मदी-मोरुई : पहिले मानव स्वर्गातच रहायचे.निळ्या पक्ष्याने पृथ्वी आणि स्वर्ग जोडणारी शिडी तोडून टाकीपर्यंत स्वर्गातून पृथ्वीवर आणि पृथ्वीवरून बराच प्रवास चाले.
अशांती : देवाने निर्माण केलेली सात माणसे दोरखंडाने पृथ्वीवर उतरली.इथे मानवांचा जन्म झाल्यावर ती स्वर्गाला परत गेली.
झुलू : झुलू या शब्दाचा अर्थच मुळी स्वर्ग.सर्व झुलू लोक,त्यांचे प्राचीन वंशज थेट स्वर्गातून उतरले म्हणून सांगतात.त्यांच्या देशाला ते 'स्वर्गीय मानवांचा देश' असेच म्हणतात.
मसाई म्हणतात,स्वर्गात प्राणीही होते.सूर्य,चंद्र व तारे यांची निर्मिती करणाऱ्या देवाने पृथ्वीवर वनस्पती जीवन निर्माण केले आणि मगच त्या प्राण्यांना पृथ्वीवर आणले.
टांझानियातील झिबा जमातीचा मूळ देव 'रुगाबा.' त्यांनी त्याची कधी पूजा केली नाही किंवा त्याला बळी वगैरे दिले नाहीत;कारण त्यांना माहीत होते की रुगाबा 'फार दूर-अनंत विश्वात' राहतो.अंतराळात अंधारच असतो.रुगाबाने पहिला माणूस 'अंधार नाहीसा झाल्यावर' (आपल्या पृथ्वी या ग्रहावर पोहोचल्यावरच) निर्माण केला.
स्वर्ग म्हणजे अमरत्व,स्वर्ग म्हणजे सुखाचे आगर असे आपल्या 'मागासलेल्या' पूर्वजांना वाटत होते;असे आजचे विद्वान लोक सांगतात.खोटे आहे ते! स्वर्गातही माणसे मरत असत असे किलिमांजारो येथील जग्गा जमात सांगते.जन्म-मरणाचा फेरा स्वर्गातही चुकत नव्हताच.सत्य आहे.स्वर्ग काल्पनिक नव्हताच मुळी ते होते अंतराळ यांत्रिकांचे निवासस्थान.ते कसे अमर असतील ?
पृथ्वी प्रथम कशी होती? विश्वाची निर्मिती झाली कशी?
झांबियामधील वेम्बा या निग्रो जमातीची आख्यायिका सांगते की त्यांचा देव 'मुकुला' हा स्वर्गात रहायचा. प्रथम त्याने तारे,मग सूर्य आणि चंद्र निर्माण केले.मग प्रकाश निर्माण करून त्याने पृथ्वी निर्माण केली, तिच्यावर प्राणी निर्माण केले.वनस्पतींचे बी पेरले आणि प्राणी आणले.मग त्याने कियोम्बे आणि दोन स्त्रियांना पृथ्वीवर पाठवले. त्यानेअग्नी निर्माण करणारी वस्तू आणली होती.त्याने प्रथम निरनिराळ्या वस्तुंना नावे ठेवली आणि त्यांचा वापर शिकवला.
बुशोंगो त्यांची निर्मिती कशी झाली म्हणतात ?
पहिल्या प्रथम पृथ्वीवर सर्वत्र अंधार होता आणि पाणी. मग बुम्बा हा धिप्पाड आणि गोरा माणूस आला.त्याचे एक दिवस इतके पोट दुखायला लागले की तो ओकायलाच लागला.प्रथम त्याच्या पोटातून बाहेर पडले ते तारे,सूर्य आणि चंद्र ! सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होऊन सागर निर्माण झाले,किनारे निर्माण झाले. मग तो झाडाचे एक रोपच ओकला आणि त्यातून वनस्पती जीवन निर्माण झाले.मग त्याच्या तोंडातून प्राणिमात्र पडले व शेवटी मानव,औषधे,आयुधे आणि अग्नी! त्याने एका माणसाची पृथ्वीवरील देव, पृथ्वीवरील राजा म्हणून नेमणूक केली व तो उडून अंतराळात नाहीसा झाला.
बुम्बाची जग निर्मितीची घाणेरडी तऱ्हा सोडली तर जग निर्मितीबद्दलचे त्याचे ज्ञान आश्चर्याने थक्क करणारे नाही? प्रथम काहीच नाही.मग वाळवंट,चिखल,पाऊस, सूर्याची उष्णता,
जमीन,वनस्पती,प्राणी,माणूस,औषधे, आयुधे,अग्नी हा क्रम कोणत्याही जमातींच्या आख्यायिका चुकवत नाहीत.
मसाईंच्या आख्यायिका विचार करायला लावतात. त्यांच्या 'गोऱ्या' देवाने प्रथम माईतुम्बे हा पहिला माणूस निर्माण केला. स्वर्गातच ! पृथ्वीवर त्याच्या खाण्या-पिण्याची सोय झाल्यावर त्याने त्याला पृथ्वीवर पाठवले आणि तो आफ्रिकेतील 'नोहा' च बनला. जगाचा निर्माता स्त्री नव्हतीच.तेव्हा त्याने स्वतःपासून सात पुरूष निर्माण केले;कारण माईतुम्बे एकाच वेळी स्त्री होता आणि पुरूषही.
आपले पूर्वज कसेही असोत.आपला पहिला मानव एकाच वेळी स्त्री आणि पुरूष होता हे जगातल्या सर्व आख्यायिका कशा सांगतात? ही गोष्ट विचार करण्यासारखी नाही ?
आपले पूर्वज मागासलेले असतील पण मूर्ख नक्कीच नव्हते.एकाच शरीरातून स्त्री-पुरूष निर्माण होतात ही कथा मानवाची निर्मिती कृत्रिमपणे केली होती असे नाही दर्शवत ?
न्होंगा अमो जमातीत एक कथा आहे.चंद्र आणि सूर्य एकदा जेवायला बसले.स्वयंपाक बिघडला होता.सूर्य इतका रागावला की त्याने चंद्राचा चेहराच जाळून टाकला.तेव्हापासून चंद्रावर खड्डे पडले.साधीच गोष्ट; पण चंद्राच्या पृष्ठभागावर खड्डे आहेत याचे ज्ञान हजारो वर्षे चालत आले आहे हेच नाही का सिद्ध होत?
माणसाचे आयुष्य एकदा का ठराविक साच्याचे बनले की त्याच त्याच गोष्टींचे त्याचे कौतुक नाहीसे होते. मेंढपाळ दररोज सूर्योदय पाहतो.त्याची नवलाई त्याला नाही.ती असते शहरात राहणाऱ्या माणसाला.चंद्रावर प्रथम माणसाने पाऊल टाकले तेव्हा श्वास रोखून सर्व जग त्या प्रसंगावर नजर ठेवून होते;पण हीच गोष्ट पुनःपुन्हा घडायला लागल्यावर त्यातले नाविन्यच नाहीसे झाले.टीव्हीवर सुद्धा बातमीत फक्त एकच ओळ वाचायला सुरुवात झाली.
आफ्रिकन आख्यायिकांकडे आधुनिक नजरेने पाहिले तर त्यातल्या किती तरी रिकाम्या जागा भरतील.
आख्यायिका तरी कशी जन्म घेते ?
कल्पना करा की १५००० वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात एक अंतराळवीर उतरला.रानटी मागासलेले पूर्वज भीतीने घाबरून त्यांच्या गुहेत पळून गेले.हळुहळू दररोज त्याला पाहून त्यांच्यातली भीती नाहीशी झाली.त्यांच्यात विश्वास निर्माण झाला.हा परका माणूस त्यांना इजा करू इच्छित नाही,याबद्दल तरी त्यांची खात्री पटली.ते काय म्हणत होते यापेक्षा तो त्यांना स्वतःबद्दल जे सांगायचा प्रयत्न करीत होता हे त्यांना कळू शकत नव्हते हे महत्त्वाचे.
त्यांना ज्या थोड्या फार खाणाखुणा कळत असतात त्यात 'मी देव नाही' असे दर्शवणारे चिन्हच नाही.तो कसे समजवणार त्यांना? त्या रानटी लोकांनी त्याला आकाशातून उतरलेले पाहिलेले असते.तिथे देवच असतात.तो त्यांच्या दृष्टीने देवच राहतो.
त्यांची भाषा येत नसल्याने तो स्वतःशीच बडबडत असतो,'अरे बाबांनो! मी देव नाही.मी तुमच्यासारखाच रक्तामांसाचा माणूस आहे.हात लावून पहा मला.वर आकाशात पहा.तुमच्यासारखाच आकाशात एक ग्रह तिकडे आहे.ते माझे घर.मी उतरताना झालेल्या चकचकाटाने घाबरू नका.मला उतरण्यासाठी जागा शोधताना सर्चलाईटस् वापरावे लागल्याने तो प्रखर प्रकाश पडला होता.हा पहा जनरेटर.या केबल्स.'
यातले काहीही त्यांना कळत नव्हते.कळले असते तरी त्यांनी तो देव नाही हे मान्य केले असते की नाही शंकाच आहे.त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी त्याला आकाशातून उतरताना पाहिलेले असते.ही दैवी शक्तीच की! फक्त देवांकडेच ती असते.काही काळाने तो अंतराळवीर आपल्या 'घरी' निघूनही जातो.
त्या काळात घडलेला अघटित असा प्रकार होता तो.हा अनुभव इतरांना कसा समजावणार? देव एका दैदिप्यमान मागे अग्नी सोडणाऱ्या वाहनातून उतरला होता.दैदिप्यमान म्हणजे कसे? सूर्य सर्वांना माहिती आहे.प्रखर,उष्ण गोळा.मग असेच सांगू या.आकाशातून 'काही तरी' उतरले.सूर्याहून प्रखर,प्रकाशमान, स्वतःभोवती फिरणारे.ते 'काही तरी' जबरदस्त आवाज करीत होते.मेघगर्जनेसारखा! मेघगर्जना सर्वांना कळते ना! ढगातून आलेले 'ते' वाहनासारखे वाटत होते पण वाहने तर जमिनीवर फिरतात.हे वाहन तर उडत होते. सर्वांनी पाहिले होते.कसे समजावणार? पण पक्षी तर उडतात ना? बरोबर,असेच सांगायला पाहिजे.अत्यंत प्रकाशमान वस्तू उतरली.स्वतःभोवती फिरणारी.
सूर्याहून चमकदार,अग्निने वेढलेली आणि पक्ष्याप्रमाणे उडणारी.तशी ती धोकादायकच वस्तु होती पण धोकादायक म्हणजे कशी? जमिनीवर सरपटणाऱ्या सर्याएव्हढी.त्याची सर्वांनाच भीती वाटते आणि ती वस्तूही पूर्ण गोलाकृती नव्हती.
अंड्यासारखी वाटत होती.त्यातून उतरलेल्या देवाने झगझगीत कपडे घातले होते.काही प्राण्यांची शरीरे चमकतात तसे.बरोबर, देवाने घातलेले कपडे चमकणाऱ्या चांदीच्या कातड्यासारखे होते.अशा त-हेने रचली जात जात ती कथा जन्म घेते आणि तरीही तिचा अर्थ आज आपण समजू शकतो. हजारो वर्षांपूर्वीच्या कुठल्या अप्रतिम दृश्याचे वर्णन चालले आहे ते आपण गेल्या ३५-४० वर्षांत जाणून आहोत.
आख्यायिका ? अजूनही आख्यायिकाच? ही तर सत्यकथा आहे.स्वानुभव आहे.
निनेव्ह येथे उजेडात आलेल्या मृत्तिकापत्रात आणखी एक महाकाव्य आहे.एटना! गिलगामेशच्या महाकाव्यात याचा थोडा भाग समाविष्ट आहे पण या महाकाव्याचा उगम तर मानवी इतिहासाच्या आरंभापासून वाटतो. ५००० वर्षांपूर्वीच्या सिलेंडर सीलवर एटनाचे चित्र आहे. ही काय आख्यायिका आहे?
एटना समासदेवाला विनंती करतो की त्याला अमरत्वाची औषधी वनस्पती द्यावी म्हणून.देव त्याला गरुडाकडे पाठवतो.गरूड त्याला विचारतो तुझी काय इच्छा आहे म्हणून.एटना म्हणतो,मला अमरत्वाची औषधी वनस्पती हवी म्हणून.गरूड त्याला घेऊन स्थिर ताऱ्यांच्या दिशेने अंतराळात उड्डाण करतो.या उड्डाणात सहा वेळा गरूड एटनाचे लक्ष नाहीशा होणाऱ्या पृथ्वीकडे वळवतो.थोडा वेळ झाल्यावर गरूड म्हणतो,'मित्रा,बघ! जमीन कशी वेगळी दिसते आहे.समुद्र बघ,पर्वत बघ;जमीन आता टेकडीसारखी आणि समुद्र कालव्यासारखा दिसत आहे.'थोड्या वेळाने गरूड पुन्हा म्हणतो, 'मित्रा बघ ! जमीन कशी वेगळी दिसते आहे.आता ती जंगलासारखी वाटत आहे.'थोड्या वेळाने जमीन एखाद्या झोपडी एव्हढी तर समुद्र अंगणासारखाच दिसायला लागला.आणि उंच उंच गेल्यावर गरूड एटनाचे लक्ष पृथ्वीकडे वळवतो.शेवटी म्हणतो.'बघ! आता जमीन दिसेनाशीच झाली आहे.'
एटना ते बघतो आणि म्हणतो,'जमीन कशी दिसेनाशी झाली ते मी पाहिले,आता तर समुद्रही दिसेनासा झाला आहे;माझी स्वर्गात जायची इच्छा नष्ट झाली आहे.तू मला परत पृथ्वीवर घेऊन जा.'
'गरूड उतरला आहे!' चंद्रावर उतरल्यावर ह्यूस्टन इथे आपल्या अंतराळ यात्रिकांकडून ऐकू आलेले पहिले शब्द ! आता इतिहासात नोंद केले गेलेले !
एटनाचा प्रवासही तितकाच सत्य आहे.स्पष्ट आहे.
जग निर्मितीबद्दलसुद्धा या मृत्तिकापत्रांमध्ये लिहिले आहे.प्रथम अंतराळालाही काही नाव नव्हते.आणि खालच्या पृथ्वीलाही.प्रथम फक्त सागर होता.आणि त्याच्या लाटांचा गंभीर आवाज.त्यावेळी शेते नव्हती, कुठल्या जमाती नव्हत्या.एकही देव अस्तित्वात नव्हता. कुणालाच नावे नव्हती.कुणाचेच भविष्य ठरत नव्हते. मग देवाची निर्मिती झाली.लुहुमु आणि लहामु जन्माला आले.आणि अनंत काळ निघून जातच होता.
आख्यायिका ? की सत्यकथा?
गेल्या महायुद्धात जपानचा पराभव केल्यावर अमेरिकेने पहिली कोणती गोष्ट केली असेल तर शिंटो या त्यांच्या धर्मावर बंदी घातली.जपानचा सम्राट हाच या धर्माचा अधिपती.पृथ्वीचा अधिपती आणि देवांचा राजा हा एकच ! जपानी सम्राट ! ही रूढी मोडणे अमेरिकेला भागच पडले नाही तर देव म्हणून जपानी लोक ज्याची पूजा करीत होते,त्या सम्राटाला कोणत्याही आज्ञा अमेरिकन देऊ शकले नसते.तेव्हा प्रथम त्यांनी जपानी सम्राटाला त्याच्या देवपदावरून भ्रष्ट केले.
या धर्मात महत्त्वाची तीन पुस्तके.कोयिको,कोऊयिकी आणि निहोंगी! तसे हे धर्मग्रंथ प्रथम आठव्या शतकात लिहिले गेले असले तरी त्यांचा उगम वादातीतपणे अत्यंत जुन्या अशा आख्यायिकात आहे.पुनःपुन्हा तीच गोष्ट लिहायचे,टाळायचे म्हटले तर सांगता येईल की, इतर सर्व धर्मग्रंथांप्रमाणेच विश्वाची,
विश्वनिर्मितीची, अंतराळयानांची माहिती निहोंगी या धर्मग्रंथात व्यवस्थित दिली आहे.इतर धर्मग्रंथांचा अर्थ लावताना जी अडचण येते ती यांच्या बाबतीतही येते.
१९१२ मध्ये आल्फ्रेड वेगनर याने पृथ्वीवरील खंडे कशी तयार झाली याबाबत मांडलेला सिद्धांत सागरतळाचे संशोधन केल्यावर खरा ठरला आहे.पॅसिफिक महासागरात प्रथम प्रचंड भू-भाग होता.पुरातन काळात एकदा त्याचे तुकडे उडले आणि आपल्या जागेवरून ढळले.वेगवेगळे होत त्यातून तयार झाली अमेरिका, आफ्रिका खंडे.
शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखामध्ये…