उरुग्वेतून चिलेला जाणारं एक छोटं विमान अँडीज हिमशिखरांमध्ये कोसळतं.जिथे मरण सोपं आणि सर्व यातनांपासून सुटका करणारं ठरू शकतं अशा अँडीजच्या अमानवी वातावरणात विमानप्रवासी तब्बल सत्तर दिवस कसे तग धरून राहतात याची कहाणी.
▶ १२ ऑक्टोबर १९७२. दक्षिण अमेरिकेतल्या उरुग्वे देशाच्या हवाई दलाचं छोटं विमान ४० पॅसेंजर्स आणि पाच कर्मचारी घेऊन चिले या देशाच्या दिशेने उड्डाण करतं.उरुग्वेतल्या एका क्लबची रग्बी टीम मॅच खेळण्यासाठी चिलीला चाललेली असते;पण हवा खराब होते आणि विमानाला अर्जेंटिनातल्या एका शहरात थांबावं लागतं.दुसऱ्या दिवशी हवा निवळण्याची वाट बघत दुपारी तीनच्या सुमारास विमानाचे पायलट पुन्हा उड्डाण करण्याचा निर्णय घेतात;
पण उड्डाणानंतर थोड्याच वेळात हवामान पालटतं,वादळ सुरू होतं आणि त्या तडाख्याने विमान हिमशिखरांमध्ये कोसळतं.
अँडीज म्हणजे हिमालयानंतरची सर्वाधिक उंचीची आणि अफाट पसरलेली पर्वतरांग.ही पर्वतरांग उभी ७००० किलोमीटर आणि आडवी ५०० किलोमीटरचा परिसर व्यापून आहे.अर्जेंटिनाहून चिलेकडे जाणाऱ्या विमानांचे पायलट पाचशे किलोमीटरचा हा अँडीजचा टप्पा अक्षरशःनशिबाच्या भरवशावरच पार करत असतात.( नँडो पॅरेडो,रॉबर्ट कनेसा आणि इतर अँडीजवरचा चमत्कार,मृत्यू पाहिलेली माणसं,गौरी कानेटकर,समकालीन प्रकाशन ) कारण इथे हवा कधी पालटेल आणि त्याचा तडाखा विमानाला कधी बसेल हे सांगणं अशक्य... आणि अँडीजमध्ये कोसळणं म्हणजे मृत्यू !
अशा अँडीजमध्ये दुपारी साडेतीनच्या सुमारास उरुग्वेचं विमान कोसळतं.एका शिखरावर आपटून विमानाचा शेपटाकडचा भाग तुटतो.विमान तसंच पुढे जात राहतं आणि तिन्ही बाजूंनी शिखरांनी वेढलेल्या एका पठारावर येऊन आदळतं;पण आश्चर्य म्हणजे ना विमानाचा भडका उडतो ना चक्काचूर होतो.विमान जमिनीवर स्थिरावतं तेव्हा विमानातल्या साऱ्यांनाच मृत्यूने गाठलेलं नसतं.आपलं विमान कोसळलंय हे कळल्यावर साहजिकच पहिली प्रतिक्रिया असते ती हात-पाय गाळून मदतीची वाट बघणं.इथे तर बरेचसे खेळाडू विशीच्या आतले कोवळे तरुण असतात,पण तरीही त्यातले काही झपाट्याने सावरतात.आपल्या मित्रांपैकी कोण जिवंत आहे,कुणाला किती लागलंय याचा अंदाज घेऊ लागतात.काहीजण नशिबाने पहिल्या फटक्यातच मरण पावलेले असतात,पण बाकीच्यांची परिस्थिती मृत्यू परवडला असं म्हणण्याजोगी असते.
हादऱ्यामुळे माणसं विमानाच्या सीट्समध्ये अडकलेली असतात.
काहींचे पाय तुटलेले असतात,काही वरून हाती पायी घड दिसत असले तरी त्यांना अंतर्गत जखमा झालेल्या असतात.कित्येकजण बेशुद्ध पडलेले असतात,तर काही शुद्धीवर असूनही धक्क्यामुळे त्यांचं भान गेलेलं असतं.
खेळाडूंमपले दोघं मेडिकलचे विद्यार्थी असतात.रॉबर्ट कनेसा आणि गुस्ताव्ह झर्बिनो.हे दोघं तातडीने जखमींच्या परिस्थितीचा अंदाज बांधायच्या कामाला लागतात.जे खेळाडू जायबंदी झालेले नसतात तेही इतरांच्या मदतीला धावतात.त्यात मुख्य असतो तो त्यांच्या टीमचा कॅप्टन मार्सेलो पेरेझ.कॅप्टन असल्यामुळे तो फटाफट सूत्रं आपल्या हातात घेतो आणि काम सुरू करतो.काही मुलं विमानाच्या बाहेर पडून पाहतात,तर आजूबाजूला केवळ बर्फ आणि बर्फ पसरलेला असतो.त्यांच्या तिन्ही बाजूंनी प्रचंड हिमशिखरं आकाशाला भिडलेली असतात.त्यांची पहिली प्रतिक्रिया असते,संपलं सारं !
या परिस्थितीला प्रत्येक व्यक्तीचा प्रतिसाद वेगळा असतो.
काहीजण विमानाबाहेरच्या बर्फात सुन्नपणे बसून सिगरेट ओढत राहतात.काहीजण भीतीने गोठून रडत राहतात,तर काही घडाक्याने काम करू लागतात. जखमींना थोड्या वेळासाठी बाहेर काढून विमानाची आवराआवर करतात.मदत येईपर्यंत सर्वांना बसायला थोडी जागा असावी असा त्यांचा प्रयत्न असतो.
विमानातल्या परिस्थितीचा पहिला अंदाज येईतो दुपारचे चार वाजलेले असतात.अँडीज हिमशिखरांच्या त्या बेचक्यात हळूहळू अंधारू लागतं आणि बर्फ पडायला सुरुवात होते.एव्हाना विमान कोसळल्याची बातमी कळली असेल आणि मदत रवानाही झाली असेल असं साऱ्यांना वाटत असतं.विमानातून बाहेर सिग्नल देण्याची सोय असेल तर आपलं नेमकं स्थान सांगता येईल,या विचाराने काहीजण पायलटच्या केबिनमध्ये डोकावतात.
मुख्य पायलट मरण पावलेला असतो,तर को-पायलट समोरचा डॅशबोर्ड आणि सीट यात अडकून जायबंदी झालेला असतो. मुलं त्याच्या मदतीने विमानातला रेडिओ सुरू करता येतो का बघतात;पण लक्षात येतं की ते यंत्र बॅटरीखेरीज पूर्ण निकामी आहे.
थोड्याच वेळात संध्याकाळचे सहा वाजून जातात.पूर्ण अंधारतं.
आता आज सुटका होणं शक्य नाही हे त्यांना कळून चुकतं.
विमानात आहे त्या जागेत दाटीवाटीने बसून सकाळ होण्याची वाट बघण्याशिवाय त्यांच्या हातात काही नसतं.तापमान शून्याच्या किती तरी खाली गेलेलं असतं.कुणाकडेच पुरेसे गरम कपडे नसतात. एरवी अतिदक्षता विभागातच दाखल करावं लागलं असतं अशी अनेकांची प्रकृती असते.आणि इथे तर धडधाकट माणसालाही जगण्यासारखी स्थिती नसते. अशा परिस्थितीत रात्रभर आपला टिकाव कसा लागणार,हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात उभा असतो. 'ठीक आहे,एक रात्र कशीबशी काढावी लागेल, सकाळी सुटका होईलच',या भरवशावर सगळे विमानात गोळा होतात.तिथे शक्य तितकी जागा तयार केली जाते.
प्रवाशांच्या बॅगा एकमेकांवर रचून उघडा भाग झाकला जातो.
बॅगांमध्ये सापडतील तेवढे कपडे अंगावर घालतात.तरीही थंडी कमी होत नाही.शेवटी सीट कव्हर्स काढून ती ब्लॅकेटसारखे गुंडाळण्याची कल्पना कुणाला तरी सुचते.जखमींना कमीत कमी त्रास होईल अशा स्थितीत पडून हे प्रवासी एकमेकांच्या आधाराने रात्र सरण्याची वाट पाहत राहतात.त्यांना सोबत असते ती आपल्या मित्रांच्या मृतदेहांची.
थंडी हाडं गोठवणारी असते;पण त्याहून अधिक भीतिदायक असतं ते घबराटीचं आणि उद्रेकाचं वातावरण.विमानातल्या प्रत्येक जखमीला वाटत असतं की आपली अवस्था सर्वात वाईट आहे.प्रत्येकजण ते आरडाओरडा करून दुसऱ्या व्यक्तीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो.जागा एवढी कमी असते,की कुणी एकाने हालचाल केली की आजूबाजूच्या सर्वांना त्याचा त्रास भोगावा लागत असतो.सगळीकडून कण्हण्याचे आवाज येत राहतात.कुणी मदतीसाठी ओरडत असतं, कुणी मृत्यूची याचना करत असतं.नँडो पॅरेडो या खेळाडूची तरुण बहीण आणि आई दोघीही त्याच्यासोबत आलेल्या असतात.अपघातात त्याची आई जागीच मरण पावलेली असते,तर नँडो बेशुद्ध पडलेला असतो.
त्याच्या बहिणीला जबरदस्त मार लागलेला असतो.रात्रभर ती आईसाठी रडत राहते.मधूनच तिचं मन भरकटतं आणि ती बालगीतं म्हणायला सुरुवात करते.एवढी प्रदीर्घ आणि भयानक रात्र त्यांच्यापैकी कोणीही आजवर अनुभवलेली नसते.
सकाळ होते.उठल्यावर लक्षात येतं की त्या भयानक रात्रीने तिघांचा बळी घेतलेला असतो.ते वास्तव स्वीकारून 'डॉक्टर्स' बचावलेल्यांची काळजी घेण्याच्या कामाला लागतात.जखमींवर उपचार करण्यासाठी ना त्यांच्याकडे पुरेसं ज्ञान असतं ना तशी साधनं हाताशी असतात.जखमांवर अँटिसेप्टिक म्हणून ओडी कोलोन लावून जखमा कपड्यांनी बांधल्या जातात.ज्यांची हाडं तुटलेली असतात त्यांना हालचाल न करण्यास बजावलं जातं.
अनेकांना शरीराच्या अंतर्गत अवयवांना जखमा झालेल्या असतात.त्यावर या दोघांकडे काहीच उपाय नसतो.आज दिवसभरात किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी सुटका होईल याची प्रत्येकाला खात्री असते.
तरीही कॅप्टन मार्सेलो विमानात सापडलेल्या खाण्याजोग्या पदार्थांचं रेशनिंग करण्याचा निर्णय घेतो. काय असतात हे पदार्थ ? तर चॉकलेटची आठ पाकिटं, चिक्कीची पाचपाकिटं,
खजूर,जॅमच्या छोट्या बाटल्या आणि वाइन-व्हिस्की आणि ब्रँडीच्या काही बाटल्या.
मार्सेलो प्रत्येकाला चॉकलेटचा एकेक तुकडा वाटून देतो.
दिवसातून दोन-तीन वेळा विमानाचे आवाज ऐकू येतात.त्या आवाजाने प्रत्येकाच्या छातीची धडपड वाढते.झालीच आता सुटका,असं मनात येतं;पण पुढे काहीच घडत नाही.ढगाळ हवेमुळे विमानं खाली उतरू शकत नसणार,अशी समजूत काढून मुलं स्वतःचं समाधान करून घेतात.संध्याकाळ होते,अंधारून येतं आणि आणखी एका रात्रीला सुरुवात होते.अर्थात दिवसभरात मुलांनी मृतदेह बाहेर नेलेले असतात आणि शक्य तितकी जागा करून ठेवलेली असते.त्यामुळे ही रात्र थोडी बरी जाते.
तिसरा दिवस निरभ्र उजाडतो.त्यामुळे आज सुटका नक्की याबद्दल कुणालाच शंका वाटत नाही.मन थोडं उल्हसित झाल्यामुळे अँडीजच्या रौद्र सौंदर्याकडेही कुणाकुणाचं लक्ष जातं.शिवाय मदत पोहोचेपर्यंत काही तातडीचे प्रश्नही त्यांना सोडवायचे असतात. त्यातला मुख्य प्रश्न असतो तो पिण्यासाठी पाणी मिळवण्याचा.एकाला कल्पना सुचते.तुटून पडलेल्या विमानाच्या सीटमधला अल्युमिनियमचा एक तुकडा वाकवून तो त्याचा द्रोणासारखा आकार तयार करतो. त्यात बर्फ भरून उन्हात ठेवला की थोड्या वेळात पाणी जमा होऊ लागतं.मग मुलांची एक टीम असे अल्युमिनिमचे तुकडे तयार करून पाणी गोळा
करण्याच्या कामाला लागते.
मार्सेलो इतर मुलांमधून आणखी काही पथकं तयार करतो
.कनेसा,झर्बिनो हे दोघं डॉक्टरचं काम करत असतात.लिलियाना मेथॉल ही पस्तिशीची बाई त्यांची मदतनीस नर्स बनते.तिचा नवरा अति उंचीचा त्रास झाल्यामुळे झोपून असतो.त्याची काळजी घेण्याबरोबरच वयाने तरुण असलेल्या खेळाडूंनाही ती मोठ्या बहिणीसारखी आधार देत राहते.त्या दिवशी पुन्हा एकदा विमानाचा आवाज ऐकू येतो.आता या वेळी तर खात्रीच पटते,की मदत आली.त्या उत्साहात सारे आपापली कामं सोडून विमानाची वाट पाहत राहतात.काहीजण आनंदामध्ये वाइनच्या काही बाटल्या रिकाम्या करतात,रेशनिंग थांबवून चॉकलेट्स संपवतात.पण त्या दिवशीही मदत येत नाही. रात्री सगळ्यांनाच निराशा घेरून राहते.
त्यात काही जण अविचाराने वाइन आणि चॉकलेटवर तुटून पडल्यामुळे एकमेकांमध्ये भांडणंही जुंपतात.त्यामुळे ती रात्र पुन्हा सर्वांसाठी त्रासदायक ठरते.शिवाय गंभीर जखमा झालेल्यांसाठी एवढ्या दाटीवाटीत झोपणं वेदनादायी असतं.रात्री एखाद्याला नैसर्गिक विधीसाठी उठून बाहेर जावं लागलं तर सर्वांना तुडवत जाणं भाग असतं. त्यावर कनेसा एक उपाय शोधतो.
विमानातल्या सामानातूनच तो या जखमींसाठी हॅमॉक तयार करतो.हे हॅमॉक्स झोपायला फारसे सोईचे नसतात,पण किमान तिथे त्यांना सतत दुसऱ्यांच्या लाथा लागत नाहीत आणि खालच्यांसाठी झोपायला जास्तीची जागा तयार होते.आपल्याला याचं आश्चर्य वाटतं,की मन बधिर व्हावं अशा अपघातातही या तरुणांची डोकी चालू असतात.आपला आणि आपल्या सोबत्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी त्यांच्या सुपीक डोक्यातून सतत नव्या कल्पनाही बाहेर पडत असतात.
चार दिवस उलटूनही मदत येत नाही,तेव्हा पहिल्यांदा नँडो पॅरेडोच्या मनात येतं,की सुटकेसाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार.तोपर्यंत हा मुद्दा कुणाच्याही डोक्यातच आलेला नसतो.
आज नाही तर उद्या मदत येईल;तोपर्यंत वाट पाहायची,हे सरळ असतं.पण पहिले दोन दिवस बेशुद्ध असणारा नँडो तिसऱ्या दिवशी झपाट्याने बरा होतो आणि बाजूच्या शिखरावर चढून पलीकडे काय आहे हे बघायला हवं यासाठी मित्रांच्या मागे लागतो.जवळपास सारे त्याला वेड्यात काढतात. 'गेले चार दिवस एक चॉकलेटचा तुकडा आणि दोन घोट पाण्यावर आपण जगतो आहोत.एवढं उंच शिखर चढणार कसं?' हा त्यांचा सवाल असतो.ते खरंच असतं. पण नँडो एका मित्राशी बोलताना म्हणतो,"मी पायलटचं मांस खाईन.शेवटी त्याच्यामुळेच तर आपण इथे अडकून पडलोय."
विक्षिप्तपणा म्हणून त्या त्याचा मित्र हे बोलणं हसण्यावारी नेतो.पण आणखी दोन दिवस उलटल्यावरही मदत येत नाही म्हटल्यावर डोंगर चढून जाण्यासाठी मोहीम काढायचं ठरतं.
टीममधले त्यातल्या त्यात चार दणकट तरुण शक्य त्या तयारीनिशी निघतात;पण पाच-सहा दिवसांच्या उपासमारीमुळे त्यांच्या अंगात फारशी शक्ती नसते.त्यामुळे बर्फातून एकेक पाऊल उचलणं म्हणजे आई आठवणारं काम असतं.तरी हे चौघं कसेबसे चढत राहतात.
थोडं वर गेल्यावर मागे वळून पाहतात,तर त्यांना त्यांचं पडलेलं विमान दिसेनासे झालेले असतात.बर्फाच्या कुशीत पांढरं विमान पूर्णपणे लपून गेलेलं असतं.एवढ्या जवळूनही विमान दिसत नसेल,तर सुटका करण्यासाठी येणाऱ्या विमानांना ते दिसेल अशी अपेक्षा करणं हास्यास्पद असतं.
सूर्य वर येतो तसतसं बर्फ वितळू लागतं आणि चालणं आणखी अवघड होतं.त्यातला एकजण हिमदरीत पडता पडता वाचतो.
शेवटी चौघंही परतण्याचा निर्णय घेतात; पण येताना त्यांची शक्ती पूर्ण खलास होते.स्वतःला अक्षरशःओढत ते कसेबसे विमानात पोहोचतात.या मोहिमेनंतर विमानात नैराश्याची लाट पसरते. विमान वरून दिसतच नाही,तर सुटका होणार कशी? शिवाय शिखराचा छटाक भाग चढताना आपल्यातल्या तगड्या लोकांची अवस्था,तर इथून स्वतःहून बाहेर पडण्याच्या गोष्टी कशाच्या जीवावर करायच्या?पण अशा वेळी कोणी ना कोणी अशेचे बोल बोलून सर्वांचा धीर टिकवून.ठेवत असतं.अपुर्ण राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखात.।।