* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२९/६/२५

कथा सापाच्या आवाजाची The story of the snake's voice

हात,पाय किंवा इतर कुठला असा चालता येण्यासारखा अवयव नसतानाही ज्याला चालता येते असा साप हा एकमेव प्राणी आहे.

आपले डोके उभे करून जलद गतीने जमिनीवरून चालणारा साप कुणी पाहिलाय ? त्याच्या गतीतले तेजस्वी सौंदर्य कुणी न्याहाळलंय ? कुठंही हिसका नाही.पाण्यातील माशाला गतीतली विविधता नाही.डौलदार वळण,सुबक आकार,रमणीय सौंदर्य,

तेजस्वी डोळ्यांतील भेदकता,अन्नावाचून दीर्घकाळ राहणारा,कात टाकून पुनःपुन्हा तरुण होणारा, अशी एक ना अनेक गूढे असलेला साप आजच्या विज्ञानयुगात जिज्ञासेचा विषय वाटतो.वाघ-सुसरीची वाटत नाही इतकी भीती माणसाला सापाची वाटते. त्यातल्या काही जातींना जालीम विषांची देणगी मिळाली आहे.त्यांचा दंश कित्येकदा इतका दाहक असतो की माणूस तडफडून मृत्यू पावतो.म्हणूनच त्याला काळसर्प म्हटले आहे.


अशा त्याच्या अलौकिक गुणधर्मामुळे आदिमानवाने त्याला देवळात बसवून देव मानले तर त्यात आश्चर्य नाही.त्याला पूज्य मानण्याची प्रथा जगातील अनेक देशांत अजूनही अस्तित्वात आहे.चरक, सुश्रुत व वाग्भट संहिता या वैद्यकीय ग्रंथांत सापाचे प्रकार सांगून सर्पदंशावर उपाय सांगितले आहेत.विषाची परीक्षा पाहू नये म्हणतात.


त्याकरिता वाग्भटाने सल्ला दिला आहे,'ज्या ठिकाणी सर्वांची भीती असेल त्या ठिकाणी फिरताना दिवसा छत्री व विशेष करून रात्रीच्या वेळी हातात खुळखुळा व काठी बाळगावी.छत्रीच्या सावलीने व काठीच्या आवाजाने साप भिऊन पळून जातात.' संस्कृत कोषवाङ्मयात सापांविषयी विपुल माहिती आहे. अभिधानचिंतामणी कोषात सापाच्या वीस नावांचा उल्लेख आहे.

त्याचे एक नाव पवनाशन- म्हणजे हवेवर जगणारा असे आहे.त्याच्या अवयवांचा परिचय करून देताना नागाला दृष्टिविष असल्याचा लक्षणीय उल्लेख आहे.कुक्कुटारी सर्पाचा रंग कोंबड्याच्या वर्णासारखा असून तो कुक्कुटासारखाच स्वर काढत असल्याचा निर्देश महत्त्वपूर्ण आहे.भविष्य पुराणातील अध्याय ३३ म्हणजे सर्पसंहिताच आहे.त्यात सर्पाचे अनेक प्रकार सांगून त्याची रानओळख,वितरण व सवयी-आचरणाविषयी माहिती दिली आहे.

त्याच्या विणीविषयी दिलेली माहिती तर अभूतपूर्व म्हणावी लागेल.

सर्पज्ञांनी कश्यप ऋषीचा ठिकठिकाणी संदर्भ दिला आहे.ऋषी कश्यपाचा उल्लेख महाभारतातही आला आहे.त्याने कद्रू व विनता ह्या दोघी बहिणींशी विवाह केला.कद्रूने सर्वांना जन्म दिला तर विनतानं गरुडांना जन्म दिला.


 मानववंश आणि दैवत कथांचा विलक्षण मेळ घालण्यात व्यासांची प्रतिभाच दिसून येते.पण अभिधानचिंतामणी कोष वगळता सर्पाच्या आवाजाचा उल्लेख कुठेही आढळत नाही.


तीच स्थिती कर्नल खंडेराव घारपुरे व विष्णु गोविंद चिपळोणकर यांच्या सर्पावरील मराठी ग्रंथांतून आढळून येते.चिपळोणकरांचा 'हिंदुस्थानातील सर्प' हा ग्रंथ तर एका शतकापूर्वी लिहिला गेलेला.मराठीतून इतका शास्त्रशुद्ध ग्रंथ माझ्या वाचण्यात नाही.


देवाच्या अस्तित्वाविषयी जेवढे गुढ आहे.तेवढेच सापाच्या आवाजाविषयी आहे आधुनिक सर्पतज्ञांचे मत असे की सापाला स्वरतंतूच नसतात तर आवाज कुठून येणार? हा भ्रमाचा भोपळा पडला तो नवेगावबांधचे माधवराव पाटील आणि गांधारी जवळ राहणाऱ्या निरगूने कितीतरी वेळा सापाचा आवाज जंगलात ऐकला होता.सापाच्या आवाजाची ओळख पाटील निरगूकडून शिकले.त्याचे प्रत्यंतर एकदा पाटलांबरोबर चळ्याकाठाने भटकत असताना आले.


सूर्य मावळतीकडे झुकला होता.आभाळ गर्जू लागलेले. विजा चमकू लागलेल्या आणि टर्रर्रर्र आवाज येऊ लागला.गावातल्या चिंचेच्या झाडावरच्च्या घरट्याकडे आभाळातून जाणारे बगळे-ढोकरी क्षणभर उडायचे थांबले.पडारीतून बागडणारी चिमणी पाखरे एकाएकी शांत झाली.तशीच तुऱ्यांना चिकटून राहिली.एखाद्या चिनी चित्रातल्या पाखरासारखी. जंगलात चीचिर ची करीत ओरडणारा तित्तिरही गप्प झाला.


"सायब, ऐकलं काय ?"


"काय ?"


"टवऱ्या मुहाडोर सापाचा आवाज." मला वाटले होते की हा येणारा आवाज लावा पक्ष्याचा असावा.पण तो होता सापाचा.साप एवढ्या मोठ्याने ओरडू शकतो यावर माझा विश्वासच बसला नसता.पण पाटील मोठे सर्पज्ञानी आहेत.


कल्याणचे श्री. लालू दुर्वे महाराष्ट्र व मध्य प्रदेशातल्या घनदाट जंगलातून शिकारीच्या निमित्ताने गेली तीन तपे फिरत आहेत.त्यांना मी एकदा सहज सापाच्या आवाजाविषयी विचारले,तेव्हा त्यांनी सांगितले... "१९४७ च्या सुमारास हिसव हाल स्टेशनपासून १५ मैलांवर हरणाच्या शिकारीसाठी गेलो होतो.हरणाच्या शोधात फिरता फिरता दूर कुठून तरी कवड्याच्या ओरडण्याचा आवाज आला.आमच्याबरोबर जो जाणता भिल्ल होता तो म्हणाला, 'तिकडं जाऊ नका. ते किडं... म्हणजे साप ओरडत फिरतंय.ते फार खतरनाक आहे.'


परवा गरुड-घुबडाच्या शोधात नाशिकजवळच्या पेठला गेलो होतो.तेथे आवरी गुरुजींची योगायोगाने भेट झाली. हा ५०-६० वर्षांचा जंगलात राहणारा निसर्गज्ञानी.ह्या कोकणी गृहस्थाने सापाविषयी अगदी बारीकसारीक माहिती गोळा केली आहे.बोलण्याच्या ओघात सर्पाच्या आवाजाचा विषय निघाला. मी विचारलं-


"गुरुजी, तुम्ही कधी सापाचा आवाज ऐकलात काय ?"


"होय."


"कधी, कुठं ऐकायला मिळाला तो आवाज ? कसा असतो ?"


"सांगतो साहेब,आता या गोष्टीला १५-१६ वर्षं झालीत. पेठजवळ ४-५ किलोमीटर अंतरावर जुनोठी गाव आहे. मी तिथलाच.गाव तसं लहानच.गावाबाहेर मारुतीचं देऊळ. तिथं मी रोज सांज वेळी दिवा लावायला जात असे.त्या दिवशी मी दिवा लावून घरी येत होतो.वाटेत पडीक जागा आहे.तिथं वीतभर गवत उगवलेल. इतक्यात चिव चिव असा कोंबडीच्या पिलासारखा आवाज कानी पडला.मला वाटलं अशा सांज पारी इथं कोंबडीचा आवाज कसा ? एखादं पिलू चुकून मागं तर राहिलं नाही ? पुन्हा तर्क केला की अशा वेळी गावाबाहेर कुठलं पिलू असणार ! मला आठवण झाली ती माझे मामा अर्जुन भोये व चुलता लक्ष्मण आवारी यांची.

त्यांच्या बोलण्यात मी ऐकलं होतं की सापदेखील असाचा आवाज काढतो.खात्री करावी म्हणून मी जरा सावधगिरीनं तिथं उभा राहिलो.आभाळात अष्टमीचा चंद्र डोक्यावर होता.आभाळ अगदी स्वच्छ.चंद्राचा प्रकाश तिथल्या उंच विरळ गवतावर पडला होता.

त्यातून चिव चिव आवाज आता दुसऱ्याच ठिकाणाहून येत होता. समोर गवत हालत होतं.नागमोडी.आणि थोड्यावेळानं साप चांदण्यातून जाताना चमकला. थांबून थांबून तो आवाज कानी पडत होता.तो नागच होता.उंच फणा काढून तो जाताना दिसला.विषाची परीक्षा पाहणं नको म्हणून मी तिथून गावाकडं पळ काढला.


"आणि दुसरा प्रसंग त्याच वर्षातला.गावाला लागून जंगल.एक दोन फर्लांगावर. पहाटे मी जंगलात गुरं चारायला नेली.तसं आजूबाजूला दिसण्याइतकं चांदणं पडलं होतं.इतक्यात गांजी लावाचा आवाज कानी पडला.गांजी लावा रानात हालचाल झाली की एकमेकांना चिक् चिक् आवाजानं साद घालतात. इतक्यात एक लावा त्या आवाजाच्या दिशेनं माझ्या डोक्यावरून उडत गेली.

आणि तिथं जाऊन हळूच विसावली.पण ती तशीच भडकून-चमकून दुसऱ्या दिशेनं उडाली.तेव्हा मला विशेष वाटलं नाही.पण दुसऱ्याच दिशेनं आणखी एक लावा तिथं जाऊन धडकली.तोच ती भडकून उडाली.मी त्या ठिकाणी डोळ्यात जीव आणून पाहात होतो.त्या ठिकाणची गवताची पाती एखादा सर्प जाताना हालतात तशी नागमोडी हालत होती.तो सर्पच होता.गावचा गुराखी त्रिंबक रावजी राऊत असे प्रसंग व आवाज दिवसा उजेडी आणि रात्रीही पाहिल्या-ऐकल्याचं सांगायचा.तो म्हणायचा, 'साप गांजी लावाचा हुबेहूब आवाज काढून-फसवून त्यांना जवळ बोलावतो.नजीक येताच तिला दंश करून पकडतो.'


"आणखी एक असाच प्रसंग आठवतो." ते सांगू लागले. "नाशिकजवळच्या हरसूळजवळ ठाणेपाडा इथं माझा दोस्त रामा रावजी सापटे राहातो. तिन्ही-त्रिकाळ जंगलात भटकणारा हा वारनी पला गुरुस्था अरण्य विद्या मी त्याच्याकडूनच शिकलो.

एकदा तो व मी जवळच रायत्याला राहणारा आमचा मित्र किसन जानू गवळी याच्याकडे मुक्कामाला गेलो.रात्री बराच वेळ गप्पा मारल्या.शिकार,भुतंखेतं,जादूटोणा,मंत्र-तंत्र, करणी,भानामती अशा एक ना अनेक विषयांवर गप्पा रंगात आल्या होत्या.तोच रामा सपाटे म्हणाला, 'ऐका तर काय आरडतंय!' आम्ही लक्षपूर्वक ऐकत होतो. तसा आवाज आम्ही जंगलात-रानावनात भटकताना अनेक वेळा ऐकला होता.त्यामुळे आम्हाला नवल वाटले नाही. मी विचारले, 'डरगा लाहुरी ओरडतंय नव्हं!'


"ना, तो आवाज सापाचा आहे.डरगा लाहुरी कधी रातीची बोंबलत नाही.तिचा आवाज लांब तर सापाचा आवाज तीक्ष्ण असतो." अशी त्याने दोहोंच्या आवाजातली ओळखण सांगितली.


"साप केवळ कोंबडी किंवा लाहुरी पक्ष्यासारखं ओरडतात असं नव्हे तर ते जनावरांसारखेदेखील आवाज काढताना मी ऐकलंय." गुरुजी पुढे सांगत होते.


"ते कसं?" मी.


"त्या वेळी मी गुजरातमधील धरमपूर येथे होतो. धरमपूर पेठपासून ७०-८० कि. मी. अंतरावर आहे. आता या गोष्टीला तीन तपं झाली.पूर्वी ह्या रस्त्यानं दिवसा जायलादेखील भीती वाटे इतकी किर्र झाडी होती.आता एखाददुसरी वस्ती तरी दिसतेय.त्या काळात वाटेत माणूसदेखील भेटायचं मुष्कील.त्यावेळी मी डांग सेवा मंडळाचा कार्यकर्ता होतो. एकदा जवळच असलेल्या मारवाड गावात गेलो. सोनू नायक व चित्ता नायक या वारल्यांच्या घरी मुक्कामाला होतो. गावाभोवती घनदाट जंगल.रात्रीची जेवणं झाली. मी पथारी पसरून अंग टाकलं.

दिवसभराच्या श्रमामुळं मला लगेच झोप लागली.रात्री मध्येच झोप चाळवली. जंगलातून दुरून बकरी ओरडते तसा बे ऽ बे ऽऽ असा आवाज कानी पडला.मी जवळच झोपलेल्या चित्ता नायकाला जागं केलं. त्यानं विचारलं, 'गुरुजी झोप येत नाही काय ?'


"अरे चित्ता, रानात कवापासून बकरी आरडतीय.वाघानं तर गाठली नसेल ?"


"गुरुजी, तो बकरीचा आवाज नाही.एखाद अर्धा कोसावरून तो आवाज येतो तो आरा-अजगराची जात-सापाच्या मादीचा.ती माजावर आलीय.नराला साद घालतेय. हा आवाज कधी सात-आठ दिवस तर प्रसंगी एक-दोन महिनेही ऐकू येतो."


आभाळातल्या चांदणीकडे मी पाहिलं.मध्यरात्र झाली होती.

सापाचं जुगणं कधी पाहू नये म्हणतात.पण असं दर्शन झाल्यावर बरी वाईट भावना आम्हा लोकांत दृढ नाही.ते थंडीचे दिवस होते.मी पेठहून उबरद गावाकडे जाताना वाटेत जंगलात धामणीची रतिक्रीडा पाहिली.वेळ असावी सकाळी दहा-अकरा वाजताची.ती एकमेकांना गुंडाळून जमिनीपासून दोन फूट उंच उभी होती.बाकीचं धड जमिनीवरच काटकोनात लोळत होतं. त्या वेळी ते चीत्कार करीत.एकमेकांचे चुंबन घेत होते. पण आवाज नर की मादी करीत होती हे मात्र कळले नाही." (जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली, प्रकाशक-मकरंद भास्कर कुलकर्णी,साहित्य प्रसार केंद्र सीताबर्डी नागपूर)


पेठच्या वनविश्रामगृहात व्हरांड्यात बसून आम्ही बराच वेळ बोलत होतो.बाहेर किर्र अंधार होता.इतक्यात वादळी पावसाला सुरुवात झाली.तेवढ्यात विजेचे दिवे गेले.वनविश्रामगृहात अंधार पडला.चौकीदाराने पितळेचा लँप टेबलावर आणून ठेवला.

पावसाळी किडे-पतंग दिव्याभोवती पिंगा घालू लागले.जेवणे उरकून आम्ही पलंगावरच्या मच्छरदाणीत प्रवेश केला. बाहेर डासांची विलक्षण गुणगुण ऐकू येत होती. कौलावर पाऊस थड् थड् वाजत होता.आजूबाजूच्या झाडांची पाने सळसळत होती.एकदा-दोनदा घुबडाचा घुग्‌घुग् असा दीर्घ स्वर कानी आला आणि वातावरणात विरला.थोड्या वेळाने वादळ शमले.नवीन जागेत लवकर झोप येत नसल्याचा माझा अनुभव आहे.


इतक्यात शेजारच्या पलंगावरून आवरी गुरुजींचा आवाज आला.


"साहेब, तुम्ही पलंगावरच असा.खाली उतरू नगा."


"का बरं?" मी किंचित घाबरल्या स्वरात म्हटलं.


"इथल्या सतरंजीवरून एक जीवाणू सरपटत जात असल्याचा आवाज मला ऐकू येतोय."


मी उशालगतच्या छोट्या विजेरीच्या प्रकाशात पाहिले. एक मोठा नाग सरपटत दारातून मागच्या व्हरांड्यात जाताना दिसला.उजेडात त्याची त्वचा चमकत होती. गुरुजींनी हळूच पलंगावरून उतरून दिव्याची वात मोठी केली तसा सळकन् वीज चमकल्याचा भास झाला आणि व्हरांड्यातून नाहीसा झाला. गुरुजींनी दारं बंद केली.नंतर रात्री मला झोप आलीच नाही।

२७/६/२५

काळोखाच्या क्षेत्रात /In the realm of darkness

पाण्यापेक्षा माती आपल्यासाठी अधिक गूढ आहे, रूपकात्मक आणि शब्दशः सुद्धा.असं म्हणतात की, आपल्याला जितकी चंद्राची माहिती आहे त्यापेक्षा कमी ज्ञान सागराच्या तळाचे आहे आणि माती मधल्या जीवसृष्टीचे तर याहीपेक्षा कमी ज्ञान आहे. 


हे खरं आहे की,सूक्ष्मजीवांच्या अनेक प्रजाती आज माहीत आहेत आणि मातीबद्दलही बऱ्याच नवनवीन गोष्टी संशोधनातून येतात.तरीही आपल्या पायाखालच्या गुंतागुंतीच्या दुनियेची ही फक्त आंशिक माहिती आहे. जंगलामध्ये जवळजवळ अर्धा जैविक माल जमिनीखाली असतो.इथले बहुतांश सजीव साध्या डोळ्यांना दिसत नाहीत.त्यामुळे कोल्हा,काळा सुतार पक्षी किंवा फायर सॅलमँडरबद्दल जितके आपल्याला कुतूहल आहे तितके या सूक्ष्म सजीवांचे नाही.


पण झाडांच्या आयुष्यात या सूक्ष्म जीवांचे महत्त्व फार आहे.

जंगलातून मोठे सजीव आले नाहीत तरी झाडाला फार फरक पडणार नाही.हरणे,रानडुक्कर,मांसाहारी जनावरे आणि अनेक पक्षी जंगलात नसले तरी परिसंस्थेत फार परिणाम होणार नाही,जंगल वाढतच राहील.पण त्यांच्या पायाखालचे सूक्ष्मजीव नसले तर मात्र मोठा फरक पडेल.मूठभर मातीमध्ये जितके सूक्ष्मजीव असतात तितकी पृथ्वीची लोकसंख्याही नसेल.चमचाभर मातीमध्ये कित्येक मैलबुरशीच्या जाळ्याचे तंतू असतात.या सर्वांच्या योगदानातून झाडांसाठी मातीचे मूल्यवर्धन होते.या सूक्ष्मजीवांबद्दल बोलण्याआधी आपण पहिल्यांदा माती कशी तयार झाली,ते पाहू.उघडे किंवा सैल रचनेत असलेल्या दगडातून आर्द्रता आणि पोषणद्रव्यांचा योग्य साठा होत नाही.भूवैज्ञानिक प्रक्रियेतून,उदाहरणार्थ हिमयुगातील कडक थंडीमुळे या दगडांना तडे गेले. हिमनद्यांनी त्यांचे छोटे छोटे तुकडे केले.कालांतराने त्यांची बारीक वाळू बनली.हिमयुग संपल्यावर पाण्याने या वाळूचा थर दऱ्याखोऱ्यातून पसरविले किंवा वादळ वाऱ्यामुळे दूरवर पसरून त्यांचे जाड थर रचले गेले.


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न

अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर

 मनोविकास प्रकाशन


सूक्ष्मजंतू,बुरशी आणि वनस्पती पाण्यातून येत गेली आणि त्यांच्या विघटनामुळे वाळूत जैविक मालाची भर पडली.पुढील हजारो वर्षांत तिथे झाडे उगवायला सुरू झाली आणि मातीची गुणवत्ता वाढत गेली.झाडांच्या मुळांमुळे मातीची धूप टळली आणि त्यावर जैविक माल पडत गेला.ही दगडी कोळशाची प्राथमिक अवस्था होती.धूप किंवा झीज ही जंगलासाठी सर्वांत धोकादायक प्रक्रिया असते.जोरदार पाऊस किंवा काही हवामानाच्या घटनांमुळे माती वाहून जाते.जर जंगलाला पावसाचे पाणी शोषून घेता आले नाही तर पाणी वाहून जाताना मातीही घेऊन जाते.

यामुळेच पावसाळ्यात वाहणारे पाणी तपकिरी रंगाचे दिसते. पावसामुळे एका चौरस मैलातून दोन हजार नऊशे टन माती वर्षाकाठी वाहून जाऊ शकते.आणि एका वर्षात जेमतेम दोनशे नव्वद टन माती त्याच क्षेत्रावर तयार होऊ शकते.

त्यामुळे काही काळातच तिथे फक्त दगड उरतात.ज्या क्षेत्रात काही शतकांपूर्वी शेती झाली तिथे आज अशी मातीविरहित क्षेत्र दिसून येतात.या तुलनेत जिथे अजून जंगलं शाबूत आहेत तिथे एका चौरस मैलात जेमतेम एक ते चौदा टन मातीची झीज होते.

किंबहुना अशा ठिकाणी झाडाखालची माती अधिक खोल आणि पोषणयुक्त होत जाते ज्यामुळे तिथल्या जंगलाला पोषक वातावरण तयार होते.


आता मातीतील जीवसृष्टीकडे वळू.खरंतर ही काही फार प्रेक्षणीय नाही.हे सजीव इतके सूक्ष्म असतात की, डोळ्याने तर नाहीच पण भिंगातूनही दिसणार नाहीत. बीटल माईट,स्प्रिंगटेल किंवा स्युडो सेंटीपीड हे नक्कीच ओरंग ऊटंग आणि हम्पबॅक व्हेल माशाइतके आकर्षक नसतात,पण हे सजीव अन्नसाखळी मधले प्राथमिक घटक असल्यामुळे त्यांना जमिनीवरील प्लॅकटन (पाण्यात तरंगणारे सूक्ष्म प्लवक) म्हणता येईल. दुर्दैवाने संशोधकांना या जीवांमध्ये म्हणावा तितका रस नाही.यांच्या हजारो प्रजातींचा शोध लागला आहे पण त्यांना फक्त उच्चारायला अवघड लॅटिन नावं दिलेली आहेत. अजून अगणित प्रजाती आपल्याकडून दखल घेतली जाण्याची वाट पाहात आहेत. 


तुमच्या घराच्या मागच्या जंगलात अजून खूप गुपित आपली वाट पाहात आहेत.तोच काय तो दिलासा! 


याबद्दल आपल्याला आज जी थोडी माहिती आहे, त्यावर जरा बोलू.मघाशी बीटल माईटचा उल्लेख झाला. यांना 'ऑरिबॅटिड माईट' असेही म्हणतात.युरोपमध्ये यांच्या हजारो प्रजाती सापडतात.हे सजीव जेमतेम ०.०४ इंच लांब असतात आणि आखूड पायाच्या कोळ्यांसारखे दिसतात,तपकिरी रंगाच्या दोन छटा असलेले त्यांचे शरीर जमिनीच्या रंगात मिसळून जाते. आपल्या घरांमधल्या धुळीत ही माईट असतात. झडणाऱ्या मानवी त्वचेवर ते जगतात पण काही जणांना त्यांच्या अ‍ॅलर्जीचा त्रास होऊ शकतो.काही बीटल माईट झाडांभोवती अशाच प्रकारे झडलेल्या सालांवर आणि पानांवर जगतात.ही नसती तर गळणारी पानं आणि सालांचा कित्येक यार्ड उंच ढीग झाला असता.बीटल माईटची भुकेली सेना हा ढीग फस्त करते.माईटच्या इतर काही प्रजाती बुरशीवर जगतात.बुरशीच्या बारीक तंतूंमधून वाहणारे द्रव्य ते शोषून घेतात.याव्यतिरिक्त झाडांनी आपल्या मित्र बुरशीसाठी बनविलेली साखरही बीटल माईट शोषून घेतात.

कुजणारे लाकूड असो किंवा मेलेली गोगलगाय, प्रत्येकावर चरणारे बीटल माईट जंगलात सापडतात. जन्म घेणारी वनस्पती असो अथवा मरून पडलेले झाड प्रत्येक ठिकाणी बीटल माईट असतात,त्यामुळे या परिसंस्थेचे अविभाज्य घटक म्हणून त्यांना मानलं जातं.


आता भुंग्यांकडे (वीव्हिल) वळू.कान हरवलेल्या पिटुकल्या हत्तीसारख्या दिसणाऱ्या या कीटकांत पृथ्वीतलावरील सर्वाधिक प्रजाती आहेत.फक्त युरोप खंडातच यांच्या चौदाशे प्रजाती मिळतात.खाण्यापेक्षा आपल्या पोराबाळांच्या पालकत्वात भुंग्यांचे जास्त लक्ष असते.पान आणि कोवळ्या खोडांमध्ये आपल्या सोंडेने छोटी भोकं पाडून त्यात ते आपली अंडी घालतात.तिथे या अंड्यातून निघालेल्या पिल्लांना भक्षांपासून संरक्षण असते आणि ती शांतपणे झाडाच्या आतला भाग किंवा पानं खात खात ती आपला मार्ग बनवतात. 


जंगलाच्या जमिनीवर राहणारे काही भुंगे उडू शकत नाहीत,कारण त्यांना या परिसंस्थेच्या संथ चालीची आणि निरंतर अस्तित्वाची सवय झालेली असते.एका वर्षात ते फार फार तर तीस फूट प्रवास करतात,कारण त्या पुढे जाण्याची त्यांना गरजच पडत नाही.समजा एखादे झाड वठले आणि आजूबाजूची परिस्थिती बदलली तर तिथल्या भुंग्याला फक्त शेजारच्या दुसऱ्या झाडापर्यंत पोचायचा प्रवास करावा लागतो.मग तिथे पोचून तो कुजणाऱ्या पाल्यावर आपले पोट भरेल. जंगलात भुंगे असणे हे जंगल इतिहासकालीन असल्याचे निदर्शक आहे.जर मध्ययुगामध्ये जंगल साफ केले गेले आणि नंतर पुन्हा लागवड झाली तर तिथे हे कीटक दिसत नाहीत


कारण साफ झालेल्या जंगलापासून दुसऱ्या जंगलापर्यंत ते पोचू शकत नाहीत.आत्तापर्यंत आपण बोललेल्या सर्व प्राण्यांच्यात एक साम्य आहे.सर्व प्राणी सूक्ष्म असल्यामुळे फार छोट्या परिसरात त्यांचा परिणाम जाणवतो.मध्य यूरोपीय प्राचीन जंगलात हे ठीक होते. पण बहुतांश जंगलात मानवी हस्तक्षेप झालेले आहेत. त्यामुळे बीचच्या जागी स्प्रूस दिसतात,ओक वृक्षांची जागा डग्लस फरने घेतली आहे आणि विशाल वृक्षांच्या ठिकाणी यौवनातील झाडे उभी आहेत.अशा प्रकारच्या अल्पवयीन जंगलात जनावरांना खाद्य मिळत नाही त्यामुळे त्यांचे अस्तित्व संपून गेले.तरीही काही ठिकाणी आज जुनी पानझडी जंगले आहेत जिथे मूळच्या जैवविविधतेला आसरा मिळतो.आता जर्मनीमध्ये सूचीपर्णी जंगलांच्यापेक्षा पानझडी वृक्षांची लागवड सुरू झाली आहे.पण वादळात मोडलेल्या स्प्रूसच्या जागी एखादा बीच जरी उभा राहिला तरी बीटल माईट आणि स्प्रिंगटेल पुन्हा तिथे कसे पोहोचू शकतील? हे कीटक आयुष्यभरात जेमतेम तीन फूट चालतात. बाव्हेरियन जंगलासारख्या सुरक्षित वनक्षेत्रात पुन्हा एकदा घनदाट प्राचीन जंगले उभी राहतील,अशी अपेक्षा आपल्याला करता येईल का? हो, हे नक्कीच शक्य आहे.


माझ्या जंगलात काही विद्यार्थी संशोधकांनी सूचीपर्णी झाडांशी निगडित सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला आहे. त्यातून त्यांना असे दिसते की,हे जीव दूरपर्यंत जाऊ शकतात.जुन्या स्प्रूसच्या लागवडीत तर हे नक्कीच दिसून येते.या तरुण संशोधकांना स्प्रूस जंगलात विशेष स्प्रिंगटेल सापडले.पण ह्यूमेल मधल्या या जंगलात जेमतेम शंभर वर्षांपूर्वी लागवड झाली होती.त्याच्या आधी फक्त प्राचीन बीच वृक्ष होते,जसे मध्य युरोपात सापडतात.तर मग सूचीपर्णी जंगलात वाढणारे हे स्प्रिंगटेल ह्यूमेलला कसे आले,

पोचले ? माझ्या अंदाजाप्रमाणे हे कीटक पक्ष्यांच्या पिसामध्ये चिकटून इथे आले असावेत.पक्ष्यांना पानगळीत लोळायला खूप आवडते.असे करून त्यांची पिसे स्वच्छ होतात.आणि तेव्हाच हे छोटे जीव त्यांच्या पिसात अडकून बसतात. दुसऱ्या कुठल्या जंगलात जाऊन तिथे लोळण घेतली की तिथे जाऊन पडतात.

स्प्रूस जंगलातील विशेष प्रजातींना जे लागू होतं तेच कदाचित पानझडी वृक्षप्रेमी प्रजातींनाही लागू होत असेल.


जर का भविष्यात पुन्हा प्रौढ अवस्थेतील पानझडी जंगले इथे आली तर पक्षी योग्य त्या कीटकांना तिथे पोचवायची काळजी घेतील. पण कील आणि ल्युनेबर्गला झालेल्या अभ्यासात असे दिसते की या सूक्ष्म कीटकांची परत वारी होण्यासाठी प्रचंड कालावधी लागेल."


ल्युनेबर्गच्या सुपीक जमिनीवर शंभर वर्षांपूर्वी ओक वृक्षांची लागवड झाली.शास्त्रज्ञांना वाटले की काही दशकातच बुरशीचे जाळे तयार होईल आणि सूक्ष्म जिवाणू मातीत वाढू लागतील.पण आजही तिथे त्यांचं विपुल वैविध्य - दिसत नाही.याचा जंगल परिसंस्थेवर निश्चितच विपरीत परिणाम होतो.शिवाय जन्म आणि कुजण्याच्या विघटन प्रक्रियेचे पोषणचक्र कार्यक्षम होत नाही.त्यात भर म्हणजे शेतीच्या वेळेस वापरलेल्या खतांतील नत्र अजूनही इथल्या मातीत सापडते.इथलं एक जंगल इतर ठिकाणच्या लागवडीपेक्षा झपाट्याने वाढतय,हे खरं आहे,पण ही झाडं पुरेशी धडधाकट नाहीत.त्यामुळे दुष्काळ काढणं त्यांना अवघड जात. इथली माती पूर्ववत कधी होईल,हे आपल्याला माहीत नाही.पण इतकं कळलं आहे की एक शतक त्यास पुरेसं नाही.मातीचं पुनरुज्जीवन होण्यासाठी आपल्याला प्राचीन जंगलांना मानवी हस्तक्षेपापासून सुरक्षित ठेवावं लागतं.अशा ठिकाणी मृदेतील वैविध्य जिवंत राहतं आणि याचा उपयोग बाजूच्या परिसरात त्यांचा प्रसार होण्यासाठी होतो.आणि यासाठी काही मोठा त्याग करावा लागत नाही,हे आपल्याला ह्यूमेलच्या लोकांनी इतकी वर्षं दाखवून दिलं आहे.त्यांनी एक बीच वृक्षाचं जंगल सुरक्षित ठेवलं आणि कल्पकतेनं त्याचं मार्केटिंग केलं.

जंगलाच्या एका भागात जंगलातील स्मशानभूमी केली आहे.इथे मृतांच्या नातेवाइकांना जिवंत झाडाखाली आपल्या लाडक्या व्यक्तीची थडगी बनवण्यासाठी झाड भाड्याने दिलं जाते.आहे की नाही ही छान कल्पना ? अजून एक भाग उद्योगधंद्यांना भाड्याने दिला जातो जिथे त्यांना निसर्गसंवर्धनाची जबाबदारी पूर्ण करता येते. अशा गोष्टींमुळे लाकडाचा वापर होत नाही व निसर्ग आणि माणूस दोघेही खुश राहतात.


आजच्या एकविसाव्या शतकात जंगलाची सुरक्षा आणि संवर्धनाचा खर्च अशा प्रकारे विविध मार्गातून जगभरात काढला जात आहे.ग्वाटेमाला मधील 'माया बायोस्फियर रिझर्व' सारख्या ठिकाणी शिक्षण आणि उपयुक्ततेचा मेळ घडवून आणला जातो.तिथे स्थानिक लोकांकडून पर्यटक जंगलाची माहिती घेतात. त्यामुळे तिथे स्थानिक लोक लाकूडतोड किंवा शेती करत नाहीत.

काही ठिकाणी जंगल संवर्धनाचे काम प्रतिष्ठेशी जोडण्यात आले आहे,जसे स्कॉटलंड मध्ये ! इथे तुम्हाला पूर्वीच्या प्रतिष्ठित लोकांच्या मालकीची जमीन विकत घेता येते.त्यामुळे लाकूड तोडणाऱ्या धंद्यांना बाहेर ठेवलं जातं आणि तिथे प्राचीन कॅलिडोनियन जंगल परिसंस्थेचं पुनरुज्जीवन होऊ शकत आहे.काही ठिकाणी असंभाव्य संस्थांची भागीदारी आहे,जसे अमेरिकेमध्ये ! राष्ट्रीय वन्य जीवन आणि मत्स्य संस्था लांब पानाच्या पाईन परिसंस्थेला टिकवण्याचं काम करीत आहे,त्यांना अमेरिकेच्या संरक्षण खात्याकडून मदत मिळत आहे.याचं कारण म्हणजे सैन्य दलाच्याभोवती जंगल असणं हे त्यांच्या पथ्यावर पडतं.अशा कित्येक पद्धतीने आपल्याला जंगले सुरक्षित आणि उत्पादनक्षम ठेवता येतात.



२५/६/२५

नाझारेथचा ज्यू येशू / The Jew Jesus of Nazareth

येशू जूडाच्या डोंगरात भटकत राहिला.मानवजातीने त्याला उडाणटप्पू ठरवले होते.जॉन बॅप्सिटस्ट याच्याप्रमाणे त्यालाही आढळून आले की,माणसे पशूच्याच प्रतिकृती आहेत.निराशेच्या गर्तेत पडलेले लोक त्याच्याभोवती गोळा झाले.कोळी,कामगार वगैरे दरिद्री लोक त्याचे अनुयायी झाले.त्याने त्यांना भावी सुखाची-स्वर्गातील राज्याची आशा दाखवली, अंधारमग्रांना आशेचा किरण दाखवला. "सोडा आपूले घरदार" तो म्हणाला, "चला माझ्या पाठोपाठ.प्रभूच्या नव्या राज्यात आपण शहरे,पुरे,पट्टणे हिंडत जाऊ, या गावाहून त्या गावी जाऊ,पृथ्वीवर सर्वत्र प्रभूचे राज्य स्थापू,ईश्वराचा झेंडा चोहोंकडे नेऊ."


त्याच्याभोवती जमा झालेले भिकारी म्हणजे बेजबाबदार व मजा करू पाहणाऱ्या लोकांचा जथ्था!त्यांना खाणेपिणे व भांडणे या गोष्टी आवडत.एकदा एका गावी त्यांचे स्वागत कोणीच केले नाही म्हणून त्या गावाला काडी लावायला ते निघाले;पण ख्रिस्ताने त्यांचे मन वळवले व त्यांना तसे करू दिले नाही.जगातल्या रूढींकडे पाहून तोंड वेंगाडण्यात त्यांना परमानंद वाटे. रविवारी म्हणजे प्रार्थनेच्या पवित्र दिवशी काही वेडेवाकडे,अपवित्र काम करताना ते कोणास आढळले तर ते असा युक्तिवाद करीत की,"लोकांसाठी रविवार आहे, रविवारसाठी लोक नाहीत." जे त्यांचे ऐकत नसत, ऐकायला तयार नसत,त्यांना ते शिव्याशाप देत व त्यांची निंदा करीत. "तुम्ही जणू मृतवत् मुडदे आहात!" असे ते त्यांना हिणवीत.ईश्वराने त्यांचा नाश करावा म्हणून ते प्रार्थना करीत.

सोडोम व गोमारा येथील लोकांचा जसा पूर्वी प्रभूने नायनाट केला तसाच याही लोकांचा त्याने नायनाट करावा म्हणून ते प्रभूला प्रार्थीत.ते जणू गॅलिलीतले समाजवादीच होते! अनुयायी फार अतिरेक करू लागले,तर त्यांचा मुख्य नेता ख्रिस्त त्यांस आवरी; पण खुद्द येशूही कधीकधी अत्यंत संतापे,प्रक्षुब्ध होई. ख्रिस्ताची वाणी व त्यांची कृत्ये अद्यापि पुरेशी सुसंस्कृत झाली नव्हती.

आपला संदेश न ऐकणाऱ्यांवर तो संतापे, त्याला धीर धरवत नसे.तो उतावळा व अधीर होता. निराशेच्या भरात एकदा तो म्हणाला,"जो माझ्या शब्दांवर विश्वास ठेवणार नाही,तो नरकात जाईल." आयुष्याच्या या काळात त्याच्या ठायी सहनशीलता नव्हती,सौम्यता नव्हती.तो एकदम रागावे, संतापे, प्रक्षुब्ध होई. कधीकधी क्रोध आवरणे त्याला अशक्य होई.जोरदार व तेजस्वी शब्दांनी ऐकणाऱ्यांचा हृदयपालट झाला नाही की तो हात उगारावयासही मागेपुढे पाहत नसे.हातात चाबूक घेऊन तो अन्यायाचे शासन करण्यास उभा राही;हाती तलवार घेऊन तो पृथ्वीवर स्वर्गाचे राज्य आणू पाही.


पण त्याच्या ठायी दैवी विनोदही होता व मुलांवर तर तो अपार प्रेम करी.तो जिथे जिथे जाई,तिथे तिथे त्याच्याभोवती मुले गोळा होत व त्याला म्हणत,"या, आमच्याबरोबर खेळायला या." तो त्यांच्याबरोबर हसे, खेळे.एक मुलगा खांद्यावर आहे,एक हाताला ओळखंबा घेत आहे,पुष्कळ जण त्याच्या पाठीमागून येत आहेत, अशा थाटात त्याची ती ऊन लागून तांबूस-पिंगट झालेली धिप्पाड मूर्ती रस्त्यावरून जाताना नेहमी दिसे, ती मुले पॅलेस्टाइनमधली लोकगीते मोठमोठ्याने गात व हावभाव करीत त्याच्याबरोबर हिंडत,ख्रिस्ताचे एखाद्या गावी आगमन म्हणजे तेथील मुलांना जणू सुटीचा दिवस ! तो नाझारेथचा गोड मुरलीवाला मुलांना इतके मोहून टाकी की,पृथ्वीच्या टोकापर्यंत कोठेही त्याच्याबरोबर जावयास ती आनंदाने तयार असत.


येशूची सारी आशा त्या बाळगोपाळांवर होती. 'हे माझे बाळसवंगडी म्हणजेच जगाची,प्रभूची व माझी आशा !' तो म्हणे,"ईश्वराचे राज्य अशा सरळ,निष्पाप,निर्मळ व प्रेमळ मुलांसाठीच असते.मुलांना त्याचे म्हणणे पटकन समजे.नवीन राज्याच्या ज्या अद्भुत कथा तो सांगे,त्या मुलांना खऱ्या वाटत.त्यात त्या निष्पाप बालकांना असंभाव्य वा अशक्य काहीच वाटत नसे.तो स्वतः त्या मुलांना घेऊन त्या रम्य आनंदभुवनात जाणार होता".त्या नवीन मंगल भूमीत द्वेष-मत्सर असणार नाहीत,दुःख असणार नाही,रोग असणार नाहीत,मरण येणार नाही!" असे तो सांगे.मुले त्याच्याजवळ बसून तल्लीनतेने ऐकत,आश्चर्याने त्यांचे डोळे विस्तारीत होत.येशू त्यांच्या डोळ्यांसमोर जी कल्पनारम्य चित्रे उभी करी,त्यामुळे त्यांची तोंडे आशेने व श्रद्धेने चमकू लागत."या पृथ्वीवर ही मुलेच नवीन स्वर्ग उभारतील,तो निर्माण करण्यास मदत करतील,मोठ्या माणसांच्या हातून हे काम होणार नाही,"असे त्याला वाटे.जे वयाने वाढलेले असतात,ते बिघडलेले असतात.साहसी वृत्ती,आत्मविश्वास,त्याग, श्रद्धा इत्यादी गुण त्यांच्या ठायी नसतात.न्याय्य वस्तुस्थितीतील वैगुण्ये,जगातील दुःखे व निराशा त्यांच्या हृदयात खोल रुतून बसलेली असतात,ते केवळ संसारी असतात.व्यवहारापुरते राहतात.या रानटी जगातील व्यावहारिक शहाणपणामुळे त्यांना सौम्य व शांत अशा एका नव्या जगातील सौंदर्ये दिसत नाहीत.


ख्रिस्त वयाने मोठ्या असलेल्या प्रौढांजवळ स्वर्गीय राज्याविषयी बोलत,तेव्हा त्यांना त्याचाही अर्थही समजत नसे.ते गैरसमज करून घेत व त्या राज्यात कोणाला कोणते अधिकार मिळणार याबाबत त्याच्याशी भांडू लागत ! ते त्याला विचारीत,"ते स्वर्गाचे राज्य आल्यावर तुमच्या उजव्या बाजूला कोण असणार, डाव्या बाजूला कोण बसणार,मंत्री कोण होणार, सेनापती कोण होणार?" ते लोक वयाने वाढलेले असले तरी एका दृष्टीने अडाणी मुलेच आहेत असे त्याला आढळून येई.दरिद्री,करुणास्पद पण वंदनीय मूल.

वाईट करण्याची त्यांची शक्ती तेवढी वाढलेली होती;इतर बाबर्तीत ते मूलच होते,अपरिपक्वच होते.आणि भोवतालच्या अशा लोकांत वावरतावावरता,त्यांचे अडाणी प्रश्न ऐकताऐकता ख्रिस्ताला हळूहळू कळून चुकले की,तो मुलांमध्येच वावरत होता.काही मोठी मुले, काही छोटी मुले;पण सारी मुलेच ! त्या मुलांच्या जगात एकटा तोच काय तो मनाने व बुद्धीने वाढत होता,प्रौढ व परिपक्व होत होता.बौद्धिक व नैतिकदृष्ट्या तोच तेवढा वाढत होता.आणि हे कळून आल्यावर तो रागावेनासा झाला.तो त्यांची कीव करू लागला.त्याला त्यांच्याबद्दल करुणा वाटू लागली.


तो त्याच्या आयुष्यातला संक्रमणाचा क्षण होता. सहानुभूतीची व प्रेमाची वेगळीच दृष्टी त्याला फुटली. मुलांचा द्वेष वा मत्सर करण्यात त्याच्यावर रागावण्यात, त्यांच्याशी आदळआपट करण्यात काय अर्थ? त्यांना शिव्याशाप देण्याचा,त्यांना शिक्षा करण्याचा काय उपयोग? ज्यांना विचार नाही,ज्ञान नाही,त्यांच्यावर तलवार उगारण्याचा काय उपयोग? का आपण फुकट दातओठ खावेत? प्रेमळ शब्दांनीच त्यांची कानउघाडणी करणे बरे नव्हे का? करुणेच्या,क्षमेच्या शस्त्रानेच त्यांना शिक्षा करणे अधिक शहाणपणाचे नाही का होणार ?


म्हणून त्याने आपला पवित्रा बदलला,आपले धोरण बदलले,जगात झगडे उत्पन्न करण्याची इच्छा आता त्याच्या ठायी राहिली नाही.त्याने आपला तापट स्वभाव सोडला.तो शांत व संयमी झाला.अत्याचाराने वा हिंसेने अन्यायाविरुद्ध लढणे त्याने सोडून दिले.सदैव युद्धाची भाषा वापरून पापाला डिवचण्याचे वा चिडवण्याचे त्याने बंद केले.इतकेच नव्हे;


तर तो शांततेच्या सनातन युद्धातला शांततेने लढणारा कर्मवीर बनला.तो चाबूक व तलवार टाकून देऊन क्षमा,दया व प्रेम या अधिक प्रभावी व प्रबळ शस्त्रास्त्रांनी सज्ज झाला.


तो मानवांमध्ये सदिच्छेचा संदेश पसरवीत फिरणारा परिव्राजक बनला. "शत्रूला ठार मार" अशी प्रार्थना देवाला करणारा पूर्वीचा येशू आता राहिला नाही. तो आता पर्वतोपनिषद् देणारा, परिणतप्रज्ञ असा सर्वस्वी निराळा महात्मा झाला.आता त्याचा संदेशही बदलला; शत्रूवर प्रेम करा,त्याच्या अज्ञानाची कीव करा, अडाण्यांना कळावे समजावे म्हणून त्यांना शिकवा. तुम्हांला शिव्याशाप देतील त्यांनाही आशीर्वाद द्या. छळणाच्याही आत्म्यांसाठी प्रार्थना करा.दुष्ट हृदयाच्या लोकांना रोगी समजून त्यांची शुश्रूषा करा.त्यांचे हृदय शुद्ध व निरोगी होण्यासाठी दयाळू वैद्याप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करा,आजारी माणूस सेवा करणाऱ्यासच वाताच्या भरात मारतो,तद्वत् हे रोगी हृदयाचे मानव त्रास देऊ लागले, मारू लागले,तरीही त्यांची सेवाच करीत जा.


शेवटी ख्रिस्ताला अटक झाली.त्याचे सारे शिष्य आपणही गिरफ्तार होऊ भीतीने पळून गेले ! त्याचे शत्रू त्याच्या रक्तासाठी तहानलेले होते;पण या सॉक्रेटिसप्रमाणेच ख्रिस्तानेही आपल्या बचावाची काहीही तयारी केली नाही.हातात तलवार घेऊन पीटर त्याला वाचवू पाहत होता,पण येशूने मंद स्मित केले. भाले,तलवारी वगैरे नेहमीची जुनाट हत्यारे घेऊन मारण-मरणाचा खेळ खेळण्याच्या स्थितीच्या पलीकडे तो गेला होता.तो या झगड्यांच्या पलीकडे गेला होता. ती पोरकट भांडणे त्याने केव्हाच मागे टाकली होती! 


तलवारीने मिळविलेल्या विजयातून पुन्हा नवीन युद्धेच निर्माण होतात हीही गोष्ट त्याने नीट ओळखली होती.

आश्चर्यचकित झालेल्या पीटरला तो म्हणाला,"म्यानात घाल ती तलवार। जे तलवार हाती घेतील ते तलवारीनेच मरतील!"


रोमन सैनिकांसमक्ष उच्चारलेले ते शब्द म्हणजे जणू भविष्यवाणीच होती.! पण रोमनांनी त्या शब्दांकडे लक्ष दिले नाही.पायलेटने त्याला मरणाची शिक्षा फर्मावली! रोमन रिवाजाप्रमाणे क्रॉसवर खिळे ठोकून त्याला ठार मारण्यात आले! खिस्ताबरोबर दोन चोरही त्याच्या दोन्ही बाजूंस क्रॉसवर चढविले गेले.त्यांनी अपार वेदना होऊ लागल्यामुळे शिव्याशाप दिले;पण ख्रिस्ताने क्षमा केली.क्रॉसवरून लोंबकळणाऱ्या त्या तिघांच्याही मरणकाळच्या किंकाळ्या मात्र एकमेकांत मिसळून गेल्या.

अव्यवस्थित अशा या जगात कोठेच नीट न बसू शकणारे असे ते तिघे दुर्दैवी,करुणास्पद जीव होते !


मानवी ख्रिस्ताचे माझ्या मते हे असे चित्र आहे.घरच्यांनी नाकारलेला,नागरिकांनी धमकावलेला,मित्रांनी सोडलेला,शत्रूनी क्रॉसवर चढविलेला,अनुयायांकडून आतापर्यंत विपरीत अर्थ केला गेलेला,असा हा येशू ख्रिस्त काही जादूगार नव्हता.त्याने चमत्कार केले नाहीत.पण द्वेषाने पेटलेल्या या जगात त्याने दाखविलेले प्रेम हाच खरोखर थोर व अपूर्व चमत्कार नव्हे काय? त्याने केलेल्या चमत्कारांच्या म्हणून ज्या कथा गॉस्पेल्समध्ये वर्णिल्या आहेत,

त्याहून त्याने शत्रूबद्दल दाखविलेले प्रेम हा कितीतरी पटींनी मोठा चमत्कार नव्हे काय ? अर्वाचीन रूढ अर्थाने तो चर्चवाला नव्हता. त्याला विधिविधानांचा तिटकारा होता.कोंडलेली व गजबजलेली प्रार्थना-मंदिरे त्याला आवडत नसत. त्याचे चर्च मोकळ्या जागेत होते.रस्त्याच्या कडेचा एखादा दगड हेच त्याचे व्यासपीठ,तद्वतच जाडाभरेडा व प्रवासामुळे जीर्णशीर्ण झालेला एखादा झगा हाच त्याचा पोशाख असे.आणि आपल्या मातृभूमीची गाणी गाणारे ज्यू मजूर त्याचे साथीदार असत.ख्रिस्त आज जिवंत असता तर आपल्या नावाने चालणारी युद्धे,तद्वतच करण्यात येणारे द्वेष-मत्सर,छळ व अपराध पाहून तो विस्मितच झाला असता.ज्या ज्यू राष्ट्राने ख्रिश्चनांना देव दिला त्याच ज्यूंची निंदा चर्चवाले करीत आहेत,असे त्याला दिसले असते.एका ज्यू धर्ममार्तंडाने त्याला मरणाची शिक्षा फर्मावली,एवढ्याचसाठी आपली सारी ज्यू जात धिक्कारली जात असलेली त्याला दिसली असती,तर त्याने ख्रिश्चन चर्चला सौम्यपणे सांगितले असते की,आपणास जन्म देणारी माताही एक ज्यू बाईच होती.ख्रिस्त जर आज जर्मनीत येईल,तर तेथील ख्रिश्चन विद्यार्थी त्याला ज्यू समजून त्याच्या पाठीस लागतील.तो रुमानियात जाईल,तर त्याला तेथील लोक धावत्या आगगाडीच्या डब्याच्या खिडकीतून बाहेर फेकून देतील.तो पॅलेस्टाईनमध्ये जाईल तर अरब लोक त्याला ठार करतील व जवळच उभे असणारे ख्रिस्तीधर्मी इंग्रज सैन्य ती गंमत पाहत राहील. अमेरिकेतही पुष्कळशा कॉलेजात ख्रिस्ताला प्रवेश मिळणार नाही.थोडक्यात म्हणजे,आज जर ख्रिस्त जिवंत होऊन येईल,तर त्यालाही ख्रिश्चन राष्ट्रांना स्वतःच्या धर्माकडे घेऊन जाणे अशक्यप्राय होईल व मान हलवून म्हणावे लागेल,"हे प्रभो, हे तात, यांना क्षमा कर.आपण काय करीत आहोत हे यांना कळत नाही." तर मग ख्रिस्ताचे जीवन काय फुकटच गेले? तो काय उगीचच जगला? बिलकूल नाही.बर्नार्ड शॉ सर्वांना बजावून सांगत आहे की, "ख्रिस्ताचे जीवन विफल झाले असे अद्यापि म्हणता येणार नाही.

कारण,त्याच्या पद्धतीने प्रयोग करून पाहण्याचे शहाणपण अद्यापि कोणीही दाखविलेले नाही."


पण शौंच्या या म्हणण्यात नेहमीप्रमाणे अतिशयोक्ती आहे.कारण दोन माणसांनी ख्रिस्ताच्या पद्धतीचा अवलंब केलेला आहे;एक म्हणजे ज्यू तत्त्वज्ञानी स्पायनोझा व दुसरे म्हणजे हिंदूधर्मी गांधी.ख्रिश्चन जनतेला पुन्हा ख्रिस्ताकडे घेऊन जाण्यात ज्यू व हिंदू यांना अद्यापिही यश येण्याचा संभव आहे.






२३/६/२५

नाझारेथचा ज्यू येशू / The Jew Jesus of Nazareth

क्षणभर रोमन लोकांची खुनाखुनी बाजूस ठेवून आपण जरा दूर जाऊ या.रोमन लोकांची ती भांडणे,ते कोलाहल,ते गदारोळ तसेच सोडून आपण पूर्वेकडच्या अधिक शांतताप्रिय राष्ट्राकडे जरा जाऊ या.इकडे अलेक्झांडर,हॅनिबॉल,सीझर जगाला आपल्या महत्त्वाकांक्षांनी व खाटिकखान्यांनी हैराण करीत असता पूर्वेकडील हिंदू,चिनी व ज्यू राष्ट्र शांतीचे महात्मे जगाला देत होती.


हिंदुस्थानात थोर सम्राट अशोक होऊन गेला.ख्रि.पू. २६४ ते ख्रि.पू.२२७ पर्यंत त्याने राज्य केले.एका मोठ्या युद्धात त्याला विजय मिळाला होता.युद्धातील क्रूरता व भीषणता प्रत्यक्ष पाहून त्याला युद्धाचा वीट आला व पुन्हा म्हणून युद्ध करावयाचे नाही.असे त्याने ठरविले व युद्धाऐवजी सदिच्छेचा, बंधुभावाचा व प्रेमाचा संदेश जगभर पसरविणे,हेच आपले जीवनकार्य निश्चित केले.


नाझारेथचा बहिष्कृत ज्यू येशू,मानवजाती कथा,अनुवाद - साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन 


चीनमध्ये कन्फ्यूशियसचे अनुयायीही शांतिप्रसार करीतच होते.कुआंगत्से,मेंन्सियस,मोटी,इत्यादी चिनी शांतिदूतांनी आपल्याच बांधवांची प्रेते तुडवीत जाण्यापेक्षा निराळ्याच मार्गाने जीवन कसे कंठावे हे शिकविले.त्यांनी शांतीचा मार्ग शोधला.

कधीकधी मेन्सियसची वाणी प्रेषिताच्या वाणीप्रमाणे भासे.तो म्हणतो,"श्रीमंतांच्या घरात चरबी आहे,मांस आहे.तर गरिबांच्या पोटाच्या दामट्या वळल्या आहेत ! श्रीमंतांच्या तबेल्यांत धष्टपुष्ट घोडे आहेत, तर दरिद्री लोक भुकेने मरत आहेत ! जिकडे तिकडे उपाशी मेलेल्या लोकांचे मुडदे पडलेले आहेत!... श्वापदे माणसांना व माणसे एकमेकांना खातील.


एपिक्यूरसने स्वार्थाचाच उपदेश केला;पण अविरोधी, शहाण्या स्वार्थाचा मेन्सियसने तेच ध्येय चिनी जनतेपुढे ठेवले.तो उपदेशितो,"सुख खुशाल भोगा,स्वतःच्या सुखासाठी जरूर खटपट करा,पण दुसऱ्यांच्या सुखाआड येऊ नका,

म्हणजे झाले." एपिक्यूरसप्रमाणे व येशूप्रमाणे मेन्सियसलाही लहान मुले फार आवडत. तो लिहितो,"ज्याचे हृदय लहान मुलाच्या हृदयासारखे असते,तोच खरा मोठा."


मेन्सियसच्या शब्दांपेक्षाही मोटीची उपदेशवाणी अधिक सुदंर आहे. उदाहरणार्थ, पुढील उतारा पाहा - 


" एका राज्याने दुसऱ्या राज्यावर हल्ले चढविणे,एका कुटुंबाने दुसऱ्यास लुबाडू पाहणे,माणसांनी एकमेकांस लुटणे,राजांनी निर्दय असणे,प्रधानांनी अप्रामाणिक असणे,पिता-पुत्रांत वात्सल्याचा व पितृभक्तीचा अभाव असणे,इत्यादी गोष्टी साम्राज्याला अपायकारक असतात.परस्पर सहानुभूती व प्रेम दर्शविण्याचा सद्गुण सर्वांच्या जीवनात येईल तर केवढी मौज होईल!राजे एकमेकांवर प्रेम करू लागतील,तर रणांगणाची जरुरीच भासणार नाही.सर्वत्र प्रेम असेल तर कुटुंबातील कोणीही एकमेकांस लुबाडणार नाहीत.सर्वत्र प्रेम असेल तर माणसे चोऱ्या करणार नाहीत,राजे व त्यांचे प्रधान उदार होतील, आई-बाप व मुले यांचे संबंध प्रेमळ होतील,भावाभावांत मेळ व प्रेम राहील,ते भांडणे पटकन विसरतील.माणसे परस्परांवर प्रेम करतील,तर बलवान दुर्बलास चिरडणार नाहीत वा खाणार नाहीत, बहुसंख्य लोक अल्पसंख्यकांना लुटणार नाहीत.श्रीमंत गरिबांचा अपमान करणार नाहीत.सरदारवर्ग गरीब घराण्यात जन्मलेल्या श्रमजीवी वर्गाचा उपमर्द करणार नाही,त्याच्याशी अरेरावीने वा अहंकाराने वागणार नाही. कपटी लोक साध्या,सरळ लोकांना फसविणार नाहीत, वा त्यांच्या डोक्यावर बसणार नाहीत."


चिनी ऋषीची ही वाणी हिब्रू भाषेत भांषातरिली,तर हेच शब्द प्रेषित,इसैया,अ‍ॅमॉस किंवा हिल्लेल यांचेही आहेत, असे आढळेल.ही चिनी वाणी अरॅमिक भाषेत भाषांतरिल्यास ती गॅलिलीतील निळ्या नभाखालच्या पर्वतांच्या व्यासपीठावरून उपदेश करणाऱ्या तदनंतरच्या ज्यू धर्मसंस्थापकांचीच वाणी वाटेल.


गॅलिलीचा तो सौम्य पुरुष! तो फकिराप्रमाणे हिंडणारा महात्मा ! त्याला कोणी देव तर कोणी पागल बनविले आहे! कोणी त्याला जादूटोणा करणारा समजत,तर कोणी त्याला ढोंगी बुवा म्हणत ! कोणी तर त्याला 'अमेरिकन पद्धतीचा प्रचारक' मानतात.पण तो यांपैकी कोणीही नव्हता.प्रेमाने द्वेष शमवावा,क्षमेने सूड जिंकावा,

नम्रतेने अहंकार जिकांवा;शांतीने रक्तपात जिंकावा,असे शिकविणारे जे अनेक महात्मे पूर्वेकडे झाले,त्यांच्याच परंपरेतील व त्याच मालिकेतील तोही एक होता.त्याचे खरे चित्र आजपर्यंत काढले गेलेले नाही व पुढेही कधी काढले जाईलसे वाटत नाही.कारण, त्याच्या प्रत्येक चरित्रकाराने जणू स्वतःचेच चित्र काढून त्याला ख्रिस्ताचे नाव दिले आहे,स्वतःला ख्रिस्तावर लादले आहे! बायबलात जसा येशू चमत्कार करणारा दिसतो;


त्याच्याभोवती जसे तेजोवलय शोभते,तद्वतच रेनन,पापिन,

वूस बार्टन वगैरेंनी लिहिलेल्या चरित्रांतही येशूच्या बाबतीत प्रकार आढळतात.ख्रिस्ताच्या आपणांसमोर असलेल्या चित्रांत खूप विरोधाभास आहेत ! एका गालावर मारले असता दुसरा गाल पुढे करण्यास सांगणारा येशू मंदिरात जमलेल्यांस फटके मारून बाहेर हाकलीत आहे असे दिसते! एका क्षणात तो पृथ्वीवर शांतता आणणारा आढळतो; तर दुसऱ्या क्षणी तो तरवार परजीत आहेसे दिसते ! 


सुखाचे व शांतीचे उपनिषद सांगणारा तो सुखी लोकांची टिंगल उडवितो ! (जे तुम्ही आज हसत आहात,तेच उद्या रडाल,आक्रोश कराल,समजले?) तो शत्रूना क्षमा करतो; पण शत्रूना प्रभूने ठार करावे म्हणून प्रभूला आळवितोही ! स्वर्गाच्या राज्याची घोषणा करणाराच तो अनेक जातीच्याजाती नरकात लोटतो!आपला उपहास करणारांनाही आशीर्वाद देणाराच तो.अंजिराचे झाड अंजीर देत नाही (अंजिरांचा मोसमच नसताना कोणता शहाणा मनुष्य अंजिराच्या झाडापासून अंजीर अपेक्षील?) म्हणून त्याला शिव्याशाप देण्यासही मागेपुढे पाहत नाही! असे हे परस्परविरोधी तुकडे एकत्र करून त्यांवरून जिंवत माणसाचे खरेखुरे चित्र तयार करता येईल का ?


हो.ते तयार करणे शक्य आहे असे मला वाटते.सजीव येशूचे चित्र हवे असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की,कितीही झाले,तरी मानव,मर्त्य होता.त्याचा स्वभाव हळूहळू विकसत गेला.त्याच्या जीवनात हळूहळू उत्क्रांती,वाढ होत गेली.इतर मानवांप्रमाणेच त्याचेही चारित्र्य हळूहळू फुलत गेले.नव्या करारांतील कालगणना आपण दूर फेकून देऊ या.त्यांच्या चरित्रातल्या ज्या अनेक कथा चार पुस्तकांत आल्या आहेत,

त्यांनाही फारसे महत्त्व नाही.त्या तोंडोतोंडी आलेल्या लोककथा आहेत.मानसशास्त्राचे किंवा इतिहासाचे ज्ञान नसणाऱ्यांनी त्या गोष्टी गोळा करून लिहून काढल्या आहेत.एखाद्या चिनी कोड्याप्रमाणे हे तुकडे बायबलात इकडे,तिकडे,चोहोंकडे,सर्वत्र पसरलेले,विखुरलेले आहेत.ते गोळा करून त्यांची नीट जुळणी करून पुनर्रचना करता आली,तर ज्याचे आकलन करता येईल,ज्याच्यावर प्रेम करता येईल, ज्याचे पूजन करता येईल असा पुरुष आपणास खास निर्मिता येईल,एका मर्त्य व्यक्तीचे सुंदर व सहृदय चित्र खचित उभे करता येईल.


हा पुरुष कशा प्रकारचा होता? प्रारंभी तो बंडखोर व तापट डोक्याचा होता,तो प्रतिष्ठितांच्या समाजाचा द्वेष करी;

आपल्यासारखे जे परित्यक्त वा दरिद्री होते, त्यांच्यात तो मिसळे,भोवतालचे जीवन पाहून तो असंतुष्ट झाला होता.अधिक चांगले जीवन सर्वांना लाभावे म्हणून झगडावयाला,लढा करावयाला तो तयार होता.त्याचा स्वभाव जहाल व जलाल होता.तो मारण्यासाठी हात उगारी;शाप देण्यासाठी जीभ उचली. जग सापांनी व सैतानांनी भरलेले आहे,असे त्याला वाटे. जग म्हणजे चोरांचे व लुटारूंचे माहेरघर व दरोडेखोरांची गुहा आहे,असे त्याला वाटे.या सर्वांना शुद्ध करणे किंवा हाकलून देणे हे आपले कर्तव्य आहे,अशी त्याची समजूत होती.थोडक्यात म्हणजे,उत्युत्कट क्रांतिकारक जॉन दि बॅप्टिस्ट याचा तो श्रद्धाळू शिष्य होता.


पण तो मानवांवर अपरंपार प्रेम करी,म्हणूनच त्यांच्यावर दातओठही खाई;त्यांचा द्वेषही करी.ज्यू प्रेषितांचा क्रोध व त्यांची करुणा ही दोन्ही त्याच्या ठायी होती.प्रथम काही असंतुष्ट भिकारडे लोकच त्याच्याभोवती गोळा झाले.पण जसजसे त्याचे अनुयायी वाढू लागले,त्याचे शिष्य त्याची पूजा करू लागले,तसतसा त्याच्या स्वभावातील मधुरतेचा स्तुत्य व उदात्त भाग अधिकाधिक प्रकट होऊ लागला,मातीचे सोने होऊ लागले.तो असंतुष्ट जनतेचा देवही बनला.आणि नंतर त्याचे मरण! पण आपण त्याचे चरित्र अधिक जवळ जाऊन पाहू या व त्याचा स्वभाव निरखू या.


लहानपणी तो नेहमी भटके,कधीही स्वस्थ बसत नसे. त्याच्या स्वभाव बंडखोर होता.त्याला आईबापांनी जेरुसलेम येथे आणले,

तेव्हा तो त्यांना सोडून निघून गेला व ज्यूंच्या धर्ममंदिरात जाऊन तेथील धर्मगरूंशी वाद करीत बसला.इकडे आईबाप त्याला शोधीत होते. शेवटी तो जेव्हा सापडला तेव्हा त्यांनी त्याची चांगलीच कानउघडणी केली.त्यांनी त्याला नाना प्रश्न विचारले. त्याची त्याने जरा रागानेच उत्तरे दिली.वडील मंडळींच्या म्हणण्याकडे तो दुर्लक्ष करू लागला.वडील मंडळीचे न ऐकण्याची प्रवृत्ती त्याच्या ठायी दिसून येऊ लागली.तो आपल्या सदसद्विवेकबुद्धीच्या सांगीप्रमाणे वागू लागला. पुढील अठरा वर्षांत त्याने काय काय केले ते समजत नाही.वयाच्या तिसाव्या वर्षी तो पुन्हा आईबापांना सोडून गेला व जॉर्डन नदीच्या तीरावर भटकत राहिला.


तिथेच तो जॉन दि बॅप्टिस्ट याच्या क्रांतिकारक पक्षास मिळाला.

जॉन हा एक संन्यासी होता.तो वृत्तीने आडदांड व क्रांतिकारक होता.तो द्वेषाचे उपनिषदच शिकवी. अननुतप्तांना वाचविण्यात त्याला विशेष आनंद वाटत नसे;तर अननुतप्तांना शिव्याशाप देण्यात व त्यांना शासन करण्यात त्याला खरा आनंद वाटे.

सुखोपभोग सुख म्हणजे त्याच्या मते पाप;व धनदौलत,इस्टेट असणे लाजिरवाणे.या जीवनात सुख मिळवू पाहणे म्हणजे पुढे कायम नरकाचा धनी होणे होय,असे तो सांगे.स्वतःचा उद्धार व्हावा असे वाटत असेल त्याने दारिद्र्याचे व्रत घ्यावे,अंगावर चिंध्या घालाव्यात,केस कसेतरी वाढवावे, स्वतःला असुखी करावे,

ईश्वराच्या आज्ञा पाळाव्यात व आपल्या (जॉनच्या) म्हणण्याप्रमाणे वागावे,असे जॉन दि बॅप्टिस्ट प्रतिपादत असे.


ही मतप्रणाली जरी प्रखर वैराग्याची व जरा असंस्कृत असली,

तितकीशी सुंदर नसली,तरी येशू तिच्याकडे ओढला गेला.

जॉनप्रमाणेच तोही बंडखोर होता, रूढींचा द्वेष्टा होता.त्याला आजूबाजूच्या लोकांच्या दंभाची मनस्वी चीड येई.जॉर्डन नदीच्या पाण्याने येशूला शुद्ध करून घेऊन नवदीक्षा देण्यात आली. तो जॉनचा मुख्य शिष्य,पट्टशिष्य झाला.पुढे जॉनला अटक झाली व येशू एकटाच राहिला.तो रानावनात भटकत राहिला.


मूसा, बुद्ध वगैरेंच्याप्रमाणेच त्यानेही केले.अनंत आकाश व निर्जन वन यांच्या सान्निध्यात राहून तो विचार करू लागला.

त्या गंभीर शांततेत त्याची विचारवेल फुलली व बहरली.तो आपल्या जन्मग्रामी परत आला.आपल्या लोकांना नवीन संदेश द्यावयास तो अधीर झाला होता.


पण त्याला धोंडे मारून त्याची हुर्रेवडी उडवण्यात आली! त्याच्या कुटुंबीयांनी त्याला हाकलून दिले व 'त्याचा आमचा काहीही संबंध नाही,तो एक भटक्या व निकामी माणूस आहे',असे म्हटले.नाझारेथच्या प्रमुख नागरिकांनी 'जर येथील शांततेत तू व्यत्यय आणशील बिघाड करशील,तर तुला कड्यावरून खाली लोटून देऊ',अशी धमकी दिली.भटकून भटकून बाळ परत घरी आला,तो सारे दरवाजे आपणास बंद आहेत, असे त्याला आढळून आले.रानातील पशुंनाही गुहा असते,पक्ष्यांनाही घरटी असतात,पण नाझारेथच्या या परित्यक्त्त्याला मात्र डोके टेकवायला कोठेही जागा नव्हती.


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….!