* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: अँडीजवरचा चमत्कार / Miracle on the Andes

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२७/१/२६

अँडीजवरचा चमत्कार / Miracle on the Andes



अँडीजवरच्या यशकथेवर पीअर्स पॉल रीड या लेखकाने लिहिलेलं 'अलाइव्ह' हे पुस्तक जगभर प्रचंड गाजलं. या अपघातातून वाचलेल्या सोळाजणांशी, त्यांच्या नातेवाइकांशी, तसंच मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाइकांशी बोलून रीड यांनी ही कहाणी जिवंत केली. त्या वेळी ते स्वतः या मुलांच्या कहाणीत ते इतके गुंतून गेले होते की मुलं त्यांना सतरावा सर्व्हयव्हर म्हणत! याखेरीज नँडो पॅरेडो आणि रॉबर्ट कनेसा यांनीही स्वतःच्या कहाणीवर अनुक्रमे 'मिरॅकल ऑन अँडीज' आणि 'आय हॅड टु सर्काइव्ह' ही पुस्तकं लिहिली. या लेखासाठी मुख्यतः 'अलाइव्ह' या पुस्तकाचा आधार घेतला आहे.


त्यानुसार १५ नोव्हेंबरला अपघात होऊन ३३ दिवस होऊन गेल्यानंतर नँडो कनेसा आणि विंझटिन मोहिमेवर निघतात; पण नेमकी त्या दिवशी एवढी हिमवृष्टी होते की त्यांना लगेचच पुन्हा विमानाकडे परतावं लागतं. दोन दिवसांनंतर ते पुन्हा बाहेर पडतात. या वेळी विमानाच्या ठिकाणापासून खाली उतरून थोडं पुढे गेल्यानंतर त्यांना विमानाचं शेपूट सापडतं. त्यांच्यासाठी तो जणू खजिनाच असतो. त्यात अनेक बॅगा असतात. त्यात या तिघांना बरेच नवे कपडे मिळतात. प्रत्येकजण अंगावरचे घाणेरडे कपड़े काढून कपड्यांचे नवे थर घालतो. त्याशिवाय वाचायला कॉमिक्स आणि  कॅमेरा अशी कमाईही होते. कॅमेरा अजूनही चालू स्थितीत असतो. (त्यामुळेच अँडीजवर अडकलेल्या या मुलांच्या वास्तव्याचे फोटो आज आपल्याला बघायला मिळतात.) पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्यांना विमानाच्या रेडिओची बॅटरी सापडते. ही बॅटरी काढून रेडिओला लावली तर बाहेरच्या जगाशी संपर्क करता येईल असं त्यांना वाटत असतं; पण बॅटरी इतकी जड असते की तिथून ती इंचभरही हलत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी विमानाकडे परतून रेडिओ आणि त्यातल्या त्यात रेडिओची माहिती असणारा रॉय हार्ले यांना घेऊन पुन्हा इथे यायचं असं ते ठरवतात. त्या रात्री विमानाच्या त्या शेपटात त्यांना खूप काळात न मिळालेला आराम अनुभवता येतो. तिघं परततात. दुसऱ्याच दिवशी रेडिओ आणि रॉयसह ही पलटण पुन्हा तोच रस्ता चालू लागते. रॉय खूप खटपटी करतो, पण रेडिओ सुरू होत नाही. बाहेरच्या जगाशी संपर्क करण्याचा त्यांचा शेवटचा प्रयत्नही फोल ठरलेला असतो. परतीचा प्रवास रॉयसाठी विशेष अवघड ठरतो. शेवटच्या चढणीपाशी त्याच्यातले त्रास संपतात. मला इथेच सोडा, अशी विनवणी करत तो बर्फात पडून राहतो. त्याची वाट पाहत एका जागी थांबलो तर आपणही संपून जाऊ हे माहिती असूनही नँडो थांबून राहतो, त्याला ऐकवणार नाहीत अशा शिव्या घालत त्याच्यातली धुगधुगी पुन्हा जागी करतो. अगदी शेवटच्या टप्प्यावर तर तो कुठून शक्ती आणतो माहिती नाही, पण रॉयला अक्षरशः उचलून तो विमानापर्यंत घेऊन येतो.


या मोहिमेने झालेली शरीराची झीज भरून काढायला काही दिवस जातात. त्यानंतर तिघं पुन्हा एकदा बाहेर पडतात. या वेळी त्यांनी बऱ्यापैकी तयारी केलेली असते. प्रत्येकाने अंगावर पँट आणि शर्ट्सचे अनेक थर चढवलेले असतात. त्यावर तीन-तीन स्वेटर्स, मेलेल्या माणसांच्या कातडीपासून तयार केलेले सॉक्स,मांसाने भरलेली सॉक्सची पिशवी, पाण्याची बाटली, विमानातल्या सामानापासून तयार केलेले गॉगल्स, असा सगळा जामानिमा असतो. शिवाय या वेळी त्यांच्याकडे तिघंही मावतील अशी स्लीपिंग बॅगही असते. जाता जाता.


नँडो मागे वळतो आणि 'अन्नसाठ्या'ची जबाबदारी बघणाऱ्या मित्राला सांगतो, "समजा तशीच वेळ आली, तर माझ्या आई आणि बहिणीचं शरीर वापरायलाही मागेपुढे बघू नका." ." त्याच्या या वक्तव्याने तो मित्रच नव्हे तर आपणही गारद होऊन जातो. हे सांगण्याची ताकद नॅडोकडे कुठून येते ?


(तिघंही पश्चिमेकडे चालू लागतात.मरण्याआधी पायलट जे बोललेला असतो त्यावरून मुलांच्या लक्षात आलेलं असतं, की पश्चिमेकडे काही अंतरावर चिली देशाची हद्द सुरू होत असणार. त्यानुसार शेवटची मोहीम त्या दिशेने निघते. दिवसभर न थांबता चालत राहिलं तर रात्रीपर्यंत आपण किमान शिखराच्या जवळपास तरी पोहोचू, असा त्यांचा अंदाज असतो; पण प्रत्यक्षात बर्फामध्ये सगळीच अंतरं फसवी असतात. आत्ता दिसतंय ते टोक म्हणजे शिखर, असं वाटत असताना तिथे पोहोचल्यावर शिखर अजून बरंच वर असल्याचं त्यांच्या लक्षात येतं आणि नाइलाजाने ते तिघं पुन्हा शक्ती गोळा करून त्या दिशेने चालू लागत लागतात. 


जिथे अँडीजमधली हिमशिखरं सर करणं कसलेल्या गिर्यारोहकांसाठीही जवळपास अशक्य असतं, तिथे गिर्यारोहणातला 'ग' देखील माहिती नसलेली, महिनाभर उपाशी असलेली आणि गिर्यारोहणाची कोणतीही साधनं सोबत नसलेली तरुण पोरं केवळ इच्छाशक्तीच्या बळावर ती शिखरं चढत असतात.त्यातही सर्वांत पुढे असतो तो नँडो. लवकरात लवकर सुटका करून घेण्याच्या आणि पल्याड काय आहे हे पाहण्याच्या इच्छाशक्तीने त्याचा असा काही ताबा घेतलेला असतो की थकलेलं शरीर अस्तित्वातच नसल्यासारखा तो चालत असतो. त्याच्या झपाट्याला कनेसा आणि विंझटिन दोघंही पूरे पडत नसतात.


संध्याकाळ होते.अजून शिखर दृष्टिक्षेपातही नसतं. त्यामुळे अखेर त्यातल्या त्यात बरी जागा बघून रात्र काढायचा निर्णय होतो. ही जागा सपाटही नसते. फक्त समोर खडक असल्याने आपण खाली कोसळणार नाही, एवढाच काय तो दिलासा असतो. जवळपास उभ्यानेच झोपून हे तिघं रात्र घालवतात. उठतात ते पूर्ण गोठलेल्या अवस्थेत. अशी आणखी एक रात्र काढायला लागली तर आपण जिवंत असू का, हा विचार तिघांच्याही मनात येतो; पण नँडो थांबायला किंवा परतायला तयार नसतो. दुसऱ्या दिवशी दुपारी दोघा सोबत्यांना मागे टाकून तो अखेर शिखरावर पोहोचतो; पण ज्या आशेने तो हे शिखर चढून आलेला असतो.त्यावर पाणी फिरतं.शिखरावरून चहुबाजूंनी दिसत असतात त्या केवळ हिमाच्छादित पर्वतरांगा. कुठेही पर्वतरांगा संपून जीवन सुरू होत असल्याचं चिन्ह नसतं. त्यांच्या धडपडीची अखेर झालेली असते.


नॅडोच्या जागी कुणीही असतं तरी त्या शिखरावर शरीर टाकून तिथेच मृत्यूची वाट बघणं त्याने पत्करलं असतं किंवा पुन्हा विमानात जाऊन आपल्या सोबत्यांसोबत मृत्यूची वाट बघण्याचा मार्ग स्वीकारला असता. पण नँडो हार मानायला तयार नसतो. शरीरात त्राण नसताना आणि पुढे काय आहे याची पुसटही कल्पना नसताना तो पुढे चालत राहण्याचं ठरवतो. त्या परिस्थितीतही नँडोला आपण हे शिखर चढणं किती मोलाचं आहे याची जाणीव असते. या शिखरावर पोहोचलेला आपण पहिलाच माणूस असू, या विचाराने त्याचं मन भरून येतं. फाटलेल्या ओठांसाठी औषध म्हणून सोबत आणलेली लिपस्टिक घेऊन तो एका प्लास्टिक पिशवीवर 'माऊंट सेलर' असं लिहितो आणि एका दगडाखाली ठेवून देतो. त्या शिखराला त्याने स्वतःच्या वडिलांचं नाव दिलेलं असतं !


नामकरणाचं काम आटोपल्यावर तो परत एकदा परिस्थितीचं अवलोकन करू लागतो. त्याच्या लक्षात येतं, की हे शिखर उतरून पल्याड गेलं की काही किलोमीटरनंतर एक दरी आहे, जिथे बर्फाचं प्रमाण बरंच कमी झालेलं दिसतं आहे. पण तिथपर्यंत चालत जाणं शक्य आहे का? त्याच्या मनात त्याबद्दल शंकाही येत नाही. तो शिखर उतरून कनेसा आणि विंझटिन थांबलेले असतात तिथे येतो आणि कनेसाला सांगतो, "आपण विंझटिनला परत विमानाकडे पाठवू आणि त्याचा अन्नसाठा आपल्याकडे ठेवून घेऊ. म्हणजे आणखी काही दिवस आपल्याला तग धरून राहता येईल." नॅडोच्या वेड्या आशेवर विश्वास ठेवून त्याच्यासोबत जावं की सध्या सुरक्षित वाटणाऱ्या दुसऱ्या पर्यायाकडे, विमानाकडे परतावं हे कनेसाला कळत नाही. त्याचं शरीर त्याला सांगत असतं, की आता पुढे चालत राहणं तुझ्या क्षमतेपलीकडचं आहे; पण तरीही का कुणास ठाऊक, अखेर तो नँडोसोबत जाण्याचा निर्णय घेतो. विंझटिन त्या दोघांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यांच्याकडे सोपवून मागे फिरतो आणि सुरू होतो या दोघांचा अखेरचा प्रवास.


दोघं पुन्हा एकदा माऊंट सेलर चढू लागतात. दोघंही इतके थकलेले असतात की दर चार पावलांनी त्यांना थांबावं लागत असतं. अखेर शिखर येतं आणि उतार सुरू होतो. उतरण्यासाठी शक्ती कमी लागत असते; पण चुकून एक पाऊल चुकीचं पडलं तरी मृत्यू ठरलेला. एखादं हाड मोडलं तरी अशा ठिकाणी परिणाम

तोच मृत्यू. त्यातून कनेसाची शक्ती आणि इच्छाशक्ती दोन्ही संपत आलेली असते. तो सतत नॅडोच्या मागे पडत असतो आणि त्याला हाका मारून आपण मागे असल्याची आठवण करून देत असतो. 


दुपार होते तेव्हा ते एका सपाटीवर पोहोचतात.अजून अंधारू लागलं नसलं तरी ती जागा मुक्कामासाठी चांगली वाटल्याने दोघंही तिथे थांबायचं ठरवतात. सूर्य अजूनही तळपत असल्यामुळे बर्फाने ओले झालेले कपडे काढून ते सुकवत ठेवतात. मांसाचे थोडे तुकडे आणि ब्रँडी असं जेवण करून स्लीपिंग बॅगमध्ये शिरतात. थंडी थोडी कमी झालीय याचा अर्थ आपण आता अँडीजच्या शेवटाला आलो असणार, अशी स्वतःची समजूत घालत ते झोपी जातात.


दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य वर आल्यावर न्याहारी करून ते पुन्हा चालू लागतात. रात्रीच्या विश्रांतीमुळे ते काही काळ झपाट्याने चालतात; पण लवकरच तो उत्साह संपतो आणि थकवा जाणवू लागतो. पूर्ण संपलेल्या शरीराकडे दुर्लक्ष करण्यासाठी कनेसा सतत देवाशी बोलत असतो. त्याचं देवाला मागणं असतं, 'हा प्रवास तुला जितका अवघड करायचाय तितका कर पण तो अशक्य होऊ देऊ नकोस.' नॅडोचे विचार आकाशातल्या बापापेक्षा पृथ्वीवरच्या त्याच्या सख्ख्या बापावर केंद्रित झालेले असतात.


दुपार उलटून गेल्यानंतर ते पुन्हा मुक्कामाची तयारी करतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की शिखरावरून पाहिलेली दरी आता बरीच जवळ दिसू लागलेली आहे. संध्याकाळ व्हायला आली असली तरीही अजून अंधाराची चिन्हं नाहीत. पर्वतरांगा संपत आल्याचंच हे चिन्ह असतं. सकाळी उठून पुन्हा चालणं सुरू होतं. आता कनेसाचा वेग आणखी मंदावतो. पावलं वाकडीतिकडी पडू लागलेली असतात. तो सतत नँडोला थांबण्यासाठी हाकारत असतो; पण शरीर तितकंच थकलेलं असलं तरी नॅडोचं मन त्याला पुढे पुढे खेचत असतं. अशाने अतिश्रमाने मरशील, हा कनेसाचा इशाराही तो कानाआड करतो. बर्फ कमी होऊ लागलेला असतो आणि आता पुढे काय दिसेल या ओढीने नँडो अक्षरशः पळत दरीच्या | शेवटाला येऊन पोहोचतो.


जे समोर दिसतं तो त्यांना स्वर्ग वाटतो! बर्फ संपून प्रचंड मोठे खडक उघडे पडलेले असतात आणि त्यामधून एक छोटा झरा वाहत असतो. झऱ्याच्या दोन्ही काठांवर गवत आणि दगडांवर शेवाळं उगवलेलं असतं. गवतात नाना प्रकारचे किडे बागडत असतात, पाली हिंडत असतात, पक्षी उडत असतात. हे दृश्य पाहून नँडो आणि कनेसा दोघंही आनंदाने वेडे होतात. गटागट झऱ्याचं पाणी पिऊन तेगवतात लोळण घेतात. कितीं तरी वेळ ते तिथेच पडून राहतात. अजून माणसांच्या वस्तीचा मागमूस लागला नसला तरी अँडीजच्या कराळ जबड्यातून त्यांची सुटका झालेली असते.


अर्थात प्रवास अजून संपलेला नसतो. आणि शेवटचा हा टप्पाच कनेसासाठी अतिशय कठीण ठरतो. त्याला जुलाबाचा त्रास होऊ लागतो; पण त्याच्या पाठीवरची पिशवी स्वतःकडे घेऊन नँडो चालतच राहतो. थोड्याच वेळात ते दोघं एका नदीच्या काठी पोहोचतात. नदीकाठी हिरवळ असते, झाडं असतात. थोडं लक्ष देऊन पाहिल्यावर कनेसाला अनेक मानवी खाणाखुणाही दिसू लागतात. काही झाडं कापलेली असतात. वाळलेली का असेना पण जनावरांची विष्ठा असते. थोड्या वेळाने नदीच्या पल्याड गाई चरत असल्यासारखंही त्याला वाटतं. आता आपण सुटलो, या आनंदात शेकोटी पेटवून ते मांस भाजून खातात आणि झोपी जातात. सकाळी उठल्यावर दोघांच्याही मनात पहिला विचार येतो तो उरलेलं मानवी मांस पुरून टाकण्याचा. दुसरा माणूस भेटण्याआधी ते काम केलं पाहिजे, असं दोघांनाही वाटत असतं. दोघं पुन्हा चालू लागतात. अखेर थोड्या वेळाने कनेसाला पल्याडच्या बाजूला घोड्यावर बसून चाललेली दोन माणसं दिसतात.


नँडो जिवाच्या आकांताने ओरडत त्यांचं लक्ष वेधून घेतो; पण खळाळत वाहणाऱ्या नदीतून त्याचा क्षीण आवाज त्यांना ऐकू जाईल का ही शंकाच असते. पण आता दैव त्यांच्या साथीला असतं. त्या माणसांना हे दोघं दिसतात. अर्थात बोललेलं ऐकू जात नसल्यामुळे ती माणसं दगडाला कागद आणि पेन बांधून या काठावर फेकतात. नँडो त्यावर घाईघाईने खरडतो, 'आम्ही उरुग्वेच्या विमान अपघातातून बचावलेले प्रवासी आहोत. आमच्याकडे खायला काहीही नाही. आमचे १४ सहप्रवासी अजूनही अँडीजच्या पोटात जिवंत आहेत.' ते वाचून तिकडून उत्तर येतं- 'उद्या!' त्याचबरोबर आणखीही एक दगड नॅडोच्या पुढ्यात येऊन पडतो. त्या दगडाला एक ब्रेडचा तुकडा बांधलेला असतो. तो तुकडा वाटून खाताना नँडो आणि कनेसाला रडू फुटतं. 'आपण वाचलो', एवढंच म्हणत ते किती तरी काळ रडत राहतात. विमान कोसळल्यानंतर सत्तराव्या दिवशी आणि तब्बल दहा दिवस चालून ते पुन्हा बाहेरच्या जगात पोहोचलेले असतात.


दुसऱ्या दिवशी या दोघांना घेऊन जायला घोड्यांवरून माणसं येतात. उरुग्वे विमान अपघातातले प्रवासी सापडल्याची बातमी सगळीकडे पोहोचते. विमानात अडकलेल्यांना सोडवण्यासाठी नँडोला घेऊन हेलिकॉप्टर्स अँडीजमध्ये रवाना होतात. नँडो आणि कनेसासह सर्व १६ प्रवाशांची सुखरूप सुटका होते.


या घटनेला आता ४५ वर्षं उलटून गेली आहेत, पण इच्छाशक्तीच्या बळावर मृत्यूला पुरून उरलेल्या तरुणांची ही गोष्ट आजही 'अँडीजवरचा चमत्कार' बनून जगाला आश्चर्यचकित करते आहे.


हा तीन भागातील लेख संपला…!!