* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: दुसरा वुइल्यम / Wuilliam II

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

6/20/26

दुसरा वुइल्यम / Wuilliam II

लिखित इतिहासात १९१४ सालचे महायुद्ध म्हणजे, अत्यंत भयानक आपत्ती होय.हिची जबाबदारी कोणाही एका व्यक्तीवर वा राष्ट्रावर नसून सर्व मानवजातीवरच आहे.एकोणिसाव्या शतकात सारे जगच युद्धाचे विचार शिकत होते.शांततेचे विचार जणू जगातून लुप्तच झाले होते! 'आपापल्या जाती-जमातीपुरते वागताना सभ्य गृहस्थ राहा;पण राष्ट्राचे एक घटक या दृष्टीने गुंड बना' असा संदेश प्रत्येक राष्ट्र आपापल्या लोकांना देत होते. कल्पना करा की,हत्यारबंद लोक बोस्टन,बर्लिन वा बगदाद शहरात घुसले असून कोण अधिक लुटतो,

शेवटचा कैसर सम्राट दुसरा वुइल्यम,मानवजातीची कथा,हेन्री थॉमस, अनुवाद - सानेगुरुजी,मधुश्री पब्लिकेशन.

लुबाडतो व सर्वांना दहशत वा दरारा बसवतो,याबाबत त्यांची आपसात स्पर्धा लागली आहे व तिथे पोलीस वगैरे कोणी नाहीत,कायदेशीर साधन नाही. या हत्यारबंद गुंडांविरुद्ध उपाययोजना करील असे संघटित सामाजिक यंत्रही नाही.हुबेहूब अशीच स्थिती एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्थात व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जगातील बलाढ्य राष्ट्रांची होती.

युरोपातील प्रबलतर राष्ट्र जागतिक प्रमाणावर उठाठेवी व दंगामस्ती करणारी होती.युरोपात एक विशिष्ट मनोवृत्ती सर्वत्र बळावत होती. ही विशिष्ट राष्ट्रीय मनोवृत्ती जंगलच्या कायद्यावर उभारलेली होती.'बळी तो कान पिळी' हे या सर्वांचे ब्रीदवाक्य होते. 'आमच्या देशातले जे आम्हाला हवे असते ते आम्ही विकत घेतो, पण इतर देशांतले जे आम्हाला हवे असते,ते आम्ही चोरून घेतो.' असे सारी बलाढ्य राष्ट्र म्हणत.ती चढाऊ राष्ट्र घाणेरड्या व निंद्य खेळात मग्न झाली.पूर्वे कडील दुबळी राष्ट्र लुटायची हा जणू सर्वांचा धर्मच झाला! ती याला 'डाकूगिरी' म्हणत नसत,तर 'संरक्षण' म्हणत असत,फ्रान्सने अल्जीअर्स,मादागास्कर आनाम व टोंकिन यांचे संरक्षण करण्याचे ठरवले व त्यांना आपल्या पंखाखाली घेतले.ऑस्ट्रिया तुर्काच्या विरुद्ध रक्षण द्यायला उभा राहिला.बोस्निया व हर्झगोविना या प्रदेशांना त्याने जवळ घेतले.रशिया पोर्ट आर्थरचे रक्षण करायला गेला व जपानशी १९०४-०५ साली त्याचे युद्ध झाले.जर्मनी आफ्रिका व आशिया या खंडांत संरक्षणासाठी धावू लागला.त्याचे हे संरक्षित टापू होते. इंग्लंड सर्वांत जास्त चढाईखोर होते.हिंदुस्थान,इजिप्त, आयर्लंड इत्यादी दहाबारा देशांवर इंग्लंडने आपले पंख पसरले होते.रस्त्यातल्या एखाद्या लहान मुलाजवळची उसाची कांडी घेण्याचा जसा कोणालाही बिलकूल हक्क नसतो,तसाच या प्रबळ राष्ट्रांना दुबळ्या राष्ट्रांची मालमत्ता लुबाडण्याचा यत्किंचितसुद्धा हक्क नव्हता. पण राष्ट्रीय नीती व्यक्तीच्या नीतीच्या पाठीमागे शेकडो वर्षे असते.आपापल्या शासनसंस्थांच्या वतीने कारभार हाकणारे मुत्सद्दी आंतरराष्ट्रीय कारभारात असे वागतात की,तसे खाजगी नागरिक या नात्याने वागण्याचे ते स्वप्नातही मनात आणण्याचे धाडस करणार नाहीत. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, ऑस्ट्रिया व इटली इत्यादी राष्ट्रांनी जगाला चक्क जाहीर केले की, 'दुबळ्या राष्ट्रांवर सत्ता गाजवणे हे आमचे ईश्वरदत्त कर्तव्य आहे. हे भाग्य आम्हाला ईश्वराने दिले आहे!' व ती सर्व दुबळ्या राष्ट्रांना लुटावयास व गुलाम करायला पुढे सरसावली.वसाहतींचे साम्राज्य मिळवण्यासाठी वेडी स्पर्धा जोरात सुरू झाली. या स्पर्धेतून लवकर अथवा उशिरा जागतिक युद्ध पेटणार,यात शंका नव्हती, कारण या चढाऊ राष्ट्रांच्या परस्पर हितसंबंधांचे पुष्कळ वेळा खटके उडत,संघर्ष होत.ज्यांनी उत्कृष्ट प्रदेश आधीच बळकावले होते, त्यांच्याकडे इतर देश द्वेषाने व मत्सराने बघत.कारण त्यांना लुटीतला फारसा फायदेशीर वाटा मिळालेला नसे.पुष्कळदा एकाच तुकड्यावर अनेकांचे गिधाडी डोळे लागलेले असत.या स्पर्धेतून शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरू झाली.तोफांचा आवाज ईश्वर आवाजाप्रमाणे पूजिला जाऊ लागला.

सारे जग युद्धोत्सुक झाले. 'युद्ध', 'युद्ध' असा आवाज सर्वत्र घुमू लागला.प्रत्येक देशातील हरएक तरुणास शिकवण्यात येई की,दुसऱ्या देशातील दहांना तो भारी आहे.ही लढाऊ मनोरचना ऑस्ट्रिया जर्मनीतल्याइतकीच इंग्लंडमध्येही ठसविण्यात आलेली होती.जुन्या जगातील इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली, रशिया ही प्रबळ राष्ट्र १९१४ मधील महायुद्धासाठी अगदी कंबर कसून तयार होती.खुंट्या नीट पिरगळलेल्या होत्या डेव्हिड स्टार जॉन्सन याच्या शब्दात सांगायचे म्हणजे 'युरोपचे पिस्तूल भरलेले होते आणि एकदम स्फोट झाला.'म्हणून मागील महायुद्धाला साम्राज्यशाही स्पर्धा हेच मुख्य कारण होते.हे क्लेमेंकोच्या कारकिर्दीवरून लक्षात येईल.

क्लेमेंकोला 'वाघ' असे नाव होते व त्याबद्दल त्याला अभिमान वाटे. किप्लिंग हा या साम्राज्यशाहीचा महाकवी होता.काळ्या लोकांचे ओझे गोऱ्या लोकांना कर्तव्य म्हणून वाहावे लागते व गोरे लोक जगाचे प्रभू होण्यासाठीच जन्मलेले आहेत असे तो म्हणे.नित्शेचे मन सौंदर्य व वेडेपणा यांच्या दरम्यान लंबकाप्रमाणे हेलकावे खात असे.नित्शे स्वतः कोमल मनाचा व प्रेमळ स्वभावाचा होता. पण त्याने जगाला द्वेषाचे व युद्धाचे उपनिषद दिले.झार निकोलस याच्या धोरणात हीच साम्राज्यशाहीची उद्दामता होती.त्याची कारकीर्द ज्यूंच्या छळासाठी व फटाक्यांच्या थैमानासाठी प्रसिद्ध आहे.पण सम्राट दुसरा वुइल्यम यांच्या अहंमन्य शब्दांनी व रानवट कृतींनी या सर्वांना रंगरूप आले.

वुइल्यम होएनझोलर्न याने एकट्यानेच मानवजातीला युद्धात ढकलले असे नव्हे.तो अनेक साम्राज्यवाद्यांपैकी एक होता.पण त्याचा आवाज सर्वांहून बुलंद होता. त्याची घनगर्जना होती.जे अपराधी होते,युद्ध पेटवण्याचा गुन्हा करणारे होते,त्यात हा वुइल्यम पटकन उमटून पडे. दुसरे गुन्हेगार आपले पाप गुप्तपणे,मुत्सद्देगिरीच्या पडद्याआड,गाजावाजा न करता,मोठ्या शिताफीने करीत.त्यामुळे पुष्फळ अविवेकी इतिहासकार त्यामागील महायुद्धातल्या माणुसकीस काळीमा लावणाऱ्या गोष्टींचे खापर एकट्या वुइल्यम कैसरच्याच डोक्यावर फोडतात.

पण आपण लक्षात ठेवले पाहिजे की,कैसर हा एकटाच काही गुन्हेगार नव्हता.विसाव्या शतकातला पोषाख केलेल्या,पण केवळ रानटी व अत्यंत प्राचीन काळच्या जंगली पूर्वजांप्रमाणे असलेल्या,साम्राज्यवादी लोकांचा तो एक प्रतिनिधी होता.जवळजवळ प्रत्येक देशात असे लोक होते आणि तेच राज्यकारभार चालवीत असत,ही बस्तुस्थिती ध्यानी धरून कैसर वुइत्वमचे जीवन आपण पाहू या.

कैसर एकोणीस वर्षांचा असताना म्हणजे १८५९ साली त्याची आजी,इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया,ही हिंदुस्थानची सम्राज्ञी म्हणून घोषणा करण्यात आली. त्याच वेळी त्याने मनाशी खूणगाठ बांधून ठेवली की,मी जेव्हा जर्मनीचा राजा होईन तेव्हा मीही असाच सम्राट होईन व वाटेल ती किंमत देऊन जर्मन साम्राज्य वाढवीन.त्याचे वडील तिसरे फ्रेडरिक हे १८८८ सालच्या जून महिन्यात वारले.त्यांनी फक्त तीनच महिने राज्य केले.वुइल्यमला राज्याभिषेक झाला. त्याने गादीवर येताच चॅन्सेलर बिस्मार्क याला काढून टाकले व आपण एकट्याने राज्य चालवायचे ठरवले.वुइल्यम फार उंच नव्हता.त्याचा डाव हात सुकलेला होता.त्याची बुद्धीही काही मोठी अपूर्व नव्हती,पण तो स्वतःला आपल्या अहंकाराच्या आरशात पाही. 'आपण महाप्रभू आहोत', 'ईश्वराच्या खालोखाल जर कोणाचे वैभव असेल, तर ते आपलेच', असे त्याला वाटे. त्याने आपल्यासमोर जणू जिहोव्हाचा आदर्श ठेवला होता. तो तद्‌नुसार वागत होता.त्याच्याप्रमाणे आपणाला बनवू पाहत होता.आपले यशोवैभव वाढवण्यासाठीच मानवजात आहे,असे त्याला वाटे.कीर्तीची अपरंपार भूक त्याला होती.आपल्या पिढीतील जास्तीतजास्त मोठा आवाज करणारा आपणच व्हावे असे त्याला वाटे. सारी राष्ट्रे आपणाकडे पाहत राहतील अशा रीतीने आपल्या तलवारीचा खणखणाट करण्याचे त्याने ठरवले होते.ब्रिटानिया समुद्राची स्वामिनी होती.कैसरनेही भूमीचा तसाच समुद्राचाही स्वामी होण्याचे ठरवले. त्याचे निर्दय व कठोर डोळे जगाला कः पदार्थ मानीत. त्याच्या मिशांची दोन्ही टोके वर पिळलेली असतजणू तो स्वर्गालाही तुच्छ मानीत होता,स्वर्गालाही ऐट दाखवत होता !

सारी राष्ट्र तलवारीच्या साधनाने आपापली राज्ये-साम्राज्ये वाढवण्यासाठी धडपडत होती,स्पर्धा करीत होती."ठीक." कैसर म्हणाला, "या सर्वांना जर्मन राष्ट्र तलवार कसे धरते ते दाखवून देतो." सारे इंग्लंड युद्धभावनांनी नाचत होते. पुढील गीत सर्वांच्या ओठावर होते - "आम्हाला लढण्याची इच्छा नाही,पण लढण्याची वेळच आली तर आमच्याजवळ भरपूर आरमार आहे,भरपूर द्रव्यबळ आहे व भरपूर मनुष्यबळही आहे."

इंग्लंडचे आव्हान वुइल्यमने स्वीकारले,"मीही माझ्या जर्मनीला माझ्या हयातीत सैन्य,संपत्ती, व गलबते मांनी संपन्न करतो..”अशी घोपना करून तो प्रतिज्ञेवर सांगे.

की, "माझे सारे जर्मन राष्ट्रच शिपाईगिरीचा पेशा पत्करील.विजयी चढाई हेच माझे जीवितकार्य!" राज्यावर येताच तो म्हणाला,"सैन्यावरच माझी सारी भिस्त आहे.'आपल्या जर्मन राष्ट्राला शिस्त शिकवायला, शिक्षण द्यायला व संघटित करायला तो उभा राहिला. कत्तलीसाठी तो त्यांना पुष्ट करू लागला.इतिहासातील अत्यंत अव्यंग असे युद्धतंत्र त्याने निर्माण केले व ते खरोखरच इतके परिपूर्ण होते की,ते शेवटी वाटोळे फिरले व निर्मात्याचाच निःपात करते झाले.

वुइल्यम जगभर प्रवासार्थ निघाला.लंडन, रोम, व्हिएन्ना, अथेन्स, कॉन्स्टॉटनोपल इत्यादी शहरांतून तो मिरवीत गेला.आपण किती अद्भुत पुरुष आहोत हेच जणू जगाला दाखवू पाहत होता.तो पॅलेस्टाईनला गेला व घोड्यावर बसून जेरुसलेम शहरात शिरला.देवाप्रमाणेच त्याला मिरवत नेण्यात आले.त्याच्या खास प्रवेशासाठी तेथील भिंतीला मुद्दम नवीन दरवाजा करण्यात आला होता.नेहमीच्या सामान्य दरवाजातून जाणे कैसरला कमीपणाचे होते..जगातील सर्वांत मोठे आरमार आपल्यापाशी असावे म्हणून १८९५ साली त्याने इंग्लंडशी स्पर्धा सुरू केली. तो म्हणाला, "माझे लष्कर ज्या दर्जाचे आहे,त्याच पराकोटीला माझे आरमार नेल्यावाचून मी स्वस्थ बसणार नाही."

आणि इतर राष्ट्रही स्वस्थ बसली नव्हतीच, डेन्मार्क व हॉलंड यांसारखी काही राष्ट्र सोडून दिली तर इतर प्रत्येक देशाच्या अंदाजपत्रकात उत्पन्नाचा नव्वद टक्के भाग युद्धावरच खर्च होई,संरक्षक व आक्रमक दृष्टींनी दोस्ती करण्यात येई.इंग्लंड, फ्रान्स व रशिया यांनी आपला एक दोस्त संघ बनवला,तर जर्मनी व ऑस्ट्रिया यांनीही आपली गट्टी केली.ज्याच्यावर सूर्य कधीही मावळत नाही,असे आपले अवाढव्य साम्राज्य वाढवण्याचा निर्धार इंग्लंडने केला होता. आशिया व आफ्रिका खंडांतले आपले साम्राज्य टिकवायचे व १८७० साली जर्मनीने बळकावलेले अल्सेस व लॉरेन्स हे प्रांत परत घ्यायचे,असे फ्रान्सच्या मनात होते. रशिया भयभीत झाला होता.वसाहतींच्या चढाईत जर्मनीची स्पर्धा पाहून त्याच्याही तोंडाला पाणी सुटले.त्याचाही स्वार्थ जागृत झाला.युद्ध लवकर सुरू व्हावे म्हणून शक्य ते सर्व ऑस्ट्रिया व जर्मनी यांनी केले.कैसरला गर्व चढला होता.तो दटावीत होता,दरडावीत होता,आपल्या मोठेपणाची गर्जना करीत होता आणि महायुद्धाचा दिवस कधी येतो,याची वाट पाहत होता.

१९१४ साली दोन्ही पक्ष तयार झाले होते.युद्ध सुरू करण्यासाठी सारेच जण एखाद्या निमित्ताची वाट पाहत होते.फर्डिनंड हा ऑस्ट्रियाच्या गादीचा वारस होता.तो बोस्नियाची राजधानी सारायेव्हो येथे गेला होता.हा प्रांत आरंभी सव्हियाचा होता.तो तुर्कांनी घेतला होता व तुर्काच्या हातून सरतेशेवटी ऑस्ट्रियाने बळकावला होता.१९१४ सालच्या जूनच्या अठ्ठाविसाव्या तारखेस एका देशप्रेमी सर्व्हियन विद्यार्थ्याने सारायेव्हो येथे फर्डिनंडचा खून केला.सर्व्हियाचा प्रदेश ऑस्ट्रियाने गिळंकृत केलेला पाहून तो विद्यार्थी चिडला होता.

ऑस्ट्रियाने जुलैच्या अठ्ठावीसाव्या तारखेस सर्व्हियाशी युद्ध पुकारले.रशिया अशा एखाद्या संधीची वाटच पाहत होता.सर्व्हियाला मदत करण्याच्या मिषाने ऑस्ट्रिया व जर्मनी यांच्याविरुद्ध आपल्या सैन्याच्या हालचाली त्याने केल्या.जर्मनीने रशियाविरुद्ध व रशियाचा गुप्त मित्र फ्रान्स याच्याहीविरुद्ध सुरू युद्ध पुकारले.युद्धाच्या पहिल्या घोषणेनंतर आठच दिवसांत हा वणवा सर्वत्र भडकला.युरोपातील सर्व प्रमुख राष्ट्र कत्तली करण्याचा गुन्हा करू लागली.रक्ताचा सडा घालण्यात आला.एक कोटी मानवांचा संहार झाला.

१९१७ साली अमेरिकाही युद्धात ओढली गेली.भीती, स्वार्थ व अभिमान यांच्या संमिश्र भावना अमेरिकेस युद्धात खेचत्या झाल्या. 'जर्मनांचा जय झाला तर?' अशी भीती खरोखरच काही अमेरिकनांना वाटे विजयी कैसरचीही त्यांना धास्ती वाटे.दोस्तांना दारूगोळा पाठवणाऱ्या काही कारखानदारांना जर्मनीच्या पाणबुड्यांचा त्रास होत होता. १९१५ सालच्या मे महिन्यात जर्मन पाणबुड्यांनी योग्य सूचना देऊन लुसिटानिया ही अमेरिकन बोट बुडवली.ही दोस्तांसाठी तोफा नेत होती.काही उतारूही तिजवर होते.प्रेसिडेंट वुइल्सने कैसरला एक कडक पत्र लिहिले.पण आपल्या देशबांधवांना तो म्हणाला, "मी क्षुद्रासारखे एकदम युद्ध सुरू करणार नाही." १९१६ साली वुइल्सनच पुन्हा प्रेसिडेंट निवडला गेला.त्याच्या निवडणुकीचे घोषवाक्य 'मी अमेरिकेला युद्धापासून अलिप्त ठेवले' हे होते. प्रत्येकाच्या ओठावर 'मी माझा मुलगा लढाईत मारण्यासाठी नाही वाढवला!' हे गाणे होते. अमेरिकेतील बहुजन समाजाचे मत या गीतात होते. पण प्रेसिडेंट म्हणून निवडून आल्यानंतर दोनच महिन्यांत वुइल्सनला जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारावे लागले. 'अमेरिकेच्या गलबतास धक्का लावू नका' असे त्याने कैसरला बजावले, तेव्हा कैसरने जबाब दिला की, 'आमच्याविरुद्ध असणाऱ्या दोस्त राष्ट्रांना दारूगोळा पुरवणे बंद करा.' वुइल्सनसमोर दोनच मार्ग होते. एक तर दारुगोळा पाठवणे बंद करणे किंवा जर्मनीबरोबर युद्ध पुकारणे. त्याने पहिला मार्ग पत्करला असता तर शस्त्रास्त्रे व दारूगोळा तयार करणाऱ्या कारखानदारांचे नुकसान झाले असते.पण अमेरिकेत शांतता राहिली असती.वुइल्सनने दुसरा मार्ग पसंत केला.तो शाळा मास्तराच्या वृत्तीचा होता.दुसऱ्यांसाठी तो कायदा करी.पण स्वतःकधी कोणाचा सल्ला घेत नसे. कैसरने वुइल्सनचे मानण्याचे नाकारले.तेव्हा त्याला धडा शिकवण्यासाठी त्याने अमेरिकन मुलांना युरोपात पाठवण्याचे ठरवले.तेव्हा त्याला धडा शिकवण्यासाठी त्याने अमेरिकन मुलांना युरोपात पाठवण्याचे ठरवले. प्रथम युद्ध न करण्याची स्वाभिमानता वुइल्सनजवळ होती;पण आता युद्धापासून दूर राहणे त्याच्या गर्वास व अभिमानास पटेना.

कैसर गमावली जाणारी लढाई लढत होता.म्हणून तर त्याने निकरावर येऊन निर्दयपणे आणि हट्टाने पाणबुड्यांची लढाई सुरू केली होती.त्याने शेवटचा पत्ता टाकला होता.अमेरिका युद्धात ओढली गेली.कैसरचे लष्करी तंत्र कोलमडण्याला आता केवळ काही महिनेच अवकाश होता. ते १९१८ सालच्या उन्हाळ्यात गडगडले.जर्मन सैन्याचा धुव्वा उडाला! ते पळत सुटले ! कैसर गलबतात बसून पळून गेला.भेदरलेल्या सशाप्रमाणे तो हॉलंडात गेला.त्याने लाखो लोकांना युद्धाच्या खाईत लोटले.पण ते मरणसंगीत स्वतः ऐकण्याचे धैर्य मात्र त्याला नव्हते.हॉलंडमध्ये डॉर्न येथे तो हद्दपारीत राहिला.त्याच्या जीवनातील आवाज आता बंद पडला,मंद झाला.आता गडबड नव्हती,गर्जना नव्हती,सारे शांत होते. लष्करी आक्रमणकाळात तो जितका सुखी होता.त्यापेक्षा अधिक सुखी तो हॉलंडमध्ये असेल अशी आशा करू या.

त्याच्या आडदांड कारकिर्दीने जगाला दोन गोष्टी पटवल्या... १.राजेशाही ही आता एक जुनाट गोष्ट झाली होती. २. यापुढे आंतरराष्ट्रीय.अनियंत्रित स्पर्धेच्या जागी आंतरराष्ट्रीय सहकार्य आले पाहिजे,तरच मानवजात वाचण्याचा संभव आहे. १९१४ सालच्या युद्धासारखी जगव्याळ आपत्ती पुन्हा जगावर येता कामा नये.

।।। समाप्त ।।।