगतो त्या गोष्टींचे स्मरण ठेवावं असं मला वाटतं. तुमच्या आत जे जे निःशक्त आणि विस्कटलेलं दिसेल ते ते अत्यंत शक्तिमान, अत्यंत निर्धारशील आहे असं समजा.तुमचे श्वासनिःश्वास, त्यांनीच तुमच्या हाडांना ताठ,कणखर आणि सुडौल केलं नाही काय? या श्वासांची भरती-ओहोट तुमच्या दृष्टिपथात थोडीच येते! तशी ती येईल त्या क्षणी तुमच्या नजरेतून दृश्यजगत् मावळलेलं असेल.


जे स्वप्न तुम्हाला आठवतही नाही,त्यातूनच तर तुम्ही नगरबांधणी केलीत आणि तिच्या आतली सगळी मांडामांडही.त्या स्वप्नाची कुजबुज जरी तुमच्या कानी पडली तरी दुसरा कोणताही आवाज तुम्हाला ऐकू येणार नाही.पण तसं दर्शन आणि तसं श्रवण तुमच्या अनुभवात नाही,हेही चांगलंच.ज्या हातांनी तुमच्या डोळ्यांवरचा दृष्टी गढूळणारा पडदा विणला आहे,तेच हात तो दूर करतील.तुमच्या कानांत भरलेलं मातीचं मेण ज्या बोटांनी मळलं आहे,तीच बोटं ते मेण उकरू शकतील.मग तुम्ही पाहाल : मग तुम्ही ऐकाल.तरीही अनुभवलेल्या आंधळेपणाची निंदा न कराल. बहिरेपणाचा खेद न कराल. कारण,त्या दिवशी या सर्व गोष्टींआड दडलेले हेतू तुमच्या जाणिवेत आलेले असतील.आणि तुम्ही प्रकाशाला द्याल तसाच धन्यवाद काळोखालाही द्याल.इतकं बोलून झाल्यावर अल् मुस्तफानं सभोवार पाहिलं.त्याच्या नौकेचा कर्णधार सुकाणूपाशी उभा होता. वाऱ्यानं शिडं भरली आहेत.आपल्याला दूरवर प्रवास करायचा आहे, हे तो पाहत होता.अल मुस्तफा म्हणाला :


"फार धीराचा आहे आमचा कप्तान.

वारा वाहतोय,शिडं अधीर झाली आहेत 

आणि सुकाणू दिशासूचनेची अपेक्षा करीत आहे. इतकं असूनहीमाझा कप्तान शांतपणानं माझी वाट पाहत आहे.आणि हे माझे समुद्रावरचे सहप्रवासी कामगार माझं बोलणं धीरानं ऐकत आहेत.त्यांनी तर महासमुद्राची गाज ऐकली आहे.आता ते किती वेळ थांबतील ?मी निघायला तयार आहे.हा लहानसा ओहोळ समुद्राशी येऊन पोहोचला.आहे.आई आपल्या बाळाला स्तनाशी घेईल.ऑरफालीजच्या जनबांधवहो, निरोपाचा नमस्कार मी तुम्हाला करतो.दिवस सरला आहे.पाण्यातलं कमळ दुसऱ्या दिवशी उमलण्यासाठी मिटावं,तसा हा दिवस

मिटायला आला आहे.या दिवसात जे दिलं घेतलं ते आपण राखून ठेवूया. त्यात काही उणीवही असेल.आपणा सर्वांना पुन्हा एकत्र यावं लागेल.देणाऱ्या परमेश्वराकडे हात पसरावे लागतील.मी पुन्हा परत येईन,हे विसरू नका.काही काळ जाईल आणि माझ्यातली आर्तता आणखी एका देहासाठी माती आणि पाणी जमा करील.तुम्हाला आणि तुमच्या संगतीत घालवलेल्या माझ्या यौवनाला मी निरोप देतो.कालच,एखाद्या स्वप्नात भेटलोत असं झालं आहे.मी माझ्या एकलेपणात असताना तुम्ही माझ्यासाठी गाणी गाइलीत.तुमच्या 

मनीच्या उत्कंठांचा मनोरा मी आकाशात उभा केला.

आता तुमची माझी झोप उडाली आहे. स्वप्न ओसरलं आहे.उषःकाल उलटून गेला आहे.मध्यान्ह झाला आहे.

पुरती जाग आली आहे. एकमेकांचा निरोप आपण घेतला पाहिजे.स्मरणाच्या संधिप्रकाशात,पुन्हा आपली भेट होईल.आपण पुन्हा बोलू - बसू या.त्यावेळी तुम्ही मला अधिक गहन - मधुर गीत ऐकवून रिझवाल.आणखी एका स्वप्नात तुमचे-माझे हात जुळतील तर आकाशात आणखी एक मनोरा आपण उभा करू."

एवढं बोलून अल् मुस्तफानं नौकेवरील खलाश्यांना इशारा केला.तात्काळ त्यांनी नांगर ओढला,नौकेचे बंध मोकळे केले आणि नौका पूर्वदिशेनं हलली.


निरोपासाठी जमलेल्या सर्वांच्या मुखातून जणू एकच हाक उमटली.मावळत्या उजेडात, समुद्रभागावर एखाद्या वाद्यस्वरासारखी ती व्यापून राहिली.


अल् मित्रा तेवढी निमूट उभी होती.नौकेकडे पाहत.धुक्यात नौका दिसेनाशी झाली.सर्वजण पांगून गेले.


अल् मित्रा एकटीच तटालगत उभी होती. तो बोलून गेला ते शब्द ती पुन्हा पुन्हा आठवत होती.


"थोडा काळ जाईल :


वाऱ्यावर क्षणभर विश्रांती घेईन.


मग कोणा स्त्रीच्या पोटी


मी पुन्हा जन्माला येईन."


२६.८.२०२३ या लेखातील पुढील व शेवटचा भाग..

२६/८/२३

'प्रयाण' अल् मुस्तफा देवदूत 'Departed' Al Mustafa Angel

आता संध्याकाळ झाली.साक्षात्कारिणी अम्मित्रा बोलू लागली : हा दिवस,हे स्थळ आणि अशी

वचनं उद्गारणारा तुझा आत्मा दैवी कृपेला पात्र असो.

त्यावर अल मुस्तफा म्हणाला : जो संवाद झाला तो मीच केला का ? श्रोताही मीच होतो की !


देवळाच्या पायऱ्या उतरत तो चालू लागला. जमलेले जनबांधव त्याच्यामागून निघाले. नौकेपाशी तो पोहोचला.चढून डेकवर उभा राहिला.जनसमूहाकडे पाहत पुन्हा बोलू लागला. त्याचा स्वर मघापेक्षा उंच होता :

ऑरफालीजच्या नागरिक जन हो,तुमचा निरोप घ्यावा असा आदेश वारा मला देत आहे.वारा करीत आहे तितकी तातड मला नसेल.तरी मला गेलं पाहिजेच.आम्ही फिरस्ते संन्यासी. एकांत वाटेच्या शोधात असणारे.रात्र जिथं घालवली तिथं पुढच्या दिवशी आम्ही ठरत नाही. सूर्यास्ताला जिथं असतो तिथून अरुणोदयापूर्वी आम्ही प्रयाण करतो.धरणीची लेकरं झोपेत असतात तेव्हा आम्ही वाटचाल करीत असतो.कोण्या जिवट चेतना-निर्भर वनस्पतीची आपण बीजं आहोत.आपले अंतरात्मे विकसित होऊन पिकतील तसतसे वायुमंडलाच्या अधीन आपण होतो,आणि अवकाशात विखुरले जातो.भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या सहवासातले माझे दिवस मोजके होते.तुमच्याशी बोललो ते त्याहूनही मोजकं होतं.माझा शब्दस्वर तुमच्या कानांआड होईल आणि माझा प्रेमभाव तुमच्या विस्मरणात जाईल त्या क्षणी मी पुन्हा तुमच्यात येईन.त्यावेळी माझं अंतःकरण ईश्वरी कृपेनं अधिक समृद्ध झालेलं असेल.माझ्या ओठांतले शब्द अंतरात्म्याला आणखी शरण गेलेले असतील.

भरतीच्या लाटेवर स्वार होऊन मी पुन्हा परतेन.मृत्यून मला दडवलं असेल,किंवा गाढ शांतीनं मिठीत घेतलं असेल,तरीही तुमच्याशी संवाद करावा,तुमच समाधान करावं यासाठी मी आतुर असेन.माझी धडपड व्यर्थ जाणार नाही.


मी बोलून गेलो त्यात सत्यार्थ असेल तर ते सत्य माझ्या मुखातून अधिकार-स्वरानं प्रकट होईल माझे शब्द तुमच्या विचारांशी सुसंगत असतील.ऑरफालीजच्या जनबांधव हो,शिडांत वारा भरला आहे.मी निघालो आहे.रिकाम्या अंतःकरणानं जात नाही,भरून पावलो आहे.

या माझ्या प्रयाणदिवशी तुमच्या गरजा भागलेल्या नसतील आणि माझ्या प्रेमाला पूर्तता आली नसेल तर आपण एकमेकांना वचन देऊया की तसा सफलतेचा दिवस कधीतरी उगवेलच.माणसांच्या गरजा बदलतात,

तसं प्रेम बदलत नाही.माझ्यासारख्या प्रेमिकाला प्रेमाच्या पोटी गरजा सफल व्हाव्यात असंच वाटतं.

म्हणून लक्षात घ्या,गाढ शांतिघरातून मी पुन्हा परतेन.

पहाटवेळी धुकं सर्वत्र स्वतःला लोटून देत असतं.त्याचेच दवबिंदू शेतमळ्यांवर उतरतात. त्या बिंदूंमधून मेघमाला जमून येते.आकाशातून ती पुन्हा पावसाच्या रूपानं पृथ्वीवर उतरते.त्या धुक्यासारखा मी आहे,असं समजा.

रात्रीच्या शांत प्रहरांत मी तुमच्या नगरीच्या रस्त्यांवरून फिरलो आहे.माझा अंतरात्मा तुमच्या घराघरात शिरला आहे.तुमच्या अंतःकरणांतली धडधड मी अनुभवली आहे. तुमचे उच्छ्वास माझ्या मुद्रेवर उमटले आहेत. एकूण एक सर्वांना मी ओळखलं आहे.तुमचा आनंद आणि तुमचं दुःख माझं झालं आहे.झोपेत तुम्ही पाहिलीत ती स्वप्नं मीही पाहिली आहेत.कित्येकदा तर मी तुमच्यामध्ये पर्वतराजीच्या पोटात भरून आलेल्या सरोवराप्रमाणे होऊन राहिलो.तुमच्या अंतःकरणांची उंच शिखरं माझ्यात प्रतिबिंबित झाली.त्याच बरोबर,वळणं घेणाऱ्या उतरणी आणि तुमच्या विचार-वासनांचे सरकते कळपही माझ्यात उमटले आहेत.तुमच्या बाळगोपाळांचं हास्य माझ्या स्तब्ध चित्तात,निर्झराप्रमाण हुदडत आलं.तरुणांच्या आकांक्षा नदीप्रवाहाप्रमाणे वाहत आल्या.माझ्या गूढ़ आकांक्षांहून मनः कुहरात निर्झरांचे आणि नद्यांचे ओघ पोहोचले,तरी त्यांचं गीतगुंजन चालूच राहिलं : मात्र त्या हास्याहून अधिक मधुर, आणि त्या अधिक उज्ज्वल असं काही मला जाणवत होतं.ती होती तुमच्यातली असीमता !


ईश्वराच्या अस्तित्वातील अंशमात्र पेशी आणि नसा तुम्ही आहात.त्याच्या विराट गीत-स्वरावलीत तुमचं गुंजन म्हणजे निःस्वर श्वासासारखं आहे.तरी,त्या अमर्याद पुरुषोत्तमाच्या अपेक्षेनं तुम्हीदेखील अमर्याद आहात.

त्यांच्या दर्शनात मी तुम्हाला पाहिलं आहे,आणि तुमच्यावर प्रेम केलं आहे.किती झालं तरी,त्या विराट विश्वरूपाच्या कक्षेतले तुम्ही : मग माझं प्रेम आपल्यातलं अंतर तोडू शकलं,त्यात नवल ते काय? तुमचं जाणतेपण,तुमच्या आकांक्षा, तुमची दर्शनं त्या कक्षेबाहेर थोडीच उड्डाण घेणार! तुमच्यातलं व्यापकपण एखाद्या मोहरून आलेल्या प्रचंड ओकवृक्षासारखं असतं.त्याच्या शक्तिमत्तेमुळं या मातीशी तुम्ही बांधून राहता. त्याचा परिमळ तुम्हाला अवकाशात उचलून धरतो आणि त्याच्या चिरजीवनात तुम्ही अमरपण भोगता.

एखादी शृंखला असते.कडीतून कडी गुंफलेली. सांगतात की तिच्यातला एकही दुवा कच्चा-दुबळा असेल तर ती शृंखला तितकी दुबळी असते.हे अर्धसत्य आहे.तिच्यातील बलवान दुव्याइतकी ती बलवानही असते.तुम्हीही तसेच आहात,हे समजून असा. माणसाच्या दुबळ्या कृत्यानं त्याची शक्ती मोजू नये.महासमुद्राची बलाढ्यता त्याच्या लाटांवरील फेसांच्या भंगुरतेनं मोजता येते काय ?

तुमचं अपयश तेवढं लक्षात घेऊन तुमची गुणवत्ता ठरवणं,हे बरोबर कसं ? ऋतुमानात चंचलता असते म्हणून त्याला दोष द्यावा काय? बंधूनो,तुम्ही महासागरासारखे आहात.किनारभूमीवर रुतून बसलेल्या तुमच्या नौका भरतीची प्रतीक्षा करीत असतात,म्हणून काय झालं ? तुम्ही तर नाहीच,पण प्रत्यक्ष समुद्रही भरतीला ओढून आणायला समर्थ असत नाही.ऋतुमान जस तसे तुम्ही असता.हिवाळ्याची पीडा भोगताना वसंत ऋतू तुम्ही अगदी मनावेगळा करता तरी तुमच्या अंतरंगात तो अर्धसुप्त असतो.तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता याचा तो अपराध मानत नाही.

हे सगळं मी बोलतो म्हणून एकमेकांशी विचार करताना असं समजू नका की 'यानं आमची स्तुती केली... आमच्यातलं चांगलं तेवढं पाहिलं.' तुम्ही स्वतःशी स्वतःचा विचार करताना जे म्हणाल तेच मी बोललो.

पण मित्रहो,शब्दांतून व्यक्त होणारं ज्ञान हे शब्दातीत ज्ञानाची केवळ छाया असतं.तुमचे विचार काय,माझे शब्द काय,मोहोरबंद स्मृतीच्या लहरीप्रमाणं आहेत.भूतकाळाची नोंदवही जणू.भूतकाळातल्या अतिप्राचीन दिवसांत या पृथ्वीला स्वतःचीच खबर नव्हती,मग ती तुम्हा-आम्हाला कुठून ओळखणार? भयानक गोंधळाच्या बेधुंद रात्रीमागून रात्री इथं होऊन गेल्या.ज्ञानवान् महात्मे या पृथ्वीवर जन्मले.त्यांनी तुम्हाला आत्मज्ञान दिलं.त्या ज्ञानातला हिस्सा घ्यायला मी आलो आहे.पाहिलंत का,त्या ज्ञानाहून अधिक काही माझ्या पदरात पडलं आहे.!


कालौघात,तुमच्यासाठी आत्मज्योत अधिक तेजानं उजळत आहे.तुमचा मनःप्रदेश ती अधिक व्यापत आहे.आणि तुम्ही मात्र मावळून गेलेल्या दिवसांची खंत करीत बसलेले आहात.


तुमचं जीवन सभोवतीच्या देहधारी जीवांतील चैतन्याचं असतं.आणि हे जीव तर स्मशानभयानं ग्रासलेले आहेत.खरं म्हणजे,इथं स्मशान आहेच कुठं? सभोवारचे डोंगर आणि मैदानं ही तर पाळण्यासारखी आहेत : पायठाणासारखी आहेत.


तुमच्या शेतमळ्यात तुम्ही पूर्वजांचं दफन केलं आहे.त्या जागांच्या जवळून जाताना नीट निरखून पाहा.तुम्हाला दिसेल की तुम्ही आणि तुमची मुलंबाळंच हातात हात गुंफून,फेर धरून नाचत आहेत.


पुष्कळदा तुम्ही चैन चंगळ करण्यात रंगून जाता. कशासाठी,त्याचं भानही तुम्हाला नसतं. कुणीकुणी तुमच्याकडे आले : तुमच्या मतांशी, श्रद्धांशी त्यांची जुळली म्हणून तुम्ही वचनं दिली घेतली.त्यांना तुम्ही संपत्ती बहाल केली.सत्ता दिलीत.वैभव दिलंत.

मी कसलंही वचन तुम्हाला दिलं नाही,तरी तुम्ही मला अधिक उदारपणानं कितीतरी दिलंत. जीवनातील चेतनेची खोल-खोल तहान तुम्ही मला दिलीत.


सर्व ध्येयांची परिणती या तहानेनं आसुसलेल्या ओठांमध्ये व्हावी आणि सर्व जीवन निर्झराप्रमाणं व्हावं,याहून माणसाला श्रेष्ठ वरदान तरी कोणतं? ते मिळून मी सन्मानित झालो आहे.जेव्हा जेव्हा या चेतनाप्रवाहाकाठी मी येतो तेव्हा ते जिवंत पाणी आपल्या ठिकाणी तहानेलं आहे,हे पाहून मी धन्य होतो.हे पाणी मी पितो त्यावेळी ते मला पीत असतं.तुम्हांपैकी काहीना वाटून गेलं असेल की मी गर्व वाहतो,आणि कोणती भेटवस्तू स्वीकारायला भारीच संकोच करतो.


खरं सांगू ? केलेल्या श्रमाचं मोल घेताना मी गर्व करतो : देणगी घेताना तसा नाही करीत.आपल्या मेजांवर भोजनासाठी मी यावं अशी इच्छा तुम्ही केलीत,तेव्हा कधीकधी रानावनातली बोरफळं खाऊन मी भूक शमवली.आपल्या ओसरीवर मला निवारा द्यावा असं तुमच्या खूप मनात आलं,तेव्हा कधीकधी मी देवळांच्या मंडपांत आसरा घेतला.म्हणून काय झालं ? दिवसरात्र तुम्ही माझी चिंता केलीत.किती देखभाल केलीत! यामुळं तर अन्न गोड लागलं आणि माझ्या रात्री दृष्टान्तस्वप्नांनी भरून आल्या.

यासाठी मी तुमचा कृतज्ञ आहे.तुमचं सर्व शुभ इच्छितो.


' द प्रॉफेट - खलील जिब्रान '

 देवदूत,देवदूतांचं विहारवन आणि अग्रदूत

भावानुवाद - त्र्यं.वि.सरदेशमुख

मधुश्री पब्लिकेशन,शरद अष्टेकर

२४/८/२३

जग जिंकूनही निर्वासित अवस्थेत मरणारा नेपोलियन- Napoleon died in exile despite conquering the world..

अठरावे शतक हे बंडखोरीचे शतक होते.सर्वत्र राजांची फर्माने व धर्मोपदेशकांचे हट्ट यांविरुद्ध बंडे होत होती.

राजा व धर्म दोहोंच्याही कचाट्यातून जनता मुक्त होऊ पाहत होती.सर्व जगभर क्रांतिकारक विचारांचा विद्युतसंचार होत होता.व्हॉल्टेअर पॅरिसला शेवटची भेट द्यावयास आल्यावेळी तेथील विज्ञानमंदिरात बेंजामीन फ्रँकलीन त्याला भेटला होता.दोघा बंडखोरांनी परस्परांना मिठ्या मारून चुंबने घेतली. भोवतालचे लोक म्हणाले, "सोलोनसोफोक्लिस हेच जणू परस्परांना आलिंगन देत आहेत.किती सुंदर दृश्य हे !" ज्याने आकाश फाडून त्यातून विद्युत खाली आणली होती,ओढून घेणार होता,

असा तो अमेरिकन छापखानेवाला,विज्ञानवेत्ता व स्वतंत्र विचारवादी बेंजामीन या वेळी अमेरिकन क्रांतीला सोळाव्या लुईची सहानुभूती मिळवण्यासाठी आला होता.इंग्रजांच्या सत्तेवर आघात करण्यासाठी फ्रेंच राजा सदैव टपलेला असे.त्याने अमेरिकेशी करार केला.वस्तुतः त्याला त्या बंडखोरांना मदत देण्याची मनापासून इच्छा नव्हती.पण नाखुशीने का होईना,इंग्रजांची सत्ता नष्ट करण्यासाठी म्हणून त्याने मदत देण्याचे मान्य केले.

अमेरिकेतील विचार फ्रान्समध्येही येणार हे त्याला समजत नव्हते,असे नाही.पेन,जेफरसन,फ्रँकलीन,

वॉशिंग्टन वगैरे अमेरिकन क्रांतीचे पुढारी लुईच्या मते धोकेबाज होते.ते सारे बंडखोर होते,एवढेच नव्हे तर देववादी म्हणजे चर्च वगैरेंची जरूर न ठेवता देवाला मानणारे होते. 'चर्चची अडगळ कशाला?' असे ते म्हणत. नास्तिकतेकडे जाणाराच त्यांचाही रस्ता होता. व्हॉल्टेअरच्या मतांप्रमाणेच,या अमेरिकन क्रांतिकारकां -

चीही मते,राजांच्या दैवी हक्कांच्या तत्त्वावर उभारलेल्या सामाजिक रचनेचा पाया उखडून टाकू पाहणारी होती.

लुईने अमेरिकनांशी मैत्री जोडण्याचे कारण त्याचे अमेरिकनांवरील प्रेम नसून तो इंग्रजांचा द्वेष करीत असे,हे होते. त्याने अमेरिकनांना पैसे दिले,फौजा दिल्या.पण अमेरिकेतील क्रांतीची प्रगती मात्र तो सचिंत होऊन पाहत होता.लुईला वाटत असलेली भीती खरी ठरली.


१७८९ सालच्या वसंत ऋतूत,अमेरिकेत वॉशिंग्टनचे इनॉगरेशन होण्याच्या थोड्याच दिवस आधी लुईच्या स्वत: च्या देशात क्रांतीचा वणवा पेटला.फ्रेंच राज्यक्रांती बरीचशी रशियन राज्यक्रांतीसारखीच होती.प्रथम मिरोबाच्या नेतृत्वाखाली मध्यम वर्गाने राजाविरुद्ध बंड केले.रशियात केरेन्स्कीच्या पक्षाने झारविरुद्ध केलेल्या बंडासारखेच हे बंड होते.पण पुढे डान्टन, राब्सोरी,मरात वगैरे जहाल पुढारी लेनिन, ट्रॉट्स्की इत्यादी रशियन क्रांतिकारकांप्रमाणे अधीर झाले.त्यांना मवाळ पुढाऱ्यांचा मवाळपणा आवडेना,त्यांना दूर करून त्यांनी सत्ता स्वतःच्या हाती घेतली व राजाचा शिरच्छेद केला. 

सरदारांचे विशिष्ट हक्क त्यांनी नष्ट केले. त्यांच्या पदव्या रद्द केल्या व अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याप्रमाणे मानवी हक्कांचा जाहीरनामा काढला.त्यांनी चर्चची मालमत्ता जप्त केली व ती सरकारच्या हवाली केली.

ईश्वराच्या पूजेविरुद्ध एक फतवा काढून ईश्वराच्या पूजेऐवजी त्यांनी 'बुद्धीची दैवी पूजा' सुरू केली.त्यांनी बुद्धीला ईश्वराच्या सिंहासनावर बसवले.येथपर्यंत

क्रांती बरीचशी रक्तहीनच झाली.पण १७९१ साली प्रशियाचा राजा व ऑस्ट्रियाचा सम्राट पिल्लिट्झ येथे भेटले.फ्रेंच क्रांतीविरुद्ध प्रतिक्रांती सुरू करण्यासाठी ते जमले होते. हद्दपार केलेले फ्रेंच सरदार व इतर राजनिष्ठ लोक यांचे सैन्य त्यांनी गोळा केले व सर्व जगाच्या कल्याणासाठी पुन्हा राजेशाही सुरू झालीच पाहिजे असे जाहीर केले.या घोषणेमुळे फ्रेंच क्रांतिकारकांच्या भावना पेटून उठल्या.ते जणू चवताळले!घरच्या राजेशाहीची नावनिशाणी नष्ट करायची एवढेच नाही,तर सर्व युरोपमधील राजेशाही नष्ट करून साय युरोपचेच रिपब्लिक करायचे,असे त्यांनी ठरवले.त्यांनी तुरुंग फोडले व शेकडो कैद्यांना ठार केले.त्यांनी सर्व रेन ऑफ टेरर' सुरू केले. त्यांनी सुरू केलेला मरणमारणाचा कारभार अक्षम्य होता.युद्धाचा मार्ग आजपर्यंत कधीही प्रगतीचा ठरला नाही. खुनाखुनी करून मिळवलेला कोणताही विजय महत्त्वाचा नसतो.लाखोंच्या प्राणांचे मोल देण्याइतका मूल्यवान विजय कोणताच नसतो. फ्रेंच क्रांतिकारकांनी हिंसेचा अवलंब केला व शेवटी अपरिहार्य ते झालेच.जयाचे परिवर्तन पराजयात झाले. पण फ्रेंच राज्यक्रांतीतील या दुदैवी घटनेला उगीच नावे ठेवण्यात अर्थ नाही. ही भीषण राजवट सुरू करणारे घाबरून गेले होते.त्यांची डोकी ठिकाणावर नव्हती.त्यांनी हे सर्व आत्मरक्षणासाठी केले.नवीनच मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे ते मस्त झाले होते.पण ते स्वातंत्र्य जाणार की काय,अशा भीतीने ते वेड्यासारखे झाले.आपण काय करीत आहोत,

हे त्यांना कळेना.एच. जी. वेल्स लिहितो की, 'राजाचा कैवार घेणाऱ्यांनी क्रांतिकारकांच्या अत्याचारांची अतिशयोक्तिपूर्ण वर्णने केली आहेत.त्याच्या मते आपण फ्रेंच क्रांतीत मारल्या गेलेल्यांची इतकी वर्णने ऐकतो याचे कारण ते जरा बड़े व प्रतिष्ठित लोक होते.जास्तीत जास्त चार हजार लोक मारले गेले असतील आणि त्यांपैकी बरेचसे क्रांतीच्या विरुद्ध होते.फ्रेंच रिपब्लिकविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत ते खुशीने सामील झाल्यामुळे त्यांना लढाईची फळे भोगावी लागली.एच. जी. वेल्स म्हणतो," १९१६ मधील 

सोम आघाडीवरच्या लढाईच्या वेळी ब्रिटिश सेनापतींनी संबंध फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात जितके लोक मारले गेले होते,त्यापेक्षा अधिक एका दिवसात मारले!" इतिहासाच्या अंगणात गरिबांच्या विव्हळण्यापेक्षा श्रीमंतांच्या रडण्याचेच प्रतिध्वनी अधिक मोठे उमटत असतात.


पण एकाने अन्याय केला म्हणून काही दुसऱ्याने केलेला अन्याय क्षम्य ठरत नाही.फ्रेंच राज्यक्रांतीती 'रेन ऑफ टेरर' एकंदरीत लज्जास्पदच होते.एवढेच नव्हे;तर त्यासाठी किंमतही जबर द्यावी लागली.क्रांतिकारकांना स्वतःचे स्वातंत्र्य गमावून बसावे लागले.त्यांनी रिपब्लिकच्या रक्षणासाठी टाकलेल्या पावलांतून इतिहासातील एक अत्यंत चढाऊ युद्ध निर्माण झाले.

त्यातच फ्रेंच रिपब्लिक नष्ट होऊन त्यातून नेपोलियनच्या साम्राज्यशाही तृष्णा जन्माला आल्या.


नेपोलियनच्या लढायांचा आरंभ रिन ऑफ टेरर मधून झाला.नेपोलियन मूळचा इटलीमधला. १७६९ साली कॉर्सिका बेटावर त्याचा जन्म झाला.फ्रान्समधील लष्करी विद्यालयात त्याचे शिक्षण झाले.मुसोलिनीप्रमाणे,तोही आरंभी क्रांतिकारक व जहाल होता.तो गबाळ व केसाळ होता.त्याचे केस कधी नीट विंचरलेले नसत. पावडर वगैरे कुठलीतरी,कशीतरी फासलेली असायची.त्याला घरी नीट शिक्षण मिळाले नाही. तो पॅरिसच्या रस्त्यातून अहमन्यतेने भटकत फिरे.क्रांतीचे शत्रू नष्ट करून क्रांती वाचवण्याची जबाबदारी त्याने स्वतःच्या शिरावर घेतली. आपणच हे काम करू शकू असे तो म्हणे.त्यावेळी त्याचे वय फक्त सत्तावीस वर्षे होते. पण लढवय्या म्हणून त्याने आपली योग्यता आधीच दाखवली होती.ती म्हणजे १७९५ साली राजाची बाजू घेणाऱ्यांचे बंड मोडून त्याने रिपब्लिकविषयी आपली निष्ठा दाखवली होती. तेव्हा क्रांतीच्या नेत्यांनी नेपोलियनला सैन्य देऊन सांगितले, "ही सेना घे व साऱ्या जगाला जिंकून त्याची फ्रेंच रिपब्लिकच्या धर्तीवर पुनर्रचना कर." पण हातात शस्त्र घेणारे आजपर्यंत कधीच जगाचे उद्धारक ठरले नाहीत.जगाला वाचवू शकले नाहीत.नेपोलियन आणि त्याच्या फौजा यांनी जगाचा धुव्वा उडवला.आपले मनोरथ पूर्ण करून घेण्यासाठी नेपोलियनने क्रांतीचा साधन म्हणून उपयोग करून घेतला.त्याने पहिली स्वारी इटालियनांविरुद्ध केली.आपण त्यांची बंधने तोडण्यासाठी जात आहोत असे त्याने जाहीर केले.पण इटलीवर तुटून पडणाऱ्या आपल्या शिपायांना तो म्हणाला, "आपण या देशावर दोन कोटी फ्रैंक खंडणी लादू (म्हणजेच तितकी संपत्ती लुटून नेऊ).

जगातील अत्यंत समृद्ध मैदानात मी तुम्हाला नेत आहे.

तुम्हाला तिथे गेल्यावर यश,संपत्ती,मानसन्मान सारे काही मिळेल." त्यानुसार वरील सर्व मिळाले.पण त्याच्या शिपायांना मात्र मरणच लाभले.


इटलीतील विजयामुळे नेपोलियन फुगला.तो आपणास ज्युलियस सीझरच्या प्रमाणात पाहू लागला.पूर्वेकडील देशात आपणही आपले वैभव दाखवले पाहिजे.आपला दरारा तिकडील राष्ट्रांवरही बसवला पाहिजे असे त्याला वाटले. म्हणून त्याने इजिप्तमधील लोकांना आता मुक्त केले पाहिजे.हे आपल्या देशबांधवांना पटवून दिले व आपल्या आज्ञाधारक क्रांतिकारक कोकरांना इजिप्तमध्ये नेऊन त्यांना तेथील उंच पिरॅमिड्स दाखवले.त्यांच्या भावना पेटवल्या, त्यांनी मरावयास तयार व्हावे म्हणून तो म्हणाला, "तीस शतके त्या पिरॅमिड्सवरून तुमच्याकडे पाहत आहेत!" इतिहासातील अती प्रसिद्ध व अत्यंत मूर्खपणाचे हे वाक्य आहे.या वाक्यात लष्करशाहीचे स्वरूप प्रतीत होत आहे. लष्करशाही जिवंत व प्रगतीपर वर्तमानकाळाला भूतकाळाशी जखडून टाकून प्रगती होऊच देत नाही.लष्करशाही आम्हाला आपले जीवनाचे नाटक जणू भुतासमोर करावयास लावते.चार हजार वर्षे- मृतांची चार हजार वर्षे - तुमच्याकडे पाहत आहेत,म्हणून मारा व मरा असे ही सांगत असते.एका वेडपटाचा मूर्खाच्या पिढीला हा उपदेश आहे.तो मूर्खानी ऐकला मानला व ते मेले.त्या वेडपटाचे वैभव व त्याची कीर्ती वाढवण्यासाठी ते मूर्ख मातीत पडले.


नेपोलियन फक्त स्वतःची पूजा करी व बाकी साऱ्या दुनियेला तुच्छ मानी,कृतज्ञतेशी त्याचा परिचय नव्हता.

मानवी दुःखाविषयी त्याला सहानुभूती नसे.इजिप्तमधील जखमी शिपायांना परत स्वदेशी आणणे हे फार त्रासाचे होते.म्हणून त्यांना क्लोरोफॉर्म देऊन त्याने ठार मारले. नेपोलियन वंचक व असत्यवादी होता.त्याला सत्य ठाऊक नव्हते.तो दंभाचा पुतळा होता. फसवणूक करणे हा तर त्याचा धर्म होता.ज्या ध्येयांवर त्याची श्रद्धा नव्हती तीही आपली आहेत,असे तो खुशाल सांगे.पाळावयाची नसलेली वचनेही तो खुशाल देई.चढाऊ वीराचा तो आदर्श नमुना होता.जगावर सत्ता गाजवू पाहणारे तलवारबहाद्दर असेच असतात.मानवी प्राणी म्हणजे मातीची डिखळे,असे तो मानी व तो आपली लहर तृप्त करण्यासाठी या मातीला मन मानेल तसा आकार देई वा फोडून टाकी.

आपल्या कारकिर्दीच्या आरंभी त्याने 'आपण मानवजातीचे मित्र आहोत' असे ढोंग केले. युरोपभर अनेक रिपब्लिके स्थापून त्याने ती स्वतःच लुटली.

क्रांतीच्या नावाने लढत असता तो स्वतःचेच घोडे कसे पुढे दामटता येईल,हेच खरोखरी पाहत असे.सैन्यावर आपला पूर्ण ताबा बसला आहे असे दिसल्यावर त्याने १८०४ साली पोपला बोलावून आणून त्याच्याकडून 'फ्रान्सचा ईश्वरनियोजित सम्राट' असा अभिषेक आपणास करून घेतला. कार्लाईल म्हणतो, "त्या राज्याभिषेकात कशाचीही वाण नव्हती. पाच लाख लोक त्यासाठी मेले नव्हते का? मग आणखी कोणते भाग्य हवे?" आतापर्यंत तो 'पददलितांचा कैवारी' म्हणून मिरवला. पण आता तो अत्यंत रानटी व जुलमी हडेलहप्पी बनला.युरोपातील साऱ्या रिपब्लिकांच्या पुन्हा राजेशाह्या करून स्वतःच्या भावात व आप्तेष्टांत त्याने सारे युरोप जणू वाटून टाकले.

पण हे भावांवर व आप्तेष्टांवर त्याचे प्रेम होते म्हणून नव्हे,तर राजे बनवणे व नष्ट करणे हा आपला खेळ आहे.

आपल्या तळहाताचा मळ आहे असे त्यांना दाखवून दिपवून टाकण्यासाठी,आपण 'कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम' असे सत्ताधारी आहोत हे तो दाखवू इच्छित होता.एखाद्या उकिरड्यावर ऐटीने बसणाऱ्या कोंबड्याप्रमाणे उद्ध्वस्त जगाच्या विनाश राशीवर तो बसला होता.आपणास अद्यापीही या कोंबड्याचे कुकूऽ कू सर्व राष्ट्रांतील मुलांच्या वर्गातून शिकवण्यात येत असते व या नवयुवकांतून पुढच्या चढाईचे शिपाई तयार करण्यात येत असतात.

जीवनाच्या सुरुवातीला नेपोलियन नास्तिकवादाकडे झुकत होता.पण आता तो धार्मिक झाला."धर्माशिवाय दुसऱ्या कोणत्या युक्तिवादाने 'आपल्या दारिद्र्यातच समाधान माना' हे गरिबांना पटवून देता येईल बरे?" असे तो म्हणे. एक अपचनाने आजारी आहे,तर एक भुकेने मरत आहे हा जगातील भेद,ही जगात दिसणारी विषमता मनुष्याने सहन करावयास पाहिजे असेल तर, कोणीतरी असे सांगणारा हवाच की, 'ईश्वराचीच तशी इच्छा आहे. जगात गरीब व श्रीमंत हे भेद असावे असा ईश्वरी संकेतच आहे!' असे सांगितले तरच लोक गप्प बसतील.नेपोलियन ईश्वराचा भूतलावरील अधिकृत प्रतिनिधी बनला. 'दरिद्री व पददलित असूनही प्रजेने शांत राहावे, समाधान मानावे.' यासाठी जणू नेपोलियनचा अवतार होता.इतर सर्व गोष्टींप्रमाणे त्याने धर्माचेही प्रबळ लष्करी शास्त्र बनवले व परकीयांवर हेरगिरी करण्यासाठी परदेशात मिशनरी पाठवले.तो म्हणे, "आशिया,आफ्रिका, अमेरिका इत्यादी ठिकाणी या मिशनऱ्यांचा मला खूप उपयोग होईल.त्या त्या देशांची हकिकत मला या मिशनऱ्यांतर्फे मिळेल.त्या पाद्र्यांचा धार्मिक पोशाख त्यांचे रक्षण करील व त्यायोगे त्यांचे व्यापारी व राजकीय हेतू कोणास कळणार नाहीत.

"त्याला आता एकाच ध्येयाचा स्वतःच्या सत्तेचा ध्यास लागला होता. सत्ता कोणत्या मार्गांनी मिळवायची याचा विधिनिषेध त्याला नसे.मार्ग कोणताही असो,सत्ता हाती राहिली म्हणजे झाले,असे तो म्हणे.जुन्या क्रांतिकारक सहकाऱ्यांचा 'कल्पनावादी' अशी टिंगल करून ते स्वातंत्र्य व सुधारणा या ध्येयांचा पुरस्कार करीत.म्हणून त्याने त्यांना दूर केले.स्वातंत्र्याचा हट्टच धरून बसणाऱ्यांना तो तुरुंगात टाकी. त्याला टीकेची भीती वाटे म्हणून तो टीकाकारांना दया दाखवीत नसे.'साऱ्या जगाला थक्क करणे, दिपवून टाकणे' हे त्याचे त्याचे ध्येय असल्यामुळे त्याने प्रत्येक विरोधी आवाज दडपून टाकण्याचे ठरवले.

आपण वर्तमानपत्रांना स्वातंत्र्य दिल्यास आपली सत्ता तीन दिवसही टिकणार नाही,असे त्याला वाटे.


नेपोलियन एक क्षुद्र वृत्तीचा जाहिरातबाज होता. त्याने केलेल्या युद्धांचा हेतू जगाला गुलाम करणे एवढाच नसून जगाला दिपवणे,थक्क करणे हाही होता.जय कोणी का मिळवीना,टाळ्या व श्रेय मात्र नेहमी तोच घेई.तो स्वत:ची स्तुती स्वतः करणारा होता.त्याला मोठा आवाज करणे आवडे.तो म्हणतो,कीर्ती व प्रसिद्धी म्हणजे काय? जो जास्त आवाज करतो,तोच प्रसिद्ध होतो.जितका अधिक मोठा आवाज केला जाईल,तितका अधिक दूर तो ऐकू जातो.कायदे, संस्था,स्मारके,राष्ट्रे सर्व नष्ट होतात.पण आवाज मात्र टिकतो पुढच्या काळात,पुढच्या युगातही टिकतो.आणि म्हणून नेपोलियन जगासमोर मोराप्रमाणे नाचत होता.तो दरोडे घालीत,निंदा करीत,फसवीत,खून करीत,वल्गना करीत, पराक्रम दाखवत होता.स्वतःच्या मोठेपणाची स्तुतिस्तोत्रे तो स्वतःच गाई. व्हिक्टर ह्यूगो म्हणतो, "देवालाही जणू त्याचा कंटाळाच आला!" तो आणखी म्हणतो, "पुरे झाला नेपोलियन! फार झाली त्याची चव ! विटलो, विटलो आता! ( मानव जातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन)

आणि नंतर त्याचा अध:पात झाला.स्वतः च्या फाजील महत्त्वाकांक्षेमुळेच त्याचा नि:पात झाला.आपल्या साम्राज्यात रशिया व इंग्लंड यांचाही समावेश करायला तो उत्सुक होता. म्हणून सहा लाख सैन्य घेऊन तो मॉस्कोवर स्वारी करण्यास निघाला.पण पुढे कित्येक महिन्यानंतर काही हजार दरिद्री,भिकार, मरतुकड्या,निःसत्त्व व निरुत्साही शिपायांसह पराभूत होऊन परत आला.त्याला जय मिळत होते,तोपर्यंत त्याच्या यशोज्योतीभोवती पतंगाप्रमाणे मरण्यास ते तयार होते.पण मॉस्कोहून ही जी अनर्थकारक पिछेहाट झाली, तिने फ्रेंचांचे डोळे उघडले.

नेपोलियन हा जगाला दिपवू पाहणारा एक शुद्ध वेडपट आहे हे त्यांनी ओळखले.त्याच्या महत्त्वाकांक्षेच्या रोगाने लाखो तरुण शिपायांना नाहक मृत्यूमुखात लोटले होते. नेपोलियनने पुन्हा असला काही खोडसाळपणा करू नये.

म्हणून त्याचे देशबांधव व्यवस्था करू लागले.या मूर्खपणाला आळा बसला पाहिजे, असे त्यांना वाटू लागले.म्हणून त्यांनी त्याला एल्बा बेटावर हद्दपार केले.

पण तो अकरा महिन्यांनी तेथून निसटला व स्वत: च्या वेड्या व चढाऊ लष्करशाहीने पुन्हा एकदा जगात दरारा बसवण्याची खटपट करू लागला.तथापि सुदैवाने या वेळचे त्याचे हत्याकांड अल्पायुषी ठरले.ही खुनाखुनी,ही लूटमार फार दिवस चालली नाही.पळून आल्यापासून नव्वदच दिवसांनी वॉटर्लू येथे त्याचा पराभव झाला. त्याने गलबतातून अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न केला.पण इंग्रजांनी त्याला पकडून सेंट हेलेना बेटाच्या निर्जन किनाऱ्यावर स्वतःच्या गुन्हेगार वृत्ती- भोगेच्छा व आकांक्षा

मनात खेळवीत बसायला पाठवून दिले.आयुष्याची शेवटची सात वर्षे त्याने येथे आपल्या आठवणी लिहिण्यात घालवली.या स्मृतीत त्याने स्वतःला जवळजवळ महादेव बनविले आहे. १८२१ साली तो कॅन्सरने मरण पावला व जगाला थोडासा विसावा मिळाला. फ्रेंच राज्यक्रांती करणाऱ्या पुढाऱ्यांनी एक फार मोठी चूक केली.त्यांनी तलवारीच्या जोरावर आपल्या कल्पनांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला.जगाला मुक्त करण्यासाठी त्यांनी सैन्य उभे केले.पण हेच साधन हाती घेऊन नेपोलियनने स्वतः च्याच देशाला गुलाम केले.

यशासाठी हिंसेवर विसंबून राहणाऱ्या फ्रेंच क्रांतीचा गळा शेवटी हिंसेनेच दाबला जाणे अपरिहार्य होते व ते नेपोलियनने केले.नेपोलियनने फ्रान्सची मर्यादा, तीच युरोपची मर्यादा करण्याची खटपट केली. कारण त्याला स्वत:च्या क्षुद्र दिमाखासाठी सारे युरोप रंगभूमी म्हणून हवे होते.पण सारे करून तो सेंट हेलेना बेटावर जाऊन बसला,

तेव्हा युरोपचे स्मशान झाले होते.फ्रान्स पूर्वीपेक्षा लहान झाला.नेपोलियनवर स्वतःच्या जीवन-नाटकातील शेवटचा प्रवेश उष्ण कटिबंधातील एका अज्ञात आणि निर्जन बेटावर करावा लागला.अनंत आकाश व अफाट सागर हेच तेवढे प्रेक्षक होते.


अलेक्झांडर खूप दारूची मेजवानी झोडून मेला. हॅनिबॉलने शत्रू सारखे पाठीस लागले म्हणून आत्महत्या केली.सीझरला सर्वांत मोठा विजय मिळवायचा होता.त्याच दिवशी तो मारला गेला आणि नेपोलियनला एखाद्या क्रूर,वन्य श्वापदाप्रमाणे कैद करून मरण्यासाठी दूर ठेवण्यात आले.इतिहासातील या सर्वांत मोठ्या चार सेनापतींपैकी एकाच्याही हातून जगाच्या सुखात किंवा संस्कृतीत तिळमात्रही भर पडली नाही व खुद्द त्यांनाही सुख लाभले नाही,अशा हडेलहप्पींशिवायच जगाचे नीट चालेल. 




२२/८/२३

शोध 'शून्या' च्या उगमाचा -The search for the origin of 'zero' - भाग - २

यावरून इसवी सनाच्या दहाव्या शतकात इथल्या गणितींची किती प्रगती झाली होती हे स्पष्ट होतं.ज्याअर्थी दहाव्या शतकात एवढी प्रगती होती त्याअर्थी त्या प्रगतीला त्याआधी काही शतकं तरी सुरुवात झालेली असावी असं यातून स्पष्ट होत होतं.खजुराहो इथे मिळालेले जादुई चौरस आणि वेगवेगळे आकडे म्हणजे भारतीय अंकांचे ठोस पुरावे आहेत.असेच आकडे भारतात इतरत्रही सापडतात.याबद्दल इतरांचं म्हणणं वाचून ॲक्झेल यांनी मांडलेलं मत प्रचलित विचारांशी मिळतंजुळतं आहे.

भारतात आकडे आणि एकंदरीतच गणिताचा उगम धार्मिक कृत्यांशी संबंधित आहे.वेदांमध्ये आणि वैदिक काळातील आख्यायिकांमध्ये यज्ञकुंडं,मंदिरं,यज्ञात बळी द्यायच्या पशूंची संख्या आदी गोष्टींकरता अंकांची आणि भूमितीची नक्कीच आवश्यकता होती. प्राचीन भारतीय संस्कृतीचा इतिहास अभ्यासून त्यावर संशोधन करणाऱ्या जॉन मॅक्लिश या तज्ज्ञाच्या मते- 'भारतातील आद्य संस्कृतींच्या रहिवाशांमध्येसुद्धा आकड्यांची जाण असल्याचं दिसून येतं.सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात भरभराटीस आलेल्या हडप्पाच्या संस्कृतीत

सुद्धा दशमान पद्धतीची प्राथमिक जाणीव होती.भारतीय लोक इजिप्त,बॅबिलॉन आणि मायसेनिया इथल्या लोकांपेक्षा गणनपद्धतीबाबत खूप पुढे होते.वैदिक संस्कृतीत यज्ञवेदी रचण्यासाठी जी काटेकोर अचूकता लागत होती ती आकडेमोडीची व भौमितिक प्रमेयांची माहिती असल्याशिवाय शक्यच नव्हती.' असं असलं तरी ॲक्झेल यांना लिखित पुरावा हवा होता.प्रत्यक्ष ते शून्य पाहिल्याशिवाय त्यांचं समाधान होणार नव्हतं. भारतातही ते वेगवेगळ्या राज्यांतील प्राचीन मंदिरांत आणि संग्रहालयांत फिरून आले.त्यांना सर्वांत जुनं लिखित शून्य ग्वाल्हेर इथल्या एका विष्णू मंदिरात सापडलं.हे मंदिर इ. स. ८७६ मध्ये बांधण्यात आलं होतं.पण इ. स. ८७६ मध्ये अरब व्यापारी त्या वेळच्या ज्ञात जगात सर्वत्र फिरत होते.शून्याचा शोध पूर्वेत कुठे तरी लागला आणि अरब व्यापाऱ्यांनी ते पश्चिमेकडं आणलं, तसंच ते सागरामार्गे भारतात नेलं ही शक्यता नाकारता येत नव्हती.त्याबरोबरच,अरबी गणितज्ञांनीच शून्य निर्माण केलं आणि अरब व्यापाऱ्यांनी ते पश्चिमेकडे त्याचबरोबर पूर्वेकडे नेलं,ही शक्यतासुद्धा होतीच.जोपर्यंत आधीच्या शतकांतले शून्याचे पुरावे मिळत नाहीत,तोपर्यंत हिंदूंनी शून्याचा शोध लावला,या म्हणण्याला अर्थ नाही,असं ॲक्झेल यांना वाटत होतं.सिंधू संस्कृतीत शून्य वापरलं जात असेलही;पण जोपर्यंत त्यांच्या लिपीचा उलगडा होत नाही, तोपर्यंत भारतातल्या लिखित पुराव्यावरून अरबी व्यापाऱ्यांनी शून्य पाश्चात्त्य देशांत नेलं असं म्हणायला वाव नव्हता.यानंतर अमीर ॲक्झेल भारतातून परतले खरे,पण ते असमाधानी होते.' शून्याच्या मुळाशी जाण्यात अपयशी ठरलो ' हे सत्य स्वीकारणं त्यांना जड जात होतं. हिंदू-अरब आकड्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करून जगात इतरत्र असलेल्या आणि आता कालौघात नष्ट झालेल्या इतर गणनपद्धतींबाबत विचार करावा किंवा हे सर्व सोडून दुसराच एखादा संशोधन प्रकल्प हाती घ्यावा याचा ते विचार करू लागले.

त्यांच्या पत्नीला त्यांची अस्वस्थता कळत होती. त्यामुळे इतर गणनपद्धतींचा अभ्यास करण्याच्या नव्या प्रकल्पांचा ॲक्झेलने विचार करायला हवा,असं तिलाही वाटत होतं.

अमीर यांनी या सूचनेस मान देऊन युरोपातील एटुस्कन संस्कृतीच्या गणनपद्धतीचा अभ्यास करायचं ठरवलं.ही संस्कृती इ.स.पूर्व आठव्या शतकात उदयास आली आणि इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात लयास गेली.पण त्या अभ्यासात अमीर यांचं मन रमत नव्हतं.ही बाब त्यांच्या पत्नीच्या लक्षात आलीच.दोघंही नोकरी करत असल्यामुळे आठवड्यातील एका ठराविक दिवशी दुपारी ते एकत्र येऊन जेवण घेत असत.त्या वेळी ॲक्झेल यांची पत्नी म्हणाली, "अमीर, तू परत भारतात जा आणि ग्वाल्हेरच्या शून्याबद्दल माहिती मिळवायचा प्रयत्न कर.'

अमीर कामाला लागले.बिल कॅसलमन नावाच्या एका गणितीने ग्वाल्हेरच्या शून्याचा अभ्यास करून त्याबद्दल बरीच माहिती मिळविल्याचं अमीर यांच्या लक्षात आलं. हे कॅसलमन ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनीही आकड्यांवर बरंच संशोधन केलं होतं. अमीर यांनी कॅसलमनशी दूरध्वनी - मैत्री प्रस्थापित केली.

कॅसलमननी त्यांच्याजवळच्या माहितीचा खजिनाच उघडला आणि अमीरना  नवा मार्ग दाखवला.त्यांनी सांगितलं, "जॉर्ज कोडेस या फ्रेंच पुरातत्त्ववेत्त्याने ग्वाल्हेरच्या आधीच्या काळातलं शून्य कंबोडियामध्ये पाहिल्याचं फार पूर्वीच लिहून ठेवलं होतं.तेव्हा अमीरने भारतात न जाता कंबोडियात जाऊन या शून्याबद्दल अधिक माहिती मिळवावी." लोट्झीने ॲक्झेल लहान असताना ज्या फ्रेंच पुरातत्त्ववेत्त्याबद्दल सांगितलं होतं त्याच्याबद्दलच कॅसलमन बोलत होते.ते ऐकल्यावर अमीरना बऱ्याच गोष्टी आठवल्या आणि इतके दिवस त्या विस्मरणात गेल्याबद्दल पश्चात्तापही झाला.एके ठिकाणी ते प्रांजळपणे लिहितात, 'मी असा कसा वागलो? मी कित्येक वर्ष शून्याचं मूळ शोधायचा प्रयत्न करत होतो.

माझ्या टेबलावर जॉर्ज इफ्राचं 'द युनिव्हर्सल हिस्टरी ऑफ नंबर्स' हे पुस्तक हाताशी लागेल असं ठेवलेलं होतं.


त्यात कोडेस यांच्या कार्याचे अनेक संदर्भ आहेत.लोट्झीने मला योग्य ती दिशा पूर्वीच दाखवली होती.मीच तिकडे दुर्लक्ष केलं होतं.' कोडेस ही एक वल्ली होती.तो गणिती नव्हता, तर पुरातत्ववेत्ता आणि भाषाशास्त्रज्ञ होता.मात्र, गणित अभ्यासक सोडले तर तो फारसा कुणाला ठाऊक नव्हता;तेसुद्धा गणिताचा इतिहास त्याने जगापुढे आणला म्हणून स्वतः गणितज्ञ नसताना त्याने गणिताच्या इतिहासाचं ज्ञान जगाला दिलं होतं.त्याला अनेक भाषांचं सखोल ज्ञान होतं. बारीक बारीक गोष्टींची माहिती घेऊन त्यातून तो अर्थपूर्ण निष्कर्ष काढत असे.वेगवेगळ्या घटकांचे परस्परसंबंध काय असावेत हे जाणून घेण्याची अनोखी दृष्टी त्याला प्राप्त होती. पूर्वगृहदूषित वृत्तीने निष्कर्ष काढून ते जगासमोर मांडणाऱ्या अनेक विद्वानांचं पितळ त्याने उघडं पाडलं होतं.कारण तो खरा इतिहासप्रेमी होता. ग्वाल्हेर इथल्या शून्याच्या किती तरी आधीच लिखित शून्य त्याने जगासमोर आणलं होतं. त्यामुळे आकड्यांच्या इतिहासावर नवा प्रकाश पडला होता.कोडेसचं हे काम दुसऱ्या महायुद्धापूर्वीचं होतं.

दुसऱ्या महायुद्धानंतर कंबोडियात बरीच उलथापालथ झाली होती. विसाव्या शतकाच्या उत्तराधांत 'ख्मेर रुज' नावाच्या संघटनेने कंबोडियावर ताबा मिळवला होता.

त्यांनी वीस लाख नागरिकांची खुलेआम कत्तल केली होती.अनेक पुरातन पुतळे फोडून त्यांनी त्याची खड़ी करून रस्त्यांवर भर म्हणून वापरली होती.त्यामुळे ज्या शिलालेखात सर्वांत प्राचीन लिखित शून्य कोडेस यांनी पाहिलं होतं तो शिलालेख तरी शिल्लक आता असेल का, हा प्रश्न अमीर यांना सतावत होता. मेकाँग नदीकाठी असलेल्या सांबोर नावाच्या गावी कोडेसना हा शिलालेख १९२५ च्या आसपास मिळाला होता. त्यांनी त्या दोन शिळांना के १२७ आणि के- १२८ हे क्रमांक दिले होते.


अनेक ई-मेल आणि अनेकांकडे चौकशा करून अमीर यांना अँडी ब्रोअर नावाच्या कंबोडियात स्थायिक असलेल्या माणसाचा दूरध्वनी क्रमांक मिळाला.अँडीला भेटायला अमीर ॲक्झेल नॉमपेन्हला पोहोचले.त्यांनी अँडीला शिलालेखाबद्दल सांगितलं.सध्या तो कुठे आहे हे शोधायला मदत करावी,अशी विनंतीही त्यांनी अँडीला केली.अँडी आणि अमीर दोघांनी काही जाणकार बौद्ध भिक्खूंची मदत घ्यायचं ठरवलं. त्यासाठी अमीर यांना लुआंग प्रबांग या शहरी जावं लागणार होतं.

दरम्यान,अँडीने रोटानाक यांग नावाच्या मित्राची भेट घ्या,असं अमीर यांना सुचवलं.यांगचा पुरातन वस्तूंचा अभ्यास होता. के-१२७ आणि के-१२८ हे दोन शिलालेख दुसऱ्या महायुद्धपूर्व काळात नॉमपेन्ह इथल्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात शिलालेख विभागात होते,असं यांगने अमीरना सांगितलं;पण तिथेही त्यांना एक सुंदर वस्तुसंग्रहालय बघितल्याचं समाधान मिळालं एवढंच.

त्यांच्या कामात कोणतीही प्रगती झाली नव्हती.

अमीर बँकॉकला परतले.बँकॉकमध्ये नुसतं बसून राहण्यापेक्षा अँडीने सुचवल्याप्रमाणे लाओसमध्ये जाऊन यावं,तोपर्यंत अँडी किंवा इतर कुणी जाणकार काही संदेश पाठवेल त्यावर नंतर काम करावं,असं त्यांनी ठरवलं.

त्यांनी आपल्या पत्नीला,डेब्रालाही तिथे बोलावून घेतलं.

दोघं मिळून लुआंग प्रबांगला गेले.तेथील झिआँग थाँग या पॅगोडात एका भिक्खूला अमीर यांनी प्रश्न केला, "शून्यत्व म्हणजे काय ?" या प्रश्नाला त्या भिक्खूने विस्तृत उत्तर दिलं.ते विवेचन ऐकून अमीर यांची खात्री पटली,की इतका खोलवर विचार करणाऱ्या प्राचीन लोकांनीच 'शून्य' आणि 'अनंत' अशा कल्पना केल्या असणार.

ॲक्झेल पती-पत्नी बँकॉकला परतले.तिथे रोतानाक यांगचा संदेश त्यांची वाट पाहत होता. यांगचे वडील 'अंगकोर जतन संस्थे'चे संचालक होते.त्यांना इंग्रजी येत नव्हतं.त्यांच्या संस्थेत अनेक कंबोज शिलालेख,पुतळे आणि इतर वस्तू जतन करून ठेवलेल्या होत्या.

इ.स.१९९० मध्ये ख्मेर रुजच्या गुंडांनी यातल्या बऱ्याच गोष्टी लुटल्या होत्या.त्या पैशासाठी त्यांनी परदेशात पाठवल्या होत्या किंवा तोडून तरी टाकल्या होत्या.तिथे पूर्वी के १२७ असण्याची शक्यता होती. त्यासंबंधी - अधिक माहिती फक्त शासकीय सांस्कृतिक मंत्रालयच देऊ शकत होतं. ती परवानगी मिळायला काही काळ जावा लागला.के-१२७ च्या अखेरच्या ज्ञात आश्रयस्थानाला आता भेट देणं बाकी होतं. ठरलेल्या वेळी अमीर त्या संग्रहालयात पोहोचले. संग्रहालयाचे संचालक वृद्ध होते.त्यांनी संग्रहालयाच्या दयनीय स्थितीबद्दल माफी मागितली.असंख्य तोडक्या मोडक्या पुतळ्यांचे तुकडे तिथे पडून होते.कित्येक शिलालेख भग्न अवस्थेत कसेबसे तग धरून होते.संग्रहालयात पंखे नव्हते.खूप उकडत होतं.अमीरने एक-एक शिळा तपासायला सुरुवात केली.अखेरीस घामाने डबडबलेल्या स्थितीत त्यांनी पुतळ्यांच्या मागील बाजूस ठेवलेल्या शिलालेखांची तपासणी करायचं ठरवलं. इथे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी तपासायचं ठरवलेल्या पहिल्याच शिलालेखावर के-१२७ क्रमांक होता.क्षणभर अमीर यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.एक मोठ्ठा तांबूस खडकाचा तुकडा होता तो. त्यावर ख्मेर लिपीत ६०५ हा आकडा कोरलेला होता.त्यातलं शून्य आपण पाहतो तसं गोलाकार नव्हतं.ते नुस्तंच एक टिंब होतं.मुख्य म्हणजे

तो आकडा आणि तो ज्या मजकुराचा भाग होता त्या मजकुराचं कसलंही नुकसान झालेलं नव्हतं.सर्व मजकूर आणि तो आकडा स्पष्ट दिसत होते.इतकी वर्षं शून्याचा शोध घेत फिरल्यावर आता ते सापडलं तर पुढे काय करावं.हे अमीरना सुचेना या शोधात त्यांना अनेकांची मदत झाली होती.कंबोडिय शासनातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सचिव हाब टच, स्लोन फाउंडेशन या दोघांनी तर त्यांचा भार खूपच हलका केला होता.आणि अखेरीस अमीर ॲक्झेल त्या ज्ञात आद्य शून्याजवळ उभे होते. पण इथेच त्यांच्या हातून एक चूक झाली.'मला आद्य शून्य सापडलंय' हे जगाला सांगायच्या आधी जी काळजी घ्यायला हवी ती त्यांनी घेतली नाही.


ते के-१२७ कडे भक्तिभावपूर्वक आदराने आणि विस्मयाने बघत असताना तिथे दोन इटालियन स्त्रिया आल्या.आपण जे शोधत होतो ते सापडल्याचा आनंद बोलून दाखवावा,

या हेतूने त्यांनी या महिलांना त्या शिळेबद्दल सांगितलं. त्यांच्यापैकी एकीने हातातली काठी त्या शिळेवर मारली. "हे सांगितलंत ते बरं केलंत.आम्ही अशीच एखादी शिळा शोधत होतो. पुरातत्वशास्त्राच्या विद्यार्थ्यांना पुरातन गोष्टी पूर्ववत कशा करायच्या याचं प्रशिक्षण द्यायचंय, त्यासाठी ही शिळा अगदी योग्य वाटते." अमीर त्या कल्पनेने हादरले इतका महत्त्वाचा शिलालेख शिकाऊ विद्यार्थ्यांच्या हाती पडणार,ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती.त्यांनी त्या महिलांना समजवायचा खूप प्रयत्न केला,पण व्यर्थ! शेवटी बँकॉकला परत येऊन अमीर ॲक्झेल यांनी कॅसलमनची मदत घेतली.त्या दोघांच्या बऱ्याच प्रयत्नांनंतर आणि पत्रापत्रीनंतर त्या महिलांनी 'के- १२७ ला हात लावणार नाही,'असं ई- मेलने अमीर यांना कळवलं.पुढेही अनेक प्रयत्न करून अमीर यांनी तो शिलालेख वाचवला.


एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की माणूस काय करू शकतो याचं दर्शन हे पुस्तक वाचताना होतंच,पण आकड्यांच्या इतिहासाचीही माहिती आपल्याला सहजगत्या मिळते.गणिताशी संबंध नसलेल्या व्यक्तीलाही हे पुस्तक गुंगवून टाकेल यात शंकाच नाही. 


२०.८.२३ या लेखातील शेवटचा भाग.. लेख संपला.