* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

११/७/२३

त्या दोन साड्या अन् एक पातेलं..

जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी घेण्यासाठी खूप घासाघीस करत असलेली, श्रीमंत घरातली ती महिला,एका मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या मोबदल्यात आपल्या दोन जुन्या साड्या दारावर भांडी विकायला आलेल्या त्या भांडेवाल्यास द्यायला शेवटी कशीबशी तयार झाली.


"नाय ताई ! मला न्हाय परवडत.एवढ्या मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या बदल्यात मला तुमच्याकडून कमीत कमी तीन तरी साड्या पायजेत." म्हणत भांडेवाल्याने ते भांडे त्या बाईंच्या हातातून अदबीने काढून आपल्या हाती परत घेतले.


"अरे भाऊ ..., फक्त एकदाच नेसलेल्या साड्या आहेत या दोन्ही.बघ अगदी नवीन असल्यासारख्याच आहेत..! तुझ्या या स्टीलच्या पातेल्यासाठी या दोन साड्या तशा तर फार जास्त होतात.मी म्हणून तुला दोन साड्या तरी देतेय."


" ऱ्हावू द्या, तीन पेक्षा कमीमध्ये तर मला अजिबातच परवडत न्हाय." तो पुन्हा बोलला.


आपल्या मनासारखा सौदा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ते दोघं प्रयत्न करत असतानाच घराच्या उघड्या दारात उभं राहून भांडेवाल्याशी हुज्जत घालत असलेल्या घरमालकिणीकडे पाहात पाहात समोरच्या गल्लीतून येणाऱ्या एका पारोश्या, केस पिंजरलेल्या,वेडसर महिलेनं घरासमोर उभं राहून घरमालकिणीला मला कांही खायला द्या अशा अर्थाच्या काही खाणाखुणा केल्या.


त्या श्रीमंत महिलेनं एकवार किळसवाण्या जळजळीत नजरेनं त्या वेडसर महिलेकडे पाहिलं.तिची नजर त्या वेडसर दिसणार्‍या महिलेच्या कपड्यांकडे गेली.

जागोजागी ठिगळ लावलेल्या तिच्या त्या फाटक्या साडीतून आपली लाज झाकायचा तीचा केविलवाणा प्रयत्न दिसून येत होता.


त्या श्रीमंत महिलेनं आपली नजर दुसरीकडे वळवली खरी,पण मग पुन्हा सकाळी सकाळी दारी आलेल्या याचकाला विन्मुख परत जाऊ देणं योग्य होणार नाही.

असा विचार करीत आदल्या रात्रीच्या शिळ्या पोळ्या घरातून आणून देत त्या तिनं त्या वेडसर भिकारणीच्या ओंजळीत टाकल्या आणि भांडेवाल्याकडे वळून ती त्याला म्हणाली,"हं तर मग काय भाऊ! तू काय ठरवलंय ? दोन साड्यांच्या ऐवजी ते पातेलं देणार आहेस की परत ठेवू या साड्या?"


यावर काही न बोलता शांतपणे भांडेवाल्यानं तिच्याकडून मुकाटपणे त्या दोन्ही जुन्या साड्या घेतल्या,आपल्या गाठोड्यात टाकल्या,पातेलं तिच्या हवाली केलं आणि तो आपलं भांड्यांचं टोपलं डोक्यावर घेऊन लगबगीनं निघाला.


विजयी मुद्रेनं ती महिला हसत हसतच दार बंद करायला रेंगाळली आणि दार बंद करताना तिची नजर समोर गेली... तो भांडेवाला आपल्याजवळचं कपड्यांचं  गाठोडं उघडून त्या वेडसर महिलेला त्यानं आताच पातेल्याच्या मोबदल्यात त्याला मिळालेल्या दोन साड्यांपैकी एक साडी तिचं अंग झाकण्यासाठी तिच्या अंगावर पांघरत होता... त्यानें ती साडी पांघरली आणि तो शांतपणे तिथून निघूनही गेला.


आता मात्र हातात धरलेलं ते पातेलं त्या श्रीमंत महिलेला एकाएकी फार जड झाल्यासारखं वाटू लागलं होतं... त्या भांडेवाल्यासमोर आता तिला एकदम खुजं झाल्यासारखं वाटायला लागलं. आपल्या तुलनेत त्याची कसलीच ऐपत नसतानाही भांडेवाल्यानं आज आपला पराभव केला हे तिला जाणवलं होतं.


तासभर घासाघीस करणारा तो आता न कुरकुरता फक्त दोनच साड्या घेऊन ते मोठं पातेलं देऊ करायला एकाएकी कां तयार झाला होता.याचं कारण  तिला आता चांगलंच उमगलं होतं.


आपला विजय झाला नसून आज त्या यःकश्चित भांडेवाल्यानं आपल्याला पराभूत केलं आहे ह्याची तिला आता जाणिव झाली होती...अनामिक


पुढील लेखात ..

कला,विज्ञान-वेत्ता लिओनार्डो डी व्हिन्सी

९/७/२३

रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबळ्या

'प्रयाग' या शब्दाचा अर्थ संगम.केदारनाथवरून येणारी मंदाकिनी आणि बद्रीनाथवरून येणारी अलकनंदा या दोन नद्यांचा रुद्रप्रयाग येथे संगम होतो.यापुढे त्यांच्या एकत्रित प्रवाहालाही अलकनंदा म्हणूनच संबोधतात.पण पुढे देवप्रयागला ह्या अलकनंदाला भागीरथी येऊन मिळाल्यावर त्यांच्या एकत्रित प्रवाहाला सर्व हिंदू लोक 'गंगामय्या' म्हणून ओळखतात तर इतर सर्व जग 'गंगा' म्हणून ओळखतं.

जेव्हा एखादं जनावर - तो वाघ असो किंवा बिबळ्या - नरभक्षक बनतं तेव्हा ओळख पटण्यासाठी आणि नोंद ठेवणं सुलभ जावं यासाठी त्याला त्या भागातल्या महत्त्वाच्या ठिकाणाचं नाव दिलं जातं.त्या नावाचा अर्थ असा नव्हे की त्या नरभक्षकाने आपली कारकीर्द त्याच गावापासून सुरू केली किंवा सर्व मनुष्यबळी त्याच गावात घेतले.त्यामुळे या रुद्रप्रयागच्या बिबळ्यानेही त्याचा पहिला बळी रुद्रप्रयागपासून बारा मैलांवर केदारनाथ रस्त्यावरील एका छोट्याशा गावात घेतला असला तरी पुढे तो 'रूद्रप्रयागचा नरभक्षक बिबळ्या' म्हणूनच ओळखला जाऊ लागला.ज्या कारणांमुळे वाघ नरभक्षक बनतात त्याच कारणांमुळे बिबळे नरभक्षक बनत नाहीत.

बिबळ्या हे आपल्या जंगलातलं सर्वात रुबाबदार व देखणं जनावर आहे आणि अडचणीत सापडला किंवा जखमी झाला तर धाडसात इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा कांकणभर सरसच आहे.मात्र,मला

कबूल करायला आवडत नसलं तरीही एक गोष्ट खरी आहे की जर भूक भागली नाही तर तो जंगलात सापडणारा कोणताही मृतदेह खातो.

त्या अर्थाने scavanger किंवा 'जंगलातला सफाईकामगार' 'जंगलातला सफाईकामगार' म्हणता येईल... आफ्रिकेतला सिंहही याच प्रकारातला!

गढवालचे लोक हे प्रामुख्याने हिंदू आहेत आणि त्यामुळे ते मृत व्यक्तीचं दहन करतात. सर्वसाधारणपणे हा दहनविधी जवळच्या ओढ्याच्या किंवा नदीच्या काठावरच पार पाडला जातो.कारण त्याची रक्षा पुढे कुठेतरी गंगेत व तिथून सागराला मिळेल अशी श्रद्धा असते. पहाडी मुलखातली गाव शक्यतो उंच डोंगरावर बसलेली असतात आणि ओढा,नद्या या खाली दरीतून वाहतात.साहजिकच एखाद्या दहनविधीसाठी किती ताकद खर्ची पडत असेल याचा अंदाज येऊ शकेल;कारण मृतदेह वाहून नेणारे खांदेच नव्हेत तर जाळायला लागणारं सरपण गोळा करणे व वाहून नेणे यासाठी बरंच मनुष्यबळ लागतं.

सर्वसाधारणपणे हे सर्व विधीपूर्वक पार पाडलं जातं;पण जर कधी एखादा साथीचा रोग पसरला आणि लोक जास्त संख्येने मरायला लागले तर मात्र पटापट सर्व मृतदेहांची विल्हेवाट लावणं अशक्य होऊन बसतं.अशा वेळी हा विधी अतिशय सरळसोट पद्धतीने पार पाडला जातो.

मृतदेहाच्या तोंडात जळत्या कोळशाचा तुकडा ठेवून तो देह डोंगराच्या कडेला नेला जातो आणि सरळ खालच्या दरीत लोटून दिला जातो.ज्या ठिकाणी वाघ,बिबळ्यांच्या नैसर्गिक भक्ष्याचा तुटवडा असेल त्याठिकाणी जर एखाद्या बिबळ्याला असा मृतदेह सापडला तर तो आपली भूक त्यावरच भागवतो.त्यामुळे त्याला चटक लागू शकते.नंतर ती साथ थांबली की मग अचानक हे नवं भक्ष्य दुर्मीळ झाल्याने सहज आणि विपुल मिळणाऱ्या ह्या नव्या शिकारीकडे तो वळतो. १९१८ मध्ये आलेल्या एन्फ्ल्यूएन्झाच्या साथीने भारतात लाखो बळी घेतले व त्यात गढवालच्या वाट्यालाही प्रचंड मनुष्यहानी आली. याच साथीच्या शेवटी शेवटी म्हणजे १९१८ च्या सुमारास या आपल्या 'रूद्रप्रयागच्या नरभक्षक बिबळ्या'चा उदय झाला.

या बिबळ्याने त्याचा पहिला नरबळी १ जून १९१८ला रुद्रप्रयागपासून काही मैलांवरच्या 'बैंजी' या गावात घेतला तर शेवटचा बळी १४ एप्रिल १९२६ रोजी 'भैंसवाडा' या गावात घेतला. मधल्या आठ वर्षांच्या कालावधीमध्ये त्याच्या नावावर एकशेपंचवीस नरबळींची नोंद आहे.

सरकारी अधिकाऱ्यांच्या नोंदीप्रमाणे आलेला हा आकडा आणि वास्तव यात फरक आहे ही माझी शंकाच नव्हे तर खात्री आहे.कारण त्याच्या शिकारीसाठी मी त्या भागात जेवढे दिवस राह्यलो त्या काळातल्या काही बळींची सरकारी दफ्तरात नोंद नाही.अशा तऱ्हेने या बिबळ्याने प्रत्यक्षात घेतलेल्या बळींपेक्षा कमी बळी त्याच्या नावावर टाकून मला आठ वर्ष त्याच्या दहशतीखाली काढणाऱ्या लोकांवर अन्याय करायची इच्छा नाहीये. त्याचबरोबर त्याने निर्माण केलेल्या दहशतीकडेही मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. त्याने वास्तवात घेतलेले बळी सरकारी

नोंदींपेक्षा कमी असो किंवा जास्त,गढवालचे लोक एका बाबतीत मात्र सहमत होतील की सर्वात जास्त.प्रसिद्धी याच बिबळ्याच्या (मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे) वाट्याला आली आहे.माझ्या माहितीप्रमाणे त्याचं नाव युनायटेड किंगडम,अमेरिका,कॅनडा,दक्षिणआफ्रिका,केनिया,मलाया,हाँगकाँग,ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड इथल्या जवळपास सर्व दैनिकात, मासिकांत व साप्ताहिकात झळकलंय.

या प्रसारमाध्यमांशिवाय वर्षभरात चार धाम यात्रा करणाऱ्या जवळ जवळ साठ हजार यात्रेकरूंमार्फत त्याचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलं होतं.

नरभक्षकाने घेतलेल्या नरबळींची नोंद ठेवण्याची सरकारी पद्धत अशी असायची...

मयत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांनी किंवा मित्रांनी गावच्या पटवाऱ्याकडे घडलेली घटना नोंदवायची.त्यानंतर त्या पटवाऱ्याने घटनास्थळावर जायचं व मृतदेह गायब असेल तर ताबडतोब एक शोधपथक तयार करायचं. जर मृतदेह सापडला तर पटवाऱ्याने पंचनामा करायचा.जर त्याची खात्री पटली की हा खरोखर नरभक्षकाचा बळी आहे,भलतंसलतं काही नाही, तर त्याच्या नातलगांना त्यांच्या जातीधर्माच्या रिवाजाप्रमाणे मृतदेहांचं दहन किंवा दफन करायला परवानगी द्यायची.त्यानंतर त्याने त्याच्या रजिस्टरमध्ये सर्व घटनेचा सविस्तर वृत्तांत लिहून,

नरभक्षकाच्या नावासमोर त्या नरबळींचं नाव लिहून अहवाल तयार करायचा आणि जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रमुखाला म्हणजेच,डेप्युटी कमिशनरला सादर करायचा. डेप्युटी कमिशनरनेही जिल्हास्तरावरच्या नोंदवहीत त्याची नोंद ठेवायची.परंतु जर मृतदेह मिळालाच नाही (कारण आपली शिकार खूप अंतर वाहून नेण्याची वाईट खोड बिबळ्याला असते.) तर मात्र ही केस पुढील चौकशी साठी कार्यान्वित होते व अशा वेळेला त्याची 'नरभक्षकाचा बळी' म्हणून नोंद होत नाही.त्याचबरोबर जर नरभक्षकाच्या हल्ल्यात एखादी व्यक्ती जबर जखमी झाली व काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचीही नोंद 'नरभक्षकाचा बळी' म्हणून होत नाही.यावरून असं सहज लक्षात येतं की ही सर्व पद्धत कितीही चांगली असली तरी नरभक्षकाच्या सर्व बळींची नोंद ठेवणं केवळ अशक्य आहे,खास करून जेव्हा एखादा नरभक्षक एखाद्या ठिकाणी फार वर्ष कार्यरत असेल तेव्हा.!


उर्वरित भाग नंतर..




७/७/२३

जीवनात विजयी करणारी गोष्ट..!

तो अगदी निवांतपणे गुरूंसमोर उभा होता.गुरू त्याच्या जाणकार नजरेने त्याला तपासत होते. नऊ-दहा वर्षांचा मुलगा,त्याला लहान मूल समजा.त्याला डावा हात नव्हता,तो बैलाशी झालेल्या भांडणात तुटला होता.तुला माझ्याकडून काय हवे आहे.गुरुने त्या मुलाला विचारले.त्या मुलाने गळा साफ केला.

धैर्य एकवटले आणि म्हणाले - मला तुमच्याकडून कुस्ती शिकायची आहे.एक हात नाही आणि कुस्ती  शिकायची आहे ? विचित्र गोष्ट आहे.का? शाळेतील इतर मुले मला आणि माझ्या बहिणीला दादागिरी करतात.मला टुंडा म्हणतात.सगळ्यांच्या मेहरबानीने माझे आयुष्य उध्वस्त केले आहे गुरुजी.मला माझ्या हिंमतीवर जगायचे आहे.कोणाच्याही दयेची गरज नाही.माझे आणि माझ्या कुटुंबाचे संरक्षण कसे करावे हे मला माहित असले पाहिजे.योग्य गोष्ट आहे.पण आता मी म्हातारा झालोय आणि कोणाला शिकवत नाही.तुला माझ्याकडे कोणी पाठवले? मी अनेक गुरूकडे गेलो. मला कोणी शिकवायला तयार नाही.

एका ज्येष्ठ गुरूने तुमचे नाव सांगितले.फक्त तेच तुला शिकवू शकतात.कारण त्यांच्याकडे फक्त वेळ आहे आणि शिकायला कोणी नाही,म्हणून त्यांनी मला सांगितले.ते उद्धट उत्तर कोणी दिले असेल हे गुरूना समजले.अशा गर्विष्ठ लोकांमुळेच वाईट स्वभावाचे लोक या खेळात आले,हे गुरूना माहित होते.ठीक आहे.उद्या सकाळी उजाडण्यापूर्वी आखाड्यात पोहोचा माझ्याकडून शिकणे सोपे नाही,हे मी आधीच सांगत आहे. कुस्ती हा प्राणघातक खेळ आहे.स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्याचा वापर करा.मी जे शिकवतो त्यावर पूर्ण विश्वास ठेव.आणि माणसाला या खेळाची नशा चढते.त्यामुळे डोकं थंड ठेव समजले?


होय गुरूजी.समजले आपण म्हणाल, त्या प्रत्येक गोष्टीचे मी पालन करीन.मला तुमचा शिष्य करा. त्या मुलाची इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. गुरूंच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले.गुरु आपल्या एकुलत्या एक शिष्याला शिकवू लागले.माती तुडवली गेली,मुग्दुलवरून धूळ झटकली गेली आणि या एक हाताच्या मुलाला कसे शिकवायचे या विचारात गुरूचे डोळे लागले.


गुरूने त्याला फक्त एक डाव शिकवला आणि दररोज मुलाला प्रशिक्षण देण्यास भाग पाडले. सहा महिन्यांसाठी दररोज फक्त एक डाव.एके दिवशी सद्गुरूंच्या वाढदिवशी शिष्याने पाय दाबताना प्रकरण छेडायला सुरुवात केली. गुरुजी, सहा महिने झाले आहेत,मला या डावाचे बारीकसारीक मुद्दे चांगले समजले आहेत आणि मला काही नवीन डाव देखील शिकवा.गुरू तिथून उठले आणि निघून गेले.त्याने गुरूला नाराज केल्याने मुलगा परेशान झाला. मग गुरूच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो शिकत राहिला.

अजून काही शिकायचे आहे.असे त्याने कधीच विचारले नाही.गावात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात मोठी बक्षिसे होती.प्रत्येक आखाड्यातील निवडक पैलवान स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले होते. गुरुजींनी उद्या सकाळी शिष्याला बैलांसह गाडी घेऊन बोलावले.जवळच्या गावात जायचे आहे. सकाळी तुला कुस्तीच्या डावात सहभागी होण्यासाठी जायचे आहे.हात नसलेल्या या मुलाने कुस्तीचे पहिले दोन सामने जिंकले.तसेच विरोध करणाऱ्या सर्व गुरूचे चेहरे उतरले.बघणारे थक्क झाले.हात नसलेले मूल कुस्तीत कसे जिंकू शकते? कोणी शिकवले?आता तिसऱ्या कुस्तीत समोरचा खेळाडू नवशिक्या नव्हता.पण मुलाने ही कुस्ती सुद्धा आपल्या नीटनेटक्या चालीने जिंकली आणि बाजी मारली.आता या मुलाचा आत्मविश्वास वाढला आहे. संपूर्ण मैदान आता त्याच्यासोबत होते.मीही जिंकू शकतो,ही भावना त्याला प्रबळ करत होती.काही वेळातच तो अंतिम टप्प्यात पोहोचला.

ज्या आखाड्याने त्या मुलाला या म्हाताऱ्या गुरुकडे पाठवले होते,त्या गर्विष्ठ पैलवानाचा शिष्य शेवटच्या कुस्तीत या मुलाचा प्रतिस्पर्धी होता.हा कुस्तीपटू तेवढ्याच वयाचा असूनही ताकद आणि अनुभवाच्या बाबतीत तो या मुलापेक्षा वरचढ होता.त्याने अनेक मैदाने मारली होती.तो या मुलाला काही मिनिटांत चित करेल हे स्पष्ट होते.पंचांनी सल्ला दिला,कुस्ती घेणे योग्य होणार नाही.कुस्ती ही बरोबरीची असते.मानवता आणि समानतेनुसार ही कुस्ती रद्द करण्यात आली आहे.बक्षीस दोघांमध्ये समान विभागले जाईल.पंचांनी त्यांचा हेतू उघड केला.

कालच्या या मुलापेक्षा मी खूप अनुभवी आणि बलवान आहे.ही कुस्ती मीच जिंकणार, ही गोष्ट सोळा आणे खरी आहे.त्यामुळे मला या कुस्तीचा विजेता बनवायला हवे.तेथें स्पर्धक अहंकारनी बोलला ।


मोठ्या भावापेक्षा मी नवीन आणि अनुभवाने लहान आहे.माझ्या गुरूनी मला प्रामाणिकपणे खेळायला शिकवले आहे. न खेळता जिंकणे हा माझ्या गुरुचा अपमान आहे. माझ्या सोबत खेळा आणि माझ्यासाठी जे आहे ते द्या.मला ही भिक्षा नको आहे. त्या देखण्या तरुणाचे स्वाभिमानी शब्द ऐकून लोकांनी टाळ्या वाजवल्या.अशा गोष्टी ऐकणे चांगले पण हानिकारक असते. पंच निराश झाले. काही कमी की जास्त झाले तर?आधीच एक हात गमावला आहे,

अजून काही आणखी नुकसान होऊ नये? मूर्ख कुठला.! कुस्ती सुरू झाली आणि उपस्थित सर्वजण थक्क झाले.संधीच्या शोधात मुलाने टाकलेला डाव आणि बाजी त्या मोठ्या स्पर्धकाला झेलता आली नाही.तो मैदानाबाहेर पडला होता.कमीत कमी प्रयत्नांत त्या नवशिक्या स्पर्धकाने त्या जुन्या स्पर्धकाला धूळ चारली होती.आखाड्यातत

पोहोचल्यावर शिष्याने आपले पदक काढून सद् गुरुच्या चरणी ठेवले.सद् गुरूंच्या पायाची धूळ कपाळावर लावून त्याने आपले डोके मातीने माखले.


गुरुजी,मला एक गोष्ट विचारायची होती.विचारा... मला फक्त एक डावच माहित आहे.तरीही मी कसा जिंकलो?


तू दोन डाव शिकला होतास.त्यामुळेच तू जिंकलास.

कोणते दोन डाव गुरुजी?


पहिली गोष्ट,तु हा डाव इतक्‍या चांगल्या प्रकारे शिकलास की त्यात चुकीला वाव नव्हता.मी तुझ्याशी झोपेत कुस्ती लढवली तरीही तू या डावात चूक करत नाहीस.तुमच्या प्रतिस्पर्ध्याला हे माहित होते की तुम्हाला हा डाव माहित आहे, पण तुला फक्त हा एकच डाव माहित आहे हे त्याला थोडे माहीत होते का? आणि गुरू,दुसरी गोष्ट काय होती? दुसरी गोष्ट जास्त महत्त्वाची आहे.प्रत्येक डावासाठी प्रतिडाव आहे.! असा कोणताही डाव नाही ज्याची तोड नाही.असा दावा केलाच जाऊ शकत नाही.तसाच या डावाचाही ही एक तोड होता.मग माझ्या प्रतिस्पर्ध्याला तो डाव कळणार नाही का? हे त्याला माहीत होते.पण तो काही करू शकला नाही.तुला माहीत आहे का? कारण त्या तोडीत डाव टाकणाऱ्या स्पर्धकाचा डावा हात धरावा लागतो! आता तुला समजले असेल की हात नसलेला साधा मुलगा विजेता कसा झाला? ज्या गोष्टीला आपण आपली दुर्बलता समजतो, तिला आपले सामर्थ्य बनवून जगायला शिकवतो,तोच खरा सद् गुरू आतून

आपण कुठेतरी कमकुवत आसतो,अपंग आहोत.त्या कमकुवतपणावर मात करून जगण्याची कला शिकवणारा गुरु प्रत्येकाला हवा आहे.आपल्याकडे दोन हात आहेत... एक स्वतःला मदत करण्यासाठी आणि दुसरा इतरांना मदत करण्यासाठी आजपासून इतरांवर अवलंबून न राहता स्वतःची आणि इतरांची मदत केली पाहिजे.


अनामिक..


५/७/२३

द वेल्थ ऑफ नेशन्स-ॲडम स्मिथ - (१७७६)

'जे सगळे आहे ते आमच्यासाठी,आमच्या हस्तकांसाठी.

नाही रे वर्गासाठी काहीच नाही.' अशी संकुचित विचारसरणी जगाच्या सर्वच सत्ताधारी वर्गात दिसून येते.

अशा वेळी त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचं काम ॲडम स्मिथने आपल्या 'वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकातून केलं आहे.आज जगात फोफावलेला संधि-साधूपणा आणि चंगळवाद पाहता ॲडम स्मिथची आणि

त्याच्या या पुस्तकाची गरज प्रकर्षाने जाणवते.आधुनिक अर्थशास्त्राचा आद्य प्रवर्तक अशी ओळख असलेला ॲडम स्मिथ हा अठराव्या शतकातला एक स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ,

तत्त्वज्ञ होता.तो आधुनिक अर्थशास्त्राचा पितामह म्हणून ओळखला जातो.इतकंच नाही,तर भांडवल शाहीचा

जनक म्हणूनही लोक त्याला ओळखतात.'द थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेंट्स' (१७५९) आणि 'ॲन एन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स' (१७७६) ही त्याची पुस्तकं म्हणजे अर्थशास्त्रातलं अमूल्य असं योगदान मानलं जातं.अर्थशास्त्राला नैतिकतेचं परिमाण जोडणारा हा अर्थतज्ज्ञ गेल्या दोन-अडीच शतकांपासून जगाच्या अर्थव्यवस्थेवर,राजकारणावर आपली छाप दाखवत आहे.ॲडम स्मिथने ग्लॅसगो विद्यापीठातून सोशल फिलॉसॉफी या विषयात प्रावीण्य मिळवल होत.द थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेंट्स' या पुस्तकात स्मिथने अदृश्य हाताची संकल्पना मांडली आणि ती खूपच लोकप्रिय ठरली.स्मिथनं अतिशय महत्त्वाचं काम प्रसिद्ध केलं ते पुस्तक म्हणजे 'ॲन एन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ द 'वेल्थ ऑफ नेशन्स' हे होतं,पण या पुस्तकाचं नाव लांबलचक असल्यामुळे ते 'द वेल्थ ऑफ 'नेशन्स' याच नावान रूढ झालं.ॲडम स्मिथनं 'वेल्थ ऑफ नेशन्स' हे पुस्तक लिहून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र यांची सांगड घातली.ॲडम्स स्मिथच्या जन्मापूर्वी म्हणजे जवळजवळ २००० वर्ष आधी होऊन गेलेला कौटिल्य आणि १०० वर्षांनंतर झालेला कार्ल मार्क्स यांच्याव्यतिरिक्त राज्यशास्त्राचा अर्थशास्त्राशी असलेला संबंध खऱ्या अर्थाने प्रभावीपणे कोणीच मांडला नव्हता.

'जे सगळे आहे ते आमच्यासाठी,आमच्या हस्तकांसाठी.

नाही रे वर्गासाठी काहीच नाही' अशी संकुचित विचारसरणी जगाच्या सर्वच सत्ताधारी वर्गात दिसून येते.अशा वेळी त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचं काम ॲडम्स स्मिथने आपल्या 'वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकातून केलं आहे.आज जगात फोफावलेला संधिसाधूपणा आणि चंगळवाद पाहता ॲडम्स स्मिथची आणि त्याच्या या पुस्तकाची गरज प्रकर्षाने जाणवते.बटबटीत डोळे आणि लांबट नाक असलेला ॲडम्स स्मिथ म्हणतो,'मी सुंदर नसलो तरी माझी पुस्तकं सुंदर असतील'आज त्याच्या लौकिक दिसण्यापेक्षा,त्याच्या विचारांची ओळख जगाला अधिक आहे.ॲडम्स स्मिथचा जन्म नक्की कधी झाला याची कुठेही अधिकृत नोंद नाही.,मात्र त्याचा बाप्तिस्मा ५ जून १७२३ रोजी झाल्याची नोंद आढळते.काही ठिकाणी

ॲडम्स स्मिथ आणि मागरिट डग्लस या दांपत्याच्या पोटी १६ जून १७२३ या दिवशी स्कॉटलंडमधल्या किर्केकॅल्डी या छोट्याशा गावात ॲडम स्मिथचा जन्म झाल्याचं म्हटलं जातं.त्याच्या जन्मापूर्वीच दोन महिने अगोदर त्याचे वडील ॲडम स्मिथ यांचं निधन झालं होतं. ना भाऊ ना बहीण.

केवळ आईची माया त्याला लाभली.मासेमारी हा गावातला प्रमुख व्यवसाय होता.ॲडम स्मिथची आई मागरिट डग्लसचं माहेर श्रीमत असल्याने तो तीन वर्षांचा होईपर्यंत त्याला परिस्थितीचे चटके सोसावे लागले नाहीत.तीन वर्षांचा असताना ॲडम स्मिथच्या बाबतीत एक भयंकर घटना घडली.काही भटक्या टोळ्यांनी त्याचं अपहरण केलं.मात्र ॲडम स्मिथला ताब्यात घेतल्यानंतर हा मुलगा आपल्या काहीही कामाचा नाही.हे लक्षात येताच. त्यांनी त्याला परत घराजवळ आणून सोडलं.या घटनेचा मागरिट डग्लसच्या मनावर खूप परिणाम झाला.

त्यानंतर ॲडम स्मिथला तिने वयाच्या १४व्या वर्षापर्यंत नजरेआड होऊ दिलं नाही.कायम आईच्या पदराआड ठेवल्याने त्याला कोणीही जवळचे मित्र-मैत्रिणी मिळालेच नाहीत. घराजवळच्याच बर्ग स्कूल ऑफ किर्ककॅल्डी इथे त्याचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं आणि १४ वर्षांचा ॲडम स्मिथ किर्ककॅल्डी सोडून ग्लासगो विद्यापीठात तत्त्वज्ञान शिकायला दाखल झाला.ॲडम स्मिथच्या व्यक्तिमत्त्वाला ग्लासगो विद्यापीठात पैलू पडले.त्याच्यात वक्तृत्व कौशल्य विकसित झालं.तसंच त्याची भाषा आणि व्याकरण अतिशय चांगलं तयार झालं.ग्रीक भाषा आणि तत्त्वज्ञान यात स्मिथनं चांगलीच हुकमत मिळवली.या काळात तो आपल्या आईला पत्रही लिहीत असे.

अभ्यासात स्मिथने कधीच आळस केला नाही.स्नेल एक्झिबिशन ही शिष्यवृत्ती मिळवून तो ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या बाटलीबॉय कॉलेजमध्ये दाखल झाला.

तिथे जाण्यापूर्वी ग्लासगो विद्यापीठातल्या आपल्या वह्या आणि पुस्तकं त्याने रद्दीच्या दुकानात विकून टाकले.मात्र पुढे त्याचं त्या काळातलं सगळं हस्त लिखित सापडलं आणि  ते जतन करण्यात आलं.ऑक्सफर्ड विद्यापीठाशी स्मिथचे सूर काही जुळले नाहीत.विद्यापीठाला अपेक्षित प्रगती ॲडम स्मिथ करू शकला नाही आणि विद्यापीठाच्या चौकटीत आपलं वाचन सीमित करणंही त्याला जमलं नाही.त्यातच त्याच्या अपस्माराच्या दुखण्यानं डोकं वर काढलं.खरं तर ग्लासगो विद्यापीठात असताना तिथले प्राध्यापक फ्रान्सिस हचसन यांनी ॲडम स्मिथला तयार करण्यात खूप परिश्रम घेतले होते.आणि तितकंच प्रेमही केलं होतं.त्या तुलनेत ऑक्सफर्डमधले प्राध्यापक त्याला कोरडे आणि रुक्ष असल्याचं वाटायचं.

याच कारणाने शिष्यवृत्तीचा कालावधी शिल्लक असतानाही स्मिथने ऑक्सफर्डला रामराम केला.आणि मामाच्या ओळखीने त्याने एडिनबर्ग विद्यापीठात व्याख्यानं द्यायला सुरुवात केली.यातूनच त्याला पुढल्याच वर्षी नैतिक तत्त्वज्ञान विभागाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली.याच दरम्यान ॲडम स्मिथची ओळख डेव्हिड ह्यूम यांच्याशी झाली.ॲडम स्मिथच्या आयुष्यात फ्रेंड,

फिलॉसॉफर आणि गाईड म्हणून आलेली ही एकमेव व्यक्ती.डेव्हिड ह्यूम हा स्मिथपेक्षा वयाने दहा वर्षांनी मोठा होता.या दोघांची तत्त्वज्ञान,तर्क,नैतिकता अशा अनेक विषयांवर तासन्तास चर्चा रंगत असे.यातूनच ॲडम स्मिथची व्याख्यानं अधिक धारदार आणि लोकप्रिय होऊ लागली.या निवडक व्याख्यानांचं संकलित रूप म्हणून १७५९ मध्ये ॲडम स्मिथचं पहिलं पुस्तक 'द थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेट' जन्माला आलं.हे पुस्तक अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झालं आणि अनेक श्रीमंत मुलं आपलं शिक्षण सोडून स्मिथकडे शिकण्यासाठी येऊ लागली.

स्मिथ खूप लोकप्रिय व्यक्ती बनला होता.वर्गामध्ये शिकवताना त्याचं मुलांकडे बारकाईने लक्ष असायचं.

शिकवताना एखाद्या विद्यार्थ्याने जांभई जरी दिली.किंवा तो मागे सरकून आरामात टेकून बसला असं स्मिथच्या लक्षात आलं तरी तो आपलंच काही तरी चुकलं असं समजून विषय सोपा करायचा किंवा विषय बदलायचा किंवा विषयाची मांडणी वेगळ्या प्रकाराने करायचा.याच त्याच्या दृष्टिकोनामुळे आणि अभ्यासामुळे तो आपल्या व्याख्यानात श्रोत्यांची नस बरोबर पकडत असे.पुढली १३ वर्षं प्राध्यापक म्हणून तत्त्वज्ञान, नैतिकशास्त्र हे विषय शिकवण्याचं काम करत असताना हळूहळू जाणीवपूर्वक स्मिथने आपला रोख अर्थशास्त्र या विषयाकडे वळवला.

खरं तर त्याचा हा प्रवासच 'द वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकाची तयारी घडवत होता.ॲडम स्मिथच्या अर्थशास्त्रावरच्या व्याख्यानांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली.ग्लासगो विद्यापीठाने त्याला 'डॉक्टर ऑफ लॉज' ही पदवी प्रदान केली.याच दरम्यान डेव्हिड ह्यूमने स्मिथची ओळख चार्ल्स टाऊनसेंड या उमरावाशी करून दिली. त्याच्या राजकुमार हेन्री स्कॉट नावाच्या सावत्र मुलाला शिकवण्याचं काम स्मिथने करावं,असा प्रस्ताव त्याला देण्यात आला.यासाठी स्मिथला ३०० पौंड + प्रवास भत्ता असं घसघशीत मानधन दरवर्षी मिळणार होतं.याशिवाय शिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर ३०० पौंड निवृत्तिवेतनही दिलं जाणार होतं.आपल्या प्राध्यापकीच्या संपूर्ण कालावधीमध्ये एवढी रक्कम ॲडम स्मिथ कधीच मिळवू शकला नसता.त्यातच स्मिथ अविवाहित असल्यामुळे त्याच्यावर कुठल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही नव्हत्या अणि तो कुठेही जायला मुक्त होता. साहजिकच स्मिथने प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला आणि चार्ल्स टाऊनसेंडचा प्रस्ताव स्वीकारला.इतर विद्यार्थ्यांशी केलेल्या करारानुसार स्मिथने त्यांची घेतलेली फी परत करण्याचं जाहीर केलं,पण त्याच्या एकाही विद्यार्थ्याने आपली फी परत घेतली नाही. स्मिथने त्यांना भरभरून शिकवलं होतं,अशीच त्यांची भावना होती.टाऊनसेंड कुटुंबासोबत स्मिथ फ्रान्समध्ये फिरण्यासाठी गेला असताना त्याच्याकडे भरपूर मोकळा वेळ होता.या प्रवासात त्याची भेट तत्त्वज्ञ व्हॉल्टेअर,जोसेफ ब्लॅक,जेम्स वॉट, बेंजामिन फ्रैंकलिन यांसारख्या हरहुन्नरी व्यक्तींशी झाली.त्यांच्या भेटीने त्याच्या ज्ञानात भर पडली. मात्र शिकवण्याची,विचार मांडण्याची त्याची बौद्धिक भूक शमली जात नव्हती.या भुकेतून 'द वेल्थ ऑफ नेशन्स' हे पुस्तक जन्माला आलं.जगातलं सर्व तत्त्वज्ञान अर्थशास्त्रावर आधारित असतं.प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात सुखसोयीच्या वस्तू,नैतिक मूल्य आणि बौद्धिक आनंद या तीन गोष्टी हव्या असतात.त्यांचा प्राधान्य -

क्रमदेखील चढत्या क्रमाने असतो.गरीब असो वा श्रीमंत, गुलाम असो वा गुन्हेगार,प्रत्येकालाच आत्मसन्मान हवा असतो.प्रत्येकजण स्वतःसाठी वकील आणि इतरांसाठी न्यायाधीश बनत असतो.हे प्रत्येकाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत चालू असते.ॲडम स्मिथचं याविषयी सखोल चिंतन,मनन सुरू होतं.नैतिकता,न्याय, राजकारण,धर्म या सर्वांचा डोलारा अर्थशास्त्रावर उभारलेला असतो.आपल्या पूर्वजांची समाजव्यवस्था निर्माण करण्यामध्ये अन्न संचय आणि त्याचा पुरवठा ही आदिम कल्पना होती. संस्कृती तग धरून राहण्यासाठी आणि समृद्ध होण्यासाठी व्यवस्थेची गरज असते,अशी ॲडम स्मिथची मतं होती. आदिम समाजात खासगी मालमत्तेचा उदय झाला आणि त्याबरोबर वितरण करताना न्यायाच्या जाणिवेच्या कल्पना विकसित झाल्या. मालमत्तेच्या वितरणाच्या तीन पद्धती इतिहासात ढोबळमानाने आढळतात.धर्म-सत्तेच्या काळात, सरंजामशाहीच्या काळात आणि आजच्या कालखंडात आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतो.या तिन्ही टप्प्यांत न्याय-अन्यायाच्या कल्पना वेगवेगळ्या असल्या,तरी त्यात एक सामाईक धागा होता.तेव्हाही वस्तूला मूल्य होतं आणि आताही वस्तूला मूल्य आहे.

फ्रान्समध्ये पॅरिसला असताना हेन्री स्कॉट बऱ्यापैकी ॲडम स्मिथच्या हाताखाली तयार झाला होता.तसंच याच दरम्यान त्याच्या भावाचा कुठल्याशा आजाराने पॅरिसमध्येच मृत्यू झाला. ही संधी साधून स्मिथने मायदेशी जाण्याचा विचार बोलून दाखवताच चार्ल्स टाउनसेंड याने परवानगी दिली.परत येताच स्मिथने दिवसाचा पूर्ण वेळ 'द वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकाच्या लिखाणासाठी घालवायला सुरुवात केली. जवळजवळ १० वर्ष राबून हा अनमोल ग्रंथ तयार झाला.पाच पुस्तकांची ही एक मालिका होती. यातल्या लिखाणावर डेव्हिड ह्यूम आणि फ्रान्सिस हवसन या त्याच्या मार्गदर्शकांची छाप दिसून येते,'सुशासन म्हणजे जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त हित' हा विचार हसन याच्याकडूनच स्मिथ शिकला. ''वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकात नैतिकता आणि तात्त्विकता यावर डेव्हिड हाम याचा प्रभाव जाणवतो.

व्हॉल्टेअरबरोबर केलेल्या चर्चामधून फ्रान्सचा राजा चौदावा लुई आणि पंधरावा लुई यांनी देशाचं नुकसान कसं केलं,देशाची संपत्ती आणि त्यांचा अधिकार याबद्दल त्यान विचारमंथन केलं होतं.राजाचा जनतेच्या पैशावर किती अधिकार असावा याबाबत त्याने यानिमित्ताने चिंतन केलं. याच वेळी फ्रान्सिस क्युंसी या मुक्त व्यापारवाद्याशी त्याची ओळख झाली,तो काळ वसाहतीचा आणि व्यापारी चढाओढीचा होता. जास्तीत जास्त निर्यात करून आणि किमान आयात करून आपला देश श्रीमंत कसा करायचा याबद्दल सर्व युरोपीय देश दक्ष होते. मात्र याच्या उलट मांडणी क्युसी करत होता. कारण यामुळे अल्पकालीन फायदा दिसत असला तरी दीर्घकालीन नुकसान होतं.असं त्याचं मत होते.कोणत्याही सरकारने आयात आणि निर्यात यामध्ये हस्तक्षेप करता कामा नये, तर आयात-निर्यातीचा प्रवाह हा निसर्गत:वाहता असला पाहिजे,असं तत्त्व क्युंसीनं मांडलं होतं. 'कोणत्याही देशाच्या अधिकाधिक विकासासाठी मुक्त व्यापार 'आवश्यक आहे' हेच क्युंसीचं तत्त्व स्मिथने 'द वेल्थ ऑफ नेशन्स'मध्ये मांडले.मँडेव्हिल या लेखकाने लिहिलेल्या मधमाश्यांच्या कथेची संकल्पना वापरून ॲडम स्मिथने श्रमविभागणीचं तत्त्व 'द वेल्थ ऑफ नेशन्स' मध्ये सांगितलं.कोणत्याही माणसाला एक काम दिले,तर तो त्या कामामध्ये निपुण बनतो. त्यामुळे प्रत्येकाला कामं वाटून किंवा विभागून दिली,तर उत्पादनाचे प्रमाण अनेक पटीने वाढू शकतं. मधमाश्यांच्या पोळ्यामध्ये दर दिवशी कामाची विभागणी झालेली असते.अशी विभागणी उद्योगामध्ये व्हायला हवी.अशा सोप्या कथांचा आणि रूपकांचा आधार घेत केलेली 'द वेल्थ ऑफ नेशन्स' या संपूर्ण पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत स्मिथने मांडणी केली आहे. श्रमाचा वापर देशात किती कौशल्याने आणि योजकतेने केला जातो,यावर देशाच्या संपत्तीची वाढ अवलंबून असते.संपत्तीचं गमस्थान म्हणून श्रमाचं आणि पर्यायाने श्रमविभागणीचं महत्त्व स्मिथने यात विशद केलंय.आज सोनं आणि चांदी यांना जरी चलन म्हणून खरी मान्यता असली,तरी जेव्हा आपत्काळ येतो तेव्हा आपण सोनं किंवा चांदी अन्न म्हणून खाऊ शकत नाही.त्या वेळी खाण्यासाठी धान्य लागतं. म्हणून राष्ट्राची खरी संपत्ती म्हणजे त्याचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन हेच असतं.आज कोणत्याही देशाची आर्थिक अर्थव्यवस्था किती भक्कम आहे.हे ठरवण्यासाठी आपण त्या राष्ट्राचा जीडीपी म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजत असतो.पूर्वी कोणत्या देशाकडे सोन्याचा किती साठा आहे यावरच तो देश किती श्रीमंत हे ठरवलं जात असे. याचं श्रेय केवळ ॲडम स्थिथकडे जाते.कर आकारणीविषयी 'द वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकामध्ये स्मिथने सविस्तर चर्चा केली आहे. प्रत्येक राज्याने कल्याणकारी भूमिका स्वीकारली पाहिजे.त्याचबरोबर तिथल्या नागरिकांनीदेखील त्यांची कर्तव्यं बजावली पाहिजेत.राज्याची अर्थ- व्यवस्था भक्कम करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या कुवतीप्रमाणे कर भरून शासनाला साहाय्य केलं पाहिजे.

कर आकारणीमध्ये सुलभता आणि सुसूत्रता असेल तर करवसुली अधिक होते;म्हणून प्रत्येक नागरिकाला आपण कोणते कर भरावयाचे आहेत; कधी,कसे आणि कुठे भरायचे आहेत हे आधीच माहीत असणं गरजेचं असतं.

तसंच कर भरण्याची वेळ,पद्धत आणि कराची रक्कम या गोष्टी कर भरणाऱ्या नागरिकाला निश्चितपणे माहीत असल्या पाहिजेत.करवसुली करताना किमान सक्ती असावी.तसंच करवसुलीची यंत्रणादेखील किमान खर्चीक असावी,असं स्मिथने म्हटलं.'द वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकामध्ये ॲडम स्मिथ गुलामगिरीविरुद्ध दंड थोपटताना दिसतो.मात्र,त्यामागे गुलामगिरीविरुद्ध बंड करणं ही जाणीव नसून अधिकाधिक मजूर उत्पादनासाठी उपलब्ध व्हावेत,मुद्दादेखील तो मांडतो.जिथे मजूर कमी उपलब्ध आहेत,तिथे वेतनाचं प्रमाण वाढतं.त्यामुळे अधिकाधिक श्रमिक तिथे आकर्षिले जातात.कालांतराने श्रमाची मागणी कमी होऊन वेतन कमी होतं.स्मिथ असंही म्हणतो,की या जगात कोणी कोणावर उपकार करत नाही,तर प्रत्येकाला त्याचा स्वार्थ आणि हित जपायचं असतं.तो म्हणतो की, 'दोन व्यापारी जेव्हा एकत्र भेटतात तेव्हा ते कला-क्रीडा,संगीत यांचा आनंद घेण्यापेक्षा व्यापारावर चर्चा करतील.आहे त्या परिस्थितीमध्ये माझा काय फायदा आहे हेच पाहतील.माणसाची ही नैसर्गिक वृत्ती आहे.'तो म्हणतो की,'प्रत्येकाच्या स्वहित जोपासण्याच्या प्रक्रिये-मध्येच व्यापार आणि अर्थव्यवस्था यांना चालना मिळत असते. स्मिथच्या मते मुक्त व्यापार असेल तर प्रत्येकाला किमान किमतीमध्ये आपली गुणवत्ता टिकून ठेवावी लागते.म्हणजेच स्पर्धेचा फायदा हा अंतिमतः ग्राहकालाच होत असतो.स्पर्धेमुळे आपोआपच प्रगती होते अणि मालाचा दर्जा सुधारतो. एकाधिकारशाही असेल तर उत्पादकाला आपल्या उत्पादनाच्या किमती हव्या तशा वाढवता येतात;पण स्पर्धेमध्ये ते शक्य नसतं. किमती ठरवताना तो सीमांत उपयोगिता सिद्धान्तदेखील मांडतो.तुम्ही जर वाळवंटात असाल आणि तुम्हाला प्रचंड तहान लागली असेल,त्या वेळी तुम्ही पाण्याच्या एका घोटासाठी जेवढी रक्कम द्याल,तिच्या अर्धी रक्कम तुम्ही पोटभर पाणी पिऊन झाल्यानंतर पुढच्या घोटासाठी देणार नाही,असं स्मिथचं म्हणणं होतं. 'द वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकाने क्रांती केली असली तरी या पुस्तकाला काळाच्या मर्यादा आहेत,

कारण हे पुस्तक ज्या वेळी प्रसिद्ध झालं, त्या वेळी औद्योगिक क्रांती व्हायची होती. माणसाला यंत्र समजून घेणारे कारखाने उभे राहिले नव्हते.कारखाने नसल्यामुळे त्या काळात कोणत्याही कामगार संघटना निर्माण झाल्या नव्हत्या.त्यामुळे रोजगाराची मागणी आणि वेतनाचं नैसर्गिक संतुलन राहील,हा स्मिथचा मुद्दा काळाच्या ओघात खोटा ठरला.सरकारी हस्तक्षेप अजिबात नको,

असं म्हणताना त्याच्याकडून अनेक गोष्टी सुटून गेल्या.या सुटलेल्या गोष्टींचा फायदा घेतच भांडवलदार 'सरकारने हस्तक्षेप करू नये, आम्हाला 'स्वातंत्र्य द्यावं' अशी मागणी करताना ॲडम स्मिथचा दाखला देत असतात.ॲडम स्मिथनं लिहिलेलं 'द वेल्थ ऑफ नेशन्स' हे पुस्तक अजिबात बोजड नाही.किंबहुना आपण एखादा कधी न संपावा असं वाटणारा ललित लेख वाचत आहोत असंच वाटतं.त्यात कथा आहेत,कविता आहेत आणि अगदी सहज सोपी मांडणी आहे.कोणतेही मोठे आकडे किंवा न कळणारी क्लिष्ट समीकरणं या पुस्तकात टाकलेली नाहीत.अर्थव्यवस्थेचं संतुलन नैसर्गिकरीत्या व्हावं याचा आग्रह ॲडम स्मिथ करताना दिसतो.'मागणी किमती यांचा सहसंबंध असो,बचत - गुंतवणूक किंवा मागणी-पुरवठा यांचा सहसंबंध असो,बाजारपेठेतल्या अदृश्य हाताने म्हणजेच बाजारपेठेच्या नियमांमुळे आपोआप संतुलन घडत असतं.हाच नियम रोजगार आणि वेतन यांनादेखील लागू होतो आणि आयात-

निर्यातीच्या चक्रालादेखील लागू होतो.'असं मांडताना ॲडम स्मिथने लोकांना समजतील आणि कळतील अशी उदाहरणं दिली. थोडक्यात,एखाद्या प्रेमळ आजोबांनी आपल्या नातवाला मांडीवर बसवून गोष्टींतून काही तरी शिकवावं असा या पुस्तकाचा बाज आहे. म्हणूनच ॲडम स्मिथला 'अर्थशास्त्राचा पितामह' म्हटलं जातं ते सर्वार्थाने किती खरं आहे हे लक्षात येतं. स्मिथच्या मांडणीचा प्रभाव एकोणिसाव्या शतकातल्या डेव्हिड रिकार्डो आणि कार्ल मार्क्स,तसंच विसाव्या शतकातल्या जॉन मेनार्ड केन्स आणि मिल्टन फ्रीडमन या अर्थशास्त्रज्ञांवरदेखील पडला.

'द वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकाचा खप इतका प्रचंड वाढला,की युरोपातल्या सगळ्याच भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं.अठराव्या शतकानंतर हे पुस्तक युरोप आणि अमेरिका खंडात सर्वत्र पोहोचलं होतं.

भांडवलदारांना तर 'द वेल्थ ऑफ नेशन्स' हे पुस्तक ॲडम स्मिथने जणू काही आपल्या साठीच लिहिलंय असं वाटायचं.या पुस्तकानं जगभर इतकी खळबळ माजवली,की हे पुस्तक युगप्रवर्तक पुस्तकांच्या यादीत आपला ठसा कायमचा उमटवून बसलं.१९ जून १७९० या दिवशी वयाच्या ६७ व्या वर्षी  स्मिथचा मृत्यू झाला.

स्वतःच्या दिसण्याबद्दल न्यूनगंड असलेला ॲडम स्मिथ,ज्याने स्वतःचं चित्र काढण्यासाठी क्वचितच वेळ दिला,आज तो इंग्लंडच्या घराघरांत पोचला आहे.आज २० पौंडच्या ब्रिटिश नोटेवर आपण त्याची छबी पाहू शकतो.याशिवाय त्याच्या नावाने सुरू असलेल्या अनेक संस्था आज ज्ञानदानाचे काम करून खऱ्या अर्थाने या त्याच्या कार्याला सलामी देत आहेत.स्मिथ आणि त्यानं लिहिलेलं 'द वेल्थ ऑफ नेशन्स' या पुस्तकानं अर्थशास्त्राच्या विश्वात आपलं अढळ स्थान कोरून ठेवलं यात काही शंकाच नाही !


" ज्या समाजातले बहुतांश लोक गरीब आणि दुःखी असतात,तो समाज सुखी आणि समृद्ध असू शकत नाही." - ॲडम स्मिथ


१७ जून २०२३ या लेखमालेतील पुढील लेख.





३/७/२३

पानापट्टीचा पिसाट हत्ती थरारक कथा..

पिसाट हत्ती म्हटलं,की एक जबरदस्त, भीतिदायक व धिप्पाड हत्ती डोळ्यासमोर येतो.परंतु पानापट्टीचा हा हत्ती तसा लहानखुरा, साधारण साडेसात-आठ फूट उंच असावा.भारतीय हत्तीच्या पुढच्या पायाच्या ठशाच्या परिघाला दोनने गुणले,की त्याच्या उंचीचा,काही इंचांच्या फरकानं अंदाज बांधता येतो.या हत्तीची उंची फार नसली,

तरी तो धाडसी,कपटी आणि कावेबाज होता आणि त्याला मनुष्यप्राण्याचा अत्यंत तिरस्कार होता.संधी मिळेल,तेव्हा त्यांच्यावर हल्ला करायची त्याला आवड होती.


हा ज्या कळपात वाढला,त्याचा संचार कावेरी नदीकाठावरच्या वोडापट्टी वनक्षेत्रात असायचा.याच वनक्षेत्रात पानापट्टी गाव होतं.इथे बरेच गाईगुरांचे गोठे होते.असं म्हणतात,की 


पिसाटायच्या आधी अगदी तरुण असताना हा हत्ती जरा जास्त उत्साही आणि आगाऊ होता.कळपातल्या हत्तिणींकडे त्याचं जरा जास्तच लक्ष असायचं.हे जेव्हा त्या कळपाच्या प्रमुखाच्या लक्षात आलं,तेव्हा त्यानं चीत्कार करून आपली नापसंती दर्शवली.त्याकडे जेव्हा दुर्लक्ष केलं गेलं,तेव्हा मात्र तो कळपाचा सुळेवाला प्रमुख त्याला कळपातून हाकलून द्यायला पुढे आला,तर हा त्याच्याशी झुंज घ्यायला उभा राहिला.त्यांची जबरदस्त झुंज झाली.

तो कळपाचा प्रमुख वयाने अनुभवानं आणि वजनानंही भारी होता,त्यामुळे झुंजीत या तरुण हत्तीनं चांगलाच मार खाल्ला.शेवटी हार खाऊन त्यानं पलायनाचा मार्ग स्वीकारला.त्या सर्वच दृष्ट्या भारी हत्तीच्या जबरदस्त सुळ्यांनी त्याला भरपूर जखमा झाल्या होत्या.आणि त्या झुंजीत त्याचा एक सुळा तुटला होता.त्याला आता साधारण अठरा इंच लांबीचा एकच सुळा राहिला होता.

तुटलेल्या सुळ्याच्या व अंगभर झालेल्या जखमांच्या वेदना,वर झुंजीत हार झाल्यामुळे व कळपातून हाकलले गेल्याने झालेला अपमान ह्या साऱ्यामुळे ह्या हत्तीला अनावर संतापही आला होता,कळपापासून तुटल्याचं दु:खही होत होतं.तो कळपाच्या आजूबाजूनं हिंडत राहिला, पण कळपात परत जायची हिंमत मात्र त्याला झाली नाही.दिवसेंदिवस तो अधिकच चिडचिडा व तिरसट बनत गेला.


एक दिवस जंगलातल्या रस्त्याच्या एका वळणावर अचानक एक बैलगाडी त्याच्यासमोर आली.ठेकेदारानं तोडलेले बांबू घेऊन ती चाललेली होती.एकदम समोर आलेली बैलगाडी पाहून तो बिथरला.त्याच्या मनात खदखदणारा सर्व संताप एकदम उफाळून आला.रागानं बेभान होत,तो सरळ त्या बैलगाडीवर चालून गेला. हल्ला करायला येणारा हत्ती पाहून घाबरलेल्या गाडीवानानं जीव वाचवायला गाडीतून उडी मारत धूम ठोकली.त्या वजनदार बैलगाडीचं जू मानेवर असल्यानं ते बैल मात्र काहीच करू शकत नव्हते.


या पिसाटानं आधी त्या बैलगाडीच्या चिरफळ्या उडवल्या,

त्यानंतर त्यानं आपला मोहरा बैलांवर वळवला.एका बैलाच्या लांबलचक वळणदार शिंगाभोवती आपल्या सोंडेचा विळखा घालून त्यानं त्याला उचललं आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या भरावावर अक्षरशः भिरकावून दिलं. दुसऱ्या दिवशी तो बैल जेव्हा सापडला,

तेव्हा त्याचं ते शिंग मुळापासून उपटलं गेलं होतं, त्याच्या पुढच्या पायाचं हाड मोडून ते तिथल्या मऊसर जमिनीत खोलवर रुतून तो बैल जागेवरच अडकून पडला होता.

दुसऱ्या बैलाला त्या हत्तीनं सुळ्यानं भोसकलं होतं,पण तो बैल मानेवरचं मोडलेलं जू घेऊन तसाच पळाला म्हणून वाचला होता.


त्यानंतर हत्तीचे प्रताप दिवसेंदिवस वाढतच गेले.नदीकडे जाणाऱ्या कितीतरी दुर्दैवी जिवांना त्यानं पायाखाली चिरडून मारलं होतं किंवा सोंडेत धरून एखाद्या झाडावर आपटून त्यांचा पार चेंदामेंदा केला होता.


या हत्तीची व माझी पहिली भेट अपघातानं झाली.

पानापट्टीपासून साधारण चार मैलांवर, कावेरी नदीच्या काठावर,होगेनाईकल म्हणून एक ठिकाण आहे. तिथे मी एका शनिवार - रविवारी मासेमारी करायला गेलो होतो.

महासीर मासे किंवा एखादी मगर मिळाली तर बघावं, असा माझा विचार होता.तो पिसाट त्या सुमारास तिथे नसून कळपामागे नदी ओलांडून पलीकडे गेलाय,असं मी ऐकलं होतं.


दुसऱ्या दिवशी खास काही मासेमारी झाली नाही,म्हणून मी चहा घ्यायला फॉरेस्ट बंगल्याकडे परत येत होतो.वाटेत मोराच्या केका माझ्या कानावर पडल्या.मोराच्या मांसाची चविष्ट मेजवानी करण्याचा मोह पडून मी माझी शॉटगन घेतली.त्यात पक्ष्यांना मारण्यासाठी वापरतात, ज्याला 'बर्ड शॉट' म्हणतात,अशी दोन काडतुसं भरून,जिथून मी मोराच्या केका ऐकल्या होत्या, तिथे निघालो.माझ्या सावजाचा शोध घेत सावधपणे पावलं टाकत मी मैलभर पुढे जाऊन, कावेरी नदीला मिळणाऱ्या चिनार नावाच्या ओढ्याच्या कोरड्या पात्रात आलो.त्या मऊ वाळूवरून चालत जाताना रबरी तळ असलेल्या माझ्या बुटांचा अजिबात आवाज होत नव्हता.समोरच्या काठावरच्या झुडुपांच्या पलीकडे मला मोराचा पंख फडफडवल्याचा आवाज येत होता. मी चवड्यावर चालत नाला पार करीत होतो,तर अचानक एका कर्णकर्कश्श तुतारीचा आवाज त्या शांततेला चिरत गेला आणि एक भलामोठा हत्ती अवघ्या पन्नास यार्डावर झाडाझुडुपांना तुडवत बाहेर येत माझ्यावर चाल करून येताना मला दिसला.


हत्ती झपाट्यानं अंतर कापू शकतात.मी कितीही जोरात पळालो,तरी माझी सुटका अशक्य होती. त्यातून मी जिथे होतो तिथे खाली मऊ वाळू आणि काटेरी झुडुपं होती,

त्यामुळे मला जोरात पळताही आलं नसतं.माझ्यापुढे आता एकच पर्याय होता.मी माझी शॉटगन उचलली आणि हत्तीच्या वर वळलेल्या सोंडेवर नेम धरत दोन्ही नळ्यांतून दोन गोळ्या एकापाठोपाठ एक झाडल्या.

गोळीबाराचा झालेला आवाज व त्या गोळ्या लागल्यानं झालेला दंश यामुळे रागानं, धमकावण्याच्या पवित्र्यात तुताऱ्या फोडत काही काळ तो तिथेच थांबला.ती संधी साधत मी माझी रिकामी बंदूक घेऊन आलेल्या रस्त्यानं धूम ठोकली.आपण इतक्या वेगानं धावलो, यावर माझाच विश्वास बसत नव्हता.फॉरेस्ट बंगल्यावर पोहोचताच मी तिथून माझी रायफल घेतली आणि तिथे परत धाव घेतली;पण ते चिनार ओढ्याचं पात्र सुनसान होतं.तो पिसाट ओढा ओलांडून पलीकडे गेला होता.अंधार पडू लागल्यानं मी त्याच्या मागावर मात्र गेलो नाही.दुसऱ्या दिवशी मला कामानिमित्त बंगलोरला परतणं आवश्यक असल्यानं आमची सलामीची फेरी हत्तीच्या हवाली करून मी परत गेलो. 


हत्तीनं मिळवलेल्या सुप्रसिद्धीची सरकारने दखल घेऊन त्याला पिसाट म्हणून घोषित केलं.एवढंच नव्हे.तर तसा सरकारी फतवा काढून दवंडीही पिटली व त्याला मारण्यासाठी पाचशे रुपयांचं बक्षीस जाहीर केलं.


त्याच परिसरातील एक शिकारी सद्गृहस्थ मोठ्या धाडसानं या हत्तीला मारून बक्षीस मिळवायला पुढे आले.त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दलची मला नंतर कळलेली हकीगत अशी : एक जरा जुनीशीच ५०० ची दुनळी रायफल घेऊन हे गृहस्थ पानापट्टीत दाखल झाले.त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्या हत्तीचा वावर,मी चिनार ओढ्याच्या पात्रात जिथे त्या हत्तीच्या पायाखाली तुडवला जाताजाता वाचलो होतो, त्या वोडापट्टी वनक्षेत्रातच होता.या चिनार ओढ्याचा वायव्येकडचा तीर ही वोडापट्टी वनक्षेत्राची सीमा.पलीकडच्या तीरापासून पेन्नाग्राम वनक्षेत्र सुरु होतं.


या गृहस्थांनी दोन दिवस या हत्तीचा शोध घेतला, परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली.तो हत्ती चिनारचा परिसर आणि वोडापट्टी वनक्षेत्राच्या बाहेर जात नाही,म्हणून तिसऱ्या दिवसाची रात्र त्यांनी पलीकडच्या पेन्नाग्राम वनक्षेत्राच्या दोन मैल आत काढायची ठरवली.त्यांनी दोन तंबू ठोकले.अधिक सुरक्षा म्हणून त्यांनी दोन्ही तंबूंभोवती वर्तुळाकार शेकोट्या पेटवल्या.भरपूर लाकूडफाटा हाताशी ठेवून शेकोट्या रात्रभर पेटत्या ठेवण्याच्या सूचना रात्री पहारा करणाऱ्यांना दिलेल्या होत्या.


रात्री सर्व जंगल शांत असल्यानं हे गृहस्थ व त्यांच्या

बरोबरच्या सर्व माणसांना लवकरच गाढ झोपा लागल्या.


भल्या पहाटे हत्तीचं जेव्हा तिथे आगमन झालं, तेव्हा शेकोट्या विझत येऊन फक्त निखारे उरले होते.सहसा हत्ती किंवा कुठलंही जनावर आगीच्या जवळ नाही,परंतु ते पांढरे तंबू पाहून बहुधा तो पिसाट बिथरला असावा आणि तंबू उद्ध्वस्त करायची उर्मी त्याला दाटून आली असावी.त्या विझत आलेल्या शेकोट्यांमधून काळजी -

पूर्वक वाट काढत तो आत आला आणि मोठ्यानं चीत्कार करत त्या तंबूंवर चालून गेला.


अचानक झालेल्या त्या आवाजानं झोपेतून जागे झालेल्या लोकांना तो चालून येत असलेला हत्ती दिसला,तेव्हा एकच हलकल्लोळ उडाला.सगळे सैरावैरा पळत सुटले.

तंबूतल्या त्या शिकारी सद्गृहस्थाला आपली दुनळी वापरायची जराही संधी मिळाली नाही.हत्तीच्यापायाखाली

तंबू जमीनदोस्त झाला.हत्तीनं तंबूच्या पार चिंध्या केल्या.

तंबूच्या कापडात गुरफटून अडकलेल्या त्या शिकाऱ्या -

भोवती आपल्या सोंडेचा विळखा घालून हत्तीनं त्याला एखाद्या विजयी वीरासारखं उचलून घेतलं.त्याला जवळच्या मोकळ्या जागेत घेऊन जात त्याने त्याला मातीत दूर रगडलं,दोन्ही पायांनी तुडवत त्यानं त्याचा इतका चेंदामेंदा केला,की त्याचा रक्तबंबाळ असा पार लोळागोळा झाला.शेवटी बहुधा हत्तीला रक्ताचा वास आवडला नसावा,कारण त्याने त्याला पुन्हा सोंडेत धरून उचललं आणि भिरकावून देऊन तो परत वोडापट्टी वनक्षेत्रात निघून गेला.


या घटनेचा परिणाम असा झाला,की सरकारनं बक्षिसाची रक्कम दुप्पट म्हणजे १००० रुपये केली.मी आता हत्तीबरोबरची दुसरी फेरी सुरु करणार होतो.


मी पानापट्टीला पोहोचल्यावर जिथे ती दुर्दैवी घटना घडली होती,त्या जागेला भेट दिली. शेकोट्यांची वर्तुळं भेदून आत येताना त्या हत्तीनं दाखवलेल्या धाडसानं मी अचंबित झालो.जिथे त्या हत्तीनं त्या शिकाऱ्याला पायाखाली चिरडलं होतं,त्याच्या खुणा त्याठिकाणी स्पष्ट दिसत होत्या.मृतदेहाचे अवशेष मात्र गिधाडांनी फस्त केले होते.


मी पानापट्टीला परत आलो.जवळच असलेल्या गोठ्याचा जो मालक होता,तो माग काढण्यात वाकबगार होता.मी हत्तीला शोधण्यासाठी त्याची मदत मागितली.चिनार ओढ्याच्या वाळूमध्ये त्या हत्तीच्या वावराच्या भरपूर खुणा होत्या.खरा प्रश्न त्यातले ताजे ठसे कोणते,हा होता आणि ते समजणं अशक्य होतं.तो वोडापट्टीच्या वनक्षेत्रात कुठेतरी किंवा वाटेतील छोट्या टेकड्या ओलांडून आधी सांगितल्याप्रमाणे चार मैलांवर असलेल्या कावेरी नदीकडे गेला असण्याचीही शक्यता होती.


वोडापट्टीच्या बाजूचा ओढ्याचा तीर,ओढ्यापासून

दोन मैल अंतरापर्यंत एका विशिष्ट, उंच वाढणाऱ्या गवतानं व्यापलेला होता.या गवताचे देठ काही ठिकाणी दहा फूट उंच होते त्यांच्या वरच्या टोकांना,उसाला

असतात.तसे, सुंदर दिसणारे तुरे होते.त्यावर पहाटे पडलेले दवबिंदू उगवत्या सूर्याच्या किरणांत चमचमत होते.ते दृश्य नितांत सुंदर,अगदी परीकथेत असतं,तसं दिसत होतं;परंतु त्या गवतात शिरण्याचा धोका मात्र त्यामुळे पटकन लक्षात येत नव्हता.ह्या गवताचे देठ एवढे उंच वाढलेले असतात,की जेमतेम एक यार्ड अंतरापर्यंतच तुम्हाला दिसतं.त्यातून चालायचं,तर तुम्हाला एका हातानं गवताचे देठ बाजूला करत व दुसऱ्या हातात रायफल धरूनच जावं लागतं.अशा त्या उंच वाढलेल्या गवतात जर हत्तींचा कळप असला,तर त्यातल्या एखाद्या हत्तीला हात लावता येण्याएवढा तो जवळ आला,तरच तो तुमच्या लक्षात येणं शक्य झालं असतं.


तो गवताचा पट्टा १०० ते २०० यार्ड असा कमीजास्त रुंद होता.या जागी डोंगर थेट ओढ्याला येऊन भिडला होता आणि तिथे उंचच उंच बांबूचं रान माजलं होतं.या गच्च रानातून जाणं गवतातून जाण्याएवढंच धोकादायक होतं. मोडून पडलेल्या बांबूच्या अणकुचीदार फांद्यामुळे चालणं अतिशय जिकिरीचं व कष्टदायक होत होतं.वारा सुटला की,ते उंच बांबू वाकून डोलायचे आणि त्यांच्या हिरव्या-पिवळ्या पानांची सळसळ व्हायची.आम्ही पुढील संपूर्ण चार दिवस त्या उंच रानगवतात व बांबूच्या रानातून त्या हत्तीचा शोध घेत पायपीट केली.डोंगराच्या पलीकडे पार कावेरी नदीपर्यंत आम्ही गेलो,परंतु आम्हाला कुठेही हत्तीचा ताजा माग आढळला नाही.


पाचव्या दिवशी दुपारी परत आम्ही कावेरी नदीशी होतो.

नदीच्या काठानं वरच्या दिशेला जात शोध घ्यायचं मी ठरवलं.या काठावर उंच वाढणारे मुठी किंवा मुथी म्हणून ओळखले जाणारे वृक्ष होते.कावेरी नदीच्या पात्राकडे जाणाऱ्या त्यांच्या अजस्र मुळांवरून कशीबशी पावलं टाकत,मधूनच येणाऱ्या त्या तुरेवाल्या उंच रान गवतातून चालत,अनंत अडचणींचा सामना करत आम्ही साधारण तीन मैल गेलो.आणि तिथे आम्हाला हत्तीच्या पावलाचे ताजे ठसे मिळाले. नदीपलीकडच्या कोइंबतूर जिल्ह्यातून तो हत्ती त्या दिवशी सकाळीच नदी ओलांडून आला होता.त्या ठशांची मापंही त्या पिसाट हत्तीच्या ठशांशी मिळतीजुळती होती.आता त्याचा माग काढणं सोपं होतं.त्या हत्तीच्या प्रचंड वजनानं गवत,बांबू व जमिनीवरच्या झाडोऱ्यात रुतलेली त्याची पावलं स्पष्ट दिसत होती.


त्याचा माग काढत आम्ही एक छोटीशी टेकडी चढून पलीकडे गेलो.तिथे आम्हाला शेणाचा एक ढीग पडलेला दिसला.आम्ही त्याला हात लावून पाहिलं,अगदी ताजं शेण जेवढं उबदार लागतं, तेवढं ते उबदार नव्हतं.म्हणजे ते अगदी ताजं नव्हतं.आम्ही तसेच चालत जात एका खोलशा दरीत उतरलो.इथं परत एक शेणाचा ढीग होता. त्यालाही आम्ही हात लावून पाहिला,तोही एवढा ताजा वाटला नाही.याचा अर्थ आमचं सावज अजून काही अंतर आमच्या पुढे होतं.


आम्ही धडपडत समोरचा चढ चढलो.त्यापुढे अजून दोन टेकड्या आम्ही ओलांडल्या आणि आम्हाला दिसलं,की तो हत्ती अचानक वळून कावेरी नदीच्या दिशेनं गेला होता.ते पाहून हा हत्ती आम्हाला चुकवून कावेरी नदी ओलांडून परत पलीकडे गेला,तर आमच्या हातातून निसटेल,अशी आम्हाला भीती वाटू लागली. आम्ही जमेल तेवढ्या वेगानं पुढे निघालो.इथे आम्हाला परत एक शेणाचा ढीग दिसला,

हा मात्र उबदार होता आणि तिथली जमीन हत्तीनं केलेल्या मूत्रविसर्जनानं ओली झाली होती. त्याचबरोबर थोडे फेसाचे बुडबुडेही तिथे दिसत होते,म्हणजे तो हत्ती फार दूर नव्हता.त्यापुढे मात्र तो हत्ती कावेरी नदी ओलांडून रायफलच्या पल्ल्यापलीकडे जायच्या आत त्याला गाठायची शर्यत लागल्यासारखे आम्ही धावत निघालो. वाटेत आम्हाला नुकत्याच खाली पडलेल्या फांद्या दिसल्या.हे साहेब निवांत चरत नदीकडे चालले होते.


पुढे तीव्र उतार होता,पाणी वाहात असल्याचाही आवाज येऊ लागला.आम्ही नदीकाठाशी पोहोचत आल्याचं आम्हाला कळलं.आणि लगेचच झाडांमधून आम्हाला चमचमतं पाणी दिसलं.आम्ही नदीकाठाशी होतो.

सावधपणे आवाज न करता आम्ही पुढे गेलो.पुढे मऊ वाळू होती,तिथे आमच्या लक्षात आलं,की आम्हाला वाटलं होतं,तसा हा हत्ती नदी ओलांडून पलीकडे गेलाच नव्हता.अचानक विचार बदलून तो नदीच्या वरच्या दिशेला असलेल्या एका गवताळ कुरणाकडे गेला होता.त्याच्या पायाखाली गवताची कोवळी पाती खाली ओलसर जमिनीत दाबली गेली होती आणि त्या खळग्यातून अजून पाण्याचे बुडबुडेही येत होते.


आम्ही अजून दीडशे यार्ड पुढे गेलो.तिथे नदीला एक फाटा फुटला होता.आम्ही तिथपर्यंत पोहोचलो आणि आम्हाला पाणी उडवल्याचे आणि हत्ती सोंडेत हवा आत ओढताना येतो, तसे आवाज येऊ लागले म्हणजे हत्ती पाण्यात डुंबत होता.


जो काही थोडासा वारा वाहात होता,तो सुदैवानं आमच्या दिशेला येत होता.नीट दिसावं म्हणून आम्ही काही फांद्या व त्या उंच रानगवताची पाती बाजूला करून पाहिलं,तसा आम्हाला तो हत्ती दिसला.तो पाण्यात आडवा कुशीवर पडून लोळत होता,पण त्याचं तोंड आमच्या विरुद्ध दिशेला होतं.


अशा परिस्थितीत तो हत्ती पिसाटच आहे,की कावेरी नदीच्या काठांवरच्या हत्तींच्या अनेक कळपांपैकी एक आहे - हे ठरवणं अवघड होतं.आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून थांबलो.


पुढच्या पाचच मिनिटांत पाण्याचे फवारे उडवत, सोंडेतून फुरफुरण्याचे आवाज काढत तो एकदम उठून उभा राहिला व निवांतपणे तो फाटा ओलांडून पलीकडे जाऊ लागला.हा सर्व वेळ त्याचं तोंड आमच्या विरुद्ध दिशेलाच होतं, त्यामुळे आम्ही त्याला दोन सुळे आहेत का एक, हे पाहू शकत नव्हतो.आता पटकन जर काही केलं नाही, तर तो पलीकडच्या रानगवतात नाहीसा झाला असता. मी बोटं जुळवून एकापाठोपाठ एक दोन चुटक्या वाजवल्या.

हत्तींची श्रवणशक्ती तीव्र असते.(नरभक्षकाच्या मागावर,संजय बापट) मी वाजवलेल्या चुटक्यांचा छोटासा आवाज त्या हत्तीला ऐकू आला आणि तो गर्रकन वळला.हाच होता तो पानापट्टीचा पिसाट. 


त्याच्या तुटलेल्या डाव्या सुळ्याचं थोटूक आणि उजवा वर वळलेला दुसरा सुळा स्पष्टपणे दिसत होता.आपले बारीक डोळे फिरवत त्यानं एका सेकंदात आम्हाला पाहिलं.त्याची सोंड आत वळली,त्याची छोटीशी शेपटी ताठ होऊन वर आली.दाटून आलेल्या तिरस्कारानं व रागानं बेभान होत नदीपात्रातल्या पाण्यातून तो आमच्यावर धावून आला.


माझी ४०५ रायफल एकदाच बोलली.त्या वजनदार भारी गोळीनं वर वळलेल्या सोंडेखाली त्याच्या कंठाचा वेध घेतला.एक रक्ताचा फवारा त्याच्या कंठातून उडाला.पळून जायला तो बाजूला वळला,तेव्हा मी झाडलेल्या अजून दोन गोळ्या - एक कपाळात व दुसरी सुपासारख्या कानामागे त्याला वर्मी लागल्या.


तो भलामोठा अजस्र देह क्षणभर जागेवरच खिळला.नंतर थरथरत त्या उथळ पाण्यात धाडकन कोसळला.

कोइंबतूरच्या बाजूला असलेल्या पोनाची मलाई शिखरामागे मावळत्या सूर्याच्या किरणात त्या उथळ नदीपात्रातलं पाणी लालेलाल झालं.


समाप्त..