* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: ऑक्टोबर 2023

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३१/१०/२३

बिबळ्याचा दुसरा बळी.. Second victim of leopard..

त्या विशिष्ट नरभक्षक बिबळ्याला केवळ पगमार्क्सवरून ओळखू शकेन असे कोणतेही फोटोग्राफ्स किंवा इतर साधनं मला उपलब्ध नव्हती.त्यामुळे अशी निश्चित माहिती मिळेपर्यंत आसपासच्या सर्व बिबळ्यांना आरोपी समजणं आणि मिळेल ती पहिली संधी घेणं याशिवाय गत्यंतरच नव्हतं.रुद्रप्रयागला पोचलो त्याच दिवशी मी दोन बोकड खरेदी केले.दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यातल्या एकाला मी यात्रामार्गावर मैलभर अंतरावर एका ठिकाणी बांधलं आणि दुसऱ्याला घेऊन मी अलकनंदा ओलांडली व झाडाझुडपांच्या जंगलातून जाणाऱ्या एका पायवाटेवर बांधलं... आदल्या दिवशी याच ठिकाणी मला एका मोठ्या वयस्कर बिबळ्याचे बरेच जुने पगमार्क्स सापडले होते.दुसऱ्या दिवशी दोन्ही ठिकाणी भेट दिल्यावर मला नदी पलीकडचा बोकड मेलेला आढळला आणि त्याचा काही भाग खाल्लासुद्धा गेला होता.या बोकडाला बिबळ्यानेच मारलंय हे सरळ कळत होतं,पण खाल्लं मात्र एखाद्या लहान प्राण्याने होतं; बहुदा पाईन मार्टिनने !

(पाईन मार्टिन हा प्राणी म्हणजे आज 'येलो थ्रोटेड मार्टिन' म्हणून ओळखला जाणारा प्राणी असावा.हा साधारण मुंगुसासारखा किंवा 'व्हीझेल'सारखा दिसतो.)


त्या दिवसभरात नरभक्षकाची कोणतीही खबर न मिळाल्याने मी त्या बोकडाजवळ संध्याकाळी बसायचं ठरवलं आणि बोकडापासून ५० यार्डावर एक छोटंसं झाड बघून त्याच्या फांदीवर साधारण दुपारी दोनच्या सुमारास जागा घेतली. तिथे मी जवळजवळ तीन तास बसलो पण तेवढ्या वेळात कोणत्याही जनावरांकडून किंवा पक्ष्यांकडून बिबळ्या आसपास असल्याचे निर्देश मिळाले नाहीत.अंधार पडायला लागल्यावर मी झाडावरून उतरलो,बोकडाच्या गळ्याला बांधलेली दोरी सोडली (आदल्या रात्री त्याला मारल्यावर ही दोरी तोडण्याचीही तसदी बिबळ्याने घेतली नव्हती.) आणि बंगल्याकडे पावलं वळवली.मी मगाशीच कबूल केलंय की मला नरभक्षक बिबळ्यांचा फारच कमी अनुभव होता.पण नरभक्षक वाघांचा मात्र भक्कम अनुभव गाठीशी होता.

त्यामुळे झाड सोडल्यापासून ते बंगल्यावर पोचेपर्यंत अचानक हल्ला होऊ नये म्हणून मी सर्व तऱ्हेची दक्षता घेतली आणि माझं सुदैव की मी सावध राह्यलो कारण दुसऱ्या दिवशी अगदी लवकरच उठून बाहेर पडलो तसे मला बंगल्याच्या फाटकापाशीच एका मोठ्या नर बिबळ्याचे ताजे पगमार्क्स मिळाले.ह्या पगमार्क्सचा माग घेतला तेव्हा तो माग कालचा मेलेला बोकड जिथे पडला होता त्यापासून जवळच,पायवाटेला छेदून जाणाऱ्या एका घळीपर्यंत गेलेला आढळला.


आता ज्या बिबळ्याने इतक्या लांब माझा पाठलाग केला होता तो नक्कीच नरभक्षक असणार! त्यामुळे तो दिवसभर मी शक्य तेवढी तंगडतोड करत वाटेत लागेल त्या गावातल्या लोकांना सावध करत राह्यलो की बिबळ्या आता नदीच्या आपल्या बाजूला आहे.खबरदारी घ्या !


त्या दिवशी तरी काही विशेष घडलं नाही पण दुसऱ्या दिवशी गुलाबराईच्या पलीकडच्या जंगलात फेरफटका मारून परत आल्यावर ब्रेकफास्ट करत असतानाच एक माणूस घाईघाईने बंगल्यात आला आणि मला सांगितलं की आदल्या रात्री बंगल्याच्या वरच्या डोंगरावरल्या एका गावात एका बाईचा बळी गेलाय.हाच तो पहाड,की जिथून तुम्ही त्या नरभक्षकाच्या पाचशे चौ.मैलांच्या इलाक्याचं विहंगम् दृश्य बघितलं होतंत !


काही मिनिटातच मी मला पाहिजे त्या सर्व वस्तू जमवल्या.एक जास्तीची रायफल व शॉटगन, काडतुसं मजबूत दोर,माझ्या फिशिंगची लाईन आणि माझी माणसं व तो गाववाला यांना बरोबर घेऊन मी तो अवघड चढ चढायला सुरुवात केली.हा दिवस जरा गरमच होता आणि तीन मैल अंतर जरी फार नसलं तरी जवळजवळ तीन-चार हजार फुटांचा तो चढ चढून गावात पोचलो तेव्हा आम्ही घामाने निथळत होतो.पोचल्या पोचल्याच बळी गेलेल्या त्या बाईच्या नवऱ्याकडून सर्व हकिगत आम्हाला ऐकायला मिळाली.चुलीच्या उजेडात संध्याकाळची जेवणं आटोपल्यानंतर त्याच्या बायकोने सर्व भांडीकुंडी एकत्र केली आणि ती घासण्यासाठी दरवाजाकडे गेली.आणि इकडे नवरा निवांतपणे हुक्का प्यायला बसला.दरवाजा उघडल्यावर ती बाई पायरीवर बसली.त्याचक्षणी भांडी गडगडत खाली पडल्याचा आवाज आला.नक्की काय झालंय हे कळण्याइतपतही तिथे उजेड नव्हता. दोन-तीन हाका मारूनही काहीच उत्तर न आल्याने नवरा पटकन उठला व त्याने घाईघाईने दरवाजा लावून घेतला."मयत झालेल्या व्यक्तीचं शरीर मिळवण्यासाठी मी जीवाचा धोका पत्करण्यात काय मतलब होता साहेब?" हे त्याचं तत्त्वज्ञान कितीही निर्दय वाटत असलं तरी तर्कनिष्ठ होतं.नंतर मला हेही समजलं की त्याला जे काही दुःख झाल्याचं दिसत होतं ते त्याची बायको गेल्यापेक्षा काही दिवसांनी अपेक्षित असलेल्या मुलाच्या वारसाच्या विचारामुळेच होतं.-" जिथे बिबळ्याने तिला उचललं होतं,तो दरवाजा एका तीन-चार फूट रुंदीच्या बोळात उघडत होता.हा बोळ पन्नास-साठ यार्ड लांब होता आणि त्याच्या दोन्ही बाजूला रांगेत घरं होती.भांड्यांचा आवाज व त्यानंतरच्या नवऱ्याच्या हाका ऐकल्यावर त्या बोळातल्या प्रत्येक घराचं दार क्षणार्धात घट्ट बंद झालं. जमीनीवरच्या खाणाखुणांवरून कळत होतं की त्या बाईला तोंडात धरून बिबळ्याने बोळातूनच तिला ओढत नेलं होतं.नंतर तिला ठार मारल्यानंतर डोंगर उतारावरून काही अंतर जाऊन उतारावरची एक दोन शेतं पार करून एका छोट्याशा घळीत नेलं होतं.इथेच त्याने काही भाग खाल्ला होता व इथेच त्याने तिचे दयनीय अवस्थेतले अवशेष टाकून दिले होते.


ज्या घळीत हा मृतदेह पडला होता ती उतारावरच्या शेताच्या एका कडेला होती व त्या शेताच्या दुसऱ्या बाजूला शेजारच्याच शेताच्या कडेला चाळीस यार्डावर एक छोटंसं निष्पर्ण झालेलं आक्रोडाचं झाडं होतं.या झाडाच्या फांद्यांवर जमीनीपासून चार फुटांवर सहा फूट उंचीची गवताची गंजी रचून बांधली होती.याच गंजीवर बसायचं मी ठरवलं.


मृतदेहाच्या अगदी शेजारून एक पायवाट घळीपर्यंत गेली होती.याच वाटेवर त्या बाईच्या मारेकऱ्याच्या पावलांचे ठसे उमटले होते आणि हे ठसे आदल्यारात्री बोकडापासून ते बंगल्यापर्यंत माझा पाठलाग करणाऱ्या बिबळ्याच्या पगमार्क्सी तंतोतंत जुळत होते.


हे पगमार्क्स एका खूप मोठ्या आकाराच्या वयस्क बिबळ्याचे होते व चार वर्षापूर्वीच्या त्या रायफल शॉटमुळे मागच्या डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे अगदी वेगळे काढता येत होते.


गावातून मी दोन मजबूत बांबू घेतले आणि जो बांध वरच्या व खालच्या शेतांमधून जात होता, त्याच्या जवळच मी ते खोलवर ठोकून घेतले. त्या बांबूना मी जास्तीची रायफल व शॉटगन बांधली.त्याच्या ट्रीगर्सना माझी फिशिंगची रेशमी दोरी बांधून ट्रीगरगार्ड्स भोवती गुंडाळून घळीपलीकडे ठोकलेल्या लाकडाच्या खुंट्यापर्यंत ताणून बांधून टाकली.जर आदल्या रात्रीच्याच वाटेवरून बिबळ्या भक्ष्यावर आला तर या फिशिंग लाईन्स खेचल्या जाऊन स्वतःवर गोळ्या झाडून घेण्याची शक्यता होती आणि अगदी दुसऱ्या वाटेवरून आला व भक्ष्यावर असताना मी शॉट घेतला तरीही परत जाण्याचा प्रयत्न करत असतानाही हीच शक्यता होती.


बिबळ्या त्याच्या नैसर्गिक रंगामुळे आणि मृतदेहावर एकही कपडा नसल्यामुळे दोन्हीही त्या अंधाऱ्या रात्री मला नीट दिसणार नव्हते म्हणून दिशेचा अंदाज यावा या हेतूने मी घळीतून एक पांढुरका दगड शोधून आणला आणि भक्ष्यापासून माझ्या बाजूला दोन फुटांवर खालच्या शेताच्या कडेला ठेवून दिला.


आता हे सर्व रणभूमीचं नियोजन मनासारखं झाल्यावर मी गंजीवरलं जरासं गवत बाजूला काढलं आणि थोडं माझ्या पाठीशी,थोडं समोर कमरेपर्यंत येईल असं पसरून गंजीत आरामात जागा घेतली.माझं तोंड भक्ष्याकडे आणि पाठ झाडाकडे असल्याने बिबळ्याने मला पाहण्याची शक्यताच नव्हती;अगदी तो कोणत्याही वेळी आला तरी!एकदा मारलेल्या भक्ष्यावर परत न येण्याची त्याची ख्याती माहीत असूनही आज तो येणार याबद्दल मला संपूर्ण खात्री होती.


दमछाक करणारा चढ चढून परत नंतरच्या या सगळ्या धावपळीमुळे माझे कपडे अजूनही ओलेच राह्यले होते.

पण त्यातल्या त्यात कोरड्या राहिलेल्या जॅकेटमुळे मात्र थंडीपासून थोडं संरक्षण मिळत होतं.आता मी माझ्या गुबगुबीत व आरामशीर बैठकीवर बसून रात्रीच्या पहाऱ्यासाठी सज्ज झालो.मी माझ्या माणसांना जाताना सांगितलं होतं की,सकाळी मी परतेपर्यंत किंवा फार उशीर झाला तरी उन्हें चढेपर्यंत त्यांनी मुखियाच्याच घरात थांबावं.(मी बांधावरून गंजीवर सहज चढलो होतो आणि नरभक्षकासाठीही ते तितकच सहज शक्य होत.)


सूर्य मावळतीला गेला होता व मावळत्या सूर्याच्या तिरप्या किरणांखाली निळसर गुलाबी दिसणाऱ्या हिमालयाच्या पार्श्वभूमीवर गंगेच्या खोऱ्याचं दृश्य पाहणं म्हणजे डोळ्यांना मेजवानीच होती;संधीप्रकाश संपून अंधार केव्हा पडला ते मला समजलंसुद्धा नाही.


रात्रीच्या संदर्भात 'अंधार' ही संकल्पना सापेक्ष आहे व त्याला निश्चित परिमाण नाही.एखाद्या माणसाला अतिशय गडद काळी वाटणारी रात्र दुसऱ्याला साधी अंधारी वाटू शकते तर तिसऱ्याला बऱ्यापैकी दिसू शकेल इतपतच गडद वाटते.आयुष्यातली कित्येक वर्ष जंगलात काढल्यामुळे मला स्वतःला कोणतीही रात्र कधीच संपूर्ण अंधारी वाटत नाही... फक्त आकाश ढगांनी आच्छादलेलं नसेल,तर... अर्थात याचा अर्थ असा नव्हे की मला दिवसाइतकं रात्रीसुद्धा दिसू शकतं. 


पण किमान जंगलात रस्ता चुकू नये इतपत मला बऱ्यापैकी दिसू शकतं.भक्ष्याजवळ मी जो पांढरा दगड ठेवला होता तो केवळ एक खबरदारी म्हणून;नाहीतर चांदण्याच्या आणि हिमालयाच्या रांगांवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशामुळे नेम धरण्याइतपत उजेड मला नक्कीच मिळेल असं मला वाटलं.


पण बहुतेक आज माझं नशीब जोरावर नसावं कारण जरा अंधार पडतो न पडतो तोच विजा चमकू लागल्या आणि दूरवर ढगांचा गडगडाट ऐकू येऊ लागला.काही मिनिटातच संपूर्ण आकाश ढगांनी आच्छादून गेलं व पावसाचे मोठमोठे थेंब पडायला सुरुवात झाली.त्याचवेळी घळीत एक दगड घरंगळत गेल्याचा आवाज आला आणि काही मिनिटानंतर माझ्या गंजीखालच्या गवताच्या काड्या पावलांखाली दबल्याचा आवाज आला.बिबळ्या आला होता. इकडे सोसाट्याचा थंडगार वारा माझ्या ओल्या कपड्यांमधून शीळ घालत असताना,धो धो पावसात मी कुडकुडत असताना तो मात्र माझ्या गंजीच्या छपराखाली कोरडा ठणठणीत आणि उबदार ठिकाणी बसला होता.मी अनुभवलेल्या कित्येक वादळांपैकी आजचं वादळ जरा विलक्षणच होतं.हे वादळ ऐन भरात असताना मला त्या छोट्या गावाच्या दिशेने जाणारा एक कंदील दिसला.तो कंदिल एवढ्या वादळी रात्री घेऊन जाणाऱ्या त्यामाणसाच्या धैर्याचं मला मनोमन कौतुकच वाटलं,मला काही तासांनी कळलं की एक इलेक्ट्रिक शूटींग लाईट माझ्यापर्यंत पोचवण्यासाठी त्या माणसाने पौरीवरून वादळ आणि बिबळ्याची दहशत याची पर्वा न करता तीस मैलांची मजल मारली होती.हा लाईट देण्याचं आश्वासन मला शासनाकडून मिळालं होतं.


ही महत्त्वाची वस्तू फक्त काही तास लवकर माझ्या हातात पडली असती तर? पण 'जर आणि तर'ला वास्तवात तसा काहीही अर्थ नसतो.! आणि अशी खात्री तरी कोण देऊ शकत होतं की बिबळ्याने गळ्यात दात रुतवले नसते तरी पुढे बळी गेलेल्या माणसांना दीर्घायुष्य लाभलं असतं?

आणि समजा लाईट वेळेवर आला असता तरीही माझ्याकडून त्या रात्री बिबळ्याची शिकार झालीच असती याची तरी काय शाश्वती होती ? मला अगदी हाडांपर्यंत गोठवल्यानंतर शेवटी पाऊस थांबला आणि ढगही हळूहळू विरळ व्हायला सुरुवात झाली होती.तेवढ्यात अचानक तो पांढरा दगड दिसेनासा झाला आणि बिबळ्या खात असतानाचा आवाज ऐकायला आला. आदल्या रात्री त्याने घळीत बसून त्या बाजूने भक्ष्य खाल्लं होतं आणि आजही तसंच होईल असं गृहीत धरून मी तो दगड भक्ष्यापासून माझ्या बाजूला ठेवला होता.बहुतेक पावसामुळे घळीत छोटी छोटी डबकी तयार झाली होती व ती टाळण्यासाठी बिबळ्याने खाण्यासाठी आज ही नवी जागा निवडली होती आणि तसं करताना तो बरोबर त्या दगडाच्या समोरच आला असणार.ह्या प्रकारची मी अपेक्षाच केली नव्हती. पण बिबळ्याच्या सवयी माहीत असल्याने मला फार काळ थांबावं लागणार नाही याची खात्री होती.दहा मिनिटांनी मला पुन्हा एकदा तो दगड दिसायला लागला आणि अगदी लगेचच गंजीच्या खाली मी आवाज ऐकला.काहीतरी फिकट पिवळसर आकृती गंजीखाली अदृश्य झाली.हा फिकट रंग त्याच्या वयामुळे असावा पण चालताना त्याने जो आवाज केला त्याचं कोडं मला अजूनही उलगडलेलं नाही.स्त्रियांच्या रेशमी वस्त्रांच्या सळसळीसारखा तो आवाज होता.गवतामुळे झाला म्हणावं तर गंजीखाली तसं गवत नव्हतंच !काही काळ जाऊ दिल्यानंतर मी रायफल खांद्याला लावली व दगड परत दिसेनासा होईल त्याक्षणी ट्रीगर दाबण्याच्या तयारीने दगडावर नेम धरून ठेवला.


पण एवढी जड रायफल तुम्ही किती वेळ खांद्याला लावू शकता यालाही मर्यादा असते.ती मर्यादा ओलांडल्यानंतर स्नायूंना विश्रांती देण्यासाठी मी रायफल खाली ठेवली.मी असं केलं मात्र आणि दुसऱ्यांदा तो दगड दिसेनासा झाला.

पुढच्या दोन तासात हाच घटनाक्रम तीनदा घडला.शेवटी वैतागून नैराश्याच्या भरात तो बिबळ्या गंजीखाली अदृश्य होत असताना मी वाकलो आणि अस्पष्ट दिसणाऱ्या त्या आकृतीच्या दिशेने गोळी झाडली.शेताचा इथला भाग या ठिकाणी २ फूट रूंद होता व जेव्हा दुसऱ्या दिवशी मी तो तपासला तेव्हा मला त्या २ फूट जागेत बंदुकीच्या बुलेटने पडलेलं भोक दिसलं आणि त्याच्याबरोबर बिबळ्याच्या मानेवरचे काही केसही आढळले.यापुढे मात्र सकाळपर्यंत मला काहीही दिसलं नाही.सूर्य उगवल्यावर मी माझ्या माणसांना गोळा केलं आणि रुद्रप्रयागच्या वाटेवरचा डोंगर उतरू लागलो.त्या बाईचा नवरा व त्याचे नातलग ते उरलेले अवशेष अंत्यविधीसाठी घेऊन गेले.


२३.०९.२३ या लेखातील पुढील भाग…


२९/१०/२३

असे ही एक स्मारक - Such a memorial..

ते काॕटवर बसलेले बाबा दिसतात का ?अं..हो तेच ! 


आपण त्यांना पाहु शकतो पण ते आपल्याला नाही पाहु शकत... कारण त्यांना दिसतच नाही... ! 


अं...हं... पण त्यांना अंध म्हणायचं धाडस नाही होत.नजर नसेलही डोळ्यात कदाचीत,पण तरीही त्यांना एक दृष्टी आहे... !


नजर आणि दृष्टी मध्ये फरक आहे... दोन वाक्यं वाचायला नजर लागते.. त्याचा अर्थ कळायला दृष्टी !


समोरच्याला पहायला नजर लागते... समोरच्याच्या मनातलं पहायला दृष्टी ! 


लहानपणी शाळेत प्रत्येकजण चौकोन,त्रिकोण, काटकोन,

लघुकोन,विशालकोन शिकतो... दृष्टिकोन शिकायचा राहुनच जातो !


आयुष्याच्या भुमितीत,आपणच आपल्याभोवती एक न दिसणारं वर्तुळ आखुन घेतो,आपल्याही नकळत ... 


यात एक चौकोनी कुटुंब असतं... 


मी,माझं आणि मला या 'त्रि' कोनांच्या बाहेरचं जगच नाही असं समजुन जगणं सुरु होतं....


संकुचित कसं व्हायचं असतं ते लघुकोनानं शिकवलेलंच असतं... 


विशालकोन सुद्धा आस्तित्वात असतो...हे कळेपर्यंत आयुष्याचा काटकोन झालेला असतो... 


आपणही एकदा विशालकोन होवु म्हणता म्हणता... समिकरणं बदलत जातात... हिशोब मांडता मांडता सगळेच कोन मोडुन पडतात आणि मग उरते फक्त सरळ रेषा...


आपले सगळेच कोन हरवुन बसतात... आणि शेवटी प्रश्न उरतो आता मी कोण ? 


या प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत... आयुष्याची भुमिती कळण्याआधीच... या सरळ रेषेला भुई मातीत घेते कायमचीच...!


असो ! 


नीट पाहिलं ? या बाबांना पायही नाहीत...! 


हे अंध आणि अपंगही... ! 


पण यांना डोळे नसुनही दृष्टी आहे आणि पाय नसुनही उठुन उभं राहण्याचं बळ अजुन आहे..! 


अंध असुनही दृष्टी असणं आणि पाय नसुनही बळ असणं यालाच दिव्य अंगं म्हणतात...! 


ज्यांच्याकडे हि अंगं आहेत ते दिव्यांग !

शहाणपण आणि अनुभवही असेच... !


शहाणपणाला पाय असतात,ते चालु शकतं,पण डोळे नसतात...! अनुभवाला दिसु शकतं,डोळे असतात पण पाय नसतात...ते स्वतंत्र चालु शकत नाही ! 


एकटं शहाणपण आणि एकटा अनुभव असुन काहीच कामाचे नाहीत !


अशावेळी शहाणपणानं,अनुभवाला पाठकुळीवर घ्यावं... अनुभव दाखवेल त्या दिशेनं शहाणपणानं मग चालत रहावं... ! 


असं चालणं म्हणजेच जगणं... नाहीतर फक्त भोगणं ...! 


तर... बाबांचे लहानपणीच डोळे गेले... पण पाय मात्र धडधाकट होते. 


रेल्वेमध्ये काही न् काही विकायचा व्यवसाय ते करायचे.

ऊत्तम चाललं होतं.पुढे लग्न झालं.दोघं एकमेकांना पुरक ! 


एक मुलगी झाली... त्यानंतर मुलगा...! 


यथावकाश मुलीचं लग्न करुन दिलं.मुलगा लहान होता,त्याला शिकायची भारी हौस... ! म्हणायचा,पप्पा खुप शिकायचंय मला... ! पप्पाही त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत सांगायचे... बाळा भरपुर शीक,मोठा हो ! 


मी वचन देतो तुला,शिक्षणासाठी काही कमी पडु देणार नाही... ! पण... हे घडायचं नव्हतं...


एके दिवशी रेल्वेतुन गडबडीने उतरतांना पाय घसरला, पायांवरुन रेल्वे गेली... थोड्यावेळापुर्वी असणारे पाय सोडुन गेले... !


पुर्ण अपंग होवुन घरात झोपुन राहिले.पायातली वेदना आणि डोक्यातले विचार... दोन्हींच्या कळा मस्तकात जायच्या ! खायचे प्यायचे वांधे... आता मुलाला शिकवणार कसं ? 


परिस्थिती मार्ग दाखवते.... 


बाबांच्या पत्नीनं आता चार घरी घरकाम सुरु केलं... कसंतरी घर पुन्हा चालु लागलं ...


बाबांची पत्नी बाबांचं सारं करायची ! 

पण हे सुद्धा व्हायचं नव्हतं ! 


मध्यंतरी बाबांच्या पत्नीच्या पायाला काहीतरी झालं,

पायाला गँग्रीन झालं... निदान होवुन ऊपचार सुरु होईतो... डाॕक्टरांनी जाहिर केलं,यांचेही पाय कापावे लागतील नाहीतर जगण्याची शाश्वती नाही... ! 


बाबांच्या पत्नीचाही पाय कापावा लागला... !


आता कुणी कुणाचं करायचं ?  दोघेही अंथरूणावर पडुन...!


मुलगा रात्र रात्र रडत रहायचा... ! तिघांच्याही डोळ्यांपुढं पुर्ण अंधार... ! कुणीतरी जाणुनबुजुन हे घडवुन आणलंय असं वाटावं अशी परिस्थिती !


लोक भेटायला - बघायला यायचे... पोकळ सांत्वन करुन निघुन जायचे... 


दिवसा भरलेलं घर... रात्री रिकामं व्हायचं आणि मागे उरायचे तीन जीव...अंधारात तळमळणारे.!


ताजमहालाचंही असंच ...! 


दिवसा बघायला,कौतुक करायला आख्खी दुनिया लुटते... पण रात्रीच्या अंधारात सोबतीला कुणी थांबत नाही इथं ... ! नदीच्या काठावर थंडीनं कुडकुडत,आयुष्याच्या अंधारात तोही तळमळत असतो एकटा ... जीवाची लाही लाही होत असते एकटेपणामुळे...! त्याची घुसमट होत असते... घुमटाच्या आत... आणि लोक याच घुमटाकडं पाहुन म्हणतात... वाह ताज !!!


सौंदर्यालाही शाप असतो हेच खरं....! 


बाबांच्याही सुंदर आयुष्याला असंच गालबोट लागलं होतं.बाबांच्या डोळ्यापुढं होतं... पोराचं आयुष्य...त्याचं शिक्षण,आणि शिकवण्याचं त्याला दिलेलं वचन !


नविन झालेली जखम,जुन्या जखमांच्या वेदना कमी करते,हेच खरं !


पत्नीचं दुःख्खं पाहुन ते स्वतःचं दुःख्खं विसरले...! 

पुन्हा काम करायचं ठरवलं त्यांनी...


घरातल्या पाटाला चाकं जोडली आणि त्यावर बसुन हातानं ढकलत ते इकडुन तिकडे फिरायला शिकले. 


लोक पायात मोजे घालुन त्यावर बुट घालतात... बाबा हातात बुट घालतात... ! 


पाटावर बसुन रस्त्यांवर हात घासत जातांना हाताला इजा होवु नये म्हणुन...


पायाचं काम,आता हात करायला लागले... ! 


परिस्थितीनुसार,जो स्वतःला बदलतो तोच टिकतो या जगात ! 


जग सुंदरच आहे... हातांनीही कधीतरी पायाशी येण्याचं मोठेपण दाखवलं तरच... ! 


पाटावर बसुन,दारोदारी जावुन काम शोधणं सुरु झालं...! 


दारावर आलेला हा भिकारीच आहे असं समजुन,लोक पाच दहा पैसे अंगावर फेकत... काम नाही !


पाचदहा पैशांत लोकांना पुण्य विकत हवं असतं... !


मेलेल्या माणसाला खांदा देवुन पुण्य मिळवण्यापेक्षा,

जमिनीवर पडलेल्याला हात देवुन उठवण्याने पुण्य जास्त मिळतं... ! 


हात द्यायचा कि खांदा ... ज्याने त्याने ठरवावं...! 


आता,सकाळी काम शोधायला निघायचं आणि संध्याकाळी परत यायचं, हे रोजचंच झालं...! 


एके दिवशी भकास आयुष्यं घेवुन,रस्त्यावर ते विचार करत बसले असतांनाच, भिकारी समजुन दोन-चार जणांनी पुढ्यात अजुन पैसे फेकले... !


बाबांचं मन आता पालटायला लागलं... लोक काम नाही,पण भीक मात्र सहज देतात... !


त्यांना पुण्य साठवायचं असतं आणि आपल्याला भाकरी !


काळानुसार गरजा बदलतात हेच खरं...!


त्या दिवसापासुन रोज चुल पेटायला लागली... ! 


चुलीत लाकडं ढणाढणा जळायची... आणि सोबत बाबांचं मनही आणि मानही ! 


आता मन मेलं आणि याचदिवशी आणखी एका भिक्षेक-याचा जन्म झाला... !


बाबा रोज याच जागेवर येवुन बसु लागले... मिळणाऱ्या भिकेत घर आणि पोराचं शिक्षण सुरु ठेवलं... !


स्वतःचा आत्मसन्मान बाजुला सारुन ! 


हे असं एक दोन नाही तर तब्बल 11 वर्षे चाललं... ! 


माझी,यांची भेट ९ जुन २०१९ ची ! 


औषधं देता देता यांच्याशी सुर जुळले... आणि न जमलेलं गाणं ते माझ्यापाशी गात राहिले... मी ऐकत गेलो ... !


या गाण्याला ना कसला सुर,ना कसला ताल, ना कसली लय... ! तरीही कुठं तरी खोलवर रुतुन बसणारं... हे गाणं मुक्तछंदातलं...!  


'एक सर्वसामान्य आयुष्य जगणारा माणुस आज परिस्थितीपायी भिक मागतो... बाबा खुप वाईट वाटतं मला.' मी बोलुन गेलो. 


'नाही डाॕक्टर,मी विसरलोय जुनं सारं आता. अहो विस्मरण हा आजार आहे म्हणतात.


पण खरं सांगु ? विस्मरण हे आपल्याला मिळालेलं एक वरदान आहे.एखाद्या गोष्टीचं सारखं स्मरण होणं हा खरा आजार ! अहो विस्मरण झालं नसतं तर माणुस जगुच शकला नसता.आपण पडलो होतो, हे जर विसरलोच नाही तर उठुन उभं रहायची आठवण कशी येणार ?' ते हसत बोलले होते. 


डोळ्यांची जागा रिकामी आहे यांच्या... 


पण या पोकळ जागेत मला सारं विश्व दिसलं या वाक्यानं...! 


'एकाही नातेवाईकाने मदत केली नाही तुम्हाला बाबा ?' मी शेजारी बसत विचारलं होतं. 


माझ्या आवाजाचा अंदाज घेत माझ्याकडे पहात ते खोल आवाजात बोलले,'आपल्याकडे पैसा - पद - प्रतिष्ठा जर असेल तरच नाती आपल्याला जवळ घेतात. 


पैसा - पद - प्रतिष्ठा यांपैकी मात्र आपल्याजवळ काहीच नसेल तर ना-ती तुमची,ना-ती माझी !' 


'ना-ती तुमची,ना-ती माझी !' खरंय बाबा,मी आवंढा गिळला. 


अहो डाॕक्टर,पैसा पद प्रतिष्ठा असेल तर नुसतं जवळ जाताच सारी बंद दारं आपोआप उघडतात... मात्र एकदा का हे तुमच्याकडनं गेलं की उघड्या दारावर टकटक केली तरी आतुन कुणी आपल्याकडे ढुंकुन पहात नाही... पाहिलंच तर पाहणाऱ्याच्या नजरेत भाव असतो... ऐ,चल हो पुढं ! 


या अर्थानं आपणही सारे भिकारीच !' हातात घातलेला बुट नीट करत ते बोलले.रस्त्यावरच्या शाळेत तयार झालेलं बाबांचं तत्वज्ञान ऐकुन मी थरारलो...!


'तसे आले होते काही लोक मदत करायला... किमान तसं त्यांना दाखवायचं होतं.ते किनाऱ्या किनाऱ्याने फिरत होते... पण ते येईपर्यंत आम्ही केव्हाच बुडुन गेलो होतो...सापडणार कसे ?' ते पुन्हा हसले,त्यांच्या त्या केविलवाणं हसण्यानं, रडण्यालाही लाज वाटावी...


'बुडण्याचं दुःख्खं नसतं डाॕक्टर,आपल्याला पोहता येत नाही याचंही दुःख्खं नसतं... पाण्यात ढकलणारा जेव्हा आपलाच असतो ते खरं दुःख्खं !' 


डोळे नसलेल्या जागेतुन आता अश्रुंची धार लागली होती...ऊगम सापडत नसलेला,तरीही समोरुन वहात असलेला झरा असाच असावा का ?


असे कितिक झरे वाहतात आणि नंतर आटुन जातात...! 


'बाबा, तुमच्या पत्नीने खुप साथ दिली तुम्हाला... तुम्ही दोघं एकमेकांबरोबर होतात म्हणुन निभावलं.' मी त्यांचा हात हाती धरुन म्हणालो. 


'हो, खरंय ते...! पण डाॕक्टर तुमच्या गणिताच्या पुस्तकात असतात तशी गणितं आयुष्यात घडत नाहीत.'


'दोन मधुन एक वजा झाला तर प्रत्येकवेळी एक उरतोच असं नाही.पाय गेल्यावर आमच्या दोघांतुन मी वजा झालो तेव्हा ती शुन्य झाली होती... आमच्या आयुष्याच्या गणितात दोन वजा एक बरोबर शुन्य झालं होतं...!' 


खरंच पुस्तकातलं ज्ञान काहीवेळा पुस्तकातल्या पानांतच मिटुन राहतं... पिंपळाच्या जपलेल्या पानासारखं! 


कालांतरानं त्याची नक्षीदार जाळी होते... दिसायला दिसते छान... याच जाळीला आपण फ्रेम करुन भिंतीवर लावतो पदवी म्हणुन... !


पुस्तकातल्या ज्ञानानं पदवी मिळते ... पण, माणुस म्हणुन पद मिळवायचं असेल तर पुस्तकाबाहेरच यावं लागतं !


पदवीच्या या जाळ्यात मग आपणच अडकत जातो... खुप काही मिळवता - मिळवता,... बरंच काही हरवुन येतो...! 


 'बाबा, मी काय मदत करु तुम्हाला ? ' बाबांच्या पाटाला हात  लावुन मी विचारलं. 


'काय मदत करणार आता डाॕक्टर ? राहुद्या चाललंय तेच बरं आहे.' ते शुन्यात बघत म्हणाले असावेत.त्यांच्यापुढं सारंच शुन्य होतं. 


'बाबा, मुलाचं शिक्षण करु,ट्रस्टच्या माध्यमांतुन...' मी चाचरत बोललो. 


ते तिसरीकडे पहात हसत म्हणाले... 'बघा प्रयत्न करुन,तो तयार होईल की नाही माहित नाही... !' 


'म्हणजे ?' 


'डाॕक्टर,तुम्ही घरी या,त्याच्याशीच बोला...' बाबांनी हसत पुन्हा हातातला बुट सावरला. 


यानंतर पत्ता घेवुन एकेदिवशी मी त्यांच्या घरी  पोचलो.


वाळुत मणी शोधावा तसं मी त्या झोपडपट्टीतुन बाबांचं घर शोधलं...! 


बोळाबोळांतुन वाट काढत मी घरात आलो... ! 


६x६ फुटांचं हे घर ! 


ते काॕटवर बसलेले बाबा दिसतात का ?

अं ... हो हेच ते ... ! 


पत्र्याच्या या घरांत लख्ख उजेड ! घर अतिशय स्वच्छ आणि लखलखीत ! 


एका कोपऱ्यात लोखंडी काॕट,त्यावर अनेक ठिकाणी शिवलेली पण स्वच्छ चादर... काॕटखाली नीट रचुन ठेवलेली अंथरुणं आणि शिस्तीत मांडलेली भांडीकुंडी.


दुस-या कोपऱ्यात देव्हारा...! त्यात लावलेली अगरबत्ती मंद जळत सुवास देत होती... 


एका ठिकाणी बाबांचा मुलगा,जमिनीवर पोतं टाकुन,त्यावर पुस्तकं मांडुन अभ्यास करत होता... 


उरलेल्या ठिकाणी स्वयंपाक सुरु होता... ! बाजुला बसल्येय ती बाबांची पत्नी ! 


पातेल्यात भात घातला असावा.शिजत असलेल्या भाताला इतका सुंदर सुवास येतो... मला आजच कळलं... !


पत्र्याच्या या घरात खुप प्रसन्न वाटत होतं ! 


अगरबत्ती आणि भाताचा वास एकमेकांत मिसळुन अजब मिश्रण तयार झालं होतं... ! 


भुक आणि भक्ती या पत्र्याच्या घरात आज एक झाली असावी का ?


भिंतीवर टांगलेला एक स्वच्छ आरसा,त्यालाच अडकवलेला एक कंगवा... ! 


मी सहज आरशात पाहिलं... मला  माझ्यासह ते तिघेही आरशात दिसले... 


भिंतीवरच्या त्या आरशाने चौघांनाही एकत्र चौकटीत घेत "कोन" साधला होता... 


आणि याबरोबरच "मी कोण" हा प्रश्नही आता माझ्यापुरता सुटला होता... ! 


मी मुलाला विचारलं, 'काय करतोहेस सध्या...?' 


सर सुक्ष्मजीवशास्त्र या विषयामध्ये ग्रॕज्युएशन करतोय मी...! 


मी उडालोच.... ! 


भीक मागत बाबांनी पोराला सुक्ष्मजीवशास्त्र सारख्या किचकट विषयाच्या डिग्रीपर्यंत ओढत आणला ? 


आश्चर्यानं मी बाबांकडे पाहिलं.या बाबांच्या पाया पडावं !  


'Greattt यार,मला तुझा अभिमान आहे...' मी त्याच्याजवळ जात म्हणालो.


'तुला माहित आहे,बाबांची अवस्था सध्या बिकट आहे,माझी संस्था आहे,लोकांच्या आश्रयावर ती चालते,या माध्यमांतुन तुला आम्ही शिक्षणासाठी मदत करु शकतो... !' मी थोडक्यात त्याला सर्व सांगितलं. 


'सर, तुम्ही भिका-यांनी भीक मागु नये म्हणुन प्रयत्न करता ना ?' चेह-यावरची रेषाही न हलवता तो  म्हणाला.


'हो...' मी बोलुन गेलो. 


'मग ? मलाही तुम्हाला भिकारीच बनवायचं आहे का ?' तो शांतपणे  पुस्तकं आवरत म्हणाला. 


'म्हणजे ... ?' मी घाम पुसत आश्चर्यानं बोललो.


'सर,पप्पांनी आजपर्यंतचं माझं शिक्षण भिकेवरच केलं... माझ्यापायी त्यांना भीक मागावी लागली,याची बोच मला आयुष्यंभर टोचणार आहेच.' तो मान वळवत म्हणाला. 


'खरंय ते,त्यावेळी इलाज नव्हता मित्रा, परिस्थितीनुसार जे वाट्याला आलं ते त्यांनी केलं,आज आपण ही परिस्थिती बदलु शकतो.' मी समजावलं. 


'तुम्ही एका माणसाची भीक थांबवुन आता त्याच्या पोराला भीक घालुन,आणखी एक भिकारी तयार करताय असं नाही वाटत सर तुम्हाला ?' त्याने माझ्यावर नजर रोखत विचारलं. 


मी अचंबीत झालो ! 


मला या शब्दांचा राग आला आणि वाईटही वाटलं... 


म्हटलं, ' तुला काय म्हणायचंय नेमकं बोल मित्रा... मी तुला मदत करायला आलोय... भीक द्यायला नाही.भिक आणि मदत यात फरक आहे.पण,ठिक आहे,तुझी स्वतःचीच इच्छा नसेल तर माझी बळजबरी नाही.' निघण्याच्या तयारीनं नाराज होवुन मी जायला उठलो. 


'सर...' पाठीमागनं आवाज आला त्याचा,मी वळुन पाहिलं. 


 'मी सुद्धा तेच म्हणतोय,भीक नको,मदत करा मला...! पुढचं वाक्य त्यानं पुर्ण केलं.


' वेडा आहेस का रे तु ? इतकावेळ मी काय बोलतोय मग मघापासुन ?' वैतागुन मी बोललो. 


यावर त्याने हात जोडले आणि म्हणाला, ' सर पार्ट टाईम जाॕब बघा मला,मी शिकत शिकत काम करेन... काम करत करत शिकेन... मिळणाऱ्या पैशांत मी माझं शिक्षण करुन, कुणीतरी होवुन आईबापाला सुखात ठेवेन !' 


'आज तुम्ही मला शिक्षणाला मदत केलीत तर उद्याही तुम्ही आणखीही अशीच काहीतरी मदत करावी असं मला वाटेल,तुम्ही ती  करालही ! पण,याची मला सवय लागेल... आणि मी कायम तुमच्यावरच अवलंबुन राहीन, स्वावलंबी व्हायला मला वावच मिळणार नाही...

शिक्षणाची मला भीक नको,नोकरीची मदत करा...' आता त्याच्या डोळ्यात पाणी होतं.


मी भारावुन गेलो... बाणेदारपणा आणि स्वाभिमान हे शब्द पुस्तकांतले... आज प्रत्यक्षच मी अनुभवत होतो... ! 


भीक म्हणजे दुस-याला आपल्यावर

अवलंबुन ठेवणं.! मदत म्हणजे दुस-याला 

स्वावलंबी बनवणं ...!


अवलंबुन नका ठेवु त्यांना आपल्यावर, स्वावलंबी बनवा ! 


घसा फाटेपर्यंत रोज मी हेच बोलत असतो. 

हे पोरगं आज माझीच वाक्यं बोलतंय... ! 


माझ्या डोळ्यांतुन पाणी वहायला लागलं... उठुन त्याला मिठी मारत म्हणालो, 'आज मला तुझ्या तोंडुन ही वाक्यं ऐकुन एक लढाई जिंकल्याचा भास होतोय...!'


बोलता बोलता मी बाबांकडे पाहिलं... 


त्यांना दिसत काहीच नव्हतं,पण आजुबाजुला चाललंय ते सर्व कळत होतं.त्यांच्या चेह-यावर अतिव समाधान होतं आणि चेह-यावरुन वहात होता उगम नसलेला झरा ! 


म्हणाले, 'डाॕक्टर, मनात असुनही आम्हाला स्वाभिमान जपता नाही आला...परिस्थितीनं भिकारी म्हणुन जगायला लावलं... आयुष्यात पोराला बाकी काही देता आलं नाही...पण स्वाभिमान मात्र भरभरुन दिलाय त्याला ... मी भिकारी म्हणुन जगलो... पण त्याने तसं जगु नये,हिच शिकवण  दिली आयुष्यंभर ...! 


चला या निमित्तानं त्याची परिक्षा झाली,तो पास झाला आयुष्याच्या या परिक्षेत !' असं म्हणत ओंजळीत चेहरा लपवुन ते ढसाढसा रडायला लागले... ! 

काय बोलावं ? 

सर्व शब्द आणि भावना थिट्या पडतात.

अशा माणसांपुढे ! 


यानंतर बाबा व त्यांच्या पत्नीसाठी मी सुद्धा नोकरी शोधली पण मिळाली नाही...


म्हणुन घरबसल्या औषधांची पाकिटं करणे वैगेरे अशी माझ्याचकडे यांना कामं देवुन संस्थेला मिळणाऱ्या डोनेशन मधुन या दोघांना पगार चालु केला आहे. 


बाबा आता भिक मागत नाहीत, कुणी विचारलं तर अभिमानानं ते सांगतात, मी आणि माझी बायको सोहम ट्रस्टमध्ये काम करतो. 


मुलाच्या म्हणण्यानुसार त्याला पार्ट टाईम जाॕब शोधुन दिलाय,तो स्वतः कमवत शिकतो,घरही चालवतो... पुर्ण स्वावलंबी होवुन ! 


पाच पैशांचीही मदत घेण्याचं त्यानं नाकारलं आहे... ! 


सुक्ष्म जीवशास्त्रातली मास्टर डिग्री पुर्ण करुन या विषयांत त्याला नविन संशोधन करायचं आहे...सायंटिस्ट होणं हे त्याचं स्वप्नं आहे ! 


त्या दिवशी त्यांच्या घरातुन बाहेर पडतांना, एकानं विचारलं,डाॕक्टर इकडं या झोपडपट्टीत काय करत होता ? अच्छा,तुमच्या त्या पांगळ्या भिका-याच्या घरी गेला होता काय ?


पांगळा कोण ? जगातला सर्वात सशक्त बाप आहे तो... ! सर्व असुनही कारणं देणारे आपण  पांगळे असतो ! 


मी परत वळुन त्या पत्र्याच्या शेडकडे पाहिलं... 


शेड कसलं ते ?


एका श्रीमंत बापाचा महाल होता तो... ! 

एका भावी सायंटिस्ट ची प्रयोगशाळा होती ती ! 

इथंच तो घडतो आहे !!! 


आज या ठिकाणी मी आलो... भविष्यात जगातली लोकं येतील...एव्हढा मोठा सायंटिस्ट आधी कुठं रहात होता ते पहायला... ! 


आजचं हे शेड... उद्याचं स्मारक आहे... ! 

हे स्मारक आहे एका बापाच्या जिद्दीचं ! 

हे स्मारक आहे एका पोराच्या स्वाभिमानाचं ! 

हे स्मारक आहे एका भिक्षेक-यांनं सोडलेल्या भिकेचं ! मी मनोमन नतमस्तक आहे या स्मारकापुढं !


९  जुन २०२०


डाॕ.अभिजीत सोनवणे,भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर


तळटिप - एकदा साहेबांना मी फोन लावला होता.हे माझे प्रेमळ मित्र आहेत.त्यावेळेस त्यांच्याशी बोलत असताना.चकवा चांदण या पुस्तकातील एक प्रसंग सांगितला जो पुढीलप्रमाणे होता.


" इफ यू आर लुकिंग फॉर 

अ मेमोरियल,लुक अराउंड " 

" स्मारक शोधत असाल तर आजूबाजूला बघा." 


हुगो वुड या वनाधिकाऱ्याच्या समाधीवरील एका शिळेवरील स्पष्ट दिसत नसणारी अक्षरे.. यावेळी उत्तर देताना त्यांनी सांगितलेले तत्वज्ञान..


'स्मारक शोधू नका.... असं काहीतरी करा.... स्वतःचा स्मारक बनेल'- डॉ.अभिजीत सोनवणे.

२७/१०/२३

जागरूक मातृत्व आणि पितृत्व.. Conscious motherhood and fatherhood..

साधारणपणे मी माझ्या व्याख्यानांचा समारोप असा करतो :आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण स्वतः जबाबदार असतो. आता असं बोलल्यावर लोकांना त्यांच्यावर येत असलेली जबाबदारी पेलवत नाही आणि त्यामुळे त्यांना मी फारसा आवडतही नसेन.आपल्या आयुष्यासाठी आपणच जबाबदार या विचारानं त्यांच्या मनावर ओझंच येतं.माझ्या एका व्याख्यानाच्या अशा समारोपानंतर एक महिला इतकी अस्वस्थ झाली की,

आपल्या पतीला घेऊन ती मला स्टेजमागे भेटायला आली.तिनं माझ्या समारोपाच्या वाक्याचा अश्रूंच्या लोंढ्यासह विरोध एक केला. "माझ्या आयुष्यातल्या काही शोकाकुल करणाऱ्या घटना मला अजिबात नको होत्या आणि तुम्ही असं कसं म्हणू शकता की त्यासाठी मी स्वतःच जबाबदार आहे?" हा प्रश्न तिनं मला विचारला. "तुमचं हे वाक्य तुम्ही बदलायला हवं " ती मला आग्रह करू लागली.मलाही हे जाणवलं की, इतरांच्या मनात अपराधी भावना निर्माण व्हावी, हा काही माझा हेतू नाही.

माझ्या त्या वाक्यानं लोकांच्या मनात अपराधी भावना निर्माण होत आहे.सामान्यतः आपण आपल्या समस्यांसाठी दुसऱ्या कोणावर तरी ठपका ठेवण्यात फार तत्पर असतो.आपल्या आयुष्यातल्या सगळ्या वाईट घटना दुसऱ्या कोणाच्या तरी वागण्यामुळे निर्माण होत आहेत,असं समजण्याची आपली वृत्ती असते,तिलाच माझ्या त्या समारोपाच्या वाक्यानं धक्का बसत होता.मग मी विचार केला, त्या महिलेशी चर्चा केली,समारोपाचं वाक्य असं बदललं की,मग ती महिला संतुष्ट झाली. ते वाक्य मी असं केलं : 


तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही स्वतः जबाबदार असता;पण केव्हापासून? तर तुम्हाला जेव्हा समजतं की,तुम्हीच तुमच्या आयुष्यातल्या गोष्टींना जबाबदार आहात,तेव्हापासून तुम्हाला जेव्हा ते माहीतच नव्हतं,तेव्हाच्या काळातल्या गोष्टींसाठी तुम्ही स्वतःला अपराधी समजू नका. 


जागरूक पालक असणं म्हणजे काय,हे माहीत नसताना तुम्ही पालकत्व पार पाडलं असेल आणि त्यात काही चुका झाल्या असतील, तर त्याबद्दल तुम्हाला दोष देता येणार नाही; पण जागरूक पालकत्व म्हणजे काय,हे समजल्या

नंतरही तुम्ही तुमच्या मुलांना वाढवताना चुका केल्या तर मात्र तुम्ही अपराधी ठराल.एकदा का तुम्हाला हे सत्य समजलं की, मग तुम्ही तुमच्या वर्तणुकीत योग्य ते बदल करालच...


आता आपण पालकत्वाविषयी बोलतोच आहोत, तर हेही लक्षात घ्या की,तुम्ही तुमच्या सगळ्या मुलांसाठी समान पालक नसता.प्रत्येक मुलाच्या बालपणाच्या वेळी तुम्ही स्वतः वेगवेगळ्या परिस्थितीतून जात असता,ज्याचा आपोआपच तुमच्या वागण्यावर परिणाम होत असतो. शिवाय,तुम्ही सगळी मुलंही एकसारख्या स्वभावाची नसतातच.त्यांच्या स्वभावात जमीन अस्मानाचा फरक असू शकतो.मी आधी असं समजत होतो,की माझ्या वेगवेगळ्या स्वभावाच्या दोन अपत्यांबाबतीत मी समान वागलो होतो; परंतु जेव्हा नीट विश्लेषण करून पाहिलं,

तेव्हा मला कळलं,की असं नव्हतं.माझं पहिलं अपत्य जन्माला आले,तेव्हा माझ्या करिअरची सुरुवात होत होती.अति काम आणि त्यासोबतच काम टिकण्याबाबतची खात्री नसणं,यामुळे मी जरा तणावातच असे;पण दुसऱ्या अपत्याच्या जन्माच्या वेळी मी स्थिरावलो होतो,संशोधक म्हणून ख्याती मिळाली होती,

मला आत्मविश्वास आला होता.यावेळी मी माझ्या अपत्यांबरोबर जास्त वेळ घालवू शकत होतो.


पालकांच्या अजून एका घट्ट समजुतीबद्दल मी त्यांना काही सांगू इच्छितो.ही समजूत म्हणजे मुलांची हुशारी किंवा चलाखी वाढवण्यासाठी त्यांना बाजारात उपलब्ध असलेले असंख्य शैक्षणिक खेळ गरजेचे असतात.नाही, पालकांनो,असं मुळीच नाही.तुम्ही त्यांच्याबरोबर घालवत असलेला वेळ,त्यांच्याशी बोलणं, खेळणं यामुळे त्यांची हुशारी वाढते,बाजारी शैक्षणिक खेळांमुळे नव्हे.(मेंडिस आणि पीर्स २००१.) पालकांनी मुलांना वेळ दिला, त्यांच्यासोबत ते राहिले,त्यांचे कुतूहल शमवणारे खेळ पालकच मुलांबरोबर खेळले,त्यांच्या निर्मितीक्षमतेला वाव मिळेल,अंस त्यांना वागू दिलं तर हे सगळं मुलांच्या विकासाला फार फार उपयोगी पडतं,त्यांच्या आयुष्यात हेच कामाला येतं.


अर्थातच मानवाला त्याच्या बालपणात काय हवं असतं,तर प्रेमानं केलेलं पालनपोषण आणि भरपूर लोकांचा सहवास,ज्यातून ते बालक चालणं,बोलणं,रीतिरिवाज शिकतं. अनाथालयातल्या बालकांना केवळ पाळण्यात ठेवून वेळच्यावेळी अन्न,पाणी,औषधं इतकंच दिलं जातं,ते काम करणाऱ्या व्यक्तीच्या मनात त्या सगळ्यांबद्दल खूप प्रेम असेल असं नसतंच. त्या अश्राप बालकांना कधी प्रेमळ हास्य,घट्ट मिठ्ठी किंवा गालावरचा पापा मिळत नाही, त्यांच्या विकासात अतिशय गंभीर समस्या येतात.


रोमानियातल्या अशा एका अनाथालयातल्या मुलांचा अभ्यास मेरी कार्लसन यांनी केला.त्या हार्वर्ड वैद्यकीय महाविद्यालयातल्या मज्जाजैवशास्त्रज्ञ आहेत. प्रेमाचा स्पर्शही न होता,केवळ अन्नपाणी वेळच्या वेळी देऊन वाढवलेल्या त्या मुलांची वाढ योग्य तऱ्हेनं न होता खुंटली आणि त्यांचं वागणं सामान्य मुलांसारखं न राहता विचित्र झालं,असं त्यांना या अभ्यासातून दिसून आलं.


कार्लसन यांनी या अनाथालयातल्या काही महिने ते तीन वर्ष,या वयोगटातल्या साठ मुलांचा अभ्यास केला.या मुलांच्या लाळेतून त्यांनी त्यांच्या रक्तातलं कॉर्टिसोलचं प्रमाण तपासलं. ज्या मुलांच्या रक्तात कॉर्टिसोलची पातळी जास्त होती,त्यांच्या वाढीवर जास्त विपरीत परिणाम झाला, असं त्यांना दिसून आलं. (होल्डन१९९६.)



कार्लसन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माकडं आणि उंदीर यांच्यावरही याबाबतीत संशोधन केलं आहे.पिलांना होणारा आईचा स्पर्श आणि रक्तातलं कॉर्टिसोल यांचा त्यांच्या विकासावर काय परिणाम होतो,याचा अभ्यास त्यांनी केला. त्यात त्यांना असं दिसून आलं की,आईच्या स्पर्शाचा पिलांवर अतिशय चांगला परिणाम होतो,

अमेरिकेच्या मानवी आरोग्य आणि बालविकास विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे माजी निर्देशक

जेम्स प्रिस्कॉट यांनीही याबाबत संशोधन केलं आहे.माकडांच्या ज्या नवजात पिलांना आईचा स्पर्श मिळत नाही,ती त्यांच्या पुढच्या आयुष्यात हिंसकपणे वागतात, असं प्रिस्कॉट यांना दिसून आलं.(प्रिस्कॉट १९९६ आणि १९४०.) प्रिस्कॉट यांनी असाच अभ्यास मानवजातीसाठीही केला.यात त्यांनी विविध संस्कृतींच्या समाजांच्या तुलनात्मक नोंदी केल्या. त्यात त्यांना असं आढळून आलं,की ज्या समाजात मुलांना प्रेमानं वागवलं जातं, आई-वडिलांचा सहवास आणि वागणुकीची मोकळीक मिळते,योग्य वयात योग्य तऱ्हेनं लैंगिक शिक्षणही दिलं जातं,तो समाज शांत जीवन जगतो.

शांततेनं जीवन जगणाऱ्या समाजांमध्ये त्यांना एक गोष्ट विशेषत्वानं लक्षात आली.ती म्हणजे,या समाजात बालकांना त्यांच्या आई-वडिलांचा नुसता सहवासच मिळतो असं नाही,तर त्यांना आई-वडिलांची शारीरिक जवळीकही खूप जास्त प्रमाणात मिळते.हे पालक दिवसेंदिवस आपल्या तान्ह्यांना आपल्या कडेवर किंवा पाठीवर वागवतच आपापली कामं करतात,असं प्रिस्कॉट यांना आढळून आलं. याउलट,ज्या समाजांमध्ये तान्ह्यांना,

बालकांना आणि किशोरांना मायेच्या स्पर्शापासून दूर ठेवण्याचीच प्रथा आहे,त्या समाजातली बालकं पुढच्या आयुष्यात रुक्ष,कठोर स्वभावाची आणि सहजपणे हिंसक होणारी असतात,असं दिसून आलं आहे.


अशा समाजातल्या मुलांना,ज्यांना मायेचा स्पर्श मिळालेला नसतो त्यांना ज्ञानेंद्रियांबाबतची अजून एक समस्या भेडसावते. शरीरानं जाणून घेण्यासारख्या संवेदना,उदा.दाब,वेदना, इतर

ओळखण्याची शक्ती त्यांच्यात कमी झालेली दिसते.

या समस्येसोबतच एक लक्षण चिकटूनच येतं,ते म्हणजे त्यांचं शरीर तणावाच्या संप्रेरकांची उसळणारी पातळी खाली आणू शकत नाही.ही स्थिती म्हणजेच हिंसक वागणुकीची पूर्वस्थिती असते.


अमेरिकन समाजात दिसून येणाऱ्या मोठ्या हिंसाचार मागची कारण आपल्याला या संशोधनावरून समजून येतील.आपली सध्याची वैद्यकीय आणि सामाजिक स्थिती अशी आहे की ज्यात मुलांना फार जवळ घेणं,रात्रभर कुशीत झोपवणं,कडेवर घेऊन फिरणं हे फारसं शिष्टसंमत समजले जात नाही.इथेच नेमक चुकते.याहूनही भयंकर म्हणजे आपले डॉक्टर्स पालकांना अशी सूचना देतात की,बाळाला स्वतंत्र करा,सारखं सारखं त्याच्या रडण्याकडे लक्ष पुरवत बसू नका,त्याच त्याला झोपू दे,तुम्ही थोपटून झोपवू नका... आधुनिक वैद्यकशास्त्राचं नैसर्गिक प्रक्रियेवर हे सरळसरळ भयंकर अतिक्रमण आहे.

बालकांना पालकांची माया मिळणं,हा त्यांचा नैसर्गिक हक्क आहे,तो हक्कच या अशा विकृत समजुतीमुळे हिरावून घेतला जात आहे.या समजुती विज्ञानावर आधारित आहेत हा समज आहे आणि नैसर्गिक पद्धतीपासून दूर जाऊन या वेडगळ आणि क्रूर पद्धतीनं मुलांना वाढवलं जात असल्यामुळेच अमेरिकन समाजात हिंसाचार थैमान घालत आहे.www.violence.de.

या वेबसाईटवर,स्पर्श आणि हिंसाचाराचं नातं सांगणारं पूर्ण संशोधन उपलब्ध आहे.


मग,अभावग्रस्त पार्श्वभूमीवर वाढलेल्या रोमानियन मुलांचं काय?चांगली पार्श्वभूमी नसूनही त्यातली काही मुलं चांगली कशी वागत.त्यांची 'जनुक' चांगल होती म्हणून? तुम्हाला आतापर्यंत समजलंच आहे,की मी जनुकांवर इतका विश्वास ठेवत नाही.शक्यता अशी आहे, की ही बालकं गर्भावस्थेत असताना त्यांच्या आई-वडिलांनी नीट काळजी घेतली असेल आणि मग अनाथालयातलं पोषण मिळून एकूणात ही मुलं चांगल्या वागणुकीची झाली असतील.


मुलं दत्तक घेणाऱ्यांनीही यातून धडा घेण्यासारखा आहे.ही मुलं त्यांनी दत्तक घेतली, तेव्हापासूनच त्यांचा जन्म सुरू झाला,असा विचार या पालकांनी करू नये.ती मुलं आधीच त्यांच्या नैसर्गिक आई-वडिलांच्या वागण्यानुसार घडलेली असण्याची शक्यता दत्तक पालकांनी नेहमी लक्षात ठेवावी.ते त्या आई-वडिलांना नको असण्याची भावना त्या बालकानं सहन केली असणार.त्यातल्या काही सुदैवी मुलांना घडणीच्या काळात प्रेमळ काळजीवाहक मिळाले असण्याची शक्यता असू शकते.दत्तक मूल घेणाऱ्या पालकांना जर गर्भावस्थेतही बालकाची घडण होते,याची कल्पना नसेल तर त्यांच्या आणि दत्तक मुलांच्या एकत्र आयुष्यात समस्या उद्भवू शकतात.हे मूल मनाची पाटी कोरी घेऊन त्यांच्या आयुष्यात आलेलं नाही,हे त्यांना समजून घ्यावं लागेल. 'द बायोलॉजी ऑफ बिलीफ,अनु.शुभांगी रानडे -बिंदू,साकेत प्रकाशन'


 (तसं तर कुठलंच मूल जन्माला येताना मनाची पाटी कोरी ठेवून येतच नाही, गर्भावस्थेत असताना ते काही गोष्टी ग्रहण करून मगच जन्माला आलेलं असतं.) 


दत्तक पालकांनी हे सत्य एकदा समजून घेतलं, की मग त्यांचं मुलांसह आयुष्य सोपं होईल, प्रसंगी मुलांच्या काही समजुती बदलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत,हे त्यांना कळेल आणि ते त्याप्रमाणे वागू शकतील. 


नैसर्गिक किंवा दत्तक आई-वडिलांनी एक गोष्ट नीटपणे समजून घेतलीच पाहिजे तुमच्या मुलाची जनुक ही त्यांच्या क्षमतेच्या संभाव्य शक्यता फक्त दाखवतात त्यांचं नशीब नाही.त्यांच्या क्षमता पूर्णपणे विकसित होतील, असं वातावरण त्यांना मिळू देणं, हे तुमच्या हातात असतं.


मी हे सगळं सांगतोय,त्याकडे बरेच लोक आकर्षित होतात,बौद्धिकदृष्ट्या त्यांना ते पटतं, माझी पालकत्वावरची पुस्तकं त्यांना वाचायला हवी असतात;

पण माझं असं मत आहे,की केवळ बौद्धिकदृष्ट्या पटणं हे पुरेसं नाही.मी तुम्हाला पालकत्वावरची पुस्तकं वाचायला सांगत नाहीच.मलासुद्धा बुद्धीला हे आधी सगळं माहीत होतंच.नुसतं माहीत असणं किंवा वाचणं पुरेसं नाही.ते सगळं कृतीत आणलं पाहिजे. 


सजग पालकत्व ही फक्त समजून घेण्याचीच नाही,तर सदैव आचरणात आणण्याची गोष्ट आहे,हे लक्षात घ्या. केवळ पुस्तक वाचून आता आपण सजग पालक आहोत हे समजणं म्हणजे,एखाद्या रोगासाठी एक गोळी घेऊन,आता तो रोग बरा होईल,असं समजण्यासारखंच आहे. 


असं आपोआप काही होत नसतं.पोहावं कसं,हे फक्त समजून घेऊन तुम्ही बुडताना वाचू शकाल का? नाही ना? त्यासाठी तुम्हाला पाण्यात हातपाय मारून तरंगण्याची कृती करावीच लागेल.तसंच आहे जागरूक पालकत्व.

तुम्हाला ते प्रत्यक्ष आचरणात आणावं लागेल.


मी तुम्हाला आव्हान देतो.घ्या हा जागरूक पालकत्वाचा वसा.तुमच्या मुलांची कोवळी सुप्त मनं अनावश्यक भीती आणि बंधनांपासून मुक्त ठेवा.त्यांना माया,प्रेम,विश्वास द्या.सर्वांत महत्त्वाचं म्हणजे,जनुकांवरच सगळं काही अवलंबून असतं,हा समज उपटून टाका.तुमच्या मुलांच्या गुणांचा जास्तीतजास्त विकास करणं तुमच्या हातात आहे,त्यातूनच तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्यही बदलू शकता.आपल्या मुलांशी मनाने सदैव प्रेमात गुंफलेले राहा,मग बघा आयुष्य किती सुखद असतं.तुम्ही तुमच्या जनुकांना बांधील नाही. तुमचं आणि तुमच्या बालकांचं सुंदर आयुष्य घडवणं तुमच्या हातात आहे.


मी पेशींच्या,संरक्षणाच्या आणि वाढीच्या प्रतिसादाबद्दल तुम्हाला सांगितलं आहे.तेच ज्ञान वापरा आणि आपलं शरीर वाढीच्या प्रतिसादाच्या अवस्थेत जास्तीत जास्त वेळ राहील,याचा प्रयत्न करा.म्हणजेच नेहमी आनंदात राहा,परिस्थिती बदलता आली नाही, तरी स्वतःचा दृष्टिकोन बदलता येतो,तो बदला आणि नेहमी समाधानी राहा. त्यानंतरच तुमचं शरीर तणावरहित,

निरोगी राहील.हेच तत्त्व तुमच्या लहानग्यांसाठीही वापरा.त्यांना माया,विश्वास,सुरक्षिततेची भावना पुरेपूर अनुभवू द्या,मग बघा त्यांची आयुष्यं कशी बहरतील पुढे जाऊन.


एक लक्षात ठेवा.मुलांच्या सुदृढ विकासासाठी मोठी नामवंत शाळा, मोठमोठी महागडी खेळणी,तुमचं प्रचंड उत्पन्न, यातलं काहीही महत्त्वाचं नसतं.मुलांच्या सुदृढ आणि सर्वांगीण विकासासाठी केवळ एक गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे.प्रेम,माया.


निष्प्रेम आयुष्याला काही अर्थ नसतो प्रेम म्हणजेच जीवनाचं जल,ते हृदयानं आणि आत्म्यानं पिऊन घ्या…


ब्रूस एच.लिप्टन ( पिएच.डी.)