७/३/२३
आपल्या पूर्वजांचा परिचय करून देणारा चार्लस डार्विन.. भाग २
५/३/२३
आपल्या पूर्वजांचा परिचय करून देणारा चार्लस डार्विन..
पास्कल एकदा म्हणाला की,क्लिओपात्रा हिच्या नाकाच्या आकारामुळे साऱ्या जगाचे स्वरूप बदलून गेले.त्यानंतर जवळजवळ दोन हजार वर्षांनी इतिहासाचे सारे स्वरूप एका केसावर आधारलेले होते.दुसऱ्या एकाच्या नाकावर नाकाच्या आकारावर इतिहास लोंबकळत होता. तो १८३१मधील मंदीचा काळ होता.बावीस वर्षांचा धर्माभ्यासक चार्लस डार्विन बादशहाच्या गलबतातून अवैज्ञानिक निसर्गाभ्यासक म्हणून जाणार होता.पण गलबताचा कप्तान फिट्झरॉय त्याला घेईना.त्याचे नाक पाहून शास्त्रज्ञ होण्याची पात्रता अगर त्यासाठी आवश्यक तो उत्साह त्याच्या (डार्विनच्या) ठिकाणी असेल,असे कप्तानला वाटेना.
डार्विन या 'बीगल' नामक जहाजातून न जाता,तर तो धर्मोपदेशक झाला असता.मानवाच्या उत्क्रांतीवरील त्याच्या युगप्रवर्तक संशोधनाला जग मुकले असते व या शोधामुळे इतिहास समृद्ध झाला,तसा झाला नसता.
डार्विन वस्तुतः धर्मोपाध्यायच व्हावयाचा;पण थोडक्यात चुकले.एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी मस्तिष्कशास्त्राचा फार बोलबाला होता. एका मस्तिष्कशास्त्रज्ञाने डार्विनचे डोके तपासून सागितले की,तो धर्माचा मोठा आधारस्तंभ होईल.कारण त्याला त्याच्या डोक्यातला धर्मशास्त्रदर्शक भाग चांगलाच वर आलेला दिसला.दहा सामान्य धर्मोपाध्यायांच्या डोक्यांतल्या भागाइतका भाग त्याच्या एकट्याच्या डोक्यात त्या मस्तिष्कशास्त्रज्ञाला आढळला.डार्विनचे नाक,तसेच त्याचे डोके त्याला सरळ इंग्लंडमधील चर्चच्या सिंहासनावर नेऊन बसवणार असे दिसत असता,
मानव जातीच्या सुदैवाने कप्तानाचे डार्विनच्या नाकाबद्दलचे मत बदलले व डार्विनला 'बीगल' गलबतावर जागा मिळाली.
त्याने बायबल मिटले.त्यातील सृष्टिनिर्मितीच्या कल्पित कथा सोडून दिल्या व साता समुद्रांत फिरून पशुपक्ष्यांत,
फुलाफळांत,वृक्षवनस्पर्तीत जगाचा इतिहास पाहण्यास प्रारंभ केला.जगाच्या इतिहासावरील प्रवचने दगडार्धोड्यांतून,नद्यांतून,वाळवंटांतून व पर्वतांतून ऐकत तो सर्वत्र हिंडला. किती मनोरंजक व सत्यमय ही जगाची कथा ! परत आल्यावर पूर्वी धर्मोपदेशक होऊ इच्छित असलेलाच डार्विन ज्या आधारावर चर्चची उभारणी झाली होती,त्या आधाराच्याच सत्यतेविषयी शंका घेऊ लागला.त्याने आव्हान दिले.
अदृश्य स्वर्गाचा अभ्यास व परलोकाचा विचार सोडून देऊन तो प्रत्यक्ष पृथ्वीचा अभ्यास करू लागला.जग एका धर्मोपदेशकाला मुकले खरे;पण त्याला एक अत्यंत मोठा शास्त्रज्ञ लाभला.
डार्विन व अब्राहम लिंकन एकाच दिवशी १२ फेब्रुवारी १८०९ रोजी जन्मल्यामुळे प्रोफेसर लल् म्हणे की,लिंकनने मानवाचे देह गुलामगिरीतून मुक्त केले.त्याप्रमाणे डार्विनने मानवी मन अज्ञानाच्या बंधनांपासून मुक्त केले.
१८०९ साल महापुरुषांच्या जन्मांनी भरलेले आहे.या वर्षी निसर्गाने मानवजातीच्या मांडीवर जणू महापुरुषाचे ताटच वाढून आणून ठेवले.डार्विन,लिंकन,गॉडस्ट,मेंडेलसन,
चॉपिन,पो,टेनिसन,ऑलिव्हर वेंडेल होल्म्स,एलिझाबेथ बॅरेट ब्राऊनिंग या सर्वांचा जन्म याच वर्षी झाला.
आणखीही कित्येक याच साली जन्मले असतील.यांपैकी प्रत्येकाने मानवजातीला शाश्वत सुंदरतेची व उदात्ततेची जोड करून दिली आहे. त्यात भरपूर भर घातली आहे.
डार्विनने घातलेली भरही काही कमी नव्हती.
डार्विनची मातृकुल व पितृकुल दोन्ही चांगली होती.त्याच्या वडिलांचे वडील इरॅस्मस डार्विन हे प्रसिद्ध निसर्गशास्त्री होते.त्यांनी वनस्पतींच्या प्रेमलीला हे काव्य तसेच लॉज ऑफ ऑरंगनिक लाइफ (सेंद्रीय जीवनाचे नियम) हे पुस्तक लिहिले.त्याचे आईकडचे पणजोबा चिनी मातीच्या भांड्यांचे मोठे कारखानदार होते.त्यांचे नाव जोशिया वेजवूड.शास्त्रे व कला यात खूप रस घेणारे वातावरण डार्विनच्या घरात असणे साहजिकच आहे.लहानपणी डार्विन सौम्य वृत्तीचा व चिंतनशील होता.त्याला लहानलहान खडे,दगड,शिंपले,नाणी,फुले,कृमी,जीवजंतू पक्ष्यांची अंडी,कीटक वगैरे जमविण्याचा फार नाद होता.तो जिवंत कीटक पकडीत नसे.मेलेले आढळले तरच उचली.फुलपाखरांनाही तो मारीत नसे.पण पक्षी मात्र आपल्या छोट्या बंदुकीने तो खुशाल मारी.दुरून जीव घेण्यात त्याच्या बालमनाला जणू हरकत वाटत नसावी.
पुष्कळ वर्षे त्याला शिकारीचा नाद होता.पण एके दिवशी एका जखमी पक्ष्याच्या वेदना पाहून त्याच्या मनावर खूप परिणाम झाला व केवळ करमणुकीखातर पुन्हा प्राण्यांची हिंसा करायची नाही,असा निश्चय त्याने केला.त्याची आई तो आठ वर्षांचा असताना वारली.त्याचा बाप रॉबर्ट वेअरिंग डार्विन हा भीमकाय पुरुष होता.त्याचे वजन साडेतीनशे पौंड होते.तो अत्यंत आनंदी व कार्यक्षम होता.पण त्याला पुत्राचा स्वभाव मात्र नीट समजला नाही.
तो निरुपयोगी उडाणटप्पू आहे,असे त्याचे मत होते.जगातला सारा केरकचरा फुले,पाखरे,
दगडधोंडे घरात आणून भरणारा हा पोरगा पुढे काय करणार असे त्याला वाटे.
मुलाच्या हातून काही कर्तबगारी होईल असे बापाला वाटेना.त्याच्या डोक्यात थोडेफार जुने ज्ञान कोंबण्यासाठी बापाने त्याला ग्रीक व लॅटिन शिकवणाऱ्या एका शाळेत घातले.पण मुलाने शिक्षणाकडे लक्ष न देता बापाच्या बागेतच एक गुप्त प्रयोगशाळा सुरू करून रसायनशास्त्राचे व पदार्थविज्ञानाचे प्रयोग चालवले.त्यामुळे त्याला सारे जण वेडपट म्हणू लागले.मुले त्याला 'गॅस' म्हणत.
हेडमास्तरांनी त्याला 'निष्काळजी माणूस' ही पदवी दिली.मुलाच्या या प्रयोगांमुळे व उंदीर पकडण्याच्या खेळामुळे विटून व घाबरून बापाने त्याला क्लासिकल शाळेतून काढून घेऊन एडिंबरो येथे वैद्यकाचा अभ्यास करण्यास पाठवले.
पित्याच्या धंद्याचे शिक्षण घेण्यात डार्विन थोडा वेळ रमला.पण अँनॉटॉमीची व्याख्याने त्याला कंटाळवाणी वाटू लागली.
शस्त्रक्रियेचे प्रयोगही त्याला बघवेनात.एका मुलावर करण्यात येत असलेली शस्त्रक्रिया पाहून डार्विन खोलीतून पळून गेला.त्यावेळी गुंगी आणणारा क्लोरोफॉर्म नसल्यामुळे तो मुलगा फोडीत असलेल्या किंकाळ्या पुढे कित्येक वर्षे तो विसरू शकला नाही.
गटेप्रमाणेच तो वर्गात फारसे शिकला नाही.तो शाळेबाहेरच बरेचसे शिकला.तो दारू पिई, जुगार खेळे,प्रेम करी.हे सर्व करीत असताना तो आपल्या अजबखान्यात अधिकाधिक वस्तूंची भर घाली.'मुलगा डॉक्टर होणे शक्य नाही'असे वाटल्यामुळे बापाने त्याला धर्मोपदेशक करायचे ठरवून केंब्रिजच्या ख्रिश्चन कॉलेजात घातले.या वेळी तो अठरा वर्षांचा होता.येथे तो तीन वर्षे होता. 'ही तीन वर्षे फुकट गेली,वाईट वाटते.नुसती फुकट जाती तरी बरे.पण प्रार्थना,दारू पिणे,गाणे,पत्ते खेळणे या आणखी गोष्टी त्यात होत्या.'
'बीगल' गलबतावरच्या प्रवासाने डार्विनच्या जीवनाला तर नवीन दिशा लावलीच.पण साऱ्या मानवी विचारांचीही दिशा बदलली.ही युगप्रवर्तक सफर पाच वर्षे चालली होती. गलबतातून पृथ्वीप्रदक्षिणा करून डार्विनने जीवनाचे कोडे उलगडण्यासाठी निसर्गाच्या अनेक वस्तू जमा केल्या.सृष्टीत सर्वत्र विखुरलेले नाना नमुने त्याने पाहिले,गोळा केले व त्यांचे वर्गीकरण केले.त्याची दृष्टी शास्त्रज्ञाची होती. त्याचे मन व त्याची बुद्धी ही कवीची होती.त्याने जमवलेले प्राण्यांचे हजारों नमुने एकत्र जोडून त्यातून सुसंगत अशी प्राण्यांच्या उत्पत्तीची मीमांसा करून उपपत्ती त्याने लावली व त्यांच्या विविधतेचे विवेचन केले.आपले संशोधन आपणास कोठे घेऊन जात आहे याची तो गलबतावर होता,तेव्हा त्याला नीटशी कल्पना आली नव्हती.प्रत्येक खऱ्या निरीक्षकाप्रमाणे आधीच मनात एखादी मीमांसा निश्चित करून तो निघाला नाही.प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहून तो सिद्धांताकडे जाई.वीस वर्षे त्याचे संशोधन अखंड व परिश्रमपूर्वक चालू होते.त्याने अपरंपार माहिती मिळवली व तिची निःपक्षपातीपणे छाननी केल्यावर त्याला उत्क्रांतीची महत्त्वाची उपपत्ती आढळून आली.
हे सारे जगत म्हणजे डार्विनपुढे एक प्रश्नचिन्ह होते.एक गूढ व बिकट अशी समस्या होती.तो जणू गणितातलाच एक प्रश्न होता.भूमितीतील एक सिद्धांत होता.तो सोडवावयास पाहिजे होता.त्यात पुष्कळच अज्ञात राशी होत्या.जग हे कौतुक करण्यासारखी कलाकृती नसून ते एक गणित आहे.एक कोडे आहे असे डार्विनला वाटे.वाड् मयाची त्याची आवड कधीच नष्ट झाली होती.
पण त्यांचे विज्ञानच त्याला वाड्मयाप्रमाणे,
कलेप्रमाणे,संगीताप्रमाणे झाले होते.मानवांविषयीचे त्याचे प्रेम कधीही नष्ट झाले नाही.विज्ञानाखालोखाल त्याला न्यायाविषयी उत्कट आस्था वाटे.एकदा त्याचे 'बीगल' गलबत ब्राझील येथे थांबले.काही नीग्रो गुलाम पळत होते.त्यामध्ये एक स्त्रीही होती.पाठलाग करणाऱ्यांच्या हाती लागू नये म्हणून त्या म्हाताच्या नीग्रो स्त्रीने कड्यावरून उडी घेतली.तिचे तुकडेतुकडे झाले!डार्विन लिहितो,
एखाद्या पोक्त व पावन रोमन स्त्रीने जर असे केले असते तर 'केवढे हे स्वातंत्र्यप्रेम!' असे म्हटले गेले असते.पण तेच नीग्रो स्त्रीने केले म्हणून त्याचे 'पाशवी हट्टीपणा'असे विकृत वर्णन करण्यात आले!
गुलामगिरीवर अन्यत्र टीका करताना तो लिहितो (आणि त्याने अमेरिकेतील सिव्हिल वॉरच्या आधी वीस वर्षे हे लिहिले होते,हे लक्षात घेतले पाहिजे.)
'गुलामांच्या धन्याकडे करुणेने व आस्थेने पण गुलामांकडे मात्र निष्ठुरतेने पाहणारे लोक स्वतः गुलामांच्या स्थितीत असल्याची करू पाहतील,तर गुलामांची स्थिती किती निराशजनक असते हे त्यांना कळून येईल.
आशेचा किरण नाही,उत्साह नाही,आनंद नाही, जीवनात कधी काही फरक पडण्याची वा स्थिती सुधारण्याची तीळमात्र शक्यता नाही!किती केविलवाणे जीवन!आपली मुले-बाळे व पत्नी आपणापासून केव्हा वियुक्त केली जातील, ओढून नेली जातील याचा नेम नाही.क्षणोक्षणी ताटातूट होण्याची चिंता सतावीत आहे अशी परिस्थिती डोळ्यांसमोर आणा.ही माझी पत्नी, 'ही माझी मुलेबाळे !'असे म्हणण्याचा, निसर्गानेही न नाकारलेला गुलामांचा हक हिरावून घेऊन त्यांची लाडकी मुले-बाळे,त्यांची प्रियतम पत्नी यांची गुराढोराप्रमाणे अधिकात अधिक किंमत देणाऱ्यांना विक्री करण्यात येते आणि तीही कोणाकडून!तर शेजाऱ्यांवरही आपल्याइतकेच प्रेम करण्याचा आव आणणाऱ्यांकडून!ईश्वरावर श्रद्धा ठेवणारे, त्याच्या इच्छेप्रमाणे पृथ्वीवर सर्वांनी वागावे असे उपदेशिणारेच या प्रकाराचे पुरस्कर्ते असावेत, त्यांनी त्याचे समर्थन करावे,व 'यात काय आहे!' असे म्हणून उडवाउडवी करावी हे केवढे आश्चर्य !'
'बीगल'मधून सफर करीत असता मानवप्राण्यांची उत्पत्ती कसकशी होत गेली,हे शोधून काढण्यासाठी ज्याप्रमाणे त्याने बारकाईने निरीक्षण चालवले होते,त्याप्रमाणेच मानवांच्या दुःखांकडेही त्याची बारीक नजर होती.त्याकडे तो काणाडोळा करीत नव्हता,करुणेने पाहत होता.
सफरीहून परत आल्यावर त्याने आपली भाची एम्मा वेजवूड हिच्याशी विवाह केला.त्याला पुढे दहा मुले झाली.या मुलांचे खरे पूर्वज कोण याचाही शोध तो करीतच राहिला.त्याने खेड्यात एक घर खरेदी केले.
त्याच्याभोवती विस्तृत बगिचा होता.सुदैवाने,त्याला पोटासाठी काम करण्याची आवश्यकता नव्हती.त्याच्या वडिलांनी भरपूर मिळवून ठेवले होते.आपली मुले काहीही कष्ट न करता नीट जगू शकतील,आळसात राहू शकतील अगर आपल्या उज्वल प्रतिभेची व अपूर्व बुद्धिमत्तेची करामत दाखवू शकतील अशी सोय त्यांनी करून ठेवली होती.चार्लस डार्विन आपल्या प्रतिभेच्या पूजनात रमला.
लग्न करण्याच्या किंचित आधी त्याची प्रकृती बरीच खालावली होती.ती कधीच सुधारली नाही.तो जवळजवळ चाळीस वर्षे आजाऱ्यासारखाच होता.तरीही त्याने एकट्याने दहा माणसांइतके काम केले!प्रथम त्याने 'बीगल' वरून केलेल्या प्रवासाचे इतिवृत्त प्रसिद्ध केले.हे पुस्तक शास्त्रीय असूनही एखाद्या मनोरंजक कादंबरीप्रमाणे रसाळ वाटते.
हरएक गोष्ट लिहिताना त्याच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय असे लिहिलेले सर्वांना समजेल अशी भाषाशैली तो वापरत असे तो लिहितो,'लहानलहान जुने सॅक्सन शब्द वापरणे चांगले.'एखादे लहान रोपटे अफू घेतल्याप्रमाणे जणू गुंगीत असते आणि अशा वृत्तीनेच ते जगते',अशी वाक्ये कानाला इंग्रजी नाही वाटत.त्याचे भाषांतर करावेसे वाटते.पण हेही खरे की,भाषाशैली अती सोपी,सहजसुंदर व प्रासादिक असावी यासाठी फार श्रम घेणे बरे नाही.वाग्वैभव केवळ निरुपयोगी असेही नाही.लिखाणात परमोच्च वक्तृत्व असूनही फारसा आटापिटा न करता प्रसाद व सहजसुंदरता दोन्ही साधता येतील तर चांगलेच.'
भाषा सहजसुंदर व स्वच्छ आणि विशद अर्थ सांगणारी व्हावी म्हणून डार्विनने खूप प्रयत्न केले.सुंदर लिहिणे प्रथम त्याला जड जात होते. पण अविरत प्रयत्नाने त्याने स्वतःची एक विशिष्ट भाषाशैली बनवली.मोकळी,सोपी व मनोहर भाषाशैली त्याने निर्मिली.त्याच्या जीवनाचे ब्रीदवाक्य 'सतत प्रयत्नाने कार्य होते',हे होते. काव्याविषयी आपणास फार आवड नसल्याबद्दल त्याला वाईट वाटे.तरीही पण 'बीगलवरील प्रवास' या त्याच्या पुस्तकात कवितांचे पुष्कळ उतारे आहेत.ब्राझीलचे पुढील वर्णन पाहा,'येथील जमीन म्हणजे एक विस्तृत, अनिर्बंध,
भव्य,भीषण व वैभवसंपन्न असे निसर्गाचे जणू उष्ण मंदिरच आहे.पण निसर्गाच्या या घराचा कब्जा मानवाने घेतला आहे.येथे मानवाने ठायीठायी सुंदर घरे व लहानलहान बागा निर्मिल्या आहेत.' ब्राझीलची भूमी पाहून त्याला प्रथम काय वाटले ते पाहा,तो म्हणतो, "आनंदाच्या व आश्चर्याच्या वादळात मी बुडून गेलो." व मग लिहितो,'नारिंगे,संत्री,नारळ,ताड, आंबे,केळी वगैरेंची बाह्यरूपे पृथक् आहेत.पण या भिन्न भिन्न वृक्षवनस्पतींची सहस्त्रावधी सौंदर्ये शेवटी एक भव्य अशी सौंदर्यकल्पना देतात आणि वेगवेगळी सुंदर रूपे विलीन होऊन एकच सौंदर्यकल्पना मनात राहते.पण ही विविधता गेली तरीही अस्पष्ट;पण अत्यंत सुंदर अशा आकृतींची चित्रे हृदयफलकावर राहतातच. '
'बीगलवरील प्रवास' हे पुस्तक लिहून शंभर वर्षे होऊन गेली.तरीही तें पुस्तक अरबी भाषेतील सुरस गोष्टींप्रमाणे गोड वाटते.
डार्विनचे यानंतरचे पुस्तक मात्र केवळ शास्त्रीय होते.त्यात निसर्गाच्या स्वरूपाविषयी बरीच माहिती असून समुद्रातल्या बानेंकल नामक प्राण्याची ही हकिकत आहे.हा प्राणी आपल्या डोक्यावर उभा असतो व आपल्या पायांनी तोंडात अन्न फेकतो,हे पुस्तक डार्विन आठ वर्षे लिहित होता.
त्याच्या आयुष्यातली ही आठ वर्षे अत्यंत उपयोगी कामात गेली.या एका विषयाला सतत आठ वर्षे चिकटून बसून डार्विनने स्वत:मध्येही जणू बार्नेकलची चिकाटी बाणवून घेतली. असल्या विषयावर निरर्थक इतके प्रयत्न करण्याबद्दल डार्विनचे मित्र त्याची खूप टिंगल करीत.पण डार्विन हळूहळू 'सर्वांत मोठा सृष्टिज्ञानी व निसर्गाभ्यासी'अशी आपली प्रतिष्ठा प्रस्थापित करीत होता व आपल्या आयुष्यातल्या सर्वांत मोठ्या कामासाठी आपले मन आपल्या मनाचे स्नायू मजबूत करीत होता.
ही आठ वर्षे किती मोलाची!तो सारखा मिळवीत होता व चिकित्सक बुद्धीने त्या माहितीतून सत्य शोधीत होता, निवडानिवड करीत होता. 'निरनिराळ्या जातींची उत्पत्ती आणि मानवाची उत्क्रांती ( मानवाचा अवतार ) ' यासंबंधी आपली उपपत्ती पूर्णावस्थेस नेऊ पाहत होता.
अपुरे ( अपूर्ण )
१९ फेब्रुवारी २०२३ या लेखामधील पुढील भाग..
३/३/२३
अनंत विश्वात दुसऱ्या बुद्धिमान जमाती आहेत का?
या अनंत विश्वात विसाव्या शतकात पृथ्वीवर राहणारी मानवजात ही एकच बुद्धिमान जमात अस्तित्वात आहे का?
रात्रीच्या स्वच्छ आणि निरभ्र आकाशात नुसत्या डोळ्यांनी आपल्याला किमान ४५०० तारे दिसतात असे निदान खगोलशास्त्रज्ञ तरी सांगतात.छोट्याशा वेधशाळेतील दुर्बिणीतून वीस लाख तारे दिसू शकतात.आधुनिक वेधशाळेतील रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपच्या (आरशाच्या दुर्बिणीच्या सहाय्याने आणखी कोट्यावधी तारे आपल्या नजरेच्या टप्प्यात येतात.
पण अनंत विश्वाचा विचार करता आपली ग्रहमाला हा अगदी नगण्य भाग आहे.आकाशात तारे सारख्याच दाटीवाटीने पसरलेले नाहीत. आकाशाच्या विशिष्ट भागात त्यांनी बरीच गर्दी केलेली आढळते.या ताऱ्यांच्या दाटीवाटीमुळे आकाशाच्या मध्यभागी एक लांबचलांब व थोडा रूंद असा पांढुरका पट्टा तयार झाला आहे. त्याचा आकार लंबवर्तुळाकार चकतीसारखा आहे.यालाच म्हणतात आकाशगंगा !
आपली ग्रहमाला अशा आकाशगंगेच्या कडेला जे तुरळक तारे दिसतात त्यातल्या एका ताऱ्याभोवती म्हणजे सूर्याभोवती आहे
या ताऱ्यांमधील अंतर मोजायला मैल हे परिमाण अगदीच तोकडे पडते.त्यासाठी प्रकाशवर्ष, म्हणजे एका वर्षात प्रकाश जेवढे अंतर कापील तितके मैल (प्रकाशवर्ष १८६००० X ६० X ६० X २४X३६५ मैल) हेच परिमाण वापरावे लागते. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपच्या सहाय्याने ज्या काही आकाशगंगा दिसतात,त्यांची त्रिज्याच १५ लाख प्रकाशवर्ष असेल आणि इलेक्ट्रॉनिक टेलिस्कोपने आपण जितके तारे पाहू शकतो तो आकडा इतका प्रचंड आहे की आपल्या कल्पनाशक्तीच्या आवाक्यातही तो येऊ शकत नाही.अर्थातच हे सर्व आकडे फक्त आजतागायतच्या झालेल्या संशोधनाला अनुलक्षून आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
खगोलशास्त्रज्ञ हार्लो शेपली यांच्या मते आपल्या दुर्बिणीच्या टप्प्यात साधारण १० (२०) (एक वर वीस शून्ये) इतके तारे येतात.समजा की हजारात एखाद्याच ताऱ्याभोवती आपल्यासारखी ग्रहमाला आहे आणि अशा ताऱ्यांपैकी पुन्हा हजारात एकाच ताऱ्यावर जीवन निर्मितीस आवश्यक अशी परिस्थिती आहे.तरी अशा ताऱ्यांची संख्या येईल १० (१४) (एक वर चौदा शुन्ये)
अशा ताऱ्यांपैकी पुन्हा हजारात एखाद्याच ताऱ्यावर जीवनास आवश्यक अशी परिस्थिती खरोखरच निर्माण झाली असेल असे समजले तरी अशा ताऱ्यांची संख्या असेल १०(११) (एक वर आकरा शुन्ये)आणि यापैकी हजारात एका ताऱ्यावर जीवसृष्टीचे अस्तित्व गृहीत धरले तरी १० कोटी इतक्या ताऱ्यांवर जीवसृष्टी असण्याची शक्यता निर्माण होते.हा आकडा थक्क करणारा नाही ?
प्रोफेसर डॉ.विली ली दुसऱ्या तऱ्हेने विचार करतात.
त्यांच्या मते आपल्या आकाशगंगेतच साधारणतः३० अब्ज तारे आहेत आणि खगोलशास्त्रज्ञांच्या मते त्यापैकी १८ अब्ज ताऱ्यांना तरी आपल्यासारख्या ग्रहमाला आहेत. समजा शंभरात एखाद्या ग्रहमालेतील एकाच ग्रहावर जीवन निर्माण होण्यासारखी परिस्थिती अस्तित्वात आहे असे समजले आणि पुन्हा त्यापैकी शंभरात एकाच ग्रहावर जीवसृष्टी खरोखरच निर्माण झाली असेल तरी अशा ग्रहांची संख्या होईल १८ लाख,हा आकडा कमी करण्याचा प्रयत्न म्हणून मानवसदृश प्राणी पुन्हा शंभरात एकाच ग्रहावर निर्माण झाला असेल असे गृहीत धरले तरी फक्त आपल्याच आकाशगंगेत १८००० ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता निर्माण होते.
पण शेवटी ही सर्व आकडेवारी तशी फसवीच ठरते.
दुर्बिणीच्या तंत्रात जसजशी सुधारणा होते आहे तसतसा जो मूळ आकडा धरून आपण गणिते करीत आहोत तो आकडाच बदलतो आहे.आता खगोलशास्त्रज्ञ म्हणायला लागलेत की आकाशगंगेत ३० अब्ज नव्हे तर १०० अब्ज तारे आहेत म्हणून !
तेव्हा या आकड्यांच्या जंजाळात फसण्यापेक्षा अमेरिकेच्या अणुशक्ती कमिशनच्या एम्स संशोधन केंद्रातील बायोटेक्निकल विभागाचे प्रमुख डॉ.जॉन बिलिंगहॅम म्हणतात ते खरे समजायला हरकत नाही.ते म्हणतात,
'पृथ्वीपेक्षा अब्जावधी वर्षे प्रथम निर्माण झालेले किती तरी ग्रह आहेत.त्यांच्यापैकी ज्या ग्रहांवर बुद्धिमान जीव निर्माण झाले असतील,त्यांच्या संस्कृतीही त्याच प्रमाणात आपल्यापेक्षा प्रगत असेल ही शक्यता मुळीच नाकारता येत नाही.पाषाण युगातील मानवापेक्षा आपण जितके पुढारलेले आहोत तेवढ्याच त्या संस्कृती आज आपल्यापुढे असतील. '
जीवन अस्तित्वात असण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी आवश्यक मानतो ? त्यासाठी पृथ्वीसदृश वातावरण तसेच वनस्पती जीवन, प्राणी जीवन आवश्यक आहे असे गृहीत धरूनच आपण सर्व विचार करतो.पण पृथ्वीसारख्या ग्रहांवरच जीवन शक्य आहे असे ठामपणे म्हणायला कुठे काही आधार कधी तरी आपल्याला सापडला आहे का? मुळीच नाही.
इतकेच काय तर प्राणवायू आणि पाणी यांच्याशिवाय जीवन अशक्य आहे हे म्हणणे सुद्धा चूक आहे.
प्राणवायूची आवश्यकता नसलेले,एवढेच नव्हे तर थोडा फार प्राणवायू असलाच तर ज्यांना तो विषवत वाटेल असे जीवजंतू आपल्या पृथ्वीवरच अस्तित्वात आहेत.
खूप उष्ण नाही,खूप थंड नाही,भरपूर पाणी आणि प्राणवायू यांनी समृद्ध अशी पृथ्वी म्हणजे जीवन निर्मितीसाठी आदर्श असा ग्रह आपण मानतो. शयाला तसा काही पुरावा आहे काय? आणि तुलना कोणत्या ग्रहांशी करणार? निरनिराळ्या तऱ्हेचे वीस लाख जीवजंतू पृथ्वीवर अस्तित्वात आहेत असा अंदाज असला तरी साधारण बारा लाखांहून अधिक तर आपल्या वैज्ञानिकांना ठाऊकच नाहीत.त्यापैकी हजारो जीवजंतू पृथ्वीवर अस्तित्वात असायलाच नको होते,जगायलाच नको होते.खरोखर जीवनासाठी आवश्यक अशा नक्की गोष्टी कोणत्या आहेत याबाबतचे प्रचलित सिद्धान्त पुन्हा तपासून बघणेच आवश्यक आहे.
रेडिओ अँक्टिव्ह पाण्यात सूक्ष्म जंतूसुद्धा जिवंत राहणे शक्य नाही असे कोणालाही वाटेल.पण अणुभट्टयांच्या आसपासच्या अशा प्राणघातक पाण्यात फोफावणारे जीवजंतूही आहेत.
डॉ.सिगेल या शास्त्रज्ञाने 'गुरू' या ग्रहासारखे वातावरण प्रयोगशाळेत तयार करून त्यात जंतू व छोटे कीडे वाढवले.अमोनिया,मिथेन, हायड्रोजनसुद्धा त्यांना मारू शकले नाहीत.
हिन्टन आणि ब्लूम या कीटक शास्त्रज्ञांनी चिलटासारख्या प्राण्यांना १००० सेंटिग्रेड तपमानावर कित्येक तास ठेवून वाळवले व नंतर द्रवरूप हेलियममध्ये बुडवले.अति गरम वातावरणातून अति शीत हेलियममध्ये बुडवल्यावर व नंतर पुन्हा नेहमीच्या वातावरणात सोडल्यावरसुद्धा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही.ज्वालामुखीत राहणारे,
दगड खाणारे,लोखंड निर्माण करणारे जीवजंतूही आपल्याला माहीत आहेत.
आपण पृथ्वीवरचे वातावरण जीवन निर्मितीसाठी योग्य म्हणत असतानाच दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहावर अगदी वेगळे वातावरण असेल आणि तरीही जीवसृष्टी अस्तित्वात असेल तर तेथील बुद्धिमान प्राण्यांनाही असेच वाटत असेल की त्यांच्या ग्रहावरचे हवामानच जीवनिर्मितीसाठी आवश्यक आहे तेव्हा या अथांग विश्वात आपणच तेवढे बुद्धिमान प्राणी अस्तित्वात आहोत हे म्हणणे अगदीच निरर्थक आहे.अशीही शक्यता आहे की भविष्यकाळात अंतराळात अनेक तऱ्हेचे जीवन अस्तित्वात आहे हे आपल्या भावी पिढ्या बघतील.
आपण ते बघायला नसलो तरीही त्या पिढ्यांना मात्र आपली मानव-जमात हीच सर्वांत जुनी व बुद्धिमान अशी जमात आहे ही कल्पना बाजूला ठेवावीच लागेल.
जुने जीवजंतू आणि प्राणी नष्ट होणे व त्यांची जागा नवीन तऱ्हेच्या जीवजंतू आणि प्राण्यांनी घेणे ही क्रिया अखंडपणे कोट्यावधी वर्षे चालू आहे व पुढेही चालू राहणार आहे.जगात सापडणाऱ्या निरनिराळ्या तऱ्हेच्या दगडांचे वेगवेगळ्या तऱ्हानी संशोधन केल्यावर पृथ्वीचा पृष्ठभाग सुमारे ४ अब्ज वर्षांपूर्वी तयार झाला असे शास्त्रज्ञ म्हणतात.पण शास्त्र एवढेच जाणते की २० लाख वर्षांपूर्वी प्रथम मानवसदृश प्राणी अस्तित्वात आला.
त्यापैकी आपल्याला साधारणतःसात एक हजार वर्षांचा इतिहास थोडा फार कळला आहे.त्यासाठी सुद्धा किती श्रम आणि कष्ट घ्यावे लागले आहेत.तरीही मधली कित्येक शतके अशी आहेत.की त्या काळात खरोखर काय घडले ते आपल्याला माहीत नाही.अज्ञात विश्वाच्या अब्जावधी वर्षांच्या इतिहासाशी तुलना करता मानवाच्या सात हजार वर्षांच्या इतिहासाला खरोखर किती किंमत आहे?
विसाव्या शतकात प्रगतीच्या ज्या पल्ल्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत तिथे पोहोचायला चार लाख वर्षे घेऊन पुन्हा या विश्वात आमच्यासारखे बुद्धिमान आम्हीच,असा गर्व आपण किती करावा?
कशावरून दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहांवर आपल्याला स्पर्धक नसतील? कशावरून काही ग्रहांवर प्रगतीला जास्त पोषक परिस्थिती निर्माण झाली नसेल की ज्यामुळे तेथील जमाती इतक्या प्रगत अवस्थेला पोहोचल्या असतील की आजसुद्धा आपणच त्यांच्यापुढे मागासलेले
ठरू ?
शेकडो पिढ्या म्हणत होत्या की पृथ्वी सपाट आहे म्हणून,सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हे हजारो वर्षे विद्वान लोक आपल्याला सांगत होते.हा अनुभव असूनही आपण म्हणावे की आपल्या आकाशगंगेच्या मध्यापासून तीस हजार प्रकाशवर्षे लांब कडेला असलेला आपला पृथ्वी हा नगण्य ग्रहच सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू आहे म्हणून ?
विश्वाचा विचार करता पृथ्वी अगदीच क:पदार्थ आहे हे लक्षात घेऊन अज्ञात अंतराळाचे संशोधन करण्याची वेळ आज आली आहे.आपल्या उज्ज्वल भविष्यकाळातील संधी अंतराळ संशोधनातच मिळतील असे आपल्या 'देवांनी' नाहीतरी सांगून ठेवले आहेच.या भविष्यकाळात नजर टाकेपर्यंत प्रामाणिकपणे आणि निःपक्षपातीपणे आपला भूतकाळ तपासण्याचे धैर्य आपल्याला मिळणार नाही.
देव ? छे ! परग्रहावरील अंतराळवीर !
लेखक - बाळ भागवत
मेहता पब्लिशिंग हाऊस
१/३/२३
साहित्यातील 'पाणी' आणि पाण्यातील 'साहित्य'..!
"पाणी" मानव व इतर जिवंत असणाऱ्या जीवांच्या जीवनातील अविभाज्य अंग.पाणी आहे तर सर्व काही आहे. धान्य पिकवताना जे पाणी लागतं तेच पाणी धान्यापासून अन्न शिजवताना लागतं. पाण्याजवळ तळ्याकाठी नदीकाठीच माणसाने राज्ये व नगरे वसवली होती.पहिला जीव पाण्यातच जन्माला आला. वनस्पती निसर्ग या सर्वांठायी पाणी असतेच.
"पाणी हा जसा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे तसाच वनस्पतींचाही,हरित वनस्पती पाण्याचा उपयोग करून सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण क्रियेमधून स्वतःचे कर्बयुक्त अन्न तयार करतात.(पाणवनस्पती डॉ. नागेश टेकाळे मराठी विज्ञान परिषद पत्रिका नोव्हेंबर 2022 )
आम्ही लहान असताना जुनी माणसं अनुभवाचा दाखला देत असताना मी किती अनुभव संपन्न आहे हे सांगत असताना 'मी बारा गावचे पाणी प्यालो आहे,अशी वाक्य रचना ते नेहमी करायचे. त्यावेळी मला वाटायचं नुसतं बारा गावात जावून पाणीच तर पिऊन आलेत.त्यात अनुभवाचा काय संबध पण हे समजण्यास फार काळ जावा लागला.'समजलेला' अनुभव पुढे येईलच.
हेन्री डेव्हिड थोरोचे वॉल्डन पुस्तक व त्या पुस्तकातील 'तळी' मध्ये असणारं वर्णन विचार करायला लावते.
संध्याकाळी अनेक वेळा मी तळ्यावरील वारा अंगावर घेत बोटीत माझी बासरी वाजवत बसायचो पर्च मासा माझ्या भोवती गिरट्या घालायचे.बहुदा माझ्या बासरीच्या सुरांनी ते समोहित होत असावेत काय माहित खाली पाण्यात घिरट्या घालणारे मासे त्यांच्या खाली पाण्यात खडबडीत तळ व त्यावर बुडलेली जंगलातील लाकडे,ओडंके आणि पाण्यात चालणारा चंद्र मला दिसायचा आणि मी संमोहित व्हायचो.
मला वाटायचं (थोरोला ) शांत काळोख्या रात्री जेव्हा तुमचे विचार विश्वाच्या पलीकडे स्वच्छंद सैर करत असतात अशावेळी हाताला बसलेला एखादा नाजूक झटका आहे तुमची विचार श्रुंखला तोडून तुम्हाला त्या अवस्थेतून बाहेर निसर्गात आणतो.पण मला वाटायचं पुढच्या वेळेला मी हवेत जाळे फेकून माझे विचार पकडू शकेन आणि त्याच जाळ्यांनी खाली पाण्यातील मासे एकाच जाळ्यात दोन्ही प्रकारचे मासे मी पकडत असे.
कारण वास्तव जगाची खोली बहुतेक माझ्या वैचारिक जगापेक्षा कमी असावी.
तलावाच्या मध्यभागी बोटीत बसून पाण्याला वेढलेल्या जंगलावर नजर टाकली तर निसर्ग सौंदर्य म्हणजे काय ते तुम्हाला कळेल निवळ्ळ अप्रतिम! स्तब्ध पाण्यात पडलेले जंगलाचे प्रतिबिंब या दृश्याला अतिसुंदर पुरोभाग पुरवतो. नुसते एवढेच नाही तर ते पाहताना असे वाटते की पाण्याला जंगलाच्या प्रतिबिंबाने त्याच्यात बंदिस्त केले आहे की काय ! किनाऱ्यावर सगळे कसे जेथल्या तेथे आहे फक्त काही ठिकाणी जेथे जंगलतोड झाली आहे. किंवा लागवड झाले आहे ते मात्र थोडासा ओबडधोबडपणा आला आहे.झाडांना वाढण्यासाठी पाण्याच्या बाजूला मुबलक जागा आहे आणि किनाऱ्यावरील प्रत्येक झाडाने एक महाकाय फांदी पाण्यावर वाढवलेलीच आहे.कापड फिसकू नये म्हणून जशी दोऱ्याची वीण घालतात तशी त्या तळ्याला झाडांनी एक वीण घातली आहे असे मला वाटते. पाण्यावर पसरलेल्या फांद्यांच्या ढहाळ्यावरून आपली नजर हळूहळू उंच झाडावर जाते.मानवी हस्तक्षेपाच्या काही खुणा आजही दिसतात पण हजारो वर्षे तळ्याचे पाणी या खुणा धुवत आले आहे.आणि कदाचित पुढेही तसेच होत राहील.
.....निसर्गातील सगळ्यात बोलकी व्यक्ती कोण असेल तर तळे.मी तर तळ्याला व्यक्तिच मानतो. कारण प्रत्येक तळ्याला स्वतःचे असे एक खास व्यक्तिमत्व असते... तळे म्हणजे पृथ्वीचे नेत्र. त्या डोळ्यात डोकावून पाहताना, पाहणारा स्वतःच्या मनाची व व्यक्तिमत्वाची खोली चाचपडत असतो. तळ्याकाठी असलेली झाडे त्या डोळ्याच्या सुंदर लांबसडक पापण्या, तर तळ्याकाठी घनदाट जंगले असलेले पर्वत त्या डोळ्याच्या भुवया....
तळे म्हणजे एखादी वितळलेली,गार झालेली पण पूर्ण घनरुप न झालेली काच असावी असे दिसते आणि त्यातील काही कण हे काचेत दिसणाऱ्या बुडबुड्याप्रमाणेच सुंदर दिसतात.बऱ्याच वेळा तुम्हाला चकाकणाऱ्या काळसर पाण्याचा अजून एक पट्टा तळ्यात दिसेल.तळ्यातील इतर पाण्यापासून एखाद्या कोळ्याच्या जाळ्याने वेगळा केल्यासारखा.
जणू जलदेवतेने तेथे कोणी येऊ नये म्हणून रेषा आखली आहे.
प्रकाशाची तळी! जर पृथ्वीवरील हे हिरे आकाराने लहान असते तर गुलामांनी ते उचलून नेऊन एखाद्या महाराणीच्या मुकुटात विराजमान केले असते.नशिबाने ते द्रव स्वरुपात आहेत. त्यामुळे आपल्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी निरंतर उपलब्ध आहेत. या अस्सल हिऱ्यांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि कोहिनूरच्या मागे लागतो.कुठे ही तळी आणि कुठे तो कोहिनूर!हे अस्सल हिरे इतके निर्मळ आहेत की बाजाराला त्यांची किंमतच करता येणार नाही.एकवेळ कोहिनूरमधे दोष सापडतील पण यांच्यात कसले दोषच नाहीत.ही तळी आपल्या जीवनापेक्षा,आयुष्यांपेक्षा कितीतरी सुंदर आहेत.त्यांचे व्यक्तिमत्व पारदर्शक आहे. त्यांच्याकडून तुम्हाला कसलीही वाईटसाईट विचारांची शिकवणी मिळणार नाही याची मला खात्री आहे.
दुर्दैवाने या निसर्गाचे कोडकौतुक करणारी,त्याचे आभार मानणारी माणसे आता या जगात नाहीत.पक्षी त्यांची पिसे आणि गुंजनासकट फुलांशी अद्वैत राखून आहेत.पण आजचे तरुण तरुणी आणि अफाट,मूक निसर्ग यांच्यात असे अद्वैत आहे का? निसर्ग आपला शहरापासून दूर फुलतोय! स्वर्गाचे गोडवे गाऊन तुम्ही निसर्गाचा अपमान करीत आहात एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही....
हे साहित्यातील पाणी आपल्या वास्तविक जीवनातही 'ओलावा' देवून जाते.
आणि मी विचार केला साहित्यातील पाणी मग पाण्यातही साहित्य असणारच. एखादा माणूस बारा गावचे पाणी पितो त्यावेळी त्या विचारा मागचा एक विचार असतो. पाण्यामधून संस्कार,नीतिमत्ता,शिष्टाचार,नियम त्या गावच्या परंपरा,त्या गावातील असणाऱ्या माणसांचा स्वभाव,त्या गावातील माणसांचे असणारे एकमेकां-सोबतचे संबंध,व्यवहार,वैचारिक पातळीवरील बैठक हे सर्व 'पाणी' या माध्यमातून समजून घेतलेलं असतं.
पूर्वीच्या काळी ओळख नातेवाईक असण्याची काही गरज नसायची. रस्त्यावरून जाणारा अनोळखी माणूस सुद्धा ओळखीचा असायचा कारण तो माणूस असणं इतकं पुरेसं असायचं.तहान लागली असता पाणी पीत असताना.अनेक विषयांवर वैचारिक व बौद्धिक चर्चा व्हायची व ज्ञानामध्ये अनुभवांमध्ये वाढ व्हायची.अनेक ज्ञानी ऋषीमुनी हे पाण्याजवळच ध्यानाला बसत मानवी स्वभावात असणारे जे प्रतिबिंब आहे ते पाण्याचे आहे. पाण्याचे स्थिती पाण्याचा स्वभाव तीच माणसाची स्थिती तोच माणसाचा स्वभाव असतो.अवखळपणा,नवीन ठिकाणी जात असताना मनाची होणारी घालमेल,उन्हाने तहान लागली असताना जीवाची होणारी घालमेल, तहान लागण्यानंतरची परिस्थिती आणि पाणी पुर्ण झाल्यानंतरची शरीराची स्थिती या सर्व गोष्टींचा जीवंत साक्षीदार म्हणून पाणी आपल्या सोबत नेहमीच असते.
पाण्याचा वापर करून आपण खाण्यायोग्य धान्याचे उत्पादन करीत असतो.पण दुसऱ्या बाजूला ('वेस्ट-अनकव्हरिंग द ग्लोबल फूड स्कँन्डल' ट्रीस्ट्रँम स्टुअर्स,ग्रंथाचिया द्वारी-अतुल देवुळगाकर,विश्वकर्मा पब्लिकेशन)पुस्तकातील नोंदी विचार करायला लावणाऱ्या आहेत.
मार्क अँड स्पेन्सर या कंपनीला ब्रेडच्या गट्ट्यातील वरचा व खालचा ब्रेड चालत नाही, म्हणून ब्रेडच्या कारखान्यातील २०,००० ब्रेडचे स्लाइस दररोज फेकून दिले जातात.'ना मला ना तुला,घाल डस्टबिनला' अशी म्हण कशी जगली जाते, हे वाचकाला उमगत जाते उत्तम अवस्थेतील ५० कोटी दह्याचे डब्बे,२५ कोटी ब्रेड स्लाइस,३० कोटी रुपयांची केळी,१६ लक्ष सफरचंद,१० लक्ष मांसाची पाकिटे,म्हणजेच २ कोटी टन वजनाच्या या सर्व जिनसा दरसाल ब्रिटनमध्ये कचराकुंडीत जातात.
अमेरिका याहून पुढे! तिथे एकंदरीत उत्पादनापैकी तब्बल ५० टक्के अन्न फेकून दिले जाते.'सुशी' व 'कॅव्हिअर' या फास्टफूडवर जपानमध्ये उड्या असतात. दरवर्षी सुमारे ४५०० कोटी रुपयांचे हे पदार्थ कसे नष्ट करायचे,ही जपानपुढे विवंचना आहे.
फेकून देण्याचे विडंबन करताना 'जाने भी दो यारो' या चित्रपटात नसरुद्दीन शहा खाता खाता सांगतो,'थोडा खाओ,जादा बाहर फेक दो,मजा आता है! ' ही धनदांडग्यांची मनोवृत्ती आहे.ते गरीब देशातील असोत वा श्रीमंत,गुणांमध्ये तसूभर फरक नाही.सर्वसामान्य जनतेपासून फारकत झालेले धनाढ्य जगभर आहेत.हे अन्न निर्माण करण्यासाठी किती कष्ट,वेळ व ऊर्जा खर्च झाली हा विचारसुद्धा त्यांना शिवत नाही.नासाडीबद्दल त्यांना यत्किंचितही खेद-खंत वाटत नाही.वरचेवर नासाडी ही जीवनशैली असणारे वाढत आहेत.त्यातूनच अख्खी फळे,स्पर्श न झालेल्या पाकीटबंद फास्टफूडचा प्रवास रेफ्रिजरेटर ते डस्टबिन असा होत आहे.उकिरडे साफ करणाऱ्या डुकरांची चंगळ होत आहे.त्याच युरोपमध्ये ४ कोटी,अमेरिकेत ३.५ कोटी, तर ब्रिटनमध्ये ४० लक्ष भुकेले राहतात,याचे भान लेखक आणून देतो .
अन्नधान्यामुळे जग एकवटले असल्यामुळे नासाडी हा मुद्दा वैयक्तिक राहत नाही.त्याचा परिणाम जगभर दिसतो या जगड्याळ नासाडीमुळे अधिक धान्याची गरज निर्माण होते (त्यात भर म्हणून अमेरिकेने २ वर्षांत १० कोटी टन धान्यापासून जैवइंधन केलं.)त्यातूनच गरीब राष्ट्रांच्या जमिनी बळकावून धान्योत्पादन चालू होते,लाखो हेक्टर जंगल नामशेष करून शेती होते.दुसरीकडे धान्याची प्रचंड वाहतूक,साठवण व प्रक्रियेवरचा खर्च अक्षरशः बाद ठरतो. शेतापासून ताटात अन्न पडेपर्यंत (अथवा कुजेपर्यंत) प्रत्येक टप्प्यावर ऊर्जा लागते.कर्ब वायूचे उत्सर्जन होते.समस्त घनकचरा अजस्र खड्डयात साठवला जातो तिथे तो कुजवला अथवा जाळला जातो.एका सर्वेक्षणानुसार युरोपमधील ३३ टक्के कर्ब वायूचे उत्सर्जन अन्नधान्याचे उत्पादन व वाहतूक यामधून होते.जगातील अन्नधान्याचा पर्वत आणि नासाडी ही पर्यावरणीय जोखीम होऊन बसली आहे. जगभरातील उच्चमध्यमवर्गीयांचा मांसाहार झपाट्याने वाढत आहे.वाढत्या मागणीनुसार मांस खाण्यास योग्य पशुपैदास व पशुखाद्य यांची गरज वाढते.त्यामुळे तृणधान्य (गहू, मका, बाजरी ) अधिक प्रमाणात पशुखाद्य होऊ लागले. कोंबडीचे वजन एक किलो करण्याकरिता दोन किलो धान्य भरवावे लागते,तीन किलो तृणधान्याने पोसल्यावर दोन किलो डुकराचे मांस तयार होते तर एक किलो बैलाचे मांस तयार होण्यासाठी आठ किलो धान्य पसार होत असते.
हे अन्नधान्य वाया गेले नसते तर कुणाच्या पोटात गेले असते?हा भाबडा आशावाद आहे असे कोणी म्हणू शकेल.धनवान व गरीब देशासाठी जागतिक बाजारपेठ एकच आहे ही वस्तुस्थिती आहे.धनवानांची हजारो टन खरेदी ते कचरा अशी धान्याचे वाट लागते,तेव्हा दारिद्र्य देश धान्यांपासून वंचित राहत असतात.हे सर्व तयार करण्यासाठी कितीतरी हजारो लाखो लिटर पाणी वाया जात असते.याचा आपण माणूस म्हणून विचार नक्कीच करायला हवा.याच अनुशंगाने माहितीयुक्त ज्ञानासाठी हे पुस्तक वाचणे महत्वाचे ठरेल.
परवाच आमचे मित्र सतीश खाडे यांचा पॉडकास्ट श्रवण करत असताना.एक कप चहा बनवण्यासाठी साधारणतःएक कप पाणी,एक चमचा साखर,एक चमचा चहा पूड साहित्य लागतं.ही झाली सर्वसाधारण चहा बनविण्याची कृती पण निसर्गातील संसाधनाचा विचार केला असता १०० ते १२० लिटरपाणी लागते.साखर तयार करताना लागणारे पाणी,चहा बनवताना लागणारे दूध हे दूध तयार होण्यासाठी जनावरांना लागणारा चारा व त्या चाऱ्यासाठी लागणारे पाणी,चहा मळ्यांना लागणारे पाणी या सर्वांचा विचार करता पाणी हे जास्तीचे लागतेच.असे हे पाणी थोड्याफार फरकाने आपल्या सर्वांच्यात आहे…
परवा वाचत असताना काही विचारांनी लक्ष वेधून घेतले.
जगणं म्हणजे विचार करणे.तुम्ही मुळात भौतिक शरीर असलेले मन असता.तुमच्या अस्थी,मज्जा व स्नायू म्हणजे ८० टक्के पाणी व काही कमी महत्त्वाच्या रासायनिक द्रव्यांखेरीज काही नसते; पण "तुम्ही कोण आणि काय आहात हे ठरवीत असतात तुमचे मन व तुमचे विचार..!.
जाता.. जाता..
'अरण्यवाचन' या पुस्कातील हे अनुभव घेतलेले वाक्य विचार करा म्हणून सांगून गेले.
'तलाव' म्हणजे फक्त 'साठलेलं पाणी नाही' आणि तलावाचा काठ म्हणजे ' नुसता चिखल' नाही.
पूर्व प्रसिद्धी - ' जलसंवाद ' मासिक फेब्रुवारी २०२३ सर्वांचे मनापासून आभार..
२७/२/२३
जगावेगळी कौतुकाचे थाप..
" जे लोक पराकोटीचे प्रेम करू शकतात, तीच लोक अपार वेदना सहन करू शकतात." - टॉलस्टॉय
आम्ही लहान असताना खेळायला जात होतो. (तसं प्रत्येकजण कधी ना कधी खेळायला गेलेलं असतचं) पायात चप्पल नसायची अनवाणी फिरायचं.मग कधी कधी पायात काटा घुसायचा त्यावेळेला सुई वगैरे सोबत नसायची.मग काट्यानेच काटा काढला जायचा.पायातून काटा निघाल्यानंतर त्या काट्याला मी शिव्या द्यायचा. पण ज्या काट्याने काटा काढला असायचा त्याला मात्र मी प्रेमाने स्पर्श करायचा.त्यावेळी अधिक खोलात जाऊन कधी विचार करत नसायचा.पण आता मला माझ्या त्या वागण्याचं हसू येतं.कारण माझ्या पायात जो काटा मोडायचा आणि ज्याला मी शिव्या द्यायचा.तो काटा ज्या काट्याने मी तो काटा काढलेला असायचा,त्याचा भाऊबंदच असायचा.हा सर्व जीवनातील जगण्याचा,
अनुभवाचा पुस्तक वाचण्यातून आलेला समजूतदारपणा आहे.
' मला फक्त एकच गोष्ट माहित आहे आणि तीही आहे की मला काहीच माहित नाही.'अशा पद्धतीने आपलं संपूर्ण जीवन जगणाऱ्या सॉक्रेटिसला हेमलॉक नावाचं विष देण्यात आलं.सॉक्रेटिसने ते विष आनंदाने घेतले.याचा परिणाम मृत्यू असूनही ते त्याने आनंदाने स्वीकारले.
आपण साधं आजारी जरी पडलो तरी बरं होण्यासाठी ज्या गोळ्या खातो त्या गोळ्या खाताना आपण तोंड वेडे-वाकडे करतो.इंजेक्शनची भीती वाटते.कारण आपल्या कुणालाच वाटत नसतं आपण आजारी पडावं.पण तरीसुद्धा आपण आजारी पडतो.
पुस्तक नवीन विकत घेतलं असताना ते उघडून एकदा पूर्ण श्वास घ्या.त्या पुस्तकाचा सुगंध आपल्या फुफ्फुसात साठवून ठेवा.हा सुगंध म्हणजे जणू काही कोटी वर्षांपूर्वी पहिला जो पाऊस पडला होता त्या पावसावेळी मातीतून आलेला सुगंध याची आठवण करून देणारा असतो.
लेखक पांढऱ्या कागदांवरती काळ्या अक्षरांनी अंधारी जीवन प्रकाशमय करीत असतो.पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतात. अनेकांच्या आयुष्याचं फक्त कल्याणच करतात.
लेखक म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र आणि वाचक म्हणजे त्या ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्राचे सप्तरंगी छायाचित्र..
पुस्तक वाचत असताना लेखकाच्या जीवाची झालेली घालमेल,त्याची झालेली जीवाची तगमग,भावनिक गुंतागुंत,कमी जास्त झालेला रक्तदाब या सर्व भावनांशी एकरूप होऊन जो पुस्तक वाचतो तोच खरा वाचक..
लेखक हा नेहमीच पुस्तकांसोबत जोडलेला असतो नाही तो असावाच लागतो.लेखकाची व पुस्तकाची नाळ ही सदैव जोडलेले असावी.
पण बऱ्याच वेळेला पुस्तक संपल्यानंतर त्या लेखकाचा आणि पुस्तकाचा काही संबंध राहत नाही.पुस्तक त्या लेखकापासून दूर जातं.
माणसाच्या भावभावना सोबत घेऊन जगणारा लेखक आणि पुस्तक लिहून त्यापासून बाजूला होणारा लेखक यामध्ये फार संवेदनशील अंतर आहे.
काही लेखक फोन केल्यानंतर फोन उचलत सुद्धा नाहीत,आणि फोन उचलल्यानंतर फारच कामात आहे असं सांगून बोलणं थांबवतात. त्यांना जिवंत माणसाशी बोललेलं कदाचित आवडत नसावं..
पण याला सुद्धा अपवाद आहे आणि तो अपवाद जीवन आनंदाने जगण्यासाठी फारच अलौकिक आणि अविस्मरणीय असा आहे.
परवाच शिक्षणात्री या मासिकामध्ये फेब्रुवारी २०२३ या अंकामध्ये मराठी भाषा दिनानिमित्त मराठीचा जागर करणाऱ्या महानुभावांच्या वाचन छंदा विषयी.. वाचन आवडी विषयी मा.बाबाराव मुसळे जेष्ठ कथाकार यांचा माझं वाचन,माझी वाचन प्रक्रिया या लेखामध्ये त्यांनी लेखक बनण्यामागची खडतर तपश्चर्या याबद्दल लिहिले होते..हा लेख वाचून मी त्यांना फोन लावला. यापूर्वी मी त्यांच्याशी कधीही बोललो नव्हतो त्याचा नंबर ही माझ्याकडे नव्हता.या लेखाखाली तो दिला होता.
पहिल्यांदा फोन लागला तेव्हा तो व्यस्त लागला.आणि थोड्यावेळाने त्यांचा मला फोन आला तब्बल वीस मिनिटे आम्ही बोललो. त्यांच्याशी बोलत असताना ते कोणी परके किंवा परग्रहावर राहणारे आहेत असं मला कधी वाटलंच नाही.त्यांच्याशी बोलत असताना आमचे काही ऋणानुबंध आहेत असंच वाटत होतं.आपुलकी,प्रेम,जिव्हाळा,
नात्यातील पावित्र्यता या सर्व भावना व या भावनेला सोबत घेऊन विशाल मन बाळगणाऱ्या या लेखकांशी बोलताना ऊर भरून आला.आणि माझा चांगुलपणावरील विश्वास दृढ झाला.
यांच्याशी बोलून झाल्यानंतर मला सॉक्रेटिसचे विचार आठवले.मला काहीच कळत नाही हे तरी कळतं.इतरांना तेही कळत नाही.
त्यानंतर त्यांनी लगेचच फेसबुक वरती माझा आणि त्यांचा झालेला मोबाईल वरील सुसंवाद पोष्ट केला.( ही पोस्ट वाचून प्राचार्य भास्कर गायकवाड यांचा मला फोन आला व त्यांनी माझी कौतुक केले.) पण त्याचबरोबर शिक्षणयात्री या मासिकामध्ये 'पुस्तकांसोबत जगताना.' एक विस्तृत अशी आशीर्वाद स्वरूप शब्दरूपी प्रतिक्रिया दिलेली आहे.फेसबुक वरील ती पोस्ट व माझा लेख वाचून दिलेली प्रतिक्रिया जशी आहे तशी खाली देत आहे.
असाही एक दर्दी वाचक।
परवा एक निनावी फोन आला,फोन निनावी आले तरीसुद्धा मी उचलतो.कारण कोण,कधी, कुठून,कसे कोणत्या विषयावर बोलेल याचा नेम नसतो,माझ्याशी असं बोलणाऱ्या माणसांची संख्या जास्त असते.उगीच काहीतरी आगाऊपणा म्हणून मला फार कमी फोन येतात.बरेच मान्यवर असे आहेत की ते निनावी फोन उचलत नाहीत.पण मी तसे करत नाही।
तर तो निनावी फोन मी घेतला,आणि पलीकडून एक व्यक्ती बोलू लागली,'सर,तुमचा एक लेख माझ्या वाचनात आला.त्या लेखातून तुम्ही लेखक बनण्या मागची तुमची जी खडतर तपश्चर्या आहे ती मांडली आहे,ती मला खूप भावली आहे,म्हणून फोन केला।'असं बरंचसं माझ्यासाठी उत्साहवर्धक वाटेल असं तो बराचवेळ बोलत राहिला.
त्या लेखाचे शीर्षक'लेखक होणे खरंच सोपे आहे का?असे असावे मध्यंतरी हा लेख औरंगाबादच्या दिव्य मराठी या दैनिकाच्या रविवार पुरवणीत प्रकाशित झाला होता.तो लेख अनेकांना आवडला होता.त्यावेळी कित्येक फोन मला येऊन गेले होते.धुळे जिल्ह्यातल्या कुठल्याशा गावावरून निघणाऱ्या एका मासिकात तोच लेख पुनर्मुद्रित झाला.तो विजय गायकवाड यांच्या वाचनात आला,हा लेख त्या मासिकात छापून आल्याबद्दल मला काहीही माहिती नव्हते.गायकवाड यांनी सांगितलेले मासिकाचे व संपादकाचे नावही माझ्या परिचयाचे नव्हते.
तरीही त्या मासिकाने हा वाचक मला मिळवून दिला यासाठी त्या संपादकाचे मला विशेष आभार मानावेसे वाटतात.
तर हा वाचक नाव विजय कृष्णात गायकवाड, मुक्काम पोस्ट टोप,तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर फक्त नववा वर्ग शिकलेला.कोल्हापूरला कुठल्या कारखान्यात जेथे लोखंड वितळवून त्याच्या रसापासून मोटर्सचे पार्ट बनविण्यात येतात त्या कारखान्यात काम करणारा आहे.कामगार आणि तोही असा वाचक की ज्याच्याजवळ स्वतः विकत घेतलेली जवळपास दीडशे पुस्तके मला कौतुक वाटलं.ते सांगत होते,'सर,मला पुस्तक वाचल्याशिवाय चैन पडत नाही.हा तुमचा लेख वाचला,त्यात तुम्ही ज्या गोष्टी दर्शविल्या त्या मला भावल्या,आणि म्हणून तुम्हाला फोन करण्याची हिम्मत केली.'
मी माझ्याबद्दल त्यांना फारसं सांगत बसलो नाही कारण एरव्हीही मला कोणाहीसोबत माझ्याविषयी अधिक बोलणे हे मुळात आवडत नाही.तरीही मी त्यांना माझ्या दोन गोष्टी वाचायची शिफारस केली,एक माझा सहावीच्या वर्गात बालभारती पुस्तकात असणारा' बाकी वीस रुपयांचं काय?' हा पाठ कारण हे पुस्तक सहज उपलब्ध होते.आणि माझी 'हाल्या हाल्या दुधू दे' ही कादंबरी,ही कादंबरी मिळविण्यासाठी मी त्यांना मा.अनिल मेहता यांच्या कोल्हापूर येथील महालक्ष्मी द्वारा जवळ असणाऱ्या मेहता पब्लिशिंग हाऊसच्या पुस्तक विक्री दुकानात जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना माझ्याबद्दल सांगून तिथून विकत घ्यायला सांगितले.आणि ते त्यांना शक्य आहे असे ते बोलले.
असा वाचक भेटणे म्हणजे लेखकाला प्रचंड ऊर्जा स्रोत मिळणं होय.याआधी प्राचार्य भास्कर गायकवाड,
औरंगाबादचे नारायण कुडलीकर हे असेच थोर वाचक आहेत.त्यात आता भर पडली विजय कृष्णात गायकवाड यांची..
'विजय' शिक्षण यात्री या मासिकात आलेला पुस्तकांसोबत जगताना हा तुमचा लेख वाचला आणि एक बऱ्यापैकी यशस्वी लेखक म्हणून मी मला समाधानी मानत असताना मी कुछ भी नही याची जाणीव मला या लेखाच्या व्यापक प्रसार पुस्तक व्यवस्थेतून दिसून आली.
तुम्ही ज्या अलेक्झांडरच्या नावाने असणाऱ्या वाचनालयाचा संदर्भ देता त्या वाचनालयात माझं पुस्तक जावो अशी जर मी अपेक्षा केली तर मी आणि ती वाचनालय यांच्यात कितीतरी योजने नव्हे तर काळही अंतरावर उभा आहे.कदाचित त्यासाठी मला लेखक म्हणून हजार वेळा जन्म घेऊनही मी माझे हे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही.
आज माझी अवस्था ही समुद्रातल्या वाळूच्या एका छोट्यातल्या छोट्या अशा कणासारखी आहे.मला वाटणारा माझा दुराभिमान एका अफाट पोकळीत भिरकावून दिलेल्या वाळलेल्या पानासारखा वाटतो.
माझ्या स्थिरावण्याने माझं अस्तित्व जगाला कळावे ही माझ्यासाठी दुर्मिळात दुर्मिळ अशी गोष्ट असेल.
मित्रा,केवळ तुमच्यामुळे या माझ्या वास्तव स्थितीची मला जाणीव झाली.त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो.
तुम्ही फेसबुकवर नाहीत याचा आनंद झाला आणि फेसबुकवर कधी येण्याचा प्रयत्न करू नका.कारण ते जग रिकामटेकड्यांचे आहे असे मला वाटते.मी त्या जगाचा सहप्रवासी जरूर आहे.पण माझ्या गरजेपुरता मी त्याचा वापर करतो.मला त्या जगात माझी वाचकांची संख्या वाढविण्याची संधी मिळते असं वाटते.पण ते सारं भ्रामक आहे.तिथे असणारे जे वाचकं ते टाइमपासवाले आहेत.
त्यातून फार क्वचित नामांकित असे वाचक मिळू शकतात नाही असे नाही.
पण तुमच्यासारखा आयुष्यातला फार थोडा वेळ वाचनासाठी खर्च करणाऱ्या सात्विक आणि सच्च्या वाचकाला पुस्तकं हीच योग्य साथ देऊ शकतात.
फेसबुक हे आभासी जग,आभासी माध्यम आहे.
त्यामुळे फेसबुकवर जाऊन तितकी मजा वाटत नाही.मी म्हणतो त्या पद्धतीचं लेखन जर तुम्ही विस्तारपूर्वक केलं तर तो या जगातल्या तुमच्यासारख्या काही निस्तं वाचनातून आनंद,
समाधान मिळवणाऱ्या वाचकांसाठी फार मोठी देणगी असेल.तुमचा अनुभव हा त्यांच्यासाठी फार मोलाचा ठरेल.हे तर खरंच पण त्या अनुभवाचा फायदा अनेकांना ते पुस्तक उपलब्ध असेल तोपर्यंत घेता येईल.
पुस्तकं ही मर्यादित आयुष्य लाभणारी गोष्ट आहे,
आपल्याकडे अलेक्झांडरच्या त्या लायब्ररीसारखी व्यवस्थाही नाही.त्यामुळे आपल्याकडची पुस्तकं किती काळ राहतात आणि पुस्तक नसले की तो लेखक किती लवकर विस्मृतीतही जाऊ शकतो.याचा पण विचार आवश्यक आहे.पण आता अलीकडे पुस्तकांच्या जगातही काही क्रांती होते आहे.पुस्तकांची ई-बुक्स तयार होत आहेत आणि ती नेटवर कधीही उपलब्ध आहेत.माझीही काही ई- बुक्स तयार झालेली आहेत.पण ती नेमकी मला शोधत येत नाहीत.जर तुम्हाला ती शोधता आली तर त्याचाही मला आनंद होईल.
प्राचार्य भास्कर गायकवाड सर हे उत्तम वाचक आहेत.
त्यांची स्वतःची अशी फार मोठी लायब्ररी आहे.
त्यांच्याजवळ मोठमोठे ग्रंथ आहेत.मी ते पाहिले आहेत.आजही ते मोठ्या पुस्तकांवर खर्च करतात.पण ते वाचल्यावर फारसे व्यक्त होत नाहीत,हा त्यांचा दोष आहे.
मी त्यांना तसे म्हणतही असतो.त्यामुळे ते तुमच्या संपर्कात आले.तुमच्याशी बोलले याचा मला आनंद होतो.
खरं म्हणजे लेखकाचे जसे एक जग असते.तसं तुमच्यासारख्या वाचकांचे एक जग असावं त्यात तुमच्यासारख्या वाचकांचा एकमेकांशी परिचय ही तर बाब आहेच.पण तुमचेही दर वर्षातून एखादे संमेलन व्हावे.किमान तुम्ही एकमेकांना भेटावे,त्यातून विचार विमर्श व्हावा.त्यातूनही काहीतरी एक वेगळं असं रसायन बाहेर यावं.जे जगाच्या कल्याणासाठी उपयोगी ठरू शकणार आहे.बघा काय करता येईल ? नारायण कुडलीकर यांनाही मी तुमचा नंबर देईन किंवा त्यांचा नंबर मी तुम्हाला देईन त्यांच्याशी कसा संपर्क करता येईल
मस्त वाचा,लिहा.तुम्हाला अनंत शुभेच्छा..
आदरणीय बाबाराव मुसळे ( नाना )
- जेष्ठ कथाकार
यांच्या एकूण १० कादंबऱ्या आहेत.बाकी वीस रुपयाचं काय ? इयत्ता सहावी बालभारतीमध्ये ही कथा आहे.दावणीचा बैल व हाल्या हाल्या दुधु दे ( कांदबरी ) विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत.
हा लेख मी आता पूर्णविराम देऊन थांबवतो. तरीसुद्धा हा लेख तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या भावना व विचारांना सोबत घेऊन चालत चालत राहील अखंडपणे कधीही न थांबण्यासाठी.
विजय कृष्णात गायकवाड