* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: एप्रिल 2024

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३०/४/२४

पाठलाग ‘रामायणाचा’ Chasing 'Ramayana'

२८.०४.२४ या लेखातील शेवटचा भाग..


मी भारतात गेले काही महिने वावरत होते. कमकुवत हृदयाच्या सायकलस्वाराचा इथे निभाव लागणार नाही हे मला पदोपदी जाणवत होतं.मी दात-ओठ खाऊन या गर्दीतील इतरांप्रमाणेच वावरायला हळूहळू शिकत होते. त्या सकाळी वातावरणात प्रचंड धूळ होती. त्यातच वाहनांचा धूरही मिसळत होता.त्यामुळे वाहते डोळे आणि नाक पुसायला मी अखेरीस रस्त्याच्या कडेला थांबले.

त्याच वेळी माझं लक्ष त्याच्याकडे वळलं.तो अनवाणी होता.त्याच्या अंगात एक फाटका करडा शर्ट होता.पँटही फाटकीच होती.त्याने डोक्यावरून एक फडकं गुंडाळून हनुवटीखाली त्याची गाठ मारली होती.त्याच्या आजूबाजूने गर्दी वाहत होती.ही काय कटकट आहे,अशा नजरेने लोक त्याच्याकडे बघत होते.पण याला त्याची पर्वा नव्हती.डोळे मिटून,हात जोडून तो तिथे उभा होता.त्याचे ओठ हलत होते.अतिशय तल्लीन होऊन बालकाच्या भाबडेपणाने एका मंदिराकडे तोंड करून तो प्रार्थना करत होता.त्याची प्रार्थना संपली.त्याने छातीवरचे हात कपाळापर्यंत वर नेले.मग तो गर्दीचा एक भाग बनून तिथून नाहीसा झाला.


मी त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या मंदिरापर्यंत सायकल ढकलत नेली.हिंदूंच्या असंख्य देवदेवतांपैकी ही कुठली देवता आहे ते मला बघायचं होतं.एखादा माणूस इतक्या तल्लीनतेने गर्दीच्या रस्त्यात उभा राहून ज्या देवाची प्रार्थना करतो तो कोण,याची मला उत्सुकता होती.मी त्या मंदिराच्या जाळीच्या दारातून आत डोकावलं.शेंदरी रंगाच्या त्या देवाचे काळे डोळे माझ्याकडे बघत होते.

झेंडूच्या फुलांच्या माळा घातलेला तो देव म्हणजे 'हनुमान- द मंकी गॉड'.त्याच्या अंगावर सोनेरी वेषही होता.त्या काळात मला हिंदू देवदेवतांची फारशी माहिती नव्हती.हनुमान हा अत्यंत आज्ञाधारक, स्वामिभक्त सेवक होता,इतपतच मला त्याची माहिती होती.तो एक प्रश्नांची सोडवणूक करणारा स्वर्गीय दूत होता आणि तो डोक्याभोवती फडकं गुंडाळलेला माणूस त्याच्याकडे अशीच मदतीची याचना करत होता. देवाला त्याच्या अडचणी सांगून झाल्यावर तो निवांत मनाने गर्दीचा भाग बनून गेला होता.या देवाची आपण जास्त माहिती करून घ्यायलाच हवी,असं त्या क्षणी मला आतून वाटलं.

त्यामुळेच भारतीय उपखंडात मी नेपाळपासून श्रीलंकेपर्यंत भटकले.तीन हजार वर्षांपूर्वीच्या काळात वावरले. रामायणाच्या निर्मितीचा आणि रामकथेचा मागोवा घेतला.रामायण ही भारतीयांची अत्यंत आवडती कथा मलाही मोहवू लागली.'


किती सहजपणे मुस्टो हनुमानकथेच्या अंतरंगात शिरल्या आहेत! 'टू व्हील्स इन द डस्ट'चा सारा प्रवास असा सहज आहे.हा प्रवास दोन स्तरांवर आहे,असं म्हणता येईल.

एकीकडे मुस्टोबाई त्यांच्या सायकल प्रवासाबद्दल,त्या प्रवासात भेटणाऱ्या माणसांबद्दल लिहितात,तर त्याला समांतर असं रामायणाचं कथनही सुरू राहतं. आपण कधीही न पाहिलेला भारत आपल्यासमोर उलगडतो.

आणि त्याचबरोबर रामायणातल्या आपण कधीही न ऐकलेल्या आख्यायिकाही आपल्याला या पुस्तकातून कळतात.त्यातून मुस्टोंची ज्ञानपिपासाही उघड होते.

हनुमानाच्या या द्रोणागिरी आख्यायिकेबद्दल समजल्या समजल्या त्यांनी प्रवास सुरू केला, असं घडलेलं नाही.

'हनुमाना'चा अभ्यास करायचा हा विचार मुस्टोंच्या मनात आला,त्या वेळी त्यांनी भारतीयांकडून हनुमानासंबंधीच्या आख्यायिकांची माहिती घ्यायला सुरुवात केली. त्यातून मारुती आणि रामायण या दोघांचा निकटचा संबंध त्यांच्या लक्षात आला.त्यानंतर मुस्टोंनी लंडनमधील 'स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीज'च्या ग्रंथालयातून रामायणावरचे सगळे संदर्भग्रंथ आणून वाचून काढले.रामायणाच्या वेगवेगळ्या प्रती आणि वेगवेगळ्या लेखकांनी लावलेले अर्थ,त्यासंबंधीचं संशोधन यांची माहिती करून घेतली आणि मगच त्यांच्या या दुहेरी प्रवासाला सुरुवात झाली.


सर्वसाधारणपणे मुस्टो आपल्या सायकल भ्रमंतीत ऐतिहासिक मार्गांनी प्रवास करतात. भारतात त्यांनी ग्रँड ट्रंक रोडवरून प्रवास केलेला होता;पण आता रामायणातील आख्यायिकांनुसार मार्ग शोधायचा निश्चय करून त्या भारतात परतल्या.त्यानंतरचे पाच हिवाळे त्या टप्प्याटप्प्याने नेपाळ ते श्रीलंका हा प्रवास पूर्ण करत होत्या.हे अंतर त्यांना टॅक्सी आणि आगगाडीतून प्रवास करून एका फेरीतच पूर्ण करणं शक्य होतं.पण मुस्टोबाईच्या शब्दांत सांगायचं,तर त्यांना 'सायकल प्रवासाचं व्यसन जडलं होतं,आणि व्यसन सोडणं कधीच सोपं नसतं.'शिवाय सायकलच्या भटकंतीतून दिसणारा भारत ट्रेनमधून कसा दिसणार? त्यामुळे भारतात सायकलवरून हिंडून स्वतःचा जीव कशाला धोक्यात घालतेस,असा अनेकांनी दिलेला सल्ला झुगारून त्यांनी ही भटकंती केली.या प्रवासादरम्यान मुस्टोंनी केलेलं एक निरीक्षण फार महत्त्वाचं आहे.त्या म्हणतात, रामायण आणि भारत या दोन्हीही गोष्टी समजून घ्यायला अवघड आहेत.रामायण ही एक गुंतागुंतीची कलाकृती आहे. तिच्या अनेक वेगवेगळ्याआवृत्त्यांतील सर्व घटना एकसारख्या नाहीत,त्यामुळे त्याबद्दल काही ठाम निष्कर्ष काढता येत नाहीत.


तरी मुस्टोंनी रामाचा जनकपूर ते श्रीलंका म्हणजे सीतास्वयंवर ते (श्री) लंकेपर्यंतच्या प्रवासातील सामायिक घटना एकत्र करून एक मार्ग निश्चित केला आणि त्या मार्गावरून प्रवास केला. भारताबद्दलही त्यांचं निरीक्षण असंच आहे. 'भारत ही एक प्रचंड मोठी भूमी आहे. त्या भूमीत हिंडताना माणसांची भाषा,समजुती, एखाद्या प्राचीन ग्रंथातील घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन यात फरक पडतो. तसंच प्राचीन ग्रंथांतील घटनांचे बारकावे एका ठिकाणी जसे सांगितले जातात तसेच दुसऱ्या ठिकाणी सांगितले जातीलच असं नाही.

त्यामुळे नवख्या माणसाचा निष्कर्ष काढताना गोंधळ उडू शकतो,'असं मुस्टो म्हणतात.त्यामुळे त्या शक्यतो फक्त निरीक्षणं नोंदवताना दिसतात.यातून त्यांची भारताकडे पाहण्याची दृष्टी पूर्वग्रहदूषित नाही हे आपल्या लक्षात येतं आणि त्यामुळे पुस्तकही आपण अधिक जवळिकीने वाचू शकतो.


मुस्टोंनी रामायणाचा कसून अभ्यास केलाय,हे त्यांनी वेळोवेळी रामायणाबद्दल व्यक्त केलेल्या मतांवरून स्पष्ट होतं.'अति परिचयात् अवज्ञा' असं एक वचन आहे. रामायण आणि महाभारताच्या बाबतीत आपली अवस्था काहीशी अशीच झालेली असते.त्यातले बरेच बारकावे आणि कंगोरे आपल्याला ठाऊक नसतात.इंद्राचा मुलगा जयंत कावळ्याचं रूप घेऊन येतो आणि वनवासातल्या सीतेला चोचीने टोचून रक्तबंबाळ करतो.त्या वेळी राम हतबल होऊन उभा असतो.या प्रसंगी सीता कावळ्याला शाप देते : 'तुला फक्त एका डोळ्यानेच दिसेल' आणि काचोळी फाटल्यामुळे काढून टाकते. तेव्हापासून कावळ्याला एका डोळ्यानेच दिसतं,या समजुतीमागे ही दंतकथा आहे.त्या घटनेच्या स्मरणार्थ सीतेला सहानुभूती म्हणून दक्षिणेतील भटक्या जमातीतील स्त्रियांनी चोळी वापरणं सोडून दिलं,ही हकीकत आपल्यापैकी कितीजणांना ठाऊक असते? या व अशा अनेक दंतकथा मुस्टो आपल्या प्रवासात गोळा करतातच,पण त्यालाच जोडून त्यांना दिसलेल्या भारताचं दर्शनही आपल्याला घडवत जातात.


'भारतात फिरत असताना बऱ्याचदा कधी एकदा परत घरी जातेय,असं मला होऊन जायचं. इंग्लंडमधलं शिस्तबद्ध आरामदायी जीवन मला खुणावायचं.अशा वेळी मी घरी परत जायचे तेव्हा भारतात कमालीचा उन्हाळा सुरू झालेला असायचा.मात्र,लवकरच निर्जंतुक पाश्चात्त्य जीवनाचाही मला कंटाळा यायचा.झगमगीत रंग, मोकळं हास्य,अनौपचारिक चौकशा,मसाल्यांचा घमघमाट,

उकळत्या चहाचा वास,रातराणीचा गंध,झेंडूच्या माळा आणि साडीचे पदर मला खुणावू लागत.धुळीचा अभाव त्रासदायक ठरू लागे.मग मी पुन्हा एकदा सायकल बाहेर काढून भारतात परतत असे.तुम्ही भारतात एकदा येऊन गेलात की पूर्णपणे या जगात गुरफटून जाता. भारताचा द्वेष किंवा प्रेम यापैकी कोणतीही भावना तुमच्या मनात उद्भवली तरी एक गोष्ट विसरून चालत नाही,ती म्हणजे भारतात एक पुरातन संस्कृती नांदते.

तो एक समजायला कठीण पण तितकाच आकर्षक असा देश आहे.प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी भारतात येऊन जायला हवं.'ॲन मुस्टोंसारखी माणसं लिहितात तेव्हा त्यांचे अनुभव आपलंही जीवन समृद्ध करतात आणि अशी पुस्तकं वाचताना आपण त्यांना आपसूकच सलाम करतो !


तुम्हाला जे द्यावेसे वाटते, ते नेहमीच देत रहा !


एक वृद्ध बिल्डर


एक वृद्ध बिल्डर एकटाच,त्या लांबवरच्या हायवेवरुन चाललेला. संध्याकाळ तशी थंड आणि करडी,अंतर तसे खूप मैलांचे आणि कमालीचे रुंदही.रस्त्याजवळचा पाण्याचा प्रवाह वेगाने खळाळतो आहे.,सायंकाळचा संधी प्रकाश अधिकाधिक कातर होत जाणारा!किनाऱ्यावरुन प्रवाहाच्या कडेने त्याला पैलतीरावर जायचे आहे. 

किनाऱ्यावरुन जाताना पुल बांधण्याची निकड त्याला जाणवते.हात थकले असले,तरी पुल बांधायचाच,तो वृद्ध निश्चित करतो.वेगाने कामालाही प्रारंभ होतो.दिवसरात्र काम आणि काम ! त्या पुलाच्या बांधकामाकडे पहात असणारा एक गृहस्थ,त्या वृद्ध बिल्डरला विचारतो,

'कशासाठी बांधता आहात पुल ? काय साधणार त्यातून ? वेळेचा आणि पैशाचा मोठा अपव्यय ! तू आता इतका वृद्ध झाला आहेस, आणि तुझ्या आयुष्याचा प्रवासही संपत आलेला आहे.तरीदेखील हा सारा व्यर्थ खटाटोप कशासाठी ?हा पुल बांधला जाईल तेव्हा तू निश्चितच या जगात असणार नाहीस!'


'मी नसलो,तरी पुल असेल,आणि पुढच्या अनेक पिढ्यांना पैलतीरावर नेण्यास,तो सोईचा-सुखावह होईल.जवळचा हायवे दमछाक करणारा आहे.कित्येक मैलांची थकावट वाचेल यातून.निश्चितच वेळ आणि ऊर्जाही वाचेल ! मग पुढीलांसाठी सुखावह होईल सारे,येणाऱ्या तरुणाईसाठी पिढ्यांसाठी तर हे एक मोठे श्रमदान आहे,यातून स्वर्गीय आनंद मिळेल, हेही नसे थोडके !' - विल ॲलेन ड्रोमगोले


जन्मजात बुद्धी ही वाढत्या वयानुसार,अनुभवानुसार अधिकाधिक परिपक्क होत असते.प्रत्येक अनुभव आयुष्याचा एक नवा धडा,आपल्या तळहातावर ठेवत असतो.
मुख्य म्हणजे तो एक नवे शहाणपण देत असतो.तेव्हा जेवढा माणूस अनुभवसंपन्न असेल,

तेवढे शहाणपण त्याला प्राप्त होते. ३० प्रभावी परिणामकारक सिद्धांत -अनुपम कुर्लवाल, गोयल बुक एजन्सी माझे म्हणाल,तर आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली आणि ती म्हणजे,आपण आपले ज्ञान, आपला अनुभव,हा दुसऱ्याला जेवढा देत राहू,त्या देण्यातूनच आपण समृद्ध होत जातो.खरे तर,प्रत्येक अनुभव जीवनाचे एक आगळे रूप दर्शवत असतो.एक वृद्ध बिल्डर ही कविता मी लहानपणी प्रथम वाचली.तेव्हा ती मला फारशी कळली नाही,पण आयुष्याच्या या टप्यावर मात्र ती कविता मला मोठी आशयसंपन्न वाटते.मला त्या वयोवृद्ध बिल्डरचा ध्येयपथ कमालीचा आकर्षून घेतो.त्या वृद्धाला पुढील पिढीतील लोकांना मदत करायची आहे.

म्हणूनच तो मोठा पुल बांधायला घेतो.त्याचे ते पुल बांधणे,हे त्याच्याशी संवाद साधणाऱ्या गृहस्थाला,वेळ फुकट घालविण्यासारखे वाटते.अर्थात तो ब्रीज बिल्डर त्याच्याशी वाद घालत बसत नाही.याचे महत्त्वाचे कारण म्हणजे,आपण जे काही कार्य करीत आहोत,

त्याची योग्यता व पुढील अनेक पिढ्यासाठी असणारी उपयुक्तता,त्याला चांगली ठाऊक आहे.


जेव्हा तुम्ही तुमच्याकडची गुणसंपदा-प्रतिभा जेव्हा जगाला वाटायला लागता,तेव्हाच तुम्हाला जे काही हवे (सुख-समाधान) ते सहज मिळते.यामागचे साधे तर्कशास्त्र असे आहे की,तुम्ही जेवढे या दुनियेला द्याल,तितके तुम्हाला अधिक मिळत जाणार आहे.झिग झिगलर म्हणतो, तुमच्याकडे काय आहे, किती धनदौलत आहे, याला काहीच महत्त्व नसून,असलेल्या साधनाचा इतरांसाठी कसा वापर करता,याला अधिक महत्त्व आहे. 


२८/४/२४

रामायणाचा 'सायकल' पाठलाग Ramayana's 'cycle' chase

रामायणातल्या आख्यायिकांची भुरळ पडून एक ब्रिटीश महिला भारतात येते.द्रोणागिरी पर्वत घेऊन लंकेला गेलेल्या हनुमानाच्या मार्गावरून प्रवास करते.भारत आणि रामायण या दोन्हीतली गुंतागुंत समजून घेत सायकलवरून उभा भारत फिरणाऱ्या ॲन मुस्टो यांच्याबद्दल.


जगात नाकासमोरून चालणारी माणसं बहुसंख्य असली तरी कोणत्यातरी वेडाने झपाटून नाना ठिकाणी भटकत फिरणारी माणसंही कमी नाहीत.घरदार असतं;

पोटापाण्याची सोय झालेली असते;सगळं भलं चाललेलं असतं; पण यांना चैन पडत नाही.एक दिवस उठतात, घरादाराचा निरोप घेतात आणि कुठेतरी भलत्याच ठिकाणी जाऊन पोहोचतात. फक्त पुरुषच नव्हे,तर बायकाही.ही भटकण्याची खाज त्यांच्यात कुठून निर्माण होते ? सर्व अडचणींकडे दुर्लक्ष करत हे स्त्री-पुरुष जीव धोक्यात घालून कुठल्या तरी अज्ञाताचा शोध घ्यायला का निघतात ? दहा ते पाच ऑफिस,शक्यतो घराजवळ कामाची जागा,रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी आराम,असं जगण्याचं सूत्र असलेल्यांच्या हे लक्षात येणं अवघड असतं.


हटके भटके - निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन


ही भटकी वृत्ती त्यांच्यात कुठून येते? असं म्हणतात,

ही वृत्ती आदिमानवात नसती तर माणूस आजही आफ्रिकेत दगडी हत्यारांनी वन्य पशुंची शिकार करत हिंडत असता. आदिमानवाच्या टोळ्यांमधील काहीजणांना क्षितिजापलीकडे काय आहे,समोरचा डोंगर ओलांडून गेलो तर काय होईल,सूर्य मावळतो तेव्हा तो कुठे जातो हे बघण्याची उत्सुकता होती म्हणूनच माणूस जगभर पसरला. तीच वृत्ती अजूनही काही माणसांमध्ये टिकून आहे.


इंग्लंडमधल्या ॲन मुस्टो या बाई त्यातल्याच एक.


ॲन मुस्टो हे नाव भारतीयांना खरं म्हणजे ठाऊक असायला हवं,पण माझ्या ओळखीच्या कुणालाही ते नाव मी सांगेपर्यंत माहिती नव्हतं. सध्या आपण देव,धर्म,

रामायणातलं आणि महाभारतातलं विज्ञान यासंबंधी बराच काथ्याकूट करत असतो.शिवाय अशा सनातनी विचारांविरुद्ध बोलणाऱ्यांना गोळ्याही घालतो. पण एखादी परदेशी व्यक्ती जेव्हा भारतात येते, आपल्या देशातील एखाद्या दैवताचा खोलवर अभ्यास करते,तेव्हा त्या व्यक्तीच्या कार्याची दखल घ्यावी असं मात्र आपल्याला वाटत नाही.


ॲन मुस्टो ही आपला सुखासुखी जीव पणाला लावून भटकणारी एक इंग्रज महिला.तिला सायकल चालवायची हौस.सायकल जणू तिच्या रक्तातच मुरलेली.कारण तिचा जन्म नॉटिंगहॅमचा.नॉटिंगहॅम शहर दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे: पहिली गोष्ट म्हणजे 'रॉबिनहुड' हा इंग्रज दंतकथा गाजवणारा बाराव्या- तेराव्या शतकातील धनुर्धर.दुसरी गोष्ट म्हणजे नॉटिंगहॅम हे ब्रिटिश सायकल निर्मितीचं माहेरघर आहे.


साहस आणि सायकलप्रेम या दोन्हींचा वारसा ॲनला नॉटिंगहॅममधून मिळाला. 


ॲनमुलींच्या एका शाळेची हेडमास्तर म्हणून काम करत होती.सतत तरुण विद्यार्थिनींच्या सहवासात राहून ती मनाने तरुण राहिली असावी.वयाच्या चोपन्नाव्या वर्षी तिने नोकरीचा राजीनामा दिला. बहुधा तोपर्यंतच्या मिळमिळीत आयुष्याचा तिला कंटाळा आला असावा.


खरं तर वयाची पन्नाशी उलटली की आपल्याकडची माणसं निवृत्तीचा विचार करू लागतात.फार तर एखाद्या प्रवासी कंपनीची पॅकेज टूर बघून एखाद्या आखीव रेखीव सहलीला जावं,एवढीच त्यांची इच्छा असते.पण चोपन्न वर्षांच्या ॲन मुस्टोबाईंनी नोकरीचा राजीनामा दिला,

हातात एक सायकल घेतली आणि थेट जगप्रवासाला निघाल्या.१९८७ ते २००० दरम्यान मुस्टोंनी सायकलवरून दोनदा जगप्रवास केला. त्यावर त्यांनी 'लोन ट्रॅव्हलर' आणि 'अ बाइक राइड' नावाची पुस्तकं लिहिली.त्यांचं तिसरं पुस्तक 'टू व्हील्स इन द डस्ट- फ्रॉम काठमांडू टु कँडी', हे त्यांच्या भारतातील सायकल प्रवासाबद्दल आहे.


या ब्रिटिश महिलेला भारतात सायकल प्रवास करताना काय दिसलं हे वाचलं की आपल्या देशातलं हे चित्र आपल्याला कसं दिसलं नाही किंवा रोज पाहत असूनही आपल्याला ते का जाणवलं नाही,हा प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही. 


जिथे आपणही आपला देश असा रस्त्यावर जाऊन बघत नाही,तिथे या परदेशी महिलेने उभ्या भारतात खेडोपाड्यांतून प्रवास करावा आणि तिथलं जनजीवन टिपावं याचं कमालीचं आश्चर्य वाटतं.या पुस्तकाबद्दल आत्मीयता वाटायचं आणखी एक कारण होतं.भूशास्त्राशी संबंधित शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने मी पठाणकोट ते कोलकाता आणि उत्तराखंड ते कन्याकुमारी असा भारत पालथा घातला. रेल्वेची तृतीय श्रेणी,खासगी बससेवा (म्हणजे काही वेळा बसच्या छतावरून),

बैलगाड्या किंवा पायी अशी ही भटकंती होती.त्या वेळी प्रत्येक छोट्या वस्तीत मला मारुतीचं देऊळ आढळत असे.सिमल्याची जाकू टेकडी असो,ओरिसातलं एखादं खेडं असो,किंवा कर्नाटकातलं आडगाव -

तिथे मारुती मंदिर आणि त्यावर भगवा झेंडा फडकताना दिसे.मुस्टोबाईंनीही हीच गोष्ट त्यांच्या पुस्तकात नोंदवली आहे.


पण मुस्टोबाई मारुती मंदिरांची नोंद करून थांबल्या नाहीत.या 'मंकी गॉड' बद्दल कुतूहल वाटून त्या त्याबद्दलच्या दंतकथा गोळा करू लागल्या.त्या हनुमानाच्या प्रेमातच पडल्या,म्हणा ना! (पाश्चात्त्यांनी हनुमानाचा मागोवा घेतल्याचं हे दुसरं उदाहरण मी पाहत होतो. १९७२ ते ७५ या काळात अबूच्या पहाडात भूसर्वेक्षण करताना एकदा एका अमेरिकी महिलेशी गाठ पडली. त्यांचं नाव सारा हर्डी.त्या लंगूर वानरांवर संशोधन करत होत्या. त्यांच्या प्रबंधात हनुमानावर एक प्रकरण होतं असं आठवतं. पुढे 'लंगूर्स ऑफ अबू' या नावाने हा प्रबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला.) मुस्टोंनी हनुमानाच्या कथा ऐकल्या तेव्हा त्यांना हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून लंकेत नेल्याची हकीकत कळली.रावणासोबतच्या युद्धात लक्ष्मणाचे प्राण वाचवण्याची जबाबदारी हनुमानावर येऊन पडली.


द्रोणागिरी पर्वतावरची संजीवनी आणण्यासाठी गेलेल्या हनुमानाने वनस्पती शोधत बसण्याऐवजी सरळ पर्वतच्या पर्वतच उचलला.'मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे।' हे ठीक आहे; पण पुढे रामदासांच्या भीमरूपी स्तोत्रात म्हटल्याप्रमाणे 'आणिला,मागुति नेला।' हे वास्तव तसं नाही,अशी माहिती मुस्टोंना या शोधाशोधीत समजली. हे कळल्यावर मुस्टोबाईंना स्वस्थ बसवेना.त्या द्रोणागिरीचा शोध घेत घेत नेपाळमध्ये पोहोचल्या.तिथे त्यांना कळलं,की मारुतरावांनी द्रोणागिरी उखडला खरा,पण तो परत आणतो असं सांगून ते जे गेले ते परतलेच नाहीत.बहुधा युद्धाच्या गडबडीत विसरले.

आजही 'हा गेलो नि हा आलो' असं सांगून गेलेले हनुमानजी आपली टेकडी परत आणून देतील याची हे गावकरी वाट बघत आहेत,असं मुस्टो सांगतात.


खरं तर रामायण ही आपली परंपरा.पण त्यातल्या तपशीलांच्या खोलात शिरण्याची उत्सुकता आपल्यापैकी कितीजण दाखवतात ? 'द्रोणागिरी'चं मूळ स्थान कुठे आहे यात आजवर किती लोकांनी रस घेतला असेल ? द्रोणागिरी परत करण्याचं आश्वासन देऊन निघालेला हनुमान परत आलाच नाही म्हटल्यावर नेपाळमधल्या त्या गावात कोणत्या दंतकथा तयार झाल्या असतील याचा शोध आपल्यातल्या कितीजणांनी घेतला असेल ?


पण ही हकीकत ऐकल्यावर मुस्टोंचं कुतूहल मात्र जागृत झालं.मुस्टो नेपाळमध्ये गेल्या आणि रामायणातल्या मारुतीच्या मार्गावरून,म्हणजे द्रोणागिरीचं हिमालयातलं मूळ स्थान ते लंका असा प्रवास करायचं त्यांनी ठरवलं. हा प्रवास अर्थातच सायकल प्रवास असणार होता,हे वेगळं सांगायला नकोच.त्या प्रवासाची हकीकत म्हणजे 'टू व्हील्स इन द डस्ट फ्रॉम काठमांडू टु कैडी'. या पुस्तकात या सायकल प्रवासाबरोबरच त्या भारतीय निवडणुकांचा उत्साह,भारतीय आदरातिथ्य आणि ग्रामीण जीवन हे सगळं खुसखुशीत शैलीत आपल्याला सांगतात. त्या म्हणतात...


✓ 'माझी तीर्थयात्रा एक दिवस दख्खनच्या धुळीमध्ये सुरू झाली. १९९२ चा जानेवारी महिना होता.उज्जैनच्या गर्दीतून बाहेर पडून मोकळ्या ग्रामीण भागात जायचा प्रयत्न करत मी सायकल चालवत होते.सकाळची गर्दीची वेळ.अरुंद रस्त्यातून मी वाट काढत होते.इंच इंच लढवत पुढे सरकणं भाग होतं.रहदारीत माझी स्पर्धा सर्व प्रकारची यांत्रिक वाहनं,सायकली, सायकल रिक्षा,बैलगाड्या,

टांगे,घोडे,उंट आणि हातगाड्या अशा विविध वाहनांशी होती.हॉर्न वाजत होते,सायकलींच्या घंटा किणकिणत होत्या,चाबकांचे फटकारे ओढले जात होते आणि त्यातच उतावळे वाहनचालक बहुधा एकमेकांना शिवीगाळ करत होते.जे काही अरुंद पदपथ होते त्यांवर चर्मकार, ज्योतिषी आणि त्यांचे पोपट,भिकारी,कपड्यांचे व्यापारी,

चपलांचे व्यापारी आणि इतर विक्रेते आपला माल मांडून बसले होते.काही गरीब कुटुंबं आपल्या न्याहारीची व्यवस्था करत होती आणि पादचारी भर रस्त्यात वाहनांच्या गर्दीत जीव मुठीत घेऊन चालायचा प्रयत्न करत होते. जिथे मोकळी जागा मिळेल तिथून हे पादचारी एकामागून एक घुसून पुढे पुढे सरकायचा प्रयत्न करत होते.त्यामुळे होणाऱ्या वादांची या गोंधळात आणखीच भर पडत होती.काळी मातकट डुकरं कचऱ्याचे ढीग उकरत डुरकत होती.त्यांच्या पाठीवर बसून त्यांना चोची मारणाऱ्या कावळ्यांना त्याचं काहीच देणं-घेणं नसावं.भटकी कुत्री त्या रहदारीच्या गोंधळात भर घालत होती आणि मधनंच केकाटत होती.या सगळ्या गोंधळाचा नि आपला काहीच संबंध नाही अशा थाटात भारतात परमपवित्र मानल्या गेलेल्या गायी मधूनच एखादा वृत्तपत्रीय कागदाचा पुडा चघळत नाही तर कोबीचं पान चावत निवांत हिंडत होत्या.आपल्या जाणिवांना खडबडून जाग आणणारा खास भारतीय माहौल म्हणतात तो हाच.


शिल्लक राहिलेला भाग पुढील २०९.०४.२४ या लेखामध्ये…



२६/४/२४

पातीवरल्या बाया Women on the floor

भावनांची तीव्र मूळं शब्दांच्या भुईत 

रूजवणाऱ्या कवींच्या ह्या 'पातीवरल्या बाया'


नदी युगायुगांचे तप घेऊन वाहत असते.ती थकलेल्या माणसांच्या हाडांची राखेसहित त्यांचा काळ देखील धुवून काढत असते.नदी ठेवत नाही जपून कुणाचा संदर्भ,

कुणाचा इतिहास,कुणाचा काळ.कारण नदीला व्हायचं असतं पुन्हा पुन्हा स्वच्छंद निच्छल सजक वर्तमानाच्या पिढ्यानपिढ्यांची तहान भागवण्यासाठी.'तहान' 

या एकाच शब्दाला 'पाणी' मिळालं तर अंतःकरणातून कुठल्याही सजीवाला क्षणभरात टवटवीतपण लाभतं.

म्हणून नदी कुण्या एकासाठीच वाहत नाही.तसेच ती प्रवाह जगताना कुठल्याही काळासाठी थांबत नाही.

भुईच्या गर्भातून वाहणारी तशी नदी म्हणजे भुईची लेकच.पण ह्या भुईवर 'नदी' नावाची बाई तसेच 'बाई' नावाची नदी मला तरी युगपरात वाहतांना दिसलेली नाही आणि असा संदर्भ देखील ह्या भुईनेही युगा - 

युगानुसार नोंदलेला नसावा.नदीला 'माय' म्हणणारी माणसं नदीलाच दुषित करतात,नदीचा नाला करतात,

नदीत उडी घेत आत्महत्या करतात.मात्र जनावरं नदीला माय मानत नाही.नाही नदीला दुषित करण्याचा त्यांचा हेतू असतो.ते तर नदीचा नालाही करत नाही आणि आत्महत्या तर अजिबातच करत नाही.जनावरं अलिप्त असतात माणसांच्या विचारधारेतून,हे नदीलाही कळत असावं.म्हणून माणूस नदी जगू शकतो पण जगतांना माणसाला नदीची निर्मिती करता येऊ शकत नाही.कारण नदी निर्मितीचे सर्व हक्क ह्या सृष्टीला आहेत. 


खालील प्रमाणे कवी 'नदी' ह्या कवितेतून म्हणतात -


            नदी वाहे वळणाने, दुःख घेत उदरात

             गाव निजते खुशाल, दान घेते पदरात

             {पृष्ठ क्रमांक : २१}


कुणी थांबवून विचारतं का नदीला नदीचे दुःख ? नदीचे नैसर्गिक ऐवज काळानुसार कमी होऊ लागलीयेत ! दूर्मिळ होत चाललीयेत खेकडं - मासे,रंगारंगांचे शंख शिंपले,काठाभोवतीची वनस्पती आणि नदीची ओल.गाव शहरांनी तर नदीला दुषित करून नदीचा कसच काढून टाकलाय.? नदीचा नाला करून,तिच्या भोवती अतिक्रमण करून तिचा विस्तारता काठ आखडवून टाकलाय.तिचा खळखळ - झुळझुळ - स्थिर वाहणाऱ्या प्रवाहाला देखील बांधांनी विभागून टाकलाय.जाऊळाची केसं,राख झालेल्या देहाची उरलेली हाडं,केमिकलचं सांडपाणी,

विसर्जित मुर्त्या नदीच्या गर्भात टाकून नदी हेच दुःख उदरात घेत युग जगतेय की काय ? प्रश्नच आहे.बाईचं वाहणं नात्यात आहे,तिचं उद्ध्वस्त होणं माणसात आहे पण नदीचं काय ? बाई तप जगत असेल तर नदी तपातपांचं युग जगत असते,याची नोंद भुईने युगानुयुगे घेतलीच असावी.नदीचं महत्व सांगताना स्त्री प्रासंगिकतेचा तीव्र भाव पाण्यासाठी कसा स्पष्ट होतो हे 'बाई घायाळ मनाला' ह्या पुढील कवितेच्या ओळींमधून जाणवते.कवी म्हणतात 


                  बाई घायाळ मनाला

                  कशी मारावी फुंकर

                  किती चालावे वाळूत

                  तरी रिकामी घागर

                  {पृष्ठ क्रमांक : ४१}


वरील कवितेच्या ओळीतून बाई कोरडा कंठ घेऊन उन्हाची झळ सोसतांना दिसते आहे. आशयाच्या दृष्टीने नदीलाही भागवता आली नाहीये पाणी शोधणाऱ्या बाईची तहान.इथं 'घागर' ही प्रतिमा द्विभाव व्यक्त करते.तिचा देहही पाण्यावाचून कोरड्या घागरीगतच आहे.नदीतली वाळू उपसा करून करून नदीची ओल राहिली तरी कुठं ? तरीही बाईला आस असावीच नदीत झिरे करून घागर भरून घ्यायची.उन्हाळ्याच्या दिवसात वरील कवितेच्या ओळींचा विचार केला तर पाण्यासाठी जीव लाहीलाही करणारा आहे.तशी ही समग्र कविताच बाई मनाच्या दृष्टीने पाण्यासारखी पातळ होऊन विस्तारणारी आहे.नदी,

माळरान, विहिरीचा तळ गाठणाऱ्या बाया हंडा दोन हंडा पाण्यासाठी अस्वस्थ होतात,कोसो मैल दूर पाय तोडत पाणी मिळालं तर आणण्याचा प्रयत्न करतात.कारण तहान समजून घेतांना बाई तिच्या एकट्याचाच विचार करत नाही.बाई बाहेरील भोवतालापेक्षा आपल्या अंतरील भोवतालात अधिक डवरण्याचा प्रयत्न करते.बाईचा अंतर्बाह्य भोवताल म्हणजे तिच्यासाठीचा स्वतंत्र प्रदेशच असतो.एखादी बाई बाईवरील कविता अथवा बातमी ऑनलाईन वाचून 'ति'चा ऑफलाईन अधिक विचार करू शकते.मग जरी त्या कवितेचा तो संदर्भ ती प्रतिमा तिला लागू नसली तरी बाई 'बाई' म्हणून बाईचा विचार करते अर्थात तेव्हा ती तिलाच समजून घेण्याचा प्रयत्न करते.तसा बाईला माणूस म्हणून जगण्याचा स्वतंत्र प्रवाह लाभलाय खरी पण ; तरीही बाई अस्तित्व,ग्रामीण,स्त्रीवाद,आदिवासी,शहरी,

जागतिकीकरण,वर्तमान,कामगार सारख्या आदी प्रवाहात बाई प्रवाह जगून जातांना दिसते. मनाची फांदी एकाएकीच शहारून थरथरावी असे बाईचे तपा तपातील संदर्भ - वेदना  काळाला बधिर करून सोडतात पण;बाई वेदनेला ओठांवर कमी आणि आसवांच्या काठांनाच अधिक गपगुमान भिजवून काढण्याचा प्रयत्न करत आलीये.कधी कधी भुईत जिरावं पाणी तशी बाई आपली वेदना मनातल्या भुईत जिरवून टाकण्याचा प्रयत्न करते.

असे कितीहीदा केलं तरी बाईला एखाद्या तीव्र वेदनेतील आसवांना ठेवता येत नाही गोठून डोळ्यांच्या तळ्यात.

म्हणून कवी आसवांचाच संदर्भ घेऊन पुढीलप्रमाणे म्हणतात -


    तुझे झरणारे डोळे ओल्या पापणीच्या कडा

      तुझ्या आसवांचा बाई पडे अंगणात सडा 

                           ‌          {पान नंबर : ५५}


कल्पना वाटाव्यात अशाच वरील ओळखीतल्या प्रासंगिक भावना आहेत.'आसवांचा कधी अंगणात सडा पडतो का ? ' हा प्रश्न देखील वरील कवितेच्या ओळी वाचून वाचक मनाला पडणारा आहे.कदाचित हे काल्पनिक शब्दसौंदर्य असू शकतं पण ह्या काल्पनिकतेला येऊन भिडणारं एखाद्या बाईचं जगत असलेल्या प्रवाहातील वर्तमानही असू शकतं जे आपल्याला नाकारता येऊ शकत नाही.

माझा तर्क,अंगणात पडणारा हा आसवांचा हा सडा पहाटेचा असू शकतो अथवा संध्याकाळाचा देखील असू शकतो.कारण बाईचं आसवांचं आभाळ बऱ्यापैकी ह्याच वेळी दाटून येतं.बाईला द्यायचा नसतो. आसवांचा हिशोब कुणाला म्हणून बाई काळोखाचा आधार घेऊन होत राहते.आसवांनीच व्यक्त अंगणाला झाडू मारता मारता.

बाई सहन करत जाते शरिरावरील घाव, पण तिच्या मनाला लाभलेला शब्दांचा मुक्कामार ती सहन करेलच असेही नाही.म्हणून कधी तरी बरंच सहल्यावर येऊ शकतो दाटून तिच्यातला स्त्रीवाद.  


पातीवरल्या बाया दुःखाचा आवंढा गिळून शिरतात रानात झुरतात,मनात वेदनेच्या खपल्या काढीत उघडी करतात जखम दुखरी एकमेकींपुढे - {पान नंबर : ५६}


वरील प्रमाणे सदर संग्रहाला लाभलेल्या शीर्षकी कवितेच्या ओळी आहेत.बाई वावरातलं तन निंदता निंदता मनातलं तनही खुरपून काढते,आणि भुसभुशीत करू पाहते आपलं मन. नदारी,जबाबदारी,घरेलु भांडणं बायांना सुटत नाही,जगून घेतलेला तो क्षणही मनातून निघता निघत नाही म्हणून बाया उघडी करतात जखम दुखरी एकमेकींपुढे.हे सगळं सहतांना ग्रामीण बाया सोडत नाहीत आपली कामं.कदाचित त्यांना निभावून घ्यायचा असतो त्यांना लाभलेला बाई म्हणून बाईचा जन्म.कवींच्या मते,'वर्षानुवर्ष एकाच मालकाच्या वावरात काम करणाऱ्या बायांना पातीवरल्या बाया म्हणतात.' 

तसा 'पात' या एकाच शब्दाचा अर्थ मराठी प्रदेशातील प्रादेशिक ग्रामीण विभागानुसार विविध अर्थाने दैनंदिन जगण्यात येणारा आहे. 'पात' हा शब्द कृतीशील,प्रतिक म्हणून देखील उमटणारा आहे.दोन पिकांच्या रांगेतला मधला जो भाग असतो त्याला पात म्हणतात.एका बांधापासून दुसऱ्या बांधापर्यंत जी निंदनी होते (मधलं तन खुरपलं जातं) त्याला पात लागली असं म्हटलं जातं. खानदेशात 'येक वख्खर लागनं' असं म्हणतात. (तसा 'वखर' हा शब्द कृषी निगडीत अवजारच.) दिवसभर पातीवर अशी प्रक्रिया बायांकडनं वावरात होतांना कवी 'पातीवरल्या बाया' असे उद्देशून म्हणतात.तसा 'पातीवरल्या बाया' हा काव्य संदर्भ सदर संग्रहातील तीन कवितांमध्ये विविध आशयाच्या दृष्टीने वाचावयास मिळतो.गावाकडील बायां विषयी व्यक्त होता होता कवी गावाकडच्या पोरींविषयी देखील व्यक्त होतांना दिसतात. ते म्हणतात -


  माहेराला कवेत घेणाऱ्या

  गावाकडच्या हसऱ्या कोवळ्या पोरी

  कधी बाया होतात कळतच नाही

                 {पृष्ठ क्रमांक : ६७}


हे खरं आहे.ज्वारीच्या तोट्यागत वय उंचीने टराटरा वाढणाऱ्या पोरी कधी लग्नाच्या होतात, लग्न करून नांदायला लागतात कळतच नाही. सुनं होतं घर लग्न झाल्यावर पोरीवाचून.नकोशी वाटतात दैनंदिन घरातील कामं नात्यांना ज्या पोरी पार पाडायच्या माहेराला 'पोर' म्हणून. खरंच सुनंसुनं होतात घरे लग्न झाल्यावर पोरीवाचून.करमत नाही आख्ख्या घरालाच काही दिवस,काही महिने सणासुदीच्यावेळीही. पोरी नांदायला जातात अन् माहेराला बाया होऊन येतात !? ही खरंच विचार करायची गोष्ट आहे,विचारातल्या प्रश्नाचं उत्तरं शोधायची गरज आहे.पोरींना जन्मतःच वारसा लाभतो वंशवेलींचा,म्हणूनच पोरी लग्न झाल्यावर बाई होण्याच्या अधिक प्रयत्नात असतात.


गावात नात्यांमध्ये अद्यापही तुरळक ओलावा आहे.पण बदलत्या दिवसांप्रमाणे गावाची आणि गावातल्या नात्यांची नीतीमत्ता बदलत चालली आहे ती गावं सोडून जातांना.खालील प्रमाणे 'गाव ढासळत जाते' ह्या कवितेच्या ओळी बदलत्या ग्रामीण काळाचं प्रतिनिधित्व करताना दिसतात.


                  चिंब मनाची माणसं

                  त्यांचे निसटले बंध

                  माती पुसेना मातीला

                  तिचा हरपला गंध

                  {पृष्ठ क्रमांक : ७५}


वरील कवितेच्या ओळीतून साध्या सोप्या शब्दात भाव स्पष्ट होतांना दिसतोय पण माझं वाचनीय लक्ष 'माती पुसेना मातीला' ह्या एकाच ओळी कडे पुन्हा पुन्हा लागलेलं.ह्या ओळीमध्ये मला माणसांची बदलणारी मानसिकता जाणवते. 'माती पुसेना मातीला' म्हणजे ? 


माणूस येत नाही गावाकडच्या माणसांच्या मरणाला.देत नाही मुठमाती नात्यातील थांबलेल्या श्वासाला.पाहत नाही उद्ध्वस्त झालेल्या घराला.धीर देत आपलं म्हणून घेतांना आपल्यांना.शहराला शब्दांनी कुरवाळणारा गावाकडचा माणूस,गाव - गावातले नाते मेली आहेत की जिंदी आहेत आवर्जून विचारत सुधीक नाहीत अशी खंत सदर कवितेतून कवी व्यक्त करताना दिसतात. 'ओल मनाची सुकता / नाते कोसळत जाते / माया दुभंगते वेडी / गाव ढासळत जाते.' कवी मनाची ही खंत सर्वांना पटेलच असेही नाही पण गाव खरंच ढासळत चाललंय ! याचा प्रत्यय ग्रामीण पिढीला येत आहे.ग्रामीण प्रादेशिकतेचा विचार केला तर काही प्रश्न,काही समस्या,काही संदर्भ काळानुसार सर्वच प्रादेशिक विभागांवर समान व तीव्र प्रभाव पाडतांना दिसतात.धडधड छाती मनाची माती करायला लागलेला हा काळ अस्तित्वाला टवटवीत कमी पण वाळवून अधिक सोडणारा आहे.


मातीचा गंध श्वासात भरून आकाशाकडे उंचावण्याचं बळ राहिलं नाही पिकांमध्ये,नक्षत्रेच वांझोटी होऊन जातात पाणी पावसावाचून धकत नाही मग कितीही ब्रॅण्डेड वापरा बि - बियाणं पाण्याशिवाय कुठला हंगाम उगत नाही.


            विहीर हरवून बसली तिचा गर्भ

            झालीय वांझोटी

            तहानल्या पिकांना जाळते आता सल

            कुठं गेली खोल

            मुळाखालची ओल ?

           {पृष्ठ क्रमांक : ७७}


जरका मातीचच अवसान गळायला लागलं,मग विहिरीत ओल तरी राहिल काय ? भुईचा ओलावा टिकवून ठेवणारी झाडं तुटत चाललीयेत ? ऐन पेरणीत नक्षत्र हूल देऊन जातात ग्रीष्मात रानाचीच होते लाहीलाही,पाखरं नेहमीचाचा मुक्काम सोडून दूर दिशांमध्ये गळप होतात. 'तहानल्या पिकांना जाळते आता सल' ही ओळ काळजाला चटके देवून जाणारी आहे.'कुठं गेली खोल मुळाखालची ओल ?' हा प्रश्न वावरात राबणाऱ्या माणसांचाच नाही वाटत,हा प्रश्न मुक्या जित्रबांचा - पाखरांचा देखील वाटतो... ज्यांच्यासाठी माणूस म्हणून आपल्याला काहीच कसं करता येत नाही ? पाखरं विहिरीचा तळ गाठून अस्वस्थ होतात.जित्रबे पाण्याच्याच शोधात विहिरीपाशी येतात आणि कोरड्या विहिरीत पडून आपला जीव देखील गमावतात.विहिरीला वांझोटपण येणं म्हणजे उगूच न पाहणाऱ्या हंगामी पिकपिढीचा अंतच म्हणता येईल.'गाई हुंगुन येतात कोरडे रान' [पृष्ठ क्रमांक ३५] ही एकच ओळ कविता ठरते.तशी ही कविता पंधरा ओळींची आहे.ह्या पंधरा ओळींमधून सदर कवीला या कवितेत शब्दातून प्रसंग निर्माण करायचा आहे आणि तसा शब्दात्मक प्रयत्न त्यांनी केला देखील आहे पण कवितेचं गुढ आणि कळ 'गाई हुंगुन येतात कोरडे रान' ह्या एकच ओळीतून प्रभावीपणे सिध्द होतांना दिसते.काय म्हणत असावं त्या गाईचं मन जी हुंगन येते कोरडं रान ? किती तीव्र असावी त्या गाईची भुक चारावाचून अन् तहानेनं पाणीवाचून ? माणसांना जगता येतो प्रश्न पण जित्रबांना प्रश्न देखील पडत नसावा जगण्या मरण्याचा ! त्यांना तर उपलब्धही करता येत नाही स्वतःसाठी चारापाणी. जीवाला झळ काळजाला कळ ह्या जित्रबांसाठी तरी आली पाहिजे.अशी खंत 'गाई हुंगुन येतात कोरडे रान' ही एक ओळ वाचून माझ्या वाचक मनातून जित्रबांप्रति येते.


   अंधारून ढग येता,डोई आभाळ फाकते

    पोळणाऱ्या देहावर,घर पदर झाकते. {१०९}


वरील 'पोळणाऱ्या देहावर,घर पदर झाकते' ही ओळ मला ह्रदय स्पर्शी जाणवली.घराला हवी असतात माणसे,

माणसातील नाते,नात्यात ओलावा,ओलाव्यात आपलंपण अनुभवता येते ते घरामुळे.घर पिढ्यानपिढ्यांच्या जगून गेलेल्या काळाची जाणीव करून देते,घराला पाहिलं जरी तरी तारूण्यातलं आपलं मन,आठणीतलं बालपणाकडे खेळायला धावताना दिसते.नेहमी मोठं कुटूंब (खटलं) असल्यामुळे काळानुसार घराची वाटणी होतांना दिसलीये.पण ह्या वाटणी झाल्यावरही बऱ्यापैकी लोकांनी आपली जुनी घरे पाडून नवी घरं बांधली नाहीत.त्यांनी जपलाय पिढ्यानपिढ्यांचा काळ,स्वतःचे बालपण,लहान मोठ्यांच्या लग्नाच्या, सणासुदीच्या आठवणी.कवी अशाच एका मातीच्या घराचं वर्णन आपल्या काव्यातून मांडताना दिसतात.जे माझ्याही वाचक मनाला भावणारं आहे. 'पोळणाऱ्या देहावर,घर पदर झाकते' ओळ खरंच उल्लेखनीय आहे.आणि अशा जाणीवा काळानुसार खरंच साहित्यात येण्या गरजेच्या आहेत.समकालीन ग्रामीण प्रवाहात सचिन शिंदे यांची कविता आगळी व वेगळ्या धाटणीची आहे. तिच्यावर कुठल्याही काळाच्या कवितेची सावली पडलेली जाणवत नाही.ती स्वतःच एक काळ घेऊन शब्दात आलेली आहे. ग्रामीण,स्त्रीवाद,कामगार,सौंदर्य, प्रेम, अस्तित्व,

वर्तमान सारख्या प्रवाहात सदर संग्रहातील कविता भरल्या कणसागत नवे अनुभव,नव्या जाणिवा,नवे प्रश्न घेऊन आलेल्या आहेत.ही कविता ऋतू,नदी - पूर,

दुष्काळ,गाव - गावशिवार,माती - नाती,घर - जित्रब - पाखरं, अस्तित्व हरवत चाललेल्या 'मी' विषयी बोलते ज्याचा माणूस विचार करून सोडतो अथवा विचार पण करत नाही.या संग्रहातील 'जमाव' नावाची कविता वर्तमानाशी भिडताना दिसते. 


'झुरणाऱ्या दावणीची कविता' अस्वस्थ मनाचे तळ गाठतांना दिसते.अपेक्षांवर फिरलेलं पुराचं पाणी,

वेदना,जखम,उन्ह,विहीर,वणवा,ओल सारख्या कविताही वाचक मनावर प्रभाव पाडणाऱ्या आहेत.भावनांची तीव्र मूळं शब्दांच्या भुईत रूजवणारा हा कवी लेखणीच्या नांगराने आपलं वर्तमान भुसभुशीत करून पुन्हा नव्या उमेदीने शब्दांचा नवा हंगाम घेऊन येईल,अशी आशा व्यक्त करतो.सचिन शिंदे यांना नव्या शब्दपेरणीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.


प्रविण पवार - धुळे 


•••• ••••

•पुस्तकाचे नाव : पातीवरल्या बाया 

•कवीचे नाव : सचिन शिंदे 

•साहित्य प्रकार : कविता (संग्रह)

•प्रकाशकाचे नाव : अष्टगंध प्रकाशन

२४/४/२४

पक्षिसृष्टी - birdlife

साऱ्या जगात अंदाजे आठ हजार प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती आढळून येतात.त्यापैकी सुमारे दोन हजार ते अडीच हजार पक्षिकुळं भारत आणि पाकिस्तानात दिसून येतात.म्हणजे जगातील एकूण पक्षिकुळांपैकी एक तृतीयांश जाती वरील क्षेत्रात आढळून येतात. 


पक्षिगणाविषयीची ही विविधता जगात अन्यत्र कुठेही आढळून येत नाही.याचं मुख्य कारण आहे या प्रदेशातील निसर्गसृष्टीची विविधता.इथे राजस्थानमधील काटेरी झाडांची वनं आहेत, तशीच हिमालयात देवदाराची अरण्यं आहेत.जसा वाळवंटी प्रदेश आहे,तशीच बर्फानं आच्छादलेली हिमालयाची उंच शिखरं आहेत.नुसता हिमालय पर्वत आहे असं नव्हे,तर साऱ्या भारतात पर्वतांच्या रांगा पसरल्या आहेत.पश्चिम घाटासारखी हिरवीगार पर्वतमाळा आहे.तसेच सातपुडा,विंध्य अरवली,खाशी आणि गारो या पर्वतांच्या रांगा आहेत.

या साऱ्याच पर्वतश्रेणींत विविधता आहे.


पर्वत आले की त्यावरचा वनप्रदेश आला.भारतातील वनं प्रामुख्यानं रुंदपर्णी वृक्षांची आहेत.हिमालयात सूचिपर्णी झाडांची जंगलं आहेत.या दोहोंतदेखील अनेक प्रकारच्या वनांचा समावेश होतो.सदाहरित,अर्ध (सेमी) सदाहरित वनं.पानगळ,काटेरी आणि समशीतोष्ण जंगलं. या समृद्ध वनांतून विविध प्रकारचे पक्षी आढळून येतात.ते पानं,फुलं,

फळं आणि मध यावर उपजीविका करतात.कीटकांची सृष्टीदेखील बहुविध आहे.हे पक्षी अनेक प्रकारच्या झाडांच्या बिया त्यांच्या शिटेतून आणि पिसांतून आणतात.त्यांच्या माध्यमातून वृक्षांच्या बियांचा प्रसार होतो.त्यात एखादी त्या क्षेत्रात न येणारी वनस्पतीदेखील असते.तीदेखील तिथे वाढू लागते.झाडांच्या शेंड्यांवर पर्णपक्षी असतात,तर मधल्या छतावर शिलींद्री आणि सुतार पक्षी आश्रय घेतात. जमिनीवर झुडपं असतात, गवत उगवतं, पालापाचोळा पडलेला असतो, हवेमुळे पडलेली पोकळ झाडं असतात. या क्षेत्रात मुख्यत्वे जमिनीवरील पक्षी राहतात.


वनं आणि पर्वतमाळा पक्षिसृष्टीतील विविधता वाढविण्यास अनुकूल असतात.त्या पर्वतांवरून उगम पावणाऱ्या नद्यादेखील पक्ष्यांची निवासस्थानं असतात.

त्या नद्या सखल प्रदेशातून वाहत शेवटी समुद्राला मिळतात.हा सारा जलमय प्रदेशदेखील पक्ष्यांसाठी आदर्श वसतिस्थान असतो.गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा उगम हिमालयात झाल्यामुळे बर्फाच्या पाण्यामुळे त्या बारमाही वाहत असतात.गंगेचं विशाल खोरं प्रसिद्ध आहे. तिथल्या भूप्रदेशात जलचर पक्षी विपुल प्रमाणात आढळून येतात.

भारत द्वीपकल्पातील नद्या पावसावर अवलंबून आहेत.

उन्हाळ्यात त्या कोरड्या होतात.अति दक्षिणेकडच्या केरळ प्रदेशात तर समुद्राचं पाणी आत दूरवर घुसलं आहे.

या नद्या जिथे समुद्राला मिळतात तिथे समुद्राच्या मुखावर खाजणीची अतिशय समृद्ध जंगलं आहेत.हा प्रदेशदेखील पक्षिकुलाचा निवास आणि वीण यांसाठी उपयुक्त आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात शेतीला पाणीपुरवठा करण्याकरिता आणि वीज निर्माण करण्याकरिता नद्यांवर लहानमोठी धरणं बांधण्यात आली.ही नवनिर्मित जलाशयं पाणपक्ष्यांसाठी उपयुक्त ठरली.भंडारा,चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील अनुकूल भूरचना आणि माती यामुळे मूळ पर्यावरणाला धक्का न देता लहानमोठ्या तलावांचं जाळं निर्माण झालं आहे. हा तलावाचा प्रदेशदेखील पक्षिकुलाच्या निवासासाठी योग्य आहे.

साऱ्या महाराष्ट्रात सुमारे साडेपाचशे प्रकारच्या पक्ष्यांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. परंतु,एकट्या विदर्भातच अंदाजे पाचशे प्रकारचे पक्षी आढळून येतात.


जैविक विविधता पक्षिसृष्टीला कशी अनुकूल होऊ शकते हे आत्तापर्यंत सांगितलं.शास्त्रीयदृष्ट्या पक्षिकुलाचं वर्गीकरण सांगणं अवघड असलं तरी सामान्य लोकांना समजेल असं वर्गीकरण करता येईल.


■.सागरीय पक्ष्यांत वादळी पक्षी म्हणजे पेट्रेल, पाणकावळा,गंगाचिल्ली म्हणजे गल,कावळा, समुद्र-कावळा यांचा समावेश होतो.


■.जलचर पक्ष्यांतबगळा,ढोकरी,ढोक,सारस, क्रौंच,हंस,रानबदक आणि पाणकोंबडी यांचा समावेश होतो.


■.शिकारी पक्ष्यांत गरुड,ससाणा,श्येन,शिक्रा, घार, घुबड आणि पिंगळा यांचा समावेश होतो.


■.स्थळनिवासी पक्ष्यांत मोर,रानकोंबडा,तित्तिर,

लावा,हिमालयातील पिझंट आणि चकोर यांचा समावेश होतो.


.वृक्षारोहक पक्ष्यांत पोपट,कोकिळा,भारद्वाज, नीळकंठ इत्यादींचा समावेश होतो.


पक्षिसृष्टीतील आजपर्यंत न सुटलेलं कोडं आणि विशेष प्रकार म्हणजे पक्ष्यांचं स्थलांतर. 


हिवाळ्यात आणि उन्हाळ्याच्या सुरवातीला लक्षावधी पक्षी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात आकाशमार्गानं उडत जातात.हा प्रवास ते काही वेळा समुद्रावरून किंवा खुश्कीच्या मार्गाने करतात.त्यांना हा आवश्यक प्रवास का करावा लागतो?इतक्या लांबच्या प्रवासाचा धोका ते का स्वीकारतात? ते आपला मार्ग कसा शोधतात? या मूलभूत प्रश्नांची समाधानकारक उत्तरं अजून तरी मिळालेली नाहीत.अलीकडे पक्ष्यांच्या पायांना कडी बांधून आणि इतर काही प्रयोगांमुळे या रहस्यमय गोष्टी पूर्वी-पेक्षा जास्त समजू लागल्या आहेत.


एका मुलुखातून दुसऱ्या मुलुखातील उलटसुलट प्रवासाचा नियमितपणा पक्षिस्थलांतराचा एक खास गुण आहे.हजारो किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुलुखात पुष्कळ वेळा तेच तळं किंवा त्याच रानात हे पक्षी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात परत येतात.

सैबेरियातून भारतात येणारी रानबदकं आणि हंस यांचं उदाहरण आपण घेऊ या. 


निळावंती,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी नागपूर


हिवाळ्यात सैबेरियात खूप थंडी पडते. तिथे बर्फ पडू लागतो. जलाशयं गोठून जातात.या पक्ष्यांना अन्न मिळेनासं होतं.अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतासारख्या समशीतोष्ण प्रदेशात हे पक्षी स्थलांतर करून येऊ लागतात.स्थलांतर करणारे हे पक्षी रोजी पाचशे किलोमीटर अंतर सहज ओलांडून जातात.ताशी सत्तर ते ऐंशी किलोमीटर वेगानं ते उडतात.स्थलांतर करणारे हे पक्षी प्रामुख्यानं थव्यांतून राहणारे असतात. 


आकाशातून उडताना ते बाणाच्या टोकासारखी रचना करतात,टोकावर सर्वांत अनुभवी पक्षी असतो.तो इतरांना मार्ग दाखवितो.त्यांच्या शरीररचनेत लोहचुंबकाचं अस्तित्व असतं.त्यामुळे त्यांना उत्तर-दक्षिण दिशेचं ज्ञान होतं.शत्रुपक्ष्यांचा उपद्रव होऊ नये म्हणून हे पक्षी रात्री प्रवास करतात.त्यावेळी आकाशातील ग्रहताऱ्यांच्या साह्यानं ते उडण्याची दिशा निश्चित करतात.त्याच मार्गानं वर्षानुवर्षे प्रवास करीत असल्यानं भूगोलावरील पर्वतशिखरं,नदींचा प्रवाह आणि इतर ठळक गोष्टी त्यांच्या लक्षात राहतात.मार्ग अचूक शोधण्यासाठी ते या गोष्टींचा देखील उपयोग करतात.


उन्हाळ्याच्या सुरवातीला हे सर्व पक्षी पुन्हा आपल्या मुलुखात परतू लागतात.तोपर्यंत तेथील हिवाळा संपलेला असतो.स्थलांतराच्या वेळी पक्ष्यांच्या पिलांचं आचरण फारच आश्चर्यकारक असतं.त्या काळात ही पिलं उडण्यास थोडीफार समर्थ झाली असल्यास,ती नैसर्गिक प्रेरणेनं मातापित्यांबरोबर उड्डाण करून जातात.त्यांच्या अंगी इतका धीटपणा असतो की,हजारो किलोमीटरचं अंतर ती सहज उडून जातात.


आर्क्टिक टर्न हा कुररी जातीचा पक्षी उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाचा प्रवास करतो आणि पुन्हा उत्तर ध्रुवाकडे परततो.त्याचा एकूण प्रवास पस्तीस हजार किलोमीटर लांबीचा होतो.


कित्येक जण मला विचारतात की, ह्या पक्ष्यांचा आपणास उपयोग काय?पक्षी आपला परिसर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.आर्थिक दृष्ट्यादेखील त्यांचं महत्त्व कमी लेखता येणार नाही.शेतातील पिकांवर पडणाऱ्या किडींवर ते नियंत्रण ठेवतात. उपद्रवी अशा उंदीरघुशींवर काही पक्षी उपजीविका करीत असल्यानं शेतीसाठी ते उपकारकच ठरतात.घुबडांची एक जोडी एक हेक्टर शेतजमिनीचं कीटक आणि उंदीर यापासून रक्षण करते.याशिवाय ते फुलांचं परागीकरण आणि बियांचं स्थलांतर करतात.मृत झालेले कीटक आणि सरपटणाऱ्या, कुरतडणाऱ्या मेलेल्या प्राण्यांचे अवशेष खाऊन कावळे गावातील घाण नाहीशी करतात.घारी आणि गिधाडं मृत जनावरांवर तुटून पडतात.एक प्रकारे हे पक्षी नगर

पालिकेला घाण नाहीशी करण्यात साहाय्यच करतात.


परंतु कावळ्यांची संख्या शहरातून तसंच खेडेगावातून उत्तरोत्तर कमी होत आहे.याचं मुख्य कारण म्हणजे विषारी औषधांचा अति वापर.विषारी द्रव्यं खाल्यामुळे जे कीटक,उंदीर आणि सरपटणारे प्राणी मरतात ते कावळ्यांच्या खाण्यात आले की ते देखील मृत्युमुखी पडतात.यातील जे जगतात,ते प्रजोत्पत्ती करू शकत नाहीत.हजारो वर्षांपासून कावळे हे माणसाबरोबर राहत आले आहेत.गावातील कावळे जंगलात राहू शकत नाहीत.कावळ्याचं आयुष्य शंभर वर्षांचं आहे.म्हणजे तो सरासरीनं माणसापेक्षा अधिक काळ जगतो. 


महाभारतात अर्जुनाचा उल्लेख पूर्णपुरुष केला आहे.तसाच पक्ष्यांत कावळा हा पूर्णपक्षी म्हणून प्रसिद्ध आहे.अनेक प्रकारच्या ऋतुचक्रांतून तो माणसाबरोबर जगत असतो.हा अतिशय सामान्य पक्षी साऱ्या भारतभर आढळून येतो.म्हणून आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी अंतर्गत पाऊस आणि हवामान यांचा अंदाज घेण्यासाठी कावळ्याची निवड केली होती.कावळे आपली घरटी झाडांवर उन्हाळ्यात पावसापूर्वी बांधतात.त्यांच्या घरटी बांधण्याच्या आचरणावरून पाऊस आणि हवामानाचा अंदाज घेता येतो.वराहमिहिर,पराशर,गार्ग्य,नारद या विज्ञाननिष्ठ पूर्वाचार्यांनी कावळ्याच्या घरटी बांधण्याच्या आचरणा

वरून पूर्वी पावसाचा अंदाज दिला आहे.याकरिता कावळ्यांच्या संबंधाने तीन घटकांचा विचार केला आहे :


१.आंबा,निंब,पिंपळ,करंज,अर्जुन या झाडांवर कावळ्यांनी घरटी केली तर पाऊस चांगला पडतो.बाभूळ,बोर,खैर,

हिवर आणि सावर या काटेरी झाडावर घरटी केली तर अवर्षण पडतं.


२.पूर्व,उत्तर,ईशान्य,नैर्ऋत्य आणि वायव्य या दिशांना कावळ्यांनी घरटी केली,तर पाऊस चांगला पडतो.

पश्चिम,दक्षिण,आग्नेय आणि वृक्षांच्या मध्यभागी घरटी केली तर पाऊस कमी पडतो. 


३.तिसऱ्या घटकात कावळ्यांनी किती अंडी घातली याचा विचार केला आहे.तीन ते चार अंडी घातली तर चांगली वृष्टी होते. एक अंडं घातलं तर अवर्षण पडतं.


याची खात्री करण्यासाठी १९९४ सालच्या उन्हाळ्यात मी कावळ्यांच्या घरट्यांचं निरीक्षण महाराष्ट्रातील पक्षि मित्रांच्या साहाय्यानं केलं.त्या पाहणीत मला आढळून आलं :


१. यंदा महाराष्ट्रात पाऊस चांगला पडावा.


२.मराठवाड्यातील भूकंपग्रस्त लातूर विभागातील कावळे लुप्त झाले आहेत. कुठेही त्यांची घरटी दिसून आली नाहीत. यात धोक्याची सूचना आहे.


३.गडचिरोली भागात कावळे अजिबात नाहीत.ही चिन्हंदेखील चांगली नाहीत.


कावळ्यांची संख्या उत्तरोत्तर कमी होत असल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. 


कावळ्यासारखा पूर्णपक्षी आपल्यातून हळूहळू निघून चालला आहे.तो अशा रीतीनं लुप्त होणं ही पर्यावरणाच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही. कावळ्यां

बरोबर आणखीन एक पक्षिकुल नष्ट होईल;ते म्हणजे गोड गळ्यानं,पंचम स्वरानं गाणाऱ्या कोकिळांचं.

कारण कोकिळेची अंडी कावळे उबवितात.त्यांच्या पिलांची वाढ करतात.


पुस्तकं - books


मी गेल्यावर, 

तुला वाटेल की आपल्या बाबांनी 

वाचलियेत ही सारी पुस्तकं... 


पण नाही, 

अर्धही वाचता आलेलं नाहीय, 

येणारही नाही हे ठाऊक होतं मला तरी, 

मी जमवत गेलो होतो ही पुस्तकं... 


माझ्यासाठी माझ्या बापाने

काहीच सोडलं नव्हतं मागं, 

ही अक्षर ओळख सोडून फक्त... 


जिच्या मागे धावत मी 

पोहोचलो आहे इथवर, 

तुला सांगण्या समजावण्यासाठी की, 

मलाही सोडता येणार नाहीय मागे, 

काहीच स्थावर जंगम तुझ्यासाठी... 


ही काही पुस्तकं आहेत फक्त, 

जी तुला दाखवतिल वाट. 

चालवतील,तुला थांबवतील, 

कधी पळवतील,कधी 

निस्तब्ध करतिल, 

बोलतं करतील,कधी

टाकतिल संभ्रमात, 

सोडवतिल गुंते, 

वाढवतील पायाखालचा चिखल, 

कधी बुडवतील,तरवतील,कधी

वाहवतील,कधी थोपवतील,प्रवाह

अडवतील,तुडवतील,सडवतील, 

बडवतील,हरवतील,सापडतील... 


तुझ्याशी काहीही करतील, 

ही पुस्तकं... 


तू समोर आल्यावर, 

नेहेमीच कवेत घेवुन मी माझ्यातली

धडधड तुला देण्याचा प्रयत्न करतो... 


तशीच ही पुस्तकं 

उघडतील मधोमध,पसरतील हात, 

मिठीत घेतील तुला, 

आपोआप होतील हृदयाचे ठोके... 


यांच्यात रहस्य आहेत दडलेली,

अनेक उत्तरंही असतील,

प्रश्नांमधे कदाचित कुठेच

प्रश्नही नसतील... 


एक लक्षात ठेव,

आपलं आयुष्यच पल्प फिक्शन,कधी क्लासिक,सेल्फ हेल्प फिलॉसॉफिकल,कधी कवितीक,कधी किचकट,कधी सोपं असतं, ध्यानात असु दे या सगळ्यात वाईट काहिच नसतं... 


त्या वेळी हाती लागलेलं पुस्तक, 

त्याच वेळची गरज असतं,समज नसतं... 


मी नसेन तेंव्हा ही पुस्तकं असतील, 

जी नेतील तुला जायचं आहे तिथं, 

फक्त मी असेन,तिथं मात्र तुला पोहोचता येणार नाही... कारण मी आधीच

होवुन गेलेलो असेन तुझ्यासाठी, 

एखादी कथा,एखादी कादंबरी, 

एखादी कविता,एखाद्या पुस्तकातली... 


माझी आठवण आली की, 

या प्रचंड ढिगाऱ्यातलं ते एखादं पुस्तक शोध... 


तुझा प्रवास बघ कसा

सोपा होवुन जाईल... 


(प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम )


भास एक भयकथा,लेखक - विष्णू गोपाळ सुतार,

यांच्याकडून व्हाट्सअप वरून आलेली ही कवीता…