इतिहासकारांनी युद्धातील विजयांवर फार भर दिला आहे.परंतु संस्कृतीची गती पाहिली की युद्धातील विजयात वैभव नाही,आणि पराजयात लज्जास्पद असे काही नाही,ही गोष्ट दिसून येईल.संस्कृतीच्या विकासाचा व वाढीचा युद्धातील जयापजायाशी काहीही संबंध नाही.एखाद्या राष्ट्राला मिळविण्यासाठी युद्धातील विजयाचीच आवश्यकता असते असे नाही. स्पार्टाने पेलापोनेशियन युद्धात विजय मिळविला,परंतु त्यामुळे स्पार्टाचे महत्त्व वाढले नाही.त्याची कीर्ती वाढली नाही.स्पार्टन लोक अज्ञात व रानटी राहिले.अथेन्सचा त्या लढाईत पराजय झाला;परंतु मानवी प्रगतीचे निशाण हाती घेऊन अथेन्सच पुढे सरसावले.
विजयाची पूजा करणाऱ्या मानवजातीच्या शिक्षकांना ह्या ऐतिहासिक गोष्टीचा सहज कसा विसर पडला कोणास ठाऊक..! विजयाची स्तोत्रे गाणाऱ्या या लोकांना आठवण करून देण्याची जरुरी आहे की, प्लेटो व ॲरिस्टॉल ह्या ग्रीक इतिहासातील अलौकिक बुद्धीच्या विभूती पराभूत राष्ट्राच्याच नागरिक होत्या.
ख्रि. पू. ४२७ मध्ये प्लेटोचा जन्म झाला. पेरिक्लसच्या मरणानंतर एक वर्षाने तो जन्मला. गटेप्रमाणे प्लेटोलाही ईश्वराने सर्व प्रकारच्या देणग्या दिल्या होत्या.कोणतीही उणीव नव्हती. सुखी आईबाप,सुंदर शरीर,निरोगी निकोप मन, आरोग्य,सारे त्याच्याजवळ होते.प्लेटो या शब्दाचा अर्थ 'रूंद खाद्यांचा'.तो होताच तसा. पेलोपोनेशियन लढाईच्या धुमचक्रीच्या काळात तो लहानाचा मोठा होत होता.त्याला प्रारंभी लष्करी पेशा आवडला,परंतु वयाच्या विसाव्या वर्षी सॉक्रेटिस ची व त्याची गाठ पडली. सॉक्रेटिसचा प्रभाव त्याच्यावर पडला आणि युद्धाचा धंदा सोडून तो ज्ञानोपासनेकडे वळला.
त्या दिवसापासून सॉक्रेटिसच्या मरणापर्यंत तो त्याचा शिष्य होता.सॉक्रेटिसाच्या अवतीभोवती असणाऱ्या तरुण बुद्धि मंतांच्या मेळव्यात तोही शिरला.हे सारे तरुण कधी सॉक्रेटिसबरोबर जात, तर कधी त्याला आपापल्या घरी ते बोलावीत. तिथे मग विचार - भोजनाची मोठी मौज असे. अथेन्समधील मी मी म्हणणारे तत्त्वज्ञ व पंडित तिथे गोळा होत.सॉक्रेटिस त्या सर्वांना कोंडीत नेई.आणि शेवटी आपला मूर्खपणा ते कबूल करीत.त्या चर्चा ऐकणे म्हणजे ज्ञानामृताची मधुर मेजवानी होती.सॉक्रेटिस दिसायला कुरूप होता. परंतु वृत्तीने तो संत होता.शांत स्वभावाचा व सौम्य वृत्तीचा तो होता.थट्टाविनोद त्याला आवडे. कधीकधी संस्फूर्त होऊनच जणू तो बोले.पायात काही न घालणारा हा थोर तत्त्वज्ञानी अथेन्समधील कोणासही वादांत हटवीत असे.धंद्याने तो शिल्पकार,
मूर्तिकार होता;परंतु बहुधा कधीही तो ते काम करीत नसे.तिकडे त्याच्या कुटुंबीयांची उपासमार होत असे.इथे तो सामाजिक न्यायावर प्रवचने देत असे.तो स्वतःला अत्यंत शहाणा समजे; कारण तो म्हणे, "मला समजत नाही,एवढे तरी मला समजते;परंतु इतरांना एवढेही समजत नाही.' - त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्या तत्त्वज्ञान्यांनी जीवनाचे कोडे सोडविण्याचा प्रयत्न केला होता.सॉक्रेटिसाला त्यात गोडी नव्हती.
तो म्हणे,"जग जाणण्याची हिंमत नका धरू.तो अहंकार आहे.तुम्ही स्वतःला समजून घेतले तरी पुष्कळ होईल.
"स्वतःला समजून घ्या." हे त्याच्या तत्त्वज्ञानाचे सार आहे.
सॉक्रेटिस म्हणे, "ज्ञान म्हणजे सद्गुण." लोक दुष्टपणामुळे चुका करतात असे नव्हे;तर ते अडाणी असतात.गुन्हेगार हा मूर्ख तरी असतो किंवा माथेफिरू तरी असतो;परंतु दोन्ही प्रकारच्या गुन्हेगारांना आपण काय करतो, ते कळत नसते.तत्त्वज्ञानाचे मुख्य कर्तव्य ज्ञान कसे मिळवावे, शहाणे कसे व्हावे,हे शिकविणे हे होय. सॉक्रेटिसने लोकांना शहाणे करण्याचे,त्यांना शिकवण्याचे व्रत आमरण चालविले.लोकांस आवडो वा नावडो,तो त्यांना शिकवित राही.तो गंमतीने एकदा म्हणाला,
"मी सुईण आहे. लोकांच्या मनात जे विचार असतात,
त्यांच्या पोटात ज्या गोष्टी असतात त्या नीट सहजपणे बाहेर पडाव्यात यासाठी मी लोकांना मदत करीत असतो."
परंतु दुसऱ्याने आपणास शिकवावे,आपणास सुचवावे,हे आवडत नसते.विचार करणे ही गोष्ट सुखाची नाही.
विचारप्रसूती वेदनांशिवाय नाही. म्हणून पुष्कळ जण विचार करणेच टाळतात. कशाला त्रास,असे ते म्हणतात.
तसेच रस्त्यात किंवा सार्वजनिक जागी आपल्या अज्ञानाचे सर्वांसमोर प्रदर्शन व्हावे,चारचौघांत मूर्खपणाची शोभा व्हावी,ही गोष्ट कोणास रुचणार?ज्यांचा मूर्खपणा तो प्रकट करी ते त्याला विदूषक म्हणत.कधीकधी ते त्याला मारहाणसुद्धा करीत. त्याच्या अंगावर हात टाकीत.परंतु सॉक्रेटिस कधी रागावत नसे.तो स्वतःचा विनोदी स्वभाव गमावून बसत नसे. ( मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनु.सानेगुरुजी )
तो रस्त्यातच माणसांना थांबवी व गोधळून टाकणारे प्रश्न त्यांना विचारी यामुळे पुष्कळ जण त्याचे शत्रू बनले.
विशेषतः राजकारणी लोकांचा मूर्खपणा चव्हाट्यावर आणण्यात त्याला फार आनंद वाटे.ह्या मुत्सद्यांना व राजकारणपटूंना चांगल्या राज्यकारभाराचे काडीइतकेही ज्ञान नाही असे तो सभोवती असणाऱ्या लोकांना दाखवून देई.आणि नंतर त्या मुत्सद्यांना म्हणे, "तुम्हाला काही कळत नाही,तर राज्यकारभार कशाला चालवता? चांभाराने गलबत चालवू पाहण्याप्रमाणे हा अव्यापारेषु व्यापार आहे."
शहरातील तरुणांमध्ये त्याने बौद्धिक जिज्ञासा निर्माण केली.नवीन नवीन - विचार त्यांच्या डोक्यांत त्याने भरले,
आणि तरुण मुले हे नवीन विचार घेऊन घरी येत व आपल्या आईबापांशी त्या बाबतीत चर्चा करीत.आपली पोरे आपणापेक्षा शहाणी होत चालली हे पाहून अडाणी आईबाप चिडत;रागावत.सारे वृद्ध शेवटी सॉक्रेटिसवर रागावले.ते म्हणू लागले, "हा आमच्या मुलांना बिघडवीत आहे."
आणि एके दिवशी बाजारातील प्रमुख ठिकाणी 'सॉक्रेटिसवर अमुक अमुक आरोप आहेत' असे पत्रक लागले.
"सॉक्रेटिसवर असा गुन्हा केल्याचा आरोप आहे की,ज्या देवदेवतांची हे शहर पूजा करते,त्या देवदेवतांची पूजा तो करीत नाही.एवढेच नव्हे; तर आपल्या कल्पनेप्रमाणे नवीनच देवदेवता निर्मित आहे,प्रचारात आणीत आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे तरुणांना तो बिघडवीत आहे.या अपराधास शिक्षा म्हणजे मरण.'
ज्या सरकारी धर्ममार्तंडांनी,धर्मरक्षण करणाऱ्या ज्या सरकारी लोकांनी सॉक्रेटिसवर हा आरोप लादला होता,
त्यांचा सॉक्रेटिसवर वैयक्तिक दात होता;म्हणून त्याच्या रक्तासाठी ते तहानलेले होते.आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एकाचे नाव अॅनिटस असे होते.
सॉक्रेटिसने त्याच्या मुलाला बिघडवले होते.बापाबरोबर धंद्यात शिरू नको असे सॉक्रेटिसाने त्याला सांगितले होते.
अॅनिटस हा कातड्याचा व्यापारी होता.त्याचा मोठा भरभराटलेला धंदा होता.आपल्या कौटुंबिक कारभारात सॉक्रेटिसने ढवळाढवळ करावी,याचा त्याला राग आपल्या कातड्याच्या धंद्यात आपल्या मुलाचे सहकार्य आपणास मिळावे म्हणून सॉक्रेटिसला ठार करण्याचे त्याने ठरविले.
ज्या ज्यूरींसमोर सॉक्रेटिस उभा होता. तिच्यातील लोक निःपक्षपाती व न्यायी निर्णय देतील असे चिन्ह नव्हते.तशा मनःस्थितीत ते ज्यूरर्स नव्हते.नुकतेच एक दीर्घकालीन युद्ध संपले होते.क्रांती,प्रतिक्रांती वगैरे प्रकार होऊन गेले होते.यामुळे अॅथीनियन लोकांचा विवेक, समतोलपणा नष्ट झाला होता.तरीही सॉक्रेटिसने बचवावी नीट तयारी केली असती,तर तो सुटता. परंतु जाणूनबुजून त्याने तसे करण्याचे नाकारले. तो आता जवळजवळ सत्तर वर्षांचा झाला होता.
तो म्हणाला,"सत्तर वर्षे जगलो.पुष्कळ नाही का झाले? पुरे की आता.तो पुन्हा म्हणाला,मनाच्या व बुद्धीच्या सर्व शक्ती शाबूत,अविकृत असताच मरण येणे बरे नाही का? पुढे आणखी म्हातारे होणे व दुसरे बाल्य अनुभवविणे
,इंद्रियांच्या सर्व शक्ती नष्ट झाल्यावर जगणे,यापेक्षा निरोगी मरण बरे."
त्याने जे भाषण केले,त्यात बचावासाठी म्हणून तो बोलला नाही.स्वत:चे प्राण वाचावे म्हणून त्याने भाषण केले नव्हते.त्याने आपले तत्त्वज्ञानच त्या भाषणात पुन्हा नीट मांडले. तो म्हणाला, "मी रडेन,प्राणांची भीक मागेन, तुमच्या पाया पडेन अशी अपेक्षा तुम्ही कदाचित केली असेल.माझ्या मुलाबाळांनी,आप्तेष्टांनी, तुमच्यासमोर येऊन माझ्यासाठी पदर पसरावा, असे कदाचित् तुम्ही अपेक्षित असाल.परंतु मी अशी प्रर्थना करीन तर मी गुन्हा मान्य केला असे नाही का होणार? माझे कर्तव्य एकच आहे; तुम्हांलाही खरे ज्ञान देणे,तुम्हाला शिकविणे, तुमचे मतपरिवर्तन झाले तर बघणे."
ज्ञानसंशोधनासाठी त्याने आयुष्य वेचले. शहाणपणा,सत्य यांसाठी सारे जीवन अर्पिण्याचा त्याच कृतनिश्चय होता.
हेच त्याचे जीवनध्येय होते.तो स्वतः चे व दुसऱ्याचे परीक्षण करी, पृथक्करण करी.खरे काय ते शोधू पाही.
जरी मृत्यूच्या छायेत तो उभा होता,जरी त्याच्यासमोर मरण उभे होते,तरी त्या क्षणीही स्वत:वर आरोप लादणाऱ्यांस तो शिकवू इच्छित होता.त्यांनी आपणावर दया करावी म्हणून तो तिथे बोलू इच्छित नव्हता.
न्यायाधीशांनी त्याला विचारले, "आम्ही तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी असे तुम्हांला वाटते?" सॉक्रेटिस म्हणाला, "मी तुमच्या व या शहराच्या हितासाठीजे काही केले.त्यात तुम्ही मला पाठिंबा दिला पाहिजे.मी जी सेवा केली,
तिच्यासाठी तुम्ही मला उरलेल्या आयुष्यभर जनतेच्या तिजोरीतून पोसले पाहिजे." परंतु न्यायाधीशांनी निराळाच विचार केला,निराळाच निर्णय घेतला. त्यांनी त्याला मरणाची शिक्षा सांगितली आणि स्वतःच्या तोंडाला चिरंतन काळोखी फासून घेतली.
"सॉक्रेटिस तीस दिवस तुरुंगात होता.त्याला शृंखलाबद्ध करून ठेवण्यात आले होते.एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्याला अंथरुणावर खिळवून ठेवण्यात आले होते.शेवटी विषाचा पेला त्याला दिला गेला.त्या वेळेस त्याच्या त्या कोठडीसमोर त्याचे जे निकटवर्ती,परमप्रिय मित्र जमले होते,ते रडले.त्यांना शोकावेग आवरेना, अश्रू आवरेनात.परंतु शेवटपर्यंत सॉक्रेटिस मात्र शांत व आनंदी होता.
सॉक्रेटिस मेल्यावर अथेन्स शहर सोडून जाणे बरे असे प्लेटोस वाटले.तत्त्वज्ञानी लोकांनी त्या वेळेस अथेन्समध्ये राहणे सुरक्षितपणाचे नव्हते. प्लेटो परिव्राजक बनला.बारा वर्षे तो जगभर हिंडला.तो इटलीत व सिसिलीत गेला.तिथे पायथॅगोरसच्या संप्रदायाशी त्याचा परिचय झाला.
पायथॅगोरसला "माणसे पकडणारा " असे म्हणत त्याच्या संप्रदायात गूढता होती.या पायथॅगोरसला अंकगणितांत उपनिषदे दिसत, भूमितीत दैवी सत्ये भेटत.अशा या अध्यात्मवादी पंथाशी परिचित झाल्यावर प्लेटो गलबतात बसून इजिप्तमध्ये गेला.इजिप्तमधील प्राचीन ज्ञानाचे मधुबिंदू त्याने गोळा केले.ज्यूडा व हिंदुस्थान या देशांत तो गेला होता असे म्हणतात;परंतु याबाबत शंका आहे;कारण ज्यू वा हिंदू लोकांच्या प्रेषितांची त्यांच्या आध्यात्मिक विचारांची किंवा न्यायासाठी,सत्यासाठी जी एक प्रखर व उत्कृष्ट अशी शोधक वृत्ती त्यांच्यामध्ये होती,तिची प्लेटोला माहिती होती,असे दिसत नाही.प्लेटोला वाटत होते की, "न्यायासाठी तहानलेले आपणच या पृथ्वीवरचे पहिले." ज्या विषयावर आपण लिहीत आहोत,त्यावर तसे आजपर्यंत कोणीही लिहिलेले नाही.असे त्याला वाटे.जे विचार आपण देत आहोत ते या जगात प्रथम आपणच देत आहोत असा त्याचा विश्वास होता. अशी त्याची प्रामाणिक समजूत होती. तो लिहितो, "आजपर्यंत न्यायाची स्तुती कोणी केली नाही.अन्यायाचा धिक्कार कोणी केला नाही. आपल्या हृदयात असणाऱ्या असत्प्रवृत्तीतील सर्वांत दुष्ट प्रवृत्ती म्हणजे अन्यायाची आहे.परंतु ही गोष्ट आजपर्यंत कोणाच्याच लक्षात आली नाही.ही अन्याय प्रवृत्ती आपल्या हृदयात का दृढमूल होऊन बसली आहे,याचे संशोधन आजपर्यंत कोणीही केले नाही.तसेच मनुष्यातील सर्वांत थोर सत्प्रवृत्ती म्हणजे न्यायाची होय. तिचाही विचार कोणी केला नाही.
"प्लेटोसारख्या थोर विचारवंतांचा हिंदू वा ज्यू तत्त्वज्ञान्यांशी परिचय असता,तर त्याने असे लिहिले नसते. प्रवासानंतर तो परत आला,त्या वेळेस त्याचे वय चाळीस वर्षांचे होते.
अथीनियन लोकांच्या भावना शांत झालेल्या होत्या,
वातावरण पुन्हा स्वतंत्र विचाराला अनूकूल होते.
भूतकाळात प्राण अत्यंत स्वस्त झाले होते; तसे आता नव्हते.जीवनाची किंमत लोक पुन्हा समजू लागले होते. तत्त्वज्ञान शिकविण्यात आता धोका नव्हता.
परंतु फार क्रांतिकारक विचार सांगण्याचे काम अद्यापही जरा जपूनच करायला हवे होते.नाजूक प्रवृत्तीच्या नागरिकांचे मन दुखावेल असे काही केले नाही म्हणजे झाले;अगदीच पाखंडी मते नसली म्हणजे झाले;सनातनी मतांविरुद्ध उघड बंड नसले म्हणजे झाले.तेवढी काळजी घेऊन विचारस्वातंत्र्य राखायला हरकत नव्हती.
प्लेटोने तत्त्वज्ञानमंदिर उघडले.त्या ज्ञानमंदिरात बसून आपल्या विद्याथ्यांशी तो जीवन-मरणाच्या भवितव्याविषयी बोले.फावल्या वेळी तो लिही. ज्या जगाने सॉक्रेटिसला मरणाची शिक्षा दिली, त्या जगाला प्लेटो विटला होता.तो मनामध्ये अधिक निर्दोष जगाची स्वप्ने खेळवीत बसे.ते आपले आदर्श जंग,ते आपले पूर्णतचे स्वप्न, त्याने त्या जगद्वविख्यात संवादाच्या रूपाने जगासमोर मांडले आहे.ते नाट्यरूप संवाद अमर आहेत,
अद्वितीय आहेत.त्या संवादांत सॉक्रेटिस हे प्रमुख पात्र आहे.परंतु सॉक्रेटिसाच्या तोंडी घातलेले विचार मात्र सॉक्रेटिसचे नसून प्लेटोचे आहेत.प्लेटोचे स्वप्न सॉक्रेटिस बोलून दाखवीत आहे.आवाज सॉक्रेटिसचा आहे.परंतु विचार प्लेटोचे आहेत.
सॉक्रेटिसाने स्वर्गातील तत्त्वज्ञान भूतलावर आणले असे म्हणतात.प्लेटोने ते तत्त्वज्ञान पुन्हा वर स्वर्गात नेले.किंवा असे म्हणू या की,पृथ्वीच स्वर्गाची प्रतिमा व्हावी म्हणून या पृथ्वीचीच पुनर्रचना करण्याचा त्याने प्रयत्न केला.तो लिहितो, "ही पृथ्वी म्हणजे एक खोल अंधारी गुहा आहे.
बुद्धीचा व ज्ञानाचा प्रकाश तिथे पोहोचू शकत नाही;
आपण या गुहेत शृंखलाबद्ध करून ठेवलेले कैदी आहोत,
जे पदार्थ आपण येथे पाहतो ते सत्यतेच्या छाया आहेत.
आपल्या डोळ्यांसमोर वस्तूंच्या या छाया काळ्या अंधाऱ्या भिंतीवर क्षणभर नाचतात व नाहीशा होतात. सत्यमेव जगत्,परिपूर्ण जगत् कल्पनेत आहे. वस्तूंचे सद्रूप,वस्तूंचे अंतिम परिपूर्ण स्वरूप,तिथे वर,स्वर्गात आहे.ज्या जगात आपण जगतो,ते त्या सद्रूप व परिपूर्ण सृष्टीचे अपूर्ण असे प्रतिबिंब आहे."
मूसाप्रमाणे प्लेटोही स्वतःमधील दिव्यतेचेच अनंतपटीने वाढविलेले स्वरूप म्हणजे परमेश्वर, असे मानतो.
स्वत:मधील ज्ञान व साधुता,शिवता व सुंदरता यांचे परिपूर्ण रूप म्हणजे प्लेटोचा परमेश्वर.. प्लेटो ज्याप्रमाणे आपल्या तत्त्वज्ञानाच्या उद्यानात बसे, त्याप्रमाणे त्याचा तो परमेश्वरही स्वर्गातील त्या परिपूर्ण अशा 'परमधर्मा'त असतो.प्लेटो ज्याप्रमाणे आपल्या उपवनात बसून सुंदर जगाच्या परिपूर्ण कल्पनेचा विचार करीत बसे.जवळ असलेल्या अपूर्ण व सदोष वस्तुजातातून त्या आदर्श जगाची प्रतिकृती करू बघे,तद्वतच तो परमेश्वरही जणू वरती करीत असतो.दगडाधोंड्यांतून,काट्यांतून परमेश्वर स्वर्ग निर्मू पाहत होता;परंतु स्वर्गाचे ध्येय दूर राहून ही पृथ्वी मात्र त्याने निर्मिली. मातीतून देवदूत निर्माण करण्याच्या ध्येयाने प्रभू काम करू लागला;परंतु देवदूताऐवजी त्याच्या हातून हा मानवच घडला.
परंतु प्लेटोच्या आध्यात्मात रमायला आपणास अवसर नाही व त्याची जरुरीही नाही.त्याला स्वत:लाच त्या बाबतीत निःशंकता नव्हती.तो धुक्यातच वावरत असे.सारे अध्यात्मवादी एक प्रकारच्या संदिग्धतेत,
अस्पष्टतेतच,वावरत असतात.सौंदर्याची कल्पना व परमेश्वर यांचा संबंध काय ? आदर्शभूत सौंदर्य व ईश्वर एकरूपच का? जो स्वर्गीय विश्वकर्मा सौंदर्याची कल्पना मानवांच्या रूपाने आविर्भूत करू पाहतो,त्या विश्वकर्म्याचे व त्या ध्येयपूर्त सुंदरतेचे नाते काय? ती निर्दोष सौंदर्याची कल्पना ईश्वराचाच एक भाग का? ती ध्येयभूत सौंदर्यवस्तू म्हणजे का ही सौदर्यवस्तू ईश्वराहून अधिक आहे,स्वंयभू आहे? ईश्वरातीत आहे? जर ही आदर्शभूत सौंदर्याची कल्पना ईश्वरनिरपेक्ष व ईश्वराहून स्वतंत्र अशी निराळी असेल,तर त्या कल्पनेचे विशिष्ट गुणधर्म काय ? ही ध्येयभूत वस्तू कोणी,कधी,केव्हा निर्मिली ? इतर काही प्रश्नांना प्लेटोजवळ उत्तर नाही.येथे प्लेटो निरुत्तर आहे.
काही प्रश्नांना तो गुळमुळीत व संदिग्ध अशी उत्तरे देतो.परंतु ती उत्तरे म्हणजे खात्री न पटविणारी अशी गूढगुंजने आहेत.अज्ञानाच्या अनंत सिंधूत तो फारच पुढे जातो.स्वतःस न झेपणाऱ्या खोल पाण्यात तो शिरतो.
त्याच्या पाठोपाठ जाण्यात अर्थ नाही;आपण बुडू, जगातील सर्वांत थोर व बुद्धिमान ॲरिस्टॉल, तत्त्वज्ञान्यांचा व बुद्धि मंतांचा तो अनभिषिक्त सम्राट,त्यालाही कधीकधी प्लेटोच्या त्या गूढगुंजनांचे आकलन होत नसे.
ईश्वराविषयींच्या कल्पनांचे जाळे विणणे जेव्हा प्लेटो थांबवितो,ईश्वराविषयींचे सिद्धांत मांडीत बसणे बंद करतो व स्वतःच्या मनातील विचार बोलू लागतो,तेव्हा जगातील परम-थोर आचार्य म्हणून तो यथार्थपणे शोभतो.प्लेटो कधी जुना वाटत नाही.तो चिरंजीवपणे अर्वाचीन आहे.तो नित्य नवीन आहे.कोणत्याही युगात तो नवीनच वाटेल.
त्याची राजकीय व सामाजिक मते त्याच्या काळाच्या फार पुढे होती;एवढेच नव्हे,तर आजच्या काळाच्याही फार पुढे गेलेली आहेत. असे म्हणावे लागेल.तो विसाव्या शतकातील विचारांच्याही पुढे गेलेला आहे.आजचा असा एकही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न नाही की,जो प्लेटोने चर्चिला नाही.मानवी नाटकाचे सर्वांगीण व सर्वकष असे निरीक्षण,
परीक्षण,त्याने केले आहे.मानवाचे विश्वबंधुत्व,सुप्रजानन-शास्त्र, संततिनियमन,सामुदायिक पत्नीत्व, कुटुंबपद्धतीचा अस्त,मुलांची स्टेटकडे मालकी, स्त्री-पुरुषांची समानता,खासगी मालमत्तेचा अस्त.अनिर्बंध मोकळे प्रेम,ग्रंथनियंत्रण,दारूबंदी,इत्यादी शेकडो
प्रश्नांवर प्लेटोने प्रकाश पाडला आहे.त्या संवादातून अशा अनेक समस्यांवर त्याने चर्चा केली;परंतु या ज्या चर्चा त्याने केल्या,त्यांचा हेतू काय ? प्लेटोसमोर एकच ध्येय होते,एकच उद्दिष्ट होते.पृथ्वीवर न्यायाची प्रस्थापना व्हावी,हाच एक ध्यास त्याला लागलेला आहे.अंतर्बाह्य न्याय- राजसंस्थेत न्याय,व्यक्तीच्या अंतरंगांत न्याय.त्याला अशा प्रकारची शासनाव्यवस्था हवी होती,
असे जग हवे होते की,जेथे सॉक्रेटिससारख्यांचा वध न होता,त्यांना राजा म्हणून सिंहासनावर बसविता आले असते.
अपुर्ण पुढील भाग १९.१०.२३ रोजी