* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: महत्ता भारतीय वादसंवादाची! / The importance of Indian debate!

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

6/14/26

महत्ता भारतीय वादसंवादाची! / The importance of Indian debate!

'माझ्या नसानसांत भारतीयता भिनलेली आहे. भारताविषयीची माझी दृष्टी भाबडी असता कामा नये. कुठल्याही तर्काच्या कसोटीवर माझे विश्लेषण घासूनपुसून पाहता आले पाहिजे,असा माझा कटाक्ष होता.त्यामुळे एखाद्या पाश्चात्त्याच्या तटस्थपणातून मी भारताकडे पाहू शकलो.कठोर टीकाकाराच्या भूमिकेतून मी भारतीय परंपरेची शक्तिस्थळे आणि दुबळेपणा उमजून घेतला होता.म्हणूनच भारताला आधुनिक रूपडे आणण्याची आस मला लागली होती'.-जवाहरलाल नेहरु ( वाद-संवादप्रिय भारतीय - अमर्त्य सेन ( द ऑर्क्युमेंटेटिव्ह इंडियन,पेंग्विन प्रकाशन,अनुवाद : वाद-संवादप्रिय भारतीय - शारदा साठे मेहता पब्लिशिंग हाउस ) डोळ्यांदेखत एक जण दुसऱ्याच्या पोटात सुरा खुपसतो, रक्ताचे थारोळे साचते.अकरा वर्षांचा कुमार हे सारे भेदरून पाहतो आहे.त्याचे वडील भोसकला गेलेल्याला पाणी पाजतात.

रुग्णालयात घेऊन जातात. मात्र,रुग्णालय त्याला वाचवू शकत नाही,हे दृश्य ते बालक जन्मभर विसरू शकत नाही.त्याला 'मारणारा हिंदू,मरणारा मुस्लीम' असा धार्मिक चश्मा मिळाला नव्हता.जात,धर्म,भाषा,प्रांत ह्या क्षुद्र सीमांच्या पलीकडे पाहण्याची गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची वैश्विक दृष्टी त्याला लाभली होती.मरणारा बेरोजगार होता. माणसाला काम का मिळत नाही? माणूस जिवे मारायला का व कधी तयार होतो? कठोपनिषदात मृत्यूचे रहस्य उलगडण्याकरिता बालक नचिकेत यमाचा पिच्छा पुरवतो,अशी गोष्ट आहे.त्याप्रमाणे 'हा कुमार' हिंसेचा उगम शोधायला निघाला.१९४२ च्या महाभयंकर दुष्काळाच्या आठवणी त्या बालमनाला दुःस्वप्नासारख्या होत्या.गोदामात धान्याच्या पोत्यांची थप्पी असूनही गोदामाबाहेर हाडांचे सापळे का हिंडतात? याचा 'अर्थ'बोध करून घेण्यासाठी अमर्त्य कुमार सेन झटत राहिला.त्यातून दुष्काळाचे व भुकेचे अर्थशास्त्र जगासमोर आले.टागोर यांच्या मानवतावादी विचारांचा विस्तार अमर्त्य सेन यांनी केला.मध्ययुगात रुतलेल्या सुस्त भारताला आधुनिकतेकडे खेचून आणणारा रथ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी तयार केला.महात्मा गांधी आणि आणि पं.नेहरू यांनी तो रथ ओढणाऱ्या अनेक पिढ्या घडवल्या.

प्राचीन काळापासून पौर्वात्य व पाश्चात्त्य विचार,नवता व परंपरा,निसर्ग व मानव,व्यक्ती व समाज,बुद्धी व भावना अशी अनेक द्वंद्वं चालत आली आहेत.त्यांच्यात अद्वैत साधण्याची किमया टागोर,गांधी व नेहरू यांनी साधली. विक्रम साराभाई,

सत्यजित राय,लॉरी बेकर,अमर्त्य सेन यांसारख्यानी त्यांचा वारसा प्रगल्भ करून आधुनिकता रुजवण्याचे कार्य केले.टिकवून धरावी अशी भारतीय परंपरा कोणती?भारताने नवतेमधील कशाचा स्वीकार करावा? परंपरा आणि आधुनिकता यांचा उत्तम संगम कसा घडवावा? याचा सखोल आणि चिकित्सक मागोवा घेऊन टागोर,गांधी व नेहरू याँनी विचार आणि कृती दिली.त्यासाठी आवश्यक लोकशाही मूल्यांना आधार देणाऱ्या संस्थांची रचना केली.भारतीय लोकशाहीने पंचाहत्तर वर्षांत केलेल्या प्रगतीचा पाया या तिघांनी घातला,याचा विसर पाडणे कृतघ्नपणाचे ठरेल.काळाच्या ओघात कुठलाही बदल घडवण्यात अग्रभागी राहणाऱ्या मध्यमवर्गाची संवेदनशीलता नाहीशी होत गेली.इतरेजनांबद्दल तुच्छता व मग्रुरी हे मध्यमवर्गीयांचे व्यवच्छेदक लक्षण ठरू लागले.पैसा कमावणारा यंत्रवत व आत्ममग्न समाज पाहून १९९१मध्ये सत्यजित राय यांना सुसंस्कृतता (व ते स्वतः) 'आगंतुक' असल्याची

खात्री वाढू लागली.१९९२ मध्ये जर्मनीला विभागणारी बर्लिन भिंत पाडण्यात आली.

जग एकवटण्याची सुरुवात झाली.' त्याच वर्षी तालिबानी काश्मीरमध्ये घुसले आणि हिंसाचार सुरू केला इकडे बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली.सार्वजनिक जीवनात भौतिक समस्यांपेक्षा धार्मिक व जातीय मुद्द्यांना अधिक महत्त्व येत गेले.अनेक संघटना संपुष्टात येऊ लागल्या.हिंदू-मुस्लीम,सवर्ण-दलित यांच्यात सेतू साधणारे कार्यक्रम दिसेनासे झाले.समाजातील संवाद नाहीसा होऊ लागला.कधीही उद्रेक होऊ शकेल अशी ज्वालाग्राही परिस्थिती अनेक ठिकाणी दिसू लागली.

भारतापुढे भविष्यात काय वाढून ठेवलं आहे? दारिद्र्य व विषमतेच्या पर्यावरणातील अशांतपर्वातून आपण कसे बाहेर पडणार? प्रादेशिक अस्मिता वरचढ ठरून देशाचे तुकडे पडतील?अशा अनकेविध कूटप्रश्नांनी ग्रासलेल्या भारताने विचार कसा करावा? भारतामधील सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय घडामोडींमुळे अस्वस्थ होऊन अर्थतत्त्वज्ञ डॉ.अमर्त्य सेन भारताच्या भवितव्याबाबत सातत्याने चिंतन करीत आहेत.ते आपल्या व्याख्यानांतून व निबंधांतून त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. 'द ऑर्क्युमेंटेटिव्ह इंडियन' ह्या ग्रंथातून डॉ.अमर्त्य सेन यांनी भारतीय इतिहास आणि संस्कृतीमधील सार्वकालिक विचारांचे सत्व आपल्याला काढून दिले आहे.स्त्रिया व कष्टकरी चळवळीमधील ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती शारदा साठे यांनी 'वाद-संवादप्रिय भारतीय' हा या मौलिक ग्रंथाचा अनुवाद, मराठी वाचकांना उपलब्ध करून दिला आहे.अमर्त्य सेन यांनी प्रस्तुत ग्रंथामध्ये 'अभिव्यक्ती आणि बहुविधता','संस्कृती आणि परस्परसंवाद',

'राजकारण आणि निषेध','बुद्धिप्रामाण्य आणि ओळख' अशा चार भागांतील प्रत्येकी चार प्रकरणांमधून सविस्तर व सखोल मांडणी केली आहे.'वाद-संवादातून चातुर्य येते', या सुभाषिताची प्रचिती भारतीय इतिहासात वारंवार येते.वेद- उपनिषदांचा काळ असो वा रामायण-महाभारताचा काळ असो;मंडण व खंडण हा सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य घटक होता. सार्वजनिक वादविवादांमध्ये जातिभेद वा लिंगभेद नव्हता.प्रत्येकाला मोकळेपणाने विचार मांडण्याची मुभा होती.भारतीय युक्तिवादाची परंपरा ही कोणाचीही मक्तेदारी

( १ 'आगंतुक' हा सत्यजित रे यांचा शेवटचा चित्रपट. १९९२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात रे यांनी तथाकथित सभ्यता व सुसंस्कृततेला प्रश्न विचारले आहेत.

२ दुसऱ्या महायुद्धानंतर विचारसरणींच्या आधारावर जर्मनीची पूर्व व पश्चिम अशी फाळणी झाली.पश्चिम जर्मनीने लोकशाही भांडवलवादाच्या तत्त्वावर वाटचाल केली,तर पूर्व जर्मनीने साम्यवादी (कम्युनिझम) तत्त्वावर.साम्यवादी सोव्हिएत रशियाचे पतन झाल्यानंतर १९९२ मध्ये जर्मनीचे पुन्हा एकीकरण होऊन तिथे लोकशाही भांडवलवाद रूढ झाला.)

नव्हती.आद्य शंकराचार्यांना विचार करण्यास भाग पाडणारा चांडाळ होता.रामायणात रामावर कडाडून टीका करणारा नाबाली होता.याज्ञवल्क्य ऋषीला विदुषी गार्गी धर्मशाखातील कूटप्रश्न विचारते.

द्रौपदीने केलेल्या प्रश्नांच्या भडिमारापुढे धृतराष्ट्र,

विदुर,भीष्माचार्य दिङ्गुढ होतात.इतकेच काय,जेव्हा रक्तरंजित युद्ध करण्यापेक्षा सत्तेचा त्याग उत्तम असा पर्याय युधिष्ठिर निवडतो, त्या वेळी द्रौपदी म्हणते,'आपण राजाधिराज इंद्राप्रमाणे शूर आहात.अवघ्या पृथ्वीवर आपण प्रदीर्घ काळ राज्य केले आहे.आता आपल्याच हाताने ते राज्य भिरकावून देत आहात.

आपल्याला शौर्य कर्म करावयाचे नसेल,तर क्षत्रियाचे प्रतीक असलेले हे धनुष्य द्या फेकून! केसांची वेणी करून घ्या.मग खुशाल आयुष्यभर पवित्र अग्ग्रीला आहुती देत बसा.' हा द्रौपदीचा युधिष्ठिराशी संवाद केवळ भावनिक नाही.समर्पक उपमा,रूपक यांची पखरण करीत केलेली ती तर्कशुद्ध मांडणी होती.पुढे युद्धभूमीवर कृष्ण व अर्जुन यांच्यातील प्रदीर्घ संवाद गीतेमधून व्यक्त झाला आहे तात्त्विक व नैतिक प्रश्नांमुळे अर्जुन विषण्ण झाला होता.त्याच्या सर्व शंका व संशय नाहीसे करून त्याने युद्धास सिद्ध होईपर्यंत कृष्णाने केलेले तर्कशुद्ध संभाषण गीतेच्या अध्यायांतून आढळते.

'महापुरुष असो वा ग्रंथ;कोणाचेही प्रतिपादन हे अंतिम प्रमाण मानू नका.बुद्धीस पटले तरच त्याचा स्वीकार करा.' हा संदेश हीच भारतीय विचारपरंपरेची अमूल्य देणगी आहे,याचे अनेक दाखले अमर्त्य सेन देतात. प्राचीन भारतात धार्मिक कर्मठपणाला समाजातील कनिष्ठ वर्गांकडून सतत आव्हाने दिली गेली. जातिव्यवस्था घडत गेली,तेव्हा श्रेष्ठत्वाच्या उतरंडीवर घणाघाती हल्ले झाले आहेत.भृगू ऋषी भारद्वाजांना विचारतात,'आपण सारी ईश्वराची लेकरे आहोत,तर मुलांचे वर्ण भिन्न कसे असू शकतील?' यक्ष व कूटप्रश्नांच्या आधारे तर्काच्या कसोटीवर प्रत्येक बाब तपासून पाहणे,शंका व संशय घेणे ही प्राचीन भारतामधील सहज प्रवृत्ती झाली होती. 'बाबा वाक्यं प्रमाणं' मानणाऱ्यांना भारतीय इतिहासात प्रतिष्ठा नव्हती.त्यातूनच चार्वाकांचा नास्तिकतावाद विस्तारत गेला. 'मृगजळाप्रमाणे इंद्रियांस कधी भास होऊ शकतात.धूर असेल तर आग असण्याची शक्यता असते, एवढेच सांगता येते.'असे लोकायत दर्शन सांगते.कनिष्ठ जातींना मिळणारी वागणूक सहन न झाल्यामुळेच बौद्ध व जैन धर्माची स्थापना झाली. त्या काळात वाद-संवादांमुळे मतांतरे व त्यातून धर्मांतरे झाली आहेत.सामाजिक भेदभावाचा धिक्कार करणाऱ्या हिंदू भक्ती पंथ,तसेच मुस्लीम सूफी पंथ यांचा सहज प्रसार मनपरिवर्तनामुळेच झाला होता.सहिष्णुता व सौहार्दाचे वातावरण तयार करण्यात ऐतिहासिक भूमिका बजावणारे सम्राट अशोक,अकबर हे हिंदू नव्हते.विणकर कबीर,चर्मकार रविदास,सेना न्हावी, नरहरी सोनार हे कवी; तर मीराबाई.मुक्ताबाई,दयाबाई, अंदलबाई,

सहजोबाई ह्या कवयित्रींच्या भजनांची समाजमनावर छाप अजूनही आहे. विचारमंथनाची प्रक्रिया खोलवर रूजल्यामुळे समाजातील सर्व थरातून अभिव्यक्तीचा तो अविष्कार होता.इसवी सन १००० सालार्यंत अवघ्या जगावर भारतीय विज्ञान,तत्त्वज्ञान आणि गणित यांचा दबदबा निर्माण झाला होता. त्याचा पाया हा बहुविधतेच्या ऐतिहासिक परंपरेने रचला होता.

वाद-संवाद परंपरांमुळे भारतीय उपखंडातील सामाजिक व सांस्कृतिक जगाची जडणघडण होत गेली.त्यामुळेच बहुविधता हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे.भारतीय लोकशाही ही ब्रिटिशांच्या प्रभावाची निष्पत्ती असल्याची ग्वाही अनेक स्वयंघोषित बुद्धिवादी देतात.अतिप्राचीन काळापासून चालत आलेल्या वाद-संवाद परंपरांमुळे आपल्या लोकशाहीची पाळेमुळे खोल रुजली आहेत,हा इतिहास त्यांना माहीत नसतो.

असे नसते तर ब्रिटिश साम्राज्याच्या आधिपत्यापासून मुक्त झालेल्या शंभर राष्ट्रांमध्ये लोकशाही सारखीच दिसली असती,असा बिनतोड युक्तिवाद सेन करतात.

प्राचीन भारतामध्ये कालगणना करण्यासाठी सात प्रकारच्या दिनदर्शिका उपलब्ध होत्या.खगोलशास्त्र व गणिताचा गाढा अभ्यास असल्याशिवाय दिनदर्शिका तयार करता येत नाही.इसवी सन पूर्व ३१०२ मध्ये कलियुग कालगणना पद्धतीचा आरंभ झाला.त्यामधील अचूक गणितीपद्धतीच्या नोंदी पाहून आज कुणीही थक्क होईल.चार लक्ष बत्तीस हजार वर्षांचे कलियुग हे चार युगांतील सर्वांत लहान युग आहे.कृतयुग हे कलियुगाच्या चौपट,द्वापारयुग हे तिप्पट,तर त्रेतायुग हे कलियुगाच्या दुप्पट होते.'कलियुग दिनदर्शिकेमधून त्या काळातील ग्रहताऱ्यांची अचूक स्थिती लक्षात येते',असा गौरव गणितज्ञ लाप्लेस यांनी केला होता.सेन यांनी बुद्धनिर्वाण,महावीरनिर्वाण शक,बंगाली व कोल्लम यांसारख्या इतर दिनदर्शिकांचा अभ्यास करून त्यांच्यामधील विविधता आणि एकतेकडे लक्ष वेधले आहे.

इतिहासाची महत्ता सांगताना सेन वर्तमानातील भारताच्या समस्यांबाबत चिंता व्यक्त करतात. जागरूक मतदारांना धार्मिक अस्मितेपेक्षा भूक, रोजगार, शिक्षण, आरोग्य हेच प्रश्न महत्त्वाचे वाटतात, याकडे ते वाचकांचे लक्ष वेधतात.

इतिहासाची महत्ता सांगतानाच सेन वर्तमानाकडे येतात. केवळ संख्यांचा आधार घेऊन भारताला हिंदुत्ववादी ठरवण्याच्या विकृत खटाटोपाचा खरमरीत समाचार घेतात 'कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय पक्षांना स्वातंत्र्य चळवळीपासून आजतागायत कधीही जनाधार मिळालेला नाही.आजही भारतीय जनता पक्षाला ३० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळू शकत नाहीत.बाबरी मशीद उद्ध्वस्त करणे,गुजरातमध्ये मुस्लिमांवर निर्घण अत्याचार करणे,असे हिंसाचार करून धर्माच्या पायावर राजकीय फायदा उठवता येत नाही.जागरूक मतदारांना धार्मिक अस्मितेपेक्षा भूक, रोजगार,शिक्षण,आरोग्य हेच प्रश्न महत्त्वाचे वाटतात,हे अनेक निवडणुकांमधून व्यक्त झाले आहे.हेच भारताचे वैशिष्ट्य आहे.' असे ते म्हणतात.भारत व चीन यांच्यात व्यापारी संबंध पूर्वापार चालत आले आहेत.बौद्ध धर्मामुळे देवाणघेवाण वाढत गेली. पहिल्या सहस्रकात भारतीय विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी चिनी विद्वान मोठ्या संख्येने येत असत. चिनी प्रवाशांनी,तसेच विद्वानांनी भारतीय शिक्षण व आरोग्यव्यवस्थेला आदर्श म्हटले आहे.

हा इतिहास रम्य वाटला,तरी वर्तमानात भारताची शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील अवस्था दयनीय आहे.शिक्षणाचा प्रसार आणि उत्तम सार्वजनिक आरोग्य यांच्यामुळे जागतिकीकरणानंतर चीनला आंतरराष्ट्रीय व्यापारात हनुमान उडी घेता आली.निर्यात होणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करण्याकरिता चीनमध्ये कामगारांना प्रशिक्षित केले जाते.जागतिक बाजारपेठेत उतरायचे असेल,तर गुणवत्ता उच्च दर्जाची असावी लागते.अनुरूप शिक्षण व चांगले आरोग्य असल्यास उत्पादन व सेवा यांचा दर्जा टिकून राहतो.जागतिक बाजारपेठेत चीनने स्थान मिळवताच तिथे नोकऱ्या वाढू लागल्या.या विकासप्रक्रियेपासून भारताने बोध घेतला पाहिजे,असे आग्रही प्रतिपादन अमर्त्य सेन करतात.

'राजकीय समानता आली,तरी सामजिक व आर्थिक विषमतेमध्ये भारतीय लोकशाही आयुष्य कंठणार आहे.' १९५०मध्ये डॉ.आंबेडकरांनी प्रजासत्ताकावर केलेले मार्मिक भाष्य आजदेखील तंतोतंत लागू पडते. 

१९४३ नंतर दुष्काळामुळे भूकबळी झाले नाहीत,याचे श्रेय भारतीय लोकशाहीला आहे.गेल्या पंचाहत्तर वर्षांत आयुष्यमान व दरडोई उत्पन्न वाढले.तरीदेखील आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. काही महानगरांमधील मोजक्या लोकांभोवती जागतिकीकरणाचा फायदा एकवटला आहे. 'विषम संधी हा आपल्या लोकशाहीवर लागलेला कलंक आहे. निरक्षरता,अनारोग्य,अपूर्ण जमीन सुधारणा व शेतीविकासाची उपेक्षा अशीच चालू राहिली,तर अशांतता व असुरक्षिततेमुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते.' हे प्रखर वास्तव सेन अधोरेखित करतात. त्याचबरोबर ते उपाययोजनादेखील सुचवतात.प्राथमिक शिक्षणाच्या व्यवस्थापनाची पुनर्रचना करावी, शाळेच्या व्यवस्थापनात वंचित समाजगटाच्या पालकांचा समावेश करावा,अशा अनेक धोरणात्मक सूचना ते करतात.

महाभयंकर हिंसा आणि पर्यावरण विनाश यांमुळे सध्या जग अंधारून गेले आहे.तर्क वा युक्तीने संवाद साधता येण्याची क्षमता नसणारे निर्बुद्ध लोक बळाच्या आधारे मत लादू पाहतात.असे लोक सर्व काळात,सर्व धर्मांत व पंथांत असतात.लोकशाही व समाजस्वास्थ्य धोक्यात येण्याचे प्रसंग राष्ट्राच्या आयुष्यात येत असतात. 

आज समस्त जनता हवालदिल झाली असून,हे भीषण वातावरण त्यांना नकोसे झाले आहे.जनता तिच्या विविध पद्धतीने भावना व्यक्त करीत आहे आणि हीच आशा आहे.बदल व्हावा ही अभिव्यक्ती महत्त्वाची असते.त्यातूनच युक्तिवाद व वाद-संवाद झडू लागतात. मोठ्या परिवर्तनाची ती नांदी असते.काळ्याकुट्ट ढगांनी दाटी केली,तरी काही क्षणांत रुपेरी कड अवतरते आणि आसमंत उजळून जातो.निरंतर सुरू राहिलेल्या वाद-संवाद परंपरेने भारतावरील अनेक सावटे दूर केली आहेत.त्यामुळेच वाद-संवाद परंपरा हीच भारतीयत्वाची ओळख आहे,हे सेन साधार दाखवून देतात.एकविसाव्या शतकातील भारतात १००० पुरुषांमागे ९३० स्त्रिया आहेत.आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गर्भाचे लिंग जाणून घेतल्यावर मुलींचा नाश करण्याचे प्रमाण वाढत आहे.१९८६ मध्ये जगभरातील १० कोटी बालिकांना 'गायब' करून टाकले गेले.या वास्तवाने सेन दुःखी होतात.पंजाब,

हरियाणा,गुजरात व महाराष्ट्र ही राज्ये त्यात आघाडीवर आहेत.त्यामानाने पूर्व व दक्षिणेकडील राज्यांत परिस्थिती बरी आहे. हा लिंगभेद समाजस्वास्थ्य बिघडवून टाकणारा आहे.मातांचे मोठ्या प्रमाणावर कुपोषण होते.त्यामुळे कमी वजन व आजार घेऊनच बालकांचा जन्म होतो.पुढे बालपणातील कुपोषणामुळे अनेक व्याधी जडतात.यापासून सुटका झाली असेल,तर शिक्षण,नोकरी,व्यवसाय,संशोधन, राजकारण सर्वच क्षेत्रांत स्त्रियांना मिळणाऱ्या सुविधांपासूनच विषमता सुरू होते.

गुणवत्ता असूनही महिलांना संधी नाकारण्याची मानसिकता आजही तेवढीच आक्रमक आहे.त्यामध्ये गरीब व श्रीमंत असा वर्गभेद करता येत नाही.अमेरिकेत दरवर्षी १५ लाख महिलांवर बलात्कार होतात,याकडे सेन लक्ष वेधतात.आपली संस्कृतीची वैशिष्ट्ये कोणती? इतिहास कसा वाचावा? यांचा वस्तुपाठ प्रस्तुत ग्रंथ देतो. भूतकाळाचे भान व वर्तमानासाठी कृतिआराखडा सेन सादर करतात.

समाप्त...