सर फिरोझशहांना पाहिल्यावर मला हिमालयाची आठवण झाली तर लोकमान्य टिळक हे मला महासागरासारखे वाटले. पण गोपाळ कृष्ण गोखले मला गंगानदीसारखे वाटले. हिमालय अनुल्लंघ्य आहे, महासागर तरून जाणे अत्यंत कठीण आहे पण गंगामाता मात्र कोणालाही आपल्या आईसारखीच वाटते.
- महात्मा गांधी
गांधीजींचे गुरु,नामदार गोपाळ कृष्ण गोखले,आचार्य अत्रे,
गांधी नावाचे महात्मा,संपादक-रॉय किणीकर,सहाय्यक -अनिल किणीकर
'भारत सेवक समाजा'चे संस्थापक,महात्मा गांधींचे गुरू आणि घटनावादी राजकारणाचे महान प्रणेते नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी मधुमेहाच्या विकाराने पुणे येथे आपल्या 'समाजा'च्या वास्तूत निधन पावले. तो दिवस आम्हाला अगदी ठळकपणे अजून आठवतो आहे.कारण त्यावेळी आम्ही 'फर्ग्यूसन कॉलेज'मध्ये पहिल्या वर्षात नुकतेच प्रविष्ट झालो होतो.गोखल्यांच्या निधनाची वार्ता ऐकताच आम्ही काही विद्यार्थी तडक धावतच 'भारत सेवक समाजा'त गेलो.तेथे गोखल्यांच्या गौरवर्ण आणि सुंदर पण निश्चेष्ट देहाचे अंत्यदर्शन आम्ही अगदी जवळून घेतले.जिवंतपणी आम्ही गोखल्यांना कधीच पाहिले नव्हते.किंवा त्यांचे भाषणही कधी ऐकले नव्हते.आम्हांला घडलेले तेच त्यांचे पहिले नि शेवटचे दर्शन.त्यानंतर गोखल्यांची जी विराट अंत्ययात्रा पुणे शहरातून निघाली तिच्यात लक्षावधी लोक सामील झाले.
जिवंतपणी पुणेकरांनी गोखल्यांची फारशी कदर केली नव्हती; पण त्यांच्या पार्थिव देहाला निरोप देण्यासाठी ओंकारेश्वराच्या स्मशानात जो अमर्याद जनसमुदाय त्यावेळी जमला होता,तो पाहिल्यानंतर पुणेकरांनी आपल्या पूर्वीच्या उपेक्षेची संपूर्ण भरपाई करून टाकली अशीच सर्वांची खात्री झाली.लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले ह्यांच्या मधले राजकीय वितुष्ट त्या काळी अगदी विकोपाला गेले होते.आदल्याच आठवड्यात "तुमच्या आमच्या गवऱ्या आता ओंकारेश्वरावर गेल्या आहेत,"असे वैतागाने टिळकांनी गोखल्यांना उद्देशून उद्गार काढले होते.ते इतक्या तडकाफडकी अक्षरशः खरे ठरतील असे कोणालाच वाटले नव्हते,म्हणून व्याकूळ अंतःकरणाने लोकमान्य टिळक सिंहगडावरून धावत आले आणि गोखल्यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी श्रोत्यांच्या काळजांना पीळ पाडणारे भाषण केले.सर रामकृष्ण भांडारकरांसारख्या वयोवृद्ध विद्वानानेसुद्धा गोखल्यांना श्रद्धांजली वाहिली.आमच्या शेजारी राम गणेश गडकरी बसले होते.त्यांनी कागदाच्या तुकड्यावर तेथल्या तेथे पुढील ओळी भराभर लिहिल्या.
साऱ्या शहर पुण्याई काळवंडली कां ही?
आनंदाची माया हांसत खेळत कुठेच कां नाही?
भारतसेवा - मंडल - सदनांभवती उदास वदनांनी अश्रूची पुष्करिणी केली का? काय जाहली हानी ? श्री फर्ग्युसन मंदिरि शोकाचा पूर लोटला कां हां? हे भिंतीचे दगडही रडूनी म्हणती सारखेच का? हा! हा!
त्या दिवसाचे सारे स्मरण अगदी काल घडल्यासारखे आम्हाला आता आहे.टिळक आणि गोखले हे त्या काळी महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे सूर्य-चंद्र होते.भारताला स्वराज्य मिळावे म्हणून देशातल्या ज्या दोन राजकीय प्रवृत्तींचे द्वंद्वयुद्ध त्या काळी चालू होते,त्यांचा टिळक - गोखले हा एक द्वंद्व समास होता.टिळकांवाचून गोखल्यांना शोभा नव्हती आणि गोखल्यांवाचून टिळकांना तेज नव्हते.दोघांच्या विचारसरणींमध्ये जेवढा विरोध होता,तेवढेच साम्य होते.
१८८४ साली वयाच्या अठराव्या वर्षी पुण्याच्या 'डेक्कन कॉलेज' मधून गोखले बी.ए. झाले आणि लागलीच आपटे आगरकर टिळक ह्यांनी स्थापन केलेल्या 'फर्ग्युसन कॉलेज' मध्ये महिना पाऊणशे रुपयांवर आजन्म सेवक झाले.
कॉलेजमध्ये टिळक आणि गोखले गणितच शिकवीत असत.पुढे नव्वद साली टिळक कॉलेजातून बाहेर पडले.तरी देखील 'सार्वजनिक सभे'च्या राजकीय कार्यात दोघेही काही काळ एकत्र वावरत होते.गोखले हे वयाच्या एकविसाव्या वर्षी 'सार्वजनिक सभे'चे चिटणीस होते एवढेच नव्हे,तर 'सभे' च्या इंग्रजी त्रैमासिकाचे ते संपादकही होते.पुढे 'सार्वजनिक सभे'तील रानडे-टिळक पक्षाचे मतभेद विकोपाला गेले तेव्हा रानडे पक्षीय मंडळी 'सार्वननिक सभे'तून बाहेर पडली आणि त्यांनी पुण्यात 'डेक्कन सभा' नावाची दुसरी एक राजकीय संस्था स्थापन केली.तिचे गोखले हे चिटणीस झाले.
आगरकरांच्या संपादकत्वाखाली निघणाऱ्या 'सुधारका'च्या इंग्रजी विभागाचे गोखले हे चार वर्षे संपादक होते.'केसरी' आणि 'सुधारक' ह्यांचा एकमेकांवर नेहमी शाब्दिक भडीमार चालू असे. त्यामुळे टिळक आणि गोखले ह्यांचे राजकीय मतभेद एकसारखे वाढत गेले तरीदेखील १९९५ मध्ये पुणे काँग्रेसचे अधिवेशन जे भरले,त्याचे सरचिटणीस दिनशा एदलजी वाच्छा होते आणि त्याचे दुय्यम चिटणीस टिळक आणि गोखले हे दोघेजण होते.त्यानंतर मात्र उभयतांमधील राजकीय अंतर इतके वाढत गेले की,पुन्हा ते शेवटपर्यंत एकत्र कधीही येऊ शकले नाहीत.
१८९४ सालापासून गोखले ह्यांनी काँग्रेसच्या राजकारणाला सर्वस्वी वाहून घेतले.त्यावर्षी लाहोर काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष दादाभाई नौरोजी,एम. पी.हे पुण्यास आले असताना नागरिकांनी त्यांची हिराबागेपर्यंत घोड्याच्या गाडीतून मोठी मिरवणूक काढली.त्या गाडीत गोखल्यांना बसावयाला जागा नव्हती तरी देखील ते मोठ्या आनंदाने गाडीच्या कोचमनशेजारी बसले.एवढा काँग्रेसबद्दलचा त्यांचा उत्साह अगदी शिगोशीग उचंबळत होता.न्या. रानडे आणि गणेश व्यंकटेश जोशी ह्यांच्या मार्गदर्शकत्वाखाली गोखले ह्यांनी अर्थशास्त्राचा अत्यंत सखोल अभ्यास करून त्यात पराकाष्ठेचे प्रभुत्व मिळविले.त्यामुळे १८९७ साली वेल्बी कमिशनपुढे भारताच्या वतीने साक्ष देण्यासाठी इंग्लंडमध्ये त्यांनाच पाठवण्यात आले.ते त्यावेळी अवघे एकतीस वर्षाचे होते.
कमिशनने त्यांना वेडेवाकडे नि आडवेतिडवे प्रश्न विचारून त्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला. पण गोखले ह्यांनी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला बिनचूक उत्तरे देऊन त्यांची भंबेरी उडविली.त्यांच्या साक्षीत त्यांनी भारतीय अर्थशास्त्राच्या इतिहासातील महत्त्वाच्या गोष्टींचे विश्लेषण केले.हिंदी सैन्याची घटना आणि त्यावर होणारा खर्च ह्यांची त्यांनी चांगलीच हजेरी घेतली.कर देणाऱ्या जनतेपेक्षा गोऱ्या नोकरशाहीच्या हितसंबंधांना जास्त महत्त्व देण्याच्या आणि वरिष्ठ नोकऱ्यांमधून हिंदी लोकांना वगळण्याच्या सरकारी धोरणावर त्यांनी कडक टीका केली.ह्याच सुमारास पुणे शहरात प्लेगची भयंकर साथ चालू होती.त्यावेळी सोल्जर लोकांनी नागरिकांवर जे अत्याचार केले,त्यांची भयानक वर्णने पुण्यातील गोखल्यांच्या काही मित्रांनी पत्रातून त्यांना विलायतेला कळविली.त्यामुळे गोखल्यांचा संतापही अनावर झाला.त्यांनी त्या पत्राच्या आधारावर 'मँचेस्टर गार्डियन' मध्ये कडक लेख लिहून हिंदुस्थानातल्या गोऱ्या सैनिकांची निर्भत्सना केली.त्यामुळे इंग्लंडमध्ये नि हिंदुस्थानात खूपच खळबळ उडाली.पुढे गोखले जेव्हा परत हिंदुस्थानात आले तेव्हा गोऱ्या सैनिकांवर त्यांनी विलायतेला केलेल्या आरोपांचा मुंबई सरकारने त्यांना जाब विचारला.पण ज्यांनी गोखल्यांना ही माहिती पुरविली होती,त्यांनी पुरावा देण्याच्या बाबतीत अक्षरशः 'शेपट्या' घातल्या.तेव्हा गोखल्यांना सरकारची माफी मागण्यावाचून दुसरे गत्यंतरच नव्हते.
त्यांच्या त्या माफीमुळे त्यांच्या टीकाकारांनी त्यांच्यावर खूपच गहजब केला.पण मित्रांनी विश्वासघात केल्यानंतर कोणत्याही सभ्य आणि स्वाभिमानी माणसाने तोच मार्ग पत्करला असता.
गोखले 'सुधारक' पंथाचे असल्याने आणि त्यानंतर वारंवार हे इंग्लंडला गेलेले असल्याने त्यांच्या टीकाकारांनी त्यांच्या आहाराविहाराबद्दल नाना तहेच्या अफवा पसरवलेल्या होत्या.पण इंग्लंडच्या पहिल्या वारीत त्यांच्या बरोबर दिनशा एदलजी वाच्छा होते.'गोखल्यांच्या आठवणी'त ते लिहितात, "He never forgot that he was a Hindu, who could not touch an egg or even smell a fish. His food consisted of bread, butter, vegetable soup and fruits. He would not touch a spoonful of pudding for fear it might be made of eggs." इंग्लंडमध्ये असताना ते नारिंगी रंगाची जरीची पगडी डोक्याला घालून हिंडत.त्यामुळे ते सर्वांच्या आकर्षणाचा विषय झाले होते.विलायतेत पहिल्या वेळी ते तीनच महिने राहिले.पण ह्या तीन महिन्यांत त्यांनी जॉन मोर्ले,आयरिश होमरूल पक्षाचे पेते जॉन रेडमंड,सर विल्यम वेडरबर्न,टी. पी.ओकॉनर,सर विल्यम हंटर ह्या मोठमोठ्या मुत्सद्द्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी हिंदी राजकारणावर सविस्तर चर्चा केली.
दादाभाई नौरोजींच्या तर त्यांच्या रोजच्या बैठकी होत होत्या.
इंग्लंडहून परत आल्यानंतर त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वामधे आमूलाग्र फरक झाला. १९०१ मध्ये ते 'मुंबई कायदेमंडळा'त निवडून आले. तेथे गोखल्यांच्या अमोघ इंग्रजी वक्तृत्त्वाचे प्रथम दर्शन झाले.१९०१ मध्ये मुंबई जमीन महसूल कायदा दुरुस्तीचे एक विधेयक सरकारने आखले होते.ते तहकूब करावे म्हणून सर फिरोजशहा मेहतांनी ठराव मांडला.त्याला पाठिंबा देताना गोखल्यांनी एवढे जबरदस्त भाषण केले की सरकारला ते विधेयक मागेच घेणे भाग पडले. १९०२ मधे 'व्हॉईसरॉयच्या कौन्सिल'मधे बिनसरकारी सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. छत्तिसाव्या वर्षी गोखल्यांना हा बहुमान मिळाला. सतत सहा वर्षे ते त्या कौन्सिलमध्ये होते.
त्यावेळी लॉर्ड कर्झन हे व्हॉईसरॉय होते.१९०२ पासून तो १९०८ पर्यंत सतत सात वर्षे गोखल्यांनी जी अर्थसंकल्पावर भाषणे केली,तो अर्थशास्त्राच्या व्यासंगाचा,तर्कशुद्ध निर्भय टीकेचा नि वक्तृत्वाचा उच्चांक होता.भारतीय राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांना ही भाषणे आजही वाचल्याखेरीज गत्यंतर नाही.बजेट कसे तयार करावे आणि त्यातील शिलकी रकमा कशा खर्च कराव्यात ह्याचे झणझणीत धडे त्यांनी सरकारला त्या भाषणातून दिलेले होते. स्वतःचा संयम न सोडता,एकही वावगे अक्षर न उच्चारता,डोळे पांढरे होईपर्यंत सरकारला कसे ठोसे लगावावेत ह्यांचे जणू काही प्रात्यक्षिकच गोखल्यांनी ह्या भाषणातून दिलेले आहे.१९ सप्टेंबर १९०२ साली त्यांनी 'फर्ग्युसन कॉलेज' चा निरोप घेतला त्यावेळचे त्यांचे भाषण अत्यंत हृदयद्रावक होते.त्या भाषणात त्यांनी समुद्राच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या एका माणसाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले,"तो माणूस त्या किनाऱ्यावरील आपल्या झोपडीत सुखाने राहात होता.पण त्याचे सारे लक्ष त्या अफाट समुद्राकडे लागलेले होते.एक दिवस त्याचे ते वेड अनावर झाले.तो होडीत बसला आणि सरळ समुद्राच्या प्रवासाला निघाला.तशी माझी आज स्थिती झाली आहे.ह्या कॉलेजात मी सुखासमाधानाने रहात आहे.पण माझे सारे लक्ष सार्वजनिक जीवनाच्या त्या तुफान आणि चंचल सागरावर खिळलेले आहे.माझा 'आतला आवाज' त्या मार्गाने तू जा असे मला सांगतो आहे.म्हणून देशकल्याणासाठी कर्तव्यबुद्धीने मी ह्या कॉलेजचा निरोप घेतो आहे.ह्या देशात फर्ग्युसन कॉलेजपेक्षा दुसरी पुष्कळ कॉलेजे असतील.पण परांजपे आणि राजवाडे ह्यांच्या त्यागाने ह्या संस्थेभोवती जे तेजोवलय निर्माण झाले आहे,ते अपूर्व आहे."
अवघ्या तीस रुपये महिना पेन्शनवर गोखले सेवानिवृत्त झाले.१९०५ साल हे गोखल्यांच्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे.त्यावर्षी १२ जून रोजी त्यांनी पुण्याला 'भारत सेवक' समाजाची स्थापना केली.नवा भारतवर्ष निर्माण करण्यासाठी त्यागी आणि व्यासंगी समाजसेवकांचा एक आश्रम स्थापन करण्याची गोखल्यांची ही कल्पना जितकी अभिनव तितकीच प्रभावी होती.ह्यावरून त्यांच्या महान द्रष्टेपणाची कल्पना येते.ह्याच वर्षी व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झन ह्यांनी बंगालची फाळणी करून साऱ्या भारतवर्षावर जणू काही एक बाँबगोळाच टाकला.ह्या फाळणीतून स्वातंत्र्यवादी आणि राष्ट्रवादी आंदोलनाचा जन्म झाला.ब्रिटिश मालावर बहिष्कार आणि स्वदेशीचा पुरस्कार ही नवीन अस्त्रे भारतीय जनतेला त्यामुळे प्राप्त झाली. 'वन्दे मारतम्' ही राष्ट्रगीताची गर्जना देशाच्या कानाकोपऱ्यांतून निनादू लागली.लॉर्ड कर्झनच्या दडपशाहीचा वरवंटा साऱ्या देशाच्या डोक्यावरून फिरू लागला.तेव्हा भारतातील राजकीय परिस्थिती इंग्लंडमधल्या मुत्सद्द्यांना आणि जनतेला समजावून सांगण्यासाठी गोखले आणि लाला लजपत राय विलायतेला गेले.विलायतेमध्ये गोखल्यांनी आकाशपाताळ एक केले.पन्नास दिवसांत घसा फाटेपर्यंत त्यांनी पंचेचाळीस व्याख्याने दिली.शेवटी परत येताना बोटीवर त्यांना आपल्या घशावर शस्त्रकर्म करणे भाग पडले. मुंबईत आणि पुण्यात त्यांचा प्रचंड सत्कार झाला. त्या सत्कारात लोकमान्य टिळक सामील झाले. साहजिकच त्या वर्षी वाराणसी येथे भरणाऱ्या राष्ट्रीय सभेच्या विसाव्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी गोखले ह्यांचीच निवड झाली.
त्यावेळी गोखले ह्यांचे वय अवघे एकोणचाळीस वर्षाचे होते,इतका तरुण अध्यक्ष काँग्रेसला कधीच मिळाला नाही.मागेही नाही अन् पुढेही नाही (१९२९ साली नेहरू लाहोर काँग्रेसचे पहिल्याने अध्यक्ष झाले.त्यावेळी त्यांना एकेचाळिसावे वर्ष चालू झाले होते).वाराणसी काँग्रेसचे त्यांचे अध्यक्षीय भाषण अत्यंत ज्वलज्जहाल आणि तडफदार झाले.भाषणाच्या प्रारंभीच त्यांनी लॉर्ड कर्झनची औरंगजेबाशी तुलना केली.नंतर बंगालच्या फाळणीचे त्यांनी वाभाडे काढले.ब्रिटिश मालावर बंगालने घातलेल्या बहिष्काराचे त्यांनी समर्थन केले.स्वदेशीचा पुरस्कार हा देशभक्तीचा परमोच्च आविष्कार आहे असा तिचा गौरव केला. सेक्रेटरी ऑफ स्टेट मोर्ले ह्यांनी भारताचा कसा विश्वासघात केला ते सांगितले.काँग्रेसचा ध्येयवाद काय आहे आणि तिला कोणकोणत्या सुधारणा ताबडतोब हव्यात त्याची रूपरेषा सांगितली.आणि भारताच्या भवितव्याचे न्या.रानडे ह्यांनी जे चित्र रेखाटलेले होते,त्याचे दिग्दर्शन करून त्यांनी आपले भाषण संपविले.वाराणसी काँग्रेसनंतर गोखल्यांची राजकीय उंची देशामध्ये शतपटीने वाढली.१९०६ च्या डिसेंबरमध्ये कलकत्ता येथे दादाभाई नौरोजी ह्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे अधिवेशन भरले.
त्यात बंगालच्या फाळणीमुळे खवळलेल्या जहाल मताच्या काँग्रेस तरुणांनी खूपच वादळ माजविले. कदाचित त्याच वर्षी काँग्रेसचे अध्यक्षपद लोकमान्य टिळकांना मिळाले असते.पण बाबू सुरेंद्रनाथ बॅनर्जी त्यांना आडवे आले.
तथापि,सर फिरोजशहा मेहता,सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि अनेक मवाळ मताचे पुढारी ह्यांचा त्या अधिवेशनात अपमान झाला. त्यांना बोलू दिले नाही.ह्या अधिवेशनात 'स्वराज्य, बहिष्कार,
स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण' ही जी देशोद्धाराची चतुःसूत्री मान्य करण्यात आली,तिचे जनक गोखलेच होते.१९०७ साली गोखल्यांनी संयुक्तप्रांत आणि पंजाब ह्या भागात दौरा काढून स्वदेशी, हिंदू - मुसलमान ऐक्य आणि विद्यार्थ्यांची कर्तव्ये यावर काँग्रेसची भूमिका काय आहे हे निरनिराळ्या शहरात व्याख्याने देऊन समजावून सांगितले आणि प्रचलित राजकीय परिस्थितीबाबत लोकमत जागृत केले.
अलिगढमधल्या मुसलमान जनतेने त्यांचा प्रचंड सत्कार केला.१९०८ साली सुरतेच्या अधिवेशनात काँग्रेसचे तारू फुटले आणि टिळक पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडला.त्यानंतर पुन्हा काँग्रेसच्या कार्याला गोखल्यांनी स्वतःला वाहून घेतले.पुढे लवकरच ते दक्षिण आफ्रिकेत गेले आणि गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मोहिमेला त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला.१९०९ च्या काँग्रेस अधिवेशनात तर गांधीजींच्या सत्याग्रहाची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आणि त्यांचे मूलभूत तत्त्वज्ञान काव्यमय भाषेत सांगून त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.१९०९ ते १९१४ पर्यंत मध्यवर्ती कायदेमंडळ हेच त्यांचे कार्यक्षेत्र होते.१९१४ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेला जहाल पक्ष आणि आत असलेला मवाळ पक्ष ह्यांचे फिरून ऐक्य करण्याचा प्रयत्न झाला. प्रारंभी त्या प्रयत्नाला गोखल्यांचा पाठिंबा होता. पण टिळक काँग्रेसमध्ये आल्यानंतर पुन्हा त्याच जुन्या कटकटी वाढतील आणि कार्यनाश होईल म्हणून गोखल्यांनी नंतर आपला पाठिंबा काढून घेतला.त्यामुळे टिळक-गोखले ह्यांच्या पक्षांमधले वितुष्ट भलतेच विकोपाला गेले आणि त्याच वातावरणात काळाने गोखल्यांवर अकस्मात झडप घालून देशाची अपरिमित हानी केली.गांधीजींनी ज्यांना गुरू मानले,ते गोखले असामान्य कोटीतले, स्वार्थत्यागी,चारित्र्यसंपन्न आणि ज्वलज्जहाल देशभक्त होते ह्यात काय शंका ? देशसेवेचे असिधाराव्रत स्वीकारणारे आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याचे पालन करणारे ते आदर्श भारत - सेवक होते.सरकारने देऊ केलेली 'सर' पदवी त्यांनी लाथाडली एवढेच नव्हे तर व्हाईसरॉयच्या कार्यकारिणीत जाण्यासही त्यांनी नकार दिला.इंग्रजी भाषेतले त्यांचे वक्तृत्व म्हणजे त्यांचे महान सामर्थ्य होते.त्यांच्या वक्तृत्वात वेग होता,गती होती,तेज होते;पण आरडाओरडा आणि धांगडधिंगा नव्हता.अर्थशास्त्र हा त्यांच्या वक्तृत्वाचा पाया.वस्तुस्थिती हे त्यांच्या वक्तृत्वाचे सामर्थ्य. प्राचीन इतिहासाला किंवा भूतकाळातील सुवर्णयुगाला आवाहन करून श्रोत्यांच्या भावना प्रक्षुब्ध करण्याच्या भानगडीत ते कधीही पडत नसत.त्यांचा युक्तिवाद
सुस्पष्ट,तर्कशास्त्र अभेद्य आणि पुरावे अचूक असत. टीकाकारांना निरुत्तर करण्याचे जबर सामर्थ्य त्यांच्या वक्तृत्वात असे.न्या रानड्यांसारख्या साधुपुरुषाचे ते सच्छिष्य (अतिशय चांगले असे शिष्य) होते.परमेश्वरावर त्यांचा पूर्ण भरवसा होता. म्हणून वाराणसी काँग्रेसच्या अध्यक्षीय भाषणाच्या अखेर ते म्हणाले."सर्व भविष्यकाळ आपल्या डोळ्यांना स्पष्टपणे दिसत नाही,म्हणून निराश होण्याचे कारण नाही."
"Our times are in His hand Who said 'A whole I planned.' Youth shows but half; Trust God, see all nor be afraid!"