* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: मे 2025

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

३०/५/२५

नीलाम्बरी मांडवी / Nilambari Mandvi

ह्या गोव्यातल्या.कर्नाटकातल्या.ओडिशातल्या अंदाधुंद खाण व्यवसायाचा परिपाक म्हणून भारत सरकारच्या खनिज मंत्रालयाने न्यायाधीश शाह ह्यांच्या अध्यक्षतेखाली बेकायदेशीर खाणींबद्दल चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमला.त्या आयोगाच्या अहवालात नमूद केले आहे : गोव्यातील खाणींवर कधीही काहीही देखरेख ठेवली गेलेली नाही.त्यामुळे कशाचीही भीती नाही असे वातावरण निर्माण होऊन खाण चालकांद्वारे बेदरकारपणे पर्यावरण,जीवसृष्टी, शेती,भूजल,ओढे,नद्या,तळी ह्यांचा विध्वंस चालला आहे.अशा अवैध व्यवहारातून किती पैसा गोळा केला गेला आहे? शाह आयोगाचा अंदाज आहे पस्तीस हजार कोटी रुपये.ह्या अहवालापोटी गेले पंधरा महिने इथल्या खाणी बंद आहेत.एवढा अवधी श्वास घ्यायला फुरसत मिळाल्याने निसर्गरम्य गोमंतक पुन्हा खुलतो आहे.गोवेकरांची लाडकी मांडवी आता रक्तांबरी नाही,नीलांबरी बनली आहे.तिच्यात लाललाल नाही निळेशार पाणी वाहायला लागले आहे.


पुन्हा जीव धरला आहे.खरोखरच केवढे परिवर्तन झाले आहे? लोक सांगतात त्याप्रमाणे नद्यांच्यात अनेक वर्षांनी खर्चाणी,

लेपसारखे मासे,खुबे, माड्यासारखे शंख-शिंपले,वाधी अथवा टायगर प्रॉन खरोखरच पुन्हा बागडू लागले आहेत का? समजावून घेऊ या,म्हणून मी नुकतीच मांडवी नदीत मच्छीमारांच्या होडीवर दिवसभराची सफर केली.


मच्छीमार सांगत होते - होय,खुदानातून,खनिज वाहतुकीतून नदी जी गढूळ,प्रदूषित होत होती ते थांबल्याने खूप जास्त मासे,झिंगे,

शंख-शिंपले भेटताहेत. पण नदीची अवदशा संपलेली नाही,कारण गेली अनेक दशके मत्स्योत्पादनात जी मोठी घट झाली होती. त्यामुळे अनेक मच्छीमार वाळू उपसण्याकडे वळले आहेत.ह्या उपशाने माशांच्या विणीवर मोठा दुष्परिणाम होऊन मत्स्योत्पादनाची जी हानी झाली आहे,ती सहजासहजी भरून निघणार नाही.वाटते की ही घसरगुंडी चालूच राहील आणि काही वर्षांनी वाळूही संपून सारे मच्छीमार पूर्णपणे बेकार होतील.


('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )


आज पर्यावरण आणि विकास हा जो वाद चालू आहे, त्यात आजच्या धर्तीच्या विकासानेच रोजगार निर्माण होतील,आणि नवे रोजगार निर्माण करणे ही तर आपली फार निकडीची गरज आहे असे प्रतिपादन केले जाते. पण वास्तव काय आहे? गोव्यात खाणी बंद केल्या गेल्यावर हे आपोआपच उघडकीला आले.जो प्रचंड गैरव्यवहार झाला आहे त्याविरुद्ध काहीही कारवाई न करता सत्ताधाऱ्यांनी एकच ओरडा सुरू केला आहे: खाणबंदीमुळे गोव्यात पराकाष्ठेची बेकारी फैलावत आहे.निदान सव्वा लाख लोक बेकारीच्या खाईत लोटले गेले आहेत.तेव्हा खाणवाल्यांनी कमावलेल्या काळ्या पैशातून नाही हो,तुमच्या आमच्याकडून वसूल केलेल्या कराच्या पैशातून,ह्या बेरोजगारांना भत्ता दिला पाहिजे. कित्येक महिन्यापूर्वी सरकारने अशी एक योजना जाहीर केली,अर्ज मागवले.किती अर्ज आले असतील ? पाचशेहूनही कमी ! सव्वा लाख कुठे आणि पाचशे कुठे ! कारण उघड आहे. 


एके काळी कुदळीने खनिज खणले जात होते.आज जेसीबीसारखी अगडबंब यांत्रिक फावड्यांनी सज्ज वाहने एका व्यक्तीच्या हजारोपट वेगाने खणताहेत. अर्थशास्त्राच्या परिभाषेत श्रमिकांची उत्पादनशक्ती झपाट्याने वाढते आहे.जसजसे हे स्वयंचलित यांत्रिकीकरण प्रगती करत आहे.तसतशी माणसांच्या शारीरिक,तसेच बौद्धिक श्रमाची आवश्यकता घटते आहे.सहाजिकच बेकारी भडकते आहे.हे युरोपात अमेरिकेतही दिसत आहे.जगभर भांडवलावर व तंत्रज्ञानावर पकड असलेले मूठभर लोक सत्ता गाजवू लागले आहेत.म्हणूनच अमेरिकेत वॉल स्ट्रीटवर लोक घोषणा देत होते : अमेरिकेची नव्याण्णव टक्के सामान्य जनता आता एक टक्का धनदांडग्यांची दादागिरी सहन करणार नाही !


भारतात हेच चालू आहे.आपल्या आर्थिक विकासाची मंदगती जोवर तीन टक्के होती,तोवर संघटित क्षेत्रांतील रोजगार प्रतिवर्षी दोन टक्क्यांनी वाढत होते.पण तीच आठ टक्क्यांवर पोचल्यावर असे रोजगार केवळ एक टक्क्याने वाढताहेत.बहुतेक सारी भारतीय जनता असंघटित क्षेत्रांत तऱ्हेतऱ्हेच्या लटपटी करत कशी बशी गुजराण करते आहे.गोव्यात खाणींवर किती लोकांची उपजीविका अवलंबून आहे ह्याची काहीही नोंद नव्हती. मग जलप्रदूषणाने मच्छीमारीतील रोजगार किती प्रमाणात घटले आहेत,किंवा खाणींमुळे भूजलाची पातळी खाली जाऊन,हवेत धूळ पसरून,शेतीचे उत्पादन घटून रोजगारांवर किती दुष्परिणाम झाला आहे,ह्यांबद्दलची माहिती कशी उपलब्ध असणार? पक्की आकडेवारी उपलब्ध नसली तरी अशा आघातांमुळे बेकारी खूप वाढते आहे हे नक्की.


स्वयंचलनाच्या अविरत प्रगतीतून आधुनिक क्षेत्रांतील रोजगार घटत राहणे अटळ आहे.पण आजच्या झपाट्याने एकत्र येणाऱ्या जगात आधुनिकीकरण नकोच असे म्हणणे शुद्ध वेडगळपणा ठरेल.


तेव्हा आपल्याला औद्योगिकीकरण,जगातील इतर राष्ट्रांबरोबर देवाण-घेवाण जरूर हवीत.पण आधुनिकीकरणाचा पाठपुरावा करताना भारतातील बहूतांश लोक आपल्या उपजीविकेसाठी नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहेत,एवढेच नव्हे तर आधुनिक संघटित क्षेत्रात त्यांना पुरेसे रोजगार निर्माण होणे अशक्य आहे.हे वास्तव विसरता कामा नये.


पण हे दृष्टिआड करत आज एक भ्रामक मांडणी केली जाते की आधुनिकीकरणातून लोकांना भरपूर रोजगार मिळतील.तेव्हा ह्या प्रक्रियेत परंपरागत श्रमशक्तीला महत्त्व देणारे उपजीविकेचे मार्ग नष्ट झाल्यास काहीही काळजी करण्याचे कारण नाही.तेव्हा आज आवश्यकता आहे एका समन्वयाची,सहयोगाची.एका बाजूने आधुनिक संघटित उद्योग व सेवा क्षेत्रांच्या विकासाची निश्चितच निकड आहे.पण हा विकास हिंसक असता कामा नये.तो सहयोगी असावा.जोडीलाच,तितक्याच अगत्याने नैसर्गिक संसाधनाधारित श्रमप्रधान उपजीविकांचे मार्ग सांभाळण्याची,आणि नुसते सांभाळण्याची नाही तर आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानांचा वापर करत विकसित करण्याचीही निकड आहे.


गोव्यात खाणींच्या गैरव्यवहारातून जो काळ्या पैशाचा पाऊस पडला आहे त्याची एक निष्पत्ती आहे गोव्यात झपाट्याने होत असणारी वसंतसेनेच्या वाड्यासारखी उधळपट्टीचे प्रदर्शन करणारी बांधकामे.ह्यातलेच एक आहे सुइदाद दे गोवा नावाचे तिमले ह्या खाणचालक कुटुंबाचे समुद्रकिनाऱ्यावरचे किनाऱ्यावरच्या बांधकामांबद्दलच्या कायद्याचा भंग करणारे हॉटेल.ह्या हॉटेलला,अनेक बेकायदेशीर खाणव्यवहारांना आव्हान दिले आहे नॉर्मा व क्लॉड अल्वारिस ह्यांच्या गोवा फौन्डेशनने,रमेश गावस निलेश गावकर ह्यांसारख्या कार्यकर्त्यांनी त्यातल्या निलेश गावकर ह्या कावरे गावच्या वेळिप समाजातल्या तरुण कार्यकर्त्यावर तर चक्क भर मडगावात गुंडानी हल्ला केला होता;कसाबसा बचावला. मृच्छकटिकातल्या जुलमी राजाला आव्हान देणाऱ्या तरुण गवळ्यासारखे,मुळशीच्या धरणाविरुद्ध टाटांना आव्हान देणाऱ्या सेनापती बापटांसारखे हे धडाडीचे कार्यकर्ते एक वेगळीच धुरा उचलून,बलदंडांना, सत्ताधीशांना त्यांच्या अन्याय्य वर्तणुकीबद्दल आव्हान देऊन,आपण कसे सामर्थ्यवान आहोत हे सिद्ध करतात व समाजात एक वेगळेच स्थान प्राप्त करून घेतात. मर्ढेकर म्हणतात असे दिसते की स्वार्थ,शोषण हाच जगाचा स्थायीभाव आहे.हेच शाश्वत आहे.


मग दुर्बलांवरचा अन्याय,निसर्गावरचे अत्याचार कधी आटोक्यात येतील का? पण मर्ढेकरांचा आशावाद दुर्दम्य आहे :अखेर घेता टक्कर जरि मग - युगायुगांचे फुटेल भाल - अशाश्वताच्या समशेरीवर शाश्वताचिही तुटेल ढाल । मर्ढेकर सांगतात,धीर धरा.मानवापाशी जी तकलादू वाटणारी सद्भावनेची तलवार आहे,ती एक दिवस भरभक्कम भासणाऱ्या दुष्टप्रवृत्तींच्या ढालीला भेदेल आणि मानवसमाज एक अर्थपूर्ण,माणुसकीचे, निसर्गाशी समरस जीवन जगायला शिकेल! मानवी समाज यथावकाश आजच्या हिंसक अर्थव्यवस्थेकडून एक सहयोगी अर्थव्यवस्थेकडे प्रगती करू शकेल.


हिंसेपासून सहयोगाकडे


आजही जगात अशी अमेरिकेहून वेगळी,अहिंसक, सहयोगी दिशा चोखाळणारे नॉर्वे,स्वीडनसारखे देश आहेत.त्यांचा अनुभव दाखवतो की सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी विषमता पोसणे आवश्यक तर नाहीच, पण हानिकारक आहे.इथे शासन लोककल्याणकारी कार्यक्रमांवर खर्च करते,आणि त्यातून त्यांच्या अर्थव्यवस्थेला बळच मिळत आहे.ह्या देशांत सरकार कमी खर्च करत असूनही जास्त चांगली आरोग्यसेवा उपलब्ध आहे.समाजात मोठ्या प्रमाणात सामंजस्य नांदते आहे.अर्थात आपला देश आज ह्यांच्याहून वेगळ्या परिस्थितीत आहे.पण आपल्याकडे काय दिशा सुयोग्य आहे ह्याचे स्वातंत्र्याच्या उषःकालीच महात्मा गांधींचे अर्थतज्ज्ञ सहकारी जे सी कुमारप्पा ह्यांनी केले होते.त्यांचा गांधींसारखा विज्ञान - तंत्रज्ञान यांत्रिकीकरणाला विरोध नव्हता.परंतु,ते म्हणाले की भारतात भांडवलही मुबलक नाही,आणि लोकसंख्येच्या मानाने नैसर्गिक संसाधनेही तुटपुंजी आहेत.तेव्हा आपल्या विकासाचा भर आपली मुबलक मानवी संसाधने काळजीपूर्वक वापरण्यावर असावा.ह्यासाठी ह्या लोकांना विकासनीतीचा केन्द्रबिंदू बनवावे.त्यांचा आधार असलेली स्थानिक नैसर्गिक संसाधने कार्यक्षमतेने वापरत त्यांना समाधानकारक रोजगार निर्माण करणारा आर्थिक विकास हाच खरा अहिंसक आर्थिक विकास ठरेल.त्या दिशेने स्वतंत्र भारतात काहीतरी नावीन्यपूर्ण करून दाखवावे.


देशाच्या विकासासाठी दोन सारख्याच महत्त्वाच्या विकास प्रक्रिया समांतर राबवल्या पाहिजेत.पहिली म्हणजे आधुनिक तंत्राधारित उत्पादनावर भर देणारी विकासप्रक्रिया.तांत्रिक विशेषतः

स्वयंचलनाच्या प्रगतीतून आधुनिक क्षेत्रात श्रमाची उत्पादकता सतत वाढणे अपरिहार्य आहे,आणि 'त्यातून रोजगार घटतीलच,

वाढणार नाहीत.तेव्हा उर्वरित बहुसंख्य भारतीयांसाठी अत्यावश्यक आहे दुसरी,निसर्गाधारित, श्रमप्रधान उत्पादनावर भर देणारी विकासप्रक्रिया.पण आज काय चालले आहे?केवळ तंत्राधारित उत्पादनाचा विचार करत,कायदे झुगारून देत,नैसर्गिक संसाधने नासवत,बेरोजगारी फुगवत,लोकशाहीला तुडवत, विज्ञानाचा अवमान करत एक एकांगी तंत्राधारित विकास प्रक्रिया राबवली जात आहे.मग लोकांचा असंतोष आवरण्यासाठी मनरेगा किंवा अन्नसुरक्षा कायदे करतो आहोत.हा खऱ्या खुऱ्या विकासाचा विपर्यास आहे.आपल्या जनतेकडे घटनेने बहाल केलेले सर्व अधिकार व्यवस्थित पोचवून,निसर्ग संपत्ती काळजीपूर्वक जोपासून,निसर्गाधारित,श्रमप्रधान उत्पादन भरभराटीस आणणे पूर्णपणे शक्य आहे.ह्यासाठीही आधुनिक विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा आधार घ्यावाच लागेल.पण ही पाश्चात्त्य विज्ञानाची नक्कल नसेल,त्यासाठी आपल्यालाच मनापासून झटायला हवे, लोकांसोबत काम करायला हवे.विज्ञानाची कास धरून, निसर्गाच्या कलाने व लोकांच्या साथीनेच भारताचा सर्वंकष विकास होऊ शकेल.अशा संतुलित विकासप्रक्रियेतूनच समाजात जो जे वांछील तो ते लाहो,असे सुख-शांतिप्रद वातावरण नांदू लागेल.


हे कसे होऊ शकेल ? ह्यासाठी सरकारवर,सरकारी कृपाछत्राखाली संतुष्ट असणाऱ्या तज्ज्ञांवर व त्यांच्या संशोधनावर भिस्त ठेवून चालणार नाही.लोकांनीच पुढाकार घेऊन आपल्या समाजाला,

अर्थव्यवस्थेला, शासनाला,विज्ञानालाही रुळावर आणले पाहिजे.

आपण स्फूर्ती घेतली पाहिजे गडचिरोलीतल्या मेंढा (लेखा) सारख्या गोंड गावाकडून.इथे शिरल्या- शिरल्या दिसतो एक फलक : दिल्ली - मुंबईत आमचे सरकार,आमच्या गावात आम्हीच सरकार ! मेंढावासी अराजकवादी बिलकूल नाहीत,नक्षलवाद्यांप्रमाणे सरकार तोडले पाहिजे असे म्हणत नाहीत.उलट म्हणतात,आम्ही सारे भारताच्या शासनाचे घटक आहोत.


कस्तुरीच्या एका कणालाही जसा साऱ्या कस्तुरीचा परिमळ असतो,तसेच आम्हीही भारताचे शासक आहोत.अनेकदा शासकीय यंत्रणा सचोटीने काम करत नाही,तेव्हा आमची सर्वांचीच जबाबदारी आहे देशात सर्वंकष सुधारणा आणण्याची.केवळ आर्थिक नाही. आपण राजकीय,शासकीय,सामाजिक,वैज्ञानिक सुधारणांसाठी झटायला पाहिजे.भारतात लोकांपर्यंत सत्ता पोचवणारे पंचायत राज,आदिवासी स्वशासन,जैवविविधता,माहिती हक्क,वनाधिकार असे अनेक चांगले कायदे आहेत.ह्यांची योग्य तऱ्हेने अंमलबजावणी होत नाही म्हणून हताश होऊन हात चोळत बसण्यात अर्थ नाही.संघर्ष करू या.पण ते अंतिम उद्दिष्ट नाही. मनापासून रचनात्मक कामासाठीही झटत राहू या.


आपल्या देशात आपले कायदे जमिनीवर उतरलेच पाहिजेत म्हणून लढत मेंढावासीयांनी वनाधिकार कायदा पुऱ्या गडचिरोली जिल्ह्यात लागू करवला आहे. शेकडो गावांचे सामूहिक वनसंपत्तीवरचे अधिकार मान्य झाले आहेत.ह्या संसाधनांचा शाश्वत वापर करत आर्थिक लाभकरून घ्यायचा,आणि जोडीने निसर्गाला अधिकाधिक समृद्ध करायचे मोठे आव्हान ह्या गावांपुढे आहे.ह्या संदर्भात एक परिसरशास्त्रज्ञ म्हणून गेली दोन वर्षे मेंढाच्या ग्रामवासीयांबरोबर व बायफ ह्या सेवाभावी संस्थेच्या व इतर अनेक मित्रांच्या मदतीने मी राबतो आहे.तिथल्या परिस्थितीला अनुरूप अशी मृद् व जलसंधारणाची,वनराजी जोपासण्याची तंत्रे विकसित करायची,जमिनीवर उतरवायची,व वनोपजाच्या मूल्यवर्धनाची,विक्रीची नीट व्यवस्था लावायची,असे अनेक उपक्रम जोरात चालू आहेत.


असे परिसरानुरूप विज्ञान हे प्रयोगशाळेत बीटी कॉटन निर्माण करण्याइतकेच कष्टाचे,तितकेच समाधान देणारे विज्ञान आहे.पण बीटी कॉटन रोजगार नष्ट करेल,तर मेंढाचे संशोधन निसर्गाला पोसत पोसत रोजगार निर्माण करेल. शिवाय एक निसर्गप्रेमी म्हणून मी खास उत्साहात आहे, कारण मेंढा ग्रामसभेने सामूहिक वनसंपत्ती क्षेत्रातल्या दहा टक्के क्षेत्रास देवरायांसारखे पूर्ण संरक्षण देण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.

२८/५/२५

पुराणकथा का स्वानुभव ? Why is mythology a self-experience?

मदी-मोरुई : पहिले मानव स्वर्गातच रहायचे.निळ्या पक्ष्याने पृथ्वी आणि स्वर्ग जोडणारी शिडी तोडून टाकीपर्यंत स्वर्गातून पृथ्वीवर आणि पृथ्वीवरून बराच प्रवास चाले.


अशांती : देवाने निर्माण केलेली सात माणसे दोरखंडाने पृथ्वीवर उतरली.इथे मानवांचा जन्म झाल्यावर ती स्वर्गाला परत गेली.


झुलू : झुलू या शब्दाचा अर्थच मुळी स्वर्ग.सर्व झुलू लोक,त्यांचे प्राचीन वंशज थेट स्वर्गातून उतरले म्हणून सांगतात.त्यांच्या देशाला ते 'स्वर्गीय मानवांचा देश' असेच म्हणतात.


मसाई म्हणतात,स्वर्गात प्राणीही होते.सूर्य,चंद्र व तारे यांची निर्मिती करणाऱ्या देवाने पृथ्वीवर वनस्पती जीवन निर्माण केले आणि मगच त्या प्राण्यांना पृथ्वीवर आणले.


टांझानियातील झिबा जमातीचा मूळ देव 'रुगाबा.' त्यांनी त्याची कधी पूजा केली नाही किंवा त्याला बळी वगैरे दिले नाहीत;कारण त्यांना माहीत होते की रुगाबा 'फार दूर-अनंत विश्वात' राहतो.अंतराळात अंधारच असतो.रुगाबाने पहिला माणूस 'अंधार नाहीसा झाल्यावर' (आपल्या पृथ्वी या ग्रहावर पोहोचल्यावरच) निर्माण केला.


स्वर्ग म्हणजे अमरत्व,स्वर्ग म्हणजे सुखाचे आगर असे आपल्या 'मागासलेल्या' पूर्वजांना वाटत होते;असे आजचे विद्वान लोक सांगतात.खोटे आहे ते! स्वर्गातही माणसे मरत असत असे किलिमांजारो येथील जग्गा जमात सांगते.जन्म-मरणाचा फेरा स्वर्गातही चुकत नव्हताच.सत्य आहे.स्वर्ग काल्पनिक नव्हताच मुळी ते होते अंतराळ यांत्रिकांचे निवासस्थान.ते कसे अमर असतील ?


पृथ्वी प्रथम कशी होती? विश्वाची निर्मिती झाली कशी?


झांबियामधील वेम्बा या निग्रो जमातीची आख्यायिका सांगते की त्यांचा देव 'मुकुला' हा स्वर्गात रहायचा. प्रथम त्याने तारे,मग सूर्य आणि चंद्र निर्माण केले.मग प्रकाश निर्माण करून त्याने पृथ्वी निर्माण केली, तिच्यावर प्राणी निर्माण केले.वनस्पतींचे बी पेरले आणि प्राणी आणले.मग त्याने कियोम्बे आणि दोन स्त्रियांना पृथ्वीवर पाठवले. त्यानेअग्नी निर्माण करणारी वस्तू आणली होती.त्याने प्रथम निरनिराळ्या वस्तुंना नावे ठेवली आणि त्यांचा वापर शिकवला.


बुशोंगो त्यांची निर्मिती कशी झाली म्हणतात ?


पहिल्या प्रथम पृथ्वीवर सर्वत्र अंधार होता आणि पाणी. मग बुम्बा हा धिप्पाड आणि गोरा माणूस आला.त्याचे एक दिवस इतके पोट दुखायला लागले की तो ओकायलाच लागला.प्रथम त्याच्या पोटातून बाहेर पडले ते तारे,सूर्य आणि चंद्र ! सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होऊन सागर निर्माण झाले,किनारे निर्माण झाले. मग तो झाडाचे एक रोपच ओकला आणि त्यातून वनस्पती जीवन निर्माण झाले.मग त्याच्या तोंडातून प्राणिमात्र पडले व शेवटी मानव,औषधे,आयुधे आणि अग्नी! त्याने एका माणसाची पृथ्वीवरील देव, पृथ्वीवरील राजा म्हणून नेमणूक केली व तो उडून अंतराळात नाहीसा झाला.


बुम्बाची जग निर्मितीची घाणेरडी तऱ्हा सोडली तर जग निर्मितीबद्दलचे त्याचे ज्ञान आश्चर्याने थक्क करणारे नाही? प्रथम काहीच नाही.मग वाळवंट,चिखल,पाऊस, सूर्याची उष्णता,

जमीन,वनस्पती,प्राणी,माणूस,औषधे, आयुधे,अग्नी हा क्रम कोणत्याही जमातींच्या आख्यायिका चुकवत नाहीत.


मसाईंच्या आख्यायिका विचार करायला लावतात. त्यांच्या 'गोऱ्या' देवाने प्रथम माईतुम्बे हा पहिला माणूस निर्माण केला. स्वर्गातच ! पृथ्वीवर त्याच्या खाण्या-पिण्याची सोय झाल्यावर त्याने त्याला पृथ्वीवर पाठवले आणि तो आफ्रिकेतील 'नोहा' च बनला. जगाचा निर्माता स्त्री नव्हतीच.तेव्हा त्याने स्वतःपासून सात पुरूष निर्माण केले;कारण माईतुम्बे एकाच वेळी स्त्री होता आणि पुरूषही.


आपले पूर्वज कसेही असोत.आपला पहिला मानव एकाच वेळी स्त्री आणि पुरूष होता हे जगातल्या सर्व आख्यायिका कशा सांगतात? ही गोष्ट विचार करण्यासारखी नाही ?


आपले पूर्वज मागासलेले असतील पण मूर्ख नक्कीच नव्हते.एकाच शरीरातून स्त्री-पुरूष निर्माण होतात ही कथा मानवाची निर्मिती कृत्रिमपणे केली होती असे नाही दर्शवत ?


न्होंगा अमो जमातीत एक कथा आहे.चंद्र आणि सूर्य एकदा जेवायला बसले.स्वयंपाक बिघडला होता.सूर्य इतका रागावला की त्याने चंद्राचा चेहराच जाळून टाकला.तेव्हापासून चंद्रावर खड्डे पडले.साधीच गोष्ट; पण चंद्राच्या पृष्ठभागावर खड्डे आहेत याचे ज्ञान हजारो वर्षे चालत आले आहे हेच नाही का सिद्ध होत?


माणसाचे आयुष्य एकदा का ठराविक साच्याचे बनले की त्याच त्याच गोष्टींचे त्याचे कौतुक नाहीसे होते. मेंढपाळ दररोज सूर्योदय पाहतो.त्याची नवलाई त्याला नाही.ती असते शहरात राहणाऱ्या माणसाला.चंद्रावर प्रथम माणसाने पाऊल टाकले तेव्हा श्वास रोखून सर्व जग त्या प्रसंगावर नजर ठेवून होते;पण हीच गोष्ट पुनःपुन्हा घडायला लागल्यावर त्यातले नाविन्यच नाहीसे झाले.टीव्हीवर सुद्धा बातमीत फक्त एकच ओळ वाचायला सुरुवात झाली.


आफ्रिकन आख्यायिकांकडे आधुनिक नजरेने पाहिले तर त्यातल्या किती तरी रिकाम्या जागा भरतील.


 आख्यायिका तरी कशी जन्म घेते ?


कल्पना करा की १५००० वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात एक अंतराळवीर उतरला.रानटी मागासलेले पूर्वज भीतीने घाबरून त्यांच्या गुहेत पळून गेले.हळुहळू दररोज त्याला पाहून त्यांच्यातली भीती नाहीशी झाली.त्यांच्यात विश्वास निर्माण झाला.हा परका माणूस त्यांना इजा करू इच्छित नाही,याबद्दल तरी त्यांची खात्री पटली.ते काय म्हणत होते यापेक्षा तो त्यांना स्वतःबद्दल जे सांगायचा प्रयत्न करीत होता हे त्यांना कळू शकत नव्हते हे महत्त्वाचे.


त्यांना ज्या थोड्या फार खाणाखुणा कळत असतात त्यात 'मी देव नाही' असे दर्शवणारे चिन्हच नाही.तो कसे समजवणार त्यांना? त्या रानटी लोकांनी त्याला आकाशातून उतरलेले पाहिलेले असते.तिथे देवच असतात.तो त्यांच्या दृष्टीने देवच राहतो.


त्यांची भाषा येत नसल्याने तो स्वतःशीच बडबडत असतो,'अरे बाबांनो! मी देव नाही.मी तुमच्यासारखाच रक्तामांसाचा माणूस आहे.हात लावून पहा मला.वर आकाशात पहा.तुमच्यासारखाच आकाशात एक ग्रह तिकडे आहे.ते माझे घर.मी उतरताना झालेल्या चकचकाटाने घाबरू नका.मला उतरण्यासाठी जागा शोधताना सर्चलाईटस् वापरावे लागल्याने तो प्रखर प्रकाश पडला होता.हा पहा जनरेटर.या केबल्स.'


यातले काहीही त्यांना कळत नव्हते.कळले असते तरी त्यांनी तो देव नाही हे मान्य केले असते की नाही शंकाच आहे.त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी त्याला आकाशातून उतरताना पाहिलेले असते.ही दैवी शक्तीच की! फक्त देवांकडेच ती असते.काही काळाने तो अंतराळवीर आपल्या 'घरी' निघूनही जातो.


त्या काळात घडलेला अघटित असा प्रकार होता तो.हा अनुभव इतरांना कसा समजावणार? देव एका दैदिप्यमान मागे अग्नी सोडणाऱ्या वाहनातून उतरला होता.दैदिप्यमान म्हणजे कसे? सूर्य सर्वांना माहिती आहे.प्रखर,उष्ण गोळा.मग असेच सांगू या.आकाशातून 'काही तरी' उतरले.सूर्याहून प्रखर,प्रकाशमान, स्वतःभोवती फिरणारे.ते 'काही तरी' जबरदस्त आवाज करीत होते.मेघगर्जनेसारखा! मेघगर्जना सर्वांना कळते ना! ढगातून आलेले 'ते' वाहनासारखे वाटत होते पण वाहने तर जमिनीवर फिरतात.हे वाहन तर उडत होते. सर्वांनी पाहिले होते.कसे समजावणार? पण पक्षी तर उडतात ना? बरोबर,असेच सांगायला पाहिजे.अत्यंत प्रकाशमान वस्तू उतरली.स्वतःभोवती फिरणारी.


सूर्याहून चमकदार,अग्निने वेढलेली आणि पक्ष्याप्रमाणे उडणारी.तशी ती धोकादायकच वस्तु होती पण धोकादायक म्हणजे कशी? जमिनीवर सरपटणाऱ्या सर्याएव्हढी.त्याची सर्वांनाच भीती वाटते आणि ती वस्तूही पूर्ण गोलाकृती नव्हती.

अंड्यासारखी वाटत होती.त्यातून उतरलेल्या देवाने झगझगीत कपडे घातले होते.काही प्राण्यांची शरीरे चमकतात तसे.बरोबर, देवाने घातलेले कपडे चमकणाऱ्या चांदीच्या कातड्यासारखे होते.अशा त-हेने रचली जात जात ती कथा जन्म घेते आणि तरीही तिचा अर्थ आज आपण समजू शकतो. हजारो वर्षांपूर्वीच्या कुठल्या अप्रतिम दृश्याचे वर्णन चालले आहे ते आपण गेल्या ३५-४० वर्षांत जाणून आहोत.


आख्यायिका ? अजूनही आख्यायिकाच? ही तर सत्यकथा आहे.स्वानुभव आहे.


निनेव्ह येथे उजेडात आलेल्या मृत्तिकापत्रात आणखी एक महाकाव्य आहे.एटना! गिलगामेशच्या महाकाव्यात याचा थोडा भाग समाविष्ट आहे पण या महाकाव्याचा उगम तर मानवी इतिहासाच्या आरंभापासून वाटतो. ५००० वर्षांपूर्वीच्या सिलेंडर सीलवर एटनाचे चित्र आहे. ही काय आख्यायिका आहे?


एटना समासदेवाला विनंती करतो की त्याला अमरत्वाची औषधी वनस्पती द्यावी म्हणून.देव त्याला गरुडाकडे पाठवतो.गरूड त्याला विचारतो तुझी काय इच्छा आहे म्हणून.एटना म्हणतो,मला अमरत्वाची औषधी वनस्पती हवी म्हणून.गरूड त्याला घेऊन स्थिर ताऱ्यांच्या दिशेने अंतराळात उड्डाण करतो.या उड्डाणात सहा वेळा गरूड एटनाचे लक्ष नाहीशा होणाऱ्या पृथ्वीकडे वळवतो.थोडा वेळ झाल्यावर गरूड म्हणतो,'मित्रा,बघ! जमीन कशी वेगळी दिसते आहे.समुद्र बघ,पर्वत बघ;जमीन आता टेकडीसारखी आणि समुद्र कालव्यासारखा दिसत आहे.'थोड्या वेळाने गरूड पुन्हा म्हणतो, 'मित्रा बघ ! जमीन कशी वेगळी दिसते आहे.आता ती जंगलासारखी वाटत आहे.'थोड्या वेळाने जमीन एखाद्या झोपडी एव्हढी तर समुद्र अंगणासारखाच दिसायला लागला.आणि उंच उंच गेल्यावर गरूड एटनाचे लक्ष पृथ्वीकडे वळवतो.शेवटी म्हणतो.'बघ! आता जमीन दिसेनाशीच झाली आहे.'


एटना ते बघतो आणि म्हणतो,'जमीन कशी दिसेनाशी झाली ते मी पाहिले,आता तर समुद्रही दिसेनासा झाला आहे;माझी स्वर्गात जायची इच्छा नष्ट झाली आहे.तू मला परत पृथ्वीवर घेऊन जा.'


'गरूड उतरला आहे!' चंद्रावर उतरल्यावर ह्यूस्टन इथे आपल्या अंतराळ यात्रिकांकडून ऐकू आलेले पहिले शब्द ! आता इतिहासात नोंद केले गेलेले !


एटनाचा प्रवासही तितकाच सत्य आहे.स्पष्ट आहे.

जग निर्मितीबद्दलसुद्धा या मृत्तिकापत्रांमध्ये लिहिले आहे.प्रथम अंतराळालाही काही नाव नव्हते.आणि खालच्या पृथ्वीलाही.प्रथम फक्त सागर होता.आणि त्याच्या लाटांचा गंभीर आवाज.त्यावेळी शेते नव्हती, कुठल्या जमाती नव्हत्या.एकही देव अस्तित्वात नव्हता. कुणालाच नावे नव्हती.कुणाचेच भविष्य ठरत नव्हते. मग देवाची निर्मिती झाली.लुहुमु आणि लहामु जन्माला आले.आणि अनंत काळ निघून जातच होता.


आख्यायिका ? की सत्यकथा?


गेल्या महायुद्धात जपानचा पराभव केल्यावर अमेरिकेने पहिली कोणती गोष्ट केली असेल तर शिंटो या त्यांच्या धर्मावर बंदी घातली.जपानचा सम्राट हाच या धर्माचा अधिपती.पृथ्वीचा अधिपती आणि देवांचा राजा हा एकच ! जपानी सम्राट ! ही रूढी मोडणे अमेरिकेला भागच पडले नाही तर देव म्हणून जपानी लोक ज्याची पूजा करीत होते,त्या सम्राटाला कोणत्याही आज्ञा अमेरिकन देऊ शकले नसते.तेव्हा प्रथम त्यांनी जपानी सम्राटाला त्याच्या देवपदावरून भ्रष्ट केले.


या धर्मात महत्त्वाची तीन पुस्तके.कोयिको,कोऊयिकी आणि निहोंगी! तसे हे धर्मग्रंथ प्रथम आठव्या शतकात लिहिले गेले असले तरी त्यांचा उगम वादातीतपणे अत्यंत जुन्या अशा आख्यायिकात आहे.पुनःपुन्हा तीच गोष्ट लिहायचे,टाळायचे म्हटले तर सांगता येईल की, इतर सर्व धर्मग्रंथांप्रमाणेच विश्वाची,

विश्वनिर्मितीची, अंतराळयानांची माहिती निहोंगी या धर्मग्रंथात व्यवस्थित दिली आहे.इतर धर्मग्रंथांचा अर्थ लावताना जी अडचण येते ती यांच्या बाबतीतही येते.


१९१२ मध्ये आल्फ्रेड वेगनर याने पृथ्वीवरील खंडे कशी तयार झाली याबाबत मांडलेला सिद्धांत सागरतळाचे संशोधन केल्यावर खरा ठरला आहे.पॅसिफिक महासागरात प्रथम प्रचंड भू-भाग होता.पुरातन काळात एकदा त्याचे तुकडे उडले आणि आपल्या जागेवरून ढळले.वेगवेगळे होत त्यातून तयार झाली अमेरिका, आफ्रिका खंडे.


शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखामध्ये…



२६/५/२५

पुराणकथा का स्वानुभव ? Why is mythology a self-experience?

पश्चिम आफ्रिकेतील 'माली' या देशात डोगॉन या जमातीचे वास्तव्य आहे.ज्याचा काळ ठरविणेही अवघड अशा जुन्या काळातील त्यांच्या पौराणिक कथा व्याध सीरिअस-अ (Sirius- A) या ताऱ्याची आणि त्याच्या 'न दिसू शकणाऱ्या' अशा जोडताऱ्याची माहिती कशी देतात हे कोडे मात्र उलगडत नाही.त्या जोडताऱ्याला ते म्हणतात 'डिजिटारिया.'


डोगॉनच्या पुराणकथा सांगतात की डिजिटारिया हा आपल्याला दिसत नसलेला 'उपग्रह' व्याधाभोवती ५० वर्षांत एकदा फिरतो.तो एक अत्यंत जड तारा आहे आणि व्याधाभोवती फिरताना तो व्याधाच्या कक्षेवरही परिणाम करतो.त्यांना 'अदृश्य' अशा या ताऱ्याची माहिती,त्याची कक्षा,त्याची घनता,त्याचा भ्रमणकाळ या सर्व गोष्टींची माहिती कशी होती?


दंतकथा,पुराणकथा का स्वानुभव ? देव ? छे ! परग्रहावरील अंतराळवीर,बाळ भागवत,मेहता पब्लिशिंग हाऊस


व्याध आणि त्याचा उपग्रह यांची माहिती आपल्याला गेल्याच शतकात झाली आहे.सूर्य सोडला तर व्याध हा आपल्याला सर्वात जवळ असलेला तारा.रंगाने पांढरा, आपल्यापासून ८ (१/२) प्रकाशवर्षे दूर आणि दक्षिण गोलार्धातील अत्यंत तेजस्वी असा हा तारा आहे.त्याचा उपग्रह व्याध-ब (Sirius-B) १८४४ मध्ये विल्यम फ्रेडिक बेसेल याने 'शोधून' काढला तरी दुर्बिणीची भिंगे तयार करणाऱ्या अमेरिकन यंत्रज्ञ अल्वन क्लार्क याने तो खरोखरच प्रथम 'बघेपर्यंत' १८६२ साल उजाडावे लागले."


व्याध हा सर्वसामान्य तारा आहे तर व्याध-ब हा एक पांढरा ठिपकाच (White Dwarf) म्हणावा लागेल. त्याची घनता मात्र खूप जास्त आहे.


१८३४ मध्येच बेसेलच्या लक्षात आले की व्याधाची गती सरळ रेषेत नसून ती पाण्यातल्या तरंगांप्रमाणे वक्र असावी.मृग नक्षत्रात आपण व्याधाने मारलेला बाण पाहतो.मग नेहमी बाणाच्या सरळ रेषेत व्याध दिसायला हवा.तो तसा दिसत नाही.कधी तो बाणाच्या वरच्या बाजूला दिसतो तर कधी खालच्या बाजूला.बेसेल व त्याचे साथीदार यांनी ठराविक कालाने व्याधाच्या गतीची नोंद घ्यायला सुरुवात केल्यावर तर त्यांचा संशय दृढ झाला.याचा अर्थ व्याधाच्या गतीवर दुसरा कुठला तरी तारा परिणाम करीत होता;पण तो दिसत मात्र नव्हता.या अदृश्य ताऱ्यालाच त्याने नाव दिले 'व्याध-ब'. त्याकाळच्या अत्यंत चांगल्या दुर्बिणीतूनही तो दिसू शकत नव्हता.तेव्हा तो 'अप्रकाशित' असावा असा निष्कर्ष खगोलशास्त्रज्ञांनी काढला.


पण त्यावेळी अल्वन क्लार्क याने दुर्बिणी बनवण्यात नाव कमवायला सुरुवात केली होती.१८६२ मध्ये त्याने बनविलेल्या ४७ सेंटिमीटर व्यासाच्या दुर्बिणीतून बेसेल याने सांगितलेल्या ठिकाणीच क्लार्क याला 'व्याध-ब' सापडला,दिसला.तो अप्रकाशित नव्हता,व्याधाच्या सावलीत नव्हता,पण तेजस्वी व्याधाच्या सान्निध्यात तो पाहताच येत नव्हता;त्याची तेजस्विता लुप्त होत होती.मध्यंतरीच्या काळात 'व्याध-ब' ची 'पांढरा ठिपका' अशी नोंद झाली होती.अशा ताऱ्यांची घनता पुष्कळच असते; पण तेजस्विता कमी असते.व्याधाशी तुलना करता व्याध-ब ची घनता ०.४२:२७००० या प्रमाणात आहे. व्याध पहिल्या प्रतीचा तेजस्वी तारा आहे तर व्याध-ब नवव्या प्रतीचा तेजस्वी तारा आहे. (तिसऱ्या,चौथ्या प्रतीच्या पलिकडील तारे नुसत्या डोळ्यांनी पाहणेही तसे अशक्यच.) 


व्याध-ब चा व्यास ४१००० किलोमीटर आहे पण त्याचे वस्तुमान (Mass) मात्र सूर्याएवढे आहे.उगीच नाही व्याधाच्या भ्रमणकक्षेवर तो इतका जबर परिणाम करीत असतो.


सूर्य परिमाणांप्रमाणे…!


व्याध-अ (Sirius-A) - ( व्याध-ब (Sirius-B) )


वस्तुमान - २.४ -  ( ०.९६ )


त्रिज्या - १.८ -  ( ०.०३४ )


घनता - ०.४२ -  ( २७००० )


व्याधाबद्दलचे आजचे आपले ज्ञान आणि पुराणकाळापासून डोगॉन जमातीला असलेले ज्ञान यांची तुलना केली तर काय दिसेल?


प्रचलित ज्ञान


व्याध-ब हा व्याधाच्या कक्षेवर परिणाम करतो हे गेल्या शतकात प्रथम लक्षात आले.


व्याध-ब दिसू शकत नव्हता.अद्ययावत दुर्बिणींच्या सहाय्याने सततच्या संशोधनाने तो शोधता आला आणि त्याची कक्षा ठरवता आली.


व्याध-ब हा अगदी छोटा तारा आहे.


व्याध-ब कक्षेतून फिरण्याला ५०.४ ± ०.०९ वर्षे लागतात.


व्याध-ब ची घनता प्रचंड आहे.



डोगॉनचे ज्ञान


डिजिटारिया हा व्याधाच्या कक्षेतील एक बिंदू आहे. डिजिटारिया डोगॉन लोकांनी कधी पाहिलेलाच नाही.


डिजिटारियाच्या अस्तित्वाबद्दल डोगॉनना कधीच शंका नव्हती.तो अदृश्य आहे हे माहीत असूनही !


डिजिटारिया फारच लहान आहे त्याच्या निर्मितीत त्याने आपल्या जवळचे सर्व देऊन टाकले.


डिजिटारियाच्या भ्रमणाला साधारणतः ५० वर्षे लागतात.


डिजिटारिया हा सर्वांत जड तारा आहे.तो व्याधाची कक्षा ठरवितो व स्वतःच्या कक्षेप्रमाणे त्याच्याभोवती फिरतो.


रॉबर्ट टेम्पल हा भाषाशास्त्रज्ञ असला तरी रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचाही सदस्य आहे.त्याने डोगॉनच्या पुराणकथांप्रमाणे आणि आजच्या खगोलशास्त्रातील ज्ञानाप्रमाणे व्याध-ब च्या भ्रमणकक्षा काढल्या व निष्कर्ष काढला की अगदी बारीकसारीक बारकाव्यांसह या दोन्ही आकृत्यात इतके साम्य आहे की शास्त्रज्ञांना फूटपट्टी घेऊन मोजमाप करण्याची काहीही आवश्यकता नाही.ही वस्तुस्थिती स्वयंसिद्ध आहे. अद्ययावत ज्ञानाची पुराणकथांशी ही सांगड कशी बसली?


डोगॉनच्या आख्यायिका सांगतात की डिजिटारियाला स्वतःभोवती फिरण्याला एक वर्ष लागते.ते पृथ्वीवरील वर्षाबद्दल बोलत आहेत की डिजिटारियाच्या वर्षाबद्दल हे कळत नाही;पण तरीही आकाशस्थ ताऱ्यांचे स्वतःभोवतीचे भ्रमण डोगॉन जमातीला पुराणकाळापासून ज्ञात आहे हे कसे काय? आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे आपल्याला तसे हल्लीच कळायला लागले आहे.तरी विश्वाच्या या मूळ गतीची कल्पना आफ्रिकेतील 'रानटी' जमातीला हजारो वर्षे असावी हे आश्चर्य नाही का?


खरे सांगायचे म्हणजे आज आपल्याला माहीत नाही अशा आणखी काही गोष्टींचे ज्ञानही डोगॉनना हजारो वर्षे आहे.कदाचित आपले खगोलशास्त्रज्ञ या गोष्टी भविष्यकाळात शोधून काढतीलही.


डोगॉनच्या पुराणांप्रमाणे तेजस्वी व्याधाचा व्याध-ब हा एकच उपग्रह नाही.व्याध-ब पेक्षा मोठा पण वजनाने त्याच्या (१/४) वजनाच्या 'एमी या' या आणखी एका दुसऱ्या उपग्रहाबद्दलही ते बोलतात.त्याची भ्रमणकक्षा व्याध-ब पेक्षा मोठी असून तो व्याध-ब च्या दिशेने ५० वर्षांत एक प्रदक्षिणा करतो आणि शिवाय 'एमी या' ला स्वतःचा एक उपग्रह आहे.व्याधाला शूमेकर (Shoemaker) असा तिसराही एक उपग्रह आहे. व्याधापासून सर्वांत लांबचा उपग्रह आणि तो उलट्या दिशेने फिरतो.


'एमी या' किंवा 'शूमेकर' यांची माहिती जमविण्याइतके ज्ञान आपल्याजवळ आज नाही.आपल्यापासून ८ (१/२) प्रकाशवर्षे दूर असलेल्या व्याधाचे उपग्रह लवकर शोधून काढू अशी आजची परिस्थिती नाही.


पण ज्या पौराणिक काळापासून डोगॉनच्या आख्यायिका चालत आल्या आहेत,त्या काळात तर 'अदृश्य' अशा या ताऱ्यांबद्दलचे ज्ञान कुणालाच नव्हते. मग डोगॉनना ही सर्व माहिती कशी झाली?कोणी दिली? याचा उलगडा कोण करणार?


डोगॉनच्या दंतकथा एक गोष्ट स्पष्ट करतात.हजारो वर्षे दंतकथा,आख्यायिका जे सांगत आहेत त्यात सत्याचा अंश नक्कीच आहे,त्या काल्पनिक नाहीत.त्यांचा उगम प्राचीन काळातल्या आपल्या पूर्वजांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या,

अनुभवलेल्या गोष्टीत आहे.या आख्यायिकांचा अर्थ अक्षरन्अक्षर किंवा शब्दन्शब्द जुळवून लावण्याचा प्रयत्न मात्र निरर्थक आहे.शब्दांचे अवडंबर झटकून टाकून त्यांचे एकूण सार शोधले पाहिजे.ज्यांनी हे वृत्तांत लिहिले त्यांना ते पाहत असलेल्या तंत्रविज्ञानाबद्दल काहीही माहिती नव्हती.त्यांच्या दररोजच्या आयुष्यातील संबंधित अशा गोष्टी सांगून पटतील अशा शब्दात,त्यांचे अनुभव सांगण्याच्या प्रयत्नात ते काही वेळा शब्दांच्या जंजाळात फसले आहेत हे खरे ! पण म्हणून ते वृत्तांत काही खोटे ठरत नाहीत.


पुराणकाळात उल्लेख केलेले 'देव' तरी होते कोण? कोणत्या परिस्थितीत ते पृथ्वीवर आले होते? ते काल्पनिक असतील तर लोक त्यांना बघू शकत होते, त्यांच्याशी बोलू शकत होते हे कसे काय? त्यांना तसे पृथ्वीवर येण्याचे कारणच काय होते?पण ते आले, बऱ्याचदा आनंदाने राहिले.का? त्यांनी त्यांची शक्ती दाखवली,त्यांचे ज्ञान,प्रगत विज्ञान या गोष्टी दाखवल्या. जमेल तेवढे ज्ञान दिलेही.ज्ञानदानाचे हे पुण्य त्यांना कशासाठी पदरात पाडून घ्यायचे होते?आणि ते नेहमी आपल्या ज्या घरी परत निघून गेले ते घर होते कुठे? परत येऊ असे वचन त्यांनी नेहमीच का दिले? सर्व जगभर खळबळ माजवली ते देव खरे होते का खोटे ?


सर्व पुराणकथात देवांचे आगमन,त्यांची वागणूक, विश्वाची निर्मिती,वनस्पती जीवन,प्राणी जीवन,मानव यांची निर्मिती यांची अचूक माहिती आहे.ती काय खोट्या काल्पनिक देवांनी दिली असेल ?


आफ्रिकेतील सर्व जमातींच्या कथा तपासल्या तर त्यात आश्चर्यकारक साम्य आढळून येते.


स्वर्गाचीच गोष्ट घ्या.आपल्या पूर्वजांची स्वर्गाबद्दलची कल्पना तरी काय होती?तो अनंत विश्वातील पोकळीत कुठे तरी होता.त्यावेळी अंतराळप्रवास नव्हता, टेलिस्कोप नव्हते.अब्जावधी ताऱ्यांनी भरलेले हे अज्ञात विश्व त्यांना संपूर्ण अज्ञात होते.तरीही आफ्रिकेतील वेगवेगळ्या धर्माच्या,चालीरितींच्या,संस्कृतींच्या सर्व जमातींच्या आख्यायिकांप्रमाणे स्वर्ग हा अगदी 'गजबजलेला' होता.त्यांचे मूळचे लाल,निळे,गोरे,काळे सर्व देव 'ढगावरील विश्वातून' आले होते.या गजबजलेल्या स्वर्गातून आलेल्या शक्तिमान देवांबद्दल आफ्रिकेतील निरनिराळ्या जमातींच्या आख्यायिका काय सांगतात ?


मसाई : स्वर्गीय जोडप्याने अमर अशा शक्तिमान देवपुत्रांची निर्मिती केली आणि त्यापैकी काही जणांना पृथ्वीवर पाठवले.तसे हे देवही भांडखोरच ! कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांचेही एकमत होत नसे.एका देवाने एखादी गोष्ट बनवली की दुसरे देव कित्येकदा ती मोडून-तोडून टाकीत असत.


शिल्लक भाग पुढील भागात प्रकाशित केले जातील.

२४/५/२५

हे कधीच सांगू नका,never say that

हा आजचा लेख ५०० वा त्यानिमित्ताने


" इतरांच्या अंतर्यामी खोलवर बघा आणि ऐका,फक्त कानांनी नाही,आपली हृदयं आणि कल्पनाशक्तीनं, आणि आपल्या मूक प्रेमानं " - जॉय कानेलाकोस


पुस्तकांसोबत जीवन जगत गेलो,आणि जीवन समजत गेले.मी जो आहे जसा आहे,तो फक्त पुस्तकांमुळे…


माझ्या आयुष्यात पुस्तकाचे येणे मी त्याला जवळ घेणे,आणि त्याने मला आयुष्यभरासाठी जवळ घेणे,माझ्यासाठी तर हे संपूर्ण आयुष्य हेच आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड


पुस्तकांना सोबत घेऊन आपल्या सर्वांसोबत करत असलेला हा प्रवास खरोखरच विलोभणीय आहे.त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद पुस्तक निर्मितीमध्ये असणाऱ्या सर्वांचे तसेच लेखक प्रकाशक त्यांचेही विशेष आभार…


५०० लेखांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल विजय गायकवाड यांना मनःपूर्वक शुभेच्छा!


परिस्थिती कितीही कठीण असली,तरी जो वाचन आणि लेखनाचा ध्यास ठेवतो,तोच खरा यशस्वी लेखक ठरतो. माझे प्रिय मित्र विजय गायकवाड,ज्यांनी मॅट्रिक फेल या टोपणनावाने आपला स्वतंत्र ठसा उमटवला,त्यांनी आज आपल्या ब्लॉगवर ५०० व्या लेखाचं गोलंदाज यश गाठलं आहे — हे खरंच अभिमानास्पद आहे. मराठी भाषेचा गंध जागतिक पातळीवर पोहोचवण्याचं कार्य त्यांनी नेटाने आणि सातत्याने केलं आहे.विविध देशांतील वाचकांना आपल्या विचारांनी जोडणं ही त्यांच्या लेखनशक्तीची मोठी ताकद आहे.विविध विषय, विविध दृष्टिकोन आणि वैविध्यपूर्ण शैली यांच्या साहाय्याने त्यांनी मराठी लेखनाला समृद्ध केलं आहे.


आज त्यांच्या ब्लॉगला ४५,००० च्या वर वाचकांनी भेट दिल्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठलेला आहे — हे केवळ आकड्यांचं नव्हे,तर विचारप्रवाहाच्या विस्ताराचं प्रतीक आहे.


विजय,तुमच्या लेखणीतून पुढेही असेच विचार उमटत राहो,समाजमनाला भिडणारे शब्द साकारणारे तुमचं हे कार्य अव्याहत सुरू राहो,हीच शुभेच्छा!


" जितकी मर्यादा तुटते शब्दांची,

तितकी दुनिया उघडते विचारांची,

५०० लेखांचा हीरा झळकतो,

तुमच्या लेखणीचीच ही मोठी सजवाट होती! "


पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन!


Dr.Deepak Shete (KOLHAPUR)


लेख असो वा वाचक ही केवळ एक संख्या आहे. ती निरंतर वाढत राहणारच.आणि साहेब वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या विचारांची माणसं एका माळेत गुंफली गेली ही अत्यंत मौलिक अशी बाब घडत आहे.सॅल्यूट 


दादासाहेब ताजणे,सेलू,परभणी.


कोविड काळामध्ये आमच्या शाळेतले शिक्षक माधव गव्हाणे सर यांनी मला फोन करून सांगितले की ,'आज रात्री आपल्या शाळेतील मुलांना कोल्हापूर येथून विजय गायकवाड नावाचे व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत,तुम्ही त्यात जॉईन व्हा.मी जेव्हा त्यात जॉईन झालो.तेव्हा एक बनियन परिधान केलेली व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या  पाठीमागे पत्राचे घर आणि एक लाईट दिसत होता.

मला वाटले काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे हे दृश्य दिसत आहे की काय ? परंतु जेव्हा कळाले की हेच 'विजय गायकवाड 'आहेत तेव्हा माझा भ्रमनिरास झाला.कारण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी व्यक्ती कोणी सुटा - बुटातील असेल असे मला वाटले . थोड्यावेळाने मी कार्यक्रमातून बाहेर पडलो.यानंतर मी हे सर्व विसरून गेलो .


काही महिन्यांनी गव्हाणे सरांनी मला सांगितले की , कोल्हापूरहून माझे फेसबुक फ्रेंड विजय सर येणार आहेत तेव्हा तुम्ही शाळेत या.नंतर त्यांचा छोटा कार्यक्रम झाला आणि आम्ही ऑफिसमध्ये बसलो . मी गायकवाड साहेबांना विचारले,


'तुम्ही एवढ्या लांबून तुमचे कुणी नातेवाईक नसताना ओळख नसताना आणि काही काम सुद्धा नसताना स्वतःचा पैसा आणि वेळ खर्च करून कशासाठी आलात ? ' तेव्हा त्यांचे एकच वाक्य असे होते की, 'मी तुम्हाला निरपेक्षपणे भेटायला आलो आहे.'


या एकाच वाक्याने माझी आणि 'विजय गायकवाड ' या नावाची मैत्री आणि आत्मीय संबंध तयार झाला. कुठलाही स्वार्थ नसताना कुठलेही काम नसताना केवळ फोनवर झालेल्या ओळखीमुळे एखादा माणूस एवढ्या लांबून भेटण्यासाठी येऊ शकतो ही गोष्ट एकदम वेगळी होती.तेव्हापासून आज पाच वर्षापेक्षा जास्त काळापर्यंत गायकवाड सर आणि मी फोनवर,प्रत्यक्ष भेटत आहोत.


ते जेव्हा एकदा आमच्या गावी व्याख्यानासाठी आले होते तेव्हा माझ्या घरी मुक्कामी राहिले तेव्हा त्यांच्या एकूणच कौटुंबिक आणि सर्व परिस्थितीची चर्चा झाली तेव्हा मला कळाले की सर नववीपर्यंत शिकलेले आहेत आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे.कारखान्यात कामावर आहे.

तरीसुद्धा पुस्तक वाचनाचे वेड आणि त्यातून मिळणारे ज्ञान आणि ते ज्ञान दुसऱ्यापर्यंत पोहचले पाहीजे याची तळमळ या सर्व गोष्टी बघून मला सरांबद्दल आदर आणि आदरभावच निर्माण झाला.


जेव्हा 'आदरणीय 'हा शब्द मी बऱ्याच वेळा वापरला आणि ऐकला होता परंतु आत्मीयतेतून आणि नैसर्गिक पणे अकृत्रिम पणे वापरलेला मी पाहीला नव्हता.आत्मीयतेनेच 'आदरणीय तात्या ' हा माझ्यासाठी गायकवाड सरांनी वापरलेला शब्द ऐकून मला माझ्याबद्दलच ' 'आदर' निर्माण होतो. 


फोनवर प्रथम बोलताना काय चालले ? असे मी विचारताच विजय गायकवाड म्हणतात,'आत्ता सध्या मी एका महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वाची बोलत आहे म्हणजे तुमच्याशी.तेव्हा मला माझाच 'गौरव ' झाल्यासारखे वाटते.नववी शिक्षण झालेला माणूस एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्ञानाचा सिंचन करू शकतो याचेच मला नवल वाटते.विजय गायकवाड हे पुस्तक वाचून सर्वात प्रथम मला फोनवर त्या  पुस्तकांबद्दल बोलतात तेव्हा मला माझा 'अभिमान ' वाटतो कारण त्या पुस्तकाबद्दल आणि त्या पुस्तकाविषयींच्या मताबद्दल जेव्हा ते समजावून सांगतात तेव्हा माझ्या ज्ञानात अधिक भर पडते . एकूणच सरांमुळे माझ्या वाचण्यात आणि विचार करण्यात आमुलाग्र बदल झालेला आहे.


माणूस म्हणून वाचलं पाहिजे आणि माणूस म्हणून जगलं पाहिजे या सरांनी सांगितलेल्या गोष्टी सतत ध्यानात येतात.


आतापर्यंत जवळपास ५०० ब्लॉग लिहिलेले आहेत,त्याला भेट दिलेल्या वाचकांची ४४,६७२ पेक्षा जास्त आहे.१३३ भाषांमध्ये हा ब्लॉग उपलब्ध आहे,सध्या जवळपास २० देशांमध्ये तो वाचला जातो,हे खरचं,खूपच अविश्वसनीय वाटते .कारण नववी शिकलेला माणूस हे लिहूच शकत नाही हे वाटते.लिहिण्यासारखं गायकवाड सरांबद्दल खूप आहे परंतु लिहिणं शक्य नाही .


तेव्हा लवकरच गायकवाड सर तुमचे ५ हजार लेख आणि १ लाख वाचक होणार यात तिळमात्र शंका नाही.आणि मी तुमचे त्यासाठी खूप मनापासून अभिनंदन करतो .


५ हजार व्या लेखाचे अभिनंदन करताना यापेक्षा 'मोठं '

 लिहीण्याचा सराव करीन .


लक्ष्मण विठ्ठलराव गाडेकर

रायपूर ता. सेलु जि .परभणी


गायकवाड सर नमस्कार मी आपला नियमित वाचत नाही परंतु जेव्हा वेळ भेटेल तेव्हा निश्चितच आपला ब्लॉग वाचत असतो खूपच सुंदर रचना केलेली असते आणि आपला ब्लॉग वाचत असताना आम्ही स्वतःला विसरतो वाचताना आम्हाला आनंद होतो असेच ब्लॉग आमच्यासाठी तयार ठेवत जा आम्हाला तेवढाच आपला वाचणाचा आनंद मिळत राहील. - सोपान मगर,सेलू,परभणी.


साहेब तुमचा ब्लॉग वाचताना असं वाटतं की लेखन हे केवळ शब्दांचे खेळ नसून,ते जीवनाच्या विविध पैलूंना भिडून जाणारी एक सजीव अनुभूती आहे. प्रत्येक लेखात अनुभवांची प्रामाणिकता,भावनांची गहिवर आणि विचारांची खोली दिसते.४९० हून अधिक लेख म्हणजे तुमची सातत्यपूर्ण मेहनत आणि वाचकांवरील प्रेम याचे उत्तम उदाहरण आहे. ५०० व्या लेखाच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.हे लेखनप्रवास असाच प्रेरणादायी ठरावा, हीच सदिच्छा..!! पार्थ गाडेकर,तंत्रज्ञ सहकारी,रायपुर


आदरणीय सर सप्रेम नमस्कार.विजय गायकवाड सरांच्या ब्लॉगचा मी नियमित वाचक आहे.त्यापासून मला नेहमीच प्रेरणा मिळत असते.सकाळी झोपेतून उठल्यानंतर जेव्हा मोबाईल हातामध्ये घेतो तेव्हा प्रथम मी आदरणीय गायकवाड साहेब यांचा ब्लॉग वाचतो.नंतरच पुढील कार्य करीत असतो.आदरणीय गायकवाड सरांचा ब्लॉग वाचल्यापासून माझ्या जीवनात अनेक असे आमुलाग्र बदल झालेले आहेत.त्यांचे लिखाण अत्यंत प्रभावी,दर्जेदार,

प्रेरणादायी असतात .त्यामध्ये सखोल वास्तव ज्ञान मिळते.ह्या ज्ञानाचा उपयोग मी माझ्या दैनंदिन जीवनात करीत असतो.असाच मला सरांच्या ब्लॉगच्या वाचनाचा नेहमी उपभोग मिळावा हीच अपेक्षा - राजेश कान्हेकर,सेलू


मा.विजय गायकवाड,


चार भिंतीतल्या शिक्षणापेक्षा,भिंतीबाहेरच्या शिक्षणावर जास्त प्रेम करणारा अवलीया : म्हणजे विजय गायकवाड.


वाचनाचे अफाट वेड त्यासाठी केलेली पदरमोड आणि हे चांगले वेड इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू केलेला विजय गायकवाड हा ब्लॉग त्याला मिळालेले जवळपास ४५००० वाचक आणि ५०० लेख... सगळेच अविश्वसनीय आणि अफाट.एका सामान्य माणसाकडून घडलेले हे असामान्य कार्य कौतुकास पात्र आहे.ब्लॉगमधील लिखाण वाचत रहावे आणि पुढील ब्लॉग लवकर वाचायला मिळावा,अशी इच्छा होणारा informativeअसतो.


आपला हा प्रयत्न सफल होवो.आम्हास ब्लॉगच्या माध्यमातून सकस वाचायला मिळो आणि आपले कार्य सुफळ संपूर्ण होवी. - खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा!


प्रा.सर्जेराव राऊत,शैक्षणिक विभाग प्रमुख, 

 चाटे शिक्षण समूह,कोल्हापूर विभाग


नावातच तुमच्या विजय आहे.विजयासारखे जिवन.वि - म्हणजे विचारांचे भांडार,ज - म्हणजे जनासाठी खुले करून.- म्हणजे यज्ञ अविरतपणे चालू ठेवनारे.विजय गायकवाड सर तुमच्या विचारांचा सहवास मिळने हे आमचं भाग्य आहे.


तात्यासाहेब बंधू रायपूर,परभणी


सत्कार्माची सोनेरी पाऊले..


श्रावणात गावोगावी ग्रंथवाचन केलं जातं.एकजण वाचतात आणि उपस्थित ते ऐकत राहतात. संत-माहात्म्यांचे विचारधन अनमोल असा ठेवा असतो.प्रथम ओवी वाचली जाते आणि तिचे मतितार्थ सविस्तरपणे सांगितला जातो.इथं हे उदाहरण द्यायचं कारणं असं की,आधुनिक जगात वावरताना एक वाचक आपण जे वाचतो,त्यातील समाजाला पोषक असलेली माहिती म्हणजेच त्याचा अर्क आपल्या ब्लॉगद्वारे वाचकांपर्यंत पोहोचवितो.त्याला प्रतिसादही प्रचंड आहे,हे ४४२५८ वाचकांची आकडेवारी सिद्ध करते.मग ही व्यक्ती नक्‍कीच उच्चविद्याविभूषित,साहित्यिक वगैरे असेल,असा अंदाज बांधला जाणं साहिजिकच आहे.पण हे आगळंच व्यक्तिमत्त्व आहे.


मॅट्रिक फेल विजय गायकवाड. 


कोल्हापुरातील एमआयडीसीमध्ये एका कंपनीत दिवसभर धगीशी मैत्री आणि पहाटे व संध्याकाळी पुस्तकाशी सलगी करणारे असे हे अवलिया.केवळ १०  हजार पगार असूनही महिन्याला १,५०० रुपयांची ते पुस्तके खरेदी करतात.आणि त्याचा वाचून फडशा पाडतात.त्यातून जे जे समाजापर्यंत पोहोचवायचे ते साररूपात तयार करून ब्लॉगवर टाकतात.

आतापर्यंत त्यांच्या दोन खोल्यांच्या घरात ७२ हजारांच्या पुस्तकांचं छोटं ग्रंथालयच थाटलं आहे.तीच पुस्तकं विजय गायकवाड आणि कुटुंबीयांचं महत्त्व वाढवितात. 


विजय गायकवाड अगदी साधा माणूस;पण विचारसरणीने उंचावलेला.नम्रपणा ठासून भरलेला. वाचनाचा उपयोग प्रत्यक्ष जीवनात करणारा.सहज जरी विषय काढला तर ते आपल्याला अनेक देशांत फिरवून आणतात,


इतकं त्यांनी सातासमुद्रापलीकडच्या महनीय लेखकांना पुस्तकातून वाचलंय.त्यातून ते स्वतःला धन्य मानतात.हीच त्यांची खरी श्रीमंती. 


ब्लॉगच्या रूपात ते समाजसेवेचे अत्युच्य काम करतात.

त्यांच्या या कार्याला खरोखरीच सलाम करायला पाहिजे.


ता.क.त्यांनी आतापर्यंत ४९० लेख ब्लॉगवर लिहिले आहेत.

५०० लेखांच्या समीप ते आले आहेत.ते लवकरच पूर्ण करतील.याची मला पूर्णपणे खात्री आहे.त्यांच्या या कार्याचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा…!


भरत बुटाले ('लोकमत'च्या कोल्हापूर आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत.)


'कामधेनुगुना विद्या ह्यकाले फलदायिनी । 

प्रवासे मातृसदृशी विद्या गुप्तं धनं स्मृतम् ॥'


या वचनाप्रमाणे ज्यांनी आपले जीवन विविधांगी वाचन आणि चौफेर सकस लेखन यांनी समृध्द केले ते आमचे सहृदयी सन्मित्र विजय गायकवाड यांना अक्षय अक्षरब्रह्म सेवेसाठी खूप खूप धन्यवाद


माणूस कसाही असू द्या शिक्षित वा अल्पशिक्षित पण तो सुसंस्कारित असायला हवा.याचं सचेतन उदाहरण म्हणजे मॅट्रीक फेल विजय गायकवाड. यांच्याकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते,ती म्हणजे माणूस व्यासंगी वाचनाने समृध्द होतो तर वैचारिक लेखनाने विस्तीर्ण.....


विजय गायकवाड यांनी आपल्या विजय गायकवाड ब्लॉग वर आज अखेर ४९० विविध विषयांवर लेख लिहिलेले आहेत आणि यांची वैश्विक वाचक संख्या ४५ हजारापर्यंत आहे.

यावरूनच आपल्या लक्षात येते की समृध्द वाचनाची गोडी काय असते.


औद्योगिक क्षेत्रात काम करतानाच यांनी वाचन आणि लेखनालाच आपल वैचारिक कार्य सतत सुरू ठेवलेले आहे.विविधांगी वाचन असल्याने लेखन कार्यात सहज आढळणारा अक्षरब्र‌ह्माचा प्रवाह वाचकास विचारप्रवृत करतो. 


जगप्रसिध्द बास्केटबॉल प्रशिक्षक जॉन वूडण यांच्या वचनाप्रमाणे...


'यश म्हणजे मनाची शांतता होय.आपल्याला जे काही करणे शक्य आहे, ते सगळे अगदी चांगल्याप्रकारे करण्याचे जास्तीत जास्त चांगले प्रयत्न आपण केले की,आपल्या मनाला शांती लाभते !'


असाच सरस्वतीचा दिव्य आशीर्वाद.आपणास सदैव लाभावा...आपला उत्कर्ष व्हावा ही सदिच्छा !

भावी कार्यास शुभेच्छा.


राजेश पिष्टे - देशमुख,पर्यवेक्षक,गोविंदराव हायस्कूल,इचलकरंजी


५०० लेखांचा टप्पा – विजय गायकवाड यांना मनःपूर्वक शुभेच्छा !


ज्यांच्या लेखणीतून शब्द नव्हे तर अनुभव वाहतात, विचार उमटतात आणि अंतर्मनाला हलवून टाकणारी जाणीव जागी होते — असे माझे मित्र विजय गायकवाड आज त्यांच्या ब्लॉगच्या ५०० व्या लेखाच्या टप्प्यावर पोहोचले आहेत.


' मॅट्रिक फेल ' ही उपाधी त्यांनी हास्याने स्वीकारली,पण त्यांच्या जिद्दीने आणि कलेने ते जीवनाच्या परीक्षेत मात्र मोठ्या यशाने उत्तीर्ण झाले आहेत.


जगभरातील वाचकांपर्यंत त्यांनी आपल्या मराठी भाषेचा गंध पोहोचवला आहे.सामाजिक, संवेदनशील,भावनिक,

वैयक्तिक,तात्विक अशा विविध विषयांवर लिहीताना त्यांनी केवळ लेख लिहिले नाहीत,तर लोकांच्या मनात विचारांची बीजं पेरली.


५०० लेख आणि सुमारे ५०,००० वाचक हे त्यांच्या मेहनतीचं,

सातत्याचं आणि लेखनातल्या निखळ प्रेमाचं फलित आहे.


परिस्थिती कठीण असली तरी वाचनाचा आणि विचारांचा जप त्यांनी अखंड केला — यासाठी त्यांना मानाचा मुजरा आणि मनापासून शुभेच्छा!


तुझी लेखणी अशीच चालू राहो,विजय ! पुढील टप्प्यांसाठी प्रेम,शुभेच्छा आणि स्फूर्ती अशीच मिळत राहो ! .


डॉ.दिपक शेटे,महाराष्ट्र शासन राज्य गौरव पुरस्कार प्राप्त,गणितायन लॅब निर्माते


' शब्दांचा दीप ' 


वाट कठीण,संकटं भारी, 

तरी न थांबला हा ध्यास तुम्हांला, 

शब्दांच्या या उजळ वेलीने 

साजरं केलं लेखणीचं पावन

 जणू व्रत तुम्हांला.


पानोपानी प्रांजळ लेख, 

मनाच्या गाभाऱ्यात पोचले, 

कधी तत्त्वज्ञान,कधी भावभावना

वाचकांच्या मनी खोल रुजले.


' मॅट्रिक फेल ' ही ओळख जरी, 

तरी प्रतिभेचा परीघ विस्तृत, 

५०० लेखांचा सोहळा आज, 

आपल्या कर्तृत्वाला होईल वंदन अष्टदिशांत.


पन्नास हजार वाचकांचे

 मन जिंकलं आपण लेखणीने, 

मराठीला दिला मान, 

अनुभवांच्या सुंदर शिदोरीने.


सलाम तुमच्या त्या लेखनप्रेमाला, 

शब्दांतील तुमच्या त्या झऱ्याला, 

पुढे चालत राहो ही वाट तुमची, 

प्रेरणा मिळो नव्या वाटसरूंना !


डॉ.दिपक शेटे,महाराष्ट्र शासन राज्य गौरव पुरस्कार,

गणितायन लॅब निर्माते..!


शब्दांच्या पलीकडे आहे 

तुमची लेखन माला.

वाचनाने  तुमचा प्रवास 

साता समुद्रापार नेला


गुगलने ही घेतली आहे 

तुमची आता दखल.

जरी मॅट्रिक फेल म्हणून 

शिक्षणाने दिली असेल बगल. 


माणसाच्या मनात जिद्द असेल 

तर कुठूनही सुरुवात करू शकतो 

वाचनाची भूक भागवण्यासाठी 

भाकरीसह पुस्तके विकत घेतो. 


तुमच्याविषयी लिहिताना 

आमचे शब्द अपुरे पडतात

डिग्री संपादन केलेले देखील 

मॅट्रिक फेल वाल्यांच्या प्रेमात पडतात.


अनिल फारणे.

     शिगांव.


मला सापडलेला परिस - विजय गायकवाड


 माणसं पदव्या घेतल्याने मोठे होतात असं नाही.तर पदवी नसताना सुद्धा ज्ञानाच्या बळावर माणसं मोठे होतात. 

    ज्ञान हे चंदनाप्रमाणे जीवनात सुगंध पसरवत असते.

पुस्तके हे ज्ञानाचा सागर आहेत.पुस्तकाच्या सानिध्यात माणूस आला की,त्याचा परिस होतो. असाच एक परीस कोल्हापूर येथील विजय गायकवाड यांच्या रूपाने मला सापडला. 

     माझे स्नेही माधव गव्हाणे यांच्यामुळे विजय गायकवाड यांची ओळख झाली.नववी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर,

कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी एका कंपनीत मजूर म्हणून काम करणारे विजय गायकवाड.शिक्षण व विजय गायकवाड यांची जणूकाही फारकतच झाली होती. कौटुंबिक व संसारिक जीवनात अडकलेला हा सर्वसामान्य माणूस.

दररोज सकाळी उठून आडाचे पाणी भरणे  व आपला डब्बा घेऊन कंपनीत कामाला जाणे.हा त्यांच्या नित्यनियमाचा प्रवास होता. परंतु शारीरिक श्रमाचा विसर पडण्यासाठी विरंगुळा म्हणून हा माणूस पुस्तकांकडे वळला. पुस्तकांशी एवढी घट्ट मैत्री झाली.ती मैत्री माणसांच्या नात्याच्या पलीकडची झाली.पुस्तकांनी त्यांच्या जीवनात आनंद,चैतन्य आणले.महिन्याला नऊ हजार रुपये कमावणारा माणूस आपल्या पुस्तकरूपी मित्रांना जवळ करण्यासाठी २५०० रुपये पुस्तक खरेदीवर करू लागला. 


व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेले माणसं जीवन संपवतात. परंतु पुस्तक वाचनाच व्यसन जडलेला हा माणूस जीवनाच्या उच्च शिखराकडे पोहोचला.


    त्यांनी वाचलेली ग्रंथ ,ग्रंथातील विचार,तत्त्वज्ञान हा त्यांच्या जीवन जगण्याचा भाग बनला. 


आमच्यासारख्या पाचशे किलोमीटर दूरच्या मित्रांना सुद्धा त्यांच्या या पुस्तक वेडेपणाची ओढ लागली. परभणीतल्या अनेक मित्रांशी त्यांचे नाते जडले. ते फक्त त्यांच्या पुस्तक वेडेपणामुळे. 


  मला तर नेहमीच त्यांच्या बोलण्याची ,त्यांच्या शब्दाची ओढ कायम राहिली.आजही ते बोलताना एखादा शब्द,वाक्य हे जीवन जगण्याचा मंत्र देऊन जातात.नियमित वाचनाची सवय,वाचनाची तहान त्यांची काही भागत नाही.म्हणून त्यांनी स्वतःचेच ग्रंथालय निर्माण केले.हजारो पुस्तक वाचन झाल्यानंतर त्यांचे विचार आमच्यासारख्या मित्रांपर्यंत पोहोचविले. 


      वाचनाबरोबर लिखाणाला प्रारंभ झाला. स्वतःच्या नावाने ब्लॉग तयार करून त्यावर त्यांचे 500 लेख प्रसिद्ध झाले.

4500 वाचकांपर्यंत जगातल्या 27 भाषांमध्ये हे लेख पोहोचले.अनेक वृत्तपत्रातून,मसिकातून लेखन,अनेक शाळा,  महाविद्यालयग्रंथालय येथे व्याख्यान देऊन लोकांना वाचनाचे महत्त्व सांगून जगण्याचा खरा मार्ग शिकवणारा हा परिसच आहे. 


     आज विजय गायकवाड हे एक पुस्तकाचे झाड म्हणून ओळखले जातात.वाचन संस्कृती हरवत चाललेल्या समाजात विजय गायकवाड हे आदर्श म्हणून उभा आहेत.मी लाडाने त्यांना दादा म्हणतो. परंतु वाचनामधला खरंच दादा माणूस म्हणून आज नावारूपात येत आहे.भविष्यात विजय गायकवाड हे एक स्वतंत्र ग्रंथालय असेल.ज्ञानाचे ज्ञानपीठ असेल.व विद्येचे विद्यापीठ असेल. 


   एका मजुरी पासून सुरु झालेला प्रवास हा पुस्तकाचे झाड म्हणून उभा राहिला आहे.माणसं पैसे किती कमवू शकतात.

पैशाने ज्ञान कमावता येत नाही.त्यासाठी पुस्तकांशीच मैत्री लागते.पुस्तकांशी मैत्री करता करता स्वतःच एक पुस्तक झालेला भला माणूस अगदी जवळून पाहत आहे.आपलं

पुस्तक वाचण्याचा वेड आम्हा सर्वांना लागो व आपले लिखाण समाजाला दिशा देणारे ठरो हीच मनःपूर्वक शुभेच्छा.......! - आपला

सुभाष बाबाराव ढगे ,परभणी -


" पुस्तके सोबत असणं म्हणजे अज्ञात आयुष्य ज्ञात करून परिपूर्णतेने प्रवास करण्यासारखं आहे. पुस्तकातील दोन ओळींमधील मोकळ्या जागेतील मी प्रवासी आहे.आणि या पुस्तकासोबत घेऊन केलेला प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय व अलौकिक असा आहे..." असे विजय कृष्णात गायकवाड यांनी ब्लॉग च्या सुरुवातीसच विषद केले आहे.विजय गायकवाड यांच्या या कार्यास शुभेच्छा!


विजय गायकवाड,याचा ब्लॉग अतिशय सुंदर, इन्फॉर्मेटीव,विविध विषयावर सखोल विचार,मनाच्या भावनांना वेगळी चांगली वाट दाखवणारा,गरीब श्रीमंत, स्री पुरुष,मूल व आई सर्वांनाच आवडणारा,मनाला भावणारे विविध विषयावर चर्चात्मक विचार देणारा आहे.विजय गायकवाड यांनी हे सर्व विचार या ब्लॉग द्वारे मांडले आहेत.


विजय गायकवाड याचे हे कार्य आकाशाला भिडणारे प्रचंड आहे.सध्या च्या या काळात समाजामध्ये विविध कारणाने असंख्य प्रश्न निर्माण होत आहेत,या संघर्षमय जीवनात विजय गायकवाड यांनी विविध रंग उलगडून जगण्याची नवी उर्मी निर्माण करून हा ब्लॉग सप्तरंगी मोराच्या पिसासारखा सुंदर  सादर केला आहे.विजय गायकवाड यांच्या या कार्यास शुभेच्छा! त्याचे हे कार्य अखंडित चालू रहावे!


डॉ.सुनिल सरवदे 

पीएचडी IIT Bombay,

निवृत्त प्रिन्सिपल वाडिया 

अभियांत्रिकी कॉलेज,पुणे

सोलापूर/ पुणे


वाचनप्रेमींचा विजय

      पुस्तक हे मानवी संस्कृतीचे मस्तक आहे. पुस्तके माणसाला घडवतात. पुस्तकातील समृद्ध विचाराने माणूस समृद्ध होतो. माणसाची ही आवड लक्षात घेऊन विजय गायकवाड यांनी ब्लॉग रूपाने सुरू केलेला पुस्तक परिचय खऱ्या अर्थाने संस्कृती संवर्धक आणि मानवी मनाला उत्तेजक आहे. पुस्तकात एक अद्भुत जग पाहायला मिळते, दुनियेची सफर घडवून आणण्याचं काम पुस्तक परिचयाच्या रूपाने विजय गायकवाड करत आहेत.


 वाचनासाठी शिक्षणाचा मापदंड नसतो; म्हणूनच दहावी नापास असून सुद्धा पुस्तकांची आवड विजयरावांनी  मनापासून जपली.जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांशी सांगावे।शहाणे करून सोडावे । सकल जन।। या उक्तीप्रमाणे आपल्या ज्ञानामृताचे कण सर्वांना मुक्त हस्ते ब्लॉग रूपाने वाटण्याचे काम विजयराव करत आहेत. ब्लॉगच्या रूपाने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर; भारताबाहेर, परदेशातही ते लोकप्रिय ठरले आहेत. दहावी नापास विजयरावांचा पुस्तकांच्या बरोबरीचा हा जगप्रवास थक्क करणारा आहे. 


वाचनीय पुस्तकांची ओढ लागावी म्हणून ब्लॉग रुपाने पुस्तक परिचय हे विजयरावांचे काम आहे. कोल्हापूरच्या एमआयडीसीत काम करणारा हा माणूस दर महिन्याला हौस म्हणून दोन हजारांची पुस्तके खरेदी करतो. इतर व्यसनांमध्ये आणि  मौज म्हणून आपण पैशांची उधळण करतो पण; विजयरावांची ही पैशांची उधळण ज्ञानासाठी आहे. दहावी नापास विजयरावांनी घेतलेले हे व्रत माणसाला, वाचकाला सजग करणारे आहे. ते लिहितातही  इतकं छान की; शेवटपर्यंत वाचत राहावं असं वाटतं. शिवाय उद्याच्या भागात काय वाचायला मिळेल, याची उत्कंठा लागून राहते.


 पाश्चिमात्य लेखकांचे लेख, कादंबरीचा सारांश, कथानकाचा आशय, पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये आणि जगाची अद्भुत सफर या सगळ्या गुणवैशिष्ट्यांनी विजयरावांचा ब्लॉग आज सर्व परिचित झाला आहे. शिवाय नवोदित लेखक आणि  अनुभवी लेखकांची लेखन शैली , त्यांचे विचार सर्वदूर पसरवण्याचे श्रेय विजयरावांनाच द्यावे लागेल. पुस्तकातली ही किमया तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्ण करणे हे अवघड शिवधनुष्य विजयरावांनी मात्र लीलया पेलले आहे. वाचनाची आवड लोकांमध्ये निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रांजळ प्रयत्न कौतुकास्पदच नव्हे तर ;अंगीकारण्यास योग्य आहे. त्यांच्याकडून अद्भुत दुनियेची पुस्तक सफर आम्हा वाचकांना एक प्रकारची मेजवानी आहे. बुद्धीला मिळणारे हे खाद्य त्यांच्याकडून सदोदित वाचक लोकांना मिळत राहो हीच त्यांना मनापासून शुभेच्छा....


व्ही जी…


आदरणीय विजय गायकवाड सर तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात त्यामुळे तुमच्याविषयी काय प्रतिक्रिया लिहावी सुचत नाही किंवा एवढ्या मोठ्या माणसाविषयी प्रतिक्रिया देण्याइतपत माझी बुद्धी आहे का हा विचार माझ्या डोक्यात आहे.सर तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी मी माझ्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न करीत आहे.सर्वात महत्त्वाचं म्हणजे निस्वार्थ प्रेम दुसऱ्यावर कसं करायचं ते मी तुमच्याकडून शिकलो तुम्ही नेहमी फोन करत  असतात.तुम्ही कसे आहात मजेत आहात का आणि मजेतच राहा हे वाक्य माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे यातून तुमचे निस्वार्थ प्रेम मला कळतंय. 


समाज कार्य करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःमध्ये संयम आणि सहनशीलता महत्त्वाची असते आणि हे सुद्धा मी तुमच्याकडून शिकलो कारण समाज कार्य करत असताना खूप वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येतो त्यातून राग द्वेष येतो परंतु चांगलं काम करत असताना संयम महत्त्वाचा आहे.तुम्ही मला फोनवर बोलत असताना नेहमी सांगत असतात की संयम आणि संहशीलता हे समाज कार्य करण्यासाठी खूप महत्त्वाच आहे. आणि माझं समाजकार्य निरंतर सुरू आहे.

पैशाला जीवनात किती महत्त्व द्यायचं हे पण तुमच्याकडे बघून माझ्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न करीत आहे कारण तुम्ही छोटीशी नोकरी करून स्वतःच  परिवारासह आनंदात जीवन जगतात. गाडी बंगला याचा कधीही विचार न करता फक्त पुस्तकं च माझं सर्वस्व आहे.संसार चालून उरलेल्या पैशात दर महिन्याला हजार दिड हजार रुपयांचे पुस्तक विकत घेतात आणि ते पुस्तक वाचून स्वतःच नाही तर आमच्या सारख्यांच्या जीवनात आनंद निर्माण करतात पुस्तक वाचण्याचा जो ध्यास आहे तो खरच अप्रतिम आहे.


तुझ्यावर कोणाचा प्रभाव असता कामा नये.तुझ्यावर केवळ तुझाच प्रभाव हे जगण्याचे तत्वज्ञान केवळ तुम्हीच देऊ शकता. स्वतःला कमी लेखू नका.असं सांगणारे विजय गायकवाड सर नेहमी स्मरणात आहेत आणि राहतील.सर तुम्ही तुम्ही आज ज्या उंचीवर पोहोचला आहात त्या मागे अर्थातच आमच्या ताईंचा खूप मोठा त्याग आहे त्यांची साथ तुम्हाला सतत लाभते आहे म्हणून आज तुम्ही या उंचीवर पोहोचलात त्यासाठी ताईंना माझा नमस्कार. 


सर तुमचे लवकरच एक हजार ब्लॉग पूर्ण आणि एक लाख वाचक संख्या आहे पूर्ण हो अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपण आमच्यासाठी असेच ब्लॉग लिहीत राहा अशी आपल्याला सदिच्छा यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा 


तात्यासाहेब गाडेकर,रायपूर,परभणी



विजयराव गायकवाड सर्वांनी तुमच्याबद्दल अतिशय योग्य असेच लिहिले आहे.तुमचं पुस्तकप्रेम आम्हाला सुद्धा सतत प्रेरणा देत राहते.तुमचा ब्लॉग वाचून दिवसभर आम्ही फ्रेश राहतो.सकाळी उठल्याबरोबर आपला ब्लॉग आधी वाचतो.

पुस्तक प्रेमी माणसं आज दुर्मिळ होत असतांनाच गायकवाड सर दिव्याच्या ज्योतीने इतरांना प्रकाश देण्याचे काम करतात.


प्राचार्य भास्कर गायकवाड,वासिम


अस मी बऱ्याच वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकले आहे की,कधीही दुसऱ्याचे वाईट व्हावं असा विचार न करता दुसऱ्याचे चांगले व्हावे असाच विचार केला की आपले आपोआप चांगले होते.आणि तुमच्या बोलण्यातून सतत दुसऱ्याप्रती आपुलकी,प्रेम,आस्था आणि आदर भाव ऐकायला मिळतो.त्यामुळेच लोकांच्या ही मनात आपल्याप्रती असलेले प्रेम,आशीर्वाद रुपी त्यांच्या वाणीतून ओसंडून वाहत आहे,सर आपण खरच ग्रेट आहात.


रमाकांत लिंबाजीराव गव्हाणे,चाटोरी



खूप छान,आणि विशेषतः एका शेतकरी वाचकाची ही प्रतिक्रिया एखाद्या पुरस्कारापेक्षाही खूप मोलाची आहे..

खरंच तुम्ही आमच्यासारख्या अनेकांना प्रेरणादायी आहात.


बंधूतुल्य रामराव गायकवाड,सेलू


तुम्ही अनेक भरकटलेल्या व्यक्तींचे तसेच माणसिक संतुलन बिघडलेल्या लोकांचे प्रामाणिक मार्गदर्शक आहात.

- अरुण दबडे


२०.०५.२५ या लेखातील पुढील शेवटचा भाग


हे कधीच सांगू नका,never say that


दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांच्या प्रति सन्मान दाखवा. हे कधीच सांगू नका,' तुम्ही चूक आहात.'


ग्रीले सिविल वॉरच्या वेळी अमेरिकेचे सर्वाधिक प्रसिद्ध संपादक होते.ते लिंकनच्या नीतीबद्दल अत्यंत असहमत होते.त्यांचा विश्वास होता की ते वाद,उपहास आणि अपमानाचे अभियान चालवून लिंकनला आपल्या पक्षात सामील करतील.त्यांचे कटू अभियान महिनों महिने ,वर्षानुवर्ष चालले.खरं तर त्यांनी त्या रात्री लिंकनवर एक क्रूर,कटू,

आलोचनात्मक आणि व्यक्तिगत आघात करणारे संपादकीय लिहिले होते,ज्या रात्री बूथने लिंकनवर गोळी चालवली.


पण इतक्या कटूतेवरही लिंकन ग्रीलेबरोबर सहमत झाले का? कधीही नाही.उपहास आणि अपमानानं कधी सहमत नाही होऊ शकत.


जर तुम्हाला लोकांबरोबर आपले संबंध सुधारण्याच्या बाबतीत उत्तम उपाय हवा असेल,जर तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वाला खुलवावंसं वाटेल,तर तुम्ही बेंजामिन फ्रैंकलिनची आत्मकथा नक्की वाचा.हे अमेरिकेच्या साहित्यातले एक अमर पुस्तक आहे आणि हे सगळ्यात आकर्षक आत्मचरित्रातलं एक आहे.बेंजामिन फ्रैंकलिन सांगतो की,त्यांनी आपला वाद करण्याच्या मूडवर कसा ताबा ठेवला आणि कोणत्या प्रकारे त्यांनी आपल्या स्वतःला अमेरिकन इतिहासाचे सर्वाधिक योग्य,सौम्य आणि कूटनीतिज्ञ मनुष्यांमधला एक बनवला.


आपल्या तारुण्यात बेन इतका वाद घालत की,एक जुना मित्र त्यांना बाजूला घेऊन गेला आणि त्यांच्यावर खऱ्याचे आसूड मारायला सुरुवात केली.मित्राने त्यांना म्हटले,"बेन,तुझे काहीच होऊ शकत नाही.तुझे विचार तुझ्याशी असहमत असणाऱ्या लोकांना हातोड्यासारखे वार करतात.तुझे विचार इतके आक्रमक असतात की, कोणी त्याची पर्वा करत नाही.मित्र मानतात की,जेव्हा तू नसतोस तेव्हा त्यांचा वेळ खूपच आनंदात जातो. तुम्हाला इतकं ज्ञान आहे की,दुसरी व्यक्ती तुम्हाला काहीच सांगू शकत नाही आणि कोणी तुम्हाला सांगायचा प्रयत्न का बरं करेल,जेव्हा ते करताना त्याला खूप कष्ट,खूप मेहनत करावी लागेल,त्यामुळे तु जीवनात काहीच शिकू शकणार नाहीस आणि तुझ्यापाशी जे थोड बहुत ज्ञान आहे.तेच तुझ्यापाशी नेहमी राहील."


बेजामिन फ्रैंकलिनाची तारीफ करायला पाहिजे की,त्यांनी या अपमानकारक आलोचनेला खूप चांगल्या प्रकारे घेतलं. ते इतके महान व बुद्धिमान होते की,त्यांनी या गोष्टीमध्ये लपलेल्या खऱ्याला ओळखलं आणि त्यांना अंदाज आला की,जर त्यांनी स्वतःच स्वतःला नाही बदललं,तर ते असफलता आणि सामाजिक विनाशाकडे जातील. त्यांना आपल्या चुकांची जाणीव झाली आणि त्यांनी आपल्यामधून आलोचना व वाद घालणे काढून टाकण्याचा निश्चय केला.


फ्रैंकलिन म्हणतात,"मी हा नियम बनवून टाकला की, दुसऱ्यांच्या भावनांचा सरळ विरोध करणार नाही आणि आपली गोष्ट आक्रमक किंवा दृढपणे करण्यास लगाम घालेन.मी हा निश्चय केला की,मी आपल्या भाषेमधून वैचारिक हट्टीपणा दाखवणारे सगळे शब्द दूर करेन. याच्या जागी मी या प्रकाराने वाक्यं बोलण्याचा निश्चय केला : मला असं वाटतं किंवा मी समजू शकतो की,ही गोष्ट अशा स्वरूपाची आहे किंवा मला या वेळी असं वाटतं आहे किंवा पहिल्या प्रथम,हे असं दिसत आहे. जेव्हा कोणी व्यक्ती अशी गोष्ट सांगते जी चुकीची आहे हे मी जाणतो,तेव्हाही मी त्याचा तत्काळ विरोध करण्याच्या आनंदाचा त्याग करीत होतो.जर मला चूक सांगायची होती,तर मी कूटनीतीच्या पद्धतीचा वापर करत होतो.मी सांगायचो की,अनेक प्रकरणांमध्ये या परिस्थितीत समोरच्याची गोष्ट खरी असू शकते;पण मला वाटतं की,या प्रकरणात ते बरोबर होणार नाही.मला शैली बदलण्याचा फायदा झाला.आता माझी चर्चा चांगली सुखद व्हायला लागली.कारण मी विनम्र पद्धतीने आपले विचार मांडत होतो,यामुळे लोक माझ्या विचारांशी आनंदाने सहमत होऊ लागले.जरी मी चुकीचा असलो,तरीही मला आता कमी अपमान सहन करावे लागत होते.जेव्हा मी बरोबर असायचो तेव्हा माझे विरोधकही आपली चूक मानून माझी गोष्ट ऐकायचे.


"सुरुवातीला या तंत्राचा प्रयोग करताना मला माझ्या स्वाभाविक इच्छेला दाबावं लागलं;पण नंतर हे तंत्र इतकं सहज झालं आणि मला याची इतकी सवय झाली की,बहुतेक मागच्या पन्नास वर्षांत कोणत्याही माणसाने माझ्या तोंडून कुठलंही निग्रही स्वरूपाचं वाक्य नाही ऐकलं.या सवयीमुळे मला वाटतं की,मी माझ्या बरोबरच्यांमध्ये इतका लोकप्रिय झालो की,जेव्हापण मी एखाद्या नव्या संस्थेचा प्रस्ताव ठेवतो किंवा जुन्या संस्थेमध्ये काही बदलण्याचा प्रस्ताव ठेवतो,तेव्हा लोक माझी गोष्ट ऐकतात.मला राजकारणामध्ये इतकं यश याचमुळे मिळालं.खरंतर मी एक खराब वक्ता होतो, माझ्यात बोलण्याची कला नव्हती,माझ्या शब्दांच्या जागा ठीक नसायच्या,माझी भाषा तर अजिबात चांगली नव्हती;पण या सगळ्यांशिवाय मी नेहमीच माझी गोष्ट मानायला लावत होतो."


काय बेज फ्रँकलिनची पद्धत व्यवसायात कामाला येईल ? आपण आता दोन उदाहरणे पाहू या.


नॉर्थ करोलिनाच्या किंग्ज माउंटनमध्ये राहणारी कॅथरीन ए.अल्फ्रेड एक यार्न-प्रोसेसिंग फ्लांटमध्ये इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग सुपरवायझर आहे.त्यांनी आमच्या वर्गाला सांगितलं की,कोणत्या प्रकारे त्यांनी आमचं ट्रेनिंग घ्यायच्या आधी आणि नंतर एका संवेदनशील समस्येचा सामना केला."माझी एक जबाबदारी ही आहे की,मी आमच्या ऑपरेटर्सकरिता प्रोत्साहन देऊन श्रेणीला टिकवून ठेवलं पाहिजे,त्यामुळे आम्ही अधिक यार्नचं उत्पादन करून जास्त धन कमवू शकू.आमच्याद्वारे कामात येणारी सिस्टिम तेव्हापर्यंत तर ठीक चालली होती,जेव्हा आमच्या जवळ केवळ दोन किंवा तीन प्रकारचे यार्न होते;पण आत्ताच आम्ही आपली रेंज वाढवली,ज्या कारणामुळे आम्हाला बारा वेगवेगळ्या प्रकारच्या यार्ननी काम करावं लागायचं.ज्या प्रकारचं काम होत होतं,

त्याप्रमाणे आम्ही आपल्या ऑपरेटर्सना तितकी चांगली रोजंदारी देऊ शकत नव्हतो आणि त्यांना जास्त उत्पादन करण्याकरता प्रोत्साहित करू शकत नव्हतो.मी एक नवीन सिस्टिम सुरू करण्याची योजना बनवली,ज्यामुळे आम्ही ऑपरेटरला यार्नच्या त्या श्रेणीच्या हिशोबाने रोजंदारी देऊ शकू ज्यावर ते आत्ता काम करत आहेत.नवीन योजना घेऊन मी मीटिंगला गेले.मी मॅनेजमेंटला हे सिद्ध करू इच्छित होते की,माझी योजना ही वर्तमानकाळात अगदी योग्य आहे. मी त्यांना विस्ताराने सांगितले की,ते कसे चूक होते आणि हेही सांगितले की,ते कुठे पक्षपात करीत होते आणि कोणत्या प्रकारे माझी योजना त्यांच्या चुका आणि भेदभाव दूर करू शकतील;पण मी वाईट त-हेने अयशस्वी झाले.नवीन योजनेच्या आपल्या स्थितीच्या बचावावर मी इतकी जास्त व्यस्त झाले होते की,मी त्यांच्याकरता जुन्या योजनांशी जुळलेल्या समस्यांना स्वीकार करायची कुठलीच जागा सोडली नाही." या कोर्समध्ये दीर्घकाळ घालवल्यावर मला जाणवलं की, माझी कुठे चूक झाली होती.मी आणखीन एक मीटिंग बोलवली आणि या वेळी मी त्यांना विचारले की,त्यांच्या समस्या नक्की काय आहेत?आम्ही प्रत्येक बाजूने विचार-विमर्श केला आणि मी त्यांचे मत विचारले की, याला सोडवायचा सर्वश्रेष्ठ उपाय काय होऊ शकतो. योग्य वेळेला विनम्रतेने मी मध्ये मध्ये त्यांना चांगले उपाय सुचविले;परंतु मी त्यांना सिस्टिमला स्वतःच विकसित करू दिलं.मीटिंगच्या शेवटी जेव्हा मी आपली योजना मांडली तेव्हा त्यांनी त्याचा उत्साहाने स्वीकार केला.मला आता पूर्ण विश्वास वाटतो आहे की,जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीला सरळपणे हे सांगून देता की,तो चुकीचा आहे तर यात काही फायदा नाही होत.झालंच तर खूप नुकसानच होऊ शकतं.या प्रकारे तुम्ही फक्त या व्यक्तीचा स्वाभिमान दुखावता आणि स्वतःच स्वतःला वाईट बनवून घेता.


आता आणखीन एक उदाहरण सांगतो.लक्षात ठेवा मी जे प्रकरण सांगतो आहे,ते हजारो लोकांचे अनुभव होऊ शकतात.आर. वी. क्राउले न्यू यॉर्कच्या एका लेबर कंपनीत सेल्समन होता.क्राउलेने मानलं की,ते अनेक वर्षांपासून कठीणहृदयी लेबर इन्स्पेक्टरांना हे सांगत होते की ते चूक होते आणि ते अनेक वादांमध्ये जिंकलेपण होते;परंतु यामुळे त्यांचा काही फायदा होत नव्हता.क्राउलेने सांगितलं,"लेबर इन्स्पेक्टर बेसबॉलच्या अंपायरसारखे असतात.

एकदा ते निर्णय ऐकवतात आणि मग ते त्याला बदलत नाहीत." मिस्टर क्राउलेनी बघितलं की,वाद जिंकल्यामुळे त्यांच्या फर्मचं हजारो डॉलर्सचं नुकसान होत होतं.याकरता माझ्या कोर्समध्ये भाग घेण्याच्या काळात त्यांनी आपलं तंत्र बदललं आणि वाद घालणं सोडून दिलं.याचा परिणाम काय झाला? इथे त्यांची गोष्ट सांगतो जी त्यांनी क्लासमध्ये सांगितली.


"एका सकाळी मला एक फोन आला.फोन वरच्या रागीट व एका चिंतीत माणसाने मला हे सांगितलं की, आम्ही त्याच्या प्लॉटमध्ये जो लंबर सप्लाय केला होता, तो एकदम निकृष्ट प्रतीचा होता.

त्याच्या फर्मने माल उतरवायला मना केले होते आणि आता त्यांना आमच्याकडून त्या स्टॉकला त्यांच्या यार्डातून उठवायचा बंदोबस्त हवा होता.एक चतुर्थांश ट्रक रिकामा झाल्यानंतर इन्स्पेक्टरने आपला रिपोर्ट दिला की,लंबरचा स्तर अपेक्षित क्वालिटीच्या ५५ टक्के होता. या परिस्थितीत त्यांच्या जवळ पूर्ण माल परत करण्याव्यतिरिक्त दुसरा रस्ता नव्हता.


"हे ऐकल्यावर मी तत्काळ त्या फर्मच्या गोदामाच्या दिशेने रवाना झालो.रस्त्यात मी या समस्येतून निघण्याची रणनीती ठरवली.एरवी मी या परिस्थितीत वाद घातला असता,नियम सांगितले असते,

लंबर इन्स्पेक्टरच्या रूपात आपल्या ज्ञान आणि अनुभवाचा पाढा वाचला असता.हे सांगितले असते की,लंबरची क्वालिटी चांगल्या ग्रेडची आहे.पण मी कोर्समध्ये शिकलेल्या पद्धतीला आजमावायचा निर्णय घेतला.


"जेव्हा मी प्लॉटमध्ये पोहोचलो तर मी बघितलं की, लंबर इन्स्पेक्टर आणि प्लॉट मॅनेजर वाद घालण्याच्या आणि भांडणाच्या मूडमध्ये होते.आम्ही ट्रकपाशी पोहोचलो,ज्यातून सामान उतरवलं गेलं होतं.मी आग्रह केला की,त्यांनी माल उतरवणं चालूच ठेवावं म्हणजे मी पाहू शकेन की,मालाची क्वालिटी कशी आहे.मी इन्स्पेक्टरला म्हटलं की,तो निकृष्ट सामानाला वेगळं काढून ठेवत जाईल आणि चांगल्या मालाला वेगळं काढून दुसऱ्या ठिकाणी ठेवत जाईल,जसं तो माझ्या येण्याच्या आधी करत होता.


"काही वेळ त्याला तसं करताना बघून मी समजलो की, त्याचं पारखणं खूपच कठीण होतं आणि तो नियमांचा चुकीचा उपयोग करतो आहे.हा लंबर पांढऱ्या पाइनचा होता आणि मला माहीत होतं की,त्या इन्स्पेक्टरला हार्डवुडचं ज्ञान आहे अन् पांढऱ्या पाइनच्या बाबतीत कोणतीच खास समज नाही आहे.मी पांढऱ्या पाइनचा विशेषज्ञ होतो;पण मी त्याच्या *ज्ञानावर कुठलंही बोट ठेवलं का,तर अजिबात नाही.मी बघत राहिलो आणि हळूहळू त्याला विचारत गेलो की,अमुक अमुक तुकड्यात काय गडबड आहे.मी एकदापण हे नाही सांगितलं की,इन्स्पेक्टर चुकीचा आहे.मी परत परत या गोष्टीवर जोर देत राहिलो की,माझे प्रश्न विचारण्याचं एकमात्र कारण हे होतं की,मी भविष्यात त्यांच्या फर्ममध्ये तोच माल पाठवीन ज्यामुळे ते संतुष्ट होऊ शकतील.

जेव्हा मी या गोष्टीवर सतत जोर दिला की, ज्या तुकड्यांमुळे ते संतुष्ट नाही आहेत,त्यांना वेगळं ठेवणं उचित आहे,तेव्हा माझ्या मैत्रीपूर्ण बोलण्यामुळे आणि सहयोगी ढंगामध्ये विचारलेल्या प्रश्नांमुळे आमच्यामधली शत्रुत्वाची भिंत विरघळली.मी त्यांना सावध होऊन हेदेखील सुचवलं की,बहुतेक त्यांना जास्त महाग माल हवा आहे कारण त्यांना यापेक्षा चांगल्या क्वालिटीची आवश्यकता होती.यामुळे त्यांच्या डोक्यात हा विचार आला की,त्यांनी ज्या ग्रेडचा माल मागवला होता,अनेक रिजेक्ट केलेले तुकडे खरंतर त्या ग्रेडच्या मालाला ठीक बसत होते.फर्मच्या मॅनेजरने मानलं की, त्यांना खरंच चांगल्या क्वालिटीची आणि महाग मालाची गरज होती.मी खूपच सावध होतो की,कुठे तो हे न विचार करू लागेल की मी या विषयाचा मुद्दा बनवतो आहे.हळूहळू त्याचा पूर्ण दृष्टिकोन बदलून गेला.लंबर इन्स्पेक्टरने शेवटी हे मानलं की,त्याला पांढऱ्या पाइनचा काही खास अनुभव नाही आहे आणि मग तो मला प्रत्येक तुकड्याबद्दल प्रश्न विचारू लागला.मी त्याला सांगत राहिलो की,हा तुकडा त्याच ग्रेडचा का येतो ज्या ग्रेडची ऑर्डर दिलेली आहे;पण मी हेही सांगत राहिलो की,जर त्यांना हे वाटतं की,हा बरोबर नाही आहे किंवा त्यांच्या कामाचा नाही आहे तर त्यांनी त्याला वेगळं ठेवावं.शेवटी तो या स्थितीत आला की प्रत्येक तुकड्याला रिजेक्ट करतेवेळी त्याला अपराधी वाटू लागलं होतं. शेवटी त्याला हे समजलं की,चूक त्याची होती कारण त्यांनी तितक्या चांगल्या ग्रेडच्या मालाची ऑर्डर दिली नव्हती,जितक्या चांगल्या ग्रेडची त्यांना जरुरी होती.याचा परिणाम असा झाला की, माझ्या तिथून परतल्यानंतर एकदा परत त्यांनी पूर्ण ट्रकच्या मालाची तपासणी केली.तपासणीनंतर त्याने पूर्ण मालाचा स्वीकार केला आणि पूर्ण पैशाचा चेक पाठवून दिला.या एका उदाहरणामुळे,थोड्याशा व्यवहार कुशलतेमुळे आणि समोरच्याची चूक न सांगितल्याच्या संकल्पामुळे,ना फक्त आमच्या कंपनीचा फायदा झाला तर सद्भावनाही मिळाली जी अनमोल होती. मार्टिन ल्यूथर किंगला जेव्हा विचारलं गेलं की,ते शांतीच्या पक्षात असूनसुद्धा देशाचे सगळ्यात मोठे अश्वेत ऑफिसर एअर फोर्स जनरल डेनियल 'चैपी' जेम्सचे प्रशंसक का आहेत,तर त्यांनी उत्तर दिलं की,


मी लोकांना त्यांच्या सिद्धान्ताच्या तराजूत तोलतो,आपल्या सिद्धान्ताच्या तराजूत नाही.


याच प्रकारे जनरल रॉबर्ट एकदा कॉन्फेडरेसीच्या प्रेसिडेंट जेफरसन डेव्हिससमोर आपल्या एका अधीनस्थ ऑफिसरच्या गोष्टीवर चकित झाला.त्याने म्हटले की,

जनरल,तुम्ही नाही जाणत की,तुम्ही ज्याची तारीफ करता आहात,तो तुमच्याविषयी शत्रुत्वाचा विचार करतो आहे आणि तुम्हाला नावं ठेवण्याची एकही संधी नाही सोडत ? जनरल लीने सांगितलं, " मला माहीत आहे;पण प्रेसिडेंटने त्याच्याविषयी माझे विचार विचारले होते,माझ्याविषयी त्याचे विचार नव्हते विचारले." तसा मी या धड्यात काही फार नवीन गोष्ट नाही सांगत आहे. 


दोन हजार वर्षांआधी येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं की, आपल्या विरोधकांशी तत्काळ सहमत व्हा.येशूच्या जन्माआधी २,२०० वर्षं आधी मिस्त्र सम्राट अख्तोईने आपल्या पुत्राला हीच समजदारीची शिकवण दिली होती, "कूटनीतिज्ञ बना.यामुळे लोक तुमची गोष्ट ऐकतील आणि तुम्हाला खूप फायदा होईल." 


दुसऱ्या शब्दांमध्ये आपले ग्राहक, आपली पत्नी किंवा आपले विरोधक यांच्या बरोबर वाद घालू नका.त्यांना हे नका सांगू की ते चूक आहेत.बस,थोड्याशा कूटनीतीचा प्रयोग करा.