* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

५/११/२२

३ नोव्हेंबर २०२२ या लेखातील पुढील भाग..

पाण्याला नवजीवन देणारं दांपत्य संदीप जोशी व सायली जोशी यांचे चरित्र समजून घेत असताना,मला एक बोधकथा आठवली.


ज्यांचा सत्यावर विश्वास आहे ते साधे सरळ आणि महत्त्वाचे सत्य या बोध कथेत मांडले आहे.


 एक म्हातारा माणूस त्याच्या नातवाला म्हणतो - 


" माझ्या मनात सदैव एक लढा चाललेला असतो.या भयंकर लढाईत दोन लांडगे लढत असतात. त्यातला एक लांडगा असतो दुष्टस्वभावी म्हणजे संतापी,हावरा,मस्तरी,उध्दट आणि भ्याड,तर दुसरा असतो सुष्टस्वभावी म्हणजे शांत,प्रेमळ,विनम्र,उदार प्रामाणिक आणि विश्वासू ! हे दोन लांडगे तुझ्याही मनात आणि सर्वच माणसांच्या मनात लढत असतात."


क्षणभर विचार करुन नातवाने विचारलं, 

" त्यातला कुठला लांडगा जिंकणार ? "

त्यावर म्हातारा हसून म्हणाला,

 " तु ज्याला खाऊ घालशील तो जिंकणार..!


पाण्यामुळे जीवसृष्टी आहे. पाणी जीवन देते व तेच जीवन आहे. पण पाणी जेव्हा प्रदूषित होते, पाणी मृत होते,त्या मृत पाण्याला नवजीवन संदीप व सायली जोशी देतात. शअगदी काव्यमय आणि अद्भुत वाटावे असेच हे आहे. निसर्गालाच जागृत करून त्याच्याकडूनच प्रदूषण निर्मूलन करण्याची प्रक्रिया करवून घेण्याचे तंत्रज्ञान भारतात जोमाने सुरू करणारे जगभरात प्रसिद्ध पावलेले हे दांपत्य आहे.


ही महान कथा सुरू होते धुळ्यातील बंगल्यामधील एका खोलीत सुरु झालेल्या ऑफिसमध्ये आणि व्हाया पुणे ती देशापरदेशांतून प्रवास करून दिल्लीतील गंगा शुद्धीकरण मंत्रालयापर्यंत पोहोचते... पुन्हा तिथून निघून ती पसरतच आहे,भारतभर....


नदी टप्प्याटप्प्याने शुद्ध होत चालली आहे... त्यात जिवांची निर्मिती होताना दिसते आहे... तेव्हा हे पती-पत्नी सहजच म्हणतात 'आम्ही नदीला आई होताना पाहत भारावून गेलो होतो.'


कुठल्याही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदेपासून सर्वोच्च सरकारी ऑफिसला एक वाक्य ते नेहमी ऐकवणार...'माझ्या देशातल्या नद्या मला शुद्ध करायच्या आहेत,ते माझे जीवनध्येय आहे!!' संदीप जोशी आणि सायली जोशी यांनी बायो रेमेडियल पद्धतीने दूषित पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करण्याच्या प्रक्रिया अनेक ठिकाणी राबवल्या.


दूषित पाणी नैसर्गिक पद्धतीने आणि प्रक्रियेने शुद्ध करतात.नेहमीच्या ट्रीटमेंट प्लांटच्या फक्त पाच ते सात टक्के रकमेत,त्यातही त्याला ना कधी ऊर्जा लागते ना देखभाल खर्च ना मनुष्यबळ !! हिरो होंडाची जाहिरात आठवते ना 'फिल ईट फरगेट इट...' तसंच बॅक्टेरिया काम करतच राहतात...


संदीप जोशी ह्या धुळ्याच्या तरुणाने पुणे विद्यापीठातून परिसर विज्ञान (एनवायर्मेन्ट सायन्स) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्याच विषयात काम सुरू केले, तो काळ होता १९९१ चा,विविध कारखान्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे पारंपरिक पद्धतीचे इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटची प्रक्रिया व त्यांचे डिझाईन विकसित करणे असे काम सुरू केले होते. ते नोकरी करत असलेल्या सल्लागार कंपनीच्या वतीने अनेक खासगी कंपन्यांना डिझाईन देणे सुरू होते,पण त्यात त्यांना काही फार दम वाटत नव्हता. बऱ्याचदा करूनही या कामचलाऊ कामाविषयी त्यांना आस्था नव्हतीच. एक गोष्ट सतत अंतर्मनात बसली होती.... बायो रेमेडियल ट्रीटमेंट !! हीच शाश्वत प्रक्रिया व पद्धत आहे, आपण यातच काम करायचे.वेळ लागेल ही पद्धत लोकांना स्वीकारायला,पणआपण हेच करू..


विविध कंपन्यांशी संपर्क करून ते नेहमी सांगायचे,की आम्ही बीआरटी करून देऊ, कमी खर्चात प्रभावी उपाय होईल.दरम्यान १९९४ मध्ये त्यांनी एका आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिला शोधनिबंधही वाचला.त्याच वर्षी त्यांचे सायलीजींशी लग्न झाले. तशी ही दोन्ही कुटुंबे धुळ्यातील एकमेकांचे कौटुंबिक मित्रच, सायलीजीही मायक्रोबायोलॉजी गरवारे कॉलेज (पुणे) मधून झालेल्या... १९९४ ला एमएस्सी झाले आणि त्याच वर्षी त्यांचे लग्न झाले. दोघांचे शिक्षण एकमेकांना पूरक होते.


त्यांनी व्यवसायाचा श्रीगणेशा धुळ्यातील बंगल्याच्या खोलीतून केला. ज्ञान हेच भांडवल!


जळगावला कल्याणी ब्रेकचे एक युनिट होते. तिथे संदीपजींचा मित्र होता नोकरीला त्याच्या ओळखीने प्लांट हेड एस. आर. कुलकर्णी यांच्यापर्यंत ही संकल्पना पोहोचली.त्यांनी, 'चला बघू तर खरं' म्हणून पहिली ऑर्डर संदीपजींच्या हातात दिली.ते युनिट होते,

इलेक्ट्रोप्लेटिंगचे,यात सांडपाणी खूपच दूषित तयार होते.यावरची दूषित पाण्यावरची पारंपरिक ट्रीटमेंट तर खूप महागडी असते.त्यामुळे पाणी शुद्ध करण्याच्या पाठीमागे कोणीच लागत नव्हते. (अन् आपल्या देशात तेव्हा व आताही कोणत्याही प्रदूषणाबाबत काही फिकीर बाळगायची रितच नाही.) काम केले त्या प्रदूषित पाण्यावर प्रक्रियेचे पहिल्याच व्यावसायिक कामात यशही मिळाले. इलेक्ट्रोप्लेटिंगच्या ट्रीटमेंट प्लांटमध्ये मायक्रोब्ज जगू शकणार नाहीत,कारण त्याच्यात खूप हेवी मेटल असतात,अशी शंका असल्याने हा प्रयोग कितपत यशस्वी होतो,याबद्दल अनेकजण साशंकच होते.पण त्यांनी हा प्रयोग यशस्वी केला.जळगावच्या प्लांटमध्ये त्यांनी रोज तयार होणाऱ्या ६० हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून दाखवली.ही यशस्विता झाल्यावर लगेच त्याच कंपनीच्या चाकणच्या प्लांटच्या प्रक्रियेचे काम मिळाले. मग काय 'पाऊले चालती पुण्याची वाट' चाकणचे कामही पूर्ण यशस्वी झाले. दोन्ही कामे खूप कमी पैशात झाली होती.कंपनीचे लोक काही काळ साशंक होते,पण हे दांपत्य निश्चिंत होते. 'बायोरिमिडील ट्रीटमेंट' चे हे पहिले पाऊल त्यांचेच... पाऊलवाट त्यांचीच... आणि गेल्या पंचवीस वर्षांच्या परिश्रमाने,साधनेने त्यांचा राज्य महामार्गही त्यांनीच केला.


या यशस्वीतेतून पुढे कामे मिळत गेली. बऱ्याचदा पुणे आणि बाहेरील विविध कंपन्यांचे सांडपाणी ते आपल्या पत्त्यावर मागवायचे, प्रयोगासाठी. हे कॅन पत्त्यावर त्यांच्या घरी आणि ऑफिसला पोहोचायचे कुरीयर,ट्रान्सपोर्टने हे सांडपाणी हीच संपत्ती,कारण ते प्रयोगाचे मटेरिअल.

त्यावर विविध प्रयोग सुरू,त्यातून त्यांनी अनेक प्रक्रिया व अनेक उत्तरे तयार केली. यातूनच एखादा शोधनिबंध तयार व्हायचा. प्रायव्हेट सेक्टरमध्ये कारखान्यात कामे होत होती,पण अनेक कामे प्रदूषण मंडळाची मान्यता किंवा सरकार मान्यता या मुद्द्यांवर हातची जायची. खूप खंत वाटायची त्यांना.पण फिल्डवर यश आणि यशच मिळताना मात्र त्यांचा आत्मविश्वास वाढत होता.खरंतर त्यांनी भर दिला होता संशोधनावर,त्यांनी संस्था जी स्थापन केली तिचे नावच मुळी 'सृष्टी एन्व्हायरमेंटल रीसर्च इन्स्टिट्यूट',हिचे मुख्य ध्येय नैसर्गिक पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरण! ट्रीटमेंट प्लांट व त्यातील रासायनिक प्रक्रिया यांना खूप मर्यादा आहेत व त्या खूप खर्चिक आहेत.त्यात ऊर्जेचा वापर मोठा असतो आणि इतके सगळे असूनही त्यातून बाहेर पडणारे पाणी तितकेसे निसर्गाला अनुकूल नसते.ते प्रदूषित राहते.याउलट 'सृष्टी' किंवा 'सेरी' प्रत्येक इकोसिस्टीमला तिच्या कमतरता भरून काढण्यासाठी तेथील परिस्थितीप्रमाणे उत्तरे शोधायची असतात,अशी संकल्पना मांडत होती. प्रत्येक ठिकाणी नव्याने शोध घेणे व त्या पद्धतीने तेथे पर्याय देणे हे त्यांना सांगायचे होते. पण सरकारदप्तरी याची माहिती असलेले लोक नव्हते व त्यांची नवीन ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती. काही ऐकायचा किंवा समजून घेण्याचा त्यांना धीर नव्हता आणि इच्छा ही नव्हती. हे सर्व नवीन तंत्रज्ञान होते आणि यात प्रमाणीकरण (Standerdisation & Formulation) असे काही अजून झालेले नव्हते. राजमान्यता नसल्याने चांगला परिणाम मिळत असूनही बरेच इंडस्ट्रीतले लोक हे तंत्रज्ञान स्वीकारायला तयार नव्हते..


त्या काळात १९९८ मध्ये पुण्यात इलेक्ट्रोप्लेटिंगची जवळपास ८० छोटी मोठी युनिट्स होती. त्यांना अनेकांना प्रदूषण मंडळाच्या पाण्याविषयीच्या नोटिसा आल्या होत्या. त्यापैकी एका युनिटला 'सृष्टी'ने ट्रीटमेंट प्रोसेस उभी करून दिली.अगदी जळगावला मिळाले तसेच परिणाम मिळाले.सर्वांना दिसले की प्रक्रिया यशस्वी होते आहे. त्याला खर्च आला होता उणेपुरे पाच हजार रुपये !!


 सर्व इलेक्ट्रोप्लेटिंग युनिट मालकांचे ठरले, की हा प्रक्रिया प्लांट आपल्याकडे बसवायचा,सर्व बोलणी झाली. सर्व प्लांटला बी.आर.टी. बसवायचे ठरले.त्यांच्या असोसिएशनच्या वतीने बोलणी झाली,पण एमपीसीबीने सांगितले, की आम्ही ही ट्रीटमेंट मान्य करणार नाही. कारण ही आधी कुणी केलेली नाही.याचा पाया आम्हाला माहीत नाही. आमचा यावर विश्वास नाही. ऑर्डर रद्द! पुढे अनेक वर्षे हीच काय, कोणतीही ट्रीटमेंट सिस्टीम कुठल्याही इलेक्ट्रोप्लेटिंग प्लांटवर बसली नाही. उलट सर्वांचे वाढणारे अधिकाधिक दूषित सांडपाणी तसेच वाहत राहिले.


आपल्या भारतीय लोकांना आपल्या लोकांनी केलेल्या संशोधनावर विश्वास नसतो. त्यांना समजून घ्यायची तयारीही नाही. स्टार्टअप धोरण आले, तरीही लाल फिती काय किंवा खासगी क्षेत्र काय, विश्वास, प्रोत्साहन यांना थारा नाही. परकीय, इम्पोर्टेड ते चांगले, मग ती वस्तू असो की सेवा अन् तंत्रज्ञान असो की संशोधन, मानसिक आणि बौद्धिक गुलामगिरीचे आजही आपण आणि आपली व्यवस्था शिकार ठरत आहोत. हाच अनुभव 'सृष्टी'ला २००६ मध्ये हैदराबाद येथील हुसेन सागर स्वच्छतेबाबतच्या कामातही आला. त्यांना त्यांची प्लांटची प्रोजेक्ट कॉस्ट अतिशय कमी,अनुभव पुरेसा, सादरीकरणही तांत्रिकदृष्ट्या श्रेष्ठ या सगळ्या गोष्टी जुळत असून ही त्यांना काम मिळाले नाही. उलट काम इस्रायली कंपनीला मिळाले. ज्यांच्याकडे याचा काहीही अनुभव नव्हता. तंत्रज्ञानाचा कोणताही खुलासा त्या कंपनीने केलेला नव्हता,उलट त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, की आमचा हा पहिला प्रकल्प आहे.पुन्हा परदेशी म्हणजे भारी आणि त्यात इस्राईल म्हणजे आणखी भारी... याच समजुतीतून 'सृष्टी'ऐवजी त्या परदेशी कंपनीला काम गेले होते.


या विषयातले तज्ज्ञ 'सृष्टी'च्या तंत्रज्ञानास मान्यता देत होते. आपल्याकडे अनेक कंपन्यांमध्ये प्लांट यशस्वी होत होते,पण सरकारी यंत्रणेकडून अधिकृत मान्यता मिळत नव्हती,ही सल सतत होती. अपूर्णता वाटत होती. तसेच ती व्यवसायाची व पर्यावरणाची गरज पण होती..


...आणि पुढील संवाद मन वेधून घेतो.'हो, इथे नदी खूप लाल होते आहे... पण नदी जिवंत होते आहे... नदीत मोयना (बुरशीचे नाव) येऊ लागले आहेत. मोयना हे त्या नदीतल्या माशांचे खाद्य आहे. आता मोयना आले म्हणजे लवकरच मासेही येतील.'पर्यावरण अभ्यासक खूप आनंदात आणि उत्साहात नदी जवळूनच ह्या गोष्टी सांगत होता.नदी जिवंत होऊ लागली आहे, ही त्याची ही सुरुवात होती. नदी आई बनताना आम्ही पाहत होतो, या काव्यभाषेत एका वाक्यात सगळ्या सगळ्या भावना येत होत्या.


किती हे काव्यमय... मला एकदम जीवसृष्टीची उत्पत्ती आठवली.एकपेशीय प्राणी.... त्यातून जिवाणू... त्यातून हरित द्रव्य तयार करणारा पहिला जिवाणू... त्यातून पहिली हरितद्रव्य निर्मिती... मग वनस्पती विश्व... मग प्राणी-विश्व सायलीजींनी हे सर्व एखादे सुंदर काव्य ऐकवावे तसं भावपूर्ण शब्दांत ऐकवलं. ही संवेदनशीलताच त्यांना कार्यप्रवृत्त करते हे जाणवतं. "ज्ञानेश्वरांनी संवेदनशील माणसाचं खूप उत्कट वर्णन केले आहे,ज्याला मुंगीच्या पायातल्या पैंजणाचा आवाज ऐकू येतो आणि फुलपाखराची उचकी दिसते तो संवेदनशील माणूस !! " इथे तर संदीप सायलीजींना जिवाणूंच्या संवेदना ऐकू येण्याचा सराव झालाय.त्या जिवाणूंच्या संवेदना मलाही भविष्यात ऐकू येतील असा विश्वास मात्र दृढ झाला.


पुढील उदाहरण वाचताना तर मानवी उत्क्रांतीचे रहस्य समजल्याचा आनंद झाला.


 प्रत्येक वॉटर बॉडीचे आपलं एक वैशिष्ट्य असतं तेही लक्षात घ्यावे लागते. उदाहरणार्थ कृष्णेचे पाणी खूप संथ असते,त्याचबरोबर त्याची खोली खुप असते. काही नद्यांमध्ये कठीण खडक असतात,तर काही नद्यांच्या तळाशी वाळूचे खूप खूप उंच थर असतात.असे वेगवेगळ्या टप्प्यांत आम्ही प्रवाहाचे निरीक्षण नोंदवतो.मोजमापे घेतो.यानंतर समजून घ्यावी लागते ती नदीची किंवा प्रवाहाची इकोसिस्टीम,प्रत्यक्ष जिथे प्रवाहावर काम करायचे,तेथील निसर्गच बरंच काही बोलत असतो.त्याचे निरीक्षण बारकाईने करून त्याचाही विचार ट्रीटमेंट करताना करावा लागतो. त्यांची खूप मदत होते.त्याची काही उदाहरणे देताना त्यांनी काही रंजक माहिती दिली. नदी किंवा प्रवाहाच्या काठावर दिसणाऱ्या पक्ष्यांवरून काही अनुमान काढले जाते. घार, कावळे,टिटव्या असे पक्षी बहुदा कुजलेले मांस खातात. त्यावरून तिथे मृत मासे मोठ्या संख्येने आहेत हे समजते... म्हणजे नदीची इकोसिस्टीम मृतावस्थेत आहे,असे अनुमान निघते. खंड्या, बगळा असे मासे खाणारे पक्षी असतील, तर काही प्रमाणात इकोसिस्टीम जिवंत आहे,असे समजण्यास हरकत नाही.आणखी एक उदाहरण पिंपळ, वड, उंबर, करंज व तत्सम वृक्ष या इकोसिस्टीममध्ये खूप कमी असतील किंवा नसतील,तर त्याचे कारण तिथे भारद्वाजासारखे पक्षी जास्त संख्येने आहेत.भारद्वाज पक्षी इतर लहान पक्ष्यांची अंडी खातात ज्या पक्ष्यांच्या विष्ठेतून वड,पिंपळ या वृक्षांच्या बीजाचे परिवहन होते. पक्षी नाहीत " म्हणून वृक्ष ही तुरळक असे ते निरीक्षण.जिथे जलपर्णी आहे, त्या पाण्यात फॉस्फेट,नायट्रेट व तत्सम रसायने आहेत. बेशरम, आळू, कर्दळी भरपूर प्रमाणात वाढलेली असेल, तर पाणी नक्की दूषित आहे. कारण ही पक्ष्यांशिवाय वाढणारी इकोसिस्टीम आहे, हे समजते. तर अशा प्रकारे हे बायोइंडिकेटर प्रवाहाबद्दलची बरीच समज वाढवतात. (मारुती चितमपल्ली यांचे लिखाण वाचताना जंगल समजत जाते, त्या विषयी प्रेम आणि तादात्म्य वाढत जाते.)


हे अभ्यासपूर्ण प्रकरण वाचताना मी सध्या मारुती चितमपल्ली यांचे 'चकवाचांदण' हे पुस्तक वाचत असल्याचे मला नैसर्गिकरीत्या समाधान मिळाले.


'पहिला आणि सर्वोत्कृष्ट विजय म्हणजे स्वतःला जिंकणे; स्वतः द्वारे जिंकले जाणे हे सगळ्यात अत्यंत लज्जास्पद आणि अधर्म आहे.' 


प्लेटोचा हा प्रदीर्घ अभ्यासपूर्ण विचार या पुस्तकाशी मला जोडून ठेवत होता.

स्वयंशिस्त लावल्यास अनेक अशक्य कामे सहज शक्य होतात.यासाठी चिकाटी,मेहनत व विश्वास महत्वाचा आहे.


शुभ्र तुरे फेसांचे,जीव घेणे ! 

संभाजी पठारे यांची स्टोरी

तुरे फेसांचे... ओढ्यालगतच्या झुडपांवर, नदीच्या किनाऱ्यावर,प्रवाहातल्या शुभ खडकांवर,खाडीच्या पाण्यावर शुभ्र तुरे फेसांचे, दुर्गंधी... पाण्याबरोबर शेतमळ्यात पसरली. शुभ्र तुरे फेसांचे जीवघेणे... नदी खाडीतील मासे गायब झालेले,असलाच चुकून एखादा मरून तरंगत येतो काठावर.काजू,आंबे,कोकम यांचा मोहर धरेना, शेतात गेलेले हे पाणी का संपवते हे पीक. नदीतील खडकांवरही धरू देत नाही शेवाळ जरासेही.शुभ्र तुरे फेसांचे धाक दाखवतात झाडेझुडपे,पशुपक्षी सगळ्यांच्याच जगण्याला,महाड परिसराला... पण तो आला, त्याने पाहिले, त्याने मनाशी ठरवले आणि इतरांना बरोबर घेत हे बदलवलंही... संभाजी पठारे यांनी महाड परिसरात औद्योगिक जलप्रदूषण रोखण्यासाठी कंबर कसली...


 सगळेच कारखाने आपले सांडपाणी जवळजवळ काहीही प्रक्रिया न करता बाहेर सोडून देत असत.पुढे सामायिक प्रक्रिया केंद्रातही हाच प्रकार आणि त्यातून बाहेर पडणारे पाणी तर अति भयानक ! तांत्रिक भाषेत सांगायचे,तर त्या पाण्यासाठी केमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे COD हा तीन हजार इतका असायचा.म्हणजे नदीच्या शुद्ध पाण्यात हे सांडपाणी मिसळल्यावर तिच्याही पाण्याचा जवळ जवळ इतकाच COD होणार.


पाण्याच्या दूषितपणा मोजण्याची परिमाणे बरीच असली तरी सर्वात मुख्य दोन परिमाणे असतात. 

. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड.

 २. सीओडी - केमिकल ऑक्सिजन डिमांड


पाण्यातील सेंद्रिय (ऑर्गनिक) घटकांचे विघटन करण्यासाठी लागणारा ऑक्सिजन पाण्यातील जीवाणू व इतर सूक्ष्म जीवाणूंच्या श्वसनासाठी हवा असतो.पाण्यात मुळात ऑक्सिजन विरघळलेला असतो.तो विरघळलेला ऑक्सिजन पाण्यातील माशांसहित सर्व जलचरांना श्वासोच्छ्वाससाठी आवश्यक असतो.पण जसजसे पाण्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढत जाते,तसतसे सेंद्रिय घटकांचे विघटन होऊन पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. इतकेच काय जलचरांना हवा असलेल्या प्रमाणात ऑक्सिजन येण्यासाठी पाण्याची ऑक्सिजनची मागणी वाढते (त्यालाच बीओडी असे म्हणतात) तो ऑक्सिजन या सेंद्रिय पदार्थांचे विघटन प्रक्रियेसाठी आवश्यक असतो. पाण्यात सोडण्यात येणाऱ्या मैल्यामुळे त्या सांडपाण्याचा बीओडी अधिक असतो. तसेच अशाच प्रकारे असेंद्रिय (Non Organic) पदार्थांच्या विघटनासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीला केमिकल ऑक्सिजन डिमांड असे म्हटले जाते.या दोन्ही प्रकारच्या ऑक्सिजनची मागणी जेवढी जास्त तेवढे पाणी अधिक प्रदूषित असते.सीओडी व बीओडी मोजण्यासाठी विविध रासायनिक प्रक्रिया आहेत. तसेच गेल्या अनेक वर्षापासून इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरली जात आहेत.


स्वतः २०००  मध्ये संभाजी पठारे १९८९ मध्ये केमिकल इंजिनिअर झालेले. २००४ पर्यंत दोन-तीन मोठ्या साखर कारखान्यातून विविध पदावर काम करून आलेले. तेथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला होता. सहकारातून खाजगी क्षेत्रात आलेले पठारे २००४ ला महाडमध्ये एका चांगल्या कंपनीत रुजू झाले. मुळात शेतकरी कुटुंबातला खेड्यातला जन्म. महाविद्यालयीन शिक्षण ही ग्रामीण भागातच, पहिली पंधरा वर्षे नोकरीही साखर कारखान्यात म्हणजेच ग्रामीण भागातच आणि शेतकऱ्यांशी संबंधित खूप संवेदनशील मनाचा हा माणूस हुशार आणि मेहनतीही.


२००४ मध्ये सामायिक सांडपाणी केंद्राच्या कार्यकारणीत ते दाखल झाले. पुढची सहा-सात वर्षे त्या कार्यकारिणीचे सदस्य राहिले. तेथील सर्व कामकाज पाहून ते अस्वस्थ होत होते. बऱ्याच वेळा नदीकाठच्या गावातून तक्रारी घेऊन लोक येत असून बऱ्याच वेळा त्यांना हतबलता जाणवायची,अपराधी वाटायचे. २०१० मध्ये या सांडपाणी केंद्राचे ते व्हाईस चेअरमन झाले. त्यांनी बऱ्याच कारखान्यांर्गत तसेच इंडस्ट्रियल एरिया व त्यांच्या प्रक्रिया केंद्रे याविषयी माहिती गोळा करणे सुरू केले.सर्वांशी संवाद वाढवला. दरम्यान ज्या कंपनीत काम करत होते,ती कंपनी यांना बढत्या देतच होती.सांडपाणी केंद्रावर ते सोडून कुणीही विचार करीत नव्हतं.कोण चुकतंय,कोण मुद्दाम करतोय किंवा कोणामुळे किती नुकसान होतं यावरही त्यांनी सखोल माहिती घ्यायला सुरुवात केली होतीच..


याच दरम्यान त्यांना एक कल्पना सुचली. ते स्वतः ज्या कंपनीत काम करत होते त्या कंपनीच्या सांडपाण्यातून काही प्रक्रिया केल्या तर त्यातून ॲसिटिक ॲसिड तयार होऊ शकत होते,हे ॲसिटीक ॲसिड व्यावसायिकदृष्ट्या उत्पन्न देणारे होते.ॲसिटिक ॲसिडचा प्लांट होता,पण तो पुर्ण क्षमतेने वापरला जात नव्हता.पठारेंनी तो सुरु केला. त्यातून कंपनीच्या उत्पन्नात भर पडली आणि त्यांच्या कारखान्यांच्या सांडपाण्यातील प्रदूषणाची पातळी भर खूप कमी झाली. नंतर कंपनीत शक्य त्या प्रकारे पाणी साठवण्याचे उपाय (उदा: बोरवेल रिचार्ज व रेनवॉटर हार्वेस्टिंग) अवलंबले. कंपनीतील प्रत्येक विभागानुसार पाण्याचे लेखापरीक्षण करून घेतले. विविध ठिकाणी पाणी वाचवण्याचे तंत्र अवलंबले गेले. त्यात मूळ रासायनिक प्रक्रियेतही काही बदल करायचे धोरण त्यांनी ठेवले. इतके झाल्यावर कंपनीच्या सांडपाण्यातही त्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापरासाठी उपलब्ध करण्याची यंत्रणा सुरु केली.जलसंधारणाचे,पाणी वाचवण्याचे, रिसायकलिंग अशी जवळजवळ सर्व मॉडेल्स उभी केली आणि जलसंवर्धन संबंधित सर्व योजना राबवायला सुरुवात केली होती. त्यासाठी आधी कंपनीच्या व्यवस्थापनाला समजावून सांगणे,आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेणे, महत्त्व पटवणे हे त्यांनी सुरू केले होते.मग कधी निर्मितीप्रक्रियेत काही बदल करणे,काही नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे व त्याची कंपनीत अंमलबजावणी करणे हे प्रामुख्याने केले. तंत्रज्ञान व्यवहार आणि पाणीबचत या त्रिसूत्रीचा वापर,प्रयोग करत करत त्यांनी यशस्वी केला.


कारखाने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प खरंतर का चालवत नाहीत? कारण पठारे त्यांच्या स्वतःच्या कंपनीतील विविध उपाययोजनेतून जो अभ्यास झाला त्याचे मुख्य फलित म्हणजे प्रक्रिया खर्चापेक्षा दंड - हप्ते हे कमी खर्चाचे असतात.सांडपाणी प्रक्रियेसाठी लागणारा खर्च खूप जास्त येतो,त्यापेक्षा दंड भरणे,यंत्रणेला हप्ते देणे असे त्या कंपन्यांना वाटते हे सोयीचे आहे. हा गैरसमज आहे हे सिद्ध झाले.कोणत्याही कारखान्याने थोडा जास्त भांडवली खर्च केला आणि नफ्यात घट किंवा उत्पादनाची वाढवलेली वाजवी किंमत यातून तो झालेला खर्च वसूल केला.तर सांडपाणी प्रक्रियेतून चांगले पाणी बाहेर टाकले जाणे शक्य आहे, हा धडा त्यांनी आपल्या कंपनीत सिद्ध केला. २०१० मध्ये त्यांना सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या कार्यकारिणीचे उपाध्यक्ष करण्यात आले. पठारेंचा आग्रह सुरू होता की आमच्या कंपनीने ज्या काही उपाययोजना केल्या आहेत तशाच सगळ्यांनी आपापल्या कंपन्यांमध्ये कराव्या. नंतरच ते पाणी सामायिक प्रक्रिया केंद्रात सोडावे.पण फार कोणी मनावर घेत नव्हते. त्याच दरम्यान जगभरातील औद्योगिक वसाहतींचा प्रदूषणा संबंधात सर्वे करण्यात आला होता. त्या सर्वांमध्ये जगातील सर्वोच्च प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील पहिल्या तीसमध्ये महाड औद्योगिक वसाहतीचा नंबर आलेला होता. ही वसाहत 'थर्टी डर्टी' म्हणून कुप्रसिद्धीस आली. साहजिकच महाडमधील विविध रासायनिक कारखान्यांच्या पुढे नवीन समस्या उभ्या राहिल्या.जागतिक बाजारपेठेत येथील उत्पादनबाबत पीछेहाट व्हायला लागली. त्याचबरोबर भारत सरकारनेही एका नव्या कायद्याच्या आधारे महत्त्वाचा निर्णय असा दिला होता की,ज्या वसाहतींच्या सांडपाण्याबद्दल व हवाप्रदूषणाबाबत आजूबाजूच्या गावातील, वाड्या वस्त्यावरील त्यातील लोकांच्या तक्रारी आहेत, तेथील कारखान्यांच्या परवान्याबाबत, त्यांच्या विस्तारीकरणबाबतच्या परवानगीला पूर्ण थांबवण्याचे धोरण सरकारने जाहीर केले होते. यामुळे महाडमधील ज्या कंपन्यांना विस्तार करायचा होता त्यांचे घोडे अडले होते. वेगवेगळ्या कंपन्यांना विविध राजकीय पक्षांचे लोक आपापल्या परीने प्रदूषणाबाबत ब्लॅकमेलिंग करीत होतेच.त्यातून खंडणी वसूल करत होते.या सर्व पार्श्वभूमीवर पठारे यांच्या कंपनीस काहीही तोशीस नव्हती,कारण सर्व नियमात सुरू होते व नियमात करूनही उत्पादन खर्च आटोक्यात येत होता.त्यामुळे त्यांचे संचालक व व्यवस्थापन पठारेंवर बेहद्द खूष होती.


आता इतर कंपन्यांना त्यांची चूक उमगली.इतर सर्व कारखान्याच्या प्रतिनिधींनी पठारे यांना २०१४ मध्ये सामायिक सांडपाणी केंद्राच्या कार्यकारिणीचे अध्यक्षपद स्वीकारण्याची गळ घातली. सुरुवातीला पठारे यांनी नकार दिला. परंतु पुढच्या बैठकीत परत आग्रह झाल्यावर ते त्यांच्या अटी व शर्तीवर अध्यक्ष होण्यास तयार झाले. मी सर्वांना सारखाच नियम लावीन. प्रत्येक कारखान्यातून ठरलेल्या मानांकनानुसारच सांडपाणी बाहेर सोडायला हवे.तसेच सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात ही सर्व प्रक्रिया शास्त्रीय व तांत्रिकतेच्या सर्व कसोट्या पाळूनच केली जाईल. त्यासाठीचा भांडवली व चालू प्रक्रियेसाठीचा खर्च सर्वांनी मिळून करावा लागेल. दरम्यान माझ्या परीने सर्व कारखान्यांना अंतर्गत सांडपाणी सुधारणासाठी मदतीला मी सदैव तयार आहे.


विस्कळीत बेशिस्त व आपमतलबी व्यवस्था बदलण्यासाठी व्यवस्थेत राहून स्वयंशिस्त व लोक समज वाढवून व्यवस्था सुनियोजीत,स्वयंप्रेरित, शिस्तीत काम करणारी व व्यापक समाजहिताची करता येते..! याचे जिवंत उदाहरण म्हणजेच संभाजी पठारे..!


... अजून कर्तुत्वाच्या गाथा पुढे सुरू आहेत.थोड्या थोड्या भागात त्या क्रमशः प्रकाशित केल्या जातील.


विजय कृष्णात गायकवाड





३/११/२२

१ नोव्हेंबर २०२२ या लेखातील पुढील भाग..

पाण्याचे प्रदूषण करणाऱ्या या सर्व घटकांवर मोहन कुलकर्णी यांनी त्यांच्या 'ऋतु बायोसिस' या कंपनीद्वारे काम केले आहे व ते प्रदूषण स्रोतांच्या सुरवातीलाच कसे 'कमीत कमी' पातळीवर आणता येतील हे साध्य करून दाखवले आहे.


त्यांनी वॉटरलेस युरिनल्सच्या माध्यमातून मानवी मूत्रामुळे होणारे प्रदूषण ९५ टक्क्याने कमी केले आहे. तर मानवी मैल्याचे वेगाने व नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात प्रमाणात विघटन करून ते ६० ते ७० टक्क्यांनी त्याचे आकारमान कमी करण्यास यश मिळवले आहे. तर घरातील व ऑफिसमधील सर्व स्वच्छतेसाठी लागणाऱ्या फिनॉल,ॲसिड यांना जैवतंत्रिक (बायो टेक्निकल) रसायन हा पर्याय देऊन त्यामुळे होणारे प्रदूषण ९० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात मजल मारली आहे. इतकंच नाही तर घनकचऱ्याच्या विघटनाच्या अशा प्रक्रिया विकसित केल्या आहेत की त्यातून कचऱ्याची दुर्गंधी जवळजवळ शून्यावर येते,आणि जरी विघटीत कचरा पाण्यात वाहून गेला तरी त्याचे विघटन प्रक्रिया यापूर्वी सुरू झालेली असते.त्यामुळे प्रवाहाचा केमिकल ऑक्सिजन डिमांड (COD) किंवा बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (BOD) हा फार मोठा असत नाही. म्हणजे प्रदूषणाच्या उगमा जवळच पाण्याचे प्रदूषण संपवायचे किंवा कमी करायचे.हे मोठ्या प्रमाणात सर्वत्र झाले तर प्रवाहांचे पाणी कमी प्रदूषित होईल आणि मग ट्रीटमेंट प्लांटवरील भारही कमी होईल. प्रवाह स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांचा सहभाग अशा प्रकारची पर्यायी रसायने किंवा विविध पर्याय दिल्यामुळे वाढू लागेल,घनकचरा व्यवस्थापन आटोक्यात येईल. थोडक्यात या सर्व गोष्टींमुळे पाणी प्रदूषणावर नियंत्रण येईल!


आणि विचार करणाऱ्या कोणत्याही माणसाला कळण्यासाठी भन्नाट नवनवीन प्रयोग सुरू केले.मोहन कुलकर्णी यांनी 'मुतारीवर' सुध्दा अनेक प्रयोग केले.व त्यातूनच 'ब्लू बॉल्स' तयार केले. यामध्ये ठासून भरलेत बॅक्टेरिया.. या बॅक्टेरियांचे खाद्य म्हणजे यूरिक ॲसिड,मुतारी मध्ये दुर्गंधी येते अमोनियाची,अमोनिया येतो यूरिक ॲसिडमधून आणि हे यूरिक ॲसिड येथे लघवीवाटे आपल्या शरीरातून,त्यांच्या या प्रयोगामुळे दुर्गंधीच्या मुळावरच घाव घातला गेला. बॅक्टेरिया हे युनिक ॲसिड खातात. ते संपवतात.त्यातून बॅक्टेरियांची संख्या वाढते. त्यांची वसाहत मुतारीच्या भांड्यात व त्या खालच्या पाईपमध्ये तयार होते.सततच्या वापराने या बॅक्टेरियाच्या कॉलनी थेट ड्रेनेज लाईनपर्यंत ही जातात.बॅक्टेरियांनी खाल्ल्यामुळे यूरिक ॲसिड शिल्लक राहत नाही तर तिथे अमोनियाची दुर्गंधी येईलच कशी...!


विचारालाही विचार करायला लावणारे हे विचारशील प्रयोग वाचून मानवी मन थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.


समाजाचे कल्याण साधताना,संशोधन आणि अभ्यास हे करताना लोकांच्या अज्ञानाचा नाही, तर आपल्या ज्ञानाचा फायदा करून घेऊन व्यवसाय करणे हे सर्वोत्तम उद्योजकाचे लक्ष असते,उद्योजकाचे साध्यही पवित्र आणि साधनाही पवित्र असायला हवी असा नवीनच 'माणुसकीचा' धडा मोहन कुलकर्णी यांनी दिला आहे.


'एक चांगले पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवते.' 


पुढील प्रकरण व वाचण्यासाठी पान उघडले. आणि 'ज्वालाग्राही पाणी' ही सुरुवात वाचूनच मी अवाक् झालो. प्रदीप पुरंदरे महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावरील सर्वत्र बहुचर्चित नाव हायड्रिलॉजी तज्ञ,जल व्यवस्थापन विषयाचे प्राध्यापक आणि पाणी विषयाचे अभ्यासक पंडित,ते जलव्यवस्थापर्यंत पोहोचले आहे. पाण्याला ज्वालाग्रही बनवणारे ते सत्याग्रही आहेत. त्यांचे कार्य ध्येय ( मिशन स्टेटमेंट ) आहे की 'जल व्यवस्थापन व्यवस्थेत प्रथम लोक सहभाग वाढवा, तिथे जनरेटा निर्माण करा,त्याआधी सिंचन व्यवस्था नीट अभ्यासा, त्याचे अस्त्र बनवून प्रकल्पस्तरावर परिणामकारक हस्तक्षेप करा पाणी वाया जाण्यापासून वाचवा..!


हे वाचल्यावर सर्वप्रथम मला पाणी हे मानवी जीवनात किती महत्त्वपूर्ण आहे. याचे मुल्य समजले.


'आकड्यात सैतान लपलेला असतो' म्हणजेच आकडेवारी बारकाईने अभ्यासली तर त्यातील बदमाशी,त्रुटी कळते,विरोधाभास कळतो, वरकरणी तसे काहीच वाटत नसले तरी ही अनास्था आणि अनागोंदी अशी असते.हे रहस्य सविस्तरपणे या पुस्तकात वाचल्यानंतर 


' होय, वादळांनी फितूर झालेल्या लाटांना न जुमानता उलट त्याच लाटांवर स्वार होऊन वादळाला सामोरं जाऊन मार्गक्रमण करत इच्छित किनारा गाठणे हेच जहाज निर्मितीचे उद्दिष्ट असतं !


या  उदात्त कर्तृत्ववान विचारांनी जीवनातील जीवंत वैचारिक क्रांतीची ओळख होईल हे मात्र नक्कीच..!


मी दररोज पाणी 'आडातून' खुप खोलवरुन वरती खेचून काढतो. या पाण्याच्या शोधात मला आतून खोलात जावं लागतं.


असेच फार काळापासून पाण्याच्या शोधात .. खोलात शंशाक देशपांडे आपल्या पुढे गेलेले आहेत.फक्त आपल्याकरीताच..!


आज सगळ्यात जास्त निकड आहे भूजलाच्या थेंबाथेंबाच्या नियोजनाची.'नितीआयोगा' चा अहवाल सांगतो, की बिहारमधील एक लाखापेक्षा अधिक बोरवेल बंद पडल्या आहेत. उत्तर प्रदेशातील ७७ हजारांपेक्षा अधिक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. महाराष्ट्राच्या ५२ टक्के जमिनीचे वाळवंटीकरण झाले आहे. म्हणजे तिथे पाणीच नसल्याने काहीच बोलू शकत नाहीये. भारतातल्या १५ हजार नद्यांपैकी साडेचार हजार नद्या कोरड्या पडल्या आहेत. ( ही अभ्यासपूर्ण लेखमाला प्रत्यक्ष पुस्तकात वाचत असताना 'मला अजूनही अभ्यास करायचा आहे याची सत्यता समजली.) सगळ्यांचा संबंध आहे,अमर्याद भूजलाचा उपसा आणि त्यातून आटलेले भूजल यांच्याशी,या पार्श्वभूमीवर भूजलाचा,ते साठवून ठेवणाऱ्या 'जलधर' असा या खडकाचा जलधारांच्या सीमा निश्चित करण्याच्या,त्यातील पाण्याच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन करण्याच्या,स्वानुभवातून व स्वअध्ययनातून विकसित केलेल्या पद्धती, इतकंच काय,पूर्ण महाराष्ट्रासाठी एक हाती लिहिलेला भूजल कायदा हा पुढे केंद्र सरकारनेही स्वीकारला. हे आणि असेच भूजलासंबंधीचे मैलाचा दगड ठरतील अशी अनेक कामे डॉ. शशांक देशपांडे यांनी केली आहेत.


१९८५ ला शशांकजींनी व त्यांच्या दोन मित्रांनी खडकशास्त्र व हायड्रॉलॉजीतील संदर्भाचा वापर करून त्यासाठी एक छोटे यंत्र वापरून पाण्याची जागा दाखवण्याचा सल्ला देणारा व्यवसाय सुरू केला. गावे, जिल्हा परिषद व महाराष्ट्र सरकारने त्यांना यासाठी पहिले काम दिले. त्यांनी या यंत्राच्या आधाराने विविध ७० ठिकाणं दाखवली. त्यापैकी ५७ ठिकाणी भरपूर पाणी लागलं, म्हणजे ८० टक्के ठिकाणं बरोबर दाखवली होती. म्हणजे यांचं तंत्र,यंत्र आणि तर्क खूपच उपयोगी होता. पुढे लवकरच छत्तीसगड (तेव्हा ते मध्यप्रदेशात समाविष्ट होते) मधील रायपूर जिल्ह्याच्या शिवनी तालुक्यात काम मिळाले. खूप दुष्काळ होता. तिथे त्यावेळी बोरवेलसाठी एकूण शंभर ठिकाणं दाखवली होती, पैकी ९० ठिकाणं अचूक निघाली, जिथे भरपूर पाणी लागले. पाणी पाहण्याचे यंत्र म्हणजे इलेक्ट्रिकल कामात वापरले जाणारे मेगर किंवा रेसिस्टीविटी मीटर,कोणत्याही इलेक्ट्रिकल सर्किटमधील विद्युत प्रवाहाचा अवरोध मोजण्यासाठी याचा वापर करतात.जमिनीचा,त्यातील खडकांचा विद्युत वहनाला होणारा अवरोधही त्याने मोजता येतो. त्याचे काही शास्त्र व तंत्र आहे.जमिनीत विद्युत प्रवाह सोडला जातो आणि मेगरने त्याचा अवरोध मोजला जातो.जिथे खडकाला भेगा आहेत,पोकळी आहे अशी ठिकाणे यामुळे सापडतात.त्यांचे आकारमान इत्यादीही समजते. ते जमिनीपासून किती खोलवर आहे,हेही अनुमान काढता येते. त्यावर आधारितच हे मशीन जमिनीतले पाणी दाखवणारे मशीन म्हणून ओळखले जाते.


हे सर्व वाचत असताना एका वाक्याची प्रकर्षाने जाणीव झाली.


 ''तुम्ही एकाच नदीत पुन्हा पुन्हा पाऊल टाकू शकत नाहीत;तुम्ही एकदा पाऊल टाकलं की पुन्हा पाऊल टाकेपर्यंत तिचं स्वरूप बदललेलं असतं.'' - हेरॅक्लिटस' 


भारतीय संविधानाप्रमाणे प्रवाहातील पाण्यावर प्रवाह जिथून जिथून वाहतो तेथील सर्वांचा हक्क असतो. त्यामुळे गाव हे प्रमाण मानून हे काम केले जाते. मागच्या गावात पाणी अडवले जाते, तेव्हा त्या गावात येणाऱ्या एकूण पाण्याच्या ६५ टक्के पाणी त्या गावाला स्वतःसाठी अडवता येते, बाकी ३५ टक्के पाणी पुढे सोडावे लागते. हे नदीलाही लागू आहे. इतकेच काय, एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात जातानाही हाच नियम लागू आहे.हे सर्व माझ्यासाठी नवीन होतं.!


जीवन जगत असताना असले पुस्तक सोबत असणे म्हणजे आपली सावलीच आपल्या सोबत असणे.हा अनुभव बरचं काही शिकवून गेला.


माहिती थेंबाची... थेंबाच्या थांबण्याची...! या प्रकरणाची सुरुवातच थांबण्यापासून होते. पळण्यापूर्वी आपल्याला कोठे थांबायचे आहे हे ठरवता आलं पाहिजे. थांबण्याची सीमारेषा म्हणजे सुनील गोरंटीवार यांचे साधक जीवन..


यह ॲप का जमाना है भाई... मोबाईल ॲप का! शेतीला काटेकोर पाणी देण्यासाठी मोबाईल ॲप! हे ॲप डाऊनलोड करा, शेतात जाऊन पिकाचा फोटो काढा,तो ॲपवर डाऊनलोड करा... विचारलेल्या दोन-तीन प्रश्नांची उत्तरे द्या... ॲप तुम्हाला सांगेल, तुमचा पंप किती वेळ सुरू ठेवायचा. हवे तितकेच पाणी शेतीला मिळते.... होय, हे जागतिक दर्जाचे संशोधन करून जलव्यवस्थापनात उच्च मानांकन मिळवणारे संशोधक म्हणजे डॉ. सुनील गोरंटीवार.गेली पस्तीस वर्षे सिंचन क्षेत्रात समृद्ध ज्ञान निर्मिती करणारा हा साधक आहे.


एक पाण्याचे गणित पाहू...


'भारी जमिनीत ठिबकने पाणी दिले की पडणारा थेंब जमिनीत आधी आडवा पसरतो मग हळूहळू तो खालच्या दिशेला जातो व मुळाभोवती तो बल्ब तयार करतो तो 'कांद्याच्या' आकारात पसरतो. तर हलक्या जमिनीत तो आडवा न पसरता खालच्या दिशेने सरळ प्रवास करतो तेव्हा तो गाजरासारखा आकार धरतो.'


 आपल्या भाषेत सुनील गोरंटीवार सोप्या भाषेत समजून सांगतात.


बाष्पर्णोत्सर्जन (Evapotranspiration) हा शब्द जड वाटत असला तरी तो शालेय जीवनात येऊन गेलेला असतो. तर मला जे आठवते ते सांगतो.आपण झाडाला पाणी देतो ते जमिनीत. जमिनीला दिलेल्या पाण्यापैकी सर्वच पाणी झाडाने शोषून घेईपर्यंत काही पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते उडून जाते ते बाष्पीभवन. तसचं झाडाने शोषलेल्या पाण्यापैकी ८५ ते ९० टक्के पाणी हे पानाच्या रंध्राद्वारे झाडाच्या बाहेर श्वासाद्वारे बाहेर टाकले जाते. 


(हे transpiration). जेमतेम ५ ते ७ टक्के पाणी अन्न बनवण्यासाठी वापरले जाते. झाडाचे स्वतःचे तापमान बाहेरील हवामान व तापमानाशी जुळवून घेण्यासाठी हे उत्सर्जन सुरू असते. हे दोन्ही मिळून बाष्पपर्णोत्सर्जन (Evapotranspiration)


तर ते सांगत होते की Evapotranspiration जेवढे अधिक तेवढी झाडाची वाढ जोमाने होते. उन्हाळ्यात झाडांना किंवा पिकांना पाणी जास्त लागते.तर हिवाळ्यात कमी तर पावसाळ्यात अगदीच कमी द्यावे लागते. त्याचे कारण हेच तर!


या ठिकाणी सॉक्रेटिसचा प्रसिद्ध विचार समोर उभा राहीला.


'मला फक्त एकच गोष्ट माहित आहे आणि तीही आहे की मला काहीच माहित नाही..!


माणसांनी नेहमी अभ्यास करत राहावे. वाचत जावे व स्वतःला घडवत राहावे. मला सर्व माहित आहे. असा भ्रम तयार झाल्यानंतर माणसाचा प्रवास जागीच थांबतो. तो जागीच थांबू नये म्हणून आपण अभ्यास करत राहिलं पाहिजे.


'शुध्द पाण्यासाठी ओझोन थेरपी' किरण गद्रे हे 'क्लोरीन पुराण' सांगतात.


मोठ्या प्रमाणात निर्जंतुक पाणी निर्मितीसाठी साधारण काही प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात. क्लोरीनेशन,अल्ट्रावायलेट,ओझोनेशन, ब्रोमीन ॲसिड ट्रीटमेंट,चांदी व तांबे यांचे आयन, तसेच पोटॅशियम परमॅग्नेट,अल्ट्रासोनिकेशन इत्यादी..


आपल्याकडे पाणी निर्जंतुक करण्यासाठी सरसकट क्लोरीनेशनचा वापर होतो. पाणी गाळून त्यातील माती बाजुला करुन व तत्सम घटकांना पाण्यातून वेगळे केले जाते.. तुरटीचा वापर करून गरजेप्रमाणे क्लोरीनची मात्रा पाण्यात मिसळली जाते. पाणी थेट घराच्या नळाद्वारे आपण पाणी भरेपर्यंतच्या काळापर्यंत आणि नंतरही काही काळ काही प्रमाणात टिकून राहील इतक्या प्रमाणात क्लोरीनची मात्रा असते. यात पाणी निश्चितपणे निर्जंतुक होते. ही मात्रा पाच पीपीएम म्हणजे एका लिटरसाठी पाच मिलीग्राम इतकी असते व आपल्या नळाद्वारे भांड्यात पडेपर्यंत पाण्यातली मात्रा ०. १ ते १ पीपीएम इतकी कमी होत जाते.


पूर्ण अमेरिकेत २,००० हून अधिक वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये क्लोरीनेशन केले जात नाही. तिथे निर्जंतुकीकरणासाठी ओझोनचा वापर केला जातो. फ्रान्समधे तर १९०३ पासूनच ओझोन पाणी प्रक्रिया केंद्रात पाणी निर्जंतुकीकरणासाठी वापरायला सुरूवात झाली होती. हा जगातला पहिलाच ओझोनने पाणी शुध्दीकरण करण्याचा प्लांट होता. १९७० ते ८० पर्यंत जगात सर्वत्र क्लोरीनेशनने पाणी शुद्ध केले जात होते. पण पाण्यातील कोरीनेशनचा दुष्परिणाम यावर संशोधन सुरू झाले आणि हळूहळू मोठे क्लोरीनेशन पुराण बाहेर येऊ लागले.जसजसे हे क्लोरीन पुराण बाहेर येवू लागले तसतसा क्लोरीनचा वापर थांबवला गेला. मग सर्वाधिक सुरक्षित पर्याय ओझोनचा पुढे आला.


 पिण्याच्या पाण्यात निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीन मिसळला की पाण्यातील सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांशी क्लोरीनचा संयोग होतो. त्यातून शरीराला बाधक अशी अनेक रसायने तयार होतात. त्या घातक रसायनांमुळे मूत्राशय, गुदद्वार व आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो. केस व कातडीवर परिणाम होतात. थायरॉईड ग्रंथीवरही परिणाम होतात. सर्व जीवनाश्यक खाण्यापिण्याचे व त्यातील औषधी घटकांचे घातक पदार्थात रूपांतर होते. जन्मतः बालकात व्यंग,अपंगत्व, श्वसनाचे रोग येण्याची शक्यता वाढते. हृदयाचे स्नायू व रक्तवाहिन्यांमध्ये काठीण्य निर्माण होते. क्लोरीनमुळे तयार झालेल्या पाण्यातील विविध रसायनांचा परिणाम थायरॉईड ग्रंथीवर होतो. त्यातून हार्मोन्सचा समतोल बिघडून त्याचे विकार वाढतात. हेही सिद्ध झाले आहे की पाण्यात क्लोरींनमुळे होणारी संयुगे हे आपल्याला नैसर्गिकरीत्या आवश्यक असलेल्या औषधी तत्वांचे रूपांतर कर्करोगयुक्त पदार्थ निर्मितीत करतात,की ज्यामुळे अगदी चहापासून भाज्या फळे मसाल्यांचे पदार्थ औषधी वनस्पती यांचे शरीरासाठी आवश्यक असणारी गुणधर्मच नष्ट होऊन जातात.


असेही सिद्ध केले आहे की पिण्याच्या पाण्यात क्लोरीनने जितका त्रास होऊ शकतो त्यापेक्षा जास्त धोका पोहण्याच्या तलावातील पाण्यातील क्लोरीनमुळे आहे असे आढळते. उदाहरणार्थ ज्यावेळी एखादा माणूस गरम पाण्याने शॉवरखाली अंघोळ करतो त्यावेळी त्याच्या त्वचेवरील रंध्रे मोकळी होतात. साधारण ४२ अंश तापमानाला क्लोरीनमुळे निर्माण झालेले क्लोरोफॉर्म,ट्राय हॅलो मिथेन हे पदार्थ त्या रंध्रामधून रक्तात भिनत जातात. तेथून ते फुफ्फुसात जातात. त्यातूनच श्वसनाचे विकार विशेषतः दमा वाढतो. तसेच स्विमिंग टँकमधल्या क्लोरीनमुळे केसांवरही अनिष्ट परिणाम होऊन ते रुक्ष, रंग विरहित होतात. डोक्याच्या त्वचेवर व शरीराच्या इतर त्वचेवर सुद्धा या पदार्थांचे घातक परिणाम होतात.


क्लोरीनमुळे जलवाहिन्यांच्या गंज प्रक्रियेला वेग येतो आणि त्यामुळे पाणीपुरवठा लाईन्स वरचेवर लिकेज होऊ लागतात.


क्लोरिन व ओझोनची बॅक्टेरिया बाबतची प्रक्रिया एकच आहे. क्लोरीन किंवा ओझोन बॅक्टेरियाची पेशी भित्तिका फोडून टाकतात व त्याच्या पेशीद्रव्याबरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन पेशी नष्ट होतात.


क्लोरीनचे तोटे आणि ओझोनचे फायदे सविस्तरपणे 'अभिनव जलनायक' या पुस्तकात वाचायला मिळतील.


मला वाटते आपण अशीच पुस्तके वाचली पाहिजेत.

जी तुमच्या हृदयावर खोलवर जखमा करतात...!

पुस्तक कसे पाहिजे?

 एखाद्या कुर्‍हाडीसारखे ज्याने आपल्यातील बर्फ वितळला पाहिजे.फ्रान्झ काफ्काचे अप्रतिम वाक्य जे पुस्तकातील अंतःकरण उलगडून सांगणारं आहे.

'अभिनव जलनायक' हे पुस्तक सुध्दा हेच सांगत आहे.हे पुस्तक काळाच्या पुढे आहे.


आता पाहू राघव खडककर यांचा जीवनपट 'मेम्ब्रेन सिस्टिमचे डॉक्टर' 

कारखान्याच्या सांडपाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न मोठा गंभीर आहे. या प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे असते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून यंत्रणा उभारलेली असते. या यंत्रणेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उत्तम डॉक्टर हवा असतो.असेच मेम्ब्रेन सिस्टीमचे डॉक्टर आहे राघव खडककर.


पाणी प्रदूषण ही जगातली सर्वात मोठी समस्या. जगाचे सगळ्यात जास्त नुकसान त्यामुळे होते. मुळात पृथ्वीवर जीवसृष्टी तयार झाली तीच मुळी पाणी असल्यामुळे..

त्यामुळे पाणी प्रश्न हा सर्व जीवसृष्टीचा आहे.पण दुर्दैवाने पाणी प्रदूषणाची चर्चा सामान्यपणे माणसाला भेडसावणारी समस्या म्हणूनच केली जाते. नुकसान आर्थिक बाबतीत अधिक आहे पण तुलनेत जलचर, उभयचर यांच्या प्रजातीच प्रदूषित पाण्यामुळे नष्ट होत आहेत. प्राण्यांपासून शेवाळ, प्रवाळ, पाण्यातील विविध सूक्ष्म आणि मोठे जीव अशा सर्व जीवसृष्टींना हानी पोहचते.


पाणी प्रदूषणाचा प्रश्न गहन गंभीर आहे, पण आजकाल मोठमोठ्या कारखान्यांमधून समाधानकारक गुणवत्तेचे सांडपाणी बाहेर सांडलेले दिसते,विविध तंत्रज्ञानातून उभारलेल्या मशिनरीमुळे हे शक्य होत आहे. या मशिनरीची उभारणी व देखभाल करणारी व्यक्ती किंवा संस्था यांच्यामुळे या पाण्याच्या गुणवत्तेत सातत्य ठेवता येणे शक्य होते.


असेच एक डॉक्टर आहेत राघव खडककर आणि त्यांची विपणन कंपनी. दिवसेंदिवस इंडस्ट्रीचा आकार,

आवाका,संख्याही खूप वाढते आहे. आपल्याला दैनंदिन जीवनात समोर असलेल्या कंपन्याच माहिती असतात. पण प्रत्यक्षात भरपूर मोठमोठ्या कंपन्या आणि त्यांची उत्पादने आपल्या नजरेच्या पलीकडे सुरू असतात. हा आवाका व आकार याबाबत सांगायचे झाले तर 'रोज दोन तीन कोटी लिटर पाणी ह्या इंडस्ट्रीज वापरतात', म्हणजे तितकेच सांडपाणी ही तयार करणाऱ्या अशा या अवाढव्य कंपन्या आपल्या देशात व जगात अनेक आहेत. खाण उद्योग,धातू उद्योग,टेक्स्टाईल, फार्मासिटिकल,

केमिकल,फर्टीलायझर, पेट्रोकेमिकल याबरोबरच पॉवर प्लांट देखील या आणि इतर क्षेत्रातल्या या कंपन्या आहेत. म्हणजे या सांडपाण्यामुळे किती मोठ्या प्रमाणात नदी, तलाव आणि समुद्राचे प्रदूषण होत असेल याची कल्पना येते.पण काही ठिकाणी दोन तीन प्रमुख गोष्टींमुळे हे प्रदूषण रोखले जात आहे. 


१) कंपन्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सतत उपलब्ध असणे हे खूप आव्हानात्मक आहे. 


२) मोजकेच पण प्रभावी पर्यावरणप्रेमी लोक व पर्यावरणप्रेमी प्रशासन यांनी माणूस,प्राणी, वनस्पती व जमीन या सर्वांच्या अस्तित्वाचा व भवितव्याचा विचार करून बनवलेले प्रदूषण व पर्यावरण विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी. 


३) या विषयात असलेले सजग कार्यकर्ते व जनसामान्यांचा नैतिक दबाव या कारखान्यांवर असणे,या सर्वांचा विचार या मोठ्या उद्योगांना करावाच लागतो, कारण त्यांच्या कारखान्यांचा नफा, उत्पादकता ही कारखाने चालू असल्यामध्येच आहे, त्यामुळे पर्यावरणीय कायदे व लोकांचा विरोध या मुद्दयावर तोटा किंवा उद्योग बंद पडणे हे यांना परवडणारे नसते. म्हणूनच प्रदूषित घटकांच्या प्रक्रियेवर काम करणे गेल्या दोन-तीन दशकांत खूप अग्रक्रमाचे ठरत आहे. म्हणूनच सांडपाणी प्रक्रिया व हवेचे प्रदूषण नियंत्रणासाठी कोट्यावधी रुपयांची यंत्रे आणि यंत्रणा काम करत असते. सांडपाणी प्रक्रियेत ई.टी.पी. (Effluent Treatment Plant) च्या वापराबरोबरच गेली काही दशके मेम्ब्रेन फिल्टर्सच्या माध्यमातून रिव्हर्स ऑस्मॉसिसने सांडपाणी शुद्ध केले जाते. साधे पाणी शुद्ध करण्यासाठी आर.ओ. फिल्टर मेम्ब्रेन आणि सांडपाणी शुद्धीकरणासाठीचे मेम्ब्रेन वेगवेगळे असतात. तसेच सांडपाणी प्रत्येक इंडस्ट्रीचे वेगळे वेगळे असल्याने मेम्ब्रेनची संख्या व त्यांचे प्रकार वेगळे असतात. या मेम्ब्रेनमधून सांडपाणी शुद्ध केले जाते. या एकेका मेम्ब्रेनची किंमत २२ ते २५ हजार रुपये असते.असे हजार-पंधराशे मेम्ब्रेनची एक सिस्टिम आणि अशा सात आठ किंवा जास्त ही सिस्टिम अशी ती मांडणी असते,यंत्रणा असते. म्हणजे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक या सांडपाणी प्रक्रियेत झालेली असते. तर यातल्या या मेम्ब्रेनचा अभ्यास,त्यांची योग्यता,त्यांचा वापर, त्यांच्या समस्या आणि त्यावर उत्तरे शोधण्याचे काम करते राघव खडककर यांची कंपनी.मेम्ब्रेन पाणी तंदुरुस्त ठेवते आणि मेम्ब्रेनला तंदुरुस्त राघवजी.म्हणजे प्रत्यक्ष पाण्याची आणि जलचरांची सेवाच की!


ही सेवा म्हणजे संपुर्ण मानवतेचीच सेवा या ठिकाणी नतमस्तक होऊन पुढे जाऊ..!


... अजून कर्तुत्वाच्या गाथा पुढे सुरू आहेत.थोड्या थोड्या भागात त्या क्रमशः प्रकाशित केल्या जातील.


विजय कृष्णात गायकवाड







१/११/२२

" अभिनव जलनायक समिक्षा "आतून माणूस असण्याची जाणीव करून देणारं पुस्तक..!

'माणसाचं जीवन हे अज्ञात असतं. जसं जसं त्याला ज्ञान प्राप्त होतं. तसं तसं जीवन हे ज्ञात होतं. अज्ञात जीवन ज्ञात करण्यासाठी 'पुस्तक' हे एक जीवनदायी माध्यम आहे.


परवा सहज पुस्तक वाचत असता बेंजामिन फ्रँकलिन यांनी हळूच माझ्या कानात सांगितलं. 'मेल्यानंतर भरपूर झोपायचं आहे. आता तरी जागा रहा..!'

त्यापासूनच मी खडबडून 'आतून' जागा झालो.


दररोज जीवन जगत असताना पोटापाण्याच्या प्रश्नाचे उत्तर सोडवत असताना कधी कधी शारीरिक कष्टातून एखादी शारीरिक पातळीवर डूलकी लागते. मग अशी डूलकी लागली असता.आणखी थोडी हळुवारपणे झोपेतून जागे करण्याची वेळ येते, म्हणतात. मनाच्या नियंत्रणाखाली शरीराचे अवयव असतात.म्हणूनच आतुन जीवंपणा यावा लागतो..मग असा जीवंतपणा सोबत घेवून अविरतपणे प्रवास करणारे वेगळे पुस्तक जे आपल्या DNA-RNA यांनाही आपल्यासोबत घेऊन जात असते.असे पुस्तक भेटले की आपण मग कायमचेच जागेपणीचे आयुष्य जगतो.


अशाच 'जीवंत' पुस्तकाचा जीवनपट आपण उलगडून पाहणार आहोत.


पुस्तकाचे नाव आहे.'अभिनव जलनायक' मेनका प्रकाशनाचे २३७ पृष्ठसंख्या असणारे हे पुस्तक " सतीश खाडे यांनी लिहिलेले आहे.


" फार वर्षापुर्वी एका मासिकात पुस्तक व प्रस्तावनेबाबत 'वेगळे' असे वाचावयास मिळाले.

'लंकेचा राम,अयोध्येचा रावण' या पुस्तकाची प्रस्तावना १५० पानांची आहे.तर मुळ विषय ४० ते ५० पानांचा आहे.( यामध्ये काही बदल असु शकतो..) आता ज्या पुस्तकाबद्दल मी लिहित आहे.ते पुस्तकसुध्दा वेगळ्या धाटणीचे आहे.या पुस्तकावर मी ३४ पाने लिहिली आहेत.


स्वतःचा स्वतंत्र मी शोध घेत असतो.


कोणतेही कुंपण नसणारे जीवन मी जगतो.व त्यावर माझी श्रध्दा आहे.


'निसर्गाची नवलाई' या नावाचा त्यांचा पॉडकास्ट आहे. यामध्ये पशु,पक्षी, प्राणी यांची संवेदना भावभावना याबद्दल आतापर्यंत अकरा भाग मी श्रवण केलेले आहेत. हे भाग श्रवण करत असताना निसर्गच संपूर्णपणे आपल्या भावभावनेसोबत आपल्याशी प्रेमाने बोलतो आहे असेच मला वाटते. जणू संवेदनशील मनाने संवेदनशील मनाला घातलेली ती साद आहे.


पुस्तकाची सुरुवातच मोकळ्या व प्रामाणिक मनानं झाली आहे.


'आटलेल्या, तसेच प्रदूषित झालेल्या जलस्त्रोतांमुळे पृथ्वीवरून कायमस्वरूपी नष्ट झालेल्या प्राणी आणि वनस्पतींच्या सर्व प्रजातींना अपराधी मनाने अर्पण..!


एका गोष्टीनुसार एका तरुणाने सॉक्रेटिसला विचारले,त्याला शहाणपण,ज्ञान कसे मिळेल.


'माझ्यासोबत ये', सॉक्रेटिस उत्तरला व त्याने त्या तरुणाला नदीजवळ नेले. दोघेही नदीत उतरले व आतल्या दिशेने चालू लागले. जेव्हा पाणी गळ्यापाशी आले तेव्हा अचानक सॉक्रेटिसने त्या तरुणाचे डोके पाण्यात दाबून धरले. तो तरुण श्वास घेण्यासाठी धडपडू लागला. काही क्षणानंतर सॉक्रेटिसने त्याला सोडून दिले.


पाण्याबाहेर पडल्यावर जेव्हा तो तरुण पूर्वस्थितीला आला तेव्हा सॉक्रेटिसने त्याला विचारले," जेव्हा तुझे डोके पाण्याखाली होते तेव्हा तुला सगळ्यात जास्त काय हवे होते?"


"मला श्वास घ्यायला हवा हवी होती." तरुण उत्तरला.


सावकाश मान हलवत सॉक्रेटिस म्हणाला, "बरोबर..! पाण्यात बुडत असताना तुला जितक्या तीव्रतेने हवेची गरज होती तितक्यात तीव्रतेने तुला जेव्हा शहाणपण व ज्ञानाचा ध्यास लागेल तेव्हाच ते तुला मिळेल."


या कथेची वारंवार आठवण आली.


तज्ञता समर्पित भाव या दोन्हीचा संगम ज्यांच्या ठाई आहे. अशा चरित्र नायकांचा जीवनपट ( ज्यांच्या कार्याबद्दल मला नाविन्यपूर्ण ज्ञान मिळाले.) या पुस्तकात आहे.


डॉ.प्रमोद मोघे 'ऐंशी' की तैशी करणारा वैज्ञानिक ... पर्यावरण म्हणजे काय? निसर्गात जे सहज आणि नियमित घडते ते पर्यावरण ! आणि प्रदूषण म्हणजे काय? निसर्गातील किंवा पर्यावरणातील कोणतीही ढवळाढवळ म्हणजे प्रदूषण ! इतका सरळ साधा मूलभूत विचार मी आज पर्यंत कधीच वाचलेला नाही


तलावातले पाणी वापरण्यापूर्वी शुद्ध करतो म्हणजे काय काय करतो? तुरटी फिरवून गाळ बाजूला करतो. चुना टाकतो. मग त्यात क्लोरीन सोडतो. आता तुरटी म्हणजे अल्युमिनियम सल्फेट. त्यात आले अल्युमिनियमचे सल्फेटशी संयोग.सल्फ्युरिक ॲसिडची प्रक्रिया,

अल्युमिनियम आणि सल्फर निसर्गातूनच खाणीतून मिळणार. निसर्गातून मिळणाऱ्या कुठल्यातरी दोन संयुगाच्या प्रक्रियेत सल्फ्युरिक ॲसिड तयार होणार त्यानंतर चुन्यासाठी उकरा खाणी..आणि क्लोरीन मिळवण्यासाठी समुद्राच्या पाण्यावर मर्क्युरीची प्रक्रिया करा. त्यातून तयार होतात क्लोरीन आणि पाऱ्यांची संयुगे.त्या पारामुळे पुन्हा जमिनीचे प्रदूषण इतके कमीत कमी प्रदूषण.इतका कमीत कमी प्रदूषणाचा खेळ आपल्याला शुद्ध पाणी मिळवण्यासाठी करावा लागतो हे पहिल्यांदाच मी वाचून हादरलो.


संपुर्ण हादरा पुढेच आहे. क्लोरीन व पाण्यातील इतर घटकांचा संयोग होऊन 'कॅन्सर' होणारी सहा प्रकारची संयुगे तयार होतात. हो त्याने अनेकांना कॅन्सर होतो. युरोप अमेरिकेने चाळीस वर्षांपूर्वी हे क्लोरीन वापरणे बंद केले. ( त्यांच्या या सत्य स्विकारण्याच्या मोठ्या मनाचा आपण सन्मानपूर्वक सन्मान केला पाहिजे.) 'तुरटी' मुळे विस्मरण इत्यादी परिणाम दिसले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अहवाल असं सांगतो.


पण हे नवीन उपयुक्त ज्ञान सांगत असताना. एक खंतही त्यांनी सांगितलेली आहे.


जागतिक आरोग्य संघटनेने पिण्याच्या पाण्याच्या निर्देश शुद्ध पाण्यासाठी विविध ४० कसोट्या सांगितल्या आहेत.त्यापैकी भारतातील कुठल्याही शहरांमध्ये यातील निम्म्याही कसोट्या तपासल्या जात नाहीत. तर दोष दूर करणे दूरच.जास्तीत जास्त २० कसोट्यातून पार झालेले पाणी मिळते तेच आपण शुद्ध समजतो शिवाय त्यात क्लोरीन आहेच.


डॉ. मोघे सरांनी १९९० ते २००२ पर्यंत नॅशनल केमिकल लॅबोरेटरी फक्त आणि फक्त पाण्यावरच काम केले.पूर्ण वेळ पाणी ! त्यातही ९०% वेळा सांडपाणी !! 


त्यांनी देशांतर्गत तेहतीस व आंतरराष्ट्रीय सात पेटंट मिळवली आहेत, एकूण ४० पेटंट. एक पेटंट घ्यायची असेल तर काय काय करावे लागते, हे कळलं तर डोकं गरगरत. तुम्हाला जर हा अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष पुस्तकांमध्ये हा पेटंटचा प्रवास वाचावा. एवढं सगळं करूनही पेटंट मिळालेला आनंद फक्त सात वर्षे टिकतो. नंतर त्याचे स्वामित्व समाजाकडे ! येथे पेटंट खुले होते. यासाठी भरमसाठ पैसा वेळ द्यावा लागतो. त्यासोबत संशोधन आणि अभ्यास आहेच.


हे वाचत असताना मला 'प्रवास' या पुस्तकातील एक प्रसंग आठवला.


" राईट बंधूंना आपण जरी विमानाचे संशोधक मानत असलो तरी ते स्वतः मात्र तसं मानत नव्हते. विशेषतः विमानाचा शोध आपण स्वतःच लावला असा त्यांनी कधी दावाच केला नाही. त्यांनी १९०६ साली जे पेटंट घेतलं त्यातुनही आपल्याला हे जाणवतं." उडणाऱ्या यंत्रामध्ये आपण काही नवीन उपकरणं तयार केली आहेत.आणि त्यात काही सुधारणा केल्या आहेत अशा आशयाचं त्यांच पेटंट होतं. त्यांच्या पेटंटच शीर्षक होतं : न्यू अँड युजफुल इम्प्रुव्हमेंट्स इन फ्लाइंग मशिन्स..!


हे सगळं विचार करायला लावणारं आहे.


झाडांना देई पाण्यापुरते पाणी हे प्रकरण विजय जोगळेकर यांच्या कार्याबद्दल तळमळीने सांगते.


'साडेसात अश्‍वशक्तीचा पंप २४ तासात जेवढे पाणी उपसतो, तेवढेच पाणी एकरभर फळ बागेला वर्षभरासाठी आवश्यक असते व झाडाला जास्तीत जास्त किती फळे लागू शकतात, हे जोगळेकर लगेच सांगू शकतात. तुम्हाला एक-दीड महिना फळ अगोदर यायला हवे किंवा उशीर यायला हवे, तर त्याप्रमाणे आपण करूया असे जोगळेकर सहज सांगतात. ही जादू करायला ते शिकले आहेत.४५० मिलिमीटर पाऊस खरं तर पुरेसा आहे. आणि हे कृतीने सिद्ध करणाऱ्या शेती, शेतकरी, दारिद्र्य, वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक, लोकाभिमुख उत्तर शोधण्याची तयारी, केलेले संशोधन लोकांपर्यंत पोहोचवणे, प्रसिद्धीपासून लांब राहणे, ज्ञानयोग व कर्मयोगाची साधना करत साधे जीवन जगणे समजून घेण्यासाठी हे वाचलेच पाहिजे.


...तर कोणत्याही झाडाचा एक प्रोग्राम असतो. संगणकाच्या प्रोग्राम सारखा तो बीजापासून सुरू होऊन मूळ खोडाद्वारे प्रवास करत फळापर्यंत येऊन पोहोचतो, तो त्यांनी समजून घेतला, अनुभवला आहे.


जगात वनस्पतीच्या चार लाख प्रकारच्या प्रजाती आहेत. त्या सगळ्यांचे घटक सारखेच आहेत. त्या सर्व कशापासून बनल्या आहेत,तर ७५%पाणी,२४% हायड्रोकार्बन आणि एक टक्का मिनरल्स. त्यातला प्रत्येक घटक महत्त्वाचा, त्याच्या वाढीसाठी हे सर्व घटक हवेतच ! एका घटकाच्या अस्तित्वामुळे दुसऱ्या घटकाचा उपयोग होतो. विविध प्रक्रिया या प्रत्येक घटकांचा स्वतःचे एक रोल असतो.असं हे मानवी जीवनातील विश्लेषण मनाचा ठाव घेणारे आहे. वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध झालेल्या नवीन गोष्टी या ठिकाणी अविश्वसनीयरीत्या वाचावयास मिळतील. ही माहिती खरोखरच पुढील पिढीचा वारसा सांगणारी आहे. आणि एवढे महान काम करूनही,नम्रता मात्र हिमालया एवढी ते म्हणतात,'अरे, मी काहीही विशेष केलं नाही. मी जे केले तो फक्त रहस्यभेद! अद्भुततेचा भेद!


Dismistryfication !! हे सगळं निसर्गात चालतच होतं लाख वर्षांपासून. त्याची उकल मी केली फक्त. अरे, माणसाची आजवरची सगळी प्रगती त्यामुळेच तर झाली आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा शोध, विविध अप्लिकेशन हे रहस्य भेद याचाच परिणाम आहे. सर्व निसर्गात आहेच अस्तित्वात.माणसाला ते रहस्य गवसले. त्याचा त्याने परत वेगळ्या पद्धतीने वापर करून घेतला, की तो शोध किंवा तंत्रज्ञान ठरते. मी अगदी तेच केले, विशेष काही नाही. खरंच या ठिकाणी 'दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती !!


उसातले पाणी फिरवते चक्र बी.बी.ठोंबरे प्रकरणात उद्योजकातील दोन तीन प्रमुख गुणांचा उल्लेख वाचावयास मिळतो. पहिला म्हणजे विश्वासार्ह नेतृत्व गुण.. दुसरा म्हणजे, व्यावसायिकतेचा अर्थ.. नफ्यासाठी व्यवसाय तेवढेच नाही तर सर्व घटकांचे परस्परावलंबित मान्य करणे व त्यांच्या हिताचे निर्णय घेणे. तिसरे म्हणजे नवनिर्माणाची आस व ध्यास..


ठोंबरे साहेब म्हणजे कल्पकतेचे भांडार त्यांनी सांगितलेले नवनिर्माणचे तीन प्रकार


पहिला प्रकार म्हणजे एखादी कल्पना घेऊन सतत यासाठी प्रयोग करणे, दुसरा प्रकार म्हणजे गरजेपुरती किंवा अपरिहार्यतेपोटी करावे लागणारे नवनिर्माण आणि तिसरे म्हणजे अपघाताने होणारे नवनिर्माण ( उदाहरणार्थ पेनिसिलीन ) रांजणीतील नॅचरल शुगर कारखाना हे त्याचे जिवंत उदाहरण.


सर्वात पहिल्यांदा कच्ची साखर ब्राझील वरून आणली. कच्ची साखर पिवळसर असते आणि दाणेही बारीक असतात. ती पक्की करायची म्हणजे काय तर दाणे मोठे व पांढरीशुभ्र साखर तयार करायची. त्यासाठी कच्च्या साखरेवर सल्फर डायऑक्साइडची प्रक्रिया करायची. आता यासाठी परदेशातील कारखाने खास मशिनरीचा वापर करतात. त्यांची किंमतही भरपूर आहे. पण ठोंबरे साहेब व त्यांच्या कारखान्याच्या इंजिनियरनी मिळून एक नवीन प्रक्रिया विकसित केली. उसाचा रस त्यापासून पाक आणि पाकापासून साखर अशा तीन टप्प्यात कारखान्यात साखर बनते. आता या प्रक्रियेतील यंत्रात एक विशिष्ट डिझाईन केलेले भांड बसवलं आणि कच्ची साखर पक्की होऊ लागली. अगदी नगण्य किमतीचं सुधारित भांड वापरून. त्यानंतर त्यांनी पुढच्या काही वर्षात सल्फर- डायऑक्साइडची प्रक्रिया टाळणार यंत्रणाही तयार केली. त्यामुळे साखरेतील गंधकाचे प्रमाण खूप कमी झाले आणि त्यामुळे साखरेतील दोषही खूप कमी झाला.


साखर कारखान्यातून महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिलेल्या मानांकनानुसार जास्तीत जास्त चारशे लिटर प्रति टन इतके सांडपाणी सोडण्यास परवानगी असताना नॅचरल शुगर कारखान्यातून फक्त ५० ते ७० लिटर प्रति टन इतकेच सांडपाणी बाहेर जाते. उसाच्या रसाच्या पाण्यापासून झालेल्या वाफेच्या दबावातून टर्बाईन्स फिरवून मोठ्या प्रमाणात विद्युती बनवली जाते, मगच त्या वाफेचे पाण्यात रूपांतर केले जाते. म्हणजे वाफेचा दुहेरी उपयोग सुरू झाला. आता लागणारे पाणी साखर कारखान्यातूनच मिळते आणि डिस्टलरीच्या सांडपाण्यातून पुन्हा पाण्याची पुनर्निर्मिती सुरू झाली, त्यात त्यावर वेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करून वर्षाला या प्लांटमधून पन्नास हजार घनमीटर बायोगॅस आणि तितक्याच मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड तयार केला जातो. या बायोगॅसचा इंधन म्हणून वापर करून पुन्हा त्यातून वाफेद्वारे विद्युत निर्मिती होते.


कार्बन-डाय- ऑक्साइडचे कॉम्प्रेशन करून सॉफ्टड्रिंक बनविणाऱ्या कारखान्यांना तो विकला जातो. हे सर्व करताना ट्रीटमेंट झाल्यामुळे पूर्ण शुद्ध पाणी बाहेर पडते. ते परत परत वापरले जाते. सगळ्यात परमोच्च बिंदू म्हणजे डिस्टिलरीतून झिरो प्रदुषण आहे. कारण बायोगॅस वापरल्यामुळे इतर कुठल्याही प्रकारचे इंधन जळत नाही, त्यामुळे धूर नाही त्यामुळे हवेचे प्रदूषण नाही आणि शेवटी शुद्ध पाणी म्हणून बाहेर पडते, म्हणजेच पाण्याचेही प्रदूषण नाही.


अशीही पाणी पुनर्निर्मितीची यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला मार्गदर्शक व प्रेरक ठरली. आज मितीला जवळ जवळ सर्वच कारखान्यात ही राबवली जाते.


या कार्याला घरातूनच बसल्या जागेवरून सलाम ठोकला.


हे नाविन्यपूर्ण उपक्रम, वैज्ञानिक प्रयोग व प्रयोगकर्ते यांचे 'जरा हटके' जीवनगौरव चरित्र वाचत असता.एका नोंदीने लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.


 'गन्स,जर्म्स ॲण्ड स्टील' जेरेड डायमंड ( अनुवाद- सविता दामले ) जे मानव जातीचा १३ हजार वर्षाचा संक्षिप्त इतिहास सांगते.


गरज ही शोधाची जननी बनण्यापेक्षा शोध हाच गरजेचा पिता ठरतो..!


जेम्स वॅटने १७६९ साली वाफेच्या इंजिनाचा शोध लावला, कारण ब्रिटिश कोळसा खाणीत भरलेले पाणी बाहेर काढण्याची समस्या त्याला सोडवायची होती. जेम्स वॅटन खाणीतलं पाणी बाहेर काढण्यासाठी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला खरा, परंतु लवकरच त्याचा वापर कापड गिरण्यांना ऊर्जा देण्यासाठी होऊ लागला. नंतर रेल्वे इंजिन आणि बोटीच्या इंजिनासाठी अधिक नफ्यावर त्याचा वापर होऊ लागला.


जेम्स वॅटने १७६९ साली वाफेच्या इंजिनाचा शोध तेव्हा चहाच्या किटलीच्या तोंडातून बाहेर येणारी वाफ पाहून त्याला प्रेरणा मिळाली होती. या तथाकथितदंतकथेमागचं सत्य हे आहे की वॅटला आपल्या वाफेच्या इंजिनाची कल्पना थॉमस न्यूकॉमेननं बनवलेल्या वाफेच्या इंजिनाच्या मॉडेलमध्ये दुरुस्ती करताना मिळाली होती. ते इंजिन न्यूकॉमेनने ५७ वर्षापूर्वी शोधलं होतं आणि वॅटचं दुरुस्ती काम अवतरेपर्यंत तशी शंभराहून अधिक इंजिनं इंग्लंडमध्ये बनली.सुद्धा होती.


न्यूकॉमेननंही थॉमस सॅव्हरी या इंग्रज व्यक्तीने १६९८ साली स्वामित्वहक्क घेतलेल्या वाफेच्या इंजिनाच्या आधारे आपलं इंजिन बनवलं होतं, तर सॅव्हरीने आपलं इंजिन डेनिस पॅपिन या फ्रेंच माणसानं १६८० साली डिझाईन केलेल्या परंतु प्रत्यक्षात न बनलेल्या वाफेच्या इंजिनाच्या आधारे बनवलं होतं. त्या फ्रेंच माणसानंही डच शास्त्रज्ञ ख्रिस्टियन हायगेन्स आणि अन्य लोकांच्या मूळ कल्पनेवरून डिझाइन केलं होतं.वॅटनं न्यूकॉमेनच्या इंजिनात ( स्वतंत्र स्टिम कंडेन्सर आणि डबल ॲक्टिंग सिलिंडर बसवून ) भरीव सुधारणा केली.


... अजून कर्तुत्वाच्या गाथा पुढे सुरू आहेत.थोड्या थोड्या भागात त्या क्रमशः प्रकाशित केल्या जातील.


विजय कृष्णात गायकवाड

३०/१०/२२

… जाणून घेऊया किटकपुराण..

● मुंग्या


जगात १२ हजार प्रकारच्या मुंग्यांच्या प्रजाती आहेत.


ह्या कमीतकमी १० हजार ते १० लाख संख्येने एकत्रितपणे राहतात.


मुंग्या एकाचवेळी एकाच झाडाची सगळी पाने तोडत नाहीत.(निसर्गाने त्यांना तशी बुध्दी दिली आहे.)


लाखो हजारो संख्येने हल्ला करुन संपूर्ण झाडावरील सगळी पाने तोडू शकतात.पण त्या तसं करत नाही.आसपास असणाऱ्या इतर झाडांची पाने ती तोडतात.ही पाने आपल्या जमिनीखाली असणाऱ्या वारूळामध्ये (त्यांच्या घरात) नेऊन ठेवतात, व त्यावरती त्यांना खाण्यासाठी लागणारी बुरशी पसरवतात,त्यांची वाढ करतात.अशा पध्दतीने मुंग्या शेती करतात..


मुंग्या दुग्धपालन व पशुपालन सुद्धा करतात त्यांना आवडणारे जे किडे असतात. त्यांच्या शरीरातून जो पांढरा द्रव येतो. तो मुंग्यांना  फार आवडतो अशा किड्यांना मुंग्या पाळतात त्यांना खायला घालतात आणि त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारा तो पांढरा द्रव खातात. मुंग्यांच्या नादाला कोणताही प्राणी किंवा पक्षी लागत नाही आणि मुंग्याही कुणाला भीत नाहीत कारण त्या एकाच वेळी सर्व बाजूंनी हल्ला करतात.

( हत्तीसुध्दा यांच्या नादाला लागत नाहीत.)


या मुंगीच्या घराची रचना ही विशिष्ट प्रकारे केलेली असते.ज्या छोट्याशा जागेतून म्हणजे मुंग्या आत जातात त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काही मुंग्यांची ही नियुक्ती केली जात असते.( तिन्ही शिफ्टमध्ये यांचे हे सुरक्षा देण्याचे काम चालते.) तर विशिष्ट असा वेगळा आहार देऊन त्या मुंग्यांना बलवान केले जाते आणि मुंग्यानीच स्वतः तयार केलेल्या रसायनाचा वापर त्यांच्या डोक्यावरती करून त्यांचं डोकं ढालीसारखं टणक केलं जातं. यामुळे त्यांचं डोकं हे दरवाज्यासारखं होतं आणि घरात येणाऱ्या मार्गासमोर ते एका चिरेबंद दारासारखं बंद केलं जातं. या दरवाजातून ज्या वेळेला मुंगी आत येते त्यावेळी ही मुंगी आपलीच आहे का? याची खात्री करून घेण्यासाठी तिच्या अंगाला 'ओळखीचा' वास येतो का याची आधी खात्री करून घेतली जाते,आणि मगच तिला या घरामध्ये प्रवेश दिला जातो. मुंगी आपल्या वजनापेक्षा पाच ते सात पट वजन जास्त उचलू शकते. आणि जर त्या एकाचवेळी एकत्रित आल्या.तर आपल्या समुहापेक्षा ५० ते ६० पट वजन उचलू शकतात.


● फुलपाखरु 


मोनार जातीच्या फुलपाखरांची रूंदी जवळजवळ १ फुटांपर्यंत असते.ते अंडी घालण्यासाठी आपल्या वस्तीपासून ४ हजार किलोमीटर दूर जातात.आणि तिथे अंडी घालतात.ते अंतर आहे कन्याकुमारीचे टोक लडाख असे जरी धरले.


तरी ते ३८००(अडत्तीशे) कि.मी.होते. त्या ठिकाणी जाऊन तिथे अंडे घालतात.व परत येताना ते आपल्या पिल्लांना सोबत घेऊन मूळ ठिकाणी परत येतात.

का,कसं याचं संशोधन अजून बाकी आहे?


फुलपाखरे ही क्षार मिळवण्यासाठी समुद्राकाठी येतात.कारण त्यांच्या शरीरामध्ये क्षार नसते. ते मिळवण्यासाठी ते मृत प्राण्याजवळ जातात. सर्वात अगोदर फुलपाखरे याठिकाणी पोहोचतात.याकामी त्यांची तीक्ष्ण संवेदना नैसर्गिकरित्या उपयोगाला येते.जी मृत प्राण्याजवळ जाण्यासाठी त्यांना मदत करते.


पहिली औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये झाली. आणि यासाठी ऊर्जेची गरज भासली.व ही ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी कोळशाच्या खाणी मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आल्या.ज्यावेळी खाणींमध्ये काम करत असताना. कोळशाचा चुरा,राख व इतर घटक हे हवेमध्ये मोठ्याप्रमाणात वातावरणात मिसळून  जात.त्यामुळे आसपासचा सर्व परिसर हा काळाकुट्ट व्हायचा.हे सर्व होत असताना.नकळतपणे जवळच असणारी माणसं,झाडं हीसुध्दा काळी झाली होती..पण या काळ्या वातावरणात मात्र ही फुलपाखरे रंगीबेरंगी होती.त्यामुळे एक अडचण निर्माण झाली होती.सगळा परिसर काळा पण फुलपाखरे मात्र रंगीबेरंगी यामुळे त्यांना खाणारे सहज त्यांना ओळखत व मटकन खाऊन टाकत होते. त्यामुळे त्यांची पुढील पिढी अनुभव घेवून उत्क्रांत झाली.व त्यांनी काही कालांतराने आपला रंग कळा करून घेतला.पुढे कोळशाच्या खाणी बंद पडल्या त्यांची कोळशाची गरज संपली. परत पुढच्या ६० ते ७० वर्षामध्ये गंमत झाली. त्या फुलपाखरांनी परत आपला पुर्वीसारखा मुळ निसर्गाचा रंग धारण केला. त्यांच्या स्पिसिजमध्ये जे रंग होते.ते त्यांना सन्मानाने परत  मिळाले.


● कोळी ( स्पायडर )


आपल्याला जे कोळी दिसतात. त्यात कोळी जो जाळ विणतो. शक्यतो हे जाळ दरवेळी नर विणतो.त्यावेळी मादी बाजूला असते. मादी ही नरापेक्षा तीन चार पटीने मोठी असते. या जाळ्यामध्ये जर शिकार अडकली. तर नर आणि मादी दोघे मिळून त्याचा ताबा घेतात. यांच्यामध्ये एक भन्नाट पद्धत असते.जर एखाद्या नर कोळ्याला मादीला प्रपोज करायचं असेल तर त्या मादीला आवडणाऱ्या किड्याची शिकार करून त्याला अर्धमेला करून व्यवस्थित पॅकिंग करून मादीला तो भेट म्हणून देतो व तीला मागणी घालतो.(प्रपोज करतो)


जर मादीला ते पॅकिंग त्यातील किडा आवडला तर ती त्याला होकार देते,व ते एक होतात. असे निरीक्षण करून शास्त्रज्ञांनी त्याची नोंद घेतलेली आहे.


काही कोळी हुशार असतात त्यांना मुंग्या फार आवडतात. इतर कीटक त्यांना आवडतात पण मुंग्या त्यांच्या खास आवडीच्या असतात.आपण लहानपणी एक गोष्ट ऐकली होती की वाघाचं कातडं पांघरून वावरणारा लांडगा नेमकी याच गोष्टीची उजळणी हे कोळी करत असतात.


कोळ्यांना मुंग्या आवडतात पण मुंग्या सहजासहजी त्यांना 'हिगंलत' नाहीत.(विचारत) नाहीत.कारण त्या हल्ला करतात ही भीती असतेच. मग याठिकाणी कोळ्यांची कल्पकता धावून येते.हे कोळी मुंग्यांच्या जवळ जाऊन आकर्षित हालचाली करतात. आणि वेळ मिळताच एका मुंगीला अर्धमेली करतात.तिचे संपूर्ण शरीर आतून पोखरतात. व त्या शरीराच्या आत जातात. 'वरून मुंगी आतून कोळी' असं बहुरूप घेऊन हा कोळी मुंग्यांच्या वारूळात शिरतो.आणि हळूहळू त्यातील मुंग्यांचा फरशा पडतो. ही गोष्ट शोधून संशोधकांनी नवीन माहिती आपल्याकरिता उपलब्ध करून दिलेली आहे.


(सोनकिडे किंवा सोंडकिडे ही हाच मार्ग अवलंबतात.पण जर ते सापडले तर मात्र मुंग्या त्यांचा फडशा पाडतात. )


आतापर्यंत शोध लागलेल्या व शोधलेल्या अशा

७ लाख कीटकांच्या जाती माहीत झालेल्या आहेत. 


जाता जाता..!


मित्रांनो,जगामध्ये अमेरिकासारख्या देशात 'किड्याचा' मोठा पुतळा आहे.जो अलाबामा शहरात १०० वर्षापूर्वी सन्मानपूर्वक उभा केला आहे.अमेरीकेत त्यावेळी साधारणतः कपाशीचे पिके घेतले जात असे.त्यावेळी त्या राज्यातील सर्व पिकांवर कीड पडली. व किड्यांनी संपूर्ण पीक नष्ट केले. सर्वजण देशोधडीला लागली.


लोक परागंदा झाली.काहींनी राज्य सोडले.आणि त्याच वेळी 'एक होता कार्व्हर' यांचे आगमन झाले.त्यांनी त्या लोकांना भुईमूग,मका अशी  वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न घेण्यास सांगितले.त्यासाठी लागणारी सर्व माहिती त्यांनी लोकांना सांगितली. त्यानंतर दहा वर्षातच कष्ट करून त्या राज्याने आपली प्रगती केली.व लवकरच ते राज्य समृद्ध राज्य म्हणून गणले जावू लागले.


मग सर्वानुमते एक ठराव संमत करण्यात आला.आणि तो ऐतिहासिक,क्रांतिकारी जगावेगळा निर्णय घेण्यात आला. ज्या किड्यामुळे आपले कपाशीचे पीक नष्ट झाले,आणि आपणास पर्यायी पिकांचे उत्पादन घेण्याचा मार्ग मिळाली.त्यासाठी प्रेरणा देणाऱ्या व प्रतिकूल परिस्थितीत लढण्याचे बळ प्रदान करून नैसर्गिक निवड करायला सहकार्य केलेल्या त्या किड्याचा आपण मनस्वी सन्मान करायचा.त्या किड्याने जर पीक नष्ट केले नसते तर आपण दुसऱ्या पिकांचा विचारही केला त्या किड्याने आपणास पर्यायी मार्ग शोधण्यासाठी मदतच केली. म्हणून सन्मानपूर्वक सन्माननीय असा पुतळा बसवला गेला.

धन्य ती लोकं धन्य तो किडा..! हिच ती 'निसर्गाची नवलाई'


'निसर्गाची नवलाई' या सतीश खाडे यांच्या पाॅडकास्टमधून..


शब्दांकन - विजय कृष्णात गायकवाड


सदर लेखामधील भाग "मासिक शिक्षणयात्री ऑक्टो - नोव्हे जोडअंक 2022 ( दिवाळी विशेषांक ) मध्ये प्रकाशित केल्याबद्दल सर्वच संपादकीय मंडळाचे आभार..