हात,पाय किंवा इतर कुठला असा चालता येण्यासारखा अवयव नसतानाही ज्याला चालता येते असा साप हा एकमेव प्राणी आहे.
आपले डोके उभे करून जलद गतीने जमिनीवरून चालणारा साप कुणी पाहिलाय ? त्याच्या गतीतले तेजस्वी सौंदर्य कुणी न्याहाळलंय ? कुठंही हिसका नाही.पाण्यातील माशाला गतीतली विविधता नाही.डौलदार वळण,सुबक आकार,रमणीय सौंदर्य,
तेजस्वी डोळ्यांतील भेदकता,अन्नावाचून दीर्घकाळ राहणारा,कात टाकून पुनःपुन्हा तरुण होणारा, अशी एक ना अनेक गूढे असलेला साप आजच्या विज्ञानयुगात जिज्ञासेचा विषय वाटतो.वाघ-सुसरीची वाटत नाही इतकी भीती माणसाला सापाची वाटते. त्यातल्या काही जातींना जालीम विषांची देणगी मिळाली आहे.त्यांचा दंश कित्येकदा इतका दाहक असतो की माणूस तडफडून मृत्यू पावतो.म्हणूनच त्याला काळसर्प म्हटले आहे.
अशा त्याच्या अलौकिक गुणधर्मामुळे आदिमानवाने त्याला देवळात बसवून देव मानले तर त्यात आश्चर्य नाही.त्याला पूज्य मानण्याची प्रथा जगातील अनेक देशांत अजूनही अस्तित्वात आहे.चरक, सुश्रुत व वाग्भट संहिता या वैद्यकीय ग्रंथांत सापाचे प्रकार सांगून सर्पदंशावर उपाय सांगितले आहेत.विषाची परीक्षा पाहू नये म्हणतात.
त्याकरिता वाग्भटाने सल्ला दिला आहे,'ज्या ठिकाणी सर्वांची भीती असेल त्या ठिकाणी फिरताना दिवसा छत्री व विशेष करून रात्रीच्या वेळी हातात खुळखुळा व काठी बाळगावी.छत्रीच्या सावलीने व काठीच्या आवाजाने साप भिऊन पळून जातात.' संस्कृत कोषवाङ्मयात सापांविषयी विपुल माहिती आहे. अभिधानचिंतामणी कोषात सापाच्या वीस नावांचा उल्लेख आहे.
त्याचे एक नाव पवनाशन- म्हणजे हवेवर जगणारा असे आहे.त्याच्या अवयवांचा परिचय करून देताना नागाला दृष्टिविष असल्याचा लक्षणीय उल्लेख आहे.कुक्कुटारी सर्पाचा रंग कोंबड्याच्या वर्णासारखा असून तो कुक्कुटासारखाच स्वर काढत असल्याचा निर्देश महत्त्वपूर्ण आहे.भविष्य पुराणातील अध्याय ३३ म्हणजे सर्पसंहिताच आहे.त्यात सर्पाचे अनेक प्रकार सांगून त्याची रानओळख,वितरण व सवयी-आचरणाविषयी माहिती दिली आहे.
त्याच्या विणीविषयी दिलेली माहिती तर अभूतपूर्व म्हणावी लागेल.
सर्पज्ञांनी कश्यप ऋषीचा ठिकठिकाणी संदर्भ दिला आहे.ऋषी कश्यपाचा उल्लेख महाभारतातही आला आहे.त्याने कद्रू व विनता ह्या दोघी बहिणींशी विवाह केला.कद्रूने सर्वांना जन्म दिला तर विनतानं गरुडांना जन्म दिला.
मानववंश आणि दैवत कथांचा विलक्षण मेळ घालण्यात व्यासांची प्रतिभाच दिसून येते.पण अभिधानचिंतामणी कोष वगळता सर्पाच्या आवाजाचा उल्लेख कुठेही आढळत नाही.
तीच स्थिती कर्नल खंडेराव घारपुरे व विष्णु गोविंद चिपळोणकर यांच्या सर्पावरील मराठी ग्रंथांतून आढळून येते.चिपळोणकरांचा 'हिंदुस्थानातील सर्प' हा ग्रंथ तर एका शतकापूर्वी लिहिला गेलेला.मराठीतून इतका शास्त्रशुद्ध ग्रंथ माझ्या वाचण्यात नाही.
देवाच्या अस्तित्वाविषयी जेवढे गुढ आहे.तेवढेच सापाच्या आवाजाविषयी आहे आधुनिक सर्पतज्ञांचे मत असे की सापाला स्वरतंतूच नसतात तर आवाज कुठून येणार? हा भ्रमाचा भोपळा पडला तो नवेगावबांधचे माधवराव पाटील आणि गांधारी जवळ राहणाऱ्या निरगूने कितीतरी वेळा सापाचा आवाज जंगलात ऐकला होता.सापाच्या आवाजाची ओळख पाटील निरगूकडून शिकले.त्याचे प्रत्यंतर एकदा पाटलांबरोबर चळ्याकाठाने भटकत असताना आले.
सूर्य मावळतीकडे झुकला होता.आभाळ गर्जू लागलेले. विजा चमकू लागलेल्या आणि टर्रर्रर्र आवाज येऊ लागला.गावातल्या चिंचेच्या झाडावरच्च्या घरट्याकडे आभाळातून जाणारे बगळे-ढोकरी क्षणभर उडायचे थांबले.पडारीतून बागडणारी चिमणी पाखरे एकाएकी शांत झाली.तशीच तुऱ्यांना चिकटून राहिली.एखाद्या चिनी चित्रातल्या पाखरासारखी. जंगलात चीचिर ची करीत ओरडणारा तित्तिरही गप्प झाला.
"सायब, ऐकलं काय ?"
"काय ?"
"टवऱ्या मुहाडोर सापाचा आवाज." मला वाटले होते की हा येणारा आवाज लावा पक्ष्याचा असावा.पण तो होता सापाचा.साप एवढ्या मोठ्याने ओरडू शकतो यावर माझा विश्वासच बसला नसता.पण पाटील मोठे सर्पज्ञानी आहेत.
कल्याणचे श्री. लालू दुर्वे महाराष्ट्र व मध्य प्रदेशातल्या घनदाट जंगलातून शिकारीच्या निमित्ताने गेली तीन तपे फिरत आहेत.त्यांना मी एकदा सहज सापाच्या आवाजाविषयी विचारले,तेव्हा त्यांनी सांगितले... "१९४७ च्या सुमारास हिसव हाल स्टेशनपासून १५ मैलांवर हरणाच्या शिकारीसाठी गेलो होतो.हरणाच्या शोधात फिरता फिरता दूर कुठून तरी कवड्याच्या ओरडण्याचा आवाज आला.आमच्याबरोबर जो जाणता भिल्ल होता तो म्हणाला, 'तिकडं जाऊ नका. ते किडं... म्हणजे साप ओरडत फिरतंय.ते फार खतरनाक आहे.'
परवा गरुड-घुबडाच्या शोधात नाशिकजवळच्या पेठला गेलो होतो.तेथे आवरी गुरुजींची योगायोगाने भेट झाली. हा ५०-६० वर्षांचा जंगलात राहणारा निसर्गज्ञानी.ह्या कोकणी गृहस्थाने सापाविषयी अगदी बारीकसारीक माहिती गोळा केली आहे.बोलण्याच्या ओघात सर्पाच्या आवाजाचा विषय निघाला. मी विचारलं-
"गुरुजी, तुम्ही कधी सापाचा आवाज ऐकलात काय ?"
"होय."
"कधी, कुठं ऐकायला मिळाला तो आवाज ? कसा असतो ?"
"सांगतो साहेब,आता या गोष्टीला १५-१६ वर्षं झालीत. पेठजवळ ४-५ किलोमीटर अंतरावर जुनोठी गाव आहे. मी तिथलाच.गाव तसं लहानच.गावाबाहेर मारुतीचं देऊळ. तिथं मी रोज सांज वेळी दिवा लावायला जात असे.त्या दिवशी मी दिवा लावून घरी येत होतो.वाटेत पडीक जागा आहे.तिथं वीतभर गवत उगवलेल. इतक्यात चिव चिव असा कोंबडीच्या पिलासारखा आवाज कानी पडला.मला वाटलं अशा सांज पारी इथं कोंबडीचा आवाज कसा ? एखादं पिलू चुकून मागं तर राहिलं नाही ? पुन्हा तर्क केला की अशा वेळी गावाबाहेर कुठलं पिलू असणार ! मला आठवण झाली ती माझे मामा अर्जुन भोये व चुलता लक्ष्मण आवारी यांची.
त्यांच्या बोलण्यात मी ऐकलं होतं की सापदेखील असाचा आवाज काढतो.खात्री करावी म्हणून मी जरा सावधगिरीनं तिथं उभा राहिलो.आभाळात अष्टमीचा चंद्र डोक्यावर होता.आभाळ अगदी स्वच्छ.चंद्राचा प्रकाश तिथल्या उंच विरळ गवतावर पडला होता.
त्यातून चिव चिव आवाज आता दुसऱ्याच ठिकाणाहून येत होता. समोर गवत हालत होतं.नागमोडी.आणि थोड्यावेळानं साप चांदण्यातून जाताना चमकला. थांबून थांबून तो आवाज कानी पडत होता.तो नागच होता.उंच फणा काढून तो जाताना दिसला.विषाची परीक्षा पाहणं नको म्हणून मी तिथून गावाकडं पळ काढला.
"आणि दुसरा प्रसंग त्याच वर्षातला.गावाला लागून जंगल.एक दोन फर्लांगावर. पहाटे मी जंगलात गुरं चारायला नेली.तसं आजूबाजूला दिसण्याइतकं चांदणं पडलं होतं.इतक्यात गांजी लावाचा आवाज कानी पडला.गांजी लावा रानात हालचाल झाली की एकमेकांना चिक् चिक् आवाजानं साद घालतात. इतक्यात एक लावा त्या आवाजाच्या दिशेनं माझ्या डोक्यावरून उडत गेली.
आणि तिथं जाऊन हळूच विसावली.पण ती तशीच भडकून-चमकून दुसऱ्या दिशेनं उडाली.तेव्हा मला विशेष वाटलं नाही.पण दुसऱ्याच दिशेनं आणखी एक लावा तिथं जाऊन धडकली.तोच ती भडकून उडाली.मी त्या ठिकाणी डोळ्यात जीव आणून पाहात होतो.त्या ठिकाणची गवताची पाती एखादा सर्प जाताना हालतात तशी नागमोडी हालत होती.तो सर्पच होता.गावचा गुराखी त्रिंबक रावजी राऊत असे प्रसंग व आवाज दिवसा उजेडी आणि रात्रीही पाहिल्या-ऐकल्याचं सांगायचा.तो म्हणायचा, 'साप गांजी लावाचा हुबेहूब आवाज काढून-फसवून त्यांना जवळ बोलावतो.नजीक येताच तिला दंश करून पकडतो.'
"आणखी एक असाच प्रसंग आठवतो." ते सांगू लागले. "नाशिकजवळच्या हरसूळजवळ ठाणेपाडा इथं माझा दोस्त रामा रावजी सापटे राहातो. तिन्ही-त्रिकाळ जंगलात भटकणारा हा वारनी पला गुरुस्था अरण्य विद्या मी त्याच्याकडूनच शिकलो.
एकदा तो व मी जवळच रायत्याला राहणारा आमचा मित्र किसन जानू गवळी याच्याकडे मुक्कामाला गेलो.रात्री बराच वेळ गप्पा मारल्या.शिकार,भुतंखेतं,जादूटोणा,मंत्र-तंत्र, करणी,भानामती अशा एक ना अनेक विषयांवर गप्पा रंगात आल्या होत्या.तोच रामा सपाटे म्हणाला, 'ऐका तर काय आरडतंय!' आम्ही लक्षपूर्वक ऐकत होतो. तसा आवाज आम्ही जंगलात-रानावनात भटकताना अनेक वेळा ऐकला होता.त्यामुळे आम्हाला नवल वाटले नाही. मी विचारले, 'डरगा लाहुरी ओरडतंय नव्हं!'
"ना, तो आवाज सापाचा आहे.डरगा लाहुरी कधी रातीची बोंबलत नाही.तिचा आवाज लांब तर सापाचा आवाज तीक्ष्ण असतो." अशी त्याने दोहोंच्या आवाजातली ओळखण सांगितली.
"साप केवळ कोंबडी किंवा लाहुरी पक्ष्यासारखं ओरडतात असं नव्हे तर ते जनावरांसारखेदेखील आवाज काढताना मी ऐकलंय." गुरुजी पुढे सांगत होते.
"ते कसं?" मी.
"त्या वेळी मी गुजरातमधील धरमपूर येथे होतो. धरमपूर पेठपासून ७०-८० कि. मी. अंतरावर आहे. आता या गोष्टीला तीन तपं झाली.पूर्वी ह्या रस्त्यानं दिवसा जायलादेखील भीती वाटे इतकी किर्र झाडी होती.आता एखाददुसरी वस्ती तरी दिसतेय.त्या काळात वाटेत माणूसदेखील भेटायचं मुष्कील.त्यावेळी मी डांग सेवा मंडळाचा कार्यकर्ता होतो. एकदा जवळच असलेल्या मारवाड गावात गेलो. सोनू नायक व चित्ता नायक या वारल्यांच्या घरी मुक्कामाला होतो. गावाभोवती घनदाट जंगल.रात्रीची जेवणं झाली. मी पथारी पसरून अंग टाकलं.
दिवसभराच्या श्रमामुळं मला लगेच झोप लागली.रात्री मध्येच झोप चाळवली. जंगलातून दुरून बकरी ओरडते तसा बे ऽ बे ऽऽ असा आवाज कानी पडला.मी जवळच झोपलेल्या चित्ता नायकाला जागं केलं. त्यानं विचारलं, 'गुरुजी झोप येत नाही काय ?'
"अरे चित्ता, रानात कवापासून बकरी आरडतीय.वाघानं तर गाठली नसेल ?"
"गुरुजी, तो बकरीचा आवाज नाही.एखाद अर्धा कोसावरून तो आवाज येतो तो आरा-अजगराची जात-सापाच्या मादीचा.ती माजावर आलीय.नराला साद घालतेय. हा आवाज कधी सात-आठ दिवस तर प्रसंगी एक-दोन महिनेही ऐकू येतो."
आभाळातल्या चांदणीकडे मी पाहिलं.मध्यरात्र झाली होती.
सापाचं जुगणं कधी पाहू नये म्हणतात.पण असं दर्शन झाल्यावर बरी वाईट भावना आम्हा लोकांत दृढ नाही.ते थंडीचे दिवस होते.मी पेठहून उबरद गावाकडे जाताना वाटेत जंगलात धामणीची रतिक्रीडा पाहिली.वेळ असावी सकाळी दहा-अकरा वाजताची.ती एकमेकांना गुंडाळून जमिनीपासून दोन फूट उंच उभी होती.बाकीचं धड जमिनीवरच काटकोनात लोळत होतं. त्या वेळी ते चीत्कार करीत.एकमेकांचे चुंबन घेत होते. पण आवाज नर की मादी करीत होती हे मात्र कळले नाही." (जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली, प्रकाशक-मकरंद भास्कर कुलकर्णी,साहित्य प्रसार केंद्र सीताबर्डी नागपूर)
पेठच्या वनविश्रामगृहात व्हरांड्यात बसून आम्ही बराच वेळ बोलत होतो.बाहेर किर्र अंधार होता.इतक्यात वादळी पावसाला सुरुवात झाली.तेवढ्यात विजेचे दिवे गेले.वनविश्रामगृहात अंधार पडला.चौकीदाराने पितळेचा लँप टेबलावर आणून ठेवला.
पावसाळी किडे-पतंग दिव्याभोवती पिंगा घालू लागले.जेवणे उरकून आम्ही पलंगावरच्या मच्छरदाणीत प्रवेश केला. बाहेर डासांची विलक्षण गुणगुण ऐकू येत होती. कौलावर पाऊस थड् थड् वाजत होता.आजूबाजूच्या झाडांची पाने सळसळत होती.एकदा-दोनदा घुबडाचा घुग्घुग् असा दीर्घ स्वर कानी आला आणि वातावरणात विरला.थोड्या वेळाने वादळ शमले.नवीन जागेत लवकर झोप येत नसल्याचा माझा अनुभव आहे.
इतक्यात शेजारच्या पलंगावरून आवरी गुरुजींचा आवाज आला.
"साहेब, तुम्ही पलंगावरच असा.खाली उतरू नगा."
"का बरं?" मी किंचित घाबरल्या स्वरात म्हटलं.
"इथल्या सतरंजीवरून एक जीवाणू सरपटत जात असल्याचा आवाज मला ऐकू येतोय."
मी उशालगतच्या छोट्या विजेरीच्या प्रकाशात पाहिले. एक मोठा नाग सरपटत दारातून मागच्या व्हरांड्यात जाताना दिसला.उजेडात त्याची त्वचा चमकत होती. गुरुजींनी हळूच पलंगावरून उतरून दिव्याची वात मोठी केली तसा सळकन् वीज चमकल्याचा भास झाला आणि व्हरांड्यातून नाहीसा झाला. गुरुजींनी दारं बंद केली.नंतर रात्री मला झोप आलीच नाही।