* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: याला जीवन ऐसे नाव.. This is the name of life..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

७/१०/२३

याला जीवन ऐसे नाव.. This is the name of life..



सॉक्रेटिसला काही तासांतच हेमलॉक विषाचा प्याला दिला जाणार होता.


शिष्यांबरोबर त्याची शेवटची भेट सुरू होती.क्रेटो

या शिष्याने त्याला विचारलं,गुरुवर्य, तुमच्यावर अंतिम संस्कार कसे करायचे? तुम्हाला पुरायचं की जाळायचं?


सॉक्रेटिस म्हणाला,अंतिम संस्कार? कसले अंतिम संस्कार? त्यात 'अंतिम' काय आहे? मला जे विष देतायत,

त्यांची अशी समजूत आहे की मी विष पिऊन मेलो की माझा अंत होईल? तुम्ही तर माझे शिष्य... तुमची अशी समजूत कशी झाली? लक्षात ठेवा,मला विष देणाऱ्यांची नावं कोणाच्या लक्षात राहणार नाहीत,पण,मी मात्र आणखी हजारो वर्षं मरणार नाही.


एका राजाच्या दरबारात एक सूफी फकीर आला.तो…

राजाला म्हणाला,तुझी काय आकांक्षा आहे?


राजा म्हणाला,सामान्य माणूस ज्याची आकांक्षा करतो,ते सगळं माझ्यापाशी आधीपासूनच आहे,भरपूर आहे.तुम्ही मला असं काहीतरी द्या,जे परम कसोटीच्या क्षणी उपयोगी पडेल.


फकिराने एका कागदावर काहीतरी लिहिलं आणि तो कागद एका अंगठीत बंद केला.ती अंगठी राजाकडे दिली आणि म्हणाला,जेव्हा कोणताही मार्ग उरणार नाही,सर्व बाजू बंद होतील,हाच परम कसोटीचा क्षण आहे,अशी खात्री होईल,त्या वेळीच ही अंगठी उघड.


आणि लवकरच राजाच्या दुर्दैवाने हा प्रसंग आला.


शेजारच्या राजाने बेसावध क्षणी आक्रमण केलं आणि त्याचं सैन्य राजधानीपर्यंत पोहोचलं.राजाला राजवाड्यातून पळ काढावा लागला.शत्रुसैन्याची एक तुकडी त्याच्या पाठलागावर होती.राजा घोडा दौडवत डोंगरदऱ्यांतून एका कड्याच्या टोकावर पोहोचला.येणारी एकच वाट. त्यावर कोणत्याही क्षणी येण्याच्या तयारीत शत्रू. दुसरीकडे एक दुर्गम कडा.


राजाने अंगठी उघडली.कागदावर लिहिलं होतं,

हेही निघून जाईल.


घोड्यांच्या टापा जवळ येतायत…थेट प्राणांवरचं संकट,

आता कसं निघून जाईल,कसं टळेल,असं कसं लिहिलंय या कागदावर,अशा विचारांत असतानाच राजाचा पाय निसटला आणि तो दरीत कोसळला.


राजाचा घोडा स्वाराविना पाहून शत्रुसैन्याला राजाचा अंत ओढवल्याचं लक्षात आलं आणि विकट हास्य करत ते निघून गेले…


… कड्याच्या टोकाला एका झुडपाच्या आधाराने लटकत असलेला राजा वर आला.त्याने लपत छपत जवळचं गाव गाठलं. राजा मरण पावला,असं समजून इतस्तत:पांगलेले त्याचे सैनिक पुन्हा एकत्र आले.त्यांनी नव्या ताकदीने शत्रूवर हल्ला चढवला आणि आक्रमण परतवून लावलं.

शत्रूला धडा शिकवला.


राजाची हत्तीवरून मिरवणूक निघाली.जल्लोष. विजयाची धुंदी,ढोलताशांचा कडकडाट,ऐश्वर्याचं,वैभवाचं प्रदर्शन,

चकचकाट,लखलखाट,जयजयकार आनंदाचे चीत्कार… 


राजाने पुन्हा अंगठी काढली.पुन्हा वाचलं,हेही निघून जाईल.


त्या क्षणी तो आतल्या आत स्थिरावला आणि हसला..आता तो राजा होताच,पण, संन्यस्त राजा.


'अनामिक' जसं माझ्यापर्यंत आलं होत तसं आपल्यापर्यंत स्वगत पोहोच केले आहे.


पुढील भागात.. फुले दांपत्य आणि त्यांचा लढा..