* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२४/२/२४

दारा शुकोह - योद्धयांमधील कवी/Dara Shukoh - A poet among warriors

ऑगस्ट,१६५९ महिना संपायला आला आणि आग्र्याच्या शाही दरबारातील सर्वांना माहीत झालं,की दारा शुकोहचा लवकरच शिरच्छेद करण्यात येणार आहे.दारा शुकोह हा सूफी संतांचा,कवींचा लाडका असा बादशाह शाहजहानचा सर्वांत ज्येष्ठ,लाडका पुत्र वारसाहक्काची लढाई हरला होता.अत्यंत कपटी औरंगजेबाने त्याला मात दिली होती.त्याच्या स्वतःच्याच सैनिकांनी त्याचा विश्वासघात केला,जुन्या सरदारांनी त्याला आयत्या वेळेस सोडून दिलं,त्याची पत्नीही मरण पावली (बहुधा तिनं आत्महत्या केली, असा कयास आहे.) आणि ज्याला तो स्वामिभक्त समजत होता,अशा माणसाने त्याला आयत्या वेळेस दगा दिला अशा त्या दारा शुकोहला आपल्यावर काय भोग ओढवलेले आहेत,याची जाणीव होती.आपल्या

बंदिवासातून त्यानं भावाला पत्रही लिहिलं होतं की,मी उर्वरित जीवन नव्या बादशाहच्या भल्यासाठी प्रार्थना करण्यात व्यतीत करीन. परंतु त्याच्या विनवणीला नकार मिळाला. नाहीतरी विजयी औरंगजेबच्या मनात कित्येक दशकांपासून दाराबद्दल तिरस्कार साठून राहिला होता.

त्यामुळे नंतर खोटाच खटला दाखल करण्याचं नाटक रचून त्यानं आपल्या ज्येष्ठ बंधूवर हर त-हेचे आरोप लावले.त्यात राजाच्या निकालात चुकीची ढवळाढवळ करण्यापासून ते मुस्लीम धर्माशिवाय अन्य धर्मावर विश्वास ठेवण्याचा प्रवाद असे सर्व त-हेचे आरोप होते.हे सर्व आरोप खरे आहेत असे सिद्ध करून धाकटा बंधू औरंगजेब याने आपण स्वतः फारच मोठे नैतिक आहोत असा आव आणून दाराला मृत्युदंड फर्मावला.तोपर्यंतचं दाराचं जीवन वैभवात आणि सुखसुविधांमध्ये गेलं होतं. 


वडिलांच्या दरबारात तो सुवर्णासनावर बसत होता.त्या सुखी दिवसांत त्याला 'नशीबवान शाहजादा' असंच म्हटलं जात होतं.ते आसन आणि ते नशीब- दोन्ही त्याच्याकडून अचानक हिसकावलं जाण्यापूर्वी त्याला दरवर्षी चांदीचे दोन कोटी रुपये उत्पन्न दिलं जात होतं.तो पित्याचा सर्वांत जवळचा सल्लागार होता त्यामुळेच अन्य भावांच्या मनात त्याच्याबद्दल खूप मत्सर निर्माण झाला होता. दाराचं व्यक्तिमत्त्व लोभस होतं.त्यानं सर्वसंग परित्यागाविषयी भावुक काव्य लिहिलेलं असलं, तरी प्रत्यक्षात तोही थोडाबहुत स्वार्थी होताच.


औरंगजेबाने दख्खनच्या शिया सल्तनतींना खिंडीत गाठलं की तिथले सुलतान दारालाच आपली निवेदनं पाठवायचे.

कारण त्यांना माहीत होतं की,हा ज्येष्ठ शाहजादाच बादशाहच्या विश्वासातला आहे.महत्त्वाकांक्षी औरंगजेबाची ताकद दिवसेंदिवस वाढते आहे हे दाराला बघवत नव्हतंच.त्यामुळे तो आपल्या वडिलांचं मन वळवायचा आणि भावाच्या योजनांना सुरुंग लावायचा.

त्यामुळे खरोखरच,दारा त्या वारसाहक्काच्या लढाईत जिंकला असता,तर त्यानंही आपल्या स्पर्धकांवर औरंगजेबाहून जास्त दया दाखवली असती अशी अपेक्षा करण्याचं काही कारण नाही.त्याच्या स्वभावात काही अंगभूत वैगुण्यं होती. फ्रैंकॉईस बर्नियर हा दाराचा खाजगी डॉक्टर होता.त्यानं लिहिलंय की,आपण खूपच श्रेष्ठ आहोत असं त्याला वाटायचं.आपण आपल्या मनशक्तीने काहीही साध्य करू शकतो असा त्याचा समज होता.त्याला सल्ला द्यायचं धाडस करणाऱ्यांकडे तो तुच्छतेने बघायचा त्यामुळे 'त्याचे बंधू त्याच्या विरुद्ध गुप्त कारस्थानं रचत आहेत' हे त्याच्या कानी घालायला खरे मित्रही कचरत होते.स्वतःच्याच पायांवर कुऱ्हाड मारणाऱ्या या फाजील आत्मविश्वासाच्या जोडीला त्याच्याकडे उच्च बुद्धिमत्ता होती.पण त्यामुळे संकुचित मनोवृत्तीच्या गर्विष्ठ लोकांना तो अजिबात आवडत नसे. "जिथं एकही मुल्ला नसतो तिथं स्वर्ग असतो," असं तो म्हणायचा. साहजिकच दाराबद्दल सहानुभूती असणारे मुल्लाही त्याच्यापासून दूर जायचे.त्यातच भर म्हणून त्याचे वडील त्याच्यावर आपलं सगळं प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव करायचे.त्यामुळेही दाराने बरेच शत्रू गोळा केले. औरंगजेबासारख्याच्या मनात तर त्याच्याबद्दल तीव्र तिरस्कारच निर्माण झाला.दारानं काढलेली एक मोठी लष्करी मोहीम अपयशी ठरली.

कारण सैन्यातील सर्वसामान्य सैनिकांशी त्याचे भावबंधच जुळलेले नव्हते.त्याउलट औरंगजेबाचे आणि अन्य भावांचे तसे बंध त्यांच्या सैन्याशी असल्यानेच त्यांना लढायांत यश मिळत होतं. त्याचे भाऊ तलवार गाजवत असताना इकडे दारा मात्र सूफी संत गोळा करत बसला होता. परंतु तसं पाहता या मोगल शाहजाद्याचे दोष कुठल्याही मानवात असू शकत होते.त्याचं मन त्याच्या समकालीनांच्या मनापेक्षाही अधिक वेगाने धावत होतं.

वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्यानं पहिलं पुस्तक लिहिलं आणि शिरच्छेद होण्याच्या दोन वर्षं अगोदर तो काव्याच्या अत्यंत नितांतसुंदर ओळी लिहीत होता.औरंगजेबाने नेमलेल्या एका कवीने तक्रार केली आहे की,दारा सदैव ब्राह्मण,योगी आणि संन्यांशांच्या संगतीत असतो.हे सगळे भ्रामक गोष्टी शिकवणारे बिनकामाचे गुरू फारच विद्वान आणि शाहणपणाचे खरे धारक आहेत असं त्याला वाटतं.त्यानं 'माजमा अल बहरेन' (दोन महासागरांचा संगम) हा ग्रंथ लिहिला तेव्हा त्याला पणजोबा अकबराप्रमाणेच दोन धर्मांचं मीलन घडवून आणून समाजासाठी नवीन दृष्टी निर्माण करण्याची इच्छा होती.दारानेच उपनिषदांचा अनुवाद संस्कृतातून फारसीत केला.या अनुवादामुळेच तर आणखी एका शतकानंतर फ्रान्समध्ये व्होल्टेअरला भारतीय ज्ञानानंदात डुंबता आलं.शाहजहानच्या या कमनशिबी मुलाने उपनिषदांबद्दल लिहिलं,"हे जगातले सर्वांत पहिले स्वर्गीय पुस्तक होते यात काहीच संशय नाही." परंतु हेच वाक्य नंतर त्याचा घात करण्यासाठी वापरण्यात आलं. म्हणजे त्याने तसे बोलून कुराणाला थेट आव्हानच दिलं आहे असा आरोप करण्यात आला.तो एकूण काळच हिंसेचा होता.अशा त्या हिंसक काळात एकीकडे बौद्धिक यशप्राप्तीच्या शिखराकडे जात असताना तो शस्त्रसामर्थ्यावर दावा सांगण्यात मात्र अपयशी ठरला.

खरंतर त्या गुंतागुंतीच्या जगात राजेपद टिकवण्यासाठी तेच खरं गरजेचं होतं.शाहजहान आजारी पडला, तेव्हा त्याच्या या मुलाने डावपेचाच्या गंभीर चुका केल्या.

बादशाही सैन्य आणि खजिन्याच्या चाव्या ताब्यात असल्यामुळे अजूनही त्याला जिंकण्याची शक्यता होती.

परंतु युद्धभूमीवर तर औरंगजेबच खरा 'लढवय्या' होता आणि दारा मारून मुटकून चिलखत घालायला लावलेला 'कवी' होता. युद्धात पराभव झाल्यावर तो आग्र्याहून पळून गेला.मग या प्रांतातून त्या प्रांतात भटकत राहिला.

बाप अश्रू गाळत असताना औरंगजेबाच्या माणसांनी पुन्हा एकदा त्याचा पराभव केला.खरंतर तेव्हा संधी होती तर त्यानं पर्शियाला पळून जायला हवं होतं.तसं केलं असतं तर अकबराच्या पित्यासारखा (बाबरासारखा) तो लढण्यासाठी नंतरच्या कुठल्यातरी दिवशी परतू शकला असता.परंतु त्याचा अंदाज चुकला.त्यानं एका माणसाला पूर्वी मदत केली होती.त्यानंच त्याला दगा दिला आणि 'दारा'वर त्याच्या मरणाचं वॉरंट बजावलं.उदाहरणार्थ,

त्याची पत्नी वारंवार सांगत होती की आपण अजून पुढे जाऊ या.परंतु याला खूपच लवकर वाटू लागलं की आता आपण संकटातून बाहेर पडलो आहोत.तसंच एका प्रादेशिक सरदाराने त्याचं स्वागत केलं तेही दाराने चटकन स्वीकारलं.खरंतर त्याचे सोबती त्या माणसाकडे संशयाने पाहत होते.शेवटी तो खोटा ठरला आणि सोबत्यांचे संशयच खरे ठरले.बेड्यांनी जखडलेल्या अवस्थेत दाराला दिल्लीला आणलं,तेव्हा खरोखरीची खंत वाटून लोकांनी आसवं गाळली.बर्नियर लिहितो, "समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यातून दुःखाच्या कर्कश किंकाळ्या ऐकू येत होत्या.स्त्री-पुरुष-लहान मुलं अशा प्रकारे आक्रोशत होती की,जणू त्यांच्यावरच कसलंतरी भयंकर संकट कोसळलं आहे. त्यानंतर या स्पर्धकाला नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने ऑगस्ट महिन्याच्या शेवटल्या दिवशी माणसं पाठवली.दाराचा सर्वांत धाकटा मुलगा त्याच्या सोबत मारला गेला आणि मोठा मुलगा पकडला गेला.पुढे त्याच्यावर हळूहळू विषप्रयोग करून त्यालाही ठार मारण्यात आलं. या सर्व क्रूर राजकीय घटनांतून सुटण्याचा धार्मिक मार्ग मोठ्या कौशल्याने तयार करण्यात आला.औरंगजेबाच्या बखरकाराने लिहून ठेवलं आहे की दाराला वेदांचं फार आकर्षण होतं.या 'पाखंडी' ग्रंथांतील लेखनावरच त्याचं लक्ष केंद्रित झालेलं होतं.त्याशिवाय तो धर्मभ्रष्टही होता त्यामुळे त्याने सत्ता ग्रहण केली असती तर मुस्लीम धर्माचा पायाच धोक्यात आला असता आणि इस्लामी उपदेशांच्या जागी काफर आणि ज्यू धर्माची बडबड ऐकावी लागली असती.अशा प्रकारे भावाची भावाने केलेली हत्या हा एकाच वेळेस राजाचा न्याय होता आणि देवाचा क्रोधही होता,असं त्या बखरीत लिहिलं आहे.(गणिका,महात्मा,आणि एक इटालियन ब्राह्मण मनछ एस.पिल्लई,अनुवाद-सविता दामले) 


आता असला काही विचार करणं व्यर्थ असलं तरी समजा,आपण असा विचार केला की,दारा जिंकला असता आणि औरंगजेब जिंकला नसता तर मोगल इतिहासाने कसं वळण घेतलं असतं? त्याच्या काळचा 'अकबर' बनून तो त्यांच्या साम्राज्याचं रक्षण करू शकला असता का? म्हणजे जिथं आवश्यक तिथे तलवार वापरून पण त्याच वेळेस राजनैतिक मुत्सद्देगिरीही न घाबरता त्यानं अवलंबिली असती का? अकबराने राजपूतांना आपल्या बाजूने वळवलं तसं त्याला मराठ्यांना वळवता आलं असतं का? की तो दीर्घ काळ कवी आणि संतांच्या संगतीतच राहिला असता आणि त्यामुळे राजकारणपटुत्व आणि सत्ता बाजूलाच राहिली असती? नक्की काय झालं असतं हे सांगणं तसं अवघडच आहे. पण एका इतिहासकाराने लिहून ठेवलं आहे,

की काहीही झालं असतं,तरी दारा शुकोहच्या नशिबी अपयशच लिहून ठेवलं होतं.त्याच्यात बरेच दोष होते पण काही चांगले गुणही होते;परंतु शोकांतिकेचा आणि निराशेचा नायक म्हणून त्याला स्थान देण्यात एक गोष्ट कारणीभूत ठरली.ती म्हणजे,तो त्याच्या काळाच्या मानाने खूपच सौम्य आणि सभ्य होता. 

२२/२/२४

निरोप घेता / Saying goodbye.. २



'मी एकेका झाडलेल्या बाराबरोबर त्यांचा जणू जमिनीवर सडाच पडला;पण तरीही वाचालेल्यांचं त्या ठिकाणाबद्दलचं प्रेम वाढून ते पुन्हा आले फिरून तिथेच आणि आपल्या मृत भाईबंदांकडे पाहत बसले आणि अशा एका वेगळ्या अनुकंपेने आणि जिव्हाळ्याने की, माझ्या हातातली गन गळून पडली...'


२० व्या शतकाच्या दुसऱ्या दशकापर्यंत,ते पक्षी इतक्या सातत्याने टिपले गेले की,अगदीच थोडे पिंजऱ्यात ठेवलेले तेवढे वाचले.१९१८ साली त्यांच्यातला सिनसिनाटी प्राणिसंग्रहालयात असणारा 'इंका' नावाचा शेवटचा पॅराकीट मेला. (तिथेच त्याआधी चार वर्षं शेवटचं 'पॅसेंजर-कबुतर' मेलं होतं!) आणि मग त्याला पेंढा भरून काळजीपूर्वक अगत्यानं जपून ठेवण्यात आलं,

आता तुम्हाला तो 'इंका' बघायचा असेल, तर कुठे जावं लागेल माहितीये? कुणालाच ठाऊक नाही,कारण त्या प्राणिसंग्रहालयातून तो एकमेव नमुनाही गहाळ झालाय ! आणि वर लिहिलेल्या गोष्टीत काहीसं गूढ आणि चक्रावणार काय असेल तर हे की पीअल अतिशय मोठा पक्षिप्रेमी होता आणि तरीही त्याला शॉटगनने त्यांना मारताना काही वाटू नये? त्याने का ठार करावं इतक्या संख्येत त्या पक्ष्यांना काय कारणं सांगता येईल? केवळ त्याला ते तसं करणं आवडलं म्हणून? हे मात्र खरंच आश्चर्यच म्हणाव लागेल की,


या जगात प्राण्यांमध्ये,पक्ष्यांमध्ये ज्यांना खरोखरच इंटरेस्ट होता, अभ्यास करावासा वाटत होता अशीच माणसं त्या त्या पक्ष्यांचा, प्राण्यांचा नामशेष व्हायला कारणीभूत ठरली आहेत.. 


आणि या वर्णनात दुसऱ्या कोणाहीपेक्षा अचूक तंतोतंत फिट्ट बसतो तो लायनेल वॉल्टर रॉथचाईल्ड ! एका प्रतिष्ठित बँकिंग कुटुंबातला दुसरा बॅरन.त्या कुटुंबाचं शेंडेफळ !रॉथचाईल्ड काहीसं विक्षिप्त आणि एकांतप्रिय माणूस होता. बकिंगमशरमधल्या ट्रिंग इथल्या आपल्या घराच्या नर्सरी विंगमध्ये त्याने १८६८ ते १९३७ मधलं आपलं संपूर्ण आयुष्य काढलं त्या खोलीतलं फर्निचरसुद्धा त्याच्या बालपणी होतं, तेच कायम होत आणि तो झोपायचा तो बिछानासुद्धा लहानपणापासूनचाच होता (जरी पुढे त्याचं वजन १३५ किलो झालं होतं!) त्याला 'नॅचरल हिस्टरी' विषयात कमालीची रुची होती आणि वेगवेगळ्या वस्तू जमवायचा त्याला छंद जडला होता,तो एकाच वेळी माणसांच्या गटांना (चारशे माणसं एकावेळी) दुनियेच्या वेगवेगळ्या भागांत पाठवायचा कुणी डोंगरमाथ्यांवर,कुणी दाट जंगलात... कायम नवनवीन नमुने शोधण्यासाठी आणि विशेषतः असे नमुने जे उडू शकत असतील (अर्थात पक्षी) मग ती मंडळी पक्ष्यांना पकडून क्रेटमध्ये किंवा बॉक्समध्ये भरून ट्रिंग इथल्या रॉथचाईल्ड इस्टेटवर पाठवायची आणि मग ते तिथे पोहोचल्यावर रॉथचाईल्ड आणि त्याचे मदतनीस त्या सगळ्यांची नोंद करून ठेवायचे आणि विश्लेषण करायचे मग त्यावर त्यांनी पुस्तकं काढली, शोधनिबंध लिहिले जवळपास १२०० ! एकूण बघता,रॉथचाईल्डच्या त्या निसर्ग - इतिहासाच्या कारखान्यात २० लाखांहून अधिक नमुने तयार झाले होते आणि त्याने वैज्ञानिक भांडारामध्ये ५००० प्राण्यांच्या नमुन्यांची भर घातली होती; पण तरीही हे उल्लेखनीयच म्हणावं लागेल की, १९ व्या शतकातले रॉथचाईल्डचे ते सगळे परिश्रम हे इतिहासात सर्वोच्च असे किंवा खूप सढळपणे पैसे खर्च करून केलेले नव्हते,तो मान त्या वेळेच्या आधीच्या एका श्रीमंत ब्रिटिश संग्राहकाचा! ह्यू कमिंगचा! त्याला तर असे पक्ष्याप्राण्यांचे नमुने जमवण्याच्या वेडानं इतकं पछाडलं की,त्याने एक भलं मोठं जहाजच बांधलं आणि मग त्यासाठी काही खलाशी, कॅप्टन वगैरे माणसांची भरती केली.त्यांचं काम एकच जगभर जहाजातून फिरत राहायचं आणि जमेल तिथून,जमेल तेवढ्या प्राण्यांचे नमुने गोळा करून आणायचे! प्राणी,पक्षी,वनस्पती सगळ्यांच्या मिळतील,

तेवढ्या जाती-जमाती आणि हो शंख-शिंपलेसुद्धा.त्यानेच मग त्याच्या संग्रहातल्या बार्नेकलचे नमुने डार्विनला दिले होते आणि मग त्याचा फायदा पुढे डार्विनला त्याच्या अंतिम अभ्यासासाठीसुद्धा झाला होता.


पण तरीही रॉथचाईल्ड हा त्याच्या वयाचा विचार करता अतिशय शास्त्रशुद्ध अभ्यास करणारा म्हणून ओळखला जातो,पण दुर्दैवाने तो निर्दयीसुद्धा होता! १८९० साली त्याला हवाई बेटाचे वेध लागले होते एक अशी जागा जी पृथ्वीवरची टोकाची आकर्षक जागा असली तरी तितकीच असुरक्षितही मानली जाते.लक्षावधी वर्षं पृथ्वीच्या इतर भू-भागापासून दूर असल्यानं तिथे जवळपास ८८०० प्रकारच्या अत्यंत दुर्मीळ अनोख्या प्राण्यांची आणि वनस्पतींची वसाहत होती.अर्थात रॉथचाईल्डच्या दृष्टीनं त्याला लुभावणारी विशिष्ट गोष्ट म्हणजे तिथे असणारे अत्यंत चित्ताकर्षक पक्षी! काही जातीचे पक्षी संख्येनं कमी असले तरी ठरावीकच विशिष्ट जागांमध्येच आढळणारे होते.हवाईवरच्या पक्ष्यांच्या बाबतीत दुर्दैवाची गोष्ट ही होती की, ते वैविध्यपूर्ण,आकर्षक वगैरे अद्भुत संयोग असलेले जरी असले तरी अगदीच,अत्यंत सहज पकडता येतील असेच होते.उदाहरणार्थ - हनीकीपर जातीमधला 'द ग्रेटर कोआ फिंच' हा एक निरुपद्रवी पक्षी - हा कोआ झाडांवर विहरत असतो काहीसा लाजतबुजत;पण कुणी जर त्याच्या गाण्याची नक्कल केली तर तो झाडाच्या पानांचा सुरक्षित आसरा सोडून तुमच्यासमोर जणू स्वागताला आल्यासारखा येऊन बसतो, १८९६ साली त्या पक्ष्यांपैकी शेवटचा पक्षी मारला गेला तो रॉथचाईल्डच्या तरबेज हॅरी पामर या संग्राहकाकडून! (त्याच्या पाच वर्षंआधी त्याच पक्ष्याच्या दुसऱ्या जातीतला लेसर कोआ फिंच हा नामशेष झाला होता.तो इतका प्रचंड दुर्मीळ होता की,आज केवळ एक पक्षी पाहायला मिळतो,तोही रॉथचाईल्डच्या संग्रहासाठी ठार मारला गेलेला! गोळाबेरीज काय,तर रॉथचाईल्डच्या संग्रहाचा पसारा वाढवण्याच्या त्या दशकभराच्या काळात हवाईअन बेटांवरच्या किमान नऊ पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष झाल्या.कदाचित,जास्तही असू शकतात.

कुठल्याही थराला जाऊन,कितीही पैसे मोजून पक्षी मिळवण्याच्या वेडाच्या बाबतीत रॉथचाईल्ड काही एकटाच नव्हता. 


किंबहुना,दुसरे काही जण त्याच्यापेक्षाही निर्दयी होते. १९०७ साली,ॲलनसन ब्रायन नावाच्या एका प्रसिद्ध संग्राहकाला जेव्हा समजलं की, त्याने 'ब्लॅक मॅमोज' पक्ष्याचे जगातले शेवटचे 'उरलेले तीनच्या तीन' जंगली पक्षी मारलेत (की जे त्याआधीच्याच दशकात पहिल्यांदा सापडले होते),तेव्हा त्याला ती 'बातमी' ऐकून चक्क 'आनंद झाला होता!' खरं तर,तो काळच थांग लागायला कठीण असा होता.त्याकाळात कुठलाही प्राणी जर व्यत्यय आणणारा वाटला, तर त्याचा खुशाल छळ होत असे! १८९० साली, न्यू यॉर्क राज्यानं पूर्वेकडच्या डोंगरी सिंहांना ठार करण्यासाठी शंभरावर इनाम जाहीर केलं होतं, जरी हे माहीत होतं की,ते आधीच त्रस्त झालेले प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून! जवळपास १९४० सालापर्यंत अमेरिकेतलं कुठलंही राज्य आपल्या राज्यातल्या प्राण्यांना ठार करण्यासाठी इनाम जाहीर करत असत! पश्चिम व्हर्जिनिया राज्याने एक वार्षिक कॉलेज शिष्यवृत्तीच जाहीर केली होती,जो कोणी जास्तीत जास्त पेस्ट्स (कीटक) मारून आणेल त्यांच्यासाठी! आणि त्या पेस्ट शब्दाचा अर्थ हा शेतावर ज्याची पैदास केली जात नाही किंवा घरी पाळले जात नाहीत असे कोणतेही प्राणी ! आणि त्या विचित्र काळाविषयी बोलताना छोट्या बाकमन्स वार्लरपेक्षा आणखी बोलकं आणि स्पष्ट उदाहरण दुसरं कुठलं असू शकेल? अमेरिकेच्या दक्षिणेकडे आढळणारा हा देखणा छोटा पक्षी! त्याची लकेर खूप छान असायची; पण त्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली होती आणि १९३० पर्यंत ते दिसेनासेच झाले आणि पुढची अनेक वर्षं त्यांचं कुणालाच दर्शनही झालं नाही. त्यानंतर १९३९ साली एका छान योगायोगानं दोन पक्षी निरीक्षकांना वेगवेगळ्या ठिकाणी केवळ दोन दिवसांच्या अंतरानं ते एकाकी पक्षी दिसले आणि त्या दोघांनी त्या दोन्ही पक्ष्यांना गोळ्या झाडून टिपलं! पण असं गोळी घालून संपवणं ही लहर किंवा हुक्की काही फक्त अमेरिकन लोकांमध्येच नव्हती येत ! ऑस्ट्रेलियात 'टास्मेनियन टायगर' (थायलेसिन) या कुत्र्यासदृश पण वाघासारखे पट्टे असणाऱ्या प्राण्याला मारण्यासाठी इनाम जाहीर करण्यात आलं होतं.त्यांच्यातला शेवटचा टास्मेनियन टायगरला,त्या उपेक्षित,एकाकी जीवाला मृत्यू आला तो १९३६ साली होबार्टच्या प्राणिसंग्रहालयात तुम्ही कधी तिथे गेलात,तर 'टास्मेनियन म्युझियम अँड आर्ट गॅलरी'ला विचारा आम्हाला तो 'टास्मेनियन टायगर' पाहायचाच आहे म्हणून जो आजच्या आधुनिक जगात प्रवेश केलेला शेवटचा मांसभक्षक मारुस्पियल (पोटात पिशवी असणारा) होता,तर तुम्हाला बघायला मिळेल ते जेमतेम मिनिटभराचं एक फिल्मचं फूटेज आणि काही फोटोज ! जेव्हा त्या प्राणिसंग्रहालयातला तो शेवटचा थायलेसिन (टास्मेनियन टायगर) मेला,तेव्हा त्याचा मृतदेह इतर कचऱ्याबरोबर बाहेर कचरापेटीत फेकण्यात आलं होतं - मी हे सगळं सांगतोय याचं कारण तुमच्यापर्यंत एक मुद्दा ठामपणे पोहोचवण्यासाठी की,यदाकदाचित 


तुम्ही एखादा सूक्ष्मजीव आपल्या या एकाकी विश्वात जगण्यासाठीआयुष्यघालवण्यासाठी डिझाईन करत असाल किंवा तो कुठे कुठे होता वगैरे याचं रेकॉर्ड ठेवणार असाल तर त्या कामासाठी कृपया 'माणसाला' नेमू नका! हा अत्यंत महत्त्वाचा ठळक मुद्दा आहे! आपल्याला निवडण्यात आलंय.आपली निवड झालीये ती दैववशात किंवा भविष्याची काही गणितं डोक्यात असल्याने किंवा जे काही म्हणता येईल त्यासाठी! त्या प्रकाराने आपण सध्यातरी सर्वोत्तम आहोत! पण आपणच तेवढे असू कदाचित.हे कदाचित भीतिदायक सत्य असेल की,

त्या सर्वशक्तिमान निसर्गाची आपण सर्वांत शक्तिमान आणि उच्च निर्मिती असू आणि एकाच वेळी त्यानं पाहिलेलं महाभयंकर स्वप्नही असू!


कारण,आपण आजूबाजूच्या अनमोल गोष्टींकडे अत्यंत निष्काळजीपणे बघणारे आहोत.गोष्टी अस्तित्वात असताना आणि नसतानाही आपण अत्यंत निष्काळजी,

बेदरकार असणारे आहोत आपल्याला त्याची जाणीवही नाहीये - अजिबातच ! किती किती प्रकारच्या गोष्टी कायमच्या नाहीशा झाल्यात किंवा नाहीशा होऊ घातल्याहेत किंवा कधी नाहीशा नाहीही होणार आणि आपली त्या सर्वांमध्ये काय भूमिका राहील? १९७९ साली प्रसिद्ध झालेल्या 'द सिंकिंग आर्क' या आपल्या पुस्तकात नॉर्मन मेयर्सने असं सूचित केलंय की, पृथ्वीवर माणसाच्या कारनाम्यांमुळे दर आठवड्याला दोन प्रजाती नामशेष होत जाताहेत ! पुढे १९९० सालापर्यंत त्याने तोच आकडा वाढवून आठवड्याला ६०० इतका नेला ! (यामध्ये वनस्पती, प्राणी, पक्षी, जलचर सगळ्या प्रकारचं नामशेष होणं अंतर्भूत!) पण इतर काही जणांनी तर ती संख्या त्याहीपेक्षा जास्त मानलीये; आठवड्याला हजार इतकी ! १९९५ सालच्या युनोच्या एका अहवालाद्वारे असं सांगितलं गेलं की,गेल्या चारशे वर्षांत नामशेष झालेल्या ज्ञात प्रजातींची संख्या ५०० प्राणी आणि ६५० वनस्पती इतकी भरतीये;पण ते कदाचित कमी धरलेली संख्या असू शकते असंही म्हटलं गेलं. विशेषतः समशीतोष्ण कटिबंधातल्या प्रजातींविषयी! तर काहींच्या मते नामशेष झालेल्या प्राणी, वनस्पतींची संख्या ही फुगवलेली आकडेवारी आहे म्हणून! सत्य कदाचित आपल्याला ठाऊकच नाही! आपल्याला कसलीच कल्पना नाही! आपल्याला आपण करत असलेल्या कित्येक गोष्टी कधीपासून सुरू केल्या हेही सांगता येत नाही. आपण या क्षणी काय करतोय तेही आपल्याला सांगता येणार नाही किंवा आपण आत्ता जे करतोय त्याचा परिणाम भविष्यावर कसा होणार आहे,ते आपल्याला आज सांगता येत नाही; पण आपल्याला एक गोष्ट नक्कीच माहितीये की, आपण जे काही करू शकतोय ते फक्त या एकाच ग्रहावर ! आणि आपण (मानव) हा एकच प्राणी असा आहे की, जो काही बदल घडवू शकेल, या ग्रहावर! डायव्हर्सिटी ऑफ लाइफमधून एडवर्ड ओ.विल्सनने अगदी कमीत कमी शब्दांत हे छान सांगितलंय - 'एक ग्रह, एक प्रयोग'.


जर या पुस्तकात काही धडा असेल घेण्यासारखा,तर तो हाच की आपण प्रचंड सुदैवी आहोत की आज आपण इथे आहोत! आणि 'आपण' म्हणजे प्रत्येकच सजीव! या विश्वात कुठल्याही प्रकारचं जीवन 'जगायला मिळणं' म्हणजेच खूप 'मोठी कामगिरी' म्हणता येईल! आणि मानव या नात्याने तर आपण डब्बल सुदैवी आहोत,

नक्कीच !आपण 'आहोत',आपलं अस्तित्व आहे,याचा आनंद तर आपण उपभोगू शकतोच; पण त्याचबरोबर त्याबद्दलची कृतज्ञताही व्यक्त करू शकतो आणि अनेक प्रकारे आहे ते मिळालेलं जीवन आणखी सुखी,आणखी समाधानी जगण्याचं कामही करू शकतोय! आणि ते करू शकणारी क्लृप्ती अलीकडेच तर कळलीये आपल्याला !


आपण या अतिशय समृद्धतेच्या आणि लौकिकाच्या टप्प्यावर फार झपाट्याने पोहोचलोय.पृथ्वीच्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर,आधुनिक मानव म्हणून वावर सुरू झालाय.आपण त्या इतिहासाचा केवळ ०.०१ टक्के भाग व्यापलाय म्हणजे खरं तर काहीच नाही - पण त्या अत्यंत छोट्या,कणांएवढ्या काळाच्या भागात अस्तित्व असण्यासाठीसुद्धा आपल्याला अनेक योगांची,अनेक दुर्लभ भाग्याची अथक, अखंड साथ मिळालेली आहे.


आपण खरं तर या सर्वांच्या आरंभाच्या ठिकाणीच आहोत जणू! आणि त्यात योजना हीच आहे की,

आता आपल्याला त्याचा शेवट सापडूच नये! आणि त्यासाठी मात्र आपल्याला केवळ सुदैवी क्षणांपेक्षा खूपच जास्त गोष्टींची आवश्यकता असणार आहे!!


२०.०२.२४ या लेखातील शेवटचा भाग..

२०/२/२४

निरोप घेता / Saying goodbye..

१६८० च्या दशकाच्या सुरुवातीचा काळ ! जेव्हा एडमंड हॅली आणि त्याचे मित्र क्रिस्टोफर रेन आणि रॉबर्ट हुक लंडनच्या कॉफी हाउसमध्ये बसून एक सहजच पैज मारणार होते,ज्याचा परिपाक पुढे जाऊन आयलॅक न्यूटनच्या प्रिन्सीपिआ ग्रंथात होणार होता,जेव्हा हेन्री कॅव्हेंडिश पृथ्वीचं वजन करणार होता आणि अशीच इतरही खूपच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद कामं हाती घेतली जाणार होती,जी  या पुस्तकाच्या गेल्या पाचशे-सहाशे पानांत बघितलीत. अशा वेळी आणखी असंच एक मैलाचा दगड गाठला जात होता मॉरिशस बेटावर किनाऱ्यापासून दूर हिंदी महासागरात, मादागास्कर बेटाच्या पूर्वेला साधारणपणे १३०० किलोमीटर्सवर ! त्या ठिकाणी कुणी विसरलेला खलाशी किंवा खलाश्याचा पाळीव प्राणी हा नामशेष होत आलेल्या 'डोडो' पक्ष्यांच्या उरल्यासुरल्या छोट्या गटावर वारंवार हल्ले करत,त्यांना पुरतं नामशेष करण्यात गढलेला होता.डोडो पक्षी बिचारे उडू न शकणारे, भोळेभाबडे आणि समोर आलेल्यावर विश्वास ठेवणारे आणि चपळपणे पळूही न शकणारे असल्याने ते सुट्टीवर जमिनीवर वेळ घालवण्यासाठी आलेल्या खलाश्यांचा कंटाळा घालवण्यासाठी अगदीच सोप्पं आणि सहज हाती लागणारं सावज बनत असत! लक्षावधी वर्षं मानव अगदीच दूर असल्यामुळे त्यांना मानवाच्या विचित्र,विक्षिप्त आणि भीतिदायक वागणुकीची सवयच नव्हती ! आता आपल्याला त्या वेळची ती नेमकी कारणं,ती नेमकी परिस्थिती माहीत नाही किंवा ते शेवटचे क्षण नक्की सांगता येणार नाहीत,जेव्हा शेवटचा डोडो नामशेष होत होता,त्यामुळे आपल्याला हे नक्की सांगता येणार नाही की, यापैकी आधी काय आलं ते जग,ज्यात प्रिन्सीपिआ होता की जे जग,ज्यात 'डोडो' नव्हता! पण आपण हे सांगू शकतो की,त्या दोन्ही गोष्टी साधारणपणे एकाच काळात घडल्यात! मला हे मान्य आहे की,मानवाचा चांगुलपणा आणि त्याचबरोबर दुष्टपणा एकाच काळात घडताना दाखवणारी अशी दुसरी जोडी तुम्हाला शोधणं कठीण जाईल! सजीवांची अशी एक प्रजाती असणं की,जी या ब्रह्मांडातली गुढातली गूढ रहस्यही समजू शकेल,शोधू शकेल आणि त्याच वेळी काहीही कारण नसताना एका अभागी,दुर्दैवी प्राण्यावर हल्ले करत त्याला 'आपण का संपवले जातोय' हे कळूही शकत नसताना पार नामशेष करून पृथ्वीवरून त्याचा एकही जीव शिल्लक ठेवत नसेल? खरंच,डोडो पक्षी हे इतके अजाण,भोळे आणि अडाणी होते की,तुम्हाला जर एखाद्या ठिकाणचे सर्व डोडो शोधायचे असतील,तर फक्त एक डोडो पकडायचा त्याला केकाटत ठेवायचं की,त्या भागात आसपास असणारे सगळेच्या सगळे डोडो 'काय झालं? काय झालं?' बघायला आपणहून येऊन उभे राहतील तुमच्यासमोर !!


आणि डोडोंना तशी अपमानास्पद आणि वाईट वागणूक देणं तिथेचं संपलं नाही बरं! १७५५ साली,'शेवटचा' डोडो नष्ट होऊन सत्तर वर्षं उलटल्यावरची गोष्ट


ऑक्सफर्डच्या ॲशमोलियन म्युझियमच्या डायरेक्टरने त्यांच्या संग्रहात असणारा पेंढा भरलेला डोडो पार मळलेला आणि कुबट वास येणारा झाला असल्याने त्याला उचलून चक्क शेकोटीत टाकण्याचं फर्मान सोडलं! तो प्रचंड धक्कादायक निर्णय होता.कारण,पेंढा भरलेला अथवा कशाही अवस्थेतला तो अख्ख्या जगातला एकमेव डोडो पक्षी शिल्लक होता,त्यामुळे तिथून जाणाऱ्या दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने हैराण होऊन आणि दचकून आगीत हात घालत तो डोडो वाचवण्याचा प्रयत्न केला; पण त्याला फक्त त्या डोडोचं मुंडकं आणि पायाचा भाग काय तो वाचवता आला होता.!


साध्यासरळ व्यवहारज्ञानाच्या अशा गोष्टीसुद्धा पाळल्या न गेल्याने आणि अक्कलशून्य वागणुकीमुळे आता डोडो पक्षी होता तरी कसा नक्की हे ही आपल्याला कळायची संधीच शिल्लक राहिलेली नाही! 'बऱ्याच मंडळींना वाटत असतं,त्याहीपेक्षा खूपच कमी माहिती आता आपल्याजवळ शिल्लक आहे डोडो पक्ष्याची! काही सागरसफरीवर गेलेल्या अशास्त्रीय प्रवाशांकडून केलं गेलेलं धोपट वर्णन, तीन-चार ऑइल पेंटिंग्ज आणि काही किरकोळ हाडं किंवा कडक झालेले अवयव' - हे उद्विग्न शब्द आहेत.१९ व्या शतकातल्या निसर्गशास्त्रज्ञ एच. ई. स्ट्रीकलॅन्ड यांचे! स्ट्रीकलॅन्ड यांनी खेदानं असं नोंदवलंय की,आपल्याकडे काही प्राचीन समुद्रीसैतानांचे आणि महाकाय डुलत जाणाऱ्या डायनोसॉर्ससारख्या प्राण्यांचे अवशेष आहेत;पण दुर्दैवानं जो पक्षी आपल्याच वर्तमानकाळात अस्तित्वात होता,त्याचे मात्र काहीच शिल्लक नाही.असा पक्षी ज्याला आपल्याकडून फक्त आपली अनुपस्थिती हवी होती! तर आजमितीला 'डोडो' पक्ष्याविषयी आपल्याला काय माहिती आहे तर ते इतकंच तो मॉरिशस बेटावर राहत होता; तो जाडजूड लठ्ठ अंगाचा होता; पण त्याचं मांस चवदार नव्हतं, 'कबुतर' जातीतला तो सर्वांत आकाराने मोठा पक्षी होता;पण नक्की किती ते मात्र सांगता येणार नाही.कारण,त्यांच्या वजनाचे कुठे संदर्भ उपलब्ध नाहीत.स्ट्रीकलॅन्डच्या हाडं आणि अवशेषांच्या उपलब्ध माहितीवरून आणि ॲशमोलियनच्या शिल्लक राहिलेल्या अवशेषांवरून अंदाज बांधता येतो की,डोडो साधारणपणे अडीच फूट उंच आणि आधीच्या टोकापासून ते शेपटीपर्यंत तेवढाच अडीच फूट लांब असावा! उडू शकत नसल्याने तो जमिनीवरच अंडी घालत असे - ज्यामुळे त्यांची अंडी हे त्या बेटावर माणसांनी आणलेल्या कुत्रे, डुक्कर आणि माकडांसाठी आयतच खाद्य ठरत असतील.'डोडो' हा साधारणपणे १६८३ सालपर्यंत 'नामशेष झाला.(१६९३पर्यंत तर अगदीच,पार नाहीसाच झाला). त्यानंतर मात्र आजतागायत आपल्याला त्या पक्ष्याविषयी काहीही माहिती मिळालेली नाही, इतकंच की आता तो यापुढे पृथ्वीवर कधीच दिसणार नाही! 


आपल्याला त्याच्या पुनरुत्पादनाच्या,खाण्याच्या सवयीविषयी कुठलीच माहिती नाही.तो कुठपर्यंत संचार करत होता,त्याचा आवाज तो शांत असताना कसा यायचा किंवा संकटात असताना सूचना देण्यासाठी कसा ओरडायचा याचीही माहिती नाही आणि पृथ्वीवर 'डोडो'चं एकसुद्धा अंड उपलब्ध नाही.माहितीनुसार, डोडोशी मानवाचा संपर्क हा जेमतेम सत्तर वर्षंच होता.हा म्हणजे अगदीच अल्पकाळ ! आणि तो बघता आपण असं म्हणूच शकतो की,मानवाची हजारो वर्षं अशी सवय असल्याने आपण कितीतरी प्राण्यांना अशा प्रकारे कायमचं नष्ट, नामशेष करून मोकळे झाले असू! कुणाला काय माहीत की मानव हा किती भयंकर संहार करणारा प्राणी आहे ते! पण हे निर्विवाद सत्य आहे की पृथ्वीच्या पाठीवर गेल्या ५० हजार वर्षांत मानव जिथे जिथे गेलाय तिथे तिथे त्याने प्राण्यांना संपवण्याचं काम केलंय कधी कधी तर प्रचंड संख्येने !


अमेरिकेपुरतं बोलायचं तर गेल्या १० ते २० हजार वर्षांमध्ये मानवाने इथे पाऊल ठेवल्यापासून ३० प्रकारचे मोठमोठ्या जातीचे काही तर फारच मोठ्या,महाकाय जातीचे प्राणी एकेका तडाख्यात नष्ट केलेत! निव्वळ उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतच आधुनिक मानवाचं आगमन झाल्यापासून,या शिकारी मानवाने आपल्या तीक्ष्ण भाल्यांच्या आणि संघटन कौशल्याच्या जोरावर मोठ्या आकाराच्या प्राण्यांच्या जातींपैकी तीन चतुर्थांश जाती संपवल्या आहेत! तर युरोप आणि आशियामध्ये, जिथे प्राण्यांना माणसांपासून सावध राहण्यासाठी जरा जास्त वेळ लागला,तिथे ही एक तृतीयांश ते निम्म्या इतक्या जाती नष्ट झाल्याच ! आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्या बरोबर विरुद्ध कारणासाठी ९५ टक्के इतक्या प्राण्यांच्या जाती नष्ट झाल्या! केवळ सुरुवातीच्या काळात 'शिकारी' मंडळींची संख्या त्यामानाने कमी होती आणि प्राण्यांची संख्या भलतीच जास्त होती (उदाहरणार्थ उत्तर सैबेरियाच्या टंड्रा भागात एक कोटींवर 'मॅमथ' या हत्तीच्या जातीच्या प्राण्यांचे अवशेष बर्फात गाडले गेले असल्याचा अंदाज आहे) आणि कदाचित काही पंडितांच्या मते इतरही काही कारणं असावीत की वातावरणातले बदल किंवा जगभर थैमान घालणारे साथीचे रोग वगैरे…


अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरीच्या रॉस मॅकफीनं म्हटल्याप्रमाणे - तुम्हाला त्यांची शिकार करायला हवी असं वाटावं,अशा काही धोकादायक प्राण्यांना मारण्यात,माणसाला काय भौतिक फायदा असणार असतो? आपण असे किती 'मॅमथ-स्टिक्स' खाणार असतो? इतर काहींच्या मते प्राण्यांना पकडून त्यांच्या कत्तली करण्याचं दुष्कर्म करणं भलतंच सोपं!टीम फ्लॅनरीने म्हटलंय की,ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत तर प्राण्यांना कदाचित आपण पळून जायला हवं हेही कळलं नसावं !


काही नामशेष झालेले प्राणी इतके विलक्षण देखणे आणि भव्य होते आणि ते असते तर थोडंफार त्यांना हाताळणं शिकावं लागलं असतं इतकंच ! कल्पना करा की,जमिनीवर राहणारे 'स्लॉथ' जे थेट तुमच्या वरच्या मजल्यावरच्या खिडकीला डोकावतायेत,अशी कासवं जी फियाट कारच्या आकाराएवढी आहेत.पश्चिम ऑस्ट्रेलियात वाळवंटातल्या रस्त्याच्या बाजूला ऊन खात पहुडलेले तब्बल ६ मीटर (१८ ते २० फुट) लांबीचे मॉनिटर जातीचे सरडे काश!! पण गेले ते सगळे !! आणि आपण आता एका संपत चाललेल्या ग्रहावर उरलेले आहोत! आजमितीला अख्ख्या जगात मिळून केवळ चारच खरोखर अजस्र (१००० किलो किंवा जास्त वजन असणारे) भूचर प्राणी शिल्लक आहेत हत्ती, गेंडे, हिप्पोपोटॅमस आणि जिराफ! कित्येक लाखो वर्षं पृथ्वीवरच जीवन इतकं नीरस आणि विझत जाणार नव्हतं ! मग असाही प्रश्न उभा राहतो की,अश्मयुग आणि अलीकडच्या काही वर्षांमधलं 'लुप्त होत जाणं' हे एकाच नामशेष होण्याच्या प्रक्रियेचा भाग तर नाहीत? थोडक्यात म्हणजे 'मानव' हा इतर प्राण्यांच्या दृष्टीने 'अशुभ वार्ता' बनून तर अवतरलेला नाही?


खेदाची सत्यता अशी की, तेच खरं असू शकेल! शिकॅगो युनिव्हर्सिटी पुराजीवशास्त्रज्ञ डेव्हिड राऊपच्या मते,

'आपण जर का जीवशास्त्रीय इतिहास बघितला,तर पृथ्वीच्या पाठीवर दर चार वर्षांनी एक प्रजाती नष्ट होण्याची सरासरी राहिलेली आहे!' द सिक्स्थ एकटींकशन या पुस्तकात रिचर्ड लिकी आणि रॉजर लेविननी म्हटलंय की,ती जी सरासरी आहे त्याच्या कदाचित १,२०,००० पट इतकी प्रचंड प्रजाती नामशेष करण्याची कामगिरी मानव जन्माला आल्यापासून त्याच्यामुळे घडली असावी ! १९९०च्या दशकाच्या मध्यात,आता ॲडलेडमधल्या साउथ ऑस्ट्रेलियन म्युझियमच्या प्रमुख असणाऱ्या निसर्गशास्त्रज्ञ टीम फ्लॅनरीला आपण या प्राण्यांच्या 'नामशेष' होण्याच्या प्रक्रियेबद्दल किती अनभिज्ञ आहोत,याचा धक्काच बसलाय. अगदी अलीकडच्या गोष्टी गृहीत धरूनही त्याने मला २००२च्या आमच्या भेटीदरम्यान सांगितलं, 'तुम्ही जिथे म्हणून बघाल तिथे काही ना काही कच्चे दुवे किंवा मोठमोठ्या रिक्त जागा दिसतील - डोडोसारख्या म्हणजे काहीच थांगपत्ता नसणाऱ्या किंवा कसलंच रेकॉर्ड शिल्लक नसणाऱ्या !' फ्लॅनरीने त्याच्या एका ऑस्ट्रेलियन चित्रकार मित्राला,पीटर शाउटनला बरोबर घेऊन एका महत्वाकांक्षी योजनेला सुरुवात केली. ती म्हणजे जगभर फिरून जे काही हरवलंय,जे काही गेलंय किंवा जे आजतागायत माहीतच नाही अशा गोष्टी धुंडाळायच्या हेच काम ! हे दोघांच्याही आवडीचं आणि त्यांनी त्याचा जणू ध्यासच घेतलेला! त्यांनी चार वर्षं अनेक जुने नमुने धुंडाळले,बुरशी आलेले जुने कुबट वास येणारे नमुने तपासले,जुने अवशेष बघितले,जुनी ड्रॉइंग्ज,

जुनी हस्तलिखित नजरेखाली घातली - जे जे म्हणून उपलब्ध होतं ते ते बघितलं! त्यांनी पाहिलेल्या तशा बहुतेक सर्व प्राण्यांची मग अंदाजे मांडणी करत शाउटननं पुरुषभर उंचीची चित्रं काढली आणि फ्लॅनरीने त्यासंबधी माहितीपर चार शब्द लिहिले! आणि त्यातूनच मग अ गॅप इन नेचर हे अद्भुत पुस्तक जन्माला आलं! त्यामध्ये गेल्या तीनशे वर्षांत नामशेष झालेल्या बहुसंख्य प्राण्यांची माहिती आपल्याला कॅटॅलॉग स्वरूपात पाहायला मिळते.


काही प्राण्यांचा अभ्यास करताना त्यांना सुस्थितीतले रेकॉर्ड्स मिळाले;त्यासंदर्भात अभ्यास करून कुणीही विशेष काही केल्याचं दिसत नव्हतं,अगदी वर्षानुवर्षं किंवा आयुष्यभर! 'स्टेलर्स काऊ' हा वॉलरससदृश प्राणी (काहीसा ड्युगॉन्गशी संबंधित) म्हणजे नामशेष झालेला अलीकडचा सर्वांत मोठा प्राणी! हा खरंच महाकाय होता - जवळपास ९ मीटर (३० फुट) लांबी आणि १० टन (१०,००० किलो) वजन!आपल्या आधुनिक जगाला याची माहिती केवळ एका अपघाताने झाली,जेव्हा १७४१ साली एका रशियन मोहिमेचं जहाज फुटून ती मंडळी एका किनाऱ्याला लागली? जिथे हे प्राणी बऱ्याच संख्येने शिल्लक होते - बेरिंगच्या सामुद्रधुनीत असणाऱ्या कमांडर बेटावर !


एक समाधानाची बाब म्हणजे त्या मोहिमेत जॉर्ज स्टेलर हा निसर्गशास्त्रज्ञ सहभागी होता,ज्याने त्या प्राण्यात विशेष रस घेऊन अभ्यास केला.फ्लॅनरीने म्हटलंय,त्याने त्या प्राण्यासंबंधी भरपूर,विपुल टिपणं काढली होती! इतकंच नव्हे,तर त्या प्राण्याची मापं घेताना त्याच्या लांबलचक मिश्यांचीसुद्धा मापं घेतली होती.फक्त एकाच गोष्टीविषयी त्याने लिहिलेलं आढळत नाही त्यातल्या नर - प्राण्याच्या लिंगाविषयी परंतु मादीच्या जननेंद्रियाविषयी मात्र त्याने टिपणं काढलेली आढळतात! त्याने त्या प्राण्याच्या कातडीचा एक तुकडाही जपून आणला होता,ज्यामुळे आपल्याला आज त्या प्राण्याच्या कातडीचा पोत कळतो;पण आपण नेहमी इतके सुदैवी नसायचो !


स्टेलरला इतकं करताना एक मात्र करता आलं नव्हतं,ते म्हणजे त्या 'समुद्रगायीला' वाचवणं! स्टेलरने तिचा शोध लावल्यापासून पुढच्या सत्तावीस वर्षांत त्या प्राण्याची प्रचंड शिकार होत गेलीपण इतर बरेच प्राणी त्या कॅटलॉगमध्ये समाविष्ट करता नाही येऊ शकले.कारण, त्यांच्याविषयी फार काही माहितीच उपलब्ध होऊ शकली नाही. 'द डार्लिंग डाऊन्स हॉप्पिंग माउस,' 'चॅथम आयलंड स्वॅन्स',असेन्शन आयलंड फ्लाईटलेस क्रेकं,जवळपास पाच प्रकारची समुद्री कासवं आणि इतरही काही प्राणी हे काळाच्या पडद्याआड गेलेत आणि आपण त्यांना कायमचे हरवून बसलोय ! त्यांची नावच काय ती शिल्लक आहेत! फ्लॅनरी आणि शाउटनला असंही आढळलं की,बऱ्याच बाबतीत नामशेष झालेले प्राणी हे त्यांच्या क्रूर आणि बेलगाम कत्तलींमुळे नव्हे तर अत्युच्च मूर्खपणामुळेही झालेत.!१८९४ साली न्यूझीलंडच्या उत्तर आणि दक्षिणेकडच्या बेटांजवळच्या सागरी वादळांच्या पट्ट्यात असणाऱ्या एका एकाकी खडकावर, स्टीफन्स आयलंडवर जेव्हा एक दीपगृह बांधण्यात आले,तेव्हा तिथे राहणाऱ्या दीपस्तंभाच्या कर्मचाऱ्यांची मांजर रोज त्याच्याकडे काही विचित्र छोटे पक्षी तोंडात धरून आणत असे,त्या कर्मचाऱ्याने इमानदारीत त्यातले काही मृत पक्षी वेलिंग्टनच्या म्युझियमकडे पाठवले.तिथला म्युझियमचा प्रमुख ते बघून उत्तेजित झाला.कारण,ते उडता न येणाऱ्या 'रेन' प्रकारचे छोटे पक्षी होते.कदाचित, उडता न येणाऱ्या अशा बसून राहणाऱ्या पक्ष्याची अत्यंत दुर्मीळ अशी ती जात! तो लगोलग त्या स्टीफन्स आयलंडच्या दिशेने निघाला; पण तो तिथे पोहोचेपर्यंत तिथल्या मांजरीने तिथल्या झाडून सर्व पक्ष्यांना ठार मारलं होतं. आता आजमितीला आपल्यासमोर शिल्लक आहेत केवळ १२ पेंढा भरलेले स्टीफन आयलंडवरचे पक्षी !


अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ निअरली एव्हरीथिंग - बिज ब्रायसन-अनुवाद-प्रसन्न पेठे (आपलं अस्तित्वच नव्हतं तिथपासून ते आज आपण इथे असेपर्यंतचा सारा प्रवास)- मंजुल पब्लिशिंग हाऊस..


पण निदान आपल्याजवळ तेवढे तरी आहेत म्हणायचे! बऱ्याचदा असं होत आलंय की, एखादी प्रजाती हयात असताना मानवाचं त्याकडे लक्षच गेलेलं नाही आणि ती प्रजाती पूर्ण नामशेष झाल्यावर मात्र आपल्याला जाग आल्याचं दिसतं ! आता कॅरोलिना पॅराकीटचंच बघा ना! लखलखत सोनेरी डोकं आणि पाचूसारखा हिरवागार रंग असणारा हा अतिशय मनोहारी,देखणा पक्षी एकेकाळी उत्तर अमेरिकेत असायचा आणि खरं तर पोपट इतक्या उत्तरेकडे फार आढळत नाहीत हेही आपल्याला माहितीये! एक काळ असा होता,जेव्हा ते अक्षरशः मुबलक संख्येने त्या भागात वस्ती करून होते. त्यांच्यापेक्षा जास्त संख्या केवळ भटक्या कबुतरांचीच असावी! पण हे कॅरोलिना पॅराकीटसुद्धा शेतकऱ्यांच्या मते त्यांचे शत्रू ठरले आणि मग त्यांच्या अतिशय सहज शिकारी होऊ लागल्या - एकतर त्यांना घट्ट कळप करून एकत्रच उडायची सवय आणि दुसरं म्हणजे बंदुकीचा एक बार जरी झाला तरी ते झटकन कळपात वर उसळायचे आणि नंतर आपल्या मेलेल्या जातभाईंना बघायला पुन्हा तिथेच जायचे, मग काय? १९व्या शतकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या - अमेरिकन ऑर्नीथॉलॉजी या आपल्या उत्कृष्ट पुस्तकात चार्ल्स विल्सन पीअल याने एका प्रसंगाचं वर्णन केलंय... जेव्हा त्याने एका झाडावर वस्ती करून असणाऱ्या त्या पक्ष्याच्या कळपावर आपली शॉटगन पूर्ण रिकामी केली होती -


उर्वरित भाग २३.०२.२४ या लेखामध्ये..।


१८/२/२४

झाडावर चढणारे कासव..! A turtle climbing a tree..!

भर दुपारी उन्हाच्या वेळी पवनीचे माधवराव पाटील व मी एका झरीजवळ झुडपाआड बसून तिथल्या पाण्यावर उतरणाऱ्या हरोळीचं छायाचित्र घ्यावं म्हणून त्यांची प्रतीक्षा करीत होतो.ह्या वर्षी खूप उन्हाळा जाणवत होता. पतझडीनं सारी जंगलं शुष्क वाटत होती. अग्निदिव्यातून निघालेल्या टेंबुर्णीला कोवळी, लाल,लुसलुशीत,नितळ पानं फुटत होती.करू, ऐन व धावड्याला खूप डिंक येऊन बुंध्यावरून ओघळत होता.टेंबुर्णीच्या झाडाखाली पिकलेल्या फळांचा सडा पडलेला होता.मोहाच्या फुलांचा वास साऱ्या आसमंतात दरवळत होता.चार पाच हरोळ्या उडत उडत झरीजवळच्या चारोळीवर बसल्या.त्यांच्या नादमधुर मुग्ध आवाजानं सारा परिसर मुखरित झाला.

टेपरेकॉर्डर चालू करून तो आवाज ध्वनिमुद्रित करीत असता समोरच्या नाल्यातील झुडपाच्या बुडात काहीतरी हललं.मी त्या बुडाकडे निरखून पाहिलं.उन्हानं सुकलेल्या रेतीच्या थराशिवाय कुठल्याही जिवाचं तिथं अस्तित्व दिसलं नाही.टेप बंद करून मी हरोळीकडे पाहात होतो.

तो झुडपाच्या बुडातील वाळूचा थर खालून हातानं ढकलल्यागत हलला.माझा डोळ्यांवर विश्वास बसेना.


ह्या उत्पाताचं काय कारण असावं.?धरणीकंप? पण तो एवढ्या लहान क्षेत्रात होईल कसा ? चिचुंद्री?परंतु पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या अशा शुष्क जागेत ती राहणं शक्य नव्हतं.हा काय प्रकार असावा म्हणून मनात अटकळ बांधत असता वाळूचा ढीग झुडपाभोवती पसरला.मी त्या मातकट तपकिरी कवचाकडे पाहात होतो. कवच जसं जोरानं वर येत होतं,तशी वाळू बाहेर पडत होती.आणि सावधगिरीनं,हळूच कवचयुक्त डोकं रेतीतून बाहेर येताना दिसलं.त्यानंतर कातडीयुक्त लांब मान त्यानं बाहेर काढली. पिचके डोळे त्यानं एक दोनदा मिचकावले. एकदा माझ्याकडे पाहिलं आणि सन्नाट्यानं पाचोळ्यात दिसेनासा झाला.तळं सोडून आलेला उन्हाळ्यातला हा पहिला कासव असावा.


उन्हाळ्याच्या आगमनाबरोबर तळ्यातील चाम,बहर-फ्रेश वॉटर टरटल- डुंबरे व चिखल्या- पॉन्ड टॉरटाईज जातीचे कासव इथल्या डोंगरावर चढू लागले.वर्षातून आठ महिने इथल्या खोल पाण्यात राहणारे हे कासव उन्हाळ्यात डोंगरावर का चढू लागतात ह्या रहस्याचा उलगडा झाला नाही.पर्वत आहे म्हणून गिर्यारोहण करणारा माणूस हा एकमात्र प्राणी नाही !


थोड्याच दिवसात सारा डोंगर कासवांनी भरून गेला.एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रित जमलेले कासव यापूर्वी माझ्या पाहण्यात नव्हते. परातीएवढे मोठे काळसर-तपकिरी रंगाचे चाम,ताटाएवढे वहर,थाळीएवढे डुंबर व चिखल्या जातीचेकासव,रखडत,खरडत,दगडगोटे व ऐनाडी- ऐनाच्या झुडपांतून डोंगर चढताना आढळून आले.भर उन्हाळ्याच्या वेळी ओढ्या-नाल्याच्या ओल्या रेतीत,जांभूळ व करंजाच्या सावलीत डोकं खुपसून चाम व कासव विसावा घेत.एखाद्या ठिकाणी तुम्ही तासभर बसलात की सहज दहा एक कासव जाताना दिसले असते. त्यांना पकडणं मोठे कठीण,चाहूल लागताच ती पाचोळ्याच्या जाड थरात दडून बसतात.


कवच ल्यालेले हे उन्हाळी पाहुणे ऐनाडीच्या डिंकावर आधाशाप्रमाणं तुटून पडायचे.कासव डोंगरातील जंगलात का येतात याचं हे एक कारण होतं.दिवसा डुंबरं व चिखल्या दिसायचे.चांदण्या रात्री चाम व वहराच्या पाठी डोंगर चढताना चमकत.


एकदा मला वीस पंचवीस फूट उंचीवर असलेल्या ऐनाच्या आडव्या फांदीवर एक भला मोठा कासव डिंक खाताना दिसला.त्याचं छायाचित्र काढण्यासाठी चोरपावलानं जवळ गेलो, तसं त्या कासवानं अकस्मात स्वतःला खाली लोटून दिलं. कासव धपकन् खाली पडल्याचा आवाज आला. 


जलदगतीनं तो पाचोळ्यात घुसला.एकदा तर गिधाड पहाडावर; करूच्या गुळगुळीत बुंध्यावरून कासव डिंक खाण्याकरता चढताना मी पाहिला.चारी पायांच्या पंजांची नखं सालीत रोवून तो झाडावर चढत होता.बुंध्याला खाचा घातल्यानं डिंक खाली ओघळत होता. जमिनीपासून पांढऱ्या पिवळसर नितळ डिंकावर त्यानं यथेच्छ ताव मारला.तीन-चार फूट उंचावर असलेला तो कासव माझी चाहूल लागताच जलदीनं सरपटत खाली उतरला व पाचोळ्यात दिसेनासा झाला.


एकदा ऋद्धी धीवरानं भला मोठा चाम पकडून आणला होता.यापूर्वी एवढा मोठा चाम माझ्या पाहण्यात नव्हता.

त्याचं कवच मऊ,गुळगुळीत व घुमटाकार दिसत होतं.

कवचाची वाढलेली किनार लवचिक होती.त्याच्या नाकपुड्याचं रूपांतर दोन बारीक सोंडात झालं होतं.ह्या सोंडा पाण्यावर काढून तो बाहेरची हवा घेई.त्याच्या गळ्याला दोरीनं बांधलं होतं.इथं येईपर्यंत तो गळफास ठरून वाटेतच त्याचा अंत झाला होता.त्याची मान धडापासून वेगळी केल्यानंतर त्याच्या तोंडात लाकडाचा तुकडा घातला तेव्हा त्याच्या धारदार जबड्यानं लाकडाचे तुकडे तुकडे केले. चाम एवढ्या मोठ्या आकारापर्यंत वाढतात याची मला कल्पना नव्हती.त्याची लांबी मोजली तेव्हा तीन फुटांवर भरली.त्याला उचलायला दोन माणसं लागली.नवेगाव बांधच्या प्राणिसंग्रहालयासाठी मोठा जिवंत चाम मिळविण्याचा मी खूप प्रयत्न केला,पण माझी निराशा झाली.


डिंक खाण्याकरिता निघालेले कासव एकदा जंगलातील वणव्यात सापडले. पालापाचोळा पेट घेत होता.मला वाटलं,ते भाजून होरपळून निघेल.पण आगीची ऊब लागताच ते जागच्या जागी थिजले,

डोके पाय त्याने कवचात ओढून घेतले होते.आग त्यांच्या अंगावरून गेली.पोटाजवळच्या कवचाला आगीची झळ लागली होती.अग्निदिव्यातून निघालेले ते कासव हळूहळू वणव्याच्या विरुद्ध दिशेने निघून गेले.नवेगाव बांध जलाशयाच्या मध्यावर मालडोंगरी नावाचं छोटंसं बेट आहे.जलाशयाचं पाणी जसं आटू लागतं तसे उघडे पडू लागलेले तिथले काळे खडक पाणकावळे व करोते- दि इंडियन डार्टर- यांच्या शिटीनं पांढरेशुभ्र दिसू लागतात.एकदा त्या बेटाकडं डोंगीतून जाताना पाण्यावर डोकावत असलेल्या झाडाच्या थुटावर कासवाच्या जोडीचा समागम चाललेला दिसला. डोंगी जवळ येताच त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या.बेटाजवळच्या खडकावर एक कासवाची जोडी अनुनयात मग्न होती.

तिथल्या उथळ पाण्यात मादीच्या पाठीवर बसलेला नरकासव प्रियेसह जलक्रीडा करताना दिसला.


जिकडेतिकडे खूप पाऊस पडला.एक दिवस एक कासवी जलाशयाच्या भातशेतीच्या बांधावर खड्डा करताना दिसली.पुढील पायांच्या नखांनी माती उकरू लागली.

पाठीच्या साहाय्याने ती माती एका बाजूला सारीत होती.माती उकरून ती काय साध्य करीत आहे,हे माझ्या ध्यानात न आल्यामुळे दूर अंतरावरील ऐनाडीच्या झुडपात बसून मी तिच्याकडे पाहात राहिलो.खड्डा उकरून झाल्यावर बाहेर मातीचा ढीग दिसत होता.खड्ड्याच्या चोहोबाजूनं निरीक्षण केल्यावर तिला समाधान वाटलं.ती स्वतःभोवती एकदा गोल फिरली.मागची बाजू खड्ड्यात ओणावून चेहऱ्यावर आनंदी भाव आणून तिनं खड्डा भरून अंडी घातली.आश्चर्य व आनंदाच्या संमिश्र भावनेनं तिच्या ह्या महत्कृत्याबद्दल मी मनोमन आभार मानले.शांत व स्निग्ध नजरेनं मला ती जणू पिऊन टाकीत होती.हा विधी उरकल्यावर अंड्यांनी भरलेला खड्डा तिनं मातीनं झाकला. त्यावर उभी राहून पोटानं माती थोपटली.वरून पाऊस पडत होता.त्यावर पुन्हा एकदा फिरून खड्डा नीट झाकला की नाही याची खात्री करून घेऊन खड्ड्यावर ती थोडा वेळ विसावली.


हे सारं इतक्या विलक्षण,गतीनं घडलं की मी अचंब्यानं तिच्याकडे पाहात राहिलो.आमच्या वस्तुसंग्रहालयासाठी तिचं एखादं अंड हवं होतं. पण ती जवळपास असेपर्यंत अंडं घ्यावं असं वाटेना.कारण मी थोडी जरी घाई केली असती, तरी तिनं घाबरून सर्वनाश केला असता.अंडी तिनं पुनश्च उकरून ती चट्ट केली असती.तेथून ती प्रयाण करीपर्यंत मला वाट पाहावी लागली. तळ्याकडे गेल्यावर थोड्या अंतरापर्यंत तिचा पाठलाग केला.न जाणो ती परत घरट्याकडे आली तर? ती जशी पाण्यात शिरली तसा मी धावत तिच्या घरट्याकडे गेलो.काळजीपूर्वक माती उकरून अंडी मोजली.ती एकूण वीस होती.त्यातील एक अंडं काढून घेतलं.ते कबुतराच्या अंड्याएवढं,

गोलाकार,पांढऱ्या रंगाचं होतं.तिला संशय येऊ नये म्हणून परत तो खड्डा मातीनं भरून थोपटला.पूर्वी दिसत होता तसा हातानं सारवला.(जंगलाचे देणं - मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,नागपूर)

कासवाची अंडी दोन महिन्यांत उबतात असे प्राणिशास्त्रावरील ग्रंथात नमूद केलं आहे.

पण माधवराव पाटलांचं म्हणणं असं की कासवाची अंडी उबवायला आठ ते नऊ महिन्यांचा काळ लागतो. कासव आपली अंडी उबवीत नाहीत. अंडी योग्य वेळी उबताच पिलं घरट्यातून बीळ करून बाहेर येतात आणि तळ्याकडे परत जातात.

याविषयी मात्र त्यांचं दुमत नव्हतं.त्यांच्या शेताच्या बांधावर कासव पावसाळ्यात दरवर्षी अंडी घालतात. बांधावर फिरून त्यांनी कासवाचं एक घरटं शोधून काढलं.नुकतीच कासवानं त्यात सहा अंडी घातली होती.ती उकरून काढून त्यांच्या वाड्यात पुरली.आठनऊ महिन्यांचा कालावधी लोटल्यावर जून महिन्यात ती उकरून पाहिली.अंडी जशी होती तशी सापडली.त्यातील एक अंडं प्रयोगादाखल फोडलं असता त्यातून लिबलिबीत मांसाचा गोळा बाहेर पडला.वाटलं,अंडं कुजलं असणार.त्यावर थंड पाणी ओतलं तर काय आश्चर्य? त्या गोळ्यातून एका जिवाची हालचाल दिसू लागली.एक-दीड तास त्यावर पाणी टाकीत राहिल्यावर तो जीव चालू लागला.त्याला पाण्यात ठेवले.दोन दिवसांत त्याचा रंग बदलून कासवासारखा आकार आला.कासवाचं पिलू दिवसादिवसांनी वाढत होतं.एकदा नवेगाव जलाशयाकाठच्या जंगलातून भटकताना मला जमिनीवर पडलेली कासवाची पाठ दिसली.ती हातात घेऊन खालीवर न्याहाळून पाहिली.

डोके,मान व पोटातील अवशेष दिसत नव्हते.नुसता पोटापाठीचा मोकळा सांगाडा राहिला होता.ते कवच माधवराव पाटलांना दाखवीत मी विचारलं,


'पाटील, हा काय प्रकार?'


'नीलगाईनं ते कासव खाल्लं आहे.'


मी त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागलो.

आपलं म्हणणं अधिक स्पष्ट करीत ते म्हणाले,

'तळ्यावर पाणी प्यायला आलेल्या नीलगाईला हे कासव दिसलं असावं.कासव दिसताच नीलगाय त्याच्या पाठीवर पुढचे पाय ठेवून जोराने दाबते.दाब बसताच कासवाची मान आपोआप बाहेर येते.ती तोंडात धरून नीलगाय तिला जोराने हिसडा देते.

हिसडा बसताच त्याचा सारा अंतर्भाग बाहेर येतो व तो लगेच अधाशीपणे ती खाऊन टाकते.' पवित्र मानलेल्या नीलगाईनं मांसाहार करावा याचं मला आश्चर्य वाटलं.