* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: रंगीची गोष्ट / A colorful thing

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

4/19/26

रंगीची गोष्ट / A colorful thing

बाबूची आई धाकट्या छोट्याला शाळेत नाव घालायला आलेली पाहून चष्म्याच्या वरच्या भागातून रोखून बघत अनुनासिक स्वरात त्यांनी विचारलं, "जन्माचा दाखला कुठाय?"

मागील लेखातून पुढे…

रंगीने पिशवीत जपून ठेवलेला दाखला बाहेर काढला.दाखल्याकडे निरखून बघत गुरुजींनी ड्रॉवरमधून रजिस्टर काढलं.त्यातलं बाबूचं नाव मनातच वाचलं. नंतर रंगीकडे रोखून बघत तीक्ष्ण स्वरात म्हणाले, "दोघांच्या आडनावांत फरक कसा?"

रंगीला उत्तर न सापडल्याने तिने न बोलता मान खाली घातली.जोशीमास्तरांनी किरट्या आवाजात म्हटलं, "अशा परिस्थितीत ह्या मुलाला शाळेत भरती करता येणार नाही!"

रंगी गोरीमोरी झाली.छोट्याचा हात धरून घरी परत आली.जाताना छोट्याने सगळ्या गल्लीत 'साळेमंदी नाव घालाया चाललो'असा गाजावाजा केला होता.त्यामुळे हिरमुसला झालेल्या छोट्याला बघून गल्लीत सगळ्यांना शाळेत घडलेली घटना समजली.दोनतीन दिवस गल्लीत सगळ्या घरात नि मारुतीच्या पारावर छोट्याची शाळेतली अ‍ॅडमिशन आणि जोशी गुरुजींचा आगाऊपणा ह्यावर चर्चा चालू होती.तिसऱ्या दिवशी सकाळीच 'जयजवान मंडळा' ची मुलं वाड्यावर बापूंना भेटायला आली.बापूंच्या कानावरदेखील छोट्याच्या शाळेतील अ‍ॅडमिशनचा प्रकार आला होता.जयजयवानचा आक्रमक अध्यक्ष दिलीप ह्याने बापूंना यासंबंधी काही नियम,काही कायदा आहे का,जोशीमास्तर अशा कारणांनी छोट्याची अ‍ॅडमिशन नाकारू शकतात का,हे विचारून घेतलं.

बापू त्याला म्हणाले,"दिलीप,तिथे जाऊन भांडूबिंडू नकोस ! जोशींना म्हणावं,तुम्ही छोट्याला भरती का करत नाही,त्याची कारणं लेखी द्या.त्यांनी काही लिहून नाही दिलं तर त्यांना सांग,मी भेटायला येणार आहे."

दिलीप आणि जयजवानचे इतर सभासद छोट्याला घेऊन शाळेत गेले."छोट्याला भरती करा नाही तर तसं लेखी द्या आणि अ‍ॅडमिशन नाही दिली तर बापूसाहेब तुम्हाला भेटायला येणार आहेत !"

दररोज संध्याकाळी तालमीत दोन दोन तास कसरत करणाऱ्या त्या मंडळींकडे चष्याच्या वरच्या भागातून बघत गुरुजी नरमाईने म्हणाले,"एवढ्या लहानशा गोष्टीसाठी बापूसाहेबांना कशाला तसदी दिलीत ? उद्यापासून छोट्याला शाळेत पाठवून द्या."

"उद्यापासून कशाला ? छोट्याला बरोबरच आणलं आहे.कुठल्या वर्गात बसवू ते सांगा."

गुरुजींनी दाखवलेल्या दिशेने छोट्याला घेऊन दिलीप आणि बाकी सभासद निघाले.छोट्या तर उड्याच मारत निघाला.जोशी गुरुजींनी रजिस्टर काढून छोट्याच्या नावाची रीतसर नोंद करायला सुरुवात केली.

छोट्याची शाळा सुरू झाली.तो अभ्यासात रमलादेखील पण एक अनपेक्षित अडचण समोर आली.छोट्याला शाळेत घालेपर्यंत गल्लीत गावात कुणालाच त्याच्या आणि बाबूच्या वडिलांच्या नावात-आडनावात फरक आहे हे माहीत असण्याचं कारण नव्हतं.पण छोट्याच्या अ‍ॅडमिशनच्या वेळी मुख्यत्वे जोशीगुरुजींनी हरकत घेतल्यामुळे ते सगळ्यांनाच कळलं होतं.शाळेतली सगळी मुलं येता-जाता दोघांना त्यातल्या त्यात बाबू मोठा असल्याने त्याला चिडवायला लागली.छोट्या लहान होता.त्यामुळे त्याला मुलं कमी चिडवत.शिवाय त्याचा अर्थही त्याला फारसा कळत नव्हता पण बाबूच्या आणि त्याला चिडवणाऱ्या त्या मुलांच्या मारामाऱ्या होऊ लागल्या.त्यापैकी काही कागाळ्या मास्तरांपर्यंत जायच्या.छोट्याच्या अ‍ॅडमिशनच्या वेळी जबरदस्ती केल्याने जोशी मास्तर दुखावले गेले होते.त्याचा राग ते बाबूवर काढायचे आणि त्याला कडक शिक्षा करायचे. आधीच बाबूला अभ्यासात फारसा रस नव्हता.त्यात मुलांचं चिडवणं अन् वरून मास्तरांचा मार.ह्या सगळ्यामुळे बाबूने शाळेत जाणंच बंद केलं.

शाळेत न जाण्याचं कारण रंगीला समजल्यावर ती बाबूला काहीच बोलू शकली नाही.तिने श्रीकृष्ण टॉकीजच्या जवळच्या 'दी नागपुरे टी अँड स्नॅक्स'मध्ये बाब्याला नोकरीला लावून दिलं.बाब्यालादेखील हे काम आवडलं.तो ढोरमेहनत करायला मागेपुढे बघायचा नाही.त्यामुळे होटेलचा मालक जगदीशभाई नागपुरे पण त्याच्यावर खूश असायचा.बाबू पगाराचे सगळेच्या सगळे पैसे आईच्या हातात आणून द्यायचा.त्यामुळे रंगीसुद्धा त्याच्यावर खूश होती.पैसे कमवून संसाराला हातभार लावणारा म्हणून रंगी आता बाबूला जीव लावू लागली.थोड्या दिवसांतच बाबू आणि छोट्याच्या वेगवेगळ्या नावा-आडनावांच्या प्रकरणाचा लोकांना विसर पडला.चिडवणं बंद झालं.छोट्याची शाळा सुरळीत चालू झाली होती आणि बाबूचा पगार नियमित येत होता.त्यामुळे रंगीच्या संसाराच्या गाड्याला वंगण मिळून तो आवाज न करता चालू लागला.गल्लीतल्या शंकराच्या देवळात एक दिवस अचानक एक साधू आला.त्याच्याबरोबर त्याचे दोन शिष्यदेखील होते.

सुरुवातीचे आठ दिवस बाबांचं मौनव्रत होतं.पण देवळात येणाऱ्या लोकांना शिष्यांकडून बाबांची माहिती मिळत होती.बाबांचं नाव भोलेनाथबाबा होतं. हिमालयात पंचवीस वर्षं एका पायावर उभं राहून त्यांनी तप केलं होतं...! सध्या जरी ते जेमतेम चाळिशीचे दिसत असले तरी त्यांचं वय शंभरीच्या जवळपास आहे...! लहानशा गावाला चघळायला नवा विषय मिळाला.बाबांचं मौन संपेपर्यंत त्यांच्याभोवती भक्तांचा घोळका जमला.त्यात स्त्रिया प्रामुख्याने होत्या,सगळ्या जणी रात्री भजनाला जमायच्या.

'चांग फिटला,पांग फिटला,भोलेनाथबाबा मला गुरू भेटला'

अशासारख्या भजनांचे आवाज गल्लीत घुमू लागले. रंगीसुद्धा नियमित जाणाऱ्या भक्तांपैकी एक झाली. शिष्यांनी भक्तांना भोलेनाथबाबांचे फोटो वाटले.इतर भक्तांप्रमाणे रंगीच्याही घरात फ्रेम लावलेला भोलेनाथबाबांचा फोटो लागला.त्याला उदबत्ती लावणंही सुरू झालं.गल्लीतल्या प्रतिष्ठित घरातल्या बायका कुजबुजायच्या - 'करून करून भागली नि देवपूजेला लागली...'

माईंकडे कुणी तरी हा विषय काढला तर त्या म्हणाल्या, “भोलेनाथबाबांबद्दल मला माहीत नाही पण त्यांच्या निमित्ताने रंगी भक्तिमार्गाला लागलीय,हे चांगलंय. भजन,कीर्तनाच्या नावाने चार चांगले शब्द कानांवर पडताहेत,मुखातून बाहेर पडताहेत,हेदेखील चांगलंच आहे!" चारेक महिन्यात भोलेनाथबाबांचा मुक्काम हलला पण तोपर्यंत रंगीच्या मनात त्या तथाकथित बाबाच्या भक्तिमार्गाची वाट चांगलीच रुळली होती. तिच्या त्या भक्तीला प्रत्यक्ष स्वरूप देणारं कोणी नसल्याने ती सैरभैर झाली आणि ह्या अस्वस्थतेच्या काळातच तिला अनकाईच्या डोंगराजवळ राहणाऱ्या अघोरी पंथाच्या भैरवनाथांचं नाव समजलं.रंगी एकदोनदा तिथे जाऊनही आली आणि मग त्यांच्या नादीच लागली.बाबांना भूत-भविष्य चांगलं समजतं... ते थेट कालीमातेशी बोलू शकतात... वगैरे गोष्टी ती भांडी घासायला ज्या ज्या घरी जायची त्या त्या घरांत सांगायची.तिच्या घरातला भोलेनाथबाबांचा फोटो जाऊन आता भैरवनाथबाबांचा फोटो आला. संध्याकाळी त्यांच्या फोटोसमोर धूप लागू लागला. संध्याकाळी महाराजांनी प्रसाद म्हणून दिलेली कवड्यांची माळ रात्रीच्या पूजेच्या वेळी रंगीच्या गळ्यात दिसू लागली.एकदा मठीतून येताना रंगीने भैरवनाथांच्या भजनाची पुस्तकं आणली आणि रात्री ती एकटीच त्यांची भजनं म्हणायला लागली.कधी कधी ती छोट्यालाही आपल्याबरोबर भजनं म्हणायला लावायची.बाबू रात्रीचा सिनेमा सुटल्यावर घरी यायचा म्हणून तो कधी भजनाला नसायचा.हळूहळू रंगीवर भैरवनाथांचा पगडा वाढत गेला.तशा तिच्या मठीच्या फेऱ्याही वाढत गेल्या.

एकदा रंगी मठीत गेली असताना बाबांनी एरवी नेहमी बंद असलेले

डोळे उघडले आणि आपली तीक्ष्ण नजर रंगीवर रोखून ते म्हणाले,

"बेटा,तुझ्या नशिबात भरपूर धनलाभ आहे!"

इतक्या दिवसांत बाबा प्रथमच तिच्याशी बोलले होते.बाबांचं भविष्य रंगीला अशक्य वाटलं.लोकांच्या घरची भांडी घासून आणि पोराने होटेलात काम करून घरी येणारा पैसा म्हणजे धनलाभ असू शकत नाही,एवढं कळण्याइतकी रंगी हुशार होती.रंगीच्या चेहऱ्यावरून आपण सांगितलेल्या भविष्यावर तिचा विश्वास बसला नाही हे चाणाक्ष बाबांनी ओळखलं.

त्यांनी आपल्या पट्टशिष्याकडे निर्देश करत म्हटलं,

"धन कुठून येणार अन् कसं येणार हे हा तुला समजावून सांगेल.त्यासाठी मधूनमधून हा तुझ्या घरी येईल."

बाबांच्या बोलण्यातल्या ठामपणाने भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे असा विश्वास रंगीला वाटला आणि तिचे डोळे चमकले !

बाबांच्या सांगण्याप्रमाणे नागोजी रंगीच्या खोलीवर आला आणि नंतर यायलाच लागला.पहिल्या फेरीतच त्याची घारीसारखी नजर सगळ्या गल्लीवर,वाड्यावर अन् रंगीच्या खोलीत भिरभिरली.दीर्घ श्वास घेत नागोजी म्हणाला,

"येतोय... येतोय... येतोय... पैशांचा आवाज येतोय आणि वासपण येतोय.रंगूबाई,सोन्याची नाणी,चांदी, हिरे-माणकं मोडूंच घबाड दिसतंय.आता फक्त ते कुठे आहे,कसं मिळवायचं,एवढंच बघणं आपलं काम आहे."

नागोजी दिवेलागणीच्या सुमारास यायचा.रंगीच्या खोलीत डोळे मिटून ध्यानधारणा करायचा.भजनाचा कार्यक्रम झाला की,रात्रीच्या अंधारात नाहीसा व्हायचा. काळाकुळकुळीत,कपाळावर शेंदूर फासलेला, कवड्यांच्या आणि वेगवेगळ्या रंगांच्या मण्यांच्या माळा घातलेला,कुरळ्या केसांचं जंगल असलेला फेफट्या नाकाचा नागोजी अतिशय भयानक दिसायचा. बोलताना आपली लांबलचक अन् टोकदार जीभ बाहेर काढून ओठांवर फिरवायची त्याला सवय होती.नागोजी रंगीकडे आला की,त्याला पाहायला गल्लीतली पोरंटोरं आणि कधी कधी मोठी माणसंसुद्धा मुद्दाम खोलीवरून सहज आल्यासारखी आत डोकवायची.पाचसहा भेटींनंतर नागोजी येऊन जेव्हा डोळे मिटून ध्यान करत बसला होता आणि रंगी त्याच्यासमोर हात जोडून भैरवनाथबाबांचा जप करत होती तेव्हा अचानक नागोजीने डोळे उघडले.विस्फारलेल्या डोळ्यांनी तो रंगीला म्हणाला,"सापडलं ! मला सापडलं ! मी प्रत्यक्ष पाहिलं ! दोन हंडे भरून ठेवले आहेत !! जमिनीखालच्या जागेत आहेत. ्इथून फक्त पाचशे फुटांवर आहेत!"

रंगीचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं.सर्वांगाला घाम फुटला.तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा भाग्याचा क्षण आला होता.नागोजीने वर्णन केलेलं ते ठिकाण म्हणजे वाड्यातल्या स्वैपाकघरातलं बळद असं रंगीच्या मनाने ठाम घेतलं.तरीच आपल्याला भाई सारं घर सारवायला सांगतात पण स्वैपाकघर मात्र कधीच सारवायला सांगत नाहीत.ते त्या स्वतः सारवतात.तिथे नक्कीच धन असणार.नागोजी म्हणतो.ते खरंच असणार.आता फक्त ते धन कसं मिळवायचं ते ह्या नागोजीबाबाकडून समजून घ्यावं लागेल.कितीही कठीण आणि कडक व्रत असलं तरी ते करावं लागेल.धन मिळवण्यासाठी एवढी साधना तर करायलाच पाहिजे.करू आपण एकदा का धन मिळालं की,मग मोठ्ठा वाडा बांधू.आपण कुणाच्या घरी काम करायला जायचं नाही.आपणच एक नाही दोन दोन बाया कामाला ठेवू.रंगीचे विचार डोक्यात मावेनासे झाले.कानशिलं तापली.कपाळाच्या शिरा इतक्या फुगल्या की,त्या आत्ता फुटतील की काय असं तिला वाटलं. त्तेजित स्वरात तिने नागोजीला विचारलं,

"नागोजी,काय उपासना केली पाहिजे ते लगेच सांग. कसंही करून मला ते धन पाहिजे.गावातल्या बऱ्याच जणांना संशय आहे की,वाड्यातल्या बळदात धन आहे. म्हणूनच तिथून साप अन् नाग निघतात !"

नागोजीने परत डोळे मिटले.काही क्षण स्तब्धतेत गेले. आता त्याला डोळ्यांसमोर काय दिसतंय,तो काय सांगतो हे ऐकायला रंगी अधीर झाली होती.

"रंगूबाई,हे काही माझ्या आटोक्यातलं काम नाही. आता मी निघतो.तुम्ही उद्या मठीवर या.बाबांना शरण जा. बाबाच काय ते तुम्हाला सांगतील."

कपड्यांचा सळसळ आवाज करत नागोजी दार उघडून रंगीच्या खोलीबाहेर पडला.रात्रीच्या काळोखात दिसेनासासुद्धा झाला.रात्रभर रंगीला झोप लागली नाही. सकाळी लवकरच ती मठीवर पोहचली.दोन तास ताटकळत वाट पाहिल्यावर नागोजीने तिला बाबांच्या ध्यानाच्या खोलीत नेलं.बाबांनी मिटल्या डोळ्यांनीच विचारलं,

"आलीस ? म्हटल्याप्रमाणे शोध तर लागलाय. नागोजीने तिथे पाहिलंय हे आम्ही इथे स्थानावर बसून पाहिलंय.आता ते मिळवणं फक्त तुझ्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे."

"बाबा,लौकर सांगा.वाटेल ते करायची तयारी आहे माझी !" रंगीच्या आवाजात अधीरता ओतप्रोत भरली होती. बाबांनी व्याघ्रजिनावर पद्मासन घातलं.नागोजीने रंगीला एकदम शांत बसायची खूण केली.

राहिलेला भाग पुढील लेखामध्ये…..★★★