* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२/८/२३

हसणारा व्हॉल्टेअर..

आपल्याच हाताने मानेला फास लावून घेऊन आत्महत्या करण्यासाठी पाळी येऊ नये.म्हणून हसणारा व्हॉल्टेअर हा रिस्टोफेन्स व रॅबेल्स, ल्यूथर व सैतान या सर्वांचे अजब मिश्रण होता. त्याची प्रतिमा व त्याची बुद्धी या परस्पर

विरोधी गुणांनी बनल्या होत्या.तो मानवजातीचा तिरस्कार करी.पण मानवांवर त्याचे प्रेमही असे. तो धर्मोपदेशकांची टर उडवी,तरीपण त्याने आपले एक पुस्तक पोपला अर्पण केले आहे. राजा महाराजांची तो हुर्रेवडी उडवी,तरीपण त्याने फ्रेडरिक दि ग्रेटने दिलेले पेन्शन स्वीकारले. त्याला धर्मांधपणाची चीड असे;पण ज्यूंच्या बाबतीत तो अनुदार होता.संपतीजन्य ऐटीचा तो उपहास करी,तरी त्याने स्वतः मात्र पुष्कळ धनदौलत मिळवली व तीही सगळीच काही प्रामाणिकपणे मिळवली नाही.ईश्वरावर त्याचा विश्वास नव्हता,तरी तो जन्मभर ईश्वराचा शोध करीतच होता.

त्याला धर्माबद्दल आदर नसे,पण त्याने हास्याच्या आनंदाचा नवाच धर्म निर्मिला.


जगातल्या थट्टा व टिंगल करणाऱ्यांचा तो राजा होता.हे जीवन म्हणजे एक मोठे हास्यरसोत्पादक नाटक आहे,असे तो मानी.तो लोकांना म्हणे, "जीवन हा फार्स समजा आणि मिळवता येईल तितकी गंमत मिळवा." जीवन चांगल्या रीतीने जगता यावे,अनुभवता यावे,त्यातील गंमत मिळवता यावी म्हणून अज्ञान,अन्याय,रूढी व युद्धे ही सर्व नष्ट करून टाकली पाहिजेत.या दुष्ट वस्तू जीवनाची ट्रेजिडी करून टाकीत असतात. या दूर केल्या तरच जीवन हे एक कॉमेडी होईल.दुसऱ्या शब्दात हेच सांगायचे तर असे म्हणता येईल की,व्हॉल्टेअरने लोकांना विचार कसा करावा हे शिकवले.तो म्हणे,'राष्ट्र एकदा विचार करायला लागले म्हणजे मग त्याला थांबवणे अशक्य होईल.' तो स्पायनोझापेक्षा कमी चारित्र्यवान होता.तरी त्यानेच जगावर त्या ज्यू तत्त्वज्ञान्यांपेक्षा अधिक परिणाम-सुपरिणाम केला.तो व्यवहार्य गोष्टींवरच लिही व तेही लहान मुलांनासुद्धा समजावे,अशा भाषेत.त्याच्या संशयवादी तत्त्वज्ञानामुळे डायनॅमाइटवर ठिणगी पडली व असा प्रचंड भडका उडाला की,राजांचे दंभ व धर्मातील भोळसट रूढी यांचे भस्म झाले. जुन्या जगाचा पाया त्याने उडवून टाकला व नव्या जगाचा पाया घालण्यासाठी बाव करून दिला. 


त्याचे सारे जीवन म्हणजे विरोधाभास होता.तो जन्मताच त्याची आई मेली.२१ नोव्हेंबर १६९४ रोजी तोही मरणार असे वाटले,पण तो जगला. त्याची प्रकृती नेहमी मरतुकडी होती.तरीही तो त्र्याऐंशी वर्षांचा होईतो वाचला.जेसुइट स्कूल मध्ये शिकून तो ग्रॅज्युएट झाला.त्याने जेसुइटांचे सारे वर्चस्व झुगारून दिले.त्याचे शरीर हाडांचा नुसता सांगाडा होता.त्याचे नाक लांब होते,त्याचे डोळे बारीक पण तेजस्वी होते.तो पॅरिसमधला सर्वांत कुरूप तरुण होता.तरीही तो साऱ्या स्त्रियांचा लाडका होता.त्या त्याला जणू देव मानीत.तो कपटी व उपहास करणारा होता.त्याचे खरे नाव फ्रँकॉइस मेरी अरोट असे होते.पंधराव्या लुईच्या रीजंटचा अपमान केल्याबद्दल बॅस्टिलच्या तुरुंगात शिक्षा भोगीत असता त्याने नाव बदलून व्हॉल्टेअर हे नाव घेतले.अकरा महिन्यांचा तुरुंगवासात त्याने नाव्हेरचा राजा हेन्री याच्यावर महाकाव्य लिहिण्यात वेळ खर्चिला. तुरुंगातून सुटला तेव्हा तो तेवीस वर्षांचा होता.त्याचा बाप व्यवहारचतुर होता.त्याने त्याला तीन गोष्टींबाबत सावध राहण्यास सांगितले,वाड् मय स्त्रिया व जुगार.शाळेत असता तो जेसुइटांचे मनापासून ऐके..त्याचप्रमाणे त्याने बापाचा हा उपदेश लक्षपूर्वक ऐकला.पण जेसुइटांच्या शिकवणीप्रमाणेच बापाचीही शिकवण तो पुढे विसरला.

त्याने काही नाटके लिहिली व ती यशस्वी ठरली.त्याला पैसे बरे मिळाले.वॉलस्ट्रीटमधील एखाद्या ब्रोकरप्रमाणे त्याने आपले पैसे मोठ्या हुशारीने गुंतवले.फ्रेंच सरकारने काढलेली लॉटरीची सारी तिकिटे एकदा व्हॉल्टेअरने घाऊकरित्या खरेदी केली. मॅनेजरच्या हे लक्षातच न आल्यामुळे सारी बक्षिसे व्हॉल्टेअरला मिळाली.


तो तत्त्वज्ञानी तसाच व्यावहारज्ञही होता.सूक्ष्म विचार करणारा व धंद्यात हुशार असा पुरुष क्वचितच आढळतो.

व्हॉल्टेअरची बुद्धी मोठी विलक्षण होती.तत्त्वज्ञानातील अमूर्त व सूक्ष्म विचार तो प्रत्यक्ष व्यवहाराशी बेमालूम मिसळी. मूर्त- अमूर्त दोहोंतही त्याची बुद्धी सारखीच खेळे.व्यवहार्यता व सूक्ष्म अमूर्ततता दोन्ही त्याच्या ठायी होत्या.इतर नाना उलाढाली करूनही त्याला पॅरिसमधील प्रतिष्ठित व रुबाबदार मंडळींत मिसळण्यास भरपूर वेळ असे.पॅरिसमधील बेछूट,स्वच्छंदी व विलासी जीवनाचा तो मध्यबिंदू होता.त्याच्याभोवती पॅरिसमधील प्रतिष्ठित नबाब व पंडित जमत. तत्त्वज्ञान,व्यवहार व या बैठकी अशा त्रिविध चळवळींचा त्याच्या बुद्धीवर ताण पडे व त्यामुळे त्याचे दुबळे शरीर थके.एकदा त्याला देवी आल्या.

डॉक्टरांना तो मरणार असे वाटले.पण तो नेहमीप्रमाणे बरा झाला व अधिकच उत्साहाने जीवनाच्या आनंददायी गोंधळात सामील झाला.पुन्हा या सुखी व विनोदी संसारात बुडी घेता झाला.त्याची प्रकृती यथातथाच होती.दुबळ्या प्रकृतीच्या जोडीला तिखट जिभेची आणखी एक अडचण असल्यामुळे त्याला नेहमी त्रास होई. एकदा तो म्हणाला, "जे वाटते ते स्पष्टपणे बोलणे हा माझा धंदा आहे." तत्त्वज्ञानक्षेत्रातच त्याचे विचार होते,तोपर्यंत सारे ठीक होते.पण माणसांविषयी आपणास काय वाटते हे तो सांगू लागला व विशेषत: सरदार जमिनदारांविषयी लिहू लागला,तेव्हा भानगडी सुरू झाल्या,त्रास होऊ लागला.एकदा त्याने लिहिलेले एक तिखट व झणझणीत वाक्य कॅव्हेलियर डी रोहन याला झोंबले.त्याचा अहंकार दुखावला गेला.त्याने काही गुंडांना व्हॉल्टेअरला चांगले चोपून काढावयास सांगितले.दुसऱ्या दिवशी व्हॉल्टेअरने त्या सरदाराला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले. व्हॉल्टेअरची तलवारही त्याच्या जिभेप्रमाणेच तिखट असेल असे त्या बड्या सरदाराला वाटले, म्हणून त्याने पोलिसांच्या मुख्याकडे संरक्षण मागितले.पोलीस अधिकारी त्याचा चुलतभाऊ होता.व्हॉल्टेअर याला पुन्हा बॅस्टिलच्या तुरुंगात अडकवण्यात आले.त्याची मुक्तता होताच त्याला फ्रान्समधून निर्वासित करण्यात आले.


तो इंग्लंडमध्ये गेला.या वेळी त्याचे वय बत्तीस वर्षांचे होते.तो तिथे तीन वर्षे राहिला.त्याचे मन देशकालातीत होते.इंग्लंडमध्ये त्याला घरच्या सारखेच वाटले.तो इंग्रजी भाषा चांगलीच शिकला.एका वर्षात त्याने शेक्सपिअर

खेरीज बाकी सारे साहित्य आत्मसात केले.पण शेक्सपिअर हे इंग्लंडचे सर्वोत्कृष्ट फळ होते.शेक्सपिअ-

रची मनोबुद्धी हा आनंदी तत्त्वज्ञानी समजू शकला नाही.

इंग्लंडातही मोठमोठ्या तत्त्वज्ञान्यांना उत्कृष्ट फ्रेंच मनोबुद्धी समजू शकत नसे.व्हॉल्टेअर शेक्सपिअरला 'जंगली' म्हणत असे आणि पुढे शंभर वर्षांनी कार्लाइलने व्हॉल्टेअरला जंगली म्हणून त्याचा सूड घेतला. पण भूतकाळातला महाबुद्धिमान शेक्सपिअर जरी व्हॉल्टेअरला जाणता आला नाही,तरी समकालीन इंग्रजांत त्याला बरेचसे अनुकूल मनोबुद्धीचे लोक भेटले.इंग्रजांचे विचारधैर्य पाहून त्याला आश्चर्य वाटे. इंग्रज लोक आपले विचार धैयनि मांडतात हे पाहून तो त्यांचे कौतुक करी,

व्केकरांशी त्याचा चांगला परिचय झाला. त्यांची शांतिमय मते त्याला लगेच पटली.तोही म्हणाला की,समुद्र ओलांडून आपल्याच बंधूंचे गळे कापायला जाणे हा केवळ मूर्खपणा होय. 'गाढवाच्या कातड्यात दोन काठ्या मारून आवाज होतो'आणि सारे मारामारीला धावतात.

स्विफ्टची व त्याची भेट झाली.त्या शतकातले सर्वांत मोठे असे दोन उपहासलेखक एकत्र बसले,बोलले,खरोखरच तो प्रसंग देवांनासुद्धा मोठ्या मेजवानीचा वाटला असता.

व्हॉल्टेअरची 'छोटामोठा' ही मनोरम कथा 'गलिव्हर्स ट्रॅव्हल्स' पासूनच स्फूर्ती मिळून लिहिली गेली असावी. स्विफ्टच्या उपहासातील तिखटपणाइतका तिखटपणा व्हॉल्टेअरमध्ये नसे,व्हॉल्टेअरची लेखणी गुदगुल्या करी.

स्विफ्टची लेखणी भोसकी.पण व्हॉल्टेअरची प्रतिभा अधिक समृद्ध व श्रीमंत होती.छोटामोठा - मायग्नोमेगस हा सिरियस बेटाचा रहिवासी होता.तो पाच लक्ष - फूट उंच होता. त्याला शनीवरचा एक अगदीच लहान,केवळ पंधराच हजार फूट उंच गृहस्थ भेटतो. उभयता अनंत अवकाशातून भ्रमंती करण्यासाठी बाहेर पडतात.

सॅटर्नियनचे ( शनीवरील गृहस्थाचे) लग्न नुकतेच झालेले असते.त्याची पत्नी त्याला जाऊ देत नाही.कारण त्यांनी केवळ दोनशेच वर्षे मधुचंद्र भोगलेला होता.इतक्या लवकर ताटातूट! पण सॅटर्नियन तिचे समाधान करतो व म्हणतो, "रडू नको.मी लवकरच परत येईन." दोघे मित्र धूमकेतूच्या शेपटीवर बसून विश्वसंचारास निघतात.ते ताऱ्यांमधून जात असतात.संचार करताकरता ते पृथ्वी नावाच्या एका लहानशा ढेपळावर उतरतात.भूमध्य समुद्र म्हणजे त्यांना गंमत वाटते.ते त्यातून गप्पा मारीत चालत जातात.त्यांना वाटेत एक गलबत भेटते.त्या गलबतावर ध्रुवाची सफर करून आलेले काही तत्त्वज्ञानी असतात.

सिरियनला ते गलबत इतके लहान वाटते की दुर्बिणी

शिवाय ते त्याला दिसत नाही.तो ते गलबत उचलून आपल्या बोटाच्या नखावर त्याचे नीट परीक्षण करण्यासाठी ठेवतो, पण त्या गलबतात सजीव अणु

परमाणू पाहून त्याला आश्चर्य वाटते.हे अणू त्याच्याशी बोलतात व त्याला म्हणतात,आम्ही लहान असलो तरी आमच्यात अमर आत्मा आहे.हे ऐकून त्या पाच लक्ष फूट उंच माणसास व त्याच्या मित्रास अधिकच आश्चर्य वाटते.ते सजीव अणू आणखी सांगतात."आम्ही ईश्वराची प्रतिकृती आहोत, विश्वाचे मध्यबिंदू आहोत." ते अधिकच आश्चर्यचकित होतात.ते दोघे या मानवी अणूंना विचारतात, "तुम्ही कसे जगता? वेळ कसा घालवता?" ते मानवी अणू सांगतात, "आमचा पृथ्वीवरचा बराचसा वेळ एकमेकांना मारण्यातच जातो." एक तत्त्वज्ञानी त्यांना सांगतो, "या क्षणी आमच्या जातीचे एक लाख जंतू डोक्यावर टोप्या घालून डोक्यावर पागोटी घालणाऱ्या दुसऱ्या एका लाखांस मारीत आहेत." तो मानवी अणू पाहुण्यांना पुन्हा सांगतो, "ही कामगिरी पॅलेस्टाइन नावाच्या एका वारुळासाठी चालली आहे." पुन्हा तो सांगतो, "जे लाखो लोक एकमेकांचे गळे कापीत आहेत,त्यांना त्या पॅलेस्टाइनच्या ढेपळावर सत्ता नाहीच मिळवायची.ते पॅलेस्टाइन सुलतानच्या ताब्यात असावे की युरोपीय राजाच्या ताब्यात असावे यासाठी ही मारामारी,ही खुनी कत्तल!आणि अशा कत्तली अनादी कालापासून पृथ्वीवर सारख्या चालू आहेत." पृथ्वी नावाचा हा ग्रह म्हणजे वेड्याचे घर आहे असे या पाहुण्यांना वाटते व त्या मानवी अणुपरमाणूंना सोडून ते आपल्या विचारवंत लोकी त्वरेने प्रयाण करतात.


व्हॉल्टेअरच्या इंग्लंडच्या भेटीतून 'मायक्रोमिडास' हे एकच पुस्तक जन्मले नाही,तर 'इंग्रजांसंबंधी पत्रे' हे त्याहूनही अधिक महत्त्वाचे पुस्तक निर्माण झाले.अर्थातच ते तितके मनोरंजक नव्हते,हे खरे.या पत्रांमध्ये त्याने फ्रेंचांच्या गुलामीची इंग्रजांच्या स्वतंत्र वृत्तीशी तुलना केली नाही.

इंग्लंडच्या नियंत्रित राजेशाहीचा गौरव केला आहे व तसेच सरकार फ्रेंचांनी फ्रान्समध्ये स्थापावे,असे प्रतिपादन केले आहे.त्याने जवळजवळ 'आपला राजा फेकून द्या' असेच लिहिले आहे. 'तत्त्वज्ञानाची कथा' या आपल्या पुस्तकात डॉ.ड्यूरांट लिहितो, 'व्हॉल्टेअरला माहीत असो वा नसो,त्याचा हेतू असो वा नसो, त्याची पत्रे म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीच्या कोंबड्याचे पहिले आरवणे होते.' व्हॉल्टेअरला हद्दपारीतून परत बोलवण्यात आले.ही पत्रे प्रसिद्ध व्हावीत अशी त्याची इच्छा मुळीच नव्हती.

खासगीरित्या प्रचार व्हावा म्हणूनच त्याने ती लिहिली होती.पण एका अप्रामाणिक प्रकाशकाच्या हाती ती पडली व त्याने व्हॉल्टेअरची परवानगी न घेताच ती छापून टाकली.एका सरकारी अधिकाऱ्याच्या हाती एक प्रत आली.त्याने लगेच ते पुस्तक राजद्रोही, अधार्मिक आणि अनीतिमय आहे असे जाहीर केले.( मानव जातीच्या कथा हेन्री थॉमस,साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन ) ते पुस्तक जाहीररीत्या जाळण्यात आले व त्याला पकडण्यासाठी पुन्हा वॉरंट निघाले.


बॅस्टिलच्या तुरुगात पुन्हा जाऊन बसण्याची व्हॉल्टेअरची इच्छा नव्हती.बॅस्टिलच्या तुरुगाचे शिल्पकाम,त्याचा नकाशा,त्याचा आंतर भाग यांची आता त्याला पुरेपूर माहिती असल्यामुळे तो पोलिसांच्या हातून निसटून पळून गेला व आपल्या प्रियकरणीच्या बाहुपाशात जाऊन विसावला.या त्याच्या प्रेयसीचे नाव मार्किवसे डु चॅटेलेट.ती विवाहित होती.तिचा नवरा म्हातारा व सैन्याबरोबर दूर होता.त्याच्या गैरहजेरीचा व्हॉल्टेअरने पुरा पुरा फायदा घेतला.तो त्याची पत्नी व त्याचा किल्ला यांचा जणू धनीच बनला. मार्निवसे सुंदर तशीच चतुर होती.सिरे तिचा बंगला होता.ही जागा यात्रेचे,विलासाचे, आनंदाचे व मेजवानीचे स्थान बनली.येथे तत्त्वज्ञानाच्या चर्चा चालत,खानपानही चाले. प्राचीन ग्रीक लोकांचे वैभव जणू पुन्हा सजीव झाले.प्लेटोच्या काळापासून अशी भोजने झाली नव्हती,

की अशा चर्चाही झाल्या नव्हत्या.सिरे येथील हे स्थान युरोपभर विख्यात झाले. फ्रान्समधील नामांकित विद्वान व उत्तमोत्तम बुद्धिमान लोक व्हॉल्टेअरने येथे गोळा केले.

तो त्यांना सर्वोत्कृष्ट मध देई.त्यांच्यासाठी आपली नाटके करून दाखवी व आपल्या विनोदी टीकांनी त्यांना पोट धरधरून हसायला लावी. सिरे येथेच त्याने अत्युत्तम Cynical कथा लिहिल्या.कॅन्डिडे,The world as it Goes, Zading.The Pupil of Nature,The Princess of Balaglon वगैरे मनोरम कथा त्याने लिहिल्या.


या गोष्टीतील प्रमुख पात्रे म्हणजे रक्तमांसाची माणसे नाहीत.आपल्या मनातल्या कल्पनांनाच मानवी पोषाख देऊन त्याने उभे केले आहे.ही सारी पात्रे म्हणजे कल्पनांची प्रतीके आहेत.रूपके आहेत.किती रसभरित व भव्यदिव्य कल्पना! आणि त्यांना दिलेले पोशाखही किती कल्पनारम्य! या अद्भुत गोष्टींपैकी 'कॅन्डिडे' ही गोष्ट सर्वांत छान आहे.ही त्याने तीन दिवसांत लिहिली.ही लिहिताना त्याची लेखणी जणू अक्षरश: हसत होती.या पुस्तकात त्याने असे सिद्ध केले आहे की,या जगाहून अधिक वाईट जग असणे शक्य नाही.आपण राहतो ते जग शक्य तितके वाईट आहे.या गोष्टीसाठी त्याने घेतलेल्या विषयाहून अधिक खेदोत्पादक व उदास करणारा विषय सापडणे विरळा.पण व्हॉल्टेअरच्या जादूच्या स्पर्शाने निराशाही हसू लागते.निराशाही अत्यंत विनोदी वस्तू म्हणून गौरवावी,

पूजावी असे वाटते.कॅन्डिडे ही गोष्ट म्हणजे निराशेचे बायबल;पण वाङ्मयाच्या इतिहासातील हे अत्यंत आनंददायक पुस्तक आहे.


उर्वरित भाग पुढील लेखामध्ये..


३१/७/२३

चंपावतची नरभक्षक … भाग १

दहशत नरभक्षक बिबट्याची २९.७.२०२३ या लेखामध्ये बिबट्या व बिबळ्या या दोन शब्दांचा उपयोग केला आहे.

आमच्या कंपनीतील नेहमीच मनापासून वाचणारे राकेश सावंत साहेब यांना बिबट्या का बिबळ्या हा प्रश्न पडला.

.( हाच प्रश्न हा ब्लॉग मला भेट म्हणून देणारे विष्णू गाडेकर पाटील तरुण शास्त्रज्ञ यांनाही पडला होता.)

हा प्रश्न अनेकांना पडू शकतो.


त्यासंदर्भात थोडस मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे) या पुस्तकात बिबळ्या हा शब्द आहे.ही कथा अजून भरपूर शिल्लक आहे.ती लिहिली जाईलच.


नरभक्षकाच्या मागावर केनथ अँडरसन,अनुवाद संजय बापट या पुस्तकात बिबट्या हा शब्द वापरला आहे.


कुमाऊंचे नरभक्षक जिम कॉर्बेट,अनुवाद वैशाली चिटणीस,डायमंड पब्लिकेशन्स या पुस्तकात बिबट्या हा शब्द वापरला आहे.म्हणजेच बिबट्या व बिबळ्या दोन्ही एकच आहेत.


( ह्या फक्त अजरामर शिकार कथा नाहीत,तर बरचं काही शिकवून जाणाऱ्या आहेत.याची कृपया नोंद घ्यावी.)


नवीन गोष्ट सुरू..।


मी एडी नॉवेल्स बरोबर मलानी इथं शिकारीला गेलो असताना त्या परिसरामधल्या एका वाघिणीबद्दल ऐकलं.

तिलाच नंतर 'चंपावतची नरभक्षक' या नावाने ओळखलं जायला लागलं.


संयुक्त प्रांतामधले सर्वोत्तम शिकारी म्हणून एडी नावाजले गेले होते.त्यांच्याकडे शिकारकथांचा कधीही न संपणारा खजिनाच होता!खरंतर ज्यांच्याकडे आयुष्यामधल्या सगळ्या सर्वोत्तम गोष्टी असतात,अशा मोजक्या आणि भाग्यवान लोकांपैकी ते एक होते. 'नेमकेपणा' आणि 'अचूकपणा' यांत त्यांच्या रायफलसारखी दुसरी रायफल नव्हती.! त्यांचा एक भाऊ भारतामधला उत्तम नेमबाज होता,तर दुसरा भारतीय लष्करात होता आणि उत्तम टेनिस खेळायचा.जगातला उत्तम शिकारी असलेल्या त्यांच्या मेहुण्याची चंपावतच्या या नरभक्षक वाघाला मारण्यासाठी सरकारने नेमणूक केली असल्याचं त्यांनी मला सांगितलं,तेव्हाच या वाघाचे फारच थोडे दिवस उरले असल्याचं निश्चित झालं होतं.


त्यानंतर चार वर्षांनी मी नैनितालला भेट दिली, तेव्हा काही अनाकलनीय कारणांमुळे चंपावतचा तो नरभक्षक वाघ मारला गेला नसल्याचं आणि त्याचं असणं ही सरकारसाठी एक मोठीच डोकेदुखी होऊन बसली असल्याचं समजलं. त्याला मारणाऱ्यासाठी इनाम जाहीर केलं गेलं होतं,काही खास शिकारी नेमले गेले होते आणि अलमोरा डेपोमधून काही गुरख्यांच्या पलटणीही पाठवल्या गेल्या होत्या.या सगळ्या उपाययोजना करून

सुद्धा त्या नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात बळी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढतच चालली होती.


नंतर समजलं की,तो वाघ नव्हता;वाघीण होती.ती नेपाळहून कुमाऊँमध्ये आली,तेव्हा पूर्णतः नरभक्षक झाली होती.नेपाळमध्ये तिने २०० माणसांचा जीव घेतला होता.त्यानंतर सशस्त्र नेपाळ्यांच्या एका पथकाने तिला तिथून हुसकवून लावलं होतं.गेली चार वर्ष तिचं कुमाऊँमध्ये वास्तव्य होतं.इथं तिने आणखी २३४ माणसांचे बळी घेतले होते.


मी नैनितालला पोहोचतो न पोहोचतो तोच, बर्थोड हे नैनितालचे उपायुक्त मला भेटायला आले.तेव्हा मला ही सगळी परिस्थिती समजली.नंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू

झाला.आता ते हल्दवानीमध्ये कुठेतरी चिरनिद्रा घेत आहेत.बर्थोड यांचं व्यक्तिमत्त्वच असं होतं की,त्यांना ओळखणारे सगळेच जण त्यांच्यावर प्रेम करत आणि त्यांना मान देत.या नरभक्षक वाघिणीचा त्यांच्या अखत्यारीतल्या जिल्ह्यामधल्या लोकांना किती उपद्रव होत होता,तिच्यामुळे त्यांची चिंता कशी वाढली होती,हे त्यांनी मला सांगितलं होतं.त्यामुळे तिने घेतलेल्या पुढच्या नरबळीची बातमी यायच्या आत मी तातडीने चंपावतकडे कूच करणार असल्याचं वचन त्यांनी माझ्याकडून घेतलं,

तेव्हा त्याचं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही.मी त्यांना दोन अटी घातल्या.पहिली,या वाघिणीला मारण्यासाठी सरकारने जाहीर केलेलं इनाम रद्द केलं जावं.दुसरी,तिला मारण्यासाठी नेमलेले खास शिकारी,अलमोराहून मागवलेले गुरखे यांना परत बोलवलं जावं.यामागच्या माझ्या कारणांच स्पष्टीकरण देण्याची खरं म्हणजे गरज नाही.असा इनाम घेणारा शिकारी म्हणून आपल्याला ओळखलं जावं,हे कुणाही अस्सल शिकाऱ्याला आवडणार नाही,याची मला खात्री आहे आणि एकाच वाघाच्या मागावर जास्त लोक असतील,तर त्यांना अपघाताने एकमेकांची गोळी लागण्याचा धोका नाकारता येत नाही.ते टाळणं आवश्यक होतं.माझ्या या अटी मान्य केल्या गेल्या आणि आठवड्याभरा नंतर एका भल्या सकाळी बर्थोड मला भेटायला आले.दाबिधुरा आणि धुनघाट यांच्या दरम्यान असलेल्या पाली या गावामधल्या एका स्त्रीचा त्या नरभक्षक वाघिणीने बळी घेतला असल्याची बातमी रात्री त्यांच्याकडे आली असल्याचं त्यांनी मला सांगितलं.


कधीतरी अशी बातमी येणार असल्याची आणि आपल्याला ताबडतोब निघावं लागणार असल्याची जाणीव असल्यामुळे मी सहा जणांना माझ्याबरोबर येण्यासाठी सांगून ठेवलं होतं. माझं सामान साहित्य वाहून नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. पहिल्याच दिवशी नाश्ता करून निघाल्यानंतर आम्ही धारीच्या दिशेने १७ मैलांचं अंतर पार केलं.दुसऱ्या दिवशी आमचा नाश्ता मोर्नोला,तर रात्रीचा मुक्काम दाबिधुरा इथं पडला.तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही पाली इथं पोहोचलो,तेव्हा नरभक्षक वाघिणीने त्या स्त्रीचा बळी घेतल्याच्या घटनेला पाच दिवस होऊन गेले होते.त्या गावामधले स्त्री-पुरुष आणि मुलं असे मिळून पन्नासेक जण भयंकर दहशती

खाली होते.मी त्या गावात पोहोचलो,तेव्हा सूर्य वर असला,तरी सगळं गाव घरंदारं बंद करून बसलं होतं.माझ्या माणसांनी गावाच्याच आवारात चूल पेटवली आणि मी तिथेच चहा घेत बसलो.तेव्हा कुठे एका घराचं दार अगदी सावधपणे उघडलं गेलं आणि घाबरलेल्या लोकांनी बाहेर यायला सुरुवात केली.आदले पाच दिवस लोकांनी त्यांच्या घराचं दारदेखील उघडलं नसल्याचं त्यांनी मला सांगितलं.त्यांच्या अंगणाची,परिसराची अवस्था,म्हणजे अस्वच्छता बघून ते खरं बोलत असल्याचं लक्षात येत होतं.त्यांच्याकडचा अन्नसाठा संपत आला होता.नरभक्षक वाघिणीला मारलं नसतं किंवा तिथून पळवून लावलं नसतं,तर लोकांची उपासमार झाली असती.वाघीण अजूनही त्याच परिसरात होती,हे उघड होतं.सलग तीन रात्री लोकांना घरांपासून साधारण १०० यार्ड अंतरावरच्या परिसरातून तिची गुरगुर ऐकू येत होती,

डरकाळ्या ऐकू येत होत्या.विशेषतः आम्ही पोहोचलो,त्या दिवशी गावाच्या खालच्या अंगाला असलेल्या शेतात लोकांना ती दिसली होती.गावच्या प्रमुखाने आम्हाला राहण्यासाठी अगदी आनंदाने एक खोली देऊ केली.पण आम्ही आठ जण होतो आणि त्या खोलीचं दार ज्या दिशेला उघडत होतं,ती परसाकडची बाजू होती.त्यामुळे मी उघड्यावरच रात्र घालवायचा निर्णय घेतला.


रात्रीच्या जेवणानंतर काम करायचं असल्यामुळे उपलब्ध अन्नघटकांमधून पटकन तयार होतील, असे पदार्थ माझ्या माणसांनी तयार केले.त्यानंतर ती त्या सुरक्षित खोलीत जाऊन बसली.मी रस्त्याच्याच बाजूला असलेल्या एका झाडाला पाठ टेकून बसलो.गावकऱ्यांनी सांगितलं होतं की,या रस्त्यावरून रात्री फेरफटका मारायची तिला सवय होती.वाघिणीने मला पाहण्याआधी मी तिला पाहिलं

असतं,तर मला तिला मारण्याची संधी मिळण्याची शक्यता असल्याचं चंद्र पूर्ण वर आला,तेव्हा मला वाटत होतं.शिकारीची वाट बघत मी जंगलात कितीतरी रात्री घालवल्या होत्या,पण अशा पद्धतीनेनरभक्षकाची वाट

बघण्याची माझी पहिलीच वेळ होती. समोरचा रस्ता चंद्रप्रकाशात उजळून निघाला होता,पण रस्त्याच्या डाव्या-उजव्या बाजूला असलेल्या झाडांच्या सावल्या त्यावर पसरल्या होत्या.जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या आणि त्यांच्या सावल्या हलायला लागल्या,तसे डझनभर वाघ मला माझ्या दिशेने येताना दिसू लागले.त्या नरभक्षक वाघिणीच्या तावडीत स्वत:हून जाण्याचा मला भयंकर पश्चात्ताप व्हायला लागला.गावात परत जायचं धैर्यदेखील माझ्यात उरलं नव्हतं आणि स्वतःहून हातात घेतलेलं काम पूर्ण करण्याचीही भीती वाटायला लागली होती.

थंडीबरोबरच भीतीने माझे दात एकमेकांवर आपटून वाजायला लागले होते,पण रात्रभर मी तिथे तसाच बसून राहिलो.समोर दिसणाऱ्या बर्फाच्छादित पहाटेचे राखाडी रंग दिसायला लागले,तसा मी शरीराजवळ घेतलेल्या माझ्या दोन गुडघ्यांमध्ये डोके खुपसून झोपून गेलो.

तासाभरानंतर माझी माणसे आली तेव्हा मी त्याच स्थितीत गाढ झोपलेलो होतो.मी वाघिणीचा आवाजही ऐकला नव्हता की दुसरं काहीही पाहिले नव्हतं.आम्ही गावात परतलो.वाघिणीने जिथं जिथं माणसांना मारलं होतं त्या त्या ठिकाणी गावकऱ्यांनी मला घेऊन जावं म्हणून मी प्रयत्न केले,पण त्यासाठी कुणीच तयार होईना.


रात्रभर बाहेर राहूनही मी वाघिणीपासून बचावलो असल्याने ते आश्चर्यचकित झालेले दिसत होते.वाघिणीने माणसं मारलेल्या जागांच्या दिशा त्यांनी मला त्यांच्या आवारातूनच दाखवल्या.मी तिथे जाण्यासाठी कारणीभूत ठरलेली शेवटची हत्या गावाच्या पश्चिमेला असलेल्या डोंगरावर झाली होती.साधारण २० महिला आणि मुली गायीगुरांसाठी ओक वृक्षाची पानं गोळा करत असताना त्यांच्यामधलीच एक दुर्दैवी महिला मारली गेली होती.त्या वेळी तिथे असलेल्या सगळ्याच जणी मला माहिती देण्यास उत्सुक होत्या. त्या सगळ्या जणी मध्यान्ह होण्याच्या दोन तास आधी घराबाहेर पडल्या होत्या, साधारण अर्धा मैल गेल्यानंतर झाडांवर चढून त्यांनी पाने तोडली होती.जिचा बळी गेला होता, तिच्यासह आणखी दोघींनी घळीच्या बाजूला असलेल एक झाड निवडलं होतं.नंतर मी पाहणी केली.तेव्हा ती घळ चार फूट खोल आणि दहा ते अकरा फूट रुंद असल्याचं मला आढळून आलं. आवश्यक तेवढी सगळी पानं तोडल्यानंतर ती महिला झाडावरून खाली उतरत असतानाच मागच्या पायांवर उभं राहून वाघिणीने तिचे दोन्ही पाय पकडले होते.तोपर्यंत तिला कुणीच पाहिलं नव्हतं.त्यानंतर त्या महिलेचा फांदीला धरलेला हात सुटला होता आणि ती दरीत घसरत गेली होती.वाघिणीने तिचे दोन्ही पाय सोडून दिले होते.ती उठण्याचा प्रयत्न करत असताना वाघिणीने तिचं नरडं पकडलं होतं.त्या महिलेला घेऊन तो दरीच्या पलीकडच्या दाट झाडाझुडपांमध्ये नाहीशी झाली होती.


बाकीच्या दोघी जणी तिथूनच अवघ्या काही फुटांवर,

झाडावर होत्या.त्यांच्यासमोरच हा सगळा प्रकार घडला होता.बळी पडलेल्या त्या महिलेला घेऊन वाघीण दिसेनाशी झाल्यावर भयंकर घाबरलेल्या त्या महिला कशाबशा धावत-पळत गावात आल्या होत्या.दुपारच्या जेवणासाठी पुरुषमंडळी नुकतीच घरी आली होती,मग सगळे जण एकत्र जमले.कुणी ड्रम घेऊन आला,तर कुणी धातूची भांडी घेऊन आला.थोडक्यात,ज्यापासून आवाज निर्माण होईल,अशा वस्तू घेऊन प्रत्येक जण आला. सगळी तयारी करून,पुरुष पुढे आणि महिला मागे अशा पद्धतीने ते त्या महिलेला शोधण्यासाठी निघाले.वाघिणीने ज्या घळीपाशी त्या महिलेला मारलं होतं,तिथे ते पोहोचले. 'आता पुढे काय करायचं?' या महत्त्वाच्या प्रश्नावर त्यांच्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेमध्ये साधारण ३० यार्डावरच्या झाडाझुडपांतून आलेल्या डरकाळीने व्यत्यय आणला.ती डरकाळी ऐकून त्यांच्यातला एक जण मागे वळला आणि गावाच्या दिशेने सैरावैरा धावत सुटला.

त्याच्यामागून सगळेच धावत सुटले.दमून थांबल्यावर थोडा श्वास घेत त्यांच्यातल्या प्रत्येकाने 'माझ्याआधी तूच धावायला सुरुवात केलीस आणि सगळा गोंधळ झाला' असे एकमेकांवर आरोप केले.


प्रत्येक जण धैर्यवान असल्याचा प्रत्येकाचा दावा असल्याचा आणि कुणीच घाबरलेलं नव्हतं,तर वेळ न घालवता परत जाण्याचा आणि त्या महिलेची सुटका करण्याचा मुद्दा उपस्थित होईपर्यंत सगळ्यांची मोठमोठ्याने भांडणं होत राहिली.मग तिथे परत जायची सूचना स्वीकारली गेली.सगळ्यांनी घळीपर्यंत जाण्याचा आणि घाबरून धावत परत येण्याचा प्रकार तीन वेळा झाला.तिसऱ्या वेळी ते गेले,तेव्हा त्यांच्यापैकी एकाने बंदूक चालवली आणि वाघीण डरकाळी फोडत बाहेर आली.त्यानंतर मात्र शहाणपणाचा विचार करत त्या महिलेची सुटका करण्याचा प्रयत्न सोडून देण्यात आला. "त्या बंदूक चालवणाऱ्या माणसाने हवेत बार काढण्याऐवजी झाडाझुडपांत का काढला नाही?" या मी विचारलेल्या प्रश्नावर तो म्हणाला की,"वाघीण आधीच खूप चिडलेली होती.तिला चुकून गोळी लागली असती,तर तिने मला नक्कीच ठार मारलं असतं"


वाघिणीचे काही ठसेबिसे दिसण्याच्या अपेक्षेने त्या दिवशी सकाळी मी जवळजवळ तीन तास गावाभोवती फेऱ्या मारत घालवले.असं फिरत असताना 'आत्ताच तिची गाठ पडते की काय' अशी भीतीही मला वाटत होती.दरीमध्ये खूप झाडं होती.अंधार असलेल्या एका ठिकाणी झुडपांभोवती फिरत असताना वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांचा एक थवा अचानक आवाज करत उडाला आणि 'आपलं हृदय बंद पडतंय की काय!' असं मला वाटलं.अर्थात,तसं काही घडलं नाही.


माझ्या माणसांनी जेवायला बसण्यासाठी अक्रोडाच्या झाडाखालची जागा साफसूफ करून घेतली होती.

नाश्त्यानंतर गावाच्या प्रमुखाने मला गव्हाच्या पिकाच्या कापणीचं काम करणाऱ्या लोकांना संरक्षण पुरवण्याची विनंती केली.लोक अतिशय घाबरलेले असल्याचं त्याने मला सांगितलं.ते घरातून बाहेरच पडायला तयार नव्हते.

त्यामुळे मी थांबलो असतो,तरच कापणी होणार होती;

अन्यथा होणार नव्हती.अर्ध्या तासानंतर माझ्या माणसांच्या मागे सगळं गाव गव्हाच्या कापणीसाठी बाहेर पडलं आणि मी रायफल घेऊन त्यांच्या संरक्षणासाठी उभा राहिलो.संध्याकाळपर्यंत पाच मोठमोठ्या शेतांमधून गहू कापून जमा करण्यात आला. घरांजवळ असलेले दोन पट्टे बाकी ठेवण्यात आले होते.तिथलं काम करून घेण्यात काही अडचण येणार नसल्याचं गावच्या प्रमुखाने मला सांगितलं.त्याबरोबरच गावाची बरीच स्वच्छताही झाली आणि खास मला वापरण्यासाठी दुसरी एक खोलीदेखील देण्यात आली.तिला एक दार होत,पण हवा खेळती राहण्याची काहीच सोय नव्हती.मग दार उघडं ठेवून मी तिथे काही काटेरी झुडप टाकली.त्यामुळे वाघीण माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नव्हती.तसंच दार उघडं ठेवून मी झोपलो असतो,तर मला चांगला वाराही मिळणार होता.आदल्या दिवशी न मिळालेल्या झोपेचा कोटा मी अशा पद्धतीने पूर्ण करून घेतला.


माझ्या उपस्थितीमुळे लोकांमध्ये जणू प्राण फुंकला जायला सुरुवात झाली.त्यामुळे त्यांनी जरा जास्तच मोकळेपणाने वावरायला सुरुवात केली.असं असलं,तरी मला ज्या गोष्टीचं जास्त महत्त्व वाटत होतं,त्या माझ्या 'मला सगळं जंगल दाखवा' या विनंतीचा त्यांनी पुनर्विचार करण्याइतपत त्यांचा विश्वास मी अजूनही जिंकू शकलो नव्हतो.आसपासच्या मैलोगणिक परिसराचा अगदी प्रत्येक फूट या लोकांना परिचित होता आणि त्यांची इच्छा असती,त्यांना वाटलं असतं,तर वाघिणीला शोधण्याचा नेमका परिसर किंवा तिच्या पावलांचे ठसे बघायला मिळण्यची शक्यता असणाऱ्या नेमक्या जागा ते मला सांगू शकले असते.पण ती नरभक्षक वाघीण तरुण होती की वयस्कर ही माहिती अजूनपर्यंत मिळालेली नव्हती.

तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या माहितीचा उपयोग झाला असता,असं वाटत होतं.तिचे ठसे अभ्यासून ही माहिती मिळवता आली असती.


त्या दिवशी सकाळचा चहा झाल्यानंतर मी गावकऱ्यांना विचारलं, "माझ्या माणसांसाठी मांसाहारी जेवण हवं आहे,तर मला घोरूलची (पहाडी बोकड ) शिकार कुठे करता येईल ?" ते गाव पूर्व-पश्चिम पसरलेल्या एका डोगररांगेच्या कडेवर वसलेलं होतं.मी खालच्या बाजूला ज्या रस्त्यावर रात्र घालवली होती,तिथे उत्तरेकडे असलेल्या उतारावर,गवताळ भागात भरपूर घोरूल सापडले असते,असं मला सांगण्यात आलं.मला ती जागा दाखवण्यासाठी अनेक जण स्वेच्छेने यायला तयार झाले.त्यांचा प्रतिसाद पाहून झालेला आनंद व्यक्त न करता मी त्यांच्यामधून तीन जणांची निवड केली. "तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिथे खरोखरच घोरूल सापडले,तर माझ्या माणसांसाठी एक आणि गावासाठी दोन घोरूलांची शिकार करून आणेन" असंही मी गावच्या प्रमुखाला सांगितलं.तो रस्ता ओलांडून आम्ही पुढे गेलो आणि त्या डोंगरांमधून खाली उतरलो.अर्थात,आमच्या डावी-उजवीकडे आमचं एकदम बारीक लक्ष होतं,पण आम्हाला वाघसदृश काहीच दिसलं नाही.दरीमध्ये अर्धा मैल खाली उतरल्यानंतर दोन उतार जिथे एकत्र येतात,

अशा ठिकाणी उजवीकडे,उतारावर भरपूर खडकाळ आणि गवताळ जागा दिसत होती.मी तिथे थोडा वेळ बसून उताराचं निरीक्षण करायला सुरुवात केली. माझ्यामागे एक पाईन वृक्ष होता.त्याला मी टेकून बसलो.

समोर असलेल्या डोंगरात उंचावरची हालचाल माझ्या डोळ्यांनी टिपली.पुन्हा तीच हालचाल जाणवली,तेव्हा मी नीट बघितलं,तर एक घोरूल आपले कान हलवत उभं होतं.ते गवतामध्ये उभं होतं आणि त्याचं फक्त डोकंच तेवढं मला दिसत होतं.माझ्याबरोबरच्या माणसांना ही हालचाल दिसली नव्हती.त्यांनी नीट लक्ष देऊन बघायला सुरुवात केल्यावर त्याचं डोकं हलणं थांबलं.आसपासच्या वातावरणात त्याचा रंग असा मिसळून गेला होता की,

आता त्याला त्या सगळ्यांमधून शोधणं शक्य नव्हतं.ते नेमकं कुठे होतं,याची कल्पना देऊन मी त्यांना खाली बसायला सांगितलं आणि माझ्या हालचालींचं निरक्षण करायला सांगितलं. माझ्याकडे मार्टिनी हेन्री ही जुनी रायफल होती.(कुमाऊंचे नरभक्षक जिम कॉर्बेट,अनुवाद - वैशाली चिटणीस,डायमंड पब्लिकेशन्स)अतिशय अचूक नेम लागण्यासाठी ती प्रसिद्ध होती.आमच्यामधलं अंतर साधारणपणे २०० यार्डाचं होतं.खाली झोपून,जमिनीवर आलेल्या पाईन वृक्षाच्या मुळांवर मी माझी रायफल ठेवली,काळजीपूर्वक नेम धरला आणि गोळी झाडली.


काडतुसांमधल्या काळ्या पावडरीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे मला काही दिसत नव्हतं.माझा नेम बहुधा एखाद्या खडकावर किंवा पालापाचोळ्यावर लागला असल्याचं माझ्या माणसांनी मला सांगितलं.त्याच जागेवर बसून मी रायफलमध्ये पुन्हा बार भरला.मी आधी ज्या जागेवर नेम धरला होता,त्याच्या खाली,गवतात मला हालचाल दिसत होती.तिथेच मला घोरूलचा पार्श्वभाग दिसला.ते गवतातून पूर्ण बाहेर आलं आणि त्याने डोंगरउतारावरून खाली गडगडत यायला सुरुवात केली.

अर्ध्यावर खाली आल्यावर ते घनदाट गवतात दिसेनासं झालं. त्याच्या या धडपडीमुळे गवतात पडलेल्या दोन घोरूलांना सावधगिरीचा इशारा मिळाला आणि त्या गवतातून बाहेर येऊन ती वर,डोंगराच्या दिशेने धावायला लागली.आता ती अधिक जवळच्या टप्प्यात होती.

माझ्यासमोरच्या पानांमधून मी नीट लक्ष केंद्रित केलं.त्या दोघांपैकी आकाराने मोठ्या असलेल्या घोरूलाचा वेग कमी व्हायची वाट बघायला लागलो.तो कमी होताच,मी त्याच्या पाठीत गोळी झाडली.त्याबरोबर दुसऱ्या घोरूलाने त्याने तिरपं वळून डोंगराच्या दिशेने धावायला सुरुवात केली, तेव्हा मी त्याच्यावर गोळी झाडली.


कथा अजून संपलेली नाही. ( जिम कॉर्बेट याच्यांकडे कोणत्याही जंगलात जाण्याचा विशिष्ट असा अपवादात्मक परवाना होता.) संवादातून मला समजलेली माहिती.



२९/७/२३

दहशत नरभक्षक बिबट्याची भाग २

प्रत्येक वळण काळजीपूर्वक पार केलं.शेवटी मैलभर अंतरावर मात्र त्याने रस्ता सोडला होता व एका जंगलवाटेने दाट जंगलात निघून गेला होता.या ठिकाणाहून शंभर यार्डावर एक लागवड न केलेलं शेत होतं आणि त्याच्या मध्यावर काटेरी कुंपण दिसत होतं.

आपल्या शेतात शेळ्यामेंढ्या घेऊन येणाऱ्या फिरस्त्यांनी मुद्दाम यावं व त्यांच्या लेंड्यांनी आपलं शेत खतावलं जावं म्हणूनच शेतमालकांनंच हे कुंपण घालून ठेवलेलं होतं.आदल्या दिवशी त्या दिशेने आलेल्या शेळ्या -

मेंढ्यांच्या कळपाचा मुक्काम या कुंपणाच्या आतच होता.


त्या कळपाचा मालक अगदी रापलेला,टणक म्हातारा होता आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहूनच कळत होतं की किमान चाळीस-पन्नास वर्षतरी तो विविध मालांची ने-आण ह्या मार्गावरून करत असावा.कुंपणाचं एक काटेरी झुडूप बाजूला काढून तो बाहेर पडतच होता तेवढ्यात मी तिथे आलो.मी त्याला बिबळ्याबद्दल विचारल्यावर तो म्हणाला की,"मी जनावर तर पाहिलं नाही पण झुंजूमुंजू होण्याच्या सुमारास त्याच्या दोन कुत्र्यांनी मात्र आवाज दिला होता आणि काही मिनिटानंतर रस्त्याच्या वरच्या अंगाला एक भेकर भुंकलं होतं.' "


त्याचा एक बोकड विकत देण्याबद्दल मी त्याला विचारल्यावर त्याने मला कारण विचारलं. बिबळ्याला आमिष म्हणून बांधण्यासाठी पाहिजे असं सांगितल्यावर तो कुंपणाच्या बाहेर आला, झुडूप जागच्या जागी ठेवून दिलं,मी दिलेली सिगारेट घेतली अन् रस्त्याच्या कडेला एका दगडावर बसला.


बराच वेळ आमचं दोघांचंही धूम्रपान चालू होतं. तरी माझा प्रश्न अनुत्तरीतच राहिला होता.शेवटी त्याने बोलायला सुरूवात केली."माझं गाव ब्रदीनाथच्या जवळच आहे.

तिथून येत असताना वाटेतच मी एका साहेबाबद्दल ऐकलं होतं.तर तो साहेब तुम्हीच दिसताय.पण इतक्या दुरून तंगडतोड करत इथे एका वायफळ कामासाठी तुम्ही आलात म्हणून वाईट वाटतं.इथल्या इतक्या माणसांच्या मृत्यूला कारणीभूत असलेलं हे जे काही आहे ती एक 'सैतानी शक्ती' आहे.हे कुठलंही जनावर नाही की जे तुमच्या बंदुकीच्या गोळीने मरेल किंवा इतरांनी आधीच प्रयत्न केलेल्या कोणत्याही मार्गाने मरेल.माझं म्हणणं तुम्हाला पटावं म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि तोवर आपण ही दुसरी सिगरेट ओढू या! ही गोष्ट मला माझ्या बापाने सांगितली होती आणि सर्वांना माहीत आहे की तो कधीही खोटं बोलायचा नाही.


" त्यावेळी माझा बाप एकदम जवान होता आणि माझा तर अजून जन्मच झाला नव्हता.सध्या इथल्या लोकांना त्रास देण्याऱ्या अशाच एका दुष्टात्म्याने आमच्या गावात वास्तव्य केलं होतं. सर्वजण त्याला बिबट्याच समजत होते.बाया, पोरं माणसं सतत मारली जात होती,आणि इथे सध्या जे होतंय तेच तेव्हाही होत होतं,त्याला मारण्यासाठी सर्व परीने प्रयत्न झाले,सापळे लावले गेले,मोठमोठ्या शिकाऱ्यांनी मचाणावर बसून बिबळ्या समजून बंदुका झाडल्या,पण जेव्हा एवढे प्रयत्नही फोल ठरले तेव्हा मात्र लोकांच्या मनात जबरदस्त भीती बसली. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत घराबाहेर पडण्याचीच कोणाची छाती होत नव्हती.'


" सर्व उपाय थकले तेव्हा माझ्या बापाच्या गावच्या मुखियाने आसपासच्या सर्व गावातल्या मुखियांची या संबंधात निर्णय घेण्यासाठी पंचायत बोलावली.सर्व जण जमल्यावर पंचांनी सांगितलं की या नरभक्षक बिबळ्यापासून संरक्षण म्हणून काही नवीन उपाययोजना करण्यासाठी पंचायत बोलावली आहे.आदल्या रात्री बिबळ्याने मारलेल्या आपल्या नातवाचा दहनविधी उरकून स्मशानघाटावरून नुकताच परतलेला एक म्हातारा उठला आणि म्हणाला, "अगदी शेजारी झोपलेल्या माझ्या नातवाला घरात शिरून उचलून घेऊन जाणारा हा बिबळ्या म्हणजे साधा बिबळ्या नाही,तर आपल्या

सारख्या हाडामासांचा एक माणूस आहे आणि तो रक्तामांसाची इच्छा झाल्यावर बिबळ्याचे रूप घेतोय.इतर कोणत्याही उपायाने तो खतम होणार नाही.फक्त आग हे शेवटचं अस्त्र उरलंय." त्याच्या म्हणण्यानुसार त्याला पडक्या देवळाजवळच्या झोपडीत राहणाऱ्या साधूचा संशय येत होता.


" हे ऐकल्यानंतर सर्व बाजूने कुजबूज व आरडाओरडा सुरू झाला.काहींचं म्हणणं पडलं की नातू दगावल्यामुळे म्हाताऱ्याचं डोकं बिघडलंय तर काहींना त्याचं पटतही होतं.ज्यांना त्याचं म्हणणं थोडं पटत होतं त्यांनी सर्वांना आठवण करून दिली की हे बळी जायला सुरुवात होण्याच्या सुमारासच हा साधू गावात राहायला आला होता.आणि जेव्हा एखादा बळी जात असे त्याच्या दुसऱ्या दिवशी हा साधू त्याची खाट भर उन्हात टाकून दिवसभर झोपलेला दिसायचा. "


"कुजबूज शांत झाल्यावर आणि बरीच उलटसुलट चर्चा झाल्यानंतर शेवटी पंचायत अशा निर्णयावर आली की लगेच कोणतीही कारवाई करू नये पण यापुढे त्या साधूच्या सर्व हालचालींवर बारीक नजर ठेवावी.जमलेल्या लोकांमधून लगेचच टेहळणीसाठी तीन पथकं बनवली गेली.सर्व बळी विशिष्ट अंतरानेच पडत असल्याने पुढचा बळी जाण्याचा जो अपेक्षित दिवस होता त्या पूर्वीच पहिल्या गटाने टेहळणी करायला सुरुवात करायची होती.


"पहिला व दुसरा गट टेहळणी करत असताना साधूने झोपडी सोडली नाही.माझा बाप तिसऱ्या गटात होता.

अंधार पडण्याच्या सुमारास त्यांनी आपापल्या जागा घेतल्या.लवकरच झोपडीचा दरवाजा उघडला गेला,साधू बाहेर पडला आणि अंधारात गुडूप झाला.काही तासानंतर दूरवर डोंगरावरच्या कोळसेवाल्याच्या घराच्या दिशेकडून एक किंकाळी ऐकायला आली व नंतर सर्व काही शांत झालं.पार्टीतल्या एकानेही रात्रभर डोळे मिटले नाहीत आणि जेव्हा तांबडं फुटलं तेव्हा त्यांनी साधूला घाईघाईने झोपडीकडे येताना पाहिलं... त्याच्या हातातून व तोंडातून रक्त गळत होतं!"


"साधू झोपडीत शिरला आणि त्याने दरवाजा लावून घेतला.हे सर्वजण झोपडीजवळ गेले साखळी कोयंड्यात अडकवून तो बाहेरून बंद करून घेतला व त्यानंतर प्रत्येक जण त्याच्या त्याच्या गंजीकडे गेला.येताना प्रत्येकाने गवताच्या काही पेंढ्या आणल्या.त्यादिवशी सूर्य उगवण्याच्या सुमारास त्या झोपडीच्या जागी राखेशिवाय काहीही उरलं नव्हतं.त्या दिवसा पासून नरबळी घडण्याचे प्रकार बंद झाले."


"अजून तरी इकडे असलेल्या कोणत्याही साधूवर कोणाचा संशय निर्माण झालेला नाही पण जेव्हा तसं होईल तेव्हा माझ्या बापाच्या काळात जी उपाययोजना केली गेली ती माझ्याही काळात केली जाईल.पण तो दिवस येईपर्यंत गढवाली जनतेला त्यांच्या वाटेचे भोग भोगलेच पाहिजेत."


"आता तुम्ही मला बोकड विकत देण्याबद्दल विचारलंत.

तर साहेब माझ्याकडे जास्तीचा एकही बोकड नाही.पण माझी गोष्ट ऐकल्यानंतरही तुम्ही म्हणत असाल तर बांधण्यासाठी म्हणून मी माझा एक मेंढा उसना देतो.जर तो मारला गेला तर तुम्ही मला पैसे द्यायचे पण जिता राह्यला आपल्यात कोणताही व्यवहार होणार नाही. आजचा दिवस व रात्र मी इकडे आहे.उद्या 'भूतियां'ची चांदणी उगवण्याच्या वेळेला मला निघालंच पाहिजे."


त्या दिवशी संध्याकाळी मी परतलो तेव्हा त्या ओझीवाल्या मित्राने आनंदाने मला पाहिजे तो मेंढा दिला.बिबळ्याला दोन रात्री पुरेल एवढा मोठा! त्याला मी सकाळी बिबळ्याने जिथे यात्रामार्ग सोडून जंगलाची वाट पकडली होती तिथे बांधला.


दुसऱ्या दिवशी मी लवकरच उठलो.बंगल्याबाहेर पडताना परत एकदा व्हरांड्याखालीच मला त्याचे पगमार्कस दिसले.फाटकापाशी त्या पगमार्कसचं निरीक्षण केल्यावर कळलं की तो बिबळ्या काल रात्री गुलाबराईच्या दिशेनेच

आला होता आणि रुद्रप्रयाग बाजाराच्या दिशेने निघून गेला होता.याचा अर्थ त्याला माणूसच पाहिजे होता.मला नंतर कळलं की त्याने तो मेंढा मारला होता पण त्याला थोडं सुद्धा खाल्ल नव्हतं.


"परत घरी जा साहेब आणि तुमचा वेळ व पैसा वाचवा" हा त्या म्हाताऱ्याचा निरोपाचा सल्ला होता.लगेच त्याने त्याच्या कळपासाठी खुणेची शिट्टी वाजवली आणि तो हरिद्वारच्या दिशेने निघून गेला.


अशीच एक घटना काही वर्षांपूर्वी रुद्रप्रयागजवळ घडली होती.पण सुदैवाने तिचा शेवट इतका वाईट झाला नाही.

आपल्या नातलगांच्या आणि मित्रांच्या मृत्यूमुळे माथी भडकलेल्या एका जमावाने दासजल पट्टी जवळच्या 'कोठगी' गावात एका साधूला पकडलं.त्यांनाही असा संशय होता की या सर्व नरबळींमागे माणसांपैकीच कोणाचा तरी हात आहे.सुदैवाने त्या जमावाचा राग त्या साधूवर निघण्याच्या आत गढ़वालचा तेव्हाचा डेप्युटी कमिशनर फिलीप मेसन तिथे आला.त्याचा कॅम्प जवळच होता.त्याला एकूण वातावरणाचा अंदाज आला आणि चांगला अनुभवी प्रशासक असल्याने त्याने एक शक्कल लढवली.तो म्हणाला की खरा गुन्हेगार सापडलाय याबद्दल त्याची खात्री आहे पण एखाद्या माणसाला देहदंड देण्याअगोदर त्याचा गुन्हा सिद्ध व्हायला पाह्यजे.तेव्हा त्या साधूला नजरकैदेत ठेवावं.हे सर्व जमावाला मान्य होतं.पुढचे सात दिवस व रात्र त्याला पोलिसांच्या आणि जमावांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं.आठव्या दिवशी पहारेकरी व इतर टेहळे यांची अदलाबदल होत असतानाच बातमी मिळाली की तिथून काही मैल दूर एका गावात घरात घुसून बिबळ्याने एक माणूस उचलून नेलाय.


मग मात्र जमावाने साधूला सोडून द्यायला विरोध केला नाही.'या वेळेला चुकीचा माणूस पकडला गेला असेल,पण पुढच्या वेळी ही चूक होणार नाही.' असं समाधान करून घेऊन साधूला जिवानिशी सोडण्यात आलं.


गढ़वाल भागात अशा नरबळींसाठी जसं 'साधू' ना जबाबदार धरलं जातं तसे नैनिताल - अल्मोडा भागात 'बोख्सर ना धरलं जातं.हे बोख्सर फूटहिल्सच्या पायथ्याच्या 'तराई' या गवताळ पट्ट्यात वास्तव्य करून असतात आणि प्रामुख्याने शिकारी करून पोटं भरतात.


साधू रक्तमांसाला चटावल्यामुळे असं करतात तर बोख्सर हे बळीच्या अंगावरच्या दागिन्यांसाठी व मूल्यवान वस्तूंसाठी नरबळी घेतात असा समज आहे.


नरभक्षकांकडून जास्त प्रमाणात नेहमी स्त्रियांचे बळी जातात हे खरंय पण त्याची निश्चित अशी काही कारणं आहेत.!


हे सर्व समज भीतीतून किंवा अगतिकेतून येतात. मीही अतिशय कल्पनातीत अशा एकांतात नरभक्षकांसाठी पुलांवर,पायवाटांवर,आमिष म्हणून बांधलेल्या गाऱ्यांवर किंवा नरबळीशेजारी रात्री रात्री जागून काढल्या आहेत.

एकदा तर सलग वीस रात्री- तेव्हा भीतीमुळे मलाही भास व्हायचे की धड जनावराचं पण तोंड सैतानाचं असलेला,

नरभक्षक मला जवळून कुठूनतरी लपून पहातोय,माझ्या मूर्ख खटपटींकडे पहात आतल्या आत सैतानी हास्य करतोय आणि मला एकदा तरी बेसावध अवस्थेत गाठून माझ्या गळ्यात त्याचे दात रुतवण्याचं स्वप्न रंगवत जिभल्या चाटतोय!


आता तुम्ही असा प्रश्न विचाराल की इतके सर्व नरबळी जात असताना सरकार काय करत होतं? पण एकूण दहा आठवडे रुद्रप्रयाग परिसरात घालवल्यानंतर आणि त्या भागातल्या प्रत्येक गावाला भेट दिल्यानंतर मी एवढं नक्की सांगू शकतो की शासनाने त्यांच्या यंत्रणेला जेवढं शक्य होतं ते सर्व केलं होतं.बक्षिसं जाहीर केली गेली (स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार रु. १०,००० व दोन गावांचं इनाम' अशी बक्षीसं होती) निवडक शिकारी घसघशीत मानधन देऊन बोलावले गेले,(आणि परत यश मिळालं तर बक्षीसं होतीच !) आधीच असलेल्या चार हजार लायसेन्सेसशिवाय तीनशे लायसेन्सेस फक्त नरभक्षकाच्या शिकारीसाठी दिली गेली. लॅन्सडाऊनच्या गढवाल रेजिमेंटच्या सैनिकांना रजेवर गावी जाताना रायफली घेऊन जाण्याची परवानगी दिली गेली किंवा त्यांच्या ऑफिसर्सनी त्यांना बंदूका देऊ केल्या,देशभराच्या शिकाऱ्यांना प्रेसमधून आवाहन केलं गेलं,आमिष म्हणून बोकड बांधून 'ड्रॉप डोअर' पद्धतीचे सापळे लावले गेले,

सर्व गावांच्या पटवाऱ्यांना नरबळीमध्ये टाकण्यासाठी विषाच्या कॅपसूल्स दिल्या गेल्या आणि बऱ्याच सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या नोकऱ्या सांभाळून उरणारा वेळ नरभक्षकाच्या शिकारीसाठी घालवला.


ह्या सर्व उपाययोजनांचा एकत्रित परिणाम काय? तर बंदुकीच्या गोळीमुळे बिबळ्याच्या मागच्या डाव्या पायाच्या गादीला झालेली छोटी जखम आणि सरकारी दफ्तरात केली गेलेली विषाबाबतची खालीलप्रमाणे नोंद...


'विषाचा योग्य तो परिणाम होण्याऐवजी या बिबळ्याच्या शरीरात भिनलेल्या विषामुळे बिबळ्या उत्तेजित झाल्याचे व विष पचवल्याचे आढळले आहे.'


नरभक्षकाला मारण्यासाठी जे काही प्रयत्न झाले त्या संबंधीच्या तीन महत्त्वाच्या नोंदी मी मुद्दाम इथे देतोय....


पहिली नोंद :प्रेसमधील आवाहनामुळे दोन तरुण ब्रिटिश अधिकारी १९३२ साली रुद्रप्रयागला आले.अलकनंदा नदी ओलांडण्यासाठी नरभक्षक रुद्रप्रयागमधील झुलत्या पुलाचा वापर करतो असा अंदाज त्यांनी कोणत्या आधारावर काढला ते माहीत नाही पण त्यांनी त्यांचे सर्व प्रयत्न त्या पुलावरच केंद्रित करायचं ठरवलं.पुलाच्या दोन्ही बाजूच्या तीरावर टॉवर्स बांधले होते.त्यातूनच पुलाला आधार देणाऱ्या केबल्स जात असत. एक शिकारी उजव्या तर एक शिकारी डाव्या टॉवरवर बसला.जवळजवळ दोन महिने टॉवरवर अशाप्रकारे पहारा दिल्यानंतर एका रात्री डाव्या तीरावरच्या टॉवरवर बसलेल्या शिकाऱ्याने बिबळ्याला कमानीतून पुलावर येताना पाह्यलं. त्याला पुलाच्या मध्यावर येऊ दिल्यावर त्याने फायर केलं.त्यासरशी तो बिबळ्या वेगाने पूल ओलांडत असताना उजव्या टॉवरवर बसलेल्याने त्याच्या रिव्हॉल्व्हरचे सहाच्या सहा चेंबर्स रिकामे केले.दुसऱ्या दिवशी सकाळी पुलावर आणि पुलापलीकडच्या डोंगरावरच्या पायवाटेवर रक्ताचे माग मिळाले.त्यामुळे हा शोध जारी ठेवला गेला त्यानंतर जवळजवळ ६ महिने नरभक्षकाकडून एकही माणूस मारला गेला नाही.ते सातही शॉट ऐकलेल्या आणि नंतरच्या शोध मोहिमेमध्ये भाग घेतलेल्या माणसांनी ही घटना मला नंतर सविस्तर सांगितली.सर्वांना असं वाटलं होतं की पहिली गोळी त्याच्या पाठीत घुसली असावी आणि नंतरच्या सहा गोळ्यांपैकी एक डोक्यात लागली असावी.म्हणूनच इतका सातत्याने शोध घेतला गेला होता रक्ताच्या मागाबद्दल मला जी माहिती दिली गेली त्यावरून माझं मत असं पडलं की त्या बिबळ्याच्या धडावर किंवा डोक्यावर गोळी लागलीच नसणार.कारण फक्त पायाला झालेल्या जखमांमुळेच त्या प्रकारचा रक्ताचा माग मिळू शकतो. नंतर... म्हणजे खूप नंतर समाधानाची बाब अशी की माझा कयास खरा ठरला... डाव्या तीरावरून मारलेल्या गोळीने फक्त मागच्या डाव्या पावलाच्या गादीचा टवका उडाला होता तर उजव्या टॉवरवरून मारलेले सर्वच्या सर्व शॉट्स चुकले होते.


दुसरी नोंद : ' ड्रॉप डोअर' प्रकारच्या सापळ्यामध्ये जवळजवळ २० बिबळे सापडून ठार झाल्यानंतर शेवटी एक असा बिबळ्या अडकला की तो नरभक्षकच असणार याबद्दल सर्वांची खात्री होती.नरभक्षकाने मारलेल्या माणसांचे अतृप्त आत्मे आपल्याला भुतं बनून त्रास देतील या भीतीने एकही हिंदू माणूस बिबळ्याला मारायला तयार होत नव्हता.शेवटी एका भारतीय ख्रिश्चनाला बोलावणं पाठवलं गेलं.हा माणूस ३० मैलावरच्या एका गावात राहायचा आणि तो इकडे पोचायच्या आत त्या सापळ्यातून तो बिबळ्या निसटला आणि पसार झाला.


तिसरी नोंद : एका माणसाला मारल्यानंतर हा बिबळ्या जंगलाच्या एका विशिष्ट पट्ट्यात भक्ष्य ठेऊन जवळच लपून बसला होता.बळीचे अवशेष शोधण्यासाठी निघालेल्या शोधपथकाला दुसऱ्या दिवशी तो बिबळ्या जंगलातून बाहेर पडताना दिसला.थोड्याशा पाठलगानंतर तो एका गुहेत शिरताना आढळला.त्या सर्वांनी गुहेचं तोंड मोठमोठ्या दगडांनी व काटेरी झुडूपांनी बंद करून टाकलं.दरदिवशी वाढत्या संख्येने लोक त्या गुहेला भेट देऊ लागले.पाचव्या दिवशी जवळजवळ पाचशे माणसं तिथे जमलेली असताना एक माणूस तिथं आला.त्या माणसाचं नाव मला सांगितलं गेलं नाही.पण ही त्या भागातली 'वजनदार' असामी होती असं सांगितलं गेलं..


पुढची हकीकत गावकऱ्यांच्याच शब्दात ऐका "हा माणूस बोलला की त्या गुहेत बिबळ्या वगैरे काही नाहीच,असं म्हणून त्याने काटेरी झुडपं हलवली आणि त्याचक्षणी बिबळ्या अचानक गुहेतून बाहेर पडला आणि त्या पाचशे माणसांमधून वाट काढत सटकून निघून गेला. "


खरंतर या तिन्ही घटना हा बिबळ्या नरभक्षक बनल्यानंतर लगेचच घडल्या होत्या.जर पुलावरचा नेम अचूक ठरला असता सापळ्यात अडकलेला असताना त्याला गोळी घातली गेली असती किंवा तो गुहेतच कायमचा जेरबंद केला असता तर गढवालच्या जनतेला इतकी किंमत चुकवायला लागली नसती.


२७ जुलै २०२३ या लेखातील पुढील भाग..