* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१२/१२/२३

15 आॕगस्ट माझाही स्वातंत्र्य दिन 15th August is also my independence day..

१५ ऑगस्ट !!! 


ही नुसती तारीख नव्हे,आपणा सर्व भारतीयांच्या मनावर सुवर्णाक्षराने कोरलेला हा अभिमानाचा दिवस ! याच तारखेला एकेवर्षी भारत स्वतंत्र झाला होता... आणि एकेवर्षी मी सुद्धा


भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता आणि मी माझ्याच


सुरुवातीला इंटरनॅशनल कंपनीमध्ये मी महाराष्ट्र प्रमुख होतो.महिन्याचं उत्पन्न ३ ते ४लाख ! 


पण यांतही समाधानी नव्हतो ! 

भरपूर पैसे कमावणे,वर ...वर... वर जाणे ...आणखी वरचे पद मिळवणे... ! 


घर गाडी बंगला घेणे..आज महाराष्ट्र प्रमुख आहे, उद्या भारताचा प्रमुख होणे...जमलंच तर परवा जगातील काही देशांचासुद्धा प्रमुख होणे  ... !


जग जिंकायला निघालेला सिकंदर होतो मी !

फरक इतकाच,तो सिकंदर घोड्यावर होता, आणि दिडशहाणा मी...  गाढवावरहे गाढव मीच होतो आणि गाढवावर बसलेला दिडशहाणाही मीच !


एके दिवशी,आयुष्याच्या वाटेत  भेटलेल्या भीक मागणाऱ्या एका आजोबांनी या दिड शहाण्या सिकंदराची नशा उतरवली...! 


माणूस म्हणून जगण्याचे सूत्र सांगितलं... ! 


ॲलोपॅथी,होमिओपॅथी,नॕचरोपॕथी आणि इतर कुठल्याही पॕथीपेक्षा Sympathy आणि Empathy (अनुभुती आणि सह अनुभुती) या पॕथी वापरणं हे माणुस असल्याचं लक्षण असतं हे  त्यांनी माझ्यावर ठसवलं... !  वेद शिकण्यापेक्षा एखाद्याची वेदना समजून घेणं, हे वैद्य असल्याचं खरं लक्षण,हे त्यांनीच मनावर  बिंबवलं ! डोंगरावर चढणार्‍या माणसाचे पाय ओढुन त्याला पाडण्यापेक्षा, जमिनीवर पडलेल्या एखाद्या निराधाराचे हात ओढुन त्याला उभं करणं यातच खरा पुरुषार्थ असतो... पुरुषार्थाची व्याख्या नव्यानं त्यांनी मला सांगितली... !


ते खरंतर भिक्षेकरी नव्हते,ते उच्चशिक्षित होते. या गोड व्यक्तीमधुन मधुर रस चावुन चावुन ओरबाडुन घेवुन उसाच्या चोयटीसारखं त्यांच्या भाऊबंदांनी त्यांना रस्त्यात फेकलं होतं !बाबांनी सांगितलेल्या त्या बाबी त्यावेळी कानात आल्या होत्या... पण मनात नाही... ! 

मी धावत होतो शर्यतीत...!

शर्यतीची नशा होती ...!! 

पैसे... पद... प्रतिष्ठा ... मी एकेक गड जिंकत चाललो होतो... पण मन भरत नव्हतं !

हे सगळं कमावून झाल्यावर

एके दिवशी भेटायला गेलो त्यांना... आणि समजलं,की मला मुलगा समजणारे "ते" बाबा बेवारस म्हणुन रस्त्यावर "मेले"... ! 


हो... स्वर्गवासी होणं, कैलासवासी होणं आणि देवाघरी जाणं ही प्रतिष्ठितांची मक्तेदारी ...! 


"मेला" हा शब्द प्रतिष्ठा नसणारांसाठीच ठेवणीत ठेवलाय.


ते मरुन गेले... आणि जातांना भिका-यांच्या डाॕक्टरला जन्माला घालुन गेले... ! 


मी त्यांचा मुलगा म्हणुन जिवंत असुनही ते बेवारस म्हणुन गेले... ! ज्यांनी त्यांना रस काढून हाकलुन दिलं होत, त्यां लोकांत आणि माझ्यात फरक काय ?


मी अंतर्मुख झालो !


पुर्वी दिलेले त्यांचे विचार आता कानातुन मनात यायला लागले... Heart पासुन हृदयात यायला लागले... ! त्यांच्या विचारांचं मनन चिंतन व्हायला लागलं, माझ्याही नकळत .... ! आणि या दिडशहाण्या सिकंदराची नशा पुर्ण उतरली ! जग जिंकण्यापेक्षा, जगातला "माणुस" जिंकावा किंवा माणुसकीचं "जग" जिंकावं...! 

उतरलेल्या नशेनं हेच शिकवलं ! 


आणि, हा दिडशहाणा सिकंदर त्या  गाढवावरून उतरला आणि १४ ऑगस्टला त्याने या इंटरनॅशनल संस्थेचा राजीनामा दिला.आणि १५ ऑगस्ट २०१५ला  भिकाऱ्यांचा डॉक्टर म्हणून तो रस्त्यावर आला... ! स्वतःच स्वतःवर लादलेल्या गुलामगिरीतुन तो मुक्त झाला... !


मीच आखुन घेतलेल्या पद-पैसा-प्रतिष्ठा या शर्यतीतुन मी स्वतंत्र झालो १५ आॕगस्ट २०१५ ला.... म्हणुन  हा माझ्या दृष्टीने माझाही स्वातंत्र्य दिन... ! या अगोदर असलेले सर्व दिवस माझ्यासाठी पैसा असुनही "दीन" होते... 


१५ आॕगस्ट २०१५ नंतर ते पैसा नसुनही "दिन" झाले ! जवळचे लोक म्हणतात... हरलास तु आभ्या ! 


नाही...! 


शर्यतीत किती धावायचं ? कसं धावायचं ? यापेक्षा कुठं थांबायचं ... ? हे कळणं जास्त महत्वाचं ! योग्य ठिकाणी हरावंच लागतं... !


कुठं आणि कधी हरायचं हे ज्याला कळतं तो कायम जिंकतो,कारण शर्यतीत धावणाराला हे कधीच कळत नाही... की शर्यत लावणारा स्वतः कधीच पळत नाही ! 


एखाद्याला आपल्या पुढं जाताना बघुनही आपल्याला आनंद झाला तर समजावं... आपण आत्ता खरे "मोठे" झालो...बाकी वय बीय सारं झुठ ,वय फक्त केस पांढरे करण्यापुरतं येतं... जेव्हा ते मन शुभ्र करेल... तेव्हा त्याची किंमत.! नाहीतर नुसताच तो गणितातला एक फालतु आकडा !! दरवेळी मी सर्वांना दर महिन्याचा लेखा-जोखा सादर करत असतो.


१५ ऑगस्ट २०१५  ला मी इंटरनॅशनल संस्थेमधला जॉब सोडला होता,अंगावरची झूल काढली होती.मी स्वतः मुक्त झालो होतो यादिवशी आज बरोबर या गोष्टीला पाच वर्षे पूर्ण झाली,म्हणून साधारण पाच वर्षाचा लेखाजोखा आज अगदी थोडक्यात सादर करत आहे...


वाटेत भेटलेल्या भीक मागणा-या आजोबांना आदरांजली वहायची म्हणुन भीक मागणा-या समुहासाठी मी काम करायचं ठरवलं. 


ते तर गेले... पण त्यांच्यासारखे अजुन खुप आहेत... त्यांतल्या एखाद्याला हात देवु, या विचारांतुन ...! 


या समुहासाठी काहीतरी काम करायचं म्हणून रस्त्यावर फिरायला सुरुवात केली.  


सुरुवातीला मला सुद्धा कशाचीही माहिती नव्हती.मी भीक मागणारांमध्ये  मिसळायचा प्रयत्न करु लागलो. 


सुरूवातीला लाज वाटायची...!  


डोक्यावर कॅप,डोळ्यावर गॉगल आणि चेहऱ्यावर रुमाल बांधून मी त्यांच्यात मिक्स होण्याचा प्रयत्न करायचो.  


मुखवटा लावला होता... ! 


पण मला भीक मागणा-या  लोकांनी त्यांच्यात मिसळू दिलं नाही.त्यांना वाटायचं,हा पोलिसांचा खबऱ्या असेल आणि आपल्याला पकडून देईल पोलिसांत, भीक मागतो म्हणुन ... !(कारण भीक मागणं हा गुन्हा आहे कायद्यानं ) किंवा कदाचित आपल्या बरोबर धोका करून, आपली जमा झालेली भीक घेऊन कुठेतरी पळून जाईल हा भामटा ...! डाॕक्टर आहे हा xxx,गोड बोलुन आपल्या किडन्या काढून विकेल,रक्त विकेल, अजुन काही काही पार्ट काढुन हा बाजारात विकेल.... यांत आपण मरुन जाऊ... याचा भरवसा काय ? 


किंवा आपल्या पोरीबाळींना कुठेतरी फसवेल, फसवुन "धंद्याला" लावेल. (मी अगोदर शरीर विक्रय करणा-या मुलींचं पुनर्वसन करणा-या एका संस्थेत बुधवार पेठेत काम करायचो.या ताईंमध्ये माझी उठबस होती,त्यांना वाटायचं, हा माझा "धंदा" आहे, आणि मी मधला दलाल !)


या सर्व गैरसमजापोटी,या लोकांनी मला त्यांच्यात येण्यास पूर्णपणे बंदी घातलीधमक्या दिल्या,शिव्याही दिल्या.खूप वेळा अंगावर धावुन सुद्धा आले,काही लोक तर चप्पल दाखवायचे किंवा अंगावर थुंकायचे...! 


मी त्यांच्यात येवुच नये,यासाठी ते हरत-हेनं मला विरोध करायचे ! 


मी पूर्णपणे निराश झालो होतो. 


या लोकांसाठी मी माझी खुर्ची आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती. माझ्या चार ते पाच लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडलं होतं...


मी पूर्णपणे निराश झालो ! 


धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली.कुत्रं तरी बरं,त्याला कुणीतरी हाड् म्हणुन का होईना, तुकडा तरी टाकतं... मला ते ही मिळेना ! 

एकीकडे काहीही कमवत नव्हतो आणि ज्यांच्यासाठी काम करायचं म्हणुन नोकरी सोडली, ते लोक मला भाव देत नव्हते,नव्हे ते मलाच हाकलून लावायचे, जसा काही मीच भिकारी होतो... ! 


या काळात भिक्षेक-यांपेक्षा  वाईट अवस्था झाली माझी !


मी खरोखरचा बेरोजगार, 

बेनाम  झालो होतो... 


१४ आॕगस्ट पुर्वी लोक अपाॕइंटमेंट घेवुन आदरानं भेटायला यायचे ...१५ आॕगस्ट नंतर भिक्षेकरी लोक पण मला हाकलुन द्यायचे... माझ्यावर थुंकायचे ! 


किती विरोधाभास !


लाखोंचा पगार थांबल्यामुळे,माझं घर डबघाईला आलं... कालचा साहेब,आज भिकारी झाला !


एका रात्रीत रावाचा रंक होतो... आणि रंकाचा रावही होवु शकतो... ही म्हण मला माहीत होती... ! 


मी रावाचा रंक झालो होतो,त्या काळात, एका भिका-यांचं उत्पन्न माझ्यापेक्षा जास्त होतं ... !


अशा परिस्थितीत,डॉक्टर मनीषा धावुन आली. अर्धांगिनी असण्याचं कर्तव्य तीनं निभावलं ! तीने आर्थिक स्थिती सावरण्याचा प्रयत्न केला... 


आई-वडील डॉक्टर पीडी सोनवणे आणि सौ.

भारती सोनवणे यांनी मानसिक आधार दिला. 


माझा भाऊ अमित सोनवणे आणि बहीण दिप्ती सोनवणे यांनी चोहोबाजुंनी आधार दिला...!

पण तरीही मी पुर्ण ढासळलो होतो... ! आर्थिक आणि मानसिक ! यांतुनही मी रस्त्यांवर फिरायचो भिक्षेक-यांत....आणि मला ओळखणारे लोक मात्र माझी खिल्ली उडवायचे... 


काय हो, महाराष्ट्र प्रमुख,आज रस्त्यावर कसे काय तुम्ही...? खी.खी.. खी... हसत  लोक टोमणा मारायचे... !


एसी हाफीसात बसणारे तुमी... आज गटाराजवळ बसले, वास घेत गटाराचा ... आरारारा.... वाईट वाटतं बुवा तुमचं... खी..खी... खी...! 


काय वो सर... आज भिका-यांत बसले तुम्ही...? काय पाळी आली राव तुमच्यावर...  खी..खी... खी...! कशाचा सर रे तो ...? खी..खी... खी...


हि,  खी... खी... खी... मी आयुष्यात कधीही विसरु शकत नाही !!!


मात्र या खी... खी... खी...ने इरादे अजुन मजबुत केले ! 


मित्र म्हणायचे,काय बे,आब्या उतरली का रे मस्ती तुजी ?


साल्या,लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत,तु मोटा तीस मार खान निघालास होय ? स्वतःला शाना समजतो का रे ?एवढी मोठी नोकरी सोडलीस ? मर साल्या आता,नोकरी  सोडून जो शहाणपणा केला आहेस भोग त्याची फळं... त्याच लायकीचा आहेस xxxx तु... !


हि xxxx शिवी मनात रुतुन बसलीय, काट्यासारखी ... !


हि शिवी मी मनात जपुन ठेवलीय... फ्रेम करुन आणि या फ्रेमवर मी खुप प्रेम करतो ! 


मी पुर्ण डिप्रेस झालो होतो,डिप्रेस करणारे माझेच होते...!


बुडण्याचं दुःखं नसतं... मरण्याचंही नसतं, पोहता येत नाही याचंही दुःखं मुळीच नसतं... पाण्यात ढकलणारा जेव्हा आपलाच असतो ते खरं दुःखं !


मी या दुःखात बुडुन गेलो !  


तरीही निर्लज्जासारखं,मला हाकलून देणाऱ्या भिक्षेक-यांमध्ये  मी रोज रोज जायचो.नाही नाही ते त्यांचं ऐकून घ्यायचो,त्यांच्या पोटभर शिव्या खायचो,रात्री झोप लागायची नाही,कारण शिव्याशाप खावुनही शेवटी पोट रिकामंच असायचं.... ! 


हे असं एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल ३१ महिने चाललं... ! 


एकेदिवशी,अंगावर अक्षरशः किडे पडलेले, फुटपाथवर २४ वर्षे पडलेले एक आजोबा होते, त्यांच्या पाच फुटांवर सुद्धा कुणीही जात नसे.त्यांचं सर्व ड्रेसिंग करून,त्यांना स्वच्छ करून "आपलं घर" च्या विजय फळणीकर सरांकडे एका वृद्धाश्रमात ठेवलं. 


या बाबांना पूर्ण माणसात आणलं....! 


ते गेले, तेव्हा त्यांचा मुलगा म्हणुन त्यांचे अंत्यसंस्कारही केले.... ! भीक मागणाऱ्या समूहाने हे सर्व पाहिलं... ! 

यानंतरही या समुहाने मी भिक्षेक-यांसाठी केलेल्या अनंत गोष्टी दुरुन दुरुन पाहिल्या... !


आणि हळूहळू माझ्याबद्दलचं त्यांचं मत बदलत गेलं...! यार ... हे सालं आपल्यातलंच हाय... ह्यो आपल्यासाटीच कायतरी करतोय ... ! 


इतकी साधी गोष्ट त्यांना कळायला ३१ महिने गेले होते... आणि हे त्यांना कळेपर्यंत मी पण ख-या अर्थानं भिकारी झालो होतो... ! हळूहळू मला त्यांनी आपल्या मध्ये ऊठ-बस करण्याची मनापासुन परवानगी दिली. 


आॕगस्ट २०१५ ते मार्च २०१८ अशी अडीच वर्षे मी फक्त त्यांच्यात मिक्स होण्यासाठी झुंजत होतो...! 


हा काळ माझ्यासाठी अत्यंत वाईट होता... खडतर होता... ! त्यांच्याशी नातं निर्माण करण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी मला अडीच  वर्षे झुंज द्यावी लागली.या काळात त्यांच्याशी नातं निर्माण करण्यासाठी मी त्यांच्याबरोबर सतत बसत असे, उठत असे, जेवत असे,खात असे...! 


भिक्षेक-यांनी माझी अशी अडीच  वर्षे कठोर परीक्षा पाहून मला त्यांच्यातला एक होण्याची संधी दिली... !


भिकारी होणंही इतकं सोपं नसतं तर ! त्यासाठी पण परिक्षा असतात... MPSC आणि UPSC पेक्षा अवघड ! यासाठीही कठोर परिश्रम असतात तर !!! 


साधारण एप्रिल २०१८ पासून माझं डॉक्टर फाॕर बेगर्स म्हणून खऱ्या अर्थाने काम सुरू झालं. 


डॉक्टर होण्यासाठी, कलेक्टर होण्यासाठी किंवा एखादा ऑफिसर होण्यासाठी आधी तीन ते चार - पाच वर्षे कठोर अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतरच पदवी हातात मिळते.मी सुद्धा अडीच तीन वर्षे कठोर परिश्रम घेऊन भिकाऱ्यांचा डॉक्टर ही पदवी मिळवली होती, उत्तम मार्कांनी मी पास झालो होतो ! 


मी भिका-यांचा डाॕक्टर झालो होतो... ! 


हि पदवी मात्र एकदा हातात पडल्यानंतर, मी मागं वळून पाहिलंच नाही. 


सांगायला अभिमान वाटतो की,आज या भिक्षेकरी कुटुंबाचा मी कुटुंबप्रमुख आहे.मला विचारल्याशिवाय आज  कोणतीही गोष्ट आज यांच्यात होत नाही...

यांच्यामध्ये सोयरीक जुळताना सुद्धा आज माझा शब्द शेवटचा धरला जातो.यांच्या पोरांची नावं मला विचारुन ठेवली जातात...! पोरी कुठलीही गोष्ट पहिल्यांदा आपल्या आईला सांगतात.पण,आज भिक्षेकरी पोरी मला नी मनिषाला आईअगोदर आम्हाला सारं सांगतात.!


आमी आईबाप होवुन गेलो अशा पोरींचे... 


बिन बाळंतपणाची मनिषा... आई झाली त्यांची ! 


लगीन झालेली बाई,सर्व गोष्टीं आपल्या नव-याला,नायतर आपल्या बापाला सांगते... 


पोरी मलाच बाप समजाया लागल्या.... आयशप्पत ... मी पन्न्नास वर्षाच्या विवाहित पोरीचा मी बाप झालो... ! 


बापापेक्षा पोरगी वयानं मोठी... पण म्हटलं ना ? वय हा फक्त एक आकडा ! नातं महत्वाचं... आणि नात्याला वय नसतं ! भिक्षेक-यांच्या  शंभराहुन अधिक  पोरांची नावं आज "अभिजीत" आहेत...पन्नासाहुन अधिक पोरींची नाव आज "मनिषा" आहेत... !


कोणताही  पुरस्कार फिका वाटतो मला यापुढं !


आज पाच वर्षानंतर माझं भिक्षेक-यांचं कुटुंब ११०० इतक्या लोकांचं आहे.यात मला २०० ते ३०० इतके आईबाप आहेत, तितकेच आजी-आजोबा आहेत आणि या वयामध्ये मला आणि मनिषाला २०० ते ३०० पोरं सुद्धा आहेत ! आज जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती मी असेन असं मला वाटतं !


या सर्वांशी मानसिक नाती जुळवता जुळवता १०० भिक्षेक-यांना वैद्यकीय सुविधा देत आहोत. 

यांच्या,म्हणजेच आमच्या ५२ पोराबाळांचे शिक्षण  करत आहोत,याहुन आनंद कोणता ?


डोळ्यांना दिसत नसल्यामुळे या भिक्षेकरी आजी

आजोबांचे रस्त्यांत अपघात होतात,यात त्यांचे जीव जातात,हातपाय मोडतात.... ते टाळावे म्हणून अशा ५५० लोकांचे डोळ्यांचे ऑपरेशन आपण करून दिले आहेत आणि आता अपघाताचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे. 


रस्त्यावर बेवारस म्हणून कित्येक वर्षे खितपत पडलेल्या १६ आजी आणि आजोबांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वृद्धाश्रमांमध्ये निवारा मिळवून दिला आहे.ते तिथे माझे आई बाप -  आजी आजोबा म्हणूनच राहतात. 


तीथं ते आडनाव "सोनवणे" म्हणुन लावतात ! 

सोनवणे आडनावाला याआधी इतका सन्मान कधी मिळाला नव्हता... !


यांत आईबापाला आधार दिला म्हणुन स्वतःला सुदैवी समजु की आईबापाला वृद्धाश्रमात ठेवावं लागतंय म्हणुन स्वतःला दुर्दैवी समजु... ?


या विचारांत आजही झोप लागत नाही मला !


हा भीक मागणारा समुह जर कष्टकरी झाला तरच समाज त्याला गावकरी म्हणून स्वीकारेल याची मला जाणिव झाली. भीक मागणारांना गावकरी बनवायचं हे ध्येय ठरवुन "भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी" हि आमच्या कामाची टॕगलाईन मी ठरवली ! 


माझ्या शब्दांना थोडी किंमत आहे हे कळल्यानंतर मी त्यांना भीक मागणं सोडायला प्रवृत्त केलं, णि त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे वेगवेगळे व्यवसाय सुचवण्यात सुरुवात केली.याला यश येऊन ८५ कुटुंबांनी भीक मागणं सोडलं आहे आणि हि  कुटुंबं आज सन्मानाने जगत आहेत.रस्त्यावर चालणार्‍या या कामांमध्ये मला अनेक व्यक्ती आणि संस्था यांची मदत झाली.पब्लिक चॕरिटी कमिशनर आॕफिस, इन्कम टॅक्स ऑफिस, महिला व बालकल्याण, दिनानाथ मंगेशकर हाॕस्पिटल,लेले हाॕस्पिटल, पोलीस डिपार्टमेंट, पुण्यातील नामांकीत संस्था आणि व्यक्ती ! संस्थेतील बड्या अधिका-यांची नुसती भेट घेणं, "मुश्कील ही नही नामुमकीन है" ... तरीही हि मंडळी मला लहान पोरगं समजुन मला वेळ देतात... माझं ऐकुन घेतात... मदत करतात. मोठ्ठ्या खुर्चीतली ही सर्व माणसं  माझ्यासाठी मुद्दामहुन छोटी होतात ! 


लहान बाळाबरोबर खेळतांना आपणही लहान होतो तसंच...!!! 


कसे ऋण फेडावे यांचे ? 


याच प्रवासात आपल्यासारखे सहृद भेटले आणि आपण  माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकून संस्थेला देणगी देण्यासाठी सुरुवात केली.मी सुद्धा या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी करत असलेल्या कामाचा सर्व लेखा-जोखा दर महिन्याला सर्व सहृदांना  पाठवत असतो. मी करत असलेल्या कामाबद्दल सर्व बाबी प्रांजळपणे कळवतो आणि त्यांचा सल्ला सुद्धा घेतो.यातून कामांमध्ये एक पारदर्शीपणा राहण्यासाठी खूप मदत झाली, शिवाय हे काम फक्त डॉक्टरच नाही तर आपलंही आहे हे समाजाला वाटायला लागलं !


न फेडता येणा-या आपल्या ऋणांत आहे मी, माझा साष्टांग नमस्कार स्विकारावा ! 


हे सर्व करत असताना मी भीक मागणा-या व्यक्तींच्या हृदयापर्यंत  पोहोचण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यांची सुखदुःख समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो.आणि यातूनच जन्म झाला माझ्या ब्लॉगचा... !


भारतात आणि भारताबाहेर हे ब्लॉग पोहोचू लागले. 

शाबासकी मिळू लागली आणि या अशा शाबासकी ने  माझा हुरूप आणखी वाढला. काही लोक माझे ब्लॉग स्वतःचे म्हणून त्यांच्या नावावर कॉपी करून पुढे पाठवतात.या गोष्टीचा मला मुळीच खेद नाही.... पण खेद याचा वाटतो की ते फक्त माझे ब्लॉग कॉपी करतात माझं काम नाही... ! ब्लॉग कॉपी करण्याबरोबरच माझं काम जेव्हा ते कॉपी करतील तो दिवस माझ्या आनंदाचा !

जवळचे लोक मला नेहमी विचारतात आभ्या, इतकं सगळं करून तू काय कमावलंस...? 


मी खूप काही कमावलंय...


आदरणीय सिंधुताई सपकाळ उर्फ माई यांनी मला मुलगा म्हणून मला स्वीकारलं,हे पुत्रत्व मी कमावलं ! आदरणीय राणीताई बंग यांचा हात डोक्यावर मायेने पडला,तो मायेचा हात मी कमावला ...! आदरणीय डॉक्टर प्रकाश आमटे यांनी हूरूप देऊन सामर्थ्य दिले,हात धरून शक्ती दिली, ती शक्ती मी कमावली...! 


शास्त्रज्ञ आदरणीय रघुनाथ माशेलकर यांनी पोटाशी धरुन उच्चारलेले I am proud of you my child हे शब्द, या शब्दांतुन child असणं मी कमावलं ! 


सुपर कॉम्प्युटर चे जनक श्री विजय भटकर म्हणाले होते, 'मी कॉम्प्युटर बनवला,पण तू माणूस घडवतो आहेस... ' मी हा "विजय" कमावला...!


विश्वास नांगरे पाटील सर म्हणाले होते,भारीच करतोय तु राव कायतरी,आयुष्यात कधी अडचण आली तर मला फोन कर... हा घे माझा पर्सनल नंबर... हा "विश्वास" मी कमावला... !


तुमच्यासारखे जवळचे लोक मी कमावले... ! 


जन्माला येताना माकड म्हणूनच जन्माला आलो... परंतु भीक मागणाऱ्या लोकांमध्ये राहून मी हळूहळू माणूस बनत गेलो... माणुस म्हणुन चेहरा मी कमावला... ! 


ते खरं रे आभ्या परंतु या बदल्यात तु गमावलंस किती.? 

अरे हो, खरंच मी खूप काही गमावलं सुद्धा आहे... 

ह्या कामानं मी... मी पणा गमावला ! आपण कुणीतरी आहोत याचा अहंकार मी गमावला ! केवळ स्वतःपुरतं जगायचं हा स्वार्थ मी याच कामा मध्ये गमावला ! 

स्वतःच्या चेहर्‍यावर लावलेला खोटा खोटा मुखवटा मी गमावला सर आणि साहेब यांची खोटी प्रतिष्ठा गमावली. !पोरा - लेकरा-  बाळा या उबदार शब्दात मी  विसावलोय आता...मला खुर्चीपेक्षा ... उकीरडा आवडायला लागलाय आता ! मला उष्टं... खरकटं... शिळं ... आणि नासकं जेवण आवडतं हल्ली आणि आवडत राहील, तोपर्यंत .... जोपर्यंत माज्या भिकारी आईबापाला सन्मान मिळत नाही तोपर्यंत ! माझा भिक्षेकरी जोपर्यत कष्टकरी होत नाही तो पर्यंत तो गांवकरी होणार नाही... ! 


माझ्या आईबापाला जेव्हा मी भिक्षेकरी म्हणुन स्वतंत्र करेन तोच माझा स्वातंत्र्य दिन असेल..!


मी तर सारा लेखाजोखा मांडलाय  थोडक्यात...

आता अजुन कमवायचं राहिलं काय... ? 

आणि गमवायचं राहिलं काय ?

माय बापहो...तुम्हीच निवाडा करा... !


जयहिंद !!! 


१५ आॕगस्ट २०२०


डाॕ.अभिजीत सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स

भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर

१०/१२/२३

स्वतः व ईश्वर यांत जगाची वाटणी करणारा अलेक्झांडर..Alexander who divides the world between himself and God..

शइकडे प्लेटो आदर्शभूत राज्याची स्वप्ने खेळवीत असता,

तिकडे ग्रीक शहरे शुद्र व निरर्थक युद्धांनी व क्षुद्र वैरांनी स्वतःचा नाश करून घेत होती! अथेन्स विरूद्ध कॉरिन्थ,

कॉरिन्थ विरुद्ध थीब्स विरुद्ध स्पार्टा व स्पार्टी विरुद्ध अथेन्स असा चक्रव्यूह होता,परस्परद्वेष व परस्पर संशय यांचे हे असे कधी न संपणारे रहाटगाडगे,द्वेषमत्सराचे हे चक्र जणू गमतीने फिरत होते.विषारी,मारक असा हा खेळ खराच; पण त्यातच त्यांना जणू रस वाटत होता.

गोडी वाटत होती! बारीक- सारीक गोष्टीसाठीही ते एकदम युद्ध पुकारीत. युद्धही एक नित्याची,मामुली बाब बनली. उत्तमोत्तम माणसे रणांगणावर मरत होती.सारी ग्रीक संस्कृती विनाश पावणार असे दिसत होते. साऱ्या ग्रीक संस्कृतीवर गडप होण्याची वेळ आली होती.अथेन्समधील आयसॉक्रेटिससारख्या काही मुत्सद्दयांनी हा धोका ओळखला व आपल्या राष्ट्राचे प्राण वाचावेत,म्हणून ग्रीसचे एक संयुक्त संस्थान बनवावे असे त्यांनी सुचविले.

तो विचार उत्कृष्ट होता;परंतु तो प्रत्यक्षात यावा,ती योजना अंमलात यावी यासाठी ज्याची योजना करण्यात आली,तो माणूस योग्य नव्हता.चुकीच्या माणसाची निवड झाली.

मॅसिडोनियाचा राजा फिलिप्स याच्यावर हे संयुक्त संस्थान बनविण्याचे काम सोपविण्यात आले.मॅसिडोनिया म्हणजे ग्रीस देशाचा उत्तर भाग हा जरा रानटी होता.इतर भागांइतका सुसंस्कृत नव्हता.सर्व ग्रीकांचे एक संयुक्त राष्ट्र बनविण्यासाठी आयसॉक्रेटिसने दिलेले आमंत्रण त्याने स्वीकारले.फिलिप्सने मॅसिडोनियन लोकांची एक सेना उभारलेली होतीच;ती बरोबर घेऊन युद्धाने त्रस्त झालेल्या व कंटाळून गेलेल्या या द्वीपकल्पावर तो तुटून पडला व त्याने सारी स्वतंत्र ग्रीक शहरे जिंकून त्यांचे एक संयुक्त राष्ट्र बनविले.अशा रीतीने ग्रीक गुलामांचे हे संयुक्त राष्ट्र जन्माला आले.


राजा फिलिप हा अलेक्झांडरचा बाप.फिलिप सुशिक्षित;

पण जंगली मनुष्य होता.तो ग्रीक लोकांच्या ज्ञान-विज्ञानाचे कौतुक करी.त्याने त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला.त्यांची संपत्ती लुटण्याला तो अधीर झाला.तो सायरसच्या नमुन्याचा योद्धा होता.तो युद्ध पुकारावयाला भिणारा नव्हता.तो स्वतः सैन्याबरोबर असे. त्याची महत्त्वाकांक्षा अमर्याद होती.त्याला सारे जग खेळवावयाला हवे होते.इराणवर हल्ला करण्यासाठी त्याने आधी ग्रीस हातात घेतला.तो ग्रीसमधून पर्शियावर उडी मारणार होता. साम्राज्ये निर्मिण्याची अपूर्व बुद्धिमत्ता असणाऱ्यांमध्ये फिलिप हा 'साम्रज्यांचा संस्थापक' या नात्याने अद्वितीय होता. त्याच्या कुटुंबाव्यतिरिक्त बाहेर सर्वत्र त्याचा शब्द म्हणजे कायदा होता.एपिरसच्या राजाची मुलगी ऑलिम्पियस ही त्याची पत्नी. तिच्याच पोटी अलेक्झांडर जन्मला.ती धर्मवेडी होती.ती आपल्या नवऱ्याचा फार तिरस्कार करी व त्याचे जीवन करता येईल तितके दुःखी करणे,हा आपला धर्म मानी.तो चिडावा,

संतापावा,म्हणून ती म्हणे,"अलेक्झांडर माझ्या पोटचा असला तरी तो तुमचा नाही!तो एक देव पुत्र देवोद्भव आहे." या दंतकथेवर फिलिपचा विश्वास होता की नाही कोण जाणे,परंतु अलेक्झांडरचा मात्र मरेपर्यंत संपूर्ण नसला,तरी अर्धवट विश्वास होता. अलेक्झांडर अनेकदा आग्रहाने सांगे, "मी दैवी आहे- देवापासून जन्मलो आहे."


मॅसिडोनियाच्या राजाच्या राजवाड्यातील जीवनात सदोदित काही ना काही धर्मविधी चाललेले असावयाचेच;

त्यांत भांडणे, मारामाऱ्या,द्वेषमत्सर यांचेही मिश्रण असे.आई अलेक्झांडरला फूस देई व तो बापाचा अपमान करी.राजवाड्यात एकदा एक मोठी मेजवनी चालली होती,पिता व पुत्र दोघेही दारू पिऊन बेहोश झाले होते.

अलेक्झांडरने फिलिपचा अपमान केला,बाप मुलाला भोसकण्यासाठी धावला.पण सुरा नीट खुपसण्याइतकी शुद्ध त्याला नसल्यामुळे तो तोल जाऊनजमिनीवर पडला.आणि भावी आयुष्यात व्यभिचार, बदफैलीपणा व दिग्विजय करण्यास अलेक्झांडर वाचला.अशा वातावरणात अलेक्झांडर वाढला. पित्याने त्याला ग्रीक शिक्षण चांगले मिळावे म्हणून खटपट केली.त्याने मुलासाठी अती उत्कृष्ट व नामांकित शिक्षक जमविले.

कवी, तत्त्वज्ञानी,संगीतज्ज्ञ,वैय्याकरणी,अलंकार शास्त्रज्ञ,सारे राजवाड्यात येऊन अलेक्झांडरला सुसंस्कृत करू लागले,त्याला माणसाळवू लागले.कारण तो जरा रानवट होता.त्याला थोडी तरी माणुसकी यावी म्हणून हे सारे आचार्य खटपट करू लागले.या नामांकित शिक्षकांत जगप्रसिद्ध ॲरिस्टॉटल हा होता.ॲरिस्टॉटल म्हणजे विद्वत्तेचे व ज्ञानाचे आश्चर्यकारक भांडार ! एका लहानशा डोक्यात इतक्या विद्या मावत तरी कशा? शंभर माणसांचे ज्ञान त्याच्या एकट्याच्या डोक्यात होते.तो सर्व विषयांवर सारख्याच अधिकाराने लिहू व बोलू शके राजकारण,

नाटक,काव्य,सृष्टिज्ञान,वैद्यक,मानसशास्त्र,इतिहास,तर्क,ज्योतिर्विद्या,नीतिशास्त्र,गणित,अलंकार

शास्त्र,प्राणिशास्त्र थोडक्यात बोलावयाचे तर सर्व ज्ञाने व विज्ञाने त्याच्यासमोर हात जोडून उभी राहत.तरीही त्याला अलेक्झांडरवर फारसा परिणाम करता आला नाही.


इतकेच काय;पण राजघरण्यातील कोणावरच त्याचा फारसा प्रभाव पडला नाही.फिलिप, अलेक्झांडर,

ऑलिम्पिस,ही तीनही माणसे 'ग्रीक संस्कृतीची पूजक' म्हणून मिरवीत;परंतु ते नुसते सोंग होते.ग्रीक संस्कृतीच्या झिरझिरीत बुरख्याखाली त्यांचा रानवटपणा लपलेला होता. ही तीनही माणसे अंतरंगी रानमांजरासारखीच दुष्ट व हलकट होती.फिलिप पर्शियावर स्वारी करावयास निघणार,तोच त्याचा खून झाला. त्याच्या पत्नीच्याच चिथावणीमुळे तो खून झाला असे म्हणतात.मृत सम्राटाला जो मान दिला गेला होता,तोच मारेकऱ्यांच्याही प्रेतास मिळावा, तितक्याच थाटाने व समारंभाने मारेकऱ्याचाही देह पुरला जावा,असा हट्ट तिने धरला होता.


फिलिप मेला,तेव्हा अलेक्झांडर वीस वर्षांचा होता.

कसलेल्या व शिस्तशीर सैन्याचा तो मालक होता.

पूर्वेकडील देशांवर तुटून पडावयाला सारी सिद्धता होती.सैनिक अपूर्व अशा सेनानीची जणू वाटच पाहत होते.ज्याला कल्पनाशक्ती व प्रतिभा आहे,अहंकारआहे,

साहसी वृत्ती आहे.परिणामांचा विचारही न करता जो बेछूटपणे पुढे जाईल.सर्व जगावर स्वामित्व मिळविण्याचे कार्य हाती घेण्याइतपत ज्याच्याजवळ हिंमत व कौशल्य आहे,असा सेनापती सैन्याला हवा होता. अशा सेनापतीच्या नेतृत्वाखाली वाटेल तिथे जावयाला ते तयार होते.हे सारे गुण तर अलेक्झांडरच्या ठायी होतेच,पण यांशिवाय आणखीही पुष्कळ होते.आपल्या कर्तृत्वाविषयी अद्यापि कोणाला काही शंका असेल,तर ती दूर करण्यासाठी तो एकदम उभा राहिला. मॅसिडोनियाच्या उत्तरेकडील जाती-जमातींना त्याने शरण यावयास लावले आणि नंतर मॅसिडोनियाचे जू झुगारून देऊन पुन्हा स्वंतत्र होऊ पाहणाऱ्या इतर ग्रीक शहरांवर तो विजेसारखा चालून गेला.फिलिपच्या मरणाची वार्ता ऐकून ही शहरे बंड करून उठली होती. अलेक्झांडरने थीब्स शहराला वेढा घातला व फारशी अडचण न पडता ते जिंकून घेतले. आपल्या रक्ताळ मुठीचा इतरही सर्व ग्रीक लोकांना कायमचा धाक बसावा म्हणून त्याने थीब्स शहराचा संपूर्ण विध्वंस केला,शहरातील सहा हजार लोकांस ठार मारले व तीस हजार लोकांना गुलामकरून बाजारात विकले. 


नंतर तो दक्षिणेकडच्या ग्रीक राज्यांकडे वळला. जिथे जिथे तो जाई,तिथे तिथे त्याच्याभोवती खुशामत्ये गोळा होत,त्याची खोटी स्तुती करीत, कोणी त्याला भेटी देत.

बंडखोर ग्रीकांना प्रायश्चित्त मिळालेच होते,त्यामुळे नीट धडा शिकून त्यांनी अलेक्झांडर हाच आपला पुढारी अशी घोषणा केली व ते त्याच्या पूर्वेकडील विस्तृत प्रदेशावरच्या स्वारीत सामील झाले.अलेक्झांडरने ग्रीस देशात सर्वत्र विजय संचार केला.त्याला कोणीही कोठेच विरोध केला नाही असे नाही.तलवारीने विरोध करणारे जरी त्याला फारसे भेटले नाहीत,तरी निराळ्याच रीतींनी त्याला गप्प बसविण्याचे प्रकार काही ठिकाणी झाले,

अलेक्झांडरविषयी आपणास खरोखर काय वाटते हे त्याच्या तोंडावरसांगण्याइतपत धैर्य व स्वातंत्र्य असलेले काही लोक अद्यापि होते.अलेक्झांडर जेव्हा कॉरिन्थ येथे आला,तेव्हा वीराला शोभेसे त्याचे स्वागत झाले.हजारोंनी जयघोष केले.पण तिथे जमा झालेल्या स्तुतिपाठकांत त्याला डायोजिनीस दिसेना. 


डायोजिनीस हा या जगात कशातही काही अर्थ नाही.सारे पोकळ व भोंगळ,दिखाऊ व व्यर्थ आहे असे मानणारा 'सिनिक' होता.कॉरिथ मधल्या एकाच माणसाला अलेक्झांडर किंमत देई,तो म्हणजे डायोजिनीस.त्यानेही आपली स्तुती करावयास यावे असे अलेक्झांडरला वाटत होते;पण तो वृद्ध पाखंडी आला नाही. कॉरिन्थजवळच्या एका खेड्यात तो शांतपणे व निश्चितपणे बसला होता.

जेत्यांचा गर्व व सम्राटांचा दिमाख दोहोंविषयी तो बेपर्वा होता, त्याला त्याचे काडीइतकेही महत्त्व वाटत नव्हते, तो मॅसिडोनियन सैन्याची ती प्रचंड व विजयी मिरवणूक पाहावयाला आला नाही की विजयी राजाचे दर्शन घडावे म्हणून त्याने धडपडही केली नाही.डायोजिनिस आपणाकडे येत नाही असे पाहून अलेक्झांडरनेच त्याच्याकडे जावयाचे ठरविले.डायोजिनीस एकटाच सूर्यप्रकाशात ऊन खात बसला होता.तिथे जाऊन मैत्रीची व उदारपणाची बतावणी करीत त्याने विचारले, 'मी तुम्हाला काय देऊ? तुमच्यासाठी मी करण्यासारखे काही आहे काय?" 'होय' तो वृद्ध व बेरकी डायोजिनीस म्हणाला,"एक गोष्ट तुम्ही खास करू शकाल; सूर्यप्रकाशाच्या व माझ्या दरम्यान तुम्ही उभे आहात,तेवढे दूर व्हाल तर बरे."


त्या म्हाताऱ्याच्या या उद्धटपणाबद्दल त्याला शासन न करता विचार चिंतन करण्यासाठी त्याला तिथेच सोडून अलेक्झांडर निघून गेला! ॲरिस्टॉटलचा शिष्य तो उगीच नव्हता झाला.तो आपल्या एका खुशामत्यास म्हणाला,"मी जर अलेक्झांडर नसतो तर डायोजिनीस होणे मी पसंत केले असते." या म्हणण्यावर उत्तर द्यावेसे डायोजिनीस याला वाटलेच असते,तर तो म्हणाला असता,"मी जर डायोजिनीस नसतो तर अलेक्झांडरखेरीज दुसरा कोणीही व्हावयाला मी तयार झालो असतो."


अलेक्झांडर अती महत्त्वाकांक्षी होता.त्याच्या महत्त्वाकांक्षेने त्याच्या डोक्यातील सारे तत्त्वज्ञान पिटाळून लावले होते,इतर सारे विचारही पार हाकलून दिले होते.तो मागेपुढे पाहणारा नव्हता, तो बेछूट व बेदरकार असा केवळ सैतान होता! जेथे पाऊल टाकण्यासही इतरांस भय वाटे.तिथे तो खुशाल उडी घेई व निःशंकपणे घुसे,जे सर्वस्वी अशक्य वाटे,त्याबाबतही तो जुगार खेळे व बहुतकरून विजयी होई.एखादी दुस्तर नदीही अलेक्झांडर सहज तरून जाई.एखाद्या दुर्लघ्य डोंगरावरून शत्रूला हुसकावयाचे असेल तर तो ती टेकडी चढून जाई व शत्रूला पळावयाला लावी.देव नेहमी त्याच्या बाजूने लढतात,अशी लोकांची समजूत झाली होती.


तो सरळ,साधाभोळा प्लुटार्क लिहितो, "पॅपिलियन किनाऱ्याजवळील समुद्राच्या लाटा तेथील खडकाळ टेकड्यांच्या अगदी पायथ्यापर्यंत येतात.पण अलेक्झांडरला नीट जाता यावे म्हणून या लाटाही मागे हटल्या व त्यांनी त्याला रस्ता दिला." 


जेव्हा त्याने फोनिशियनांच्या टायर शहराला वेढा घातला.

तेव्हा तेथील लोकांनी शहरांतील अपोलो देवाचा पुतळा दोरखंडांनी जाम बांधून टाकला व 'आता कसा अपोलो अलेक्झांडरच्या बाजूला जातो,पाहू या' असे ते स्वतःशी म्हणाले.त्या देवाने आपणास सोडून अलेक्झांडरकडे जाऊ नये.म्हणून त्यांनी त्याला खिळे मारून जागच्याजागी खिळवून टाकले.पण प्लुटार्क सांगतो,

"टायरमधील जनतेचे ते सारे प्रयत्न झुगारून देऊन अपोलो अखेर अलेक्झांडरकडे गेला तो गेलाच.त्याचे शरीर दोरखंडांनी व खिळ्यांनी जखडून टाकण्यात आले असले तरी मन मोकळेच होते;त्यामुळे अपोलोचा आत्मा अलेक्झांडरच्या वतीनेच लढला."


अलेक्झांडर आश्चर्यकारक वेगाने आशियातील देश एकामागून एक घेत चालला.त्याला हे असंभाव्य विजय सारखे मिळत गेल्यामुळे त्याचे शत्रूही एक प्रकारच्या भोळसट आदराने त्याच्याकडे पाहू लागले.हा कोणी देवच आकाशातून पृथ्वीवर अवतरला आहे असे त्यांस वाटू लागले.अलेक्झांडर एकाच वेळी अनेक ठिकाणी असतो अशा कथा पसरू लागल्या. त्याच्याविरुद्ध शत्रूनी उभरलेल्या प्रचंड फौजा न लढता आपोआप मोडल्या.

शत्रूचे सैनिक लढनासेच झाले.त्या प्रचंड सेनांचा पराजय अलेक्झांडरने नाही केला,तर अलेक्झांडरविषयी त्यांना वाटणाऱ्या भीतीने केला..


अलेक्झांडर वेडा होता खराच,पण तो तेजस्वी वेडा होता.त्याचे वेडेपण क्षुद्र नव्हते;त्यातही एक प्रकारची ऐट होती.आपण देव आहोत असे त्यालाही वेडाच्या लहरीत वाटे.देव समजून आपली पूजाअर्चा लोकांनी करावी,असा आग्रह तो धरी.एकदा त्याच्या मांडीवर प्रहार झाला. तेव्हा इतरांच्या रक्ताप्रमाणेच आपलेही रक्त आहे असे पाहून त्याला विस्मय वाटला,कारण अमर अशा देवांच्या नसांतून जे दिव्य रक्त वाहते,तेच आपल्याही नसांत आहे अशी त्याची समजूत होती.लढाईच्या वेळी तो आकाशातील देवतांना आपल्या साहाय्यास बोलावी;तो त्यांना उद्देशून म्हणे,"मी तुमचा भाईबंद आहे,मी मर्त्य नाही,हे विसरू नका."त्याचे उत्कट व निष्ठावंत भक्तही त्याचा हा अहंकारी पागलपणा पाहून कधी कधी थक्क होऊन जात ! स्वतःच्या क्षुद्र अहंकाराच्या आरशात तो आपले रूप पाही.जगातल्या साऱ्या क्षुद्र व दुबळ्या लोकांमध्ये आपण ज्यूपिटर प्रमाणे शोभत आहोत असे त्याला वाटे.ज्यूपिटर म्हणजे ग्रीकांचा युद्धदेव,जणू, ग्रीकांचा देवेन्द्रच! अधिक पुढे जावयाचे नाही असे ठरविल्यावर 


हिंदुस्थानातून जेव्हा तो परत फिरला,तेव्हा त्याने आपल्या घोड्यांचे लगाम,चिलखताचे तुकडे व शिरस्त्रांणांचे भाग मुद्दाम मागे ठेवले.या साऱ्या वस्तू हेतुपुरस्सरच आकाराने प्रचंड अशा बनविण्यास आल्या होत्या.त्या पाहून मॅसिडोनियन सैन्यांतील लोक व घोडे प्रचंड आकाराचे,अजस्र होते,असे हिंदुना वाटावे,असा हे अवशेष ठेवण्यात त्याचा हेतू होता.त्याला स्वतःचे सर्व काही पवित्र वाटे.


आशियातील एका नव्या शहराला त्याने आपल्या

घोड्याचे व दुसऱ्याला आपल्या कुत्र्याचे नाव दिले! त्याची ही आत्मप्रदर्शनाची बारात,त्याची ही जाहिरातबाजी तिरस्करणीय व किळसवाणी वाटते.जेव्हा त्याची विजयी सेना कार्यानियांतून जात होती,तेव्हा त्याने एका प्रचंड व्यासपीठावर मेजवानी मांडली होती! ते व्यासपीठ आठ घोडे ओढीत होते व त्यावर खान-पान चालले होते! त्या चालत्या व्यासपीठावर तो आपल्या खुशमस्कऱ्यांसह खात-पीत बसला होता. शहरामधून मूर्खाची ती मिरवणूक गेली,तेव्हा मॅसिडोनियन मेजवानीमधील पोकळ ऐट व क्षुद्र अवडंबर पाहून पौर्वात्य दिङ्मूढ झाले! हा मूर्खपणा की पराक्रम,हे त्यांना समजेना.

त्याची वृत्ती इंग्लंडमधील हवेप्रमाणे चंचल होती. त्याचा स्वभाव क्षणाक्षणास पालटे.एका क्षणात तो सौम्यपणा सोडून सैतानीपणा स्वीकारी! एकदा त्याच्या सेना वाळवंटातून जात असता एका शिपायाने आणून दिलेले पेय त्याने नाकारले;कारण,सेनापतीनेही सर्वसामान्य शिपायांबरोबर तहान सोसली पाहिजे,त्यांचे जीव तहानलेले व्याकूळ होत असता आपण पेय पिणे योग्य नव्हे,असे त्याला वाटले.पण पेय देणाऱ्या एका नोकराकडून त्याचा चुकून अपमान झाला. त्याबरोबर त्याने दोन्ही हातांनी त्याचे केस धरून त्याचे डोके जोराने भिंतीवर आपटले!त्याचे डोके ठिकाणावर असे,तेव्हा तो होमर वाची,नशेच्या भरात त्याने आपला प्रियतम मित्र क्लायटस याला ठार मारले,पण शुद्धीवर आल्यानंतर त्याला झालेला पश्चात्ताप त्याच्या दारूच्या धुंदीतील खुनशीपणाइतकाच तीव्र होता. स्तुती करणाऱ्यांना तो लुटीतील भाग देई.पण 


कॅलिस्थेनिस नामक एक तत्त्वज्ञानी त्याची देव म्हणून पूजा करीना,म्हणून त्याने त्याला फाशी दिले! त्याचा सर्वांत मोठा डरायस नामक शत्रू मेला तेव्हा तो रडला.पण रोजची करमणूक म्हणून तो हजारो युद्धकैद्यांची कत्तल करी!


तो स्वतःच्या प्राणांविषयी जसा बेफिकीर होता, तसाच इतरांच्याही प्राणांविषयी बेपर्वा होता. त्याचा,

एक आवडता शिपाई आजारी पडला व वैद्यांच्या सल्ल्याप्रमाणे न वागल्यामुळे मेला.पण अलेक्झांडरने 'या वैद्याने माझा शिपाई मारला' असे म्हणून त्या वैद्याला क्रॉसवर चढविले! तरीही त्याचे मित्रवियोगाचे दुःख कमी होईना, तेव्हा त्याचा विसर पडावा म्हणून तो अकस्मात् एका शहरावर चालून गेला व त्याने तेथील सर्व नागरिकांची कत्तल करून त्याने त्यांचा आपल्या मृत मित्राला बळी दिला. 


शत्रूकडील सेनापती त्याच्या हाती पडत,तेव्हा त्यांना कधीकधी तो अत्यंत उदारपणे वागवी,तर कधी कधी जवळच्या झाडावर फाशी देई. अलेक्झांडरची स्वारी कशी वागेल हे त्या त्या प्रसंगी त्याची जी लहर असेल,तीवर अवलंबून असे.एखाद्याला ठार करावे असे त्याच्या मनाने घेतले,की तो स्वतःच आरोप करणारा,न्याय देणारा व न्यायाची अंमलबजावणी करणारा म्हणजे ठार मारणारा बने.शत्रूना छळण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या शोधून काढण्यातही त्याचे डोके कमी चालत असे नाही.प्लुटार्क म्हणतो, एकदा दोन झाडे वाकवून त्यांच्यामध्ये त्याने एका कैद्याला बांधविले व मग मुद्दाम वाकवून भिडविलेली ती झाडे एकदम सोडून देण्याचा हुकूम केला.तसे करताच ती झाडे इतक्या वेगाने आपल्या मूळ स्थितीतच गेली की,त्या दुर्दैवी कैद्याचे उभे दोन तुकडे झाले व प्रत्येक झाडाने त्याचे अर्धे अर्धे रक्तबंबाळ शरीर उचलून वर नेले व जणू विजयाची ढाल म्हणून मिरवले! त्या कैद्याचा अशा राक्षशी छळवणुकीने वध केल्यावर अलेक्झांडर होमर वाचीत पडला! त्याच्या बहुमूल्य वस्तूंत होमरच्या काव्यांची एक सुंदर प्रत सदैव असे.इलियडमधील युद्धप्रसंग वाचणे आपणास फार आवडते असे तो म्हणे, इलियडमधील समर-वर्णने वाचूनच तो युद्धप्रिय बनला.विजयध्वजा सर्वत्र मिरवावी,अजिंक्य म्हणून सर्वत्र गाजावे असे त्याला त्यामुळेच वाटू लागले होते.होमरच्या काव्यांनीच त्याला समर स्फूर्ती दिली होती.तो लढत नसे किंवा होमरही वाचीत नसे,तेव्हा तो दारू पिऊन पडत असे. रणांगणांवरील पराक्रम असोत किंवा दुसरी दुष्कृत्ये अथवा व्यसने असोत,तो सर्वच बाबतीत इतरांवर ताण करी.जेथे जाऊ तिथे आपण बिनजोड असलो पाहिजे असेच जणू तो म्हणे! सामान्य लोकांइतपत अतिरेक त्यास पसंत पडत नसे.त्याचा अतिरेक अमर्याद,अतुल असे.तो पिऊ लागला,की पिंपेच्या पिंपे रिकामी करी आणि मग दारूच्या धुंदीत एखाद्या मत्त देवाप्रमाणे वाटेल ते करीत सुटे.एकदा तो एक मेजवानी देत असता एका वेश्येचा सन्मान करीत होता; नशा केलेली ती रमणी त्याला म्हणाली,"इराणी राजाच्या राजवाड्याला आग लावा.

आणि त्याने आग लावली! एकदा तर त्याने एक फारच मोठी गंमत केली.दारू पिण्याची मॅरेथॉन शर्यत लावून सर्वांत जास्त दारू पिणारास त्याने सोन्याचा मुकुट बक्षीस म्हणून ठेवला ! ज्याने तो सुवर्णमुकुट मिळविला तो तीन गॅलन दारू प्याला होता! पण त्या नशेतच तो मेला.दुसरे एकेचाळीस जणही त्या स्पर्धेत भाग घेऊन मरण पावले." एकदा नाचरंग,मेजवानी असा स्वैराचार रात्रंदिवस सारखा चालल्यामुळे तो तापाने आजारी पडला व थोड्याच दिवसांनी ख्रि.पू. ३२३ या वर्षी तो मरण पावला.

मरणसमयी तो केवळ तेहतीस वर्षांचा होता; पण एवढ्या लहान वयात इतके देश उद्ध्वस्त करणारा,मानवांवर इतके अन्याय करणारा,त्यांच्यावर दुःखाच्या इतक्या प्रचंड राशी ओतणारा,त्यांच्या अशी कत्तली करणारा प्राचीन इतिहासात दुसरा कोणी आढळेलसे वाटत नाही.

अलेक्झांडरचे अवास्तव स्तोम माजविणाऱ्या इतिहाकारांनी त्याच्याभोवती एक तेजोवलय निर्माण करून ठेवले आहे.जे जे उच्च आहे,थोर आहे,सद्गुणी आहे, त्या सर्वांची आदर्शभूत मूर्ती म्हणजे अलेक्झांडर असे त्यांनी लिहून ठेवले आहे.नवनवी पुरे-पट्टणे वसविणारा,रानटी जातींना माणसाळविणारा,राष्ट्राराष्ट्रांत व्यापार बाढविणारा रस्ते बांधून दळणवळण वाढविणारा,इत्यादी प्रकारे त्याचे वर्णन करण्यात येत असते.परंतु अशा या दुष्ट-शिरोमणीला,या हडेलहप्पी सैतानाला,अशा रीतीने दिव्य संतपण दिलेले पाहून शिसारी येते! संस्कृती,सुधारणा यांचा थोडाही विचार या घमेंडखोराच्या डोक्यात येत नसे.अलेक्झांडर फक्त अलेक्झांडरलाच पूजी. अलेक्झांडरचीच पूजा,

अलेक्झांडरचीच स्तुती! त्याने शहरे बांधली तशीच धुळीसही मिळविली ! ती उभारणी वा संहारणा त्याच्या स्वत:च्या वैभवासाठी होती.मानवजातीचा विचारही त्याच्या डोक्यात शिरत नसे.जी थोडीफार शहरे त्याने वसविली,त्यांबद्दल त्याचे पोवाडे गाण्यात येतात; पण त्याने शेकडो शहरांची राखरांगोळी केली त्याचे काय? अलेक्झांडरच्या युद्धामुळे ग्रीक संस्कृतीची बीजे आशियाभर पेरली गेली असे मानणे हा केवळ मूर्खपणा होय.वस्तुतः त्याने संस्कृतीची बीजे पेरली नसून सूडाची, द्वेष-मत्सरांची व भावी युद्धांची मात्र बीजे सर्वत्र पेरली.


युरोपची संस्कृती पूर्वेकडे पसरली ती खरोखर अलेक्झांडरच्या तलवारीमुळे नव्हे,तर सोलोन,

हिराडोटस,प्लेटो यांसारख्या ग्रीक कवींनी व तत्त्वज्ञान्यांनी केलेल्या कामगिरीमुळे. जग सुधारावे,ते अधिक उदार व सुसंस्कृत करावे, त्याची अधिक चांगली सहकारी संघटना करावी,अशी भव्य ध्येये अलेक्झांडरच्या डोळ्यांसमोर कधीही नाचली नाहीत! अशा ध्येयांनी त्याचे अहंकारी मन कधी उच्च बनलेच नाही.आपल्या बुसिफालस नामक घोड्याला त्याने जसे फटके मारून वठणीवर आणले, त्याच्यावर स्वार होता यावे म्हणून त्याला ज्याप्रमाणे माणसाळविले,त्याप्रमाणे मानवांवर आपणाला सत्ता गाजविता यावी म्हणून त्याने त्यांना तलवार दाखवून हीन-दीन केले.


२४.०८.२३ या भागातील पुढील भाग..