* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: पुराणकथा का स्वानुभव ? Why is mythology a self-experience?

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२६/५/२५

पुराणकथा का स्वानुभव ? Why is mythology a self-experience?

पश्चिम आफ्रिकेतील 'माली' या देशात डोगॉन या जमातीचे वास्तव्य आहे.ज्याचा काळ ठरविणेही अवघड अशा जुन्या काळातील त्यांच्या पौराणिक कथा व्याध सीरिअस-अ (Sirius- A) या ताऱ्याची आणि त्याच्या 'न दिसू शकणाऱ्या' अशा जोडताऱ्याची माहिती कशी देतात हे कोडे मात्र उलगडत नाही.त्या जोडताऱ्याला ते म्हणतात 'डिजिटारिया.'


डोगॉनच्या पुराणकथा सांगतात की डिजिटारिया हा आपल्याला दिसत नसलेला 'उपग्रह' व्याधाभोवती ५० वर्षांत एकदा फिरतो.तो एक अत्यंत जड तारा आहे आणि व्याधाभोवती फिरताना तो व्याधाच्या कक्षेवरही परिणाम करतो.त्यांना 'अदृश्य' अशा या ताऱ्याची माहिती,त्याची कक्षा,त्याची घनता,त्याचा भ्रमणकाळ या सर्व गोष्टींची माहिती कशी होती?


दंतकथा,पुराणकथा का स्वानुभव ? देव ? छे ! परग्रहावरील अंतराळवीर,बाळ भागवत,मेहता पब्लिशिंग हाऊस


व्याध आणि त्याचा उपग्रह यांची माहिती आपल्याला गेल्याच शतकात झाली आहे.सूर्य सोडला तर व्याध हा आपल्याला सर्वात जवळ असलेला तारा.रंगाने पांढरा, आपल्यापासून ८ (१/२) प्रकाशवर्षे दूर आणि दक्षिण गोलार्धातील अत्यंत तेजस्वी असा हा तारा आहे.त्याचा उपग्रह व्याध-ब (Sirius-B) १८४४ मध्ये विल्यम फ्रेडिक बेसेल याने 'शोधून' काढला तरी दुर्बिणीची भिंगे तयार करणाऱ्या अमेरिकन यंत्रज्ञ अल्वन क्लार्क याने तो खरोखरच प्रथम 'बघेपर्यंत' १८६२ साल उजाडावे लागले."


व्याध हा सर्वसामान्य तारा आहे तर व्याध-ब हा एक पांढरा ठिपकाच (White Dwarf) म्हणावा लागेल. त्याची घनता मात्र खूप जास्त आहे.


१८३४ मध्येच बेसेलच्या लक्षात आले की व्याधाची गती सरळ रेषेत नसून ती पाण्यातल्या तरंगांप्रमाणे वक्र असावी.मृग नक्षत्रात आपण व्याधाने मारलेला बाण पाहतो.मग नेहमी बाणाच्या सरळ रेषेत व्याध दिसायला हवा.तो तसा दिसत नाही.कधी तो बाणाच्या वरच्या बाजूला दिसतो तर कधी खालच्या बाजूला.बेसेल व त्याचे साथीदार यांनी ठराविक कालाने व्याधाच्या गतीची नोंद घ्यायला सुरुवात केल्यावर तर त्यांचा संशय दृढ झाला.याचा अर्थ व्याधाच्या गतीवर दुसरा कुठला तरी तारा परिणाम करीत होता;पण तो दिसत मात्र नव्हता.या अदृश्य ताऱ्यालाच त्याने नाव दिले 'व्याध-ब'. त्याकाळच्या अत्यंत चांगल्या दुर्बिणीतूनही तो दिसू शकत नव्हता.तेव्हा तो 'अप्रकाशित' असावा असा निष्कर्ष खगोलशास्त्रज्ञांनी काढला.


पण त्यावेळी अल्वन क्लार्क याने दुर्बिणी बनवण्यात नाव कमवायला सुरुवात केली होती.१८६२ मध्ये त्याने बनविलेल्या ४७ सेंटिमीटर व्यासाच्या दुर्बिणीतून बेसेल याने सांगितलेल्या ठिकाणीच क्लार्क याला 'व्याध-ब' सापडला,दिसला.तो अप्रकाशित नव्हता,व्याधाच्या सावलीत नव्हता,पण तेजस्वी व्याधाच्या सान्निध्यात तो पाहताच येत नव्हता;त्याची तेजस्विता लुप्त होत होती.मध्यंतरीच्या काळात 'व्याध-ब' ची 'पांढरा ठिपका' अशी नोंद झाली होती.अशा ताऱ्यांची घनता पुष्कळच असते; पण तेजस्विता कमी असते.व्याधाशी तुलना करता व्याध-ब ची घनता ०.४२:२७००० या प्रमाणात आहे. व्याध पहिल्या प्रतीचा तेजस्वी तारा आहे तर व्याध-ब नवव्या प्रतीचा तेजस्वी तारा आहे. (तिसऱ्या,चौथ्या प्रतीच्या पलिकडील तारे नुसत्या डोळ्यांनी पाहणेही तसे अशक्यच.) 


व्याध-ब चा व्यास ४१००० किलोमीटर आहे पण त्याचे वस्तुमान (Mass) मात्र सूर्याएवढे आहे.उगीच नाही व्याधाच्या भ्रमणकक्षेवर तो इतका जबर परिणाम करीत असतो.


सूर्य परिमाणांप्रमाणे…!


व्याध-अ (Sirius-A) - ( व्याध-ब (Sirius-B) )


वस्तुमान - २.४ -  ( ०.९६ )


त्रिज्या - १.८ -  ( ०.०३४ )


घनता - ०.४२ -  ( २७००० )


व्याधाबद्दलचे आजचे आपले ज्ञान आणि पुराणकाळापासून डोगॉन जमातीला असलेले ज्ञान यांची तुलना केली तर काय दिसेल?


प्रचलित ज्ञान


व्याध-ब हा व्याधाच्या कक्षेवर परिणाम करतो हे गेल्या शतकात प्रथम लक्षात आले.


व्याध-ब दिसू शकत नव्हता.अद्ययावत दुर्बिणींच्या सहाय्याने सततच्या संशोधनाने तो शोधता आला आणि त्याची कक्षा ठरवता आली.


व्याध-ब हा अगदी छोटा तारा आहे.


व्याध-ब कक्षेतून फिरण्याला ५०.४ ± ०.०९ वर्षे लागतात.


व्याध-ब ची घनता प्रचंड आहे.



डोगॉनचे ज्ञान


डिजिटारिया हा व्याधाच्या कक्षेतील एक बिंदू आहे. डिजिटारिया डोगॉन लोकांनी कधी पाहिलेलाच नाही.


डिजिटारियाच्या अस्तित्वाबद्दल डोगॉनना कधीच शंका नव्हती.तो अदृश्य आहे हे माहीत असूनही !


डिजिटारिया फारच लहान आहे त्याच्या निर्मितीत त्याने आपल्या जवळचे सर्व देऊन टाकले.


डिजिटारियाच्या भ्रमणाला साधारणतः ५० वर्षे लागतात.


डिजिटारिया हा सर्वांत जड तारा आहे.तो व्याधाची कक्षा ठरवितो व स्वतःच्या कक्षेप्रमाणे त्याच्याभोवती फिरतो.


रॉबर्ट टेम्पल हा भाषाशास्त्रज्ञ असला तरी रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचाही सदस्य आहे.त्याने डोगॉनच्या पुराणकथांप्रमाणे आणि आजच्या खगोलशास्त्रातील ज्ञानाप्रमाणे व्याध-ब च्या भ्रमणकक्षा काढल्या व निष्कर्ष काढला की अगदी बारीकसारीक बारकाव्यांसह या दोन्ही आकृत्यात इतके साम्य आहे की शास्त्रज्ञांना फूटपट्टी घेऊन मोजमाप करण्याची काहीही आवश्यकता नाही.ही वस्तुस्थिती स्वयंसिद्ध आहे. अद्ययावत ज्ञानाची पुराणकथांशी ही सांगड कशी बसली?


डोगॉनच्या आख्यायिका सांगतात की डिजिटारियाला स्वतःभोवती फिरण्याला एक वर्ष लागते.ते पृथ्वीवरील वर्षाबद्दल बोलत आहेत की डिजिटारियाच्या वर्षाबद्दल हे कळत नाही;पण तरीही आकाशस्थ ताऱ्यांचे स्वतःभोवतीचे भ्रमण डोगॉन जमातीला पुराणकाळापासून ज्ञात आहे हे कसे काय? आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे आपल्याला तसे हल्लीच कळायला लागले आहे.तरी विश्वाच्या या मूळ गतीची कल्पना आफ्रिकेतील 'रानटी' जमातीला हजारो वर्षे असावी हे आश्चर्य नाही का?


खरे सांगायचे म्हणजे आज आपल्याला माहीत नाही अशा आणखी काही गोष्टींचे ज्ञानही डोगॉनना हजारो वर्षे आहे.कदाचित आपले खगोलशास्त्रज्ञ या गोष्टी भविष्यकाळात शोधून काढतीलही.


डोगॉनच्या पुराणांप्रमाणे तेजस्वी व्याधाचा व्याध-ब हा एकच उपग्रह नाही.व्याध-ब पेक्षा मोठा पण वजनाने त्याच्या (१/४) वजनाच्या 'एमी या' या आणखी एका दुसऱ्या उपग्रहाबद्दलही ते बोलतात.त्याची भ्रमणकक्षा व्याध-ब पेक्षा मोठी असून तो व्याध-ब च्या दिशेने ५० वर्षांत एक प्रदक्षिणा करतो आणि शिवाय 'एमी या' ला स्वतःचा एक उपग्रह आहे.व्याधाला शूमेकर (Shoemaker) असा तिसराही एक उपग्रह आहे. व्याधापासून सर्वांत लांबचा उपग्रह आणि तो उलट्या दिशेने फिरतो.


'एमी या' किंवा 'शूमेकर' यांची माहिती जमविण्याइतके ज्ञान आपल्याजवळ आज नाही.आपल्यापासून ८ (१/२) प्रकाशवर्षे दूर असलेल्या व्याधाचे उपग्रह लवकर शोधून काढू अशी आजची परिस्थिती नाही.


पण ज्या पौराणिक काळापासून डोगॉनच्या आख्यायिका चालत आल्या आहेत,त्या काळात तर 'अदृश्य' अशा या ताऱ्यांबद्दलचे ज्ञान कुणालाच नव्हते. मग डोगॉनना ही सर्व माहिती कशी झाली?कोणी दिली? याचा उलगडा कोण करणार?


डोगॉनच्या दंतकथा एक गोष्ट स्पष्ट करतात.हजारो वर्षे दंतकथा,आख्यायिका जे सांगत आहेत त्यात सत्याचा अंश नक्कीच आहे,त्या काल्पनिक नाहीत.त्यांचा उगम प्राचीन काळातल्या आपल्या पूर्वजांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या,

अनुभवलेल्या गोष्टीत आहे.या आख्यायिकांचा अर्थ अक्षरन्अक्षर किंवा शब्दन्शब्द जुळवून लावण्याचा प्रयत्न मात्र निरर्थक आहे.शब्दांचे अवडंबर झटकून टाकून त्यांचे एकूण सार शोधले पाहिजे.ज्यांनी हे वृत्तांत लिहिले त्यांना ते पाहत असलेल्या तंत्रविज्ञानाबद्दल काहीही माहिती नव्हती.त्यांच्या दररोजच्या आयुष्यातील संबंधित अशा गोष्टी सांगून पटतील अशा शब्दात,त्यांचे अनुभव सांगण्याच्या प्रयत्नात ते काही वेळा शब्दांच्या जंजाळात फसले आहेत हे खरे ! पण म्हणून ते वृत्तांत काही खोटे ठरत नाहीत.


पुराणकाळात उल्लेख केलेले 'देव' तरी होते कोण? कोणत्या परिस्थितीत ते पृथ्वीवर आले होते? ते काल्पनिक असतील तर लोक त्यांना बघू शकत होते, त्यांच्याशी बोलू शकत होते हे कसे काय? त्यांना तसे पृथ्वीवर येण्याचे कारणच काय होते?पण ते आले, बऱ्याचदा आनंदाने राहिले.का? त्यांनी त्यांची शक्ती दाखवली,त्यांचे ज्ञान,प्रगत विज्ञान या गोष्टी दाखवल्या. जमेल तेवढे ज्ञान दिलेही.ज्ञानदानाचे हे पुण्य त्यांना कशासाठी पदरात पाडून घ्यायचे होते?आणि ते नेहमी आपल्या ज्या घरी परत निघून गेले ते घर होते कुठे? परत येऊ असे वचन त्यांनी नेहमीच का दिले? सर्व जगभर खळबळ माजवली ते देव खरे होते का खोटे ?


सर्व पुराणकथात देवांचे आगमन,त्यांची वागणूक, विश्वाची निर्मिती,वनस्पती जीवन,प्राणी जीवन,मानव यांची निर्मिती यांची अचूक माहिती आहे.ती काय खोट्या काल्पनिक देवांनी दिली असेल ?


आफ्रिकेतील सर्व जमातींच्या कथा तपासल्या तर त्यात आश्चर्यकारक साम्य आढळून येते.


स्वर्गाचीच गोष्ट घ्या.आपल्या पूर्वजांची स्वर्गाबद्दलची कल्पना तरी काय होती?तो अनंत विश्वातील पोकळीत कुठे तरी होता.त्यावेळी अंतराळप्रवास नव्हता, टेलिस्कोप नव्हते.अब्जावधी ताऱ्यांनी भरलेले हे अज्ञात विश्व त्यांना संपूर्ण अज्ञात होते.तरीही आफ्रिकेतील वेगवेगळ्या धर्माच्या,चालीरितींच्या,संस्कृतींच्या सर्व जमातींच्या आख्यायिकांप्रमाणे स्वर्ग हा अगदी 'गजबजलेला' होता.त्यांचे मूळचे लाल,निळे,गोरे,काळे सर्व देव 'ढगावरील विश्वातून' आले होते.या गजबजलेल्या स्वर्गातून आलेल्या शक्तिमान देवांबद्दल आफ्रिकेतील निरनिराळ्या जमातींच्या आख्यायिका काय सांगतात ?


मसाई : स्वर्गीय जोडप्याने अमर अशा शक्तिमान देवपुत्रांची निर्मिती केली आणि त्यापैकी काही जणांना पृथ्वीवर पाठवले.तसे हे देवही भांडखोरच ! कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांचेही एकमत होत नसे.एका देवाने एखादी गोष्ट बनवली की दुसरे देव कित्येकदा ती मोडून-तोडून टाकीत असत.


शिल्लक भाग पुढील भागात प्रकाशित केले जातील.