* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: ओक अजस्र भेदरट / oak eternal tree

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१२/२/२५

ओक अजस्र भेदरट / oak eternal tree

मी ज्या जंगलाची व्यवस्था सांभाळतो त्यातून हिंडताना मला काही धोक्यात सापडलेले ओक वृक्ष दिसतात. काही वेळा ते खरंच खूप त्रासात असतात.त्यांच्या पायाकडच्या भागात शोषण करणाऱ्या पानाच्या तुऱ्यांची वाढ चालू झाली की ओक वृक्षाची मृत्यूशी झुंज चालू झाली असे समजावे.यातून ओक बिथरलेला, घाबरलेला असल्याचे दिसते.झाडांच्या बुंध्याला जमिनीच्या बाजूकडे पाने फुटे लागतात.हे पानांचे झुबके बुंध्याला चहूबाजूंनी घेरून उगवतात.पण जास्त काळ ती टिकू शकत नाही,लवकरच गळून पडतात.कारण तिथे सूर्यप्रकाश पोचत नाही.त्यांना फक्त लख्ख प्रकाशात प्रकाशसंश्लेषण करता येते.त्यामुळे या अंधारात वाढणाऱ्या पानांना सूर्यप्रकाश मिळत नाही आणि लवकरच ती गळून जातात.एखादं सशक्त झाड अशा प्रकारची बुंध्याशी वाढ करण्यात शक्ती वाया घालवत नाही.आपली उंची वाढवण्यात त्याला अधिक रस असतो.झाडाला शांतता मिळाली की त्याची उंची वाढत राहते.पण मध्य युरोपीय जंगलातून ओक वृक्षांना तशी शांतता नसते.कारण या इथे बीच वृक्षांचे राज्य चालते.स्वजातीयांबरोबर बीच मनमिळावू असतात,पण ओक सारख्या इतर प्रजातींना ते छळून कमकुवत करतात.


जो पक्षी बीचचे बीज मातीत पुरून ठेवतो आणि तिथून त्या बीच वृक्षांची अरेरावी सुरू होते.त्या पक्ष्याला भरपूर खाद्य मिळत असल्यामुळे काही बिया तो पुरून ठेवतो. काही काळानंतर ती बी रुजते आणि बीचचे रोपटे जमिनीतून वर डोकावते.काही दशकं ते शांतपणे वाढत राहते,तोपर्यंत त्याची जाणीव होत नाही.त्या रोपट्याची आई कुठेतरी दूरवर असते पण ओक वृक्ष त्याला निरागसपणे सावली आणि सुरक्षा पुरवीत असतो. जमिनीवर सलोख्याचे संबंध असलेले भासते मात्र बीच आणि ओक वृक्षात जमिनीखाली जगण्याची झटापट चालू होते.


ओकची मुळे नसतील तिथे सगळीकडे बीच आपली मुळे पसरवत राहते.त्यातून अन्न आणि पाणीपुरवठा स्वतः कडे खेचून घेतला जातो आणि यामुळे ओक वृक्ष कमकुवत व्हायला लागतो.साधारण दीडशे वर्षांत त्या बीचची उंची ओकहून जास्त होते.आता त्याला सूर्यप्रकाश थेट मिळू लागतो आणि जोमाने वाढ होण्याची शक्ती येते.आपल्या डौलदार पसाऱ्याचा उपयोग करून घेत ९७ टक्के सूर्यप्रकाश तो स्वतःकडे खेचून घेतो आणि ओक वृक्ष दुय्यम दर्जाचा होऊन जातो.त्याचे साखर उत्पादन एकदम कमी होऊ लागते, बचत केलेली ऊर्जा वापरावी लागते आणि हळूहळू ओक अन्नापासून वंचित राहतो.


आता त्याला लक्षात येते की आपल्याला बीचहून उंच वाढता येणार नाही.या भीतीपोटी ओककडून एक चूक होते.ती म्हणजे तो आता नियमाविरुद्ध जाऊन आपल्या पायाशी नवीन फुटवे आणि पाने उगवू लागतो. ही पालवी मोठी आणि मऊ असते व त्याला कमी सूर्यप्रकाश चालून जातो.पण ३ टक्के सूर्यप्रकाश फारच कमी पडतो,कारण तो ओक वृक्ष आहे,बीच नव्हे.आणि काही काळातच ही पालवी झडून जाते व त्यांना तयार करण्याची शक्ती वाया जाते.अशा उपासमारीच्या स्थितीत ओक अजून काही दशकं तग धरू शकतो पण त्यानंतर मात्र त्याची ताकद संपते.आता लाकडात भोक पाडणारे कीटक (वुड बोरिंग बीटल) त्याची सुटका करून देण्यास सरसावतील.हे बीटल आपली अंडी ओकच्या सालात घालतात आणि त्यातून निघणाऱ्या अळ्या झाडाची त्वचा फस्त करण्यास सुरुवात करतात.


तर मग हा खरंच एक अजस्र ओक आहे का एक अगडबंब भित्रा आहे? इतकं दुर्बळ झाड अविचल आणि दीर्घायू असल्याचं कसं भासतं? बीचच्या वृक्षांमध्ये ओक कितीही दुर्बल दिसत असला तरी स्पर्धक नसले की मात्र तो एकदम राकट असतो.आपल्या स्वजातीयांच्या कुशीत उगवलेला बीच फार फार तर दोनशे वर्षे जगतो. पण शेताच्या कडेला उघड्यावर उगवणारा ओक वृक्ष मात्र पाचशेच्या वर वर्ष जगू शकतो.ओक वृक्षाला जर विजेचा धक्का बसून मोठी जखम झाली किंवा त्याचं खोड दुभंगलेलं असेल तर काय होते?


ओकला याचा फार त्रास होत नाही कारण त्यात टॅनिन नावाचे रसायन तयार होते ज्यामुळे जखमेत बुरशीला पोषक वातावरण नसतं आणि बुरशीची विघटन प्रक्रिया संथ होऊन जाते.या टॅनिनमुळे अनेक कीटकही परावृत्त होतात आणि याच टॅनिनमुळे वाइनची चवही खुलते (ओकच्या लाकडापासून बनवलेल्या पिपात वाईन मुरायला ठेवली जाते). जरी मुख्य फांद्या तुटल्या आणि झाडाला खोल जखमा असल्या तरी ओक वृक्ष पुन्हा आपली पालवी पुनरुज्जीवित करू शकतात


आणि अजून एखादं शतकभर तरी तग धरतात.बहुतांश बीच वृक्ष असे करू शकणार नाहीत आणि स्वतःच्या जंगलाच्या बाहेर तर नक्कीच नाही.वादळाने झोडपलेलं कमकुवत झालेलं बीच झाड फार-फार तर एखाद दोन दशकं जगते.मी काम करतो त्या जंगलातील ओक वृक्ष आपण खूप कणखर आहोत असे मिरवितात.तिथे दक्षिणेकडे तोंड केलेल्या एका उबदार उतारावरच्या दगडांना घट्ट पकडून ठेवणारे काही ओक वृक्ष आहेत.उन्हाळ्याचा तीव्र सूर्यप्रकाश त्यावरील सर्व आर्द्रता सुकवून टाकतो आणि थंडीत बोचऱ्या बर्फाने दगड झाकले जातात.त्यामुळे तिथे दगडफूल 'लायकेन' ही वनस्पती अतिशय तुरळक उगवलेली दिसतात आणि पण तिच्यामुळे तापमान नियंत्रित होऊ शकत नाही. याचा परिणाम म्हणजे एका शतकानंतरही त्या उतारावरच्या छोट्या छोट्या झाडांची वाढ जेमतेम आपल्या मनगटाएवढी होते आणि उंची पंधरा फुटापेक्षाही कमी वाढते.त्यांचे स्वजातीय ओक इतरत्र अनुकूल वातावरणात जोमात वाढून कमीत कमी शंभर फूट उंची गाठतात,पण इथल्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांना झुडपांइतक्या उंचीवर समाधान मानावे लागते. पण ते जगतात,काटकसरीने तग धरून राहतात.अशा अस्तित्वाचा मोठा फायदा म्हणजे इतर स्पर्धक टिकत नाहीत.तर असंच म्हणावं लागेल की अभावाच्या जगण्यातही काही फायदा नक्कीच असतो.


बलाढ्य ओक का अजस्त्र भेदरट द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न,अनुवाद - गुरुदास नूलकर,

अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन


ओक वृक्षाचे जाड साल हे बीचच्या गुळगुळीत पातळ सालापेक्षा अधिक घाव सहन करू शकते.यावरून जर्मनमध्ये एक म्हण आहे 'जर रानडुकराला ओक वृक्षाच्या खोडावर आपली पाठ घासावी वाटली तर भल्या थोरल्या ओक वृक्षाला काहीच चिंता नसते, त्याला काहीच इजा होणार नाही.


महत्वाची नोंद…


अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ निअरली एव्हरीथिंग,बिल ब्रायसन,अनुवाद-प्रसन्न पेठे,मंजुल पब्लिकेशन


आपलं अस्तित्वच नव्हतं तिथपासून ते आज आपण येथे असेपर्यंतचा सारा प्रवास..


अणू म्हणजे खरं तर प्रचंड मोठे मोकळे अवकाश आहे आणि आसपास जी एक घनता किंवा दरवाजा दिसतो ते खरं म्हणजे मायाच आहे! जेव्हा खऱ्याखुऱ्या सत्यतेच्या जगात दोन वस्तू जवळ येतात (बऱ्याचदा या उदाहरणासाठी बिलीयर्डचे चेंडू वापरले जातात.) ज्या एकमेकांवर आपटत नाहीत. उलट टिमथी फेरीसने समजावून दिल्यानुसार 'उलट ऋणभाराने भारीत असलेली त्यांची क्षेत्रं एकमेकाला एकमेकांपासून दूर ढकलतात! जर त्यांच्यात कुठलाच धन वा ऋण भार नसता, विद्युतक्षेत्र नसतं, तर त्यांनी एकमेकांवर न आदळता उलट दोन आकाशगंगांप्रमाणे एक दुसऱ्यातून आरपार पलीकडे प्रवेश केला असता. ओरखडा न उमटता !' जेव्हा तुम्ही खुर्चीत बसता,तेव्हा तुम्ही खरं तर त्यात बसलेले नसता, तर त्या खुर्चीपासून वर एक अँगस्ट्रॉम (एका सेंटिमीटरचा एक दशलक्ष शंभरावा भाग) इतक्या उंचीवर तरंगत असता! कारण तुमच्यातले इलेक्ट्रॉन्स आणि खुर्चीतले इलेक्ट्रॉन्स एकमेकांना अगदी दृढनिश्चयाने विरोध करत असतात!


स्टीफन हॉकिंग्ज यांनी निरीक्षण नोंदवल्या

नुसार (तेही काहीशा उत्तेजित होऊन), 


'जोपर्यंत आपण विश्वाची सद्यःस्थिती अचूकपणे मोजू शकत नाही,तोपर्यंत आपण भविष्यात काय घडणार आहे,तेही सांगू शकत नाही!


असाही एक हळवा टप्पा


१८०८ साली लेक तुर्कानाच्या परिसरात किमेयुला 'KNM-ER' ही साधारणपणे १७ लाख वर्षांपूर्वीची स्त्री सापडली (सांगाडा) ज्यामुळे शास्त्रज्ञांना हे कळून चुकलं की,होमो इरेक्टस हा मानवसदृश प्राणी फारच कुतूहलपूर्ण आणि गुंतागुंतीचा आहे.आधी वाटला त्यापेक्षाही ! त्या स्त्रीची हाडं ही वेडीवाकडी झालेली होती आणि खडबडीत वाळूखाली झाकली गेली होती. हा परिणाम 'हायपरविटॅमिनॉयीस-ए' नावाच्या एका अत्यंत वेदनादायी स्थितीचा!आणि हे घडतं जेव्हा तुम्ही एखाद्या मांसभक्षी प्राण्याचं यकृत खाता तेव्हा ! याचा अर्थच असा होता की,होमो इरेक्टस हे मांसाहारी होते आणि त्या हाडांची ती विचित्र वाढ दर्शवत होती की,त्या स्त्रीने तो आजार अंगावर बाळगत काही आठवडे किंवा काही महिने काढले असावेत! कदाचित,कुणीतरी तिची देखभाल केली असावी! जिव्हाळा-कणव दाखवण्याच्या मानवी स्वभावाचा पैलू दर्शवणारी त्या मानवसदृश्य प्राण्याच्या उत्क्रांती मधला एक हळवा टप्पा.