* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२७/७/२३

दहशत नरभक्षक बिबट्याची

दहशत,भीती हे शब्द आपण दररोज साध्या - साध्या बाबतीत इतके सर्रास वापरतो की कधी कधी जेव्हा खरंच त्याचा आवाका मोठा असेल तेव्हा तेवढ्याच शब्दांत सांगून त्याचा खराखुरा अर्थबोध होत नाही.त्यामुळेच जवळपास पाचशे चौ.मैल पहाडी मुलखात राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीने,आणि दरवर्षी चारधाम यात्रेला येणाऱ्या साठ हजार यात्रेकरूंच्या दृष्टीने,नरभक्षकाने घातलेली ही दहशत नक्की कशी होती याची मला तुम्हाला कल्पना द्यायची आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला अशाही काही घटना सांगणार आहे की ह्या दहशतीचं कारणंही तुम्हाला समजेल.


रुद्रप्रयागच्या नरभक्षकाने लादलेल्या 'कर्फ्यू' एवढं इतर कोणत्याही कर्फ्यूचं काटेकोरपणे पालन आजवर झालं नसेल! दिवसभर त्या भागातलं सर्व जनजीवन नेहमी प्रमाणेच चालू राहायचं;पुरुषमाणसं लांबवरच्या बाजाराला,शेजारच्या गावी मित्रांकडे,पाहुण्यांकडे जायची, बायकामाणसं डोंगरावर वैरणीसाठी तसेच शाकारणीसाठी गवत कापायला जायची;पोरं शाळेत किंवा गुरं-बकऱ्या वळायला आणि सरपण आणायला रानात जायची व उन्हाळा असेल तेव्हा छोटे मोठे घोळके करून बद्रीनाथ-केदारनाथकडे जाताना दिसायची.


पश्चिम क्षितिजाकडे सूर्य जरा कलायला लागला आणि सावल्या मोठमोठ्या व्हायला लागल्या की मात्र या सर्वांच्या वागणुकीत अचानकपणे लक्षणीय असा बदल दिसायला लागायचा.बाजाराकडे,गावाकडे गेलेली पुरुषमाणसं लगबगीने परतताना दिसायची.डोक्यावर गवताचे भारे घेऊन बायका धडपडत डोंगर उतरायला लागायच्या.शाळेतून येताना रेंगाळणाऱ्या,गुरं घेऊन रानातून परतायला उशीर झालेल्या पोरांना त्यांच्या आया हाका मारमारून बोलवायला लागायच्या आणि यात्रेकरूंना वाटेत भेटणारी माणसं 'लवकर मुक्कामावर जा' असं सांगायला लागायची.


अंधार पडला रे पडला की एकप्रकारची अमंगळ शांतता,

स्तब्धता आख्ख्या इलाख्यात पसरायची, अक्षरशः एकही हालचाल नाही की शब्द नाही.! सर्वच्या सर्वजण दरवाजे बंद करून अंधाऱ्या घरात स्वतःला कोंडून घ्यायचे.

काहीवेळेला तर एखादा जास्तीचा दरवाजा काढून संरक्षणात दुप्पट वाढ करण्यात यायची.कोणाच्या घरात किंवा दुकानात आसरा न मिळालेले यात्रेकरू,यात्रेकरूं-

साठी बांधलेल्या गवती छपरांच्या पिलग्रिम शेल्टर्समध्ये दाटीवाटीने झोपायचे.


सगळेच्या सगळे,घरातले किंवा झोपड्यांतले, नरभक्षकाच्या भीतीने चिडीचीप बसायचे.सतत आठ वर्ष गढवालच्या पहाडी जनतेसाठी व यात्रेकरूंसाठी 'दहशत' ह्या शब्दाचा अर्थ हा असा होता! आता ही एवढी दहशत बसायची कारणं व स्पष्टीकरण देण्यासाठी मी तुम्हाला काही घटना सांगतो.


एका गावात चाळीस शेळ्यांची राखण करण्यासाठी एका माणसाने एक चौदा वर्षांचा अनाथ मुलगा कामाला ठेवला होता.हा अस्पृश्य जातीचा होता.दररोज संध्याकाळी शेळ्या घेऊन गावात परत आल्यावर त्याला जेवण दिलं जाई व त्यानंतर एका छोट्या खोलीत चाळीस शेळ्यांसह बंद केलं जाई.एका एकमजली इमारतीच्या तळ -

मजल्यावर मालकाच्या घराच्या बरोबर खाली ही खोली होती.झोपल्यावर शेळ्या अंगावर येऊ नयेत म्हणून त्या मुलाने खोलीचा एक कोपरा पाहून मध्ये लाकूड आडवं टाकून स्वतःला झोपण्यासाठी जागा केली होती.


त्या खोलीला एकही खिडकी नव्हती आणि फक्त एकच दरवाजा होता.सर्व शेळ्या व तो मुलगा खोलीत गेल्यावर त्यांचा मालक दरवाजा बंद करायचा.दरवाजाला बसवलेल्या साखळीची शेवटची कडी दरवाजाच्या चौकटीतल्या कोयंड्यात घातल्यावर,निघू नये म्हणून त्यात लाकडाचा अडसर सरकवून खोली सुरक्षित केली जात असे.खबरदारीचा जास्तीचा उपाय म्हणून तो पोरगाही दरवाजाला आतून एक जड धोंडा लावत असे.


ज्या रात्री त्या पोराचा बळी गेला त्या रात्रीही त्याच पद्धतीने खोली बंद केली गेली होती असं त्या मालकाचं म्हणणं आहे आणि एकूणच भीतीचं,दहशतीचं वातावरण बघता त्यात तथ्य असावं.दरवाजावर उमटलेल्या नख्यांच्या ओरखड्यांवरून सुद्धा हे ध्यानात येत होतं. दरवाजा नख्यांनी ओरबाडून तोडण्याच्या प्रयत्नात केव्हातरी तो लाकडाचा अडसर कडीतून निघाला असावा आणि त्यानंतर फक्त दरवाजा ढकलायचंच बाकी राह्यलं.


चाळीस बकऱ्या आणि त्यात लाकूड आडवं टाकून झोपायला केलेली जागा यातून खरंतर बाहेरून येणाऱ्या कोणत्याही जनावराला हालचाल करायला जागा उरण्याची शक्यता नव्हती.त्यामुळे हा बिबळ्या बकऱ्यांच्या पाठीवरून झेप घेऊन पोरापर्यंत पोचला की बकऱ्यांच्या पायाखालून सरपटत गेला याचा फक्त अंदाजच करणं आपल्या हातात उरतं. (कारण या क्षणापर्यंत साहजिकच सर्व बकऱ्या घाबरून उभ्या राह्यल्या असणार)


दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतानाचा बिबळ्याचा आवाज,तो खोलीत शिरल्यावर बकऱ्यांच बेंबाटणं पोराला ऐकू आलं नाही, त्याची झोप मोडली नाही आणि तो मदतीसाठी ओरडला नाही असं गृहीत धरण्याशिवाय गत्यंतर नाही.


मुलाला त्या कोपऱ्यात मारून,उचलल्यानंतर बिबळ्या खोलीबाहेर पडला ( तोपर्यंत सर्व बकऱ्या खोलीबाहेर पळाल्या होत्या.) आणि डोंगर उतरून काही अंतर गेला.

त्यानंतर उतारावरची एक दोन सोपानशेतं ओलांडून दगडगोट्यांनी भरलेल्या एका घळीत घेऊन गेला.काही तासांनी उजेड पडल्यावर इथेच त्याच्या मालकाला त्या पोराचे अवशेष सापडले.


यात अविश्वसनीय वाटणारी गोष्ट म्हणजे एकाही बकरीला साधा ओरखडासुद्धा उमटला नव्हता!


एक माणूस त्याच्या शेजाऱ्याकडे जरा निवांतपणे हुक्का प्यायला आला होता.ही खोली इंग्रजी 'एल' आकाराची होती.तिचा बाहेरचा दरवाजा त्यांच्या बसल्या जागेवरून दिसत नव्हता.ते दोघं हुक्का पेटवून भिंतीला टेकून आरामात धूर काढत बसले होते.त्या दिवसापर्यंत त्या गावात एकही बळी गेला नसल्याने त्यांनी दरवाजा घट्ट लावण्याची काळजी घेतली नव्हती.हळूहळू अंधार पडला.

एक दोन दम मारून मालकाने तो हुक्का आपल्या मित्राच्या हातात दिला पण नेमका तो त्याच्या हातातून निसटून खाली पडला आणि तंबाखू व जळते निखारे इकडे तिकडे पसरले.


"जरा सांभाळून... नाहीतर कांबळ्याला आग लावशील" असं काहीबाही बडबडत तो माणूस निखारे गोळा करण्यासाठी खाली वाकला आणि त्याचं तोंड दरवाजासमोर आलं.चंद्र नुकताच मावळत होता आणि त्या प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर त्याला त्याच्या शेजाऱ्याला तोंडात घेऊन जाणारा बिबळ्या दिसला.


काही दिवसानंतर ही घटना मला परत सांगताना तो माणूस म्हणतो, "मी खरं सांगतोय साहेब, हा माझा शेजारी माझ्यापासून हाताच्या अंतरावर होता तरीही साधा श्वास घेण्याचासुद्धा आवाज मला आला नाही... त्याला मारताना,ओढून नेताना बिबळ्याचासुद्धा काहीही आवाज नाही! मी त्याक्षणी काहीही करू शकत नव्हतो, बिबळ्या दरवाजाबाहेर जाईपर्यंत मी थांबलो नंतर सरपटत जाऊन पटकन दरवाजा लावून घट्ट बंद करून टाकला.' 


गावच्या मुखियाची बायको जरा आजारी होती आणि तिची शुश्रूषा करण्यासाठी तिने त्या रात्री गावातल्या दोन बायकांना घरी बोलावलं होतं. त्या घराला दोन खोल्या होत्या व बाहेरच्या खोलीला दोन दरवाजे होते.एक बाहेर अंगणात उघडणारा तर एक आतल्या खोलीत उघडणारा. बाहेरच्या खोलीला एक खिडकी होती,ती जमिनीपासून चार फूट उंचीवर होती.या खिडकीत त्या बाईसाठी पिण्याच्या पाण्याचं मोठं पितळी भांडं ठेवलं होतं.

बाहेरच्या खोलीत उघडणारा दरवाजा सोडला तर आतल्या खोलीला एकही,खिडकी नव्हती.बाहेरचा दरवाजा घट्ट लावला होता,पण दोन खोल्यांमधला दरवाजा साहजिकच उघडा ठेवलेला होता.


आतल्या खोलीत त्या आजारी बाईला मध्ये ठेवून दोन्ही बायका जमीनीवरच झोपल्या होत्या. बाहेरच्या खोलीत त्या खिडकीजवळच पलंगावर तिचा नवरा झोपला होता.

शेजारीच जमीनीवर त्याने कंदील ठेवला होता.आणि तेलाची बचत व्हावी म्हणून,शेजारच्या खोलीत त्याचा जेमतेम उजेड पडेल इतपत त्याची वात छोटी करून ठेवली होती.


मध्यरात्रीच्या सुमारास सर्वजण झोपलेले असतानाच हा बिबळ्या बाहेरच्या खोलीच्या खिडकीतून घरात शिरला.(पण हे करताना त्याने पाण्याचं मोठं भांडं कसं टाळलं हे आश्चर्यच आहे.) आत आल्यावर तो पलंगाच्या शेजारून पुढे आतल्या खोलीत शिरला.बाईला उचलून परत जाताना मात्र या जास्तीच्या ओझ्यामुळे ते पाण्याचं भांडं खाली पडलं व त्याच्या आवाजामुळे सर्वांना जाग आली.


जेव्हा कंदिलाची वात मोठी केली गेली तेव्हा कंदिलाच्या प्रकाशात त्यांना ती बाई खिडकीखाली मुटकुळं होऊन पडलेली दिसली, तिच्या गळ्यावर सुळ्यांचे चार मोठे व्रण होते. शुश्रूषेसाठी तिथे आलेल्या बायकांपैकी एकीचा नवरा मला ही हकीगत सांगताना म्हणतो, "मुखियाची बायको खूपच आजारी होती साहेब आणि फार दिवसांची सोबत नव्हती.बिबळ्याने तिलाच निवडलं हे नशीब.


दोन गुजर लोक त्यांचा तीस म्हशींचा कळप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन चालले होते.ते एकमेकांचे भाऊच होते व त्यांच्यातल्या मोठ्या भावाची बारा वर्षांची मुलगी त्यांच्या बरोबर होती.हे दोघे या भागात पहिल्यांदाच आले होते आणि एकतर त्यांच्या कानावर नरभक्षकाबद्दल काही आलं नसावं किंवा जास्त शक्यता ही आहे की सुरक्षिततेसाठी म्हशींवर त्यांचा भरवसा असावा.जवळजवळ आठ हजार फूट उंचीवर पायवाटेला लागूनच एक छोटी सपाट जागा होती आणि त्याच्याखाली कोयत्याच्या आकाराचं डोंगर उतरणीवरचं छोटंसं शेत होतं.हे शेत साधारण पाव एकराचं असावं व बराच काळ त्यावर काही लागवड झाली नसावी. त्या दोघांनी रात्रीच्या मुक्कामासाठी ही जागा निवडली.

जवळच्या जंगलातून त्यांनी काही लाकडं तोडून आणली आणि त्याचे खुंट शेतात खोलवर ठोकून त्यांनी म्हशींना रांगेत बांधून टाकलं.त्यानंतर त्या मुलीने बनवलेलं जेवण उरकून तिघांनी शेत आणि रस्त्याच्या मध्ये असलेल्या त्या सपाट जमीनीवर कांबळं अंथरलं आणि सर्वजण झोपी गेले.ती रात्र अंधारी होती. पहाटेपहाटे म्हशींच्या घंटामुळे आणि हंबरण्यामुळे त्या दोघांना जाग आली.इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर त्यांना लगेच लक्षात आलं की आसपास वाघ-बिबळ्या आहे.त्यांनी कंदील पेटवला आणि म्हशींना शांत करण्यासाठी, त्याप्रमाणे एखादीने हिसके देऊन दावे तोडलेत का हे बघण्यासाठी शेतातून त्या म्हशींमधून एक चक्कर मारली.फक्त काही मिनिटांसाठीच ते त्यांच्या झोपण्याच्या जागेवरून गैरहजर होते पण परत आल्यानंतर त्यांना दिसलं की जाताना झोपलेली ती मुलगी आता गायब आहे आणि ज्या कांबळ्यावर ते झोपले होते त्यावर रक्ताचे मोठे मोठे शिंतोडे आहेत.


दिवस उजाडल्यावर त्या भावाभावांनी रक्ताचा माग काढला.हा माग म्हशी बांधलेल्या ठिकाणा शेजारून शेत ओलांडून काही पावलं डोंगर उतारावर गेला होता.इथेच बिबळ्याने त्याचं भक्ष्य खाल्लेलं त्यांना आढळलं.


"माझा भाऊ अगदी अशुभ नक्षत्रावर जन्माला आला असणार साहेब.त्याला मुलगा नाही.ह्या त्याच्या मुलीचं लवकरच लग्न होणार होतं आणि तिच्याकडून

आपल्याला वारस मिळेल हे त्याचं स्वप्न होतं.बिबळ्याने नेमक तिलाच नेलं." तो दुर्दैवी गुजर सांगत होता.


मी अशा कित्येक घटना एकामागोमाग एक सांगू शकतो. प्रत्येक घटनेचा शेवट दुःखदच आहे पण मला वाटतं या गढ़वाली लोकांना इतकी दहशत का होती हे कळावं इतपत मी तुमच्याशी बोललो आहे.त्याचबरोबर हेही लक्षात घ्यावं लागेल की हे पहाड़ी लोक शूर असले तरी श्रद्धाळू असतात. त्यामुळे प्रत्यक्ष नरभक्षकाच्या भीतीपेक्षा त्यांच्यावर अमानवी शक्तींच्या भीतीचाही पगडा असणंही नैसर्गिक आहे.याबद्दलचं छोटंसं उदाहरण.


एक दिवस पहाटे पहाटेच मी रुद्रप्रयाग इन्स्पेक्शन बंगल्याच्या बाहेर पडलो आणि जसं व्हरांड्याबाहेर पाऊल टाकलं तसं खाली, माणसांच्या पावलांनी मऊ झालेल्या मातीवर मला नरभक्षकाच्या पावलांचे ठसे दिसले.ठसे एकदम ताजे होते आणि त्यावरून हे दिसत होतं की बिबळ्यानेही माझ्या काही मिनिटंच अगोदर व्हरांड्याबाहेर पाऊल टाकलं होतं ! बंगल्यावरची भेट अयशस्वी ठरल्यानंतर तो पन्नास पावलां वरच्या यात्रामार्गाकडे गेला होता.बंगला व रस्त्यामधला पन्नास पावलांचा रस्ता खडकाळ असल्याने तिथे कोणतेही माग दिसत नव्हते पण फाटकाशी पोचल्यानंतर मला गुलाबराईच्या दिशेने जाणारे ताजे पगमार्कस दिसले.

आदल्या दिवशी संध्याकाळी शेळ्यामेंढ्यांचा खूप मोठा कळप त्या दिशेने गेला होता आणि त्यांच्या खुरांनी मऊ वस्त्रगाळ झालेल्या मातीवर बिबळ्याचे पगमार्कस नुकत्याच पडलेल्या हिमावर दिसावेत इतके स्पष्ट दिसत होते..


त्या क्षणापर्यंत मला या पगमार्कसची चांगलीच ओळख झाली होती व इतर शंभर बिंबळ्यांमधूनही मी त्याला वेगळं काढू शकलो असतो.


शिकार करणाऱ्या जनावरांच्या पायांच्या ठशांवरून (पगमार्कस्वरून) खूप काही शिकता येतं.उदाहरणार्थ त्याचं लिंग,वय,आकार वगैरे! सर्वप्रथम जेव्हा मी ह्या बिबळ्याचे पगमार्क्स पाह्यले तेव्हाच मला कळलं होतं की हा एक आकाराने बराच मोठा,प्रौढ वयाचा नर बिबळ्या आहे.आता या ठशांवरून समजत होतं की तो माझ्यापासून काही मिनिटंच पुढे आहे आणि सावकाश पण नेहमीच्या स्थिर गतीनं चालतोय.


इतक्या सकाळी ह्या रस्त्यावर अजिबात वर्दळ नव्हती.हा रस्ता पुढे छोट्या मोठ्या असंख्य घळी ओलांडून वाकडा तिकडा गेला होता.स्वतःची संपूर्ण निशाचर सवय हा बिबळ्या या वेळी कदाचित मोडेल या आशेने मी..


९.जुलै.२०२३ या लेखमालेतील पुढील भाग

उर्वरित भाग पुढील लेखामध्ये..

२५/७/२३

निर्माता शेक्सपियर भाग २

या नाटकात टिमॉन हा एकच सिनिक नाही. अपेमॅन्टस नावाचा तत्त्वज्ञानीही सिनिकच आहे.मानवजातीचा मूर्खपणा पाहून तोही नाक मुरडतो;पण टिमॉनची दुःखी विषण्ण कटुता व अपेमॅन्टसचा उपहासात्मक चावटपणा यात फरक आहे.मानव मानवाशी माणुसकी विसरून वागतो,हे पाहून टिमॉनला जीवन अशक्य होते. पण तेच दृश्य पाहून अपेमॅन्टस उपहासाने हसतो.त्याला जणू सैतानी आनंद वाटतो.टिमॉन हे जग नाहीसे करून ज्यात प्रेमळ मित्र असतील,असे नवे जग निर्मू पाहतो. पण अपेमॅन्टस जगाला नावे ठेवतो,जग सुधारू इच्छित नाही.

अथेन्समधील एक सरदार त्याला "किती वाजले? किती समय आहे?"असे विचारतो.तेव्हा तो उत्तर देतो,

"प्रामाणिक असण्याचा हा समय आहे." पण आजूबाजूला जरासे प्रामाणिक जग दिसले तर मग जगाची टिंगल कशी करता येईल ? 'जग वाईट असावे. म्हणजे गंमत पाहता येईल.' अशी अपेमॅन्टसची वृत्ती आहे.मित्रांची कृतघ्नता पाहून टिमॉनला मरणान्तिक यातना होतात,प्राणांतिक वेदना वाटतात,अपेमॅन्टसला ती मोठ्याने हसण्याची संधी वाटते! एकाच नाटकात टिमॉन व अपेमॅन्टस यांची पात्रे रंगविणारा फारच सूक्ष्मदर्शी असला पाहिजे.त्याला स्वभावदर्शन फारच सूक्ष्म साधले आहे.बारीकसारीक छटा दाखविणे फार कठीण असते.

पण शेक्सपिअर स्वभावदर्शनात अद्वितीय आहे.

टिमॉनशिवाय अपेमॅन्टसला पूर्णता नाही,अपेमॅन्टसशिवाय टिमॉनला पूर्णता नाही.दोघांच्याद्वारे मिळून जगातील अन्यायाला शेक्सपिअर उत्तर देत आहे.जगाचा उपहास करणारा शेक्सपिअर या दोघांच्या डोळ्यांनी बघून उत्तर देत आहे. 'हॅम्लेट'मध्ये व्यवहारी माणसाचे,संसारी शेक्सपिअरचे,रामरगाड्यात पडलेल्या शेक्सपिअरचे जगाला उत्तर आहे.त्याच प्रश्नाला जगातील अन्यायाला त्याने उत्तर दिले आहे. जगातील नीचता पाहून टिमॉन आत्महत्या करतो.अपेमॅन्टस हसतो,पण हॅम्लेट काय करतो? तो खुनाचा सूड घेऊ पाहतो.हॅम्लेट टिमॉनपेक्षा कमी भावनाप्रधान आहे,पण अपेमॅन्टसपेक्षा अधिक उदार वृत्तीचा आहे. तो जगातील अन्यायाला शासन करू पाहतो.जुन्या करारातील 'डोळ्यास डोळा', 'दातास दात', 'प्राणास प्राण', 'जशास तसे' हा न्याय त्याला पसंत पडतो.

जगातील अन्याय पाहून हॅम्लेटच्या मनावर जशी प्रतिक्रिया होते.तशीच सर्वसामान्य माणसाच्या मनावर होते.


टिमॉनप्रमाणे तो जगापासून पळून जात नाही किंवा अपेमॅन्टसप्रमाणे जगाचा उपहासही करीत नाही.तो विचार करीत बसतो.या सर्व जगाचा अर्थ काय याची मीमांसा करीत बसतो.पण शेवटी त्याच्या भावना जेव्हा पराकोटीला पोहोचतात,तेव्हा तो प्रहार करतो.मात्र तो प्रहार दुष्ट कृत्यांवर नसून दुष्ट कृत्य करणाऱ्यांवर असतो आणि असे करीत असता तो आपल्या शत्रूचा व स्वतःचाही नाश करून घेतो.


'सूड घेणे हेच जणू जीवनाचे उदात्त ध्येय'असे हॅम्लेटला वाटते.या सूड घेण्याच्या पवित्र कर्माच्या आड त्याच्या मते ऑफेलियाचेही प्रेम येता कामा नये.हॅम्लेटचे जग एकंदरीत जंगलीच आहे.जरी तिथे तत्त्वज्ञानाचे विचार व सुंदर सुंदर वाक्ये ऐकावयाला आली तरी सूडभावना हेच परमोच्च नीतितत्त्व म्हणून येथे पूजिले जात आहे असे दिसते.हॅम्लेट नाटकातले सारं काव्य दूर केल्यास ते अत्यंत विद्रूप वाटेल.त्यात थोडीही उदात्तता आढळणार नाही.हॅम्लेट हा एक तरुण व सुंदर राजपुत्र असतो.त्याची बुद्धी गमावून बसतो.पित्याचे भूत आपणास खुनाचा सूड घेण्यास सांगत आहे.असे त्याला वाटते व त्याचे डोके फिरते.तो मातेची निंदा करतो व ज्या मुलीशी तो लग्न करणार असतो,तिला दूर लोटून देतो.ती निराश होऊन आत्महत्या करते.तो तिच्या भावाला व बापाला ठार मारतो.नंतर आईला मारून तो स्वतः ही मरतो आणि हे सर्व कशासाठी ? तर भुताला दिलेल्या सूड घेण्याच्या वचनाच्या पूर्ततेसाठी! सूडाच्या एका गोष्टीसाठी ही सारी दुःखपरंपरा ओढवून आणणे वेडेपणाचे वाटते.एका सूडासाठी केवढी ही जबर किंमत! या नाटकाचे 'दारू प्यायलेल्या रानवटाने लिहिलेले नाटक' असे वर्णन व्हॉल्टेअरने केले आहे ते बरोबर वाटू लागते.सारे मानवी जीवन मानवी जीवनाचे हे सारे नाटकसुद्धा एका दारुड्यानेच लिहिले आहे असेच जणू आपणासही वाटू लागते.

पण शेक्सपिअर जीवनाकडे फार संकुचित दृष्टीने पाहतो असे म्हणणाऱ्या संकुचित दृष्टीच्या टीकाकाराचे हे मत आहे.शेक्सपिअरच्या प्रज्ञेचा व प्रतिभेचा केवळ एक किरण हॅम्लेटमध्ये दिसतो.मानवी जीवनातल्या अनंत गोष्टींतील सूड ही केवळ एक गोष्ट आहे.त्याप्रमाणेच हॅम्लेटमध्ये शेक्सपिअरच्या अनंत विचारसृष्टीतील एकच गोष्ट दिसते.ते त्याचे वा जगाचे संपूर्ण दर्शन नव्हे. शेक्सपिअर हा जादूगार आहे.तो निसर्गाचे पूर्णपणे अनुकरण करू शकतो.त्याने हॅम्लेटला स्वतःच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाची मूर्ती बनविलेले नाही.हॅम्लेटद्वारा स्वत:च्या बुद्धीचा फक्त एक भाग त्याने दाखवला.अनंत पात्रांद्वारा त्याने आपले तत्त्वज्ञान मांडले आहे.सृष्टी आपले स्वरूप विविधतेने प्रकट करते.कोठे एक रंग, कोठे दुसरा,कोठे हा गंध,कोठे तो.तसेच या कविकुलगुरूचे आहे.त्याच्या नाटकी पोतडीत हॅम्लेटमधल्या विचारांपेक्षा अधिक उदात्त विचार भरलेले आहेत.निसर्ग कन्फ्यूशियसला प्रकट करतो.तद्वतच हॅम्लेटलाही निर्मितो.पण जगाचे पृथक्करण करताकरता,प्रयोग करताकरता, निसर्गाला व शेक्सपिअरला सुडापेक्षाअधिक उदात्त व सुंदर असे काहीतरी दाखवायचे असते. हे जे काहीतरी अधिक सुंदर व अधिक उदात्त आहे,ते आपणाला 'टेंपेस्ट'मध्ये पाहण्यास मिळेल.


'अथेन्सचा नागरिक टिमॉन' या नाटकात शेक्सपिअर जगातील अन्यायाला उपहासाने उत्तर देतो.हॅम्लेटमध्ये जगातील अन्यायाची परतफेड सुडाने करण्यात आली आहे.पण टेंपेस्टमध्ये अन्यायाची परतफेड क्षमेने करण्यात आली आहे.टिमॉन व हॅम्लेट यांच्याप्रमाणेच प्रॉस्पेरोही दुःखातून व वेदनांतून गेलेला आहे. पण दुःखाने तो संतापत नाही तर उलट अधिकच प्रेमळ होतो.त्याच्या हृदयात अधिकच सहानुभूती उत्पन्न होते.ज्यांनी त्याच्यावर आपत्ती आणलेली असते,त्यांच्याबद्दलही त्याला प्रेम व सहानुभूती वाटते.तो जगाला शिव्याशाप देत नाही.जगाचा उपहासही करीत नाही.तर आपल्या मुलांच्या खोड्या पाहून बाप जसा लाडिकपणे हसतो, तसा प्रॉस्पेरो हसतो.

टेंपेस्टमध्ये उपहास व तिरस्कार यांचा त्याग करून जरा अधिक उदात्त वातावरणात शेक्सपिअर एखाद्या हृदयशून्य देवाप्रमाणेच मानवाची क्षुद्रता आणि संकुचितता पाहून मिस्कीलपणे हसतो.तो एखाद्या राजाला सिंहासनावरून खाली खेचतों व 'हा तुझा डामडोल,ही तुझी ऐट सर्व नष्ट होऊन किडे तुला खाऊन टाकणार आहेत.त्या किड्यांना मासे खातील व ते मासे एखाद्या भिकाऱ्याच्या पोटात जातील.' असे त्याला सांगतो.पण टेंपेस्टमध्ये जरा रागवायचे झाले,तरी तो रागही सौम्य व सुंदर आहे.या नाटकात कडवट व विषमय उपहासाचे उत्कट करुणेत पर्यवसान झाले आहे.


आता आपण टेंपेस्टमधील कथा जरा पाहू या. प्रॉस्पेरो हा मिलनचा ड्यूक.तो हद्दपार केला जातो.तो आपल्या मुलीसह एका जादूच्या बेटावर राहतो.तिचे नाव मिरान्दा.

त्याच्या भावानेच त्याला मिलनमधून घालवून दिलेले असते.भावाचे नाव न्टोनिओ.नेपल्सचा राजा अलोन्सो याच्या मदतीने तो भावाला हाकलून देतो.प्रॉस्पेरो व त्याची तीन वर्षांची मुलगी यांना गलबतात बसवून तो ते समुद्रात सोडून देतो.हे गलबत सुदैवाने या मंतरलेल्या बेटाला येऊन लागते.तिथे प्रॉस्पेरो मुलीला शिकविण्यात व मंत्रतंत्राचा अभ्यास करण्यात वेळ घालवतो. एरियल नामक एक विद्याधर असतो व कॅलिबन नामक एक राक्षस असतो. त्या दोघांना वश करून तो त्यांना आपली सेवा करावयास लावतो.एके दिवशी एक गलबत त्या बेटाच्या बाजूने जात असते.गलबतात एका लग्न समारंभाची मंडळी असतात,ट्यूनिसहून ही मंडळी इटलीस परत येत असतात.या मंडळीत राजा अलोन्सो व ॲन्टोनिओ हे असतात.यांनी प्रॉस्पेरोला हद्दपार केलेले असते.राजाचा भाऊ सेबॅस्टियन व मुलगा फर्डिनंड हेही त्यांच्याबरोबर असतात.


प्रॉस्पेरो आपल्या मंत्रसामर्थ्यानि समुद्रावर एक वादळ उठवतो.ते गलबत वादळातून जात असता या मंतरलेल्या बेटाला येऊन लागते.प्रॉस्पेरो एरियलला सर्व उतारूंना वाचवण्यास सांगतो. पण वाचवल्यावर त्यांना बेटावर चारी दिशांना अलग अलग करण्याची सूचना देतो.फर्डिनंड बापापासून वियुक्त होतो व बाप मेला असे वाटून शून्य मनाने भटकत भटकत प्रॉस्पेरोच्या गुहेकडे येतो.वस्तुतः तो तिकडे जादूमुळे खेचला गेलेला असतो.मिरान्दाची व त्याची तिथे दृष्टिभेट होऊन दोघांचे परस्परांवर प्रेम जडते.

एक शब्दही उच्चारला जाण्यापूर्वी हृदये दिली घेतली जातात.


पण बेटाच्या दुसऱ्या एका भागावर सेबॅस्टियनने व ॲन्टोनिओ राजाचा खून करण्याचे कारस्थान करीत असतात.तर कॅलिबन व गलबतातून आलेले काही दारूडे खलाशी प्रॉस्पेरोचा खून करू पाहतात.हे बेट मंतरलेले असल्याचे त्यांना माहीत नसते.हे पाहुणे ज्या जगातून आलेले असतात त्या जगातील अनीतिविषयक प्रचार व मूर्खपणा येथेही करू लागतात.तेव्हा सर्वज्ञ व सर्वशक्तिमान प्रॉस्पेरो त्यांचे सारे रानवट बेत हाणून पाडतो.राजाला व त्याच्याबरोबरच्या लोकांना त्यांनी केलेल्या अन्यायाबद्दल शासन करावे असे प्रॉस्पेरोला प्रथम वाटते.पण एरियल दैवी विचारांचा असल्यामुळे तो प्रॉस्पेरोला अधिक थोर दृष्टी देतो व सांगतो, "राजा, त्याचा भाऊ आणि तुझा भाऊ सारेच दुःखी व त्रस्त आहेत.

त्यांच्या दुःखाचा पेला काठोकाठ भरलेला आहे.त्यांना काय करावे हे समजेनासे झाले आहे.तुझ्या जादूचा त्यांच्यावर फार परिणाम झाला आहे.तू त्यांना पाहशील तर तुझेही हृदय विरघळेल.तुझ्या भावना अधिक कोमल होतील." यावर प्रॉस्पेरो विचारतो,"विद्याधरा,तुला खरेच का असे वाटते?" एरियल उत्तर देतो, "मी मनुष्य असतो,तर माझे हृदय विरघळले असते.माझ्या भावना कोमल झाल्या असत्या." तेव्हा प्रॉस्पेरो म्हणतो, "तू अतिमानूष आहेस.

जणू वायुरूप आहेस.तरीही जर तुला त्यांच्याविषयी इतकी सहानुभूती वाटते,तर मग मी मानव असल्यामुळे, त्यांच्याच जातीचा असल्यामुळे,मला का बरे वाटणार नाही? त्यांच्याप्रमाणेच मीही सुख-दुःखे भोगतो,मलाही वासनाविकार आहेत.मग मला माझ्या मानवबंधूविषयी तुला वाटतात,त्यापेक्षा अधिक प्रेम व दया नको का वाटायला ? त्यांनी केलेले दुष्ट अन्याय आठवून माझे हृदय जरी प्रक्षुब्ध होते.तरी माझ्यातल्या दैवी भागाने,उदात्त भावनेने मी आपला क्रोध जिंकीन व दैवी भागाशीच एकरूप होईन.एरियल,जा.त्यांना मुक्त कर."


टिमॉनने सिनेटरांजवळ काढलेले उद्गार व प्रॉस्पेरोचे हे एरियलजवळचे उद्गार त्यांची तुलना करा.म्हणजे मानवी अन्यायाकडे मानवी दृष्टीने पाहणे व अमानुष दृष्टीने पाहणे यातील फरक लक्षात येईल.


प्रॉस्पेरो अती मानुष आहे.शेक्सपिअरने किंवा सृष्टीने निर्मिलेला अत्यंत निर्दोष व सर्वांगपरिपूर्ण असा मानवी स्वभावाचा नमुना म्हणजे प्रॉस्पेरो. हा शेक्सपिअरच्या सृष्टीतील कन्फ्यूशियस होय. हृदयात अपरंपार करुणा व सहानुभूती असल्यामुळे नव्हे;तर त्याची बुद्धी त्याला 'क्षमा करणे चांगले' असे सांगते.म्हणून तो क्षमा करतो. ज्या जगात राहणे प्रॉस्पेरोस प्राप्त होते,त्या जगात भांडणे व द्वेष,मत्सर,महत्त्वाकांक्षा व वासनाविकार,फसवणुकी व अन्याय,वंचना व स्पर्धा,पश्चात्ताप व सूड यांचा सर्वत्र सुळसुळाट आहे! पण प्रॉस्पेरोसचे मन या जगातून अधिक उंच पातळीवर जाऊन,या क्षुद्र धुळीपलीकडे जाऊन विचार करू लागते.तो जीवनाची कठोरपणे निंदा करीत नाही.तो स्मित करतो व जरासा दुःखी असा साक्षी होऊनच जणू राहतो. त्या मंतरलेल्या बेटावर मिरांदाला आपल्या पित्याहून वेगळी आणखी माणसे दिसतात,तेव्हा ती आश्चर्यचकित होते.पिता वगळल्यास अन्य मानवप्राणी तिने आतापर्यंत पाहिला नव्हता. नवीन माणसे दिसताच ती एकदम उगारते, "काय आनंद! अहो, केवढे आश्चर्य! किती सुंदर ही मानवजात! किती सुंदर व उमदे हे जग. ज्यात अशी सुंदर माणसे राहतात!" पण प्रॉस्पेरो मुलीचा उत्साह व आनंद पाहून उत्तर देतो, "तुला हे जग नवीन दिसत असल्यामुळे असे वाटत आहे!" अनुभवाने त्याला माहीत झालेले असते की,या जगातील प्रत्येक प्राणी जन्मजात सैतान आहे. या सैतानांना कितीही उपदेश केला तरी तो 'पालथ्या घड्यावर पाणी' या न्यायाने फुकटच जातो. त्याचा कोणाही माणसावर विश्वास नसतो,तरी तो सर्वांगसुंदर प्रेम करतो. शेक्सपिअरने निर्मिलेल्या पात्रांपैकी प्रॉस्पेरो हे सर्वोत्कृष्ट आहे.एवढेच नव्हे,तर खुद्द शेक्सपिअरच जणू परमोच्च स्थितीतील प्रॉस्पोरोच्या रूपाने अवतरला आहे असे वाटते. प्रॉस्पेरोप्रमाणेच खुद्द शेक्सपिअरही एक जादूगारच आहे.

त्याने आपल्या जादूने या जगात पऱ्या,यक्ष,गंधर्व,किन्नर इत्यादी नाना प्रकार निर्मिले आहेत.भुतेखेते,माणसे वगैरे सर्व काही त्याने निर्मिले आहे.त्याने आपल्या जादूने मध्यान्हीच्या सूर्याला मंद केले आहे.तुफानी वाऱ्यांना हाक मारली आहे.खालचा निळा समुद्र व वरचे निळे आकाश यांच्या दरम्यान महायुद्ध पेटवून ठेवले आहे.पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत सर्वत्र रणांगण पेटवून ठेवले आहे.

शेक्सपिअरचा हुकूम होताच आत्मे जागृत होऊन थडग्यातून बाहेर पडतात.थडग्यांची दारे उघडतात! महान जादूगार! 


सर्जनाची परमोच्च स्थिती अनुभवून प्रॉस्पेरोप्रमाणेच शेक्सपिअरही मग आपली जादू गुंडाळून ठेवतो.

टेंपेस्टमध्ये परमोच्च कला प्रकटवून तो आपली जादूची कांडी मोडून टाकतो व आपली जादूची पोतडी गुंडाळून ठेवून नाट्यसृष्टीची रजा घेतो.मथ्थड डोक्याच्या मानवांना उपदेश पाजून,त्यांची टिंगल करून, त्यांचा उपहास करून दमल्यावर आता तो केवळ कौतुकापुरता साक्षी म्हणून दुरून गंमत पाहत राहतो.शेक्सपिअर अज्ञातच मेला! त्याची अगाध बुद्धिमत्ता,त्याची अद्वितीय प्रतिभा जगाला कळल्या नाहीत,पण जगाच्या स्तुतीची त्याला तरी कोठे पर्वा होती ?


२१.जुलै.२०२३ या लेखातील शेवटचा भाग..

२३/७/२३

हृदयस्पर्शी जगायला सांगणारी गोष्ट

बाहेर थोडा काळोख पडायला सुरुवात झाली होती कुंपणाच्या लोखंडी दरवाजा जवळून मला कोणीतरी बोलवत होते.कोण असेल बरे या उत्सुकतेने मी बाहेर गेलो.एक वयस्कर माणूस दरवाजाबाहेर उभा होता चुरगळलेले कपडे आणि हातातील पिशवी बघून तो खूप दूरवरून प्रवास करून आल्यासारखे वाटत होते. 


हातातील कागद बघून त्याने विचारले, "बाबू हा पत्ता आनंद आठवा रस्ता आहे का ?" होय मीच आनंद मी उत्तरलो. 


त्याचे ओठ थोडेसे थरथरले कोरड्या ओठावरून त्यांनी जीभ फिरवली व स्वतः जवळील पत्र माझ्याकडे देऊन ते म्हणाले,"बाबू मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे आपल्या गावाकडून आलो तुझ्या वडिलांनी मला हे पत्र दिले आणि तुझी मदत मागायला सांगितले आहे".


"माझ्या वडिलांनी" मी  पुटपुटलो आणि उत्सुकतेने पत्र वाचू लागलो.


प्रिय आनंद,अनेक आशीर्वाद हे पत्र घेऊन येणारी व्यक्ती माझा मित्र आहे त्याचे नाव रमय्या खूप कष्टाळू आहे.

काही दिवसापूर्वी त्याचा एकुलता एक मुलगा एका अपघातात मृत्यू पावला.नुकसानभरपाईसाठी तो सर्वत्र धावाधाव करतोय.आताच्या परिस्थितीत खर्चाची तोंड मिळवणी करण्यासाठी त्याला त्याची अत्यंत गरज आहे.

मी सोबत पोलिस पंचनामा आणि ईतर सर्व कागदपत्रे पाठवीत आहे.भरपाईची अंतिम रक्कम तुम्हाला कंपनीच्या मुख्य कार्यालयात मिळेल असे त्याला सांगितले गेले आहे.त्याची हैदराबादला येण्याची पहिलीच वेळ आहे आणि तो तेथे अनोळखी आहे.मला खात्री आहे की तू त्याला मदत करू शकशील तुझी काळजी घे,आणि शक्य तेवढ्या लवकर आम्हाला भेटायला ये ..


तुझे प्रिय बाबा. .


मी पत्र वाचत असताना रामय्या मला न्याहाळत होता क्षणभर विचार केला,आणि त्यांना आत बोलावले त्यांना पाणी देऊन त्यांनी काही खाल्लेले आहे का याची चौकशी केली."नाही, प्रवास थोडासा लांबला त्यांमुळे मी फक्त बरोबर आणलेली दोन केळी खाल्ली",रामय्या म्हणाले.


आत जाऊन मी चार डोसे तयार केले,आणि लोणच्या-

बरोबर त्यांना देऊन म्हटले,"तुम्ही खाऊन घ्या". मी बाहेर जाऊन काही फोन केले.मी परत आलो तोपर्यंत त्यांनी डोसे संपवले होते व हातात काही कागद घेऊन ते बसले होते. त्यांच्या हातात त्यांच्या मृत मुलाचा फोटो होता बहुतेक २२ वर्षांचा असावा माझे डोळे पाणावले. 


"हा माझा एकुलता एक मुलगा याच्या आधी जन्मलेले सर्वजण काही ना काही कारणाने देवाघरी गेले,त्याचे नाव महेश.तो चांगला शिकला आणि त्याला चांगली नोकरी मिळाली. मी सर्व अडचणींवर मात करीन आणि तुमची चांगली काळजी घेईन असे तो म्हणाला होता. त्या अमंगल दिवशी त्याला रस्ता ओलांडताना अपघात झाला आणि त्यातच जागच्या जागीच त्याचा मृत्यू झाला.

मुलाच्या मृत्यूची भरपाई म्हणून पैसे स्वीकारायला सुरुवातीला आम्ही नाखूष होतो,परंतु दिवसेंदिवस आम्ही दोघीही थकत चाललो आहोत,तुझे वडील मला म्हणाले तू हैदराबादला जा आणि त्यांनी मला हे बरोबर पत्र दिले,

ठीक आहे आता फार उशीर झालाय तुम्ही आराम करा.

असे सांगून मी देखील झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तयार झालो. कॉफी पिऊन बाहेर पडलो.वाटेतच थोडसं खाल्लं आणी ऑफिसच्या पत्त्यावर पोहोचलो.


"आनंद आता मी सर्व काम करीन तू तुझ्या ऑफिसला जा,रामय्या म्हणाले. "काही हरकत नाही मी आज रजा घेतली आहे.",मी उत्तरलो. त्यांच्याबरोबर राहून मी त्यांना भरपाईची सर्व रक्कम मिळवून दिली."मी तुझा खूप खूप आभारी आहे माझी पत्नी घरी एकटीच आहे, त्यामुळे मी लगेच परत जातोय."रामय्या म्हणाले. "चला मी तुम्हाला बस स्टैंड वर सोडतो.",मी त्यांना बस स्टँडवर आणले बसचे तिकीट काढून दिले प्रवासासाठी बरोबर काही फळे घेऊन दिली.त्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी कृतज्ञता दाटून आली होती. 


ते म्हणाले, "आनंद बाबू तुम्ही माझ्यासाठी रजा घेऊन मला खूप मदत केली.घरी गेल्यावर मी तुमच्या वडिलांना भेटून हे सर्व सांगीन व त्यांचेही आभार मानीन." 


मी त्यांचे हात हातात घेतले आणि म्हणालो, "मी तुमच्या मित्राचा मुलगा आनंद नाही. माझे नाव अरविंद आहे.काल तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आला होतात.त्या आनंदचे घर अजून दोन किलोमीटर लांब होते.तुम्ही आधीच खुप थकला होतात.तुम्हाला सत्य सांगायचे माझ्या जीवावर आले.मी पत्रावरील आनंद च्या नंबरवर फोन केला चौकशी केली.आनंदच्या पत्नीने सांगितले. की तो काही कामानिमित्त शहराबाहेर गेला आहे. मी तुमच्या मित्राला फोन करून हे सर्व सांगितले खूप दुःखी झाले.जेव्हा मी त्यांना सर्व मदतीचे आश्वासन दिले तेव्हा त्यांना बरे वाटले.

तुमचे नुकसान हे कधीही न भरून येणारे आहे.परंतु मला वाटले मी तुम्हाला मदत करावी,आणि मी ती केली.यामुळे मला फार समाधान लाभले." 


बस सुटताना रामय्या यांनी माझे हात आपल्या हातात धरले,त्यांचे डोळे कृतज्ञतेने पाणावलेले होते."परमेश्वर तुझे भले करो" त्यांचे निघतानाचे शब्द होते.


मी वर आकाशाकडे पाहिले.मला वाटले माझे वडील तिथेच कुठे तरी असले पाहिजेत. "बाबा तुम्ही रामय्याच्या रूपात माझा उत्कर्ष पाहायला आला होतात,का? मला पत्र पाठवून तुम्ही माझी परीक्षा घेत होतात का मी मदत करतोय की नाही हे पाहत होतात ? तुमच्या सारख्या थोर पुरुषाचा मुलगा म्हणून जन्म घेऊन मी माझे कर्तव्य बजावले आहे तुम्हाला आनंद झालाय ना ?" 

आनंदाश्रूंनी माझे डोळे भरून गेले .


दुसऱ्यांना मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवा.वाट आपोआप सापडेल.


अनामिक


परवाच कामावर निघालो होतो.पावसाने फार वाट बघायला लालली.व एकदाचा वाजत गाजत आला.

अखंडपणे पाऊस पडत होता.त्या पावसामध्ये एक व्यक्ती एका गाडीतून उतरली.कामावर जाण्यास उशीर झाला होता.मेनन रिंग कंपनीच्या पुढे त्यांना जावे लागणार होते,वेळ झालाच होता.मला काय वाटले कोणास ठाऊक मी त्यांना पाहून कोणत्याही पूर्वपरवानगी शिवाय गाडी थांबवली,बसा म्हणालो.काही क्षण गेले व ते म्हणाले,

धन्यवाद देवासारखे धावून आलात.मी म्हणालो आपण अगोदर माणूस बनूया देव ही फार पुढची गोष्ट आहे.


जो माणूस 'अधिक' चांगले होण्यासाठीचे प्रयत्न थांबवितो तो माणूस 'चांगले' होणे देखील थांबवितो.ऑलिव्हर क्रॉमवेल - ब्रिटिश राजकारणी व सैनिक (1599-1558)


ते म्हणाले माझी गाडी बंद पडली आहे.दुरुस्ती

साठी मिस्त्री जवळ लावून आलो आहे.मी 'दररोज' कुणीही हात केला तरी त्या मानसाला गाडीवरून घेवून जातो.मी त्यांचे आभार मानले. व हे चांगुलपणाचे काम नेहमीच करा,असे सांगितले.तुम्ही जे काम करता त्या कामाची प्रतिक्रिया म्हणजेच मी तुम्हाला हात न करताही गाडीवरुन घेवून आले.कारण मी 'दररोज' कुणालाही गाडीवर घेत नाही. कारण घर जवळच आहे.या कारणाने पण तुम्हाला पाहून तुम्हाला पाहून गाडीवर घ्यावे.हे मला मनापासून वाटले.हाच तुमचा चांगुलपणा सो .. लगे..रहो.!


कंपनीच्या गेटबाहेर गाडी थांबवून त्यांना उतरले.गाडी पार्किंगमध्ये लावली.मनापासून या गोष्टींचे चिंतन करतच होतो.तेवढ्यात लिओ टॉल्स्टॉय न चुकता म्हणालेत.


जर तुम्हाला वेदना होत असतील तर तुम्ही जिवंत आहात.जर तुम्हाला इतर लोकांच्या वेदना जाणवत असतील तर तुम्ही माणूस आहात.


विजय कृष्णात गायकवाड





२१/७/२३

नवसृष्टी निर्माता शेक्सपियर

एक लाख वर्षांपर्यंत निसर्ग मानवाचे निरनिराळे नमुने बनवीत होता,मानवांवर प्रयोग करीत होता. शेवटी १५६४ साली सर्व संमीलित ज्ञान एकत्र ओतून निसर्गाने एक मूर्ती जन्माला घातली,ती शेक्सपिअर ही होय.


या जगात अनेक अनाकलनीय गूढे असतात. शेक्सपिअरसारख्यांची अलौकिक बुद्धी हे एक गूढच आहे.शेक्सपिअरचे आईबाप सामान्यांहून सामान्य होते.त्याच्या पित्याला स्वत:ची सहीही करता येत नसे.तो मोजे विणी,लोकर पिंजी,तो एका अज्ञात कुटुंबात जन्मला.आकाशात तेजाने तळपला;त्याच्या वंशात पुन्हा पुढे कोणीही चमकले नाही.शेक्सपिअरच्या पूर्वी आणि नंतरही त्याचे कूळ अज्ञातच होते.त्याला तीन मुली होत्या.त्यांपैकी दोघी दहा जणींसारख्या होत्या; पण तिसरी मात्र अगदीच अडाणी होती.


शेक्सपिअर म्हणजे निसर्गाची एक लहर होती. निसर्गाच्या हातून ही व्यक्ती नकळत जन्माला घातली गेली.तो मानवांत अती मानुष,देव होता. त्याच्या मनाची खोली कार्लाइललाही कळली नाही;जॉर्ज ब्रँडिसनेही त्या कामी हात टेकले आणि कोणाही टीकाकाराला तिचा अंत लागणार नाही,असे म्हणण्याचे धाडस मी करतो. शेक्सपिअर समजून घेणे म्हणजे सृष्टीचे गुंतागुंतीचे गूढच समजून घेणे होय.जीवनाचा हा जो विराट खेळ चालला आहे,जीवनाचे हे जे विराट नाटक चालले आहे,तेच शेक्सपिअरने थोडक्यात आपल्या नाट्यसृष्टीत निर्मिले आहे.त्याची नाटके म्हणजे सृष्टीची प्रतिनिर्मिती आहे. 


अमेरिकन कवी व तत्त्वज्ञानी संतामना एका सुनीतात म्हणतो,"शेक्सपिअरला निर्मून ईश्वराने सृष्टी दुप्पट केली."


शेक्सपिअरला जणू देवाची बुद्धी व देवाची भाषा लाभल्या होत्या!पण बाह्यतः मात्र त्याचे जीवन अगदी निराळे होते.

या कविसम्राटाचे जीवन जगातील अत्यंत नीरस जीवनासारखे होते.वयाच्या चौदाव्या वर्षी तो एका खाटकाजवळ उमेदवार म्हणून राहिला.त्याच्या वयाच्या अठराव्या वर्षी सव्वीस वर्षाच्या एका बाईने त्याला किंवा त्याने तिला मोह पाडला.तिचे नाव ॲन हॅथावे.तिच्याशी लग्न झाल्यावर लवकरच स्वतःचे स्ट्रॅटफर्ड गाव त्याला सोडावे लागले. कारण हरणे चोरण्याच्या आरोपावरून त्याला अटक होणार होती.लंडनला आल्यावर तो रंगभूमीकडे वळला.तो सतरा वर्षे नाटके लिहीत होता.

नाटकात बारीकसारीक कामेही तो करी. रंगभूमीवर काम करण्याबाबत तो उदासीन होता. आपली सारी नाटके छापून काढावीत,असे त्याला कधीही वाटले नाही.धंद्यात त्याने कमाई केली व तो थोडीफार सावकारी करू लागला.ऋणकोंनी वेळेवर पैसे न दिले तर तो फिर्याद करी तो दरसाल एकदा कुटुंबीयांना भेटावयास जाई.


आयुष्याच्या अखेरीस त्याने स्टॅटफर्ड येथे एक घर विकत घेतले व तिथे तो मरेपर्यंत एखाद्या सुखवस्तू गृहस्थाप्रमाणे राहिला.रंगभूमीवरील काम करणारे वागत,तसाच तोही वागे.ते वागणे मोठेसे सुसंस्कृत अगर सदभिरुचीला पोषक होते असे मुळीच नव्हे. एकदा तर त्याने इतकी दारू घेतली की,तो रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली झिंगून पडला! प्रेमाची विफलताही त्याने अनुभविली होती.तो आपल्या एका सुनीतात लिहितो,"माझी प्रियकरीण जेव्हा 'मी सत्यनिष्ठ आहे' असे सांगते,तेव्हा मी तिच्यावर विश्वास ठेवतो;पण ती खोटे बोलत आहे हे मला ठाऊक असते."नारीजनांना आकर्षण वाटेल असा पुरुष तो नव्हता,पण कधीकधी आपल्या प्रतिस्पर्थ्यांना तो प्रेमस्पर्धेत जिंकी.त्याचे कौटुंबिक जीवन सुखाचे नव्हते.ते वादळी होते.मरेपर्यंत त्याची पत्नी त्याला सतावीत होती. त्याने आपल्या मृत्यूपत्रात तिला केवळ आपला एक भिकार बिछाना चांगला होता तो मात्र ठेवला.थोडक्यात त्याची जीवनकथा ही अशी आहे.पण या हकिकतीने त्याच्या मनाचा थांग लावून घेण्यास प्रकाश मिळत नाही.मनुष्य या दृष्टीने त्याच्याच नाट्यसृष्टीतल्या कॅलिबन नावाच्या पात्राहून फार फार तर थोड्या उच्च दर्जाचा तो होता,असे म्हणता येईल.कॅलिबन हा अत्यंत क्षुद्र वृत्तीचा व क्षुद्र वासनाविकारांत लडबडलेला असा दाखविण्यात आला आहे.पण मानवजातीचा शिक्षक या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहिल्यास तो पृथ्वीवरच नसून स्वर्गातील आहे,असे वाटते.तो अती मानुष वाटतो.क्षुद्र मनाच्या या मानवात तो चुकून जन्माला आला असावा,असे वाटते.


जगातील अत्यंत प्रतिभासंपन्न प्रज्ञावंतांनी शेक्सपिअरच्या बुद्धीचे मोजमाप करण्याची खटपट केली,त्याची विचारसृष्टी तर्कदृष्टीने मांडून दाखविण्याची त्यांनी पराकाष्ठा केली.पण तो खटाटोप यशस्वी झाला नाही.

टीकाकार त्याला रोमन कॅथॉलिक म्हणतात.कोणी त्याला नास्तिक म्हणतात,कोणी देशभक्त मानतात,तर कोणी युद्धविरोधक मानतात.कोणी त्याला प्रवचनकार समजतात,तर कोणी त्याला सिनिक म्हणजे कशातच अर्थ नाही,असे म्हणणारा मानतात. कोणी त्याला मानव्यवादी म्हणतात,तर कोणी 'संशयात्मा' म्हणतात.कोणी त्याला राजांचा बडेजाव करणारा म्हणतात.वस्तुतः तो यापैकी काहीच नव्हता;पण असे असूनही तो सारे काही होता असे विरोधाभासाने म्हणावे लागते.! कोणाही एका मनुष्याचे वा मानवसंघाचे जे विचार अगर त्याच्या ज्या कल्पना असू शकतील, त्यांच्यापलीकडे शेक्सपिअरचे विचार व कल्पना जात.तो विचारसिंधू होता,कल्पनाविश्वंभर होता. तो जे जे पात्र निर्मी,त्याच्या त्याच्या जीवनाशी तो तितक्याच प्रेमाने व सहानुभूतीने मिळून जाई. कॅलिबानशी तो जितका एकरूप होई,तितकाच प्रॉस्पेरोशीही.शेक्सपिअरची मनोबुद्धी मानवजातीच्या मनोबुद्धीला व्यापून राहिलेली होती,तिजशी एकरूप झाली होती.शेक्सपिअरचे पृथक्करण करण्याचा प्रयत्न मी करणार नाही, किंवा त्याची विचारसृष्टी विवरूनही सांगणार नाही.कारण,असा प्रयत्न करणे निरुपयोगी आहे. पण मी त्याच्या विशाल मनोभूमीच्या कोपऱ्यात शिरून पाहणार आहे.त्याच्या अनंत बुद्धीच्या सागरात बुडी मारून पेलाभर शहाणपण मिळाले,तर मी आणणार आहे.या दृष्टीने शेक्सपिअरच्या तीन नाटकांकडे आपण जरा नजर टाकू या.पहिल्या नाटकात तो उपहास करणारा दिसतो,दुसऱ्यात केवळ ऐहिकदृष्टीचा दिसतो,तिसऱ्यात तत्त्वज्ञानी दिसतो.कोणती बरे ही तीन नाटके? टिमॉन ऑफ अथेन्स,हॅम्लेट,

टेंपेस्ट.


'टिमॉन ऑफ अथेन्स' या नाटकात एखाद्या ज्यू प्रेषिताप्रमाणे जगातील अन्यायांविरुद्ध तो गर्जना करतो व शिव्याशाप देतो.दुसऱ्या नाटकात तो फक्त जीवनाचे प्रतिबिंब दाखवितो,नीतीचे पाठ देत बसत नाही.जेव्हा कधी त्या वेगाने जाणाऱ्या नाट्यक्रियेत मध्येच क्षणभर जीवनावरील टीकेचे एखादे वाक्य उच्चारण्यासाठी तो थांबतो,तेव्हा जणू काय दुसऱ्या एखाद्या गोलावरून उतरलेल्या माणसाप्रमाणे या जगाला क्षुद्र व तुच्छ समजून तो फेकून देतो.!या जगाला तो फार महत्त्व देत नाही.हे जग म्हणजे मूर्खाची कथा,फुकट आदळआपट व आरडाओरड, निरर्थक पसारा असे म्हणून तो निघून जातो.पण या 'टिमॉन ऑफ अथेन्स' नाटकात जगाबद्दलचा त्याचा तिरस्कार,क्रोध ज्वालेत परिणत झालेला दिसतो.जीवन ही मूर्खाने नव्हे;तर कपटपटू सैतानाने सांगितलेली कथा असे येथे वाटते. आणि जग निरर्थक न वाटता द्रोह,नीचता,द्वेष, दंभ,कपट यांनी भरलेले दिसते.टिमॉन हा अथेन्समधील एक श्रीमंत मनुष्य आहे.तो उदारपणामुळे आपली सर्व संपत्ती मित्रांना वाटून टाकतो.त्यांना तो कधी नाही म्हणत नाही. मित्रांना त्यांच्या सावकारांचा तगादा लावला की तो त्यांचे कर्ज फेडून टाकी,मित्रांची लग्ने होत, तेव्हा त्यांना आंदण देई.त्याचा नवा संसार मांडून देई,तो त्यांना मेजवानीस बोलावी व जाताना देणग्या देई,हिरे- मोती देई.त्याचा कारभारी फ्लॅव्हियस 'हे औदार्य अखेर तुम्हाला धुळीला मिळवील' असे सांगतो.पण आपली संपत्ती संपणार नाही व आपले मित्र कृतज्ञ राहतील, टिमॉनला वाटते.फ्लॅव्हियसच्या सांगण्याकडे तो लक्ष देत नाही व शेवटची दिडकी संपेपर्यंत दुसऱ्यांना देतच राहतो.अखेर तो कर्जबाजारी होतो. त्याचे सावकार त्याला सतावू लागतात.ज्या मित्रांना आपण आपले सर्वस्व दिले,ते आपल्या संकटकाळी धावून येतील.असे त्याला वाटते.पण एकामागून एक सारे त्याला सोडून जातात;प्रत्येक जण निरनिराळ्या सबबी सांगतो व मदत नाकारतो.पुन्हा एकदा टिमॉन त्या सर्वांना मेजवानीस बोलावतो व त्यांच्यासमोर केवळ कढत पाण्याचे पेले ठेवतो.पण त्या वेळेपर्यंत आपणास त्याचे मित्र म्हणविणारे ते आश्चर्यचकित होऊन काही बोलण्याच्या आधीच तो ते कढत पाणी त्यांच्या तोंडावर व ताटे त्यांच्या अंगावर फेकतो व त्यांना घालवून देतो.


या स्वार्थी जगात निःस्वार्थीपणा म्हणजे मूर्खपणा असे तो शिकतो.जग काय हे त्याला नीट समजते.तो अथेन्स शहर सोडून जंगलातील गुहेत राहायला जातो.तिथे त्याला 'अत्यंत निर्दय पशूही माणसांहून अधिक दयाळू आढळतात. आपल्या गुहेसमोर तो कंदमुळांसाठी खणीत असता त्याला अकस्मात एक ठेवा 'पिवळा - गुलाम' - पिवळे सोने सापडते;मानवजातीला गुलाम करणारे व मानवजातीचे गुलाम असणारे सोने पाहून त्याला त्याचा तिटकारा वाटतो व तो ते पुन्हा मातीत पुरून टाकतो.पण काही नाणी मात्र कोणी मानवी प्राणी त्रास द्यावयास आले तर त्यांना देण्यासाठी म्हणून तो वर ठेवतो.


टिमॉनला सोने सापडल्याची गोष्ट अथेन्समधील लोकांना कळते व एकामागून एक ते त्याच्या गुहेकडे येतात.कवी,चित्रकार,योद्धे,वेश्या,भिकारी,डाकू,सारे येतात.पुन्हा एकदा टिमॉनची मैत्री जोडण्यासाठी ते उत्सुक होतात.तो प्रत्येकाला मूठ,दोन मुठी नाणी देतो.

एखाद्या संतप्त व तिरस्कार करणाऱ्या देवाप्रमाणे तो त्यांना म्हणतो, "जा,चालते व्हा,तुमच्या शहरात जा व हे द्रव्य पुजून ठेवा,नाही तर सूकरवत् चाललेल्या तुमच्या सुखोपभोगात खर्च करा." काही चोरांना तो द्रव्य देतो व म्हणतो,"जा,लुटा एकमेकांना,म्हणजे अधिक मिळेल.कापा गळे. जे तुम्हाला भेटतील ते सारे चोरच आहेत.जा अथेन्स शहरात व फोडा दुकाने.ज्यांचे लुटाल तेही चोरच ! चोर चोरांना लुटू देत.सारेच चोर !" हे सारे जग टिमॉनला डाकूंची गुहा वाटते.पण एक अपवाद मात्र असतो,तो म्हणजे त्याचा कारभारी फ्लॅव्हियस.तो आपल्या धन्याच्या दुःखात भागीदार असतो.फ्लॅव्हियस म्हातारा झालेला असतो.तो जेव्हा धन्याजवळ येतो, त्याला भक्तिप्रेम दाखवितो व रडतो,तेव्हा टिमॉन म्हणतो,"जगात अद्यापि थोडी माणुसकी आहे. या जगात एक फक्त एकच प्रामाणिक मनुष्य आहे.पण फक्त एकच हो! माझे म्हणणे नीट लक्षात घ्या.एकच,अधिक नाही;व तो म्हणजे हा माझा वृद्ध कारभारी." पण तो फ्लॅव्हियसला म्हणतो, "तू फसशील हो! इतके चांगले असणे बरे नव्हे. तू प्रामाणिक आहेस;पण शहाणपणात कमी दिसतोस.तू मला फसवून व छळून दुसरी चांगली नोकरी मिळवू शकशील.आपल्या पहिल्या धन्याच्या मानेला फास लागला,म्हणजे शहाणे नोकर दुसरा धनी मिळवितात.जगाची तर ही रीतच आहे.तू वेडाच दिसतोस.'


शेक्सपिअर खालच्या वर्गातील लोकांना तुच्छ मानतो,असा त्याच्यावर एक आरोप आहे. टीकाकार म्हणतात, "अशांविषयी शेक्सपिअरला सहानुभूती वाटत नसे. तो त्यांच्याबद्दल नबाबी तिरस्काराने व तुच्छतेने बोलतो.काटक्याकुटक्या,दगडधोंडे,यांच्याहून त्यांची किंमत अधिक नाही असेच जणू तो दाखवितो." अशा 'टीकाकारांना शेक्सपिअरच्या मनाची विश्वव्यापकता कळत नाही.'अथेन्सचा टिमॉन' या नाटकात शेक्सपिअरने अथेन्समधील जी मानवसृष्टी उभी केली आहे,तीत त्याचे अत्यंत प्रेमळ पात्र जर कोणते असेल,तर ते टिमॉनच्या गुलामाचे फ्लॅव्हियसचे होय.टीकाकारांच्या तत्त्वज्ञानात जितकी सहानुभूती असेल,त्यापेक्षा अपरंपार अधिक सहानुभूती शेक्सपिअरच्या अनंत मनात आहे.जीवनाकडे प्रत्येक दृष्टिकोनातून पाहणारा शेक्सपिअरसारखा द्रष्ट दुसरा झाला नाही. प्रसंगविशेषी तो शेलेप्रमाणे क्रांतिकारक होऊ शके,हीनप्रमाणे कडवट व कठोर होऊ शके, तसाच युरिपिडीसप्रमाणे निराशावादी तर बायरनप्रमाणे निस्सारवादी (सिनिक) ही होऊ शके.

स्विनबर्गप्रमाणे तो मायेतून पाहणारा होई, तर गटेप्रमाणे तत्त्वज्ञानीही होई;टेनिसनप्रमाणे तो आशावादी आणि शांतपणे शरणागती स्वीकारणारा,जे आहे ते चांगलेच आहे असे मानणाराही होई.जीवनाकडे नाना रंगांच्या चश्म्यांतून पाहणारा हा महाकवी आहे.याची दृष्टी एकांगी नाही.

'अथेन्सचा नागरिक टिमॉन' या नाटकात निराशेच्या काळ्या चष्म्यातून तो पाहत आहे.जगात कशातही सार नाही,सारा चौथा, सारे निःसार,घाण! टिमॉनचा एक मित्र अल्सिबिआडीस म्हणून असतो.(मानवजातीची कथा-हेन्री थॉमस)तो अथेन्स शहर वाचवू पाहतो;पण त्याला हद्दपारीचे बक्षीस मिळते! अल्सिविआडीस रागाने सैन्य उभारून आपला अपमान करणाऱ्या मातृभूमीवरच चालून येतो तेव्हा सीनेटर घाबरतात.ते सारे टिमॉनकडे जातात व म्हणतात, "अथेन्स संकटात आहे.या वेळेस तू ये." पण टिमॉन त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देत नाही.तो शक्य तेवढे सारे शिव्याशाप त्यांना देतो.पण शेवटी त्याच्या मनात एक विचार येतो.तो म्हणतो, "अल्सिबिआडीसच्या हातून मरण येऊ नये असे वाटत असेल तर एक गोष्ट मी करू शकेन." आणि मग तो म्हणतो,"माझ्या शेजारीच एक झाड आहे.

मला ते माझ्यासाठी कापावे लागणार आहे.मी ते तोडणारच आहे. पण अथेन्समधील माझ्या मित्रांना... साऱ्या अथेन्सलाच खालपासून वरपर्यंत रावापासून रंकापर्यंत सर्वांना माझा हा निरोप सांगा,ज्यांना ज्यांना येणारे संकट टाळायचे असेल,ज्यांना ज्यांना आपली दुःखे थांबवायची असतील, त्यांनी त्यांनी येथे त्वरेने धावून यावे.माझ्या कुऱ्हाडीने झाड पडण्यापूर्वीच या झाडावर त्यांनी स्वतःला टांगून घ्यावे."


आपल्या विषारी तिरस्काराचा शेवटचा बाण शहराकडे परतणाऱ्या त्या आपल्या नगरबंधूंवर सोडून टिमॉनने स्वतःचे थडगे खणले.तेथील खारट पाण्याच्या प्रवाहाजवळ त्याने खड्डा खणला व स्वतःचे विषण्ण जीवन संपविले. मातीतील,पृथ्वीच्या पोटातील कृतज्ञ किड्यांना मेजवानी देणेच अधिक चांगले.पृथ्वीवर चालणारा व्दिपाद मानवी पशुंपेक्षा पृथ्वीच्या पोटातले किडे व जीवजंतू किती तरी चांगले..


उर्वरित भाग पुढील लेखामध्ये



१९/७/२३

नेहमीच भल्याचा विचार करा..

जेव्हा मी लहान होतो,त्यावेळेस मी खूप स्वार्थी होतो.

आणि स्वतःसाठी उत्तमोत्तम गोष्टी हिसकावून घेत होतो.

हळू हळू सर्वजण माझ्यापासून दूर होत गेले आणि मला एकही मित्र राहिला नाही.माझ्या वडिलांनी माझ्या जीवनात मदत व्हावी म्हणून मला तीन गोष्टींची शिकवणूक दिली.एके दिवशी माझ्या वडीलांनी दोन वाट्या नूडल्स केले आणि नूडल्सच्या दोन्ही वाट्या टेबलावर ठेवल्या.एका वाटी मधील नूडल्स वर एक अंडे ठेवले होते व दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. त्यांनी मला सांगितले, "बेटा,तुला कोणती वाटी हवी आहे ती तू  घेऊ शकतो."


 त्यावेळी अंडे मिळणे कठीण होते.!आम्हाला केवळ सणासुदीच्या दिवशी किंवा नवीन वर्षाच्या दिवशीच फक्त अंडे खायला मिळत असे. 


म्हणूनच मी ज्या वाटीत अंडे होते ती वाटी निवडली.!आम्ही जेवण करायला सुरुवात केली,तेव्हा मी स्वतःला खूप बुद्धिमान समजून स्वतःला शाबासकी देत अंडे खाण्यास  सुरुवात केली. 


जेव्हा माझ्या वडिलांनी नूडल्स खाणे सुरू केले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांच्या वाटीत नूडल्सच्या खाली दोन अंडी होती.! तेव्हा मला खूपच पश्चात्ताप झाला.मी निर्णय घेण्यास खूप घाई केली म्हणून मी स्वतःला दोषी मानू लागलो.माझे वडील हसले आणि त्यांनी मला सांगितले,"बाळा,नेहमी लक्षात ठेव जसे दिसते तसे खरेच असते असे नाही.जर तुमची वृत्ती लोकांचा फायदा घेण्याची असेल तर नुकसान तुमचेच आहे.शेवटी तुमची हारच होईल."


 दुसऱ्या दिवशी,माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले.एका वाटीत वर एक अंडे होते आणि दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते.पुन्हा त्यांनी त्या दोन वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या व मला सांगितले,"बाळा,तुला जी वाटी हवी असेल ती घे."


ह्यावेळी मी जरा हुशारी दाखवली!मी अंड नसलेली वाटी निवडली.मला फार आश्चर्य वाटले जेव्हा मी नूडल्सला वर खाली हलवले तेंव्हा त्यात एकही अंडे नव्हते.


 पुन्हा माझे वडील हसले आणि मला म्हणाले, "बाळा,तू नेहमी आपल्या आधीच्या अनुभवावर विश्वास ठेवता कामा नये.कारण जीवनात खूप अनिश्चितता असते.कधी कधी,जीवन तुम्हाला धोका देऊ शकते किंवा तुमच्याशी कुणी कपट करू शकतो.अशा अनुभवाने तुम्ही नाराज किंवा दुःखी होता कामा नये,फक्त तो अनुभव एक शिकवणूक म्हणून स्वीकारला गेला पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे.या गोष्टी तुम्ही पुस्तके वाचून शिकू शकणार नाही."


तिसऱ्या दिवशी,माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले,एका वाटीच्या वर एक अंडे होते आणि दुसऱ्या वाटी वर एकही अंडे नव्हते.त्यांनी दोन्ही वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या आणि मला सांगितले,"बाळा,तू निवड आता तुला कुठली वाटी हवी आहे?"


 या वेळी मी माझ्या वडिलांना सांगितले की,"आधी तुम्ही घ्या कारण तुम्ही घरातील प्रमुख व्यक्ती आहात आणि कुटुंबासाठी तुम्ही खूप योगदान दिले आहे."


माझ्या वडिलांनी नाही म्हटले नाही व ज्या वाटीवर एक अंडे ठेवले होते ती वाटी निवडली.जेव्हा मी माझ्या वाटीतील नूडल्स खाण्यास सुरुवात केली तेव्हा मला खात्री होती की माझ्या वाटीत अंडे निघणार नाही.परंतु जेव्हा माझ्या वाटीत दोन अंडी निघाली,तेव्हा मी खूपच आश्चर्यचकित झालो.!


माझ्या वडिलांनी  प्रेमपूर्वक माझ्याकडे पाहून हसून मला सांगितले,"माझ्या बाळा,हे कधीही विसरु नकोस की तू जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याचा विचार करतोस,तेव्हा तुमच्याबाबतीत ही नेहमी चांगलेच होते!"


मला माझ्या वडिलांची ही तीन वाक्ये नेहमी आठवतात आणि मी त्यानुसार माझा व्यवहार आणि उद्योग करतो.हे खरेच आहे,की मला माझ्या उद्योगात त्यामुळेच सफलता मिळाली आहे.


एक यशस्वी उद्योजक नारायण मुर्ती..