* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: अँडीजवरचा चमत्कार / Miracle on the Andes

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२५/१/२६

अँडीजवरचा चमत्कार / Miracle on the Andes

आठव्या रात्री नैंडोची बहीण सुझाना मरते. त्यानंतर प्रत्येकालाच आपल्या मित्रांकडे बघून सर्वांची शक्ती झपाट्याने कमी होत चालल्याचं लक्षात येतं. चॉकलेटचा एक छोटा तुकडा, एक चमचा जॅम आणि बाटलीचं एक टोपण भरून वाइन, एवढाच त्यांचा दिवसभरातला आहार असतो. आता अन्न मिळालं नाही तर आपण हळूहळू मरत जाणार याची जाणीव प्रत्येकाला आतून होते. पण अन शोधणार कुठे ? बाहेर ना गवताचं पातं असतं, ना कुठले कीटक, ना एखादा पक्षी. 


काहीजण बाहेर बर्फात खोदून दगडावर शेवाळं मिळतं का ते बघण्याचा प्रयत्न करतात. तिथे काहीच न सापडल्यामुळे विमानातल्या कुशन्समधला फोम खाण्याचाही प्रयत्न होतो; पण त्याने पोट बिघडून भलतीच पंचाईत होईल हे लक्षात आल्याने तोही मार्ग बंद होतो.


त्यानंतर हळूहळू प्रत्येकाला नकळत ही जाणीव होऊ लागते, की जगायचं असेल तर मेलेल्या मित्रांच्या शरीरातलं मांस खाण्या

खेरीज दुसरा पर्याय नाही. बहुतेक सारी मुलं अतिशय धार्मिक असतात. हा विचार मनात येणंदेखील अनेकांना पाप वाटत असतं. आपण काय पाप केलं म्हणून मला देव शिक्षा देतोय, हा विचार त्यांना रात्रंदिवस छळत असतो; पण दुसरीकडे त्याखेरीज पर्याय नाही, हे वास्तव असतं. मुलं आपापल्या मित्रांशी त्याबद्दल खासगीत बोलत असतात, पण सर्वांसमोर हा विषय काढणं टाळत असतात. अखेर कनेसा या विषयाला तोंड फोडतो. "दहा दिवस होऊन गेलेले आहेत. अजूनही आपली सुटका झालेली नाही. आता आपल्यालाच सुटकेसाठी हालचाल करावी लागेल, आणि त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज आहे. दुसरा कुठलाही मार्ग दिसत नाही. समोर आपल्या मित्रांच्या शरीरांच्या रूपात अन्न पडलेलं असताना ते नाकारून मृत्यूला सामोरं जाणं म्हणजे आत्महत्या ठरेल. आणि आत्महत्या करणं पाप आहे." कनेसा आपल्या मित्रांना समजावण्याचा प्रयत्न करतो. हे मांस खाणं नाइलाज नसून आपलं कर्तव्य आहे, असं त्याचं म्हणणं असतं. मेडिकलचा विद्यार्थी म्हणून त्याच्या मताला महत्त्व असतं; शिवाय तो अतिशय धार्मिक असल्यामुळेही मुलांना त्याचं हे म्हणणं भिडतं. जी मुलं हा विचार करायला कचरत असतात तीदेखील त्याच्या या आवाहनामुळे तयार होतात. किमान तात्त्विकदृष्ट्या तरी ते मान्य करतात.पण ते प्रत्यक्षात आणणं अवघड असतं.

पुन्हा एकदा कनेसाच पुढाकार घेतो. एक फुटकी काचेची बाटली घेऊन तो बाहेर ठेवलेल्या मृतदेहांकडे जातो. पालथ्या टाकलेल्या एका मृतदेहाच्या कुल्ल्याचा मोठा भाग तो कापून काढतो आणि विमानाच्या छतावर मऊ होण्यासाठी ठेवतो; पण तो प्रत्यक्ष खाण्याची वेळ येते तेव्हा त्याचेही हात-पाय गळतात, उलटीची भावना होऊ लागते. बोलणं वेगळं आणि प्रत्यक्ष करणं वेगळं. शेवटी मनावर दगड ठेवून तो एक तुकडा कसाबसा गिळतो. 


त्याच्या बुद्धीने त्याच्या मनावर विजय मिळवलेला असतो. त्याच्या जगण्याआड येणारा एक संस्कार त्याने झटकून दिलेला असतो. त्याच्या मनात येतं, आता मी जगेन ! नक्की जगेन ! आपल्याच मित्रांचं शरीर कापून खाण्यापेक्षा मेलेलं बरं, अशी भावना असतानाही ही मुलं त्या निर्णयापर्यंत कशी येतात? ही कहाणी वाचत असताना आपल्या लक्षात येतं, की त्यापेक्षा मेलेलं बरं, असं म्हटलं तरी प्रत्यक्षात आपलं शरीर त्या भावनेला साथ देतंच असं नाही. ते जगण्याची धडपड करत राहतं. त्या धडपडीमुळेच मृत्यू आसपास फिरत असला तरी तो सहजी जवळ येऊ शकत नाही. त्यामुळेच सर्व प्रवासी थोड्याफार दिवसांच्या फरकाने या नव्या अन्नाचा स्वीकार करतात. आता अन्नाचा साठा कमी नसतो. नॅडोची आई आणि बहीण या दोघींना सोडून इतरांची शरीरं त्यासाठी वापरायची असं ठरतं. या नव्या अन्नपुरवठ्यामुळे मुलांच्या शरीरातली ताकद सावकाश का होईना, वाढू लागते. त्यामुळे लवकरच वेगळ्या दिशेने आणखी एक मोहीम काढली जाते. या वेळी तिघं मोहीमवीर प्रचंड प्रयत्नांनी एका छोट्या शिखरावर चढतात; पण तिथून पाहतात तो नजर जाईल तिथपर्यंत अँडीजच्या रांगाच रांगा पसरलेल्या असतात. त्या शिखराहून प्रचंड उंच शिखरं पल्याड उभी असतात. या वेळी रात्री शिखराजवळ मुक्काम करून हे तिघं दुसऱ्या दिवशी परततात; पण रात्रीची थंडी आणि अतिश्रमाने त्यांचा जवळपास जीव घेतलेला असतो. रात्री विमानाबाहेर मुक्काम करणं किती जीवघेणं आहे हे त्यामुळे लक्षात येतं. पुढच्या मोहिमेसाठी आणखी बरीच तयारी करावी लागणार हेही स्पष्ट होतं.

पण पुढच्या मोहिमेचा विचार करण्याआधीच त्यांना आणखी एक आघाताशी सामना करावा लागतो. एके रात्री झोपेची आराधना करत असतानाच प्रचंड हिमवादळ होतं आणि विमानासह सारे प्रवासी आत गाडले जातात. त्या धक्क्याने सर्वांना जाग येते तेव्हा प्रत्येकजण बर्फाच्या लादीखाली चिमटलेला असतो.

त्यांच्यापैकी जे लवकर सुटका करून घेऊ शकतात ते जिवाच्या आकांताने इतरांना वाचवतात. अंगात शक्ती नसतानाही प्रत्येकजण त्या क्षणी दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्यात जशी माणुसकी असते, तसं आपण एकटेच जिवंत राहिलो तर पुढे काय याची भीतीही असते. अखेर मदतकार्य थांबतं तेव्हा लक्षात येतं, की या वादळाने आठजणांचा बळी घेतलेला आहे. त्यात त्यांचा कॅप्टन मार्सेलो असतो आणि त्यांना बहिणीप्रमाणे धीर देणारी-बचावलेल्यांमधली एकुलती एक स्त्री लिलियाना असते.


या घटनेने मुलांचं मनोधैर्यही पुन्हा एकदा खाली घसरतं. कालपर्यंत आपल्या शेजारी झोपणारा मित्र एका क्षणात गाडला गेला हे पचवणं अवघड असतं.


शिवाय अव्हलांच आणखीही संकटं घेऊन येतं. विमान बर्फात गाडलं गेल्यामुळे मोठ्या मुश्किलीने तयार केलेली त्यातल्या त्यात उबदार खोली उद्धस्त झालेली असते. विमानातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झालेला असतो. दोन दिवसांनंतर प्रचंड परिश्रम करून, बोगदा तयार करून त्यांना पुन्हा सूर्यप्रकाशात यायला मिळतं. शिवाय सर्वांत मोठा फटका बसतो तो त्यांच्या अन्नसाठ्याला. पहिल्या अपघातात मेलेल्यांचे मृतदेह आता बर्फात आतवर गाडले जातात. या सगळ्या संकटांतून मार्ग काढत पुन्हा स्थिरस्थावर व्हायला अनेक दिवस जातात, पण आधीचे दिवस म्हणजे चैन होती, असं सर्वांना सतत वाटत राहतं.


या संकटातून सावरल्यावर पुन्हा मोहिमेची आखणी सुरू होते. 'निवड झाली नाही तरी मी मोहिमेवर जाणार' असा नॅडोचा निश्चय असतो. त्यामुळे त्याचं नाव पक्कं असतं. त्याच्याबरोबर कनेसाचं नाव नक्की होतं. त्यांच्याबरोबर आणखी कोण जाणार हे ठरवण्यासाठी एक छोटी मोहीम काढली जाते. त्यात रॉय हालें, कार्लिटोस पाएझ आणि विंझटिन असे तिघं जातात; पण परतताना त्यांच्यातले त्राण जवळपास संपतात. तिघांपैकी कोणी ना कोणी सतत खाली कोसळतं आणि इतरांना आपल्याला सोडून पुढे जाण्यासाठी विनवत राहतं, 'मी आता एक पाऊलही चालू शकत नाही. मला सोडा, मला मरू द्या', असं म्हणत राहते. पण आश्चर्य म्हणजे कुणीही कुणाला मागे ठेवत नाही. स्वतःचे प्राण शरीरातून जाण्याची वेळ आली तरीही इतरांचा विचार त्यांच्या मनातून जात नाही. कधी समजावून, कधी शिव्या देत उचकवून, कधी स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यासाठी थांबत ते तिघं विमानात पोहोचतात. मृत्यूच्या इतक्या जवळ वावरत असतानाही ही तरुण पोरं जी नीतिमत्ता दाखवतात ती पाहून थक्क व्हायला होतं. पुढच्या मोहिमेतून रॉय आणि कार्लिटोस माघार घेतात. 'मोहीम काढणं अशक्य आहे, आपण इथेच मरणार आहोत', असं त्यांचं म्हणणं असतं. पण विंझटिन महणतो, "ते अवघड आहे. खरं, पण अशक्य नक्कीच नाही". त्यामुळे कनेसा आणि नॅडोसोबत विंझटिन मोहिमेवर जाणार हे ठरून जातं.


मोहीमवीरांची नावं नक्की झाल्यावर सगळीच मूलं मोहिमेच्या तयारीला लागतात. आतापर्यंतच्या मोहिमांनी त्यांना गरजांची जाणीव करून दिलेली असते. त्यानुसार गट पाडून काम सुरू होतात. काहीजण या तिघांसाठी स्लीपिंग बॅग बनवण्याच्या तयारीला लागतात. काहीजण मृतदेह शोधून अन्नाच्या शिदोरीची तजवीज करत असतात. काहीजण बर्फ वितळवून पाणी भरण्याच्या मोहिमेवर रुजू असतात. मोहीमवीरांना खास वागणूक मिळत असते. त्यांची शक्ती भरून निघावी यासाठी त्यांना अन्नाचा जादा वाटा दिला जातो. त्यांना कामातून सवलत मिळते. त्यांच्या विक्षिप्तपणाकडे, रागाच्या झटक्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. तेवीस वर्षांचा नँडो हा त्यातला एकटाच असा असतो की तो या सवलतीचा गैरफायदा घेत नाही. तो इतरांसारखीच कामं करत राहतो आणि कधीही स्वतःचा तोल ढळू देत नाही. खरं तर या अपघाताचा त्याला बसलेला फटका इतरांपेक्षा कैक पटीने जास्त असतो. त्याची आई आणि बहीण दोघीही त्याच्या डोळ्यांसमोर मरण पावलेल्या असतात; पण त्यामुळे हताश होण्याऐवजी उलट त्याच्या मनात सुटकेसाठी प्रयत्न करण्याची भावना आणखी प्रबळ होते. त्याच्या मनात सतत आपल्या वडिलांचा विचार असतो. बायको आणि दोन पोरांना घेऊन चाललेलं विमान कोसळलं, या बातमीचा त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल


याचा विचारही नँडोला करवत नसतो. त्यामुळेच लवकरात लवकर इथून सुटका करून घेत त्यांच्याकडे परतायचं, या इच्छेने त्याचा ताबा घेतलेला असतो. अशी प्रबळ इच्छाशक्ती काय चमत्कार घडवून आणू शकते याचं नँडो हे अफलातून उदाहरण असतं.


मोहीम निघण्याआधीचा काळ सर्वांसाठीच प्रचंड कठीण असतो. अँडीजवर अडकून महिना उलटलेला असतो. अपुऱ्या अन्नाचा त्यांच्या शरीराबरोबरच मनावरही परिणाम होऊ लागलेला असतो. अनेकदा छोट्या छोट्या कारणांवरून भडके उडत असतात. नैराश्याचे झटके येत असतात. अनेकांची प्रकृती खालावायला लागलेली असते. उरलेल्या मुलांमध्ये साहजिकच छोटे छोटे गट पडतात. हे गट एकमेकांवर चेक्स अँड बॅलन्सेस ठेवण्याचं काम करत असतात. मित्रमंडळी एकमेकांची काळजी घेत असतात, एकमेकांना इतरांच्या झटक्यांपासून जपत असतात. भांडणं जितक्या लवकर होत तितकीच लवकर ती मिटतातही. आपण सगळे एकत्र आहोत म्हणून जिवंत आहोत याची जाणीव प्रत्येकाला असते. मृत्यू दोन हातांवर उभा दिसत असताना त्यांचं मन अशक्य घुसळणीतून जात असतं. जसा मृत्यू सतत सोबत आहे तसाच देवही आपल्या खूप जवळ आहे असं अनेकांना वाटत असतं.


संध्याकाळ झाली आणि सारे आत आले की रात्री अनेक विषयांवर चर्चा रंगत असतात. त्या गप्पा म्हणजे प्रत्येक बुडत्यासाठी काडीचा आधार असतात. देवाने आपल्यावर ही वेळ का आणली, हा विषय अनेकदा त्या चर्चेत डोकं वर काढत असतो. जवळपास सारीच तरुण मंडळी सश्रद्ध असतात. देवाबद्दलच्या चिंतनातून त्यांना शांती मिळत असते आणि उमेदही. गप्पांमधला दुसरा विषय असतो तो रग्बी. जवळपास साऱ्यांची घरची शेती असल्यामुळे तो विषयही सतत बोलण्यात असतो. घर-कुटुंब-प्रेयसी हे विषय मात्र मनात घोंघावत असूनही फार कमी वेळा ओठांवर येतात. कारण त्यावर बोलणं सुरू झालं की बरं वाटण्याऐवजी त्रासच अधिक होत असतो. मनातल्या मनात मात्र आपल्या आई-वडिलांशी टेलिपथी साधण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न चालू असतो; पण बहुतेक वेळा त्यांच्या गप्पांचाओघ खाद्यपदार्थांवर येऊन थांबत असतो. 


टोकाच्या उपासमारीमुळे खाणं ही त्यांच्या डोक्यात सदोदित फिरणारी एकमेव गोष्ट असते. अनेकदा प्रत्येकजण आपल्या आवडत्या पदार्थांबद्दल बोलत असतो. पूर्वी केलेल्यापार्ट्यांची वर्णनं चवीने रंगवली जात असतात. वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृतींची चर्चा होत असते. डोळ्यांसमोर आपल्या आवडीचा पदार्थ आणून तोंडाला सुटलेल्यापाण्याने आवंढा गिळत राहणं हे त्यांचं नेहमीचं काम असतं. पण दुर्दैव असं, की ते समाधानही त्यांच्या नशिबी नसतं. कारण थोड्यांत दिवसांत त्यांच्या लक्षात येतं, की या वर्णनांमुळे शरीरात पाचक रस तयार होताहेत, पण प्रक्रिया करायला पोटात पुरेसं अन्न कुठेय? त्यामुळे अल्सर होण्याची भीती असल्याचं त्यांना जाणवतं. मग जाणून-बुजून ही चर्चा कमी केली जाते.मुलांनी तिथल्या अमानवी वातावरणाशी जुळवून घेतलं असलं तरी समस्या कमी नसतात. 


संध्याकाळ झाली की १५-१६ तास त्यांना विमानात अडकून पडावं लागत असल्यामुळे लघवीला जाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. दरवेळी उठून बाहेर येणं म्हणजे सर्वांना तुडवत जाणं. मग त्यावर उत्तर निघतं, की दाराच्या शेजारी झोपलेल्या मुलाने सर्वांना रात्रभर एक टमरेल पास करत राहायचं. त्याने ते बाहेर मोकळं करून पुन्हा आत फिरवायचं. अशा जागी झोपण्यासाठी कोण तयार होणार? त्यामुळे या कामासाठीही शिफ्ट्स लावल्या जात. दुसरा प्रश्न असतो तो संडासला जाण्याचा. पुरेसं अन्न खायला मिळत नसल्यामुळे सगळ्यांनाच टोकाच्या बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागलेला असतो. दिवसांमागून दिवस जाऊनही अनेकांना संडासला होत नाही. कुणाचं पंधरवड्याने, तर कुणाचं तब्बल महिन्याभराने पहिल्यांदा पोट साफ होतं; पण त्यानंतर दुसरा त्रास सुरू होतो तो जुलाबांचा. त्यात असते नसते ती शक्ती पार संपून जाते.मधल्या काळात जबर जखमी झालेल्या त्यांच्यातल्या दोघांचा मृत्यू होतो. हे मृत्यू सर्वांनाच धक्का देऊन जातात. हिमवादळातून बचावलेल्यांना आता काही होणार नाही, या त्यांच्या विश्वासाला तडा जातो. सारे अचानक मृत्यूसमोर उघडे पडतात. आपल्यापैकी कोणीही कधीही दगावू शकतं, या विचाराने त्यांची मनःशांती आणि शक्तीही ढळते. आता लवकरात लवकर मोहीम काढायला हवी हे साऱ्यांना कळून चुकतं…


अपुर्ण राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखात.।।