* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: कोल्हा : एक धूर्त प्राणिविशेष / Fox: A cunning animal

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

4/25/26

कोल्हा : एक धूर्त प्राणिविशेष / Fox: A cunning animal

कोल्ह्यासारखा लबाड आणि चतुर प्राणी नाही म्हणतात ते खरं असल्याची प्रचीती निदान त्याचं निरीक्षण करणाऱ्याला येते.त्याला शोधून कसं काढावं हाच मुळी प्रश्न पडतो.वर्षाच्या ठरावीक काळातच कोल्हा निश्चितपणे अमुक ठिकाणी सापडेल असं सांगता येत असलं,तरी तो मुक्त व स्वच्छंद प्राणी आहे.

कोल्ह्याची पिलं कप्पी व जमिनीतील पोखरीत बराच काळ राहतात.कित्येकदा ही लबाड बछडी कप्पीच्या समोर मे-जून महिन्यात खेळता-बागडतानाही दिसतात. वीण होताच कोल्ही त्यांना पाजवीत राखीत असते.जरा मोठी झाली की त्यांची मातापितरं त्यांना भक्ष्य आणून देतात.त्यांचं निरीक्षण करायचं तर विणीच्या काळात.

जुलै ते मार्च या प्रदीर्घ काळात कोल्ही कधी व कुठे दिसतील हे मात्र निश्चित सांगता येणार नाही. कोल्ह्यांच्या कप्पी व पोखरी शोधून काढणं ही देखील सोपी गोष्ट नाही.पोखरीच्या रचनेमुळे कोल्ह्याच्या वास्तव्याची खात्री झाली नाही,तर वासानं त्याच्या ठावठिकाणाची निश्चिती करता येते.कोल्ह्याच्या अंगाला कस्तुरीसारखा उग्र वास येतो.त्याच्या पोखरीत डोकावलं की तो तीक्ष्ण वास येताच कोल्होबा तिथे राहतात असं समजायचं.त्याचा वास इतका उग्र असतो की,कित्येक वेळा हा वास जमिनीवरूनही येतो.आपल्याकडे कोल्ह्याची पारध करण्याकरिता शिकवलेली जातिवंत कुत्री उपयोगात आणीत नाहीत. परंतु कुठल्याही पारध्याला विचारा,

त्यांची शिकारी कुत्री कोल्ह्याच्या वासाचा मागोवा घेत कशी पाठलाग करतात ते!

विचलित व भयभीत झालेल्या कोल्ह्याचा वास अधिक उग्र असतो असं म्हणतात.ज्या कोल्ह्याचा ससेमिरा करण्यात येतो तो चतुर कोल्हा जसजसा थकतो, तसतसा कमीकमी वास अंगातून सोडतो.भीती,राग, सजग व विचलितपणापासून मुक्त असलेल्या कोल्ह्याचाच परिचित वास येतो.

कोल्ह्याचं एकंदर वागणं पाहून मला नेहमी वाटत आलं आहे की,तो मनात म्हणत असेल :"भल्या गृहस्था,तुला माझा उग्र दर्प जवळून येत असेल,परंतु तुझा वास मात्र मला अर्ध्या मैलावरून येतो.आता यात घाणेरडा कोण हे तूच ठरव!"

कोल्ह्यानं आपला वास लपविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याच्या पाऊलखुणा एखाद्या स्पष्ट सहीसारख्या सराणीतील पवाट्यात,पोखरीजवळच्या मातीत उमटलेल्या दिसतात.पण इथे थोडं सावध राहायला हवं.कोल्ह्याच्या अन् कुत्र्याच्या पाऊलखुणांतील फरक ओळखणं कठीण असतं,

धनगराची अन् गुराख्याची कुत्री त्यांच्या बिळात उगीचच नाकं खुपशीत असतात आणि ह्याच कुत्र्यांच्या पाऊलखुणांमुळे कोल्ह्यांची पाऊलचिन्हं ओळखणं अवघड होतं.

स्वतःचा मागमूस लागू न देणाऱ्या ह्या कोल्ह्याचा ठावठिकाणा मात्र विणीच्या काळात त्यांच्या कप्पी पोखरींच्या तोंडाशी पडलेल्या खाद्याच्या अवशेषांवरून लागतो.कोल्ह्याची मादी जरा वेंधळीच असते.अन्नाचा सुकाळ असला की कप्पीच्या तोंडाजवळ पक्ष्यांचे पंख, पिसं,चोच,पंजे,हाडं,सशाची एखादी तंगडी इत्यादींचे अवशेष आढळून येतात.पाखरं,ससे, तसंच जंगलात हिंस्र पशुंनी मारून फस्त करून टाकलेल्या प्राण्यांच्या उरल्यासुरल्यातनं आणलेली मोठी हाडं इत्यादीमुळेही त्यांची कप्पी शोधून काढणं शक्य होतं.

एकदा तर मी एका कोल्ह्याच्या कप्पीजवळ ढाकाची (नर सांबर) मांसविरहित तंगडी,सशाचे पाय, रानकोंबड्यांच्या दोन चोची व तणमोराची पिसं पाहिली. पोखरीच्या तोंडात अडकलेल्या तणमोर व तित्तिराच्या पंखांचे अवशेष दिसले.प्राणिजगात धूर्त म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या कोल्ह्यानं आपल्या अस्तित्वाच्या अशा खुणा ठेवाव्यात याबद्दल आश्चर्य वाटत असलं तरी निसर्गात असं सहज घडतं मात्र.जलाशयाकाठी कासवाची अंडी पिलं खाण्यासाठी कोल्ह्यांनी केलेल्या उगद्यांवरूनही (उकरलेले खड्डे) त्यांचं अस्तित्व कळून येतं.मांजराप्रमाणे तो आपली विष्ठा खळगा करून पुरत नसल्यामुळे विष्ठेचा मागोवा घेऊनही त्याचं एखाद्या ठिकाणातील अस्तित्व शोधून काढता येतं.

विणीच्या काळात कोल्ही दगडमातीच्या खाणीत, शेताच्या बांधाच्या पोखरीत (मोंगाड) आश्रयाला राहत असली तरी जंगलातून परंपरेनं चालत आलेली त्यांची कप्पी-पोखरींची स्थळं आढळून येतात.अशा ठिकाणी कोल्ही वर्षाकाठी वा काही वर्षांआड हमखास दिसतात. पारधी,शिकारी,धनगर,गुराखी व गायकी यांना कोल्ह्यांची निवासस्थानं असलेली अशी स्थळं ठाऊक असतात.परंतु कोल्हाही मोठा वस्ताद असतो.नित्य नवनवे निवारे,आश्रयस्थाने यांच्या शोधात तो असतो. एकदा मी जंगलातील उजाड पुलाखाली डोकावलो असता कोल्ही आपल्या लहानग्या बछड्याला पाजताना दिसली.

विणीच्या काळात पिलांसह त्यांचा ठाव घेणं मोठं कठीण असतं.कोल्हीला कुत्र्या-माणसाचा थोडा जरी वास आला तरी ती आपला निवारा सोडून पिलांसह निघून जाते.बिळासमोर नाचत-बागडत असलेली कोल्ह्याची गोजिरवाणी निष्पाप पिलावळ पाहणं मोठं मनोरंजक व आनंददायी असतं.'माणूस' नावाच्या शत्रूची अजून पुरती ओळख देखील झालेली नसते.रोज सकाळ-सायंकाळ पोखरीच्या तोंडालगत ती खेळताना दिसतात.मात्र मांजराच्या पावलानं त्यांना पाहावं लागतं. ती कितीही निष्पाप असली,तरी आपली चाहूल मात्र त्यांना लागू देऊ नये.निर्धास्त असलेली ही पिलं तांबडं फुटताच न्याहरीच्या वेळेपर्यंत बिळाच्या तोंडाजवळ खेळताना दिसत असली तरी त्यांना पाहणं तितकं सोपं नाही.पिलं जरी मूर्ख असली,तरी कोल्ही चतुरच असते.तिला काही सहज फसविता येणार नाही.पहाटेपूर्वीच्या काळोखात भक्ष्याच्या शोधात गेलेली कोल्ही दिवस उगवेपर्यंत पिलासाठी घास घेऊन परत येणार नाही,असं नव्हे.

कप्पीकडे येणारी कोल्ही तुम्ही कधी पाहिली आहे काय? गनिमी काव्याचे सारे पवित्रे घेत,नाकात सारा जीव आणून,शत्रूचा पावलागणिक वास घेत,पोखरीला वळसा घालीत मोठ्या सावधानतेनं ती घराकडे येते. तिच्या अद्‌भुत सहाव्या इंद्रियापासून काहीही लपून राहत नाही आणि म्हणूनच जमिनीवरून येणाऱ्या तुमच्या वासामुळे तिला तुमचा सुगावा लागू नये ह्यासाठी तुम्ही जमिनीपासून जरा उंचावरच जायला हवं.

कोल्ही तुम्हाला हेरील,तुम्ही जमिनीवर असताना हेरीलच.लगेच भुंकून ती आपल्या बछड्यांना सावध करील.पिलं इकडेतिकडे पाहण्यात क्षणाचाही वेळ न दवडता किंवा कसलंही कुतूहल न दाखविता लगेच बिळात धूम ठोकतील.त्या क्षणी त्यांना आलेला वास, पाहिलेलं दृश्य व आईचं विशिष्ट भुंकणं यांची सांगड घालून भविष्यात ती त्या वासाशी,दृश्याशी असलेलं धोक्याचं साहचर्य भुंकण्याशिवाय ओळखू शकतात,ती कायमचीच.

माणसाच्या आकाराशी,वासाशी परिचित झालेल्या मोठ्या पिलांचं आचरण प्रौढ कोल्ह्याप्रमाणेच असतं. पावसाळ्याच्या सुरवातीला ती खूप जाणती झालेली असतात.या काळात त्यांचं जमिनीवरून निरीक्षण करावयाचं तर दुर्बिणीतून दूर अंतरावरून किंवा जमिनीपासून उंचावरून.

तीन महिन्यांची मोठी पिलं मी रोज पहाटे चारच्या सुमारास अर्ध्या एक फर्लांगावरून पाहत असे.एकदा मात्र पाठमोऱ्या येणाऱ्या कोल्हीनं मला हेरलं.तशी तिनं पिलांना धोक्याची साद घातली.

व्यालेली कोल्ही सकाळ-सायंकाळ तिच्या पिलांबरोबर असताना थोडीफार दक्षता घेऊन तिचं निरीक्षण करता येणं सहज शक्य आहे.तुम्ही जरी जमिनीपासून पन्नाससाठ फूट उंचीवर असलात तरी अल्पशा हालचालीनं ती सावध होते.यापुढे तिथे राहणं तिला धोक्याचं वाटलं,तर लगेच ती आपलं बिन्हाड हलविते.

उंचावर बसलेल्या तुम्हास ती पाहू शकणार नाही.परंतु कुठल्याही प्रकारचा आवाज,हालचाल करण्याचं टाळणं अत्यंत आवश्यक असतं.लांबच्या अंतरावरून येणाऱ्या आवाजांची,हालचालींची ती कदाचित दखल देखील घेणार नाही.

तिच्या कप्पीपासून बारा फूट अंतरावर बसून,निश्चिंत मनानं बाहेर येणाऱ्या कोल्हीला मी काही वेळा पाहिलं आहे.परंतु अशा प्रकारची लगट वा जवळीक करण्यास मी तरी सांगणार नाही.

पोखरीसमोरच्या झाडाच्या किंवा शिलाखंडाच्या आश्रयाने,पाठमोरा वारा नसताना तुम्ही कदाचित तिला पाहू शकालही,पण ती चतुर कोल्ही कर्मधर्मसंयोगानं तुमच्या पाठीमागूनच आली तर !...तर पुन्हा त्या ठिकाणी ती कधीच दिसणार नाही; सहपरिवार ती तिथून लगेच निघून जाईल.

कोल्ह्याचं निरीक्षण करावयाचं तर पुढील नियम पाळायलाच हवेत.त्यांना दुरून पाहावं.दिवसाउजेडी उघड्या डोळ्यांनीच त्यांना पाहायचं झालं तर थोर्ड दूरवर गेल्यानं,जरा लांब अंतरावर राहिल्यानं काही बिघडणार नाही.उलट फायदाच होईल.त्यांच्यापासून वीसएक फुटांवर असण्यात खूप तोटे आहेत,तर पन्नास यार्डावर आपण मोठे सुरक्षित असतो.

कोल्ह्यीचं छायाचित्र मिळणं म्हणजे कपिलाषष्ठीचा योगच म्हणायला हवा!आपल्या आवाक्यातलं कप्पीजवळचं एखादं झाड,जवळपासची झाडंझुडपं यांच्या आश्रयानं तिचं एखादं छायाचित्र घेणं अशक्य नाही.कप्पीच्या तोंडाजवळ दिसणाऱ्या रिफ्लेक्टरमुळे ती कोल्ही अशी काही बुजून जाते की नंतर तिचं छायाचित्र मिळणं दुष्करच.कोल्ह्याचं छायाचित्र टिपता येणं हे आजही एक आव्हान आहे.

कोल्हा-कोल्ही आपल्या अजाण बछड्याची मोठ्या दक्षतेनं काळजी घेतात.खरोखरीच ती आदर्श मातापितरं असतात.वेळ पडली तर कोल्ही आपली पिलं वाचविण्यासाठी जिवाचा धोका पत्करेल.स्तनपान सोडलेली,आईविना असलेल्या पिलांची कोल्हा जोपासना करतो.त्यांना आईच्या मायेनं वाढवितो.

भक्ष्याविषयीच्या कोल्ह्याच्या काय सवयी आहेत त्याचं निरीक्षण सामान्यतःत्याच्या विष्ठेच्या पृथक्करणानं करता येतं.परंतु त्यांच्या कप्पीजवळ पडलेल्या पशुपक्ष्यांच्या अवशेषांवरूनही खूप माहिती मिळू शकते.दिवसाउजेडी तोंडात भक्ष्य धरून गुहेकडे येताना ते काय आणतात, यांच्याही नोंदी ठेवाव्यात.हेच निरीक्षण तांबडी काच असलेल्या विजेरीच्या साह्यानं रात्रीच्या वेळी गुहेच्या तोंडाजवळ करता येतं.कारण तांबड्या प्रकाशानं ते बुजत नाहीत.

निळावंती मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र सिताबर्डी,नागपूर

त्यांच्या पोटातील अवशेषांवरून व विष्ठेच्या पृथक्करणानं मिळालेल्या माहितीवरून असं आढळून आलं आहे की,कोल्हे नाना प्रकारचं खाद्य खातात. गावकोंबड्या,तित्तिर,लावा व ससे यांवरच कोल्ही जगतात असं समजणं चुकीचं आहे,पण संधी मिळाली तर ते हे प्राणी सोडणार नाहीत,हेही तितकंच खरं आहे. घुशी,उंदीर,बेडकी,घुई,कोश-अळी,किडे,मृत प्राण्यांचं मांस हे त्यांचं मुख्य अन्न आहे.विविध फळंही त्यांना आवडतात.बहाव्याच्या गुळमट शेंगा त्यांना फार आवडतात.शेतातील ऊस,खरबूज,

कलिंगड,गाजर व रताळी ज्या ज्या वेळी सहज प्राप्त होतात,त्या त्या वेळी ते खातात.बोरं खाण्यासाठी ते बोराच्या झाडाखाली गोळा होतात.दूरदुरून अभयारण्यं पाहायला येणाऱ्या प्रवाशांना कोल्ही हमखास दाखविण्यासाठी वाघाप्रमाणे गारा (बेट : आमिषादाखल मुद्दाम मारून टाकलेलं जनावर) बांधावा लागतो.

सशाइतका उत्तम गारा नाही. परंतु सुकविलेलं मांस व अंडीही त्यांना आवडतात. एकदा का अशा गाऱ्याची सवय जडली की कोल्ही पुनःपुन्हा तिथे येताना दिसतात.

कधीकधी,कोल्ह्याला सहज चढता येईल अशा झाडावर 'गारा' बांधावा.कोल्ही अशा झाडांवर चढतात. कित्येकदा त्यात लपून बसलेलीही आढळतात.अशी संधी प्राप्त करून दिल्यामुळे त्यांना चढताना,उतरताना पाहता येणं सहज शक्य होतं.

जानेवारी-फेब्रुवारी हा त्यांचा विणीचा काळ.ज्या माळरानात कोल्हेकुई नेहमी ऐकू येते अशा जागेपासून काही अंतरावरच्या टेकडीवर चांदण्या रात्री बसलात तर कदाचित कोल्ह्याची एखादी जोडी दिसेलही.वाघानं टाकून दिलेल्या सांबराच्या अवशेषांवर कोल्ही मोठ्या संख्येनं जमा होतात.तुम्हाला शिकार आवडो न आवडो; पारधी,वैदू,शिलाजितवाले व आदिवासींची शिकारी कुत्री कोल्ह्यांचा माग काढताना जरूर पाहा;म्हणजे कोल्हा कुत्र्यांना कसा गुंगारा देतो कसा चकवतो ते दिसेल.असं एखादं शिकवलेलं कुत्रं जवळ बाळगलं तर कोल्ह्याचा माग काढायला त्याचा खूप उपयोग होतो.

एखाद्याला अचानक खूप लाभ झाला वा घबाड हाती लागलं तर अजूनही ग्रामीण भागात म्हटलं जातं की, "कोल्ह्याचं तोंड पाहिलंस की काय?" याचं कारण कोल्हा दृष्टीस पडण्याची संधी क्वचितच मिळते.एकदा मी वनमार्गानं जाताना दव पडलेल्या गवतावर उगवत्या सूर्याच्या प्रकाशात एक कोल्हा लोळताना दिसला. तळ्याच्या काठानं पक्षिनिरीक्षण करताना सराणीतल्या (नदीचं मागे सरलेलं खाडीसारखं पाणी) खोलगट भागातूनही त्याला बिचकून धूम ठोकताना अनेक वेळा पाहिलं.भावतरल मनाची माझी पहिली आठवण कशाची असेल,तर ती आहे समुद्रावरच्या मावळत्या सूर्याची दोन्ही बाजूला निळाईनं झाकलेल्या पर्वतमाला. मध्ये अथांग पसरलेल्या गूढ जलाशयावरच्या निळ्याहिख्या लाटा.सागर- सीमेवरील ते छोटंसं गाव. नारळ-पोफळी-केळी यांच्या सुंदर बागा.

किनाऱ्यावरचं ते केतकीचं बन आणि आपल्या पिलांबरोबर लपतछपत केवड्याच्या बनांतून डोकावणारी चतुर कोल्ही.


¶¶¶ समाप्त ¶¶¶