* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: मे 2024

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३०/५/२४

राणी : एक माकडीन Queen: A monkey

एकदा जवळच्या दुर्गा टेकडीवर तिथल्या कर्मचाऱ्यांनी तात्पुरता पिंजरा बांधून त्यात माकडाची जोडी कुठून तरी पैदा करून ठेवली होती.ती बॉनट जातीची माकडं होती.

ही माकडं महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतातील राज्यां-

मधेही आढळतात.ही मंडळी शाकाहारी असली तरी कधी कधी कोळी,कोळ्यांची जाळी आणि काही कीटकही आनंदाने गट्टम करतात.दुर्गा टेकडीवर फिरायला येणारे नागरिक या माकडांना केळी, सफरचंदं वगैरे खायला घालत.तिथले कर्मचारीही कधी कधी पपई,अंजीर अशी चविष्ट फळं आवर्जून माकडांसाठी आणत.टेकडीवर दिवसा माणसांची जाग असे,पण रात्री मात्र माकडं त्या पिंजऱ्यात एकटीच असत.


एका रात्री गावभर भटकणाऱ्या रानटी कुत्र्यांनी त्यांच्या जबड्यांनी त्या तकलादू पिंजऱ्याच्या जाळ्या तोडून टाकल्या आणि त्या निष्पाप माकडांवर हल्ला चढवला.

त्या रानटी हल्ल्यामधे नराचा जागीच मृत्यू झाला.मादीही गंभीर जखमी झाली.सकाळी निरोप मिळाल्या मिळाल्या आम्ही टेकडीवर जाऊन पोहोचलो.माकडिणीची अवस्था पाहून काळजात चर्र झालं.उजव्या हाताच्या जागी फक्त हाड शिल्लक राहिलं होतं. कुत्र्यांनी तिचा हात पिंजऱ्या

बाहेर ओढून त्याभोवतीच्या मांस आणि कातडीचा फडशा पाडला होता.खूप रक्त गेलं होतं;पण कशी कोण जाणे,ती अजूनही जिवंत होती.त्या वेळी तिथे कामावर असलेल्या आलेल्या गोरख नेवाळेने तिला हलकेच पोत्यामध्ये गुंडाळलं आणि स्कूटरवर माझ्या मागे बसला.पार्कवर आल्यावर त्या मादीला खाली झोपवून नीट तपासलं. खांद्याच्या सांध्यातून हाड मोकळं झालं. ताबडतोब औंधच्या सरकारी दवाखान्याचे प्राण्यांचे डॉक्टर सोनटक्के यांना बोलावणं पाठवलं.तेही तातडीने आले.अँटिबायोटिक्स, इंजेक्शनं,गोळ्या,ड्रेसिंग सगळं यथासांग पार पडलं.दोन दिवस तिला सलाइनवर ठेवलं.त्या वेळी आमच्याकडे नारायण शिंदे नावाचा वैदू समाजातला वॉचमन कामावर होता.त्यालाही जडी-बुटीची बऱ्यापैकी जाण होती.त्याने मावळातल्या जंगलातून शोधून आणलेल्या कुठल्या तरी औषधी झाडपाल्याचा लेप बनवून तिच्या हाताला लावला.पहिले दोन दिवस ती जगते की वाचते याची खात्री नव्हती.नेवाळे दिवसरात्र तिच्यासोबत बसून होता.


सोयरे वनचरे-अनिल खैरे-राणी : आमच्या मर्कट परिवारातली आद्य स्त्री-समकालीन प्रकाशन


पण तिसऱ्या दिवशी सकाळी ती आपणहून उठली.

नेवाळेने तिला एक केळं सोलून दिलं,ते तिने अधाशीपणे खाल्लं.आम्हाला खूपच आनंद झाला.एवढ्या जीवघेण्या हल्ल्यानंतरही ही माकडीण बचावली होती.तिच्या जीवावरचा धोका टळला होता.तीन-चार आठवड्यांत राणीच्या खांद्याची जखम पूर्णपणे भरून आली. अंगात शक्ती यायला आणखी बराच वेळ लागला.जीवघेण्या हल्ल्यानंतर एक हात कायमचा गमावूनही ती आश्चर्यकारकरीत्या पूर्ण बरी झाली.तिचं नाव आम्ही राणी ठेवलं.दुर्गा टेकडीवरच्या प्रस्तावित पण नंतर रद्द झालेल्या प्राणिसंग्रहालयासाठी तयार केलेले चार-पाच ट्रान्झिट केज,चार चाकं असलेले एखादा प्राणी मावेल असे पिंजरे आमच्याकडे पडून होते.त्यातले दोन पिंजरे जोडून आम्ही राणीसाठी पिंजरा तयार केला.त्या पिंजऱ्याच्या मागच्या बाजूला आणखी एक पिंजरा जोडून फीडिंग केज बनवला.राणी एकटीच असल्यामुळे तिचा वेळ कसा जाणार हा प्रश्न होता.त्यामुळे मोठ्या पिंजऱ्यामधे तिच्यासाठी मोटरसायकलच्या टायरचा झोका बांधला.राणीचा दिवसभराचा वेळ झोक्यावरच जात असे.सकाळ-संध्याकाळ तिला थोड्या वेळासाठी पिंजऱ्याबाहेर काढत असू.संपत पुलावळे नावाचा हुशार कर्मचारी पिंजरा झाडून स्वच्छ करण्याचं,तिच्या खाण्यापिण्याचं काम मन लावून करत असे.


पिंजऱ्यामधे एकटी-दुकटी राहणारी माकडं लवकरच कंटाळतात.त्यांना सतत एंगेज ठेवणं गरजेचं असतं.

राणीला विरंगुळा म्हणून आम्ही सुरुवातीला एक भला मोठा ओंडका पिंजऱ्यातल्या एका कोपऱ्यात उभा केला.तो ओंडका तिथे का ठेवलाय हे तिला बरोबर कळलं.तिने त्या ओंडक्यावर आपली शिल्पकला सुरू केली.दिवसभर आपल्या दातांनी ती ओंडका कुरतडत बसे.ती काय करते याची आम्हाला उत्सुकता होती.

थोड्याच दिवसांत तिने त्या ओंडक्याच्या मध्य भागात स्वतःला बसण्याजोगी खोबणी तयार केली.त्यानंतर रोज रात्री ती त्या खोबणीमधे जाऊन झोपत असे. तिच्याइतकं क्रिएटिव्ह माकड मी आजवर पाहिलेलं नाही.राणीच्या खांद्याची जखम बऱ्यापैकी भरत आली होती. 


एखादा अवयव गमावल्यानंतर माणसाला जसा फँटम लिम्बचा त्रास होतो,तसाच प्राण्यांनाही. आपला एक हात आता नाही,हे विसरायला होऊन त्या हाताचा उपयोग करायला गेलं की अपघात होतो.याला म्हणतात फँटम लिम्ब.राणीलाही सुरुवातीला त्याचा त्रास झाला.एकदा संध्याकाळी संपतने पिंजऱ्याची साफसफाई करण्यासाठी राणीला बाहेर काढलं आणि एका फांदीवर ठेवलं. फांदीवरून उतरून ती माझ्या जवळ येऊ लागली.पण लक्षात न येऊन तिने फांदी धरायला आपल्या नसलेल्या हाताचा,म्हणजे फँटम लिम्बचा आधार घेतला आणि तिचा साफ तोल गेला.माझं तिच्याकडे लक्ष असल्याने मी तिला वरच्यावर झेललं म्हणून बरं.आणखी एक-दोन वेळा राणी फँटम लिम्बमुळे गडबडली;पण तीन-चार महिन्यांच्या उपचारांनंतर तिचा फँटम लिम्ब सिंड्रोम पूर्णपणे बरा झाला.तीन पायांवर उड्या मारण्यात ती चांगलीच पटाईत झाली.


राणी महाउद्योगी होती.अधूनमधून एखाद्या संध्याकाळी आम्ही तिला पिंजऱ्याबाहेर काढत असू.आमच्यापैकी कोणाच्या तरी खांद्यावर बसून ती पार्कचा फेरफटका करायची.एकदा माझ्या खांद्यावर बसून तिची सैर चालू होती.सहज चाळा म्हणून माझ्या शर्टाच्या खिशाला लावलेलं पेन तिने काढून घेतलं.अमेरिकेच्या प्रसिद्ध क्रॉस कंपनीचं लाइफटाइम गॅरंटी असलेलं ते महागडं पेन होतं.माझ्या मेव्हण्याने मला वाढदिवसानिमित्त भेट दिलेलं.राणीने पेन घेतल्या घेतल्या माझे सहकारी एकदम सावध झाले.तिच्या हातातून पेन काढून घेण्यासाठी ते सरसावलेले बघून मी मोठ्या घमेंडीत त्यांना म्हटलं,

"अरे,हे क्रॉस कंपनीचं पेन आहे.त्यात कसलाही बिघाड होत नाही.काही काळजी करू नका." माझं वाक्य संपायच्या आतच कटकन पेन तुटल्याचा आवाज आला.लाइफटाइम गॅरंटीवाल्या क्रॉस पेनचं मुंडकं राणीने तिच्या दातांनी एका झटक्यात तोडलं होत.सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली.ते लाइफटाइम गॅरंटीवालं तुटकं पेन आजही आमच्या जुन्या सामानात चिरनिद्रा घेत आहे.तीन पायांची राणी हा आमच्या पार्कमधला पहिला सस्तन प्राणी होता. 


आमचं पहिलं माकडही तीच होती.त्यामुळे आम्हा पार्कवरच्या मंडळींची आणि पार्कला भेट द्यायला येणाऱ्या बालगोपाळांची ती अतिशय लाडकी होती.मी रोज सकाळी पार्कच्या मेन गेटवर दूध आणि पेपर आणण्यासाठी जायचो, तेव्हा राणीसाठी घरून काही तरी खाऊ नेत असे.तिला खायला द्यायचं,तिच्याशी गप्पा मारायच्या आणि घरी परतायचं हा राणी आल्यापासूनचा माझा दिनक्रम ठरून गेला होता. राणीही माझी वाट बघत असायची.पण एके दिवशी मात्र भलतंच घडलं.त्या दिवशी मी राणीसाठी शेंगा घेतल्या होत्या.खिशातल्या शेंगा तिच्या हातात दिल्या.त्यातल्या बऱ्याच खाली पडल्या.काही पिंजऱ्याच्या आत,तर काही पिंजऱ्याबाहेर.

पिंजऱ्याबाहेरच्या शेंगा तिला देण्यासाठी मी खाली वाकून गोळा करू लागलो आणि अचानक एक प्रचंड वेदनेची कळ डोक्यामधून अंगभर पसरली.डोळ्यांपुढे अंधारी आली;पण काही क्षणातच मी स्वतःला सावरलं. घाबरून राणीकडे पाहिलं आणि अक्षरशः गर्भगळितच झालो.

माझ्या डोक्यावरच्या दाट कुरळ्या केसांचा पुंजका तिच्या हातात होता. दूध- पेपर वगैरे सोडून मी थेट घर गाठलं. आरशात पाहिलं तर माझ्या डोक्यावरचा केसांचा एक गोल पॅच गायब झाला होता.दाट कुरळ्या केसांमध्ये छोटं गोल टक्कल पडलं होतं.पण नशिबाने तिची नखं माझ्या टाळूला लागली नव्हती.वेदना होत होत्या त्या केस उपटले गेल्यामुळे.पण त्या अवस्थेतही माझं ते विनोदी रूप बघून प्रतिभा आणि तेजसबरोबर मलाही हसू आवरत नव्हतं.

त्या दिवशी माझ्या टकलाची सुरुवात झाली ती झालीच.


पण राणीने त्या दिवशी असं का केलं? खरं तर ते कोडंच आहे.आपण फक्त अंदाज बांधू शकतो. खरं काय ते फक्त राणीलाच माहीत.पण माझ्या मते मी वाकलेलो असताना दिसणारे माझे कुरळे केस पाहून तिला त्यांच्याशी खेळण्याची इच्छा झाली असणार.शेंगा उचलाव्यात त्या सहजतेने ती माझे केस हाताने पकडायला गेली आणि झालं भलतंच.त्याआधी तिने कधीही पार्कमध्ये कुणाला इजा केली नव्हती आणि त्यानंतरही कधी केली नाही.दोन अडीच वर्षं राणी आमच्या पार्कवर मजेत राहिली.पुढे सेंट्रल झू ॲथॉरिटीने अपंग प्राण्यांना प्रदर्शनार्थ ठेवण्यास बंदी केल्यावर आम्ही तिला कात्रजच्या वन्यप्राणी अनाथालयात हलवलं.तिथेही ती खूप वर्ष समाधानाने राहिली.राणीच्या संगतीचं गारुड आमच्या सर्वांच्या मनावर कायम राहिलं. त्यामुळेच आमच्याकडे त्यानंतर आलेल्या आणखी एका माकडिणीचं नाव आम्ही 'राणी'च ठेवलं. 



२८/५/२४

एका बोकडाचा बळी Victim of a buck

मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी इबॉटसन पौरीवरून परत आला व दुसऱ्याच दिवशी सकाळी आम्ही ब्रेकफास्ट घेत असताना आम्हाला काही माणसं सांगत आली की रुद्रप्रयागपासून वायव्येला (जिथे आम्ही जिनट्रॅपमध्ये त्या बिबळ्याला मारलं होते.त्या ठिकाणापासून १ मैलांच्या अंतरावर) एका बिबळ्याचे कॉल्स सातत्याने ऐकायला येतायत.या गावाच्या उत्तरेला अर्धा मैल अंतरावर एका मोठ्या पहाडाच्या कडेचा बराच प्रदेश ओबडधोबड जमीनीचा होता आणि तिथे खूप गुहा आणि शिळा होत्या.

त्याचबरोबर तिथे पूर्वीच्या लोकांनी खणलेल्या तांब्याच्या खाणीमुळे तयार झालेले मोठाले खड्डे होते आणि इथे सर्वत्र झुडुपी जंगल माजलं होतं.काही ठिकाणी विरळ तर काही ठिकाणी एकदम दाट ! हे जंगल गावाच्या बाहेर डोंगर उतारावरच्या शेतीपर्यंत पसरलं होतं.


माझा फार दिवसांपासून कयास होता की जेव्हा म्हणून हा बिबळ्या रुद्रप्रयागच्या आसपास असतो तेव्हा तो या भागाचा लपण्यासाठी वापर करत असावा.त्यामुळे मी ह्या भागात जरा उंचशा जागा बघून बऱ्याच वेळा फेरफटका मारला होता की जिथून तो ऊन खात असताना मला दिसेल.ही बिबळ्यांची शिकार करण्याची नेहमीची पद्धत आहे कारण ही त्यांची आवडती सवय आहे; फक्त थोडा संयम व अचूक नेमम असला तरी पुरेसं ठरतं.जेवण लवकरच उरकून मी आणि इबॉटसन आमच्या ०.२७५ रायफली घेऊन आणि एका माणसाच्या हातात छोटासा दोर देऊन निघालो.गावातच आम्ही एक बोकड खरेदी केला (माझे आतापर्यंत खरेदी केलेले सर्व बोकड ह्या बिबळ्याने मारले होते.)


शेळ्यांची एक वाट गावापासून निघून सरळ डोंगरावरून जात त्या ओबडधोबड भागात शिरत होती.तिथून ती डावीकडे वळत होती व डोंगराच्या कडेकडेने १०० यार्ड जात नंतर डोंगराच्याच अंगाने वळत पलीकडे जात होती. इथे ह्या पायवाटेच्या वरच्या बाजूला झुडपी जंगल तर खालच्या बाजूला गवताळ भाग होता. पायवाटेवरच्या वळणावरच पण पायवाटेपासून दहा वार्ड खाली आम्ही एक मजबूत खुंट ठोकून बोकड बांधून टाकला. ह्यानंतर आम्ही शंभर-दीडशे यार्ड खाली उतरलो व तिथे असलेल्या मोठमोठ्या खडकांमागे आमची जागा घेतली.कॉल देण्याच्या दृष्टीने हा बोकड आतापर्यंतच्या सर्व बोकडांमध्ये सर्वात चांगला होता,जोपर्यंत तो कॉल देत होता तोपर्यंत आम्हाला डोळ्यात तेल घालून झुडुपांच्या दिशेला बघण्याची गरजच नव्हती.कारण आम्ही त्याला नीट बांधल्यामुळे त्या बिबळ्याने त्याला उचलून लांब घेऊन जाण्याची शक्यताच नव्हती.


आम्ही आमच्या जागा त्या खडकांमागे घेतल्या तेव्हा सूर्याचा लालभडक गोळा केदारनाथच्या वरच्या हिमाच्छादित शिखरांपासून हातभर वर होता.साधारण अर्ध्या तासानंतर,आम्ही काही काळ सावलीत आलो असताना तो बोकड अचानक ओरडायचा थांबला.थोडं बाजूला सरकून गवताच्या आडून मी बघितलं तेव्हा मला दिसलं की कान ताठ करून तो एका झुडुपाच्या दिशेने बघतोय.त्याने जोरजोरात डोकं हलवलं आणि त्याला बांधलेला दोर पूर्ण ताणला जाईपर्यंत मागे सरकला.


बोकडाच्या ओरडण्यामुळे आकर्षित होऊन बिबळ्या तिथे आला होता हे निश्चित आणि ज्याअर्थी बोकडाला कळण्याच्या आत त्याने झडप मारली नव्हती,त्या अर्थी त्याला काहीतरी संशय आला होता.टेलिस्कोपिक साईट्स मुळे इबॉटसनचा नेम माझ्यापेक्षा अचूक असणार होता.त्यामुळे मी त्याला जागा करून दिली.रायफल खांद्याला लावून तो जेव्हा पालथा पडला तेव्हा मी त्याला हळू आवाजात सांगितलं की तो बोकड ज्या झुडुपाकडे बघतोय त्या झुडुपाचं नीट निरीक्षण कर. बोकडाला बिबळ्या दिसत होता त्या अर्थी इवॉटसनलाही तो दिसायला हवा होता.


मिनिटभर टेलिस्कोपला डोळे लावून बघितल्यानंतर त्याने नकारार्थी डोकं हलवून रायफल खाली ठेवली आणि मला जागा करून दिली.मघाशी ज्या स्थितीत तो बोकड होता तसाच अजूनही होता.त्याच्याकडून झुडपाच्या दिशेचा अंदाज घेऊन मीही काही मिनिटं तिथे नजर केंद्रित केली पण मलाही काहीच दिसू शकलं नाही.दुर्बीण बाजूला केल्यानंतर मला जाणवलं की अंधार जलद पडतोय आणि बोकडही आता पुसटसा दिसायला लागलाय. आम्हाला तर बरंच दूर जायचं होतं.आता आणखी काही वेळ थांबणं उपयोगाचं तर नव्हतंच पण धोकादायकही होतं.त्यामुळे चटकन उठून मी इबॉटसनला सांगितलं की आता निघायला हवं.ओरडण्याचं थांबल्यावर त्या बोकडाने या क्षणापर्यंत तोंडातून एकही आवाज काढला नव्हता.आता आम्ही त्याचा दोर सोडला आणि तो एका माणसाकडे देऊन व त्याला पुढे ठेवून आम्ही गावाच्या दिशेला लागलो.त्या बोकडाच्या गळ्याभोवती याआधी कधी दोर बांधला गेला नसावा.आता त्याने हिसडे द्यायला सुरुवात केली.माझा आतापर्यंतचा अनुभव असा होता की एखाद्या बोकडाला अशा प्रकारे जंगलात बांधल्यावर जेव्हा सोडलं जातं तेव्हा तो भीतीमुळे म्हणा किंवा सोबतीची गरज असल्यामुळे म्हणा गळ्यात दोरी नसताना सुद्धा तो एखाद्या इमानी कुत्र्याप्रमाणे आपल्या मागे येतो,त्यामुळे मी त्या माणसाला बोकडाला मोकळं सोडायला सांगितलं.

पण या बोकडाच्या काही निराळ्याच कल्पना असाव्यात कारण दोरी काढली गेल्याबरोबर तो वळला व पायवाटेवरून पळायला लागला.हा बोकड कॉल देण्याच्या बाबतीत खूपच चांगला होता आणि त्याला जपणं महत्त्वाचं होतं.त्याने एकदा बिबळ्याला आकर्षित केलं होतं व पुन्हा करण्याची शक्यता होती.त्यात परत आम्ही आताच त्याच्यासाठी चांगले पैसेही मोजले होते त्यामुळे आम्हीही त्याचा पाठलाग सुरू केला.वळणावर तो डावीकडे पळत गेला आणि दिसेनासा झाला. त्याच्याच मार्गाने आम्ही डोंगराच्या कडेकडेने जात पाठलाग चालू ठेवला.तरीही बोकड न दिसल्याने आम्हाला वाटलं की त्याने गावात जायला जवळचा रस्ता पकडला असेल.

त्यामुळे आम्ही माघार घेतली.मी सर्वात पुढे होतो. आम्ही त्या वाटेवरून शंभर यार्ड गेलो असू तेवढ्यात वाटेवर काहीतरी पांढुरकी आकृती दिसली. 


उजेड अगदी कमी होता.त्यामुळे आम्ही सावधपणे जवळ गेलो तेव्हा आम्हाला दिसलं की तोच बोकड आहे.त्याचे पाय आणि डोकं वाटेवरच राहील अशा स्थितीत तो पडला होता आणि फक्त याच अवस्थेत तो खाली गडगडत जाऊ शकत नव्हता.त्याच्या गळ्यातून रक्त ठिबकत होतं आणि जेव्हा मी त्याच्या शरीरावर हात ठेवला तेव्हा त्याचे स्नायू अजूनही आचके देत होते.दुसऱ्या कोणत्याही बिबळ्याने बोकड मारून अशा पद्धतीने पायवाटेवर टाकून दिला नसता.जणू काही हा बिबळ्या आम्हाला चिडवत होता,

'बघा तुम्हाला तुमचा बोकड पाहिजे ना? घ्या..... आणि आता अंधार पडलाय,तुम्हाला खूप अंतर कापायचंय,तेव्हा तुमच्यापैकी कोण गावापर्यंत जिवंत जातोय तेच बघू!'


सुदैवाने माझ्याकडे आगपेटी होती,जर ती नसती तर मला नाही वाटत की आम्ही तिघेच्या तिघे गावापर्यंत सुखरूप पोचलो असतो.एक काडी ओढायची,

आजूबाजूला घाबरी नजर टाकायची आणि पटापट चारपाच पावलं टाकायची अशा प्रकारे ठेचकाळत,

धडपडत आम्ही शेवटी गावापासून हाकेच्या अंतरावर पोचलो.आमच्या हाकेसरशी हातात कंदील व पाईनच्या मशाली घेऊन माणसं आम्हाला घ्यायला आली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला तो तसाच आढळला पण आमचा पाठलाग करतानाचे नरभक्षकाचे माग मात्र मला मिळाले!


१४.०४.२४ या लेखमालेतील पुढील भाग…


वाचन नसलेली पिढी म्हणजे आशा नसलेली पिढी


(भारतीय अभियंत्याच्या पत्राचा उतारा)


"शांघायला जाणाऱ्या फ्लाइटवर,झोपेच्या वेळी, केबिनचे दिवे बंद होते;मी लोकांना iPads वापरून जागे करताना पाहिले,मुख्यतः आशियाई;ते सर्व गेम खेळत होते किंवा चित्रपट पहात होते.खरंतर मी तो पॅटर्न पहिल्यापासून पाहिला.जेव्हा मी फ्रँकफर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर होतो तेव्हा माझ्या लक्षात आले की बहुतेक जर्मन प्रवासी शांतपणे वाचत होते किंवा काम करत होते,तर बहुतेक आशियाई प्रवासी खरेदी करत होते आणि किंमतींची तुलना करत हसत होते.आजकाल अनेक आशियाई लोकांना बसून पुस्तके वाचण्याचा धीर नाही. 

एकदा,एक फ्रेंच मित्र आणि मी एका रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होतो आणि या मित्राने मला विचारले: "सर्व आशियाई चॅट किंवा इंटरनेट का सर्फ करतात,परंतु कोणीही पुस्तके का वाचत नाही?".


मी आजूबाजूला पाहिले,आणि खरंच ते होते. 

लोक फोनवर बोलतात,मजकूर संदेश वाचतात, सोशल मीडियावर सर्फ करतात किंवा गेम खेळतात.

ते मोठ्याने बोलण्यात किंवा सक्रिय असल्याचे ढोंग करण्यात व्यस्त आहेत;गहाळ असलेली एकमेव गोष्ट म्हणजे शांतता आणि विश्रांतीची भावना. ते नेहमी अधीर आणि चिडखोर, रागावलेले आणि तक्रार करणारे असतात...


प्रसारमाध्यमांच्या मते,चीनमध्ये सरासरी व्यक्ती प्रतिवर्षी केवळ ०.७ पुस्तके,व्हिएतनाममध्ये ०.८ पुस्तके,भारतात १.२ पुस्तके आणि कोरियामध्ये प्रतिवर्षी पुस्तके वाचतात. केवळ जपान पाश्चात्य देशांशी तुलना करू शकतो ज्यात प्रति व्यक्ती प्रति वर्ष ४० पुस्तके आहेत; एकट्या रशियामध्ये प्रति व्यक्ती प्रति वर्ष ५५ पुस्तके आहेत.२०१५ मध्ये,४४.६% जर्मन लोक आठवड्यातून किमान एक पुस्तक वाचतात – नॉर्डिक देशांसाठी समान संख्या.आकडेवारी दर्शवते की वाचन नापसंत होण्याची तीन मुख्य कारणे आहेत.


-एक म्हणजे लोकांची खालची संस्कृती (शिक्षण नव्हे).त्यामुळे लोक नेहमी भेटल्यावर खूप बोलतात आणि कंटाळा न येता दिवसभर गप्पा मारतात.ते नेहमी इतर लोकांच्या कथांबद्दल उत्सुक असतात,सतत सामाजिक नेटवर्क अद्यतनित करतात आणि संप्रेषणाच्या महत्त्वपूर्ण गरजा असतात.


दुसरे म्हणजे,त्यांना लहानपणापासून वाचनाची चांगली सवय लावली जात नाही.त्यांच्या पालकांना पुस्तके वाचण्याची सवय नसल्याने तरुणांना त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या संगोपनात तसे वातावरण मिळत नाही. लक्षात ठेवा, मुलाचे व्यक्तिमत्त्व प्रामुख्याने कुटुंबाद्वारे घडवले जाते.


तिसरे म्हणजे 'परीक्षाभिमुख शिक्षण',त्यामुळे लहान मुलांना बाहेरची पुस्तके वाचायला वेळ आणि ऊर्जा मिळत नाही.बहुतेक ते पुस्तके देखील वाचतात,म्हणून ते परीक्षांसाठी असतात.जुन्या अभ्यासपद्धतीच्या वातावरणामुळे अभ्यासाची सवय लागणे,पदवी मिळवणे आणि नंतर वाचन करणे बंद झाले.


इस्त्राईल आणि हंगेरी हे जगातील सर्वाधिक वाचले जाणारे दोन देश आहेत.इस्रायलमधील सरासरी व्यक्ती वर्षाला ६४ पुस्तके वाचते. मुलांना समजायला लागल्यापासून,जवळजवळ प्रत्येक आई आपल्या मुलांना शिकवते:"पुस्तके हे शहाणपणाचे भांडार आहेत,जे पैसे,खजिना आणि शहाणपणापेक्षा अधिक मौल्यवान आहेत जे कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.


हंगेरीमध्ये सुमारे २०,००० लायब्ररी आहेत.आणि ५००​​ लोकांमागे सरासरी एक लायब्ररी आहे; लायब्ररीत जाणे हे कॉफी शॉप किंवा सुपरमार्केटमध्ये जाण्याइतकेच चांगले आहे.हंगेरी हा जगातील सर्वात लक्षणीय पुस्तके वाचणारा देश आहे,ज्यात दरवर्षी दशलक्ष लोक नियमितपणे वाचतात,देशाच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त.ज्यू हे एकमेव लोक आहेत जे निरक्षर नाहीत; 

भिकाऱ्यांकडेही नेहमी पुस्तक असते. त्यांच्या दृष्टीने पुस्तके वाचणे हा लोकांचा न्यायनिवाडा करण्याचा उत्कृष्ट गुण आहे.जे लोक वाचतात त्यांची विचार करण्याची पद्धत खूप वेगळी असते आणि त्यांच्याकडे चमकदार कामगिरी नसली तरी त्यांची मानसिकता खूप चांगली असते.पुस्तकांचा केवळ व्यक्तीवर परिणाम होत नाही;त्याचा समाजावर परिणाम होतो.ज्ञान ही शक्ती आहे आणि ज्ञान ही संपत्ती आहे. जो देश किंवा व्यक्ती पुस्तके वाचणे आणि ज्ञान संपादन करणे याला महत्त्व देतो तो नेता असेल.


एक महान विद्वान एकदा म्हणाले: "एखाद्या व्यक्तीच्या विचारांच्या विकासाचा इतिहास हा त्याचा वाचन इतिहास आहे.किती लोक पुस्तके वाचतात आणि कोणत्या प्रकारची पुस्तके निवडतात हे ठरवते की समाजाचा विकास होईल की मागे राहील."


लक्षात ठेवा: वाचनाशिवाय शर्यत ही आशा नसलेली शर्यत आहे.



२६/५/२४

वेध कुर्दी स्त्रीजीवनाचा Vedha Kurdish women's life

डोंगर चढताना हॅन्सनचा पाय निसटला.त्या गडगडत काही अंतर खाली गेल्या त्यांच्या खांद्याला,जबड्याला दुखापत झाली;दातांतून रक्त येऊ लागलं.त्यावेळी त्या मायलेकींनी ज्या पद्धतीने त्यांची काळजी घेतली आणि त्यांना फार गंभीर इजा न झाल्याबद्दल अल्लाचे आभार मानले त्याने हॅन्सन भारावल्या.त्या दोघी काय बोलत होत्या हे कळायला हॅन्सनकडे मार्ग नव्हता,पण त्यांच्या हालचालींवरून त्यांनी बहुधा परमेश्वराचे आभार मानले असावेत असा अंदाज त्यांनी बांधला.'माझी कुर्दी भाषेची जाण प्राथमिक गरजांपुरती मर्यादित होती.अमूर्त भावनांचं ज्ञान मला होणं शक्य नव्हतं',असं त्या या प्रसंगाबद्दल लिहिताना म्हणतात.पुढे दुभाषीची मदत मिळाल्यावर त्यांना कुर्दाच्या चालीरीती आणि धार्मिक समजुतींची माहिती हळूहळू होत गेली.


यानंतर काही दिवसांतच त्या खेड्यात आणखी एक लग्न होतं.आता हॅन्सन या शेखच्या कुटुंबाचा एक भाग बनल्या होत्या.त्या वेळी तिथल्या शहरी भागात एक नवी फॅशन आली होती.स्त्रियांच्या अंगरख्यासाठी अतिशय तलम आणि पारदर्शक कापड वापरलं जायला लागलं होतं.

त्यातला एक धागा कुठल्या तरी धातूच्या अतिशय पातळ जरीचा असे.उन्हात ही जर तापून चटके बसत,तरीसुद्धा आपला श्रीमंती तोरा मिरवण्यासाठी वराकडच्या स्त्रियांनी या जरीचे कपडे परिधान केले होते.हॅन्सन वरपक्षाकडल्या असल्यामुळे त्यांनाही हाच वेष घालणं भाग पडलं होतं.

याउलट खेड्यातल्या बाकीच्या स्त्रियांचे कपडे साधेच होते.त्या खेडूत स्त्रिया शेतात काम करणाऱ्या,शेळ्या राखणाऱ्या होत्या.त्या स्त्रिया शेळ्या आणि गाढवांना घेऊन सकाळीच डोंगरात जायला निघत.द्राक्षबागांची निगराणी करणं,शेतातील तण उपटणं,शेळ्यांची देखरेख करणं,दूध काढणं,तसंच सरपण गोळा करून ते गाढवांच्या पाठीवर लादणं अशी कामं करून त्यांची त्वचा चांगलीच रापलेली असे. शेखच्या घरच्या स्त्रियांना अशा प्रकारची कामं करण्याची सवयच नव्हती.त्या क्वचितच घराबाहेर पडत असल्यामुळे त्यांचा गोरा रंग या गर्दीत उठून दिसत होता.शेखच्या घरातल्या स्त्रियांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अंगावरचे सोन्याचे दागिने.


एकदा हॅन्सनचा मुक्काम असलेल्या घरातल्या एका तरुणाला लग्न करायचं होतं.त्यासाठी तो बरेच दिवस पैसे साठवत होता.त्याने ५०० पौंड होतील एवढी रक्कम साठवली.चांगली बायको मिळवायची तर एवढी रक्कम हवीच.(ही १९५७ ची रक्कम आहे.) तेव्हा त्याने घरातल्या कर्त्या स्त्रीजवळ त्याची लग्नाची इच्छा व्यक्त केली. त्याच्या आयांपैकी एका आईजवळ आणि एका बहिणीजवळ


त्याला मुलगी कशी हवी याबद्दल तो बोलला. त्याच्या वडिलांचा बारदाना खूप मोठा होता. त्यात एक स्त्री कशीही सामावून गेली असती. उलट,मदतीला नवे हात आले असते.त्या मुलाची सख्खी मोठी बहीण आणि त्याच्या वडिलांची सर्वांत धाकटी बायको यांनी या बाबतीत लक्ष घालायचं ठरवलं होतं.खरं तर त्याची आई ही सर्वांत पहिली पत्नी होती,पण ती गावठी समजली जात होती.लग्न जुळवणं तिच्या कुवती

पलीकडचं काम आहे,असं सर्वांचं मत पडलं.त्या बहिणीने एक मुलगी बघून ठेवली होती.पण बहीण आणि सावत्र आई थेट त्या मुलीच्या घरी जाऊन बोलणी सुरू करू शकत नव्हत्या,याचं कारण त्या वयाने लहान होत्या.

हॅन्सननी जाऊन उपयोग नव्हता.त्यांना ते लोक 'आपल्यातली' मानत नव्हते.मग त्यांच्या ओळखीच्या एका प्रौढ स्त्रीवर ही जबाबदारी टाकण्यात आली.ती स्त्री,घरातल्या या दोघी आणि हॅन्सन अशा चौघीजणी लग्न ठरवायला निघाल्या.त्या प्रौढ स्त्रीच्या अंगावर सोन्याचे दागिने अंगभर घातलेले होते.साधारणपणे बोलण्याच्या दोन-तीन फेऱ्या झाल्या. 


मुलीकडची बाजू ऐकीव माहितीवर दर वेळेस नवी खुसपटं काढायची.मुलीची किंमत वाढवायची ही युक्ती होती.शिवाय मुलीसाठी इतर मुलांकडूनही चौकश्या होत आहेत,हेही मुलाच्या बाजूच्या कानावर पडेल ही व्यवस्था केलेली होती.अशा बैठका तासन्तास चालत.शिवाय त्या प्रत्येक बैठकीत चार-सहा आठवड्यांचं अंतर असे.

अखेरीस मुलीच्या आईने ही बाब नवऱ्याच्या कानावर घालण्याचं कबूल केलं. लग्नाच्या बोलण्यामध्ये पुरुषांची परवानगी म्हणजे केवळ औपचारिकताच ! यानंतर मग मुलीला किती दागिने मिळणार,एकूण खर्च किती होणार वगैरे आर्थिक बाबींची चर्चा सुरू झाली. अजूनही हॅन्सननी ती भावी वधू बघितलेली नव्हती.ही आर्थिक बोलणी झाल्यावर मुलगा बघण्याचा कार्यक्रम ठरला.

त्याच्या फोटोचा विषयही निघाला नव्हता.कुर्दघरांमधून माणसांचे फोटो नसतात.माणसांचे फोटो असणं हे इस्लामला मान्य नाही,असं हॅन्सनना सांगण्यात आलं.स्थानिक माणसं, त्यांची संस्कृती,चालीरिती समजावून घ्यायच्या तर लग्नसमारंभासारखा दुसरा हुकुमी प्रसंग नाही.हॅन्सननी नोंदवलेल्या बारीकसारीक निरिक्षणांतून याचाच प्रत्यय येतो.


या पुस्तकात हॅन्सन कुर्दी घरांचं,तसंच त्यांना वापरासाठी दिलेल्या खोल्यांचंही सविस्तर वर्णन करतात.त्यांचं घर डोंगर उतारावरल्या एका शेतात होतं.एक बैठकीची मोठी खोली आणि तिच्या दोन बाजूंना दोन छोट्या खोल्या,असं त्याचं रूप होतं.वाळवंटी भागात घरांना खिडक्या नसतात,तशा त्या या घराला देखील नव्हत्या. घराला व्हरांडा होता.मागच्या बाजूला खोल्यांना भिंत नव्हती.तिथे मोकळं अंगण आणि त्यानंतर संरक्षक भिंत होती.या बंदिस्न अंगणातल्या कोंबड्या आणि शेळ्या घरभरही फिरू शकत. घराच्या छत्तासाठी दोन तुळयांवर मातीच्या सपाट विटा रचण्यात आल्या होत्या.या विटा छोट्याछोट्या फांद्यांवर चटया पसरून त्यावर ठेवण्यात आल्या होत्या.

तुळयांच्या आधाराने भांडिक पक्ष्यांची चिखलाचे गोळे लिंपून तयार केलेली घरटी होती.जमीन मातीची होती.

तिच्यावर सिमेंटचा पातळ थर होता.फार गरम होऊ नये म्हणून या जमिनीवर दिवसभर पाणी मारलं जायचं.


बैठकीच्या खोलीत दोन भिंतींना टेकून ठेवलेले दोन सोफे होते.त्यांचे हात खूप रुंद होते.त्यावर चहाचे कप ठेवता येत असत.बाजूच्या दोन खोल्यांमध्ये गालिचे आणि तक्तपोशी होत्या.त्यावर बसण्यासाठी सोय होती.मागच्या अंगणात एक कॉट होती.भिंतींवर कावेत बुडवून उठवलेले हाताच्या पंज्याचे ठसे होते.त्यातल्या एका खोलीला लागून अंधारात हमामखाना होता. त्याला तर खिडकी असणं शक्यच नव्हते.


दुसरी खोली कोठीची खोली होती.त्या खोलीत शेतीची अवजारं होती.मजूर सकाळी ती घेऊन जात.संध्याकाळी परत आणून ठेवत.दुपारी इथेच ते जेवण करून विश्रांती घेत.मागच्या अंगणातच एक आडोसा होता.तिथे स्वयंपाक व्हायचा. इथल्या व्हरांड्यात कधी कधी पाळणा टांगला जायचा.त्यात घरातलं मूल पडून राहत असे. येणारी जाणारी व्यक्ती त्या पाळण्याला झोका देऊन जायची.


कुर्दी घरांचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही दोन भिंती एकमेकींशी काटकोन करत नाहीतच,पण कुठल्याही दोन खोल्यांच्या जमिनी एका पातळीवर नसतात.त्यामुळे त्यांची छतंही पायऱ्या पायऱ्यांची असतात.याचं कारण ही घरं जमीन नैसर्गिकरीत्या जशी असेल तशीच ठेवून त्या जमिनीवर भिंती उभ्या करून बांधलेली असतात.फर्निचर ठेवण्यापुरतीच जमीन सपाट करण्यात येते.शेतात झाडांच्या फांद्यांनी शाकारलेल्या काही झोपड्या होत्या.

त्या दोन भक्कम ओंडक्यांच्या आधारावर उभ्या होत्या. सूर्य डोक्यावर आला की शेतमजूर या आडोशाला विश्रांती घेत.या झोपड्यांना भिंती नव्हत्या,तर चटया आणि जुनी जाजमं लटकवून आडोसा तयार करण्यात आला होता.

इथेच दुपारचं जेवणही व्हायचं. 'काळा वारा', म्हणजे वाळूचं वादळ आलं,की सर्व गावावर धुळीची चादर पसरली जायची.सगळं जग त्या धुळीसारखंच पिवळं व्हायचं.फाटकं आणि खिडक्या खिळखिळ्या व्हायच्या.

इथल्या घरांना फार खिडक्या का नसतात ते अशा वेळी लक्षात यायचं.


खेडूत कुर्दी स्त्रिया बुरखा आणि आभा म्हणजे शरीर झाकणारा काळा वेष घालत नाहीत. शहरात मात्र तो पेहराव सक्तीचा असतो.कुर्द एकूणच अशिक्षित असतात.

खेडेगावात सुशिक्षित व्यक्ती सापडणं अवघडच.शहरात साक्षरतेचं प्रमाण थोडं अधिक असतं.स्त्रिया अपवादानेच शिकतात.इतर मुस्लिम समाजांप्रमाणेच कुर्दी स्त्रियांना घरात आणि घराबाहेर दुय्यम वागणूक मिळते.घरकामाचा सर्व भार स्त्रियांनाच उचलावा लागतो.हॅन्सन राहत होत्या त्या घरात कामाचा सर्व बोजा सतरा वर्षांची सर्वांत धाकटी मुलगी,अज्जा आणि बारा वर्षांची नोकराणी यांच्यावर होता. अज्जाला घरातले पुरुष जेवत असताना त्यांच्या सेवेसाठी तिथे उपस्थित राहावं लागत असे. ताटावर माश्या बसू नयेत याची काळजी घेणं हे तिचं प्रमुख काम.ज्यांचं जेवण होईल त्यांच्या हातावर पाणी घालायचं;नंतर ती सर्व खरकटी भांडी घेऊन जवळच्या झऱ्याकाठी जायचं आणि तिथे ती घासून,धुऊन,वाळवून परत घरात आणायची हे कामही या मुलीच करत.अंगण झाडणं हे अज्जाचं आणखी एक काम होतं.हॅन्सन पाहुण्या होत्या.त्यांची सर्व सेवाही त्यांनी नको म्हटलं तरी या दोन मुलीच करत असत. एक दिवस त्यांनी त्या मुलींशी बोलताना सहजच त्यांचे हात हातात घेतले.तर त्या दोघींच्या हातांना काम करून घट्टे पडलेले असल्याचं त्यांना दिसलं.


घराच्या मागच्या अंगणामध्ये चटयांचा आडोसा करून न्हाणीघर तयार केलेलं होतं.तिथे अंघोळ करणं हॅन्सनना योग्य वाटत नव्हतं.त्या त्यांच्या खोलीतच दोन घमेल्यांमध्ये पाणी घेऊन ओल्या पंचाने अंग पुसून काढत असत.पण यासाठी त्या स्वतः पाणी आणू लागल्या,तर अज्जा धावत येऊन त्यांच्या हातातून मडकं हिसकावून घेई. मग ती आणि तिची मदतनीस त्यांच्या खोलीत पाणी भरून ठेवत असत.वाळवंटी प्रदेशातल्या विविध प्रथाही हॅन्सनना बघायला मिळाल्या.त्याबद्दलही त्यांनी अगदी बारकाईने निरीक्षणं नोंदवली आहेत.कुर्दामध्ये कुणीही व्यक्ती जखमी झाली असेल किंवा बेशुद्ध पडली असेल तर तिला इतरांच्या आधाराने चालवतच हकिमाकडे किंवा दवाखान्यात नेलं जातं.सर्वच वाळवंटी प्रदेशात उष्माघाताचा अनेकांना त्रास होतो.हॅन्सननी अशा दोन प्रसंगी त्या व्यक्तींना असं चालवत वैद्यकीय उपचाराला नेलं जातं हे बघितलं.दैनंदिन कुर्दी जीवनातले असे विविध प्रसंग हॅन्सननी पुस्तकात विस्तृतपणे मांडलेले आहेत.


त्या रोगात कोरोनातले संदर्भ देऊन स्त्रियांच्या दुय्यम स्थानाची चर्चा केली आहे.या पुस्तकात कुठलीही सनसनाटी घटना नाही हे खरे;पण सहा देशात पसरलेल्या आणि तरीही आपली संस्कृती आणि भाषा जपणाऱ्या,ती नष्ट होऊ नये म्हणून जिवापाड प्रयत्न करणाऱ्या एका जमातीबद्दल खात्रीशीर माहिती देणारा हा एकमेव ग्रंथ आहे.ज्या वेळी 'डॉटर्स ऑफ अल्लाह' हा ग्रंथ लिहिला गेला तेव्हा कुर्दांपुढे काय वाढून ठेवलंय याची हॅन्सननाच काय पण इतर कुणालाही कल्पना नव्हती.कुर्द जमात सहा-सात देशांत पसरलेली आहे.कुर्द अशिक्षित असण्यातच या देशांचा फायदा आहे.(त्याला अर्थातच इतर काही काही भूराजकीय कारणंही आहेत.) कुर्द शिकले तर स्वातंत्र्याची चळवळ उभी करतील आणि वेगळा कुर्दिस्तान होणं या देशांना परवडणारं नाही. कारण कुर्दिस्तान भूभागात तेल आहे.त्यामुळे इतर अनेक वेळी एकमेकांशी न पटणारे हे देश कुर्दाना दडपण्यात मात्र एकमेकांना मदत करतात.कुर्द सुन्नी मुस्लिम आहेत.इराण आणि उत्तर इराक वगळता इतर देशांमध्येही सुन्नी मुस्लिमांची संख्या जास्त आहे;पण तरीही कुर्दावरच्या दडपशाहीत सर्वजण एकत्र आहेत. अमेरिकेने कुर्दाचा आधी रशियाविरोधात,मग खोमेनीच्या इराणविरोधात आणि नंतर सद्दामविरोधात वापर करून घेतला.नंतर कुर्दाना वाऱ्यावर सोडलं.या पार्श्वभूमीवर हॅन्सन यांच्या अभ्यासाचं महत्त्व आणखीनच वाढतं.१९६० मध्ये इराकमध्ये बाथ पक्षाची सत्ता आली. त्यानंतर काही काळातच सद्दाम हुसेनच्या हाती सत्ता गेली आणि कुर्दाचं पद्धतशीर शिरकाण सुरू झालं.त्यामुळे त्यानंतरही कुर्दी स्त्रियांचा कधीच कुणी अभ्यास करू शकलं नाही. कुर्दामध्ये निरक्षरतेचं प्रमाण भरपूर असल्याने कुणी कुर्द उठून आपल्या जमातीवर लिहील हे अवघडच.त्यामुळे कुर्दी स्त्रीजीवनाचं जगाला दर्शन घडवणारं एकमेव अभ्यासपूर्ण पुस्तक म्हणून मानवशास्त्रीय अभ्यासात या ग्रंथाची दखल घ्यावी लागते.'डॉटर्स ऑफ अल्लाह' हे त्यामुळेच एक महत्त्वाचं पुस्तक ठरतं.


२४.०५.२४ या लेखातील अंतिम भाग…

२४/५/२४

कुर्दी स्त्रीजीवनाचा वेध / Kurdish women's life

एका पुरातत्त्व संशोधन मोहिमेसाठी हेनी हॅन्सन हराकी कुर्दिस्तानात पोहोचल्या.तिथल्या लोकजीवनाशी एकरूप होऊन त्यांनी आजवर जगाला न दिसलेला कुर्दी समाज आणि त्यांची संस्कृती वाचकांसमोर आणली.त्यांच्या या चाकोरीपल्याडच्या अभ्यासपूर्ण भटकंतीतून साकारलेलं 'डॉटर्स ऑफ अल्लाह' हे पुस्तक आज मानवशास्त्राच्या दृष्टीकोनातून महत्वाचं मानलं जातं.


कुर्दिस्तान हा इराक,इराण,तुर्कस्तान आणि सिरीया या देशांमध्ये विभागला गेलेला कुर्दी वंशाच्या लोकांचा प्रदेश.

देशापेक्षाही आपल्या वंशाची अस्मिता बाळगणारे कुर्दी हे धर्माने सुन्नी मुस्लिम आहेत.पण अनेक वर्षं आसपासच्या इतर मुस्लिम समाजाशी त्यांचा फार कमी संबंध होता.

किंबहुना विसाव्या शतकातल्या साठच्या दशकापर्यंत बाहेरच्या समाजालाही कुर्दीबद्दल फार कमी माहिती होती.प्रत्यक्ष कुर्दी गावांमध्ये राहून या लोकांचं जगणं समजून घेण्याचं आणि ते जगासमोर मांडण्याचं श्रेय जातं ते हेन्त्री हॅरॉल्ड हॅन्सन या डॅनिश पुरातत्वज्ञ बाईंना.कुर्दी लोकजीवन समजून घेण्यासाठी इराकी कुर्दिस्तानात मुक्काम ठोकून त्यांनी केलेलं काम हे एखादा झंगड माणूसच करू जाणे! त्यांच्या या मुक्कामातल्या अनुभवांतून 'डॉटर्स ऑफ अल्लाह' हे पुस्तक साकारलं.


त्याचं झालं असं की इराकमधल्या 'छोट्या झाब' नदीवर १९५७ मध्ये डोकान धरण बांधायचं ठरलं.या धरणामुळे इराकमधल्या अनेक पुरातत्त्वीय महत्त्वाच्या स्थानांना जलसमाधी मिळणार होती.त्याचबरोबर कुर्दी लोकांची बरीच खेडीही पाण्याखाली जाणार होती.त्यामुळे धरण बांधून पूर्ण होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय पुरातत्वीय ठेवा जतन करण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास करणं गरजेचं होतं.तसंच आजवर जगाला अज्ञात असणाऱ्या कुर्दी लोकजीवनाचं दस्तावेजीकरण करणंही आवश्यक होतं.हे काम डेन्मार्कच्या राष्ट्रीय संग्रहालयातील तज्ज्ञांवर सोपवण्यात आलं.त्या मोहिमेत या राष्ट्रीय संग्रहालयातील वांशिक अभ्यासक (एथ्नोग्राफर) हेत्री हॅन्सन यांचाही समावेश होता.(अज्ञात कुर्दी स्त्रीजीवनाचा वेध - हेन्नी हॅन्सन,हटके भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन)


हेन्नी हॅन्सन ज्या मोहिमेच्या सदस्य होत्या त्या मोहिमेला कार्ल्सवर्ग प्रतिष्ठानचा भक्कम आर्थिक पाठिंबा होता.

हॅन्सन ऐन मे महिन्यात बगदाद आणि किर्कुकमार्गे डोकान धरणाच्या परिसरात पोहोचल्या.डोकान धरण उत्तर इराकी कुर्दिस्तानात आहे. '४५ पूर्व रेखांश आणि ३६ उत्तर अक्षांशावर हा भाग नकाशात पाहावयास मिळतो,' असं पुस्तकात त्या सुरुवातीलाच सांगतात.पुढच्या काही पानांमध्ये आपल्याला त्या भागाचे नकाशेही बघायला मिळतात.सुरुवातीला हॅन्सन यांनी त्या पुरातत्त्वीय मोहिमेच्या मुख्य ठाण्यावर मोहिमेच्या इतर सदस्यांबरोबर राहावं असं ठरलं होतं.हा मुक्काम 'तेल शमशारा' इथे होता. (तेलचा तिथल्या भाषेतील अर्थ उंचवटा) हॅन्सननी तेल शमशारा इथे राहून पुरातत्त्वीय उत्खननात भाग घ्यावा आणि जमल्यास अधूनमधून जवळपासच्या कुर्दी खेड्यांमधून स्त्रियांशी संपर्क साधून लोक संस्कृतीचा अभ्यास करावा,अशी कामाची पूर्वनियोजित रूपरेखा ठरली होती.हॅन्सन यांना कुर्दी लोकसंस्कृतीचं असं दुरून दर्शन घेणं मान्य नव्हतं.त्यांनी ठरवलं,आपण एखाद्या कुर्दी खेड्यातल्या घरातच मुक्काम ठोकायचा.


तसं बघायला गेलं तर हे पाऊल भलतंच धाडसाचं होतं.कुर्दी लोक एखाद्या एकट्या स्त्रीला पाहुणी म्हणून स्वीकारतील का,त्यांना हवी ती माहिती देतील का,हा प्रश्नच होता.पण हॅन्सन यांनी ते धाडस दाखवलं.त्यानुसार टोपझावा नावाच्या खेड्यातल्या शेखकडे,म्हणजे ग्रामप्रमुखाकडे त्यांनी स्वतःची राहण्याची सोय करून घेतली.या खेड्यातले काही गावकरी डोकान धरणाच्या बांधकामावर मजूर म्हणून काम करत होते.स्थानिक लोकांसमवेत राहण्याची सोय तर झाली होती,पण प्रश्न भाषेचा होता.तिथल्या लोकांना कुर्दीशिवाय दुसऱ्या भाषेचा गंध नव्हता,तर हॅन्सनना फक्त डॅनिश आणि थोडंफार इंग्रजी येत होतं तेवढंच.पण बरीच शोधाशोध केल्यावर त्यांना जवळच्याच शहरात इंग्रजी शिकवणारी एक दुभाषी मुलगी मिळाली.तिचं नाव मलिहा करीम सैद. पुढे हॅन्सन मलिहाच्याच घरी राहू लागल्या.त्यामुळे कुर्दी महिला आणि कुर्दीचे सांस्कृतिक व्यवहार यांचा त्यांना अगदी जवळून अनुभव घेता आला.मलिहाचे अनेक नातेवाईक आसपासच्या खेड्यांमध्येच राहत असल्यामुळे अनेक गावांमध्ये त्यांना फिरता आलं.थोडक्यात, पुरातत्वज्ञांसोबत राहून जमेल तसा लोक संस्कृतीचा अभ्यास करण्याऐवजी आता हॅन्सन त्या गावात स्थानिकांबरोबर राहून मजुरांबरोबर धरणाजवळच्या तळावर जाऊन पुरातत्त्वीय काम करू लागल्या.


'टोप'झावाबरोबरच राकावाह,सुलेमानैया आणि मिर्झा रुस्तम या गावांमध्येोले हॅन्सन यांनी वास्तव्य केलं.यातलं मिर्झा रुस्तम हे झाब नदीच्या काठी असलेले गाव.तिथे नदी ओलांडण्यासाठी 'तर' होती.शिवाय बस सेवाही होती.त्यामुळे हॅन्सननी मिर्झा रुस्तम इथे सर्वाधिक मुक्काम केला.या तरीतूनच त्या डोकान धरणाजवळच्या तळाजवळ जायच्या. बसने त्या शडाला,तसंच चार्मबान पर्वतराजी ओलांडून सर्गालूसारख्या गावीही जाऊन आल्या. त्यांनी इराणच्या सीमेलगत असलेल्या हलाबया, बल्ख आणि तवेला या डोंगरी वस्त्यांची,तसंच इराकच्या उत्तर सीमेवरील सर्कान,अर्बिल, मोसुल आणि रोवांदुझ या गावांचीही पाहणी केली.(सध्या इसिसच्या संदर्भात यातल्या बऱ्याच गावांची नावं ऐकायला मिळतात.)


कुर्दी लोकजीवन,विशेषतः तिथल्या स्त्रियांचं जगणं उलगडून दाखवण्यापूर्वी हॅन्सन आपल्याला कुर्दाचा इतिहास सांगतात.हा इतिहास सततच्या झगड्यांचाच आहे.एकीकडे ग्रीस,रोम आणि दुसरीकडे मेसोपोटेमिया,

पर्शिया ही साम्राज्यं.त्यांच्यामध्ये वसलेल्या कुर्द जमातीला आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्याकरिता लढाऊ बाणा अंगीकारणं क्रमप्राप्तच होतं. इ. स. पू. ४०० च्या सुमारास झेनोफोन आणि त्याचे दहा हजार ग्रीक योद्धे बॅबिलॉनला गेले होते.तिथे एका पर्शियन राजाने त्यांना बोलावून घेतलं होतं.त्यांची बोलणी संपवून परतताना त्यांना 'कार्दुशी'शी लढावं लागलं.हाच आजच्या कुर्द वसाहतींचा प्रदेश.आजही या भूभागात ही हकीकत लोककथेत अमर झाली आहे.या भूभागावर वेळोवेळी वेगवेगळ्या साम्राज्यांची नाममात्र सत्ता असली, तरी अगदी काल-परवापर्यंत कुर्दावर खऱ्या अर्थाने कुणीच राज्य करू शकलं नव्हतं, पर्शियन,अरब,नंतर पुन्हा पर्शियन,मग मंगोल्स, त्यानंतर तुर्की साम्राज्याचा एक भूभाग म्हणून कुर्दिस्तानची ओळख होती.पहिल्या महायुद्धानंतर तुर्कस्तान,सीरिया,इराक,इराण, सोव्हिएत संघराज्य या देशांत कुर्दिस्तान विभागलं गेलं.कुर्दामध्ये दोन प्रकार आहेत. काही कुर्दी टोळ्या भटक्या असून त्या ऋतुमानाप्रमाणे स्थलांतर करतात,तर हॅन्सन ज्या कुर्दामध्ये वावरल्या ते कुर्द स्थिरावलेले होते. शेती आणि पशुपालन हा त्यांच्या उपजीविकेचा प्रमुख स्त्रोत होता.जमीन-पाण्याच्या उपलब्धतेनुसार ते गहू,तांदूळ,

तंबाखू,कापूस आणि फळांचं उत्पादन करत होते.

त्याचबरोबर शेळ्या,मेंढ्या आणि कुक्कुटपालन हे जोडधंदे त्यांनी अंगीकारले होते.किर्कुक आणि सुलेमानैया या शहरांतला व्यापारबहुतांशी कुर्दाच्या हाती होता.

याशिवाय इराक पेट्रोलियम या कंपनीच्या तेलविहिरींवर ते काम करत असत.पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात स्वतंत्र कुर्दिस्तानच्या स्थापनेचा पाश्चात्त्यांनी काही काळ विचार केला होता;पण तो प्रत्यक्षात येऊ शकला नाही.

तेव्हापासून कुर्द विरुद्ध अरब,इराणी आणि तुर्की हा लढा आजही चालू आहे.कुर्द हे जरी सुन्नी मुस्लिम असले तरी त्यांची अरबांशी कधीच जवळीक नव्हती.ते स्वतःला इराकी किंवा तुर्की किंवा उझबेकी समजत नाहीत,तर त्यांची कुर्द ही ओळख त्यांच्या अभिमानाची बाब आहे.इराकी कुर्दी इराकमधल्या सत्ताधाऱ्यांशीही फटकून वागत आले होते.इंडो-युरोपी भाषागटातील त्यांची भाषा फार्सी (पर्शियन) भाषेशी संलग्न आहे.


सेमाइट म्हणजे पश्चिम आशियाई वाळवंटी जमातींच्या भाषागटातली अरबी भाषा ही कुर्दी भाषेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.कुर्दाची ही पार्श्वभूमी स्पष्ट केल्यावर हॅन्सन आपल्याला प्रत्यक्ष कुर्दाच्या वस्तीत घेऊन जातात आणि त्यांच्या मुक्कामांतल्या प्रसंगांमधून कुर्दी स्त्रीजीवन वाचकांसमोर उलगडतात.इराकी-कुर्दी लोकसंस्कृतीचा अभ्यास हा जरी हॅन्सन यांचा इराकमध्ये येण्यामागचा मुख्य उद्देश असला,तरी त्या स्त्री असल्यामुळे त्यांना कुर्दिश स्वयंपाक घरात सहज प्रवेश मिळू शकेल,ही सुप्त अपेक्षा त्यांच्या निवडीमागे असावी.कारण तोपर्यंत कुर्दिश स्त्रियांच्या सामाजिक स्थानाचा आणि त्यांचा जीवनाचा कुणीच अभ्यास केलेला नव्हता.या पुस्तकामार्फत हॅन्सन यांनी ती अपेक्षा शंभर टक्के पूर्ण केली आहे असं म्हणता येईल.इराकी कुर्दीस्तानात दाखल होईपर्यंत हॅन्सन यांचं संपूर्ण आयुष्य डेन्मार्कमध्ये व्यतीत झालं होतं. हा देश उत्तर युरोपातला.उत्तर धृवावरून येणारं गार वारं इथलं तापमान कधीच फारसं वाढू देत नाहीत.वर्षातले सहा महिने बर्फाच्छादित असणाऱ्या या देशातून हॅन्सन जगातल्या एका अतिशय उष्ण अशा वाळवंटी देशात पोहोचल्या होत्या.खरं तर इराकचा उत्तर भूभाग वाळवंटी नव्हे,तर सपाट गवताळ भूप्रदेशाचा एक भाग आहे.फक्त तिथे गवताऐवजी खुरटी काटेरी झुडुपं पसरलेली आहेत.

इथे जमीन खूप तापल्यामुळे हवेचे कमी दाबाचे पट्टे तयार होतात.त्यात धूळ वर उचलली जाते;ती काही उंचीवर पोहोचली की हवेची उद्धरणशक्ती कमी होते;त्यानंतर काही मीटर ते काही किलोमीटर एवढा प्रवास केल्यावर ही धूळ खाली बसते.धूळ आणि अतिउष्णता यामुळे या भागात दुपारी मोटारीने प्रवास करत नाहीत.मोटारीचे धातूचे भाग तापतात.त्यांना स्पर्श केला तर हात भाजून निघतो.गाडीत भट्टीसारखं वातावरण असतं. काचा उघड्या ठेवल्या तर वाऱ्याबरोबर फिरणारी धूळ गाडीत शिरते.कपड्यांत आणि केसांत शिरलेली धूळ नंतर काढून टाकणं हा एक उद्योगच होऊन बसतो.


हॅन्सनना याची कल्पना नव्हती.पहिल्या दिवशी त्या डोकान धरणाकडे जायला निघाल्या त्या मोटारीनेच.त्या ऊष्ण प्रवासाचा अनुभव घेतल्यावर त्या जाग्यावर पोहोचल्या तेव्हा त्यांना कळलं की दुपारी धरणाचं कामही बंद असतं । तापलेल्या अवजारांना स्पर्श करणंही शक्य नसल्यामुळे दुपारी सक्तीची सुट्टी घ्यावी लागते.


हॅन्सन यांना कुर्दी लोकांच्या घरांमध्ये राहण्याची सवय करून घेण्यासाठीही प्रयास पडले.डोंगरी भागातील कुर्दी घरं ही डोंगर उतारावर एकावर एक अशी वसलेली असतात.खालच्या घराचा वरचा मजला त्यावरच्या घराच्या तळमजल्याच्या पातळीवर असतो.घरं मातीचीच असतात. त्यांच्या छतांना उतार असतो.जमिनी त्यातल्या त्यात सपाट केलेल्या असतात.कुंभाराने चिखल रचून घरं केली तर ती कशी दिसतील तशी ही घरं असतात.फक्त त्यांच्या निर्मितीत चाक वापरलेलं नसतं.तिथल्याच मातीचा चिखल करून तो उन्हात वाळवून केलेल्या विटांची ही बैठी घरं सुबक वाटली तरी त्यांच्या छतावर जाण्यासाठी केलेल्या जिन्यांना जिने आणि त्यांच्या पायऱ्यांना पायऱ्या का म्हणायचं,असा प्रश्न हॅन्सनना पडत असे.कुर्दी स्त्रिया सवयीने या जिन्यांवरून झटपट चढून जात,पण हॅन्सनना ते जिने चढताना खूप कसरत करावी लागत असे.हॅन्सनना दुभाषी मिळाली आणि त्यांच्या महिलांसोबतच्या संवादात थोडी सुलभता आली. ही दुभाषी,मलिहा मुस्लिम असल्याने तिला एकटीने हिंडण्याची परवानगी नव्हती.ती आली तेव्हा तिच्याबरोबर दोन पुरुष होते.एक तिचा छोटा भाऊ.तो बारा-तेरा वर्षांचा म्हणजे कुर्दाच्या दृष्टीने पुरुषच होता.दुसरा तिच्या बहिणीचा नवरा.मलिहा कशी कुठे राहणार,तिचं नक्की काम काय आणि इतर पुरुषांशी तिचा संबंध येण्याची शक्यता नाही ना,हे तपासून बघायला आला होता.पुढे तिचा भाऊ सतत तिच्याबरोबर असे.कुर्दिस्तानमधल्या वास्तव्यात हॅन्सननी अनेक लग्नं जवळून बघितली.हे विवाह समारंभ त्यांना कुर्दी लोकसंस्कृतीबद्दल बरंच काही शिकवून गेले.अगदी सुरुवातीच्या काळातच त्यांना एका विवाह समारंभाचं आमंत्रण मिळालं.त्या वेळेला अजून दुभाषीची सोय व्हायची होती. त्या पुढे ज्या कुटुंबात राहिल्या त्याच कुटुंबात हे लग्न होतं.वधू जवळच्याच एका खेड्यातली होती.तिला आणायच्या काफिल्यात सामील होशील का,असं हॅन्सनना विचारलं गेलं. 


इराकमध्ये तेव्हा रस्ते कमी,पण मोटारी भरपूर अशी परिस्थिती होती.पेट्रोल अतिशय स्वस्त होतं.त्यामुळे वधूला आणायला जाणारा मोटारींचा ताफा खूप मोठा होता.त्या ताफ्यात सर्व गावच सामील झालं होतं.

मोटारींच्या टपांवरसुद्धा वऱ्हाड्यांची गर्दी होती.हॅन्सनना एक गोष्ट त्या वेळी लक्षात आली - वधूला आणण्याच्या ताफ्यात स्त्रियांना स्थान नसतं. त्यामुळे मग त्यांनी वधूच्या आगमनाची तयारी करणाऱ्या स्त्रियांमध्ये सामील व्हायचं ठरवलं.गावाच्या सीमेबाहेर मोटारीतून उतरवलेल्या वधूला एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसवण्यात आलं.ती बुरख्यात होती.ती घोड्यावर स्वार होताच संगीत सुरू झालं आणि हळूहळू त्या संगीताचा आवाज वाढू लागला.सर्वच लग्नांमध्ये हेच संगीत वाजतं,असं पुढे हॅन्सनच्या लक्षात आलं. या संगीताचा शेवट बहुधा कुणी तरी उत्साही तरुण हवेत गोळी झाडून करायचा.कधी एका गोळीत हा उत्साह आवरला जात असे,तर कधी बंदुकांच्या अनेक फैरी झडत असत.या समारंभात फक्त पुरुष उत्साहाने नाचत असत. स्त्रिया घरांच्या छतांवर बसून हे सर्व बघत असत. तिथेच त्यांचं जेवणही होई.छतावर चढणं-उतरणं ही कसरत रिकाम्या पिंपाच्या आधाराने करावी लागत असे.नवरी मुलगी घरात एका अंधाऱ्या खोलीत पूर्ण लांबीचा झगा घालून बसलेली असे. या खोलीला एक चौकोनी बिनगजांची खिडकी असे.या चौकोनाच्या कडा वर्तुळाकृती बनवायचा प्रयत्न झाल्याचं लक्षात येई.वधूच्या झग्यावर जरतारी नक्षीकाम असे.या वधूचं आधी एक लग्न झालं होतं.ते का रद्द झालं त्याबद्दल कुणी काही बोलत नव्हतं.ती आता २६ वर्षांची होती,

म्हणजे कुर्दी पद्धतीनुसार तिच्या लग्नाला खूपच उशीर झाला होता.तरीही तिच्यासाठी वराला भरपूर किंमत मोजावी लागली होती.हे लग्न झालं आणि काही दिवसांतच हॅन्सन या खेड्यातल्या शेखच्या घरी राहायला आल्या. पहिले पंधरा दिवस त्यांच्यासोबत दुभाषी नव्हती.'त्या काळात घरातल्या यजमानणीबरोबर मी कसा काय संवाद साधला याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं.ना तिला माझी भाषा येत होती, ना मला तिची;पण आमचं काहीच अडलं नाही. खुणांची भाषा आणि सातत्याने वापरावे लागणारे शब्द आम्ही एकमेकींना सांगत होतो. त्या थोडं डॅनिश शिकल्या आणि मी कुर्दी भाषेचे प्राथमिक धडे घेतले.पण तिच्याशी आणि तिच्या मुलीशीही माझी चांगली गट्टी जमली होती.' असं हॅन्सन सांगतात.


एक दिवस या तिघी डोंगर उतारावर असलेल्या द्राक्षांच्या मळ्यात गेल्या.


शिल्लक राहिलेला भाग पुढील २६.०५.२४ या लेखामध्ये…